Tuesday, December 25, 2012

जातिअंताच्या दिशेने आपण जाणारच!


जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (११) 

मित्रहो, आपण "पाळेमुळे" मधुन काही जातींचा इतिहास पाहिला तसेच जातिसंस्थेचाही इतिहास पहात तिच्या आजच्या भिषण वास्तवापर्यंत  प्रवासही केला. गेल्या दिडशे वर्षांत जातिसंस्थेच्या उगमाबाबतचे समाजशास्त्रज्ञांचे आकलन वंशवादाच्या व ब्राह्मणी उपपत्तीच्या चुकीच्या आधारावर झाल्याने जातिसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण निकोप न बनता ते अधिकाधिक दुषितच होत गेला असल्याचे चित्रही आपण पाहिले आहे. जातीसंस्थेच्या उगमाबद्दलच संभ्रम असल्याने जातिनिर्मुलनाचे सर्व उपायही निरर्थक ठरले आहेत व त्याला आरक्षणही कसे हातभार लावत आहे हेही आपण पाहिले. असो.

प्रत्येक जातीघटकाचा भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्था घडवण्यात सारखाच व मोलाचा वाटा आहे हे आपण काही जातींचा इतिहास समजावून घेतांना पाहिले आहे. खरे तर भारतात निर्माण करणारा व सेवा देणारा हे दोनच घटक होते व आजही आहेत. कुणबी, लोहार ते ढोरापर्यंत वस्तु-निर्मिती करणारे घटक जसे होते तसेच धार्मिक, व्यापारी, दळणवळणादि ते प्रशासकीय, सैनिकी सेवा देणारे घटकही होते. एकमेकांच्या सहास्तित्वाखेरीज एकही समाजघटक जगु शकला नसता. किंबहुना समाजच अस्तित्वात आला नसता. परंतू आम्ही वर्चस्वतावादी भावनांचे बळी ठरलो. भाकडकथांच्या निर्मित्या करुन आपापला जातिश्रेष्ठत्वतावाद वाढवत गेलो. पुर्वी म्हटल्याप्रमाणे एकाच राष्ट्राला अनेक राष्ट्रांत विखंडित करत गेलो. आमची जुनी ग्रामाधारित अर्थव्यवस्था औद्योगिकरणामुळे मोडीत निघाली. आम्ही नव्या विश्वाशी जुळवून घेत नवनिर्मितीच्या मागे लागत कालसुसंगत परंतू आमच्या मनोवृत्तीशी नाळ जोडणारी नवी अर्थव्यवस्था बनवण्याऐवजी सर्वस्वी परकीय व म्हणुण सहजी अनुकरणास अयोग्य अशा अर्थव्यवस्थेच्या दु:ष्चक्रात अडकुन बसलो. आज आम्ही एकविसाव्या शतकात आलो आहोत पण तरीही आमचा संभ्रम संपलेला नाही.

जातिप्रणित उद्योग राहिले नाहीत कि सेवा. ती अर्थव्यवस्था राहिली नाही कि समाजव्यवस्था. पण जात मात्र आम्ही नुसते जपुन बसलोत असे नाही तर त्या बेड्या जास्त घट्ट करत चाललो आहोत असे विदारक चित्र आपल्या लक्षात येईल. आज जिचे औचित्य उरलेले नाही, स्थान उरलेले नाही तरीही आम्हाला जात महत्वाची वाटु लागलीय कारण जात हीच आम्हाला आमच्या अस्मितेची महत्वाची खुण वाटतेय. जातीमुळे आपल्याला पटकन एकत्र येता येईल, जातीमुळे सामाजिक संरक्षण मिळेल व आपल्या अधिकारासाठी भांडता येईल ही भावना वाढीला लागलीय. राजकीय सत्ताही विशिष्ट जातींच्या हातात केंद्रीभुत झाल्याने या प्रक्रियेला कधी नव्हे तेवढी गती मिळाली हेही वास्तव नजरेआड करुन चालत नाही. आपल्यावर अन्याय होतो आहे, आपल्याला व्यवस्थेत डावलले जाते आहे आणि त्यामुळे आपले भवितव्य धोक्यात आहे अशा प्रकारची असुरक्षिततेची भावना तीव्र होतांना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच जात हे आता रक्षणाचे व सुरक्षिततेचे एक साधन बनले आहे असे विदारक समाजचित्रही आपल्याला दिसेल.

जातीच्या निर्मितीची मुळ कारणे बाजुला पडुन नवीन व्यवस्थेत स्थान मिळवण्यासाठी जात हा एक मानसिक आधार बनणे हे कोणत्याही समाजाला खरे तर भुषणावह नाही. परंतू आपणच व्यवस्था अशा पद्धतीने विकराळ बनवली आहे कि प्रत्येक जात दुस-या जातीकडे संशयाने पाहते. अर्थव्यवस्थेच्या विनाशक परिस्थितीतुन जन्माधारित जातिसंस्था बळकट कशी बनली हे आपण पाहिले. आजही स्थिती बदललेली नाही. अर्थव्यवस्थेने सर्वव्यापी स्वरुप कधी धारण केलेच नाही वा तसे घडावे व सर्वच समाजघटक अर्थव्यवस्थेचे लाभार्थी बनावेत व साधनसामग्रीचे न्याय्य वाटप व्हावे व पुनर्निर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेलेच नाहीत.

असुरक्षिततेची भावना ही मानवी मानसशस्त्रातील सर्वात विनाशकारी भावना मानली जाते. या असुरक्षिततेच्या भावनेतून आज एकही जातिघटक सुटलेला नसल्याचे आपल्या सहज लक्षात येईल. आज जागतिकीकरणामुळे व काही प्रमाणात का होईना शिक्षण सर्वच जातीघटकांत पसरल्याने सर्वच समुदायांच्या आशा-आकांक्षा अणि अपेक्षांमद्ध्ये वाढ झालेली आहे. त्या प्रमाणात त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न होत नसल्याने व ग्रास-रुट स्तरापासूनच प्रगतीच्या संध्या उपलब्ध नसल्याने एकंदरीत व्यवस्थेतच आपण दुर्लक्षित बनलो आहोत अशी भावना प्रत्येक जातिघटकाची बनली असल्यास नवल नाही. जागतिकीकरणाने ब्रिटिशकाळात जेवढे रोजगार हिरावुन घेतले त्यापेक्षा जास्त प्रमाणात आज लोकांच्या तोंडचा घास विकासाच्या नांवाखाली हिरावला जातो आहे. उदा. चरावू कुरणांची धुळधान करत राजरोस लुट केल्याने आज मेंढपाळ-पशुपालकांचा पारंपारिक उद्योग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असे अनेक समाजघटकांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपले रक्षण व हित जातच करेल, कारण किमान जातीसाठी तरी संघटित होता येते अशी भावना बळावत असेल तर त्याबाबत दोष व्यवस्थेलाच द्यावा लागतो.

असे असले तरी या असुरक्षिततेच्याच जाणीवेतुन एकत्र येण्याच्या गरजेपोटी अजून एक नवीन अभिसरण घडुन येत आहे. ते म्हणजे पोटजातींचे एकत्र येत आपापसातील बेटीबंदी तोडण्याचे प्रयत्न. आज धनगर, कोष्टी, शिंपी आदि जाती पोटजातींचे एकत्रीकरण करत व्यापक ऐक्य साधण्याच्या प्रयत्नांत दिसून येतात. एका अर्थाने ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे कारण जाती तोडण्याची पहिली पायरी म्हणुन आपण पोटजाती तोडण्याच्या प्रयत्नांकडे पाहू शकतो.

भारतात आज साडेसहा हजार जाती आहेत. एकाच जातीला प्रादेशिक भाषाभेदांमुळे देशभर अनेक वेगळी नांवे पडलेली आहेत. उदाहरणार्थ एकाच धनगर जातीला पाल, धनगड, कुरुब अशी जवळपास पंचेचाळीस वेगळी नांवे आहेत. ब्राह्मण समाजातच साडेपाचशे पोटजाती आहेत! खरा विचार केला व भाषाभेदामुळे निर्माण झालेले अंतर मिटवले तर देशात केवळ शंभरेकच जाती अस्तित्वात आहेत हे लक्षात येईल. जर पोटजातींप्रमानेच भाषाभेदामुळे निर्माण झालेले पोटभेदही मिटवता आले तर आजचे साडेसहा हजार जाती-पोटजातीत वातले गेलेले तुकडे शंभरेक घटकांतच विभाजित होतील. यामुळे एक व्यापक ऐक्य साधून येउन त्यातून नवसमाजरचना अस्तित्वात यायला मदत होईल. आज धनगर बांधव राष्ट्रीय पातळीवर सर्व भेद तोडत एकत्र येण्याच्या प्रक्रियेत आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण समाजही आता एकत्र होण्याच्या प्रक्रियेत सामील झाला आहे. अशा प्रयत्नांना सर्वांनीच नुसते समर्थन दिले पाहिजे असे नव्हे तर स्वत:ही आपापल्या जातीसंदर्भात असे प्रयत्नही करणे आवश्यक आहे.

सत्तेत प्रतिनिधित्व ही सर्वच समाजघटकांची रास्त अपेक्षा आहे. प्रत्येक समाजघटकाने ऐतिहासिक काळापासून आपापले बहुमोल योगदान समाजाला दिलेले आहे. समाज हे एक यंत्राप्रमाणे असते. प्रत्येक पार्ट नीट चालला तर समाजयंत्र ठाकठीक चालणार आहे. त्यामुळे केवळ जातिअंतर्गतचे ऐक्यच पुरेसे असू शकत नाही. अनेक जातींचे अनेक प्रश्न समान आहेत. परंपराही समान आहेत. स्वत:चेच नव्हेत तर अन्य जातियांचेही प्रश्न आपलेच आहेत असे मानण्याकडे वाढता कल असने अधिक हिताचे ठरेल. आज जातींची संख्या एवढी आहे कि अनेकांना अनेक जातींच्या अस्तित्वाची साधी खबरही नसते. गोवारी नांवाची जात आहे हे नागपुरला झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राला समजले. कलाल जातीबद्दलही असेच घोर अज्ञान असते. जातीनिर्मुलनाच्या दिशेने जायचे तर जमतील तेवढ्या जातींना समजावून घेत, त्यांचा पुरातन इतिहास समजावून घेत परस्परांबद्दल आदर कसा वाढेल याकडे समाजधुरिणांना पुढे लक्ष द्यावे लागनार आहे. त्यासाठी एकमेकांच्या जातीइतिहासाचे लेखन केले तर ते अधिक संयुक्तिक आणि स्वागतार्ह ठरेल. अर्थात द्वेषमुलक लेखन हे त्याज्ज्य असले पाहिजे.

