Sunday, January 10, 2021

इतिहास, इतिहासकार आणि ऐतिहासिक भ्रम

 


“असे घडले...” ही हकीगत सांगतो तो इतिहास अशी आपण इतिहासाची साधारण व्याख्या करतो. पण जे सांगितले जाते त्याचे अनेक पदर असतात. जे सांगितले जाते ते खरेच तसेच्या तसे घडले होते हे ठामपणे सांगता येतेच असे नाही. अगदी पुरावे असले तरी त्या पुराव्यांचे आकलन इतिहासकारपरत्वे वेगळे असते. त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. पुन्हा पुराव्यांची विश्वासार्हता काय हा प्रश्न असतोच. अनेक पुरावे बदलले जातात किंवा अडचणीचे पुरावे नष्ट केले जातात. इतिहासाच्या अनेक बाबींकडे तर साफ दुर्लक्ष केले जाते.

बव्हंशी इतिहास हा जेत्यांचा, सत्ताधा-यांच्या वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. आपल्याला आवडतो तोच खरा इतिहास असा समाज असणारे सामाजिक वर्ग असल्याने समाजमनही एकाच आणि समान इतिहासाकडेही वेगवेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे इतिहासावरून असंख्य सामाजिक संघर्ष निर्माण होतात. इतिहासाने आपल्याला डावलले आहे अथवा आपल्यावर अन्याय केला आहे असे वाटणारे समाजघटकही संघर्षरत होतात. आपलाच इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यात अनेकदा अभिनिवेश असतो आणि पुराव्यांची सोयीनुसार मोडतोड करत आकलन केले जाते आणि नवाच इतिहास लिहिला जातो. पण तो काय आणि अगदी इतिहासकार म्हणून गांभीर्याने लिहिणा-या अभ्यासक/संशोधक इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास काय, यात फार फरक असतोच, तो तटस्थ आणि निरपेक्ष असतोच असे नाही.

शिवाय, भारतीय इतिहासातून सुटून गेलेल्या अनेक बाबी आहेत. आपला इतिहास हा बव्हंशी राजकीय व धार्मिक इतिहास आहे. त्यात सामाजिक  व आर्थिक इतिहासाचा क्वचितच समावेश असतो. किंबहुना त्याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेले आहे. शिवाय इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची जी कालरेखा गृहीत धरून इतिहासाची जी मांडणी केलेली आहे तीच संशयास्पद असल्याने इतिहासरचनाही विस्कळीत व चुकीची झाली आहे. त्यामुळे भारतीय धर्मेतीहासाची रचनाच साफ बदलून गेलेली आहे. उदा. इसपू. १२०० च्या आसपास भारतात प्रवेशलेल्या वैदिक धर्मापासूनच भारतिय धर्मांचा इतिहास सुरु होतो या मताचा मोठा पगडा इतिहासकारांवर आहे. त्यातून येथील प्राचीन लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू म्हणतो) आणि समन, व्रात्य, यती  या वैचारिक संस्कृती, ज्यातून जैन, आजीवक आणि बौद्ध हे धर्म निर्माण झाले त्यांच्याही मुळांचा इतिहास झाकोळला गेला आहे किंवा दुषित झाला आहे हे आपल्या लक्षात येईल. वैदिकाश्रयी इतिहासरचना हा भारतीय इतिहास लेखनातील फार मोठा दोष आहे. त्यामुळे आपल्याला सत्याच्या किमान जवळ जाणारा इतिहास मिळत नाही. आपल्या हाती आहेत ते जाणीव-पूर्वक अथवा अज्ञानाच्या अरण्यातून झिरपणारे इतिहासाचे कवडसे जे विद्रूप झालेले आहेत. साहजिकच आमची मानसिकताही त्यामुळे इतिहास-अज्ञ अशीच बनलेली आहे.

