Thursday, September 18, 2025

भाषा कशा निर्माण झाल्या?

  


 

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे केंद्र सरकारने घेतलेला योग्य निर्णय म्हणता येईल. मुळात भाषाच कशा निर्माण होतात याबाबत मात्र विशेष चर्चा झालेली नाही. भाषांचा उदय कधी झाला हा प्रश्न जेवढ्या महत्वाचा आहे तेवढाच कशासाठी झाला हाही प्रश्न अनेकदा चर्चिला गेला आहे व तो वर्तमानातही मानसशास्त्र ते मानववंशशास्त्राच्या अंगाने चर्चेत असतो. भाषा हा मानवसमाजाच्या अस्तित्वाचा, सांस्कृतिक जीवनाचा, सातत्याने विकसित होत असणारा मोलाचा गाभा आहे हे नाकारता येणार नाही. किंबहुना भाषेच्या अस्तित्वाखेरीज मनुष्य हा पुरा-आदिम अवस्थेतच राहिला असता व कसलीही भौतीक प्रगती त्याला साध्य करता आली नसती, असेही म्हणता येऊ शकते. भाषेचा उदय कसा झाला असावा व त्याच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्यते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. असे असले तरी मानवी जिज्ञासा अपार असते. जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक)  भाषा आहेत. मानव जात एकाच एक असतानाही जगात प्रदेशनिहाय इतक्या भाषा का हाही प्रश्न चर्चिला जात असतो.

 

   भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. पृथ्वीतलावर पहिले संभाषण अडम व इव्हने केले. नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर टोवर ओफ बाबेल येथे नौकेतुन उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही. त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले व त्यानंतरच माणसाने पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मुळच्याच भाषेला जगभर विविध रुपात नेले असा हा बायबलचा दावा. हे येथे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे याच "एकस्थाननिर्मिती"च्या बायबली मिथ्थकथेचा पगडा आजही पाश्चात्य भाषाशास्त्र ते भौतिकी शास्त्रावर आहे.



पण भाषेचा उगम व विकास हा क्रमशा: होत जात असून भाषेचा उदय एकाएकी झाला असे मानता येत नाही असे क्रमविकासवादी (Continuity theories)चे समर्थक मानत होते. भाषा आज आपण जशा पहातो-वापरतो त्या एवढ्या गुंतागुंतीच्या (Complex) असल्या तरीही त्याहीपेक्षा वाढलेल्या नवीन मानसिक गुंतागुंतीच्या अभिव्यक्तीला अनेकदा त्या पुरेसा न्याय न देना-या आहेत कि त्यांचा उगम एकाएकी झालेला असू शकत नाही असे त्यांचे एकुणातील मत आहे.


   
स्टिव्हन पिंकर हा या मताचा खंदा पुरस्कर्ता होता. त्याच्या मते जसा मानवी प्राण्याचा क्रमविकास झाला तशीच भाषाही क्रमश: विकसीत होत गेली. या सिद्धांताशी सहमत पण विभिन्न मते असणा-यांपैकी एका गटाचे मत होते कि भाषेचा उगम हा इतरांशी संवाद साधण्याच्या गरजेतुन निर्माण झाला नसुन आदिम स्व-अभिव्यक्तीच्या गरजेतुन निर्माण होत विकसीत होत गेली. असे असले तरी अभिव्यक्तीची अथवा संवादाची निकड मानवातच का याचे समाधानकराक उत्तर या सिद्धांतांनी मिळत नाही असे आक्षेपकांचे म्हणणे आहे.


   
अगदी या क्रमविकाससिद्धांतालाही छेद देणारा पुढचा सिद्धात आला तो म्हणजे "क्रमखंडवादी" (Discontinuity Theory) सिद्धांत. या सिद्धांतवाद्यांच्या मते अन्य कोनत्याही प्राण्यात न आढळणा-या एकमेवद्वितीय अशा भाषानिर्मितीचे गुण मानवातच आढळत असल्याने ती बहुदा एकाएकी मानवी उत्क्रांतीच्या क्रमात कोणत्यातरी टप्प्यावर अचानकपणे अवतरली असावी असे या सिद्धांत्यांचे मत आहे.


