Wednesday, May 6, 2015

राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!

बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकातील काही विधानांबद्दल सध्या वादळ सुरु आहे. तसे हे वादळ आजचे नाही. गेली काही वर्ष ते अधुन मधुन डोके काढत सुरु आहे. पुरंदरेंना राज्य शासनाने "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार दिल्याने हे वादळ आता तांडवात बदलण्याची शक्यता आहे. हा पुरस्कार शिवद्रोह्याला दिला जातो आहे असा प्रमुख आक्षेप असुन त्यासाठी त्यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मानली जाणारी विधाने/पुस्तकातील मजकुराची पाने सोशल मिडियातुन वावटळीसारखी सर्वत्र पसरवली जात आहेत. यांचा प्रतिवाद करण्यासाठी पुरंदरेंचे समर्थकही सज्ज असतातच. पण आरोपक आणि प्रतिवाद्क यांतील एकंदरीत जो उग्र आवेश आहे तो अशा वादांना कधीही पुर्णविराम देवु शकणार नाही हे उघड आहे.

मी हे पुस्तक आजवर वाचले नव्हते. मला प्रासादिक/पाल्हाळीक/प्रवचनी/प्रचारकी/नाटकी पुस्तके वाचायला आवडत नाहीत. अकरावी-बारावीत असतांना पाबळच्या वाचनालयात कधीतरी हे पुस्तक हाती आले होते. पण चाळुन ठेवुन दिले. आता मात्र वाचणे भाग पडले. वाचले आहे. भाषा प्रभावी आणि प्रवाही आहे हे नक्कीच.

पुस्तकाच्या अंतरंगात शिरायच्या आधी नेटवर जी माहिती मिळते ती नमुद करतो. या ग्रंथाच्या सोळा आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या असुन पाच लाख घरांत हे पुस्तक गेले आहे असे विकिपिडियावरील माहितीत म्हटले आहे. हे खरे मानले तर पाच लाख प्रती विकल्या गेल्या आहेत असे म्हणता येईल. कोणत्याही मराठी पुस्तकाच्या एवढ्या प्रती मराठीत विकल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे "पुरंदरेंनी शिवाजी महाराजांना घरोघर पोहोचवले." हे विधान अतिशयोक्त असले तरी बहुसंख्य मराठी जनांपर्यंत पोहोचवले हे मान्यच करावे लागेल. इतर कोणतेही पुस्तकरुपात प्रकाशित शिवचरित्र हा विक्रम मोडु शकलेले नाही असे स्पष्ट दिसते. शिवाय शिवाजी महाराजांवर त्यांनी असंख्य व्याख्यानेही दिलेली आहेत. ग.ह. खरेंसारखे विद्वान इतिहास संशोधक त्यांना गुरुस्थानी लाभले असेही दिसते. "बाबासाहेब पुरंदरे याणी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला." असेही विकीत नमुद आहे. असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल. समजा नसले तरी शिवचरित्र लिहायचे म्हणजे त्यांना त्याकाळी जी साधने उपलब्ध होतील त्यातील काही साधने तरी त्यांना संदर्भासाठी वापरावे लागलीच असतील हे गृहित धरावे लागेल. शिवाय इतिहासकार होण्यासाठी कोणाकडे कसली पदवी असलीच पाहिजे हेही बंधन नसते, त्यामुळे "पदवी दाखवा" हा आक्षेपही योग्य नाही. तरीही शाहीर व इतिहास संशोधक म्हणून त्याही अंगाने राजा शिवछत्रपती या पुस्तकाकडे पहावे लागेल.

ते रा. स्व. संघाशी तरुणपणापासुन संपर्कात होते अशीही माहिती यात नमुद असुन ते स्वत: स्वयंसेवक होते कि नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

त्यांनी इतरही लेखन केले असुन या विषयाशी संबंधीत त्यांचे "जाणता राजा" हे एक महानाट्य असुन त्याचे असंख्य प्रयोग झाले आहेत. अर्थात यावरही आक्षेप आहेत, पण ते नाटक मी पाहिलेले नसल्याने त्याबाबत काही लिहु शकणार नाही. पण हेही नाटक लाखो लोकांनी पाहिलेले आहे. किंमान अशा प्रकारचा महाराष्ट्रात झालेला (होत असलेलाही) एकमेव प्रयोग आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

आता पुस्तकाबाबत आणि आक्षेपांबाबत.

या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध होऊन सहा तरी दशके उलटली असतील. पुरंदरेंचा जन्म १९२१चा. म्हणजे हे पुस्तक लिहायला लागलेला संभाव्य कालावधी लक्षात घेता ते लिहित्यावेळीस तिशीत असावेत. मी चवदावी आवृत्ती (२००१) वाचुन आक्षेपांव्रील खालील निरिक्षणे नोंदवत आहे.

आक्षेप १)

"मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत." (पान ८३) असे सांगुन या विधानावर सर्वात जास्त प्रक्षोभ व्यक्त केला जातो. हे विधान देतांना पुढील संदर्भ दिला जातो.(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) संदर्भासठी खालील लिंक देत आहे.   http://babapurandare.blogspot.in/2010/09/blog-post.html  http://vishvamarathi.blogspot.in/2012/06/blog-post_28.html
सर्चमद्ध्ये अनेक मिळतात. अनंत दारवटकरांनी न्यायालयात विचारलेल्या प्रश्नावर पुरंदरे निरुत्तर झाले असेही सांगितले जाते.

माझ्याकडील आवृत्ती २००१ मधील आहे. १४ वर्ष जुनी. या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ८३ वरच नेमके काय म्हटले आहे हे पाहुयात:

"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"

दोन्ही उद्घ्रुते शांतपणे पडताळुन पहा. पुरंदरेंच्या पुस्तकात या विधानात मुळात ’मराठा’ शब्दच नाही हे सहज लक्षात येईल. हा शब्द कोठुन आणला? हे विधान करतांना लेखकाने तत्कालीन महाराष्ट्रातील अनागोंदी चितारत हे विधान केले आहे हे सलग वाचले तर स्पष्ट दिसते. सरदार-जहागिरदार फक्त मराठा होते कि काय? मुरारपंत जोगदेव सरदार नव्हता काय? तो कोण होता? वरील विधान सरसकट सर्वच महाराष्ट्री जहागिरदार-सरदारांबाबत आहे, त्यात ब्राह्मणाला सुटका दिली आहे असे दिसते आहे काय?

दुसरे महत्वाचे असे कि पुरंदरेंनी मराठा हा शब्द पुस्तकात मराठी माणुस म्हणुन वापरला आहे. जात म्हणून नाही. जेथे जेथे जात अनुस्युत आहे तेथे काय म्हटले आहे तेही पाहुयात:

 "क्षत्रीय मराठ्यांच्या तलवारी आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लेखण्या सुलतानांच्या सेवेंत दासींबटकींच्या अदबीने आणी नेकीने रमल्या होत्या." (पान ५५). विधान स्वयंस्पष्ट आहे. येथे मराठा जातीचा जसा उल्लेख आहे तसेच ब्राह्मणांचाही आहे. अन्यत्र मराठा जात ही कुळवंत अथवा शहाण्णव कुळी या विशेषणासहित उल्लेखली आहे. दोहोंना सारखेच झोडपले आहे असे स्पष्ट दिसेल.

मराठा जातीविषयी येणारा अजुन एक उल्लेख पहा, : "आणि या मंडळींना ओळखलत का? हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती.........पण काय लिहायचे आता?" (पान ३५८)

ही हतबुद्धता संतापाच्या रुपाने कोठे उमटली तर लेखकाला दोष द्यायचा कि परिस्थितीला? महाराजांपेक्षा या अशा "९६ कुळी म-हाटे" (हा पुरंदरेंचा या संदर्भातच पुढच्याच परिच्छेदांत येणारा शब्द), त्यातही निकटच्या नातेवाईक मंडळीला शाइस्तेखान जवळचा वाटला आणि त्याला जाऊन मिळाले. हे वास्तव नसेल तर पुराव्यांनीच खोडले पाहिजे. पण या विधानाबाबत कोणी आक्षेपच घेतल्याचे वाचनात नसल्याने हे विधान सर्वमान्य आहे असा अर्थ सहज घेता येइल.

आक्षेप २) " शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... " हे विधान आक्षेपार्ह मानले गेले आहे कारण यातील "कुजबुज" हा शब्द आणि हे लग्न पंतांनी हौसेने केले, म्हणजे शहाजीराजांना डावलले. एक चाकर शहाजीराजांपेक्षा मोठा झाला का असा हा आक्षेप आहे.

याला जोडुनच दुसरा आक्षेप या विधानावर... "आईसाहेबांवर ते फार माया करीत. ही बाई अशी तशी नाही, हिची जडणघडण कांही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता..........पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. गोत्र? - गोत्र शांडिल्य. पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे शिवबांचे गोत्र एकच होते-सह्याद्रि! प्रचंड अवघड सह्याद्रि! पंत भारदस्त होते. जबरदस्त होते. सह्याद्रीसारखेच!"  (पान १२६)

या विधानातील ’गोत्र’ एकच या शब्दावर आक्षेप आहे, तसेच ’ते फार माया करीत’ आणी ’शिवबांवर  तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता."

पण याच्याच आधी पान १२५ वर काय म्हटलेय तेही पाहुयात.

"राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरा-याचे, मायेचे आणि ममतेचे वडिलधारे पुरुष होते. ते सर्वांवर हक्काने रागवत अन हक्काने प्रेम करत." (पान १२५).

पुन्हा हा पाठचा संदर्भ असतांना हे वाक्य वाचुन काही ओळी (ज्यात सत्तर वर्षीय दादोजींच्या राजकीय अनुभवांबाबत सांगण्यात जातात.) गेल्यानंतर येणारे आक्षेपार्ह मानले जाणारे विधान पाहिले तर कोण सुज्ञ पुरुष ते आक्षेपार्ह मानेल? ’वडिलधारे’ या शब्दातच माया ममतेचा अर्थ सामावला आहे.

राहिले आता गोत्राचे. गोत्र ही वैदिक धर्मीय  संकल्पना आहे. पुरंदरेही "उत्तरेत वैदिक धर्माचा, वैदिक राज्यांचा आणि वैदिक संस्कृतीचा हे सुलतान विध्वंस करत होते, त्याच काळात महाराष्ट्रांतले धर्ममार्तंड पोथ्या उलथ्यापालथ्या करत खल करत बसले होते." (पान २५) असे विधान करतात. या वाक्याला माझा आक्षेप नाही कारण वैदिक धर्म स्वतंत्र आहे, वेगळा आहे हे मी सांगतच आलो आहे. त्यांनी उत्तरेतील कोणाला वैदिक मानले हे मी सांगु शकत नाही कारण त्यांनी ते स्पष्टही केलेले नाही. पण तो येथे मुद्दा नसुन गोत्राचा आहे.

पुरंदरे उपमा-उत्प्रेक्षा पेरत लेखन करतात हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. गोत्र म्हणजे काय? शूद्र वगळता सर्वांना (तीन वर्णांना) गोत्र असते. गोत्र म्हणजे ऋग्वेद रचना करणा-या ऋषींचे थेट वंशज. रक्तसंबंधी. महाभारत काळात गोत्रे फक्त चार होती. ती म्हणजे अंगिरस, कश्यप, भृगू आणि वशिष्ठ. नंतर ती आठ बनली. त्यांच्याच वंशांत गोत्रकर्ते ऋषी झाल्याने ही संख्या आता चारशेच्या पुढे गेली आहे. ही का संख्या वाढली त्याचे उत्तर मी अन्यत्र दिलेले आहे.

वरील विधानात दादोजींचे मुळ गोत्र शांडिल्य दिले आहे पण त्यात शिवबांचे मुळ गोत्र दिलेले नाही. जे नाही ते कसे देणार? पण अनेक जे मराठे आज स्वत:ला क्षत्रीय समजतात त्यांनी याचा विचार करावा. असो.

तर पुरंदरेंनी येथे प्रत्यक्ष सह्याद्रीची उपमा देत सह्याद्री गोत्र ठरवले यात काव्यमय आणि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. त्याच्याच अंगाखांद्यांवर खेळणारे मावळे यांचा नि वैदिक ऋषी गोत्राचा काय संबंध? हा सम्बंध महाराष्ट्रावरील प्रेमापोटी आणलेला आहे. गोत्र सह्याद्री म्हटल्यावर राग येत असेल तर अवघड आहे.

आता दादोजींना ते गुरु मानतात काय? शिक्षक मानतात काय हेही त्यांच्याच शब्दात पाहुयात:

"पण पंतांचे सर्वात बारकाईने लक्ष असे ते शिवबांच्या शिक्षणावर. लिहिणे-वाचणे शिकवण्यासाठी नेमलेल्या गुरुजींपाशी शिवबा बसे. ’ (पान १२७)

यात गुरुजीतुन गुरु आणि शिक्षणातुन शिक्षण हे दोन्ही शब्द आले आहेत. दादोजी गुरु होते असे पुरंदरेंनी ठामपणे कोठेही म्हटलेले नाही. न्यायनिवाड्यांत व अन्य राजकार्यात ते शिवबांना बरोबर ठेवत असे म्हटले आहे पण कोठेही "गुरु" शब्द येत नाही. येतो तो एका संस्कृत सुभाषितात, पण त्याचा अर्थ दादोजी गुरु होते असा काढणे म्हणजे मुद्दाम अनर्थ करणे होय. रामदासांबाबतही असेच आहे, पण त्याबाबत नंतर.

म्हणजे, एकदा वडिलधारेपणा दिला गेलेला माणुस माया करतो यात गैरार्थ काढणे विकृती म्हणता येईल.

