Wednesday, July 1, 2026

लेखकांना राजकीय मते असू शकत नाहीत काय?

 

लेखकांनी राजकीय मत ठेवू नये, ठेवत असतील तर ते आम्हाला जे आवडते तेच त्यांचे मत असले पाहिजे हा दुराग्रह गेली पंधरा-सोळा वर्ष मी पाहतो आहे. असे म्हणणार्यांसारखे मत नसेल तर वाट्टेल त्या थराला जाऊन अभिव्यक्त होणाऱ्याची निंदा करणे, शिवीगाळ करणे हा काही भाडोत्री लोकांचा छंद बनून गेला आहे.

 

त्यामुळेच की काय अनेक प्रसिद्ध लेखक आपले राजकीय मत व्यक्त करण्याचे टाळतात आणि आपल्याच बंदिस्त साहित्य व्युहात रममाण राहतात आणि कधी मत व्यक्त केलेच तर ते शक्यतो सत्ताधारी पक्षाच्याच बाजूचे लिहितात, मग सत्तेमध्ये यांना हिटलर, स्टालिन किंवा मुसोलिनी असला तरी काही फरक पडत नाही.

 

सर्वात वाईट बाब ही की काही विचारवंत देखावा करतात की ते विरोधी बाजूचे आहे पण ते शक्य तेवढे सत्ताधार्यांना मदत करण्यासाठी आपली विचारबुद्धी आणि वक्तृत्व बुद्धी वापरत असतात. असे दुर्तोंडी स्वविचारघातकी विचारवंतही आजकाल ढीगाने झालेले आहेत.

 

पण याच्याही पलीकडे जाऊन व्यापक समाज आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आपली  मते सातत्याने मांडत असणारे काही लेखक, विचारवंत आणि कवी असतात. सामान्य असणारे नागरिक, सारे निरीक्षण करत राहतात...कधी भावनांवर वाहून जातात आणि जेव्हा सत्ता आपल्या हिताचे काहीही करत नाही हे लक्षात येते तेव्हा उद्रेकून उठतात. हा उद्रेक अनेकदा सुप्त असतो. त्यावर सर्व प्रचलित विचारप्रवाहांचा प्रभावही असतो. पण तो व्यक्त करायचा मार्ग म्हणजे मतपेटी. पण त्यातूनही आपली मते पोचायला हवीत तेथे पोचतच नाही हे हळूहळू लक्षात येऊ लागते तेव्हा मात्र हा उद्रेक रस्त्यावर येऊ शकतो. अघोषित हुकुमशाहीचा विरोध करण्याचा तोच एक मार्ग लोकांच्या हातात उरलेला असू शकतो.

 

धर्म आणि जात हे सामाजिक संघर्षाचे आणि राजकीय यशाचे कारण सहसा दिले जात असले तरी ते चिरकाळ टिकू शकत नाही. पोट भरू शकले तरच धर्म आणि जात आठवते. आजवर आठवत राहिली कारण पूर्वीच्या सरकारांनी सर्वांना किमान अन्न मिळावे ही खबरदारी घेतलेली होती. त्याच जीवावर धर्मोन्माद आणि जातीय संघर्ष निर्माण करण्यात भाजपाला यश मिळाले. पण ते लोकांच्या पोटाची, जीविताची आणि भविष्याची काळजी घेण्यात जसजसे अपेशी ठरू लागले तसा असंतोष वाढत गेला आहे. आणि या उत्तरोत्तर वाढत चाललेल्या असंतोषाचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे लोकांनी आक्रोश करत रस्त्यावर यावे आणि माध्यमे नाहीत तर आपल्याच आवाजात आहे त्या सरकारला जाब विचारावा. तेही शक्य झाले नाही तर सरळ आत्महत्या कराव्यात वा कोणा झुंडीचे बळी व्हावे.

 

भारतात हे स्वातंत्र्य पूर्व काळात घडले. आणीबाणीच्या काळातही घडले. पण ती सुस्थिती वाटावी अशी वेळ विद्यमान सरकारने आणून ठेवलेली आहे. जगातली आपली किंमत सोडा, पण भारतातील आपले कायदा, सुव्यवस्था आणि घटनात्मक मूल्यांचे स्थान काय आहे याचा गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे. देशाच्या नागरिकांत दुभंग आणि द्वेषभावना निर्माण करण्याचा चंग बांधला गेलेला आहे. आणि या भावानिद्रेकात लोकांना आपली रोज ढासळत चाललेली स्थिती विसार्वाय्ला लावण्याचा प्रयत्न होतो आहे.

 

मी एक लेखक आहे. राजीव गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असताना मी त्यांच्याविरुद्ध “गुडबाय प्राईममिनिस्टर” ही उपहास करणारी उपरोधिक कादंबरी लिहिली आहे. अन्नसुरक्षा बिलावरसुद्धा कोरडे ओढलेले आहेत. ही मोजकी उदाहरणे आहेत. माझ्या साहित्यात तुम्हाला ती अनेक सापडतील.

 

भाजप सत्तेत आली तेव्हापासून त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि परराष्ट्र नीतीवर जेथे जेथे चुका दिसल्या त्यावर आसूड ओढलेले आहेत. प्रश्न गेल्या सत्तर वर्षात काय झाले आणि काय झाले नाही हा नसून तुम्ही काय करताय हाच होता आणि आहे. मागील लोकांनी तुमच्या मते चुका केल्या तर त्या दुरुस्त करून तुम्ही नवीन इमले किती उभे केले हा आहे. ट्रोल मंडळी फेक आकडेवार्या फेकण्यात जेवढी वस्ताद आहे तेवढेच विद्यमान सरकारही आहे कारण साधे जीडीपी मोजण्याचे जुने मापदंड बदलून खोटी टक्केवारी जाहीर करण्यात हे लोक वस्ताद झालेले आहेत. भारताने जे स्थान निर्माण केले होते ते स्थान खालावत गेलेले आहे आणि याचे शर्म कोणाला वाटत नसल तर ते राष्ट्रप्रेमी कसे?

 

मी परदेशात स्थलांतरित होण्याच्या किमान दोन संधी आल्या असल्या तरी देश सोडण्याचा स्वप्नातही विचार केला नाही. हा देश माझा आहे. या देशातील (आज द्वेषाने माथे फिरवलेले धरून) सर्व लोक माझे बांधव आहेत. हीच प्रतिज्ञा शाळेत दिली जात असते. मी केवळ लिहिता येते म्हणून लेखक आहे. प्रथम बाब म्हणजे मी या देशाचा नागरिक आहे. आणि सर्व नागरिक गुण्या-गोविंदाने नांदावेत हे माझे एक माणूस म्हणून स्वप्न आहे. पण द्वेषाने भारावलेले लोक एका धर्माच्या लोकांना नष्ट करणे किंवा त्याना नामोहरम करणे ही स्वप्ने नुसती पाहत नाहेत तर प्रत्यक्षात तसे करण्याच्या प्रयत्नात मशगुल आहेत. गुजरातमध्ये त्यासाठीच नरसंहार केला गेलेला आहे. विद्यमान सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. हा हिटलरी कावा आहे हे लक्षात न येण्याएवढे या देशातील सारेच लोक मूर्ख नाहीत. भ्रमिष्ठावस्थाही कायम टिकून राहु शकत नाही.

 

मी लेखक आहे. मी माझ्या लेखणीला कधीही विकण्याचा अथवा शरण जाण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. मला विचारांचे खुले सौंदर्य हवे आहे. ट्रोलांचे आघात झाले म्हणून विचलित होणार्यांपैकी मी नाही. मी फक्त मला घाबरतो. तात्विक विवादासाठी पुढे येणार्यांचे मी स्वागतच करतो हे माझ्या विरोधकांनाही माहित आहे.

 

लेखक, विचारवंत किंवा समाज सेवक या देशाचेच नागरिक आहेत. “मला राजकीय मत नाही” असे जो कोणी म्हणतो तो धादांत खोटे तरी बोलत असतो किंवा त्याला “विचार” ही बाबच कोणी शिकवलेली नसते. मला राजकीय मते आहेत. ती असलीच पाहिजेत. कारण राजकीय मत असणे एक माणूस म्हणून मला नैसर्गिक अधिकार आहे. पण अमुकच मते बाळगा असे मला कोणी दटावून सांगत असेल किंवा मी कोणाला सांगत असेल तर अशा व्यक्ती लोकशाहीला लायक तर नाहीच पण ती प्रत्येक मनुष्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वावर आघात करत असते. ही अशे स्वातंत्र्य हिरावून घेणारी “समरसता” मला पूर्णपणे अमान्य आहे.

 

या देशातील संघर्ष नुसता राजकीय नाही तर तो प्रामुख्याने सांस्कृतिक आहे हे फारसे कोणी अजून लक्षात घेतलेले नाही. भाजपचे राजकारण संघप्रणीत असल्याने ते स्वाभाविकही आहे. गोळ्वलकर गुरुजी ते दिनदयाळ उपाध्याय हे त्यांचे मुख्य तत्वज्ञ आहेत. त्यांच्या तत्वद्न्यानाकडे  नुसत्या हेटाळनीच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा त्याचा गंभीर अभ्यास केला तर हे लक्षात येईल की गेली बारा वर्ष भाजप त्यांचे तत्वज्ञान क्रमा-क्रमाने प्रत्यक्षात आणत असल्याचे दिसून येईल. मुल्सिमान्ना दुय्यम नागरिकत्व, एक देश-एक धर्म, एक देश-एक भाषा, एक देश एक निवडणूक, भारतीय संघराज्याचे स्वरूप बदलून एकाच एक केंद्र सरकार असणारे राष्ट्र, धर्मसत्तेच्या अंमलाखाली असणारी राजकीय सत्ता आणि तीही साम्राज्यवादी. संसदेत सेन्गोल आणला गेला तेव्हा तरी भारतीय विचारवन्तांचा हे लक्षात यायला हवे होते. प्रादेशिक पक्षांना सत्तेचे आमिष दाखवून फोडाफोड सुरु केली तेव्हा तर हे अधोरेखित व्हायला हवे होते. असे अनेक प्रकार झाले. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा त्यातीलच एक प्रकार. हे जेवढ्या गांभीर्याने घेतले जायला हवे होते तेवढ्या गांभीर्याने न घेता वरवरचे मुद्दे काढत विरोध केला गेला. पुढे हा विषय बारगळला असे लोकांना वाटले पण “हिंदी ही ज्ञानभाषा आहे, त्यामुळे ती शिकणे आवश्यकच आहे.” असला दिव्य शोध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावला तेथेच ही आज ना उद्या पक्की होणारी गोष्ट आहे आणि त्याच दिशेने पावले पडत आहेत हे लक्षात यायला हवे होते, पण तसे झालेले नाही.   