   
नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक होता. परंतु त्याचा सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी असे त्याचे मुख्य मत होते. या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवे शरीरातील, विशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे.


   
अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. हे मत फारसे मान्य केले गेले नाही याचे कारण म्हणजे अंतत: वेगळे काही असे या सिद्धांतामुळे सिद्ध होत नाही.

पण क्रमविकास मान्य केल्याने मुळात भाषाच का निर्माण होते याचे उत्तर मिळत नाही. याच सिद्धांत्यांचे म्हणने आहे कि एकतर संवाद साधण्यासाठी तरी भाषेची निर्मिती होते अथवा अभिव्यक्त होण्यासाठी.   भाषेच्या एकुणातील विकासात मानवाच्या ज्या प्रजाती जन्माला आल्या, म्हणजे पुरामानव ते होमोसेपियन्स, यात सर्व प्रजातींची भाषा एकदिश उत्क्रांत झाली असे मान्य करता येत नाही. प्रत्येक प्रजातीची काही ना काही, अगदी प्राथमिक का होईना भाषा असणे असंभाव्य नसले तरी एका प्रजातीचा मानव नष्ट होत दुसरी प्रजाती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे एका प्रजातीच्या अंताबरोबरच तीही भाषा नष्ट झाली असणे स्वाभाविक आहे.


असे असले तरी एका मुद्द्यावर प्रचंड विवाद आहे व तो म्हणजे निएंडरथल अणि होमोसेपियन्समद्ध्ये संकर होत आजचा मानव बनला कि निएंडरथल मानव स्पर्धेत टिकाव न धरु शकल्याने नष्ट झाला?. पहिला सिद्धांत ग्राह्य मानल्यास होमो सेपियनने आपल्या पुर्वजांच्या भाषेतील गुणसुत्रे घेतली असतील असे मानावे लागेल. तसे असेल तर भाषेचा क्रमविकासही संकरातुन झाला असे मानावे लागेल. अर्थात यातील नेमके काय खरे हा वाद अद्याप सुरु आहे.


   
दुसरे असे कि पृथ्वीतलावर पसरलेल्या मानवांची भाषा असली तरी त्यांत तंतोतंत म्हणता येईल असे साम्य नाही. एका अर्थाने प्रत्येक भाषा प्रादेशिक आहे. म्हणजे भाषेचा क्रमविकासही प्रादेशिक आहे असे म्हणता येईल. प्रादेशिक भुवैशिष्ट्यांमुळे मानवी संस्कृती व भाषा यावर नेमके कसे परिणाम होतात हे पाहणे भाषेच्या निर्मितीवर प्रकाश टाकू शकेल. प्रत्येक प्रदेशाचे भूगर्भशास्त्रीय स्वरूप वेगळे असते हे आता सिद्ध झाले आहे. भूगर्भशास्त्रात प्रादेशिक खनिज वितरण, खडक रचना, भूचुंबकत्व, विशिष्ट गुरुत्व  इत्यादीचा समावेश होतो. प्रत्त्येक भागात पुन्हा हे स्थानिक वितरण बदलते. भाषा दर बारा कोसावर बदलते असे जे पूर्वी म्हटले जायचे त्याचे कारण भूवैशिष्ट्यात आहे. जेथे भूगर्भशास्त्र कमालीच्या तीव्रतेने बदलते तेथे मात्र आपल्याला अत्यंत वेगळ्या भाषा बोलल्या जातांना दिसतात. कर्नाटक,  आंध्र, गुजरात, मध्यप्रदेश या प्रदेशांतील भूवैशिष्ट्ये वेगळी आहेत हे तर स्पष्ट आहे. म्हणूनच तेथे भाषाही वेगळ्या आहेत. याचे कारण प्रादेशिक मानवी समुहाचे मानसशास्त्र घडवण्यात भूगर्भशास्त्रीय घटकांचा मोठा वाटा असतो.


