Wednesday, February 25, 2026

स्थायी समितीचे सदस्यत्व, नेहरू आणि संघी बदनामी!

भारताने आपले सदस्यत्व नाकारून चीनला स्थायी सदस्य व्हायला सहकार्य केले? सत्य नेमके काय आहे? पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे आजच्या चीनचे नाव अस्तित्वात येण्यापूर्वी (१९१२ त १९४९) ते रिपब्लिक ऑफ चायना म्हणून प्रसिद्ध होते. माओ-त्से-तुंगने साम्यवादी रक्तरंजित क्रांती करून १९४९मध्ये रिपब्लिक ऑफ चायनाचे सरकार हटवले. हे हटवलेले सरकार तैवान बेटावर वसले. तैवानचे आजही अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे रिपब्लिक ऑफ चायना १९४६ पासून संस्थापक सदस्य व सुरक्षा समितीच्या पाच स्थायी सदस्यांपैकी एक होते. तेव्हा भारत अद्याप स्वतंत्रच व्हायचा होता. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने रिपब्लिक ऑफ चायनाऐवजी आपल्याला स्थायी सदस्यत्व द्यावे ही मागणी सुरु केली असली तरी तैवानने (रिपब्लिक ऑफ चायनाने) त्या मागणीला सातत्याने विरोध केला. शेवटी १९७१ साली राष्ट्रसंघाच्या घटनेनुसार बहुमताचा ठराव करून रिपब्लिक ऑफ चायनाचे स्थायी समितीचे (म्हणजे तैवानचे) सदस्यत्व रद्द केले आणि ते सदस्यत्व पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला दिले गेले. अशा रीतीने आजचा आपला शत्रू चीन १९७१ साली सुरक्षा समितीचा स्थायी सदस्य बनला. तोवर हे सदस्यत्व राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासून रिपब्लिक ऑफ चायनाकडेच (म्हणजेच तैवानकडेच) होते. हे घडले तेव्हा पंडित नेहरू जिवंत नव्हते. रिपब्लिक ऑफ चायनाचे सदस्यत्व रद्द करून ते भारताला द्यावे असा अमेरिका आणि रशियात (अनुक्रमे १९५० आणि १९५५) एक मतप्रवाह होता, पण असे आताच्या दुर्बल राष्ट्राचे (म्हणजे तैवानपुरते सीमित झालेल्या रिपब्लिक ऑफ चायनाचे) सदस्यत्व रद्द करून ते भारताला मिळावे असे वाटत नसल्याची भावना पंडित नेहरूंनी व्यक्त केली होती. अर्थात असा खुद्द संयुक्त राष्ट्रसंघाचा एकही अधिकृत प्रस्ताव भारताकडे नव्हता तर तो केवळ एक जागतिक छोटा असला तरी मतप्रवाह होता. त्यापेक्षा स्थायी समितीचे नकाराधिकार असलेले केवळ पाचच सदस्य असावेत असा संयुक्त राष्ट्रसंघाच्या घटनेतील कलमाची पुन्हा नव्याने आखणी करावी आणि भारताला सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व द्यावे असा पंडित नेहरुंचा आग्रह होता. रिपब्लिक ऑफ चायना सुरुवातीपासूनच स्थायी समितीचा सदस्य असल्याने नेहरूंनी सहकार्य केले म्हणून चीनला ते सदस्यत्व मिळाले असे म्हणणे तर केवळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे. म्हणजेच भारताने आपले सदस्यत्व नाकारून चीनला सदस्य व्हायला सहकार्य केले हा विदेशमंत्री जयशंकर यांचा आरोप बिनबुडाचा आणि दिशाभूल करणारा आहेच पण त्याच वेळेस संयुक्त राष्ट्रसंघाचा अवमान करणारा आहे हे उघड आहे. आणि अशा धादांत खोट्या गोष्टी उगाळून भारताच्या जागतिक कीर्तीच्या, अलिप्ततावादी चळवळीचे जागतिक नेतृत्व करणा-या, पहिल्या पंतप्रधानांची धादांत थापा मारून नालस्ती करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न हे संघिस्ट सरकार सातत्याने करत असते त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच! -संजय सोनवणी

Friday, February 13, 2026

वस्त्रोद्योगात क्रांती घडवणाऱ्या हातमागाचा शोध!

पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने आपण जेवढे थक्क होतो त्याहीपेक्षा अधिक, पराकोटीच्या प्रतिकुलतेत, अत्यंत वन्य अवस्थेत पुरातन मानवाने जे शोध लावले त्यामुळे चकित व्हायला होते. किंबहुना आजचे विज्ञान आपल्या पुरातन पुर्वजांच्याच अथक प्रयत्नांच्या पायावर उभे राहत आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहे. आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. ऑस्ट्रेलिया, रशिया आणि ऑस्ट्रिया येथे नवपाषाणयुगातील (इसपु १०,०००) कातलेले धागे व विणलेल्या वस्त्रांचे अवशेष मिळाले आहेत. भारतात सिंधु संस्कृतीत हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सिंधू संस्कृतीत सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला सनपुर्व दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. ऋग्वेदात लोकरीच्या वस्त्रांचे विपुलतेने उल्लेख येतात. जगभर आद्य विणकर या स्त्रीयाच होत्या असेही आपल्याला दिसते. अर्थात सुरुवातीला विणकाम फारच क्लिष्ट असे. धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किती किचकट प्रक्रिया असायची. पण भारतात हातमागाचा शोध लागला आणि वस्त्र बनवणे तुलनेने सोपे व कमी कष्टाचे झाले. हा मानवाचा पहिला यांत्रिक शोध होता आणि तो लागला भारतातील सिंधू संस्कृतीत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. भारताने हातमागांचा शोध लावत इसपु ३२०० ते इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर स्वामित्व गाजवले. इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. भारतीय वस्त्रांसाठी रोमचे नागरिक एवढा पैसा (सोण्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली. रोमचा बादशहा अस्वस्थ झाला असे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील प्लिनी (थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवले आहे. भारतीय विणकरानी हातमागांवर असंख्य पोतांची, नक्षांची, संरचनांची वस्त्रे निर्माण केली. देशाची पत जगभर वाढवली. सिंधु संस्कृतीच्या काळानंतर चेऊल, सोपारा, भडोच ई. बंदरांतुन वस्त्रांचे तागे निर्यात होत. भरतकामातही एवढी प्रगती केली कि मार्को पोलो या जगप्रसिद्ध प्रवाशाने तेराव्या शतकात आपल्या प्रवास वर्णनात या भरतकामातील अद्भुत प्रगतीबद्दल भारतीय कोष्ट्यांची/साळ्यांची मनसोक्त तारिफ केली आहे. पेरिप्लसनेही पहिल्या शतकात येथील मलमली वस्त्रांची तारीफ केलेली आहे. विदेश व देशांतर्गत व्यापारामुळे विणकर समाजाचीही आर्थिक भरभराट होत होती. हातमागाच्या शोधामुळे हा उद्योग ख-या अर्थाने पहिला इंजिनियरिंग उद्योग बनला. कापुस व हातमाग युरोपमद्धे गेले ते अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीस. अर्थव्यवस्थेत विणकर समाजाचा सर्वात मोठा वाटा असला तरी मात्र दुस-या शतकापासुनच विणकरांचे काम हे हलक्या प्रतीचे मानले जावू लागले हेही एक आश्चर्यच आहे. "विणकाम हे अत्यंत कष्टाचे व हलक्या दर्जाचे आहे." असा उल्लेख भीमसेन जातकात येतो. स्मृतींनी विणकरांना शूद्र घोषित करुन टाकले. नग्नांना ज्यांनी आपल्या अपार कौशल्याने व प्रतिभेने वस्त्रे दिली, नटने-थटने शिकवले, जीवनात एक अनमोल वस्त्रानंद भरला...देशाच्या तिजो-या भरल्या त्यांनाच शूद्र ठरवत सामाजिक दर्जा घसरवणा-या वैदिक स्मृती व त्यांचे पालन करू लागलेल्या तत्कालिन सर्वच समाजाला दोष द्यावा तेवढा थोडाच आहे. असे असले तरी या समाजाचा आर्थिक दर्जा मात्र उच्च स्वरुपाचाच होता असे आपल्याला दिसते. तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे. बु-हाणपुरही या काळात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते. अठराव्या शतकापर्यंत आपल्या विशिष्ट कौशल्याने जगभर आदराचे कारण बनुन राहिलेल्या हातमाग उद्योगाला शेवटचा झटका दिला तो औद्योगिक क्रांतीने. युरोपात यांत्रिक मागांचा शोध लागला. गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले. भारतात बस्तान बसवु पहात असणा-या इंग्रजांना येथील बाजारपेठ काबीज करायची होती. जशी त्यांची सत्ता स्थापित झाली तसा त्यांनी आपला पहिला मोर्चा विणकरांकडे वळवला. त्यांच्या कापडाचा दर्जा हीणकस असला तरी ते स्वस्ता:त उपलब्ध होते. पण तरीही आपण देशीवस्त्र उद्योगाला तोंड देवू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी दडपसत्र आरंभले. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी येथील उद्योग नष्ट करण्याचा चंग बांधला. महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात "स्वदेशी" चा नारा दिला. "चरखा चला चला के...लेंगे स्वराज्य लेंगे" सारा देश एकसुरात गाउ लागला. देशी हातमागांना पुन्हा बरे दिवस येवू लागले. सारा देश स्वदेशीमय झाला तो गांधीजींच्या चरखा क्रांतीने. पण स्वातंत्र्य आले. स्वतंत्र भारताच्या सरकारनेही औद्योगिकरणाचाच वसा घेतला. असे करत असतांना आपण या उद्योगात जे पुरातन काळापासुन आहेत त्यांना आधुनिकिकरणाच्या प्रवाहात भांडवल पुरवत आणायला हवे याचा मात्र विसर पडला. धडाधड हातमाग बंद पडु लागले. पुर्वेचे म्यंचेस्टर म्हणुन गाजणा-या इचलकरंजीसारख्या हातमागांच्या शहरावरही ही वीज कोसळली. एवढ्या जनसंख्येला यंत्रमाग सामावून घेवू शकत नव्हते. त्यांना आता अन्यत्र रोजगार शोधण्यासाठी भटकावे लागले. थोडक्यात भारतात हातमागान्चा शोध लागला, वैभवाचे दिवस पाहिले त्याचीच पुढची तार्किक परिणती यंत्रमाग ही असायला हवी होती. पण यंत्रांचा शोध लागला युरोपात आणि यंत्रांनी भारतीय पारंपारिक कुशल व्यवसायांना संपवण्यात आघाडी घेतली हा एक दुर्दैवी इतिहास असला तरी हातमागान्च्या शोधाने भारतीय वस्त्राना किमान पाच हजार वर्ष जागतिक महत्व प्राप्त झाले होत आणि हेच या शोधाचे वैशिष्ट्य होय! -संजय सोनवणी

Wednesday, February 11, 2026

खंगलेले वैचारिक विश्व!

