Tuesday, November 3, 2015

क्षत्रिय अहंकाराचे थोतांड!

भारतात वैदिक पगडा उत्तरकाळात बसण्याचे एक कारण म्हणजे क्षत्रियत्वाचा अतोनात सोस. क्षत्रिय म्हणजे वीर, योद्धा, राज्य करायला लायक असा समाज हा समज ब-याच समाजांत/जातींत आजही एवढा दृढमूल आहे कि जो तो उटतो आणि आपले मुळ क्षत्रियत्वाशी भिडवायचा प्रयत्न करतो अथवा आपण क्षत्रिय आहोतच असे समजतो. अर्थात याला कोणा शंकराचार्याची मान्यता नसते हे वेगळे. वेदोक्त प्रकरणात टिळक म्हणले होते, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर) मला वाटते हे विधान स्वयंस्पष्ट आहे. तरीही आपण क्षत्रिय म्हणजे नेमके काय व वैदिक धर्मात त्यांचे स्थान काय होते व कसे नष्टही झाले हे पहायला हवे.

ज्या पुरुषसुक्तात वर्णव्यवस्था प्रथमच अवतरली असे मानले जाते त्यात मुळात "क्षत्रिय" हा उल्लेखच नाही तर "राजन्य" हा आहे. म्हणजे ऋग्वेदाच्या दृष्टीने क्षत्रीय नव्हे तर राजन्य हा ब्राह्मणाखालोखालचा वर्ग आहे. राजन्य आणि क्षत्रिय एकच नव्हे. वैदिक टोळ्यांचा जो प्रमूख असे त्यालाच राजन्य ही संज्ञ लागू होती. अवेस्त्यातही राजन हा शब्द अनेकदा अवतरतो. (पह झामयाद यष्ट, ८८ ते ९०) येथेही राजन या शब्दाचा अर्थ राज्यकर्ता/विजेता असा आहे. लढवैय्या लोकांना (जातीला नव्हे) रथेष्ट्रा नांवाने ते संबोधत. ऋग्वेदात क्षत्र हा शब्द छत्र या अर्थाने येत असला तरी तो समाज अथवा वर्ण या अर्थाने येत नाही. पुरुषसुक्तातील राजन्य (क्षत्रीय नव्हे) हा शब्द राजाचे निकटचे नातेवाईक या अर्थाने आला असावा असे अनेक विद्वान मानतात तर जायस्वाल आणि राम शरण शर्मा म्हणतात कि गणतंत्रातील प्रमुखालाच राजन्य ही संज्ञा होती, त्यामुले पुरुषसुक्तातील राजन्य म्हणजे गणतंत्रीय राजांचा समूह असावा. अर्थात गणतंत्रातील राजनपद हे वंशपरंपरागत नसे.

राजन्य हा शब्द पुरुषसुक्तात स्पष्टपणे नमूद असता त्याची जागा क्षत्रिय या शब्दाने कशी आणि कधी घेतली? शिवाय या सुक्तात "वर्ण" हा शब्द येत नाही हेही लक्षणीय आहे.

क्षत्रीय शब्दाचा मूळ अर्थ युद्धात नेतृत्व करणारा, कुळांच्या/टोळीच्या जमीनींवर मालकीहक्क गाजवणारा असा होता. तर राजन्य म्हणजे सर्वांचा प्रमुख. क्षत्रीयाला वर्णव्यवस्थेत मुळात स्थानच नाहे हे ऋग्वेदावरुन स्पष्ट दिसते. ब्राह्मणोSस्य मुखमासीद् बाहू राजन्य: कृत: | ऊरू तदस्य यद्वैश्य: पद्भ्या शूद्रोSअजायत,असे ऋग्वेद स्पष्टपणे म्हणतो. यात क्षत्रियांचा उल्लेख नाही. ब्राह्मण, वैश्य आणि शुद्रांबाबत आपण नंतर विवेचन करू. पण प्रतिपाद्य विषय असा आहे कि नंतरच्या काळात कधीतरी राजन्याची जागा क्षत्रियाने घेतली. मग क्षत्रीय नेमके कोण?

वर सांगितल्याप्रमाणे क्षत्रीय याचा मुलार्थ शेत- जमीनींचा स्वामी व युद्धात नेतृत्व करणारा. क्षत्रिय हा शब्द खतिय या मुळ प्राकृत शब्दापासून साधला गेला असून तो शेतीशीच निगडित आहे. शिवाय पंचविश ब्राह्मणानुसार राजन्य प्रथम तर ब्राह्मण दुस-या स्थानावर आहे. येथेही क्षत्रियाचा उल्लेख नाही. परंतू असे स्पष्ट दिसते कि वैदिक धर्म भारतात आल्यानंतर वैदिकांना राजन्य उडवत क्षत्रियांना (म्हणजे जमीनदार/राज्यकर्ते) यांना ते स्थान द्यावे लागले कारण तत्कालीन कृषीप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेमुळे राजे-सरंजामदारही शेतमालकच असत. टोळीजीवनातील जुने "राजन्य" प्रकरण त्यांना त्यागावे लागले. घुर्ये म्हणतात कि वैदिक धर्म भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक स्थानिक जमातींतील प्रभावशाली लोकांना आणि स्थानिक धर्माच्या पुरोहितांना क्षत्रीय व ब्राह्मण संज्ञा दिल्या. गौतम बुद्ध व महावीर हे व्रात्य (अवैदिक) क्षत्रीय होते असे राजवाडे व घुर्ये म्हणतात. याबाबत सविस्तर नंतर. पण येथे सांगायचा मुद्दा हा कि क्षत्रीय हा मुळात ऋग्वैदिक/वैदिक वर्ण नव्हे. तो त्यांनी त्यांच्या धर्माच्या रक्षणाच्या निमित्त केला पण नंतर तो रद्दही करून टाकला.

