Monday, December 10, 2018

शोषित असण्याचा आनंद कोठून येतो?


Image result for poverty indians


सुख-दु:खे प्रत्येकालाच असतात. किंबहुना मानवी जीवनाचा तो अविभाज्ज्य हिस्सा आहे. माणूस जसा प्रगल्भ होत जातो तशा सुखदु:खाच्या व्याख्या मात्र बदलत जातात. काल ज्याचे दु:ख वाटत होते त्याचे आता दु:ख वाटत नाही. सुख-दु:ख हे शेवटी मानवी भावना व विचारांशी जोडले गेले असल्याने व्यक्तीनिहाय त्याच्या वेगळ्या व्याख्या असणे, प्रगल्भतेबरोबर त्या बदलत जाणे स्वाभाविक आहे. समाज व राष्ट्रांनाही हे लागू पडते कारण समाज हा व्यक्तींमुळेच बनतो. सामुहिक भावना व सामुहिक विचारांचे अस्तित्व हे सदासर्वकाळ असते. त्यामुळे माणसांत आपसूक विविध गटही पडत जातात व विविध गटांतील संघर्षही अविरत सुरु राहतो. हा संघर्ष जोवर वैचारिक आणि म्हणूनच ऐहिक उन्नतीला सहाय्य करतो तोवर तो मानव जातीला उपकारक आहे असे म्हणता येते. पण अनेकदा हा संघर्ष द्वेष व हिंसेच्या दिशेने जाऊ लागतो आणि आपलेच खरे, पुरातन आणि श्रेय:स्कर या समजुतीच्या अट्टाहासातून सामाजिक, राष्ट्रीय व अनेकदा जागतिक शांतताही निखळून पडते हे आपण जगाच्या इतिहासावर नुसती नजर फिरवली तरी लक्षात येते.

या भावनांच्या खेळात अनेकदा मानवी मुल्यांचे खरे प्रश्न बाजूला पडतात. आपण येथे भारतातील शोषित वंचित समाजांचे उदाहरण घेतले तर हे लक्षात येईल की प्रत्येक विचारगट वरकरणी या समाजांबाबत सहानुभुती बाळगत असल्याचे दाखवतो. तो समाजवादी असेल, साम्यवादी असेल किंवा धर्मवादी. किंबहुना शोषित हा शोषितच नसून त्याच्या गतजन्माच्या पापांचे फळ आहे या मान्यतेचा प्रभाव धर्मवाद्यांच्या मस्तकातून अजुनही गेलेला नाही, भले ते वरकरणी काहीही म्हणत असोत. आजकाल कोणत्याही विचारसमुहाविरुद्ध बोलण्याची सोय नसली तरी काही कटू गोष्टींची चर्चा सर्व धोके पत्करुन करणे भाग आहे. संतांबद्दल आपणा सर्वांना कितीही आदर असला आणि त्यांच्या प्रतिभेचे पोवाडे गावेत तेवढे थोडेच असले तरी त्यांनी नेमकी कोणती सामाजिक मानसिकता दृढ करायला हातभार लावला याची समाज-मानसशास्त्रीय समीक्षा करणे आवश्यक असुनही तसे झाले नाही. श्रद्धेला हात घातला या नांवाखाली येथे काहीही घडू शकते हे पाहिले असल्याने कदाचित असे होत असेल. पण वंचितांच्या वंचितत्वाला संतविचारांनी हातभार लावला व त्याची गडद छाया भारतीय मानसावर आहे याचे काय करायचे?

ठेवीले अनंत तैसेची रहावे, या जन्मी पुण्य केले तर पुढचा जन्म उच्च कुळात मिळेल किंवा आज आहे ती स्थिती गतजन्मातील पापामुळे आहे हा विचार ज्ञानेश्वरांपासुन ते चोखा मेळापयंत संतांनी उचलून धरला. शब्द वेगळे असतील, प्रतिमा वेगळ्या वापरल्या गेल्या असतील, पण संदेश एकच होता. ज्यांनी हे विचार धुडकावून लावले ते समाज व्यवस्थेत खालच्या स्थानावर असले तरी ते उच्च-नीचतेच्या शिड्या पार करु शकले व आपल्याला हवे ते इप्सित समाजस्थान मिळवू शकले. पण संतविचारांच्या भजनी लागलेले वंचित अधिकाधिक वंचित होत गेले कारण त्यांनी नसलेले प्राक्तन नुसते विनातक्रार स्विकारले नाही तर ते एक भावनीक श्रद्धामय कवच म्हणून वापरले. आजही वापरले जाते आहे, आम्ही आधुनिक जगात येऊनही.  नाहीतर पाऊस चांगला यावा म्हणून श्रीविठ्ठलाला साकडे घालणारे मुख्यमंत्री या राज्यात का झाले असते? श्रद्धेने आणि संतविचारांनी समाजाला कार्यप्रवण करनारा, प्राक्तनावर लाथ मारणारा सिद्धांत दिला नाही. त्यांनीच नव्हे तर कोणीही दिला नाही कारंण नियतीशरण प्रजा हेच नियतीशरणतेवर लाथ मारणा-यांचे भांडवल बनून जाते. राज्यकर्त्यांनी, कोणत्याही कालातील असोत, सर्व ढोंगे करत समाजाला सुखनैव नियतीशरणता जोपासु दिली आणि ती मुर्खाप्रमाणे जोपासली गेली. 

