Sunday, August 12, 2012

सुतारांचा इतिहास


मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे लाकडी युग इसवी सनपुर्व दहा हजार वर्षांच्या आसपास अवतरले असा संशोधकांचा कयास आहे. गुहेत राहणारा मानव जेंव्हा जलाशयांजवळ रहायला येवू लागला तेंव्हा त्याला कृत्रीम निवा-यांची गरज भासु लागली. याच कळात त्याला प्राथमिक शेतीचेही ज्ञान झाले होते. सुरुवातीला त्याने निवा-यासाठी चामड्याचा वापर केला खरा, पण त्यात कायमस्वरुपी टिकावूपणा नव्हता. याच काळात लाकडाचा उपयोग करता येवू शकतो हे त्याच्या लक्षात येवू लागले. हातकु-हाडीसाठी तासलेले लाकडी दांडे वापरायची सुरुवात म्हणजे काष्ठयुगाची सुरुवात मानली जाते. आता तेच लाकुड कृत्रीम निवा-यांसाठी तो वापरु लागला. नेवासे व बुर्झाहोम येथे असे प्राथमिक निवारे मिळाले आहेत.

यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे चाकाचा. संपुर्ण मानवी जीवनात क्रांती घडवणारी ही घटना म्हणुन इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे. पहिले चाक नेमके कोठे शोधले गेले हे सांगता येत नसले तरी जगभर समांतर काळी चाकाचा शोध लावला गेला असावा. भारतीय चाके मात्र जगाच्या पुढचे पाउल होते...ते म्हणजे आरी असलेली चाके. चाकांतुनच आद्य बैलगाड्यांचा जन्म झाला. यामुळे कुंभकारांना मातीपासुन सुबक घट व अन्य उपयोगी वस्तु बनवता येवू लागल्या. आज जगाचा पुरातन इतिहास समजतो त्यात याच पुरातन मृत्तिकाभांड्यांचा मोठा हात आहे. थोडक्यात आजच्या अनेक जातींचा इतिहास हा हातात हात घालुन चालत आलेला आपल्याला दिसतो तो या परस्पर साहचर्यामुळे व सतत नवीन शोध घेण्याची प्रेरणा असल्यामुळे.

सिंधु संस्कृतीत भारतातील सुतारकामाने कळस गाठला. घराचे व नगरद्वाराचे दरवाजे लाकडापासुन बनवले जावू लागले. बैलगाड्या बनु लागल्या. आजही भारतात सिंधु काळी बनत तशाच बैलगाड्या बनवल्या जातात. नांगरणीसाठी लाकडाचे नांगर बनु लागले. समुद्रप्रवासासाठी नौका बनु लागल्या. भारतीय व्यापार भरभराटीला येवू लागला. पुढे आला वैदिक काळ. या काळातील सुतारकामाची बरीच वर्णणे मिळतात. वैदिक लोक सुताराला त्वष्टा, ऋभु तर कधी विश्वकर्मा संबोधतांना दिसतात. ऋग्वेदकाळात सुताराचा व्यवसाय अत्यंत भरभराटीला आला असल्याचे दिसते. हे काम कष्टाचे व कुशल कारागिरीचे आहे असेही उल्लेख ऋग्वेदात आहेत. बैलगाडी ते रथ ही प्रगती याच काळात झाली. लाकडापासुन अनेक गृहोपयोगी पात्रे व पेलेही बनु लागले. ऋग्वेदात उल्लेखलेले पणी हे असुर सुतारकामात अत्यंत कुशल असुन त्यांना त्वष्ट्याची संतती म्हटले आहे. बुबु नांवाचा धनाढ्य पणी हा नौका बांधण्यचा उद्योग करत असे असेही ऋग्वेदावरुन दिसते. घरांसाठी दारे, खिडक्या, खांब कसे बनवावेत यांची शास्त्रीय माहिती अथर्ववेदातील शालासव सुक्तात मिळते. म्हणजे तोवर सुतारकामाला शास्त्रीय दर्जा मिळाला होता. पुढे भृगुसंहितेत व वराहमिहिराच्या बृहत्संहितेत कोणत्या वृक्षाची लाकडे कोणत्या काष्ठकामासाठी वापरावीत यावर विस्तृतपणे विवेचन केले गेले.

कोणत्या प्रकारच्या साधनासाठी नेमके कोणते व किती जुन लाकुड वापरावे हे मनुष्य निरंतर प्रयोगांतुन शिकत गेला. लाकडी वास्तु व तटबंद्या याची रेलचेल आपल्याला इसपु चवथ्या शतकापासुन दिसु लागते. चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र या राजधानीच्या लाकडी प्रासादाचे व लाकडी तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत. या तटबंदीला चौसष्ट दरवाजे आणि पाचशे सत्तर बुरुज होते असे मेगास्थानीस या ग्रीक वकीलाने लिहुन ठेवले आहे. अशा प्रकारचे असंख्य लाकडी वास्तुंचे उल्लेख आपल्याला तत्कालीन साहित्यात मिळतात. बौद्ध जातककथेनुसार खास सुतारांचीच वस्ती असलेल्या अनेक गांवांची उदाहरणे येतात. यावरुन हा व्यवसाय केवढा भरभराटीला आला असेल याची कल्पना येते.