हे झाले पुस्तकातील विधानांबाबत. आक्षेपांबाबत आणि त्यातील फोलपणाबाबत. पण दादोजींचा संबंध भोसले घराण्याशी चाकर म्हणून कधीच नव्हता. जोही काही होता तो कोंढाण्याचे सुभेदार म्हनून हे मी सिद्ध करुन दाखवले आहे. जहागिरदाराचा चाकर आणि सुभेदार यातील फरक मोगलकालीन प्रशासन व महसुल पद्धतीबाबत  नीट माहिती नसल्याने सुभेदार हा जहागिरदारापेक्षा मोठा असतो, एकच नव्हे तर परिसरातील अनेक जहागिरदार, मोकासदार, मिरासदार ते वतनदार हे त्याच्या महसुल व स्थानिक न्याय या संदर्भात सुभेदाराच्या अंकित असतात हे लक्षात घेतले पाहिजे. पुरंदरेही दादोजींना "नामजाद सुभेदार" (पान १२६) म्हणुन नंतर नेमले असे म्हणतात. नामजाद सुभेदार हे पद नाही. शिवाजी महाराजांच्या दादोजीसंबंधी चार अस्सल पत्रात "दादोजी कोंडदेवु सुभेदार" असाच उल्लेख आहे. सुभेदार केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल, जमीनी लागवडीखाली आणने, गांवे वसवने, जातपंचायतींच्या निवाड्यांना मान्यता देणे (मजहरनामे) अशा त्याच्या जबाबदा-या असत.

जहागीर, मोकासा हे अस्थिर हक्कांचे स्वामी असत. केंद्रीय सत्तेची मर्जी असेपर्यंत ते कायम रहात अन्यथा ते काढुनही घेतले जात असत. याउलट वतन अथवा इनाम हे मात्र वंशपरंपरेने कायमचे असत. (महाराष्ट्र आणि मराठे, ले. अ.रा. कुलकर्णी, पान २९)

सुभेदार कोणत्याही जहागिरदाराचा चाकर असु शकत नव्हता हे येथे स्पष्ट होईल. त्यामुळे दादोजींबाबतचे सर्वच प्रसंग काल्पनिक/कविकल्पना/प्रक्षिप्त दंतकथा या सदरात टाकुन देता येईल. दादोजींबाबतच्या जुन्या कल्पना दोन-तीन वर्षापर्यंत कायम होत्या. दादोजी आणि शिवराय यांचा संबंध नाही हे इतिहासकार मेहंदळेंनीही ३०-३२ वर्षांपुर्वी मान्यच केले आहे. (संदर्भासाठी पहा: http://sanjaysonawani.blogspot.in/2012/02/blog-post_06.html ) ब्रिगेडी इतिहासकार मात्र उलट माझा लेख येईपर्यंत दादोजींचा उल्लेख "शहाजीराजांचा सामान्य चाकर अथवा नगण्य नोकर " असा करत असत. हे त्यांचेही जर अज्ञान होते तर समजा पुरंदरेंचेही (१९५८ साली) मोगलकालीन महसुलपद्धतीबाबत असेल तर त्यात धक्कादायक काय आहे?

शिवाय प्रस्तुत पुस्तकात दादोजींच्या मृत्युनंतर फक्त एकदाच ओझरता उल्लेख आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. अडिच प्रकरणांत इतर विषयांबरोबरच दादोजी प्रकरण आटोपते. (पुस्तकात एकुण ५२ प्रकरणे आहेत.)

आक्षेप ३) पुस्तकात ब्राह्मण माहात्म्य अधिक असुन शिवाजी महाराजांची प्रतिमा हिंदुत्ववादी व मुस्लिम विरोधी दाखवण्यात आली आहे.

हा आक्षेप अनेक शब्दांत, अनेक पद्धतीने नोंदवण्यात आला असल्याने मी फक्त आरोपाचा गाभा मांडला आहे. वरील आक्षेपांसाठी आपण पुस्तकातील काही नमुने पाहुयात.

यासाठी पान ८० व ८१ वाचले पाहिजे.  यात चार दिर्घ परिच्छेदांत वेदशास्त्रसम्पन्न ब्राह्मण केवढ्या नालायक्यांना पोहोचले होते याचे उद्वेगजनक वर्णन आहे. "नाशिक येथे ऐलतीरावरील मंदिरे फुटत असतांना पैलतीरावर वेदोनारायण पळींपंचपात्री घेऊन तिरिमिरीने भांडत होते. कशासाठी? तर, यात्रेकरुंपैकी ऋग्वेद्यांची पिंडॆ कोणी पाडायचीं आणी यजुर्वेद्यांची पिंडे कोणीं पाडायची यासाठी!!" ते "वेदशास्त्र संपन्न शास्त्री-पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी, ’श्रीगोदातटाकीं आणि श्रीकृष्णातटाकीं स्नानसंध्या करुन हजरतसाहेबास दुवा देत."

ब्राह्मणही या विधानामुळे पुरंदरेंच्या मागे का लागले नाही हे समजत नाही. वरील मजकुरालाच थोड्या अंतराने जोडून "एकदा मने विकली की जपण्यासारखे काही उरतच नाही. कांहीही लिलावाला निघते. बायकासुद्धा!" असे पुरंदरे  ब्राह्मणांची इज्जत काढून म्हणतात. पण आक्षेप याला नाही...

आक्षेप वेगळाच आहे.

वरील विधानानंतर सध्याच्या वादात आक्षेपार्ह मानले गेलेले अंतराने येणारे वाक्य म्हणजे, "ब-या, नीटस, गो-या जातीवंत कुणबिणी" बाजारांत सहज ’पंचविस होनांस पांच’ विकत मिळत होत्या." हे होय.

कुणबी आणि मराठे एकच असल्याने हे विधान मराठा पुरुषांची बदनामी करणारे आहे असे म्हटले जाते. वरकरणी पाहता ते खरेही वाटेल. अर्थात या वाक्याआधीचे ब्राह्मणांबाबतचे उद्वेग कसे व्यक्त झाले आहेत हे आपण थोडक्यात पाहिले.

१६३० च्या प्रलयंकारी दुष्काळात ’पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया, स्वता:ला गुलाम म्हणून  विकून घेत. आया बालकांची विक्री करीत." असे हृदयद्रावक वर्णण डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवले आहे. या दुष्काळाची वर्णने तुकाराम महाराज, रामदास, परमानंद यांनीसुद्धा करुन ठेवली आहेत. तुकोबांचे तर नुसते दिवाळे निघाले नाही तर पत्नी व मुलही गमवावे लागले. या दु:ष्काळात होनाजी निबरे नांवाच्या गृहस्थाने घर व जमीन २५ होनास विकली असे पत्रसारसंग्रह ३२९ मद्धे नमुद आहे. अशी त्याकाळातील अगणित उदाहरणे आहेत. इअतकी कि माणुस मृत माणसाला खात होता. (वरील माहितीसाठी संदर्भ: मराठे आणि महाराष्ट्र, ले. अ. रा. कुलकर्णी, पान १०८ ते ११६) आणि पुरंदरेंचे विवेचन नेमके १६२९-३० या काळातील स्थितीचे आहे. दुष्काळातील आहे.

पुरंदरेंनी कुणबिण शब्द वापरला आहे आणि कुणब्याची बायको अथवा मुलगी म्हणजे कुणबीण असा अर्थ येथे घेतला गेलेला दिसतो.  त्यामुळे वितंड आहे. मराठा म्हणजे कुणबी हे सध्या समीकरण तेजीत असल्याने पुरंदरेंनी मराठा बायकांची बदनामी केली असा समज होने स्वाभाविक आहे.

पण वास्तव काय आहे?

कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको-पोर तर बटकी कोण होती? ती कोणाची बायको-पोर होती?

कुणबीण हा रखेली या शब्दाचा प्रतिशब्द होता. कुणब्याची बायको म्हणून तत्कालीन स्थितीत तो अभिप्रेतही नव्हता. याचे शिवकालापासुन, खुद्द शिअवरायांच्या पत्रांतील पुराव्वे उपलब्ध आहेत. बटकी म्हणजे घरकामासाठी राबणारी. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको/पोर नव्हे तर एखाद्या माणसाची विक्रय झालेली शय्यासोबतीन. भावीण या शब्दाचा अर्थ भावेंची बायको असा होत नाही तसेच हे आहे. दोन्ही सर्वस्वी वेगळ्या संज्ञा आहेत. यात लग्न अभिप्रेत नाही. ब्रिटिश काळ येईपर्यंत, स्त्रीयांची खरेदी/विक्री थांबेपर्यंत ही प्रथा होती. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन रोमन व बायबल काळापासुन चालत आलेल्या ल्यटिन "Concubine" या शब्दाचा तो मराठी अपभ्रंश आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीतील अर्थ आहे "a woman who cohabits with a man to whom she is not legally married, especially one regarded as socially or sexually subservient; mistress.". थोडक्यात ठेवलेली बाई. मग ती विकत घेतलेली असेल वा ती स्वेच्छेने राहत असेल. याचा कुणबी जातीशी संबंध जोडणारे व कुणबी समाजाची स्वत:हुन बदनामी करुन घेणारे किती मुर्ख?

जसा बटकीन या शब्दाचा जातीय अर्थ नाही तसाच कुणबिण या शब्दाचाही जातीय अर्थ नाही. कुणबिणी आणि बटकिणींचे क्रय-विक्रय हा महाराष्ट्रातील (अन्यत्र वेगळ्या नांवांनी) सुरु असलेला फार जुना व्यवसाय आहे. पेशवे काळातही शनिवार वाड्यासमोर कुणबिण-बटकिणींचे बाजार भरत व पाच रुपये ते ऐंशी रुपये दराने त्यांची खरेदी होत असे अशा नोंदी उपलब्ध आहेत. आणि या विकावु स्त्रीया कुणबाऊ समाजाच्या असत असे नव्हे तर बव्हंशी सर्वच जातीतील असत. अशा सर्व स्त्रीयांना कुणबीन अशी संज्ञा होती. यामद्धे एकजातीयता शोधणे अनैतिहासिक आहे. किंबहुना हा वेगळाच वर्ग होता ज्यात कोणत्याही जात/धर्माची स्त्री असु शके.

आक्षेप ४)  हिंदुत्ववादी पुरंदरे मुस्लिम द्वेष्टे असुन शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सेवक/सेनानींबद्दल ते नामोल्लेख करत नाहीत.

आपण पुरंदरेंच्याच पुस्तकातील काही उतारे पाहु.

१. पान २४६ वर पहा. "या वेळीस महाराजांचे मुख्य मुख्य अंमलदार महाराजांच्या बरोबर घोडे दौडीत होते. पुढीलप्रमाणे हे अधिकारी होते. शामराज नीळकंठ रांझेकर (पंत पेशवे).........नुरखान बेग सरनौबत (पायदळाचे सरसेनापती.)." , नेताजी पालकरांच्या सोबतीने सिद्दी हिलाल आहे. त्याचा मुलगा वाहवाह आहे. त्यांची स्वराज्यासाठीची अविरत दौड आहे. मुस्लिम म्हणुन लेखकाने त्यांना हिणवल्याचे दिसत नाही.

२. ’स्वराज्य वाढले. किती साधी माणसे ही? कुणी कुलकर्णी होता. कुणी रामोशी होता. कुणी मुसलमान होता. कुणी न्हावी होता. कुणी भंडारी होता. कुणी देशपांडे होता. कुणी महार होता. कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला." (पान ४०७) .

३. "केळशी येथे बाबा याकूत हे थोर अवलिये राहत होते. अल्लाच्या चिंतनावाचुन त्यांना दुसरे आकर्षण नव्हतें. अमीर वा फकीर त्यांना सारखेच वाटत. सच्चे परवरदिगार रहमदिल होते ते. महाराज त्यांच्या दर्शनास केळशीस आले व त्यांचे दर्शन घेऊन जंजि-याच्या मुकाबल्यास त्यांनी हात घातला." (पान ९३८)

४. औरंगजेब उत्तरकाळात विक्षिप्त झाला. धर्मवेडाने वागु लागला. "बाटवाबाटवी तर फार स्वस्त झाली. खरोखर त्या थोर प्रेषिताच्या पवित्र व ’सत्य’ धर्माची अवहेलना त्याचेच अनुयायी म्हणवुन घेणारे करु लागले. औरंगजेब तर मुळचाच धर्मवेडा. कुराण शरीफ तोंडपाठ करुनहि बिचा-याला त्यांतील ईश्वरी तत्वाचा बोध होऊ शकला नाही." हे सांगुन लेखक म्हणतो...

"औरंगजेबाचे हे धर्मवेडे चाळे महाराजांना समजले. त्यांना अत्यंत दु:ख झाले. कीव आली. रागहि आला. कोणता धर्म असा वेडगळ उपदेश करील, की लोकांवर क्रुर जुलुम करा, अन्याय करा म्हणून? धर्माचा संस्थापक म्हणजे इंश्वराचा अवतार. पेमदयाशांतीचा गोड सागर. कोणत्या धर्मसंस्थापकाने असें सांगितले आहे की, माझ्या शिकवणुकीचा प्रचार करण्यासाठी वटेल ते क्रुर अत्याचार करा म्हणुन? असे कोणीही सांगितलेले नाही." (पान ७५७)

हे वरील वाचता (मी नमुने दिले आहेत...असे अनेक आहेत.) पुरंदरेंना मुस्लिम द्वेष्टे म्हणेल? तरीही अजुन तुमची खात्री पटावी म्हणून सर्वच लोकांबद्दल त्यंची काय भावना आहे हे खालील वाक्यावरुन लक्षात येईल...

"स्वराज्य वाढले. किती साधी माणसे ही? कुणी कुलकर्णी होता. कुणी रामोशी होता. कुणी मुसलमान होता. कुणी न्हावी होता. कुणी भंडारी होता. कुणी देशपांडे होता. कुणी महार होता. कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला." (पान ४०७).

