Sunday, November 14, 2010

"बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?"

"बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?" या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यातील वक्त्यांची मनोगते बोलण्याच्या क्रमाने थोडक्यात खाली दिली आहेत.

संजय सोनवणी: "जातीव्यवस्थेचे निर्माते म्हणुन आपण ब्राह्मण समाजाला, मनुस्म्रुतीला दोष देतो, पण आजही बहुजनीय जातीअंत घडवु शकले नाहीत. फुले माळी समाजाचे, शाहु मराठ्यांचे तर आंबेडकर दलितांचे अशी वाटणी झाली आहे. याचा अर्थ मनुवाद जिंकला असे खेदाने म्हणावे लागत आहे. आजच्या बहुजनीय चळवळीसुद्धा जातींत वाटल्या गेल्या आहेत आणि याच संघटना बहुजनीय चलवळीचे मारेकरी बनु लागल्या आहेत.

ब्राह्मण समाजावर खोटा इतिहास लिहिल्याचा आरोप केला जातो पण अनेक चलवळीतील विचारवंतसुद्धा धड्धडीत खोटा इतिहास सांगु लागले आहेत. मुलनिवासी व आर्य या संद्न्या अवैद्न्यानिक आणि असत्य असतांनाही तरुणांमद्धे चुकीचे मत प्रसारित करुन त्याचा उपयोग द्वेष वाढवण्यासाठी होत आहे. "प्रुथ्वी नि:ब्राहमण करा" अशा घोषणा दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात मुळात कोणी ना मुलनिवासी नाही आणि कोणी आर्यही नाही हे सत्य लपवले जात आहे. ब्राह्मणी संघटनाही मुस्लिमांना कापुन काढा असे सांगतात...त्याचे गुजरातमद्धे थोडे प्रयोगही झाले आहेत...हे योग्य नाही...

ब्राह्मण समाज फक्त त्यांचेच नेते-पुर्वज मोठे करतात असाही आरोप आहे, पण बहुजनीय तरी वेगळे काय करत आहेत?

धर्माचे थोतांड दुर करणे, जातीअंत करणे व बहुजनीयांना द्न्यान-विद्न्यान-तत्वद्न्यानात अग्रणी बनवणे, त्याची हा बहुजनीय चलवळीचा मुख्य उद्देष्य होता...पण आता तो फक्त ब्राह्मण द्वेषाशी येवुन थांबला आहे...आणि ब्राह्मण परस्पर विजेते ठरले आहेत... कारण बहुजनही "नव-मनुवाद" पाळत आहेत...उभय्पक्षी दोषी आहेत. ब्राह्मणी संघटणा मुस्लिम द्वेष शिकवतात तर आपले विचरवंत ब्राह्मण द्वेष पसरवत आहेत...मग वेगळेपण काय राहिले? असेच सुरु राहिले तर बहुजनीय चळवळ संपेल. भावनिक आधारावरील द्वेष्पुर्ण चळवळी कधीही यशस्वी होवु शकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे. पण ब्राह्मणांवर टीक केली तर ते जसे "ब्राह्मण्द्वेश्टा" असा शिक्का मारुन मोकळे होतात तसेच बहुजनीय चळवळीतील उणीवा प्रामाणिकपणे दाखवल्या बहुजनीय कार्यकर्ते-नेते-विचारवंत त्त्याची "भटाळलेला", "ब्राह्मणानी दत्तक घेतलेला" अशी हेटाळणी करतात...मग संतुलीत विद्वानांनी काय समरसता मंचावर जायचे?

बहुजन महत्मा बळीचा वारसा सांगतात...त्याची आजही पुजा करतात...परंतु ती महान संस्क्रुती आता विक्रुत करत बळीला पुन्हा पाताळात गाडण्यासाठी नवे "वामन" अवतार सिद्ध झाले आहेत आणि ही चिंतेची बाब आहे...यावर प्रखर आत्मचिंतन केले जावे.

प्रा. विलास वाघ: बहुजन म्हणजे नेमके कोण याचीच अजुन नीट व्याख्या नाही. या शब्दाचा अर्थ सोयीने लावला जातो. मराठे बहुजन आहेत का? ओ.बी. ची. बहुजन आहेत का? मग अस्प्रुश्य, भटके विमुक्त नेमके कोठे मोडतात याचा विचार नाही. मुस्लीम-जैनही सोयीने बहुजन ठरवले जातात. ही लबाडी असुन दलितांवर अत्याचार करण्यात ब्राह्मणांएवढेच मराठेही जबाबदार आहेत हे खैरलाजी प्रकरणावरुन स्पष्ट दिसते. गावोगावी दलितांवर अन्याय करणारे मराठेच आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आम्ही दलितांबाबत मराठे आणि ब्राह्मणांत फरक करु शकत नाही. जातीच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी "बहुजन" हा शब्द वापरला जात आहे.

बहुजनीय चळवळ भरकटलेली आहे आणि जोवर मुख्य मुद्द्यांवर एकमत होत नाही तोवर ती यशस्वी होणार नाही.