मग वंचितत्वाचा दोष कोनाच्या माथी जातो? आम्ही सामाजिक मानसिकताच बदलायची गरज आहे हे न समजता गोडबोल्या, निरुपयोगी पण सोपी प्रसिद्धी हवी असणा-या विचारवंतांनाच डोक्यावर घेत बसलो. अगदी आधुनिक अर्थ-तत्वज्ञानाच्या पुरस्कत्यांनीही हीच पद्धत अवलंबली. ज्यांनी अवलंबली नाही ते विस्मरनात फेकले गेले. एकीकडे विकासही हवा आणि दुसरीकडे आध्यात्मीकही व्हायचे या नादात आम्ही कसे "ना अरत्र...ना परत्र" या स्थितीत अडकलो आणि आम्ही ना बौद्धिक, ना आध्यात्मिक ना ऐहिक अशा त्रांगड्यात अडकत मतीभ्रष्ट झालोढे आम्हाला समजलेच नाही.

वंचितांचे हितार्थी आहोत अशा विचारवंतांनी तर फार सोपे उत्तर शोधले. आमच्या वंचितत्वाचे कारण इतिहासातील अन्याय करंणा-या, वंचितत्व लादणा-या काही जाती आहेत असे सिद्धांत हिरीरीने माम्डुन एक द्वेषमुलक समाज-मानसिकता बनवायचा प्रयत्न केला. परलोकवादी ईहवादी बनवण्याचा खरे तर हा मार्ग नव्हता. सारे काही नशीब, राजा, धर्मनेत्यांच्या चरणी गहाण टाकना-यांना स्वाभाविकपणेच हेही सोपे वाटले आणि त्यांने लगोलग हे नवे "विठुराय" डोक्यावर घेतले. ठीक आहे, अमुकने तुमचे गतकालात शोषण केले, पण त्याला शिव्या देत बसत ऐहिक प्रगती होत नाही हे वंचितांची बाजू घेणा-या कोणत्याही विचारवंतांनी सांगायचा प्रयत्न केला नाही कारण लोकप्रियता गमावण्याचा धोका होता. म्हणजे झाले असे की आर्थिक/सामाजिक वंचित स्वहस्ते मानसिक वंचितत्वाचे भागीदार बनले. 

बरे, या वंचितांचा त्यांना वंचित राहण्याचे फायदे पटवून देनारी आणि म्हणूनच पुन्हा वंचित करायला लावणारी नवी व्यवस्था आकाराला आली. ती आता माओवादाच्या सर्वंकश गराड्यात सापडू लागली आहे की काय अशी खात्री पटावी या स्तरावर पोहोचली आहे. संतांनी निर्माण केलेल्या विघातक श्रधा/नियतीवादी मानसिकतेला विध्वंसक मानसिकतेकडे नेले जात आहे. 

आणि यात वंचितता नष्ट व्हावी यासाठी कोणते सकारात्मक तत्वज्ञान आहे? काहीही नाही. भांदवलदारी नष्ट करुन वंचितता वाढते, कमी होत नाही हे यांना समजले आहे असे नाही. किंबहुना वंचितांनी पिढ्याउपिढ्या द्वेष करत वंचितच रहावे, विध्वंसक व्हावे आसे श्रद्धावादी तत्वज्ञानालाच छेद देणारे परंतू अंतिम सामाजिक परिणाम ्तेच असणारे हे तत्वज्ञान आहे. यात खुद्द वंचितांची किंवा त्यांचे तारनहार आहोत असे दाखवणा-यांची नेमकी काय भुमिका आहे? आणि याच आरोपातुन लोकशाहीवादी ते अन्य कोनतीही विचारप्रनालीवादी सुटत नाहीत ही गंभीर बाब आहे.