 
आपण भाषेची काही लक्षणे सहजपणे पाहु शकतो. माणसाच्या स्वरयंत्रात गुंतागुंतीचे ध्वनी निर्माण करण्याची क्षमता आहे जी अन्य प्राण्यांत नाही. ध्वनी काढतांना तो ज्यात उपजत नाद असेल असेच शब्द निर्माण करतो. तो त्या शब्दांना/ध्वनीक्रमाला अर्थप्रदान करतो. अर्थात तो (आपापल्या समुहात तरी) सातत्य ठेवतो. शब्दांना व्यापक अर्थ प्रदान करण्यासाठी व्याकरणबद्ध वाक्यात त्यांची रचना करतो. समुहातील ऐकणा-याला काय उच्चारले गेले आहे हे समजते. दुसरे महत्वाचे म्हणजे भाषा ही विकासशील राहते.

   
विचार आणि भाषा

   
विचार आणि भाषा यांचे निकटचे नाते आहे. मनुष्य विचार करतो हाही गुणधर्म माणसाला अन्य प्राणीसृष्टीपासून विलग करतो. भाषा हे विचारांचे वहन करण्याचे माध्यम आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. आदिम काळी माणसाची प्रदेशनिहाय भाषा अत्यंत मर्यादित व मुलभूत निकडी व्यक्त करण्यापुरती होती. आदिमानव भटका असला तरी त्याचे भटकणे ज्ञात भूभागातच होत असे. त्यामुळे बनलेल्या विशिष्ट मानसिकतेचा त्याच्या शब्दनिर्मितीवर प्रभाव असणे स्वाभाविक होते. जसे मानवाचे जीवन गुंतागुंतीचे होत गेले तसे शब्दसमुहात वाढ होत गेली व व्याकरणाच्या सहाय्याने गुंतागुंतीच्या भावना पोचवण्याची कला त्याने म्जुलाभूत प्रवृत्ती व निकडीतून शोधून काढली. हे सर्वत्र प्रदेशनिहाय पद्धतीने घडलेले असल्याने कोणी भाषा जन्माला घातली आणि इतरांवर लादली असे होणे अशक्य होते. मानवी टोळ्या संपर्काने शब्द उधार त्घेत असत पण ते आपल्या मानसिकतेनुसार त्याच्या उच्चारात व अर्थात सोयीस्कर बदल घडवून. मराठीनेही अनेक शब्द उधार घेतले आहेत, पण आपल्या पद्धतीने ध्वनीबदल करून तर कधी अर्थबदल करून.

 

जागतिक पातळीवरही हेच झाले. काही शब्द व्यापक भूप्रदेशात भूगर्भरचनेत काही साम्ये असल्याने समान भासतात. त्यांना विशिष्ट भास्झागातात टाकून दिले की भाषाविद्वानांचे काम भागते, पण असे बदल का याचे उत्तर ते देत नाहीत. त्याला स्थलांतर अथवा आक्रमण सिद्धांतात टाकून  या प्रश्नाची सोडवणूक केली जाते. पण यामुले भाषा पसरत नाहीत, फार तर शब्द देवान-घेवाणीचे प्रमाण वाढते, मूळ स्थानिक भाषेची वैशिष्ट्ये मात्र बदलत नाहीत.

 

आपण आदिम भाषेतीलच एक उदाहरण पाहू. आग, अग्गी, अगन व अग्नी हे शब्द पुरातन शब्दासामुहातील आहेत असे मानले जाते, पण या शब्दाची प्रादेशिक रुपांतरे मात्र विस्मयात टाकणारी आहेत.

 

    उदा.     a-ak-ni-iš (आक्निस) भाषा - मितान्नी , प्रदेश - उत्तर सिरिया आणि दक्षीण-पुर्व अनातोलिया,
             ignis (
इग्निस) - भाषा ल्यटिन, प्रदेश - इटली
     
  Ogon (ऒगोन) भाषा- स्लाविक , प्रदेश- पुर्व युरोप
        
ugnus (ऊग्नुस) लिथुआनियन, प्रदेश लिथुआनिया
    

थोडक्यात एकच शब्द प्रदेशनिहाय आपली ध्वनीरचना बदलतो यामागे प्रादेशिक सामुहिक मानसशास्त्र असते हे उघड आहे. शिवाय कालौघात शब्दही नवीन रूपे धारण करत जातात. उदा. प्राचीन मराठीतील ‘दिअर’ हा शब्द घेऊयात. आता मराठीत हा शब्द दीर म्हणून वापरला जातो तर हिंदीत तो देवर असा झालेला आहे. तसेच ‘पाअ’चे ‘पाय’, ‘पडीस्स’चे पडतो असे ध्वनीपरिवर्तन झाल्याचे आपल्याला दिसून येईल.