परशुराम वाडेकर: ब्राह्मणी व्यवस्था आणि भांडवलशाहीवादी व्यवस्था या दोन्ही चळवळीच्या मारेकरी आहेत, मानवजातीच्या शत्रु आहेत. त्यांना विरोध करणे आवष्यक आहे. जातीय अहंकाराची परिणती अंतता: सर्वविनाशात होइल आणि ते योग्य नाही. माझ्यासारख्या कर्यकर्त्याला नेहमी प्रष्न पडतो कि आपण कोठे जात आहोत? नेमके ध्येय काय आहे?

शुद्धोदन आहेर: बहुजनीय चळवळीने गौतम बुद्धाच्या सम्यक तत्वद्न्यानाचा उपयोग करायला हवा. "बहुजन" हा शब्द पहिल्यांदा गौतम बुद्धाने वापरला. जातीय/वांशिक अहंकारांमुळे इतिहासात विनाशच घडलेला दिसतो. आजही आपण तीच परंपरा चालु ठेवत असु तर ते सर्वविनाशक ठरेल. जाती नश्ट करण्याऐवजी त्या अधिक धारदार होत आहेत आणि त्यातच बहुजनीय चळवळीचे अपयश दडलेले आहे यावर चिंतन करावेच लागणार आहे. त्यातुन व्यापक मानवतावादी दिशा ठरवावी लागणार आहे. द्वेषाने आंधळे झालेले समाजाचे कसलेही नेत्रुत्व करु शकत नाहीत. सद्ध्या तीन छावण्या आहेत...एक चैत्यभुमीवरची, दुसरी रेशीमबागेतली तर तिसरी बहुजनीय. या सार्यां छावण्या असंबब्द्ध आणि हिरमोड करणार्या आहेत.

प्रा. हरी नरके: जेही ब्राह्मण नाहीत, ब्राह्मण्वादी नाहीत त्या सर्वांना बहुजन समजावे. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था याचे समर्थन करणारे सारेच बहुजनीय चळवळीचे मारेकरी आहेत. जे आजही द्न्यानबंदी घालुन समाजाला मर्यादित परीघात ठेवत आहेत तेही चळवळीचे मारेकरी आहेत. पण त्याहुनही मोठे मारेकरी आहेत बहुजनीय चळवळीचे नेत्रुत्व करणारे परशुराम खेडेकर, वामन मेश्राम किंवा श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे वैचारीक मतभेद मान्य न करता, लोकशाहीची तत्वे न मानता हुकुमशाहीची सारी वैशिष्ट्ये कायम ठेवणारे लोक. मी भांडारकर संस्थेवर सरकारी प्रतीनिधी म्हणुन आहे...असे असतांनाही त्यांनी नुकताच माझ्याविरुद्ध मी, डा. आ.ह. साळुंखे यांनी राजीनामा द्यावा असा ठराव केला. एकीकडे हेच लोक अशा संस्थांवर बहुजनीय विचारवंत का नाहीत असे विचारतात. हा दुटप्पीपणा आहे. "मुलनिवासी नायक" सारखे चिंधी व्रुत्तपत्र सातत्याने "मी भटाळलो आहे" अशी टीका करत आहे. मला काहीही न विचारता माझे म्हणणे काल्पनीकपणे छापले जात आहे. खेडेकरांनी तर माझा एक लेख स्वता:च्या नावाने छापला...पण साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. यांचे इतिहास संशोधन फक्त स्वर्थापुरते, अप्रगल्भ आहे आणि लोकांना भडकावणे आणि ब्राह्मणांना शिव्या देणे एवढ्यापुरते मर्यादित आहे. मी ब्राहमणी व्यवस्थेचा विरोध करतो...करत राहील पण म्हणुन कोणी सा-या ब्राह्मणांचाच द्वेष करा असे सांगेल तर ते मला मान्य नाही. आम्ही एकाकी वाटचाल करु...ब्राह्मणी छावणीत कधी जाणार नाही...पण असे हे लोक करत राहतील, खोटे रेटुन बोलत राहतील तर मात्र चळवळ संपेल. मी गेली २५ वर्ष एवढ्या तळमळीने फुले-आंबेडकरांवर रात्रंदिवस काम करीत असता, त्यांचे सारे साहित्य संशोधन करत प्रकाशित करत असता हेच लोक, माझेच संशोधन वापरत चळवळ करत असता सोयीचे मुद्दे घेतात आणि गैरसोयीचे टाकुन देतात याचे आश्चर्य वाटते. उदा: माझ्या प्रेतावर ब्राह्मणाची सावली पडु नये असे फुलेंनी म्रुत्युमत्रात लिहिले असे हे लोक सांगतात...पण प्रत्यक्षात त्यानी लिहिलेय कि "जोही कोणी ब्राह्मण स्प्रुष्य-अस्प्रुष्यता मानतो अशा ब्राह्मणाची माझ्या प्रेतावर सावली नको" असे म्हटले आहे. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्याचे "यशवंत" असे नांव ठेवले व सारी इस्टेट त्याला दिली हे सांगितले जात नाही. भांडारकरांचे फुलेंनी त्यांच्या एका पवाड्यात मदत झाल्याबद्दल आभार मानले आहेत तर खुद्द आंबेडकरांनीही भांडारकरांबद्दल व अन्य अनेक पुरोगामी ब्राह्मणांबद्दल आदरच व्यक्त केला आहे...असे असतांनाही "सब घोडे बारा टक्के" या न्यायाने सार-याच ब्राह्मणांना टार्गेट करणे मला मान्य नाही.