यानंतरही त्यांना एकाच जातीचे पक्षपाती ठ्रवायचे असेल तर खुशाल ठरवावे. खरे तर मुस्लिम हा शब्दच मुळात हजार पाने पुस्तकात दोन-तीनदा आला आहे. त्याऐवजी. अफगाणी, मोगल, निजामशाही, अदिलशाही,सुलतान-सुलतानी असेच शब्द अधिकांश वापरलेले आहेत. मुर्तीभंजनाचा खेद व उद्वेग सर्वत्र दिसतो. त्यात काही प्रसंगी अतिशयोक्तीही आहे. पण त्यातुन मराठी माणुस (मी आता मराठा शब्द टाळु म्हणतो.) आपत्तीविरुद्ध, आक्रमकांविरुद्ध आणि पारतंत्र्याविरुद्ध उभा राहत नाही, उलट स्वत्वे विकत गुलाम होतो याची चीड दिसते.

आक्षेप ५) फुटकळ मुद्द्यांना मी आता उत्तरे देत बसत नाही आणि कोणाचा वेळ वाया घालवु इच्छित नाही. पण तरीही आयबीएन लोकमतवर जिजाउंना कुंतीसारखे व्हायचे म्हणजे काय हा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेत केला होता. त्या संदर्भातील वाक्यही पुरेपुर तपासुन घेऊ. तत्पुर्वी याच पुस्तकातील पान क्र. ११३ वरील शहाजीराजांच्या स्वातंत्र्य धडपडईबाबत लिहितांना लेखक म्हणतो, ..." स्वातंत्रेच्छू सर्व धडपडींचे मुळ कोठे असेल आणि त्यांचे अंत:करण चेतवणारी, सुलतानशाहीविरुद्ध बंडाची प्रेरणा देणारी आणि स्वत:च सत्ताधीश ’राजे’ बनावे, अशी महत्वाकांक्षा फुंकरुन फुंकरुन फुलविणारी कोणती शक्ति राजांच्या मागे होती?

"इतिहासाला माहित नाही. पण ती शक्ति, ती व्यक्ति असावी जिजाबाईसाहेब! शहाजीराजांच्या राणीसाहेब!" (पान क्र. ११३)

आता आव्हाडांच्या आक्षेपाकडे जावू.

कुंतीसंबंधाने आव्हाडांनी अर्धवट विधान केले. संपुर्ण विधान असे आहे...जेंव्हा जिजाऊ गरोदर होत्या तेंव्हाचे.

"तिला रामायण , महाभारत फार फार आवडे. राम, हनुमान, सीता, कृष्ण, द्रौपदी, कुंती, विदुला या सर्वांच्या कथा ऐकतांना तिच्या मनावर विलक्षण परिणाम होई. तिला वाटे, आपण नाही का कुंतीच्या पंगतीला बसु शकणार? तिचा भीम, तिचा अर्जुन अत्यंत पराक्रमी निपजले. त्यांनी राक्षस आणि कौरव मारले. सुखसम्रुद्ध धर्मराज्य स्थापन केले. कुंती वीरमाता, राजमाता ठरली. मला तिच्या पंक्तीला बसायचेय! बसेल का?"

सोळाव्या शतकातील स्त्री-पुरुषांची मानसिकता काय होती? कुंतीला वरदानाने देवांपासुन मुले झाली. त्यात कोणाला कधी अश्लाघ्य वाटले नव्हते. विसाव्या शतकातही वाटत नाही. याला ब्राह्मणी अथवा वैदिक मानसिकता म्हणा. पण वरील विधानात "कुंतीला दैवी वराने नव्हे तर प्रत्यक्ष नियोगाने अथवा व्यभिचाराने मुले झाली" हे अलीकडचे आकलन तेथे लादुन कसे चालेल? अर्थ एवढाच आहे कि पांडवांपैकी पराक्रमी असलेल्या भीम आणि अर्जुनाप्रमाणे मुल व्हावे. मग कर्णाचे नांव पुरंदरेंनी घेतले नाही म्हणूनही छाती पिटता येईलच.

कोणतीही मिथककथा लक्षणार्थी घ्यायची कि वाच्यर्थ याचे भान सुटले तर काय होनार? पुराणकथा ऐकतच बहुजन वाढले. आजही किर्तन सप्ते लावणारे कोण आहेत? याच भाकडकतथा सांगणारे बहुतेक किरतनकार आज बहुजनच आहेत. आपलेच पुरुष, स्त्रीया आणि मुले ते ऐकत आहेत. पण त्यांना विरोध नाही.

मग विरोध कोणाला आहे?

कोणालाही करोत. सत्याला अंध विरोध मान्य नसतो. पुरंदरेंवर केले जाणारे आरोप मात्र केवळ वरकरणी ब्राह्मणी द्वेषातुन आहेत. हे, म्हणजे संघीय मुख्यमंत्री सिंधखेडराजाला यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार आणि टुक्कार अनुयायांन्च्या हाती स्वर्ग देणार. नेत्यांचे खरे अंतर्मन तरी कोठे माहित आहे?

तरीही नि:ष्कर्ष:

पुरंदरेंना इतिहास सांगायचा नसुन आक्रमक, पारतंत्र्य आणि स्वराज्य यातील भेद ठळक करण्यासाठी एक प्रेरकता निर्माण करायची आहे असा सर्व पुस्तक वाचल्यानंतरचा एकमेव उद्देश दिसतो. इतर ब्राह्मणी लेखकांनी रामदासांचे फाजील लाड केलेत तसे पुरंदरेंनी कोठेही केलेले दिसत नाही. दादोजी हे शिवजीवनातील एक दुरस्थ पात्र आहे. पण तत्कालीन समजुतींनुसार त्यांनी ते आपल्या कादंबरीत रंगवले आहे. पण त्यात जिजाऊंचा अवमान करण्याचा उद्देश्य दिसत नाही. मुस्लिम द्वेष नसुन स्वजन नाकर्ते आहेत याचा लेखकाला अधिक रोष दिसतो व त्याबद्दलचा संताप काही ठिकाणी व्यक्त झाला आहे. कुणनी-बटकिणी या संज्ञा जातीय नसुनही कुणब्याची पोरगी किंवा बायको असा सरधोपट अर्थ घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात विकत जाणा-या कुणबिणी कोणत्याही जातीतील असत व त्याचा अर्थ  रखेल असा व्हायचा. बटकिण म्हणजे घरकामासाठी विकत घेतलेली बाई. हे शब्द ज्यांनी जन्माला घातले ते दोषी आहेत. स्वराज्यासाठी उपयोगी ठरलेल्या मुस्लिमांना त्यांनी  डावलले आहे असेही दिसत नाही. इस्लामबद्दल शिवाजीमहाराजांच्याच माध्यमातुन लेखक काय म्हणतो हे मी वर नमुद केलेच आहे. त्यात कोठेही इस्लामबाबत द्वेषभावना दिसत नाही. संघविचारी इस्लामचा द्वेष करतात हे जगजाहीर आहे. या कादंबरीपुरते तरी मी म्हणू शकतो कि संघविचाराच्या प्रभावातील ही कादंबरी नाही. कादंबरीत भावनोद्रेकिता, परिस्थितीवरील चडफडाट जसा आहे तशा अतिशयोक्त्याही आहेत. देवगिरीचे साम्राज्य कोसळल्यानंतर परिस्थितीची हतबलता महाराष्ट्रावर आलीच नव्हती असेही कोणी म्हणु शकणार नाही. अतिशयोक्तीचा भाग कादंबरी म्हणून वगळला कि अशा स्वरुपाच्या घटना घडल्याच नाहीत असे म्हणायचे धाडस कादंबरी वाचल्यानंतर कोणी करु शकणार नाही. मागचे पुढचे संदर्भ न घेता एखादेच विधान व शब्द वेठीस धरले तर जगातील सर्वच पुस्तकांवर आक्षेप घेता येतील. पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे. पण त्यांच्यावर आपल्या मनात येईल ते थोपणे योग्य नाही. पुस्तकातील भाषा ही आलंकारिक आहे. प्रभावी व प्रवाही आहे. अलंकारिकतेच्या तत्कालीन खांडेकरी पद्धतीचा तो दोष आहे. तरीही एक साहित्यप्रकार म्हणून त्यात रचनाशैलीचे अनेक दोष आहेत. पण त्याची समिक्षा साहित्य समिक्षकांनी केली पाहिजे.ती समिक्षा करणे हा या लेखाचा उद्देशही नाही. जे आक्षेप घेतले जात आहेत त्यावर भाष्य करणे हा एकमेव हेतु यामागे आहे. मी दिलेली उत्तर शक्यतो पुरंदरेंच्याच मुळ पुस्तकात काय आहे आणि आक्षेप काय आहेत यावर केंद्रित केले आहे.

-संजय सोनवनी

74 comments:

  1. नेहेमीप्रमाणेच अतिशय मुद्देसूद विवेचन !

    ReplyDelete
  2. सहमत आहे मी सर !

    ReplyDelete
  3. अप्रतिम विश्लेषण as usual

    ReplyDelete
  4. Sonavani maratha dweshta aahet. Sonavani nehami maratha chya ulte lihat astat. Kay problem aahe Kay mahit kahitari changale liha

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  5. Absolute excellence appears in this blog. Hats off to u sir.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Very nice analysis.
    शहाजी राजांना डावल्याचा 1 आक्षेप आहे. त्या बद्दल थोडस मार्गदर्शन कराव ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा शिवाजी महाराज ह्याचं सईबाई सोबत लग्न ठरल तेव्हा दादाजी कोंडदेव ह्यांनी शहाजी राजे ना पत्र पाठवून आमंत्रण पाठवले होते. पण आदिलशाह ने शहाजी राजे ह्यांस रणदुल्लाखन सोबत दक्षिणेत युद्धावर पाठीवले होते, म्हणून शहाजी राजे लग्नाला येऊ शकले नाही. नंतर शहाजी राजे ह्यांनी शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाबाई ह्यांना त्यांच्या कडे बोलावून घेतले बंगलोर ला, व तिथे परत शिवाजी महाराज ह्यांचे दुसरे लग्न मोहित्यांची लेक सोयराबाई साहेब ह्यांच्याशी करून दिले.

      Delete
  8. केवळ आणि। केवळ संभाजी। ब्रिगेड व मराठा। द्वेषातून बळवंत पुरंदरेच्या विकृत लिखाणाचे निंदनीय समर्थन..
    ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे व प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांनी देखील बळवंत पुरंदरेच्या लिखाणावर आक्षेप घेतलेले आहेत...

    ReplyDelete
  9. मी या वादात कधीच पडलो नाही. पण बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केवळ जात पाहून अन्याय होतोय असे वाटते

    ReplyDelete
  10. मी या वादात कधीच पडलो नाही. पण बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केवळ जात पाहून अन्याय होतोय असे वाटते

    ReplyDelete
  11. मुद्देसूद आणि तटस्थ विवेचन !

    ReplyDelete
  12. संजय सोनवानी साहेब आपनदेखिल इतरांसारखे मुद्दे एक आणि त्याचा इतर मुद्द्याशि संबंध् जोडून फार हुशारीने समर्थन केले आहे बाबा पुरंदरेचे आता मात्र आपल्या लेखनाविषयी संशय येत आहे आपन किती गोलगोल समर्थन केले आहे याबद्दल आपल्या हुशारीचे कौतुक करावेसे वाटते, आपण फ़क्त एकमेव लेखक आहत असे नाही असो पण आपले मुद्दे दिशाभूल करणारे आहेत.

    ReplyDelete
  13. यात खर्या आक्षेपांचे निराकरण होताच नाही .. नाटकी ढंगात शिवचरित्र सांगण्याच्या नादात शिवाजी महाराजांच्या खर्या जनवादी दृष्टीकडे ( वतनदारीचा नाश , शेतसार्यातील सुधारणा इ .) दुर्लक्ष करणे , शिवचरित्रातील काही प्रसंगांकडे सपशेल दुर्लक्ष करणे ( उदा . राज्याभिषेकाला झालेला विरोध , गागा भटाची भूमिका , कृष्णाजी भास्करचा वध .) नवीन पुरावे उपलब्ध झाल्यानंतर नव्या आवृत्तीत सुधारणा न करणे ( उदा. दादोजी आणि रामदास स्वामींचा शिवाजी महाराजांशी काही संबंध नसणे .) शिवाय कोर्टात दारवटकर यांनी विचारलेल्या प्रश्नापुढे पुरंदरे निरुत्तर झाले याचा उल्लेख केला आहे . मात्र याविषयी पुढे काहीच लिहिलेले नाही . स्वराज्यद्रोही मराठ्यांवरील हतबद्धता संतापाच्या रुपात बाहेर पडते हे योग्यच आहे . मात्र अशाच संताप मिर्झा राजेंसाठी कोटी चंडी यज्ञ करून महाराजांच्या मृत्यूची प्रार्थना करणाऱ्या आणि बखरींमध्ये खोटा इतिहास दडपून लिहिणाऱ्या विषयी का दाटून येत नाही ? आक्षेप काही वाक्यांना नाही तर लिखाणात आणि व्याख्यानांतून निर्माण होणारे एकूण चित्र हे धर्माचे , उच्च वर्णाचे , उदात्तीकरण करणारे असते हा आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. पुस्तक वाचावे. कृष्णाजी भास्करचा वध जसा झाला तसाच लिहिलेला आहे आणि त्याचे यत्किंचितही दुंख लेखकाने व्यक्त केलेले नाही.

      Delete
    2. पण नाटकात तो प्रसंग टाळला आहे

      Delete
    3. शिवशाहीर??????????????????????????