 

मुळात   निसर्गातील प्राणी-पक्षांच्या आवाजांची नक्कल करत त्याने त्या त्या प्राण्यांची ओळख तसेच स्वर काढण्याच्या प्रयत्नांतून इतरांनाही पटवली असली तरी केवळ नक्कलेत भाषेचा उदय शोधणे धाडसी आहे. स्वत:ची अभिव्यक्ती, संवादाची गरज यातून मानवाने प्रदेशनिहाय सामुहिक मानसिकतेतून स्वतंत्रपणेही अनेक शब्दांना जन्म दिला असणे स्वाभाविक आहे.   भाषेचे केंद्र मेंदुतच असते असे ब्रोका केंद्रकावरुन दिसते. तसे असले तर भाषा स्वयंभू आहेत असे म्हणावे लागेल.

 

 माणसामद्धे भाषेची/बोलण्याची क्षमता एक लक्ष वर्ष जुनी आहे असे चोम्स्की म्हणतो. अलीकडेच अगदी निएंडरथल मानवातही गुंतागुंतीचे ध्वनी निर्माण करता येण्याची क्षमता होती हे पुरातन सांगाड्यांच्या/जीवाष्मांच्या स्वरयंत्रांच्या परिक्षणाअंती सिद्ध करण्यात आले आहे.  अर्थात आधुनिक मानवाचा पुर्वज होमो सेपियनने पुर्वीच्या मानवसदृष्य प्रजातींची जागा घेतली. या मानवाचे स्वरयंत्र आजच्या एवढेच विकसीत होते काय हे मात्र तपासुन पहायला कोठलाही पुरावा उपलब्ध नाही. वेगवेगळ्या ध्वनींची निकड पण ते ध्वनी काढण्याची क्षमता नसतांना स्वरयंत्रातच झालेली उत्क्रांती ही एक संभाव्य संकल्पना आहे. तिलाही तसा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. पण केवळ स्वरयंत्र आहे म्हणून भाषा आहे हे मान्य केले तरी प्रत्त्येक भाषा (अगदी एकाच भाषागटातील) वेगळी का याचे उत्तर आपल्याला प्रादेशिक सामुहिक मानसशास्त्रात शोधावे लागते. मराठी भाषेचे वय दोन-अडीच हजार वर्ष ठरते ते पुरावे मिळतात म्हणून, पण त्याही खूप आधीपासून, म्हणजे माणूस महाराष्ट्रात अवतरला तेव्हापासून जी भाषा येथे बनत गेली ती येथील भूपर्यावरणाच्या प्रभावात बनलेल्या आपल्या विशिष्ट मानसिकतेतून हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. या भाषा कोणाच्याही प्रभावात बनलेल्या नाहीत. किंबहुना प्रत्येक प्रादेशिक भाषा ही स्वतंत्र असते. भाषिक प्रवृत्ती काही अंशी समान असेल तर अनेक भाषांत वरकरणी साधर्म्य दिसू शकते पण भाषेची निर्मितीच मुळात मानसशास्त्रीय आविष्कार असल्याने हे साम्य बाह्य कारणांनी (कोणा प्रबळ मानवी समुहाचे आक्रमण किंवा स्थलांतर) निर्माण होत नाही. 