10 comments:

  1. आपल्या लेखाविषयी काही मतभेद आहेत, ते मांडतो...

    १) प्रती शिवश्री संजयजी: बहुजन चळवळी वाटल्या गेल्यात हे तुमचे विधान चूक आहे, उदा. मराठा सेवा संघाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठयांच्या खोपडीत आणि झोपडीत पोचवले. मूलनिवासी आणि आर्य ह्या संकल्पनांना विज्ञानाने सुद्धा पुष्टी दिली आहे. वाशिंग्टन युनिव्हर्सिटी च्या मायकल बामशाद यांनी DNA च्या अभ्यासातून हे सिद्ध केले आहे कि ब्राम्हण उपरे आहेत. सत्य सांगणे हा जर द्वेष वाटत असेल तर त्यात कुणीच काही करू शकत नाही.

    २) प्रती शिवश्री विलास वाघ: आपल्याला बहुजन कोण हे कळत नसेल तर महात्मा फुलेंच्या साहित्याचे पठण करा. बहुजन शब्दातच त्याचा अर्थ आहे, जे "बहु" आहेत, ज्यांचा DNA एकमेकांशी जुळतो ते बहुजन. आणि खैरलांजी प्रकरण जातीभेदामुळे घडले, त्यात जाती निर्माण करणार्‍यांचा दोष नाही का? आणि मराठयांना किंवा दलितांना दोष देण्यात अर्थ नाही, ह्याचे मूळ जातिभेदात आहे. एखादी विषवल्ली तोडताना फक्त फांद्या छाटत राहिल्याने ती नष्ट होणार नाही, तिच्या मुळावर घाव घालावा लागतो.

    ३) प्रती शिवश्री हरी नरके: आपला जर खेडेकर किंवा मेश्राम यांच्याबद्दल काही आक्षेप असतील तर आपण ते चर्चेतून सोडवावेत. राजीनामा देण्याचा ठराव यासाठी केला होता कि ज्या संस्थेने लेनला मदत केली त्यांचा निषेध करावा, व सरकारवर दबाव आणावा. तुम्हाला यात तुमची नैतिक जबाबदारी दिसत नाही का? तुम्ही म्हणता तुम्ही ब्राम्हणी व्यवस्थेचा विरोध करता ब्राम्हणांचा नाही, हा दुटप्पीपण आहे. कारण ब्राम्हणी व्यवस्था हि ब्राम्हणांची आहे, तिला विरोध म्हणजे ब्राम्हणांना विरोध. प्रत्येक ब्राम्हण हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ह्या व्यवस्थेच्या समर्थनात आहे. आपली तळमळ आम्हाला ठाऊक आहे आणि आम्ही आपले कार्य कधीच विसरणार नाही. तुम्ही तुमच्या कार्याचा अभिमान जरूर बाळगावा, आम्हीही बाळगू पण त्याचे गर्वात रुपांतर होऊ देऊ नका. आणि भांडारकरांबद्दल काहीच आक्षेप नाहीत, पण त्या संस्थेबद्दल आहेत. आणि परत एकदा तुमचे जर खेडेकर किंवा मेश्राम यांच्याशी मतभेद असतील तर ते चर्चेतून सोडवा, चव्हाट्यावर त्याचे प्रदर्शन करू नका.

    ReplyDelete
  2. शिवश्री मराठा, आपण परिसंवादात हजर असता तर कदाचीत काही गैरसमज झाले नसते. मला व्यक्तिशा: शिवश्री खेडेकर सरांबद्दल आदर आहे. तेही माझ्या लेखनाला आवर्जुन दाद देत असतात. वामन मेश्रामांबद्दल माझे आक्षेप आहेत हे खरेच आहे. डी.एन.ए. चाचनीबद्दल आपण बोलता ती फार जुनी माहिती आहे. क्रुपया खालील उतारा वाचावा:

