Friday, December 12, 2025

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत केलेली आहे. समजा मानवी जीवन अत्याधुनिक तंत्रद्न्यानाने झाकोळले गेले आणि बव्हंशी मानवी हातांना शारीरिक किंवा बौद्धिक श्रमाचे कामच उरले नाही तर एकुणातील व्यवस्था कशी ढासळेल यावर आपण गेल्या लेखात विचार केला. यात दुसरी संभावना अशी आहे की आज आपण कल्पना करूही शकत नालेली नवीन कामे निर्माण होतील आणि एकुणातील मानवी व्यवस्था आधी थोडी अव्यवस्थित होऊन नव्या व्यवस्थेशी जुळवून घेत एका वेगळ्या व्यवस्थेत जगू लागतील. रोजगाराचे प्रमाण आज वाटते तसे ढासळू शकणार नाही. किंवा तंत्रज्ञानाच्या विकासावरच सरकारे बंधने घालत समाजवादी तत्वानुसार सर्वांच्या स्वाभिमानाने जीवन जगण्याच्या नैसर्गिक अधिकाराचे जतन करतील. त्यासाठी अर्थात नीतीसिद्धांत हे मानवाभिमुख करावे लागतील व तसे कायदे बनवून त्याचे कठोर पालन करावे लागेल. तेव्हा संभावना खूप आहेत हे खरे असले तरी त्यासाठी मानवी प्रवृत्ती, म्हणजे लालसा, लोभ, मक्तेदारीची भावना इ. दुर्गुणांचा समूळ नाश करावा लागेल. सध्याची स्थिती तरी मक्तेदारीकडे जात छोटे-मध्यम उद्योग संपवण्याची आहे आणि सरकारे अतिश्रीमंतांच्या व शक्तीशाली जातसमूहांच्या कच्छपी लागनले असल्याने असे खरेच होईल काय याचे उत्तर देता येणे अशक्य आहे. याचे कारण मानवी समाजाच्या जीवनातील अनिश्चितता. अनिश्चिततेचे तत्व जसे सूक्ष्मयामिकी शास्त्राला जसे कवटाळून बसले आहे त्याहीपेक्षा या तत्वाने आदिम कालापासून मानवी जीवनाला जास्त ग्रासून टाकले आहे. अनिश्चिततेच्या हेलकाव्यांवर आपले जीवन झुलत असते. पुढच्या क्षणी काय होईल याचे भाकीत अगदी योजनाबद्ध कृती केली तरीही वर्तवता येणे अशक्य असते. मुळात जीही काही कृती केली ती जे परीणाम घडवते ती स्थितीच अनिश्चित आणि प्रतिक्षणी बदलणारी असते त्यामुळे परिणामही वेगवेगळी रुपे घेतात आणि अपेक्षित रूपे मात्र कवेत येतच नाहीत. काही वेळा कृतीचे अपेक्षित परिणाम दिसतात हे खरे असले तरी ते अपेक्षित परिणाम पुन्हा अनपेक्षित शक्यतांना जन्म देतात हेही आपल्या अनुभवाला येत असते. पण अनपेक्षिततेत अपेक्षितता आणायचा प्रयत्न असतो आणि कोणतीतरी शक्ती अपेक्षित असेच घडवू शकेल या अपेक्षेतून ईश्वरासकट ज्योतिष नावाचे भविष्य अशास्त्रसुद्धा डावाला लावले जाते. जेथे शास्त्रातच मुळात अनिश्चिततेचे तत्व राज्य करीत असताना, किंवा ती अनिश्चितता हीच निश्चितता आहे की नाही हेही सध्या तरी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. थोडक्यात भविष्य हे नेहमीच अनिश्चित असते आणि ते काटेकोरपणे घडेलच असे नाही. कारण विज्ञानाचेच म्हणाल तर अनिश्चितता सूक्ष्म स्तरावर जशी लागू पडते तशीच ती वैश्विक स्तरावरही लागू पडते. भाकिते मर्यादित काळचौकटीच्या परिप्रेक्ष्यात सापेक्षतेने केली गेलेली असतात. पण सूक्ष्म स्तरावरच नव्हे तर व्यापक स्तरावरही अनिश्चितता हे तत्व अबाधित राहत असून विश्व हे एकच ठरलेल्या नियमांप्रमाणे चालते असे म्हणणे चुकीचे होऊन जाईल. मग माणसाचे काय? विश्वाच्याच वर्तनाचे भाकीत जेंव्हा अशक्य आहे तेंव्हा जागतिक मानवी जीवनाचे भाकीत करता येईल असे म्हणणे चूक जरी असले तरी संभाव्यतेच्या नियमाप्रमाणे काही अंदाज बांधता येतात आणि संपूर्ण व्यवस्था मानवी हितासाठी विशिष्ट दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करता येतातानी तशी दिशाही देता येऊ शकते. शेवटी आपण माणूस आहोत आणि आपले मानव म्हणूनचे जे स्वातंत्र्य आहे ते जतन करण्यासाठी आजच्या स्थितीत दडलेली विषारी पाळेमुळे उखडून टाकण्याचे प्रयत्न होऊ शकतात. विज्ञानालाही किती प्रगत होऊ द्यायचे याची सीमा आखून देता येऊ शकते. आजच्या जगात विषमता पराकोटीची वाढलेली आहे. वंचित आणि शोषितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. अशात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाचे स्थान घेणार असतील तर जागतिक अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. यातून अराजकाची भयंकर स्थिती उत्पन्न होईल आणि मनुष्य विरुद्ध कृत्रिम मनुष्य यात संघर्ष पेटेल. मक्तेदार कंपन्या स्वत:चा फायदाही सोडू शकणार नाहीत पण जर मनुष्याची खरेदी शक्तीच संपली तर ते उत्पादने कितीही श्रेष्ठ बनवली तरी विकणार कोणाला? म्हणजे ग्राहकच उरले नाहीत तर कोणत्याही कंपनीला फायदा होणार नाही. यातून जी आर्थिक आपत्ती कोसळेल त्यातून सरकारेही वाचणार नाहीत कारण शेवटी कर कोणाकडून घेणार? लोकांचे त्यासाठी उत्पन्न नको काय? उत्पन्नविरहित प्रजा झाली तर सरकारे आणि कॉर्पोरेटस क्षणभरही तग धरू शकणार नाहीत. त्यामुळे हा तंत्रद्न्यानाचा आधुनिक वारू अधिक उधळू देण्यात कोणाचेही अंतत: हित नाही हे कोणाही सुज्ञ माणसाच्या लक्षात येईल. जीवनात अनिश्चितता आहे म्हणून माणसाने ईश्वर शोधला. वस्तुत: ईश्वर/देव/प्रेषित या साऱ्या भयभीत माणसाने निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. तरीही अगणित लोक दैवी शक्तीवर विश्वास ठेवतात. पण या कथित दैवी शक्ती माणसाच्या कामी येत नाहीत हे वास्तव आहे. प्रत्येक मनुष्यच आपल्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवू शकतो. अनिश्चिततेचे तत्व वैश्विक असल्यामुळे ते तत्व माणसालाही लागू पडते. अनिश्चिततेत निश्चितता कशी आणायची आणि त्यासाठी कोणते गुण अंगीकारायचे याबाबत प्राचीन काळापासून तत्वज्ञांनी पोटतिडिकेने सांगितले आहे पण बव्हंशी समाज आजतागायत त्यातून काही शिकलेला नाही. आज माणसाने स्वत: विचारच करू नये यासाठी साऱ्या यंत्रणा चारी बाजूनी प्रयत्नात आहेत. हे आपण समजावून घेण्याची वेळ आता तरी आलेली आहे. येथे विचार करणे थांबवून जर आपण आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवरच अवलंबून राहत जाणार असू तर आपले भविष्यही कृत्रिम, तकलादू आणि कधीही कालांधारात विलीन होऊन जाणारे असेल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. आजचे विज्ञान अतिप्रगत आहे पण ते “संवेदनशील ज्ञानी”नाही. त्याची एक महत्ता आहे हेही नाकारता येत नाही पण जेव्हा संपूर्ण मानवजातीचेच भविष्य डावाला लागलेले असते तेव्हा मात्र विज्ञान हे भस्मासुर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. सध्या तरी आपण अशी काळजी घेत मनुष्याचे मनुष्यपण जपण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहोत असे दिसत नाही. “सारे काही फायद्यासाठी” ही आपली जी जागतिक प्रवृत्ती बनली आहे तीच मुळात विघातक आहे. भौतिक फायदा की बौद्धिक/आत्मिक फायदा यात आपल्याला निवड करत एक संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ते जर केले नाही तर मनुष्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणजे मनुष्य असेल पण मनुष्यपण हरवलेला. तसे होऊ नये म्हणून जागृत होण्याची गरज आहे. -संजय सोनवणी