 

पण ही माझी मते झाली. तुम्हाला ती मान्यच असावीत असा माझा आग्रह नाही. पण एक व्यक्ती म्हणून, एक लेखक म्हणून मला माझी राजकीय आणि सांस्कृतिक मते आहेत आणि ते बाळगण्याचा मला पुरेपूर अधिकार आहे हे तुम्हाला मान्य आहे काय?

 

-संजय सोनवणी

 

Thursday, June 25, 2026

उड्डाणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे राईट बंधू


मागील लेखात आपण पाहिले की मानवी उड्डाणाचे स्वप्न प्राचीन काळापासून मानवाला सतावत होते. माणसाने नेहमीच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न केला आहे. उडता यावे हे स्वप्न तसे अशक्यप्राय वाटत असले तरी माणसाची अपार जिज्ञासा आणि तिच्या पूर्तीसाठी अथक प्रयत्न करत राहण्याही वृत्ती यातून विमानाच्या प्रत्यक्ष शोधापर्यंतचा प्रवास मानवाने पूर्ण केला. विमानाच्या संकल्पनेचा इतिहास, प्राचीन पुराणकथांत मिळणारे उल्लेख, विमानसदृश्य सापडलेली प्राचीन खोदचित्रे असा पुढे जात लिओनार्डो दा विंची, जॉर्ज केली, ओटो लिलिएन्थल इत्यादींपासून पुढे तो राईट बंधूंपर्यंत येतो. या शोधपरंपरेत सातत्याने, अनेक अपयशे येउनही हार न मानता मानव उड्डानाचे प्रयत्न करत राहिला. त्याचा पुढील भाग म्हणून राईट बंधूंनी प्रत्यक्ष यशस्वी उड्डाण साध्य केले. तत्पूर्वी अपयशे येण्याचे कारण म्हणजे एक मूलभूत प्रश्न आणि तो म्हणजे माणूस आकाशात उडू शकेलही, पण तो हवेत प्रचालन कसे करणार? त्यामुळे सर्वांचे उड्डानाचे प्रयोग अयशस्वी होत होते.

पण नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर शोधताना दोन अमेरिकन बंधूंनी इतिहास घडवला. विल्बर आणि ऑर्व्हिल राईट हे ते बंधू. ते प्रत्यक्षात व्यावसायिक शास्त्रज्ञ नव्हते तर ते ओहायो राज्यातील डेटन येथे सायकली बनविण्याचा आणि दुरुस्त करण्याचा व्यवसाय करत होते. परंतु यंत्ररचनेची उत्तम जाण, निरीक्षणशक्ती आणि उपजत प्रयोगशील वृत्ती यांमुळे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या समस्येकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले.

यामागे एका दुर्दैवी अपघाताची पार्श्वभूमी आहे. माणूस तोवर ग्लायडर बनवून त्यातून उडायला शिकला असला तरी त्यात नियंत्रणाची साधने नव्हती. इंजिनही नव्हते. तरीही धाडसी लोक उद्दानाचे प्रयोग करतच असत. अशात १८९६ मध्ये जर्मन संशोधक ओटो लिलिएन्थल यांचा ग्लायडर अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने राईट बंधूंना धक्का बसला, पण त्याचबरोबर उड्डाणशास्त्राविषयी तीव्र उत्सुकताही निर्माण झाली. त्यांनी उपलब्ध साहित्याचा अभ्यास सुरू केला. त्या अनेक संशोधकांचे लक्ष अधिक काळात विमान उडवू शकेल असे शक्तिशाली इंजिन तयार करण्यावर केंद्रित असल्याचे त्यांना दिसून आले. परंतु राईट बंधूंना वाटले की खरा प्रश्न इंजिनाचा नसून नियंत्रणाचा आहे. त्यांनी मग नैसर्गिक रीत्या उडणार्या पक्षांवर आपले लक्ष आधी केंद्रित केले.

पक्ष्यांचे निरीक्षण करताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. उडते पक्षी वळताना किंवा संतुलन राखताना पंखांच्या कोनात काही सूक्ष्म बदल करतात. त्या निरीक्षणावरून त्यांनी पंखांना किंचित झोक देऊन विमानाला वळविण्याची आणि दिशा देण्याची कल्पना विकसित केली. पुढे हीच पद्धत विंग वॉर्पिंगम्हणून प्रसिद्ध झाली.

सन १८९९ मध्ये त्यांनी एका छोट्या पतंगावर हा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष ग्लायडर बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील किटी हॉक हा समुद्रकिनारी भाग निवडला. येथे जोरदार वारे वाहत असत आणि जमिनीवर मऊ वाळू असल्याने जरी अपघात झाला तरी जीवितहानीची शक्यता कमी होती.

१९०० ते १९०२ या काळात त्यांनी तीन वेगवेगळे ग्लायडर तयार केले. शेकडो उड्डाणे केली. अनेक वेळा अपयश आले. तरीही त्यांनी हार न मानता आपले प्रयोग झपाटल्यासारखे सुरूच ठेवले. हे प्रयोग करताना प्रत्येक अपयशाच्या वेळेस ते अपयश का आले असावे याचा अभ्यास करत. आपल्या काळातील उपलब्ध वायुगतिकीय आकडेवारी चुकीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बहुतेक संशोधकांनी एवढी अपयशे आल्यानंतर प्रयोग सोडून दिले असते, पण राईट बंधूंनी उलट स्वतःच संशोधन करण्याचे ठरवले.

त्यांनी एक लहान विंड टनेलतयार केला. विविध आकारांच्या शेकडो पंखांची चाचणी घेण्यात आली. आजच्या दृष्टीने हा प्रयोग साधा वाटेल; परंतु त्यातून मिळालेली माहिती त्या काळातील कोणत्याही उपलब्ध माहितीपेक्षा अधिक अचूक होती. उचलशक्ती, वायुरोध, पंखांचा कोन आणि आकार यांचे प्रत्यक्ष मोजमाप करून त्यांनी विमानरचनेचे नवे तंत्रज्ञान विकसित केले.

१९०२ चा त्यांचा ग्लायडर हा खऱ्या अर्थाने पहिला पूर्णपणे नियंत्रित ग्लायडर ठरला. त्यात पंखांचे वळण, उभा रडर आणि पुढील नियंत्रण ठेवण्यासाठीचा पृष्ठभाग यांचा समन्वय साधण्यात आला. आजच्या आधुनिक विमानांतील नियंत्रण व्यवस्थेची बीजे याच रचनेत दिसून येतात.

यानंतर उरला तो इंजिनाचा प्रश्न. बाजारात उपलब्ध इंजिने अतिशय जड होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचे इंजिन बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यशाळेतील चार्ली टेलर या कुशल मेकॅनिकने त्यांना मदत केली. अवघ्या काही महिन्यांत हलके पण सक्षम पेट्रोल इंजिन तयार झाले.

विमानाच्या प्रचालनासाठी लागणार्या पंख्यांची समस्या त्याहून कठीण होती. त्या काळी पंख्यांचे शास्त्र जवळजवळ अस्तित्वातच नव्हते. त्यांनी तयार केलेले प्रचालक पंखे (प्रोपेलर) त्या काळातील कोणत्याही रचनेपेक्षा अधिक कार्यक्षम ठरले.

अखेर सर्व तयारी पूर्ण झाली. १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉकजवळील किल डेव्हिल हिल्स येथे इतिहास घडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ऑर्व्हिल राईट विमानात आडवे झाले. विमानाने लाकडी रूळांवरून वेग घेतला आणि अचानक जमिनीपासून वर उचलले गेले. ते केवळ १२ सेकंद हवेत राहिले आणि सुमारे १२० फूट अंतर पार केले. परंतु मानवाच्या इतिहासातील तो क्षण अनमोल होता.

त्या दिवशी एकूण चार उड्डाणे झाली. शेवटच्या उड्डाणात विल्बर राईट जवळजवळ एक मिनिट हवेत राहिले आणि ८५० फूटांहून अधिक अंतर पार केले. त्यानंतर जोरदार वाऱ्याने विमानाचे नुकसान झाले आणि त्या दिवसाचे प्रयोग थांबले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी जगाने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. काही वृत्तपत्रांनी ती बातमी छापलीही नाही. अनेकांना तिच्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु पुढील काही वर्षांत राईट बंधूंनी आपल्या विमानात सातत्याने सुधारणा केल्या आणि अखेर संपूर्ण जगाला त्यांच्या यशाची दखल घ्यावी लागली.

राईट बंधूंचे मोठेपण केवळ त्यांनी पहिले उड्डाण केले म्हणून नाही. त्यांनी संशोधनातील प्रत्येक अडचण वैज्ञानिक पद्धतीने सोडवली. उपलब्ध माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता स्वतः प्रयोग केले. अपयशाला घाबरले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या यशाने आधुनिक विमानयुगाचा पाया घातला.

आजची महाकाय प्रवासी विमाने, ध्वनिवेगापेक्षा जलद जेट विमाने आणि अवकाश संशोधन यांची सुरुवात त्या बारा सेकंदांच्या उड्डाणातून झाली होती. मानवी जिद्द, वैज्ञानिक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही प्रत्यक्षात उतरू शकतात, याचा राईट बंधूंचा इतिहास हे सर्वोत्तम उदाहरण आहे. राईट बंधूंनी केवळ विमान शोधले नाही तर त्यांनी उड्डाण नियंत्रित करण्याची समस्या सोडवली आणि माणसाचे हवेत उडता येण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

·         संजय सोनवणी

Tuesday, June 16, 2026

या “सुंदर” मूर्खपणाचे रहस्य काय?