    A 2006 genetic study by the National Institute of Biologicals in India, testing a sample of men from 32 tribal and 45 caste groups, concluded that the Indians have acquired very few genes from Indo-European speakers. More recent studies have also debunked the British claims that so-called Aryans and Dravidians have a racial divide. A study conducted by the Centre for Cellular and Molecular Biology in 2009 (in collaboration with Harvard Medical School, Harvard School of Public Health and the Broad Institute of Harvard and MIT) analyzed half a million genetic markers across the genomes of 132 individuals from 25 ethnic groups from 13 states in India across multiple caste groups. The study establishes, based on the impossibility of identifying any genetic indicators across caste lines, that castes in South Asia grew out of traditional tribal organizations during the formation of Indian society, and was not the product of any Aryan invasion and subjugation of Dravidian people.
    द्न्यान पुढे जात असते. जर उच्च-वर्णीय ब्राह्मण म्हनवणारे "आर्य" असते तर माझे काय जानार आहे? मुळात कोणीच "मुलनिवासी" नाही, मानव आदिम काळापासुन भटका आहे. आणि जेनोम प्रकल्प हा आनुवांशिकी ठरवण्यासाठी आहे...वांशिकी ठरवण्यासाठी नाही. दोन्हीत मुलभुत फरक आहे. तो काय हे मेश्राम सांगत नाहित. बाहेरुन आलेले...अशी संद्न्या वापरली तर राजपुत हे सिथियन असल्यामुळे ते आपोआप परकीय ठरतात...भोसले (वा मराठे) कुळ जर आपली रक्ताची नाळ राजपुतांपर्यंत नेत असतील तर तेही परकीय ठरतात. मग त्याचे काय करायचे? मुळात मराठ्याद्दलचा मराठ्यांचा समजही चुकीचा आहे, वांशिक अहंकाराचा आहे. त्याचे काय करायचे? ब्राह्मण हेच परकीय आणि त्यांना हाकला...मुळावर घाव घाला हे तुमचे विधान भावनिक आहे. प्रश्न असा आहे कि सत्ताधारी/शासक वर्ग हा कोण होता? आणि तो एवढा मुर्ख होता का कि ब्राह्मण सांगतील तसे वागावे? त्यामागे नेमक्या कोणत्या प्रेरणा होत्या हे आपल्याकडुन समजावुन घ्यायला आवडेल.
    माझे म्हनने एवढेच कि आपणही पुन्हा त्याच ऐतिहासिक चुका करत आहोत...आंबेडकरांना मराठा सेवा संघाने औदार्य दाखवले हे खरेच आहे पण मेश्राम मात्र आंबेडकर विरोधी आहेत. खेडेकर साहेब मुस्लिमांना जवळ करत, एक नवा आदर्श घालत आहेत कारण ते आपलेच पुरातन बांधव आहेत. वर्ण व्यवस्थेमुळे खुप लोक धर्म सोडुन गेले...आजही जात आहेत. पुढेही जातील. या हिंदुत्ववाद्यांना (खरे तर वैदिकांना) आपला मेलेला वैदिक धर्म नव्याने गाजवण्याची खुमखुमी आली आहे...आणि त्याचा विरोध केला जाणारच. पण त्याचा अर्थ सारेच वैदिक समर्थक आहेत असा होत नाही.
    वाद चव्हाट्यावर नकोत हे आपले मत मला पटले नाही. वाद असणे आणि त्यातुन धडा घेत पुढे जाणे हे महत्वाचे. हरी नरके, आ.ह. साळुंखे यांचा राजीनामा मागण्याचा ठराव करण्यापुर्वी आणि नंतरही त्यांच्याशी आजतागायत कोणीही संपर्क साधलेला नाही. तुम्ही खात्री करुन घेवु शकता. हे योग्य नाही. चळवळ भरकटली आहे हे वास्तव आहेच. आपण जातेव्यवस्था नश्ट न करता अजुनही जातींत अदकुन पडलो असु तर मी म्हणतो मनुवाद जिंकला...आपण बदलायला हवे...

    ReplyDelete
  3. (१)
    श्रीमान संजय सोनवणी साहेब,

    ज्या अर्थी आपण "बहुजनांच्या चळवळीचे मारेकरी कोण?" या परिसंवादातील विचार facebook वर प्रकट केलेत त्याचा अर्थ आपण त्या विचारांशी आणि विचारवंतांशी सहमत असलेले दिसते. परिसंवाद उरकल्यानंतर त्याची समीक्षा करणे आवश्यक असते म्हणून दोन वाक्ये लिहित आहे. त्या परिसंवादातील प्रत्येक मान्यवर वक्त्याची मते वेगवेगळ्या दिशेला जाणारी आहेत त्यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही. स्वता:च मांडलेल्या तत्वांना स्वता:च विरोधी मते मांडतात त्याचेच हे प्रामाणिक विश्लेषण मी मांडत आहे,
    जातीय व्यवस्था: श्रेणीबद्ध विषमता
    मला फार आश्चर्य वाटते आपण व्यक्तीगत अनुभवांचे मापदंड व्यापक समाज व्यवस्थेला लावता आणि त्यावरून इथल्या व्यवस्थेबद्दल मते मांडता. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जातीय विषमतेला सामोरे जावे लागले नाही किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही स्वतंत्र आहात, पण हे व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या वाट्याला काही अलगद आलेले नाही किंवा चांगल्या ब्राह्मणांनी बहाल केलेले नाही तर महापुरुषानी त्याग आणि संघर्ष केला त्यामुळे प्रस्थापित सनातन्यांना सोडणे अपरिहार्य झाले आणि आमच्या वाट्याला माणूसपण आले. तुमच्यापुरता प्रश्न सुटला पण अजूनही सहा लाख गावांमध्ये प्रत्येक जातीची वेगळी वाडी, वेगळे पाणवठे, वेगळी देवळे अजूनही जाती-जाती मध्ये रोटी-बेटी व्यवहार बंदी आहे. हे आपणा सारख्या कार्यकर्त्याला माहित नाही का? जातीयता अजून आहे हे वास्तव आपण स्वताच मान्य करता आणि आणि मी मनात नाही असेही म्हणता? जाती लपवून किंवा मी मनात नाही असे म्हणून त्या नष्ट होणार नाहीत. आजारपण लापाविल्याने किंवा मनात नाही म्हटल्याने ते बरे होत नाही तर त्याची करणे शोधून योग्य उपचार केल्यानेच तो बरा होतो. जातीयतेच्या विषमतेने ज्या ब्राम्हणेतराना मानवतेचे हक्क आणि अधिकार हि मिळू दिले नाहीत तेच प्राप्त करण्यासाठी जातींच्या आधारावरच लढावे लागेल. जातीय विषमतेचे भूत उठविणाऱ्याच्याच मानगुटीवर बसविण्यासाठी बहुजन चळवळीची नीती समतेची पण रणनीती जाती आधारित असणे म्हणूनच अपरिहार्य आहे.