अलीकडेच समाजमाध्यमांवर कोणी केलेल्या तत्वज्ञानाच्या मांडणीवरून व त्यावर घेतल्या गेलेल्या एका आक्षेपावरून धमासान वाद झाला. या वादाला प्रत्यक्ष तत्वज्ञानापेक्षा व्यक्तीगत संदर्भच अधिक कारणीभूत ठरले. जागतिकीकरणानंतर समाजात सर्व क्षेत्रात आलेल्या वैचारिक उथळतेचेच ते एक प्रकारे दर्शन होते. खरे तर जागतिकीकरणाच्या काळात झपाटयाने बदलत चाललेली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय संस्कृती विचारवंतांच्या कितपत आकलनात आली आहे व या स्थितीने निर्माण केलेल्या अगणित प्रश्नांना व संभ्रमांना उत्तरे शोधत कालानुरूप नव्या तत्वद्न्यानाची मांडणी करण्यात त्यांना कितपत यश आले आहे हा खरा प्रश्न आहे व त्यावर सामाजिक चर्चा घडणे आवश्यक आहे. पण तसे होतांना क्वचित दिसते हाही जागतिकीकरणाने निर्माण केलेला एक गंभीर प्रश्न आहे. जागतिकीकरणामुळे जगण्याच्या अनेक गोष्टी बहुतेक समाजघटकांसाठी अगदी सोप्या बनल्या. काही घटक पुरेपूर दुर्लक्षित ठेवले गेले. तरीही या वरवरच्या सोपेपणाचे उदात्तीकरण करणारे अनेक लेखक जगभर उगवले. ते लोकप्रियही झाले. त्यांची उद्धरणे फेकण्यात काही लोक वस्ताद होऊ लागले. कोणत्याही प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत चिंतन करत त्यावर काळसापेक्ष उत्तरे शोधण्याची आणि ती मांडण्याची सामाजिक सवय मोडली. या जगणे सोपे बनवण्याच्या नादात आपण जगण्याचे प्रश्न जटील करत नेत आहोत याचे भान आपण गमावले. साहित्यिक-विचारवंत-मालिका आणि बव्हंशी चित्रपटांनी या प्रवृत्तीला खतपाणीच घातले. नैतिकतेच्या व्याख्याही बदलल्या. एवढेच नव्हे तर एक मोठे "जगणे" मानवी विचारविश्वाच्या पटलावरून पुरते अदृष्य झाले. शेतकरी, पालांवरची कुटुंबे ते आदिवासी या तत्वचर्चेतून व कलाविश्वातून तडीपार केले गेले. म्हणजे राजकीय-सामाजिक घटकांत ती चर्चा राहिलीच नाही असे नाही पण त्यांच्या विचारांचा आधारही आता जवळपास कालबाह्य होत चाललेले तत्वज्ञान राहिले. त्यातही कोणी स्वत:च्या प्रज्ञेने भर तरी घातली असे दिसून येत नाही. सामान्य माणसांना आपल्या जगण्याचे प्रतिबिंब पहायला न मिळता उलट एक स्वप्नवत वाटणारा चमचमीत पण स्वप्नील जीवनप्रवाह त्यांच्यावरही आदळत राहिला. स्वाभाविकच आपल्या प्रत्यक्ष जीवनाचे , संघर्षाचे आणि दाखवल्या जाणार्या स्वप्नांचे करायचे काय हा प्रश्न सूप्त पातळीवर पण उद्रेकी अवस्थेत वावरत राहिला. जगण्यापासुन मनाने तुटणे म्हणजे काय असते याचे हे विदारक चित्र निर्माण होऊ लागले. जगण्याच्या व्याख्याच बदलू लागल्या. जागतिक विचारवंत/तत्वज्ञही जागतिकीकरणाच्या काळातील आपली निरीक्षणे याप्रमाणेच नोंदवत राहिलेले आहेत. माणूस असंवेदनशील झाला आहे, राजकीय/सांस्कृतिक/धार्मिक/आर्थिक विचार नेत्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत उथळ पातळीवर येऊन ठेपले आहेत, नाती, ओळखी व मुल्ये घसरत अस्थायी बनू लागली आहेत, एकाकीपणा ही वैश्विक घटना बनू लागलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने नैसर्गिक विचारक्षमतेचा वेगाने ऱ्हास होतो आहे ही निरीक्षणे व त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण कारणे शोधणे, निरीक्षणे नोंदवणे यापेक्षा महत्वाचे होते ते आधुनिक मानवाला त्याच्यासमोरील वेगाने उद्भवत जाणाऱ्या समस्यांना उत्तरे देऊ शकेल असे समाजाभिमुख नव-तत्वज्ञान मांडणे. पण आजचा भर भांडवलशाही आणि तिच्या लाभार्थ्यांना उपयुक्त ठरेल असेच उपयुक्ततावादी तत्वज्ञान प्रसृत होते आहे. मुलभूत तत्वज्ञान गायब झालेले आहे. गतकाळातील तत्वज्ञान्यांचे सिद्धांत, त्याचे सामाजिक व नैतिक परिणाम यावर भरपूर चर्चाही विद्यापीठीय पातळीवर तर कधी सामाजिक पातळीवरही होत असते. पण यात सुटलेला भाग हा की प्रत्येक तत्वज्ञ आपापल्या काळाचे अपत्य असतो, त्याच्या तत्वज्ञानावर अपरिहार्यपणे त्याच्या काळातील नैतिक समस्यांचा प्रभाव असतो, पण कोणाचेही सिद्धांत सार्वकालिक असू शकत नाहीत इकडे मात्र दुर्लक्ष होते. प्रत्येक व्यक्ती (त्यात राजकारणी, समाजकारणी व तत्वज्ञही आले) आपापल्या स्थळ-काळ सापेक्ष स्थितीत घडत असते, व्यक्त होत असते वा कृती करत असते. यात काही महान म्हणून गौरवले जातात तर काही दुर्लक्षित राहतात. पण महानांचे चिंतन अथवा वर्तन सदासर्वकाळ आजही आचरण करावे असे मार्गदर्शकच असते असेही नाही. मुळात चिरस्थायी काहीही नाही, हे न समजता आजच्या प्रश्नांची उत्तरे गतकाळात होऊन गेलेल्या महनीयांनी त्या त्या काळात दिलेल्या उत्तरांमध्ये शोधू पाहण्यात गफलत होत असते आणि ही चूक भारतीय नेहमीच करतात हे आपल्या सहज लक्षात येईल. अनेकदा यात आत्मवंचना असते. जुन्याचा केवळ सोयीसाठी अथवा स्वत:ला भावले म्हणून गवगवा करत राहणेही आजच्या स्थितीत उपयुक्त ठरतेच असेही नाही. सामान्य माणसे आपल्या वर्तमानकाळाच्या समस्यांशी हाती असलेल्या संसाधनांच्या सहाय्याने झुंजत असतात, पण वर्तमानातले प्रश्न अगदी अनपेक्षित, पूर्वी कोणीही अनुभवले नाही असे असले तर त्याचे भांबावून जाणे किंवा नवीन स्थितीचा लाभ घेण्याचे अविरत प्रयत्न करत “स्व” भान हरवून जाणे आणि परिस्थितीशरण होत आहे त्या काळचौकटीत समाधान शोधत नवीन जीवन स्वप्ने पाहणे आणि त्यांच्या पुर्तीतच स्वत:च्या जीवनाची सार्थकता शोधणे अपरिहार्य होत जाते. यात माणसाचे माणूसपण हरवून जाते आणि आजकाल तसेच होते आहे. समाजमाध्यमांवर सहज नजर टाकली तरी लक्षात येईल की समाज बव्हंशी उथळ वैचारिक कोलाहलात आपली वैचारिक प्रक्रियाच हरवून बसला आहे. क्वचित काही विचारी बाबी मांडल्या गेल्या तरी त्याची सैद्धांतिक रचना करायला कोणाकडे वेळ अथवा संयम आहे असे दिसत नाही. लेखकही तात्कालिक प्रसिद्धीतच खुश असतात. आधुनिक काळातल्या प्रश्नांशी विवस्त्रपणे भिडणे आणि त्या प्रश्नांनी भेडसावलेल्यांचे चित्रण करत नवीन मार्गही असू शकतात याचे दिग्दर्शन करण्यात ते मागे राहतात. त्यामुळेच मराठीत आज वैश्विक कादंबरी किंवा कविता जन्माला येत नाही. भेडसावणाऱ्या नव्या प्रश्नांचे चित्रण, त्यातील लाभ-तोटे मानवी अंगाने चितारत मानवी जीवनाला नवे तात्विक आधार देण्याचा प्रयत्न होत नाही. अकादमिक पातळीवर जागतिक तत्वज्ञानाचा अभ्यास करणे, सामान्य वाचकांपुढे सोप्या भाषेत ठेवणे ही स्पुहनीय बाब आहे हे मान्य केले तरी “तुमचे तत्वज्ञान काय?” हा प्रश्न अनुत्तरीत राहत असेल तर एकुणातील समाजासाठी ते शोभणारे नाही. जुन्या काळातील तत्वज्ञ किंवा संतांचे म्हणणे आज फारसे लागू पडत नाही. मराठी समाज “ठेविले अनंते तैसेची राहावे...” या उक्तीच्या विरुद्ध गेल्याला आता अनेक शतके झाली. जुन्याची साथ सोडायची नाही, पण तसे वर्तनही करायचे नाही आणि नवतत्वज्ञानाचे सृजनही करायचे नाही अशा विपरीत स्थितीत आपण आलेलो आहोत. जागतिकीकरणाचे लाभ तर घ्यायचे आहे पण जागतिक न होता गतकाळातील संकुचित अस्मितांना चिकटून बसायचे आहे. यात आपला मानसिक आणि सामाजिक दुभंग आता केवळ समाजमाध्यमातील पोकळ वादांतून दिसत नाही तर प्रत्यक्ष हिंसक वक्तव्ये आणि कृत्यांतुनही दिसू लागला आहे. उथळपणाचा सार्वत्रिक भयावह उद्रेक झाला आहे आणि हे काही जागतिकीकरनाचे उद्दिष्ट नव्हते पण आम्हीच ते बनू दिलेले आहे. आज राजकीय पक्षही आपल्याला नैतिक सिद्धांतांना बासनात बांधून ठेवतांना दिसतात. खरे तर कोणाची तत्वधारा काय आहे हेच आता कोणाला माहित नाही. कारण कोणाकडेही तत्वधाराच उरलेली नाही. विज्ञानयुग असताना, त्याचे फायदे उचलत असताना एक फार मोठा वर्ग वंचित राहतो आहे आणि मानसिक समस्यांचे आगर बनतो आहे याचे भान नाही. जागतिकीकरणातील माणूस जागतिक न होता अधिकाधिक व्यक्तीनिष्ठ आणि संकुचित होत चालला आहे ही एक शोकांतिका आहे. यावर नवसिद्धांत निर्माण करत समाजाला तात्विक आधार देणे हे खरे तर तत्वज्ञानाचे अभ्यासक, विचारवंत आणि साहित्यीकांसमोरचे आव्हान आहे. -संजय सोनवणी

Saturday, January 31, 2026

जीवन सुसह्य करणारा कातडी कमावण्याचा शोध!

