Tuesday, December 10, 2013

सर्व बेड्या तोडून!

मानवी जीवन विलक्षण आहे. खरे म्हणजे आपण जगतो खरे पण नेमके काय जगतो याचे भान येते तेंव्हा खूप उशिरही झालेला असतो. खरे तर जगत असतांनाच आपली जगण्याशीची नाळ कधी तुटून गेली हेही आपल्या लक्षात येत नाही. श्वास घेणे आणि सोदने...जीवघेणी धाव घेत राहणे आणि ही धावही का हे नुमजताच धावत राहणे...कारण सारेच धावतांना दिसतात म्हणून! आमचे जीवन कधी हरपून जाते हे लक्षातच येत नाही.

आपण थांबत का नाही? आपल्याला हे अचाट पण बेजान धावण्याचे वेड कोणी दिले? आपल्याच संस्कृतीने आणि समाजाने ना? समाजाने निर्माण केलेल्या भ्रामक-अर्धभ्रामक स्वप्नांत आपल्याला गुरफटवतच धावायला भाग पाडलेय ना?

कोठे गेले मग माणसाचे मूक्त स्वातंत्र्य. गांधीजी म्हणत मला फक्त देशाचे नव्हे तर मानवाचे स्वातंत्र्य पाहिजे आहे. होय...मानवाचे स्वातंत्र्य सर्वोपरी आहे. तेच आपण जर गमावले असेल तर आपले जगणे हे खरे जगणे आहे काय?

रुढ विचारधारांना, रुढ इतिहासांना, रुढ जगण्यांना आणि रुढ धर्मकल्पनांना आव्हान दिलेले चालत नाही म्हणून जर कोणी मूक राहत असतील तर ते स्वातंत्र्य कसले?

माणसाचे स्वातंत्र्य समाजच कुंठित करत असतो. खरे तर समाज हा नेहमीच स्वातंत्र्याचा पहिला शत्रु असतो...मग राजकीय स्वातंत्र्य भलेही असो अथवा नसो. समाजच आपल्या बोकांडी कोणाला बसवायचे हे ठरवतो. समाजातील तथाकथित आंतरप्रवाह हे शेवटी वर्चस्वतावादासाठीच वाहत असतात. सर्व प्रवाहांचे एकमेव उद्दिष्ट असते...माणसाला कसे गुलाम करता येईल.

आणि स्वत:लाही एखाद्या बेडीत कसे अडकविता येईल.

माणसांनीच माणसांना आणि स्वत:लाही गुलाम करण्याचा इतिहास हाच मानवाचा इतिहास आहे.

कोणाला दुखवायचे नाही कारण दुखावले तर तुमची सामाजिक प्रतिष्ठा...मान्यता धोक्यात येणार असते म्हणून तुम्ही ठरवून टाकता कोणाला...किमान स्व-समाजाला दुखवायचे नाही. इतर कोणा समाजाला दुखावले तर स्व-समाजाला जर समाधानच मिळणार असेल तर निर्धास्त दुखवावे कारण काही विपरित झाले तर स्व-समाज तुमच्या पाठीशी आहे. अशा सुरक्षित परिस्थितीत जर आम्ही आमचे स्वातंत्र्य वापरत असू तर ते स्वातंत्र्य कसे?

आमचे हृदयस्थ बोल...ते चुकीचे कि बरोबर...जोवर स्व-प्रामाणिक आहेत तोवर स्वतंत्र आहेत. पण आम्ही बाह्य परिप्रेक्षाशी जुळवून घेणारे आमचेच बोल बदलत असू तर आम्ही मूक्त कसे?

पण आपण पाहतो कि माणुस आजही कळपात राहतो. त्याच्या स्वातंत्र्याचे अपहरण त्याच्या कळप-भावनेने आधीच केलेले असते. "स्वयमेव मृगेंद्रता" आमच्या वाट्यास कधी येतच नाही. कारण ती हिम्मत नसते.

ती हिम्मत नसते कारण कळपभावनेने तिचे आधीच अपहरण केलेले असते. स्व-कळपाला व कळपभावनेला साजेशीच भाषा-विचार-संस्कृती मांडण्याचे बंधन आपसूक आलेले असते. तसे करण्यातच सुरक्षितता आहे असे वाटते.

