शैव, जैन आणि बौद्ध धर्मांचा जेथे प्राचीन सांस्कृतिक संगम होता ते सारनाथ आता वैश्विक वारसास्थान म्हणून युनेस्कोने घोषित करून जागतिक पटलावर आणले आहे. येथे मिळालेले सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या स्तंभावरील सिंहशीर्ष भारत सरकारने राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलंले तर आहेच पण याच स्तंभावरील चोवीस आ-यांच्या चक्राला राष्ट्रध्वजावर स्थान दिले गेलेले आहे. भगवान बुद्धांनी येथेच आपले पहिले प्रवचन दिले त्याचे हे धम्मप्रवर्तनचक्र प्रतीक असून याला बौद्ध धर्मात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. भारत सरकारने आपल्या सांस्कृतिक वारशाला दिलेली ही मानवंदना आहे. अर्थात सारनाथचा इतिहास पाहता हा केवळ बौद्ध धर्माचं वारसा सांगणारे स्थान नसून येथे शैव आणि जैन धर्माचाही प्राचीन इतिहासाचाही संगम झालेला आपल्याला दिसतो. त्याचा येथे थोडक्यात आढावा घेणे रोचक ठरेल.
सारनाथ
हे नाव मुळात आले कोठून? त्याची उत्पत्ती सारंगनाथ या येथील शिवस्थानाच्या नावात दिली
जाते. शिवाला हरीणांचा स्वामी म्हणूनही सारंगनाथ हे नाव आहे. या परिसरात प्राचीन
काळापासून हरीणांचा अधिवास असल्याने येथील शिवाला सारंगनाथ असे म्हटले जाणे
स्वाभाविक होते. शिवाय काशी (वाराणसी) या प्रसिद्ध शिवक्षेत्राच्या परिघातच सारनाथ
आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. बौद्ध साहित्यातही या स्थानाचा उल्लेख “मृगदाव’
(हरीणांचे वसतीस्थान) असा आलेला आहे. सोबतच इसिपतन (योग्यांचे आराधनास्थान) असाही
या स्थानाचा उल्लेख बौद्ध वाड्मयातील श्रीलंकेत इसपूच्या पहिल्या शतकात लिहिल्या
गेलेल्या “धम्मपवत्तनसुत्त’ या ग्रंथात येतो. बोधी मिळाल्यानंतर येथेच गौतम
बुद्धांनी आपले पहिले धम्म-प्रवचन दिले अशी मान्यता आहे. इसिपत्तन आणि मृगदाव ही
स्थलनामे कालांतराने विस्मृतीत गेली असली तरी सारंगनाथ हे प्राचीन नाव सारनाथ या अपभ्रंशरुपात
अस्तित्वात राहिले असल्याचे आपल्याला दिसते. म्हणजे सारनाथ हे स्थान मुळचे शैव
स्थान होते असे आपल्याला एकंदरीत
इतिहासावर नजर टाकल्यावर लक्षात येते.
त्यानंतर
जैनांच्या इतिहासात या स्थानाचे महत्व खूप आहे याचे कारण म्हणजे या स्थानापासून
अवघ्या एक किलोमीटर दूर असलेल्या सिंहपुरी या गावात जैनांचे अकरावे तीर्थंकर
श्रेयांसनाथ यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवनातील पाचपैकी चार कल्याणक (म्हणजे गर्भ, जन्म, दीक्षा आणि केवलज्ञान) याच परिसरात झाले. त्यामुळे जैनांसाठीही हे
अत्यंत पूजनीय क्षेत्र आहे. जैनांचे चीविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनीही
वाराणसी आणि भोवतीच्या परिसरात प्रवचने दिली होती असे जैन इतिहासात नमूद आहे. सारनाथ
हे वाराणसीपासून अगदी जवळ आहे आणि त्याच्या लगतच श्रेयांसनाथांची जन्मभूमी
असल्याने त्यांनी सारनाथ येथेही प्रवचने दिली असल्याचा निष्कर्ष अनेक इतिहासकार
काढतात.
महावीरांचे
जवळपास समकालीन असलेले भगवान बौद्ध यांना बोधीगया येथे कठोर तपस्येनंतर सर्वोच्च
ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतमचे गौतम बुद्ध झाले. ही ज्ञानप्राप्ती
झाली, आता मानवजातीच्या परमहितासाठी हे ज्ञान लोकांना दिले पाहिजे असे वाटून ते
आपल्या जुन्या शिष्यांच्या शोधात पायी चालत निघाले. सारनाथ हे शैव आणि समण
योग्यांचे-मुनींचे आराधनास्थळ असल्याने तेथेच आपल्याला योग्य शिष्य भेटतील असे
वाटले. ते सारनाथजवळच्याच हरीणबनात (मृगदाव) येथे आले. तेथे अनेक योग्यांसमवेतच
कठोर आराधना करणारे त्यांचे कौंडिन्य, वप्प, भद्दिय, महानाम आणि अस्सजि हे जुने पाच शिष्य भेटले. या पाच शिष्यांना आणि
इतरांना त्यांनी जे पहिले प्रवचन दिले त्यालाच धर्मचक्रप्रवर्तन सूत्र म्हणतात. हे
प्रवचन “धम्मपवत्तनसुत्त” या श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात नमूद आहे.
या
पहिल्याच प्रवचनात भगवान बुद्धांनी आपल्या तत्वज्ञानाचे प्रमुख सार सांगितले.
बुद्धांनी सांगितले की माणसाने
शरीराला अति-कष्ट देणारी उग्र तपश्चर्याही करू नये आणि अति-विलासी जीवनही जगू नये.