भारतातील एक न्यायाधीश देशातील तरुणांना झुरळ आणि बांडगुळ म्हणतो आणि त्यावर उपहास म्हणून अमेरिकेतील एक तरुण आभासी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करतो. देशातील तरुण या बेहद्द उपहासी कल्पनेला कोट्यावधीच्या संखेने पाठींबा देतात. जंतर मंतरवर काही हजार तरुण एकत्र येत आंदोलन करतात. पुण्यातही त्याची एक आवृत्ती होते. मंच हरपून बसलेले तथाकथित विचारवंत कोणताच पक्ष विचारत नाही म्हणून या आंदोलनाकडे धाव घेतात. हेच लोक एके काळी अण्णा हजारेच्या आंदोलनातही सामील असतात आणि भ्रमनिरास होऊन बाहेरही पडलेले असतात. खरे तर अण्णा हजारे आणि आता अभिजित दीपके हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. “मै भी अण्णा” म्हणणारे हेच लोक गेल्या बारा वर्षात सातत्याने पुरोगामी चेहरा म्हणून मिरवत आहेत. जिकडे लोकमत धावेल त्याच्या बाजूला ओसंडून धावायची हौस असणारे या देशात कमी नाहीत. खरे तर यांचा जन्मजात मूर्खपणाच अनेकदा देशाला गंभीर वैचारिक खाईत कोसळवायला भाग पाडत असतो आणि त्याची जाणीव नसलेले हेच “देशात प्रश्न उसळत आहेत आणि ते सोडवायची फक्त आमचीच प्रामाणिक इच्छा आहे” असल्या मानसिकतेत दंग राहून स्वत:ची आणि लोकांचीही फसगत करत असतात. मूर्ख आधेच मूर्ख असलेल्यांना अधिक मूर्ख बनवत आहेत याचे हे विदारक लक्षण आहे, कारण ही बाब फक्त विचारवन्तांपुरती मर्यादित नाही तर ती सर्व क्षेत्रात घुसली आहे. भारताचे खरे सौंदर्य या विराट मुर्खपणामुळे झाकोळले गेले आहे.
भारतात सर्वत्र अशा मूर्खपणाचा उद्रेक जो आज दिसतोय तो प्राचीन काळापासून आहे हेही एक विशेष. आम्ही आमच्या सुंदर वाटणार्या पण कुरूप मुर्खपणामुळे किती वैद्न्यानिक प्रगतीच्या आणि जगाचे गुरु बनण्याच्या संधी सोडल्या याची आम्हाला जाणीव नाही. मग हे वर्तमानातले राजकीय, सामाजिक आणि वैचारीक मूर्खपणा उद्रेकत असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण आपले मेंदू कोणत्याही विचारव्युहासमोर गहाण टाकू नयेत एवढे सामान्य ज्ञान नसणारे केवढ्या सुंदर मूर्खपणाच्या नंदनवनात जगात असतील तर आम्ही आमच्या अवस्थेवर कीव केली पाहिजे.
इतिहासात आम्ही काय केले? वेद-उपनिषदे, रामायण महाभारत..पुराणे यातील मोहमयी, सुंदर पण भ्रामक कल्पनाविश्वात जे अडकुन पडलो ते पडलोच. चवथ्या शतकात पृथ्वी सपाट नसुन ती गोल आहे व स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडणारा आर्यभट नावाचा महान शास्त्रद्न्य भारतात झाला होता. पण पुढे ब्रह्मगुप्त, परमादीश्वरादि खगोलद्न्यांनी त्याचा सिद्धांत साफ फेटाळुन लावला. तोवरच काय, पार कोपर्निकस (सतरावे शतक) येईपर्यंत पृथ्वी सपाट आहे याच भ्रमात अवघे जग राहिले. ज्ञानेश्वरांपर्यंत आर्यभटाची ही कृती पोहोचली ती शंकराचार्यांच्या मार्गे. पण जवळपास ९०० वर्षांनी आणि ज्ञानेश्वरांनीही आर्यभटाचाच हात धरत (ज्ञानेश्वरी ४:९७-९९) एका गणिती सिद्धांताचे आध्यात्मीक रुपकात रुपांतर केले आणि गणिताची...खगोल शास्त्राची हत्या केली गेली. खरे तर पायची पाच डिजिटपर्यंतची किंमत काढणारा पहिला गणितज्ञ आर्यभटच. sin आणि cos या गणिती संज्ञा निर्माण करणाराही आर्यभटच! खरे तर आर्यभटाचा अभिनव विचार न हेटाळता अथवा अध्यात्मात घुसवत त्याला परलोकवादी आध्यात्मिक सिद्धांतात न बदलवता त्याची शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध प्रगती करण्याचा विविधांगी प्रयत्न झाला असता तर कदाचित भारत हाच विद्न्यानातील एक महासत्ता बनला असता. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी.
गतकाळाची एवढी चर्चा का? इतिहासाकडे डोळे उघडुन पाहिले नाही तर आपल्याला आपल्या आजच्या चुका कदापि कळणार नाहीत. वर्तमानाचे आकलनही असेच धुसर होत जाईल मग भविष्य काय असणार? आपण इतिहासाकडे जातीय व धार्मिक अहंकारांच्या भावनांतुन पाहतो. वर्तमानाकडे भूतकाळाचे चष्मे लावून पाहतो. पुर्वीही रामकथा जैन व बौद्ध धर्मियांनी आपापल्या सोयीने पुन्हा लिहुन काढली. वैदिकांनीही बालकांड आणि उत्तरकांड घुसवत आणि मुळ कथेत सोयिस्कर घालघुसड करत मूळ रामकथेची वाट लावुन टाकली. महाभारताचे तर विचारुच नका! आम्ही सत्याचे बुरुज अंधविश्वासाच्या गहन धुक्यात गडप करुन टाकले. आमची बुद्धी आजही तशीच चालत आहे हे अजुन एक दुर्दैव. आज जवळपास प्रत्येक जात आपल्या प्राचीनत्वाच्या नव्या मित्थकथा निर्माण करत नवी पुराणे लिहित आहेत. कोणाचीही चिकित्सा कोणालाही नको आहे. अशा स्थितीत वर्तमानात जे घडते आहे त्यातील मूर्खपणा आम्हाला कसा कळणार?
आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. मूर्ख होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, कपिल मुनींचा विचार पुरातन काळातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य आणि वैशेषिक विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे गोंडस तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या वैचारिक बेड्यांत जखडले. त्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती. आजही राजकारणासाठीच निर्माण होणार्या सामाजिक चळवळी फसव्या असतात हे सिद्ध होऊनही स्वत:ला विचारवंत म्हणवणारे महाभाग संधी मिळेल या आशेने इकडे तिकडे उड्या घेत केवळ स्वत:ची नव्हे तर अखिल समाजाची दिशाभूल करतात हे दुर्दैव आहे. भारतात आता सामाजिक क्रांति नव्हे तर विचारांची क्रांति हवी. विचार-परिपक्व समाजाखेरीज सामाजिक क्रांति कधीही होऊ शकत नाही.
पण आम्हाला साहस करत भविष्य बनवायचे नाही तर आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे आहे. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात हे सर्वच भारतियांच्या दांभिक आणि पराजित फसवेपणाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे आणि यालाच सुंदर वाटला तरी असलेला सामुदायिक मूर्खपणा म्हणतात यावर आम्ही कधी विचार करणार? आम्ही "आम्हाला याने फसवले...लुटले..." असे गळे आजही काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.
इतिहासाचे आणि वर्तमानाचे प्रामाणिक अन्वेषन करत भविष्याची महाद्वारे खोलल्याशिवाय आम्हाला आमच्या मुर्खपणाचे रहस्य समजणार नाही. ते रहस्य जोवर समजणार नाही तोवर आमच्या उज्ज्वल भविष्याचे मार्गही उघडणार नाहीत. शेवटी ज्यांना गटार-विचार-व्युहात कसलेही तत्वद्न्यान नसतांना रमायचे आहे त्यांना कोण आवाज देणार? सामाजिक मागासपणा एक वेळ दूर होईल, पण या बौद्धिक मागासपणाचे आपण काय करणार?
या “सुंदर” मुर्खपणातील कुरूपता आम्ही कधी पाहणार?
-संजय सोनवणी

Monday, May 25, 2026

होय...हा फुकट्यांचा देश झाला आहे!

ज्या देशात आजही ८० कोटी नागरिक मोफत धान्यावर गुजराण करतात, ज्या देशात लाडकी बहीण, लेक लाडकीसारख्या सरकारी तिजोरीवर भार टाकणार्या योजना आखून उंदंड मते मिळवली जातात तो देश महासत्ता होईल ही भ्रामक आशा बाळगणे वेडगळपणाचे आहे. याच वेळीस वंचितांचे काय हा उद्दाम प्रश्न विचारणारे तद्न्यही पुढे येतात तेव्हा चिंता वाटणे स्वाभाविक आहे.


आपल्याकडे वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. पण हा आर्थिक आधार दुबळा असतो हे कोणीच लक्षात घेत नाहेत. आज ७० लाख महिला लाडक्या बहिणीच्या लाडक्या योजनेतून बाद झाल्यात. मग त्यांना आधी दिलेले पैसे परत घेण्यासाठी सरकारकडे योजना आहे काय? आज जातीनिहाय जनगणना सुरु झालीय. त्यात नागरीक आपली आहे ती खरी जात नोंदवणार आहेत काय? आणि मुळात जी जात सांगितली ती पडताळून पहायचे काही निकष आज आहेत काय? १९३१ च्या जनगणनेत लोकांनी आपल्या जाती उच्च दाखवण्यासाठी खोट्या जाती नोंदवल्या होत्या तसेच आता होणार नाही आणि ही जनगणना भ्रामक आकडेवारी समोर ठेवणार नाही याची खात्री काय आहे? तेव्हा उच्च जात सांगायचा प्रघात होता आता आरक्षणासाठी खालच्या जाती सांगितल्या गेल्या तर जातींचे एकंदरीत आहे ते वितरण बदलणार नाही काय? यातून मुख्य समस्येसाठी प्रभावी उत्तर मिळेल काय? आणि जाती निर्मुलन करायचे आमचे ध्येय कोठे गेले?

सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी “आर्थिक आधार” ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक निकष अधिक व्यापक आणि गुंतागुंतीचे आहेत. आहेत. त्याची सोडवणूक करण्याचे मार्गही वेगळे आहेत. जाती, धर्म, प्रांता-प्रांतातील विकासाचे असमान वितरण, मुलभूत सुविधांचा अभाव, आरोग्य सेवांचे अपुरे जाळे, वाहतूक व्यवस्थेतील सर्वकष दोष, पाण्याचे होणारे असंतुलित वितरण, मुलभूत अधिकारांचे जतन न होणे, लैंगिक व जातीय अत्याचार असे असंख्य पैलू वंचिततेच्या परिप्रेक्षात असतात आणि असायला हवेत पण त्यावर आजतागायत आपण प्रभावी तोडगा काढण्यात अपयशी ठरलेलो आहोत. पण किमान आर्थिक वंचितता एवढा जरी आधार घेतला तरी ती दूर करण्यासाठी आपल्याकडे तोडके, जुजबी आणि लोकानुययी उपाय केले जातात हेही वास्तव आहे. या वंचित घटकांना आपले मतदार बनवण्यासाठी लेक लाडकी किंवा लाडकी बहीण, कर्जमाफी, वीजबिलमाफी स्वस्त किंवा मोफत राशनसारख्या योजना कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सरकार किंवा निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष घोषित करतात व त्या आधारावर आपली राजकीय पोळी भाजून घेतांना आपण नित्यश: पाहत असतो. यातून वंचितांचे हित होईल असा दावा त्या त्या पक्षांचे प्रवक्ते अथवा स्वयंघोषित अर्थतज्ञ करत असले तरी त्यामध्ये फारसे तथ्य नसते. यातून फुकटेपणाची भावना वाढीस लागून लोकांचा आत्मसन्मान कमी होत अंत:ता कार्यक्षमतेवर परिणाम होईल असे इशारेही काही अर्थतद्न्य देत असतात.