Thursday, November 27, 2025

भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थिती निर्माण होईल व मानवी बुद्धीचा ऱ्हास होत जाईल याची चिन्हे आजच दिसू लागली आहेत. अवघड प्रश्न स्वत: सोडवण्याऐवजी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणे आता सर्रास सुरु आहे. अगदी संशोधनपर लेखही कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून लिहिले जात आहेत. शाळा-कॉलेज व उच्च महाविद्यालयीन स्तरावर या प्रश्नाचे काय करायचे याबाबत जागतिक शिक्षण तद्न्य चिंतेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर बंधने घालण्याचे प्रयत्नही सुरु आहेत पण त्यात कितपत यश येईल याबाबत सारे साशंक आहे कारण माणसाची प्रवृत्ती ही शक्यतो विनासायास काम करण्याची असते. बौद्धिक श्रम करण्याची मुलभूत प्रवृत्तीच नसेल तर दुसरे काय होणार? त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता देईल तेच ज्ञान सर्वांना उपलब्ध असेल, स्वतंत्र प्रज्ञेने ज्ञान प्राप्त करण्याची गरजच उरणार नाही आणि म्हणू ते सारे एकतर्फी विचारांचे असेल. यातून एकसाची माणसे निर्माण होतील आणि त्यांच्यावर या मक्तेदारी संस्थांना हवे तेवढेच ज्ञान, हवा तसाच विचार पसरवण्याची संधी मिळेल, जी आजच मिळते आहे. स्वत: विश्लेषण करणे, तर्कसांगत निष्कर्ष काढणे हे मानवाचे जे वैशिष्ट्य तेच नामशेष होत जाण्याचा गंभीर धोका त्यामुळे समस्त मानवजातीसमोर आहे. याहून मोठा धोका म्हणजे भविष्यात सारी कामे बुद्धीमान यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने ते काही केल्या "खरेदीदार" होणार नाहीत. शेती ते कारखान्यातील, विपणन क्षेत्रातील, व्यवस्थापकीय कामे बुद्धीमान प्रणाल्या व यंत्रमानव करू लागले व उत्पादन अवाढव्य वाढले पण खरेदी करायला लोकांकडे क्रयशक्तीच नसेल तर मग संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. अशा अवस्थेत उत्पादन कोणी का म्हणून करेल? खरेदीदारच नसतील तर अर्थव्यवस्थेचे चाकाच रुतून पडेल. पण यातून एक नवीन अर्थव्यवस्था साकारू शकते. एक तर सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही अथवा बेरोजगारांनाही सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण कोणते रोजगार उपलब्ध होऊ शकतील याबाबत आपण आज तरी अंधारात आहोत. थोडक्यात आपण एका अनिश्चित स्थितीकडे वेगाने वाटच्घाल करत आहोत व नेमके त्याचेच भान आपल्याला नाही. शिवाय या मक्तेदारी प्रवृत्तीतून जगासमोर वेगळाच धोका उभा राहिलेला आहे तो म्हणजे जगाचे संचालन त्या त्या राष्ट्रांच्या हाती ण राहता मोजक्याच किंवा एखाद्याच कॉर्पोरेटच्या हाती जाण्याचा. जगात आज जशा वेगवेगळ्या अवाढव्य ते छोट्या कंपन्या आहेत, त्या मर्जर, अमल्गमेशन व टेकओव्हर्सच्या मार्गाने अवाढव्य कॉर्पोरेट्स बनायच्या मागे आहेत. जगातील त्यात्या देशातील विविध क्षेत्रात कार्यरत बलाढ्य कंपन्या आपापल्या देशाच्या सीमा ओलांडुन सर्वत्र पाय रोवत आहेत. त्या त्या देशातील कायदे, अशा गुंतवणुकींसाठी अनुकुल करुन घेतले जात आहेत. याचे कारण या बलाढ्य कंपन्यांकडे असणारा अमाप वित्तपुरवठा, ज्यायोगे ते सरकारांवर प्रभाव टाकु शकतात. विरोध शमवु शकतात. त्यासाठी ते माध्यमांतील विचारवंतांमार्फत जनमतही अनुकुल करुन घेण्याचा प्रयत्न करत असतात. किंबहुना माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात हेच आघाडीवर आहेत. आज सरकारांच्या राजकीय भुमिका काहीही असल्या तरी आर्थिक जगाचे म्हणने अधिक प्रभावी ठरते. हा वेग समजा वाढत गेला तर जगात राजकीय सरकारे नव्हे तर उद्योजक सरकारेच राज्य करू लागतील. आज वरकरणी का होईना दुय्यम भुमिका घेणारे आर्थिक जगत उघड भुमिका घेऊ लागेल. वेगवेगळ्या कंपन्या असल्याने व त्यांची क्षेत्रेही वेगवेगळी असल्याने आज एकच एक कॉर्पोरेट जग अर्थ जग व्यापेल असे नसले तरी हा वाढींचा वेग पाहिला तर एकल मक्तेदारीयुक्त भांडवलशाही राबवनारी देशनिहाय एकच वा जागतिक पातळीवर एकच कंपनी असली आणि तिनेच सर्वच उत्पादने (अगदी शेतीसहित) ताब्यात घेतली तर काय होईल? शेतीक्षेत्राचे कॉर्पोरेटीकरण सध्या कायद्यांमुळे सहज शक्य नसले तरी कायदे बदलले जाऊ शकतात. असे समजा झाले आणि जे होण्याची शक्यता आहे, नवीनच समस्या उद्भवतील. पहिले म्हणजे देशोदेशीची खाद्य संस्कृती आमुलाग्र बदलेल. ठराविकच पिके घेतली गेल्याने शेतीतील पीक-वैविध्य समाप्त होईल. शेतकरी अचानक मोठ्या रकमा हातात आल्याने आनंदित जरी झाला तरी त्या पैशांचे काय करायचे हे त्यांना नीट समजेलच असे नाही आणि जी नवी अर्थव्यवस्था आकाराला येईल त्यात एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा निभाव कसा लागेल याचाही गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. हा सर्व क्षेत्रातील मक्तेदारीचा प्रश्न काल्पनिक किंवा असंभाव्य आहे असे नाही. लोकांना भावनांवर खेळवण्याचे मानसशास्त्र आता झपाट्याने विकसित होत आहे. सामाजिक माध्यमांमुळे प्रत्येकाची मनोवृत्ती कशी बदलवता येवू शकते याचे प्रयोग आजच होत आहे. हे नवे शोध फक्त व्यावसायिक अथवा राजकीय कारणांसाठीच वापरले जातील असे समजणे गैर ठरेल. जगातील युद्धे अनेकदा शस्त्र उत्पादक कंपन्या ठरवतात हा इतिहास सर्वांना माहित आहे. आणि मक्तेदारीची प्रवृत्ती एक दिवस सर्वच आर्थिक जगाला (त्यांची मुळ नांवे ते ब्रँड्स कायम ठेवून) एका छत्राखाली घेणार नाही असे नाही. ज्ञान आणि संसाधनांची निर्मिती व नियंत्रण मोजक्या किंवा एखाद्याच कॉर्पोरेटच्या हाती गेली तर आजच्या वेगाने बदलत्या जगाची काय त्रेधा-तिरपीट उडेल याची कल्पना आपण करू शकतो. मी माझ्या “भविष्य नावाचा इतिहास” या भविष्यवेधी कादंबरीत सारे जग एकाच कॉर्पोरेटच्या अंमलाखाली आले तर काय घडू शकते याचे विदारक चित्रण केलेले आहे. आणि तसे घडणे असंभाव्य नाही. हा एका परीने जगाला दिलेला भावी धोक्याचा इशारा आहे असे समजायला हरकत नाही. अशा स्थितीत “सार्वभौम राष्ट्र” या संकल्पनेला काहीएक अर्थ राहणार नाही हे उघड आहे. तसेही आताच कोणतेही राष्ट्र खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे असे म्हणता येत नाही. तरीही आहे ती स्थितीही कोलमडून पडेल आणि अप्रत्यक्षरीत्या एखादे किंवा मोजके कॉर्पोरेटस जागतिक सरकारे चालवतील आणि लोकनियुक्त प्रतिनिधी ही संकल्पनाच अर्थहीन होऊन जाईल. त्यामुळे आताच एक जग:एक राष्ट्र ही संकल्पना रुजवत अतिरेकी मक्तेदारी रोखण्याची नितांत आवश्यकता आहे. -संजय सोनवणी