शेतीचा शोध लागत असताना मानवाने जेवणाला उपयुक्त असे काही महत्वाचे शोधही लावले. शेतेच्या शोधाने या जुन्या शोधांची त्यातील उपयुक्तता लक्षात घेऊन त्याच्यात प्रचंड विकासही करण्यात आला. शेतीने माणसाला स्थिर केले असले तरी शेतीला उपयुक्त अशी अवजारेही शोधणे आवश्यक होते. अतिरिक्त अन्न-धान्य साठवणुकीसाठी व वाहतुकीसाठी नव्या व्यवस्थाही शोधणे आवश्यक होते. हा प्रवास अर्थात फारसा सोपा नव्हता. पण माणसाने आपली बुद्धी वापरत उपयुक्त शोध लावत आपले जीएन सुखकर करण्यात यश मिळवले. यातील महत्वाचा आणि शेतीसाठीही उपयुक्त ठरलेला शोध म्हणजे कातडी कमावून तिला टिकावू बनवून वापरयोग्य बनवण्याचा. खरे तर हा मानवी इतिहासातील पहिला जीव-रसायनशास्त्रीय शोध होय. या शोधाने माणसाच्या युद्धशास्त्रापासून ते शेतीशास्त्रात आमुलाग्र बदल घडवायला मदत केली. जेंव्हा जवळपास दीड लाख वर्षांपुर्वी मानव हा शिकारी मानव होता, भटका होता, जवळपास नग्न रहात होता, त्या काळातच मानवाला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातड्याची उपयुक्तता लक्षात आली. थंडी-पावसापासुन रक्षण करण्यासाठी, पांघरण्यासाठी व कृत्रीम निवारे बनवण्यासाठी आपण कातडे वापरु शकतो हे त्याच्या लक्षात आले. मग त्याने शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी सोलून काढायला सुरुवात केली. पण असे कच्चे कातडे टिकावू नसे आणि फारसे उपयुक्तही. वातावरणाच्या प्रभावामुळे कातडे फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर माणसाने आपली प्रतिभा कामाला लावुन कातडे टिकावु कसे करता येईल यासाठी शोध सुरु केला. मानव सुरुवातीची हजारो वर्ष प्रथम जनावराचीच चरबी चोळुन कातड्याला मऊ व टिकावु ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्याने तशी कातड्याची कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चरावु कुरणांच्या शोधात सतत भटकता असल्याने प्रक्रिया पद्धती शोधणे वा प्रक्रिया करत बसणे यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पण मनुष्य जसा शेतीचा शोध लागल्यावर स्थिरावु लागला, त्याची शिकार कमी होत गेल्याने कातड्याची एरवी असलेली मुबलकता कमी झाली तेंव्हा मात्र कातड्यावर प्रक्रिया केली तरच कातडे दीर्घकाळ टिकावू करता येईल हे त्याच्या लक्षात आले. त्यासाठी त्याने आपली शोधक बुद्धी वापरली. असंख्य प्रयोग केले. आणि शेवटी इसवी सनाच्या सुमारे दहा हजार वर्षांपुर्वी, त्याने नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थ वापरत अभिनव पद्धती शोधुन काढली...व ती म्हणजे कातडी कमावण्याची कला. जगभर थोड्याफार अंतराने हा शोध लागला. पण प्रत्येक ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती व हवामान वेगळे असल्याने, आणि प्राणीसृष्टीही वेगळी असल्याने प्रत्येक ठिकाणची प्रक्रिया पद्धती बदलली. पण लाभ हा झाला की मानवाला जगणे सुखकर करण्याचे एक नवे साधन मिळाले. भारतात बाभुळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ व अन्य तेलादि रंजक द्रव्ये वापरत कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापुर्वी दहा-एक हजार वर्षांपुर्वीच शोधण्यात आली. ती सर्व प्रचारित होवून ती भारतभर एक-दोन शतकातच देशभर पसरत वापरात आली. सर्व प्राण्यांचे कातडे कमवायची वेगवेगळी पद्धतही शोधण्यात आली. युरोपात मात्र ओक वृक्षाची साल कातडी कमावण्यासाठी वापरली जाई व त्यापासून कमावलेले कातडे तेवढे टिकावुही नसे. प्रक्रिया पद्धतीही वेगळी असल्याने कातड्याच्या दर्जातही फरक पडे. पण मग त्यापासून वस्त्रे, चामडी जोडे, शिरस्त्राणे, ढाली ते चामड्यांच्या मजबूत वाद्यांनी दोन वस्तू घट्टपणे बांधता येऊन शेतीची अवजारे, हातकुर्हाडी, पाण्याच्या पखाली ते मद्याचे बुधले अशा अनेक वस्तू बनत गेल्या. चामडे कमावणे हा एक प्रतिष्ठेचा आणि फायद्याचा व्यवसाय बनला. कातडी कमावणे हे अत्यंत शिस्तबद्ध रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट श्रुंखला असलेले किचकट व कष्टदायी काम आहे. आज या उद्योगात अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणाने होत असल्या तरी प्राथमिक प्रक्रिया आजही या मानवी श्रम-सहभागाशिवाय होत नाहीत. प्राचीन काळचा विचार केला तर मग हे काम एके वेळीस रासायनिक प्रक्रिया वेळोवेळी क्रमाने करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची व अंतत: त्याला अंतिम उत्पादनाचे रुप देण्याची कारागिरी करण्यास किती सायास पडत असतील याची आपण कल्पना करुनच थक्क होतो. जनावराचे कातडे सोलुन काढले कि ते वाहुन आपल्या उद्योगस्थळापर्यंत वाहुन नेण्याचा, स्वच्छ करण्याचा...वरकरणी तसा घाण वाटनारा हा उद्योग. मग एवढ्या रसायनी प्रक्रिया करतांना येणारा उग्र व घाणेरडा वास, चुन्याची-मीठाची प्रक्रिया करतांना हात-पायांवर होणारे विपरीत परिणाम...हे सारे माणूस सहन करत का केला? याचे महत्वाचे कारण म्हणजे शेतीच्या शोधणे स्थिर झालेल्या मानवी समाजाची कातडी वस्तुंची निर्माण झालेली अपरिहार्य गरज. त्यामुळेच या व्यवसायात पुर्वी प्रचंड सुबत्ताही होती. समाजात या व्यवसायाला एक हजार वर्षांपुर्वीपर्यंत सन्मानही होता. ऋग्वेदातही चर्मकारांबद्दल आदरार्थीच उल्लेख मिळतात. जवळपास आठव्या शतकापर्यंत हा व्यवसाय करणा-यांच्या श्रेण्या होत्या. भारतीय कमावलेले चर्म व त्यापासून बनलेल्या वस्तू निर्यात होत. देशांतर्गत व्यापारातही त्याचे स्थान मोठे होते. त्यामुळे यांच्या श्रेण्यांना राजदरबारीही मान असे हे आपल्याला काही शिलालेख व ताम्रपटांवरून कळते. कातडी कमावल्यामुळे पादत्राणे, घॊड्यांचे जीन, लगाम, बैलगाड्यांसाठी बैलांच्या टिकावु व मजबुत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राने, हस्त-बचावक, चामडी चिलखते, ढाली, धनुष्याच्या वादीच्या दो-या बनवता येवू लागल्या व युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी व अगदी ग्रंथ लेखनासाठीही चामड्याचा वापर होवू शकला. अशा हजारो चामड्यावर लिहिलेल्या ज्युंच्या धार्मिक लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना येथे सापडल्या आहेत. एके काळी तर चामड्याचे तुकडे हेही चलन म्हणुनही वापरात होते. शेतीसाठीची अनेक अवजारे ते जलस्त्रोतासाठी लागणा-या मोटी चामड्यापासुन बनु लागल्या. पाण्याच्या पखाली, तेलाचे बुधलेही बनू लागले. द्रव वस्तूंची हाताळणी, साठवणूक आणि वाहतूकही सुलभ झाली. त्यामुळे शेती उत्पादन वाढायला मदत झाली. फ्यशनमद्धे आजही कातडी वस्तु प्रचंड मागणीत असतात. अगदी ग्रंथांच्या बांधणीतही कातड्याचा उपयोग अगदी अलीकडेपर्यंत केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे, मद्याचे कमावलेल्या चामड्यापासुनच बनत होते. गृहसजावटीतही विविध प्राण्यांच्या चामडी वस्तुंना प्राधान्य मिळाले. थोडक्यात कातडी कमावण्याचा शोध हा असंख्य कातडी वस्तू बनवण्याच्या उद्योगांना यामुळे वेग मिळाला. चर्मोद्योगाने मानवी जीवनाला सुसह्य व उच्चभ्रु बनवण्यात मोलाचा हातभार लावला. एवढेच नाही तर पर्यावरणाचे संतुलन साधायलाही हातभार लावला. पण भारतात मात्र चर्म-वस्तुंचा सर्रास उपयोग करणा-यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले त्यांना मात्र अस्पृष्य ठरवले. हा भारतीय समाजशास्त्रीय इतिहासावर असलेला कलंक होय. पण कातडी कमावण्याचा शोध हा मानवी इतिहासाला कलाटणी देणारा ठरला हे निश्चित. -संजय सोनवणी

Friday, January 16, 2026

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी विचारला म्हणून मी खालील मुद्दे मांडत आहे. १. पहिली बाब म्हणजे वैदिक महत्ता मानतात ते हिंदू नाहीत. नाहीत कारण वेद हे ९५% हिंदू समाजाच्या धर्माचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कधीही अंग नव्हते. त्यामुळे आपसूक मुर्ती-प्रतिमापुजक अवैदिक समाज हाच हिंदू आहे...वैदिक महत्ता मानणा-यांनी मेंढ्याचे कातडे पांघरुन हिंदु धर्मात घुसखोरी करण्याचे कारण नाही. मोहन भागवत अथवा आर.एस.एस. ही वैदिकमहत्ता मानणारी संस्था असल्याने तिचाही हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. २. जे आमच्या धर्माशी संबंधीत नाहीत त्यांना आमच्या धर्माबाबत वेडगळ विधाने करण्याचा काडीइतकाही अधिकार नाही. कपडे आम्ही कशी घालत होतो याची चित्रे आजही अजंठा चित्रसमुहात मिळतात...म्हणुन बलात्कार होत होते काय? तरुण्याला मुक्तता देनारा, स्वातंत्र्य देणारा "वसंतोत्सव"" आम्हीच दहाव्या शतकापर्यंत साजरा करत होतो, बलात्कार झाले का? ३. वैदिक संस्कृतीत इंद्राने मात्र वारंवार बलात्कार केल्याची उदाहरणे वारंवार मिळतात...याचे रहस्य समजू न शकणारे आम्ही बहुजन बावळट आहोत काय? ४. आम्हे शैव आहोत. शिवाने केवळ मदनाने पार्वतीसाठे कामूक व्हावे म्हणुन कामबाधा निर्माण करणारा बाण चालवला तर शिवाने तृतीय नेत्र उघडून मदनालाच जाळून टाकले. आम्ही अशार्थाने शैव आहोत. वैदिक इंद्रासारखे अजरामर कामूक आणि वखवखलेलो नव्हेत! ५. वैदिकांचे आपल्या धर्मावरचे अतिक्रमण झुगारा अन्यथा ते धर्म आणि संस्कृतीच्या नांवाखाली तुम्हाला एक दिवस वैदिकाश्रयी गुलाम बनवतील आणि आजही त्यांना अर्धवट जमलेले काम पुर्ण करुन तुम्हाला विषमतेच्या काळडोहात फेकून देतील. (जसे आजवर त्यांनी प्रयत्न केले तसे) ६. मोहन भागवत अथवा कोणीही वैदिक जेंव्हा हिंदू धर्माबाबत बोलतात तेंव्हा ते खोटेपणाचा कळस गाठत असतात. बहीण-भावाचे, आई-मुलाचे नाते यांना व गाय-वृषभाला महत्ता देणारे आपण हे विसरतो कि या वैदिकांच्या संस्कृतीचा यांशी काडीइतकाही संबंध नाही. नव्हता. पण हेच आज आमचीच संस्कृती त्यांचीच म्हणुन सांगतात, वेडपट तर्क देतात. ते आमच्या धर्माचे कसे? उदा. सावरकर गाय हा उपयुक्त पशू आहे असे म्हनतात ते त्यांच्या गवालंभ यज्ञ करणा-या संस्कृतीशी सुसंगतच नाही काय? वर हे सांगनार-सावरकर विज्ञाननिष्ठ होते. असे असेल तर मग गाय-बैलांना यज्ञासाठी ठार मारणारे आणि खाणारे पुरातन वैदिकही केवढे विज्ञाननिष्ठ असले पाहिजेत बरे? उपयुक्त पशु नाही काय? ७. वृषभाच्या आदरयुक्त मुद्रांची रेलचेल सिंधु संस्कृतीच्या उत्खननांत आहे. आम्ही त्याच असूर संस्कृतीचे वारसदार आहोत कारआण आम्ही मुर्तीपुजक आहोत. यज्ञ ही काही आमची संस्कृती नाही. मग आम्ही जे आमचे नाही त्या संस्कृतीच्या लोकांना आपल्यात का घेतले? आजही का घेत आहोत? हाकला त्यांना या हिंदू धर्मातुन जे वैदिक आहेत. ८. वैदिकांची पोट भरण्याची आपण व्यवस्था केली. त्यांच्यावर विश्वास ठेवला कि ते आपला धर्म जपतील...पाण त्यांने त्यांचाच धर्म जपला ही त्यांचे नव्हे आपली चुक आहे. ख्रिस्त्याला कोणी मशीदीचा इमाम बनवते काय? पण ज्या वैदिकांनी शिव वगैरे आपली दैवते अनार्य ठरवली, म्हणे पावन करुन घेतली, मग ते आमचे इमाम आम्ही केले कसे? ९. वैदिकांचा आमच्या धर्माशी संबंध नाही. जेही कोणी वैदिक संस्कार करुन घेतात ते हिंदू नाहीत तर वैदिक आहेत. आणि हिंदू धर्माशी वैदिकांचा ना तत्वज्ञान, ना कर्मकांड ना आचारधर्म...संबंधच नाही तर मग ते हिंदू कसे? १०. मोहन भागवत ते आसारामबापु ते वैदिक महत्ता मानणारे हिंदू नाहीत. ते कधीही नव्हते. त्यांच्या संघटना या केवळ वैदिक धर्माच्या प्रसारासाठी आहेत. त्यांना स्त्रीयांना दुय्यम ठरवण्याची हौस आहे. मग आम्ही जगदंबेला जगन्माता मानतो त्याशी हे वैदिक तत्वज्ञान विरोधी नाही काय? हे तर स्त्रीला भोग्यच मानतात! यांचा इंद्र तर वृंदा असो कि अन्य कोणी...भोगायलाच जातो कि नाही? ११. आमची दैवते, मग खंडोबा असो कि शिव...सती असो कि पार्वती...कधी असले उद्योग केल्याची किमान दंतकथा तरी आहे काय? १२. हे वैदिक लोक मुळात भोगवादी आहेत हे अगदी पुराणकथांतुनही सिद्ध होते. ऋग्वैदिक तत्वज्ञानही भोगवादी आहे. आमच -हास यांच्या तत्वज्ञानाच्या प्रभावखाली जात असल्याने होतोय. १३. मित्रहो, वैदिक समजणा-यांना प्रथम हिंदू धर्मातून हाकला. एक तर तुम्ही वैदिक आहात नाही तर हिंदू आहात. जर तुम्ही वैदिक आहात तर तुमचाच धर्म तुम्हाला मुर्तीपुजेची परवानगी देत नाही. हेही महित नसेल तर माहित करुन घ्या. आम्ही मोकळेपणे कबूल करतो कि होय, आम्ही मुर्तीपुजक आहोत! आम्ही आत्मपुजक आहोत...आम्ही योगाला मानतो कारंण आदिनाथ शिव हा योगाचा मुख्य प्रवर्तक आहे हे आम्हालाच नाही...तुम्हालाही नाईलाजाने का होईना मान्य आहे. थोडक्यात वैदिक महत्ता ज्यांना गायची त्यांनी खुशाल गावी...पण मग स्वत:ला हिंदू म्हणुन घेवू नये. आजवर आम्ही तुमच्या अनैतिहासिक बाता ऐकल्या आता त्या ऐकल्या जाणार नाहीत. आम्हाला आमचा धर्म माहित आहे आणि तो आम्ही इमानदारीने पाळतोय...आमची कोनतीही इष्ट देवते असो तिची पुजा करतोय...तुम्ही उलट स्वधर्म घातकी आहात! अरे कोणत्या तुमच्या घरात गृहाग्नी असतो बरे? कोण इंद्र ते अदितीला आप्ल्याच घरात स्थान देतो बरे? किती लोकांचे कुलदैवत ईंद्रादि वैदिक दैवते आहेत बरे? नाहीत ना? मग कशाला त्या धर्माला हिंदू म्हणुन आमच्यावर लादायचा प्रयत्न करता? सिंधुचा हिंदु झाला. ठीक आहे. आमच्या संस्कृतीचे ते पुरातन अवशेष आहेत. काय फरक पडतो? पण वैदिकाश्रयी लोक हिंदू नाहीत. कधीही नव्हते. हे मोहन भागवत काय कि आसारामबापु काय...जर हिंदुच नाहीत पण तरीही स्वत:ला हिंदू समजतात तर अशांना धर्माबाहेर आपणच हाकलून द्यायला नको काय? होय...अशा वैदिकाभिमानी लोकांना, त्यांच्या धर्माचा आदर ठेवत त्यांना हिंदू धर्माबाहेर हाकललेच पाहिजे. आणि ही प्रक्रिया आता जोरात सुरू होईल याची वैदिक समजणा-यांनी खात्री बाळगावी!

