लेखकांनी राजकीय मत ठेवू नये, ठेवत असतील तर ते आम्हाला जे आवडते तेच त्यांचे मत असले पाहिजे हा दुराग्रह गेली पंधरा-सोळा वर्ष मी पाहतो आहे. असे म्हणणार्यांसारखे मत नसेल तर वाट्टेल त्या थराला जाऊन अभिव्यक्त होणाऱ्याची निंदा करणे, शिवीगाळ करणे हा काही भाडोत्री लोकांचा छंद बनून गेला आहे.
त्यामुळेच की काय अनेक प्रसिद्ध लेखक आपले राजकीय मत व्यक्त करण्याचे टाळतात आणि आपल्याच बंदिस्त साहित्य व्युहात रममाण राहतात आणि कधी मत व्यक्त केलेच तर ते शक्यतो सत्ताधारी पक्षाच्याच बाजूचे लिहितात, मग सत्तेमध्ये यांना हिटलर, स्टालिन किंवा मुसोलिनी असला तरी काही फरक पडत नाही.
सर्वात वाईट बाब ही की काही विचारवंत देखावा करतात की ते विरोधी बाजूचे आहे पण ते शक्य तेवढे सत्ताधार्यांना मदत करण्यासाठी आपली विचारबुद्धी आणि वक्तृत्व बुद्धी वापरत असतात. असे दुर्तोंडी स्वविचारघातकी विचारवंतही आजकाल ढीगाने झालेले आहेत.
पण याच्याही पलीकडे जाऊन व्यापक समाज आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आपली मते सातत्याने मांडत असणारे काही लेखक, विचारवंत आणि कवी असतात. सामान्य असणारे नागरिक, सारे निरीक्षण करत राहतात...कधी भावनांवर वाहून जातात आणि जेव्हा सत्ता आपल्या हिताचे काहीही करत नाही हे लक्षात येते तेव्हा उद्रेकून उठतात. हा उद्रेक अनेकदा सुप्त असतो. त्यावर सर्व प्रचलित विचारप्रवाहांचा प्रभावही असतो. पण तो व्यक्त करायचा मार्ग म्हणजे मतपेटी. पण त्यातूनही आपली मते पोचायला हवीत तेथे पोचतच नाही हे हळूहळू लक्षात येऊ लागते तेव्हा मात्र हा उद्रेक रस्त्यावर येऊ शकतो. अघोषित हुकुमशाहीचा विरोध करण्याचा तोच एक मार्ग लोकांच्या हातात उरलेला असू शकतो.
धर्म आणि जात हे सामाजिक संघर्षाचे आणि राजकीय यशाचे कारण सहसा दिले जात असले तरी ते चिरकाळ टिकू शकत नाही. पोट भरू शकले तरच धर्म आणि जात आठवते. आजवर आठवत राहिली कारण पूर्वीच्या सरकारांनी सर्वांना किमान अन्न मिळावे ही खबरदारी घेतलेली होती. त्याच जीवावर धर्मोन्माद आणि जातीय संघर्ष निर्माण करण्यात भाजपाला यश मिळाले. पण ते लोकांच्या पोटाची, जीविताची आणि भविष्याची काळजी घेण्यात जसजसे अपेशी ठरू लागले तसा असंतोष वाढत गेला आहे. आणि या उत्तरोत्तर वाढत चाललेल्या असंतोषाचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे लोकांनी आक्रोश करत रस्त्यावर यावे आणि माध्यमे नाहीत तर आपल्याच आवाजात आहे त्या सरकारला जाब विचारावा. तेही शक्य झाले नाही तर सरळ आत्महत्या कराव्यात वा कोणा झुंडीचे बळी व्हावे.
भारतात हे स्वातंत्र्य पूर्व काळात घडले. आणीबाणीच्या काळातही घडले. पण ती सुस्थिती वाटावी अशी वेळ विद्यमान सरकारने आणून ठेवलेली आहे. जगातली आपली किंमत सोडा, पण भारतातील आपले कायदा, सुव्यवस्था आणि घटनात्मक मूल्यांचे स्थान काय आहे याचा गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे. देशाच्या नागरिकांत दुभंग आणि द्वेषभावना निर्माण करण्याचा चंग बांधला गेलेला आहे. आणि या भावानिद्रेकात लोकांना आपली रोज ढासळत चाललेली स्थिती विसार्वाय्ला लावण्याचा प्रयत्न होतो आहे.
मी एक लेखक आहे. राजीव गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असताना मी त्यांच्याविरुद्ध “गुडबाय प्राईममिनिस्टर” ही उपहास करणारी उपरोधिक कादंबरी लिहिली आहे. अन्नसुरक्षा बिलावरसुद्धा कोरडे ओढलेले आहेत. ही मोजकी उदाहरणे आहेत. माझ्या साहित्यात तुम्हाला ती अनेक सापडतील.
भाजप सत्तेत आली तेव्हापासून त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि परराष्ट्र नीतीवर जेथे जेथे चुका दिसल्या त्यावर आसूड ओढलेले आहेत. प्रश्न गेल्या सत्तर वर्षात काय झाले आणि काय झाले नाही हा नसून तुम्ही काय करताय हाच होता आणि आहे. मागील लोकांनी तुमच्या मते चुका केल्या तर त्या दुरुस्त करून तुम्ही नवीन इमले किती उभे केले हा आहे. ट्रोल मंडळी फेक आकडेवार्या फेकण्यात जेवढी वस्ताद आहे तेवढेच विद्यमान सरकारही आहे कारण साधे जीडीपी मोजण्याचे जुने मापदंड बदलून खोटी टक्केवारी जाहीर करण्यात हे लोक वस्ताद झालेले आहेत. भारताने जे स्थान निर्माण केले होते ते स्थान खालावत गेलेले आहे आणि याचे शर्म कोणाला वाटत नसल तर ते राष्ट्रप्रेमी कसे?