हे कसे झाले हे आपण पाहुयात. यामागे वैदिकांच्या मुळच्या स्थलांतराची कारणे आहेत. ते भारतात आले तेंव्हा येथील स्थिती वेगळी होती. धर्म वेगळा, राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था वेगळी. कृषीप्रधान अर्थव्यवस्था. वैदिकांशी मैत्र करणारे पंजाब-कुरु-पांचालमधील काही राजे होते तसेच अन्यत्र सर्वत्र विरोध करणारेही होते. त्यासाठी त्यांना त्यांच्याच धर्मातून रक्षक घटकाची गरज होती. ती त्यांनी क्षत्रीय नांवाखाली भागवली. पुर्वी जन्माधारित नसलेला ब्राह्मण जसा आता जन्माधारित झाला तसाच हाही वर्ग जन्माधारित झाला. हा वर्ग आधी अल्पच होता. परंतू हा वैदिकांतुनच निर्माण झालेला पण योद्धा वर्ग असल्याने अन्य योद्धा गटांशी, म्हणजेच खतियांशी, मिसळतही गेला. वैदिक धर्माशी त्यांची नाळ तुटत गेली. किंबहुना क्षत्रीय हा वर्णच उरला नाही कारण तो वैदिकाश्रयीही उरला नाही. नंद घराण्याने कुरु-पांचालातील वैदिक सत्ता नष्ट केल्यानंतर नंदांनंतर क्षत्रीय उरले नाहीत असे खुद्ध वैदिकांनाच म्हणावे लागले. परशुरामाच्याही क्षत्रीय संहाराच्या भाकडकथा निर्माण करत तसेच कलीयुगात क्षत्रीय नाहीत अशा वदंता निर्माण करत वैदिक धर्मात क्षत्रीय का उरले नाहीत याच्या स्पष्टीकरण कथा द्याव्या लागल्या. राजन्य हा मुळचा पुरुषसुक्तीय वर्ण तर कधीच नष्ट झालेला. पण राजन्य म्हणजे क्षत्रीय व या वर्णाला वेदमान्यता आहे असा भ्रम मात्र निर्माण झाला तो झालाच!

पुराणांनी क्षत्रीय संज्ञेचे माहात्म्य वाढवायला खूप मदत केली असे म्हणावे लागेल. क्षत्रीय व ब्राह्मण हा वर्चस्वाचा संघर्ष होता असे मानले जाते. परंपरेने वैदिक परंपरा ब्राह्मणांची तर औपनिषक परंपरा क्षत्रियांची असेही मानले जाते. यात गोंधळ असा आहे कि हे क्षत्रीय (खतिय) वैदिक होते काय? उत्तर आहे, नाही. औपनिषदिक परंपरा नंतर दुषित केली गेली असली तरी स्पष्ट दिसते कि ती वैदिक तत्वज्ञानाच्या अत्यंत विरोधात आहे. महावीर-बौद्धाला तर "व्रात्य क्षत्रीय" म्हणण्यात येते. व्रात्य हे वैदिक नव्हेत. व्रात्यांना वैदिक धर्मात घेण्याची सोय होती व त्यासाठी व्रात्यस्तोम नांवाचा विधी होता. समान भाषांत अनेक संज्ञा समान वाटतात पण अर्थ वेगळे असतात. उदा. ब्रह्म या शब्दाचा ऋग्वैदिक अर्थ मंत्र असा होतो तर उपनिषदातील अर्थ सृष्टीचे मुलकारण असा होतो.

वेद हा शब्दही तसाच आहे. वेद म्हणजे ज्ञान अथवा दिसलेले. जेथे रिक, साम, अथर्व वा यजुस हे जोडशब्द नाहीत तेथे वेद म्हणजे हेच चार वेद असा अर्थ घेण्याचे मुळात कारण नाही. परंतू नंतर वेद शब्दाचा अर्थ म्हणजे हेच चार वेद (अथवा अन्य उपवेद) असा घेतला गेल्याने वेद शब्दाचा अर्थ मर्यादित तर झालाच पण वेदस्तोमही त्यामुळेच प्रचंड वाढले. हे स्तोम तर वाढलेच पण पुराणकथा व रामायण-महाभारत काव्यांतील प्रचंड घालघुसडीमुळे क्षत्रीय स्तोमही वाढले...पण वैदिक धर्मानुसार क्षत्रीय उरलेलेच नव्हते!

