Tuesday, December 18, 2012

पण बलात्कार का होतो?

बलात्काराची घटना घडली कि समाजसेवकांना/विचारकांना लगेच कंठ फुटतो. बलात्का-यांना भर चौकात फाशी द्या अशा मागण्यांना उत येतो. बलात्का-याचे लिंग छाटण्याची शिक्षा द्या या स्तरापर्यंत मागण्या जातात. काही चित्रपटांत (आणि नाटकांतही) तशा शिक्षा पिडित महिलांनी अपराध्यांना दिल्याचे आपण पाहिले आहे. पण हे झाले सारे काही घडुन गेल्यानंतरचे आक्रोशन. आपली सामाजिक बांधिलकी जपल्याचे, संताप व्यक्त केल्याचे वांझ समाधान.


पण बलात्कार का होतो? यामागे कोनती समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय कारणे असतात यावर व्यापक विचार करुन अशा घटना होणारच नाहीत यासाठी आपण आजतागायत काय केले आहे? भारतात दहा बलात्कारांपैकी फक्त २ बलात्कार पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचतात...पैकी किमान एक पोलिसच (वा स्थानिक गांवगुंड) तडजोड करुन मिटवायला भाग पाडतात. जो एक गुन्हा दाखल होतो...तो न्यायालयिन प्रक्रियेत सडत जातो....न्याय क्वचित मिळतो, या आपल्या सामाजिक वास्तवाकडे जरा डोळे उघडुन पाहुयात. नव-यांनी केलेले बलात्कार तर कधीच नोंदले जात नाहीत!


पुरुषी अहंकार, वर्चस्ववादी प्रवृत्ती, अनैसर्गिक भोगेच्छा, जुलुमी वृत्ती आणि स्त्रीयांबद्दलची तुच्छता या सर्वांच्या एकत्रीततेतुन बलात्कारी मानसिकतेचा जन्म होतो. बलात्कारी प्रवृत्तीत अशा रितीने मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय पैलू एकत्र आलेले असतात. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे विषय आपल्याकडे फारसे अभ्यासले जात नाहीत. त्यामुळे त्यानुसार मग विद्यार्थ्यांची निरोगी जडन-घडन करण्याची बाब तर दुरच राहिली. मुलांची मानसशास्त्रीय वाढ पारंपारिक पुरुषप्रधानतेच्या जोखडाखाली होत आली आहे. स्त्रीयांबद्दलच्या विकृत्या कामभावनेला विधीवत मार्गांच्या अभावातुनही वाढत जातात. संध्या मिळाल्या कि कोणीही बलात्कारी बनु शकतो हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. नोकरी-धंद्यात जे लैंगिक शोषण होते तो बलात्कार नसतो काय?

बलात्का-यांना कठोर शिक्षा असायलाच हव्यात...पण ९०% गुन्हेच का नोंदले जात नाहीत यासाठी आपण काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे. आणि दुसरी बाब म्हणजे अशा प्रवृत्ती विकसनात ज्या असामाजिक बाबी/तत्वज्ञान हातभार लावतात त्याविरोधात आपली नेमकी काय भुमिका आहे? खरे तर काहीही नाही. ती कधी आणनार आहोत?

बलात्काराचे मानसशास्त्र आपल्या समाजशास्त्रात/व्यवस्थेत दडलेले आहे. ते मानसशास्त्र शास्त्रीय पद्धतीने, व्यापक प्रमानात समजावुन घेत प्रतिबंधक योजना आखल्या गेल्या पाहिजेत. स्त्रीयांप्रतीचा दृष्टीकोन बदलण्यासाठी शालेय जीवनापासुनच विशेष प्रयत्न करायला हवेत. मानसशास्त्रीय समुपदेशन करणा-यांची संख्या वाढवत संभाव्य बलात्कारी (गुन्हेगारही) हुडकुन त्याच्यावर मानसोपचार करता यायला हवेत.

पण हे होणार नाही. या सरकारला व समाजालाही त्यासाठी खर्च करायची बुद्धी होणार नाही. तशी ऐपतही नाही. फारतर त्यासाठी वेगळे एफ.डी.आय. आणावे अशी मागणी जोर धरेल...बलात्कार होतच राहतील...त्यांच्या फाशीच्या आणि लिंगछाटणीच्या मागण्या ऐन भरातच राहतील...