अलीकडे महाराष्ट्रात ब्राह्मण द्वेषाची लाट आली होती. सर्वच सामाजिक दोषांचे पाप ब्राह्मणांवर फोडुन आपल्या वर्तमानाचे समर्थन करता येत नाही याचे भान सुजाण लोकांना असले पाहिजे. इतिहासाची निकोप चिकित्सा केली तरच ती सर्वांनाच स्वीकारार्ह असते. किमान इतिहासाच्या बाबतीत तरी कोनताही जातिविशिष्ट दृष्टीकोण हा घातकच ठरेल याचे भान सर्वच समाजघटकांनी ठेवले पाहिजे. त्याच वेळीस पुर्वास्पृष्य समाजांकडे पाहण्याचा आपला दुषित दृष्टीकोण बदलण्याचे आव्हानही सर्वांसमोर आहे. द्वेषाच्या पायावर आजतागायत कोनतीही संस्कृती उभी राहू शकलेली नाही, ती उध्वस्तच झालेली आहे हा जागतिक संस्कृत्यांच्या पतनांच्या इतिहासावरुन तरी आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही समाजघतकाचा सर्वस्वी द्वेष करणे हा समाजद्रोहच आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

पोटजातींचे तरी विसर्जन करत भाषाभेदामुळे निर्माण झालेला प्रादेशिक जातीभेद मिटवत तरी आम्ही साडेसहा हजार जाती शंभरेकवर आणु शकलो तर मला वाटते ते एक मोठे सामाजिक यश असनार आहे. आज काही जातींनी त्या दिशेने पावले उचललेली आहेत. सर्वांनीच ती उचलावीत अशी अपेक्षा आहे. यातून आपल्या समाजाचे व्यापक हितच होईल आणि खरा व संपुर्ण जातीअंत याच प्रक्रियेतून घडुन येईल याबद्दल मला शंका नाही.

ही लेखमालिका लिहिणे एकार्थाने आव्हान होते. पुर्वसुरीच्या समाजशास्त्रज्ञांनी मांडलेल्या जातिउत्पत्तीच्या प्रमेयांना मला नवीन पुराव्यांच्या आधारावर छेद द्यावा लागला ते काहींना खटकले असले तरी ज्ञान असेच टप्प्याटप्प्याने पुढे जात असते. पुर्वसुरींनी जी कामगिरी करुन ठेवली त्याबद्दल मला नितांत आदरच आहे. माझे सिद्धांतही पुढे नवीन पुरावे समोर आले तर छेदले जातील याचे मला भान आहे आणि त्याचे स्वागतही आहे. अशा गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्नावरील माझे लेखन प्रसिद्ध केले याबद्दल मी नवशक्तीचा, त्याच्या संपादकांचा नितांत आभारी आहे. आणि वाचकांनी वेळोवेळी मला प्रतिसाद देवून प्रोत्साहन दिले, अनेक मुद्दे सुचवले याबद्दल मी वाचकांचाही आभारी आहे.
"सर्वेपि सुखिन: संतु: सर्व संतु: निरामया:"

(समाप्त)
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

36 comments:

  1. ही लेखमाला अभ्यासपूर्ण तर होतीच, पण या प्रकारचे विश्लेषण या आधी कोणी केले नसावे असे वाटते. आपण जातीअंताचे उपायही सुचलवेत ते महत्वाचे आहे. भाषिक भेद दूर करून एखाद्या जातीच्या सगळ्या पोटजाती एकत्र आल्या तर जातींची संख्या ६०००वरून १००-१२५ वर येईल हे खरे आहे, बहुधा त्याचमुळे कांही जातीवादी राजकारणी भाषावाद पेटवत असावेत. कारण जातींची संख्या कमी झाली तर यांचे राजकीय गणित बिघडू शकते.

    पण केवळ पोटजाती एकत्र येवून जातीअंत होईल असे वाटत नाही. उलट मोठ्या झालेल्या जातींचा जातीवादही मोठा असेल. त्यामुळे जातींचे कुंपण काढून टाकणे हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. त्यासाठी आंतरजातीय लग्ने मोठ्या प्रमाणात होणे आणि जातीआधारीत आरक्षण बंद करणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. नुसती आंतरजातीय लग्ने होवून जाती अंत होवू शकत नाही कारण जातवार आरक्षणामुळे आंतरजातीय लग्ने केलेली जोडप्यांच्या मुलांना बापाची जात चिकटते हे दिसून येते. याउलट ज्या जातींना आरक्षण नसते, त्या जातींमधील आंतरजातीय लग्ने केलेल्या जोडप्यांच्या मुलांना जातीशी फारसे कांही देणे-घेणे नसते हे दिसून येते.

    ReplyDelete
  2. प्रत्येक जातीचा पुरातन इतिहास वेगवेगळा लिहून जाती नष्ट कशा होणार हे नेमके कळले नाही. उद्या ६००० जाती १०० वर आल्या तरी परवा त्या परत १००० वर जाऊ शकतात. "आमचे" रक्त "त्यांच्या" रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना संपत नाही तोवर जाती नष्ट होणार तरी कशा?
    आरक्षण नष्ट करूनही ही भावना संपणार नाही. हजारो वर्षांपासून काही जाती इतर जातींशी सोयीची शय्यासोबत करून स्वत:चे वर्चस्व राखून आहेत. आता काळाच्या ओघात बदलणाऱ्या व्यवस्थेमध्ये त्यांच्या ह्या वर्चस्वाला शह बसतो आहे. म्हणूनच आरक्षण संपवण्याची मागणी पुढे येते आहे. व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणायचा तो स्वजातीचे वर्चस्व राखण्यासाठी की सर्व जातींबरोबर मिळून मिसळून राहण्यासाठी हे आधी स्पष्ट झाले पाहिजे. वेळ मारून नेण्यासाठी चेहऱ्यावरचे भाव बदलणे वेगळे आणि अंतर्बाह्य बदल घडून वैचारिक क्रांती होणे वेगळे. "जात" हा जन्मत: सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा मार्ग आहे ही वस्तुस्थिती आहे. जातीच्या ऐवजी कर्तृत्व हे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे माध्यम होईल तेव्हा काहीतरी बदल घडून येण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. जातीमुळे मिळणारी प्रतिष्ठा जातीपुरतीच मर्यादित रहाते. कर्तुत्वानेच व्यापक सामाजिक प्रतिष्ठा मिळते हे वास्तव आहे. शंभर जाती पुन्हा हजार होणार नाहीत कारण शंभर होण्यात फायदे अधिक आहेत. "स्वजातीचे वर्चस्व" ही भावना प्रबळ आहे. ती अन्य जातीही तेवढ्याच इतिहासाच्या सारख्या भागीदार आहेत हे सत्य सतत सांगावे लागेल व त्यासाठीच इतिहास लिहिला गेला पाहिजे. इतिहास फक्त राजे-रजवाड्यांचा व धर्मनेत्यांचाच लिहायची खोड आपल्याकडे आहे. सामाजिक इतिहास (Subaltern) सुद्धा लिहिला गेला पाहिजे. तो नाही म्हणुन प्रत्येक जात संभ्रमीत व हीणगंडाने ग्रासलेली आहे. तो हीणगंड काढल्याखेरीज जातीबाबतचा दृष्टीकोण बदलणार नाही. जे नष्ट करायचेय ते नेमके काय होते हे समजणे आवश्यक आहे. नुसत्या जाती संपवा म्हणुन जाती संपत नसतात. आरक्षण गरजेचे बनलेय त्याचे कारण आपल्या दरिद्र अर्थव्यवस्थेत आहे. ती सुधरवण्यासाठी आपण एक समाज म्हणुन काय केले हा प्रश्न आपण विचारायला हवा. नोक-यांतच जीवन शोधनारे आम्ही आरक्षणाच्या कुबड्यांखेरीज कसे जगणार आहोत? असो. प्रतिसादाबद्दल आभार.

      Delete
  3. संजयजी,
    आपला समारोपाचा लेख नितांतसुंदर झाला आहे .
    त्यातील समभावाचे नव्याने मी किंवा दुसऱ्या कुणी समर्थन करण्याची आवश्यकता नाही इतके ते परिपूर्ण झाले आहे.
    समारोप आद्य श्री शंकराचार्य यांच्या श्लोकाने ( का भगवद्गीता-उपनिषद ? ) करण्या बरोबरच
    शेवट आपण माउली च्या पसायदानाने केला असतां तर -(अंगावर रोमांच उभे राहतात !)
    " जे खळांची व्यंकटी सांडो -- -
    - - -मैत्र जीवांचे
    जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात -
    येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला "
    इतके लिहिण्याचे कारण ,
    आपण सुचवलेला विचार , भाषाभेदामुळे निर्माण झालेला प्रादेशिक जातिभेद कमी होत फक्त शंभर जाती उरतील ही कल्पना गळी नीटशी उतरली नाही ,
    हे थोडेसे फांटसीच्या अंगाने गेल्यासारखे झाले आहे.
    मागे असे वाचले होते की संस्कृत ही कधीच बहुजनांची भाषा बनू शकली नाही .ती फक्त अभिजन किंवा उच्चभ्रू यांच्यापर्यंत मर्यादित राहिली.आणि
    संस्कृतच्या सावलीत ,प्रभावातच प्रादेशिक भाषा बनत गेल्या. तसे असेल तर परत एकदा एक भाषा हा मुद्दा कितपत यशस्वी होईल याबद्दल संदेह वाटतो.
    जातींच्या विविधातेबद्दल मला कधीच भीती वाटत नाही.उदाहरण द्यायचे तर अनेक रंग आणि अनेक फुले असतात,तसेच लाल-गुलाबी छटा घेतली तरं
    गुलाब,कण्हेरी जास्वंद अबोली अशा अनेक छटा आपल्याला दिसतात,प्रत्येक फूल आपापली वैशिष्ठये बाळगून देव्हारा सजविला जातो.
    प्रश्न आहे तो देव्हाऱ्यात कोण आहे त्याचा ! - तिथे देव असायच्या ऐवजी टोप्या असतील तर ? -पांढरी केशरी लाल हिरवी निळी ?
    हाच मुख्य अडचणीचा मुद्दा आहे.आपले समाजकारण राजकारणातून साध्य करायला गेले तर हे असेच घडणार !
    आपली नाट्य संमेलने - साहित्य संमेलने - ह्यावर अशीच राजकीय सावली पडताना दिसते !
    हे अटळ आहे का ?
    आपल्यातून पूर्वी एखादा कारखानदार पुढे येत असे , तसे आता होताना कमी दिसते !
    जाती नष्ट होण्यापेक्षा त्या समजून उमजून टिकवणे - निरोगीपणे त्यांचे सौंदर्य जपणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते.
    त्यासाठी सर्व जाती समान आहेत हा संस्कार सर्वात महत्वाचा आहे.
    " सर्व जाती श्रेष्ठच आहेत "असे म्हणूया !
    आनंदाचे डोही आनंद तरंग - -

    ReplyDelete
  4. आपल्या सेव लेखांचे लिखाण वाचनीय झाले आहे.
    अभिनंदन !

