Friday, August 5, 2022

काश्मीरचा सम्राट ललितादित्यचे व्यापारी मार्गांवर स्वामित्व!

 

 


आठव्या शतकाच्या प्रारंभी मोहम्मद बिन कासीमने बोलन खिंडीतून वायव्य भारतावर आक्रमण केले ते अफगानिस्तानातून जाणा-या व्यापारी मार्गावर स्वामित्व मिळवण्यासाठी आणि राजा दाहीरने कैद करून ठेवलेल्या अरबी व्यापारी व प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी. अरब साम्राज्यवादाने भारतावरील आक्रमणाआधीच मध्य आशियातून चीनला जाणा-या मार्गांवर स्वामित्व आणायला सुरुवात केली होती. तोखारीस्तानात तर अरबांनी आपल्या वसाहतीही वसवल्या होत्या. पण तेथील स्थानिक बंडाळ्याही वाढल्या होत्या. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुतैबला मर्व प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमले. त्याने सर्व उठाव सन ७०९-७१० मध्ये तर चिरडलेच पण तेथील राजाला पकडून अरबांची तत्कालीन राजधानी दमास्कसला पाठवून दिले. त्याने एवढी मोठी आघाडी उघडली होती की समरकंदही ताब्यात घेऊन तेथे ठाणे वसवले. अशा रीतीने रेशीममार्गावर अरबांचे स्वामित्व प्रस्थापित होऊ लागले होते. अरबांची मुख्य स्पर्धा तिबेटशी होती कारण तत्पूर्वी सर्व व्यापारी मार्गांवर त्याचेच आधिपत्य होते. अगदी लदाख, गिलगीट-बाल्टीस्तान मधून जाणारे व्यापारी मार्गही तिबेटच्याच कब्जात होते. त्यामुळे काश्मीरच्या मध्य आशियाशी होणा-या व्यापारावाराही बंधने आलेली होती. अशा स्थितीत चीनशी मैत्री करणे काश्मीरला भाग होते पण अरबांशी होणा-या लष्करी झगड्यात चीन विशेष काहीही करू शकला नाही.

 आधी स्वबळावरच अरबांशी संघर्ष करत त्यांना सीमेवरच ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या काश्मीरच्या राजा चंद्रापिडाचा व लगोलग राजा तारापीडाचा मृत्यू झाल्यावर सन ७२५ मध्ये ललितादित्य मुक्तापीड हा महान सम्राट काश्मीरच्या गादीवर आला. कासीमचा मृत्यू पूर्वीच झालेला होता. तामीम नावाचा अरब प्रशासक तेंव्हा वायव्य भागात आपली व्यापारी व लष्करी ठाणी सांभाळून अन्यत्र आक्रमणे करत होता. सत्तेवर येताच ललितादित्याने अरबांविरुद्ध आघाडी उघडली. त्यासाठी यशोवर्मन या कनौजच्या राजाचीही मदत घेतली. युद्ध एवढे भयंकर झाले कि तामीमला आपली ठाणी खाली करत पळ काढावा लागला. ललितादित्याला सारे व्यापारी मार्ग ताब्यात घ्यायचे असल्याने त्याने खैबर खिंडीतून पाठलाग करत तामीमच्या सैन्याचा बिमोड तर केलाच पण तामीमही त्या युद्धात ठार झाला. या युद्धाची तीव्रता एवढी मोठी होती की परतू शकलेले अरब पुन्हा हिंदकडे परतायला नकार देवू लागले. काबुल व झाबुल येथील राजवटी काश्मीरच्या पूर्वापार मित्र होत्या. कोरियन प्रवासी हुएचो याच्या नोंदींनुसार झाबुलीस्तान आणि काबुल-गांधारचे शासक त्याच्या भेटीच्या काळात (७२६-७२९) तोखारीस्तानमधुन तेथे स्थलांतरीत झालेले तुर्क होते. तेथील राजा तेगीन खोरासान शहा आणि राजा झिबील यांना मांडलिक करून त्यांचेही सैन्य सोबत घेत ललितादित्याने काबुल-बामियान मार्गे बाल्ख-तोखारीस्तानवर स्वारी केली. तेथील अरबी ठाणी उखडून काढली. तेथे अज्ञातवासात पळून गेलेल्या स्थानिक राजा कुल्तू तोन तार्दुला पुन्हा सत्तेवर आणले व आपला मांडलिक केले. या बदल्यात राजा तार्दूने आपली कन्या ईशानदेवी (हे मूळ नावाचे संस्कृतीकरण आहे) ललितादित्याला विवाहात दिली. तुर्की सेनानी चंकून हा सेनापतीपदावर नेमला गेला व मध्य आशियायी युद्धतंत्राचा समावेश काश्मिरी सेनेत झाला. त्याचा मुलगा ईशानचंद्र हा ईशानदेवीसमवेत ललितादित्याला सामील झाला. या नातेसंबंधामुळे काश्मिरी कलाशैलीवरही मध्य आशियायी तंत्राचा मोठा प्रभाव पडला. तोखारीस्तानवरील ललितादित्याचा विजय एवढा गाजला कि काश्मीरमध्ये या विजयाची स्मृती साजरी करणारा उत्सव अकराव्या शतकापर्यंत साजरा केला जात होता. अल्बी रुनीने आपल्या किताब अल हिंद या ग्रंथात म्हटले आहे कि राज मुत्ताइ (मुक्तापीड) याने तुर्कांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी एक उत्सव साजरा करत असत.