माझा मुद्दा अथवा रोख हा शिक्षा किती कठोर असावी वा नसावी याबाबत नाहीच आहे...रोख आहे तो घटना घडल्यानंतर काही दिवस उठणा-या उद्रेकी प्रतिक्रियांकडे. दहशतवादी हल्ला झाला कि आपण तसेच करतो...नंतर शांत-सुस्त आणि थंड पडतो...या आपल्याच सामाजिक मानसिकतेकडे रोख आहे. प्रत्येक गुन्ह्याला समाज गुन्हेगाराइतकाच जबाबदार असतो हे वास्तव आपण समजावून घेत नाही. स्त्रीयांच्या विवस्त्र धिंडी या देशात निघतात आणि समाजच ते दृष्य मिटक्या मारत पहात असतो. तथाकथित सभ्य लोक स्त्री सहकारी अथवा मुलगी शोभेल अशा स्त्रीयांबाबत मागे कशा कुचाळक्या करत असतात? तेंव्हा आम्हाला शरम वाटते का? शिक्षा नसावी असे कोनताही सुज्ञ माणुस म्हननार नाही. स्त्रीयांबाबबतच्या गुन्ह्यांकडे गांभिर्याने पाहिलेच पाहिजे. पण असे होनार नाही यासाठी आमची समाज म्हणुन काय जबाबदारी आहे कि नाही? पण आम्हीच मनोविकृत आणि दांभिक असल्याने असे बलात्कारी आपल्यात...आपल्या आसपास वाढत असतात आणि आम्हीच बदलत नाही, स्त्रीयांचा सन्मान करायला, लैंगिक जाणीवांचे नियंत्रण करायला शिकत-शिकवत नाही तोवर केवळ कायदे काहीही करु शकणार नाहीत एवढेच.


स्त्रीया भयभीत...हताश शोषित जीवन जगतच राहतील!

23 comments:

  1. ही झाली या विषयाची एक बाजू. पण मागे महाराष्ट्राच्या एका पोलिस महासंचालकाने आपल्या लेखात असे म्हंटले होते की बलात्काराच्या ९०% केसेस या बोगस असतात. सर्व कांही 'त्याच्या' आणि 'तिच्या' संगन मताने चालू असते पण कांहीतरी बिनसल्याने किंवा प्रकरण उघडकीस आल्याने त्याला बलात्काराचे रूप दिले जाते. समाजात स्त्रियांचे जसे लैंगिक शोषण होते तसे पुरुषांचेही होत असते. आता तर स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवेश केला असल्याने स्त्रियांना पुरुषांचे लैंगिक शोषण करण्याची जास्त संधी मिळत आहे. स्त्री बॉस आणि स्त्री सहकारी यांच्याकडून लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. Pan lakshyaat kon gheto...ithe mendhrasarakhe ekach bajune vicahr karnyachi savay amhala lagli aahe

      Delete
  2. नाना पाटेकरने " पुरुष " मधील रोल का सोडला याचे त्याने सांगितलेले कारण फार भयानक आहे.
    प्रेक्षक त्याच्या एन्ट्रीला चक्क टाळ्या वाजवायचे. ते त्याला असह्य झाले.असो-