    मनुष्यमात्राला नीच लेखून पशूपेक्षाही खालच्या पातळीवर जगायला लावणे आणि त्याला धार्मिक रूढी, परंपरा बनविण्याचा हा अधमपणा आहे? विकृत मेंदूच्या आणि उरफाट्या काळजाच्या रानटी महाभागांनी केवळ स्वार्थी हव्यासापोटी प्रस्थापित केलेल्या करोडो शोषितांच्या रक्ताने, घामाने आणि आश्रुनी माखलेल्या श्रेणीबद्ध विषमतावादी व्यवस्थेचे जनक, उपभोक्ते, पुरस्कर्ते निष्पाप, निष्कलंक असू शकतात का? हजारो वर्षे शास्त्रे, स्मृती, पुराणे यांमध्ये वर्णभेद, जातीयतेचा पुरस्कार केला आणि त्याच्या समर्थकांनी अतिरेकीपणे त्याचा लाभ घेतला त्यासाठी वेळोवेळी AMENDMENTS केली. भूदेव म्हणतात परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांचा वंश नष्ट केला आणि त्यांच्या स्त्रियांशी समागम करून जो नवीन वंश निर्माण केला ते मुळचे क्षत्रिय नसून शुद्र आहेत. जर परशुरामचा उदोउदो चालतो, देवळे चालतात, भक्ती पोथ्या-पुराणे चालतात. आमच्या पूर्वजांच्या वंशाचा नाश चालतो, आमच्या माता भगिनीची नालीस्ती चालते पण अशा नीच संस्कृतीच्या समर्थकांचा निप्पात करण्याचा विचार मांडला तोही बहुजनांची धार्मिक, मानसिक, राजकीय आणि वैचारिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी तर आमच्या विचारवंताना आभाळ कोसळल्यासारखे होते, मानवता नष्ट झाल्या सारखे होते. असे का? (उनका खून खून और हमारा खून पानी)

    मला वाटते हा अधिक कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे कि बहुजन चळवळी सोबत कोण आहेत?
    क्रमश:

    ReplyDelete
  4. (२)
    चांगले ब्राम्हण ओळखण्याच्या कसोट्या
    आजारपण आणि आजारी माणूस यांत उपचार कोणावर केले जातात? भूक आणि भुकेलेला यांत भेद करता येतो का? अन्न हे भुकेलेल्या व्यक्तीलाच दिले जाते ना? अतिरेकी कारवाया करणाऱ्या अतिरेकीना शिक्षा होतेच ना? खुनाचा गुन्हा आणि खुनी यांत भेद करून खुन्याला सोडले जाते का? यांवरून ब्राह्मण्य-ब्राम्हणवाद आणि ब्राम्हण यांत भेद करण्याचे औदार्य का? हा वास्तविकतेपासून पळपुटेपणा नाही का? ब्राह्मण्य हि केवळ प्रवृत्ती, मानसिक विकृती आहे का? त्याचे दीर्घकालीन इथल्या सामाजीवानावर, अर्थव्यवस्थेवर, राज्यव्यवस्थेवर, धर्मव्यवस्थेवर कोणते दुष्परिणाम झाले आहेत हे आपण नाही का जाणत हा केवळ चर्चेचा विषय आहे का? माझ्या मते हि मानसिक प्रवृत्ती नसून व्यावहारिक विकृती आहे. कोणीहि शुद्ध रक्ताचे नाही सर्व जाती मिश्रित आहेत हे शोषितांच्या गळी उतरविण्या एवजी जे शोषक आहेत त्यांना सर्व पातळ्यांवर स्वीकारण्यास का सांगत नाहीत? ब्राम्हण समतेचा आव आणून विषमतेचे समर्थक मोठे करतात तर बहुजन समतेचा पुरस्कार करणारे मह्पुरुष मोठे करतात. वरकरणी जरी साम्य दिसत असले तरी नैतिकदृष्ट्या कोण योग्य आहेत हे आपणच सांगावे.