    ReplyDelete
  5. आपल्या अथक परिश्रमाने आपण हा व्याप पूर्ण केला आहे.
    पुस्तकरूपाने हि विचारधारा वाचता आली तर फारच छान .अशी कृती जर संग्रही ठेवणे जमले तर इतरांना ते देत येईल.

    ReplyDelete
  6. संजयजी,
    आपण चिकाटीने सादर केलेला हा प्रयत्न संग्राह्य आहे.
    तो पुस्तकरूपात आमच्या पर्यंत कधी येईल आणि काय रुपात ,काय नावाने ?
    आपल्या ब्लोग बरोबर मी ज्या वीस इतर ब्लोग वाचतो त्यावेळेस तुलनात्मक विचार करता आपले लेखन
    जास्त जास्त सकस होत चालले आहे हे पाहून आनंद होतो.
    विशेषतः आपण इतके महत्वाचे लिहित असताना इतर मराठी संघटनांना त्यात वैचारिक सहभाग करावासा वाटत नाहे हे कुठेतार्व्व मनाला लागते.
    आपण आता श्रीकृष्णावर लिहिण्याचे कबुल केले आहे तर आपण मार्गशीर्षात ते जरूर चालू करावे.
    "मासानाम मार्गशीर्षः " असे स्वतः श्रीकृष्णानी स्वतःचे वर्णन करून ठेवले आहेच !

    आपला नम्र
    दत्ता आगाशे

    ReplyDelete
  7. संजयदादा,
    जातीभेदावरची मालिका अभ्यासपूर्ण आहे .त्याचे एक सर्वाना विकत घेत येईल असे पुस्तक केले तर ते घरोघरी पोहोचेल आणि त्यातून लोकशिक्षण होईल.
    आपल ब्लोग हा एक शाळेचा तास असल्यासारखा असतो.
    सगळ्यात चांगले असे की दिवसभरात कुणाला कसा वेळ जमेल त्याप्रमाणे कुणीकुणी वाचत राहून हा शाळेचा तास २४ तास चालूच असतो.
    आपली भाषा जर समजायला कठीण वाटते तर ती सोपी समजेल अशी करता आली तर सगळ्यांना कळायला सोपे जाईल
    आपल्याला नवीन वर्ष प्रगतीचे जावो आणि आम्हालापण तुमच्याकडून नवीन माहिती वाच्यायला भेटू दे हि इच्छा ! हैप्पी न्यू इयर २०१३ !.

    ReplyDelete
  8. हि संपूर्ण लेखमाला,मराठी सारस्वता चा वयक्तिक माझ्या साठी व जगा साठी सुद्धा कायमचा अनमोल ठेवा आहे .

    ReplyDelete
  9. संजयजी, आपण हळूहळू आपल्यावर टीका करणारे वाढत जातील अशा दिशेने चालला आहात. समाजात आज राजकीय आणि अन्य फायद्यासाठी जे विचार प्रस्थापित आहेत त्याच्या उलट ही दिशा आहे. आपणही सुरुवात प्रस्थापित विचारांपासूनच केली होती. अगदी या लेखांकाच्या सुरुवातीला आपण म्हणता - - - "गेल्या दिडशे वर्षांत जातिसंस्थेच्या उगमाबाबतचे समाजशास्त्रज्ञांचे आकलन वंशवादाच्या व ब्राह्मणी उपपत्तीच्या चुकीच्या आधारावर झाल्याने - - " यातील "दीडशे वर्षे" हा आपला उल्लेख विचार करण्याजोगा आहे. जे आधी नव्हते ते दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले - - म्हणजे ब्रिटिश राज्य आल्यावर काही वर्षांनी. ब्रिटीशांनी स्वत:चे राज्य भक्कम बनवण्यासाठी जे काही केले तेच. हिंदू धर्माला Brahminical Religion" असे त्यांनीच संबोधले. आपल्याला आवडणार नाही पण आज आदरणीय असलेल्या काही महान लोकांची मदत ब्रिटिशांना या कामात झाली. मध्ययुगातील दोष - कुप्रथा जगभर होत्या. बहुतेक देशांनी त्या मोडून काढताना त्या त्या देशाच्या मूळ संस्कृतीबद्दलचा अभिमान मोडीत काढला नाही - उलट त्याभोवती राष्ट्रभावनेची बांधणी केली, उदा. जपान. भारतातील विशिष्ठ व्यवस्थेमुळे (ब्रिटिश सत्ता - त्या शिक्षणपद्धतीतून तयार झालेले विचार, अशा लोकांना मिळणारे सत्ताधारी ब्रिटीशांचे पाठबळ) भारतीय संस्कृतीलाच बदनाम करणे म्हणजे पुरोगामित्व अशी व्याख्या रूढ झाली. आजही हाच विचार प्रस्थापित आहे. ब्रिटिश आणि त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्या विचारवंतांनी भारतीयांना जाती-जातींत फोडण्याचे काम सुरू केले. सर्व जातींना ब्राह्मण या जातीविरुद्ध आणणे, ही या प्रक्रियेची केवळ सुरुवात होती - शेवटी सर्व जातींत एकमेकांविरुद्ध स्पर्धा आणि साशंकता वाढवणे (मुळात ती काही प्रमाणात नैसर्गिकरीत्या असतेच) हे ओघानेच होणार होते. ब्रिटिशांनी जात ही गोष्ट किती अक्कलहुशारीने वापरली ते कोरेगाव भीमाच्या स्तंभांवरून दिसून येते. १८१८ साली जाता-जाता झालेली एक चकमक त्यांनी ब्रिटिशांच्या पूर्वेकडील एका मोठ्या विजयात रूपांतरित करतानाच "ही ऐतिहासिक लढाई" म्हणजे "महारांचा पेशवाईवर विजय" बनवून टाकला. प्रत्यक्ष चकमकीनंतर ३२ वर्षांनी ही कथा रचली गेली - स्तंभ १८५१ साली बनवला गेला. आजही हजारो लोक तिथे जाऊन ब्रिटिशांचा विजय साजरा करतात.

    ReplyDelete
    Replies
    1. "आपल्याला आवडणार नाही पण आज आदरणीय असलेल्या काही महान लोकांची मदत ब्रिटिशांना या कामात झाली."

      फुले शाहू आंबेडकर यांच्यावर अशीच छुपी टीका कायम होत असते. पण ज्या काळात हे सर्वजण बहुजन समाजात जागृती घडवून आणत होते त्या काळात इंग्रजी विद्या शिकून ब्रिटीशांच्या कचेऱ्यातून नोकऱ्या कोण मिळवत होते? ब्रिटीश सरकारच्या अनुदानावर कॉलेज कोण चालवत होते? बहुजन विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष कोण करत होते? ज्या विधवांचे बाळंतपण फुले पती पत्नी करत होते त्या विधवांना उपभोग घेऊन फेकून देणारे कोण होते? याचाही इतिहास लिहिला गेला पाहिजे.
      शाहू महाराजांनी कुळकर्णी वतने बंद केल्यावर ब्रिटीश सरकारकडे न्याय कोण मागत होते ते देखील कळले पाहिजे. या महान भारतीय संस्कृतीने फुले शाहू आणि आंबेडकर या तिघांनाही जीवानिशी संपवण्याचा प्रयत्न कसा केला याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या समोर आल्या पाहिजेत.

      नाना वर्ण गऊआ, उनका एक वर्ण का दूध
      तुम कहां के बम्मन, हम कहां के सूद

      हा अभंग लिहिणाऱ्या संत नामदेवांना ब्रिटीश भडकवायला गेले नव्हते.

      वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।

      हे संत तुकारामांच्या कानात ब्रिटिशांनी सांगितले नव्हते.

      उठसूट प्रत्येक गोष्ट ब्रिटीशांच्या नावावर खपवण्याचे उद्योग यापुढे चालणार नाहीत हे कृपया लक्षात घ्यावे.

      Delete
    2. शाब्बास रे माझ्या वाघा झकास उत्तर दिले.....इंग्रजांच्या राज्यात नोकरी करणारे हेच होते, औरंगजेबाच्या राज्यात नौकरी करणारे हेच होते.....निजामशाहीत पण हेच होते....लांब काय मायावतीच्या राज्यात पण हेच होते....पण बाकीच्या सामाज्याने असे केले कि संस्कृतीचा रऱ्हास , गद्दारी , आणि यांनी केले कि देशसेवा....

      Delete
  10. बघा - नीट विचार करून सांगा बर का !
    लोकहितवादी ,सार्वजनिक काका, न्यायमूर्ती रानडे यांनी राष्ट्रीय राजकारणात - समाजकारणात सक्रीय सहभाग घेतला.
    त्याबरोबरीने महात्मा फुले यांनी मराठी शाळा चालू केल्या आणि बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले.!
    आगरकर टिळक नामजोशी आपटे यांनी राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा चालू केल्या.
    पंचम राजा भारतात येणार ( इ.स. १९११ ) म्हटल्यावर - त्यावेळेस इथले राजे राजवाडे - अगदी छत्रपती .शिवाजी महाराजांचे वंशज ( ? ) सुद्धा ,
    आणि इतर तथाकथित राजघराणी सुद्धा मुजरे करायला गर्दी करत मुंबईला गेले होते.