    एका महान नटाची ही खूण म्हणता येईल.विषयाशी बांधिलकी ठेवत त्याने या टाळ्या नाकारल्या.
    रंगमंचाचे ऋण नजरेसमोर ठेवून त्याने आपल्या मनाने निर्णय घेतला.त्या टाळ्यांमुळे एक वेगळाच संदेश जात होता,तो त्याने झिडकारला !
    एका सुसंस्कृत नटाचे सभ्यतेशी असलेल्या बांधिलकीचे हे एक जिवंत मराठी उदाहरण आहे.
    आज ढासळणारी सभ्यता आणि मुक्त जीवन पद्धती तसेच फ्लोटिंग पोप्युलेशन आणि त्यातील विसंवाद यामुळे कुठल्याच मूल्यांचे समर्थन नीटसे समजून घेता येत नाही.
    आपल्याकडील लोकसंख्येचा विस्फोट ,असुरक्षितता,जाहिरातींचे मायाजाल,स्त्री-पुरुषांच्या मुक्त जीवन पद्धती बद्दलच्या कल्पना ,सार्वजनिक ठिकाणी त्याचे मांडले जाणारे रूप यातून समाजातील काही वर्गात चुकीचा संदेश जाऊन समस्या निर्माण होतात.
    आपापल्या घरापासून दूर जीवन कंठणारे ,एकटेपणा सहन करत महानगरांचे भोगवादी रूप अंगावर येउन आदळत असलेले कधी कधी व्यसनांच्या आहारी जाऊन काही नको त्या गोष्टी करतात,पण
    आपण लिहिल्याप्रमाणे,काही धनदांडगे केवळ आपल्या निरंकुश सत्तेचे सार्वजनिक प्रदर्शन करण्याच्या हव्यासाने काही ओंगळ अश्लील कृत्ये करतात.
    त्यातच त्यांना पुरुषार्थ वाटतो .
    तेंव्हामात्र आपल्या सार्वजनिक जीवनाविषयी सर्वानीच गंभीर विचार करणे आवश्यक ठरते.
    काल परवाच अमेरिकेतून आलेल्या एका बातमीत - एकाने अनेक जणांचा - त्यात मुलेपण होती - गोळीबार करत जीव घेतला असे छापूनआले होते !
    विरळ वस्तीच्या आणि सैल नीती बंधने असलेल्या देशात पण असा भयानक अंधार दिसतो -आपल्याकडे प्रचंड लोकवस्ती- अनेक मतभेद आणि तंटे बखेडे ! स्त्री ही अजूनही बऱ्याच जागी
    उपभोग्य वस्तू म्हणून पाहिली जाते. अशी वृत्ती टाळण्यासाठी केले जाणारे संस्कार प्रत्येकाच्या वाटयाला येतातच असे नाही.
    आज भारतात प्रत्येकाचा होणारा सततचा आर्थिक - भावनिक कोंडमारा आणि त्यामुळे येणारा प्रचंड राग यातून ही विकृती निर्माण झाली असावी. स्त्रीचे आई हे स्थान विसरून आज ती एक भोगवस्तू झालेली आहे - ही विकृती पुरुषांच्या नाकर्तेपणातून निर्माण झाली आहे.

