Saturday, January 30, 2016

माणसाचा शाश्वत धर्म




ज्यालाही शारिरिक अथवा मानसिक किंवा लैंगिक हिंसेत रस असतो त्यांच्या मेंदुतील रसायनांत काहीतरी मुलभूत गडबड असते. असे लोक प्रत्यक्षात अशी हिंसा करतात किंवा स्वत:ला शक्य नसते तेंव्हा अशी कृत्ये करणा-या लोकांचे छुपे किंवा उघड समर्थक असतात. व्यक्तिगत हिंसा शक्य नसते तेथे झूंड करून हिंसा करतात. हिटलर केवढा क्रूर होता हे माहित असुनही त्याचे समर्थक जगभर कमी नाहीत. भारतातही आहेत. Polpot येथल्या लोकांपर्यंत अजून नीट पोचला नाही अन्यथा त्याचेही समर्थक येथे भराभर पैदा झाले असते. Sadist लोकांचा हा मानसिक छंद असतो आणि त्यांना खरे तर मानसोपचाराची गरज असते. भारतात आज अशा अनेक मानसोपचार केंद्रांची गरज आहे.
मनुष्याच्या अमानवीपणाला मनुष्यच वाचवू शकतो. किंबहुना आजवर माणसाची जी काही अंशता: का होईना प्रगती झाली आहे त्या मागे माणसाच्या मनात असलेल्या जन्मजात माणुसकीच्या समाजोपयोगी भावना आहेत. ती अनंत चुकांतुन अडखळत झालेली आहे. आम्ही चुका कमी करायच्या कि वाढवायच्या हाच काय तो प्रश्न आहे. मानवता राहणारच आहे. कालच्या संस्कृत्या आज नव्या रुपात का होईना साकारतच अहेत आणि उद्याही त्या कोणत्या ना कोणत्या, पण मानवतेच्या उदात्त मुल्यांच्या पायावरच उभ्या असणार आहेत.
विध्वंसकता, क्रुरता, माणसांना माणसांनीच मारण्यात विकृत आनंद शोधणा-यांचेही सहास्तित्व राहणारच आहे. खरे म्हणजे मानवी सहजीवनाच्या उपजत प्रेरणांना पुरातन काळापासून या केमिकल लोच्या झालेल्या झुंडींनी अडथळेच आणायचा प्रयत्न केला आहे. हिंसक लोकांना आदर्श मानणारे भविष्यातील हिंसक नेत्यांच्या उदयाचा पाया घातलेक्ला आहे हेही एक वास्तव आहे. माणसांना गुलाम करण्याची, स्त्रीयांना गुलाम करण्याचे भावना ही याच हिंसक मानसिकतेची परिणती आहे.
पण तरीही जीवन फुलते. तरीही प्रेमाच्या आणाभाका होतात. तरीही अजरामर मैत्रीचे बंध जुळतात. तरीही माणूस क्षमा करतो. तरीही माणसाच्या काळजात करुणेचे कोंभ फुटतात. तरीही "हे विश्वची माझे घर" अशा उदात्त भावना माणसाच्या अंतर्गर्भातून येतात. खांद्यावरून क्रुस वाहणारा म्रूत्युकडे वाट चालणारा येशू येतो तसाच सा-या मानवजातीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणारा गांधीही येतो. बुद्ध येतो तसाच महावीरही येतो. ते येतात कारण माणसाच्या मनातच मानवता आहे हे त्यांना माहित असते. त्यावरची अमानुषतेची पुटे काढण्यासाठीच काय ते आलेले असतात. ते माणसाला काहीच माणसाला माहित नसलेले नवे सांगत नाहीत. पण ते माणसाला माहित असलेले केवळ जगून दाखवतात, एवढेच!
चांगुलपणा व सौहार्दमय सहजीवन हा माणसाचा शाश्वत धर्म आहे. यत अडथळा आणत आपल्या असामाजिक भावनांना प्राबल्य देवू पाहणारे हे अधर्मी होत. हिंसेचे तत्वज्ञान हे मानवतेचे तत्वज्ञान असू शकत नाही. हिंसेचे परिप्रेक्ष न समजणे हे मानवता न समजल्याचे लक्षण आहे. मानवी प्रेरणा न समजल्याचे लक्षण आहे. असे लोक नेहमीच हरतात. गांधी आज मारुनही जीवंत असेल तर तो विजय मानवी सत्प्रेरणांचा आहे. हिंसक प्रेरणांचा नव्हे. आजही बुद्ध-महावीर-येशुची करुणामयता जीवंत असेल तर तो मानवतेचाच विजय आहे. हिटलर-पोलपोट-गोडसे भलेही काही लोकांना ग्रेट वाटो...त्यांचा पराजय त्यांच्याच विकृत नियतीने कधीच केला आहे. त्यांना भवितव्य नाही.
शेवटी ज्ञानोबा म्हनतात तेच खरे...
"खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो l
भूतां परस्परें पडो l मैत्र जीवाचें l"
आम्ही वैश्विक मित्र व्हायचे कि द्वेष्टे हे आम्हीच ठरवायचे आहे.
आणि मानवता, शांती आणि अहिंसा नेहमीच, अनेकदा हरल्यासारखी वाटूनही, जिंकते!
बापू, विनम्र अभिवादन!

Monday, January 25, 2016

Swarna Bharat Party launches new website on Republic Day

Swarna Bharat Party (SBP), India’s only liberal party, congratulates everyone on the auspicious occasion of the Republic Day, when India's liberal constitution came into effect in 1950.  
Today we must all pledge ourselves to the key objective of liberty that is embedded in the Preamble of India's constitution. It is the reason we wanted freedom from British rule - so we could live our lives as a free people. But unfortunately, the idea of liberty has long since been destroyed by successive governments in India. Today, India is one of the most unfree nations in the world on almost all comparative benchmarks.
SBP is committed to your liberty and prosperity. SBP believes that India’s colonial governance arrangements, weakened further by socialist policies, have dramatically exacerbated corruption and inefficiency in government. We no longer have basic things like security, property rights and justice.  
SBP is committed to the total reform of India’s governance system, as detailed in its manifesto. No other party has any idea of the reforms India needs in order to become - once again - the greatest nation on earth.
SBP was registered by the Election Commission as a political party in mid-2014. We are launching our new website today. Please visit http://swarnabharat.in.
We invite you to join the party. Please visit the website and register either as a member or volunteer. You can become a lifetime member on payment of a nominal fee of Rs.100. Please also donate liberally to the cause of liberty and good governance in India. 
SBP is your party, your platform to fight for your freedom and to transform India's governance.

Saturday, January 23, 2016

रोहिथ वेमुला...एक मूक्त चिंतन


माहितीच्या व प्रोपागंड्यांच्या या महाविस्फोटात कोणी सत्य शोधायला जाईल तर पदरी निराशाच पडेल. प्रत्येकजण त्यामुळे हवे तेवढेच सत्य म्हणून स्विकारतो आणि आपापले अजेंडे राबवतो. त्यामुळे एकाच घटनेचे असंख्य अर्थ घेतले जातात किंवा जाणीवपुर्वक दिले जातात. आपणच काढलेला अन्वयार्थ खरा आहे असे दावे हिरीरीने शिस्तबद्ध पसरवले जातात. यातून जे संघर्ष उभे राहतात त्यातून मुख्य घटना मात्र पोरकी होऊन बसते. तिच्या मुळ कारणांचा तटस्थ शोध घेण्याच्या फंदात कोणी पडत नाही. अजून दुसरी कोणती घटना घडत नाही तोवर हे वादळ चालू राहते नि काही दिवसांत विझतेही.

रोहिथ वेमुलाचे आत्महत्या प्रकरण कितीही गंभीर असले तरी या प्रकरणाचेही हेच होत आहे असे माध्यमांतील चर्चा पाहिल्या तर स्पष्ट होते. एकीकडे आंबेडकरवादी/बहुजनवादी आक्रोशत आहेत, हे प्रकरण म्हणजे व्यवस्थेने केलेली हत्या आहे असे म्हणत आहे तर दुसरा संघवादी गट वेमुलाला देशद्रोही ठरवण्याच्या अथक प्रयत्नात आहे. त्याला बेजबाबदार, सातत्याने विचार बदलणारा अस्थिर मनोवृत्तीचा छंदी-फंदी आंबेडकरवादी म्हणून रंगवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात पंतप्रधानांनी "भारतमातेने एक सुपुत्र गमावला..." असे विधान केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेमुलाच्या प्रेताच्या साक्षीने आपापले राजकारण साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात अशी घटना घडतेच कशी याबाबत चिंतन करण्यात व असे पुन्हा कधी होनार नाही यासाठी कायमस्वरुपी व्यूहरचना करण्यात आम्ही अपेशी ठरत आहोत ही बाब पुन्हा अधोरेखित होते आहे.

मूख्य बाब म्हणजे तरुणाईचे मानसशास्त्र आम्ही समजावून घेत नाही आहोत. तरुणाई ही बंडखोर असते, रुढतेला नाकारणारी असते. तरुणाईने व्यवस्थेच्या, परंपरांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. भारतात कोणी तरुण सावरकर-भगतसिंगांच्या क्रांतीवादी तत्वज्ञानाच्या मोहात जातो तर कोणी संघवाद, मार्क्सवाद, माओवाद व आंबेडकरवादाच्या छायेखाली जातो. गरम रक्ताच्या तरुणाईला गांधीवाद सहजी पचनी पडत नाही. भारतात तरुण कोणत्या वादाच्या आहारी जाईल हे जवळपास त्या तरुणाच्या जातीय/धार्मिक संदर्भांवर अवलंबून असते. निखळ वैचारिकतेचा पाया त्यामागे असतोच असे नाही. शिवाय ज्या महाविद्यालयात/विद्यापीठात जे जे विचारप्रवाह मजबूत असतील त्यापैकी एक तरी एखाद्याला इच्छा नसली तरी अपरिहार्यपणे स्विकारावा लागतो. एकटे पाडले जाण्याचा धोका किती तरुण पत्करू शकतात हाही अभ्यासाचा एक विषय आहे.

स्वविवेक जागा असलेले स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण या वातावरणात गोंधळून जाणे स्वाभाविक म्हणता येते. वेमुलाने आपल्या विचारधारा बदलल्या असा जो दावा केला जातो तो मुर्खपणाचा आहे. मुळात "स्वशोधाची" म्हणून जी प्रक्रिया असते त्यात "स्व" शी जवळीक साधणारे तत्वज्ञान कोणते याचा शोध घेणेही महत्वाचे बनून जाते आणि तरुणाईत तर अधिकच. खरे तर यालाच स्वातंत्र्य म्हणतात. माणसाने एकाच विचारसरणीत आयुष्यभर बंदिस्त व्हावे ही अपेक्षा करणे वेडेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मरणोत्तर वेमुलाला बदनाम करण्यासाठी त्याचे कालौघात बदललेले विचार वेठीला धरणारे मुर्ख आहेत. देशाला सुस्थितीत आणण्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवतांना एक लक्षात घ्यायला हवे कि काल जे योग्य वाटले होते त्यांनीही निराशा केली आणि आज जे योग्य वाटत आहेत तेही निराशा करत आहेत. भविष्यातले आपल्याला माहित नाही. अशा संभ्रमयूक्त राष्ट्रीय स्थितीत अनुभव्यांची जेथे पंचाईत झाली आहे तेथे जीवनाच्या प्रांगणात खुले पाऊल टाकु पाहणा-या सर्वच युवकांचे काय होत असेल याची कल्पना करुन पाहिलीच पाहिजे.

 वेमुलाने (व त्याच्या सहका-यांनी) याकुबच्या फाशीला विरोध केला म्हणून तो देशद्रोही असाही एक हिंस्त्र विचार लाटेसारखा पसरवला जात आहे. या देशात प्रत्येकाला आपले मत लोकशाही मार्गाने मांडायचा अधिकार आहे हे मात्र सोयिस्करपणे ही मंडळी विसरते. गोडसेंचे पुतळे / मंदिरे उभी करण्याची मागणी करणारे त्यांचे स्वातंत्र्य वापरत नाहीत काय? त्यांना जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य वेमुलालाही होते हे कसे विसरणार? शिवाय याकुबच्या फाशीला विरोध आणी त्याची आत्महत्या या दोन घटनांचा काय संबंध आहे? त्याची आत्महत्या ही त्याच्यासह काही विद्यार्थ्याला होस्टेलमधून काढून लावले, विद्यापीठाच्या परिसरात काही विभाग त्यांच्यासाठी बंद केले गेले, केंद्र सरकार ते विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीने आणि अभाविपने जे असह्य दबाव निर्माण केले त्यास तोंड देणे असह्य झाल्याने त्याने हार मानून आत्महत्या केली असे हाती आलेल्या सर्व माहित्यांचा आढावा घेतला तर दिसते. या दबाव आणणा-या घटकांची नि:पक्षपाती चौकशी करणे व त्याबाबतच बोलणे अभिप्रेत असता वेमुलाची बदनामी करण्याचे कारण काय? पण असे घडते आहे. वेमुलाबाबतच नाही तर गेल्या दोनेक दशकांतील घटना पाहिल्या तर असेच झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मोडस ओपरेंडी एकच आहे...पिडित मयतांना व त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करणे. त्यात ते यशस्वी होतात हेही कटू वास्तव आहे.