      शाहीर म्हणजे हातात डफ-तुणतुणे घेवून सळसळत्या उत्साहात जोशपूर्ण हालचाली करत आपल्या पहाडी आवाजात पोवाडे -कवने ( किंवा लावण्या ई .) गाणारा रचनाकार गीतकार,भाष्यकार ! निदान आम्हाला तरी "शाहीर "या शब्दाची हीच व्याख्या माहिती आहे . माननीय (?)बाबासाहेब पुरंदरे या व्याख्येत कुठेच बसत नाहीत .त्यांनी आजवर कुठलाही पोवाडा किंवा कवन रचलेले किंवा गायलेले नाही. त्यांना कुणीही हातात डफ तुणतुणे घेवून ते वाजवताना पाहिलेले नाही. होय , यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर काही पुस्तके जरूर लिहिली आहेत . जाणता राजा नावाचे एक सर्कसवजा यांत्रिक नाटक ठीकठिकाणी जाऊन सादर केले आहे. व शिवगान या नावाखाली व्याख्यानाचे प्रयोग केले आहेत. या आधारे त्यांना फारफारतर इतिहासकार ,व्याख्याता किंवा दयाबुद्धीने नाटककार म्हणता येयील. परंतु शाहीर आजीबात नाही, शिवशाहीर तर नाहीच नाही.

      Delete
    4. बाबासाहेब पुरंदरे : शाहीर नव्हे सोंगाड्या !

      पुरंदरेची लेखणी काशी अफलातून बनवा बनवी करते याचे अनेक उदाहरणे देता येतील शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ( ज्यातील फक्त एक पद /सरसेनापती (सरनौबत ) मराठ्यांकडे आणि बाकीची सर्व पदे ब्राम्हण / प्रभू यांना असत ) पुरंदरे यांनी जेव्हा जेव्हा अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख केला तेंव्हा अष्टप्रधान मंडळातले ब्राम्हण कारभारी म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ ...निष्ठा आणि कर्तुत्वाचे मूर्तिमंत पुतळे ! असाच केला. वास्तविक अष्टप्रधान मंडळातील आण्णाजी दत्तो राहुजी सोमनाथ ,मोरोपंत पिंगळे , बाळाजी आवजी व आवजी बाळाजी,सोनोपंत डबीर इत्यादी ब्राम्हण कारभारी शिवाजी महाराजांच्या काळात देखील प्रचंड भ्रष्टाचार आणि अपहार करीत असत. आण्णाजी दत्तो हा या भटगटाचा म्होरक्या होता. त्याच्याच स्वार्थी-लोभी आणि पाताळयांत्रि कारस्थाना मुळे शिवाजी -संभाजी पितापुत्रातील स्नेहाचे गैरसमजात रुपांतर झाले ,त्यानेच सोयराबाईच्या मनात सावत्र पानाचे विष कालवले.शिवाजी महाराजांवर , संभाजी महाराजावर विषप्रयोग करण्या पर्यंत , संभाजी महाराजांना अटक करून अकबराच्या ( औरंगजेबाचा पुत्र ) ताब्यात देण्या पर्यंत या आण्णाजी दत्तो आणि मंडळीची मजल गेली होती. इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू ...ट्या नंतरचीगोपनीयता. संभाजी महाराजांना न कळवता गुपचूप अंत्यविधी उरकणे इत्यादी कटकारस्थाने देखील या मंडळी नी केली, अखेर संभाजी राजांनी या सर्वाना हत्तीच्या पायी ठेचून मारले. आण्णाजी दत्तो आणि कंपूच्या या राज्य बुडवेगिरीचा बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या अख्या हयातीत एकदाही उल्लेख केला नाही , उलट हा काळाकुट्ट सत्य इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला .
      --------------------------------------------------------------------------
      अडचणीच्या संदर्भांची छाननी-गाळणी
      --------------------------------------------------------------------------
      बाबासाहेब पुरंदरे स्वतःला इतिहासाचे अभ्यासक म्हणवतात तर त्यांनी सत्य इतिहासाचे कठोर विश्लेषण करायला हवे . परंतु त्यांचे लिखाण अडचणीचे (ब्राम्हणा साठी ) ठरणारे संदर्भ गाळून मांडलेली वजाबाकी असते . प्रतापगड प्रसंगातील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला केला होता त्यात महाराज जखमी देखील झाले होते आणि शिवाजी महाराजांनी तिथे अफजल खान प्रमाणे कृष्णाजी भास्कर ची सुध्धा खांडोळी केली होती. ही घटना पुरंदरे प्रतापगड प्रसंगातून बेमालूम पणे वगळतात.त्याने फक्त भेट ठरवण्याची बोलणी दूत म्हणून केली एवढाच संदर्भ पुरंदरे देतात. पुन्हा लिखाणात त्याचे आडनाव लपवून फक्त "कृष्णाजी भास्कर " एवढाच उल्लेख करतात .
      ------------------------------------------------------------------------------
      पुरावे -दुवे नष्ट करण्याचे पातक
      --------------------------------------------------------------------
      बाबसाहे पुरंदरे यांच्यावर एक आणखी गंभीर आरोप आहे तो म्हणजे महत्वाचे एतेहासिक कागदपत्रे -दस्तऐवज -पुरावे आणि दुवे नष्ट करण्याचा या संदर्भात त्यांच्यावर फलटण आणि सातारा संस्थानाने कोर्टात केसही दाखल केली होती. त्यांनी अनेक ठिकाणी फिरून आभ्यास आणि संशोधनाच्या नावाखाली बरीच शिवकालीन कागदपत्रे ,वस्तू ,चोपड्या ,रुमाल वेळो वेळी जिथे मिळतील तेथून जमा केल्या. परंतु त्या संबधितांना कधीच परत केल्या नाहीत. अनेक कागदपत्रे -दस्तऐवज अतिशय दुष्ट पणे नष्ट केले आणि मागण्यास गेल्यास हरवले -गहाळ झाले. नाहीतरी ती काही कामाची नव्हती असे सांगून बोळवण केली. या " नष्टचर्यात" पुरंदरे यांनी बरीच एतेहासिक गुपिते लपवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      Delete
    5. अरे भारतीया
      अष्टप्रधान मंडळातील हे काही इतके अराजक होते असं जार तूझे म्हणणे असेल तर शिवराय तेव्हाच नसते का बोलते झाले, दुरदृष्टिच्या त्या महाराजांची माणसांची पारख निवड चुकली म्हणता?????

      Delete
  14. अत्यंत मुद्देसूद विवेचन. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे धाकदपटशाच्या वातावरणात बहुतेक राजकारणी, साहित्यिक, पत्रकार मूग गिळून गप्प असताना, कोणी री ओढत असताना, तर कोणी राजकीय पूर्वग्रहांपोटी मुद्द्याचा वापर करून घेत असताना केलेले नि:पक्ष विवेचन. आजच अशाच प्रकारचे श्री हरी नरके यांनी केलेले विवेचन एका मित्राने फेसबुकवर टाकलेले वाचायला मिळाले. या मुद्द्यावर आपण दोघांनीही अतिशय समतोल भूमिका घेतली आणि मांडली आहे.

    ReplyDelete
  15. पुरंदरेंच्या दादोजी कोंडदेव यांच्या विषयीच्या वाक्यांना जेम्स लेनच्या पुस्तकाची प्र्श्वभूमी आहे . त्यांची शैली अशी आहे कि वाचणार्याला त्यात काही गैर वाटत नाही मात्र कोंडदेव जिजामाता संबंधी कुच्की चर्चा कानावर आल्यस त्यात तथ्य असावे कि काय असा संभ्रम तयार होतो . शिवाय कोंडदेवाचे उदात्तीकरण अनैतिहासिक आहेच

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राह्मणद्वेश आनि शिवरायाभिमान वापरुन ह्याना मराठा वेगला करायचा आहे, त्यासाठी सध्या फूले, शाहू, आम्बेडकर ह्याना हवे आहेत. पन ईकदा का मराठा एक केला की मग हे समस्त ओबिसी, दलित आनि इतराम्च्या मागे हाथ धुवुन लागतिल

      Delete
  16. सुंदर ......अत्यंत मुद्देसूद विवेचन.

    ReplyDelete
  17. संजयजी मी नियमितपणे आपलें लेख वाचतो . आपण आधी सांगितले कि मी "राजा शिवछत्रपती आधी वाचले नव्हते . आपणाकडून जे वस्तुनिष्ठ लिखाणाची अपेक्षा असते ती आज फोल ठरली लेख वाचताना जाणवते कि पुस्तक तुम्ही फक्त आरोप खोडून काढण्यासाठीच वाचले कि काय ? विवेचन पूर्णपणे एकाकी आणि बचावात्मक आहे. आणि प्रस्न फक्त शब्दांचा नाही एकंदरीत पुस्तकातून जि प्रतिमा निर्माण केली आहे ती चुकीची आहे. आणि अजून काही आक्षेप असतील तर सांगा , हे जरा अतीच आहे म्हणजे मी तयार आहे ते खोटे ठरवायला , या मानसिकतेतून कशी काय वस्तुनिष्ठ आणि खरी मांडणी होणार ?. आणि शिवाजींना घरा घरात पोचवायला बाबासाहेब कशाला ? शिवाजी सर्वांच्या घरा घरात आधी होते व नंतर हि राहतील ... शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पोहचले...

    ReplyDelete
    Replies
    1. ही खरी मांडणी...शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पोहचले

      Delete
    2. ही खरी मांडणी...शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पोहचले

      Delete
  18. अतिशय उत्तम रित्या आपण हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला आहे संजय जी.. आपला हा लेख वाचून तरी काही दिशाभूल झालेल्यांचे डोळे उघडतील अशी अशा आहे.. निव्वळ ब्राह्मणद्वेषा पोटी असले घाणेरडे आक्षेप घेतले गेले आहेत. पुरंदरे ब्राह्मण नसून इतर जातीय असते तर मात्र ह्यांनी आक्षेप घेतला नसता. स्पष्ट दिसून येते कि शब्दांची तोडमोड करून आक्षेपार्ह वाक्य बनवली गेली आहेत.. उदाहरणार्थ-

    चुकीचे वाक्य- "मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत."

    खरे नमूद वाक्य- "ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"

    ह्यात स्पष्ट जातीवादाची ठिणगी पाडण्याचा प्रयत्न दिसून येतो. अश्याने महाराजांनी एवढ्या संघर्षा नंतर एक केलेले महाराष्ट्र (स्वराज्य) शांत आणि संगठीत कसे राहील ह्याचा विचार ह्या स्वकथित शिवभक्तांना करायला हवा!! कुणी तरी ह्यांना सांगते आणि हे ऐकतात आणि मग स्वराज्यालाच तोडण्याचा प्रयत्न करतात. आपला लेख अतिशय तर्कसंगत आणि डोळे उघडे करणारा आहे.

    ReplyDelete
  19. संजय सोनवणी यांची भूमिका निपक्षपाती न्यायाधीशाची नसून खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणाऱ्या वकिलाची आहे, यात तीळ-मात्र शंका नाही. पुरंदरे हे मुळीच इतिहासकार नाहीत ते आहेत फक्त शाहीर, बस्स! त्यांनी लिहिलेले पुस्तक हा काही इतिहास ग्रंथ नव्हे तर ती एक कल्पनांच्या भराऱ्या घेऊन लिहिलेली कादंबरी आहे इतकेच! याच्या पेक्षा जास्त महत्व त्या कादंबरीला मुळीच नाही. वाचकांनी त्या पुस्तकाकडे कादंबरी म्हणूनच पाहणे योग्य आहे. या वेळेस सरकारने पुरंदरेंना "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार देऊन पुरस्काराचेच मातेरे केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!!!
    कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र?

    ReplyDelete
  20. बाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज
    बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविषयी अनेक गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी अतिशय चाणाक्षपणे या कादंबरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य वाचकाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. परन्तु जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीने पेटून उठलेल्या चिकित्सक बहुजन मावळ्याला मात्र पुरंदरेची ही लबाडी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदरेची ही लबाडी प्रा. श्रीमंत कोकाटे सरानी पुराव्यानिशी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखाचे संपादक प्रा. ज्ञानेश महाराव यानीही पुरंदरेचे लिखाण, आचार, विचार यातील विसंगती आणि लबाडी दाखवून दिली आहे.

    मी साधारणपणे पाच वर्षापूर्वी पुरंदरेची कादंबरी प्रथम वाचली. पुरंदरेच्या कादंबरीत इतकी शक्ती आहे मी मुस्लिमद्वेषाने पेटून उठलो. पुरंदरेची कादंबरी वाचणारी व्यक्ती मुस्लिमाना शिव्या घाताल्याशिवाय राहणार नाही, इतका या कादम्बरीत मुस्लिमद्वेष भरला आहे. शहाजी राजाना बाजुला ठेवून जिजाऊ, शिवराय आणि दादू कोंडदेव हे एक समीकरण पुरंदरेनी तयार केले आहे. शहाजी राजाना नेहमी गैरहजर दाखवायचे आणि दादू कोंडदेवाला जिजाऊ शिवरायासोबत दाखवणे यामागे पुरंदरेच्या मनात काय पाप होते? जेम्स लेनने जिजाऊ-शिवरायांची बदनामी करण्याच्या आधी त्याची बीजे पुरंदरेनी आपल्या कादंबरीत रोवली होती. जेम्स लेनद्वारे जिजाऊ-शिवरायांची बदनामी म्हणजे पुरंदरेच्या त्या बीजाचा वृक्ष होउन त्याला लागलेली नासकी फळेच होत.
    सोलापूर येथे झालेल्या जनता बँक व्याख्यान मालेत जेष्ठ शिवशाहीर (?) बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन चे कौतुक केले होते. जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार पुरंदरे यांनी काढले होते. जेम्स लेन ने शिवराय आणि जिजाऊ यांच्याबद्दल जो गलिच्छ मजकूर लिहिला तो पुरंदरे यांना दिसला नाही का ? पुरंदरे यांनी हिंदू किंग : इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक न वाचताच त्याची तरफदारी कशी काय केली ?