समाजवादी व साम्यवादी तर शोषितांचेच प्रतिनिधी असल्यासारखे वारंवार त्यांच्या बाबतच बोलत असतात, लिहित असतात व चर्चासत्रे घडवून आणत असतात. सत्तेत आले तरीही ही भाषणबाजी थांबत नाही. शोषित-वंचित समाजांसाठी असंख्य योजना जाहीर होतात, लक्षावधी कोटी रुपये खर्च केल्याचे दाखले व पुरावे दिले जातात. पण वास्तव हे आहे कि शोषितांचे शोषितपण थांबल्याचे चित्र मात्र आपल्याला दिसून येत नाही. उलट शोषितांच्या शोषणाचे नवनवे मार्ग शोधले जातात. समाजवादी या तत्वाला अपवाद नाहीत. किंबहुना शोषित वंचित हेच त्यांचे सत्तेत येण्याचे मुख्य भांडवल असल्याने शोषिताला थोडी मदत केल्याचे अवसान आणत त्यांना शोषितच ठेवण्याचे कट आखले जातात. व्यक्तीला आपल्या मगदुराने सुखदु:खाची व्याख्या करता येण्याऐवजी त्यांच्या सुखदु:खाचे एक मोठे कारण बनण्याचा प्रयत्न राजसत्ता व अर्थसत्ता करत जाते, कारण दु:खाचीच बाब तीव्र राहण्यात त्यांचे स्वार्थ अडकलेले असतात. शोषित वंचित मात्र भावनिक होत अनिवार आशेने कोणाचा तरी स्वीकार करतात वा कोणाच्या तरी विरुद्ध होतात.

यासाठी अगदी सोपी क्लुप्ती जगभर वापरली गेली आहे. धर्मवादी व वंशवादी दुस-या धर्माला अथवा वंशाला शत्रू घोषित करत, त्याचे काल्पनिक भय निर्माण करत आपल्या धर्मात एकजुट निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. कधी जातीही याच अजातीय कार्यासाठी वापरल्या जातात. समाजवादी/साम्यवादी भांडवलदारांना क्रमांक एकचा शत्रू घोषित करतात व श्रमिक मजदुरांची  एकजुट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणतातरी खरा खोटा शत्रू अस्तित्वात असल्याखेरीज या गटांचे अस्तित्वच रहात नाही. पण यामुळे शोषण थांबलेले नसते. या उन्मादात आपले वंचितपण विसरायला लावले जाते. भांडवलशाहीला विरोध करणारे राष्ट्राची मक्तेदारीयुक्त भांडवलशाही किंवा धर्माची मक्तेदारी हवी आहे ते धर्मवादी मानत असतात हा विरोधाभास जसे साम्यवाद्यांचे समर्थक लक्षात घेत नाहीत तसेच धर्मवादीही लक्षात घेत नाहीत. आणि नेमके हे लोकांच्या लक्षात येवू दिले जात नाही. किंबहुना व्यक्तीचे स्वातंत्र्य अधिकाधिक संकोच कसे पावेल हेच राजसत्ता व अर्थसत्ता पहात असतात. स्पर्धेचे आवाहन ते करतात पण त्यांना स्पर्धाच संपवायची असते. शोषित वंचित घटक स्वप्रेरणेने व स्वसामर्थ्याने शोषिततेच्या, वंचिततेच्या बाहेर पडावेत यासाठी मात्र कसलाही कार्यक्रम त्यांच्याकडे नसतो. सुखदु:खे एकाच परिघात येवून साचतात आणि त्यात प्रवाहीपणा येण्याची शक्यताच पुरती मावळून जाते. भारतातील शोषित जाती जमातींच्या आजही असलेल्या दुखण्यांचे नेमके हेच कारण आहे आणि ते सांगणे अंगलट येणारे असल्याने या विचारधारांचे समर्थक मूग गिळून गप्प बसनार हे उघड आहे.

भटक्या विमूक्त समाजाचा अभ्यास करून त्यांच्या भल्यासाठी उपाययोजना सुचवायला सरकारने रेणके आयोग नेमला होता हे सर्वांच्या लक्षात असेलच. या आयोगाचा अहवाल अनेक वर्ष अभ्यास केल्याचे दाखवुनही अनेक त्रुटींनी भरलेला असल्याने तो अहवाल फेटाळला जाणार हे स्पष्टच होते. भाजप सरकार आल्यानंतर पुन्हा नव्याने इदाते आयोग नेमला गेला. त्याच्या शिफारशी इदाए सोडून अन्य कोनाला माहित आहे हा एक प्रश्नच आहे, कारण त्याची चर्चाच नाही. वंचितांनाही आपल्या वंचितत्वाची पर्वा नसून केवळ आपल्या वंचितत्वाचे रडगाने गाण्यात रस आहे असे विधान मग का करता येणार नाही? आपली स्त्झिती बदलत नाही, सरकार आपल्या भावनांची कदर करणे शक्य नाही, सरकारला झुकवायला लागणार असेल तर आपणच सत्त्ताधारी व्हावे लागेल याचे भान त्यांना नाही...ते यावे असा कोनताही सामाजिक प्रयत्न नाही...आणि वंचितांबद्दल बोलून टाळ्या मिलवायच्या उद्योगापलीकडे विचारवंतांनाही काही घेणे देणे नाही...अशा स्थितीत या वंचितांचे डोळे उघडनार कसे? की ते आजही नियतीशरण रहावेत अशी सर्वांची इच्छा आहे?