    आपल्याकडे महानगरातून तथाकथित स्वयंघोषित समाज सुधारकांचे तांडेच्या तांडे हिंडत असतात. नवश्रीमंत वर्गातील ही नवीन करमणुकीची लाट असेल कदाचित ! त्यांना समाज सुधारणेचे कायम डोहाळे लागलेले असतात ! हा वर्ग प्रत्यक्ष जीव ओतून काम करायची वेळ आली की परदेशी यात्रेवर पसार होतो.यांच्या सगळ्या मोहिमा वातानुकुलीत वातावरणात आखल्या जातात.त्या मोहिमांचा आढावा सुद्धा टर्फ क्लब किंवा अशाच रमणीय ठिकाणी घेतला जातो. सतत जमेल त्या रीतीने दूरदर्शन वर दिसणे हेच त्यांचे ध्येय असते.
    अशा सोशल वर्कर स्त्रियांच्या कोंडाळ्यात आपल्या बलात्कारित स्त्रीच्या समस्या कशा सुटणार ?
    या गुन्हेगारांना - या भरकटलेल्या तरुणांना खरी हवी असते आईची माया ,पण अशा क्लब संस्कृतीत वाढलेल्या समाजाकडून त्यांना हि माया कशी मिळणार ?
    आज हेच खरे आपल्यासमोर आव्हान आहे.
    पुर्वीपण अशीच मुले शिकायला नोकरी करायला खेड्यातून शहरात यायची ,पण त्यांना अशाच कुणा मावशीचा ,आधार मिळायचा -तो तरुण तिलाच माउली मानून राहायचा .तिच्या घराला आपले घर म्हणायचा -पण आजच्या कुटुंब व्यवस्थेतून हि मावशी नष्ट होप्त चालली आहे.
    असे अनेक धोकादायक बदल समाजात होत आहेत पण त्याची शुद्ध कुणालाच नाही.
    सावध व्हायला पाहिजे.थांबून सगळ्यानी अंतर्मुख होऊ या.
    आज संजय सोनवणी हा विषय मांडत आहेत हि फार मोठी घटना आहे.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  3. देशाच्या उद्धारासाठी स्त्रीशिक्षण अपरिहार्यत: आवश्यक आहे असे सावरकरांचे मत आहे. परंतु स्त्रीशिक्षण या नावाने त्यांना केवळ पदवी शिक्षण अभिप्रेत नाही. स्त्रियांनी पदवीधर होण्यास त्यांची हरकत नाही. पण घर, मुले आणि राष्ट्र यांच्याविषयीचे आद्य कर्तव्य सांभाळूनच त्यांनी पदवी शिक्षण घ्यावे असे सावरकरांचे म्हणणे आहे. शिक्षणपद्धतीची नव्या दिशेने आखणी केली पाहिजे आणि स्त्रियांच्या वृत्तीला अनुकूल ठरणारे विशिष्ट प्रशिक्षण त्यांना दिले पाहिजे असे त्यांचे मत आहे. स्त्रिया पुरुषी वळणावर न जाता त्या साह्यकारी देवता व्हाव्यात. त्यांनी वक्तृत्वात वा गणितात प्राविण्य न कमावता, सहजसुलभ शालीनता नि मोहकता हे गुण अंगात बाणवावेत. चांगल्या निरोगी मातांची संख्या ज्या प्रमाणात वाढेल त्याच प्रमाणात राष्ट्र सामर्थ्यशील बनेल असे त्यांना वाटते. चूल आणि मूल हेच स्त्रीचे प्रमुख कर्तव्यक्षेत्र आहे हे त्यांचे मत आहे.

    आज भारताला अशाच विचारांची गरज आहे. सीतामाईने प्रभू श्री रामचंद्रांचे पाय दाबणे हीच खरी संस्कृती. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या आजच्या तरुण पिढीला या संस्कृतीकडे ढुंकूनही बघायला वेळ नाही हीच या देशाची शोकांतिका आहे. आणखी काही पिढ्यांत प्रभू श्री रामचंद्र हेच सीतामाईचे पाय धरतांना दाखवले जातील.
    स्त्री-पुरुष समान नाहीत, असूच शकत नाहीत हे स्पष्टपणे दिसत असतांना स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणे हा मूर्खपणाच नव्हे काय? स्त्रीने लक्ष्मणरेषा ओलांडली की तिचे पावित्र्यही मोबाईलच्या [ क्षमस्व, भ्रमणध्वनीच्या ] रेंजप्रमाणे [ क्षमस्व, मर्यादेप्रमाणे ] संपुष्टात येते. हा विचार आजच्या स्त्रियांनी मनात रुजवणे हे त्यांच्या दृष्टीने हितावह आहे. कारण संस्कृती, मर्यादा आणि नैतिकता यांची व्याख्या करण्याचा अधिकार केवळ आमचाच आहे. होय आमचाच, स्त्रियांचा नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. शीः -कोण हा नालायक पुरुषी अहंकारी माणूस - माणूस कसला -त्याला जनावर म्हणणे सुद्धा त्याचा सन्मान केल्यासारखे होईल.
      सावरकरांचे नाव घेऊन काहीही बरळणे सोडून द्या.
      सीतामाईने रामाचे पाय दाबणे ही आपली संस्कृती असे म्हणताना लाज कशी वाटत नाही ?
      सावरकर गार्गीचे उदाहरण देत असत.राणी लक्ष्मीबाई चे गुणगान गात असत.
      `कैकयीने दशरथाचे प्राण एका युद्धात वाचवले होते.-स्त्रियांच्या कर्तृत्वाची अशी उदाहरणे दिली असती तर ठीक होते.
      सावरकर असे परंपरावादी नव्हते.ते सर्वार्थाने आधुनिक विचारवंत होते.
      त्यांच्या नावावर काहीही खपवताना काळजी घ्या ! स्त्रियांचे स्थान पुरुषांनी ठरवण्याचे दिवस कधीच संपले.
      आता म.गांधींच्या बरोबरीने कस्तुरबांचे नाव घेतले जाते. सावरकर नेहमी राणी पद्मिनी , राणी लक्ष्मीबाई ,राजमाता जिजाऊ अशी उदाहरणे देत असत.

