Thursday, August 6, 2026

मराठी माध्यमांना नवा चेहरा देणारे वृत्तपत्र महर्षी- बाबा शिंगोटे!




वृत्तपत्र वितरण व्यवस्थेचा बादशहा अशी आपली ओळख निर्माण केल्यानंतर स्वत: वृत्तपत्र सुरु करून त्यातही उंच भरारी घेत मराठी वृतपत्र सृष्टीवर आपला अमिट ठसा उमवणारे बाबा उर्फ मुरलीधर अनंत शिंगोटे यांचे नाव आज महाराष्ट्राच्या वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या मानाचे आहे. या कामगिरीची तुलना अनेकदा जगप्रसिद्ध रूपर्ट मर्डोक यांच्याशी केली जाते. पण ही तुलना अनाठायी आहे. मर्डोक यांनी जगभर वृत्तपत्रांचे जाळे उभारले, हे खरे आहे. पण बाबा त्यांच्यापेक्षा काकणभर सरस होते. रूपर्ट मर्डोक यांना त्यांच्या वडिलांची समृद्ध पार्श्वभूमी होती. ते पूर्वीपासून माध्यम समूहात कार्यरत होते. शिवाय रुपर्ट मर्डोक हे उच्च शिक्षित होते. पण बाबांना तशी कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. शिक्षणही अवघे चौथीपर्यंत झालेले. पत्रकारितेचे कसलेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते.  तरीही वृत्तपत्र वितरण व्यवसायाच्या माध्यमातून त्यांने वाचकांना नेमके काय हवे आहे हे ओळखले आणि मग त्यांनी हाकत मराठीच नव्हे तर विविध भाषिक वृत्तपत्रांचे जाळे उभारले. वृत्तपत्र क्षेत्रात तसे यश मिळवणे फार कठीण असते. लोकांना कोणतातरी एक विशिष्ट पेपर वाचायचे सवय लागून गेलेली असते आणि ती सहजासहजी बदलाने अत्यंत कठीण असते. पण बाबांनी वाचकांची निकड ओळखली असल्याने त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात नुसते पाउल टाकले नाही तर ते पराकोटीचे यशस्वी करून दाखवले.

यामागे त्यांना केवेल वाचकांची नाडी कळाली होती हेच कारण नाहे तर त्यासाठी संपादक, पत्रकार आणि स्तंभ लेखक नेमके कोण असावेत हे जाणून घेण्याची उपजत कलाही अवलंबून होती. त्यामुळे त्यांची निवडही अचूक झाली. बरे, ते नुसते स्वभावानेच साधे होते असे नाही तर त्यांची राहणी आणि आपल्या कामावरची  अढळ निष्ठाही निर्विवाद असल्याने त्यांनी पुण्यनगरीसाठी उच्च आणि लोकांच्या हृदयाला भिडणारे लेखन करणारे आणि वार्तांकन करणार्या पत्रकारांची फौजच उभी केली. त्यामुळे त्यांनी  सुरु केलेल्या पुण्यनगरी या अनेक आवृत्त्या असलेल्या आणि अनेक भाषात प्रसिद्ध होणार्या वृतपत्राने वाचकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. बाबानावाने प्रसिद्ध असलेला वृत्तपत्र क्षेत्रातील दादामाणूस असेच मुरलीधार शिंगोटे यांचे वर्णन करावे लागेल असा दबदबा त्यांनी आपल्या हयातीतच निर्माण केला.

त्यांची पार्श्वभूमी अत्यंत सामान्य होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ रोजी बाबा शिंगोटे यांचा जन्म झाला. त्यांनी शाळेत प्रवेश केला खरा पण औपचारिक  शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. त्यांचा त्यांच्या उपजत आणि बाह्य जगातील मिळणार्या शिक्षणावर विश्वास होता. मग त्यांनी इयत्ता चौथीमधूनच शिक्षण सोडून दिले आणि नशिब काढण्यासाठी मुंबई गाठली.

सुरुवातीला मुंबईत त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पण त्यात तेवढे यश मिळत नाहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाच्या कामाला सुरुवात केली. ते घरोघरी जाऊन वृत्तपत्र टाकत असत.  यात त्यांना जो अनुभव आला त्याचा व्यावहारिक लाभ घेण्यासाठी त्यांनी वृतपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यातूनच पुढे जात त्यांनी नुसता विक्रेता नाही तर वृत्तपत्र-मासिके यांच्या वितरणाचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी राज्यभर वितरणाचे भक्कम जाळे निर्माण केले आणि या क्षेत्रातही दबदबा बसवला.