मी परदेशात स्थलांतरित होण्याच्या किमान दोन संधी आल्या असल्या तरी देश सोडण्याचा स्वप्नातही विचार केला नाही. हा देश माझा आहे. या देशातील (आज द्वेषाने माथे फिरवलेले धरून) सर्व लोक माझे बांधव आहेत. हीच प्रतिज्ञा शाळेत दिली जात असते. मी केवळ लिहिता येते म्हणून लेखक आहे. प्रथम बाब म्हणजे मी या देशाचा नागरिक आहे. आणि सर्व नागरिक गुण्या-गोविंदाने नांदावेत हे माझे एक माणूस म्हणून स्वप्न आहे. पण द्वेषाने भारावलेले लोक एका धर्माच्या लोकांना नष्ट करणे किंवा त्याना नामोहरम करणे ही स्वप्ने नुसती पाहत नाहेत तर प्रत्यक्षात तसे करण्याच्या प्रयत्नात मशगुल आहेत. गुजरातमध्ये त्यासाठीच नरसंहार केला गेलेला आहे. विद्यमान सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. हा हिटलरी कावा आहे हे लक्षात न येण्याएवढे या देशातील सारेच लोक मूर्ख नाहीत. भ्रमिष्ठावस्थाही कायम टिकून राहु शकत नाही.
मी लेखक आहे. मी माझ्या लेखणीला कधीही विकण्याचा अथवा शरण जाण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. मला विचारांचे खुले सौंदर्य हवे आहे. ट्रोलांचे आघात झाले म्हणून विचलित होणार्यांपैकी मी नाही. मी फक्त मला घाबरतो. तात्विक विवादासाठी पुढे येणार्यांचे मी स्वागतच करतो हे माझ्या विरोधकांनाही माहित आहे.
लेखक, विचारवंत किंवा समाज सेवक या देशाचेच नागरिक आहेत. “मला राजकीय मत नाही” असे जो कोणी म्हणतो तो धादांत खोटे तरी बोलत असतो किंवा त्याला “विचार” ही बाबच कोणी शिकवलेली नसते. मला राजकीय मते आहेत. ती असलीच पाहिजेत. कारण राजकीय मत असणे एक माणूस म्हणून मला नैसर्गिक अधिकार आहे. पण अमुकच मते बाळगा असे मला कोणी दटावून सांगत असेल किंवा मी कोणाला सांगत असेल तर अशा व्यक्ती लोकशाहीला लायक तर नाहीच पण ती प्रत्येक मनुष्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वावर आघात करत असते. ही अशे स्वातंत्र्य हिरावून घेणारी “समरसता” मला पूर्णपणे अमान्य आहे.
या देशातील संघर्ष नुसता राजकीय नाही तर तो प्रामुख्याने सांस्कृतिक आहे हे फारसे कोणी अजून लक्षात घेतलेले नाही. भाजपचे राजकारण संघप्रणीत असल्याने ते स्वाभाविकही आहे. गोळ्वलकर गुरुजी ते दिनदयाळ उपाध्याय हे त्यांचे मुख्य तत्वज्ञ आहेत. त्यांच्या तत्वद्न्यानाकडे नुसत्या हेटाळनीच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा त्याचा गंभीर अभ्यास केला तर हे लक्षात येईल की गेली बारा वर्ष भाजप त्यांचे तत्वज्ञान क्रमा-क्रमाने प्रत्यक्षात आणत असल्याचे दिसून येईल. मुल्सिमान्ना दुय्यम नागरिकत्व, एक देश-एक धर्म, एक देश-एक भाषा, एक देश एक निवडणूक, भारतीय संघराज्याचे स्वरूप बदलून एकाच एक केंद्र सरकार असणारे राष्ट्र, धर्मसत्तेच्या अंमलाखाली असणारी राजकीय सत्ता आणि तीही साम्राज्यवादी. संसदेत सेन्गोल आणला गेला तेव्हा तरी भारतीय विचारवन्तांचा हे लक्षात यायला हवे होते. प्रादेशिक पक्षांना सत्तेचे आमिष दाखवून फोडाफोड सुरु केली तेव्हा तर हे अधोरेखित व्हायला हवे होते. असे अनेक प्रकार झाले. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा त्यातीलच एक प्रकार. हे जेवढ्या गांभीर्याने घेतले जायला हवे होते तेवढ्या गांभीर्याने न घेता वरवरचे मुद्दे काढत विरोध केला गेला. पुढे हा विषय बारगळला असे लोकांना वाटले पण “हिंदी ही ज्ञानभाषा आहे, त्यामुळे ती शिकणे आवश्यकच आहे.” असला दिव्य शोध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावला तेथेच ही आज ना उद्या पक्की होणारी गोष्ट आहे आणि त्याच दिशेने पावले पडत आहेत हे लक्षात यायला हवे होते, पण तसे झालेले नाही.
पण ही माझी मते झाली. तुम्हाला ती मान्यच असावीत असा माझा आग्रह नाही. पण एक व्यक्ती म्हणून, एक लेखक म्हणून मला माझी राजकीय आणि सांस्कृतिक मते आहेत आणि ते बाळगण्याचा मला पुरेपूर अधिकार आहे हे तुम्हाला मान्य आहे काय?
-संजय सोनवणी