    इथे मी माझे मत मांडतो जर चांगले ब्राह्मण आहेत जे निरुपद्रवी, अलिप्त राहणारे असतील परंतु ते जर वाईट ब्राम्हणांच्या विरुद्ध बंड करत नसतील तर अशांचा आम्हालाहि काही उपयोग नाही त्यांना काय काय पुजायचे आहे? परंतु त्यांचेही हात बहुजनांच्या दु:खाश्रुनी माखलेले हे ते आणि आमचे विचारवंत विसरतात. ते आपली प्रतिष्टा, मान-सन्मान, संपत्ती सोडण्यास तयार आहेत का? आमच्या विचारवंताना चांगल्या ब्राह्मणांचा फार कळवळा येतो. चांगले ब्राम्हण शोधण्यासाठी आपण अति सामान्य कसोट्या लावून तरी पाहू या:
    १. कसोटी क्र.१: चांगल्या ब्राह्मणांना हे माहित आहे कि त्यांच्या पूर्वजांनी ब्राम्हणेतरांच्या हजारो पिढ्या बरबाद केल्या त्याची परतफेड म्हणून ब्राम्हणेतरानाहि ब्राम्हण करून घ्यावे (त्यांचाही उपनयन विधी करावा). गाडगे महाराज टिळकांना जाहीर सभेत म्हणतात, "टिळक महाशय म्या बिचारा परीट, मलाबी तुमच्या पैकी करून घ्या." सनातन्यांमुळे हे अशक्य आहे असे चांगले ब्राह्मण म्हणतील आणि पळ काढतील.
    २. कसोटी क्र.२: आशा विषमताधीष्टीत धर्माचा, जातीचा त्याग करावा आणि समतेचा, मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या दुसर्या धर्मात जावे आणि आपल्या डोक्यावरील कलंक पुसून टाकावा. दुष्टांच्या पापाचे वाटेकरी होऊ नये. हिंदू कोड बिलाचे समर्थन करताना श्री.न.वि.गाडगीळ म्हणतात, "मी ब्राम्हण जातीत जन्मलो पण मी माझ्या जातीचा हट्ट का धरावा ? माझ्या मनात आले कि आपण जानवे घालू नये आणि मी माझे जानवे तोडले. तेव्हापासून मी जानवे वापरीत नाही. जुन्या टाकाऊ चाली टाकून दिल्याच पाहिजेत." पण चांगल्या ब्राम्हणांना स्वधर्म सोडून परधर्मात जाऊ नये अशा मनोवृतीतून बाहेर येणे शक्य नाही असे म्हणून पळवाट काढण्याची खुबी अवगत आहेच म्हणा, मग आता तिसरी आणि अंतिम कसोटीला तरी उतरतील का?
    ३. कसोटी क्र.३: श्रीधर बळवंत टिळक ज्यांनी गायकवाड वाड्यावर 'चातुर्वर्ण्य विध्वंसक समाज समता संघ' हे नाव देऊन खरी अस्पृशता आणि जातीयता निर्मूलनाची चळवळ उभी केली. चांगल्या ब्राम्हणांनी निदान जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमात भाग घ्यावा. पण ब्राम्हण अनेक उपक्रम करतील, मंडळे स्थापन करतील, सभा-परिसंवाद घडवून आणतील पण जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमात भाग घेणार नाहीत असे श्री हरी नरके सर म्हणतात.
    क्रमश:

    ReplyDelete
  5. (३)
    गोष्टीतल्या राजाचा जीव पिंजरयातील पोपटात असतो त्या पोपटाचा इतरांना खूप त्रास होत असतो तो राजा म्हणतो पोपटाला मारा पण माझा जीव जाता कामा नये. माझ्या भावा- बहिनिनो हे शक्य आहे का? तसेच ब्राह्मण्य-ब्राम्हणवादाशिवाय तर ब्राम्हणांचे अस्थित्व कसे शक्य आहे? त्यांच्यात भेद करणे म्हणजे खोडसाळपणा आहे. आपण प्रवृत्ती आणि व्यक्ती यांमध्ये भेद करता आणि प्रवृत्ती विरुद्ध लढण्याचा उपदेश करता. पण आपण मानवी प्रवृतीचा गुणधर्म जाणत नाहीत का? एखाद्या प्रवृत्ती, वृत्तीमुळे माणसाचा लाभ होत असेल तर ती कदापि सोडत नाही. मग जेथे प्रतिष्टा, मान-सन्मान, सत्ता-संपत्ती, भूदेवपण उपभोगता येत असेल तर ते सोडण्यासाठी कोण बरे तयार होईल?
    क्रमश:

    ReplyDelete
  6. (४)
    संतुलित विद्वान हा काय प्रकार आहे?
    विचारवंताना तत्वे आणि तत्वज्ञान प्रेरित करते तर सामान्यांना वेदना आणि भावनिक बाबी प्रेरित करतात हे सर्वज्ञात असताना भावना विरहीत चळवळी कशा काय असू शकतात? काय बहुजनांच्या समस्या केवळ तात्विक आहेत?