    ReplyDelete
  21. राजा शिवछत्रपती कादंबरीत पुरंदरेनी उधळलेली मुक्ताफळे-

    " शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... "

    मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) (संदर्भ- http://babapurandare.blogspot.com/ )

    हे लिखाण म्हणजे पुरंदरे यांच्या मनाच्या कल्पना नाहीत का ? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का ?उलट हे विकृत लिखाणाचा पुरावा नाही का ?


    पुरंदरेंचा माफीनामा
    शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत बाबासाहेब पुरंदरे होते. शासनाने इतिहासकारांच्या अहवालावरून १९ फेब्रुवारी हि शिवजयंतीचीतारीख जाहीर केली. याच पुरंदरेने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयंत साळगावकरांना पत्र दिले. म्हणजे शिवजयंतीचा वाद बाबा साहेब पुरंदरेनीच लावला .देशभर जगभर एकदाच शिवजयंती होऊ नये यासाठी पुरंदरेने शिवजयंतीचा वाद निर्माण केला . त्याबद्दल त्यांना संभाजी ब्रिगेड चे पंढरपूर तालुका अध्यक्ष अमरजीत पाटील यांनी विचारणा केली असता पुरंदरे यांनी माफी मागितली.

    ReplyDelete
  22. बाबासाहेब पुरंदरे बद्दल नामवंत इतिहासकारांचे मत-
    बाबासाहेब पुरंदरेबद्दल नामवंत इतिहास करांचे म्हणणे मी संदर्भासहित देत आहे आपण सर्वांनी त्याचा शांत मनाने विचार करावा.

    १)सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र नेमाडे "शिवाजी महाराजांसोबत नुर्बेग ,दौलतखान सिधीहीलाला मदारी मेहतर इब्राहीम खान हि मंडळी होती.मात्र बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडात यांचे कधी नाव आलेच नाही. पैसे मिळतील म्हणून जसा मुद्रांक छापायचा प्रकार जसा त्याला संरक्षण देणाऱ्याच्या अंगावर उलटला इतिहास लेखनात झालेले प्रकारही असेच उलटतील शिवाजी महाराजांचा केवळ हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला गेल्याने इतिहासकारांनी तिरप्या पद्धतीने बांधलेली हि चुकीची भिंत आता त्यांच्यावरच कोसळत आहे, अशा गोष्टी दूर केल्याशिवाय आता आपल्याला महासत्ता होता येणार नाही"
    संधर्भ -नेमाडे भालचंद्र 'चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यावर भिंत कोसळत आहे '
    लेख दैनिक लोकसत्ता ,दिनांक १ जाने 2004

    २)प्रसिद्ध प्राच्यविद्यातज्ञ व मार्क्स फुले आंबेडकरवादी विचारवंत कॉ. शरद पाटील "एका बाजूला शिवाजी महाराजांना डोक्यावर घेवून भाबड्या शुद्रतीशुद्राना नादाला लावायचे आणि दुसर्या बाजूला शिवाजी महाराजांना बदनाम करायचे. यात सर्वात वाकबगार शिवशाहीर पुरंदरे आहेत "
    संदर्भ-पाटील शरद ,'शिवाजीचे पितृत्व व अब्राम्हनी विमोचन संघर्ष 'शोधनिबंध पान ५

    ३)सुप्रसिद्ध इतिहास संशोध्कार सेतुमाधवराव पगडी यांनी पुरंदरेला इतिहास संशोदक ठरविनार्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे ते म्हणतात "आता मला लोक विचारतात, काय हो पुरंदरेच्या शिवचरित्र बद्दल तुमचे काय मत आहे ?त्याला मी एकाच उत्तर देतो. पुरंदरे स्वतः म्हणतात कि'हे शिव्चारीरा म्हणजे इतिहास न्हावे ऐतिहासिक साधनावर आधारलेली बखर आहे,आणि मी शाहीर आहे .' असे असून सुधा आपण त्यांच्या मागे लागतो इतिहाससंशोधक काय म्हणतात म्हणून . हा त्यांच्यावर अन्याय आहे"
    संदर्भ- पगडी सेतू माधवराव पूर्वोक्त पान 11

    ४)थोर इतिहासकार त्र्यं. श. शेजवलकर पुरंदरेचे लिखाण अतिशयोक्त असल्याचे सांगून 'ब मो पुरांदारेचे राष्ट्रीय स्वयंसेवकी विचार 'या शिर्षकाखाली पुरंदरेच्या विचारसरणीवर प्रकाश टाकतात
    संधर्भ - शेजवलकर त्र्यं. श.पूर्वोक्त पान ५०३
    असे बरेच इतिहासकार आणि विद्वान यांच्या विचारावरून पुरंदरेची विचार सारणी व दर्जा सर्वांना समजू शकतो

    प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या कादंबरीला " भटी शिवचरित्र " म्हटले आहे.

    ReplyDelete
  23. पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.

    १. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
    २. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
    ३. दादोजी कोंडदेव पुरस्करासंदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर करू शकले नाहीत?
    ४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
    5. जेम्स लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसण्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
    ६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या विषयावर परिसंवाद ठेवला होता. यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
    ७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वतः समविचारी संघटनांच्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
    ८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?

    अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.

    ReplyDelete
  24. अतिशय संतुलित विवेचन, आपल्यासारखे डोळस आणि विवेकी विचारवंत समाजात आहेत म्हणून अजून तरी आशादायक चित्र आहे, अन्यथा दारू पिऊन मनुष्यवधास कारणीभूत ठरलेल्या सलमान खानच्या भोवताली हजार माणसे, आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांना समजून न घेता त्यांच्या पायाच्या नखाची सुद्धा सर नसलेली आणि व्यक्तिगत जीवनात चारित्र्यहीन असलेली माणसे निखील वागले बरोबर फिदीफिदी हसत बसलेली बघून महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या भवितव्याची काळजी वाटत होती. ---डॉ.संदीप श्रोत्री

    ReplyDelete
  25. शिवचरित्राला डसलेला विषारी नाग: बाबा पुरंदरे.....

    पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच झाले होते. यामागे बहुजनांचे तर ब्राह्मणी व्यवस्थेचा धुर्तपणा आहे.
    आजपर्यंत शिवचरित्राची कोणीच वाट लावली नसेल इतकी बाबा पुरंदरेने लावली आहे (वाट लावणे म्हणजे सत्यानास करणे). पुरंदरे हा तसा पेशवे इतिहासाचा लेखक होता पण त्याला तिकडे लोकमान्यता मिळाली नाही म्हणुन शिवचरित्राकडे वळला. राष्ट्रपिता फ़ुले आणि क्रुष्णाजी अर्जुन केळुस्करांनी लिहिलेले खरे शिवचरित्र संपविण्यासाठी पुरंदरेने उभी हयात घालविली.शिवरायांचे खरे शिवचरित्र लपवुन पुरंदरेने शिवरायांच्या माध्यमातुन दैववाद, अंधश्रद्धा, मुस्लिमद्वेष, विषमता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.रामदास ,दादू कोंडदेवाचे उदात्तीकरण तर बहुजनांत फ़ुट पाडण्याचा प्रयत्न केला. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राह्मणांच्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. शिवरायांच्या जिवनातील खर्या बाबींचा अनुल्लेख तर नाट्यमय घटकांचे उदात्तीकरण करून पुरंदरेने शिवरायांची विटंबना केलेली आहे.
    शिवाजीराजांचे नाव घेऊन पुरंदरेने कोट्यावधी रुपये कमावले.त्यातून पुरंदरेने सावरकर चित्रपटाच्या निर्मितीसाठी ८० लाख रुपये दिले.(दै. लोकमत : २७/७/२००३)शिवरायांवर टिका करणार्या सावरकराच्या चित्रपटासाठी शिवरायांचा पैसा वापरणारा पुरंदरे हा शिवप्रेमी नसून शिवद्रोही आहे. शिवजयंतीच्या तारीख तिथीचा वाद लावण्याचे काम पुरंदरेनेच केले.
    राजाशिवछत्रपती या यामधील विष :
    * "शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... "
    (हा हरामीपणा पुरांदारेने का करावा ?"कुजबुजु" म्हणजे काय ? कोणाबाबत लिहितोय ? कोणते शब्द वापरतोय ? त्यातून अर्थ काय होतात ? येव्हाडी अक्कल नाही का पुरंदरेला ?)
    * मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत......(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती )
    हे लिखाण म्हणजे पुरंदरे याच्या मनाच्या कल्पना नाहीत का ? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का ?उलट हे विकृत लिखाणाचा पुरावा नाही का ?
    * बाबा पुरंदरे म्हणतो( पानं. १२६, पंधरावी आव्रुत्ती) ते आईसाहेबांवर फ़ार माया करत,शहाजीराजांचा नसेल एवढा जीव त्यांचा शिवबांवर होता.पंत देशस्त ॠग्वेदी ब्राह्मण ? गोत्र शाडील्य तर त्यांचे(पंताचे)आईसाहेबांचे व शिवबाचे गोत्र एकच होते. ? ते कधी कधी स्वताच्या संसारात लक्ष घालीत.
    (वडिलांचे आणि मुलग्याचे गोत्र एकच असते, त्यामुळे हे वाक्य लिहिण्यामागे पुरंदरेच्या मनात काय पाप आहे ते स्पष्ट आहे.)

    हळू हळू येईल बाहेर कोणी काय काय दिवे लावले आहेत ते...बऱ्याच ठिकाणी पुरंदरेंनी घेतलेला Stand हा अनाकलनीय आहे....
    पहिल्यांदा त्याला शिवशाहीर का बरं म्हटले जाते हेच कळत नाही??????
    वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे.......
    पण उदया कोणी खरा इतिहास तज्ञ झाला कि नक्कीच पुरांदरेचे पितळ उघडे पडणार....

    सौजन्य: विश्व मराठी

    ReplyDelete
    Replies
    1. aho jyachya sathi ha lekh lihilay tech mudde tumhi upasthit karun tumhi kashala swatahache hase karun gheyat

      Delete
    2. सावरकर शिवरायांचे द्वेष्टे? मी नुसते वाचत होतो. पण आता लिहिल्यावाचून राहवत नाही. सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरती वाचा. एखाद्याची अति स्तुती करणे म्हणजे आरती करणे म्हणतात. ही आरती मराठी भाषेचे अप्रतिम लेणे आहे असे मला वाटते. आता काय बोलावे आणखी? आम्ही राजा शिवछत्रपती वाचले, त्यातील घ्यायचा तोच संदेश घेतला. म्हणजे राजा शिवछत्रपती आवडणारे मूर्ख? मुसलमानांचा द्वेष वाटत असेल तर त्यांची नावे बदलणार का? तेव्हाचे आक्रमक आणि आताचे मुसलमान एक कसे? विजय देशमुख यांच्या 'शककर्ते शिवराय' ची सुरुवातच मुहंमद पैगंबरांपासून आहे. कवी भूषण औरंगजेबाला सोडून महाराजांकडे आला. त्या शिवाजी महाराजांना बाबासाहेब मुस्लीम विरोधी दाखवत आहेत? हात टेकले.

      Delete
  26. Sanjay sonavani tumche gotra konte te aaj spasht zale. purandarenna Maharashtra bhushan dilyabaddal anek lokanni aakshep nondavle aahet. Parantu tyatlya tyat kamkuvat aslelya aakshepannach tumhi uttare dilit. Tyamule te kamkuvat aakshep nondavnaryanpeksha tumhi shahane aahat evdhech siddha hote. Vasrat tumhi langdi gay tharlyache samadhan tumhala milalehi asel, pan sambhaji briged aani purandare ya donach baju ya vadala aahet Kay? Maharashtra bhushan puraskar detana kiman patrata asavi ki nahi? Itihasat kalpanavilas ghusadnarya lekhkala ha puraskar dyava ka? Dadoji konddeva vishyichya dantakatha purandarenni tyavelchya samjutipramane ghusavlya ase tumhich manya kelet, pan Jo manus sanshodhanachi tasdi ghet nahi tyala puraskar denyavishyi tumhi anukulta dakhvita, yatach tumchya gotrachi pariksha hote. Brigedi aakshepanchi chirfad karne chukiche nahi, pan tyanni chukiche aakshep nondavle mhanje purandare puraskarasathi layak tharat nahit.
    Sonavani sanghachya valchanila jaun baslach aahat tar punha parivartanvadi aslyacha aav aanu naka. Keval sambhaji briged chukichi aslyache dakhvine evdha ekmev uddesh ya likhanamage disto. Ya puraskarasathi purandare nalayak aahet ase mat tumhi kuthehi nondavlele nahi. Yapeksha tumhi tatasth rahila asta tar tumhi parivartanvadi aslyacha aamcha bhram kayam rahila asta. To door kelat, dhanyavad.

    ReplyDelete
    Replies
    1. खेडेकर साहेबांवर स्त्रियांच्या विनयभंगाचे आरोप आहे ते खरे आहेत का ?
      कोकणात मराठा नाही तर फक्त भंडारी समाजाची सत्ता चालते. मराठ्यांना पण कोकणात आमच्या भंडारी समजामुळे यश मिळाले.
      स्वराज्य हि काय कुण्ब्यांची जहागीरदारी नाही. आमचा पण वाटा आहे त्या मध्ये.

      Delete
  27. Thanks for you hard work writing this honestly.