    माझे असे म्हणणे आहे की जे आत्ता वसवसून इथे जातीचा वाद घालत आहेत -
    त्यांच्या वाड वडीलांनी काय दिवे लावले त्यावेळेस ? किंवा माझ्या वाड वडिलांनी तरी काय तारे तोडले- मग ते ब्राह्मण असोत किंवा बहुजन !
    आहे का कुणी असा कि जो म्हणेल कि हो , माझ्या पणजोबांचा मला अभिमान आहे ,कारण ते या थोर लोकांबरोबर खांद्याला खांदा लाऊन कार्य करत होते.
    असे कुणी सांगेल का की महात्मा फुलेंच्या शाळेत माझे पणजोबा निदान बाकी काही नाहीतरी ,घंटा वाजवायला होते आणि महात्माजी जितक्या समर्पित पणे शाळा चालवायचे
    तितक्याच समर्पित भावनेने ते पणजोबा घंटा वाजवायचे !
    अहो खर सांगू का मनापासून !
    फार फार थोडी माणसे आपल्या पिढीतील थोर माणसांचा थोरपणा ओळखू शकतात.-.लोकोत्तर पणा जाणू शकतात ! तितकेसुद्धा आपल्या पुर्वजाना जमले नसेल तर
    आत्ता जुन्या जाणत्या थोर लोकांच्या पुतळ्यांना हार घालून, उरलेल्या इतर जातींना शिव्या देण्यात काय पुरुषार्थ आहे ? बाकी उरलेले आपण अति सामान्य ठरतो
    त्यानी निदान आतातरी सावध व्हावे - आपल्यापुढे स्व.छ.शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मिरवणाऱ्या आणि ब्रिटीश राज घराण्यापुढे गुढगे टेकणाऱ्या आपल्या आपल्या महाराजांना खरेतर आपण जाब विचारायला पाहिजे होता !
    इंग्रजांनी इंग्रजीत सत्ता राबवणे चालू केल्यावर इंग्रजी शिकणे हे आवश्यकच झाले होते . प्रथम कर्तव्य झाले होते आपले - काही ब्राह्मणानी पुढाकार घेऊन इंग्रजी शिकून घेतले.
    राजाची भाषा शिकणे हे मूर्खपणाचे लक्षण नाही ! त्यापूर्वी बडोद्याला गुजराथी लोक मराठी शिकत,हिंदी प्रांतातील इंदूरला मराठी शाळा होत्या !
    काही ब्राह्मणानी किंवा अजून दुसऱ्या जातीतील कुणी राज्यकर्त्यांची भाषा शिकली तर त्यात चूक काय ?-इंग्रजांची भाषा लवकर लवकर शिकून त्यांच्याशी बरोबरीने वागण्याचा हट्ट धरला तर काय बिघडले ?

    आणि तमाम राजे - महाराजे - पंचम जॉर्ज आला त्यावेळेस त्याच्या पायावर रुजू होण्यास कसे गेले ? त्यांचा दुटप्पीपणा कोण दाखवणार ?

    आधी या ब्राह्मण जातीबद्दल बद्दल इतका आकस जर होता तर त्यांच्या हाती राज्याच्या चाव्या दिल्यातच कशाला.?
    थोरले शाहू महाराज हे विनाकारणच असा निर्णय घेत गेले का ?
    वसईची लढाई जीवावर उदार होऊन कुणी आणि का लढली -
    दिल्लीचे तख्त कुणी आणि का फोडले ?
    ब्राह्मण जातीमध्ये अगदीच हुशारी नव्हती -शौर्य नव्हते का ?
    त्यांना मराठी गादीचा अभिमान नव्हता का ?- का सगळे देशप्रेम आणि स्वामिभक्ती फक्त मराठा समाजाचीच !
    आणि इतके तुम्ही जर स्वामीभक्त - तर स्वामी नी तुम्हाला डावलून त्या भटाना का हो बोलावून बोलावून पेशवाईची वस्त्रे दिली ?
    तात्पर्य असे आहे कि ,
    नवीन विचार आणण्यात ब्राह्मण आणि बहुजन समान पुढाकार घेत होते.
    त्याच प्रमाणे अति पुराणमतवादी वागण्यात सुद्धा दोन्ही जाती समानच होत्या.
    दोन्ही जाती जमातीत हुशार,संयमी , धाडसी,तेजस्वी लोक होते.
    यात वाद नाही.

    ReplyDelete
  11. प्रश्न ब्राह्मण समाजाला झोडपण्याचा नाही. सनातनी मनोवृत्तीला झोडपण्याचा आहे. या दोहोंतील फरक फुले शाहू आणि आंबेडकर या सर्वांनीच स्पष्ट केलेला आहे. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांची बाजू घेणारे कोल्हापुरातील काही अल्पसंख्य ब्राह्मण होते आणि त्यांनाही तेथील ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले होते. पुण्यात आगरकरांची त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. ज्या काळात सवर्ण हिंदू समाज आंबेडकरांना घरात घेण्यास तयार नव्हता तेव्हा त्यांची मदत करणारे काही ब्राह्मण देखील होते.
    पण याचा अर्थ असा नव्हे की समाजस्वास्थ्य बिघडवण्याची सगळी जबाबदारी बहुजन समाजातून निर्माण झालेल्या महापुरुषांवर टाकून ब्राह्मण समाजाला त्यातून मुक्त करता येईल. कोणत्याही एका समाज घटकाला ही जबाबदारी नाकारता येणार नाही. जर तसे होत असेल तर अशी मनोवृत्ती झोडपलीच जाणार आणि अशाच शब्दांत झोडपली जाणार.
    नुसतेच ब्राह्मणांना शिव्या घालत सुटणे हा बहुजनवादाचा आशय कधीही नव्हता आणि असूही नये. पण ब्राह्मणांच्या वाट्याचे खापर जर इतरांवर फोडण्याचा प्रयत्न झाला तर ही सनातनी मनोवृत्ती जपण्यात ब्राह्मण समाजाचाही हातभार कसा लागला आहे हे स्पष्ट करणे आवश्यक ठरते. जोपर्यंत स्वत:च्या चुकांचे खापर इतरांवर फोडण्याची वृत्ती सर्वच जातींमध्ये कायम आहे तोपर्यंत तरी जातीअंत होणे नाही.

    ReplyDelete
  12. करणारे करून गेले
    भोगणारे भोगून गेले.
    कुणी अजूनही दिवाळखोर राज्याचे स्वामी म्हणून मिरवत होते
    तर कुणी विशाल मराठी पेशवाई च्या उरला सुरला उकिरडा फुंकत जीवन जगत होते.
    तर कुणी जुन्या आठवणीना कुरवाळीत बसले होते
    आणि कुणी कुणी अजून जुने दिवस परत येतील म्हणून आस लावून बसले होते !
    साता समुद्राकडून राजा आला कि वाकायचे ,पार अगदी गुढग्यावर बसायचे - टेकून - नजर खाली -हात मागे -
    आणि हे कुणी करायचे ? तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी - का तर एक डौल- एक मिरवणे आणि हो - तनखा !
    इंग्रजांनी फेकलेले काही तुकडे !
    ते चघळत चघळत इथल्या ब्राह्मणांना झोडपायचे ! का तर त्यांनाच हे सगळे भोंगळ प्रकार कळतात न !
    इतर लोक अजून आपल्याला सामोरे येताच लावून मुजरा करतात !

    भो पंचम जॉर्ज -अशी कविताच होती आम्हाला ! आम्ही ओरडून ओरडून गायचो-
    समजा गायलो नसतो तर याच छत्रपतींच्या वंशजाने माझे कान पिळले असते - म्हण म्हणतो ना !-
    अरे ह्या गोऱ्या महाराजापुढे माझी लाज काढणार आहेस का रे ब्राह्मणाच्या पिल्ला !
    तर हा असा सगळा प्रकार आहे ! इंग्रज गेले .महाराज गेले.
    भोयानी पालख्या बदलल्या ! आता - टोप गेले टोप्या आल्या !
    मला आता वाटू लागलाय कि ते गोरे साहेबाच बरे होते - शिस्त होती ,शांती होती ,धास्ती होती.कुणी उगीच आपल भाषणबाजी करायचं नाही.आरडा ओरडा नाही .

    आता जो उठताय तो ओरडतोय कुणाच्यातरी नावान ! नेमका कोण बरोबर नि कोण चूक ते समजताच नाहीये ! नुसताच धुरळा उडतोय !
    आपल कोण नि वैरी कोण ? सगळे आपलेच तर आहेत कि ! मग हे अस हो कस ? आपणच आपले वैरी ?

    ReplyDelete
  13. इंग्रजांनी फेकलेले तुकडे चघळणे हेच शाहू महाराजांचे जीवित कार्य असते तर फुले आणि आंबेडकर यांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले गेले नसते हे कळण्याचा विवेक तरी असायला हवा. ज्यांच्या घरात वीर आणि ब्राह्मण असे दोन चांदीचे टाक पूजले जात होते त्या प्रबोधनकार ठाकरे यांनीही अखेरपर्यंत शाहूंची साथ सोडली नाही. मग प्रबोधनकार हे सुद्धा ब्रिटिशांनी फेकलेले तुकडे चघळत होते असेही लिहिले जाईल. पण त्यात तथ्य किती आहे हे वेगळे सांगायला नको.
    दृष्टीदोष दूर करता येतो. पण जाणून बुजून डोळ्यांना लावलेली झापडे कशी उघडणार?

    ReplyDelete
  14. संजयजी
    एकूण चर्चा पाहिली की एक मात्र खात्री होते - आपल्या लिखाणावर चर्चा चांगलीच रंगते.
    हा आपला मोठ्ठा सन्मान आहे.
    मी माफ करा ,पण स्पष्ट लिहित आहे ,
    अनिता पाटील किंवा अजून श्री खेडेकर यांच्या ब्लोग वर लिहिलेला प्रचारकी मजकूर पाहिला की अतिशय घाण काहीतरी वाचले
    असे वाटून -हातपाय धुवून येउन बसावेसे वाटते .
    आपला ब्लोग अतिशय लोकप्रिय असून तर्क वितर्क , विचार अतिशय उत्तम मांडणी असे सर्वच पद्धतशीर असते ,
    विचार मांडताना मुद्दे मांडण्याचे अगत्य खूप आहे.! बाकी उल्लेख केलेल्या ब्लोग वर अतिशय शिवराळ भाषा असते -!
    आत्तापर्यंत आपण ज्या ज्या वेळेस जात आणि आरक्षण या विषयावर लिहिले आहे त्या त्या वेळेस आपणास उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि इतर तितक्याच महत्वाच्या विषय
    मांडणीच्या वेळेस मात्र हीच वाचक मंडळी भूमिगत होतात हे कसे ?
    पाणी प्रश्न ,चारा प्रश्न, इतिहास ,असे विषय तितकेसे दाद घेत नाहीत.हि विकृती समजावी का हा विषय ज्वलंत आहे असे मानावे तेच समजत नाही.

    ReplyDelete
  15. थांबा आणि ऐका जरा ,
    पण ती स्वरदा म्हणत्ये कि जे राजे राजवाडे मिरवत होते - आणि ब्रिटीश पंचम जॉर्ज पुढे ब्याण्ड च्या मधल्या पेहेरावासारखा पेहेराव घालून उभे राहायचे
    आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजीचे वंशज म्हणून मिरवायचे - हे खोटे आहे का ?
    हे खोटे आहे का ? नेमका प्रश्न आहे - पाल्हाळ न लावता उत्तर द्या.!
    घोड्यावर फक्त शिलागाणाचे सोने आणायला बाहेर पडायचं ! बाकी पुरुषार्थ शून्य !
    मध्येच फुले आणि ठाकरे घुसडण्यात काय मतलब ? एखाद्या व्यक्तीचे समर्थन करताना दुसऱ्याचा आधार घ्यावा ( आणि तो सुद्धा छ.शिवाजीच्या वंशजाला !)- लागतो यातच त्याचा पराभव स्पष्ट होतो !
    एखाद्यावर पांघरूण कशाला घालायचे ?
    तिचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे की त्या काळातले सर्व महाराजे हे पराभूत मनोवृत्तीचे होते.निक्कम्मे आणि मुर्दाड होते.इंग्रजांचे आश्रित आणि उपकृत होते.लाचार होते !
    इंग्रजांनी तनख्याच्या पिशाविवरची गाठ आवळली असती तर यांचा जीव कासावीस झाला असता हे १०० % सत्य आहे !