      स्त्री-पुरुष समान नाहीत, असूच शकत नाहीत हे स्पष्टपणे दिसत असतांना स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणे हा मूर्खपणाच नव्हे काय हे आपले विधान म्हणजे आचरट पणाचा कळस आहे.
      आपल्या देशाच्या घटनेने सांगितलेल्या मुल्यांची खिल्ली उडवताना आपल्याला लाज कशी वाटत नाही.
      खरेतर आपण असे लिहिल्याबद्दल सर्व स्त्रीवर्गाची क्षमा मागितली पाहिजे.

      Delete
    2. What do you mean to say by quoting such songs .
      Is it relevant to current subject under discussion ?
      We are discussing a very serious subject here and it is not correct to quote such songs here.
      If you are really interested in singing such song - Go and sing it in front of YOUR MOTHER AND SISTER.
      But not here.This is not a place to demonstrate it.
      Is it straight.?

      Delete
    3. Who the hell are you to dictate the terms to others? If the blog owner thinks that it is inappropriate then he would remove it. That decision is not yours!
      And unlike you, my mind is NOT PREOCCUPIED WITH MOTHERS AND SISTERS of other people. That is why I WOULD NOT TELL YOU WHAT YOU CAN DO WITH YOUR MOTHER AND SISTER. That choice is entirely yours to make.

      I didn't make any personal comments and I expect that no one should cross that limit. Those who get offended by the comments on the public platform they better avoid it. Now THAT is perfectly straight.

      Delete
    4. अनोउनिमस साहेब ,
      यांना ,
      आपण जे म्हटले आहे की ,
      ये गो ये ये मैना
      त्याचा या विषयाशी कसा अर्थ लावायचा हे आपण सांगू शकाल का ?
      तुमच्या सावरकरांच्या शिकवणीत अशी काही कुठे नोंद दिसली नाही कि आपले नाव गुप्त राखून हवी तशी बेताल बडबड करत रहायची.
      खूप इंग्रजी भाषेतून तारे तोडले तर स्पष्ट सांगायला काय झाले - काय सांगायचे आहे ते आपण स्पष्ट सांगणे आपल्या कर्तव्यात मोडत नाही का ?
      हा विषय श्री सोनवणी सरांनी मराठीतून का मांडला.तर सगल्याजनॆन सोपे करून समजावे म्हणून -
      आणि तुम्ही तर मडमेच्या झग्यातून जन्मल्यासरखे इंग्रजीत तारे तोडताय ?

      तुम्ही बलात्कार करणे या प्रवृत्तीचा निषेध करत आहात का नाही.आणि करत असाल तर हे असेच विषयाचा बेरंग करणे आणि कोणी ते नजरेत आणून दिले तर त्यावर असे उत्तर देणे हे तुमच्या आईनेतरी आम्हास शिकवले नाही.आणि ती आपल्या मुलालासुद्धा असे शिकवणार नाही.
      ज्याकोनी तुमची कान उघडनी केली ती अगदी योग्य आहे.पहिली गोष्ट तुमचे नाव लपवून तुम्ही काय शूरपणा मिलावताय हो भाऊजी ?

      तुमची श्रद्धास्थाने तरी काय आहेत ते कळू दे एकदा आम्हा सगळ्या जणींना.
      आम्ही सगळ्याजणी तुम्हाला जाब विचारणार नाही - तो तुमच्या आईला विचारू - की असे कारटे
      जन्माला का घातले आणि घातले तर नीट वाढवले का नाही !
      आमचे मंडळ तुमच्या घरावर निषेध मोर्चा आणू इच्छिते .
      सामोरे या - नाव सांगा .दुसऱ्या बाजीरावासारखा पळपुटेपणा करू नका.
      महिला संघ

