Wednesday, April 20, 2016

हेही आहे...!

शेतकरी आत्महत्या करतो म्हणून सर्वांनाच दु:ख होते. कोणी कविता करतो तर कोणी आतमहत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना उदार हृदयाने मदतही करतो. हे सारे चांगलेच आहे. मानवता जागी आहे याचे उत्तम उदाहरण आहे.

पण आत्महत्या थांबत नाहीत. आक्रोश आवरत नाहीत हेही आहे.

उदाहरणार्थ नाबार्ड ही कृषीपुरक उद्योगांना-व्यवसायांना अन्य राष्ट्रीयीकृत ब्यंकांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली मध्यवर्ती ब्यंक आहे. पशुपालन/संवर्धन/शेतीपुरक उद्योग/शेतमाल प्रक्रिया उद्योग ईत्यादिसाठी कर्ज देणे त्यांना बंधनकारक आहे.

पण ब्यंका नाबार्ड प्रकरणे करायला उत्सूक नसतात हेही आहे.

नाबार्डही शिबीरे घेत आपण काय करतो आणि कशासाठी आहोत याचा प्रचार करत नाही हेही आहे.

बरे, प्रशिक्षण उपलब्ध आहे..घ्यायचेच असले तर...पण लोक जात नाहीत हेही आहे.

नाबार्डचा फायदा अधिकाधिक लबाड लोकच घेतात हेही आहे. (गेल्या वर्षी माझे नाबार्डच्या कर्मचा-यांसमोर शिवजयंतीनिमित्त भाषण झाले होते, तेंव्हा नाबार्डच्या अध्यक्षांनाही मी हे ऐकवले होते.)

भारतातील ९०% स्वयंसेवी संस्था fraud आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण आहे हेही आहे.

अनेक शेतकरी कर्जे  शेतकामांसाठी नाही तर लग्न्समारंभादी कारणांसाठीच उधळतात व व्यापा-यांकडून बोगस बिले घेतात नि नंतर ते कर्ज फेडता येत नाही म्हणुन हताश होतात हेही आहे.

शेतक-यांना डायरेक्ट बाजारपेठ मिळावी, शेतकरी व ग्राहक यांत थेट संपर्क व्हावा यासाठी मी प्रयत्न केले हे सर्वांना माहितच आहे. पुढे तर अजून व्यापक प्रमाणात माझ्या एसबीपी पक्षामार्फत करणार आहे हेही खरे आहे. पण घरासाठी थेट माल घेऊन मीसुद्धा गेल्यावर्षी फसलो आहे...हेही आहे.

जलसंधारणाची कामे लोकच प्राचीन काळापासून करत आले आहेत. शासनाचा सहभाग गांवपातळीवर कमीच असे. आता सारे काही सरकारने करावे, आमदार-खासदारांनी ठरावीक चमच्यांना-गांवगुंडांना कंत्राटे द्यावी, त्यांनी माज करावा...पण दहा टक्केही धड काम करू नये...लोकांनीही काही करु नये...बोलू नये...नि म्हणून शेती-जनावरांसकट तहानलेलेच रहावे हेही आहे.

आम्ही चवचाल लोकांच्या बरळण्यावर एवढी काही चर्चा करतो कि जणू ही बरळणारी अथवा त्यांच्या विरुद्ध बो्लणारीच शहाणी आहेत...बोलले नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही तर जणू काही तुमचे अस्तित्वच नाही असे वाटायला लावणारी ही जखीण सर्वांच्या मस्तकावर हावी झाली आहे. आस्तिक असा कि नास्तिक....हेही आहे.

कोठेतरी लबाडी हाच आमचा ध्यास बनला आहे. आमच्या थोरामोठ्या कंपन्यांचे ताळेबंद बनावट असतात. आमच्या सरकारचे प्रगतीचे आकडे बनावट असतात. ब्यंका या ताळेबंदांना भुलून हमखास बुडणारी कर्जे देतात. आम्ही काळ्या धनाची वाट पाहत त्यावर
आधी भुलत, मोहात पडत, ते होत नाही बघत नंतर जोक करण्यात रममान होतो...हेही आहे.

धर्मपिपासू घातक आहेत. सर्वात घातक हे अर्थपिपासू लबाड नागरिक आहेत. खोट्या प्रतिष्ठांच्या मागे लागलेली नवी पिढी आहे आणि ती भागवायला उरापाड झटणारी जुनी पिढी आहे. हेही खोट्या कारंणांनी कर्जे घेतात तेही खोट्या कारणांनी कर्जे घेतात. हेही बुडवतात...तेही बुडवतात...कारण खोटी कर्जे बुडवण्यासाठीच असतात हेही आहे.

आम्ही भारतीय कामाच्या ठिकाणी नेहमी दुर्मुखलेले असतो. आमचे whattsap नि फेबू जोमात असते. आमचे मुड काम ठरवत नाही, आम्ही काय बेस्ट दिले हेही विचार नाहीत...तर बव्हंशी थुका लावण्यात आमचे महान कर्मकौशल्य दाखवतो हेही आहे.

बरेच लिहिता येईल. पण थांबतो. थांबलेच पाहिजे या पिपासुंच्या राज्यात हेही आहे.

3 comments:

  1. Agdi barobar!!! Mazya mulachya shalet baryachshay palak pahile ki apan khotya prathisthe maage laglaoy hey agadi pavlopavli janavte.. ugichach dikhavupana, daamdaul...Mhanje 30 varshapurvi amhi lahan astana sarva staratil mule ekatra khelaycho.. Aata heech mule aai-baap zali aahet ani tyapaiki arthik drushtya saksham aslele lok aplya mulanna matra 'etar crowd' madhe 'mix' hou naka, kivhan ekatra basle ki 'Amhi May holidays madhe flight nee Germany la' chalalo sangtana kapalala haat maravasa vatato.. Paisa astana enjoy karayla maza virodh nahi.. Me swatahahe karto.. Europe la geloy.. pan ek elitist mentality hou dili nahi.. Mazya poranna saglyanshe misalayla sangto.. Gavaat gelo, tar etaranbarobar vihireche paani pyayla advat nahi.. kivha lal-dabyanni pravaas karava lagala tari kahi harkat nahi. Enjoy karta-karta samajala he kahi dyavech... Nana Patekar/Makarand Anaspure ani ajun baryach samaj sevi sansthanna madat kelich pahije.

    ReplyDelete
  2. हौसी लेखक कृतीशून्य असू नये.

    ReplyDelete
  3. असे का होते, यावरही चिंतन, अभ्यास आणि तद्नंतर भाष्य करायला हवे. अशा चिंतनगर्भ व अभ्यासपूर्ण भाष्याची आम्ही वाट बघतोय.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...