Monday, November 17, 2025

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

 पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

 Pune 
Shared with Public

10 janewari 2013

पांडुरंग बलकवडे यांच्या लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या "शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक" या पत्राला माझे खाली दिलेले उत्तर प्रसिद्ध झाले. आताच मला पांडुरंग बलकवडे यांचा फोन आला. आधी असलेला चर्चेचा सुर अचानक पालटला आणि त्यांनी मला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरु केली व मारहाणीच्या धमक्या दिल्या. इतिहास संशोधक म्हनवनारे या गलीच्छ पातळीवर जात असतील तर माहाराष्ट्री सांस्कृतिकतेचा केवढ -हास झाला आहे याची कल्पना येते. मी बलकवडेंचा निषेध करतो. वैचारिक वाद वैचारिकतेनेच लढायचा असतो याचे भान सुटलेले आहे. शिवीगाळ-धमक्या हेच परशुरामी संस्कृतीचे अपत्य आहे हेही सिद्ध झाले.
'शिवभारत' हा ऐतिहासिक पुरावा नाही
'शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक' हे पांडुरंग बलकवडे यांचे पत्र (लोकमानस, ९ जाने.) वाचले. बलकवडे म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी परशुरामाचे दर्शन राज्याभिषेकापूर्वी घेतले याचा एकदाच उल्लेख येतो, तो परमानंदाच्या शिवभारतमध्ये. त्याच वेळेस राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी परशुरामाबरोबरच अन्यही अनेक देवतांच्या मंदिरांत जाऊन दर्शन घेतले होते असे परमानंदच लिहितो हे मात्र बलकवडे सांगायला विसरलेले दिसतात व सरळ परशुराम हे शिवरायांचे जणू एकमेव दैवत होते असा आविर्भाव आणत धादांत खोटा इतिहास सांगतात.
दुसरे म्हणजे कोणीही इतिहासकार परमानंदकृत शिवभारताचा शिवचरित्रासाठीही विश्वासार्ह पुरावा म्हणून वापर करत नाही.. मुळात हे उपमा-अलंकारांनी सजवलेले काव्य असून महाभारताच्या प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेले आहे. अन्य कोणत्याही समकालीन साधनांत शिवरायांनी परशुरामचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळून येत नाही त्यामुळे बलकवडेंचे पत्रच मुळात अनतिहासिकतेने भरलेले स्पष्ट दिसते.
परशुरामाला आक्षेप असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची िहसक व मातृघातकी अशी जनमानसात रुजलेली खल-प्रतिमा असूनही काही विशिष्ट समाजघटक जाणीवपूर्वक त्याचे स्तोम माजवत आहेत हे आहे, पण हे लक्षात न घेता एका अनतिहासिक काव्यग्रंथाचा वापर ते परशुरामाला शिवरायांचे दैवत ठरवण्यासाठी आणि सध्याच्या वादाकडून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी, परशुराम माहात्म्य गाजवण्यासाठी करत आहेत ही बाब निषेधार्ह आहे.
संजय सोनवणी