शिक्षण, आरोग्य, आर्थिक उन्नतीसाठी नवी व्यावसायिक कौशल्ये देणारी विशेष व्यवस्था, वित्तसहाय्य आणि स्वबलावर उन्नती साधण्यासाठी खुली आर्थिक धोरणे असणे आवश्यक असतांना सरकारांनीही आणि विरोधातल्यांनीही सामाजिक मानसिकता आरक्षणकेंद्रीच केली. वंचितांना सामाजिक जीवनात देण्यात येणारी वागणूक बदलण्यासाठी न्याय्य व्यवस्था असायला हवी याबाबत सर्वच समाज मुकच राहिला. हे मौनाचे भिषण राजकारण आणि समाजकारण देशाला विध्वंसाच्या खाईत लोटेल हे कसे आम्हाला समजले नाही?

वंचितांमध्ये (मग ते कोणत्याही जाती/धर्माचे असोत) स्वतंत्र अर्थप्रेरणा, समाजप्रेरणा निर्माण करण्यासाठी जे खुले वातावरण हवे ते का निर्माण केले जात नाही? किंबहुना अर्थसशक्त समाज निर्माण व्हावेत यासाठी नव्या दिशा दाखवण्यासाठी सरकार असो कि त्यांच्याबद्दल वरकरणी का होईना सहानुभुती बाळगणारे का पुढे येत नाही? आजही त्यांचे व्यवस्थाच शोषण करत असेल तर ती जबाबदारी सरकारांची व त्यांच्या विचारधारांची नाही काय?

आर्थिक प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण व धोरण नसले की अर्थवंचितता येते आणि सामाजिक वंचिततेला खुले रान मिळते हे आपण समजावून घ्यायला हवे. हीच बाब भारतातील बव्हंशी समाजांना लागू आहे. शेतक-यांना लागू आहे. आज जर मुळची सशक्त ग्रामीण संस्कृती लयाला जात आत्महत्यांची संस्कृती उदयाला येत असेल तर मग भारताने राबवलेल्या अर्थ विचारधारांवरच संशय घेणे क्रमप्राप्त आहे. आम्ही कोठवर त्याच त्या नाडणा-या, वंचिततेला सहाय्य करणा-या विचारांना कवटाळुन बसत एकाच डबक्यात कुंठत राहणार आहोत?

आमची आजची व्यवस्था वंचितांचे वंचितत्व दूर करण्यासाठी नसून वंचितता जोपासण्यासाठी आहे हे आम्हीच नागरीक जोवर समजावून घेत नाही तोवर आमचे भवितव्य डबक्यातचराहणार. आमची सुख-दु:खे त्या मर्यादितच वर्तुळात फिरत राहणार कारण आम्हाला स्वातंत्र्याचे खुले अवकाश उपलब्धच नाही. ते आम्हालाच आमच्या विचारांच्या दिशा बदलत मिळवावे लागेल हे पक्के समजून असा! गतकाळातील सामाजिक अपराध्यांना शिव्या देत असतांना ज्यांनी ते सामाजिक अपराध मान्य करत, श्रद्धायुक्त अंत:करणाने नीयतीशरण होत आपल्याच वंचिततेला मुक्तद्वार दिले त्या वंचित समाजांनीही जागे होत प्रागतीक मानसिकता बनवायला हवी. सामाजिक नेते आणि सर्व सरकारांनीही "वंचीततेचे राजकारण" करण्याऐवजी ऐहिक आणि मानसीक वंचितता नष्ट करण्याचे धोरण स्विकारले पाहिजे.

आणि आम्हाला "शोषित" म्हणवण्यात जोवर आनंद होतो आहे आंणि म्हणूनच शोषितत्वातून बाहेर पडण्यासाठी काय करावे याचा विचार करण्याचीही गरज वाटत नाहीहे तोवर शोषण हे स्वनिमंत्रितच राहणार यात शंका बाळगायचे कारण नाही. या वंचित-शोश्ढित विचारव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही शोधत नाही तोवर  हा भारत सर्वंकश वंचित तर असेलच पण जगाच्या नकाशातून अदृष्य होण्याचा धोका निर्माण होईल याबाबत शंका बाळगायचे काहीही कारण नाही!

(Published in Sahitya Chaprak)

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...