आपणच करदाते आहोत या मस्तीत वावरणा-या पांढरपेशा वर्गाचा या योजनामुळे जळफळाट होत असला तरी त्यांचेही दृष्टीकोन मुळातच दुषित असल्याने वंचिततेच्या मुख्य प्रश्नावर गंभीर चर्चा करून शाश्वत तोडगा काढण्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे वंचितता दूर होईल हा एक भाबडा आशावाद निर्माण होतो. वंचितता आहे तेथेच राहते कारण ती दूर करायचा मार्ग लोकान्च्या हाताला पुरेसा रोजगार उपलब्ध करून देईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात सरकारला अपयश आलेले असते. ते लोकांना फुकटे बनवण्यासाठी तत्पर असतात आणि फुकटेपनाची हौस असलेले लोक (स्त्रियाही) काय फुकट मिळते याचीच वाट पाहत असतात. अलीकडेच झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीतही फुकटेपणाच्या प्रादुर्भावानेच जो जास्त फुकट देईल त्यालाच मत असा प्रकार झाल्याचे आपल्याला दिसून येईल आणि यापासून एकही पक्ष अलिप्त नाही हे वास्तव काय सांगते? मग ही फुकटखाऊ लोकांची लोकशाही आहे असे म्हटले तर ते गैर कसे ठरेल?

व्यापक आणि सहज रोजगार संधींचा अभाव हे प्रमुख कारण आर्थिक वंचिततेसाठी दिले जाते. रोजगार इच्छुक व्यक्तीला त्याच्या त्याच्या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात आहेत अशी अपेक्षा करता येते. पण प्रत्यक्षात आपण पाहिले तर आज उच्च शिक्षितांमध्येही जीवनावश्यक कौशल्यांचा अभाव असल्याचे दिसते. यालाही कारण काय तर मुलभूत आळशी प्रवृत्ती. काहे नवे शिकायचेच नसेल तर दुसरे काय होणार? आपली नोकरप्रधान शिक्षण पद्धती शिक्षित तर निर्माण करते पण सुशिक्षित नाही. आणि त्यांनाही पुरेशा नोक-या उपलब्ध नसल्याने त्यांच्यातही बेरोजगारीचा विस्फोट झाला आहे, म्हणजेच आर्थिक वंचितांची संख्या कमी होण्याऐवजी सर्व बाजूंनी झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. यात काही प्रामाणिक असले तरी त्यांची संख्या शोधायला आपण गेलो तर हाती निराशा येईल असे वास्तव आहे.

खरे तर देशात प्रामाणिक वृत्ती अभावानेच आढळते आणि म्हणूनच आम्हाला मोजक्या प्रामाणिक अधिकार्यांचा आणि करदात्यांचा गौरव करावा लागतो. खरे तर सरेच प्रामाणिक असयला हवेत हेच अभिप्रेत आहे!

आणि या अप्रामाणिकपणाला राजकीय पक्षच हातभार लावत असतील तर या देशाचे भविष्य अंधकारमय आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. फुकटेपणा, कामचोरी, करचोरी, कमी श्रमात (बौद्धिकही) पुढे पळायची लागलेली आत्मघातकी सवय हे आज आमचे मुख्य दोष आहेत आणि त्यात अपवाद कोटीमध्ये एखादा असेल. ही स्थिती बदलायची आमची इच्छाही नाही.

शेवटी काय तर हा देश फुकट्यांचा देश आहे आणि हेच वास्तव मान्य करा अन्यथा फुकटेपणा सोडा आणि आत्मसन्मानाने सरकारला संगा...आम्हाला रोजगार हवाय...काहीही फुकट नको!

-संजय सोनवणी

(साप्ताहिक चपराक - २५ मे च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)

Sunday, May 17, 2026

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

 महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची संतती होती आणि त्यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला हे साधारणता: सर्वमान्य आहे. पण इतिहास पाह्यला गेलो तर हे सत्य असल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.

उदा. सम्राट अशोकाने स्वत:च्या शिलालेलेखात आपली द्वितीय पत्नी कारुवाकी (चारुवाकी) आणि पुत्र तिवर याचा सन्मानाने उल्लेख केला आहे, पण एकाही शिलालेखात महेंद्र व संघमित्राचा उल्लेख केलेला नाही. अशोकाच्या प्रयागराज (अलाहाबाद) येथील 'राणीच्या शिलालेखात' तीवर याचे नाव आल्यानंतर, मौर्य साम्राज्याच्या अधिकृत इतिहासातून आणि पुढील कोणत्याही शिलालेखांमधून त्याचे नाव अचानक आणि कायमचे गायब होते. शक्यता ही सांगितली जाते की त्याचा अकाली मृत्यू झाला असावा किंवा त्याने संन्यास घेतला असावा. पण अर्थात हे तर्कच आहेत. ठोस पुरावा काही नाही.
महेंद्र आणि संघमित्रा हे उल्लेख प्रथम येतात ते श्रीलंकेत लिहिले गेलेले बौद्ध ग्रंथ दीपवंस आणि महावंस यात, जे इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर लिहिले गेले. म्हणजे अशोकाच्या मृत्युनंतर जवळपास सातशे वर्षांनी. हे उल्लेख वगळता संघमित्रा आणि महेंद्र यांच्या ऐतिहासिकतेचे कोणतेही ठोस 'भारतांतर्गत' किंवा श्रीलंकेतील पुरातत्वीय पुरावे (उदा. अशोकाचे अथवा श्रीलंकेचा तत्कालीन राजा तिस्स याचे शिलालेख) उपलब्ध नाहीत.
महेंद्र या नावाचा एक स्थविर होता अशा अर्थाचे शिलालेख राजगला आणि मिहीन्तले येथील लेखांत मिळतात पण येथे फक्त महिंद्राचा उल्लेख आहे आणि तोही एक सामान्य स्थविर म्हणून. ही कोणीतरी समान नावाची व्यक्ती असू शकेल. यातही संघमित्रा हे नाव कोठेही मिळून येत नाही.
सातव्या शतकात भारतात आलेल्या चीनी प्रवासी ह्यु-एन-त्सांग याने लिहिलेल्या ऐकीव माहितीनुसार श्रीलंकेत बौद्ध धर्म पसरवणारा महिंद (महेंद्र) हा सम्राट अशोकाचा 'लहान भाऊ' (Younger Brother) होता, मुलगा नव्हता. पण यातही संघमित्रा नाव गायब आहे.
भारतातील हस्तलिखितांपेक्षाही जुना पुरावा चीनमध्ये मिळतो. इसवी सन ३०० मध्ये 'अँन फॅकिन' (An Faqin) नावाच्या विद्वानाने 'अशोकावदान'चा चिनी भाषेत अनुवाद केला, ज्याचे नाव 'अ-यु वांग चुआन' (A-yu wang chuan) असे आहे. यावरून सिद्ध होते की, इसवी सनाच्या ३ ऱ्या शतकापूर्वीच हा मजकूर भारतात पूर्णपणे लिहून तयार झाला होता
या अनुवादात महेंद्र किंवा संघमित्रा ही नावे अस्तित्वात नाहीत मात्र या ग्रंथामध्ये अशोकाचा एक लहान भाऊ दाखवला आहे, ज्याचे नाव 'वीताशोक' असे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या मोहिमेचे आणि श्रीलंकेत बौद्ध धर्म नेण्याचे श्रेय श्रीलंकन ग्रंथ 'महेंद' (महेंद्र) याला देतात, तशाच प्रकारच्या धार्मिक प्रवासाचे किंवा भिक्षू बनण्याचे श्रेय हा चिनी/उत्तर भारतीय ग्रंथ अशोकाच्या भावाला (विताशोक) याला देतो. पण श्रीलंकन बौद्ध साहित्यातून ९आनि भारतीय इतिहासातून विताशोक हे नाव गायब आहे.
सन ३०० च्या या चिनी भाषांतरात महेंद्र-संघमित्राचे नाव नसणे हे सिद्ध करते की, अशोकाच्या मृत्यूनंतरच्या ५०० वर्षांपर्यंत उत्तर भारतात (मगध, मथुरा, उज्जैन) महेंद्र आणि संघमित्रा या नावांची कोणतीही मोठी ओळख किंवा कथा अस्तित्वात नव्हती कारण त्या ऐतिहासिक व्यक्ती नव्हत्या तर त्या बौद्ध भिक्षुंनी आपल्या धर्माला वलय देण्यासाठी निर्माण केल्या होत्या.
पुराणे किंवा प्राचीन बौद्ध साहित्यामाध्येही ही नावे कोठेही अवतरत नाहीत, अवतरतात ती सम्राट अशोकानंतर किमान सातशे वर्षांनी आणि तीही श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात.

हे इथेच थांबत नाही. सोळाव्या-सतराव्या शतकातील (इ.स. १६०८) प्रसिद्ध तिबेटी बौद्ध इतिहासकार लामा तारानाथ यांनी आपल्या 'भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास' (History of Buddhism in India) या ग्रंथात महेंद्र आणि संघमित्रा या दोघांचा साधा उल्लेखही केलेला नाही. श्रीलंकेला बौद्ध धर्म नेण्याच्या संपूर्ण मोहिमेचे श्रेय तारानाथ यांनी अशोकाच्या कोणत्याही अपत्याला दिलेले नाही. एवढेच नाही तर  श्रीलंकेव्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही बौद्ध परंपरेला (चिनी असो, तिबेटी असो वा उत्तर भारतीय) हे माहीतच नाही की 'महेंद्र आणि संघमित्रा' नावाची अशोकाची संतती श्रीलंकेत गेली होती.   तारानाथ यांच्यासारखा कट्टर बौद्ध इतिहासकार, ज्याने भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासाची पानं न् पानं गोळा केली, तो जर सम्राटाच्या श्रीलंकेत गेलेल्या धर्मप्रचारक मुला-मुलीचे नाव लिहीत नसेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो की 'महेंद्र-संघमित्रा हे अशोकाचे अपत्य होते' हा नॅरेटिव्ह केवळ आणि केवळ श्रीलंकेपुरताच मर्यादित आणि तिथल्याच भिक्षूंनी तयार केलेला धार्मिक प्रचार  होता.

यावरून इतिहासकारांचा हा संशय अधिक गडद होतो की, महेंद्र आणि संघमित्रा हे नॅरेटिव्ह पूर्णपणे 'श्रीलंकन बौद्ध भिक्षूंनी' स्वतःच्या देशातील बौद्ध धर्माचे महत्त्व वाढवण्यासाठी तयार केले असावे. आणि भारतात हे जवळपास सर्वच धर्मांनी केलेले आहे. अनेक राजे क्षत्रीय नसतांना त्यांना उगाच आपल्या धर्माचे दाखवण्यासाठी बळजबरीने क्षत्रीय घोषित केले आहे. अनेकांचे बाप नष्ट करून टाकलेत, जे नव्हतेच त्यांना गुरुपदी बसवले तसेच हे आहे एवढेच!