    क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या महापुरुषाना हि ब्राम्हणद्वेष्टे म्हटले जात होते. जर साहेब आपणालाही हि उपाधी दिली जात असेल आणि आपल्या महापुरुषांच्या वैचारिक चळवळीशी जोडले जात असेल तर हा काय खंत करण्याचा विषय आहे? आणि साहेब संतुलित विद्वान हा काय फंडा आहे जरा विश्लेषण केलेत तर फार बरे होईल.

    प्रा.विलास वाघ साहेबांना विचारावे कि दलितांना मराठे, OBC सोबत दोन हात करण्यास सांगत आहेत कि त्यांचे वैचारीक प्रबोधन करण्यास सांगत आहेत? आपल्याच रक्ताच्या, हाडामासाच्या भाऊबंदावर धार्मिक गुलामगिरीमुळे अन्याय करणाऱ्या बहुजनांचे प्रबोधन करून त्यांना जोडण्याचे काम करायला हवे कि तोडण्याचे?

    गेली पंचवीस वर्षे श्री हरी नरके सर एकच विचार मांडत आहेत "पुरोगामी ब्राह्मण आणि प्रतिगामी ब्राह्मण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत" नाण्याला तिसरीही बाजू असते हे आम्हाला सांगितले नव्हते तरी त्यांनी याचे सविस्तर विश्लेषण करावे हि नम्र विनंती आणि आपण हा निरोप सरांना जरूर द्यावा.

    जर आपण अधिक योग्य असाल, बहुजनांचे खरे उद्धरक असाल तर स्वत:च्या विदवतेवर, कर्तुत्वावर (प्रायोजित न केलेली) चळवळ निर्माण करा बहुजन समाज नक्कीच तुमच्याकडे येईल. आपल्याच आंदोलनांवर ताशेरे ओढण्या पेक्षा नक्कीच हे कार्य सन्मान्य असेल.

    जाताजाता, संजय साहेब विषमता विरोधी समतेच्या युद्धात आपणाला अनेक धूर्तराष्ट्र मिळतील तेव्हा त्यांना कोणता इतिहास सांगाल. आणि हो तेव्हाहि परिसंवाद घ्याल त्यात "बहुजनांच्या चळवळी सोबत कोण?" किंवा "बहुजनांच्या चळवळीपासून भरकटलेले कोण?" किंवा "बहुजनांना भरकटणाविणारे कोण?" हे विषय जरूर ठेवा.
    समाप्त

    ReplyDelete
  7. प्रिय जितेन्द्रजी, परिसंवादात मान्यवर वक्ते जे बोलले त्याचा मी क्रमश: सारांश दिला आहे आणि त्याचा अर्थ असा होत नाही कि मला सर्वच मते मान्य आहेत. प्रत्येकाला स्वता:ची अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि मोकळी चर्चा व्हावी हा उद्देश होता. ती झाली आणि प्रत्येकाच्या मनात काय घुस्मट आहे ती व्यक्त झाली हे या परिसंवादाचे फलीत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने चळवळीला बळ देण्याच्या प्रयत्नांत आहे आणि तेही या निमित्ताने सिद्ध झाले.

    दुर्दैवाने आपली मते भावनीक आहेत आणि भावनीक चळवळी यशस्वी होत नाहित हे लक्षात घ्यावे लागेल. ब्राह्मणांचे "ब्राह्मण" म्हणुनचे दोष गेली १००-१२५ वर्ष दाखवले जात आहेत आणि आजही फक्त तेच चालु आहे याला माझा आक्षेप आहे...आपण काय करत आहोत आणि कोठे चाललो आहोत इकडे मात्र लक्ष्य नाही. ब्राह्मण चांगले कि वाइट याची चिकित्सा (जर ब्रह्मण वा ब्राह्मण्यच मान्य नसेल तर) करण्याचे आणि आपला अमुल्य वेळ खर्च करण्याचे कारणच काय? आपल्याला ते ब्राह्मण का करुन घेत नाहीत (उपनयन) हा तुमचा प्रश्न पुन्हा मनुवादाशीच येवुन थांबतो, हे आपल्या लक्षात आलेले दिसत नाही. ब्राह्मण नाकारा कारण ते आम्हाला ब्राह्मण करुन घेत नाहित हा ध्वन्यर्थ मित्रवर्य चुकिचा आहे. आणि ब्राह्मणांनी जाती-निर्मुलनकार्यात भाग घ्यावा ही अपेक्षा आपण का बाळगतो बरे? आम्हा स्वता:ला काही करायचे नाही...हेच यातुन सिद्ध होत नाही का?

    प्रश्न मला कोण ब्राह्मण द्वेश्टा म्हनते याचा नाही तर बहुजनीयच खाजगीत मला, आ. ह. साळुंखे वा नरकेंना "भटाळलेले" म्हणत असतील तर ते योग्य आहे का?