नवा काळया मुंबईतील वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असलेल्या वृत्तपत्राची त्यांच्याकडे एजन्सी होती. प्रत्यक्षात पत्रकारीतेचे कसलेही औपचारिक प्रशिक्षण त्यांना मिळालेले नव्हते. मुळात शिक्षणही अत्यल्प म्हणता येईल असेच! त्यात व्यापार-व्यवसायाची कसलीही पूर्वपिठीकाही त्यांना नव्हती. पण त्यांच्यात एक अद्भुत व्यावसायिक आणि समाज-निरीक्षक दडलेला होता. तो डोळसपणे आजची वृत्तपत्रे लोकांना काय देतात आणि लोकांना नेमके काय हवे यातील तफावती ते टिपत राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने त्यांच्या मनोभूमिकेवर व्यापक परिणाम केला. आंदोलनांचे वृत्तांकन करण्यातल्या त्यावेळच्या वृत्तपत्रातील दोषही त्यांच्या लक्षात आले. अशी निरीक्षणे सुरु असतानाच पुढे कालनिर्णयया नव्याने सुरु झालेल्या कॅलेंडरची वितरणाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली कारण वितरण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला दबदबा. तो एवढा विलक्षण होता कि वृत्तपत्रे आणि मासिकांचे वितरण करण्यात राजा बनलेला माणूस पुस्तकांचे वितरण कशाला करेल अशी शंका वाटावी असा तो काळ. या काळात म्हणजे १९९५-९६ साली, मी माझ्या पुष्प प्रकाशन लि. या संस्थेच्या नव्यानेच सुरु केलेल्या अभिनव पॉकेट बुक्स (परवडणारी स्वस्त पुस्तके) योजनेतील पुस्तकांचे वितरण करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे साशंक मनाने घेऊन गेलो आणि या दूरदृष्टीच्या पण अत्यंत साध्या माणसाने तेही वितरण स्वीकारले. त्यामुळे एरवी मराठी प्रकाशन क्षेत्रात अशक्य वाटेल असा चमत्कार झाला. त्यांनी आपल्या सुस्थापित वितरण यंत्रणेमार्फत मराठी पॉकेट बुक्सचे वितरणच अशा ताकदीने केले गेले कि कथा-कादंब-यांच्या मोठमोठ्या आवृत्या झपाट्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत वितरीत तर झाल्याच पण अफाट लोकप्रिय झाल्या. ते तेंव्हा वितरणाचे बादशहा होते हे वास्तव आजही सारे मान्य करतात.

वितरणाचा व्यवसाय करत असताना लोकांच्या  वृत्तपत्रांकडून काय अपेक्षा असतात याचा अंदाज त्यांना आला. त्यातूनच त्यांनी स्वत: वृत्तपत्र प्रकाशनाच्या, एरवी प्रचंड स्पर्धा असलेल्या क्षेत्रात कोणत्याही राजकीय अथवा भांडवलदारांच्या पाठींब्याशिवाय उतरण्याचा निर्णय घेतला. लोकाना काय हवे आहे याचा अनुभवातून केलेला अभ्यास आणि वितरणक्षेत्रातील त्यांचे अफाट कौशल्य या भांडवलावर त्यांनी १९९९ मध्ये पुण्यनगरीया दैनिकाची स्थापना केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत त्याचे वितरण जसे सुरु झाले तसेच महत्वाच्या शहरातून आवृत्त्याही प्रसिद्ध होऊ लागल्या आणि अल्पावधीत वाचकांचा मनाचा ताबा घेतला. हे येथेच थांबले नाही तर लागोपाठ आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता आदी दैनिकेही सुरु केली. 

सामान्य वाचक हा त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्याला समजेल अशी भाषा आणि त्याला नेमके वृत्तपत्रापासून काय हवे आहे याची सखोल जाणीव यातून पुण्यनगरीचा विस्तार वाढत गेला. अल्पावधीत महाराष्ट्रात पुण्यनगरीने वृत्तपत्र क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. पत्रकारिता कशी असावी याचे धडे प्रस्थापित वृत्तपत्रांनाही गिरवावे लागले. सामान्यातील सामान्य माणसाला समजेल अशी भाषा हे पुण्यनगरीचे मुलभूत वैशिष्ट्य बनले. वृत्तपत्रविषयक प्रस्थापित संकल्पनाना छेद देत सामान्य नागरिकांच्या विचारविश्वात कशी भर पडेल हे पाहत त्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत राहिल्याने ते खरे जनतेचा आवाज बनले. मुळात हे वृत्तपत्र सुरु करणारे बाबा शिंगोटे स्वत: ग्रामीण भागातून आलेले होते. संघर्षातून मोठे झाले होते. पत्रकारितेतील किचकट संकल्पना, त्यावरील निरस चर्चा त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या नव्हत्या तर मराठी माणसाला त्याच्या भाषेत त्याला सत्यदर्शन व्हावे हा त्यांचा महत्वाचा मुद्दा होता. आणि त्यामुळेच ते एका वितरकापासून ते एका प्रभावशाली वृत्तपत्र समुहाचे संस्थापक बनले.