Thursday, January 15, 2026

मानवी जीवनाला स्थैर्य देणारा शेतीचा शोध!

शेतीचा क्रांतीकारी शोध हा सुरुवातीच्या शिकारी मानवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याआधी इ.स.पू. २०,००० पर्यंत पशुपालक आणि शिकारी अशा मिश्र समाजात मानवजात रूपांतरित झालेली होती. जीवन भटक्या स्वरूपाचे आणि अनंत धोक्यांनी भरलेले होते. आपण अन्नाच्या शोधात भटकण्यापेक्षा आपणच अन्नाचे निर्माते व्हावे असे जेव्हा मानवाला वाटले तेव्हाच या क्रांतीकारी शोधाचा जन्म झाला. अर्थात हिमयुग आणि त्यानंतर आलेले उबदार युग त्याला जगण्यासाठी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणायला संधी मिळाली. शेतीच्या शोधाने मानवाचे जीवन नाट्यमयरित्या बदलले. उत्खननात मिळालेल्या पुरातत्वीय पुराव्यांमुळे असे मानले जाते की, शेतीचा शोध इ.स.पू. ९००० च्या सुमारास झाग्रोस पर्वतरांगेत लागला, तरी प्रत्यक्षात कृषी युग यापेक्षाही काही हजार वर्षे आधी सुरु झालेले असू शकते. पशुपालक लोकांच्या मनात नेमके कधी आले की त्यांना अन्न आणि चाऱ्यासाठी भटकावे लागणार नाही, तर ते स्वतःच त्याचे उत्पादन करू शकतात? त्यांनी अनेक युगे निसर्गाचे चक्र पाहिले असेल, बियांपासून त्याच प्रकारची वनस्पती नव्याने उगवताना पाहिली असेल. आपल्या शिकारी अथवा अन्नसंकलन करण्याच्या प्रदीर्घ काळात त्यांना गहू, मका किंवा इतर तृणधान्याच्या जंगली वनस्पती आढळल्या असतील. त्यांनी त्यांचे सेवनही केले असेल. पण त्याला जीवनावश्यक व्यवसायात आपण बदलवू शकतो हे सावकाश त्याच्या लक्षात आले असावे. तसे सुकून वाळलेल्या, धराशायी झालेल्या वनस्पती बीजापासून पावसानंतर पुन्हा नव्याने वाढतात हे ज्ञान त्यांना प्राचीन काळापासून मिळाले असावे. त्यांनी बिया पेरून फळे देणाऱ्या झाडांवरही हा प्रयोग केलाही असेल आणि निसर्गाने साथ दिल्यास, अनेक वर्षे आश्चर्याने त्यांची वाढही पाहिली असेल. तथापि, त्यांना असे वाटले नाही की ते पद्धतशीर लागवडीद्वारे अन्न उत्पादन करू शकतात. याचे कारण म्हणजे शिकार व अन्नसंकलनाची त्याला लागलेली काही लक्ष वर्षांची सवय. त्या काळात त्याने काही शोध लावलेच! म्हणजे दगडी हत्यारांचे शोध, कातडी कमावण्याचा शोध, कृत्रिम पण तात्पुरत्या निवार्यांचा शोध, चकमकीने आग पेटवायचा शोध...अशा अनेक शोधांनी त्याचे बिकट जीवन थोडे सुसह्य केले असले तरी शेतीच्या शोधाने संपूर्ण मानवी जीवनात एक विलक्षण क्रांती घडून आली. समाज व्यवस्था, भाषा, धर्म कल्पना, काव्य, मिथके यांचे स्वरूप अधिक व्यामिश्र आणि अर्थपूर्ण झाले. आजचा आधुनिक मानव शेतीच्या शोधाच्या पायावरच उभा आहे असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीची शेती ही निव्वळ कुतूहलातून व भटक्या स्वरूपातच होत असली तरी हिमयुगानंतर तिच्यात नाट्यपूर्ण बदल हाले. सुमारे दहा-बारा हजार वर्षांपूर्वी, जगभरात शेतीच्या पद्धतींमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसते. मेहरगढ आणि झाग्रोस ही पुरातत्वीय स्थळे सर्वात प्राचीन शेतीच्या पद्धतींची उदाहरणे आहेत. याहूनही जुने पुरावे असू शकतात, परंतु ते काळाच्या ओघात नष्ट झाले असावेत. पण जवळजवळ सर्व जमाती शेतीकडे वळण्याची तत्कालीन कारणे काय असावीत? शेती हा काही एकाएकी लागलेला नवीन शोध नव्हता. पद्धतशीर लागवडीकडे वळण्यापूर्वी, त्यांनी कदाचित अनौपचारिकपणे, गंमत म्हणून शेती केलीही असेल. पण त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून तिचा वापर केला नाही असे दिसते. शेतीच्या शोध स्त्रियांनी लावला असेही एक लोकप्रिय मत आहे आणि त्यात तथ्यही आहे. पण शेवटचे हिमयुग सरासरी बारा हजार वर्षांपूर्वी संपून उबदार युग सुरु झाले आणि शेती तंत्राचा विस्फोट झाला असे आपल्याला दिसते. मानवी संस्कृतींच्या उत्कर्षात आणि ऱ्हासात हवामानातील बदलांचा जवळचा संबंध आहे. यामुळे केवळ मानवांना त्यांच्या जगण्याच्या पद्धतीच नव्हे, तर सांस्कृतिक पद्धतीही बदलण्यास भाग पाडले आहे. त्या काळातील मानवांनी एका हिमयुगाचा अनुभव घेतला होता. तो काळ जगण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आणि कठीण होता. हिमयुगामुळे लोकसंख्या आकुंचित झाली असावी असेही दिसते. परंतु हिमयुगाच्या काळात आणि त्यानंतरही लोक फार स्थलांतरे न करता प्रतिकूल स्थितीला तोंड देत मोठ्या प्रमाणावर त्याच भागात राहत होते, हे कोस्टेंकी मानवाच्या डीएनएवरून स्पष्ट होते. हा डीएनए मध्य सायबेरियामध्ये सापडलेल्या २४,००० वर्षांपूर्वीच्या एका मुलाच्या डीएनएसारखाच होता. हे वास्तव सूचित करते की प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असूनही लोक त्यांच्या परिचित प्रदेशांमध्ये अधिक रुजलेले होते. सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी होलोसीन युगाची सुरुवात झाली. हे एक उष्ण युग होते. बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी सुमारे ११५ फुटांनी वाढली. काही महाकाय प्राणी प्रजाती नामशेष झाल्या कारण त्या हवामान बदलाशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. हवामान बदलाच्या संक्रमण काळात लोकसंख्येची घट झाली असावी. हिमयुगाने मानवजातीला आपली जीवनशैली बदलण्यास भाग पडले. जगण्याच्या नैसर्गिक इच्छेने त्यांना उपजीविकेचे नवीन मार्ग शोधायला लावले. आपल्या पूर्वजांची आधुनिक मानसिकता तयार व्हायला हिमयुगच कारण झाले. त्यांनी हिमनदीच्या युगाचा अनुभव घेतला होता आणि त्यानुसार त्यांनी आपली जीवनशैली जुळवून घेतली होती. तथापि, निसर्गातील बदलामुळे मानवाला जगण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यास भाग पाडले असावे. मानवाने आपली वस्ती पूर्वीच्या निर्जन प्रदेशांमध्ये हलवली असावी, कारण हिमयुगाच्या समाप्तीमुळे बर्फाच्या थरांनी झाकलेले अनेक प्रदेश रिकामे झाले असावेत. नव्याने पुन्हा फोफावणार्या वनस्पतींनी या पुरा-मानवाच्या कल्पनाशक्तीला अजूनच प्रोत्साहन दिले असावे. शेती-जीवनाची सुरुवात होलोसीन युगाच्या (उबदार युग) सुरुवातीशी जुळते. याचा अर्थ या युगाला आपल्या प्राचीन इतिहासात महत्त्व आहे. शेतीमुळे सुरुवातीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित प्रदेशांमध्ये, जिथे ते कायमस्वरूपी शेती करू शकत होते, तिथे स्थायिक होण्यास मदत झाली. पाण्याची खात्रीशीर उपलब्धता आणि सुपीक जमिनींसाठी नदीखोऱ्यांची निवड नैसर्गिक होती. हा मानवी इतिहासातील एक क्रांतिकारक टप्पा होता. यामुळे त्याची जीवनशैली आणि सामाजिक संदर्भ नाटकीयरीत्या बदलले. खऱ्या अर्थाने, मानव जमिनीशी जोडला गेला. शेतीमुळे तो स्थिर झाला. त्याची मानसिकता नाट्यमय रूपाने बदलली. ज्या प्रदेशात तो स्थिर झाला त्या प्रदेशाच्या भूगर्भीय रचनेमुळे त्याच्या सामुहिक मानसिकतेत मोठा बदल झाला. वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक संस्कृतींचा उदय त्यातूनच झाला. त्याची भटकंतीची आवश्यकता संपली. पण हे सोपे नव्हते. काही मानवसमूह अजूनही पशुपालक राहिले. त्यांची भटकायची उर्मी कमी झाली नाही. एकीकडे स्थिर होऊ पाहणारी नवी संस्कृती आणि आदिम भटकी संस्कृती यांच्यात दीर्घकाळ वैचारिक-मानसिक संघर्ष झाला असणे स्वाभाविक आहे. या संघर्षाचे अवशेष आपल्याला प्राचीन मिथककथांतून मिळतात. यात शेवटी कृषी संस्कृतीनेच आपले वर्चस्व प्रस्थापित केले असेही आपल्याला दिसते. अर्थात या शोधाने मानवी जीवनाला स्थैर्य दिले एवढेच त्याचे महत्व नाही. मानवी जीवनाला आकार देणारे अनेक पूरक शोधही त्यामुळेच लागत गेले. ते पुढील भागात! -संजय सोनवणी

Sunday, January 11, 2026

विज्ञान साहित्य लोकाभिमुख होण्यासाठी!

