Wednesday, July 29, 2026

पंडित नेहरू आणि व्याप्त काश्मीर...अक्साई चीन...

 पंडीत नेहरूंनी काश्मीर ताब्यात घ्यायला वेळ केला म्हणून अजूनही अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे असा आरोप केला जातो. पण आहे तो काश्मीर कोणी ताब्यात आणला हे आम्हाला बोलायचे नाही.

इंदिरा गांधींनी अवघ्या जगाला फाट्यावर मारून पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे साफ विसरून जायचे पण त्यावेळची आणि खुद्द व्याप्त काश्मीरमधील स्थिती समजून न घेता व्याप्त काश्मीर ताब्यात का घेतला नाही याबद्दल बोंब मारायची.
भारत-चीन सीमा तेव्हाही गोंधळाची होती आणि आजही गोंधळाची आहे. सन १८३४ मध्ये जम्मूचा राजा गुलाबसिंगाचा सेनापती जोरावरसिंग याने लदाख पादाक्रांत करून तेथील नामग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आणली.
त्यानेच गिलगीट- बाल्टीस्तानही जिंकून घेऊन काश्मीर राज्याला जोडले. १८४१ मध्ये. त्याच्याआधी हजार वर्षापूर्वी काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तापीडाने लदाख जिंकला होता पण तो नंतर पुन्हां स्वतंत्र झाला होता हा इतिहास कोणी सांगायचा?




अक्साई चीन मधून एक व्यापारी मार्ग जात होता, पण हा साराच प्रदेश विषारी पाणी असलेली तळी आणि जेथे गवतही उगवू शकणार नाही अशी पांढरे वाळवंट सलेली पण अतिथंड वातावरण यामुळे कसलीही मनुष्य वस्ती नसलेला प्रदेश म्हणून कोणत्याही सत्तेने त्यावर आपली मालकी सांगितली नव्हती. यातील काही भाग चीनने व्यापारी रस्ता बनवण्यसाठी व्यापला तेव्हा देश दुर्बल असतानाही युद्ध करणारे नेहरूच होते हे मात्र विसरून जायचे. पण या भागाचा खरा इतिहास कोणी शोधायचा?

१८६५ मध्ये ब्रिटीश सर्व्हेयर डब्ल्यू. एच. जॉन्सन याला लडाखच्या चीनी सीमेपर्यन्तच्या भूभागाचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमले गेले. त्याने लडाखची सीमा शाहीदुल्लाच्या उत्तरेकडे असलेल्या कून-लुन पर्वतराजीतील सांजू खिंडीपर्यंत रेखाटली. यामुळे काराकाश नदीचे खोरेही लडाखमध्ये गृहीत धरले गेले. पण पुढे डग्लस फोरसिथ आणि हेन्री ट्रोटरने केलेल्या सर्वेक्षणात मात्र शाहीदुल्ला लडाखच्या क्षेत्रात गृहीत धरले गेले नाही.
मुळात सीमारेशाच वादग्रस्त झाली ती ब्रिटिशांमुळे आणि भारताने प्राचीन काळापासून भारताची कोणतीही सीमारेषा कधी ठरवलेलीच नव्हती. आज जोही भारत आहे तो ब्रिटीश भारत आहे हे वास्तब कटू वाटले तरी स्वीकारावे लागते.
नेहरूंच्या काळात झालेले पहिले भारत चीन युद्ध का झाले?
प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करणे हा चीनचा सुरुवातीपासून प्रधान हेतू असल्याने त्यांनी तारींम खो-यातील येन्चेंग शहर ते ल्हासा येथवर जाणा-या रस्त्याचे काम सुरु केले. हा रस्ता भारताच्या अधिकृत भूभाग असलेल्या अक्साई चीनमधून तयार करायला सुरुवात झाल्यानंतर भारत-चीन संघर्षाची ठिणगी पडली. एवढा दूरचा दुर्गम परिसर असूनही भारताने स्वत: दुर्बल असतांनाही युद्ध छेडले. खरे तर अक्साई चीन कोणाचा प्रदेश यावबाबत आधी वादच नव्हता कारण अक्साई चीन म्हणजे रोगट पांढरे वाळवंट हा तत्कालीन सर्व व्यापार्यांचाही अनुभव होता. तरीही भारतीय सैन्याने दौलत बेग ओल्डी राखले. सियाचीन हिमनदीही राखली.
पण आता एकविसाव्या शतकातील भारताने मोदीन्च्या नेतृत्वाखाली चीनला अधिकचा प्रदेश सहज जिंकू दिला. अर्ध्याच्या वर Pangong सरोवर चीनच्या ताब्यात गेले आहे. गल्वान खोरे आज आपल्या ताब्यात उरलेले नाही. हॉट स्प्रिंगचा भाग आज कोणाच्या ताब्यात आहे हे भारतीय नागरिक आज ठामपणे सांगू शकत नाहीत.
हे कोनाच्या कार्यकालात घडले?
नेहरूंच्या?

मोदी नेहमीच आपली अपयशे झाकण्यासाठी नेहरुंचा वापर का करतात?
जो भागच माहित नाही त्याबद्दल शड्डू ठोकायला कोणाचे काही जात नाही. तेथून जे पुरातन व्यापारी मार्ग जात होते त्यावर संशोधन करायला एकही भारतीय पुढे आला नाही. गावगप्पा म्हणजे इतिहास नसतो.
मुळात “अखंड भारत” ही संकल्पना कधीही अस्र्तीत्वात नव्हती. मुळात राष्ट्र ही कल्पनाच आपण उधार घेतलेली आहे. भारत आज आहे ते घटनात्मक संघराज्य आहे आणि म्हणून आहे ती एकता तरी आहे. पण संघी लोक संघराज्य ही कल्पनाच नाकारतात. त्यांना काय हवे आहे ते त्यांनाच माहित पण ते राष्ट्राच्या हिताचे नाही एवढे मात्र निश्चित.
म. गांधी, पंडीत नेहरू, बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संस्थापक स्तंभ आहेत. त्यांच्यावर सर्व दोषांचे खापर फोडून आज आपल्याला सुखाने जगता येईल ही कल्पना करणारे मूर्खांच्या नंदवनात वावरत आहेत एवढे मात्र निश्चित.
खरे तर मागील पिढ्यांनी जेही बरे वाईट केले त्यात सकारात्मक भर घालणे हे नव्या पिढ्यांचे कर्तव्य असते.
पण स्वत: काही दिवे लावायचे नाहीत आणि आपल्या पराभूततेची आणि शरणागततेची जाणीव झाली की गेल्या पिढ्यांवर दुगाण्या झाडण्यात वांझ आनंद मिळवायचा ही वृत्ती घृणास्पद आहे.
नेहरूंनी हा देश शुन्यातून उभा केला हे वास्तव आहे आणि आपण त्यासाठी कृतद्न्य राहिले पाहिजे.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

पंडित नेहरू आणि व्याप्त काश्मीर...अक्साई चीन...

  पंडीत नेहरूंनी काश्मीर ताब्यात घ्यायला वेळ केला म्हणून अजूनही अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे असा आरोप केला जातो. पण आहे तो काश्मी...