बाबा हे लोकांच्या दृष्टीने एक रहस्यच राहिले. यश हे कधीच त्यांच्या डोक्यात गेले नाही. ते सामान्य कामगारांच्या खांद्याला खांदा लावून स्वत: वृत्तपत्राच्या प्रेसमध्ये काम करत. रात्री उशिरा एकदाची एडिशन छापून झाली कि ते तेथेच जुन्या वृत्तपत्रांचा बिछाणा करून तेथेच झोपी जात. प्रसिद्ध पत्रकार आणि पुण्यानागारीच्या संपादिका राहून चुकलेल्या राही भिडे यांनी एक आठवण सांगितली होती. त्या पुणे आवृत्तीच्या संपादिका म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या होत्या. एकदा उल्हासदादा पवार त्यांना भेटायला आले. त्यांना दारात पेपर टाकून एक व्यक्ती झोपलेली दिसली. त्यांनी कुतुहलाने राही भिडेंकडे चौकशी केली. गम्मत म्हणजे भिडेंनाही ही व्यक्ती कोण हे तोवर माहित नव्हते. नंतर चौकशी केल्यावर त्यांना समजले कि ते पुण्यनगरीचे मालक बाबा शिंगोटे आहेत. त्या थक्क झाल्या. साधेपणा हा मुरलीधर शिंगोटेंच्या जगण्याचा पाया होता. एखाद्या वृतसमूहाचा मालक म्हटला की त्याच्यामागे एक विशिष्ट वलय असते. शिंगोटेंच्या मागे ते वलय होते पण ते वलय साधेपणाचे होते. आपल्या कंपनीतल्या सर्व कामगारांना समानतेने वागवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते कोणालाही अंतर देत नसत. आपण मालक आहोत याचा त्यांना अहंकार नव्हता. अधिकारांचे वाटप झाले कि त्यांचा हस्तक्षेप संपे. मालक म्हणून मिरवणे त्यांना पसंत नव्हते. आलिशान हॉटेलात मुक्काम ठोकण्याऐवजी कार्यालयात त्यांच्या केबिनमध्ये मुक्काम ठोकने हे त्यांचे साधेपणाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या बोलण्यात पोपटपंची झळकत नसे तर त्यात अनुभवातून आलेली विद्वत्ता होती.  एवढे यश मिळवूनही त्यांच्या वागण्यात कसलाही गर्व झळकत नव्हता. आपल्या वर्तमानपत्रांबद्दल आणि तिथल्या बातमीबद्दल ते आग्रही होते. वाचक हा त्यांचा प्राण होता. समाजात वाहत असलेल्या प्रत्येक विचारप्रवाहाला व होत असलेल्या घडामोडींना आपल्या वृत्तपत्रात स्थान असावे याबाबत ते नेहमीच आग्रही राहिले. मुळात त्यांनी कोणत्याही एखाद्याच विचारप्रवाहाची संगत करून इतर वृत्तपत्रीय प्रवाह शत्रू मानण्याचा विचारही केला नाही त्यामुळे पुण्यनगरी सर्वांचे व्यासपीठ बनले.

महाराष्ट्री माध्यमांना नवा चेहरा दिला हे त्यांचे मराठी वृत्तपत्र क्षेत्र आणि मराठी वाचकवर्गावरील मोठे ऋण आहे. आज त्यांचा स्मृतीदिन. विनम्र श्रद्धांजली.

-संजय सोनवणी 


No comments:

Post a Comment

मानवाची अंतराळात भरारी

  मानवाने जेव्हा पहिल्यांदा उघड्या डोळ्यांनी रात्रीच्या गडद आकाशाकडे पाहिले असेल , तेव्हा त्याच्या मनात कौतुक , आश्चर्य आणि असंख्य प्रश्न नि...