    १८५७ साली ते काय करत होते यांचे पूर्वज ते तरी सांगा - ते लढले का झाशीच्या राणीच्या बरोबरीने ?
    तात्या टोपे नानासाहेब लढले त्यावेळेस यांचे पूर्वज काय करत होते ?
    हा प्रश्न जातीचा अजिबात नाही !
    प्रश्न आहे इंग्रजांनी त्यांचा सपशेल पराभव केला तरी ते राजे महाराजे म्हणून मिरवत राहिले- लवाजमा बाळगत राहिले - रेसकोर्स वर हिंडत राहिले - पार्ट्या देत राहिले .
    त्यांचा हिंदुस्तान आणि १८५७ च्या क्रांतिकारकांचा हिंदुस्तान -त्यांचा हिंदुस्तान आणि भगतसिंगांचा हिंदुस्तान एक होता का ?
    त्यांच्या घराण्यात एकतरी जीव ओवाळून टाकणारा भगतसिंग कसा नाही निघाला हो ?

    ReplyDelete
  16. सत्तावनीचा एक अघोरी पायंडा ५७ च्या बण्डाळीने हिंदुस्थानात एका अघोरी उपक्रमाचा पायंडा घालून ठेवला आहे. आंग्रेज स्त्री पुरुष नि मुलांचे खून पाडणे आणि त्यांचे सरकारी खजिने लुटणे हा बंडवाल्यांचा राजरोस हेतू, पण त्याहिपेक्षा गावोगावी रयतेची लुटमार, जाळपोळ आणि कत्तली करण्याचे कर्म त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर केले. त्या बंडवाल्यांना धाकात नि शिस्तीत ठेवील असा कोणी नेताच नव्हता. प्रत्येक शिपायी स्वतःलाच एकांडा शिलेदार समजडून वाटोवाट मन चाहील ते उत्पात करीत चालला होता. आंग्रेजांना सहकुटुंब सहपरिवार कण्ठस्नान घालण्याच्या हमरीतुमरीत त्या बंडखोर शिपायांच्या फलटणी, खेड्यापाड्यातल्या रयतेला नागवून हैराण करण्यातच मर्दुमकीची शेखी मिरवीत सैरावैरा भडकत होत्या. दरोडे घालून रयतेची लूटमार करणा-यांना लोकसत्ताक राज्यस्थापनेच्या महत्त्वाकांक्षेचे सर्टिफिकीट देणा-यांच्या लोकशाहीच्या व्याख्या काय असाव्या, हे तेव्हाच उमजण्यासारखे आहे. अर्थात गांजलेल्या रयतेने ‘आंग्रेजी सत्ता बरी, पण ही देशी शिपुरड्यांची नादीरशाही नको.’ अशा वाजवी निर्धाराने आंग्रेजांचा जागोजाग पुरस्कार केला नि त्याना सर्वतोपरी मदत करून सत्तावनी बंडाच्या नांग्या ठेचवल्या. यांत नवल करण्यासारखे काहीहि नाही.
    (प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी - प्रबोधनकार ठाकरे)

    १८५७ च्या बंडात कोणाचे पूर्वज काय करत होते ते यावरून स्पष्ट होईल.

    राहिला प्रश्न शिवाजी महाराजांच्या मुर्दाड वंशजांचा. चिरोल खटल्यात लोकमान्य टिळकांना ऐन वेळी महत्वाचे कागदपत्र गुप्तपणे देऊन याच शिवाजी महाराजांच्या वंशजांनी टिळकांची मदत केली होती. टिळकांच्या मृत्यूची बातमी कळताच याच वंशजांनी समोरचे जेवणाचे ताट दूर करून राजवाड्यावरील झेंडा अर्ध्यावर उतरवला होता. तसेच ब्रिटीशांच्या सरकारमध्ये नोकरी करणाऱ्यांना या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी कधीही मुर्दाड, लाचार ठरवले नव्हते. आम्ही खाल्ले की सोने आणि इतरांनी खाल्ले की शेण ही त्यांची वृत्ती नव्हती.
    देशावर राज्य कोणाचे आहे हा त्यांच्या चिंतेचा विषयच नव्हता. हजारो वर्षांपासून ज्या समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीचे वारेही शिवलेले नाही त्यांना प्रगतीच्या मार्गावर कसे आणायचे हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता. आज त्या सर्वांनाच मुर्दाड लाचार ठरवले जात आहे कारण ते सर्व ब्रिटीश सरकारपुढे झुकत होते म्हणून नव्हे तर ते सनातन्यांपुढे ताठ मानेने उभे राहून त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत होते म्हणून.

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणजे तुमच्या मते झाशीची राणी आणि तात्या टोपे १८५७ ला मूर्ख पणा करत होते .
      चल पुण्यातला दादोजीचा पुतळा हलवला ,आता झाशीच्या राणीला तिच्या घोड्यासकट हलवू. !- असेच ना ?
      तो तर तुमचा आवडता खेळ झाला आहे !
      परत परत मला एक प्रश्न विचारावासा वाटतो !.आपल्या आणि रयतेमाधली दरी नष्ट करीत या तथाकथित छ.शिवाजीच्या रक्ताला (?)
      जनतेत मिसळावेसे का वाटले नाही. राजाला या देशावर राज्य कुणाचे याची चिंता नव्हती ?- या तुमच्या वाक्याचा काय अर्थ ?
      रेसकोर्सवर जायला तनखा भरपूर मिळत होता म्हणून ?
      एक गोष्ट स्पष्ट करते की - प्रबोधनकार ठाकरे कुणी महान विचारवंत वगैरे नव्हते ! त्यांची बुद्धी जातीद्वेशाने - ब्राह्मण द्वेषाने - हीन झालेली होती .
      त्यांच्यापेक्षा यशवंतराव खूपच महान होते.परिपक्व होते.
      बाळ ठाकरे हे सुद्धा कुणी महान नेता वगैरे नव्हते हे आपण नीट समजून घेतले पाहिजे.
      लोकमान्य टिळकानीपण चुका केल्याच नाहीत असे नाही.म.गांधी तर स्वतःच चुका कबुल करत असत .

      अजून एक मत म्हणजे - १८५७ ला महाराष्ट्र आणि दक्षिणेत उठावाला किती प्रतिसाद मिळला ? आणि तसे का झाले ! होळकर , शिंदे,नागपूरचे भोसले कुणाकडून होते ?

      सनातनी हे सर्व समाजाचे शत्रूच असतात.हे सनातन सत्य आहे !.etarnal truth म्हणूया फार तर !
      कुठल्याही धर्मात हा त्रास असतोच - म्हणून आतासुद्धा "शिवधर्म "असे एक फॅड निघाले आहे .त्याबद्दल तर राग तर राहोच ,हसुपण येत नाही.कीव मात्र येते.
      अनिता पाटील म्हणते की चला हिंदुधर्म सोडूया - असला बावळट पणा बोलून दाखवत परत भट ब्राह्मणाना शिव्या देत बसायचे ! एक काहीतरी निवडा - इथेच राहून लढा किंवा निघून गेलात तर इथे कोण काय करताय त्या बद्दल बोलत बसू नका -


      Delete
    2. पुतळे लावून किंवा हलवून कोणतेच प्रश्न सुटत नसतात. समाजाच्या मनावर कोणत्या विचारसरणीचा पगडा आहे हे महत्वाचे असते. ही गोष्ट ज्यांना माहित असते ते स्वत:चे परंपरागत वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी समाजाला धाकात आणि गोंधळात ठेवणाऱ्या विचारांचा प्रसार करतात. ज्यांना हे वर्चस्व मोडीत काढायचे असते ते समाजाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणाऱ्या विचारांचा प्रसार करतात.
      ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला "रयतेचा राजा" असे का म्हणतात हे बहुधा आपणास माहित नसावे. ज्यांनी आंबेडकरांना आर्थिक सहाय्य केले, दलित व्यक्तीच्या उपहारगृहात स्वत: जाऊन इतर समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास हातभार लावला, ज्यांनी ह्या देशात प्रथमच सर्व मागास जातींसाठी ५०% आरक्षण लागू केले, संस्थाने आणि संस्थानिक यांचे अस्तित्व विलीन होऊन जनतेकडे सत्ता जाणार आहे ही जाणीव ज्यांना सर्वप्रथम झाली होती आणि त्यासाठीच ज्यांचे प्रयत्न चालू होते, त्यांना रयतेमध्ये मिसळण्याची इच्छा नव्हती हा प्रचंड मोठा विनोद आहे.
      ज्यांच्या घरात ब्राह्मण पुजला जात होता, ज्यांचे जवळचे मित्र ब्राह्मण समाजातील होते आणि गांधी हत्येनंतरच्या दंगलीत दादरच्या हिंदू कॉलनीत राहणाऱ्या ब्राह्मणांच्या कुटुंबाचे ज्यांनी एकट्याच्या जीवावर संरक्षण केले होते त्या प्रबोधनकार ठाकरेंना ब्राह्मण द्वेषी ठरवणे हा अजूनच मोठा विनोद आहे.
      महान विचारवंत कोण आहे आणि बुद्धी कोणाची हीन झाली आहे ते वेगळे सांगायची गरज नाही. वाचकांना आपोआप कळेलच.