 तोखारीस्थान अशा रीतीने आपल्या अंमलाखाली आणल्यानंतर ललितादित्य मध्य आशियातील समरकंद येथे ससैन्य पोचला आणि तेथूनही अरबांना हुसकावून लावले. आता त्याचे लक्ष गिलगीट-बाल्टीस्तानवर होते. तेथून तिबेटी वर्चस्व हटवणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने अतिशय दुर्गम असलेल्या हुंझा खो-यातून जाणा-या व्यापारी मार्गावरून थेट  गिलगीटमध्ये आपले सैन्य घुसवले. त्थील तिबेटी सेना परास्त करून तेथील पटोला शाही राजाला मांडलिक बनवून बाल्टीस्तानकडे मोहरा वळवला. तेथे तिबेटी सैन्याशी झंझावाती युद्ध करून तेथून त्यांना पळ काढायला भाग पाडले. ललितादित्य तेथून परत सरळ काश्मीरला परतु शकत होता, पण त्याने तसे केले नाही. पळणा-या तिबेटी सैन्याचा पाठलाग करत थेट कारगील गाठले. झोजिला खिंडीचे रक्षण करण्यासाठी तिबेटने मोठे सैन्य ठेवलेले होते. तेथेही धमासान युद्ध झाले. मग ललितादित्याने लेहावर धडक मारत तेथून जाणारे तीन व्यापारी मार्ग स्वत:च्या नियंत्रणात तर आणलेच पण लदाख काश्मीरला जोडला. झोजिला खिंडीच्या मार्गाने तो श्रीनगरला परत आला. म्हणजे पश्चिमेकडील खैबर खिंडीतून जात पूर्वेकडून परत येत एक अवाढव्य भाग आपल्या राज्याला जोडत व्यापारी मार्गावर स्वामित्व प्रस्थापित करणारा हा सम्राट अशोकानंतरचा एकमेव भारतीय सम्राट.

 ललितादित्याला व्यापारी मार्गांचे महत्व पुरेपूर समजले होते. ललितादित्याच्या या विजयांमुळे अरब अस्वस्थ तर झालेच होते पण तिबेटही संतप्त झाला होता. दोन्ही सत्ता आता एकत्र येत ललितादित्याविरुद्ध आघाडी उघडायची शक्यता होती. त्यामुळे ललितादित्याने ७३३ मध्ये चीनला एक शिष्टमंडळ पाठवले. त्यात ललितादित्याने संदेश दिला होता कि “आपण स्वबळावर पाचही व्यापारी मार्ग स्वतंत्र केले असून येथे आता कायमस्वरूपी रक्षणाची आवश्यकता आहे. चीनने कायमस्वरूपी लष्करी तळ स्थापन केला तर काश्मीर सर्वतोपरी मदत करेल.” पण अंतर्गत संघर्षात अडकलेल्या चीनने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तिबेटशी पुढे पुन्हा ललितादित्याला युद्ध करावे लागले.

 चीनने ७३७ नंतर कोरियन सेनानी ली लिन्फू याच्या नेतृत्वाखाली काही लष्करी हालचाली सुरु केल्या पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. तिबेटनेही गिलगीटशी आपले संबंध पुन्हा प्रस्थापित करावेत यासाठी गिलगिटमधील सुशिलिझी या तिबेटसमर्थक पुढा-याला ख्रि-मा-लोद ही राजकन्याही विवाहात दिली. पण ललितादित्याच्या ठाम लष्करी धोरणामुळे हाही मार्ग फसला.

 ललितादित्याने व्यापारी मार्गांवरील स्वामित्वातून येणा-या धनाचा सदुपयोग करत काश्मीरमध्ये अवाढव्य निर्माण कार्ये केली. यात प्रामुख्याने परिहासपूर हे नवे राजधानीचे नगर आणि मार्तंड मंदिराचे बांधकाम आजही भुरळ घालते. निर्माणकार्ये केल्यानंतर ललितादित्याने अर्धा भारत जिंकत आपले लक्ष पुन्हा मध्य आशियाकडे वळवले. चीन-तिबेटमधून होणारा सर्व व्यापार आपल्या स्वामित्वाखाली यावा अशी त्याची इच्छा होती. सोबत मोठे सैन्य घेऊन ललितादित्याने लेहवरून सासेर-ला मार्गाने जात हिमालयीन पर्वतराजी ओलांडत तारीम खो-यातील तक्लमाकनच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अवाढव्य थंड वाळवंटात प्रवेश केला. त्याने बहुदा खोतानही जिंकले. पण गोबीच्या वाळवंटाकडे विजयी प्रवास करत असताना दिशा चुकल्याने म्हणा कि प्राकृतिक कारणाने, ललितादित्य व त्याचे सैन्य त्या अवाढव्य वाळवंटात गायब झाले. त्यांचे पुढे काय झाले हे कोणासही माहित नाही. या महान सम्राटाचा अंत एक रहस्यच बनून बसला.

व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठी आजीवन युद्धरत राहिलेला, आपला साम्राज्यविस्तार करणारा आणि प्राप्त धनातून असंख्य निर्माणकार्ये करणारा दुसरा सम्राट नंतर झाला नाही. अरबांना काही दशके तरी धाकाखाली ठेवणारा, हा एकमेव सम्राट. गिलगीट, बाल्टीस्तान आणि लदाख भारताला जोडणे हे त्याचे महान ऐतिहासिक कार्य होय. तिबेटचे दोनदा पराभव करत चीनशीही मुत्सद्देगीरीत मात देणारा हा वीर योद्धा. त्याचा शेवटही मध्य आशियातील मोहिमेदरम्यानच झाला. या काश्मीरच्या महान सम्राटाच्या स्मृती आम्ही जागवल्या पाहिजेत.

 -    संजय सोनवणी

 

 

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. शालेय इतिहासात आम्हाला ललितादित्य हे नाव देखील माहित नव्हते. एवढी उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...