    दुसरे असे कि आपण म्हणता "संतुलीत" म्हनजे काय...तर त्याचे उत्तर एवढेच आहे कि जे चुक ते चुक आणि बरोबर ते बरोबर (मग ते कोणाचेही असो) दाखवुन देतो त्याला मी संतुलीत म्हनतो. सामान्यांना फक्त भावनीक बाबी प्रेरित करतात हे तुमचे म्हनने मान्य करता येणे अवघड आहे. बहुजनांच्या समस्या तात्विक नाहीत...पण आताची बहुजनीय चळवळ त्यांच्या कोणत्या ऐहीक सुखासाठी काम करते आहे ते क्रुपया सांगावे...कारण खरे तर परिसंवादाचा अंतिम हेतु "द्वेष नव्हे तर प्रगती" हाच होता.

    नरके किंवा वाघ साहेब यांच्यापर्यंत तुमचे मत मी नकीच पोहोचवेल आणि त्यांची प्रतिक्रिया येथेर देइल. पण लढा हा प्रव्रुत्तींविरुद्धच असतो हे माझे मत कायम आहे. प्रव्रुत्ती बदलता येवु शकतात पण त्यासाठी प्रामाणिक आणि द्वेषरहीत प्रयत्न करावे लागतात. बुद्धाने असंख्य ब्राह्मणांना बदलवले हा इतिहास तुम्हाला माहितच असेल. दुसरे असे कि आपण म्हनता मान-सन्मान-प्रतिष्ठा-भुदेवपण ते का सोदतील? प्रश्न बरोबर आहे...पण ही प्रतिश्ठा बहाल करणारे आपनच आहोत...ती बंद करुयात ना!

    तुम्ही म्हनता "जाताजाता, संजय साहेब विषमता विरोधी समतेच्या युद्धात आपणाला अनेक धूर्तराष्ट्र मिळतील तेव्हा त्यांना कोणता इतिहास सांगाल. आणि हो तेव्हाहि परिसंवाद घ्याल त्यात "बहुजनांच्या चळवळी सोबत कोण?" किंवा "बहुजनांच्या चळवळीपासून भरकटलेले कोण?" किंवा "बहुजनांना भरकटावणारे कोण?" हे विषय जरुर ठेवा.". मला वाटते असे परिसंवाद अवश्य व्हावेत आणि तुम्हीही अशा परिसंवादांचे नेत्रुत्व करावे.
    शेवटी एक सांगतो, या भावना ज्या तुम्ही व्यक्त केल्यात त्यामागे तुमची तळमळ आहे हे खरेच आहे. मी जातीपार आहे असे मी म्हनतो...ते खरेही आहे...पण याचा अर्थ मला जातीविग्रहाचे व्यक्तिगत फटके बसलेले नाहीत असे नाही. उदाहरनार्थ माझ्या अलीकडच्याच "...आणि पानिपत" या कादंबरीचे नायक महार असल्याने मी महारच आहे असे समजुन मला एका विचित्र सामाजिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जो तो माझी खरी जात कोणती हे विचारु लागला आहे आणि त्यातुन बहुजनीय चळवळवालेही सुटलेले नाहीत. पण त्यामुळे खरोखर या दलिताना आजही ब्राह्मण काय आणि मराठे काय...किती छळत असतील याची कल्पना येते आणि मन खिन्न होते. धन्यवाद.

    ReplyDelete
  8. हरी नरके म्हणतात कि, मी ब्राहमणी व्यवस्थेचा विरोध करतो...करत राहील पण म्हणुन कोणी सा-या ब्राह्मणांचाच द्वेष करा असे सांगेल तर ते मला मान्य नाही. आम्ही एकाकी वाटचाल करु..

    हरी नरके हे आपणच पूर्वी केलेल्या ब-याच वक्तव्यापासून पाठ हिर्वित आहेत असे सरळ सरळ दिसत आहे. याला खोटेपणा म्हणावा का?
    ब्राम्हण कुठलाही असो तो कायम धोकदयकच या हरी नरके यांच्या आत्तापर्यंतच्या मताचे काय झाले. आणि हे परिवर्तन त्यांच्यात कश्यामुळे आले हे स्प्श्ट होईल का?

    ReplyDelete
  9. Sanjay jee, mee Praa. hari narake yanchi yavareel pratikriya ghevun avashy kalavato. Thanks.

    ReplyDelete
  10. अहो हेच हरी नरके आंबेडकरांच्या महाराष्ट्र शासन प्रकाशित पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात कि सध्या आंबेडकरी चळवळ बामसेफ चालवत आहे..
    मधेच या माणसाला उचकी आली आणि गेला भांडारकर मध्ये " गार्गीबाईवर" प्रवचन द्यायला !! तेथे सावित्रीबाईना चवी पुरतीच वापरली या विचारवंताने ! आणि सारे भाषण बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड विरोधात !!!
    .
    .
    .
    बहुजन चळवळीचे हेच मोठे दुखणे आहे..
    आमचे लोक सुरवातीला बामणाला शिव्या देतात पण नंतर अवसान गालातून ब्राह्मणी शक्तीच्या शरण जातात !!!
    .
    जे लोक आर्या ब्राह्मण परकीय नाहीत असे बोलतात ते फुलेना मनात नाहीत का ?
    त्यांना "सत्यशोधक चळवळीचे मारेकरी" म्हणावे का ?
    आपण "गुलामगिरी" हा ग्रंथ का वाचला नाहीत का ?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...