   जीवनव्यवहारांची गुंतागुंत आणि भाषा

   
आदिमकाळी, म्हणजे जवळपास अडीच लाख वर्षांपुर्वी, होमो सेपियन हा आजच्या मानवाचा पुर्वज पृथ्वीतलावर विकसीत झाला. त्याचे अस्तित्व त्याने बनवलेल्या अश्म-हत्यारांमुळे आणि त्याच्या जीवाष्मांतुन मिळते. अर्थात या काळाबाबतही अत्यंत विवाद आहेत. आउट ऑफ आफ्रिका सिद्धांत सध्या लोकप्रिय असला तरी तो सर्वमान्य नाही. मीही या "एकस्थाननिर्मिती" सिद्धांताशी सहमत नाही.  असे असले तरी जेनेटिक दृष्ट्या सर्वच मानवप्रजाती ही एकजिनसी आहे याबाबत मात्र जवळपास एकमत आहे. असे होण्यासाठी एकस्थाननिर्मिती व त्यांचे विस्थापन आवश्यक नाही.

 

    विचार, जीवनव्यवहार आणी भाषा यांचा नेमका काय परस्परसंबंध आहे हे आपण येथे थोडक्यात पाहू.
   

 आदिम काळी माणसाचे जीवन हे अन्य प्राणीप्रजातींशी, निसर्गाशी आणि अन्य मानवी टोळ्यांशी स्पर्धा व संघर्ष करण्याने गजबजलेले असणार हे उघड आहे. माणसाला निसर्गाने अन्य प्राण्यांना दिलीत तशी नैसर्गिक साधने दिलेली नाहीत. पण त्यावरही मात करता येईल अशे विचारशक्ती माणसाला मिळालेली आहे.
 

   माणसाने आदिम काळीच दगडी, हाडांची (नि लाकडीही) हत्यारे बनवायला सुरुवात केली ती संरक्षणासाठी तसेच मांस खरवडून काढण्यासाठी.  ही हत्यारे बनवायला हवीत हे त्याला समजणे, इतरांना सांगणे, त्यांना कार्यप्रवण करणे आणि त्यांचा वापर अधिक कुशलतेने कसा करायचा हे ठरवणे यासाठी आरंभी त्याने काही ध्वनी, खाणाखुणा याचा उपयोग केला असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी नैसर्गिक ध्वनींचीही नक्कल केली असणार. त्याचबरोबर टोळीमधील अंतर्गत व्यवहार, स्त्रीयांचे आगळेपण, अपत्यजन्म, त्याचे रडणे आणि त्याची निरर्थक वाटणारे पण सामान्य आवाज व त्याही आवाजाची नक्कल हेही अपरिहार्य आहे. आद्य पा, बा, मा, मम इत्यादि ध्वनींनाच नंतर विकास करत त्या त्या ध्वनींना मातृ-पितृ व अन्य नातेनिदर्शक व्यापक अर्थ दिला जाणे स्वाभाविक आहे. याला आपण मानसशास्त्रात वापरली जाणारी Babble थियरी म्हणू शकतो.


 
येथे हे लक्षात घ्यायला हवे कि अनेक ध्वनी मानवी जीवनात अत्यंत प्राथमिक आहेत तसेच ते वैश्विकही आहेत. प्राथमिक शब्द हे निकडीच्या गरजेतुन बनत जात त्यांची संख्या वाढायला शेकडो पिढ्या गेल्या असणे स्वाभाविक आहे. विविध ध्वनींना जोडून शब्द बनतो. पण हे ज्ञान होत असे अनेक पण सुसंगत व टोळीतील लोकांनाही समान मानसशास्त्रामुळे सहज समजतील असे ध्वनी जोडत आद्य शब्द बनले असले पाहिजेत.


 
थोडक्यात समतालीय ध्वनी हे आद्य शब्दांचे निर्माते ठरले असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना जगातील आद्य वाड्मय, ते धार्मिक असले तरी, काव्यात आहे हे विशेष आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आद्य टोळी धर्मात यात्वात्मक क्रिया करण्यासाठी काही ध्वनी मुद्दाम निर्माण गुढतेचा आभास देण्यासाठीचा वापर झाला असणार. ध्वनी व ध्वनींचा शृंखलाबद्ध तालबद्ध आवाजात काहीतरी शक्ती असली पाहिजे असे त्या आदिम काळात माणसाला वाटले असणे नवलाचे नाही. ऋग्वेदातील ‘वाक’ या देवतेचा जन्मही वाणीची अधिष्ठात्री म्हणून झाला हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.