असे असले तरी इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो हे अमान्य करता येत नाही. किंबहुना इतिहास आपली समाजमानसिकता ठरवण्यात मोठा वाटा उचलत असतो. कोणात गर्व,  स्वाभिमान तर कोनात न्यूनगंड निर्माण करण्याचे कार्यही इतिहास करतो. हे अनेक इतिहास-लबाडांना माहित असल्याने ते इतिहासाचा आपला वर्चस्वतावाद रेटण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात. अनेकदा वदंताच इतिहास बनवला जातात. नव्हे त्याच सत्य असून तोच इतिहास आहे असा ग्रह करून दिला जातो. अगदी राम किंवा कृष्ण यांचा पुराकथांना अपरिवर्तनीय ऐतिहासिक सत्य मानत त्यावरूनही सामाजिक संघर्ष पेटवले जातात थोडक्यात इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, कोणी आणि कोणत्या हेतूने सांगितला आहे याचा पगडा इतिहासावर आहे आणि यावर आधारित असलेले समाजाचे आकलन आहे. आणि असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल.

जे तटस्थपणे इतिहास लिहिण्याचा आपापल्या आकलनानुसार प्रयत्न करतात त्यांचेही अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.

मागे दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादी, पुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पाडले होते. महाराष्ट्रात इतिहासावरून आजही कटू संघर्ष सुरूच आहेत. आंदोलने झालेली आहेत. किंबहुना इतिहासाच्या स्वार्थी आकलनातून आणि त्याच्या अतिरेकी अस्मितांच्या अवडंबरातून सामाजिक दुरावे वाढण्यास हातभारच लागलेला आहे. आणि त्याचा नकळत दबाव इतिहासकारांवर येतो आणि त्याचे लेखनस्वातंत्र्य नकळत हिरावले जाते.

 खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजे, तरच इतिहासाचे आकलन समृद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते. आपल्याला जसा आवडतो तोच आणि तसाच इतिहास या आग्रहामुळे आणि मागणी तसा पुरवठा करू पाहणा-या इतिहासकारांमुळे इतिहासाचे काय होते हे आपण सहज पाहू शकतो.


खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असायला हवे, मग व्यक्तीगत आकलन भिन्न का असेना. जे सामोरे येईल ते सत्य किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.राखीगढी येथील सापडलेल्या मानवी सांगाड्यातून मिळवलेल्या जनुकांचे शास्त्रीय परीक्षण आणि शोधनिबंधातून प्रसिद्ध झालेले त्याचे निष्कर्ष आणि त्याच लेखकाने काढलेल्या निष्कर्षांच्या अत्यंत विरुद्ध अशी मते एका पुरातत्वविद्वानाने माध्यमांत व्यक्त करुन मोठा गोधळ माजवला होता. त्याची माध्यमांत प्रसिद्ध झालेली मते म्हणजेच शोधनिबंधातील निष्कर्ष असा समज करून देण्याचा प्रयत्न करत या विद्वानाने एकुनातीलच शास्त्राच्या मान्य पद्धतीला सुरुंग लावला. अशा लबाड्या जेंव्हा होतात तेंव्हा एकुणात इतिहासच गढूळतो आणि आपले आकलनही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

असे असल्याने निखळ इतिहासाची पुन्हा नव्याने रचना करणे आवश्यक बनून जाते. इतिहासातील सुटलेले मुद्दे, काही कूटप्रश्न, दुर्लक्षित किंवा अंधारात ठेवल्या गेलेल्या व्यक्ती, सामाजिक आणि आर्थिक इतिहासातील महत्वाचे मुद्दे आपण या लेखमालिकेत चर्चेला घेणार आहोत. आपले इतिहासाचे आकलन कशामुळे दुषित झाले आहे हे समजावून घेत आपल्या भूतकाळाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कवडशांतून का होईना पुराव्यांची नव्याने चाचपणी करणार आहोत. आपला दुर्लक्षित गतकाळ समजावून घेणार आहोत. आजवरच्या लिखित इतिहासाने निर्माण केलेले भ्रम दूर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.

-संजय सोनवणी

1 comment:

  1. Just wanted to let you know that if you have not read it, you must read a book रावण, राजा राक्षसांचा by Sharad Tandale

    https://www.goodreads.com/book/show/37834711-ravan-raja-rakshasancha

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...