इतिहास अजब असतो हेच खरे. चाणक्य जो अस्तित्वातच नव्हता तो जसा एक प्रत्यक्षातील व्यक्ती म्हणून मानला गेला तसेच महेंद्र-संघमित्रेचे झाले हे म्हणण्यास काही प्रत्यवाय नाही.
-संजय सोनवणी

Saturday, May 16, 2026

शोध दारूगोळ्याचा!



 

 

माणसाने जीवन सुसह्य करण्यासाठी कालौघात अनेक शोध लावले असले तरी शत्रूवर आक्रमण किंवा शत्रूपासुन संरक्षण यासाठीही अनेक शोध लावले. तलवारी, भाले, बर्च्या., गदा, धनुष्यबाण असे मानवी शक्तीवर अवलंबून असलेले शोध लावत युद्धतंत्रात बदल घडवत नेले. पण दारूगोळ्याच्या शोधाने युद्धांतील विध्वन्सकता कैक पटींनी वाढली. पण दारूगोळ्याचा शोध ठरवून लावला गेला नाही. तो हेतूही नव्हता तर अत्यंत अपघाताने हा शोध लागला.

चीनमधील ताओ पंथीय अमरत्वाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे रासायनिक प्रयोग करत असत. असा द्रव बनवायचा की ज्यायोगे मनुष्य अमर होईल असा या किमयागारांचा प्रयत्न होता. यातूनच सोरा, गंधक आणि कोळशाची पूड मिश्रण केल्यानंतर स्फोटक दारू (गनपावडर) तयार होते असा शोध लागला. अर्थात आधी हे मिश्रण नेमके किती प्रमाणात करायचे याचं अंदाज नसल्याने याकडे खेळकर वृत्तीने पाहण्यात आले. इतिहासकारांनुसार, बंदुकीच्या दारूशी साम्य असणाऱ्या पदार्थाचा जगातील सर्वात पहिला ढोबळ उल्लेख इ.स. १४२ मध्ये ईस्टर्न हान राजवंशाच्या काळातील किमयागार वेई बोयांग  यांनी केला होता. त्यांना 'चिनी किमयाशास्त्राचे जनक' मानले जाते. त्यांनी आपल्या 'कानतोंग की') या ग्रंथात लिहिले होते की, "तीन पावडरींचे असे एक मिश्रण आहे, जे एकत्र केल्यावर अत्यंत हिंसकपणे 'हवेत उडते आणि नाचते'

आधी या शोधाकडे मौजेने पाहिले गेले असले तरी टांग राजवटीच्या काळात मात्र या शोधाकडे गाम्भिर्याने पाहिले गेले. कारण घडले एक स्फोट आणि त्यातून झालेला विध्वंस. किमयागारांनी औषध बनवण्यासाठी सोरा ( पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि लोणारी कोळशाची पावडर एका विशिष्ट प्रमाणात एकत्र केली आणि हे मिश्रण प्रखर आचेवर गरम करताच प्रयोगशाळेत प्रचंड मोठा स्फोट झाला. यात किमयागारांचे चेहरे आणि हात भाजले, तसेच त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. ताओवादी एवढे घाबून गेले की त्यांनी हे मिश्रण चुकुनही गरम करू नका अन्यथा अमरत्व राहिले दूर, मरायची वेळ येईल असे सांगायला सुरुवात केली. पण दहाव्या शतकाच्या आसपास चीनी संशोधकांच्या लक्षात आले की शत्रूचा खात्मा करण्यासाठी या शोधाचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रथम या मिश्रणाचे स्फोट करून शत्रूच्या घोड्यांना घाबरवून पळून जाण्यासाठी याचा उपयोग केला गेला. सोंग राजवंशाच्या काळात, इ.स. १०४४ मधील 'वूजिंग झॉंग्याओ' या चिनी लष्करी पुस्तकात गनपावडर बनवण्याचा जगातील पहिला अचूक आणि स्पष्ट रासायनिक फॉर्म्युला अधिकृतपणे नोंदवला गेला.

भारतातही बिहार, बंगाल, पंजाब, राजस्थान आणि कर्नाटकसारख्या राज्यांत नैसर्गिक सोऱ्याच्या खाणी आहेत. बांबूच्या नळीत सोऱ्याबरोबर गंधक आणि कोळशाची पूड भरली की त्यातून अग्निबाणासारखी शत्रे दूरवर मारा करण्यासाठी फेकता येतात असा शोध भारतात बंगाल किंवा आसाममध्ये लागला असेही मानले जाते. आसाम आणि चीन या भागात प्राचीन व्यापारी मार्गांवरून दळणवळण असल्याने हा शोध भारतातून चीनमध्ये गेला की चीनमधून भारतात आला याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. पण उपयुक्त शोध सर्वत्र झपाट्याने पसरतात हा इतिहास असल्याने पहिलेपणाचे श्रेय कोणीही ठामपणे घेऊ शकत नाही. पण युद्धासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायला चीनने सुरुवात केली यात शंका नाही.

हा शोध जरी चीन-भारतात लागला असला तरी या तंत्राचा शास्त्रीय वापर केला तो युरोपने. तेराव्या शतकात तुर्कमोगलांनी यूरोपवरील आक्रमणात दारूचे अग्निबाण वापरले होते व त्यांसाठी बांबूच्या नळ्यांचा उपयोग केला होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरबांनीही तोफा व दारूगोळा यांचा वापर केला होता. यूरोपात कलशसदृश प्रक्षेपकांतून बाण फेकीत असत. चवदाव्या शतकात यूरोपात अनुक्रमे मेट्स, अल्जसिरस व क्रेसी येथील लढायांत मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला गेला.

द. भारतात प्रथम बहमनी राज्यकर्त्यांनी अडोणीच्या वेढ्यात (१३६८ साली) दारूगोळा वापरला अशी नोंद मिळत असली तरी तत्कालीन दारूगोळ्याचे वर्णन उपलब्ध नाही. भारतात वा चीनमध्ये दारूचा शोध लागला हे खरे असले, तरी त्यात सुधारणा करण्याचे कार्य यूरोपातच झाले. यूरोपीयांची साम्राज्ये जगभर पसरण्यात त्यांनी केलेल्या दारूगोळ्यातील प्रगतीचा फार मोठा वाटा आहे. यातूनच तोफा, अग्निबाण, हातबॉम्ब, बंदुका, पिस्तुले इत्यादींचा शोध लागून त्यांचे उत्पादन सुरू झाले. तोफा व दारूगोळा बनविणाऱ्या तज्ञांचा व कुशल कामगारांचा वर्ग निर्माण झाला.

सोळाव्यासतराव्या शतकांत जहाजांवरही तोफा बसविण्यास सुरुवात होऊन भर समुद्रातही लढाया होऊ लागल्या. मध्ययुगीन तटबंद्या दारूगोळ्यापुढे निष्प्रभ ठरल्या व गोल बुरूजांची जागा तोफा बसविलेल्या जाड त्रिकोणी बुरूजांनी घेतली. बंदुकीच्या गोळ्या काडतुसाच्या स्वरूपात म्हणजे प्रक्षेपक दारू व शिशांची गोल गोळी एकत्रित असलेल्या स्वरूपात उपलब्ध होऊन बंदुकीचा गोळीबार मिनिटाला एक गोळी या प्रमाणात होऊ लागला. वातीच्या ठिणगीऐवजी बंदुकीत गारगोटीच्या चापाची योजना करण्यात आली. बारा ते पंधरा किलो वजनांचे सुटसुटीत दारूगोळे प्रचारात आल्यामुळे गोळामारीचा वेग वाढला. १७८४ साली इंग्रज लेफ्टनंट श्रॅप्नल यांनी जमिनीपासून थोड्या उंचीवर फुटणाऱ्या, श्रॅप्नल याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या, तोफगोळ्याचा शोध लावला. त्यामुळे खुल्या मैदानावर लढणाऱ्या सैनिकांचे जीवित धोक्यात आले. अमेरिकेत व्हिटनी यांनी बहूत्पादनाच्या तत्त्वावर बंदुकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. जर्मनीच्या क्रप कारखान्यात पोलादाच्या भक्कम तोफा तयार करण्यास आरंभ झाल्यामुळे भारी तोफगोळे वापरणे सुलभ झाले. काडतुसाला आघात वाटी जोडल्यामुळे प्रक्षेपक दारूच्या ठिणगीऐवजी आघाताने गोळीबार करणे शक्य झाले.

इंग्रज कर्नल काँग्रीव्ह यांनी भारतातूनच हैदर अली व टिपू सुलतान यांनी वापरलेल्या रॉकेट्सची कल्पना पश्चिमी देशांत नेली. ब्रह्मदेश पादाक्रांत करतानाही (१८२५-२६) इंग्रजांनी अग्निबाण वापरले. महाराजा रणजितसिंग यांनी दारूगोळा बनविण्याचे कारखाने अमृतसर इ. ठिकाणी काढून यूरोपीय दर्जाचे तोफगोळे तयार केले. भारतात मराठ्यांनी तोफगोळ्यांचे पुणे, सोनोरी इ. ठिकाणी कारखाने काढले होते पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. इ.स. १८५० ते पहिल्या महायुद्धाअखेर (१९१८) दारूगोळ्यात लक्षणीय प्रगती झाली. धातूच्या जाड पत्र्याचा भेद करणाऱ्या (चिलखतभेदी) आणि व्यक्तिसंहारक दारूगोळ्यात सुधारणा झाल्या. नाविक तोफांचा व्यास ३० सेंमी. इतका महाकाय झाला आणि त्यामुळे चिलखती व पोलादी नौकाया असलेली जहाजे फोडणे वा जाळणे शक्य झाले. १८५०१९०० या काळात उपलब्ध झालेला दारूगोळाच बहुतांशी पहिल्या महायुद्धात वापरण्यात आला. पुढे यात नवीन शोधांची भर पडत राहिली. आता प्रचंड संहारक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. इराण-इझ्राएल-गाझा आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात आपण याचे भयानक संहारकता पाहिली आहेच. माणूस अमरतेसाठी दैवी रसायन शोधात होता पण त्याच्या हाती लागला तो असा विध्वंसक शोध!

 

-संजय सोनवणी 


Friday, April 24, 2026

कायद्यांचा दुरुपयोग करून दडपशाही: अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका!

  

या आठवड्यातच आमदार संजय गायकवाड यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकातच शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल प्रकाशक श्री. प्रशांत आंबी यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचे आणि हिंसक धमक्या देण्याचे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकावी असे प्रकरण घडले. लेखक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, विचारवंत, विश्लेषक यांना एखादा मजकूर आपल्याला आवडला नाही किंवा तो आपल्या विरोधात आहे असे वाटून (किंवा स्टन्ट करण्यासाठी आणि  स्वस्त प्रसिद्धी मिळण्यासाठी असे प्रकार वारंवार घडत आहेत. या धमक्या देण्याच्या प्रयत्नात कसलाही ठोस आधार नसतांना बदनामीच्या आणि वाट्टेल तेवढी अब्रूनुकसान भरपाई मागण्याचे, म्हणजे एका अर्थाने कायद्याचा दुरुपयोग करून धमक्या देण्याचे आणि आवाज बंद करण्याचे प्रयत्न करणे हेही सामील असते. कोर्टाचे खेटे नको म्हणून अनेकदा ज्याला नोटीस मिळाली ते एका चौकटीत दिलगीरी व्यक्त करून मोकळे होतात. पण हा आहे धमकी देण्यासाठी कायद्यांचा दुरुपयोग करण्याचा प्रकार.