   
म्हणजे आदीशब्द हे जीवनव्यवहार, जीवनाला व्यापून उरलेले भय व त्या भयावर मात करण्यासठीच्या उत्कटतेतुन निर्माण झालेली निकडही भाषेच्या आद्य संज्ञाप्रवाहाला उत्तेजन देणारी ठरली असेल. आजही अनेक मंत्र निरर्थक असले तरी तांत्रिक साधनांत वापरले जातात ते त्यांच्या विशिष्ट ध्वनींमुळे. किंवा विशिष्ट ध्वनींच्या क्रमातुन अर्थपुर्ण शब्दही असेच निर्माण होत गेले आहेत हे आपण पुरातन धार्मिक वाड्मय पाहिले तरी लक्षात येईल. त्यामुळे कधी ध्वनीशृंखलेतुन शब्द आधी व अर्थ नंतर तर कधी मनात अर्थ आधी व त्याला व्यक्त करण्यासाठी शब्द नंतर ही निरंतर प्रक्रिया भाषानिर्मितीस सहाय्यक झालेली दिसते.


   
जगभरचे मानव हे जवळपास एकविध रसायनातुन बनले असल्याने माणसाच्या मुलभूत विचारप्रक्रियेत एक साम्य आपल्याला आढळून येईल. त्यामुळे आपापल्या प्रदेशातील मानसिकतेनुसार शब्दांतील अर्थवाहीपणा संक्रमित करणे हे तितकेसे अवघड गेले असेल असे वाटत नाही.


   
म्हणजेच भाषा ही एका अर्थाने प्रदेशनिहाय सार्वजनिक विकसन झालेली मानवी निर्मिती आहे असे आपण म्हणू शकतो. पण ही निर्मिती होत असतांना टोळीअंतर्गत जशी विकसने होत गेली तशीच ती भिन्न टोळ्यांमद्ध्येही नक्कल, उसणवा-या, देवघेव यातुनही (जशी आजही होते) तशीच पुरातन काळीही झाली असणे स्वाभाविक आहे.


   
पुरातन मानव हा अन्न व शिकारीच्या शोधात भटकत असे. हे भटकणे रातंदिन नसून जोवर उपलब्ध परिसरात पुरेसे अन्न मिळते तोवर मुक्काम त्याच परिसरात असे. पुरेसे अन्न जमा झाले कि रिकामा वेळही भरपुर असे. थोडक्यत जीवनात फारशी गुंतागुंत नव्हती, पण नैसर्गिक प्रकोप, अचानक होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले यामुळे भयग्रस्तही होते. याच काळात कधीतरी माणसाने, अदृष्य असलेल्या, सुष्ट शक्ती आणि दुष्ट शक्ती अशी विभागणी केली. त्या शक्तींना नांवे देता येईल एवढी भाषेने प्राथमिक अवस्था गाठलेली होती. आद्य, धुसर का होईना पण मिथ्थकथा या काळात विकसीत झाल्या असतील. नृत्य-गायनाचे ओबडधोबड प्रयोगही होत असतील. इसपु ५०-४०,००० मद्ध्ये युरोपात तसेच अन्यत्रही एकाएकी झालेले सांस्कृतिक परिवर्तन दिसते. या काळात दफने अत्यंत शिस्तबद्ध होऊ लागली. अलंकारांची, मृद्भांड्यांची निर्मितीही होऊ लागली. म्हणजेच सौंदर्याच्या आदिम कल्पना व मृत्युनंतरचे जीवनविषयक आदिम् विचार प्रकट होऊ लागले असे म्हणता येईल. अल्तामिरा ते भीमबेटकातील गुहाचित्रे  व कोकणातील प्राचीन कातळशिल्पे जवळपास याच काळात चितारायला/कोरायला  सुरुवात झाली. अभिव्यक्तीची निकड ही सार्वत्रिक बाब असल्याने भाषांची निर्मितीही सार्वत्रिक होती. या काळातील भाषा माणसाला शिस्तबद्ध अभिव्यक्त करता येण्याइतपत ब-यापैकी प्रगत झाली होती असे म्हणता येते. शिवाय चित्रांतुनच पुढे लिप्यांचा विकास झाला असेही आपण लिप्यांच्या इतिहासावरुन पाहू शकतो. या काळात तत्कालीन मनुष्य जवळपास आधुनिक मानवाप्रमाणे वर्तन तर करत होताच, पण भाषा, नृत्य, संगीतादि कलांचाही तो उत्कर्ष घडवीत होता असे साधारणपणे मानले जाते. गुहाचित्रे ही त्याचा पुरावा आहेत.