ही विसंगती फारशी लक्षात घेतली गेली नाही. मी वर दिलेले टिळकांचे अवतरण स्वयंस्पष्ट आहे. टिळकांना त्यांचा धर्म समजत नव्हता असे कोणी म्हणू शकत नाही. वैदिक धर्म संकुचित होत जात विराट हिंदू समाजच त्यांनी परभारेच आयता रक्षणकर्ता बनवल्यानंतर त्यांना क्षत्रीय वर्णाची गरजच नव्हती. हिंदूंना वैदिक कर्मकांडांची गरज नसल्याने त्यांनीही वैदिकांशी सख्य ठेवले असले तरी त्या धर्माचा भाग होण्याचे नाकारले.

सनपुर्व दहावे शतक ते सनपुर्व सहावे शतक या काळात कुरु-पांचाल व मगध या प्रांतात वैदिक धर्माला चांगला जम बसवता आला हे खरे आहे. शिशुनाग वंशानंतर मात्र वैदिक धर्माला मगधात हादरे बसू लागले. गौतम बुद्ध आणि महावीर मगधातुनच वैदिक धर्माला विरोध करायला पुढे आले कारण हा धर्म त्याच भागात प्रबळ होता. अन्यत्र त्याचे अस्तित्वही नव्हते त्यामुळे त्याला विरोधाचे कारणही नव्हते. बुद्धोत्तर काळ ते गुप्तकाळ या प्रदिर्घ काळात हा धर्म एक सामान्य पंथ बनून उरला होता व आपला प्रभाव अन्यत्र पसरवण्याच्या कशाबशा प्रयत्नांत होता. हा प्रवास कसा झाला तेही आपण क्रमाने पाहुच. पण याच काळात क्षत्रियत्वाला डच्चू मिळाला तसाच वैश्यांनाही (ते मुळात वैदिक धर्मात किती होते?)

असे असुनही क्षत्रियत्वाचे गारूड वेदांप्रमाणेच जनसामान्यावर बसत गेले हेही तेवढेच खरे आहे. वेदांत जसे वर्णीय तथ्य नाही, वर्णांत जसे तथ्य नाही तसेच क्षत्रीयत्वाच्या मोहातही तथ्य नाही हे आजही लोकांच्या लक्षात आलेले नाही. वेदमान्यतेच्या नांवाखाली वेदांतच नसलेल्या असंक्भ्य बाबी समाज आंधळेपणाने स्विकारत गेला. हिंदुंना वेद वाचंणे अथवा ऐकने यावर बंधन का होते हे समजून घ्यायला हवे. पहिले कारण म्हणजे ते वैदिक धर्मियच नसल्याने त्यांना तो अधिकार नव्हता. आणि समजा वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म मानले व त्यांना वेदाभ्यासाचा अधिकार असतात तर वेदांज्ञांतील थोतांड हिंदुंनी कधीच ओळखले असते व तेंव्हाच वेद नाकारले असते!

क्षत्रियत्वाचे थोतांडही असेच आहे. मुळात हा वर्ण नव्हता व नाही ही पहिली बाब. हा वर्ण कोणी नष्ट केला ही भ्रमकथा आहे कारण तो मुळात अस्तित्वातच नव्हता ही दुसरी बाब. क्षत्रियत्व हे खेतियत्वाशी, म्हणजे शेतीशी व अर्धवेळ युद्धव्यावसायिकांशी संबंधीत होते व आहे. भारतीय कृषीव्यवस्थेच्या अत्यंत यशस्वी पायाभरणीनंतर बहुसंख्य राज्ये व गणराज्ये ही ज्याची शेती मोठी त्याच्याशी निगडित असत. याचा वैदिक वर्नव्यवस्थेशी काडीमात्रही संबंध नाही. हा वर्ण नाही किंवा जातही नाही. त्यामुळे क्षत्रियत्वात आत्मगौरव शोधणारे स्वत:ची वंचना करून घेतात असेच म्हणने क्रमप्राप्त आहे!

(क्रमश:)




16 comments:

  1. Prakash pawar says Maratha vanjari dhangar Mali are all in the race to get 'kshatriyatva' to uplift their social status. Is this true?

    ReplyDelete
  2. प्रस्तुत लेखात ‘ क्षत्रिय ‘ संकल्पनेचा आढावा घेतलाय. यात प्रथम वैदिक ‘ क्षत्रिय ‘ संकल्पनेचा विचार करताना प्रक्षिप्त पुरुषसूक्तातील क्षत्रिय ऐवजी ‘ राजन्य ‘ शब्दाचा विचार केला आहे. या स्थळी वेदात पुरुषसुक्त कधी घुसवण्यात आले व तत्पूर्वी वर्णांची नावनिशी विभागणी कशी होती याची स्पष्टता लेखक करत नाही. तसेच अवेस्त्यातील ‘ राजन ‘ शब्दाची मध्येच योजना केल्याने अवेस्त्यातही हा शब्द आधीपासून होता कि नंतर आला व आधीपासून असल्यास पुरुषसुक्त रचेत्यांच्या लक्षात कसा राहिला याचा खुलासा होत नाही.

