Thursday, October 11, 2012

आपणच असे सैतान आहोत!


खरे पहायला गेले तर प्रश्न हा भ्रष्टाचाराचा नसून स्वता:शी आपण किती प्रामाणिक आहोत याचा आहे. स्वत:शी प्रामाणिक नसलेला कोणताही माणुस पैसा खाओ अथवा न खाओ...भ्रष्टच असतो. पैशांचा भ्रष्टाचार विघातक असतो हे खरेच आहे...पण स्वत:शी भ्रष्टाचार करणे हे जगाला तर सोडाच स्वत:लाच अधिक विघातक असते. नव्हे विनाशक असते. नीतिभ्रष्टता नेहमीच स्वविनाशाला जन्म देते.

आपला समाज दुर्दैवाने नैतिक भ्रष्टतेच्या दु:श्चक्रात अडकला आहे. आपण भ्रष्ट म्हणून नाईलाजाने आपले नेते भ्रष्ट आहेत. आणि आपणच निर्माण केलेल्या भ्रष्टांच्या दलदलीत आपण रुतलो म्हणुन आक्रोश करायचा जसा आपल्याला अधिकार नाही तसाच श्री. विजय बळीराम पांढरे या मर्दाचा गौरव करण्याचाही नैतीक अधिकार नाही. कृष्णा खो-यापासून सुरु झालेल्या भानगडी आम्हा नागरिकांना माहित नव्हत्या काय? आम्ही काय केले? आज विजय पांढरेंना संरक्षण द्या म्हणतो...कोणाला? सरकारला? ज्या सरकारनेच हे सारे भ्रष्टाचार राजरोसपणे आपल्या डोळ्यांसमोर केले त्या सरकारला? मग आम्ही काय करत होतो? आम्ही काय करत आहोत? हे ताजे आहे म्हणुन उदाहरण दिले.

खैरनारांना मिडियाने प्रसिद्धीची चटक लावुन हद्दपार करुन टाकले. आता जे खैरनार दिसतात ते अस्तित्वाच्या शोधातील खैरनार. मी त्यांच प्रवास जवळुन पाहिला आहे. त्यांचे आत्मचरित्र "एकाकी झुंज" मीच प्रकाशित केले आहे. त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनामुळे मला दोन वर्ष पोलिस संरक्षणात रहावे लागले आहे. पण खैरनार अज्ञातवासात गेले त्याची पर्वा महाराष्ट्राने केली नाही. उद्या पांढरेही अज्ञातवासात्त...महाराष्ट्र साफ विसरुन गेला तर मला आजिबात आश्चर्य वाटनार नाही...

कारण मुळात आपणच भ्रष्ट आहोत. आपली नैतिकताच संशयास्पद आहे. आपल्याला पांढरेंना वा खैरनारांना वा अन्य महनीय लोकांना एक सामाजिक अपवाद म्हणुनच पहावे लागनार आहे...सैतानांच्या झुंडींत अपवादाने जन्माला येणारी अशी सूर्यफुले...त्यांचे कवतुक सैतान करतात ते केवळ स्वार्थापोटीच!

आपणच असे सैतान आहोत हे आपल्याला कबुल करायला हवे!

7 comments:

  1. आपण गडबडीत आहोत,लायसन घरी विसरले आहे आणि आपल्याला अति महत्वाचे काम आहे.तर आपण आपल्याला पकडणाऱ्या
    आर.ती.ओ. ला सहज,समजून उमजून शंभर ची नोट देणारच !आम्ही देत नाही - देणार नाही - देऊ नये हे सर्व थोतांड आहे .

    भ्रष्टाचार हा अनिवार्य आहे.सगळ्यांना सोयीचा आहे.म्हणून तो टिकणार.
    म.न.पा.त इमारतीचे नकाशे मंजूर होताना होणारा भ्रष्टाचार बिल्डर ला परवडतो.तो ते पैसे फ्ल्याट धारक लोकांकडून वसूल करतो.
    जनता वसाहत हा पण भ्रष्टाचारच आहे.तो पण अनिवार्य आहे.झोपडपट्टी अनिवार्य -कारण घर कामाला बाई कशी मिळणार ?
    ग्यास वितरण त्या मानाने कमी भ्रष्ट आहे.तुटवडा असेल , पण मोबाईल
    बुकिंग आणि वेटिंग लिस्ट स्मार्ट कार्ड यामुळे सर्व सुलभ झाले आहे.
    भ्रष्टाचार का होतो याची करणे फार गमतीशीर आहेत.
    दुसऱ्याला भ्रष्ट करून आपण " निर्विघ्न " वेळ विकत घेत असतो एक प्रकारे !
    शिवाय विघ्नहर्त्याला पण साकडे घालतो !त्यालापण विघ्ने दूर करण्याबद्दल मोदक देतो .हा तर उच्च कोटीचा विनोद आहे.
    आपल्याला स्वःताला सुखाच्या व्याख्येत बसवण्यासाठी आणि जगण्यातल्या यातना कमी करण्यासाठी हि केविलवाणी धडपड असते.
    कुटुंब छोटे आणि स्वप्ने मोठ्ठी -मिळवणारे हात पण चार ,मध्यमवर्ग श्रीमंती हाताळू शकत नाहीये - पचवू शकत नाहीये - हे कटू सत्य आहे.
    आज लोकांची तहान , भूक , बदलली - सकस आयुष्याची त्यांना गरजच नाहीये असे वाटते .सकस वाचन त्यांना कान्ताल्वाने वाटते.,
    शिक्षण आणि यश यांच्या कल्पना बदलल्या .
    मागच्या पिढ्यांचा वारसा जपणे ,आजीबरोबर "शुभम करोती "म्हणणे ,पाढे ,रामरक्षा म्हणणे जातीयवादी ठरत आहे !
    ब्राह्मणांना शिव्या घालणे हा धंदा झाला आहे ;
    आंबेडकर यांचा उदो उदो करणे हापण धंदा झाला आहे .
    बिन भांडवली !