यातून काय साध्य करायचे आहे? विरोधी गटांत उभी असलेली तरुणाई व अनुभवी घटक यांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल हे पहायचे. संघवादी तरुणांची मानसिक ससेहोलपट शक्यतो होत नाही कारण ते नुसते एका विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात असे नाही तर त्यांच्या मागे शक्तीशाली शिस्तबद्ध काम करणारी यंत्रणा उभी आहे. अशी यंत्रणा दुस-यांकडे नाही ही कटू वस्तुस्थिती आहे. मार्क्सवादाची लय कधीच विरलेली आहे. आंबेडकरवादी आज केवळ प्रतिक्रियावादी व विखुरलेले आहेत व तो केवळ भावनिक आहेत. वैचारिक गंभीर पाया त्यांनी कधीच गमावला आहे. अन्य हिंदू बहुजनांना आंबेडकरवाद आजच्या आंबेडकरवाद्यांमुळेच फारसा स्विकारार्ह नाही असे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे ते एकतर संघवाद्यांच्या कळपात जातात किंवा स्वजातीय संघटनांत अथवा कळपांत आपले अस्तित्व जपतात. सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ व्यापक होण्याऐवजी ती आक्रसत चालली आहे. बाबासाहेब म्हणाले होते, जोवर सामाजिक स्वातंत्र्य येत नाही तोवर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही आणि नेमके हेच आंबेडकरवादी विसरले आहेत.

जातीयवादाविरुद्ध बोलतांना, दुस-यांना त्यासाठी जबाबदार धरतांना, आम्ही आमची जात सोडायचा यत्किंचितही प्रयत्न करत नसू... तर आम्ही आंबेडकरवाद त्यागला आहे असेच म्हणावे लागेल. आम्हाला नीट राष्ट्रव्यापी सम्यक विचारधारेचे संघटन करत संघाला वैचारिक व सांस्कृतिक तोंड देता येत नसेल तर आंबेडकरांचा बुद्धीवाद, फुल्यांची बंडखोरी आम्हाला मान्य नाही असेच म्हणावे लागेल. खरे तर आज आंबेडकरवाद एकाकी पडत आहे काय यावर नव्याने चिंतन करावे लागेल. जाते/धर्म निरपेक्ष मानवतावादी राष्ट्रव्यापी, राजकारण निरपेक्ष संघटन करावे लागेल...आणि तरच आम्ही वेमुलासारख्या विद्यापीठांत झालेल्या अनेक आत्महत्यांना न्याय देवू शकू आणि पुन्हा अशा आत्महत्या होणार नाहीत याची दक्षता घेऊ शकू!

अन्यथा...अजून एक घटना....तेच निषेध...तेच मोर्चे....सोशल मिडियावर एकाहुन एक तीव्र आवेगातले आक्रोश...एवढेच घडत राहील...बाकी काही नाही!

Saturday, January 16, 2016

संमेलनाध्यक्षांची साहित्यिक यत्ता कोणती?


***संजय सोनवणी****
मराठी साहित्यात चैतन्य सळसळेल असे वातावरण निर्माण व्हावे हे संमेलनाचे खरे कार्य होय. अध्यक्ष या चैतन्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्याने तमाम साहित्यिकांना आणि वाचकांना साहित्याकडे पाहण्याची नवदृष्टी दिली पाहिजे. साहित्याची इयत्ता कशी उंचावेल, नवविचारांना कसे धुमारे फुटतील हे त्याचे कार्य असते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जीवन गौरव पुरस्कार नव्हे, तर जबाबदारीचे कार्य आहे याचे भान असले पाहिजे. परंतु गेल्या काही दशकांत हे झाल्याचे दिसत नाही.
नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीसांच्या पंतप्रधानांबाबतच्या एकेरी आणि अवमानजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य संस्कृती, मराठी भाषेच्या संदर्भातील अनेक प्रश्न, ओस पडत चाललेल्या मराठी माध्यमाच्या शाळा, साहित्यासमोरील आधुनिक काळातील आव्हाने वगैरे मराठी साहित्य संस्कृतीशी निगडित प्रश्नांची चर्चा न होता सगळीच चर्चा साहित्यबाह्य विषयावर घसरल्याचे चित्र आहे.
डॉ. आनंद यादव हे महाबळेश्वर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असता, त्यांच्या 'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीमुळे प्रचंड वादळ उठले होते. त्यांना ती कादंबरी तर मागे घ्यावी लागलीच, वारकऱ्यांची माफीही मागितली, तरीही ते महाबळेश्वरला जाऊन अध्यक्षीय भाषण देऊ शकले नव्हते. अध्यक्षाविना संमेलन भरवायची नामुश्की साहित्य महामंडळावर ओढवली होती. तरीही तो एक साहित्यिक वाद होता. संतांचे चारित्र्यहनन झाले की नाही, साहित्यिकांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे की नाही याभोवती तो वाद केंद्रित होता. या वादाचा निर्णय न्यायालयानेच केल्याने हा विषय बंद पडला असला, तरी साहित्य संमेलनाच्या परंपरेला गालबोट लागलेच होते, हे विसरता येणार नाही.
सबनीसांची बाब मात्र पूर्णतः वेगळी आहे. ते भारत-पाक संबंध अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कोणत्याही प्रकारचे भाष्यकार अथवा अभ्यासक नाहीत. त्यांनी या दिवाळीत किस्त्रीममध्ये पंतप्रधान मोदींवर एक मोठा लेख लिहिला व त्यांच्या 'पंचशील' धोरणाचे भरभरून कौतुक केले, एवढेच काय ते त्यांचे या संदर्भातील लेखन. गोध्रा अथवा त्यानंतर उसळलेल्या गुजरातमधील हिंस्र दंग्यांबाबत त्यांनी समर्थन अथवा विरोधाचे त्या वेळेस कधी वक्तव्य केलेले नाही, लिहिण्याची बाब तर दूरच. पंतप्रधानांनी 25 डिसेंबरला अचानक पाकिस्तानात उतरत नवाज शरीफ यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप उघड केला गेलेला नाही. या संदर्भात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अचानक पंतप्रधानांवर हल्ला होऊ शकत होता (जे शक्यच नव्हते) अशी भीती सबनीसांना वाटून ते काळजीने बोलले असतील, असा तर्कही एकवेळ करायला हरकत नाही. किंबहुना नरेंद्र मोदी यांच्यावर व त्यांच्या सरकारच्या धोरणांवर टीका, चिकित्सा अथवा स्तुती करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहेच. परंतु, तसे करत असताना आपण कोणती भाषा वापरतो याचे भान ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यही आहे. त्यात सबनीस हे आता केवळ एक व्यक्ती नसून तमाम मराठी साहित्यिकांचे व साहित्य रसिकांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी होती. पण त्यांनी अत्यंत सवंगपणे, एकेरी भाषेत कोणते मोदी मान्य, कोणते अमान्य व 'पाकिस्तानात कशाला मरायला गेले?' ते 'जगभर बोंबलत हिंडतात' अशी विधाने केली. ते मराठवाडयासारख्या ग्रामीण भागातून आल्याने त्यांनी अशा भाषेत वक्तव्ये केली, हे लंगडे समर्थन येथे कामाला येत नाही. ते साहित्यिक आहेत आणि भाषा म्हणजे काय हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.
यानंतर वादळ उठले. भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, संमेलन उधळायच्या धमक्या दिल्या व या प्रश्नाला राजकीय स्वरूप आल्याचे दिसू लागले, जे चुकीचेच होते. कायदेतज्ज्ञ संजीव पुनाळेकर यांनी त्यांना टि्वटरवरून सकाळी फिरायला जायचा सल्ला दिल्याने, त्यात खुनाची छुपी धमकी ध्वनित होत असल्याने, त्यावरही वादंग उठले. फोनवरून काही भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्याने त्यांच्याविरुध्दही गुन्हे दाखल झाले. सध्या सबनीसांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या बाबी टाळायला हव्या होत्या. सहिष्णुतेचा प्रश्न आज ऐरणीवर आहे, त्यात तेल ओतायचे काम करत हिंस्रता दाखवण्याची यत्किंचितही आवश्यकता नव्हती. सबनीस जेवढे चूक होते, त्यापेक्षा ही गंभीर चूक आहे याची नोंद भाजपा नेत्यांनी घेतली पाहिजे.
या सगळया बाबींचा साहित्य संस्कृतीशी काडीइतकाही संबंध नाही हे उघड आहे. किंबहुना आमची साहित्य संस्कृती व राजकीय संस्कृतीही रसातळाला पोहोचली असल्याचे चित्र यातून निर्माण झाले आणि हीच बाब नेमकी चिंता करण्यासारखी आहे. किंबहुना साहित्य संमेलन आणि साहित्य याचा काही संबंध उरला आहे की नाही, हाच प्रश्न आपल्याला पडावा व अशी संमेलने यापुढे असावीत की नसावीत यावरही गंभीर चिंतन करणे गरजेचे झाले आहे.
संमेलनाध्यक्षांची साहित्यिक यत्ता कोणती, हा प्रश्न यंदा तर प्रकर्षाने सामोरा आला. राजेंद्र बनहट्टी संमेलनाध्यक्ष झाले होते, त्या वेळीही हा प्रश्न उद्भवला होताच. सुमार दर्जाचे पण हजारभर मतदारांपैकी पाचेकशे मतदार ताब्यात घेतले की कोणीही अध्यक्ष होऊ  शकतो, हे वास्तव आहे. घटक संस्थाच यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे कोणाला मत द्यायचे याचे मतदारांनाही स्वातंत्र्य असतेच असे नाही. साहित्य संमेलने ही हळूहळू साहित्य संमेलनाच्या अध्यक्षासाठी नव्हे, तर आयोजक, संस्थाप्रमुखांना मिरवण्याची एक सुवर्णसंधी म्हणून साजरी केली जात आहेत, असेही चित्र आपल्याला दिसेल. साहित्यिक खुजे होत जातात, आयोजक मात्र बलाढय बनत जातात.. की मुळातच साहित्यिक खुजे आहेत म्हणून असे होते?
स्वतंत्र विचार, भाषा-संस्कृती याबाबत नवी दिशा देण्याची हिंमत व प्रतिभा, नवप्रतिभांना प्रोत्साहन देत त्यांच्यातूनही भविष्यातील उंचीचे साहित्यिक घडवता येण्यासाठीचे तत्त्वज्ञान देता येऊ शकणारे साहित्यिक सध्या किती? हा खरा प्रश्न आहे. खरे म्हणजे सर्व खुजी टेकाडे आहेत व त्या टेकाडांमध्ये कोण 

अधिक उंचीचे, अशा स्पर्धा लागल्या आहेत. प्रत्येक साहित्यिक, विचारवंत, समीक्षक हा कोणत्या ना कोणत्या कंपूत सामील आहे. हे कंपू कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांशी 'जुळवून' आहेत. तात्पुरते लाभ, पदे, मंडळांवरील नियुक्त्या यासाठी ते आपली प्रतिभा अधिक खर्च करतात. 'यंदा मला अध्यक्ष होऊ द्या... पुढच्या वर्षी मी तुला पाठिंबा देतो' या व्यावहारिक तडजोडी बिनदिक्कतपणे केल्या जातात. महामंडळाच्या घटक संस्थांच्या - बिनडोक, असाहित्यिक असले, तरी - प्रभावी व्यक्तींशी लाचारपणे संबंध वाढवले जातात. मतदार नवलेखकांचे साहित्य भिकार असले, तरी त्यांना स्तुतीच्या भाराखाली गुदमरवले जाते. त्यात परखड समीक्षा नसतेच. अशा परिस्थितीत नवसाहित्यिक कसा घडणार?
साहित्यिकांची ही प्रवृत्ती का बनते आहे? खरे म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी लेखक अभावानेच तळपले आहेत. यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता येईल, अशी मुळात यांच्यात क्षमताच नाही. त्यामुळे समाजमनावर या साहित्यिकांचा कसलाही प्रभाव नाही. किंबहुना त्यांना हे साहित्यिक/समीक्षकच माहीत नाहीत. माहीत करून घ्यायची गरजही वाटत नाही. 'कोण हे श्रीपाल सबनीस?' हा प्रश्न निवडीनंतर वाचकांनीच उपस्थित केला, यातून ही बाब अधोरेखित व्हावी.
साहित्य संमेलनाचे जे अध:पतन होत चालले आहे, त्याचे मूळ साहित्यिकांच्याच अध:पतनात आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. आडातच नाही, तर पोहऱ्यात येणार कोठून? आणि उथळांकडून तुम्ही कोणत्या अपेक्षा बाळगणार आहात?

मराठी साहित्यात चैतन्य सळसळेल असे वातावरण निर्माण व्हावे हे संमेलनाचे खरे कार्य होय. अध्यक्ष या चैतन्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्याने तमाम साहित्यिकांना आणि वाचकांना साहित्याकडे पाहण्याची नवदृष्टी दिली पाहिजे. साहित्याची इयत्ता कशी उंचावेल, नवविचारांना कसे धुमारे फुटतील हे त्याचे कार्य असते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जीवन गौरव पुरस्कार नव्हे, तर जबाबदारीचे कार्य आहे याचे भान असले पाहिजे. परंतु गेल्या काही दशकांत हे झाल्याचे दिसत नाही. संमेलने उत्सवीही न राहता बाजारू बनली आहेत. आता बाजारूपणात सवंगता घुसल्याने यापेक्षा अधिक अध:पतन ते काय होणार, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
खरे तर असल्या अध्यक्षांमुळे नाउमेद व्हायचे कारण नाही. खंद्या, लिहित्या आणि भव्य-दिव्यतेचा सोस असणाऱ्या साहित्यिकांनी एकवटायला हवे. भले ते मूठभर असतील. त्यांनाच आता साहित्य संमेलनांना दिशा देण्याचे, निवडणूक पध्दतीत सुधारणा घडवून आणण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. सामान्य वाचकसुध्दा मतदार कसा बनेल हेही पाहावे लागेल. सध्याचे मतदार आणि त्यांची कालबाह्य मतदान पध्दत बदलत सर्वांना ऑनलाईन मते देता आली पाहिजेत, तरच साहित्य संमेलन खरोखर लोकांचे बनेल. हजारभर मुखंडांचे व त्यांच्यावर अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या असाहित्यिक प्रवृत्तींचे उच्चाटन त्याखेरीज होणार नाही.
त्यामुळे संमेलन नको म्हणण्यापेक्षा संमेलनाची सर्वच कार्यपध्दती आमूलाग्र बदलावी. ते होत नाही, तोवर साहित्य संमेलन न घेतले तरी काही बिघडणार नाही; कारण मुळात अशी संमेलने काही देतच नसतील, तर ती भरवून तरी काय उपयोग?