हा घ्या शिवभारताच्या विश्वासार्हतेचा पुरावा!
'शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक' या माझ्या पत्रावर (९ जाने.) संजय सोनवणी यांनी 'शिवभारत हा ऐतिहासिक पुरावा नाही' अशी प्रतिक्रिया (लोकमानस, १० जाने.) नोंदवली आहे. या पत्रात त्यांनी शिवभारताच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेऊन कोणीही इतिहासकार या शिवभारताचा संदर्भ देत नाहीत, असे अत्यंत चुकीचे व बेजबाबदार विधान केले आहे. बहुधा हे विधान त्यांनी इतिहासाविषयीच्या अज्ञानातून केले असावे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये प्रकाशित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाच्या' प्रस्तावनेत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, 'शिवाजी महाराजांच्या आदेशाने परमानंदांनी संस्कृत चरित्र शिवभारत लिहिले आहे. खुद्द महाराजांच्या आदेशाने रचलेला हा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचे एक अतिशय विश्वसनीय असे साधन आहे. म्हणून अनेक इतिहास संशोधकांनी त्याचा गौरव केला आहे.
याच शिवभारताच्या आधारे स्वत: एक संस्कृत पंडित असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी शिवरायांवर बालपणी मातापित्यांनी शिक्षणाचे संस्कार कसे केले याची चर्चा - चिकित्सा केली आहे.'
थोर इतिहासकार देवीसिंग चौहान, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदाशिव शिवदे इत्यादी इतिहासकारांनी मोठय़ा विश्वासाने शिवभारताचे संदर्भ दिले आहेत. शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे तर शिवभारताला अत्यंत विश्वसनीय साधन मानतात.
परशुरामाविषयी शिवभारतातील उल्लेखाशिवाय शिवाजी महाराजांनी परशुराम क्षेत्राची लावून दिलेली पूजाअर्चा, नैवेद्य, नंदादीप इत्यादीची व्यवस्था, छ. राजाराम महाराजांनी दिलेली इनामाची सनद आणि शाहू छत्रपतींनी परशुराम क्षेत्राचा केलेला जीर्णोद्धार या मराठी राज्यकर्त्यांनी परशुरामावरील श्रद्धेपोटी केलेल्या गोष्टी पुरावा म्हणून सोनवणी यांना अपुऱ्या वाटत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वत: रचलेल्या 'बुधभूषण' या ग्रंथाचा अभ्यास करावा. या ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात संभाजी महाराजांनी दशावतारांना वंदन करताना भगवान परशुरामांचा केलेला उल्लेख समजून घ्यावा म्हणजे त्यांचे शंकासमाधान होईल.
पांडुरंग बलकवडे


आजच्या लोकसत्तात पांडुरंग बलकवडे यांनी माझ्या पत्राचा प्रतिवाद केला आहे. लोकशाहीमार्ग वापरुन मला शिवीगाळ न करता त्यांनी हे प्रत्युत्तर आधीच दिले असते तर निषेधाची वेळ आली नसती. असो. त्यांच्या आजच्या पत्राचा रोख परमानंद्कृत शिवभारत हे विश्वसनीय साधन आहे हे सिद्ध करण्याकडॆ आहे. त्यासाठी त्यांनी डा. जयसिंग पवार ते गजानन मेहंदळे यसंचा हवाला दिला आहे. प्रथम शिवभारतातील काही नमुने विश्वासार्हतेसाठी तपासून पाहू.
शिवाजी महाराजांनी अफक्जलखानाला जखमी करण्यासाठी बिचवा व वाघनखे वापरली, त्याचा शिरच्छेद जिवा महालाने केला हा मान्य इतिहास आहे. शिवभारतात मात्र शिवाजी महाराजांनी अफजलखानाला भवानी तलवारीने त्याच्या मस्तकाची दोन शकले करून ठार मारले असे लिहिले आहे. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा गुरु होता व नंतर तो गुरु नव्हता अशी डा. पवारांनी आपले मते बदलली ती शिवभारतामुळेच. एकच काव्य दोन पुरावे देते काय? शिवरायांच्या बाळंतपणासाठी जिजाउ नेमक्या कधी आल्या याबाबतची शिवभारतातील मते अनैतिहासिक आहे असे या काव्यग्रंथाच्या प्रस्तावनाकारानेच लिहून ठेवलेले आहे. काव्यग्रंथ इतिहासाचे मुख्य साधन नसते हे बलकवडे अद्यापही लक्षात घेत नाहीत हे दुर्दैव आहे.
दुसरे असे कि परत एकदा ते शिवाजी महाराजांचे दैवत परशुराम होते या ध्रुपदावर येतात. संभाजी महाराजांच्या बुधभुषण काव्यातील दशावतारांत परशुरामाचा उल्लेख ते छत्रपतींचे घराणे परशुरामाचे नेक भक्त होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आता परशुराम हा सहावा अवतार आहेच तर त्याचा उल्लेख दशावतारात येणारच, यावरुन संभाजी महाराजही परशुराम भक्त होते असा निर्वाळा ते कसा देवू शकतात हे त्यांनाच माहित. तसेच शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात असंख्य मंदिरांत जावून दर्शन घेतले आहे, जमीनी दान केलेल्या आहेत, अगदी याकुतबाबांनाही त्यांनी जमीनी इनाम लावून दिल्या आहेत, हे न सांगता ते फक्त परशुरामासाठी त्यांनी पुजाअर्चा-नंदादीपादि व्यवस्थेचाच तेवढा उल्लेख करतात यावरून त्यांचा कल शिवाजी महाराजांचे एकमात्र दैवत परशुरामच होते असे सिद्ध करणे हा आहे हे स्पष्ट आहे.

Friday, November 14, 2025

भविष्यातील काही शोध आणि आव्हाने

 

भविष्यातील काही शोध आणि आव्हाने!

 

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही. 

 

पण संगणकांनी तसे करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याच्यात अगदी भाव-भावनाही  असाव्यात व विवेकी अभियुक्तीही असावी असे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. सध्याचे संगणक या कामासाठी पुरेसे सक्षम नाहीत.

 

पण यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanic based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून होऊ शकले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला नजीकच्या भविष्यात यश मिळेल यातही शंका नाही. सध्या ३६ क्युबिट क्षमतेचे क्वांटम संगणक बनवता येऊ शकतील अशी प्रगती झाले आहे. हे संगणक वास्तवात आले तर आज आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अद्भुत क्षमता असतील. त्या व मोबाईल प्रणालीत काय संभाव्य बदल होतील आणि मानवी जग पूर्णतया कसे बदलून जाईल याचे वर्णन मी माझ्या “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मग “कृत्रिम” राहणारच नाही. मानवजातीला एक प्रबळ प्रतिस्पर्धी येऊ शकेल पण त्याच्यावर विवेकी नियंत्रण कसे ठेवायचे याचाही विचार आतापासूनच करावा लागेल.

 

शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. प्रयोग करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक व सध्याच्या विशिष्ट कामाच्या हेतूने बनवलेल्या रोबोपेक्षा हे यंत्रमानव म्हणजे प्रतीमानवच होतील. त्यातून फ्रांकेस्टैनसारखी विघातकताही जन्माला येऊ शकेल. त्यात साध्याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अनेक राष्ट्रे सामरिक हेतूसाठी आजच करु लागले आहेत. चीन यंत्रमानवांचे सैन्य खडे करण्याचा प्रयत्न करत आहे. जर अतिप्रगत बुद्धीमत्तेचे यंत्रमानव सैनिक म्हणूनही वापरात आले तर जगात काय हाहाक्कार माजेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

 

उद्योगांत साध्याच विशिष्ट कामासाठी निर्माण केलेले यंत्रमानव वापरात येउ लागले आहेत. ते सध्या कुशल कामगारापेक्षाही अनेक पटीने उत्पादन कार्य करतात. मानवी कामगारांसारख्या समस्या त्याला नसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अत्यंत उच्च दर्जाचे उत्पादन होऊ शकते. समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी कामगारांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. त्यात बुद्धीमान मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र  पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. सध्याच कृत्रिम बुद्धीमात्तेनेच असंख्य नोकर्या जाऊ लागल्या आहेत. त्यात बुद्धीमान यंत्रमानवांचीही भर पडली तर मानवी जग कोलमडून पडेल अशी भीती विद्वान व्यक्त करतात पण प्रत्यक्षात मात्र त्याचा प्रभाव पडत नाही.