    अर्थात लेखक याची स्पष्टता, मुखोद्गत वा स्मरणाने, अशी करेल पण त्याने पूर्णतः शंकानिरसन होणे शक्य नाही.

    शिवाय राजन्यचा अर्थही येथे शोधणे भाग आहे. जयस्वाल, शर्मांच्या मताप्रमाणे गणतंत्रातील प्रमुखाला राजन्य संज्ञा होती. परंतु त्याकरता गणतंत्रे नेमक्या कोणत्या काळी अस्तित्वात आली व वैदिकांचे याच काळात येथे स्थलांतर झाले का याचाही विचार होणे आवश्यक आहे.

    क्षत्रिय – खतीय संकल्पना अमान्य करण्यात काहीच हरकत दिसत नाही. याबाबतीत घुर्ये, राजवाडे यांची मते पुरेशी आहेत. शिवाय मध्ययुगीन कालखंडातही अनेक लहान – मोठे सत्ताधीश जमीनदार होते. खुद्द स्वराज्यसंस्थापकाचे पूर्वजही जमीनदार असल्याचे विसरता येत नाही.

    वैदिकांतून क्षत्रियत्वाची हाकलपट्टी लक्षात येते. परंतु ती संकल्पना अवैदिकांत का न रुजावी हे समजत नाही. कारण परधर्मियांच्या संकल्पना स्वीकारण्यात येथील हिंदू नेहमीच उत्सुक राहिले. मग क्षत्रियत्वात काय अडचण उद्भवावी ?

    वैश्यांच्या विषयी प्रस्तुत लेखात खुलासा नाही. कदाचित पुढील भागात तो करण्यात येईल हि अपेक्षा आहे. बाकी बौद्ध – जैनमत विशिष्ट प्रांतातच का जन्मावे याची संक्षिप्त कारणमीमांसा अजून तपशीलवार हवी.

    ReplyDelete
  3. You refuse to accept khshatriyatva and even then write something as "Dhangarancha gauravshali itihas". Is this not a contradiction of your own ideology. Or are you a oppurtinist trying to become leader of dhangar and though it is hardly possible that of all obc castes?

    ReplyDelete
  4. आप्पा- संजय सर आपण जे लिहित आहात ते अगदी सर्वच्या सर्व समजत आहे त्याबद्दल अभिनंदन
    बाप्पा- आम्हाला येत असलेल्या शंका अशा ,वैदिक जर बाहेरून आले आणि त्यांनी कोणालातरी जिंकले असेल तर ते कोण ?आणि वैदिक हे कृषिप्रधान होते का नव्हते ? ते भटके असतील गुरे हिंडवत जीवन जगत असतील तर त्यांच्याकडे मूळ वासियांना जिंकण्या इतके सैन्य कसे काय ?
    आप्पा- म्हणजेच मूळ वासियांकडे सैन्य होते का हापण प्रश्न निर्माण होतो.
    बाप्पा- आपल्या मताप्रमाणे हे सर्व इसपू १५०० च्या आसपास चालू होते ?म्हणजे इसपू ५०० हा बौद्ध महावीर काळ,तिकडे पैगंबर काळ इस ५७० ते इ स ६३२ ! म्हणजे जैनांच्या नंतर १००० वर्षे - म्हणजेच या मधल्या हजार वर्षात (इसपू १५०० ते इसपू ५०० ) महाभारत रामायण आणि गीता सर्व घडले का ?महम्मद कासीम कधी आला ? इ स ६७५ ला त्याने तथाकथित वैदिकांचा भूभाग जिंकला पैगम्बरानन्तर लगेचच हा महम्मद बिन कासीम भारतात आला का ? त्याला येणे भाग पडले - कारण त्याला सिंध मधले रानटी लोक त्रास देत असत , व्यापाराचा मार्ग अडवत असत , तसेच त्याला जाट (हिंदू) लोकांचे सहाय्य कसे मिळाले तेही बघण्यासारखे आहे .
    आप्पा- सांगायचा मुद्दा , व्यापारात अडचण निर्माण होत होत नेहमी आक्रमणे होत असावीत , त्यापूर्वी वैदिकांनी भारतात का आक्रमणे केली असावीत ? ते काही उलगडत नाही .त्याचे कारण व्यापार असू शकते का ? म्हणजेच मध्य आशियातल्या व्यापार मार्गाचा हा इतिहास आहे का ?
    बाप्पा- अरे आप्पा , तू बावळत आहेस , इसपू १५०० कुठे , आणि इसपू ५०० कुठे आणि इस ६५० कुठे ? एकमेकात काहीही संबंध नाही रे माझ्या लेकरा - असे लिहू नये .
    आप्पा- अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच कि आशियातील व्यापारी हित दुखावले गेले की आक्रमणे झाली आहेत , हे आपणास इ स६०० नंतर दिसते , पण वैदिकांचे आक्रमण का झाले ?
    उगाचच ? त्यापूर्वी असे उगाचच आक्रमण सिकांदाराने इसपू ३५० ला केले होते !
    बाप्पा- तिकडे हम्मुराबी असतानाच इकडे वैदिक भारतात येत होते का ?शरत्रुश्तचा खून अफगाणिस्तानात झाला असे मानले जाते का ?