हे लिहिण्याचे कारण म्हणजे साप्ताहिक चपराक मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गेल्या महिन्यातच झालेल्या निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेबद्दलचे वृत्त साप्ताहिक चपराकमध्ये प्रसिद्ध झाले. संपादक श्री घनश्याम पाटील, कार्यकारी संपादक श्री प्रमोद येवले तसेच अन्य यांना मसापचे सरकारनियुक्त निवडणूक अधिकारी एड. श्री प्रताप परदेशी यांच्यामार्फत काही दिवसातच बद्नामीची पहिली नोटीस पाठवली गेली आणि त्यात “माझी जाणूनबुजून बदनामी केली असून त्याबद्दल जाहीर माफी प्रसिद्ध करा अन्यथा चक्क वीस कोटी रुपयांची अब्रूनुकसानीबद्दल भरपाई करा” अशा स्वरूपाची मागणी केली गेली. या नोटिशीचे घनश्याम पाटील यांनी कायदेशीर उत्तरही दिले होते. नोटिशीचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर प्रताप परदेशी यांनी घनश्याम पाटील व प्रमोद पाटील यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावले. आपण नोटीस पाठवली, तिचे उत्तरही आलेय, मग ज्यांना नोटीस पाठवली त्यांना भेटीस बोलावणे कितपत कायदेशीर आहे याचा विचार या स्वत: वकील असलेल्या सद्गृहस्थाने केला होता काय हे समजत नाही.  

त्यानंतर लगोलग श्री. जयंत विष्णुदास किराड यांच्या तर्फे अजून एक नोटीस आली. त्यात म्हटल्याप्रमाणे चपराकमध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तातच “स्वत: दत्तगुरुचे भक्त असल्याचा आव आणत त्यांनी (म्हणजे प्रताप परदेशी यांनी) न्यायप्रक्रियेला काळीमा फासला आहे.” असा श्री दत्तात्रेयाची बदनामी करणारा उल्लेख आला असून,  गुरुदेव दत्तभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबाबत ४८ तासात बिनशर्त माफी मागा, शुद्धीपत्र प्रसिद्ध करा अन्यथा भारतीय न्याय संहिता कलम २९९ तसेच इतर लागू कलमांतर्गत फौजदारी व दिवाणी कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा मजकूर होता. नोटिशीत श्री. किराड यांच्या म्हणण्याप्रमाणे ते श्री गुरुदेव दत्ताचे निष्ठावंत भक्त असून मसापसंबंधी प्रकाशित लेखातील या उल्लेखाने त्यांच्या आणि दत्त संप्रदायातील भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत.

भारतात आजकाल सर्व निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवर्यात आहेत. राजकीय निवडणुकाच नाहीत तर एशियाटिक सोसायटी, मेडिकल कौन्सिल अशा सांस्कृतिक वैद्यकीय अशा अराजकीय संस्थांच्या निवडणुकीत भाजपा हस्तक्षेप करतो आहे, प्रत्यक्ष प्रचार करतो आहे असे आरोप सर्वच वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत आणि ते सर्वांनी वाचलेले असतीलच. ही लोकशाही आहे आणि आरोप-प्रत्यारोप त्यातील एक गाभा आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघातही भाजपने प्रचार केला, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला अशा स्वरूपाची वार्तांकने निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते संपून निकाल जाहीर झाला तोवर होतच होते. प्रस्तुत लेखकानेही एका भाजप आमदाराने आपला प्रतीनिधी पाठवून विशिष्ट आघाडीचा प्रचार केला होता यावर आक्षेप घेतला होता. तसा लेखही दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाला होता. महत्वाची बाब अशी की पत्रकार शेवटी जे पाहतात, ऐकतात त्यांबाबत स्वत:ची आकलने व संबंधितांचे म्हणणे प्रसिद्ध करत असतात.

भारतातील सर्वच (राजकीय तसेच अराजकीय) निवडणुकांबद्दल व खुद्द निवडणूक आयोगाच्या प्रमुखापासून ते निवडणूक अधिकार्यांवर निवडणुकीत पारदर्शकता ठेवली नाही असे आरोप आजकाल सर्रास होतांना दिसतात. वृत्त्तपत्रे-माध्यमे त्यांनाही प्रसिद्धी देत असतात.

मतमोजणीच्या वेळेस निवडणूक अधिकारी एड. श्री. प्रताप परदेशी यांनी पारदर्शकता ठेवली नाही, कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकतेनेने मतमोजणी प्रक्रिया केली नाही  अशा स्वरूपाचे निवडणूक विश्लेषण १६ मार्चच्या साप्ताहिक चपराक मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात “स्वत: दत्तगुरुचे भक्त असल्याचा आव आणत त्यांनी (म्हणजे प्रताप परदेशी यांनी) न्यायप्रक्रियेला काळीमा फासला आहे.” असे एक विधान आहे. या विधानात दत्तगुरूचा अवमान नसून एका व्यक्तीच्या वर्तनातील विसंगती त्या वृत्तात टिपलेली आहे. श्रीदत्ताचा अवमान केलेला नाही. देवतांच्या नावाला काळीमा फासणारी कृत्ये अनेक नरपुंगव आजकाल करताना दिसतातच. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एकेरी का यावरून प्रकाशक आंबी यांना अश्लील व हिंसक शिवीगाळ करणार्याने छत्रपतीन्चा गौरव वाढवला असे कोणी शिवप्रेमी म्हणणार नाही. ज्याचे निस्सीम’ भक्त आहोत असे तुम्ही समजता त्याची बूज ठेवण्याचे वर्तन भक्ताकडून व्हावे अशी अपेक्षा बाळगणे कसे चुकीचे आणि बेकायदेशीर ठरेल?

“आमच्या धार्मिक भावना दुखावल्या” हा आजकाल तेढ माजवण्यासाठी अंधभक्तांचा एक परवलीचा मंत्र झाला आहे. यांना धर्म अथवा संप्रदाय याशी काही घेणे असल्याचे अथवा त्यातील नैतिक शिकवणूनुकीबाबत काही ज्ञान असल्याचे आजवरच्या अनेक घटनांतून दिसलेले नाही.

दुसरे असे की निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणे, तिच्या पारदर्शकतेवर भाष्य करणे किंवा विश्लेषण मांडणे हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा भाग आहे. वृत्तपत्रे आणि माध्यमे हीच भूमिका पार पाडतात. संबंधित वृत्तात प्रताप परदेशी किंवा कोणाही व्यक्तीच्या खाजगी आयुष्याबद्दल कोणतेही विधान नसून निवडणूक प्रक्रियेवरच भाष्य केले असल्याचे दिसते. असे असूनही संपादक आणि कार्यकारी संपादकावर तसेक्ष्ह इतरांवर बदनामीची नोटीस बजावणे आणि माफी मागितली नाही तर फौजदारी आणि दिवाणी दावे दाखल करून चक्क वीस कोटी रुपयांची अब्रूनुकसानभरपाईचा खटला दाखल करण्याची धमकी देणे हा प्रकार  कायद्यांचा दडपशाहीसाठी दुरुपयोग याच सदरात टाकून देता येऊ शकतो. तसेच श्री. किराड यांनी पाठवलेली नोटीस तर आता हास्यास्पदतेचा कळस करणारी आहे. “मुंह में राम-बगल में छुरी” हा वाक्यप्रयोग शेकडो वर्षांपासून भारतीय करत आलेले आहेत. यात श्रीरामाचा अपमान होतो अशी आजवर कोणाची भावना झालेली नाही. मग “स्वत: दत्तगुरुचे भक्त असल्याचा आव आणत त्यांनी (म्हणजे प्रताप परदेशी यांनी) न्यायप्रक्रियेला काळीमा फासला आहे.” या विधानात श्रीदत्ताचा अवमान कसा होतो आणि कोणाची धार्मिक भावना कशी दुखावली जाऊ शकते?

निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आणि विशिष्ट पक्षाच्या प्रभावाखाली असलेल्या आघाडीला मदत होईल अशी पक्षपाती भूमिका घेत आपली नैतिक जबाबदारी बजावली नाही अशा स्वरूपाच्या विधानाने एड. परदेशी यांची कोणती व्यक्तिगत बदनामी होते? निवडणूक अधिकारी कोणीही असता तरी या ना त्या प्रकारचे आरोप होणे स्वाभाविक आहे. लोकशाहीतील तो मतदारांचा घटनात्मक अधिकार आहे. आणि असे आक्षेप घेतले जाणे हे राजकीय निवडणुकीपासून ते संस्थात्मक निवडणुकीत सर्वसामान्य आहे.

आपण वकील आहोत किंवा वकिलाचा वापर करता येतो म्हणून आपल्या पेशाचा किंवा परिस्थितीचा दुरुपयोग करत लेखक-प्रकाशक-पत्रकार तसेच संबंधित इतरांना वकील बंधूंच्यां मार्फत तथ्याचा अभाव असलेल्या नोटीसा पाठवल्या जाणे हा कायद्याचा दुरुपयोग म्हणता येईल. हा न्यायालयीन प्रक्रियेचाही अवमान होऊ शकेल. असा कायदा नसला तरी तो करणे आता आवश्यक झाले आहे.  

कारण एक प्रकारे हाही लेखक-प्रकाशक-संपादक यांच्यावर दबाव आणून त्यानी आपल्याला हवे तसे आणि रुचेल असेच लिहिले पाहिजे हा अघटनात्मक आग्रह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी चढवण्याचा प्रकार आहे. संजय गायकवाड काय आणि अशा तथ्यहीन नोटिशी पाठवणारे काय शेवटी “दडपशाही”चे तत्व वापरून आवाज दडपण्यासाठी कार्य करणारे आहेत असेच कोणीही म्हणेल. “मी कायद्याचा दुरुपयोग करू शकतो” ही भावना कोणाच्याही मनात अथवा कृतीत येणे किंवा मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून कोणालाही मारहाण करू शकतो हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही!

मी अशा सर्व प्रकारच्या दडपशाहीचा निषेध करतो.

 

-संजय सोनवणी 

Tuesday, April 21, 2026

Out of Africa Theory: From Origin Story to Evolving Hypothesis

It is no longer sufficient to treat the Out of Africa theory as a settled and final explanation of human origins. Much like the “single homeland” assumptions proposed for Proto-Indo-European homeland, the traditional version of this theory rests on a simplifying instinct: that complex human histories must begin from a single place and a single moment. 