    ReplyDelete
  28. वाद व्यावसायिक स्पर्धेतूनच...
    गेली ६० वर्षे मराठी मनांवर बाबासाहेब पुरंदरे यांचे गारूड आहे. त्यांच्या शिवचरित्राच्या ५ लाख प्रती विकल्या गेलेल्या असून अन्य कोणत्याही शिवचरित्राला वाचकांचा एव्हढा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्या शिवचरित्र कथनाच्या हजारो कार्यक्रमातून त्यांना लक्षावधींनी ऎकले असून त्यांच्या "जाणता राजा"चे हजारो प्रयोग झालेले असल्याने तेही लाखोंनी बघितले आहे.
    संभाजी ब्रिगेडला मराठी माणसांच्या मनात ही जागा मिळवायची महत्वाकांक्षा असणे वावगे नाही.त्यासाठी बाबासाहेबांना रिप्लेस करणे गरजेचे आहे. पण त्यांच्याकडे कोण आहेत तर श्रीमंत कोकाटे आणि दारव्हटकर. त्यासाठी जो व्यासंग, मेहनत, सातत्य, चिकाटी नी मिशनरी वृत्ती लागते ती यांच्याकडे आहे का? नसेल तर मग शोर्टकट मारा.
    एखाद्या ख्यातनाम माणसाची भर चौकात गचांडी पकडली की ती पकडणारा रातोरात प्रसिद्ध होतो.
    ब्रिगेडचे राजकारण नेमके हेच आहे.
    ते बाबासाहेबांचा द्वेष करीत आहेत तो याच कारणाने. त्यासाठी संदर्भ सोडून बाबासाहेबांना उद्धृत करणे, धादांत खोटे लिहिणे नी बोलणे चालू आहे.ब्रिगेडला शिवराळपणाने तात्कालिक लोकप्रियता मिळॆलही पण कायमस्वरूपी मात्र बाबासाहेब हेच अधिक मोठे होतील.

    ReplyDelete
  29. वाद व्यावसायिक स्पर्धेतूनच...
    गेली ६० वर्षे मराठी मनांवर बाबासाहेब पुरंदरे यांचे गारूड आहे. त्यांच्या शिवचरित्राच्या ५ लाख प्रती विकल्या गेलेल्या असून अन्य कोणत्याही शिवचरित्राला वाचकांचा एव्हढा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्या शिवचरित्र कथनाच्या हजारो कार्यक्रमातून त्यांना लक्षावधींनी ऎकले असून त्यांच्या "जाणता राजा"चे हजारो प्रयोग झालेले असल्याने तेही लाखोंनी बघितले आहे.
    संभाजी ब्रिगेडला मराठी माणसांच्या मनात ही जागा मिळवायची महत्वाकांक्षा असणे वावगे नाही.त्यासाठी बाबासाहेबांना रिप्लेस करणे गरजेचे आहे. पण त्यांच्याकडे कोण आहेत तर श्रीमंत कोकाटे आणि दारव्हटकर. त्यासाठी जो व्यासंग, मेहनत, सातत्य, चिकाटी नी मिशनरी वृत्ती लागते ती यांच्याकडे आहे का? नसेल तर मग शोर्टकट मारा.
    एखाद्या ख्यातनाम माणसाची भर चौकात गचांडी पकडली की ती पकडणारा रातोरात प्रसिद्ध होतो.
    ब्रिगेडचे राजकारण नेमके हेच आहे.
    ते बाबासाहेबांचा द्वेष करीत आहेत तो याच कारणाने. त्यासाठी संदर्भ सोडून बाबासाहेबांना उद्धृत करणे, धादांत खोटे लिहिणे नी बोलणे चालू आहे.ब्रिगेडला शिवराळपणाने तात्कालिक लोकप्रियता मिळॆलही पण कायमस्वरूपी मात्र बाबासाहेब हेच अधिक मोठे होतील.

    ReplyDelete
  30. Sir, babasaheb purandarenchya likhanavishayi tumhi dilelya abhyaspurn spashikaranabaddal aabhar. Hech spashtikaran jar Babasaheb Puranadare ya aadhich dete tar evadha gadarol kadachit jhala nasata.

    ReplyDelete
  31. हा संजय सोनावनी यांनी शिवशाहीर बाबासाहेंब पुरंदरे ह्याना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार देण्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या चर्चे नंतर लिहीलेला ब्लॉग आहे. महाराष्ट्राचा नविन भडवा ( हा शब्द मी मुद्दाम वापरत आहे यांची भडवेगिरी आमच्या ठाणे जिव्ह्यातील राष्ट्रवादीच्या सोडुन गेलेल्या लोकांच्या तोंडुन ऐकली आहे.) जितुमिया च्या आरोपातील हवा काढणारा ब्लॉग आहे. हे जर मी लिहीले असते तर म्हणाला असता बामणाची बाजु बामणीने घेतली म्हणुन त्याला त्याच्या शब्दात दिलेले उत्तर म्हणुन घ्या. व लगे हात सांगावे की वैचारिक सुंथा झाली आहेच.आता कलमा पढुन पाक ( पाकीस्थानी ) कधी होणार. म्हणजे आम्हाला तुझ्यावर हिंदु म्हणुन टिका करायला नको व तुला हिंदु म्हणवुन घेऊन हिंदुंची नालस्ती करायला नको.
    माझी लिखाणाची शैली माहित असलेल्याना ह्या लेखातील मी वापरलेली शब्दसंपदा नक्की धक्का देणारी आहे. पण काय करणार.

    पिंडीवरी विंचु आला।
    देवपुजा नावडे त्याला।
    तेथे पैजाराचे काम।
    जो अधमाशी अधम॥


    ता.क मी संजय सोनावनी यांची बाजु घेत नाही कारण हे ही हिंदु धर्मावर टिका करणारे म्हणुन ओळखले जातात. पण मला हेच दाखवायचे होते की ब्रिगेडी, आव्हाडी लोक किती तकलादु गोष्टीवर शिवशाहिराना विरोध करत आहेत. हे सिध्द होते व एका तथाकथित पुरोगामी माणसाकडुन चड्डी निघाल्यामुळे हांना नागडे होण्याचे कमी दुःख होईल येवढाच ह्या ब्लॉग चा उपयोग आहे. कारण ह्या बाटग्यांपेक्षा हे पुरोगामी म्हणवणारे जास्त डेंजरस आहेत.
    सौ.अंजली भास्कर ओक

    ReplyDelete
  32. mr.sanjay sonavani dont support people like baba purandare, because everyone knows the truth, nobody is fool today as you are thinking, . . .

    ReplyDelete
  33. शाहीर म्हणजे हातात डफ-तुणतुणे घेवून सळसळत्या उत्साहात जोशपूर्ण हालचाली करत आपल्या पहाडी आवाजात पोवाडे -कवने ( किंवा लावण्या ई .) गाणारा रचनाकार गीतकार,भाष्यकार ! निदान आम्हाला तरी "शाहीर "या शब्दाची हीच व्याख्या माहिती आहे . माननीय (?)बाबासाहेब पुरंदरे या व्याख्येत कुठेच बसत नाहीत .त्यांनी आजवर कुठलाही पोवाडा किंवा कवन रचलेले किंवा गायलेले नाही. त्यांना कुणीही हातात डफ तुणतुणे घेवून ते वाजवताना पाहिलेले नाही. होय , यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर काही पुस्तके जरूर लिहिली आहेत . जाणता राजा नावाचे एक सर्कसवजा यांत्रिक नाटक ठीकठिकाणी जाऊन सादर केले आहे. व शिवगान या नावाखाली व्याख्यानाचे प्रयोग केले आहेत. या आधारे त्यांना फारफारतर इतिहासकार ,व्याख्याता किंवा दयाबुद्धीने नाटककार म्हणता येयील. परंतु शाहीर आजीबात नाही, शिवशाहीर तर नाहीच नाही.

    ReplyDelete
  34. मुद्देसूद आणि तटस्थ विवेचन !

    ReplyDelete
  35. उत्तम मुद्देसुद आणि मूळ हेतुला धरुन केलेले विवेचन
    आवडले :)

    ReplyDelete
  36. आप्पा - बसा - या हो बाप्पा -!कधी नव्हे ते आपल्याशी संजय बोललाय , फार फार बरे वाटले , आपल्याला खवचट म्हणतोय , पण ठीक आहे , लहान मुलाचे बोबडे बोल पण गोड वाटतात , असे समजू या !
    बाप्पा - किती धडपड करत होता त्या दिवशी , प्रकाशन समारंभासाठी !बिचार्याची किती ओढाताण - घसा सुकला होता !
    आप्पा - सर्वात आधी आपण जे सांगायचं ठरवलं ते सांगू
    बाप्पा - जितके म्हणून इतिहास कारांचे फोटो आहेत त्यांची नावे साध्या डोळ्याना वाचतासुद्धा येत नाहीत ,त्यामुळे कोण कसे दिसत असे त्याचा काहीच अंदाज येत नाही
    आप्पा - जर संजयाने एकसारख्या नावाच्या ठळक पाट्या करून प्रत्येक फोटोखाली लावल्या तर फारच बरे होईल आणि फोटोपण जर नजरेच्या टप्प्यात आले तर उत्तमच इतका बिनडोकपणा फक्त इतिहासकाराच करू शकतात !
    बाप्पा - शहाजी शिवाजी आणि संभाजी ( तिन्ही महाराजांचा विजय असो ) यांच्या फोटोखाली जर इवल्याशा अक्षरात नाव लिहिले तर चालेल का ? किंवा तसे पाहिले तर सगळेच संत एकामागोमाग फ्रेम करून लावले आणि नावेच नाही टाकली तर ? सामान्य माणूस काय करणार ?

    आप्पा - आता मूळ विषयावर थोडे जमेल तसे - संजय म्हणतोय की तुम्ही पुरंधरे आणि कुणबिणी या विषयावर का नाही प्रतिक्रिया दिली ?
    बाप्पा - इतक्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि त्यासुद्धा इतक्या सुमार दर्जाच्या की आपण अविनाश पाटसकर म्हणतात तसे " गप्प बसा " केलेले बरे असे वाटू लागते .
    आप्पा - आपण इतकी वर्षे राजा शिव छत्रपती वाचत आहोत , त्यांची भाषणे ऐकत आहोत , त्यांच्या बरोबर गडावर गेलो आहोत , हा माणूस त्याची वाणी आणि लेखणी फक्त शिवाजीची भक्ती करण्यासाठी वापरतो आहे , आजचा जमाना व्यावसायिक बनला आहे त्यात पुरंधरे तग धरून आहेत , नव्हे शिखरावर आहेत !तेच अनेकांच्या डोळ्यात सलते आहे !
    बाप्पा - कोण काय बोलते आहे याकडे ते लक्ष देत नाहीत हे योग्यच आहे
    आप्पा - नरहर कुरुंदकर यांचे श्रीमान योगीचे प्रास्ताविक किती सुंदर आहे , शिवाजीचे मूल्यमापन करताना त्यांनी किती सुंदर शब्द वापरले आहेत
    इतकी वर्षे इतका वेळ ,श्रम खर्च करत एखादा माणूस फक्त एखाद्या उत्तुंग व्यक्तीचे वर्णन केवळ जाती विद्वेषामुळे , पाताळ यंत्री पणाने करत बसेल असे विधान करणे हे वेडगळ आणि विकृत वाटते
    बाप्पा - आपल्या प्रत्येकाच्या लहानपणापासून हा राजा आपले जीवन व्यापून टाकतो
    आप्पा - आणि अवघ्या ५०व्या वर्षी हे जग सोडून जातो म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते
    जात पात याच्या पलीकडे जाउन घरोघरी पुजला जाणारा हा जाणता राजा होता आहे आणि राहील , त्यासाठी दीड दमडीच्या छावा किंवा तत्सम संघटनांच्या सर्टिफिकिटची गरज नाही
    बाप्पा - कोण कोणासाठी लढत होते हे त्या काळात अधोरेखित व्हायचे होते असा तो मध्य युगीन जमाना होता , मोरे घोरपडे असे जुने वतनदार तरी शिवाजीला कुठे जुमानत होते ?शिवाजीने जे स्फुल्लिंग जनतेत जागृत केले होते त्याची जाणच जर त्या कालच्या आणि आजकालच्या नेत्यांना नसेल तर ते आपली पोळी भाजून घेण्यासाठी कोणत्याही पानात विष कालवू शकतात हे ऐतिहासिक सत्य आहे
    आप्पा - संजयाने अत्यंत समतोलपणे बाबासाहेब पुरंधारे यांची बाजू अभ्यासून लिहिले आहे - ते अनेकांच्या पचनी पडणार नाही - कारण साधे आणि सरळ आहे जातीच्या राजकारणाने अनेक सामान्यांचा बळी घेतला आहे त्यांच्याच प्रतिक्रिया वाचताना मन विषण्ण होते .
    बाप्पा - संजयचे मनापासून अभिनंदन !