    ReplyDelete
  5. तुम्हाला अस म्हणायच आहे का क्षत्रिय हे वैदिक धर्माचे भाग नाहित आणि त्या साठी तुम्ही जे पुरुष सुक्ताचे दाखले देत म्हणत आहात की त्यात क्षत्रिय शब्दच नाहि तर मग त्याच पुरुषसुक्तात वैश्य आणि शुद्रांचा उल्लेख आहे त्याचा संबंध आपण कोणाशी जोडणार वैदिकांशी की अवैदिकांशी ?

    क्षत्रिय वैदिकानपासुन वेगळे अस म्हणायला गेलो तर त्याना वैदिकांचे अधिकार कसे? क्षत्रिय आणि तथाकथित शुद्र एकच होते काय ? मग जे आधिकार क्षत्रियाना वैदिकानी दिले तेच अधिकार तथाकथित शुद्राना का नाकारण्यात आले ? असे आणि अजुन बरेच प्रश्न तुमच्या या लेखामुळे निर्माण होतात त्याची सोडवॅणुक कशी करायची ?


    जेव्हा पुरुषसुक्त रचण्यात आले तेव्हा त्यात क्षत्रियांचा संदर्भ नव्हता हे मानल तर शुद्र आणि वैश्यांचा संबंध राहतोच जरी आपण अस समजलो कि जे वैदिक धर्माच्या बाहेरचे होते त्याना त्यानी द्वेषबुद्धीतुन पायाच (शुद्र) स्थान दिल मग त्याच शुद्रामधील क्षत्रियाना पुंहा आपल्या सरक्षणा साठी घेउन व अधिकार देउन पुंहा ते अधिकार त्यांच्याकडुन काढुन घेतले हे कस शक्य आहे ?

    मला अस वाटत जे आधीच्या इतिहासकारानी जेमांडलय की वैदिक क्षत्रिय आणि अवैदिक खतिय हे वेगवेगळे आहेत

    रुग्वेदाकडे आपण दृष्टी फेकली तर ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य यांच्याबद्दल एकदा नव्हे तर अनेकदा उल्लेख रुग्वेदात झाला आहे . ब्राह्मण हा निराळा वर्ण आहे अश्या अर्थाने 15 वेळा .क्षत्रिय निराळा वर्ण आहे या अर्थाने 9 वेळा वापरलेला आपणास आढळतो त्याच बरोबर इतर वेदान्मध्ये सुद्धा क्षत्रिय वर्ण आढळतो

    धर्मानुसार क्षत्रियच राजा होणार असेल (पुरुषसुक्ताचा धर्म ) तर मग त्याला राजन्य म्हटले काय किंवा क्षत्रिय म्हटले काय फरक कुठे पडतो ?



    ReplyDelete
    Replies
    1. ऋग्वेदाचा भुगोल पहा. आर्यावर्त हे ते भारतात आले तेंव्हा पहिले स्थान होते. तेथेच वेदांची पुनर्रचना करण्यात आली. तेथुन धर्मप्रसाराने तो धर्म उत्तरेत पसरला. दक्षीणेत सर्वात उशीरा गेला. वैदिक येण्याअधी येथे धर्मही होता आणि समाजव्यवस्थाही. भाषा म्हणाल तर प्राकृत भाषांचे नेट हे गांधार प्रांतापर्यंत होतेच व म्मुळची वैदिक भाषाही काही प्रमाणात समकक्षच होती. मराठे व बंगालेत असावा तसा फरक. त्यामुळे येथील समाजात व वैदिकांतही अनेक शब्द समान असणारच. पण धर्म वेगळे, व्यवस्था वेगळ्या. धर्मप्रचार करतांना त्यांना येथील समाजगटांना स्थान देणे व जे धर्मात नाहीत त्यांनही काही संज्ञा देणे स्वाभाविक आहे. वैदिक वर्णातील शूद्र हे लोक वेगळे होते. हे नांव इतर सर्व वैदिक धर्म न पाळणा-या लोकांना मिळाले ते अत्यंत उत्तरकाळात. इतर समाजाची व्यवस्था काय होती हे वैदिक साहित्यातुनच काही प्रमाणात कळते. त्याबद्दल सविस्तर लिहावे लागेलच. बरे, वैदिक आक्रमण किंवा सर्व आर्यांचे स्थलांतर हे इतिहास व उत्खननांतुन सिद्धही होत नाही. त्यामुळे हा धर्म शांततेच्याच मार्गाने येथे काही प्रमणात पसरला हे दिसते. असे असले तरी क्षत्रिय व वैश्य वर्ण कस नष्ट झाला याचे उत्तर मिळत नाही. परशुराम/नंद या कथा बनावट आहेत हे उघड आहे. असे असले तरी क्षत्रियत्वाचे नितांत आकर्षण अनेक लोकांना आहे हेही सत्य आहे. हा तिढ शांतपणे, चर्चा करत पुढे जात उलगडावा लागेल.