 First articulated in its modern form in the late 20th century, the Out of Africa model proposed that anatomically modern humans emerged in Africa around 150,000–200,000 years ago and dispersed globally about 60,000–70,000 years ago, replacing earlier populations. For decades, this framework dominated anthropology, supported by fossil finds and early genetic interpretations. 

 However, the accumulating body of evidence now forces a significant revision—not necessarily a total rejection, but a fundamental rethinking. The Problem with “Single-Origin” Thinking At its core, the classical Out of Africa theory assumes a localized origin followed by expansion. 

Yet evolution, as understood through Evolution, does not operate as a sudden event in a confined space. It is a distributed, population-level process unfolding over vast timescales. There is no identified “unique chemistry” or environmental trigger in Africa that could singularly give rise to modern humans. The idea that one region alone produced Homo sapiens, while the rest of the world remained evolutionarily passive, is increasingly difficult to sustain. 

 Africa: Cradle or Network? 

 Recent discoveries suggest that even within Africa, human evolution was not centered in one location. Fossils from Jebel Irhoud (dated to ~300,000 years ago) indicate that early Homo sapiens traits were distributed across the continent. 

 This supports a “pan-African” model: multiple populations across Africa, partially isolated yet intermittently connected, collectively contributing to the emergence of modern humans. In this sense, Africa may be better understood not as a single cradle, but as a network of evolving populations. Evidence from Beyond Africa Finds outside Africa complicate the traditional migration timeline. 

Fossils from Misliya Cave (~180,000 years old) and discoveries in East Asia, such as Fuyan Cave, suggest that modern or near-modern humans were present far earlier than the standard “60,000-year dispersal” model allows. These findings point toward multiple waves of migration—some possibly unsuccessful or genetically absorbed into later populations—rather than a single decisive. Genetics: Replacement vs. Interaction Early versions of the theory emphasized complete replacement of earlier human species. However, advances in Genomics have overturned this assumption. Modern humans outside Africa carry genetic contributions from archaic populations such as Neanderthals and Denisovans. This demonstrates that human evolution involved interaction, not simple replacement.

 Even within Africa, deep genetic diversity suggests long-term population structure rather than descent from a single small ancestral group. Re-evaluating Earlier Contradictions Earlier discoveries—such as Afrasia djijidae—were sometimes interpreted as evidence against African origins. However, these fossils belong to much earlier primate evolution and do not directly challenge the emergence of Homo sapiens. Similarly, claims of very early Homo sapiens in Asia remain under debate. 

While intriguing, they do not yet overturn the broader pattern seen in genetic data. Toward a New Model What emerges from current evidence is neither the classical Out of Africa model nor a fully multiregional alternative. 

Instead, a more nuanced picture is taking shape: Human evolution occurred across multiple, interacting populations Africa played a central—though not exclusive—role Dispersals out of Africa happened in several waves, not one Interbreeding with other human groups was a defining feature. 

 Conclusion 

 The Out of Africa theory is not a myth—but its original, simplified form no longer holds. It has evolved into a more complex framework in which human origins are understood as a dynamic, interconnected process rather than a single event in a single place. The real story of human origins is not linear. It is a web—spread across regions, shaped by movement, mixture, and time.

Sunday, March 29, 2026

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस गेली हजारो वर्ष साजरा करत आले आहेत. नवरेहच्या नंतर तिसऱ्या दिवशी झंग त्रयी हा माहेरवासिनी स्त्रियांचे स्वागत करणारा सामुहिक सणही परंपरेने साजरा केला जातो. काश्मीरमधील १९९० मध्ये निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे लाखो काश्मिरी पंडितांचे विस्थापन झाले, त्यामुळे जेही पंडीत याही स्थितीत काश्मीर खोऱ्यात राहिले त्यांनी या परंपरेला जसे जिवंत ठेवले, तसेच भारतात आणि जगभर विस्थापित झालेल्या पंडितांनी असतील तेथे ही आपली काश्मिरी परंपरा कायम ठेवली. यंदाचा नवरेह १९ मार्चला साजरा केला गेला तो पुढील वर्षी नवरेह काश्मीर खोऱ्यातच साजरा करण्याचा संकल्प करत. इतकेच नव्हे तर दुसरा दिवस सम्राट अशोकानंतर भारताबाहेरही प्रथमच विशाल साम्राज्य निर्माण करणाऱ्या काश्मीरच्या महान सम्राट ललितादित्याच्या स्मृती जपण्यासाठी शौर्य दिवस म्हणूनही साजरा करण्यात आला. आपला इतिहास, परंपरा यांचे जतन व्हावे ही तीव्र भावना काश्मीर खोरे आणि जगभर विस्थापित झालेल्या पंडितांमध्ये जागृत झाली आहे. नंदनवन पुन्हा एकदा काश्मिरी पारंपारिक सणांच्या निमित्ताने का होईना घरवापसीमुळे फुलारेल आणि काश्मीरचे सौंदर्य शतपटीने वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या सणाचे काश्मीरमधील सांस्कृतिक महत्व अपार आहे. प्रत्येक प्रदेशात आपापल्या भौगोलिक आणि पर्यावरणीय अनुकुलतेनुसार सणांचे अर्थ, साजरे करण्याची पद्दत आणि त्याला जोडून आलेल्या पारंपारिक कथा वेगवेगळ्या असतात. काश्मीर खोरे हे चारी बाजूनी हिमालयीन पर्वतराजीने वेढलेले आणि अतिप्राचीन काळी तेथले सतीसार नावाचे विशाल सरोवर होते. पुरातत्वीय पुराव्यांनुसार नैसर्गिक हालचालीमुळे पर्वतराजीत भगदाड पडल्याने पाणी वाहून जाऊन जमीन सुकल्यामुळे मानवी वस्ती करण्यायोग्य बनलेले आहे. काश्मीरचा लिखित इतिहास किमान पाच हजार वर्ष जुना असून हा इतिहास जसा नीलमत पुराणातून जपला गेला आहे. नवरेह सण काश्मीर खोऱ्यामध्ये वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करतो. काश्मीरमधील वसंत किती मनमोहक असतो हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही, त्यामुळे काश्मीर खोऱ्यात त्याचे अपरंपार महत्व असणे स्वाभाविक आहे. नवरेह (नव वर्ष) सणाला काश्मीरमध्ये अत्यंत उत्साहाने घरोघरी साजरा होतो. हा सार्वजनिक उत्सव नव्हे. हा सण साजरा करण्यामागे समृद्धी, प्रगती आणि ज्ञानात्मक सांस्कृतिक वारशाचे जतन ही भावना असते. वसंत ऋतूचे आगमन मनाला उल्हासित करणारे असल्याने या सणाचा आगळा वेगळा जोश आहे. या सणाला आपल्या महाराष्ट्रासारखी गुढी उभारली जात नाही तर मुख्य विधी असतो थाली भरण. यात एका तबकात तांदूळ, दही, फुले, अक्रोड, नाणी आणि नववर्षाचे पंचाग ठेवले जाते आणि त्याचे पूजन करून सर्व-समृद्धीच्या प्रार्थना म्हटल्या जातात. याच दिवशी प्राचीन सप्तर्षी पंचांगाप्रमाणे नवीन वर्ष सुरु होत असते. या सणाच्या सायंकाळी लोक देवी पार्वतीच्या (शारिका देवी) मंदिरात जाऊन तांदळाची खीर अर्पण करून दर्शन घेतात. काश्मीर खोरे ही मुळात पार्वतीची भूमी मानली जाते आणि शारिका हे पार्वतीचेच एक काश्मिरी नाव असून हरी पर्वत हे तिचे निवासस्थान मानले जाते. शिवाय श्रीनगर शहराची ती अधिष्ठात्री देवी आहे. किंबहुना शिव-पार्वती हे पुरातन काळापासून काश्मीरचे आराध्य राहिलेले आहे. काश्मीरी शैव परंपरा तत्वज्ञानातही भारतात श्रेष्ठ असून आचार्य अभिनवगुप्त हे शैव तत्वज्ञशिरोमणी मानले जातात. हे शैव माहात्म्य येथेच संपत नाही. काश्मीरमध्ये माता पार्वतीने गणेशाला निर्माण “पन” नावाचा सणही साजरा केला जातो. या दिवशी गणेशाची नव्हे तर ज्या दिवशी पार्वतीने काश्मीरमध्येच गणेशाची निर्मिती केली म्हणून पार्वतीची पूजा केली जाते. यात कलश आणि माती याला जास्त महत्व असते आणि काश्मिरी रोटांचा प्रसाद असतो. या दिवशी प्रथेनुसार प्रत्येक भाविकाच्या मनगटावर स्नेहाचा धागाही बांधला जातो. हे मैत्री आणि स्नेहाचे प्रतीक. सरहदचे संजय नहार यांच्यामुळे मी २०१९ साली श्रीनगरमधील लाल चौकात गणपती बसवायला गेलो होतो आणि योगायोगाने सप्तर्षी पंचांग आणि आपल्या शक पंचांगानुसार दोन्ही सण नेमके एकाच दिवशी आल्यामुळे मला पन सणात सहभागी होऊन त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. काश्मीर ही मुळात सृजनाची भूमी आहे आणि त्याबाबत काश्मिरी लोक कसे सृजनाचीच परंपरा जपतात हे मला अनुभवायला मिळाले. काश्मीरच्या सप्तर्षी पंचांगाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा गणनेची सुरुवात इसवीपूर्व ३०७६ पासून सुरु होते. ही कालगणना सत्तावीस नक्षत्रांच्या भ्रमणावरून केली जाते. सप्तर्षी प्रत्येक नक्षत्रात शंभर वर्ष राहतात अशे कल्पना करून या संवताची चक्रे ठरवली जातात. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात अजूनही ही कालगणना प्रमाण मानली जाते. अन्य प्रदेशांत ही कालगणना आता जवळपास विस्मृत झाल्यात जमा आहे. नवरेह सणानंतर तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो झंग त्रेई हा सार्वजनिक उत्सव. यंदा हा सण २१ मार्चला नवरेहप्रमाणेच जेथे जेथे काश्मिरी पंडित आहेत तेथे तेथे अत्यंत उत्साहाने साजरा केला गेला. हा सण खास माहेरवाशीनी स्त्रियांसाठी राखून ठेवलेला असून हाही सण यंदा काश्मिरी पंडितांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. या दिवशी पारंपारिक आणि अत्यंत विलक्षण अशी काश्मिरी लोकगीते गायली जातात. त्यावर नृत्येही होतात. झंग म्हणजे शगुन. काश्मीर पूर्वीपासूनच स्त्रियांना बरोबरीचे स्थान देणारे आणि सन्मान करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. स्त्रीमाहात्म्याची ही परंपरा महाभारतकालीन यशोमती राणीपासून सुरु होते. दिद्दा राणी, कोटा राणी यासारख्या महान नायिका काश्मिरी स्त्रीमाहात्म्यातूनच निर्माण होऊ शकल्या. झंग त्रेयी हा सण स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा प्राचीन अध्याय आहे. याही सणाचे मुख्य केंद्र शारिका देवीचे निवासस्थान हरी पर्वत असून तो तेथे आणि अन्यत्र सार्वजनिक जागांवर साजरा केला जाती. त्यासाठी आपल्या गणेश मंडळासारखी मंडळेही पूर्वी असत. सध्या खोऱ्यात कश्मीरी पंडितांची संख्या तुलनेने कमी असल्याने हा सण किंवा उत्सव एखाद्या हॉलमध्ये किंवा मोकळ्या जागेत साजरा केला जातो. यंदाची या सणात भर पडली ती काश्मीरच्या अलौकिक सम्राट ललितादित्याच्या स्मरणार्थ नवरेहनंतरचा दुसरा दिवस “शौर्य दिवस” म्हणून साजरा करण्याची. खरे तर ललितादित्याचा जाज्वल्य इतिहास खुद्द काश्मिरी जनतेच्या विस्मरणात गेला होता. जे काही उपलब्ध होते ते फुटकळ लेख आणि पंडीत कल्हणने लिहिलेल्या राजतरंगिणीत बऱ्याचशा मिथकात्मक स्वरूपात. त्याचा सुसंगत इतिहास एका महाराष्ट्रीय माणसाने, म्हणजे मी, लिहिला आणि तोही एका महाराष्ट्रीय माणसाच्या प्रेरणेने आणि काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी अविरत प्रयत्न करणारे सरहदचे संजय नहार यांच्यामुळे. आज जगभरात हा इतिहास प्रमाण मानला जातो. काश्मिरी पंडितांना आणि इतर काश्मीरीनाही आपल्याच इतिहासाकडे पहायची वेगळी दृष्टी या इतिहास ग्रंथामुळे मिळाली याचे एक समाधान आहेच. आणि आता ललितादित्याच्या स्मृती जतन करण्यासाठी काश्मिरी पंडित शौर्य दिवस साजरा करू लागले आहेत यासारखी समाधानाची बाब असू शकत नाही. आपल्या मायभूमीची आस प्रत्येकात असते. निर्वासित व्हावे लागलेल्यांच्या मनातील भावनांची तीव्रता साहजिकच जास्त असते. “काश्मीर खोऱ्यात परत या.” अशी आवाहने केंद्र आणि राज्याच्या प्रमुखांनी गेली तीन दशके सातत्याने केली आहेत. त्याला तेथील परिस्थितीमुळे फारसा प्रतिसाद लाभल्याचे दिसत नाही. शेकडो काश्मिरी पंडीत आजही जम्मूमधील निर्वासित कॅम्पमध्ये आजही राहतात. असंख्य पंडित देशात आणि देशाबाहेर पोट भरण्यासाठी विस्थापित झालेले आहेत. तरीही मायभूमीची आस त्यांच्यात आजही तेवढीच जितीजागती आहे. आज सर्वच काश्मीर खोऱ्यात कायमचे परतू शकत नाहीत कारण आता बव्हंशी अन्यत्र स्थिरस्थावर झालेले आहेत. पण ते आज काश्मीरच्या प्रगतीसाठी आपले बौद्धिक योगदान देऊ शकतात हे वास्तव आहे. खोऱ्यात कायमचे आले अत्र चांगलेच आहे, पण काश्मीरच्या विकासाला ते हातभार लावू शकतात. यंदाचा नवरेह सण त्या संकल्पाचा होता आणि तो अभिनंदनीय असाच आहे यात शंका नाही. आता नेहमी काश्मिरी हिंदूंनी नवरेह सणच काय पण सारे पारंपारिक काश्मिरी सण प्राचीन उत्साहाने खोऱ्यात साजरे केले पाहिजेत कारण हे सण काश्मीरच्या विशिष्ट पर्यावरणातून जन्माला आलेले आहेत. त्याचा सन्मान सर्व देशवासीयांनी केला पाहिजे! -संजय सोनवणी