ज्या समाजात जीवनाकडे पाहण्याचा विज्ञानवादी दृष्टीकोन नसतो असा समाज कधीही ऐहिक आणि मानसिक प्रगती करू शकत नाही. मराठी विश्व हे विज्ञानच काय पण अन्य साहित्याकडे वा वैचारिक लेखनाकडे सहसा उपेक्षेनेच पाहत असल्याने मराठी समाजात वैचारिक वादळे झालीत, गहन चर्चा घडून आल्या आणि समाजाला नव्या दृष्टीने जगाकडे पाहता आले असे क्वचितच घडले. त्यात मराठी सामीक्षकानी काही साहित्यप्रकारांना साहित्य मानायलाच नकार दिल्याने विज्ञान साहित्याला सामाजिक प्रतिष्ठा कधीच मिळू शकली नाही. अपवाद फक्त डॉ. जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा. पण त्यांनाही प्रसिद्धी मिळाली ती स्वत: नारळीकर जागतिक कीर्तीचे संशोधक होते म्हणून. त्यांच्या विज्ञान कथांमुळे अथवा त्यांनी मराठीत वैद्न्यानिक माहिती पुरवणारे मूलगामी लेखन केले म्हणून नाही. मराठीत विज्ञानकथा लिहिल्या जाण्याचा इतिहास फार जुना आहे. भा. रा. भागवत यांनी ज्युल्स व्हर्नच्या अनेक वैद्न्यानिक काल्पनिका मराठीत आणून आता जमाना लोटला. या कादंबऱ्या खूप लोकप्रियही झाल्या होत्या. ज्युल्स व्हर्नची भविष्यवेधी आणि रंजनात्मक कथन शैली आणि त्याला साजेशी विलक्षण कथा याचा त्यात फार मोठा वाटा होता. पुढे स्वतंत्ररीत्या विद्न्यानाधारीत कथा, कादंबरी आणि लेखनाचे मार्ग खुले झाले. पण यातील बहुतेक साहित्य हे परकीय लेखनावर आधारित होते. डॉ. बाळ फोंडके, डॉ. संजय ढोले हे स्वत: विज्ञानाची पार्श्वभूमी असलेले लेखक. पण कादंबरी अथवा कथेत विज्ञान किती असावे आणि त्याला रंजक कथेची साथ किती असावी यात या मंडळीला फारसा मेळ घालता आल्याचे दिसून येत नाही. रंजकतेशिवाय वाचक अशा साहित्याकडे फिरकत नाहीत हे साहित्यिक म्हणून मराठी लेखकांनी लक्षात घ्यायला हवे होते. त्य्यामुळे अच्युत गोडबोले यांच्यासारखे लेखक वैद्न्यानिक माहिती कथात्मक स्वरूपात न आणता सोप्या भाषेत पुरवत वाचकांना अधिक विज्ञानाभिमुख करण्यात यशस्वी झाले असे म्हणावे लागते. “केलाटाची हाक” ही चंद्रकांत मराठे यांची महाकादंबरी मी माझ्या पुष्प प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली होती. ही एक आंतरग्रहीय विज्ञान कादंबरी होती. तिला मात्र चांगले यश मिळाले कारण मराठे यांनी एका परग्रहावरील समाजाच्या अत्यंत रंजक वेध घेतला होता. अलीकडेच प्रगती पाटील या तरूण लेखिकेने “त्रिकोणी साहस” ही अशीच एका दूरच्या ग्रहावर घडणारी महाकादंबरी लिहिली. ती वाचकांत लोकप्रियही आहे. पण दुर्दैवाने मराठी समीक्षकांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले. अशी उदासीनता असेल आणि अमुक म्हणजेच साहित्य असा दृष्टीकोन समीक्षक बाळगत राहतील तर मराठी विज्ञान साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचेल? नव्या प्रतिभा असे साहित्य कशाला लिहितील? ही घोर उपेक्षा मराठी विज्ञानसाहित्याच्या प्रसाराला बाधक आहे. मुलांसाठी किती विद्न्यानिका आहेत? आकडेवारी पाहिली तर निराशाच दाटून येईल. अजूनही बालसाहित्य म्हणजे जादू-पऱ्याच्या कथा, फुटकळ साहसकथा व बोधकथा असा घोर अपसमज आहे. मुलांना आता त्या वाचण्यात रस उरलेला नाही कारण त्यांच्या भवतालाचे जग अफाट बदललेले आहे. विज्ञान युगाची फळे ते चाखत आहेत. एल विज्ञान समजून घेण्याची त्यांची जिज्ञासा आहे. हे कथांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवत त्यांच्या नुसत्या जिद्न्यासेचेच शमन नव्हे तर भविष्यकालीन संभावना त्यांच्यासमोर ठेवत त्यांच्या कल्पनाशक्तीला विद्न्यानाधीष्ठीत बळ पुरवणे आवश्यक आहे. यातून विज्ञानवादी पिढी तर घडू शकतेच पण भविष्यातील स्वतंत्र संशोधन करणारे वैज्ञानिकसुद्धा घडू शकतात. युरोप विज्ञानवादी व्हायला ज्युल्स व्हर्न. मेरी शेली, एच. जी. वेल्स यांच्यासारखे खांदे आणि कल्पक विज्ञानकथा लेखक होते. ज्युल्स व्हर्नने आपल्या काल्पनिकांत वर्णन केलेल्या पाणबुडीसारखीच पाणबुडी प्रत्यक्षात तयार करता येईल असा विश्वास संशोधकांच्या मनात आला. आणि ते स्वप्न साकारही झाले. अशा अनेक कल्पना कल्पक लेखकांनी पुरवल्या आणि मग ते स्वप्न सत्यात आणले. मी १९९८ साली उडती आणि रस्त्यावरूनही चालू शकेल अशी हेलीकार बनवण्याचा संकल्प केला होता. तो प्रत्यक्षात यावा यासाठी प्रयत्नही केले होते. माझा प्रयत्न अपुरा राहिला असला तरी जगात आज अनेक संशोधक तशी कार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या विज्ञान कादंबर्यात या कल्पनेचा चपखल उपयोगही केला. पण तो तेथेच संपला, करण कोणा भारतीयाने हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही. आहे त्या विद्न्यानावर आधारित कथा महत्वाच्या आहेतच. त्यातून आहे त्या विद्न्यानामागील अर्थ आणि उपयुक्तता समजून घेता येते. पण भविष्यवेधी विज्ञानकथा मात्र विज्ञानातील भावी प्रगतीच्या संभावना आणि दिशा सांगत असतात. त्या संशोधकांना उपयुक्त ठरू शकतात. मराठीत पाहिले तर मात्र चित्र एवढे समाधानकारक नाही आणि म्हणूनच देशात मुलभूत संशोधकांचीही वानवा आहे. बालसाहित्यापासून ते प्रौढांच्या साहित्याचा आधार विज्ञान (मग ते आजचे असो की भविष्यवेधी) आधाराला घेत रंजक कथा लिहिता येणे म्हटले तर फार सोपे आहे. अट एकाच की स्वत: लेखकच विज्ञानाचा पाया भक्कम असला पाहिजे. त्याच्या अभावात चांगली विज्ञानकथा निर्माण करता येणे शक्य नाही. विज्ञानाच्या पायासोबतच लेखक हा उच्च दर्जाचा प्रतिभाशाली असला पाहिजे आणि त्याने रंजक खिळवून ठेवणारी कथानके बनवून विज्ञानाच्या हातात हात घालून आपली रचना उतरवली पाहिजे. दुर्दैवाने मराठीत असे लेखक किती आहेत याच विचार केला तर हाती निराशा आल्याखेरीज राहणार नाही. विज्ञानाची क्षितिजे अमर्याद आहेत. आताचे संगणक जाऊन लवकरच क्वांटम संगणक येतील अशी चिन्हे आहेत जे जगाचा चेहरामोहरा बदलून टाकती. त्याच्या भल्या-बुर्या सामर्थ्याचे व्यापक चित्रण मी “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत केले. पण आपले विज्ञान कथाक्षेत्र अध्याप तेथवरही पोचलेले नाही. न्यानो (Nano) तंत्रज्ञान आता सर्व क्षेत्रे काबीज करू लागले आहे. यात मानवी जगाला सुख देणार्या आणि भयभीत करणार्या अनेक भावी संभावना आहेत. त्याबाबतही अत्यंत उत्कृष्ठ कथा निर्माण होऊ शकतात. मी स्पेस ब्राव्हो या कादंबरीत त्याचा भविष्यवेधी उपयोग केला आहे. भारतातील प्राचीन तंत्रज्ञान हाही आज फार चर्चेचा विषय आहे. पण त्या कल्पना आज सत्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या सत्यात आल्या तर आजचे जग कसे असेल यावरही लेखन व्हायला हवे होते. ते झालेले नाही. मी शेवटी “"The Astronaut Who Crashed In From Space" या शीर्षकाखाली या विषयावर कादंबरी लिहिली, पण इंग्रजीत. मराठीत माझ्या अन्य विज्ञान कादंबर्यानी जी उपेक्षा सहन केली ती पुन्हा सहन करण्याची माझी इच्छा नव्हती एवढेच. मराठी वाचकांना विद्न्यानाभिमुख साहित्य्याकडे वळवणे शक्य तेव्हाच होईल जेव्हा या विषयावर अनेक साहित्यिक विज्ञानाचा मुलगर्भ आणि भावी संभावना समजून घेऊ शकतील आणि रंजक कथेच्या माध्यमातून विपुल लेखन करत राहतील तेव्हा. वैज्ञानिक साहित्यच पुरेसे उपलब्ध नसेल तर लोक त्याकडे कसे वळणार? आणि समीक्षकांनी ते साहित्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपली लेखणीच उचलली नाही तर काय होणार? साहित्य कोणतेही असो, त्याच पहिला निकष म्हणजे ते रंजक व वाचनीय असले पाहिजे. अनेक लेखक विज्ञान कादंबरी अथवा कथा लिहिताना वैद्न्यानिक माहितीचा किचकट भाषेत एवढा मारा करत जातात की विज्ञानही हरवते आणि कथाही निरस बनते. असे टाळले गेले पाहिजे. विज्ञानकथा लेखक विज्ञानातील जाणकार तर असलाच पाहिजे पण तो प्रतिभाशाली साहित्यिकही असला पाहिजे. तरच विज्ञान-साहित्य लोकाभिमुख बनू शकते. शेवटी हा विषय लेखक-प्रकाशक आणि समीक्षकांचा आहे. विज्ञान साहित्यच निरस आहे, छद्म-विज्ञानाचे दर्शन घडवत आहे किंवा कोणाचीतरी नक्कल आहे असे काही झाले तर ते समाजाला आपले वाटणार नाही. ते लोकाभिमुख होण्याची तीळमात्र शक्यता नाही हे लक्षात घ्यावे लागेल. शेवटी लेखकांनाच आपली कंबर कसावी लागेल. वाचकांना दोष देऊन फारसा उपयोग नाही कारण वाचक शेवटी जे उपयुक्त आहे किंवा रंजक आहे तेच वाचणार हे लक्षात घ्यावे लागेल. (अखिल भारतीय मराठी साहती संमेलनाच्या "अटकेपार" या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेला लेख) •

Friday, January 2, 2026

यशवंतराव होळकर आणि मी....