      Delete
  17. ब्रिटिशांना ज्यांची मदत झाली अशा आज आदरणीय असलेल्या काही महान लोकांबद्दलचा विद्रोही भारतीय ने केलेला उल्लेख Annonymus पैकी एका भावाने / बहिणीने “फुले शाहू आंबेडकर” यांच्यापर्यंत पोचवला आहे. पुढे त्यातूनच जातवादी टीका केलेली आहे. दुसऱ्या Annonymus ने ही तेच केले आहे. प्रत्यक्षात विद्रोही भारतीय ला व्यक्तिकेंद्रित किंवा जातकेंद्रित चर्चेकडे जायचे नाही. आपण शंभर – दीडशे वर्षांपूर्वीच्या लोकांकडे वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाही. माणसे सिनेमातील पात्रांसारखी पूर्ण सत्यवादी-सज्जन किंवा पूर्ण खोटी-हलकट नसतात हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या महात्म्यांची ब्रिटिशांना सत्ता पक्की करायला मदत झाली त्यांनी “ब्रिटिशांना मदत करणे” हे स्वत:चे जीवितकार्य म्हणून पत्करले होते असा त्याचा अर्थ नाही. त्यांनी त्यांच्यामते चांगली कामे करण्याचाच प्रयत्न केला असावा. त्यांच्याकडून समाजाला दिशा देणारी चांगली कामे जशी झाली तशीच कळत-नकळत ब्रिटिशांना मदतही झाली हे तेवढेच खरे आहे. तीही माणसेच होती. त्यामुळे राग-लोभ, प्रेम-मत्सर, मान-अपमान, व्यवहारीपणा हे Trigger त्यांच्याबाबतीतही होते; कधी कौटुंबिक पार्श्वभूमी होती. हे त्या काळातील निरनिराळ्या महान लोकांच्या चरित्रांचा अभ्यास करताना दिसेल. (कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे नाव घ्या – त्याने केलेली पुष्कळ चांगली कामे दाखवता येतील, तसेच चुकीची / वाईट कामेही दाखवता येतील) त्यासाठी त्या लोकांना दोष देण्यापेक्षा - त्यामुळे समाजाला जी जातकेंद्रित दृष्टी मिळाली ती दुरुस्त करणे जास्त महत्वाचे आहे. संजयजींच्या या लेखावर ज्या प्रतिक्रिया दिसतात त्यातही ही जातकेंद्रित दृष्टी दिसते – पहिल्या Annonymus प्रतिक्रियेत दिसते त्याप्रमाणे “जातिनिर्मूलन” म्हणजे आरक्षणावर होणारा हल्ला म्हणूनही पाहिले जाते. राजकारणी लोक “जातिनिर्मूलन” म्हणजे मतदानाच्या गणिताला संभाव्य धोका म्हणून पाहतात. पण बऱ्याच लोकांकडे अशी काहीच कारणे नसतात. मग ते जातीनिरपेक्ष विचार का करू शकत नाहीत? याचे उत्तर Conditioning मध्ये आहे. जो सामाजिक विचार आज प्रस्थापित आहे त्या विचारामध्ये एखाद्या जातीला (लक्षात घ्या, व्यक्तीला नव्हे) दोष देणे सर्वमान्य मानले जाते, त्या विचारांवर आजची पिढी पोसली गेली आहे. तसे करताना आपण काहीतरी पुरोगामी विचार मांडतो आहोत – समतेचे सैनिक बनलो आहोत असे समजले जाते. आफ्रिकेत टोळ्यांमध्ये द्वेषाचे वातावरण असते, तसे महाराष्ट्रात जातींमध्ये तयार होत आहे – तेही पुरोगामित्वाच्या किंवा समतेच्या नावाखाली. जातिभेदाचा – उच्चनीचतेचा तिरस्कार करण्याऐवजी अन्य जातींचा तिरस्कार केला जात आहे.

    ReplyDelete
  18. कोणत्याही एकाच जातीला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही याची जाणीव सर्वांनाच आहे. पण खरा प्रश्न "ब्रिटीश ह्या देशातून गेल्यावर आमचे काय होणार? सत्तेचे वाटप कसे होणार?" हा होता. हा प्रश्न जसा मुस्लिम लीगला पडला होता तसाच तो मागास जातींनाही पडला होता. विशेषत: ज्या जातींना शेकडो वर्षांत सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधित्व नाकारले गेले होते त्या सर्वांच्या मनात हीच भीती होती. त्यातही नुकताच पेशवाईचा अनुभव घेतल्याने त्या काळी सामाजिक आणि राजकीय नेतृत्व करणाऱ्या जातींबद्दल, त्यांच्या हेतूंबद्दल इतर समाजाच्या मनात संशय असेल तर तो पूर्णपणे चूक होता असे म्हणता येत नाही.
    ज्याप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिम लीगला ब्रिटीश सरकारपासून फोडण्यासाठी लखनौ करार केला तसा एखादा करार किंवा कमीत कमी तोंडी संवाद तरी त्या पुढारलेल्या नेत्यांनी स्वत:च्या देशातील सर्व सामान्य जनतेशी साधणे आवश्यक होते. पण तसा कोणताही प्रयत्न त्यांच्याकडून झाला नाही. मग त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर जातींमधून नेतृव तयार होऊन त्यांनी स्वत:च्या जातीचे हित साधण्यासाठी ब्रिटीश सरकार बरोबर वाटाघाटी केल्या तर नवल काय? गांधीजींच्या एका हाकेवर सारा देश ढवळून निघतो आणि त्यांच्या आधीच्या नेत्यांना हे जमत नाही याचा अर्थ एकच आहे. या खेडोपाडी पसरलेल्या सर्व सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची आमच्या तथाकथित राष्ट्रीय नेत्यांची इच्छाच नव्हती.
    ह्या देशात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे. शतकानुशतके हीच व्यवस्था इथे होती. त्यातूनच परस्परांविषयी संशय बाळगण्याची सवय बळावत गेली आणि त्या सवयीचा आता भस्मासुर झाला आहे. स्वत:चे अस्तित्व स्वत:च्या राष्ट्राशी न जोडता जातीशी जोडले जात आहे. जातींचा अंत झाला तर आपले अस्तित्व शिल्लक राहणार नाही ही सुप्त भीती प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच आधुनिक वळणाच्या लोकशाहीमध्ये एक राष्ट्र म्हणून कसे जगायचे हे आता सतत मांडत राहावे लागणार आहे.

    ReplyDelete
  19. संजयजी
    काही ठराविक लोकांना कुठलाही संवाद ब्राह्मण द्वेष पर्यंत नेल्याशिवाय त्यांचा आत्मा शांत होत नाही.
    संजयजी सारख्या तर्कशुद्ध पद्धतीने विचार मांडणाऱ्यांचे वाचक मात्र अजून अशा वर्णद्वेषी पद्धतीने विचार करत असतील तर ?
    त्यातल्यात्यात रियल विद्रोही ने संतुलित आत्मपरीक्षण वजा लिखाण केले आहे.
    असे दिसते स्पष्टपणे कि आपला वाचकवर्ग ब्राह्मण आणि इतर असा दुभागाला गेला आहे.तुम्हाला मानणारा ब्राह्मणवर्ग
    तयार होतो आहे हा तुमच्या सततच्या संयत वृत्तीचा परिपाक आहे.तुम्ही घेतलेल्या अभ्यासू मांडणीचा हा विजय म्हटलेतरी ते अयोग्य
    धरले जाणार नाही,हे तुमचे मोट्ठे यश आहे !
    पण त्याच वेळी तुम्ही ब्राह्मणेतर वर्गाला आत्म परीक्षण करायला शिकवण्यात कमी पडत आहात असे दिसते !
    त्यांच्यातल्या स्वार्थापोटी कुणीतरी पेटवलेल्या ब्राह्मण द्वेषाला विवेकाचा लगाम घालून त्यांना नीरक्षीर बुद्धीने विचार करायला शिकवण्याचे
    महाप्रचंड आणि कर्मकठीण कार्य आपण आता अर्धवट सोडून देऊ शकत नाही हे इथे नमूद करावेसे वाटते.
    मुल्भ्होत संस्कारांपेक्षाही अशा मानसिक दुरुस्त्या अवघड मानल्या जातात.
    त्यात आपल्याला नवीन वर्षापासून यश चिंतिते !
    शुभम भवतु.