      Delete
    5. तुमचा इंग्रजीचा माज उतरवल्यावर राग येणे साहजिकच आहे. बाकी मडमेच्या झग्यातून पडण्याचा तुम्हाला वैयक्तिक अनुभव आहे हे सिद्ध झाले. इतरांचे अनुभव काय असतील याविषयी तर्क लढवणे सोडून द्यावे ही उद्धट विनंती. तुम्ही स्वत:च महिला संघाचे नाव लावून दुसऱ्या बाजीरावाची औलाद असल्याचे दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन.
      इतरांच्या शब्दांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही म्हणून त्यांची आई बहीण काढणे ही तुमची तथाकथित संस्कृती असेल. इतरांची नाही. बलात्काराच्या लेखावरील प्रतिक्रियेत महिला संघाचे नाव लावून इतरांच्या आईचा उल्लेख करणाऱ्यांची मानसिकता काय आहे हे आता सर्वांना कळले असेलच. तुम्हाला अक्कल शिकवण्याची जबाबदारी इतरांनी घेतलेली नाही. तेव्हा इथून पुढे तुम्ही कितीही आक्रस्ताळेपणा करून प्रतिक्रियेची भीक मागितली तरी ती मिळणार नाही.

      Delete
  4. kayadayacha dhak astitvat nahi. Paishyachya joravar sarva vikat gheta yete ase samajnare karodo lok. sakali uthalyapasun TV, Media, Vruttapatre, Internet, cineme yatun fakta uttejakteche pradarshan..ani promotion..galli te dilli fakt corruption .yatun dusare kay honar?

    ReplyDelete
  5. जगभर युद्ध आणि यादवी जेव्हा जेव्हा घडली अगदी युरोप मधील महायुद्ध पहिली तर महिलांवर बलात्कार झाले.
    पुरुषी वर्चस्व महिलांवर स्थापित करण्यासाठी बलात्काराचा वापर केला गेला , बदला घेणे किंवा न्यूनगंड किंवा एखाद्या समूहाचा द्वेष असे घटक बलात्कार होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच दंगल असो किंवा सूड घेणे असो त्याची किंमत महिलांना मोजावी लागते.
    जनजागृती व कायद्याचे पाठबळ त्याला जनतेची साथ ह्या त्रिसूत्रीमुळे ह्या घटना आपण थांबवू शकतो.

    ReplyDelete
  6. Delhit ghadleli ghatan wachli aani man sunna zaala. kaay hey?
    tya apradhi lokanna pakadlya pakadlya bhar chaukat fasawarti latkawayla haw hota. yawar ekach upay aahe. jya jya baykanwarti ase nighrun atyachar hotat, tyanni shastra haatat ghene. tyashivay aapla samaj sudharnar naahi. samja ti baai bari zaali tar tine hatat pistul gheun sarwa aropinna jaaun thar karawe asa maaz mat aahe.

    ReplyDelete
  7. sanjay sir,
    why every alternate person here is taking the things personally .
    this is a very serious subject.
    i am very glad that you opened up this issue for discussion .
    at the same time everyone is expected to contribute in the discussion
    and take the things positively and seriously.
    if anyone thinks that few of the remarks are passed as a joke then she finds it disturbing ,
    especially in such type of subjects.
    so please ask everyone to pass remarks in a gentlemanly style.

    ReplyDelete
  8. sanjay sir,
    We are a egular group of senior citizens who eagerly read your blog and mostly appriciate the contains
    people people people
    my god !
    they keep on discussing and taking it personally.
    they wont take it seriously unless it hurts their family interests i think !
    its shame to here such odd songs in response to such beautiful analysis by you.
    is it not possible for you sir to stop such nonsense at the source.

    Who the hell are you to dictate the terms to others? If the blog owner thinks
    that it is inappropriate then he would remove it. That decision is not yours!

    sir,we all demand to you to express your anxiety on such type of arrogance on your blog.

    ReplyDelete
  9. Sanjay Sir,

    The prime reason for rape is that people are not afraid of its after effects. Max a rapist can get an imprisonment upto 10 -15 years. People will be afraid of raping any girl only if a rapist is hanged publicly.At least such punishments will abstain people from doing such heinous deeds.