    ReplyDelete
  37. राजा शिव छत्रपती हे दोन भागात आलेले चरित्रवजा , लिखाण आमच्या समोर गेली
    अनेक वर्षे आहे , सन्माननीय ब मो पुरंधरे यांच्या पूर्वी अनेकांनी चरित्रवजा लिखाण केले आहे पण ओघवती भाषा आणि सुरेख चित्रांची जोड ,प्रसंग प्रभावीपणे जिवंत करून दाखवण्याची त्यांच्या लेखणी आणि वक्तृत्वाची ताकद अफाट आहे
    त्यातून त्याना काय साधायचे होते आणि ते साधले का ? हा प्रश्न आज पुढे येतो !
    पुरंधरे यांनी जेंव्हा सुरवात केली त्यावेळेस , इतक्या वर्षांनी असा भडका होईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल , पण जसजसे ,
    मराठा मराठेतर राजकारण फुलत गेले आणि त्याची खरी झळ मराठेतर शेतमजूर आणि ओबीसी याना बसू लागली . रोजगार हमी योजने सारख्या योजना राबवून खालच्या वर्गातील
    ग्रामीण अर्थ व्यवस्था स्थिर स्थावर होतानाच सहकारी कारखाने आणि श्रीमंत शेतकरी याना शेत मजुरांचा प्रश्न सतावू लागला , तेंव्हा त्या शोषितांच्या परिस्थितीला ब्राह्मण द्वेषाची झालर लावून काही वर्षे तगून नेली गेली पण नंतर खरा लढा हा मराठा आणि मराठेतर असाच आहे हे उमगल्यावर , राजकारण , ब्राह्मण द्वेष आणि मराठा असे होत गेले तसतसे ,
    मराठा समाजाला शिवाजी या राष्ट्र्नायकावर आपला हक्क दाखवणे गरजेचे वाटू लागले !आणि जणू हे थोर व्यक्तिमत्व त्यांची खाजगी जहागीर झाली !
    कारण आजवर ब्राह्मण , कायस्थ , सीकेपी यांनी सरसकट शिवाजीला आपला मानत त्याचे गोडवे गायले होते त्यातून सुरु झाले विद्वेषाचे राजकारण !
    फुले माळी समाजाचे , आंबेडकर पद दलितांचे , शाहू मराठा समाजाचे असे वर्गीकरण होत गेले आणि त्या विचाराने सर्वांचेच अवमुल्यन होत गेले
    तीच गोष्ट स्वामी समर्थ आणि गजानन महाराज आणि साई बाबा यांची झाली आहे
    कोणतीही अनधिकृत पावभाजी वडापाव किंवा छोटी टपरी हि या साधुसंतांच्या नावाने चालवली जाते , त्यांचा प्रकट दिन किंवा निर्वाण दिन भर रस्त्यात साजरे केले जाते , त्याला सार्वजनिक रूप देत एक सामाजिक कार्य केल्याचा दावा मांडत अनधिकृत कामे अधिकृत म्हणून रेटली जातात
    हे सगळे ओंगळ आहे - भयानक आहे आणि गलिच्छ आहे !
    तसे पाहिले तर पूर्वी हा असा विखारी विचार नसायचा , पण आज प्रत्येकाचे व्यापारीकरण झाले आहे ,
    शिवाजी प्रमाणेच , दुसरे दैवत पंढरपूरचा पांडुरंग , ह भ प बाबामहाराज सातारकर आणि अनेक कीर्तनकार या ना त्या रुपात अभंग कीर्तने या रूपाने आपली प्रवचने लोकांसमोर ठेवत आहेत , त्यांचा उद्देश काय असेल ? त्यात निखळ शुद्ध भक्तिभाव थोडाच असणार आहे ?
    प्रत्येक पूल रस्ते आणि बागा , तलाव यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे नाव देण्याची जी एक फ्याशन सुरु झाली त्यामुळे अनेकवेळा विनोद आणि फजितीची वेळही आलेली दिसते
    सरसकट प्रत्येक विद्यापीठ आणि शाळा यांना थोर प्रभूतींचे नाव दिलेच पाहिजे का ?हा पण एक विचार करण्याचा मुद्दा आहे !
    खरा विकास म्हणजे काय ? खरी सार्वजनिक स्वच्छता म्हणजे काय खरे प्रबोधन म्हणजे काय ? हे बाजूलाच ठेवत कुणाला तरी कशाबद्दल तरी अस्वस्थ करत राहणे , आणि आजच्या त्या वर्गाच्या अपयशाला दुसराच वर्ग जबाबदार आहे असे तिसऱ्या वर्गाने म्हणत सभा जिंकणे हे सूत्र समाज विघातानाचे काम मात्र अस्सलपणे करत आहे , आता समाज एक होण्याची शक्यता दिवसे दिवस कमी होते आहे , हे सर्वात आधी ओळखले ते ब्राह्मण वर्गाने !त्यांनी त्यांची व्युह्राचानाच बदलली - या देशात काहीही चांगले करण्याची किंवा होण्याची शक्यता दुरावत गेल्याने त्यांनी परदेशागमन व्यवहार्य मानले , त्यात काय चुकले आज हाच ब्राह्मण वर्ग मानाने परदेशात त्यांच्या योजना सफल होण्यासाठी जिवाचे रान करत असताना दिसतो - हे कसे ?
    फालतू देवधर्म आणि अवडंबर यात गुंतून न राहता , हा समाज कितीतरी प्रगत झाला आहे !
    आजचे आपले पदाधिकारी कोण आहेत ? रस्ते , पाणी , त्यांची अवस्था , मुंबई शहराची परिस्थिती आणि शिवसेनेने केलेली लूट , तसेच काँग्रेस चा भ्रष्टाचार , त्यांच्या पावलावर पाउल टाकत आज बीजेपी जात आहे - सर्व एका माळेचे मणी आहेत , राजकारणातून समाज कारण कधीही साधत नाही ,प्रबोधन तर नाहीच नाही
    आपल्याकडे मुलाना खेळायला मैदाने नाहीत , एक मूळ एक कुटुंब , त्यामुळे नाती आटत चालली आहेत , मित्र नक्की नेमके चांगले भेटतील याची खात्री नाही , शाळेत शिक्षक आरक्षित त्यामुळे त्यांचे उच्चार दर्जाहीन , प्रत्येक वळणावर दर्जाशी तडजोड करत , हा भ्रष्ट समाज काय साधत आहे ?आणि अशा वेळी परत परत लोकांची जुने सांगाडे उकरून करमणूक होत असेल तर त्या समाजाला परमेश्वरही वाचवू शकणार नाही !
    शिवजयंती ला मिरवणूक काढून आपली रग जिरवणे , नवरात्र आणि गणपती या दिवशी आचरट अंग विक्षेप करत नाचणे म्हणजे सांस्कृतिक वारसा जपणे असा अर्थ होतो का ?
    जितेंद्र आव्हाड हा तर अत्यंत हिणकस प्रवृत्तींचा इसम आहे . त्याच्या बद्दल काही बोलणे म्हणजे त्याची दाखल घेतल्या सारखे होईल , तितकी त्याची लायकीही नाही !

    ReplyDelete
    Replies
    1. आपले विचार उत्कृष्ट आहेत. आपण नक्कीच एकविसाव्या शतकातील आहात व बाविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहात. काही लोक (विशेषतः राजकीय) आपल्या स्वार्थासाठी समाजाला मागच्या दिशेने रेटत आहेत. नकारात्मक विचार अल्पजीवी असतो. एखादा विचार अथवा चळवळ दीर्घ काल टिकायची असल्यास तिला सकारात्मक विचाराचे भक्कम पाठबळ लागते. आजच्या घडीला कार्यरत असलेल्या कोणत्याही संघटनेचे उदाहरण घेता येईल.

      Delete
  38. सोनवणी सर, सप्रेम नमस्कार!
    मी अमरावती वरून सचिन चौधरी.
    सर्वप्रथम अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की मी मराठा सेवा संघ या संघटनेशी संलग्न आहे.
    सध्या पुरंदरे प्रकरणा संबधी सुरू असलेल्या वादाबाबत आपण ६ मे रोजी "राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!" हा लेख लिहून पुरंदरे यांचेवर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण एक वैचारिक लेखक असल्याने आपणास सर्व प्रकारचे लिखाण करण्याचा निश्चितच अधिकार आहे. या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत "असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल" असे गौरवास्पद उद्‌गार सुद्धा लिहीलेले आहे. पुरंदरे यांचेबाबत आपणास असलेल्या या आपुलकीबाबत माझ्यासकट कुणालाही आक्षेप असण्याचा अजिबात अधिकार नाही.
    परंतु आपल्या Sunday, October 10, 2010 च्या ब्लॉग मधील "दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव" या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण लिहिता की "आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे."
    आता मात्र तुमच्या या दोन भूमिकॉमधील तफावत मला खूप प्रयत्न करूनही समजवुन घेता आली नाही.
    आपल्या ६ मे च्या शेवटच्या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत एक सुंदर वाक्य लिहिलेले आहे, "पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे."
    सर आपणास नम्रपणे विचारू इच्छितो की आपल्या १०-१०-२०१० च्या लेखा नंतर आज ६ मे च्या लेखाच्या कालावधी दरम्यान आपल्या विचारांत/निष्ठेत तर बदल नाही ना झाला? कारण बदलामुळेच भरभराट होते हा हल्ली आधुनिक डार्विनचा नवसिद्धांत आहे.
    कृपया गैरसमज नसावा. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. सचिन चौधरी.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय सचीनजी,

      मी आधीच म्हटल्याप्रमाणे सभ्य भष वापरल्याबद्दल पुन्हा आभार. खरे म्हणजे आपण जे प्रश्न उपस्थित केलेत ते अनेकांनी केलेत. त्यावर उत्तरेही दिली आहेत. तरीही तुमच्यासाठीही उत्तरे देतो:

      १) उपहास हा भाग आपल्याला समजत नाही अनेकदा. पुरंदरेबद्दल विकीवर जी माहिती दिलीय ती कोणी पुरंदरे भक्तानेच. आपण इतिहास संशोधक नाही तर केवळ शाहीर असा दावा पुरंदरेंनी अनेकदा केला आहे. आता ग. ह. खरेम्सारख्या इतिहासकाराच्या मार्गदर्शनाखाली भारत इतिहास संशोधन मंडळात काम केले असे जत्र येथे म्हटले जात असेल तर दावा खोटा कोणाचा ठरतो? मी उपहास केला आहे हे लक्षात सहज यायला हवे. "ही माहिती खरी असेल तर..." अशी माझी सुरुवात आहे.

      २) मला पुरंदरेंबद्दल आपुलकी असण्याचा संबंध नाही. त्यांन मी कधी प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही. ना कधी फोनवरुनही बोलणे झाले. आयबीएन लोकमत व अन्य च्यनेल्सनी मलाही चर्चेला बोलावले होते. पण मी मुळ पुस्तक वाचलेलेच नसल्याने नकार दिला. आयबीएनवरील चर्चा झाल्यावर मला अनेक पत्रकारांनी फोन करुन माझ्या प्रतिक्रिया विचारल्या. त्यांनाही मी प्रतिक्रिया दिली नाही. पुस्तक मिळवले व वाचले व जे आक्षेप आहेत ते खरे आहेत कि नाही हे पडताळून पाहिले. आक्षेपांवरचे माझे मत तुम्ही वाचलेलेच असल्याने द्विरुक्ते करत नाही.

      ३) दादोजी कोंडदेव, २०१०. हा लेख लिहिला त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. या लेखातील , "त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे".हे वाक्य वाचा. त्यावेळेस हे १३ अथवा यापैकी काही संशयित होते. पण नेमका कोण हे तेंव्हाही निश्चित झाले नाही अथवा २०१५ मद्धेही निश्चित झालेले नाही. माझे हेही विधान बरोबरच आहे. पण आजवर आम्ही नेमका दोषी शोधु शकलेलो नाही हा आमचाच दोष नव्हे काय? २०११ साली मी लेनशी पत्रव्यवहारही केला. त्याने "मी अनेकदा ही माहिती ऐकली." असे मोघम उत्तर देवुन त्याने कोणाचेही नांव घेतले नाही. मग आरोपी निश्चित होत नसतांना वारंवार तेच ते आरोप करणे सुज्ञपणात बसत नाही.

      Delete
    2. ३) २०१२. मेहंदळेंच्या मुलाखतीतील आक्षेपार्व विधानांना विरोध करणारा लेख लिहिणारा मी एकमेव होतो. तोवर दादोजी शहाजीराजांचा चाकरही नव्हता हे स्पष्ट करणारे पुरावे हाती आले. हे मी त्यात लिहिले. कौस्तुभ कस्तुरेचाही प्रतिवाद केला. नवीन पुरावे आले कि आधीचे मत बदलावे ही संशोधकीय शिस्त आहे. केवळ आरोपांची राळ उडवुन देणे आणि पुरावेही न बघणे यात शहाणपणा नाही.

      ४) पुस्तक वाचल्यानंतर आणि आक्षेप पडताळल्यावर लेखकाच्या तोंडी स्वत:चे शब्द घुसवणे, वाक्ये हवी तशी तोडून हवा तो अर्थ काडणे, पुढचे मागचे संदर्भ न देता एखादेच विधान वेठीला धरणे एवढेच प्रकार झालेले आहेत हे दिसले. ते कोणावरही अन्याय करणारे आहे. ही काही चळवळ होऊ शकत नाही. हे जे मला वाटणे याला "विचार बदलले, किंवा पुरंदरे प्रेम वाढले" वगैरे ते अनेक हेत्वारोप माझ्यावर गेल्या काही दिवसांत झाले आहेत. आरोप सोपे असतात, पण आरोपांना विचारांची बैठक नको काय? कोणीही मला आरोपकर्त्यांनी जे पुरंदरेंचे शब्द बदलले यावर स्पष्टीकरण दिले नाही. म्हणजे "आम्ही काय वाटेल ते आरोप करु, तुम्ही मधे पडायचे नाही अन्यथा तुम्ही भटाळले" असाच जर होरा असेल तर या देशात संशोधन/लेखन अशक्य होऊन जाईल.

      Delete
    3. ५) गोतियेने शिवमंदिर बांधायला काढले त्याला विरोध करणारा मी एकमेव होतो. खालील लिंकवरील तिन्ही लेख आवर्जुन वाचा.
      http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post.html
      http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post_26.html
      http://sanjaysonawani.blogspot.in/2013/06/blog-post_3.html

      यावेळेस माझ्या पाठीशी कोणी का आले नाही? मी कलमनामात जे आरोप केले ते खरे नाहीत हे तुम्ही कसे सिद्ध कराल? ही सरळ सरळ दुटप्पी भुमिका नव्हे काय? जर मंदिर हवे तर तशी भुमिकाही सेवा संघाने अथवा ब्रिगेडने घेतली असती तरी चालले असते, चर्चा झाली असती. पण तसे झालेले नाही हे वास्तव काय सांगते?