प्राचीन काळी मंदिरे ही लाकडांपासुन बनवली जात असत. एवढेच नव्हे तर देवमुर्त्याही लाकडाच्याच असत. भारताचा मानबिंदु असलेले सोमनाथाचे मंदिर कुमारपालाने जीर्णोद्धार करण्यापुर्वी (इस. नववे शतक) चंदनी लाकडाचे होते हेही लक्षात ठेवायला हवे. मौर्यकालात बव्हंशी मंदिरे लाकडीच होती व अनेक मंदिरांचे अवशेषही सापडलेले आहेत. (बैराट या राजस्थानातील गांवात असे एक भव्य मंदिर सापडले आहे.) नंतर दीर्घकाळ टिकावीत म्हणुन दगडी मंदिरे व प्रासाद बांधायला सुरुवात झाल्याने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही. लाकडाने शस्त्रास्त्रे ते दैनंदिन जीवन व्यापुन टाकले.

सुतार हा शब्द सुत्रधार या शब्दावरुन बनला अशी व्युत्पत्ती दिली जाते. ही व्युत्पत्ती ठीक वाटते. कारण लाकडावर काम करत असतांना सुत्राने (सुताने) मापे घेत खुणा कराव्या लागत असत. मग ओबडधोबड अशा लाकडापासुन कलाकृती जन्म घेत. भारतातील अनेक प्राचीन काष्टशिल्पे कलेचे अजोड नमुने मानले जातात.  

पण काष्ठपुराण येथेच संपत नाही. लाकडापासुनचे पहिले यंत्र, ते म्हणजे हातमाग व चरखे सुतारांनीच वीणकरांच्या सहाय्याने विकसीत केले. त्यामुळे वस्त्रोद्ध्योगात एक अभुतपुर्व क्रांती झाली. भारत हा जगाला वस्त्रे निर्यात करणारा श्रेष्ठ देश बनला. अत्यंत गुंतागुंतीची संरचना असनारे माग बनवणे ही एकार्थाने, प्राथमिक का असेना, भारतीय औद्योगिक क्रांतीच होती असे म्हटले तरी वावगे ठरु नये.

सुतारकामाच्या व्यवसायात प्राचीन काळी कोणीही कुशल कारागिर प्रवेशु शकत होता. किंबहुना त्यामुळेच सुतारकामाची विविधांगी प्रगतीही झाली. सुतारकामात विविध कलासंप्रदायही त्याचमुळे निर्माण झाले. यात काश्मिरी, बंगाली, उडिया, माहराष्ट्री, केरळी अशा विविध शैल्या बनत गेल्या. सुतारकामात अनेक वंशीय प्रवेशले व त्यांच्या पुढे पोटजाती बनत गेल्या. मुळात सुतार ही जात नव्हती. सुतारकाम हे अत्यंत कौशल्याचे काम होते. त्यात कष्टही होतेच. पण प्रचंड मागणीमुळे अनेक लोक त्या व्यवसायात पडत राहिले. भारताच्या विविध भागांत सुतारांना वेगवेगळी नांवे आहेत. सुत्रधार, सुत्तार, सोहळे, मिस्त्री, बाडिग, बढई, थवी ही काही नांवे होत. सुतारांत अहीर, गुजर, पांचाळ, मेवाड, पंचोली, कोकणी इ. पोटभेद आहेत ते स्थानांमुळे व वंशामुळेही पडलेले आहेत. पुरातन काळी रथकार अशी सुतारांची एक स्वतंत्र जात होती...पण पुढे रथ उपयोगातुन गेल्यामुळे ही पोटजात अन्य पोटजातींत मिसळुन गेल्याचेही दिसते.

एक जात म्हणुन सुतार ज्ञातीचा उगम दहाव्या शतकानंतर होवू लागला. कोणताही व्यवसाय वंशपरंपरागत बनु लागला कि असे होणे स्वाभाविक असते. सुतारांना जरी त्वष्टा वा विश्वकर्म्याचे वंशज मानले गेले असले तरी वैदिक व्यवस्थेने त्यांना शुद्र वर्णात ढकलले. हाही समाज बव्हंशी शैव असून चामुंडा, महामाया, वेराई इ. त्यांच्या कुलदेवता आहेत. काही सुतार स्वामीनारायण पंथातही गेले आहेत. गुजरात व कर्नाटकातील सुतार ब्राह्मणी पद्धतीने मुंजही करुन घेतात. अनेकदा स्वत:च पौरोहित्यही करतात. महाराष्ट्रातील देशी सुतारही अलीकडे ब्राह्मणांसारखी गोत्रे लावू लागले आहेत. लग्नापुर्वी ते मुलाची मुंजही करुन घेतात.

असे असले तरी महाराष्ट्रातील सुतारांचे अहीर व कुणबी यांच्याशी वांशिक साधर्म्य आहे. यावरुन एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यामुळे निर्माण झालेली ही एक जात आहे असे म्हणता येते.

अलीकडे हा व्यवसाय फर्निचर व लाकडी शिल्पे/मुर्ती यांपुरता मर्यादित झाला असुन महाराष्ट्रात राजस्थानी सुतारांचीच चलती आहे. रेडीमेड फर्निचरमुळे पारंपारिक उद्योगावर कुर्हाड कोसळलेली आहे. परंपरागत बैलगाड्या, नांगर, लाकडी चाके...पार अदृष्य होवू लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. या समाजाने आता नव्या दिशा धुंडाळायला सुरुवात केली असुन परंपरेच्या जोखडातुन मुक्त होण्याचा ध्यास बाळगला आहे. अडचण आहे ती या समाजात ऐक्याचा अभाव आहे. त्यामुळेच कि काय राजकीय प्रतिनिधित्वापासुन हा समाज वंचित राहिलेला आहे. पोटजातींत वाटुन राहिल्यामुळे कसलाही समाजाला फायदा न होणारे पोटजातीय सवते सुभे निर्माण झालेले आहेत. एक दिवस त्यांचे ऐक्य घडुन येईल व त्यांचे पुरातन वैभव आधुनिक परिप्रेक्षात परत मिळेल अशी आशा आहे.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...