      आणि मुळात ऋग्वेदात वर्ण या अर्थाने हे शब्द आलेले नाहीत. राजन व क्षत्रीय वर्ग एकाच वेळेस अस्तित्वात असल्याचे शतपथ ब्राह्मणात आहे. त्यामुळे दोन्ही एक असे मानण्याची चूक करू नये. पुढे राजन्याची जागा क्षत्र्तियांनी घेतली. प्रश्न विचारत रहा. पण चुकीची माहिती देऊ नका. तपासुन द्या. वैश्य शब्दही ऋग्वेदात येत नसून "विश" (खेड्यंत राहणारे) या अर्थाने हा शब्द आला आहे,

      Delete
    2. णि मुळात ऋग्वेदात वर्ण या अर्थाने हे शब्द आलेले नाहीत. राजन व क्षत्रीय वर्ग एकाच वेळेस अस्तित्वात असल्याचे शतपथ ब्राह्मणात आहे. त्यामुळे दोन्ही एक असे मानण्याची चूक करू नये. पुढे राजन्याची जागा क्षत्र्तियांनी घेतली. प्रश्न विचारत रहा. पण चुकीची माहिती देऊ नका>>>>>>मुळात मी कोणी विद्वान नाहि जी काहि माहिती असते ती इतर विद्वानांची पुस्तके ग्रंथ वाचुन विचार करुन मत मांडलेल आहे रुग्वेदात क्षत्रिय किंवा ब्राहमण हे वर्ण या उद्देशातुन काहि ठीकाणी आली आहेत हि माहिती शुद्र पुर्वी कोण होते ? या प्रसिद्ध ग्रंथातही आलेली आहेत तुम्हाला दुसरे प्रसिद्ध विद्वानांची संदर्भ पाहिजे असतील तर ती हि मिळु शकतात त्यामुळे मी चुकीची माहिती देत आहे असा आपला माझ्यावरचा आरोप पुर्णता चुकीचा आहे

      Delete
  6. "Who Were the Shudra's" will be analysed separately, but Babaasaheb do not mention that Rig Veda talks of varna's.

    ReplyDelete
  7. जरुर शुद्र पुर्वी कोण होते ? या ग्रंथाची चिकित्सा व्हायलाच हवी मी हि त्या चर्चेत आपला खारीचा वाटा देइन त्यावर एखादी नविन पोस्ट जरुर टाका पण मला तरी वाटतय तो ग्रंथ तुम्ही खुप वर्षांपुर्वी वाचला असावा असे वाटते आंबेडकरांच्या मते रुग्वेद काळात ही वर्णव्यवस्था होती फक्त वरणाची संख्या तीन होती हे स्पष्ट केलेल आहे आपल्या 8 व्या प्रकरणात असो त्यांच्या निष्कर्षांवर आपण प्रश्नचिंह उभे करु शकु ( चिकित्सा ) पण त्यात दिलेली जनरल माहिती कशी चुकीची असु शकेल कोणताही ग्रंथकार अशी जनरल माहिती खोटी देउच शकत नाही .

    ReplyDelete
  8. त्यावेळच्या उपलब्ध संदिग्ध /चुकीच्या माहिती/पुराव्यावर आधारित मत निर्माण होऊ शकते. यात ग्रंथकार किंवा संबधित खोटी माहिती म्हणून प्रसारित किंवा ठरविण्याचा प्रश्नच उदभवत नाही. याबाबत इतिहासाची अन्योन्य साधने यासाठी अतिशय परखड असणाऱ्या राजवाडयांसारख्यांनाही हा प्रश्न भेडसावत होता. पुनर्चिकित्सा हा सर्वांची मते विचारात घेऊनच व्हावी. केवळ एकाच पुस्तकावर आधारित मत कायम नसावे त्यात वेळोवेळीचे आवर्तन त्या त्या विषयात नव्याने मांडणीवर होत रहावे, असे मला वाटते. धन्यवाद.