    ReplyDelete
  20. Annonymus - आपण म्हणता त्याप्रमाणे "ब्रिटीश ह्या देशातून गेल्यावर आमचे काय होणार? सत्तेचे वाटप कसे होणार?" हा होता. हा प्रश्न जसा मुस्लिम लीगला पडला होता तसाच तो मागास जातींनाही पडला होता. - - - - अगदी बरोबर. पण असे लोकांना का वाटले असावे? खरे म्हणजे ब्रिटिश आल्यावर काही वर्षांनी या प्रकारचा प्रचार सुरू झाला. आपण म्हणता - “त्या पुढारलेल्या नेत्यांनी स्वत:च्या देशातील सर्व सामान्य जनतेशी साधणे आवश्यक होते”. आपण तेव्हाची परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हा लोकशाही नव्हती – तसेच ब्रिटीशांना गैरसोयीचे मत असलेल्या व्यक्तीला आपले म्हणणे समाजापर्यंत पोचवण्याची साधने उपलब्ध नव्हती. ब्रिटिशांना विरोध असल्याची नुसती शंका जरी आली तरी अशा व्यक्तीला गोळी घालणे किंवा फासावर देणे ही साधने ब्रिटिशांना अगदी सहज उपलब्ध होती. त्यामुळे “ब्रिटिशांच्या बाजूचे” या एकाच प्रकारचे लोक समाजाचे नेतृत्व करू शकत होते. म्हणून अनेकांनी ब्रिटिशांना राजकीय विरोध न करता समाजकार्याचा रस्ता निवडला असावा. म्हणजे ब्रिटिश प्रचाराला विरोध करणे कोणालाच शक्य नव्हते. १८५० च्या दरम्याने नव्याने सुरू झालेल्या स्त्रियांच्या एका शाळेतील एका मुलीने लिहिलेला निबंध पुढे संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे, त्यात ही मुलगी लिहिते – देवा, तू फार चांगले केले आहेस आम्हांला पेशवाईपासून वाचवायला तू ब्रिटिशांना पाठवलेस. – १८१८ मध्ये बुडालेली पेशवाई या मुलीने स्वत: पाहिलेली नसणार हे नक्कीच. १८५१ मध्ये कोरेगाव भीमा येथे स्तंभ उभारून १८१८ मधील एका चकमकीचे Fabricated Version दाखवून दोन जातींमधील लढाईचे स्वरूप ब्रिटिशांनी कसे दिले हे उदाहरण आहेच. ब्रिटिशांनी अनेक स्थानिक राजे – सरदार यांना तनख्यावरील संस्थानिक म्हणून ठेवले होते, पेशव्यांना मात्र दूर पाठवले – म्हणजेच त्यांना पेशव्यांबद्दल असुरक्षित वाटत होते. मराठा घराण्यांची सातारा, कोल्हापूर, बडोदा, नागपूर, इंदूर यांशिवाय अनेक छोटी संस्थाने ब्रिटीशांनी चालू ठेवली. पेशव्यांचे राज्य ब्राह्मणांचे – म्हणून अन्यायी, म्हणून ब्रिटिशांनी घालवले, मग सांगली – मिरज – इचलकरंजी – जमखंडी – नरगुंद - औंध हे ब्राह्मण संस्थानिक का ठेवले? साधे कारण आहे, ब्रिटिशांना पेशव्यांची खात्री नव्हती. ब्रिटिशांनी जे मनावर बिंबवले तेच आपणही पुढे म्हणता की "नुकताच पेशवाईचा अनुभव घेतल्याने" - - पण हे उत्तर नक्की बरोबर आहे का? साधारण इ.स. बाराशे पासून म्हणजेच पाच-सहाशे वर्षे महाराष्ट्रात इस्लामी राज्य होते. शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य फारतर दीडशे - पावणेदोनशे वर्षे होते. त्यापैकी शंभर वर्षे पेशवाई. स्वराज्य आणि पेशवाई यांचे संपूर्ण महाराष्ट्रावर कधीही नियंत्रण नव्हते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इस्लामपूर्व काळापासून स्थानिक राज्य नेहेमी स्थानिक क्षत्रपांच्या हातात होते. इस्लाम आल्यावरही याच लोकांनी दिल्ली / देवगिरी (दौलताबाद) / बिदर / विजापूर / अहमदनगर च्या सुलतानांना मुजरे घालून आपापले स्थानिक राज्य चालू ठेवले. शिवाजीमहाराजांनी १६५० दरम्याने वतनदारी काढून घेणे सुरू केले, मात्र त्यांना सतत विरोध करून, पुढे संभाजीराजांना पकडून देऊन – राजाराममहाराजांवर दबाव आणून इ.स. १७०० पर्यंत वतनदारांनी वतने परत मिळवली होती. त्यामुळे स्थानिक राज्य नेहेमीच पाटील – देशमुख यांचेच होते, गावात अंतिम शब्द त्यांचाच होता. कारभारी-कुलकर्णी असलेले ब्राह्मण त्यांच्या जोडीने असत, पण नोकर म्हणून. त्याशिवाय अन्य जातींचे लोकही वतनदार असत. महात्मा फुले यांचे पणजोबा साताऱ्याजवळील कटगुणचे वतनदार चौगुले होते. वतनदारांची सर्व जातींच्या लोकांवर सत्ता होती, त्यांच्या मेहेरबानीचा लाभ घेणारे किंवा भरडले जाणारे लोकही सर्व जातींचे असत. ब्राह्मणांना दान-धर्म केल्यामुळे पेशवाई वाईट असा एक समज आपल्या ब्रिटिशकालीन विचारवंतांनी करून दिला आहे. “रमणा” हा शब्द त्यासाठीच Coin करण्यात आला. पण दानधर्म एकतर सर्वच राजे करत असत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यापेक्षा पेशवे अधिक दानशूर म्हणून ओळखले जात नाहीत. दुसरे म्हणजे दानधर्म फक्त ब्राह्मणांवर केला जाई हा एक गैरसमज आहे. एखादे मंदिर – नदीवरील घाट बांधताना अनेक प्रकारच्या लोकांना काम मिळे, अशा बांधकामांमधील खास कौशल्य असणारे लोक त्यामुळेच पुढच्या पिढीला तयार करत आले. मंदिराच्या व्यवस्थेसाठी ज्या जमिनी दिल्या जात, त्या ब्राह्मणांखेरीज फुले पुरवणारे – धान्य, दूध, तूप वगैरे पुरवणारे अशा अनेक लोकांना दिल्या जात.
    थोडक्यात म्हणजे, त्या काळच्या नेत्यांनी जे सांगितले ते कोणत्या परिस्थितीत सांगितले हे लक्षात घेतले पाहिजे – उपलब्ध माहितीचा उपयोग करून घेतला पाहिजे, समाजाला जातिआधारित द्वेषातून बाहेर काढले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या व्यक्तिगत गुणा-अवगुणांवरून पारखायला शिकले पाहिजे – जातीवरून नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. पेशवाईचा उल्लेख केला म्हणून सर्व चुकांचे खापर ब्राह्मणांच्या डोक्यावर फोडण्याचा हेतू अजिबात नाही. पेशवाई ब्राह्मणांची होती म्हणून तिच्याविषयी जनतेमध्ये संताप नव्हता. पेशव्यांच्या राज्यात ज्या प्रकारचे धार्मिक आणि सामाजिक निर्णय घेतले गेले त्याचा या गोष्टीत महत्वाचा वाटा होता. कायस्थ प्रभुंपासून ते महारांपर्यंत सर्वच जातींना हे भोगावे लागले. थोरले बाजीराव आणि काही प्रमाणात थोरले माधवराव सोडले तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने पेशवाईला पोखरले होते हे स्पष्ट दिसते. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीविषयी तर स्वत: सावरकरांनीच टीका केलेली आहे. म्हणूनच पेशवाई संपल्यावर पुण्यातील ब्राह्मणांनी देखील नि:श्वास टाकला.
      राज्यकर्ते हे जनतेचे संरक्षण करू शकतात आणि त्यांना जनतेची काळजी आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. शिवाजी महाराजांचे राज्य टिकवण्यासाठी जनता शेवटपर्यंत लढते आणि पेशवाई टिकवण्यासाठी मात्र तेवढा उत्साह दाखवत नाही याचे हेच कारण आहे. संभाजी महाराजांचा अंत्यविधी महारवाड्यात झाला तेव्हा तेथील स्त्रियांनाही "आमचा राजा गेला" ह्याचे दु:ख वाटत होते. शाहू महाराज निवर्तल्यानंतर आंबेडकर यांनीही हीच भावना व्यक्त केली होती. पेशवाई संपल्यावर असे दु:ख जनतेला वाटलेले दिसत नाही. याचा अर्थ असा नव्हे की इतर सर्व निर्दोष होते आणि पेशवे एकटेच दोषी होते. छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूर आणि सातारा अशी दुफळी माजली होती. रयतेला कोणी वाली राहिला नाही ही भावना पेशवाईच्या उतरत्या काळात जनतेमध्ये खोलवर पसरली होती. त्यातूनच पुढचा इतिहास घडला आहे.

      Delete
    2. राष्ट्रीय काँग्रेस ही १८८४ मध्ये स्थापन झाली तेव्हापासून ते टिळकांचा उदय होईपर्यंत ब्रिटीश झोपलेले नव्हते. काँग्रेसचे अंतिम उद्दिष्ट काय आहे हे न कळण्याइतके ब्रिटीश निश्चितच भोळे नव्हते. टिळकांनी दोन दोन वृत्तपत्रे काढली. अनेक चळवळी उभ्या केल्या. त्याबद्दल ब्रिटीशानी त्यांच्यावर खटले चालवले पण त्यांना गोळ्या निश्चितच घातल्या नाहीत. पण त्या सर्वांची मर्यादा प्रामुख्याने शहरी भागापर्यंतच होती. नेमका त्याच वेळी कोल्हापुरात वेदोक्त आणि पुराणोक्त वाद सुरु झाला. त्यात केसरी आणि इतर प्रमुख वृत्तपत्रांनी उघडपणे शाहूंवर टीका सुरु केली. शेवटी या वादाला इंग्रजांच्या दरबारी नेण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली.
      राष्ट्राचे पुढारीपण करणाऱ्यांनी स्वत:चे धार्मिक वर्चस्व राखण्यासाठी एक स्थानिक वाद इंग्रजांपर्यंत घेऊन जावा ह्यातच त्यांच्या राष्ट्रीयतेची पाळेमुळे स्पष्ट होतात. "अस्पृश्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले तर आम्ही त्यांच्या सोबत भोजन करू", हे आमच्या राष्ट्रीय पुढाऱ्यांचे विचार. ते सुद्धा अशा काळात जेव्हा शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील हे व्यक्तिश: समाजोद्धाराच्या कार्यात गुंतलेले होते. अशा वेळी "चंपारण्य सत्याग्रहापासून" स्वत:चे अस्तित्व दाखवून देणारे, भारत हा सात लाख खेड्यांचा देश आहे हे सत्य काँग्रेसच्या व्यासपीठावरून जाहीरपणे मांडणारे गांधीजी सामान्य जनतेला आपले उद्धारकर्ते वाटले यात आश्चर्य नाही.
      राज्यसत्ता शस्त्रांच्या आणि जातीच्या जोरावर नाही तर सर्व सामान्य जनतेच्या निष्ठेवर अवलंबून असते हे उघड सत्य आहे. पण हे सत्य "पेशव्यांचा मुख्य प्रधान" अशी सही करणाऱ्या क्रांतिवीर फड्केंपासून ते "मराठ्यांची मते मराठ्यांनाच मिळाली पाहिजेत" असा प्रचार करणाऱ्या जाधवांपर्यंत आणि "कुणब्यांना विधिमंडळात येउन काय नांगर हाकायचा आहे, वाण्याला काय तराजू पकडायचा आहे?" असे जाहीर भाषणात बोलणाऱ्या टिळकांसारख्या लोकांपर्यंत कोणालाच फारसे उमगले नव्हते. हे देखील कटू सत्य आहे.
      इंग्रजांनी निर्माण केलेल्या राजकीय व्यवस्थेला समर्थ पर्याय उभा करून पद्धतशीरपणे सामान्य जनतेच्या निष्ठा वळवून घेणे यातच इंग्रजांचा पराभव आहे हे सत्य ज्यांना कळले ते आजही जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या विरुद्ध इंग्रजांनी कितीही प्रचार केला तरी त्यांचे स्थान डळमळीत झाले नाही. आपले उद्धारकर्ते कोण आहेत हे कळण्याइतके शहाणपण जनतेमध्ये नक्कीच आहे.

      Delete
  21. १. सेनापती म्हणून बालाजी विश्वनाथला नेमले आणि पेशवा ह्या पदाला महत्व त्याच्या कर्तुत्वाने प्राप्त झाले.
    २. हळू हळू राज्याची सूत्रे पेशव्याच्या हातात गेली.....नंतर शाहू महाराज पण काही करू शकले नसावेत.
    ३. होळकर आणि शिंदे यांचे कधीच पेश्व्याशी मनापासून जमले नाही कारण पेशव्यांचे असलेले ब्राह्मण प्रेम आणि जातीवाद.....होल्काराना आणि शिंद्यांना कमी लेखने.
    ४. ज्या राज्यात तुमच्या गळ्यात लोटके आणि मागे झाडू बांधला जातो त्या राज्यावर दलितांनी प्रेम करावे अशी अपेक्श्या इथल्या एका देशप्रेमी विचारवंताने केली आहे.....
    ५. पेशव्यांनी अगोदर तैनाती फौज स्वीकारली शिंद्यांनी आणि होळकरांनी नाही......१८१८ नंतर सुद्धा होळकर लढत होते......
    ६. पेशव्याची सत्ता म्हणजे काही देश नवता......
    ७. छत्रपतींचे वाव्शाज सत्तेतून बाहेर पडले होते
    ८. सर्वात जास्त फायदा इंग्रजांचा जर कोणी करून घेतला तर तो ब्राह्मणांनी हे ब्राह्मण लोक का नाकारतात हेच काळात नाही....
    ९. ज्यांना माणसासारखे पहिल्यांदाच वागवले, कायद्याचे राज्य आणि शिक्षण दिले...त्यांच्यावर दलितांनी प्रेम केले तर काय चुकले?
    १०. शाहू महाराज इंग्रज विरुद्ध लढले नाहीत कारण इंग्रजांच्या हातून काढून सत्ता ब्राह्मणांच्या हातात द्यायाच्ही नवती....
    ११. टिळकांचे अथणी येथील सभेतील वाक्य - कुन्ब्यानि विधानसभेत जावून काय नांगर वोधायाचा आहे का? वाण्यानी विधानसभेत जावून काय पुड्या बांधायच्या आहेत का? हे वाक्य त्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची मानसिकता सांगते.
    १२. एकदा मांडलिकत्व स्वीकार्ल्य्वर पेशव्यान्चे वाव्शाज काय किवा शिवाजी महाराजांचे वंशज काय , काय फरक पडतो....
    १३. शिवाजी राज्यांच्या वाव्शाजनी कमीत कमी लोकांची आणि समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला,,,,,उद. सयाजीराव गैकावाड , शाहू महाराज....