   
अर्थात भाषेचा विकास प्रत्येक टोळीत सर्वस्वी स्वतंत्रपणे झाला असे मात्र दिसत नाही. आदिमानवाचा अन्य टोळ्यांशी येणा-या संपर्कांतुन नव्या शब्दांची अथवा पर्यायी शब्दांची देवाण-घेवाण, त्यातुन पुन्हा नवीन शोध यातुन आद्य भाषा विकसीत होत राहिली. देवाण-घेवाण फक्त भाषांची नव्हे तर धर्मकल्पना, मिथके तसेच जीवनोपयोगी शोध यांचीही होत होती. त्या शोधांत पुढे स्वतंत्रपणे भरही घातली जात होती. त्या शोधांना ज्या टोळीने शोध लावला त्यानेच नांव दिले असणार हे उघड आहे. त्याच नांवाला ध्वनीपरिवर्तन करुन ते शब्द पसरत गेले असे आपल्याला दिसते.

 
   
भाषाविदांनी अशा साम्यांच्या आधारावर भाषागट कल्पिले आहेत. फक्त त्याचे कारण मात्र त्यांनी कोणत्यातरी प्रबळ भाषा बोलणा-या (उदा. पुरा-इंडो-युरोपियन) लोकांचे आक्रमण अथवा विस्थापन यात शोधले आहे जे चूक आहे. ते हे विसरतात की अनेक पुराशब्द वेगवेगळ्या विरुद्ध भाषागटांतही समान आलेले दिसतात. एवढेच नव्हे तर अनेक भाषागटांतील समान भासणा-या शब्दांचा अर्थ मात्र अत्यंत वेगळा अथवा विरुद्धार्थी असल्याचेही आपल्याला दिसते.

 

भाषेच्या प्रवासात  आधीचे शब्द उच्चारसुलभ, शक्यतो जोडाक्षरविरहित अणि किमान व्याकरणाने जोडत वाक्यात सामील होत होते. टोळीजीवनातील निमभटका मानव जसा स्थिर झाला, तसा त्याच्या भाषेची निकड बदलेल्या व व्यामिश्र होऊ लागलेल्या जीवनव्यवहारांमुळे वाढत गेली. त्यातुनच त्याने शब्द वाढवत नेले. आहे त्या शब्दांचे विविधांगी अर्थाने वापर सुरु केले अथवा त्यांच्यात काही वर्णांची वा व्यंजनांची भर घालत नवे शब्द तयार केले. शेतीशी निगडित शब्द याच काळात वाढू लागले. राज्यव्यवस्था, मग ती गणसंस्था असो कि राजसंस्था, त्याशी, व्यापाराशी, सैन्य आणि युद्धे याशी, नगररचना आणि त्याशी निगडित सामग्रशी संबंधित व तसेच गुंतागुंतीच्या होऊ लागलेल्या धर्म व तत्वप्रणालीशी संबंधीत शब्द व त्यांन अधिक अर्थवाही करण्यासाठी व्याकरण या गरजा भासणे स्वाभाविक होते. हे सारे माणसाने सर्वस्वी स्वतंत्रपणे केले असे नाही तर देवाण-घेवाणसुद्धा केली. यातुनच भाषांचा विकास होत गेला. अर्थात ही प्रक्रिया प्रत्येक प्रदेशात स्वतंत्रपणे झाली कारण प्रादेशिक भूगर्भाशास्त्राने बनवलेली वैशिष्ट्यपूर्ण सामुहिक मानसिकता व त्यातून निर्माण झालेल्या भाषाप्रवृत्ती.