    ReplyDelete
  9. आप्पा- संजय सर आम्हाला अफगाणिस्थानातून वैदिक भारतात आले त्यावेळी नेमका कोणता धर्म इथे नांदत होता ते आपणा कडून माहित करून घेण्यास आवडेल
    बाप्पा- कृपया असे सांगू नका की यावर माझे अमुक साली लिहिलेले अमुक पुस्तक वाचा , किंमत फक्त १०० रुपये , कारण एका प्रश्नासाठी ते जरा जास्त होतात नाही का ?
    आप्पा- तू म्हणजे एक नम्बरचा चिक्कू आहेस !त्यांच्या पक्षाला देणग्या घेत नाहीत ते म्हणून वाचलास !नाहीतर स्वर्ण भारताला दक्षिणा दिल्यावरच तुला उत्तर मिळेल अशी त्यांनी पूर्व अट घातली असती तर ?
    बाप्पा- अरे काय हे पूर्व उत्तर दक्षिण चाललय तुझे ?तुला जस वाटते तसेच मलाही वाटते की वैदिक भारतात येण्यापूर्वी इथे कोण होते लोक ? ते काय करायचे , दिवाळीच्या आधी समजले तर किती बरे होईल !
    आप्पा- अरे इथे बळी होता , त्याला वामनाने घातले खड्यात !असली उत्तरे ऐकायची आहेत का भर दिवाळीत ?
    बाप्पा- सरांनी अवेस्ता आणि ऋग्वेद यांचे प्रकरण मस्त समजावून सांगितले,अगदी पूर्ण समजले !
    आप्पा- पूर्वी महाराष्ट्रातील वसाहती हे इतिहासाचार्य राजवाडे यांचे स्फुट वाचले होते - अतिशय सुंदर - त्यांचा सिद्धांत तेंव्हा पटला तो कायामाचाच . नवा येणारा समाज संघर्ष जिंकला की हरलेल्याचे सर्व बळकावतो आणि हरलेल्याला दूर ढकलतो , तसेच महाराष्ट्रात नाग ठाकर इतर लोकांच्यात घडले आणि ते डोंगर माथ्यावर ढकलले गेले , त्यांचा जगण्याचा हक्क कोणी हिरावून घेतला नाही हे इथले वैशिष्ट्य !
    बाप्पा- अगदी तसेच वैदिकांच्या येण्याने झाले असेल असे वाटते . पण ते मुळंचे लोक कोण होते ?त्यांची भाषा प्राकृत होती असे सर म्हणतात, पण त्यांचा धर्म कोणता होता, शैव होता का ?

    ReplyDelete
    Replies
    1. हे मधेच क्षत्रिय प्रकरण निघाल्याने त्याकडे जरा दुर्लक्ष झाले. पहिली बाब म्हनजे आर्य/वैदिक आक्रमण झलेले नाहे त्यामुळे जित/पराजित हा विषय नाही. वैदिक लोक पारशी धर्माच्या अतिक्रमणामुळे धर्म वाचवायला भारतात आले. पुढे मुस्लिम आक्रमणामुळे पारशांनाही भारतात यावे लागले. वैदिक भारतात येण्यापुर्वी पस्चिमोत्तर भारतात शिव, विषाणिन, भलानस, पख्त वगैरे लोक राहत होते तर सिंधू गंगेच्या खो-यातही अनेक जमाती रहात होत्या. त्यांची नांवे नाग, निषाद, व्रात्य, कीकट, मल्ल, शाक्य, वैदेह, कलिंग, वंग, योधेय, शुद्रक इत्यादि तर दक्षीणेत औंड्र, पुंड्र, मुतीब, शबर वगैरे अशा असंख्य जमाती राहत होत्या. राज्ये/जानपदे/गणराज्ये ही त्यांची व्यवस्था तर धर्म देवकप्रधान, मातृपुजक/लिंग-पुजक/तंत्रप्रधान अशी धर्मव्यवस्था. हा विस्तृत भुगोल होता. वैदिक लोकांना आधी फक्त पश्चिमोत्तर भारतातील जमाती माहित होत्या. नंतर कालौघात सावकाश अन्य जमातींशी परिचय झाला. वैदिक धर्मात नंतर जेही गेले ते एतद्देशियच होते. वैदिक धर्मात दोन मुख्य भेद पडतात ते यामुळेच. वैदिक साहित्य सुरुवातीला कुरु-पांच्घाल भागात लिहिले गेले. त्यात वेळोवेळी भर पडत गेली. नंतर मगध हा वैदिक धर्माचा केंद्रबिंदू बनला. पण बौद्ध-जैन यांनी तेथे उचल खाल्ल्याने तेथुनही त्या धर्माला अन्यत्र सरकावे लागले. सविस्तर नंतर वाचायला मिळेलच. आधी क्षत्रिय/ब्राह्मण आणि एकंदरीतच वैदिक धर्मात काय फेरफार होत गेले आणि का ते पाहू!