    ReplyDelete
  10. Every reader please sign this petition to the President of India and The Chief Justice of India for fight against rape
    https://www.change.org/en-IN/petitions/president-cji-stop-rape-now?utm_source=action_alert&utm_medium=email&utm_campaign=15496&alert_id=cecWCjTgZY_fiFfMYFhnJ

    ReplyDelete


  11. संजयजी,
    अत्यंत ज्वलंत प्रश्नावर अत्यंत उत्स्फूर्त आणि कडवट ,तिखट आणि अतिशय
    परिपूर्ण प्रतिक्रिया दिल्या जात आहेत .यातला
    वैयक्तिक दोषारोपांचा भाग बाजूला ठेवला तर असे दिसते कि या सर्वांचे एकमत
    होते आहे की
    असे प्रकार थांबविण्यासाठी कायदा आणि जन जागृती असे दोन्ही मार्ग आपण
    चोखाळले पाहिजेत.
    आपली लोकसंख्या पाहता हे काम डोंगरा एव्हढे मोठे आहे.
    तसेच एकत्रित सार्वजनिक रित्या काम करायला गेले की मिडिया मुळे त्याला
    कसे वळण लागेल सांगता येत नाही.
    अन्न हजारेंची जी त्रेधातीर्पिट झाली ती अजून आपल्या समोर ताजी आहे.

    त्यामुळे जन जागृती चे काम जास्त करून वैयक्तिक पातळीवर झालेले बरे !
    मला या सर्व प्रकारचा आढावा घेताना लागोपाठ इतक्या प्रतिक्रिया आलेल्या
    पाहून प्रथम आनंद झाला .पुरुष आणि स्त्रियांनी सर्वानीच उत्कट मते
    नोंदवली .
    फक्त एकजण मात्र असे का लिहित होता समजले नाही.

    आधी एक गाणे लिहिले ,नंतर त्यावर कुणी काही तिखट लिहिले आणि विचारले तर
    त्याचा अर्थ सांगायचा नाही.
    हे बरोबर बुद्धीला पटत नाही.
    आमच्या पिढीत असे नव्हते.

    आम्हाला आचार्य कृपलानी ,म.गांधी , अटलजी,एस एम जोशी ना .ग.गोरे,जॉर्ज
    फर्नांडीस असे आणि असे अनेक, त्यांच्या भाषणातून भेटले.
    प्रत्यक्ष यशवंतराव,आचार्य अत्रे, मधु लिमये,मधु दंडवते,शरद पवार आणि
    अनेकांचे भेटण्याचे योग आले- ऐकायला मिळाले - शिकायला मिळाले-
    पण आजकाल जे हे असे चित्र दिसते ते आमच्या वेळेस नव्हते.
    आज ब्लोग वर लपून लपून शाब्दिक दगड मारल्यासारखे जे दिसते - तेसुद्धा नाव
    गाव लपवून - त्याचे फार आश्चर्य वाटते आणि खेद होतो.
    काळाचा महिमा असेल कदाचित !
    आम्हाला एखादी गोष्ट हिडीस वाटली तर आम्ही नाव न लपविता " अमुक एक गोष्ट
    किंवा वृत्ती अश्लाघ्य वाटली असे लिहितो. आपली प्रतिमा न लपविता लिहितो
    हे जास्त महत्वाचे !"
    पण वाद वाढवताना आपली आयडेनटीटी गुप्त राखून लिहिण्यामुळे त्या वादाला
    धीटपणा येत नाही. विचारांचा परिपक्वपणा येत नाही.
    मग तो कुठला महिला संघ असो किंवा सजग निवृत्त लोकांचा गट असो.किंवा
    स्वतः "तो ये गो ये ये मैना लिहिणारा असो."
    स्वःता संजय सरानी तर पूर्ण पाठ फिरवली यामध्ये.त्यामुलेतर फारच निराशा वाटली.