Wednesday, January 13, 2016

मनुस्मृतीचा भुगोल

कोणता ग्रंथ कोणत्या भुभागात लिहिला गेला आणि त्या ग्रंथकर्त्याला कोणता भुगोल माहित होता यावरून अनेक महत्वाच्या बाबींचा उलगडा होतो. त्यात हा धर्माशी निगडित ग्रंथ असेल तर धर्मेतिहासाच्या दृष्टीने त्याचे महत्व अजुनच वाढते. मनुस्मृती हा ग्रंथ धर्माज्ञा, धर्मनियम आणि समाजव्यवहाराशी निगडित आहे. कोणताही धर्माज्ञा देणारा ग्रंथ या धर्माज्ञा अर्थातच आपला धर्म मानणा-या लोकांसाठी देणार हे उघड आहे. ज्या भागात हा धर्म प्रबळ अथवा उदयोन्मूख आहे त्या भागातील आपल्या धर्मियांसाठीच या आज्ञा विहित असतील हेही उघड आहे. आणि ग्रंथकर्त्याला ज्ञात असणारा भुगोल या परिप्रेक्षातच पहावा लागेल हेही तेवढेच सत्य आहे.

पुरातन काळात भुगोलाचे माणसाचे ज्ञान मुळात अल्प होते. राष्ट्र ही संकल्पना उदयाला आलेलीही नव्हती. माणसाला दुरच्या भुगोलाची माहिती त्याला भटक्यांकडून, प्रवाशांकडून अथवा व्यापा-यांकडून मिळायची आणि स्थानिक माणूस तिचे मिथकीकरण करत वापरायचा हे आपणास माहितच आहे. ग्रंथकर्ता आपले स्थान हे पृथ्वीचा मध्यबिंदू मानत असे. इजिप्शियन लोक मेंफिसलाच प्रुथ्वीचा केंद्रबिंदू मानत तर आर्यभट उज्जैनीला तसा मध्यबिंदू मानत असे. ते त्या काळातील भुगोलाच्या अज्ञानचा भाग म्हणून पाहता येते.

मनुस्मृती "हिंदू" धर्माचा धर्मनियमांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ असल्याचा आपला समज असल्याने आपण आधी मनुस्मृतीचा भुगोल काय होता हे मनुस्मृतीच्याच आधाराने समजावून घेवूयात.

१) सरस्वती आणि दृषद्वती या देवनद्यांमधील भाग हा देवनिर्मित ब्रह्मावर्त म्हणून ओळखला जात असून हजारो पिढ्यांपासून येथील माणसांचे/ ऋषींचे वर्तन सर्वात सद्गुणी समजले जाते. (म. २.१७-१८)

२) ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात. (म. २.१९)

३) या प्रदेशात जन्मलेल्या ब्राह्मणापासून पृथ्वीवरील अन्यांनी शिकावे. (म. २.२०)

४) हिमवत आणि विंध्याच्या दरम्यान पसरलेला प्रदेश, प्रयागच्या पुर्वेकडे आणि विनशनाच्या पश्चिमेकडे पसरलेल्या प्रदेशाला मध्य देश म्हणतात. (म. २.२१)

५) पण या दोन पर्वतांच्या मधील प्रदेश (हिमवत आणि विंध्य) अणि पुर्व व पश्चिमेकडील समुद्र यामधील प्रदेशाला शहाणी माणसे आर्यावर्त म्हणतात. (म. २.२२)

६) असा प्रदेश जिथे  काळविटे मुक्तपणे विहार करतात तोच प्रदेश यज्ञासाठी (यज्ञिय देश) योग्य होय. जेथे नाहीत ते प्रदेश म्लेच्छांचे प्रदेश होत. (म. २.२३)

७) द्विजांनी फक्त हाच देश असून प्रयत्नपुर्वक तेथे रहावे. शूद्र मात्र कोठेही असू शकतात. (म. २.२४)

हे मनुस्मृतीत येणारे स्मृतीतील स्मृतिकर्त्याला ज्ञान असलेल्या भुगोलाचे वर्णन. यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.

सरस्वती व दृषद्वती नद्यांच्या मधल्या भागात राहणारे लोक हे स्मृतीकर्त्याच्या दृष्टीने सर्वार्थाने आदर्श आहेत. सरस्वती व दृषद्वती या नद्यांना स्मृतीकर्ता देवनद्या म्हणतो तर यामधील भुभागाला तो देवाने निर्माण केलेला प्रदेश म्हणतो. या प्रदेशाला तो ब्रह्मावर्त असेही नांव देतो. त्यानंतर हा स्मृतीकर्ता "कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." असेही म्हणतो म्हणजे स्मृतीकर्त्याच्या दृष्टीने कुरु-मत्स्यादि प्रदेश हे ब्रह्मावर्ताच्या खालोखाल महत्वाचे आहेत. सरस्वती नदी हरक्सवैती या नांवाने आजही अफगाणिस्तानातून वाहते व तोच ब्रह्मावर्त होय, तर कुरु पांचाल भाग हा ब्रह्मर्षींचा भुभाग होय हे येथे लक्षात घ्यावे लागते.

यातील गंमत अशी कि घग्गर नदी म्हणजे सरस्वती मानली तर ही नदी कथित कुरु प्रदेशामधोमध वाहते. पांचाल-मत्स्य अधिक पुर्वेला आहे. खालील नकाशा पाहिला तर लक्षात येईल.

 


बरे भारतात सरस्वतीबरोबरच दृषद्वतीसारखी "देवनदी" वाहत होती याचा पुरावा नाही. घग्गर नदी गेली हजारो वर्ष मोसमी पावसावर अवलंबून असलेली नदी आहे हे पुरातत्वीय व भुगर्भीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. दृषद्वती नदी कोणती हे आजतागायत सिद्ध झालेले नाही.

माणुस लिहितांना स्मृतीरंजनामुळे गतकाळातील स्मृतींतील प्रदेश व तेथील लोक यांचे उदात्तीकरण करतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. आपले पुर्वज हे देवसमान व ते राहत होते ते देवानेच बनवलेले प्रदेश अशी प्रवृत्ती या मनुस्मृतीतील श्लोकात दिसते. हा प्रदेश भारतातील नाही हे मनुच लगोलग पुढच्या श्लोकात सिद्ध करतो.

मनू म्हणतो, "ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." (म. २.१९). घग्ग्गर नदी कुरु प्रदेशातुनच वाहते. पांचाल तर खूप पुर्वेला गेला. शौरसेनक हा मथुरेनजिकचा प्रदेश आहे तर मत्स्य प्रदेश कोणता याबाबत अजून विद्वानांत मतभेद आहेत. तो बहुदा राजस्थान असावा असा एक कयास आहे. असे म्हटले तरी घग्गर नदी कुरू प्रदेशातून वाहते व राजस्थानात जाते हे वास्तव आहे. दृषद्वती नदी कोणती याचा अता-पता नाही. सरस्वती व दृषद्वती नांवाच्या कोणत्याही नद्या भारतात अस्तित्वात नाहीत. किंबहुना स्मृतीकर्त्याने वैदिक लोक जेथून आले होते त्या भागातील नद्यांच्या प्रदेशात (दोआबात) राहणा-या आपल्या पुर्वजांचे स्मरण यातून ठेवले. कारण मनुस्मृती पुढे लगेच म्हणते, कि "ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात."  (म. २.१९)

कुरु हा वैदिक धर्मप्रसारकांचा दुसरा थांबा होता हे मी आधीच स्पष्ट केले आहे. "The Hymns of the Rigveda" या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ग्रिफिथनेही हेच विधान केले आहे. मनुस्मृतीचा जोही कोणी ग्रंथकार होता (ते किमान तीन असावेत, पण याबद्दल पुढे) त्याचा मुळचा प्रदेश कुरु हाच असावा याचे पुरावे मनुस्मृतीच देते. पांचाल, मत्स्य व शौरसेनक प्रदेश हेही भौगोलिक दृष्ट्या निकट असल्याने त्याने त्यांचेही नांव घेतलेले आहे. हा भुगोल छोटा तर होताच पण तेथे फक्त वैदिक रहात नव्हते हेही मनुस्मृतीवरुनच स्पष्ट होते. किंबहुना वैदिकेतरांचा परिघ हा त्यांना ज्ञात असलेल्या भुभागांत विस्तृत होता हेही दिसते.

मनुस्मृतीत कीकट म्हणजे बिहारचा उल्लेख नाही. कीकट हा प्रदेश वैदिकांच्या दृष्टीने त्याज्ज्यच होता. पुर्वेचा व पश्चिमेचा उल्लेख होतो पण त्या विस्तृत प्रदेशातील एकाही राज्यनामाचा उल्लेख येत नाही. एवढेच नव्हे तर विंध्य पर्वताचा उल्लेख असला तरी त्याच्या अलीकडच्या प्रदेशांचाही भौगोलिक उल्लेख नाही. विंध्याच्या दक्षीणेकडे काय हे तर बहुदा ऐकिवातही नसल्याने तिकडील प्रदेशांचाही उल्लेख नाही.

वैदिकेतर लोक, म्हणजे म्लेंच्छ (शूद्र) त्यांना ज्ञात असलेल्या भुभागात प्रत्यक्ष व ऐकिवातले त्यांना माहित होतेच हेही स्पष्ट दिसते. किंबहुना वैदिकांचा स्मृतीकाळे प्रदेशातील उपप्रदेश हेच स्थान कसे होते हेही दिसते. "असा प्रदेश जिथे  काळविटे मुक्तपणे विहार करतात तोच प्रदेश यज्ञासाठी (यज्ञिय देश) योग्य होय. जेथे नाहीत ते प्रदेश म्लेच्छांचे प्रदेश होत." (म. २.२३)

काळविटे हिंडतात असे प्रदेश म्हणजे अरण्यमय वा कुरणांचा प्रदेश होय हे उघड आहे. वैदिक लोक ग्रामनिवासी होते हे ब्राह्मण ग्रंथांवरुनही दिसून येते. मनुस्मृतीतही ग्रामाचेच महत्व आहे. नागर संस्कृतीशी, जी म्लेंच्छ अथवा शूद्रांची होती, त्यांशी त्यांचा संपर्क तसाही कमीच असे. म्हणजेच ज्ञात भुगोलातही त्यांचे अस्तित्व तुरळक होते. इतर भागांत (धर्म वेगळा असल्याने) त्यांना कोणी यज्ञ करु देत नव्हते. (म्हणजेच तेथील लोक वैदिक धर्मानुयायी बनत नव्हते). त्यामुळे द्विजांनी आपला प्रांत सोडू नये असेही मनुस्मृती स्पष्ट करते.

येथे म्लेंच्छ आणि शूद्र या शबदामधील घोळ पाहू. म्लेंच्छ हा शब्द मेलुहा (किंवा मेलुखा) या शब्दाचा वैदिक अपभ्रंश कसा आहे हे बी.बी. लाल यांनी दाखवून दिलेले आहे. शूद्र या शब्दाची कोणत्याही भाषेत आजवर व्युत्पत्ती सापडलेली नसल्याने हा कशाचा अपभ्रंश आहे हे आपल्याला आजही माहित नाही. समजा वैदिक लोकांनी आपल्या भाषेत, वर्णव्यवस्थेत चवथा वर्ण म्हनून हे नांव दिले असते तर त्या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थही त्या भाषेतच असायला पाहिजे, पण तसेही नाही. याचाच अर्थ म्लेंच्छ किंवा शूद्र हे वैदिक धर्मियांच्या कक्षेबाहेर होते. त्यामुळेच वैदिक लोक त्यांच्यापासून दूर रहायचा आटोकाट प्रयत्न करत असे दिसते.

आर्यावर्ताची वैदिकांची मनुस्मृतीतील व्याख्या ही आजच्या वैदिकवाद्यांच्या "अखंड हिंदुस्तान" च्या व्याख्येएवढीच बालीश होती हे मनुस्मृतीवरुनच दिसते. मनुस्मॄतीला विंध्याचा दक्षीणेकडील भुभाग माहित नाही. बिहार (कीकट) ते  पुर्वेकडील प्रदेश माहित नाहीत. जे माहित आहेत ते कुरु प्रांताच्या परिघातील. ते स्वाभाविक असले तरी मग प्रश्न निर्माण होतो तो असा कि:

एका मर्यादित प्रदेशात निर्माण झालेली, तेथीलच लोकांसाठी लिहिली गेलेली एक धर्मनियमावली सर्व देशातील माणसांची कशी? नंतर झाली असेल तर सर्वांचे (सर्वांचे हा शब्द लक्षात घ्या) धर्मांतर कधी आणि कसे झाले? आणि काही तोकड्या लोकांचे जरी झाले असेल तर इतरांचा धर्म स्वतंत्र होता आणि आहे असेच नाही कि काय?

वास्तव हे आहे कि मनुस्मृती ही समग्र हिंदुंसाठी नव्हती. असुही शकत नव्हती. ती केवळ वैदिकांसाठीची आचार-धर्म संहिता होती. हिंदुंनी तिचा बाऊ का म्हणून केला? 