थोडक्यात आजच्या भाषांचा उगम माणसाच्या नैसर्गिक अभिव्यक्तीच्या गरजेतुन व त्याला असलेल्या स्वरयंत्राच्या उपलब्धतेतुन झाला. तो बोलु लागला. त्याचे बोलणे भाषेत हजारो वर्षांच्या प्रवाहातून परिणत झाले.  भाषेचा उगम हा एकाकी (आयसोलेटेड) नसून सामुहिक आहे. मनुष्य विचार करतो, बाह्य घटनांना प्रतिसाद देतो आणि व्यक्तही होतो. भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे माणसाच्या अत्यंत आरंभकाळीच लक्षात आले व अनावर कुतुहलातून त्याने त्या क्षमतेला विकसित व विस्तारित करत नेले म्हणून भाषा निर्माण झाली असे आपण म्हणू शकतो. नुसत्या नक्कलेच्या प्रवृत्तीतुन विविध ध्वनी निर्माण करण्याची क्षमता वाढली असली तरी त्यातून भाषेचा उदय झालेला नाही, तर नक्कलेची प्रवृत्ती त्याला सहाय्यकारी घटक ठरला एवढेच आपण म्हणू शकतो. माणसाची विचार करण्याची क्षमता भाषेच्या उगमाला मुख्य कारण ठरली व सामुदायिकपणे त्याने प्रदेशनिहाय स्वतंत्र प्रवृत्तीची भाषा विकसित केली असे आपल्याला म्हणता येईल.


असे असले तरी गेल्या तीन-चारशे वर्षांपासून एका भाषेने अन्य भाषांवर प्रभाव टाकत मुळ भाषा नष्ट केल्या असे दावे केले जात आहेत. यात इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांताचे युरोपियन जन्मदाते जबाबदार आहेत. या सिद्धांताने भाषिक कमी, सांस्कृतिक प्रश्न अधिक उपस्थित केले आहेत. एका विशिष्ट स्थानावर पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारा मानवी समूह टोळ्याटोळ्यांनी भारत ते युरोप असा पसरला आणि त्यामुळे या भाषेचा प्रचार-प्रसार झाला असे या सिद्धांताचे थोडक्यात म्हणने आहे. या सिद्धांतात तथ्य नसले तरी या सिद्धांताचा विलक्षण पगडा समाजावर आहे. संस्कृत ही मुलभाषा व प्राकृत या अपत्य भाषा (म्हणजे मिडल इंडो-युरोपियन) अशी भाषिक क्रमवारी देतांना कोणतीतरी भाषा एकाच ठिकाणी निर्माण झाली आणि मग ती विविध भागात पसरली या बायबली सिद्धांताचेच पुन:प्रक्षेपण आहे.

 

मराठी भाषा ही या भूमीवर जेव्हापासून मानवाचे पहिले पाउल पडले तेव्हापासून विकसित होत आलेली आहे. म्हणजे तिचा इतिहास पुरातन आहे. हालाच्या गाथासप्तशतीपर्यंत (म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी) ती साहित्याची भाषा बनावी एवढी प्रगल्भ झालेली होती. तिचा आरंभीचा प्रवास सर्व भाषाप्रमाणेच अत्यंत प्राथामिक व गरजेपुरता होता. जसजसे मानवी जीवन व्यामिश्र होत गेले तसतसे भाषा प्रगत  होत गेली. या भाषेने कालौघात अनेक शब्द उधार घेतले तसे दिलेही. पण या उधार-उसणवारीत मराठी भाषेची मुलभूत प्रवृत्ती व रचनातत्व मात्र बदलले नाही याला कारण येथील वैशिष्ट्यपूर्ण भूगर्भरचना व तिच्या सान्निध्यात निर्माण झालेले सामुहिक मानसशास्त्र होय. केवळ पुरावे मिळतात किंवा मिळत नाहीत म्हणून कोणतीही प्रादेशिक भाषा अर्वाचीन आहे असे मानणे अशास्त्रीय आहे. याचा सविस्तर शास्त्रीय आढावा मी माझ्या “Origin of Language’ या आगामी ग्रंथात घेतला आहे.

 

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

भाषा कशा निर्माण झाल्या?

        मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे केंद्र सरकारने घेतलेला योग्य निर्णय म्हणता येईल. मुळात भाषाच कशा निर्माण होतात या...