 गोपीचंद पडळकर, महाराजा




आज माझे बंधुतुल्य मित्र प्रा. हरी नरके यांनी श्री. गोपीचंद पडळकर यांनी “अनसंग हिरो ऑफ इंडिया- महाराजा यशवंतराव होळकर” या मी इंग्रजीत लिहिलेल्या आणि सहा जानेवारी २०२१ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी झालेल्या प्रकाशन समारंभात कोणीही मागणी अथवा विनंती केली नसतांना पडळकर यांनी प्रकाशनासाठी आलेला रु. १.२५ laakh खर्च आपण देतो असे जाहीर केले होते. माझे मित्र प्रकाश खाडे यांनी आपल्या अत्यंत अडचणीच्या स्थितीत पुस्तकाची छपाई, संपादन इत्यादी कामाला अपार खर्च केलेला होता. मी किमान आठ महिने हे पुस्तक कोणत्याही मोबदल्याशिवाय लिहिले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाचे अनावर आकर्षण आणि त्यांनी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे केलेली माझ्या मनाला मोह पाडणारी झंझावाती रुजुवात यापोटी मी कधीही आर्थिक विचार केलेला नव्हता व नाही. मी त्यांच्या जीवनावर “झंझावात” ही कादंबरीही लिहिली व ती योगेश दशरथ यांनी स्टोरीटेलच्या श्राव्य माध्यमातून जगासमोर नेली. हा यशवंतरावांचा त्यांच्याच समाजाला न समजलेला महिमा आहे कारण ही कादंबरी हजारो लोकांनी ऐकली त्यात हा समाज किती असेल हा संशोधनाचा विषय आहे. २०११ साली माझे महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावरचे चरित्र प्रकाशित झाले. त्याआधी प्रकाश खाडे आणि मी यशवंतरावांचे जन्मस्थान हुडकून वाफगाव येथे गेलो. पुढे मी त्यांच्या राज्याभिषेकाची तारीखही शोधून काढली. त्यांचा जन्मोत्सव आणि राज्याभिषेक दिन साजरा करायची सुरुवात मी आणे श्री. खाडे यांनी केली. आज ही प्रथा राज्यभर पसरलेली आहे. फक्त एकच आहे कि त्याचे श्रेय आम्हाला कोणी देत नाही आणि ती अपेक्षाही नाही. असो.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे जीवन इंग्रजीच्या माध्यमातून जगासमोर जावे हे माझे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले केळुस्करगुरुजी लिखित इंग्रजीतील चरित्र जगासमोर जावे यासाठी तुकोजीराजे होळकर यांनी त्या काळातील २५००० रुपयांची देणगी दिली होती व ते चरित्र जगभरच्या विद्यापीठांतील ग्रंथालयांमध्ये पाठवले होते. आता हे असे करायला कोणी पुढे येणार नाही हे वास्तव माहित असलेले श्री. खाडे यांनी आपले काही मित्र तयार केले होईते जे या प्रती विकत घेऊन भारतातील व जगभरच्या विद्यापीठांत प्रती पाठवणार होते. सुमारे अडीचशे प्रती तरी सुरुवातीला पाठवता येतील असा त्यांचा होरा होता. पण प्रकाशन समारंभात पडळकर यांनी केलेल्या घोषणेमुळे व त्याप्रमाणे पैसे खाडे यांना मिळाले आहेत या समजुतीमुळे हेही लोक बाजुला सरले. कार्यक्रमानंतर महिनाभरात पडळकर यांनी खाडे यांना फोन करून त्यांच्या सांगली जिल्ह्यातील जरे गावी बोलावले. माझ्या पाठीच्या वेदना तेंव्हा तीव्र असूनही खाडे यांच्या आग्रहामुळे मी तेथे गेलो. तेथे हे नव्हतेच. त्या दिवशी ते येणारच नव्हते. आम्ही अन्यत्र मुक्काम करून पुण्यास परत आलो.
प्रा. हरिभाऊ मी आठवीत असल्यापासून माझ्या सर्व सुख-दु:खाचे साक्षीदार आहेत. या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते मुख्य अतिथी होते. पडळकर यांनी कोणेही मागणी न करता दिलेले जाहीर आश्वासनही माहित होते. त्यांनी ते पाळले नाही. ती जागा पुढा-याप्रमाणे पोकळ आश्वासने देण्याचीही नव्हती. त्यांने तरीही “वचनं किं दरिद्रता” या न्यायाने आश्वासन दिले असेल पण त्यामुळे पुढे काय अनर्थ कोसळला याची त्यांना पर्वाही नसेल. एक वर्ष उलटले तेंव्हा त्यांची भेट हरीभाउन्शी झाली. त्यांनाही असेच थातूर मातुर उत्तर देऊन पडळकर यांनी बाजू सावरली. बरे, हा एकच अनुभव नाही, इतर नेत्यांबाबतही असे अनुभव अनेक आहेत आणि ते हरीभाउन्ना माहित आहेत कारण ते त्या क्षणांचे साक्षीदार आहेत.
अर्थात माझा अनुभवाने या लोकांवर विश्वास नव्हताच. छापील चरित्र विकण्यात आणि जगभरच्या ग्रंथालयांमध्ये नेण्यात अडचणी आहेत हे लक्षात घेऊन मी अव्यावहारिक निर्णय घेतला व तो म्हणजे अकेडमिया आणि रिसर्चगेट या अभ्यासकांसाठी असलेल्या साईटवर मोफत उपलब्ध करून देण्याचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या दोन्ही साईट्सवरून गेल्या वर्षभरात ६५००० पेक्षा जास्त प्रती डाउनलोड झालेल्या आहेत. दर आठवड्याला आजही किमान ३०० प्रती डाउनलोड होतात. अर्थात या प्रती मोफत आहेत. याचा फायदा असला तर एकच, अभ्यासकांपर्यंत तरी महाराजा यशवंतराव होळकर पोचत आहेत.
पण दुर्दैव हे आहे कि महाराजा यशवंतरावांचे नाव घेत, त्यांच्या नावाने आणाभाका घेणारे तथाकथित नेते मात्र यापासून अलिप्त आहेत. इंग्रजी सोडा, मराठी चरित्रही यांनी वाचलेले नाही कि “झंझावात” ही त्यांनी कधी ऐकलेले नाही. आणि हे लोक समाजाचे नेते बनतात. सरधोपट थापा मारतात. अब्यासक म्हनवनारेही बिनधास्त थापा मारतात. ही सुभेदार मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्याशीच केलेली कृतघ्नता नाही असे कोण म्हणेल? पण तेही असो. महाराजा यशवंतराव तळपते सूर्य होते आणि ते वर्तमानातही तळपतच राहणार. त्यासाठी माझीही मुळीच गरज नाही. मी जे केले ते केवळ प्रेमापोटी. मी कधी महाकाव्य लिहिले तर ते केवळ महाराजा यशवंतरावांवर असे मी म्हणतो ती पोकळ गोष्ट नाही.
आज दु:ख याचे वाटले कि काही मला म्हणाले, हरीभाउन्नी ही पोस्ट केली ही तुमच्या सांगण्यावरून. हा अत्यंत उद्धट आणि बेमुर्वतखोर आरोप आहे. मुळात मी हरीभौन्ना काही सांगेल ही माझी प्राज्ञा नाहीये. मलाही कोणी एखादी पोस्ट टाका असा आदेश देऊ शकत नाही. आम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहोत. किंबहुना त्यामुळेच आमचे मैत्रही अजरामर झालेले आहे. असले फालतू आरोपो करणारे मनोविकृत आहेत एवढेच काय ते मी म्हणू शकेल.
राहिले पडळकर किंवा तशाच प्रकारच्या अन्य नेत्यांबद्दल, जर हे कार्य त्यांच्या मेहरबानीने सुरूच जर झालेले नव्हते तर ते त्यांच्या बेमुर्वतखोरीमुळे थांबेल असा भ्रम कोणीही करून घेण्याचे कारण नाही.
- संजय सोनवणी
Like
Comment
Share

Thursday, December 25, 2025

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे असेल याचा अनेक अंगांनी आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आजचा जो वर्तमान आहे त्या आधारावर आपण भविष्याच्या तशा अज्ञात कुहरात डोकावण्याचा प्रयत्न केला. खरे तर वर्तमानही आपल्या समग्र आकलनात येत नाही तर भविष्य कोठून येणार असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण एकुणातील भविष्याची दिशा काय असू शकेल याचा ढोबळ अंदाज तरी आपण बंधू शकतो. मुळात प्रश्न आहे तो आपल्याला भावी जग कसे असावे वाटते आणि ते भविष्याच साकार व्हावे अये होण्यासाठी आपण काय करू शकतो हा. शेवटी मनुष्यच आपल्या भविष्याचा निर्माता असतो, पण ही माणसाची सामुहिक शक्ती सहसा एकत्रित कार्यरत नसते. म्हणजे ती असते पण ती शक्तीही एवढी विस्कळीत आणि परस्परविरुद्ध कार्य करणारी असते कि त्यातून निर्माण होणारे भविष्यही असेच विस्कळीत आणि अंतत: समग्र मानवी जीवनाला अधिकाधिक त्रस्त करणारे असणार यात शंका नाही. आपल्याला आपली धरती सुंदर असावी, सुखमय जीवन जगता यावे, संघर्ष जीवघेणा होऊ नये, सुरक्षित समाज-राजकीय जीवन असावे, जगण्यातील अनिश्चितता किमान कशी होईल यासाठी सरकारे प्रयत्न करतील अशी राजकीय संस्कृती असावी, सर्वांना सन्मानाचे जीवन जगता यावे अशा किमान अपेक्षा सर्वांच्याच असतात. पण आज विषमता आणि अनिश्चितता एवढ्या कमाल वेगाने वाढलेली आहे की संध्याकाळी काय होईल याचा भरोसा नाही अशी स्थिती बहुतेक जागतिक नागरिकांची असेल तर मानवी जीवनाचे भविष्य काय असणार याची चिंता कोण कशाला करायच्या भानगडीत पडेल. आणि शेवटी “हे असेच चालणार” म्हणत सुस्कारे सोडण्याशिवाय कोण काय करणार? असे असले तरी ही निराशावादी वृत्तीच अधिक अनिश्चिततेला जन्म देत असते हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल. तसे पाहिले तर आज संपूर्ण जगावर निराश मनोवृत्तीचा उद्रेक झाला आहे. या निराशेला राष्ट्रा-राष्ट्रांतील संघर्ष, हेलकावे घेणारी आर्थिक स्थिती, संवेदना हीण सत्ता, झपाट्याने बदलत जाणारे नाते-संबंध, लोकांमध्ये वाढलेली व्यक्तीवादी प्रवृत्ती, त्यामुळे समाज म्हणून पडत जाणारे छोटे छोटे गट आणि त्यांच्यामध्ये उसळणारे असमाधानाचे उद्रेक हे आजचे वास्तव बनत आहे. प्रश्न तीव्र झाले, एखादा समाजच स्वत:ला असुरक्षित समजू लागला तर मात्र उद्रेक होतात. ते कधी हिंसक पातळीवरही उतरतात, पण त्यातून त्या त्या समाजाचे कल्याण झाले आहे असे क्वचितच दिसून येते. आपल्या भावी पिढ्यांना कोणत्या पद्धतीने जगायला आवडेल याचे प्रत्येकाचे आराखडे मात्र निश्चित असतात. म्हणजे सर्वांचे कल्याण होईल, जगण्यातील अनिश्चितता संपेल, माणसाला पुरेसे स्वातंत्र्य मिळत आपल्या प्रतिभेचा मुक्त आविष्कार करता येईल किंवा सहजी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या उद्योग-रोजगारांच्या मुबलक संधी उपलब्ध असतील, जेथील पर्यावरण सुखद आणि प्रदुषण विरहित असेल, असे साधारण जग सर्वांना अभिप्रेत असते. पण पप्रत्यक्षात मात्र भलतेच घडते. आज आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला व्यक्तिवादी बनवण्ास भाग पाडलेले आहे. माणूस नुसता व्यक्तिवादीच नव्हे तर आपल्या स्वत:च्या स्वतंत्र बुद्धीचा वापर किमान करत एक दिवस सर्वस्वे कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम कसा होईल यासाठी जगातील सारी भांडवलशाही व्यवस्था कामाला लागलेली आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आज कृत्रिम बुद्धीमत्ता बाल्यावस्थेत असतानाच आपल्याला दिसून येत आहेत. हा सारा मानवाला मतीमंद्त्वाकडे नेणारा सापळा आहे हे कळूनही आम्हाला वळते आहे असे नाही. आणि याहीपेक्षा निर्माण झालेला मोठा धोका म्हणजे प्रत्येकाचे वर्तन "विशिष्ट" पद्धतीनेच व्हावे यासाठी नागरिकांना निवडक माहिते पुरवत त्यांना कळूही न देता त्याच्या मेंदूचे कंडीशनिंग केले जात आहे. आपली राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक मते नियंत्रित तर केली जातच आहेत, पण तुम्हाला काय आवडावे हेही तुमच्या परस्पर ठरवले जात आहे. तुमची राजकीय मते काय असावीत हे आता तुम्ही नाही तर ही आधुनिक यंत्रणा ठरवते आहे. यातून केवळ विचारहीन गुलामच पैदा होऊ शकतात, स्वतंत्र विचारांचे, प्रतिभेचे नागरिक नाहित आणि आम्ही नकळत या धोक्याचा उंबरठा ओलांडून बसलो आहोत. आम्हाला आमचे जग भविष्यात कसे असायला हवे आणि त्यात या अशा गोष्टी बसत नसतील तर त्यांना कसे टाळायचे याचा निर्णय आम्ही आताच घेतला पाहिजे. आम्हाला आमचाच हतबल यंत्रमानव होऊ देण्याच्या आत हे पाउल उचलले पाहिजे. ही भीती काल्पनिक नाही. आजचे जग या भयकारी दिशेने आधीच निघालेले आहे, ते आम्हाला जाणवतेही आहे. पण आम्ही विचारच करू नये यासाठी सर्व राजकीय, भांडवलदारी यंत्रणा जोमाने काम करत असतील तर आम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी तरी माणसाची सर्वात श्रेष्ठ असलेली शक्ती ती म्हणजे स्वतान्र विचार आणि कल्पकता यांचा वापर करावा लागेल. तंत्रज्ञान हे शेवटी तुमचे खाजगी आणि सांगकामे निर्बुद्ध सचिव आहेत आणि त्यांच्या आहारी जात आपण आपल्या जगण्याचेच सत्व हरपून बसू हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. आम्ही व आमचे पाल्य थोडा जरी प्रयत्न करत या व्यामोहातून बाहेर पडत नव्या अनवट वाटा बनवायला सुरुवात केली तर या संभाव्य धोक्यापासून आम्ही काही प्रमाणात तरी मुक्ती मिळवू शकू आणि भविष्यातले जग माणसांना किमान सुसह्य जगता येईल असे काही करू शकू. मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटींत आपण आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पुर्णपणे स्वीकारत नाही. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. भविष्यात मानवी जीवनाची ही "विलक्षणता" टिकून राहील की नाही ही जर थोडी जरी भीती वाटत असेल तर येथेच थांबणे आणि नव्याने विचार करत, स्वत:च्या बुद्धीने नवा मार्ग शोधत पुढे जाणे इष्ट आहे. माणसांनी तंत्रज्ञान वापरणे हे ठीक पण तंत्रज्ञानच माणसांना वापरू लागले तर मात्र मनुष्यतेचा अंत होईल आणि हे कोणालाही अभिप्रेत नसणार आहे. आपण वेळीच सावध झालो तर जग आज आहे त्यापेक्षा सुंदर बनू शकते यात शंका नाही. पण या वावटळीवर स्वार होत भरकटत राहिलो तर मात्र कठीण आहे. -संजय सोनवणी