Tuesday, January 12, 2016

साहित्य संमेलन कि दांभिकांची जत्रा?

"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे?" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली आहे. साहित्यिक (साहित्यासंदर्भात...व्यक्तिगत नव्हे) वाद-विवाद, साहित्यसंकल्पनांबद्दल घनघोर चर्चा, सामाजिक प्रश्नांना साहित्यविश्वाशी जोडत चिंतनात्मक मंथन साहित्य संमेलनामुळे घडावे अशी अपेक्षा ठेवावी अशी आजकाल परिस्थिती उरलेली नाही. उलट साहित्यबाह्य कारणांनीच साहित्य संमेलने गाजत आली आहेत. साहित्य जाणीवा त्या वादांत वाहून गेलेल्या दिसत आहेत. तरीही मागची काही संमेलने सर्वच उमेदवारांच्या समजुतदारपणामुळे आतापर्यंत तरी कसल्याही चारित्र्यहननांच्या वादांच्या भोव-यात सापडलेले नाही हे नक्कीच अभिनंदनीय आहे. पण असे असले तरी ज्यासाठी साहित्य संमेलन भरवले जाते त्या साहित्याचे काय? एकुणातील साहित्यव्यवहार ज्याच्या पायावर उभा असतो त्या वाचकांचे काय? आणि जे संमेलनांचे अध्यक्ष होतात ते जर छद्मसाहित्यिक असतील, त्यांच्याच विचारांत/साहित्यात उंची खोली वगैरे नसेल तर मग त्याचेही काय? हे प्रश्न गंभीर आहेत. मला वाटते, यावर आपल्याला कोठेतरी तटस्थपणे विचार करायला हवा.
साहित्य संमेलन म्हणजे उत्सव अशी काहीतरी कल्पना आयोजकांपासून ते सहभागकर्त्यांची झालेली आहे. उत्सव म्हटला कि त्यात फारसा गंभीरपणा आणायची गरज नसते. पण उत्सव म्हणजे जत्राही नव्हे याचे भान आपल्याला आहे काय? साहित्याचा उत्सव साहित्याच्या किमान इतमामात तरी साजरा करावा कि नाही? कि हा काहींच्या (विशेषत: संयोजकांच्या) मिरवण्यासाठी आयोजित केलेला उत्सव आहे? कोठे संमेलनांच्याच अध्यक्षांना डावलले जाते तर कोठे मी अपमान सहन करणार नाही अशा फुकाच्या गर्जना आधीच एखादा नियोजित अध्यक्ष करतो. पण मुळात संमेलनाध्यक्षांची पत्रासच उरलेली नाही हे कोण पाहणार? त्याला अध्यक्षच जबाबदार नव्हेत काय? आदराने कोणाचेही शिर झुकेल अशी तपश्चर्या करत साहित्यात किंवा समीक्षेत किंवा सामाजिक विचारांत अशी कोणती भर अलीकडच्या (सदानंद मोरेंचा अपवाद वगळता) कोणत्या अध्यक्षाने घातली आहे हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देतांना खुद्द त्या त्या अध्यक्षाचीच पंचाईत होईल.
याचे कारण असे आहे कि मुळात या मंडळीला मुळात साहित्याशी घेणे नाही. त्यांची नाळच मुळात अहंभावी, मिरवू वृत्तीत दडलेली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कारासारखाच त्यांना वाटू लागला आहे. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी करावी लागणारी पण आवश्यक नसलेली लाचारी करायला यांना कसलीही शरम वाटत नाही. भले भले राजकारणी लाजतील असे राजकारण हे करु शकतात. त्यामुळ३ए त्यांना साहित्यविषयक आपल्या जाणीवा काय आहेत, भविष्यातील मराठी साहित्य, वैचारिकता यांना दिशा दाखवण्याचे जे काम आहे ते तर अस्पर्शीच राहते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कार नसून साहित्य-संस्कृतीच्या सर्व प्रवाहांना एका सूत्रात बांधत पुढील दिशादर्शक कार्य करण्यासाठी असते. साहित्य संमेलन हा केवळ उत्सव नसून व्यापक विचारमंथनाचे शिबीर आहे व ते वर्तमान व भविष्यातील साहित्यिक व साहित्यरसिकांसाठीचे एक उर्जाकेंद्र बनावे यासाठी प्रयत्न करायचा असतो हे यांना कधी समजणार? अध्यक्षपद हा केवळ सन्मान नसून जबाबदारी आहे याचे भान आताच्या आणि भविष्यातल्या अध्यक्षांना आणि संयोजकांना कधी येणार?
साहित्य संमेलनांबाबत केवळ वाचकच नव्हे तर अनेक मतदारच उदासीन असल्याचे चित्र दिसून आले आणि याचे कारण ज्यासाठी म्हणून संमेलन हवे तेच संमेलनात नेमके होत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. यातील सर्वात चिंतीत करणारी बाब म्हणजे तरुणांना तर साहित्य संमेलनाचे कसलेही आकर्षन उरलेले दिसत नाही. एक तर त्यांच्या अभिव्यक्तीला पुरेसे अवकाश सम्मेलन उपलब्ध करून देवू शकलेले नाही. ते नसेल तर नसो पण किमान युवा साहित्यिकांच्या प्रेरणांना, नवनवीन साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचे व त्यावर व्यापक चर्चा घडवण्यातही संमेलन आजवर पुढाकार घेवू शकलेले नाही. साहित्य संमेलनातून काहीतरी दिशादर्शक प्रेरणा मिळाव्यात अशा लेखकांच्या अपेक्षा असतील तर त्यांना वावगे कसे म्हणता येईल? भविष्यातील प्रतिभांना जर आम्ही संमेलनातून अवकाश देवू शकत नसू, त्यांचे साहित्यिक विश्व विस्तारायला प्रोत्साहन देत नवी क्षितीजे देत नसू आणि तरुण लेखकच जर साहित्य संमेलनापासून काही मिळू शकण्याच्या स्थितीत नसतील तर ते तिकडे का फिरकतील?
ते जाऊद्या, मराठी साहित्यात काहीतरी भव्य दिव्य घडते आहे व आपण त्याशी जुळलो गेलो पाहिजे ही आत्मियतेची भावना निर्माण करण्यात आम्हाला अपयश येत असेल तर भविष्यात मराठीला वाचक राहील कि नाही हा प्रश्न उद्भवणारच! जागतिकीकरणाच्या लाटेनंतर परंपरागत संस्कृती आणि जागतीक संस्कृतीचे प्रवेशत असणारे वेगवान प्रवाह यांतील आंतरसंघर्षामुळे आपण सारेच एकार्थाने सांस्कृतीक पडझडीच्या कालखंडात येऊन ठेपलो आहोत. आजचा तरुण वर्ग मालिकांच्या वा जाहिरातींच्या कचकड्याच्या जीवनदर्शनाला संस्कृती समजू लागल्याने व त्याच वेळीस कठोर वास्तव अनुभवास येत असल्याने अस्वस्थ आहे. त्याला सांस्कृतिक व भावनिक आधार देवू शकेल असे साहित्य क्वचितच दिसते. दुसरीकडॆ सर्व समाजांमद्धे आज शिक्षणामुळे अभिव्यक्तीचीही आस बळावत आहे...पण तिला दिशा देवू शकेल आणि त्या अभिव्यक्तीला वैश्विक साहित्याचे रूप देवू शकेल असे सकारात्मक सांस्कृतीक व सामाजिक वातावरण आपल्यात आज तरी नाही. आपल्याला संस्कृतीचीच एकुणातच फेरमांडणी करावी लागनार आहे. पण यासाठी गंभीरपणे अखिल भारतीय म्हणवणा-या मुठभरांच्या संमेलनात जर गांभिर्याने कधी साधी चर्चाही होत नसेल तर काय करायचे?
आज आपण पाहतो कि सर्वशिक्षण अभियानामुळे शिक्षितांचे प्रमाण जवळपास सर्वच समाजघटकांत वाढू लागले आहे. या समाजांतील सर्जनशील प्रतिभा लिहू लागल्या आहेत, अभिव्यक्त होवू लागल्या आहेत. एका अर्थाने हे नवजागृतीचे वारे आहे. स्वागतार्ह आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वच समाजघटकांच्या जगण्याचे संदर्भ बदलत असलेले आपल्याला ठळकपणे दिसते. त्यातून निर्माण होत असलेल्या आजवर अपरिचित असलेल्या समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत. त्यांवर उत्तर शोधणे हे सर्वच प्रतिभाशालींचे काम आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे नवप्रतिभांना जातीय अथवा वर्गीय चौकटीत न अडकावणे यासाठी संपुर्ण साहित्यविश्वानेच सजग रहायला हवे. परंतू आपण पाहतो कि दुर्दैवाने या दिशेने आजवर प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे एकुणातील साहित्य विश्व (वैचारिक/तात्विक मतभेदांसहित) किमान साहित्यएकतेच्या मूल्यावर एकसूत्रात येणे शक्य झालेले नाही. उलट आज बहुतेक जाती/समाजांची स्वतंत्र साहित्य संमेलने भरत आहेत. शहर/प्रांतनिहाय साहित्य संमेलनांना प्रोत्साहन दिले पाहिजे हे खरे पण जातीय साहित्य संमेलने ही पुरोगामी महाराष्ट्राचे कोणते चित्र स्पष्ट करते?
मराठीत एके काळी उच्चभ्रू साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य इ. अशी एक विभागणी नकळत का होईना पण झाली होती. एका अर्थाने साहित्य क्षेत्रातही वर्णव्यवस्थेने प्रवेश केल्याचे ते एक दर्शन होते. पण ही विभागणी पुढे धुसर होण्याऐवजी अधिक कठोर कप्पेबंद होत गेल्याचे विदारक चित्र आपल्याला दिसते. साहित्य हे निखळ साहित्य असून त्यात असे भेदाभेद करून मग त्याचे मूल्यमापण करू नये याबाबत अनेक साहित्यिक/समिक्षक आग्रही असतात. असे असले तरी प्रत्यक्षात ही विभागणी एकुणातच मराठी साहित्याला हानीकारक आहे याबाबत दुमत नसावे. त्या आधारावरच साहित्यिकाचा दर्जा ठरवणे हे तर अधिक हानीकारक आहे. पण यावर जी चर्चा साहित्य संमेलनांतील एखाद्यातरी चर्चासत्रांतून गंभीरपणे केली जायला हवी होती तशी झालेली नाही, हे दुर्दैव नव्हे काय?
बरे, हे येथेच थांबत नाही. साहित्यिकांची जात व प्रांतही अखिल भारतीय साहित्यसाहित्य संमेलनाच्या निवडणूकीत अनेकदा कळीचा मुद्दा बनत आले आहेत. हे मुद्दे जिंकतातच असे नसले तरी ते रेटले जातात हा सर्वांचाच अनुभव आहे. साहित्याला जात/धर्म/प्रांत नसेल तर साहित्यिकाला हे मुद्दे का लागू व्हावेत? परंतू ते अनेकदा फायद्याचेच जात असल्याने ते वापरले जातातच हेही एक दुर्दैवी वास्तव आहे. यातून साहित्याचे आणि अनेक साहित्यिकांचे एकुणात किती नुकसान होते याचा लेखाजोखा साहित्यिकांनीच मांडायला हवा. पण त्यासाठी जरा निरपेक्ष बनावे लागेल. ते आजच्या परिस्थितीत शक्य आहे कि नाही? मला वाटते शक्य आहे. हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
उदाहरणार्थ विदर्भातील लेखकांना पुणे सहजी जवळ करत नाही अशी वैदर्भियांची, मराठवाडियांची तसेच खानदेशी लेखकांचीही तक्रार असते. जे डोक्यावर घेतले गेले ते त्यांच्या अथक प्रयत्न आणि साहित्यनिष्ठेमुळे. पण अनेकजण प्रतिसादांच्या अभावी मधेच गळून पडतात ती संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वाची एकुणातच हानी होतेय याकडे साहित्य संमेलनांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी असंख्य युवा-साहित्यिकांची आहे.
परप्रांतातील मराठी भाषक आणि लेखकांची समस्या तर याहून गंभीर आहे. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करने काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२)
यातील खंत आजही दूर झालेली नाही. किंबहूना परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परप्रांतांत मराठी भाषकांसाठी (गोवा अपवाद) एकाही मराठी साहित्य मंडळाचे सम्मृद्ध ग्रंथालय नाही. इमारतींची तर बाबच दुर्मिळ. बडोद्याला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून येणारे फिरते पेटी ग्रंथालय सोडले तर काही सुविधा नाही. तीच बाब छत्तीसगढची. येथे भाड्याच्या खोलीत मराठी साहित्य परिषदेचा कारभार चालतो. गुलबर्ग्याच्या ग्रंथालयात ५०-६० ग्रंथ आहेत. खरे तर महाराष्ट्र ग्रंथ संचालनालय दरवर्षी ३-४०० ग्रंथांच्या जवळपास तेवढ्याच प्रती विकत घेऊन महाराष्ट्रातील ग्रंथालयांना वातते. त्यात परप्रांतीय ग्रंथालयांचाही समावेश करने अशक्य आहे काय? मराठी साहित्य संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांना अनुदान देतांना परप्रांतीय मराठी लेखकांना प्राधान्यक्रमाने प्रथम पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देता येणे अशक्य आहे काय? ग्रंथालयांसाठी सुसज्ज इमारती देणेही अशक्य नाही. पण त्यासाठी मराठी भाषेच्या वृद्धीची तळमळ व कळकळ लागते. ती आजवर तरी दिसलेली नाही.