    ReplyDelete
  22. मित्रहो, आपण सर्वांनी या लेखावर व्यापक व विचारपुर्वक चर्चा केली व त्याला जातिद्वेषाचे स्वरुप शक्यतो येवू दिले नाही याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो. गतकालाचा विचार करतांना आपण त्याकडे ब्राह्मण व ब्राह्मणेतर दृष्टीकोनातून पाहत विश्लेशन करण्याचा प्रयत्न करत असतो. या भिन्न दृष्टीकोनांमुळे आपले आकलन व विश्लेशनही भिन्नच राहणार यात शंका नाही. पत्येक बाजू आपापल्या बाजुला भक्कम करण्यासाठी आपापले तर्क व पुरावेही देणार हेही स्वाभाविक आहे. पण त्यातून आपल्या हाती निखळ सत्य लागणार आहे काय हाही एक प्रश्नच आहे. आपण काल-संदर्भ चौकटींचा विचार न करता गतकाळाकडे पहात अन्वेषन करू लागलो तर कदाचित आपल्या हाती सत्य लागण्याची शक्यता नाही. ब्रिटिशकाळ हा भारतियांच्या दृष्टीने दिग्भ्रमित करणारा काळ होता कारण राष्ट्र, स्वातंत्र्य आणि समता या संकल्पना मुळात भारतियांना नवीनच होत्या असे नाईलाजाने म्हनावे लागते. त्याचा गैरफायदा वा फायदा इंग्रजांनी घेतला असेल तर त्यांना दोष देता येत नाही. आणी संभ्रमित समाजाला आपल्याला नेमके काय हवे आहे, कोणती व्यवस्था हवी आहे याचे ज्ञान व भान नसेल तर समाजालाही दोष देता येत नाही. लोकांना हवी होती म्हणुन आपण आज लोकशाहीत आहोत हाही आपला एक भ्रमच आहे...कारण लोकांना लोकशाही हवी होती हा आपला तर्क आहे, वस्तव नाही. खरे तर आपल्याला नेमके काय हवे आहे हे सर्वसामान्यांना माहितच नव्हते. त्यामुळे कोण ब्रिटिशांच्या बाजुने होते व कोण नव्हते यावर आपण जर अन्वयार्थ काढायचा प्रयत्न करु तर तो चुकीचाच ठरेल. एकार्थाने लोकशाही लोकांवर लादलीच गेली. कारण ती हवी असा लोकांचा नव्हे तर स्वातंत्र्य चळवळीतील काही लोकांचा आग्रह होता. त्यांचा आग्रह विचार करुन लोकांनी पाळला असता, केवळ महान नेते सांगताहेत म्हणुन पाळला नसता तर आपल्या आजच्या लोकशाहीचे धिंडवडे निघाले नसते. मुस्लिमांच्या व सनातन्यांच्या गुलामीत राहिलेल्या भारतियांना इंग्रजांची गुलामी अधिक श्रेय:स्कर वाटली असेल तर लोकांनाही दोष देता येत नाही. आपापल्या मर्यादांत ज्याही लोकांनी लोकांचा विचार केला, मग तो राजकीय असो कि सामाजिक असो, लोकशाहीवादी असो कि अलोकशाहीवादी असो, त्यांना दोष देण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? आपल्याला फक्त निरपेक्ष विश्लेषन करण्याचा अधिकार आहे. आणि तेवढाच अधिकार आपण पाळुयात. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातुन आपल्याला सत्य मिळणार नाही आणि पुढची दिशाही दिसनार नाही. वर्चस्वतावाद, मग तो कोणत्याही समाजघटकाचा असो त्याज्ज्य आणि निंदनीयच असला पाहिजे. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. पण एखाद्याच्या विचारांचा विरोध केला आणि तो जर ब्राह्मण असला तर कथित ब्राह्मणवादी खवळतात व अतार्किक समर्थने देवू लागतात आणि जर बहुजनवादी विचारकां/नेत्यांबद्दल विरोधाचा उद्गार निघाला तर कथित बहुजनही ब्राह्मणवाद्यांवर तुटुन पडतात. त्यासाठी कसलेही तर्क पुरतात. पण मुळात ब्राह्मण आणि बहुजन ही सामाजिक विभागणी अशास्त्रीय आणि म्हणुन अन्न्याय्य आहे हे आपण कधी लक्षात घेणार? ब्राह्मणांचे तसे ब्राह्मण असने हे इतिहासकालातच संपले आहे व बहुजनांचे बहुजन असणेही! आपण मात्र विरोधासाठी विरोध वा वर्चस्वतावादी मनोभुमिकेतुन कोणतीतरी एक भुमिका घेत जातो. ब्राह्मणवादाला जीवंत ठेवनारे कथित ब्राह्मण नव्हेत तर बहुजनवादी आहेत आणि तसेच उलटेही आहे...आणि दोन्ही विभागण्या समाजशास्त्रीय दृष्ट्याही अनैसर्गिक आणि अशास्त्रीय आहेत हे आपण कधी लक्षात घेणार? प्रत्येक समाज जेंव्हा आपापल्या जातींतील व्यक्तींना योग्यतेपेक्षा मोठा करु लागतो त्यामागचे एकमेव कारण असते व ते म्हणजे प्रतिकारार्थ प्रतीकनिर्माण. प्रतीके खरीच असतात असे नाही. पण मग संघर्ष सुरु होतो तो तुमचे प्रतीक मोठे कि आमचे यात. आणि आम्ही आज त्यातुनच चाललो आहोत. याचा खेद आपल्याला वाटायला हवा.

    ReplyDelete
  23. EVERYONE LIVES ON ILLUSSIONS

    ReplyDelete
  24. संजय सोनवणी यांस,
    आपल्या शेवटच्या समारोपात्मक वैचारिक आवर्तनातून अतिशय उत्कट शक्यतांची मालिकाच हाती लागल्याचा भास होतो.
    -मानवी मेंदू हा अनेक शक्यतांचा एक स्त्रोत आहे.
    'मी कोण'- कोहम -चा शोध घेताना आणि अनेक शक्याशक्यताना स्पर्श करत हे जीवनाचे कोडे उलगडत जात असताना,
    एका भावरचनेचा अर्थ कळत आला असताना दुसरीच व्यथा आपल्यापुढे उभी ठाकते - नवीन श्रद्धा आणि नवीन जाणीवांना जन्म देत आपले मन त्या सर्व खेळाला स्वनियंत्रित यम नियमांच्या चौकटीत बंदिस्त करायला बघत असते.
    मुक्तविचार आणि त्याला कुठल्यातरी चौकटीत बंदिस्त करायची घाई हि मनुष्य स्वभावाची सवय आश्चर्यकारकच म्हणावी लागेल !

    माणसाने सोपे सरळ जीवन तंत्र शोधण्यासाठी कंबर कसली आहे हे मात्र निर्विवाद !

    आधुनिक शिक्षण,आणि शहरी संमिश्र जीवनमान यामुळे जातीभेद आणि धर्म याच्या व्याख्याच नष्ट करत माणसाने
    बऱ्याच अंशाने सनातनी विचार धर्म आणि जातीभेद सौम्य आणि निष्प्रभ केले आहेत.याची मी साक्षीदार आहे.

    वेगवान जीवनमान आणि त्यासाठी फक्त मूलभूत मानवतावादी तत्वांचा केलेला पुरस्कार
    यामुळे एक सर्वसमावेशक जीवनशैली आपोआप शहरी संस्कृतीची तोंड ओळख बनली आहे.
    महानगरातून मध्यम आणि कनिष्ठ वर्गातून याची प्रचीती येते.
    या नवीन जीवन निष्ठाना डावलून - याला आता कोणताही स्वामी वा महाराज उलटे वळण देऊ शकणार नाही .

    धोका एकच वाटतो - ज्यांना यश ,संपत्ती मिळत जाते - यांना हे ईश्वरी वरदान वाटून ते जर बिनडोकपणे भांबावल्या प्रमाणे
    कर्मकांडाच्या मागे लागतील तर त्यावेळेस ते नवीन विनाशाची मुहूर्तमेढच रोवतील.हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
    आज जातीपाती नष्ट होत जात असतानाच अंधश्रद्धांच्या रूपाने एक नवीन भूत आपल्या मानेवर बसायची भीती निर्माण झाली आहे.
    धर्म आणि जातींचा पगडा कमी कमी होत जाताना - जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा समजावून घेण्याची ताकद
    जर आपण घालवून बसलो तर आपण अंधश्रद्धांच्या मागे फरफटत जायची भीती जास्त बळावत जाते.

    ReplyDelete
  25. सर
    आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले आहे की विठ्ठल हा विष्णुरूप नसून,
    शिवरूप आहे.साधारणपणे अशा प्रकारचा आपला आशय आहे.
    आता समजा कुणीतरी ब्रिटीश लेखकाने जर सुरुवात केली -
    शिव छत्रपतींचे खरे वडील अमुक तमुक आहेत आणि सर्व मराठे रास्तपणे पेटून उठले ,
    त्या प्रकाराशी आपण हे आपले वागणे जुळवून बघा.

    वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला ज्या रुपात पूजले आहे त्या रूपातच त्यांना तो आनंद घेऊ दे !
    जर दादोजीला शिवाजीचा बाप ठरवणे हे पाप असेल तर,
    आपणही पाप करत आहात .वारकरी तुमच्या कडे दुर्लक्ष तरी करतील किंवा
    तुम्हाला क्षमा तरी करतील तरीही तुमचे पाप दुर्लक्षिले जाऊ शकत नाही.
    आपण सर्व वाचकांची क्षमा मागितली पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. विठ्ठला बद्दलच्या नव संशोधित लिखाणाचे अजिबात समर्थन करता येणार नाही. हे संशोधन नाही तर आपले अगोदरच ठरविलेले विचार आणि त्यासाठी पुरावे गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, बस्स. अशा लेखनास स्वीकृती मिळणे महा अवघड आहे.

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...