 

याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे या नव्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अथवा निराशावाद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरी बुद्धीमान यंत्रमानव व अतिप्रगत कृत्रीम बुद्धीमत्ता ही आव्हाने बनणार आहेत हेही खरे.

 

वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा प्रगत कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नैतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील याबाबत अंदाज बांधले जात असले तरी ते सत्यात उतरतात असे नाही.

 

त्यात सुक्ष्माणु (Nano) तंत्रज्ञान आज प्रगतीपथावर आहे. ते असेच प्रगत होत गेले तर धुळीच्या कणापेक्षा सूक्ष्म असलेले बुद्धीमान सुक्ष्माणुसुद्धा विकसित होतील. तेही मानवी जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यात सक्षम असेल. ज्या राष्ट्राच्या हाती हे तंत्रज्ञान लागेल ते सर्व जगावर अधिसत्ता निर्माण करेल. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष वेगळे पण भयावह रूप धारण करतील. हे येऊ घालणारे (आणि आजही वापरात येऊ लागलेले) प्रगत तंत्रज्ञान क्वांटम तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून आले तर मानवजातीसमोरची आव्हाने अजूनच वाढतील. मानवी हातांना वा बुद्धीला वावच राहिला नाही तर सारेच्या सारे बेरोजगार होतील आणि सारी अर्थव्यवस्था ढासळून पडेल. असे होऊ नये यासाठी काही पर्याय निर्माण होतील काय याचा वेध आपण पुढील लेखात घेऊ.

 

-संजय सोनवणी

 

 

णमोकार मंत्र

 णमोकार मंत्र- (पर्यायी नावे- पंच-णमोक्कारा, नमोकार, नवकार, नमस्कार मंत्र)- णमोकार मंत्र जगभरातील बहुतेक सर्व जैन दररोज किंवा कधीकधी अनेक वेळा - जप करतात. जे जैन परंपरेत जन्मलेले नाहीत ते देखील या मंत्राचा जप करतात असे आढळून आले आहे. या मंत्राला मूलमंत्र, महामंत्र, पंचनमस्कार मंत्र किंवा पंचपरमेष्ठी मंत्र असेही म्हटले जाते. खरे म्हणजे जैन तत्वज्ञानाचे मुलभूत सार या मंत्रात आले असल्याने अभ्यासकांच्या दृष्टीनेही हा मंत्र महत्वाचा आहे. जैन परंपरेत या मंत्राचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. जैनांच्या मते णमोकार मंत्र नेहमीच अस्तित्वात होता आणि तो निर्माण केला गेलेला नाही अथवा कोणा व्यक्तीने लिहिलेलाही नाही. तो अनादि आहे. सध्या सर्वत्र मान्यता असलेल्या मंत्राचे स्वरूप, क्वचित उच्चारभेद वगळता) खालीलप्रमाणे आहे.

णमो अरिहंताणं
(अरिहतांना नमस्कार असो)
णमो सिद्धाणं
(सिद्धांना नमस्कार असो)
णमो अयरियाणं
(आचार्यांना नमस्कार असो)
णमो उवज्झायाणं
(उपाध्यायांना नमस्कार असो)
णमो लोए सव्व साहूणं
(विश्वातील सर्व साधू-साध्वींना नमस्कार असो)
एसो पंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
मंगला णं च सव्वेसिं, पडमम हवई मंगलं
(हा णमोकार महामंत्र सर्व पापांचा विनाश करणारा सर्व मंगलांहून सर्वाधिक श्रेष्ठ मंगल आहे.)
इतिहास- ऐतिहासिक उपलब्ध पुराव्यांनुसार हा मंत्र कालौघात विकसित होत गेलेला आहे. पुरातत्वीय पुराव्यांनुसार या मंत्रातील आरंभिक ओळी इसपूच्या दुसऱ्या शतकातील हाथीगुंफा येथील सम्राट खारवेलच्या शिलालेखात येतो. त्यानंतर महाराष्ट्रातील लोहगड व पाले येथील इसपू दुसरे ते पहिले शतक या काळातील शिलालेखातही या मंत्राची पहिली ओळ आलेली आहे.
हाथीगुंफा शिलालेख-