हे असे चित्र असेल तर मग परप्रांतांतील मराठी भाषकांच्या गळचेपीबद्दल काय बोलावे? गोव्याची राजभाषा मराठी व्हावी यासाठी गोवेकर मराठी बांधव संघर्ष करीत आहेत. पण त्याबाबत मराठी भाषक व महाराष्ट्र सरकार तर उदासीन आहेच, पण खुद्द अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही उदासीन असावे हे मात्र अनाकलनीय व मराठीच्या एकुणातील विकासासाठी हानीकारक आहे. बेळगांव-निपाणीबाबत एवढी वर्ष नियमीत ठराव केले जातात....काय झाले त्यांचे?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरु आहेत. प्रा. हरी नरके व भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य अकादमीकडे नेटाने पाठपुरावा करून ती मान्यता मिळवून घेतली. पण पुढील सोपस्कार न झाल्याने तो मुद्दा अजुनही प्रलंबित आहे. खेदाची बाब ही कि गेल्या दोन-तीन साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांना ही बाब माहित असुनही एकानेही त्याबाबत जाहीर आवाज उठवला नाही. किंबहुना असा काही विषय आहे व त्याचे नेमके मराठीच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्व काय हे त्यांच्या गांवीही नाही. त्यांच्याच गांवी नसेल तर सामान्य मराठी माणसाला तरी कसे त्याबाबत आवाज उठवावासा वाटणार? खरे तर यासाठी सर्वच साहित्यिकांनी जनांदोलन सुरु करायला हवे होते. पण ते तसे झालेले नाही. याचे कारण यांना साहित्याचीच आस्था नाही तर भाषेची काय असणार असा प्रश्न उपस्थित झाला तर दोष कोणाचा? आजवर जेवढय़ाही भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला तो सर्व त्या-त्या भाषकांत आपल्या भाषेबद्दल एकमुखाने असलेल्या जिव्हाळ्यामुळे. परंतू महाराष्ट्र हे एकमेव कमनशिबी राज्य असावे जेथे मराठी भाषकच आपणच विकसित केलेल्या गैरसमजांना सबळ पुराव्यांच्या प्रकाशात सोडण्याऐवजी अडसर बनत आहेत. खरे तर सर्व राजकीय पक्ष-संघटनांनी यासाठी एकत्र यायला हवे…पण ते कसे होणार?
साहित्य-संस्कृतीचे जतन-वर्धन-विकसन हे प्रत्येक सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य मानले जाते. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे असे समजले जाते. कोणता समाज नेमका कसा आहे हे समजाऊन घ्यायचे तर साहित्य व वाचनसंस्कृतीचेच मापदंड लावले जातात. या पार्श्वभूमीवर आपण एकूण मराठी साहित्य व वाचनसंस्कृतीचा विचार केला तर लक्षात येईल की आपली ही संस्कृती अत्यंत बाल्यावस्थेत आहे. तिची जी काही वाटचाल होत आहे ती खुरटलेली आणि रोगग्रस्त आहे. आज लेखकांपासून ते पार ग्रंथालयांपर्यंत असलेली साहित्य-संस्कृतीची साखळी नैतिक व आर्थिक भ्रष्टाचाराने पोखरलेली असल्याचेच सध्याचे चित्र आहे.
शंकर सारडांसारखे समीक्षक म्हणतात कि मराठी साहित्य एवढे समृद्ध व्हावे कि एक दिवस मराठी साहित्त्यिकाला नोबेल मिळावे! हा आशावाद सत्यात कधीच येवू शकणार नाही असे नाही,पण मग मराठी साहित्याचीच यत्ता काय यावर आधी विचार केला पाहिजे. मराठीतील आजतागायत गाजलेल्या कादंबर्या बव्हंशी ऐतिहासिक अथवा परकीय कल्पना चोरुन लिहिलेल्या आहेत हे वास्तव काय सांगते?
वाचन संस्कृतीची सुरुवात बालपणापासून होत असते. पाश्चात्य भाषांत बाल, किशोर, कुमार साहित्याची अत्यंत सृजनशील अशी विपुल प्रमाणात निर्मिती होत असते. त्यामुळे मुलांना लहान वयातच वाचनाची गोडी लागते. यात रहस्य, थरार, गूढ, अद्भुतरम्य अशा विविधरंगी साहित्याचा समावेश असल्याने व साहित्यिक दर्जाही उत्तम असल्याने मुलांना आपापल्या आवडीनुरुप विपूल साहित्य उपलब्ध असते.
याउलट अत्यंत केविलवाणे असे मराठीचे चित्र आहे. मुळात मुलांसाठी लिहिण्याचीच आपल्या साहित्त्यिकांना लाज वाटते. भा. रा. भागवतांचा अपवाद वगळला तर आजीवन बाल-किशोरांसाठी लिहिणारा लेखक नाही. पण आता तेही आउटडेटेड झाले आहे. जे आजकाल सहित्य प्रसिद्ध होते त्याची लायकी जवळपास शुन्यवत अशीच आहे. अपवादाने अधुन-मधुन एखाददुसरे चांगले पुस्तक येते खरे, पण एखाद-दुसर्या अपवादांनी बाल-किशोर मराठी वाचनाकडे वळण्याची शक्यता नाही. वाचनाची सवय लहानपणापासून लागली तर मुलांच्या मनोविश्वावर सकारात्मक परिणाम होतो याचे भान आपल्याला कधीच नव्हते. आजही नाही. प्रकाशक जी काही मुलांसाठीची म्हणवली जाणारी पुस्तके काढतात ती अक्षरशः कोणत्यातरी शासकीय योजनेत त्यांची वर्णी लावण्यासाठी. त्यामुळे दर्जाचा विचार व अपेक्षा करता येत नाही. ही पुस्तके शेवटी शाळांच्या कपाटांत वा गोदामांत सडणार आहेत हे जसे प्रकाशकांना माहित असते तसेच खरेदी करणार्या शासकीय अधिकार्यांनाही. त्यामुळे मुलांच्या आवडींचा, त्यांच्यातील वाचनसंस्कृतीचा विचार कोण आणि का करेल? ज्याचा हिस्सा त्याला मिळ्ण्याशी मतलब! जेथे बालसाहित्यात असा लेखक/ विक्रेता व ग्राहक यांच्या संगनमताने एवढा भ्रष्टाचार होतो त्यांच्या संस्कृतीबद्दल काय बोलावे?
वाचकांच्याही यत्ता असतात. बाल-किशोर साहित्याचा अभाव आहे, ठीक. पण मग पुढे तरी काय? ज्याला पहिलीतच यश नाही त्याने एकदम एम.ए. ला बसवावे…ज्याने आधी काही सकस असे वाचलेलेच नाही त्यांच्या हाती जी.ए. द्यावेत अशी अपेक्षा करता येत नाही. वाचनाची सवय लागायला वाचकाला आधी रंजक साहित्य हवे असते. तेही दर्जेदार असायला हवे. आपल्याकडे त्याचीही वानवा. रहस्यकथा, गुढकथा, भयकथा, थरारकथा, विनोदी साहित्य….आहे कोठे? जे आहे ते बव्हंशी रुपांतरीत अथवा अनुवादित…येथल्या मातीत जणु कसलेही रहस्यच नाही कि काय? अलीकडे मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही स्वतंत्र ऐतिहासिक थरार कादंबरी कादंबरी प्रसिद्ध झाली होती. तिला वाचकांनी भरघोस प्रतिसादही दिला. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. तत्पुर्वी मीही जवळपास २८ राजकीय, आंतरराष्ट्रीय व सांस्कृतिक थरारकादंब-या मराठीत लिहिल्या होत्या. वाचकांचा प्रतिसाद असला तरी समीक्षकांचा नाही. त्याउलट इंग्रजीतील माझ्या थरार कादंबरीवर जागतिक पातळीवर लिहिले तर गेलेच पण २६ विद्यापीठांतील ग्रंथालयांसहित व्हाईट हाउसमधील ग्रंथालयात तिला "दक्षीण आशियामधील दहशतवादाचा महत्वाचा ऐवज" म्हणून स्थान मिळाले. आपल्याच मराठीची अशी कद्रू वृत्ती का हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
परकीय कथावस्तुंवर आधारीत का होइना मराठीत एके काळी रंजक सहित्याची मोठी लाट होती. गो. ना. दातार ते शिरवळकर एवढा प्रवास मराठीने केला. लाखो लोकांना वाचक बनवले. वाचनालये गजबजु लागली ती याच लेखकांमुळे. हेच वाचक मग अधिक गंभीर साहित्याकडे वळाले.
पण मग ही परंपरा खंडितच झाली. मराठी समिक्षकांनी रंजक लेखकांना साफ नाकारले. रंजक लेखक हा साहित्यिकच नसतो हे म्हणतांना त्यांनी अगाथा ख्रिस्ती, रेमंड च्यंडलर, चेस, गार्डनर अशा असंख्य लेखकांना मात्र जगाने नुसते डोक्यावर घेतले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही दिले याकडे दुर्लक्ष केले. पण आपल्याकडे अशा रितीने हिणवून घेत मग रंजक लेखन करायला कोण पुढे येणार? स्वतंत्र प्रतिभेने नव्या काळाशी सुसंगत, अधिक व्यापक परिमाणे घेवून येणारे नवे रंजक पण अनुभवविश्वात भर घालणारे साहित्यिक मराठीने निर्माण केले नाहीत. मारिओ प्युझो, जेफ्री आर्चर, गफोरसीथ…छे. आमची मजल तेथवर गेलीच नाही. आम्ही अवलंबून राहिलो मग अनुवादांवर. मराठीतील जीही काही वाचन संस्कृती आहे ती थोडीफार या रंजक साहित्याच्या अनुवादांमुळे. मराठी साहित्त्यिकांचे योगदान त्यात अल्पांश आहे हे नाईलाजाने म्हणावे लागत नाही काय?
मराठी साहित्यिकांची (किती जणांना साहित्त्यिक म्हणायचे हा प्रश्नच आहे.) सर्वात मोठी समस्या ही आहे कि एक पुस्तक प्रकाशित होते न होते, त्याला पारितोषिक कसे मिळेल, त्यावर परिचय कसे येतील…मग त्यावर आधारित पुढचे डाव काय..फायदे काय यातच लेखक गुंतून पडत जातो. एकदा तर मी एका लेखकाची कादंबरीचे हस्तलिखित वाचलेलेही नसता मला सांगितले कि ही कादंबरी तुम्ही फक्त प्रकाशित करा, राज्य शासनाचा पुरक्कार मिळणारच आहे. तो एवढय़ा ठामपणे बोलत होता कि त्याने काहीतरी फिल्डींग लावलेलीच आहे याची मला खात्रीच पटली. मी ती कादंबरी नाकारली. अन्य प्रकाशकाने ती प्रसिद्ध केली. दुसर्या वर्षी त्याच्या कादंबरीला खरोखरच पारितोषिक मिळालेले होते. आपल्या साहित्त्यिक पुरस्कारांच्या या यत्तेवर कोणाही सुजाण वाचकाला शरम वाटायला हवी कारण बव्हंशी पुरस्कार हे अक्षरशः मॅनेज केलेलेच असतात याबाबत कोणीही शंका बाळगू नये. पुरस्कारप्राप्त पुस्तक वाचणे ही एक शिक्षाच बनून जाते आणि वाचक गंडवला जातो. लेखक 10 टक्के कोटय़ातील फ्लॅट मिळवायला पात्र ठरतो…काय वाचन संस्कृती वाढवणार?
तो कशाला आपली साहित्त्यिक म्हणूनची यत्ता वाढवायचा प्रयत्न करेल?
अशा कुपमंडूक साहित्त्यिकांकडून नोबेल विनर साहित्त्यिक निर्माण होईल कसा? वैश्विकतेला कवेत घेत मानवी जीवनाचे असंख्य पदर उलगडून दाखवत वाचकाला प्रगल्भ करणार्या कलाकृती निर्माण होतीलच कशा? तसे होणार नसेल तर वाचन संस्कृती बहरेलच कशी?
मराठीत गाजलेल्या (बव्हंशी गाजवल्या गेलेल्या) कृती या तुलनात्मक साहित्याच्या अंगाने पहायला गेले तर अजुनही प्राथमिक पातळीवर आहेत असे प्रसिद्ध तुलनाकार समीक्षक डॉ. आनंद पाटील म्हणतात हे खरेच आहे.
मुळात ज्या लेखकांना स्वतःच जीवनाला निधडय़ा छातीने सामोरे जाता येत नाही, अनुभवविश्वात भर घालता येत नाही ते साहित्यिक वाचकांना कोणते नवे जीवनदर्शन घडवणार आहेत? नेमाडेंसारखा साहित्यिकही जेथे आपली नीतिमत्ता प्रसंगी गहाण ठेवू शकतो तर इतरांची काय कथा? मग कशी मराठी भाषा समृद्ध होणार आहे? कसा वाचक समृद्ध होणार आहे? वाचक हा देशाचा नागरिक असतो. त्याच्या जडणघडणीत साहित्याने मोलाचा हातभार लावावा अशी अपेक्षा असते. परंतु आपले साहित्य एकूणातच त्याला दुबळ्या मानसिकतेच्या पोचट अनुभवविश्वातच अथवा इतिहास-पुराणकालीन तथाकथित गौरवगाथांतच गुंगवून ठेवू पाहत असेल तर सक्षम व समृद्ध नागरिक कसा घडणार? मराठी साहित्य कसे वैश्विक होणार?
थोडक्यात मराठीचे व मराठी साहित्यविश्वाशी निगडित असंख्य प्रश्न आहेत. ते चर्चेत आणने संबंधितांना खरे तर अडचणीचे ठरणारे नसून ते सतत चर्चेत ठेवले तर मराठीच्या एकुणातील संवर्धनासाठी उपयोगाचेच होईल. पण तसेही होतांना आपल्याला दिसत नाही. आजच्या प्रत्यक्ष समस्यांबाबत साहित्य संमेलनांची अशी उदासीनता असेल तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबत मराठी साहित्य संमेलन काय भूमिका घेणार आहे? मराठीचा जागर देश-विदेशात व्हावा ही सर्व साहित्यप्रेमी मराठी भाषकांची वाजवी अपेक्षा आहे. पण जेथून चिंतनाचे आणि परिवर्तनाचे धुमरे फुटावेत ते साहित्य संमेलनच त्याबाबत उदासीन असेल तर साहित्य संमेलन म्हणजे तीन दिवसांची जत्रा आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गणपती ही जनधारणा नुसती ठळक होत जाणार नाही तर काय?
तसे होऊ नये. ते मराठी भाषेच्या, साहित्याच्या आणि समाज-स्पंदनांना जाणवून घेत अभिव्यक्त होत राहणा-या प्रतिभावंतांच्या हिताचे नाही. साहित्य संमेलन हे मुठभरांचे असते या भ्रमातून सर्वच मराठी रसिकांनी बाहेर यायला हवे आणि त्यात कालानुरुप बदल घडवण्यात हातभार लावला पाहिजे. हे खरेच "अखिल भारतीय" आणि "सर्व मराठी साहित्य-रसिकांचे चिंतन-शिबीर" व्हावे यासाठी हातभार लावला पाहिजे.
साहित्य व्यवहारांचे, सर्व प्रवाहांचे भान साहित्य संमेलनात ठेवले जायला हवे. सर्व साहित्यिक अंगे मराठीत ख-या अर्थाने कशी फुलारतील, नव्या प्रतिभा जोमाने कशा लिहित्या राहतील हे पहायला हवे. साहित्य संमेलनाचे तेच काम आहे आणि अध्यक्षाने आपल्या कार्यकाळात फक्त प्रकाशन समारंभांतील टाळ्याखाऊ व आत्मप्रौढीच्या भाषणांबाहेर जात अखिल समाजातच साहित्य चैतन्य निर्माण करायला हवे. ही अपेक्षा बाळगण्यात गैर ते काय?
नाहीतर साहित्य संमेलन ही एक "दांभिकांची जत्रा" ठरतच राहील व एक दिवस मराठ भाषकांच्या मनातून पार उतरेल याची खात्री बाळगावी!
(साहित्य संमेलनाच्या पार्श्वभुमीवर माझा "साहित्य संमेलन कि दांभिकांची जत्रा" हा लेख साहित्य चपराकमद्ध्ये प्रसिद्ध झाला आहे.)