Friday, December 12, 2025

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत केलेली आहे. समजा मानवी जीवन अत्याधुनिक तंत्रद्न्यानाने झाकोळले गेले आणि बव्हंशी मानवी हातांना शारीरिक किंवा बौद्धिक श्रमाचे कामच उरले नाही तर एकुणातील व्यवस्था कशी ढासळेल यावर आपण गेल्या लेखात विचार केला. यात दुसरी संभावना अशी आहे की आज आपण कल्पना करूही शकत नालेली नवीन कामे निर्माण होतील आणि एकुणातील मानवी व्यवस्था आधी थोडी अव्यवस्थित होऊन नव्या व्यवस्थेशी जुळवून घेत एका वेगळ्या व्यवस्थेत जगू लागतील. रोजगाराचे प्रमाण आज वाटते तसे ढासळू शकणार नाही. किंवा तंत्रज्ञानाच्या विकासावरच सरकारे बंधने घालत समाजवादी तत्वानुसार सर्वांच्या स्वाभिमानाने जीवन जगण्याच्या नैसर्गिक अधिकाराचे जतन करतील. त्यासाठी अर्थात नीतीसिद्धांत हे मानवाभिमुख करावे लागतील व तसे कायदे बनवून त्याचे कठोर पालन करावे लागेल. तेव्हा संभावना खूप आहेत हे खरे असले तरी त्यासाठी मानवी प्रवृत्ती, म्हणजे लालसा, लोभ, मक्तेदारीची भावना इ. दुर्गुणांचा समूळ नाश करावा लागेल. सध्याची स्थिती तरी मक्तेदारीकडे जात छोटे-मध्यम उद्योग संपवण्याची आहे आणि सरकारे अतिश्रीमंतांच्या व शक्तीशाली जातसमूहांच्या कच्छपी लागनले असल्याने असे खरेच होईल काय याचे उत्तर देता येणे अशक्य आहे. याचे कारण मानवी समाजाच्या जीवनातील अनिश्चितता. अनिश्चिततेचे तत्व जसे सूक्ष्मयामिकी शास्त्राला जसे कवटाळून बसले आहे त्याहीपेक्षा या तत्वाने आदिम कालापासून मानवी जीवनाला जास्त ग्रासून टाकले आहे. अनिश्चिततेच्या हेलकाव्यांवर आपले जीवन झुलत असते. पुढच्या क्षणी काय होईल याचे भाकीत अगदी योजनाबद्ध कृती केली तरीही वर्तवता येणे अशक्य असते. मुळात जीही काही कृती केली ती जे परीणाम घडवते ती स्थितीच अनिश्चित आणि प्रतिक्षणी बदलणारी असते त्यामुळे परिणामही वेगवेगळी रुपे घेतात आणि अपेक्षित रूपे मात्र कवेत येतच नाहीत. काही वेळा कृतीचे अपेक्षित परिणाम दिसतात हे खरे असले तरी ते अपेक्षित परिणाम पुन्हा अनपेक्षित शक्यतांना जन्म देतात हेही आपल्या अनुभवाला येत असते. पण अनपेक्षिततेत अपेक्षितता आणायचा प्रयत्न असतो आणि कोणतीतरी शक्ती अपेक्षित असेच घडवू शकेल या अपेक्षेतून ईश्वरासकट ज्योतिष नावाचे भविष्य अशास्त्रसुद्धा डावाला लावले जाते. जेथे शास्त्रातच मुळात अनिश्चिततेचे तत्व राज्य करीत असताना, किंवा ती अनिश्चितता हीच निश्चितता आहे की नाही हेही सध्या तरी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. थोडक्यात भविष्य हे नेहमीच अनिश्चित असते आणि ते काटेकोरपणे घडेलच असे नाही. कारण विज्ञानाचेच म्हणाल तर अनिश्चितता सूक्ष्म स्तरावर जशी लागू पडते तशीच ती वैश्विक स्तरावरही लागू पडते. भाकिते मर्यादित काळचौकटीच्या परिप्रेक्ष्यात सापेक्षतेने केली गेलेली असतात. पण सूक्ष्म स्तरावरच नव्हे तर व्यापक स्तरावरही अनिश्चितता हे तत्व अबाधित राहत असून विश्व हे एकच ठरलेल्या नियमांप्रमाणे चालते असे म्हणणे चुकीचे होऊन जाईल. मग माणसाचे काय? विश्वाच्याच वर्तनाचे भाकीत जेंव्हा अशक्य आहे तेंव्हा जागतिक मानवी जीवनाचे भाकीत करता येईल असे म्हणणे चूक जरी असले तरी संभाव्यतेच्या नियमाप्रमाणे काही अंदाज बांधता येतात आणि संपूर्ण व्यवस्था मानवी हितासाठी विशिष्ट दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करता येतातानी तशी दिशाही देता येऊ शकते. शेवटी आपण माणूस आहोत आणि आपले मानव म्हणूनचे जे स्वातंत्र्य आहे ते जतन करण्यासाठी आजच्या स्थितीत दडलेली विषारी पाळेमुळे उखडून टाकण्याचे प्रयत्न होऊ शकतात. विज्ञानालाही किती प्रगत होऊ द्यायचे याची सीमा आखून देता येऊ शकते. आजच्या जगात विषमता पराकोटीची वाढलेली आहे. वंचित आणि शोषितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. अशात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाचे स्थान घेणार असतील तर जागतिक अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. यातून अराजकाची भयंकर स्थिती उत्पन्न होईल आणि मनुष्य विरुद्ध कृत्रिम मनुष्य यात संघर्ष पेटेल. मक्तेदार कंपन्या स्वत:चा फायदाही सोडू शकणार नाहीत पण जर मनुष्याची खरेदी शक्तीच संपली तर ते उत्पादने कितीही श्रेष्ठ बनवली तरी विकणार कोणाला? म्हणजे ग्राहकच उरले नाहीत तर कोणत्याही कंपनीला फायदा होणार नाही. यातून जी आर्थिक आपत्ती कोसळेल त्यातून सरकारेही वाचणार नाहीत कारण शेवटी कर कोणाकडून घेणार? लोकांचे त्यासाठी उत्पन्न नको काय? उत्पन्नविरहित प्रजा झाली तर सरकारे आणि कॉर्पोरेटस क्षणभरही तग धरू शकणार नाहीत. त्यामुळे हा तंत्रद्न्यानाचा आधुनिक वारू अधिक उधळू देण्यात कोणाचेही अंतत: हित नाही हे कोणाही सुज्ञ माणसाच्या लक्षात येईल. जीवनात अनिश्चितता आहे म्हणून माणसाने ईश्वर शोधला. वस्तुत: ईश्वर/देव/प्रेषित या साऱ्या भयभीत माणसाने निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. तरीही अगणित लोक दैवी शक्तीवर विश्वास ठेवतात. पण या कथित दैवी शक्ती माणसाच्या कामी येत नाहीत हे वास्तव आहे. प्रत्येक मनुष्यच आपल्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवू शकतो. अनिश्चिततेचे तत्व वैश्विक असल्यामुळे ते तत्व माणसालाही लागू पडते. अनिश्चिततेत निश्चितता कशी आणायची आणि त्यासाठी कोणते गुण अंगीकारायचे याबाबत प्राचीन काळापासून तत्वज्ञांनी पोटतिडिकेने सांगितले आहे पण बव्हंशी समाज आजतागायत त्यातून काही शिकलेला नाही. आज माणसाने स्वत: विचारच करू नये यासाठी साऱ्या यंत्रणा चारी बाजूनी प्रयत्नात आहेत. हे आपण समजावून घेण्याची वेळ आता तरी आलेली आहे. येथे विचार करणे थांबवून जर आपण आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवरच अवलंबून राहत जाणार असू तर आपले भविष्यही कृत्रिम, तकलादू आणि कधीही कालांधारात विलीन होऊन जाणारे असेल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. आजचे विज्ञान अतिप्रगत आहे पण ते “संवेदनशील ज्ञानी”नाही. त्याची एक महत्ता आहे हेही नाकारता येत नाही पण जेव्हा संपूर्ण मानवजातीचेच भविष्य डावाला लागलेले असते तेव्हा मात्र विज्ञान हे भस्मासुर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. सध्या तरी आपण अशी काळजी घेत मनुष्याचे मनुष्यपण जपण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहोत असे दिसत नाही. “सारे काही फायद्यासाठी” ही आपली जी जागतिक प्रवृत्ती बनली आहे तीच मुळात विघातक आहे. भौतिक फायदा की बौद्धिक/आत्मिक फायदा यात आपल्याला निवड करत एक संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ते जर केले नाही तर मनुष्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणजे मनुष्य असेल पण मनुष्यपण हरवलेला. तसे होऊ नये म्हणून जागृत होण्याची गरज आहे. -संजय सोनवणी

Thursday, November 27, 2025

भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थिती निर्माण होईल व मानवी बुद्धीचा ऱ्हास होत जाईल याची चिन्हे आजच दिसू लागली आहेत. अवघड प्रश्न स्वत: सोडवण्याऐवजी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणे आता सर्रास सुरु आहे. अगदी संशोधनपर लेखही कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून लिहिले जात आहेत. शाळा-कॉलेज व उच्च महाविद्यालयीन स्तरावर या प्रश्नाचे काय करायचे याबाबत जागतिक शिक्षण तद्न्य चिंतेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर बंधने घालण्याचे प्रयत्नही सुरु आहेत पण त्यात कितपत यश येईल याबाबत सारे साशंक आहे कारण माणसाची प्रवृत्ती ही शक्यतो विनासायास काम करण्याची असते. बौद्धिक श्रम करण्याची मुलभूत प्रवृत्तीच नसेल तर दुसरे काय होणार? त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता देईल तेच ज्ञान सर्वांना उपलब्ध असेल, स्वतंत्र प्रज्ञेने ज्ञान प्राप्त करण्याची गरजच उरणार नाही आणि म्हणू ते सारे एकतर्फी विचारांचे असेल. यातून एकसाची माणसे निर्माण होतील आणि त्यांच्यावर या मक्तेदारी संस्थांना हवे तेवढेच ज्ञान, हवा तसाच विचार पसरवण्याची संधी मिळेल, जी आजच मिळते आहे. स्वत: विश्लेषण करणे, तर्कसांगत निष्कर्ष काढणे हे मानवाचे जे वैशिष्ट्य तेच नामशेष होत जाण्याचा गंभीर धोका त्यामुळे समस्त मानवजातीसमोर आहे. याहून मोठा धोका म्हणजे भविष्यात सारी कामे बुद्धीमान यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने ते काही केल्या "खरेदीदार" होणार नाहीत. शेती ते कारखान्यातील, विपणन क्षेत्रातील, व्यवस्थापकीय कामे बुद्धीमान प्रणाल्या व यंत्रमानव करू लागले व उत्पादन अवाढव्य वाढले पण खरेदी करायला लोकांकडे क्रयशक्तीच नसेल तर मग संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. अशा अवस्थेत उत्पादन कोणी का म्हणून करेल? खरेदीदारच नसतील तर अर्थव्यवस्थेचे चाकाच रुतून पडेल. पण यातून एक नवीन अर्थव्यवस्था साकारू शकते. एक तर सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही अथवा बेरोजगारांनाही सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण कोणते रोजगार उपलब्ध होऊ शकतील याबाबत आपण आज तरी अंधारात आहोत. थोडक्यात आपण एका अनिश्चित स्थितीकडे वेगाने वाटच्घाल करत आहोत व नेमके त्याचेच भान आपल्याला नाही. शिवाय या मक्तेदारी प्रवृत्तीतून जगासमोर वेगळाच धोका उभा राहिलेला आहे तो म्हणजे जगाचे संचालन त्या त्या राष्ट्रांच्या हाती ण राहता मोजक्याच किंवा एखाद्याच कॉर्पोरेटच्या हाती जाण्याचा. जगात आज जशा वेगवेगळ्या अवाढव्य ते छोट्या कंपन्या आहेत, त्या मर्जर, अमल्गमेशन व टेकओव्हर्सच्या मार्गाने अवाढव्य कॉर्पोरेट्स बनायच्या मागे आहेत. जगातील त्यात्या देशातील विविध क्षेत्रात कार्यरत बलाढ्य कंपन्या आपापल्या देशाच्या सीमा ओलांडुन सर्वत्र पाय रोवत आहेत. त्या त्या देशातील कायदे, अशा गुंतवणुकींसाठी अनुकुल करुन घेतले जात आहेत. याचे कारण या बलाढ्य कंपन्यांकडे असणारा अमाप वित्तपुरवठा, ज्यायोगे ते सरकारांवर प्रभाव टाकु शकतात. विरोध शमवु शकतात. त्यासाठी ते माध्यमांतील विचारवंतांमार्फत जनमतही अनुकुल करुन घेण्याचा प्रयत्न करत असतात. किंबहुना माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात हेच आघाडीवर आहेत. आज सरकारांच्या राजकीय भुमिका काहीही असल्या तरी आर्थिक जगाचे म्हणने अधिक प्रभावी ठरते. हा वेग समजा वाढत गेला तर जगात राजकीय सरकारे नव्हे तर उद्योजक सरकारेच राज्य करू लागतील. आज वरकरणी का होईना दुय्यम भुमिका घेणारे आर्थिक जगत उघड भुमिका घेऊ लागेल. वेगवेगळ्या कंपन्या असल्याने व त्यांची क्षेत्रेही वेगवेगळी असल्याने आज एकच एक कॉर्पोरेट जग अर्थ जग व्यापेल असे नसले तरी हा वाढींचा वेग पाहिला तर एकल मक्तेदारीयुक्त भांडवलशाही राबवनारी देशनिहाय एकच वा जागतिक पातळीवर एकच कंपनी असली आणि तिनेच सर्वच उत्पादने (अगदी शेतीसहित) ताब्यात घेतली तर काय होईल? शेतीक्षेत्राचे कॉर्पोरेटीकरण सध्या कायद्यांमुळे सहज शक्य नसले तरी कायदे बदलले जाऊ शकतात. असे समजा झाले आणि जे होण्याची शक्यता आहे, नवीनच समस्या उद्भवतील. पहिले म्हणजे देशोदेशीची खाद्य संस्कृती आमुलाग्र बदलेल. ठराविकच पिके घेतली गेल्याने शेतीतील पीक-वैविध्य समाप्त होईल. शेतकरी अचानक मोठ्या रकमा हातात आल्याने आनंदित जरी झाला तरी त्या पैशांचे काय करायचे हे त्यांना नीट समजेलच असे नाही आणि जी नवी अर्थव्यवस्था आकाराला येईल त्यात एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा निभाव कसा लागेल याचाही गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. हा सर्व क्षेत्रातील मक्तेदारीचा प्रश्न काल्पनिक किंवा असंभाव्य आहे असे नाही. लोकांना भावनांवर खेळवण्याचे मानसशास्त्र आता झपाट्याने विकसित होत आहे. सामाजिक माध्यमांमुळे प्रत्येकाची मनोवृत्ती कशी बदलवता येवू शकते याचे प्रयोग आजच होत आहे. हे नवे शोध फक्त व्यावसायिक अथवा राजकीय कारणांसाठीच वापरले जातील असे समजणे गैर ठरेल. जगातील युद्धे अनेकदा शस्त्र उत्पादक कंपन्या ठरवतात हा इतिहास सर्वांना माहित आहे. आणि मक्तेदारीची प्रवृत्ती एक दिवस सर्वच आर्थिक जगाला (त्यांची मुळ नांवे ते ब्रँड्स कायम ठेवून) एका छत्राखाली घेणार नाही असे नाही. ज्ञान आणि संसाधनांची निर्मिती व नियंत्रण मोजक्या किंवा एखाद्याच कॉर्पोरेटच्या हाती गेली तर आजच्या वेगाने बदलत्या जगाची काय त्रेधा-तिरपीट उडेल याची कल्पना आपण करू शकतो. मी माझ्या “भविष्य नावाचा इतिहास” या भविष्यवेधी कादंबरीत सारे जग एकाच कॉर्पोरेटच्या अंमलाखाली आले तर काय घडू शकते याचे विदारक चित्रण केलेले आहे. आणि तसे घडणे असंभाव्य नाही. हा एका परीने जगाला दिलेला भावी धोक्याचा इशारा आहे असे समजायला हरकत नाही. अशा स्थितीत “सार्वभौम राष्ट्र” या संकल्पनेला काहीएक अर्थ राहणार नाही हे उघड आहे. तसेही आताच कोणतेही राष्ट्र खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे असे म्हणता येत नाही. तरीही आहे ती स्थितीही कोलमडून पडेल आणि अप्रत्यक्षरीत्या एखादे किंवा मोजके कॉर्पोरेटस जागतिक सरकारे चालवतील आणि लोकनियुक्त प्रतिनिधी ही संकल्पनाच अर्थहीन होऊन जाईल. त्यामुळे आताच एक जग:एक राष्ट्र ही संकल्पना रुजवत अतिरेकी मक्तेदारी रोखण्याची नितांत आवश्यकता आहे. -संजय सोनवणी