      Delete
  10. आप्पा- अरे बाप्पा ,अगदी लवकर लवकर ये , हे बघ , संजय सरांचे उत्तर आले .
    बाप्पा- कित्ती छान !ते आपल्या शब्दाना जागणार असे दिसते . समजा चुकून माकून ते राजकारणात स्वर्ण भारत पक्षाकडून उभे राहिले समजा ,नगर पालिकेच्या निवडणुकीत , यतर माझे मत त्यांनाच !
    आप्पा- होरे हो , अगदी माझ्या मनातले बोललास बघ . पण तू एकदम सरना नगर पालिकेच्या ठरला का धरलेस ? ते रसायन लोकसभेचे आहे.इतका इतिहासाचा अभ्यास आहे त्यांचा की त्याचा फक्त वर्तमानात उपयोग करायचा आहे , यश त्यांचेच आहे!बर ते असू दे ! परवा बिहारचे निकाल आहेत , त्यानंतर बोलूच आपण . नंतर सर्व पद्म पुरस्कार वाले परत उरस्कार घेतील मागून , म्हणतील , अहो आमच्या हिच्या किती पार्टीत विषय निघाला , नाही म्हणता येईना , खर तर मी मोदींच्या बाजूनेच आहे , ते एक असो - पण इतक्या जाती आणि इतक्या श्रद्धा वैदिक येण्या पूर्वीही होत्या ,म्हणजे कमाल आहे ना ?
    बाप्पा - एकंदरीत एक स्पष्ट चित्र संजयाच्या खुलाशाने डोळ्यासमोर उभे राहते . ते सर्वात महत्वाचे आहे , कारण कोणतेही वाचन झाल्यावर असे चित्र जर उभे राहिले नाही तर त्याचा काही उपयोग नसतो , संजय ला रेक अजून विनंती , आता स्पष्टीकरण उरले ते भाषेचे , दक्षेनेतील लोकांची आणि उत्तरेतील व्रात्य ,भलानास , शाक्य वैदेह , नाग या लोकांच्या भाषा कोणत्या होत्या ?
    आप्पा- आम्ही इरावती कर्वे यांचे युगांत वाचले त्यावेळेस त्यांनी दोन मुद्दे चांगले मांडले होते ते आठवले ,एक म्हणजे नंदाचे राज्य हे पहिले भारतीय साम्राज्य आणि श्रीकृष्ण हा ग्रामराज्यांचा आणि गणराज्यांचा पुरस्कर्ता होता , दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाचा खून तो गाफिलपणे झाडाखाली बसला असताना झाला , तेंव्हाचे नीतीनियम न पाळणारे असे लोक भारतात येत होते त्यांनी नजर ठेवून श्रीकृष्णाचा काटा काढला असेल .
    बाप्पा - तू म्हणजे संजय सरांच्या पुढे कल्पकतेत दोन पावले पुढे चालला आहेस !
    आप्पा- मी नाही रे -इरावती कर्वे हि विदुषी , तिने लिहिले आहे .
    बाप्पा - तर मग संजय सर पुढच्या वेळेस , या गणांच्या भाषा कोणत्या ते पण सांगाल ना ?
    आप्पा- आपणास दिवाळीच्या शुभेच्छा !
    बाप्पा - ही दीपावली आपणास आणि आपल्या समविचारी लोकाना सुखाची जावो !
    आप्पा- म्हणजे तू पण स्वर्ण भारत पक्षाला शुभेच्छा सुरु केल्यास का ?
    बाप्पा- अरे आप्पा , तसे डायरेक्ट लिहायचे नसते , तुला नाही समजणार ते , तो राजकारणाचा भाग आहे . तू आपला गोरा गोमटा,सात्विक आहे तसाच रहा !शुभ दीपावली !

    ReplyDelete
  11. ब्राह्मण ग्रंथात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तीन च वर्णाचा उल्लेख येतो तर पुरुषसुक्तात ब्राह्मण वैश्य शुद्राचाच उल्लेख येतो ( तुमच्या मते राजन्य क्षत्रिय नाही म्हणुन ) तर मग पुरुषसुक्ताच्या काळी क्षत्रिय वर्ण नव्हता पण शुद्र वर्ण होता आणि ब्राह्मण ग्रंथाच्या काळी क्षत्रिय वर्ण होता आणि शुद्र वर्ण नव्हता ? हे कस शक्य असेल ?

    ReplyDelete
  12. क्षेत्र पालक (सरंक्षक)
    क्षेत्र धारण करून असणारा (कसणारा)
    क्षेत्रीय-क्षत्रिय.

    ब्राम्हण आणि शुद्र हे दोन वर्ण होते हे टिळकांचे रेफरन्स देऊन सिद्ध कसे करता?

    टिळक १९-२० व्या शतकातले.
    त्याआधी २००० वर्षांचा इतिहास कुठे जातो?
    वैदिक भारतात बाहेरून आले होते मग भारताची संस्कृती (जपणारे/वाढवणारे/टिकवणारे) कोण?

    शुद्र हे विशेषण लावणे हा कित्येक वर्षांपासून तेजोभंग करण्याचा प्रयत्न?

    उद्या कोणी उठेल आणि म्हणेल वैदिक बाहेरुन आले आणि त्यांनी येथील कृषी संस्कृती वर बौद्धिक आक्रमण केले त्यामुळे वैदिकांचा भारतात असलेल्या मुळ संस्कृतीशी
    संबंध नाही, सबब भारतीय कृषी संस्कृती मधील क्षेत्रीय/क्षत्रिय, वैश्य, शुद्र हे तीन वर्ण मुळ आहेत. ब्राम्हण वर्ण हा लादलेला आहे तर??

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...