Sunday, January 10, 2016

सहिष्णुता म्हणजे नेमके काय?

असहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्वाची संकल्पनाच मुळात बदनाम करण्याचे कारस्थान सुरु आहे. सहिष्णुतेचे जसे तत्वज्ञान असते तसेच असहिष्णुतेचेही असते. आपल्याला सर्वप्रथम असहिष्णुतेचे तत्वज्ञान समजावून घ्यावे लागेल, त्याशिवाय सहिष्णुतेचे महत्व समजणार नाही.

माझ्या घरातील लोक, माझे शेजारी, माझे सहकारी व समाजही मी ज्या विचारधारेला मानतो, ज्या जीवनशैलीला मानतो, ज्या धर्मश्रद्धा जोपासतो त्या विचारधारेने व धर्मश्रद्धा-जीवनशैलीनेच वागतील - वागावेत असा जो आग्रह धरतो, प्रसंगी जबरदस्ती करतो त्याला आपण असहिष्णू म्हणू शकतो. असहिष्णुपणात इतरांचा धर्म, जीवनविचार, आहारपद्धती ते वस्त्र-संस्कृती, राजकीय व स्वतंत्र आर्थिक विचार या बाबींना स्थानच नसते. किंबहुना "व्यक्ती स्वातंत्र्य" ही संकल्पनाच असहिष्णुपणात बसत नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अशा लोकांना मान्य असण्याची शक्यता नसते. एक विचार, एक समान संस्कृती व एकसमान आचार-व्यवहार संहिता असलेला "समरस" समाज बनवणे अशा लोकांचे एकमात्र ध्येय असते व हे ध्येय साध्य करण्याचा मुख्य उद्देश अनिर्बंध राजकीय व सांस्कृतिक सत्ता गाजवता यावी हाच असतो. थोडक्यात लोकशाहीला या विचारपद्धतीत स्थान नसते.

हे तत्वज्ञान का जन्माला येते हे आपण समजावून घेण्यचा प्रयत्न करुयात. पहिली बाब म्हणजे हे तत्वज्ञान नवे नाही. पुरातन काळापासून कधी ना कधी, कोठे ना कोठे कोणत्या ना राजाने अथवा धर्मगुरुने या तत्वज्ञानाचा आधार घेत प्रचंड रक्तपात केले आहेत, मानवी समुदायांना दास्यात ठेवण्यासाठी करता येतील तेवढी क्रूर कृत्येही केलेली आहेत. जगभरातील बहुतेक धर्म हे मुळात असहिष्णुच असल्याचे ऐतिहासिक रक्तपातांच्या घटनांतून पहायला मिळते. खरे म्हणजे धर्मात मुळ काय आहे यापेक्षा धर्म हे राजकीय सत्ताप्राप्तीचे साधन म्हणून वापरण्याच्या प्रयत्नांतून ही असहिष्णुता जास्त फोफावलेली असल्याचे आपल्या लक्षात येईल. या सत्ताकांक्षेला, रक्तपात व  दडपशाहीला समर्थन देवू शकेल असे तत्वज्ञान तुकड्या-तुकड्यांतुन शोधले तर सहज काढता येते, आणि समजा नसले तर शब्दार्थांची तोडमोड करत सोयिस्कर अर्थ काढण्यात येतात. त्यामुळेच धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता या दोहोंत संघर्षही पेटल्याचेही इतिहासात आपण पाहतो. पोपची अनिर्बंध राजसत्ता झुगारण्यासाठी युरोपने केलेला संघर्षही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच वेळीस आपल्य धर्माला अनिर्बंध पसरवता यावे यासाठी धर्मांनी राजाश्रय मिळवण्यासाठी किती लटपटी-खटपटी केल्या व   अंतत: अपार यश मिळवले याचीही उदाहरणे आहेत. अन्य धर्मियांचा छळ तर बहुतेक सत्तांनी केला.

अठराव्या शतकात धर्माबरोबरच वंशवादानेही असहिष्णू तत्वज्ञानाचा अतोनात वापर केला. आर्य वंश हा श्रेष्ठ  तर अन्य वंशिय हे कमअस्सल या मांडणीतून सेमेटिक लोकांचा (विशेषत: ज्यु) छळ सर्व युरोपने केला. या वंशवादाचाच फायदा घेत हिटलर-मुसोलिनी सारखे सत्तेच्या वारुवर झटपट आरुढ होऊ पाहणारे फ्यसिस्ट जन्माला आले. काही काळ यशस्वीही झाले. लक्षावधी ज्युंची कत्तल केली गेली, छळ छावण्यांत त्यांना नराधम यातना देत संपवले गेले. विसाव्या शतकाचा इतिहास या क्रुरतेची परिसीमा पाहणा-या रक्तरंजित घटनांनी सुरु होतो. समाज-समाजांतील हे संघर्ष व राष्ट्रा-राष्ट्रातीलही संघर्ष हे कोठे ना कोठे असहिष्णुतेच्या तत्वज्ञानापाशी येवून ठेपतात. किंबहुना असहिष्णुतेचा मुळगर्भ जगभरच्या  संघर्षांमागे आहे असेही आपण अंदाजू शकतो.

असहिष्णुतेचे तत्वज्ञान हे दुस-यांवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी जन्माला येते. या चारही बाबी या तत्वज्ञानात हातात हात घालून वावरत असतात. त्यांना वेगळे करता येत नाही. Theory of others हा या तत्वज्ञानाचा पहिला नियम असतो. हा नियम म्हणजे आपण (स्वधर्मीय वा विचारप्रणालीचे) व इतर  अशी विभागणी सर्वप्रथम काळजीपुर्वक केली जाते. आपले धर्म/तत्वज्ञान हे इतरांपेक्षा कसे पुढारलेले आहे, इश्वरप्रणित आहे, श्रेष्ठ आहे, पुरातन आहे, हे लिहिणे, सांगत राहणे, बिंबवने व त्यातुनच हाडाचे कट्टर अनुयायी तयार करणे ही स्वभावत:च पुढील पायरी असते. या प्रवसात सुरुवातीला जमतील ती सत्तास्थाने (आर्थिक/राजकीय) प्रप्त करत जात अंतिम उद्देश साध्य करायचा असतो सत्ता संपादनाचा. त्यासाठी शत्रू मानलेल्या वर्ग-गटांबाबत द्वेष पसरवत प्रसंगी हिंसक होण्याची त्यांची अर्थातच तयारी असते, कारण द्वेष केल्याखेरीज, त्यांच्याबाबत खोटे का होईना भय निर्माण केल्याखेरीज आपले लोक एका झेंड्याखाली राहणार नाहीत याची त्यांना खात्रीच असते. आपले अनुयायी स्वतंत्र विचार करणार नाहीत, एक साच्याचे बनतील यासाठी ते अपरंपार कष्ट घेत असतात. कोणी स्वतंत्र विचार मांडत असतील, त्यांच्या विचारांनी आपल्यला हवी तशी समाजरचना करण्यात अपयश येणार असेल, अडथळे येणार असतील तर त्यांना धमकावून गप्प करण्याचे प्रयत्न होतात, एनकेन प्रकाराने अंधारात फेकले जाते व तेही जमणार नसेल तेंव्हा सरळ हत्या केल्या जातात. अमेरिकेतील कु-क्लक्स क्लान या गुप्त संघटननेने अनेक ज्यू व बायबलमधील तत्वज्ञानाविरोधी जाणा-या विचारवंतांची हत्या केली हा इतिहास आहे. भारतात अलीकडेच झालेल्या तीन विचारवंतांच्या हत्याही याच परिप्रेक्षात पहाव्या लागतात. आयसिसचा झालेला उदय याच तत्वज्ञानातून झाला आहे. किंबहुना सर्वच दहशतवादांमागेही हेच तत्वज्ञान व साध्य असते.

सहिष्णुता

या पार्श्वभुमीवर आपल्याला सहिष्णुतेच्या तत्वज्ञानाकडे पहावे लागेल.  सर्वांना स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा, विचार करण्याचा व आपले विचार निर्भयपणे मांडण्याचा, आपापले धर्म (उपद्रव न निर्माण करता) पाळण्याचा, राजकीय हवे ते विचार बाळगण्याचा अधिकार सहिष्णुता सर्वप्रथम मान्य करते. मानवी सहजीवन हे एकमेकांचा सन्मान करत, एकमेकांचे अधिकार मान्य करत संविधानाच्या चौकटीत जीवन जगण्याचे स्वातंत्र्य घेणे व देणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुतेचे तत्वज्ञान मानवाचा मुलभूत व्यक्तिस्वातंत्र्याच्या सन्मानाच्या संकल्पनेवर उभे आहे. महात्मा गांधी जे म्हणत, "मला केवळ भारताचे नव्हे तर भुतलावरील सर्व मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे." ही उदात्त भुमिका सहिष्णुतेच्या संकल्पनेचा गाभा आहे. स्वत:चे स्वातंत्र्य इतरांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी नाही याचे भान प्रत्येक सहिष्णू ठेवत असतो. आपले राष्ट्र "सेक्युलर" राष्ट्र आहे. हा सेक्युलरिझम बहुतेक विद्वान फक्त "धर्म-निरपेक्ष" या शब्दाशी जोडतात, जे चुकीचे आहे. सेक्युलर या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ खूप व्यापक आहे. केवळ धर्मांपुरता नव्हे तर तो सर्वच जीवनव्यवहारांशी निगडित आहे. तो मानवाच्या (नागरिकांच्या) सौहार्दमय सहजीवनाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार करण्याचा, जीवन जगण्याचा, धर्म, अर्थविषयक श्रद्धा-विचार ठेवण्याचा, आपापली खाद्य ते जीवनसंस्कृती (अन्य कोणालाही उपद्रव होणार नाही व वर्तन कायद्यांच्या चौकटीत असेल या पद्धतीने) जपण्याचा अधिकार आहे. ही बाब सहिष्णुता मान्य करते. ज्याक्षणी सहजीवनाची संकल्पना हद्दपार होऊ लागते तत्क्षणी ते ते समाज असहिष्णू होत जातात असे म्हणावे लागेल.

थोडक्यात सहिष्णुता ही संकल्पना मानवाच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे. कोणतेही शासनही ज्यावेळीस अशा स्वातंत्र्याचा विविध अन्याय्य कायदे करत संकोच करू पाहते ते शासनही असहिष्णू आहे असे सहज म्हणता येते. सहिष्णू नागरिकच  नव्हेत तर  सरकारेही असली पाहिजेत. म्हणजेच सरकारांची विचारसरणीही सहिष्णू असली पाहिजे, अंतत: आपल्या नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य कसे देता येईल हे पाहणारी असली पाहिजे. स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी सरकारे नसतात.

Saturday, January 9, 2016

विरोध नेमका कशाचा हवा?