      खाली आपल्याच प्रश्नासारख्या एका मित्राने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर:

      "बच्छावजी, तुमच्यासारखा सुज्ञ बुद्धीवादीही शब्दच्छल करतो तेंव्हा नवल वाटते. ’ हे सर्व वा त्यापैकी काहीजन.." यातील अर्थ समजला नसावा. मी आधीच सांगितले कि मी पुस्तक आताआता पर्यंत वाचलेले नव्हते. पण एवढे आरोप होत आहेत तर आरोपकर्त्यांचे खरे असले पाहिजे हा विश्वास. पण त्याहीपेक्षा त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. अर्धी-मुर्धी विधने उचलुन सोयिस्कर मांडणी करायची हे ब्रिगेडींना नवीन नाही हे आजही सिद्ध होते. २०१० च्या लेखात मीही दादोजींना नोकर म्हटले होते. २०१२ च्या लेखात नोकरही नव्हते हे सिद्ध केले. २०१५ च्या लेखात दादोजीबद्दलचे माझे स्वतंत्र मत नोंदवले आहे. जेम्स लेनशी मी पत्रव्यवहारही केला होता हे मी नमुद केले आहे. मेहंदळेंना बहुदा दादोजीबाबत उत्तर देणारा महाराष्ट्रात मी एकमेव होतो. गोतियेने शिवमंदिर बांधायचा घाट घातला त्यालाही मी इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतुन विरोध करणारा एकमेवच होतो. याचा मला गर्व नाही. तुमच्याकडुन वा कोणाकडुनही कधी शाबासकीची काडीमात्रही अपेक्षा नाही व नव्हती. मी माझे कर्तव्य व तेही वेळीच बजावले. एवढे सारे असुन तुम्ही जे हेत्वारोप आणि सोफिस्टिकेटेडचे अर्थ काढत नथीतुन तीर मारायचा प्रयत्न करत आहात हे काही नवलाचे नाही. किंबहुना आंधळ्या झालेल्या लोकांना फक्त सोयीचे दिसते. खरे सांगायचे तर यामुळे शिवाजीमहाराजांवरचे लेखन या सर्व वृत्तीमुळे कमी होत जाईल याची खात्री बाळगा. कारण कोण कोणता शब्द अथवा वाक्य घेऊन महिलांच्या आड दडून वार करील याचा नेम राहिलेला नाही. पुरंदरेंवर टीका करतांना त्यांची विधनेही बदलायची हिंम्मत दाखवतात हे मला वाचल्यावर समजले. माझ्या नजरेतुन कोण उतरले असेल? सत्याचा लढा लढताय ना...तर किमान दुस-यांची विधाने तरी आहे तशी उद्घृत करा ना! पण ती पद्धत वापरायची नाही. कोण कशाला लिहिल? हेत्वारोप करुन घ्यायला? शिव्या-धमक्या खायला? माझीही या विषयाव्रील ही शेवटची प्रतिक्रिया. तेही जाधव सरांसारख्या मला आदरणीय असलेल्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली म्हणून. मी मराठा अथवा दलित असतो तर सारे गप्प बसले असते हेही विनोद अनाव्रत आणि मदन पाटील यांच्या पुस्तकावरेल आजवरील मौनातुन दिसते. चालु द्यात. शुभेच्छा. जाती सोडलेल्या माणसाला जातीत ढकलणारी ही दुष्ट माणसे....काय म्हणावे त्यांना? मला आता राग नाही. खिन्नता आहे फक्त. आभार."

      माझे विचार फक्त पुरावेच बदलु शकतात. मला बाकी कोणत्या जाती/धर्माशी घेणे-देणे नाही. मुळात शिवकाळ हा माझ्या अभ्यासाचाही विषय नाही, पण गरज पडली म्हणून करावा लागला तेवढाच. माझा विषय पुरातन संस्कृती हा आहे व त्यावर मी पुस्तके लिहिलेली आहेत.

      एक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हनून आपण शांतपणे विचार कराल यावर मी विश्वास ठेवतो. अविनाश दुधे यांनी प्रकाशित केलेला मराठा सेवा संघावरील दिवाळी विशेशांक आपण वाचला असेल अशी आशा आहे. त्यात माझाही मसेसंघावर लेख आहे. अवश्य वाचा.

      धन्यवाद,
      आपला,
      संजय सोनवणी

      Delete
  39. appropriate question by sachin chaudhri and excellent answer by sonawani sir!!

    ReplyDelete
  40. आप्पा - होणार होणार असे सांगणारे अनेक पण संजयाने त्याने पुढे काय होईल ते आत्ताच सांगून ठेवले आहे , राजा शिव छत्रपति यांच्या बद्दल लेखन कमी होत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे ती अगदी १००% खरी आहे कारण कुणीही माणूस असला ससेमिरा मागे लाऊन घेण्यास तयारच होणार नाही - विकतचे श्राद्ध कुणी सांगितलय ?
    बाप्पा - पण त्याच वेळेस पावासाल्याताल्या उगवणाऱ्या छत्र्या प्रमाणे शिवाजीवर पीएचडी करणारे असंख्य असतील कारण शेवटी अशी अवस्था येईल की महासंघ किंवा ब्रिगेड यांच्याकडून मंजुरी आली की मिळाली पीएचडी !
    आप्पा - सचिन चौधरी किंवा असे अनेक जन फारच भ्रमात आहेत की शिवरायांवर ब्राह्मणांनी अनन्वित अत्याचार केला आहे आणि त्याना जणू मदतीची गरज आहे , आणि आपण पुढे सरसावून उभे राहून ब्राह्मणांच्या विळख्यातून छत्रपतीना सोडवले पाहिजे हि अफूची गोळी याना खायला लावणारे जे मराठा समाजाचे राजकारण करणारे आहेत त्यांची भूमिका तपासून जर पाहिली तर बरेचसे चित्र स्पष्ट होईल ,त्यातला महत्वाचा मुद्दा आरक्शानाचाच घ्या ! सर्व जगाला माहित आहे कि मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळणार नाही तरीही ते तुणतुणे वाजवत ठेवून त्यावर जीवन जगायची यांची हौस दांडगी आहे
    बाप्पा - एका ब्राह्मणाने छत्रपती या विषयावर खिळवून ठेवणारे लेखन आणि भाषण करून लाखो लोकाना मंत्रमुग्ध केले , मराठा समाजात असा एकही शिलेदार नाही हे कसे ?साधे शुद्ध मराठी जमत नाही अशी यांची स्थिती !
    आप्पा - सचिन चौधरी शिवरायांबद्दल सर्व मराठी समाजाला अत्यंत प्रेम आणि अभिमान आहे . पण संजय सोनावणी यांनी खरोखर अभ्यास करून उत्तरे दिली आहेत या बद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे . तुम्हाला पवार घराण्याचे राजकारण समजत नाही हे दुर्दैव आहे !

    ReplyDelete
  41. अप्रतिम विवेचन सोनवणी सर..

    मी आपल्या "ब्राम्हण का झोडपले जातात!" या पुस्तका पासून आपल्याला वाचायला सुरवात केलेली आहे. तेंव्हाही आपली विचारधारा व हेतू पटत होते. आजही तेच अश्या लेखनातून पुन्हा पटत आहे. सत्य या गोष्टीशी प्रामाणिक रहाण्यासाठी जे धाडस लागतं,ते आपल्यापाशी भरपूर आहे. त्या धाडसाला आधी पहिला सलाम , आणि नंतर या अश्या सगळ्याच लेखनाला आणखि एक!

    ReplyDelete
  42. पुरंदरे यांचे वादग्रस्त इतिहासलेखन -

    बाबासाहेब पुरंदरे यानी 'राजा शिवछत्रपती' ही भली मोठी कादंबरी लिहून महाराष्ट्रातील मराठी वाचकांवर प्रभाव निर्माण केला आहे. पुरंदरे यांची भाषा ओघवती आणि अलंकारिक असल्याने अनेक लोक आवडीने ही कादंबरी वाचतात. असे सांगितले जाते कि या कादंबरीच्या पाच लाख प्रती खपल्या आहेत. पुरंदरे यांची ही कादंबरी इतर कोणत्याही मराठी पुस्तकापेक्षा खूपच लोकप्रिय ठरली आहे. परंतु एवढ्याने पुरंदरे यांच्या कादंबरीची योग्यता मोजणे बरोबर नाही. इतिहासलेखन करताना ते किती निष्पक्ष पद्धतीने, पुर्वग्रह मनातून काढून लिहिणे गरजेचे असते. आपल्या मनातील कल्पना, धारणा इतिहासाच्या माथ्यावर मारणे हा खूप मोठा अपराध आहे. इतिहास हा विषयच अनेकजणाना रटाळ आणि कंटाळवाना वाटत असलेल्या तो थोडा अलंकारिक भाषेत लिहिला तर लोक आवडीने वाचतात. परंतु याचा अर्थ असा नाही कि इतिहासातील मूळच्या प्रसंग, पात्रामध्ये सोयीस्कर बदल करावा. इतिहासातील काही गोष्टी आपणाला अप्रिय असल्या, गैरसोयीच्या असल्या तरी त्या टाळता कामा नये. किंवा त्याचे स्वरुप बदलून सोयीस्कर इतिहास लिहिता कामा नये. हे सर्व संकेत इतिहास अभ्यासकाने पाळावे अशी अपेक्षा असते. परंतु पुरंदरे यांच्या शिवचरित्राकडे पाहिले तर असे दिसते कि पुरंदरे यानी सोयीस्कर इतिहास लिहिला आहे. ब्राह्मणी चष्म्यातून लिहिलेला इतिहास, शिवरायांच्या मुस्लिम सहकार्यांची उपेक्षा, काल्पनिक कथा-प्रसंग-पात्रे याना अग्रक्रम अशा पद्धतीच्या अनेक चुका पुरंदरे यांच्या इतिहासलेखनात आढळतात. त्यामुळे पुरंदरे यानी सदोष शिवचरित्र लिहिले याबद्दल शंका नाही.

    ReplyDelete
  43. माननीय संजय सोनवणी ,
    पुण्यात जितेंद्र आव्हाड याने उगाच बळेच शिवशाहीर पुरंधरे यांच्या बाबत वक्तव्य केले
    २४ मे २०१५ ला आव्हाड चा पोपट झाला ,
    एका क्वार्टर वर जमा होणारी गर्दी जमवून असले चाळे जर तो करणार असेल तर त्यांचे राजकीय भवितव्य काय असणार ?
    हा माणूस इतका मूर्ख कसा ?
    संजय सोनावनी यांनी अशा वेळी त्यांच्या बोलण्यावर भाष्य केले पाहिजे
    कारण हि घाण पुण्यात येऊ देता कामा नये - तशी सांस्कृतिक जबाबदारी संजय सोनवणी आणि प्रभूतींची आहे .

    ReplyDelete
  44. संजयजी,
    अतिशय सुंदर आणि व्यवस्थित लेख लिहला आहे . अगदी वेळेत केलेल्या या लिखाणा मुळे
    बरेच गैरसमज दूर होतील

    ReplyDelete
  45. Manatlya shankanche nirasan kelyabaddal dhanyawaad!!!

    ReplyDelete
  46. हा सोनवणी विकाऊ आहे...

    ReplyDelete
  47. पहिले शिवचरित्र लिहिले आहे ते केळुस्कर गुरुजी यांनी ते सुद्धा शाहू महाराजांच्या विनंतीवरून या शाहू महाराजांनि संपूर्ण आर्थिक सह्ह्हाय हे चरित्र लिहिण्यासाठी दिले होते आणि चरित्र प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या 1000 प्रति विकत घेतल्या होत्या हे पुस्तक या शाहू राजाला अर्पण केले आहे त्याची नवीन आवृत्ती कोल्हापूरच्या सरस्वती पब्लिशिंग ने प्रसिद्ध केली असून त्यातील खालील मजकूर वाचा
    पान न 59 "स 1637 त शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवास आपल्या जहागिरीची व्यवस्था सांगून शिवाजी महाराजास त्याच्या हवाली केले व त्यास असे सांगितले कि याला योग्य प्रकारचे शिक्षण द्यावे" पान न 62 "शिवाजी महाराजास व जिजाबाईस कोणत्याही गोष्टीस उणे पडू न देण्याविषयी तो मनापासून झटे.क्षत्रियाचा मुलगा क्षत्रियकर्म करण्यास चांगला योग्य व्हावा यासाठी त्याने महाराजास युद्धकला शिकविण्याची चांगली व्यवस्था केली .त्याचे शरीर बळकट व चपळ होण्यास लागणाऱ्या कसरती व व्यायाम त्याच्याकडून तो नियमाने करून घेत असे त्याने महाराजास उर्दू व फारशी भाषा शिकविल्या होत्या इतकेच नव्हे तर त्यास थोडेसे संस्कृत हि शिकविले होते "
    " पान न 63 "दादाजी सर्वच गोष्टी शिवाजीमहाराजच्या विद्यमाने करीत नसत हे लक्षात घेऊन ते एका दिवशी त्याला म्हणाले कि "आह्मी लहान असलो म्हणून काय झाले ?प्रत्येक गोस्ट आह्माला कालवून करावी .आपण आह्माला वडिलांच्या जागी आहात"
    या जेम्स लेन याने हे पुस्तक वाचले असावे किंवा कोणाकडून तरी समजून घेतले असावे म्हणूनच हा अभद्र विनोद याने आपल्या पुस्तकात केला असावा तेव्हा या केळूस्करच्या मागे ज्या शाहू महाराजांचा मेंदू आहे तेव्हा जेम्स लेनच्या अभद्र विनोदामागे हा शाहू महाराज आणि केळुस्कर आहेत

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...