हा शिलालेख ओडीशातील उदयगिरी टेकड्यांत खोदण्यात आलेल्या गुंफांपैकी ही एक मोठी गुंफा आहे. यात हा १७ ओळींचा लेख असून त्याची सुरुवात-
“ नमो अरहंतानं नमो सव-सिधानं”
अशी असून पुढे सम्राट खारवेलाने आपल्या कार्यकाळात केलेल्या विपुल कार्याची आणि विजयांची नोंद आहे. या लेखात संपूर्ण णमोकार मंत्र आलेला नाही व जो आलेला आहे त्यात उच्चारभेद असल्याचे दिसते. उदा. येथे मंत्रात आलेला “सव” (सव्व?) हा शब्द पुढे अवतरणाऱ्या मंत्राच्या या ओळीत येत नाही. हा शिलालेख इसपू १६२ मधील आहे असे विद्वानांचे साधारण सर्वमान्य मत आहे.
लोहगड (महाराष्ट्र) येथे सापडलेल्या जैन लेण्यांत एक दान-शिलालेख मिळाला असून त्याची सुरुवात “णमो अरहंताणम्” अशी आहे.
पाले (महाराष्ट्र) येथील जैन गुंफेतही एक दान-शिलालेख सापडला असून त्याचीही सुरुवात “णमो अरहंताणम्” अशी असून हे दोन्ही लेख भदंत इदरखित या एकाच व्यक्तीने कोरवले आहेत अशी मान्यता आहे कारण दोन्ही दान-शिलालेखांत हेच नाव आलेले आहे.
वरील तीनही शिलालेख ब्राह्मी लिपीत असून त्यांची भाषा प्रादेशिक प्राकृत आहे. त्यामुळेही काही स्थानिक भाषिक भेद निर्माण झाले असणे शक्य आहे. हे दोन्ही शिलालेख इसपुचे दुसरे ते पहिले शतक या दरम्यान कोरले गेले असावेत असा पुरातत्व खात्याचा अंदाज आहे. थोडक्यात प्राचीन शिलालेखात णमोकार मंत्राचे संक्षिप्त रूप दिलेले आहे. शिलालेखांची मर्यादा लक्षात घेता हे स्वाभाविकही आहे. पण इसपूच्या दुसऱ्या शतकात हा मंत्र सामाजिक दृष्ट्या निश्चयाने प्रचलित होता असे दिसते.
या मंत्राचा पहिला ग्रांथिक पुरावा मिळतो तो “वासुदेवहिंडी” या इसवी सनाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान श्वेतांबरपंथीय संघदास गणी याने लिहिलेल्या ग्रंथात. यात मंत्राचा विस्तार दिसत असला तरी तो आज जसा पूर्ण आहे तसा नाही. त्यात आजच्या मंत्रात नसलेले मध्ये अनेक विवेचनात्मक शब्द घातले गेले असले तरी ते वगळता त्यात दिलेला मंत्र असा-
“नमो .....अरहंताणं
नमो ....सिद्धाणं
नमो .....अयरियाणं
नमो.... उवज्झायाणं
नमो ....साहूणं “
यात मध्ये गाळलेले काय आहे हे आपण मंत्राच्या एका पहिल्याच ओळीवरून समजू शकतो. संघदास गणी यांनी दिलेल्या मंत्रातील ओळी या मूळ शब्दरचनेला स्थान देत असल्या तरी मध्ये त्यांनी स्पष्टीकरनात्मक शब्द सामाविष्ट केलेले आहेत. उदा.-
णमो विणयपणयसुरिंदविंदवंदियकमारविंदाणं अरहंताणं
आपल्या लक्षात येईल की वरील सर्व मंत्रांत काही ना काही शब्दविस्तार किंवा पाठभेद आहेत. शिवाय क्रमश: मंत्राचा विस्तार होत गेलेला दिसतो. अरहंताणं या शब्दाऐवजी अरिहंताणं ही संज्ञा सर्वप्रथम वापरली ती भद्रबाहु यांनी आपल्या कल्पसूत्र या ग्रंथात. हा ग्रंथ जरी इसपू चवथ्या शतकात रचला गेला अशी मान्यता असली तरी तो लिखित रुपात वल्लभी धर्मसंसदेच्या वेळेस राजा ध्रुवसेनाच्या कारकीर्दीत पाचव्या ते सहाव्या शतकात आला असावा असे अंतर्गत पुराव्यांवरून मानले जाते. मूळ मौखिक संहितेत हा मंत्र सामाविष्ट होता की नाही हे मात्र सांगता येत नाही. (पहा- कल्पसूत्र व भद्रबाहू प्रथम)
संपूर्ण णमोकार मंत्र
संपूर्ण णमोकार मंत्र सर्वप्रथम येतो तो भद्रबाहू विरचित कल्पसूत्र या ग्रंथात. तोवर हा मंत्र क्रमश: विकसित होत होता असे दिसते किंवा संपूर्ण मंत्र लिहित बसण्याची वा कोरत बसण्याची आवश्यकता न वाटल्याने शिलालेखात त्याला संक्षिप्त स्वरूप दिले असेल असेही म्हणता येऊ शकते. पण कल्पसूत्रमध्ये मात्र आज म्हटला जातो व वर दिला आहे तसाच्या तसा मंत्र आलेला आहे. १९३३ साली बनस्थली येथे कल्पसूत्रच्या झालेल्या प्रकाशित प्रतीवरुन आपण याचा पडताळा घेऊ शकतो. णमोकार मंत्राचे पूर्ण विकसित रूप यात दिसून येते. महाकवी पुष्पदंत (इ.स. नववे ते दहावे शतक) यानेही ‘अरिहंताणं’ हीच संज्ञा वापरलेली आहे. तिलोयपन्नती या प्राचीन ग्रंथात मात्र अरिहंतांऐवजी सिद्धांना प्रथम वंदन केलेले आहे.
मंत्रातील संज्ञा व अर्थ-
आज जैन धर्मीय ज्या अर्थाने हा मंत्र घेतात तसाच प्रत्येक परमेश्ठीला केलेल्या वंदनाचा अर्थ “वासुदेवहिंडी” मध्ये संघदास गणी यांनी दिला आहे. तो असा-
अरहंत (अर्हत) म्हणजे ते लोक जे सर्वज्ञता प्राप्त जैन परंपरेच्या शिकवणी सामायिक करण्यासाठी मूर्त स्वरूप धारण करतात आणि "ज्यांचे कमळासारखे चरण" अशा प्रकारे "देवांद्वारे पूजनीय" असतात;
सिद्ध म्हणजे असे आत्मे जे त्यांचे सर्व कर्म नष्ट करून, त्रयस्थपणे वैराग्यपूर्णपणे विश्वाकडे पाहतात.
आचार्य हे तपस्वी गटांचे विश्वसनीय नेते आहेत आणि योग्य तपस्वी वर्तनाचे सर्वोच्च आदर्श म्हणून काम करतात;
उपाध्याय हे त्यांच्या तपस्वी विद्यार्थ्यांना जैन ज्ञान शिकवण्याची जबाबदारी घेणारे असतात.
साधू - भूतकाळातील आणि वर्तमानातील साधू हे सामान्यतः कर्मनाश करण्यासाठी योग्य आचरण मूर्त स्वरूपात आणत असतात.
नंतर सातव्या शतकातील श्वेतांबर ग्रंथातील महानिसीह-सुह (महानिशिथ सूत्र) पंच परमेष्ठीपैकी प्रत्येकाचा तपशीलवार अर्थ देते. यातील अरहंत या शब्दाची व्याख्या महत्वाची व व्यापक आहे. नवव्या शतकातील धवला टीका लिहिणारा वीरसेनही याच व्याख्येत अर्थबदल न करता अर्थविस्तार करतो. श्वेतांबर व दिगंबर जी व्याख्या सर्वसामान्यपणे घेतात त्यात समानता दिसून येते हे दोन्ही पंथांच्या आचार्यांच्या कथनावरून दिसून येते. बाराव्या शतकातील देवेंद्राच्या उत्तराध्यायन सूत्रावरील टीकेतही या मंत्राचा व्यापक अर्थ नोंदवलेला आहे. त्यानुसार णमोकार मंत्र हा आनंदाचा वाहक व एक संरक्षणात्मक साधन आहे, तसेच हा मंत्र आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर, कर्म-नाश करणारा आवाज आहे. १२ व्या शतकातील हे अर्थ आज मंत्राच्या एकूण कार्ये आणि क्षमतांबद्दलच्या अनेक लोकप्रिय जैन समजुतींशी जुळतात.
-संदर्भ-
१. वासुदेवहिंडी, संघदास गणी, प्रकाशक- श्रीजैन आत्मानंद सभा, भावनगर.
२. Kalpasutra of Bhadrabahu Swami by Kastur Chand Lalwani, pub. Motilal Banarasidas, 1979
3. Roth, Gustav. 1986. “Notes on the Paṃca-Namokkāra-Parama-Maṅgala in Jain Literature.” In Heinz Bechert and Petra Kieffer-Pülz (eds.), Indian Studies (Selected Papers). Delhi: Sri Satguru Publications. pgs.129-146.
-संजय सोनवणी

Thursday, November 13, 2025

यक्ष

जैन धर्माच्या प्रत्येक तीर्थंकरांच्या सेवक रुपात एक यक्ष व एका यक्षीचे स्थान असते. यक्ष आणि यक्षिणी हे तीर्थंकराच्या प्रतिमेच्या दोन्ही बाजूंना दर्शवतातयक्ष उजव्या बाजूला आणि यक्षिणी डाव्या बाजूला. ते तीर्थंकराचे भक्त मानले जातात आणि त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असतात. भारतातील यक्ष संस्कृती प्राचीन असून लोकधर्मात यक्षांचे रक्षक स्वरूपात फार मोठे स्थान होते. सरोवरे, गावे, शेते, संपत्ती इ.चे यक्ष रक्षण करतात अशी लोकश्रद्धा होती. लोकसंस्कृतीशी निकटचे नाते टिकवून ठेवण्यासाठी जैनांनीही यक्ष व यक्षिणीना तितकेच महत्वाचे स्थान दिले.