    हा काही कुणा एका बद्दलचा वाद नव्हता .कुणा एकाला दोष द्यायचा मुद्दा
    नव्हता .एका जिवंत मुद्द्यावर लोक उत्स्फूर्त पणे विचार मांडत असताना
    एकदम नाव गुलदस्तात ठेवत जर कुणी पाचकळपणे एखादी गाण्याची ओळ म्हटली तर
    काय म्हणावे ?
    आणि त्याला आपण जाब विचारला तर त्याने म्हणावे की ही काय तुमची खाजगी
    मालमत्ता नाही - कुणालाही हटकायला !
    म्हणजेच अशा ब्लोग वर असेच प्रकार चालणार ! त्यापेक्षा अशा ब्लोग वर
    लिहिण्यापासून दूर राहिलेले बरे !
    कारण असे हिडीस स्वरूप जर येणार असेल तर तिथे लिहिण्यात तरी काय अर्थ ?
    तुमचे चालू द्या - आम्ही निघतो- परत येणे नाही.

    ReplyDelete
  12. sanjayji,

    i remember a part of marathi drama and a dialogue by mr nana patekar a leader and a rapist.

    When someone is writing a song on your blog , i compare it with the nana's dialogue.

    that dialogue is something like this !,

    now donot worry ! all the rapes are going to stop !

    NO MORE RAPES ! NO MORE PROBLEMS !

    because women are going to STOP reacting - !

    " TYA PRATIKAAR KARAYACHE SODUN DENAR AAHET "-THAMBANAAR AHET - KITI JANANSHEE LADHATEEL ?

    i see the glimpses of this philosophy in the song quoted by the anonymous " ye go ye - ye maina "

    a shame !

    ReplyDelete
  13. काही प्रतिसादकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियांतून जी हीनकस भावना दाखवली त्यांचा मी निषेध करतो. मी वेळ जात नाही म्हणुन ब्लोग लिहित नाही. माझे विचार पटिओत अथवा न पटोत पण विविधांगी सकस चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. पण तिला काही लोक हरताळ फासतात. अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणुन मी प्रतिक्रियांचे पूर्वपरिक्षण करत नाही. वाचकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवतो...पण काहींमद्ध्ये तिचा अभावच असल्याने हेतू विफल होतात याचा खेद वाततो. माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे कि वाचकांनी सकसपणे वाद-विवाद करावा, खालच्या पातळीवर उतरु नये. तुमच्या प्रतिक्रियेवरुन इतर वाचक तुमची योग्यताही ठरवत असतात याचा विसर पडु देवू नये आणि मला कोणतीही प्रतिक्रिया उडवायला भाग पाडु नये ही विनंती.

    ReplyDelete
  14. याच देशात नव्हे तर सर्व जगातच लहानपणापासून पुरुषी वर्चस्वाची भावना मुलांमध्ये घरातून आणि समाजातून कळत नकळत रुजवली जाते. बलात्कार हे फक्त गरीब किंवा अशिक्षित लोकांकडूनच होत नाहीत तर उच्च कुळातील आणि कुलीन समजल्या जाणाऱ्या समाजातही होतात. बदलत्या समाजव्यवस्थेत स्त्रीचे वाढते वर्चस्व हे सभ्य म्हणवून घेणाऱ्या पुरुषांनाही खोल मनात कुठेतरी खटकत असते. आजही पुरुषांकडून बहुतेक शिव्या ह्यादेखील स्त्रियांचा उल्लेख करूनच दिल्या जातात. स्त्री ही दुय्यम आहे हे मनावर अशा प्रकारे ठसवले जात असेल तर त्याचा परिणाम असाच होणार. हे सर्व थांबवण्यासाठी स्त्रीला दुय्यम समजणारी पारंपारिक मूल्यव्यवस्था बदलून स्त्रीत्वाचे महत्व प्रस्थापित करणारी नवी मूल्यव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. निव्वळ आरोपींना कठोर शिक्षा देऊन हा प्रश्न निश्चितच सुटणार नाही.

    ReplyDelete
  15. पुरुषांची वर्चस्व नष्ट होण्याच्या अधिची ही परिस्थिति आहे ही , कारन पुरुष आपले आपले वर्चस्व जात आहे हे त्याला सहन होत नाही आहे. त्यामुळे स्रीला खच्चीकरण करण्याची सोपी प्रक्रिया म्हणजे बलात्कार

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...