मसापमधील सत्तापालट: मराठी साहित्य विश्वाच्या अंत्ययात्रेची सुरुवात!

महाराष्ट्र साहित्य परिषदेची तब्बल दहा वर्षांनी झालेली यंदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणेच वादग्रस्त ठरत गेली. साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या पद्धतीवर आक्षेप घेणारे काही विद्यमान तर काही निलंबित सदस्य होतेच. माजी अध्यक्ष मिलिंद जोशी व अन्य पदाधिकार्यांविरुद्ध धर्मादाय आयुक्त ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत झेपाही घेतल्या गेल्या होत्या. या तक्रारी व याचिकांचे काय झाले हे सर्वांना माहीतच आहे. साहित्य परिषदेच्या घटनेत केलेल्या दुरुस्त्या बेकायदेशीर आहेत असाही एक आरोप न्यायालयापर्यंत गेला होता. आताची निवडणूक त्याच घटनेवर झाली आहे आणि विरोधक त्याच घटनेप्रमाणे निवडून आलेले आहेत. जर घटनाच बेकायदेशीर असेल तर ही निवडणुकही बेकायदेशीर ठरू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे. यंदा दहा वर्षांनी निवडणूक झाली. मिलिंद जोशींच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा किरकोळ फरकाने पराभव झाला. म्हणजे मिलिंद जोशी यांना एकूण अकरा हजाराच्या आसपास झालेल्या मतदानात साहित्य संवर्धन आघाडीचे विजेते उमेदवार योगेश सोमण यांच्यापेक्षा फक्त चाळीस मते कमी पडली. या आघाडीचे सर्वाधिक अधिक मते घेणाऱ्या प्रदीप निफाडकर यांना प्रतिस्पर्ध्यापेक्षा मिळालेली मते केवळ चारशेने अधिक होती. त्यात महत्वाच्या एकूण सात पदांपैकी तीन पदावर मिलिंद जोशींच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले. याला काही दणदणीत विजय आणि मिलिंद जोशींच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रचंड नाराजी होती म्हणून त्यांचा पराभव झाला असे म्हणता येत नाही. अजूनही जवळपास निम्मे मतदार सदस्य त्यांच्या मागे उभे आहेत.. त्यामुळे किमान मनमानी कारभाराचा मुद्दा बाद ठरतो. उलट त्यांनी मसापचा चेहरा-मोहरा बदलवला, मसापला तरूण बनवले, अभिजात मराठीसाठी सक्रीय संघर्ष केला हे मुद्दे त्यांच्या बाजूने गेल्याने विरोधी आघाडीने प्रचंड राजकीय शक्ती पणाला लावूनही त्यांचा दारुण म्हणता येईल असा पराभव करता आला नाही. निवडणुका म्हटले की काही ना काही व्यक्तिगत राजकारण होतेच. पण यंदा मसापच्या निवडणुकीत जो घृणास्पद फरक पहायला मिळाला तो मात्र दु:ख्ख-संतप्त करणारा होता. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपली विचारधारा काय असावी आणि कोणत्या पक्षाशी निगडीत असावे याचे स्वातंत्र्य राज्य घटनेने दिलेले आहे. मिलिंद जोशी किंवा त्यांचे सहकारीही कोणत्या ना कोणत्या विचारधारेशी संलग्न होतेच. पण त्यांनी राजकीय पक्षांना किंवा जातीयवादी संघटनांना आपल्या आघाडीच्या प्रचारात उतरवले नव्हते. पण योगेश सोमण यांच्या साहित्य संवर्धन आघाडीने मात्र उघड उघड भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ते आमदार आणि संघ स्वयंसेवकाना आपल्या प्रचारात उतरवले. इतके की डोळ्यावर यावे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही लगोलग तेथे भाजप आणि संघ नेत्यांची गर्दी जमा झाली. खरे तर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली तेव्हापासून हे चित्र ठळक झाले होते. साहित्य परिषदेचे अनेक आजीव सदस्य साहित्यिक आहेत. त्यात आजी व माजी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही आहेत. पण राजकीय पक्ष आणि एका विशिष्ट विचारधारेला वाहिलेल्या संघटनेचे स्वयंसेवक एवढ्या हिरीरीने प्रचारात उतरलेले पाहूनही त्यांची समाधी भंगली नाही. सर्वांनी चूप बसणे पसंत केले. माझ्याकडेही एका आमदाराचा प्रतिनिधी आदेशात्मक स्वरात सोमण यांच्या आघाडीला मतदान करा असे सांगायला आला होता. मी त्याला दारातूनच हाकलून दिले आणि त्याच दिवशी एक व्हिडीओ क्लिप बनवून प्रसारित केली. त्याने जरा खळबळ माजली असली तरी बाकी सदस्य चुपचाप बसले. या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी तीन संघ स्वयंसेवक माझ्याकडे तीच टेप वाजवत आले. त्यांच्या वयाचा मी मान ठेवला म्हणून, अन्यथा त्यांनाही हाकलून दिले असते. मुळात प्रश्न हा आहे की साहित्य संस्था म्हणजे पक्षीय राजकारणाचा अड्डा आहे काय? साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असावेत की नाही याबद्दल महाराष्ट्रात दरवर्षी वाद होत आले आहेत. अनेकजण राजकीय शक्तींच्या पाठबळाने संमेलनाध्यक्ष झाले आहेत हे वास्तव आहे. हेही चुकीचे आहे आणि यावरही गंभीरपणे चर्चा झालेली आहे. पण या वेळेस मसापच्या निवडणुकीत भाजप व संघाने जसा उघड प्रचार केला गेला तसे आजवर कधी झाल्याचे पाहण्यात नाही. एक प्रकारे ही मराठी साहित्य परिषदेच्या थोड्याफार प्रतिष्ठेची अंत्ययात्रा होती. मराठी साहित्य आणि त्याचे भविष्य कसे घडवणार हा चर्चेचा विषय न राहता प्रचाराने गलिच्छ पातळी गाठली. सार्वजनिक संस्था कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असो त्यावर आपली गौण क्षमतेची प्यादी आणून संस्था ताब्यात घेण्यासाठी एखाद्या पक्षाने आणि स्वत:ला सांस्कृतिक रक्षक मानणाऱ्या संघटनेने अशी पूर्ण शक्तीनिशी अशी खालची पातळी गाठावी ही गोष्ट मराठी साहित्यविश्वाचा अपमान करणारी आहे. मी निकाल लागला त्याच दिवशी मसापच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला. जे लोक राजकीय प्यादी आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील मसापचे काम कोणत्या दर्जाचे असेल याची मी कल्पना करू शकतो. हा मराठी साहित्यसंस्कृतीचा पराभव आहे असे मी मानतो. -संजय सोनवणी

लेखकांना राजकीय मते असू शकत नाहीत काय?

  लेखकांनी राजकीय मत ठेवू नये, ठेवत असतील तर ते आम्हाला जे आवडते तेच त्यांचे मत असले पाहिजे हा दुराग्रह गेली पंधरा-सोळा वर्ष मी पाहतो आहे....