जैन यक्षात प्रामुख्याने पूजनीय असलेले यक्ष असे. गोमुखमहायक्षकरमुख, त्रिमुख, यक्षेश्वरतुंबरकुसुम किंवा पुष्पमातंग किंवा वारानंदीकवजय किंवा स्यामा यक्षअजीतब्रम्ह यक्षईश्वर यक्षकुमार चतुर्मुख किंवा संमुख यक्षपाताळ यक्षकिन्नर यक्ष, शांतीनाथांचा गरुड यक्ष,  गंधर्व यक्षखेंद्र किंवा यक्षेंद्र, धर्मेंद्र, कुबेरवरूणभृकुटीगोमेदपार्श्व किंवा धरणेंद्रमातंग यक्ष व सर्व तीर्थकरांचे सेवक यक्ष असतात.

यक्षिणीमध्ये चक्रेश्वरी, अजिता किंवा रोहिणी, निर्वाणी, दुरीतायी किंवा प्रज्ञाप्ती, वज्रश्रीमखाला किंवा कालीमहाकाली किंवा पुरुषदत्ताअच्युता किंवा शामा, मानववेगा,  ज्वाला मालिनीसुतारा निर्वाणी, गौरी, मानवीचंदा, गांधारीविदिता, विजया, अंबुसा, अनंतमतीकोंडर्पापुण्णगदेवीकनववती, महामानसीबाला, अच्युताधरणी  तारावैरोट्या किंवा अपराजिता, नारदत्ता किंवा बहुरूपिणीगंधारीचामुंडा, अंबिका,  कुस्मडी किंवा आमरापद्मावती सिद्धाईका इत्यादी होत.

     जैन धर्मातील प्रत्येक तीर्थंकरांचे संरक्षक यक्ष आणि यक्षी खालीलप्रमाणे-

·  ऋषभनाथ (आदिनाथ)

  • यक्ष: गोमुख
  • यक्षिणी: चक्रेश्वरी

·  अजितनाथ

  • यक्ष: महायक्ष
  • यक्षिणी: रोहिणी

·  संभवनाथ

  • यक्ष: त्रिमुख
  • यक्षिणी: दुर्गा

·  अभिनंदननाथ

  • यक्ष: यक्षराज
  • यक्षिणी: काली

·  सुमतिनाथ

  • यक्ष: तुम्बुरु
  • यक्षिणी: महाकाली

·  पद्मप्रभ

  • यक्ष: कुसुम
  • यक्षिणी: स्यामा

·  सुपार्श्वनाथ

  • यक्ष: मातंग
  • यक्षिणी: शांता

·  चंद्रप्रभ

  • यक्ष: श्याम
  • यक्षिणी: विजया

·  पुष्पदंत (सुविधिनाथ)

  • यक्ष: अजित
  • यक्षिणी: सुतारा

·  शीतलनाथ

  • यक्ष: ब्रह्मा
  • यक्षिणी: अशोक

·  श्रेयांसनाथ

  • यक्ष: यक्षेत
  • यक्षिणी: मानवी

·  वासुपूज्य

  • यक्ष: कुमार
  • यक्षिणी: चंडा

·  विमलनाथ

  • यक्ष: षण्मुख
  • यक्षिणी: विदिता

·  अनंतनाथ

  • यक्ष: पाताल
  • यक्षिणी: अंकुशा

·  धर्मनाथ

  • यक्ष: किन्नर
  • यक्षिणी: कंदर्पा

·  शांतिनाथ

  • यक्ष: गरुड
  • यक्षिणी: निर्वाणी

·  कुंथुनाथ

  • यक्ष: गंधर्व
  • यक्षिणी: बला

·  अरनाथ

  • यक्ष: यक्षनायक
  • यक्षिणी: धारिणी

·  मल्लिनाथ

  • यक्ष: कुबेर
  • यक्षिणी: धर्मप्रिया

·  मुनिसुव्रत

  • यक्ष: वरुण
  • यक्षिणी: नरदत्ता

·  नमिनाथ

  • यक्ष: भृकुटी
  • यक्षिणी: गंधारी

·  नेमिनाथ

  • यक्ष: गोमेध
  • यक्षिणी: अंबिका

·  पार्श्वनाथ

  • यक्ष: पार्श्व
  • यक्षिणी: पद्मावती

·  महावीर

  • यक्ष: मातंग
  • यक्षिणी: सिद्धायिका

जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर परंपरांनुसार तीर्थंकरांच्या संरक्षक यक्ष आणि यक्षिणींच्या नावांमध्ये काही भिन्नता आढळते. या भिन्नता मुख्यतः परंपरागत ग्रंथआचार्यांच्या व्याख्या आणि स्थानिक श्रद्धांवर अवलंबून असतात. खालीलप्रमाणे काही प्रमुख तीर्थंकरांच्या यक्ष-यक्षिणींच्या नावांमधील भिन्नता खाली स्पष्ट केली आहे.

सामान्य भिन्नता:

1.     नावांमधील फरकदिगंबर आणि श्वेतांबर परंपरांमध्ये यक्ष-यक्षिणींची नावे कधी कधी पूर्णपणे वेगळी असतात किंवा एकाच देवतेचे वेगवेगळे रूप मानले जाते.

2.     प्राधान्यकाही यक्ष किंवा यक्षिणी दिगंबर परंपरेत अधिक महत्त्वाच्या मानल्या जाताततर श्वेतांबर परंपरेत त्यांचे स्थान भिन्न असू शकते.

3.     आकृतिबंध आणि वर्णनयक्ष-यक्षिणींचे वर्णन (उदा.त्यांचे रूपरंगवाहनआयुधे) दोन्ही परंपरांमध्ये भिन्न असू शकते.

4.     स्थानिक परंपराकाही प्रादेशिक जैन मंदिरांमध्ये स्थानिक परंपरांनुसार यक्ष-यक्षिणींची नावे किंवा पूजा पद्धती बदलतात.

काही प्रमुख तीर्थंकरांच्या यक्ष-यक्षिणींच्या नावांमधील भिन्नता:

1.     ऋषभनाथ (आदिनाथ)

o    श्वेतांबर:

§  यक्ष: गोमुख

§  यक्षिणी: चक्रेश्वरी

o    दिगंबर:

§  यक्ष: गोमुख (समान)

§  यक्षिणी: चक्रेश्वरी (समानपरंतु काही दिगंबर ग्रंथांमध्ये तिचे नाव "अपराजिता" असेही येते).

o    भिन्नतायक्षिणीचे नाव आणि तिच्या मूर्तीचे स्वरूप (उदा.हातांची संख्याआयुधे) बदलते.