या दोन्हीच्या मधला 'मध्यम मार्ग'
स्वीकारावा,
जो मोक्षाकडे घेऊन जातो. यासाठी त्यांनी अष्टांगिक
मार्ग सांगितला. योग्य दृष्टी,
योग्य विचार,
योग्य वाणी,
योग्य कर्म इत्यादीचा त्यात समावेश होतो. येथेच
भगवान बुद्धांनी चार आर्यसत्येही सांगितली. त्यात दुख्ख, दुख्खाचे कारण, त्याचे
निवारण आणि हे निवारण करण्यासाठीचा मार्ग याचं समावेश होतो. ज्या ठिकाणी भगवान
बुद्धांनी पहिले प्रवचन दिले त्याच ठिकाणावर सम्राट अशोकाच्या काळात “धमेक स्तूप” उभारण्यात आला. सध्या आपण जो स्तूप पाहतो त्याची
पुनर्निर्मिती पाचव्या शतकात म्हणजे गुप्त काळात करण्यात आलेली आहे. या स्तूपाचे
वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाप्रमाणेच याचे रचना दंडगोलाकार रुपात करण्यात आलेली आहे.
सारंगनाथ शिवाच्या प्रभावात हे स्तूपाचे कार्य केले गेले असावे असे तज्ञ मानतात. भारताचे
राष्ट्रीय चिन्ह असलेले सिंहशीर्ष (ज्यावरच अशोक चक्र आहे) या स्तुपाच्याच
परिसरातच आढळले आहे.
सम्राट अशोकापूर्वी या भागात स्तूप अथवा विहार
बांधले गेले नसले तरी उत्खननात अशोकपुर्व काळातील चुनारी तांबड्या पाषाणात घडवलेल्या
काही तुटलेल्या मूर्तींचे अवशेष सापडले आहेत. त्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांच्या
पाच शिष्यांची प्रतिमा कोरलेले एक प्राचीन शिल्प समाविष्ट आहे, जे अशोकाच्या काळापूर्वीची मानली जाते. अशोकाच्या काळातही हे क्षेत्र
मनुष्यवस्तीने गजबजलेले क्षेत्र नसून येथे तुरळक व्यक्ती ध्यान-धारणेसाठी राहत असत
असे पुरातत्वीय पुराव्यांवरून दिसते. सारंगनाथ शिवलिंगाचा एक भाग प्राचीन असून हे
शिवलिंग प्राचीन काळात उघड्यावर असले पाहिजे व कुशाण काळानंतर येथे त्यावर मंदिर
बांधले गेले असावे असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. स्कंद पुराणांतर्गत येणाऱ्या
काशी खंडात या शैव स्थानाचा उल्लेख येतो. पुढे आदि शंकराचार्यांनीही या स्थानाला
भेट देऊन अजून एक शिवलिंगाची स्थापना केली आणि दोन्ही शिवलिंगांची एकत्र पूजा
करण्याची प्रथा सुरु झाली अशीही एक मान्यता आहे. सातव्या शतकात भारतात आलेल्या ह्युएन श्वांग या चिनी प्रवाशाने आपल्या काशीयात्रेच्या
प्रवासवर्णनात सारनाथ येथील एका अत्यंत भव्य आणि प्राचीन शिव मंदिराचा उल्लेख केला
होता, ते हेच असावे असा इतिहासकारांचा निष्कर्ष
आहे.
जैन
धर्मियांसाठीही हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे इसवी सनानंतरच्या कुशाण आणि गुप्त
साम्राज्याच्या काळातील श्रेयांसनाथ आणि महावीर या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, छत्र आणि आयागपट्ट (पूजा विधीच्या
शिळा) सापडल्या आहेत. कुशाणकाळातील येथील मूर्तींच्या पृष्ठभागावर कोरलेल्या
शिलालेखात कोणत्या जैन श्रावकाने आणि कधी याचे उल्लेख आले असल्याने या अवशेषांचा
काळ निश्चित आहे. सध्या येथे श्रेयांसनाथ आणि महावीर यांची मंदिरे आहेत पण ती
आधुनिक काळात बांधली गेलेली आहेत.
सम्राट
अशोकाने या स्थानाला उदार राजाश्रय दिल्यामुळे हे क्षेत्र मात्र नामांकित बौद्ध
क्षेत्र म्हणूनच विकसित झाले. येथे आज किमान तीन स्तुपांचे आणि पाच विहारांचे
अवशेष मिळालेले आहेत. हे स्थान अशोकानंतर बौद्ध शिक्षणाचे एक महत्वाचे केंद्र
म्हणून उदयाला आले. यातील मुलगंधकुटी विहार हे स्वत: भगवान बुद्ध वर्षावासासाठी
(चातुर्मास) वापरत असत अशी मान्यता आहे.
थोडक्यात
सारनाथ हे शैव, जैन आणि बौद्ध धर्मियांसाठी एक सांस्कृतिक मिलनस्थळ राहिले असून या
तीनही धर्मांनी एकमेकांपासून काही ना काही घेतले आणि देशाची सांस्कृतिक धारा उन्नत
व तेजस्वी बनवली. आता हे स्थान प्रामुख्याने बौद्ध स्थान म्हणून जागतिक वारसा
स्थळात सामील झाले असले तरी सहिष्णू भारतीयांसाठी हे एक सामुहिक सहजीवनाचे आदर्श
आहे. धार्मिक अस्मितांचा बडिवार न माजवता आपण तोच वारसा जपणे आपल्यासाठी महत्वाचे
आहे.
-संजय
सोनवणी
(महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित)
No comments:
Post a Comment