खेद...विरोध नेमका कशाचा हवा?
गतकाळात रमवत, त्याच चश्म्यातून भविष्याकडे पाहत आपल्या अनुयायांना पुढे नेण्याची स्वप्ने दाखवत मागेच ओढत राहणा-या विचारधारांचा.
यातून प्रगतीही होत नाही आणि मानसिकता पुराणपंथी बनत जाते. मानवी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे ते समजुच देत नाहीत कारण त्यांना अबौद्धिक गुलामच हवे असतात. ते अनुयायांचे असे काही ब्रेन वाशिंग करुन टाकतात कि त्यांची स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणाच नष्ट होते.
किंबहुना विचार करायचीच त्यांना भिती वाटू लागते.
असे एका साच्यात घडलेले लोक काही नवनिर्मिती करू शकतील याची सुतराम शक्यता नसते. ते कधी स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊ शकतील याचीही संभावना नसते.
आणि इतरांनीही स्वतंत्र विचार केलेला त्यांना आवडत नाही. किंबहुना इतरांचेही स्वातंत्र्य बंदिस्त करत त्यांनाही आपल्या झापडबंद अविचारशील विचारधारेत आणण्याचा त्यांचा जबरदस्त प्रयत्न असतो.
येत नसतील तर त्यांना संपवुनच टाकायचे हेच काय ते धोरण असते.
कारण ते भेकड असतात. त्यांना विचारांचीच भिती वाटते, प्रकाशाला घाबरणा-या दिवाभितांसारखी.
ते प्रकाशावरच तुटून पडू पाहतात.
खेद या अविचा-यांचा असायला हवा. विरोधही. कारण ते इतरांनाच घातक आहेत म्हणून नव्हे तर स्वत:च्या अनुयायांसाठी तर जास्तच घातक आहेत.
रक्तशोषक किड्यांप्रमाणे ते आपल्या अनुयायांचा आत्मा आधी शोषतात मग नंतर बाह्य कक्षेतील माणसांवरही तेच प्रयोग करायला सिद्ध होतात.
अनुयायांनीही किमान झापडबंद होऊ नये असा प्रयत्न करायला हवा. स्वत:चे स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातील स्वातंत्र्य नव्हे हे समजावून घ्यायला हवे.
जगात आजवर अगणित अशा राज्यव्यवस्था, हुकुमशहा, संघटना झाल्या आहेत, मानवी दुर्दैव कायम असेल तर पुढेही होत राहतील.
यात माणसाचे माणुसपण कोठे राहिले?
आमचा विरोध अशा माणुसपणाला हिरावणा-या अविचारी, एककल्ली, एका साच्यातले माणसे बनवण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहत, खोट्या आशा, खोटी स्वप्ने आणि खोटे शत्रू समोर ठेवत हिंस्त्र प्रेरणा देत माणसाने माणसांनाच फसवत राहणारी व्यवस्था आणण्याच्या प्रयत्नांना असला पाहिजे.
आम्हाला अखिल मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे.

Wednesday, January 6, 2016

शेतीच्या भवितव्यासाठी....

दोन जानेवारी रोजी संध्याकाळी माझे डेक्कन शुगर टेक्नोलोजिस्ट असोशिएशन येथे "शेती आणि आधुनिक तंत्रज्ञाने" या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी उगार साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष श्री. राजाभाऊ शिरगांवकर होते.

मी मांडलेले मुद्दे:

१. शेतीचा शोध हा मानवी संस्कृति-इतिहासातील क्रांतीकारी टप्पा आहे. या टप्प्यानेच गरजेपोटी आद्य तंत्रज्ञाने, नांगरासारखी प्राथमिक यंत्रे जन्माला आली. शेतीसाठी आद्य जैविक तंत्रज्ञानेही वापरत विविध प्रकारची अन्नध्यान्ये व पालेभाज्या-फळभाज्या संकराने निर्माण केल्या. धरणे बांधने, कालवे काढणे याची सुरुवातही सिंधू संस्कृती कालात सुरु झाली. शेती ही नुसते जगण्याची नव्हे तर मानवी शोधबुद्धीला चालणा देणारी, सर्जनाचा पाया असलेले धर्मविचार आणि विवाहसंस्थेचेही मूळ कारण बनली. आपले आजचेही बहुतेक सण हे कृषीसांस्कृतीतून आलेले आहेत. तंत्रज्ञान आणि शेती याचा मुळ संबंध हा असा असला तरी पुढे त्यात नवीन भर पडली नाही. परंपरागत पद्धती हजारो वर्ष सुरु राहिल्या.

२. पर्यावरणाची चक्रे फिरल्याने सिंधू संस्कृती अवनतीला पोहोचली. अलीकडेच पहायचे तर दहाव्या शतकासून पर्यावरण बदलत जात देशावर दुष्काळाच्या रांगा सतराव्या शतकापर्यंत कायम राहिल्या. त्याने शेतीचीच नव्हे तर सामाजिक स्थितीचीही धुळधान केली. आज वर्तमानात पर्यावरण बदलाचे संकेत आपल्याला मिळत आहेत. आज आम्ही आधुनिक तंत्रयुगात राहतो आहोत असा दावाही आम्ही करतो. पण त्यावर उपाय शोधण्यात आम्ही कमी पडतो आहोत. अवकाळी पाऊस, अतिवृष्ट्या ते पावसाचे वाढते लहरीपण हे आमच्या तंत्रज्ञांचे संशोधनाचे विषय बनत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

३. आम्ही शेतीत स्पर्धात्मकताही ठेवलेली नाही. उद्योजकांनी आपली उत्पादने कोनत्या किंमतीला विकावीत हे सरकार ठरवत नाहे तसेच ग्राहकही. ते उत्पादक ठरवतात. त्यांनी आपली उत्पादने निर्यात करून परकीय चलन आणावे यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न होतात. शेतीवर ५५% लोक अवलंबून आहेत. तेही उत्पादक आहेत. मात्र त्यांना त्यांच्या उत्पादनांचा भाव ठरवायचा अधिकार नाही. हवे तेंव्हा निर्यातीचाच काय भारतातील दुस-या राज्यांत थेट पाठवायचा अधिकार नाही. घटनेच्या समतेच्या मुलतत्वाविरुद्ध ही बाब आहे. शेतक-याला गुलाम करणारी, हमी भावांवर अवलंबून ठेवण्याची ही चाल आहे. हमी भावांचा आधार तरी काय आणि किमान तो तरी किती कृषी-उत्पन्न बाजार समित्या देतात हा संशोधनाचा विषय आहे. शेतक-याला प्यकेज अथवा दात्यांच्या भिकेची गरज नाही, आपल्या उत्पादनाचा भाव ठरवायचा अधिकार, हवे तेथे विकण्याचा अधिकार हीच मुलभूत गरज आहे. स्पर्धात्मकतेमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञाने अधिक डोळसपणे वापरतील. त्याच त्या परंपरागत पीकांच्या मागे लागत स्वत:चे आणि आपल्या जमीनीचे नुकसान करून घेणार नाहीत.

४. आधुनिक तंत्रज्ञानांबरोबरच शेतक-यांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्रांशी परिचय करून दिला पाहिजे. शेतक-याची स्थिती एकल उद्योजकासारखी झाली आहे. व्यक्तिगत भुक्षेत्र कमी कमी होत चालले आहे. अशा स्थितीत शेतक-यांनाच एकत्र येत कार्पोरेट पद्धतीने शेती केल्याखेरीज भविष्यात गत्यंतर नाही,. याबाबत व्यापक प्रबोधन करावे लागेल. काही शेतकरी गटशेतीच्या पद्धतीने हे प्रयोग यशस्वीपणे राबवत आहेत. तो आदर्श सर्वांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

५. लोकांना अन्नधान्ये स्वस्त मिळावीत म्हणून शेतक-यांना वेठीला धरले जाते. ५५% लोकसंख्या गळा आवळत नेत ४५% लोकांचाच विचार करायचा हे ठीक असले तरी भले यात टक्काभर लोकांचेच होते. ग्राहकाला ते फायदे मिलत नाहीत आणि शेतकरी तर लुबाडलाच जातो. समाजवादी धोरणे ही अंतत: मुठभर भांडवलदारांच्याच हिताची असतात. गरज सर्व शेतक-यांना भांडवलदार बनवण्याची आहे. समाज व सरकारच्या कृपादृष्टीवर अवलंबुन असलेले याचक नव्हे.

६. भारतात आज फक्त २% शेतमालावर प्रक्रिया केली जाते. जवळपास ३०% फळे व भाजीपाला साठवणूकीच्या अभावात वाया जातो तर बराच माल अनेकदा भावच पडल्यामुळे अक्षरश: रस्त्यांवर फेकला जातो. आम्ही प्रक्रिया उद्योगात मागे असू तर आम्ही कोणत्या तंत्रज्ञानातील यशाच्या गप्पा हाकतो? बरे, ही काही रोकेट टेक्नोलोजी नाही. आम्हाला अशा तंत्रज्ञानांना भारतात पसरवावे लागेल. भारताच्या महासत्ता बनण्याची खरी ताकद आजही शेतीक्षेत्रात आहे. पण ते पोटेंशियल आम्हाला नीटपणे समजावून घ्यावे लागेल.

७. आपण सर्वांना मिळून शेतीसाठी, पशुपालन व मासेमारी उद्योगांसाठी नवे अर्थ-तत्वज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन ज्ञान विकसीत करणे हेच खरे आपल्यासमोरील आव्हान आहे.

Monday, January 4, 2016

वैदिक ब्राह्मण कोण आहेत?

वैदिक धर्मव्यवस्थेत ब्राह्मण हा अग्रगण्य वर्ण म्हणून ओळखला जातो. भारतीय समाजव्यवस्थेत या वर्णाने जसा सन्मान मिळवला तसेच जन्माधिष्ठित श्रेष्ठत्ववादाचे वर्चस्वही गाजवल्याचे आपल्याला दिसते. बहुतेक वैदिक धर्मग्रंथांत ब्राह्मण अपरंपार ब्राह्मण माहात्म्य आपल्याला दिसते. अठराव्या शतकानंतर मात्र ब्राह्मणविरोधी लाटही उठल्याचे दिसते. आर्य वंश सिद्धांताच्या वर्चस्वाखाली आपण बाहेरचे, भारतावरील आद्य आक्रमक, एतद्देशिय असंस्कृतांना आपली संस्कृती व भाषा देणारे अशा समजापोटी वांशिक भेद करवून घेतल्याने एक सांस्कृतिक संघर्षही त्यांनी सुरु केला. त्यामागील कारणे वगैरेंचा येथे विचार करण्याऐवजी आपण भारतातील ब्राह्मणांचा इतिहास समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.

ऋग्वेदकाळात ब्राह्मण हा वर्ण नव्हता. ब्रह्म या शब्दाचा वैदिक संस्कृतातील अर्थ "मंत्र" अथवा "स्तोत्र" असा आहे. जो मंत्र अथवा स्तोत्र रचतो तो ब्राह्मण एवढाच ब्राह्मण या शब्दाचा अर्थ होता. थोडक्यात वैदिक मंत्र ज्यांनी रचले तेवढेच ब्राह्मण येथे अभिप्रेत होते. ऋग्वेदकाळात ब्राह्मण हा जन्माधिष्ठित वर्ण बनलेला नव्हता त्यामुळे मंत्रकर्त्या ब्राह्मणाची मुले मंत्रकर्ती नसतील तर ते ब्राह्मण नव्हेत. पुढे वेदरचना संपल्यानंतर वेदाधारित यज्ञकांडाला अधिक शिस्त आली. मंत्रांचा उपयोग यज्ञादी धार्मिक कर्मकांडात करणारा वर्ग पुढे विकसीत झाला. त्यासाठी वेदाध्ययन व पाठांतर आवश्यक होते. हे काम तसेच यज्ञांचे विधान समजावून घेणे किचकट होते. या गरजेपोटी जो वर्ग वेदाध्ययनाकडे वळाला तोही स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेऊ लागला. पुढे ब्राह्मण हा वर्ण जन्माधारित बनत गेला. यज्ञाभोवती गुढतेचे वलय निर्माण करण्यात यश आल्याने वैदिक धर्मसंस्थेत ब्राह्मणांना अननयसाधारण महत्व मिळाले. त्यांच्या उपजीविकेची सोय लावण्याचे कार्य अर्थात राजे व धनाढ्यांवर आले. अर्थात या वर्णावर उपजिविका कशी करावी यापासून ते जीवनआचार व्यवहारांवरही खूप बंधने आली. पण हे खूप नंतर घडले. तो प्रवास पाहणेही रोचक ठरेल.

उपनिषदांमधील ब्रह्म व वेदामधील ब्रह्म या शब्दांचे अर्थ एकच नव्हेत. वेदांतील ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र असा होतो हे आपण पाहिले. उपनिषदांत मात्र "ब्रह्म" हा शब्द मंत्र  म्हणून येत नसून आध्यात्मिक गुढार्थाने, चिद्शक्ती किंवा विश्वनिर्मितीमागील एक चैतन्य अशा अर्थाने येतो. "ब्रह्म" जाणतो, म्हणजे ब्रह्मविद्या जाणतो तो ब्राह्मण नव्हे तर उपनिषदकाली ब्रह्मविद्येला जन्म क्षत्रियांनी दिला असे छांदोग्य उपनिषदात प्रावाहण जैवालीने स्पष्टपणे म्हटलेले आहे. काही लोकांनी ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असा अर्थ लावला असला तरी ते खरे नाही.

उदा. महाभारतातील व्याख्येनुसार- " जातकर्मादी संस्कारांनी जो सुसंस्कृत झाला आहे, जो शुद्ध व वेदाध्ययन संपन्न आहे, जो षट्कर्मे करतो, आचरण शुद्ध ठेवतो, यज्ञ करून उरलेले अन्न जो भक्षण करतो, जो गुरुला प्रिय असतो ; नियमशील, सत्यनिष्ठ, दानशील, अद्रोही, दयाळू, सलज्ज, दुष्कृत्यांची घृणा करणारा व तपस्वी असतो, त्यालाच ब्राह्मण असे म्हणतात." (म.भा. शांतिपर्व १८९.२-४) ही व्याख्या उपनिषदांतील ब्रह्मशी सुसंगत नाही हे उघड आहे.