पण ही सुरक्षिततता खरी असते काय? मुळात यच्चयावत विश्वातील एकही जीव केवळ कळपात आहे, सामाजिक बंधनांचे पुरेपूर पालन करतो म्हणुन सुरक्षित आहे काय?

जरा विचार केला कि लक्षात येईल कि मुळात सुरक्षित नसणे हाच जीवनाचा-जगण्याचा पहिला नियम आहे.

मग तुम्ही समाजाच्या कथित नीतिबंधनात असा अथवा नसा. कळपात असा अथवा नसा.

मग कळपभावनेतून येणारी सुरक्षितता आम्हाला का प्रेय वाटते?

आम्हाला आम्हीच ओढवून घेतलेले पारतंत्र्य का हवेसे वाटते?

आणि जर आम्हाला एवढेच पारतंत्र प्रिय आहे तर आम्ही नेमक्या कोणत्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असतो?

एका पाश्चात्य नीतिविदाने (बहुदा नित्शे) म्हटले आहे कि मनुष्य जन्माला येतो तोच क्षण त्याचा स्वातंत्र्याचा असतो. पुढे तो परिस्थितीचा आपसूक गुलाम होतो.

काही गुलाम्या जगण्यासाठी आवश्यक मानल्या तर जगणे हे गुलामीच्या कुबड्यांवर चालते असे म्हणावे लागेल. नवे तत्वविद कदाचित म्हणतील कि छे...ती मुळात गुलामी नसून माणसाच्या जगण्यासाठीची अपरिहार्य परिस्थिती आहे. बरे...आपण तेही मान्य करू...पण मग आम्हीच मुलांचे...म्हणजे पुढील पिढ्यांचे मानसिक संयोजन (कंडिशनिंग) का करतो? स्वत:ची, समाजाची, राष्ट्राची आणि धर्माचीही स्वप्ने इतरांवर लादत असता त्यांच्यावर का लादत जातो?

याचे उत्तर असे आहे कि आम्ही स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी पुढची पिढीही जवळपास आमच्यासारखीच करण्याच्या नादात त्यांना मानसिक गुलाम करत जातो. आम्हाला हवे तसेच नवे शोध आम्ही स्विकारतो. आम्हाला हवेत तसेच नवे म्हणवले जानारे पण जुनेच विचार आम्ही नव्या भाषेत स्विकारत जातो.

पण आम्ही खरेच नवे स्विकारतो का?

आमची नव्याची व्याख्या तरी काय असते शेवटी?

आम्ही बव्हंशी आमची नव्याची व्याख्या जुन्या गतकाळातील लोकांशी किंवा मतांशी जुळवत असतो. आम्हाला सर्वस्वी नवे नकोच असते. आम्हाला नव्याची भिती वाटते. जगातील कोणत्याही धर्माचे लोक असोत...कोणत्याही राजकीय अथवा आर्थिक व्यवस्थेत राहनारे लोक असोत...माणसाची धाव ही भविष्याकडे कमी...गतकाळाकडे अधिक असते. समजा एखाद्या इमारतीला आग लागली तर लोक नकळत खाली पळण्याऐवजी वरच्या मजल्यांकडे धावतात. तेथे प्रात्यक्षिक सुरक्षा नसते...मानसिक सुरक्षा असते. माणुस गतकालाला नेहमीच एखाद्या गुहेसारखा लपण्याचा मार्ग समजतो.

माणुस गतकाळाचाही गुलाम होतो तो असा.

म्हणून गतकालच नासवणारे नतद्रष्ट या समाजात असतातच. किंबहुना इतिहास नासवण्याचे कार्य निष्ठेने वर्तमानात पार पाडले
जाते ते यामुळेच. लपण्याची गुहाही कुंठित केली जाते ती अशी.

मग माणुस ना वर्तमान, ना भुतकाळ आणि मग स्वभावत:च धुक्याने ग्रासले गेलेले भवितव्य अशा कोंडीत जो सापडतो तो कधी त्यातून बाहेरच येत नाही.

हे जगणे आहे कि जगण्याचे मेलेलेपण येशुप्रमाने स्वत:च्या खांद्यावर वाहून नेणे आहे?

आम्हा जगणा-यांना यावर विचार केलाच पाहिजे...

आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग आम्ही शोधलाच पाहिजे...सर्व बेड्या तोडून!

1 comment:

  1. अरे रे कुणीच प्रतिसाद देत नाही

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...