2.     पार्श्वनाथ

o    श्वेतांबर:

§  यक्ष: पार्श्व (किंवा धर्मेंद्र)

§  यक्षिणी: पद्मावती

o    दिगंबर:

§  यक्ष: पार्श्व (समान)

§  यक्षिणी: कुशमांडिनी (पद्मावतीऐवजी).

o    भिन्नतायक्षिणीचे नाव पूर्णपणे वेगळे आहे. श्वेतांबर परंपरेत पद्मावतीला विशेष महत्त्व आहेतर दिगंबर परंपरेत कुशमांडिनीला प्राधान्य दिले जाते.

3.     महावीर

o    श्वेतांबर:

§  यक्ष: मातंग

§  यक्षिणी: सिद्धायिका

o    दिगंबर:

§  यक्ष: मातंग (समान)

§  यक्षिणी: सिद्धायिका (समानपरंतु काही दिगंबर ग्रंथांमध्ये तिचे नाव "वैरोट्या" असेही सापडते).

o    भिन्नतायक्षिणीचे नाव आणि तिच्या पूजेचे स्वरूप बदलते. दिगंबर परंपरेत वैरोट्याला काही ठिकाणी अधिष्ठायिका म्हणून पूजले जाते.

4.     नेमिनाथ

o    श्वेतांबर:

§  यक्ष: गोमेध

§  यक्षिणी: अंबिका

o    दिगंबर:

§  यक्ष: षण्मुख

§  यक्षिणी: कुशमांडिनी (काहीवेळा अंबिका ऐवजी).

o    भिन्नतायक्ष आणि यक्षिणी दोन्हींची नावे बदलतात. श्वेतांबर परंपरेत अंबिका (किंवा कुशमांडिनी) अत्यंत लोकप्रिय आहेतर दिगंबर परंपरेत यक्षाचे नाव वेगळे आहे.

5.     शांतिनाथ

o    श्वेतांबर:

§  यक्ष: गरुड

§  यक्षिणी: निरवाणी

o    दिगंबर:

§  यक्ष: किंपुरुष

§  यक्षिणी: महामानसी

o    भिन्नतायक्ष आणि यक्षिणी दोन्हींची नावे वेगळी आहेत. दिगंबर परंपरेत महामानसीला अधिक महत्त्व आहे.

यक्षिणींची लोकप्रियताश्वेतांबर परंपरेत पद्मावतीअंबिका आणि चक्रेश्वरी यांसारख्या यक्षिणींना विशेष स्थान आहे आणि त्यांच्या स्वतंत्र मंदिरेही आढळतात. दिगंबर परंपरेत कुशमांडिनी आणि अपराजिता यांना प्राधान्य मिळते.

यक्षांचे स्वरूपयक्षांचे नाव काहीवेळा समान राहते (उदा.गोमुखमातंग)परंतु त्यांचे चित्रण आणि पूजाविधी बदलतात.

ग्रंथांचा आधारश्वेतांबर परंपरेत "प्रतिष्ठासार" आणि "त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र" यांसारख्या ग्रंथांवर आधारित नावे ठरताततर दिगंबर परंपरेत "हरिवंशपुराण" आणि "आदिपुराण" यांसारख्या ग्रंथांचा प्रभाव आहे.

यक्ष परंपरा

अथर्ववेद आणि बव्हंशी उपनिषदांमध्ये येणारा “ब्रह्म” हा शब्द मूळच्या यक्ष (अद्भुत, अचिंत्य व संरक्षक शक्ती) या शब्दाचे पर्यायी नाव आहे. यक्षपूजा वेदपूर्व काळापासून चालू आहे. यक्षपूजेचा ऱ्हास झाल्यानंतर वैदिक लोकांनी यक्षांची क्षुद्रदेवतांमध्ये गणना केली. वीर व ब्रह्म हे शब्द यक्षाचे पर्याय असून वीरब्रह्म’ या देवतेची पूजा हा यक्षपूजेचाच अवशेष होय. वैदिक संस्कृतीतील येणारी ब्रह्मकल्पना व ब्रह्म हा शब्द ही यक्षसंस्कृतीचीच देणगी आहे असे अनेक विद्वानांचे मत आहे. विशेषता: केनोपनिशषदातून तर हे जास्तच स्पष्ट होते. ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्यातील ब्रम्ह या शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे. यक्ष संस्कृती एतद्देशीय व पुरातन असून लोकधर्मांमध्ये ती अत्यंत प्रिय देवता होती. गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नावाचा एक यक्षच होतास्वत: बुद्धाला यक्ष म्हटले जाईजैन धर्मियांनी यक्ष-यक्षींना तीर्थंकरांचे सेवक मानले आहे  असे असले तरी वैदिक साहित्यात मात्र यक्षांना त्यांना नरभक्षक, मायावी ठरवून बदनाम करण्यात आले. श्रमण संस्कृतीचा उदय मुळात लोकसंस्कृतीतून झाला असल्याने त्यांनीही यक्षाचे स्थान आपल्या तत्वपरंपरेत कायम ठेवले असे दिसून येते. असे असले तरी रामायण व महाभारतामध्ये तसेच पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे अरंतुकआसारणकरतुतरंतुकताक्ष्यमचकुकमणिभद्र ही दशकुमारचरितात आलेली नावे तर मानसरथकृतरामहृदशतजितश्रोतायक्षसत्यजित्‌सुप्रतीक यांचे नाव कथासरित्सागरात आले आहे.

बौद्ध धर्मातील स्तूप तसेच हिंदू मंदिरांतही यक्षांच्या प्रतिमा आढळून आलेल्या आहेत. वीर मारुतीही मुळची यक्ष असावी असा अंदाज वर्तवण्यात येतो.

यक्षप्रतिमांचे प्राचीन पुरावे-

परखम (मथुरेजवळ) येथे यक्षाची एक प्राचीन प्रतिमा मिळून आली असून ती मणीभद्र यक्षाची असावी असा विद्वानांचा कयास आहे. मणीभद्र यक्षाच्या अन्य दोन प्रतिमा मिळाल्या असून एक ग्वाल्हेरजवळील पवाया येथे तर दुसरी  कोशाम्बी जवळील भीटा येथे आहे 

image.png


परखम शिलालेखाखाली एक त्रुटित शिलालेखही आहे त्यावरून ही प्रतिमा इसपू दुसऱ्या शतकातील असावी असा अंदाज विद्वानांनी बांधला हे. हा यक्ष व्यापाऱ्यांचे रक्षण करणारा असावा असेही अनुमान काढले गेलेले आहे. मथुरा परिसरातीलच भारहुत येथील याच काळातील बुद्ध स्तूपातही यक्षिणीच्या प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. सर्व जैन व शैव हिंदू मंदिरांत यक्षाच्या प्रतिमा प्राधान्याने असतात.

 संदर्भ-

1.   History of Early Stone Sculpture at Mathura, Ca. 150 BCE-100 CE By Sonia Rhie MaceSonya Rhie Quintanilla, 2007

...

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...