    आयुष्याच्या पाउल वाटा -किती तुडविल्या येता जाता
    परी आईची आठवण येता
    मनी वादळे होती सुरु - खेड्यामधले घर कौलारू -
    सगळे विसरले - संदर्भ बदलले -
    पाण्या सारख्या विषयावर होणारे राजकारण , शेतकऱ्यांच्या आत्म हत्या ,
    अरुण वैद्य -लष्करातले सर्वोच्च अधिकारी,त्यांना मारल्या बद्दल गुरुद्वारातून मारणा ऱ्यांच्या नाते वाईकांचा सत्कार होतो आहे.
    महागाई आणि भ्रष्टाचार यासाठीच जनतेला एकत्र ठेवायचे , लुबाडण्याला सोयीचे जाते म्हणून -
    कायद्याचा अभ्यास कशासाठी - तर पळवाटा शोधण्यासाठी - भुजबळ यांची मुलाखत बघताना ( आय बी एन लोकमत )हसावे कि रडावे तेच कळत नव्हते .
    आपल्या देशाचा अर्थमंत्रीच श्री.वध्रा यांना क्लीन चिट देतो मग इन्कम टक्स डिपार्टमेंट कशी निःपक्षपाती चौकशी करणार ?

    निवडलेल्यांना परत बोलावण्याचा अधिकार आपल्याला कधी मिळणार ?
    ५० टक्के मतदान - त्यात ३-४ पक्ष - अपक्ष -अशावेळी नन ऑफ द अबोव्ह -हे ऑप्शन कधी वापरता येणार ?

    खलिल जिब्रान ची कविता " त्या देशाची स्थिती दयनीय असते "त्याची आठवण होते.
    आपण राजकारण्याना अति महत्व दिले - समाजकारण्याना बाजूला ठेवले आणि समाज सुधारकांचे बोलणे हसण्यावारी नेले -
    व्यक्ती पूजेचे अफाट स्तोम माजवले,अगदी ज्ञानेश्वरांपासून आंबेडकर यांच्या पर्यंत !
    राजकारण्यांना ते तसे फार आवडते .लोकांना पुतळ्याला हार घालायला शिकवा,टाळ्या !
    फोटोला हार घाला- - टाळ्या ! मग पुढे स्वःतालाच हार घालून घ्या - टाळ्या ! लोकांना चोइस नाही 'मुलायम किंवा मायावती.
    काँग्रेस किंवा भा ज प -हे सगळे भीषण आहे.
    आणणा हजारे यांना प्रेझेन्टेशन ची वक्तृत्वाची कला नाही-ते गांधी होऊ शकत नाहीत .त्यांची तेव्हढी लायकीही नाही.

    ReplyDelete
  2. कोणी खैरनार, पांढरे वा हजारे येऊन परिस्थिती बदलू शकत नाहीत. उपद्रवमूल्य वाढवू पाहणाऱ्या केजरीवालांकडूनही अपेक्षा केली जाऊ शकत नाही. गरज आहे ती प्रशासकीय पुनर्रचनेची जी सफल होण्यासाठी किमान दोन पिढ्या जावयास हव्यात.

    ReplyDelete
  3. लोकसंख्येचे वाढते केंद्रीकरण आणि मुलभूत गरजा पुरविण्याच्या यंत्रणेवर शहरातून पडणारा असह्य ताण यामुळे
    भ्रष्टाचार फोफावतो.
    शहरांकडे येणारे लोंढे थांबवणे खेडे घटक धरून -निसर्ग चक्रातून मुलभूत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणे -
    सोलर उर्जा , बायो ग्यास इत्यादी ..
    असे काही उपाय सुचतात.
    शहरातील फ्लोटिंग पोप्युलेशन कमी होणे पण तितकेच महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  4. जिवंत राहण्यासाठी करावा लागणारा भ्रष्टाचार व सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी करावा लागणारा भ्रष्टाचार यात फरक करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार करावा की करू नये हे स्वातंत्र्य ज्यांना आहे त्यांचे हे उत्तरदायित्व आहे. या देशात (मुळात याला देश म्हणावे की नाही हाच प्रश्न आहे) गरिबीतून आलेली अगतिकता इतकी भयानक आहे की स्त्रियांच्या शीलापासून मुलांच्या अवयवांपर्यंत सारेच विकले जाते. जोपर्यंत स्वत:वर जंगलात राहण्याची वेळ येत नाही तोपर्यंतच वन्य जीवनाचे कौतुक असते. श्वापदांच्या दुनियेत स्वत: श्वापद होण्याशिवाय अन्य मार्गच नसतो.

    ReplyDelete
  5. संजय सर, अतिशय उत्तम लेख, आपण भारतीय `प्रामाणिकता आणि नैतिकता" हेच विसरलोय, त्यामुळे नालायक जनतेचे प्रतिनिधी लायक कसे असतील. सुरुवात आपण स्वतापासून करायला हवी आहे.
    निलेश भोसले

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...