Monday, November 17, 2025

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

 पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

 Pune 
Shared with Public

10 janewari 2013

पांडुरंग बलकवडे यांच्या लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या "शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक" या पत्राला माझे खाली दिलेले उत्तर प्रसिद्ध झाले. आताच मला पांडुरंग बलकवडे यांचा फोन आला. आधी असलेला चर्चेचा सुर अचानक पालटला आणि त्यांनी मला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरु केली व मारहाणीच्या धमक्या दिल्या. इतिहास संशोधक म्हनवनारे या गलीच्छ पातळीवर जात असतील तर माहाराष्ट्री सांस्कृतिकतेचा केवढ -हास झाला आहे याची कल्पना येते. मी बलकवडेंचा निषेध करतो. वैचारिक वाद वैचारिकतेनेच लढायचा असतो याचे भान सुटलेले आहे. शिवीगाळ-धमक्या हेच परशुरामी संस्कृतीचे अपत्य आहे हेही सिद्ध झाले.
'शिवभारत' हा ऐतिहासिक पुरावा नाही
'शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक' हे पांडुरंग बलकवडे यांचे पत्र (लोकमानस, ९ जाने.) वाचले. बलकवडे म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी परशुरामाचे दर्शन राज्याभिषेकापूर्वी घेतले याचा एकदाच उल्लेख येतो, तो परमानंदाच्या शिवभारतमध्ये. त्याच वेळेस राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी परशुरामाबरोबरच अन्यही अनेक देवतांच्या मंदिरांत जाऊन दर्शन घेतले होते असे परमानंदच लिहितो हे मात्र बलकवडे सांगायला विसरलेले दिसतात व सरळ परशुराम हे शिवरायांचे जणू एकमेव दैवत होते असा आविर्भाव आणत धादांत खोटा इतिहास सांगतात.
दुसरे म्हणजे कोणीही इतिहासकार परमानंदकृत शिवभारताचा शिवचरित्रासाठीही विश्वासार्ह पुरावा म्हणून वापर करत नाही.. मुळात हे उपमा-अलंकारांनी सजवलेले काव्य असून महाभारताच्या प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेले आहे. अन्य कोणत्याही समकालीन साधनांत शिवरायांनी परशुरामचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळून येत नाही त्यामुळे बलकवडेंचे पत्रच मुळात अनतिहासिकतेने भरलेले स्पष्ट दिसते.
परशुरामाला आक्षेप असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची िहसक व मातृघातकी अशी जनमानसात रुजलेली खल-प्रतिमा असूनही काही विशिष्ट समाजघटक जाणीवपूर्वक त्याचे स्तोम माजवत आहेत हे आहे, पण हे लक्षात न घेता एका अनतिहासिक काव्यग्रंथाचा वापर ते परशुरामाला शिवरायांचे दैवत ठरवण्यासाठी आणि सध्याच्या वादाकडून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी, परशुराम माहात्म्य गाजवण्यासाठी करत आहेत ही बाब निषेधार्ह आहे.
संजय सोनवणी

हा घ्या शिवभारताच्या विश्वासार्हतेचा पुरावा!
'शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक' या माझ्या पत्रावर (९ जाने.) संजय सोनवणी यांनी 'शिवभारत हा ऐतिहासिक पुरावा नाही' अशी प्रतिक्रिया (लोकमानस, १० जाने.) नोंदवली आहे. या पत्रात त्यांनी शिवभारताच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेऊन कोणीही इतिहासकार या शिवभारताचा संदर्भ देत नाहीत, असे अत्यंत चुकीचे व बेजबाबदार विधान केले आहे. बहुधा हे विधान त्यांनी इतिहासाविषयीच्या अज्ञानातून केले असावे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये प्रकाशित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाच्या' प्रस्तावनेत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, 'शिवाजी महाराजांच्या आदेशाने परमानंदांनी संस्कृत चरित्र शिवभारत लिहिले आहे. खुद्द महाराजांच्या आदेशाने रचलेला हा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचे एक अतिशय विश्वसनीय असे साधन आहे. म्हणून अनेक इतिहास संशोधकांनी त्याचा गौरव केला आहे.
याच शिवभारताच्या आधारे स्वत: एक संस्कृत पंडित असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी शिवरायांवर बालपणी मातापित्यांनी शिक्षणाचे संस्कार कसे केले याची चर्चा - चिकित्सा केली आहे.'
थोर इतिहासकार देवीसिंग चौहान, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदाशिव शिवदे इत्यादी इतिहासकारांनी मोठय़ा विश्वासाने शिवभारताचे संदर्भ दिले आहेत. शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे तर शिवभारताला अत्यंत विश्वसनीय साधन मानतात.
परशुरामाविषयी शिवभारतातील उल्लेखाशिवाय शिवाजी महाराजांनी परशुराम क्षेत्राची लावून दिलेली पूजाअर्चा, नैवेद्य, नंदादीप इत्यादीची व्यवस्था, छ. राजाराम महाराजांनी दिलेली इनामाची सनद आणि शाहू छत्रपतींनी परशुराम क्षेत्राचा केलेला जीर्णोद्धार या मराठी राज्यकर्त्यांनी परशुरामावरील श्रद्धेपोटी केलेल्या गोष्टी पुरावा म्हणून सोनवणी यांना अपुऱ्या वाटत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वत: रचलेल्या 'बुधभूषण' या ग्रंथाचा अभ्यास करावा. या ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात संभाजी महाराजांनी दशावतारांना वंदन करताना भगवान परशुरामांचा केलेला उल्लेख समजून घ्यावा म्हणजे त्यांचे शंकासमाधान होईल.
पांडुरंग बलकवडे


आजच्या लोकसत्तात पांडुरंग बलकवडे यांनी माझ्या पत्राचा प्रतिवाद केला आहे. लोकशाहीमार्ग वापरुन मला शिवीगाळ न करता त्यांनी हे प्रत्युत्तर आधीच दिले असते तर निषेधाची वेळ आली नसती. असो. त्यांच्या आजच्या पत्राचा रोख परमानंद्कृत शिवभारत हे विश्वसनीय साधन आहे हे सिद्ध करण्याकडॆ आहे. त्यासाठी त्यांनी डा. जयसिंग पवार ते गजानन मेहंदळे यसंचा हवाला दिला आहे. प्रथम शिवभारतातील काही नमुने विश्वासार्हतेसाठी तपासून पाहू.
शिवाजी महाराजांनी अफक्जलखानाला जखमी करण्यासाठी बिचवा व वाघनखे वापरली, त्याचा शिरच्छेद जिवा महालाने केला हा मान्य इतिहास आहे. शिवभारतात मात्र शिवाजी महाराजांनी अफजलखानाला भवानी तलवारीने त्याच्या मस्तकाची दोन शकले करून ठार मारले असे लिहिले आहे. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा गुरु होता व नंतर तो गुरु नव्हता अशी डा. पवारांनी आपले मते बदलली ती शिवभारतामुळेच. एकच काव्य दोन पुरावे देते काय? शिवरायांच्या बाळंतपणासाठी जिजाउ नेमक्या कधी आल्या याबाबतची शिवभारतातील मते अनैतिहासिक आहे असे या काव्यग्रंथाच्या प्रस्तावनाकारानेच लिहून ठेवलेले आहे. काव्यग्रंथ इतिहासाचे मुख्य साधन नसते हे बलकवडे अद्यापही लक्षात घेत नाहीत हे दुर्दैव आहे.
दुसरे असे कि परत एकदा ते शिवाजी महाराजांचे दैवत परशुराम होते या ध्रुपदावर येतात. संभाजी महाराजांच्या बुधभुषण काव्यातील दशावतारांत परशुरामाचा उल्लेख ते छत्रपतींचे घराणे परशुरामाचे नेक भक्त होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आता परशुराम हा सहावा अवतार आहेच तर त्याचा उल्लेख दशावतारात येणारच, यावरुन संभाजी महाराजही परशुराम भक्त होते असा निर्वाळा ते कसा देवू शकतात हे त्यांनाच माहित. तसेच शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात असंख्य मंदिरांत जावून दर्शन घेतले आहे, जमीनी दान केलेल्या आहेत, अगदी याकुतबाबांनाही त्यांनी जमीनी इनाम लावून दिल्या आहेत, हे न सांगता ते फक्त परशुरामासाठी त्यांनी पुजाअर्चा-नंदादीपादि व्यवस्थेचाच तेवढा उल्लेख करतात यावरून त्यांचा कल शिवाजी महाराजांचे एकमात्र दैवत परशुरामच होते असे सिद्ध करणे हा आहे हे स्पष्ट आहे.

स्थायी समितीचे सदस्यत्व, नेहरू आणि संघी बदनामी!

भारताने आपले सदस्यत्व नाकारून चीनला स्थायी सदस्य व्हायला सहकार्य केले? सत्य नेमके काय आहे? पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे आजच्या चीनचे नाव अस...