भारतात ब्राह्मण हा वर्ण कसा विकसित होत गेला हे आपण पाहुयात.

भारतात वैदिक धर्माचा प्रवेश विदेघ माथवाच्या व त्याच्या सहकारी-अनुयायांच्या माध्यमातून सरासरी इसपू १२०० ते इसपू हजार या काळात झाला. त्यांनी जरी पहिली वस्ती सिंध प्रांतात केली असली तरी त्यांना राजाश्रय मिळाला तो कुरु-पांचालांचा. शतपथ ब्राह्मणात ही प्राचीन दंतकथा जपून ठेवली असून त्यावरून यांची पहिली वस्ती सदानीरा नदीकाठी पानथळ परिसरात आधी झाली असे दिसते. शतपथ ब्राह्मणातील ही पुराकथा अशी : विदेघ माथव हा सरस्वती नदीच्या तीरावर राहत होता. आपला पुरोहित गौतम राहुगण आणि अग्नी सोबत घेऊन तो पर्वत (उत्तर गिरी) नद्या व अरण्ये ओलांडत सदानीरा नदीपर्यंत आला. आता कोठे वसायचे असे विचारल्यावर अग्नीने त्याला या नदीच्या पुर्वेकडे वसती कर असे सांगितले. (पहा शतपथ ब्राह्मण १.४.१, १४-१७) शतपथ ब्राह्मणाच्या या  पुराकथेवरून दक्षीण अफगाणिस्तानातील सरस्वती (हरक्स्वैती) नदीपासून कोणत्यातरी अज्ञात कारणाने (बहुदा राजकीय घडामोडींमुळे) वैदिक धर्मियांचा एक गट उत्तरगिरी (हिंदुकूश पर्वत) व अनेक नद्या जंगले ओलांडत एका नदीजवळ आले, तेथे वस्ती केली व त्या नदीला सदानीरा नदी हे नांव दिले. येथे काही काळ वसती केल्यानंतर त्यांना कुरुंनी राजाश्रय दिला.

येथे या वैदिक अनुयायांनी सर्वप्रथम मिळेल तेवढा वेद एकत्र केला व त्याची शिस्तबद्ध विभागणी केली. वेद पुर्वी एक लाख ऋचांची राशी होती असे विष्णू पुराणाने नोंदवलेले आहे. परंतु स्थलांतरामुळे सर्वच वेद या शिष्यांना सोबत आनता आला नाही. अनेक वेद शाखा (अथवा मंडले) राहुनच गेली. वेद व्यासांनी वेदांचे चार भाग केले व चार शिष्यांना (पैल, सुमंतू, वैशंपायन व व जैमेनी) हे करत असतांना त्यावर स्थानिक भाषांचे संस्कारही केले, यज्ञसंस्थेला काटेकोर रुप दिले. ब्राह्मण ग्रंथांचीही सुनियोजित मांडणी याच काळात केली गेली. पुढे धर्मप्रसारासाठी म्हणून वेदाच्या २७ पाठशाखा तयार करण्यात आल्या. यातील आता फक्त शाकल व बाष्कल शाखा उपलब्ध आहेत.

या काळाला आपण वैदिकांचा भारतातील आरंभ काळ म्हणू शकतो. या काळात वैदिक ब्राह्मणांत फक्त चार गोत्रे होती. हे आपण मुळचे वैदिक ब्राह्मण म्हणू शकतो. हे लोक कुरु-पांचाल प्रदेशात स्थायिक होते. कुरू राजांनी सर्वप्रथम वैदिक धर्माला आश्रय दिला असावा असे मत टी. एच. ग्रिफिथ (The Hymns of the Rig Veda, पहा प्रस्तावना) यांनीही व्यक्त केलेले आहे. मनुस्मृतीचे आद्य रुपही याच परिसरात उदयाला आले हे आपल्याला मनुस्मृतीत पहिल्याच अध्यायात दिलेल्या भुगोलावरून लक्षात येते.

कुरु राजांचे अथवा त्या परिसरातील काही राजांनी वैदिक धर्माला आश्रय दिल्याने स्वाभाविकपणे त्यांनी धर्मप्रचाराचे कार्यही हाती घेतले. या प्रचारात त्यांनी अनेक स्थानिक भारतीयांना वैदिक धर्मात घेत ब्राह्मण, काहींना क्षत्रीय व तर काहींना वैश्य करून घेतले. अगदी उत्तर भारतातील ब्राह्मणांमद्ध्येही भिन्न आनुवांशिकी दिसते ती या धर्मांतरामुळेच होय. ही प्रक्रिया आधी उत्तरेत सुरु झाली. द्रविड ब्राह्मण या प्रक्रियेत सर्वात शेवटी आले. त्यामुळे वैदिक धर्मावरही या धर्मांतरित स्थानिकांमुळे (वेदपुर्व शिवप्रधान मुर्तीपुजकांचा धर्म पाळणारे) खूप संस्कार झाले. विविध स्मृत्या निर्माण झाल्या त्या वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या प्रांतात. आचार-विचार बंधनांतील स्म्रुतींतील विधाने प्राय: विसंगत अथवा परस्परविरोधी येतात ती त्यामुळेच. पण ते पुढे.

या आरंभकाळात धर्मप्रसार व धर्मजतन हेच मुख्य हेतू वैदिक ब्राह्मणांसमोर असल्याने ब्राह्मण माहात्म्य वाढवत असतांना ब्राह्मणांवर असंख्य बंधनेही लादली गेली. "ब्राह्मण म्हणजे परम तेज व तप होय. ब्राह्मणांच्या नमस्कारामुळेच सूर्य दिव्य लोकात विराजतो..." (म. भा. वनपर्व, ३०.३.१६), "जे कृद्ध झाले असता अन्य स्वर्गादि लोक व लोकपाल निर्माण करू शकतात, जे देवांनाही शाप देवून मनुष्य योनीत जन्म घ्यायला लावतात, ज्याचा आश्रय धरून लोक व देव नेहमी आपल्या जागी स्थिर राहतात....." (मनुस्मृती, ९.३१५-१६), ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेष्ठ असून राजाची त्याच्यावर सत्ता चालत नाही असे गौतमही (९.१) म्हणतो. असे ब्राह्मणांचे महत्व सिद्ध करत अन्य स्थानिक धर्मियांचे या धर्माबाबत व त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णाचे आकर्षण निर्माण केले. पण नवांगतूक वैदिक धर्म नियमांचे कटाक्षाने पालनही करतील यासाठी त्यांच्यावर  कठोर बंधनेही घातली. ती अशी:

ब्राह्मणाने सतत वेदाध्ययन करावे, एका दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, शस्त्रे हाते धरणे तर दुरच, त्याचे दर्शनही घेऊ नये, कसलाही व्यापार करू नये, राजद्रोक केला तर त्याला जलसमाधी द्यावी, गुरुपत्नीगमन-सुरापान असे गुन्हे केले तर मस्तकावर डाग देवून देशाबाहेर हाकलावे ई.

आरंभकालीन वैदिक स्वत:वर स्वत:हून बंधने घालतील ही शक्यता नव्हती. पण नवधर्मांतरीत लोक वैदिक धर्माशी अपरिचित असल्याने त्यांना धर्मात घेतांना, विशेषत: ब्राह्मण वर्णात घेतांना अशी कठोर बंधने घालणे त्यांना योग्य वाटले असल्यास नवल नाही. घुर्ये म्हणतात कि धर्मांतरीत वैदिक ब्राह्मण हे मुळच्या वैदिकांपेक्षा कडवे होते. कारण ही बंधने पाळण्यात त्यांना होणारे लाभही खूप होते. सर्वात मोठा लाभ म्हणजे प्रतिष्ठा.

 उपनयन

वैदिक धर्मात उपनयन हा अत्यंत महत्वाचा संस्कार मानला जातो. आरंभकाळात स्त्रीयांचेही उपनयन होत असे. पण याकडेही वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. वैदिक धर्मात मुळात हा संस्कार नव्हता. उपनयन म्हणजे स्नातकाला आचार्याकडे शिक्षणासाठी पाठवणे अथवा आचार्याने त्याला पुन्हा गर्भात धारण करून नवीन जन्म देणे. दोनदा जन्म म्हनून वैदिक लोकांना द्विज म्हणतात. उपनयन संस्कारात जानवे (यज्ञोपवित)  घालणे व गायत्री मंत्राची दीक्षा घेणे हे महत्वाचे विधी आहेत. परंतू ऋग्वेदात कोठेही हा संस्कार येत  नाही. जानवे , तेही तृणांचे अथवा लोकरीचे बनवलेले यज्ञप्रसंगीच पुरोहित घालत म्हणूनच त्याला "यज्ञोपवित" म्हणतात. ते नेहमी घालणे आवश्यक नव्हते.

परंतू हा नंतर वैदिक धर्मातील महत्वाचा संस्कार बनला. याचे मुळ धर्मांतरितांसाठीच्या विधीत आहे. इतर धर्मियांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दर्शवण्यासाठी काही खुणांची गरज होती. जानवे ही महत्वाची खुण बनली. किंबहुना उपनयन संस्कार झाल्याखेरीज ब्राह्मण आजही ब्राह्मण बनत नाही. तो अन्यधर्मीय, म्हणजे शुद्रच, राहतो. ज्ञानेश्वर व त्यांचा भावंडांनी मुंजीसाठी संघर्ष का केला हे आपण यातून समजावून घेवू शकतो. याचाच अर्थ असा कि उपनयन हा मुळात धर्मांतराचा विधी होता. नंतर तो स्नातकाने गुरूगृही जाण्यापुर्वीचा विधी     बनवण्यात आला.

"उपनयन" या शब्दाचा अर्थच मुळात "जवळ घेणे, सन्निकट करणे" असा आहे आणि हा धर्मांतराचा पर्यायवाची शब्द आहे हे उघड आहे. ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचे जानवे कसे वेगवेगळे असावे याचेही निर्देश वैदिक धर्मशास्त्रकारांनी दिले आहेत. थोडक्यात मुळात उपनयन विधी हा धर्मांतराचा विधी होता. आजही त्याचे स्वरूप, अर्थ वेगळा घेत जात असला तरी, बदललेले नाही. उपनयन न झालेल्या वैदिकांस "व्रात्य" अशीही संज्ञा एके काळी होती. व्रात्यांना वैदिक धर्मात स्थान नसे.
गोत्र
गोत्र म्हणजे या ऋषींच्या वंशातील माणसे. हा वंश जैविक असून अन्य गोत्र संस्थापकही यापैकीच कोणत्या ना कोणत्या ऋषीचे वंशज असून त्यांच्या नांवानेही गोत्रे निघाली आहेत. ही गोत्रे फक्त ब्राह्मण वर्णांना लागू असून क्षत्रीय व वैश्यांना ब्राह्मणांचीच गोत्रे दिली जातात. त्यांना स्वत:चे मुळ पुरुष नाहीत असा त्याचा एक अर्थ होतो. शुद्रांना गोत्र नसते कारण ते वेदबाह्य संस्कृतीचे लोक. पण आजकाल अनेक शुद्रांनाही आपली गोत्रे ब्राह्मण गोत्रांत शोधायची हौस असते असे दिसते.

बाराव्या शतकातील प्रवरमंजिरी या पुरुषोत्तम पंडिताच्या ग्रंथावरून दिसते कि ब्राह्मणांमद्ध्ये मुख्य फक्त सोळा गोत्रे होती. या जाती भारतात आलेल्या मुळ वैदिक आर्यांपैकी असाव्यात असे घुर्ये म्हणतात. (Gotra, पान २२८). पण महाभारतात मात्र प्रथम चारच गोत्रे (१-अंगिरा, २- कश्‍यप। ३- वशिष्‍ठ ४- भृगु ) होती असे सांगुन पुढे ती जमदग्नी, अत्री, विश्‍वामित्र आणि अगस्‍त्‍य यांची भर पडत आठ झाली असे उल्लेखले आहे. (महाभारत, शान्‍तिपर्व २९६ -१७ , १८ ) बौधायनही या आठच मुख्य गोत्रांचा स्पष्ट निर्देश करतो.

गोत्र संकल्पना मुळात ऋग्वेदात नाही. वेदकर्त्या ऋषीचे आनुवांशिकी जैविक वंश म्हणजे गोत्र हाही अर्थ बरोबर नाही. गोत्र म्हणजे खरे तर गायींचा गोठा. पाणिनी म्हणतो, ऋषीच्या पुत्रापासुन उत्पन्न होत गेलेल्या पुत्रांची शृंखला. (अष्टाध्यायी- ४.१.१७८). हा जैविक अर्थ नंतर आला असला तरी ज्या ऋषीच्या लोकांची सुक्ते पाठांतरीत ठेवीत, अध्यापन करीत अशा शिष्यांना त्या ऋषीचे गोत्र दिले जात होते असा अर्थ स्पष्टपणे काढता येतो. त्यामुळे सुरुवातीला बापाचे आणि मुलाचे गोत्र एक असण्याची शक्यता नाही. परंतू पुढे मात्र गोत्रेही वंशपरंपरागत (जन्माधारित) बनत गेल्याचे दिसते. यामुळेच क्षत्रीय व वैश्यांनाही ब्राह्मण गोत्रे (ऋषी मुळात ब्राह्मणही नव्हते कि कोणत्या अन्य वर्णाचे कारण वेद निर्माण होत असतांना जन्माधारित वर्णव्यवस्थाच अस्तित्वात आलेली नव्हती.) दिली जात होती हे उघड आहे. थोडक्यात गोत्र म्हणजे वंश नव्हे. ती एक भ्रामक समजूत आहे.

बाराव्य शतकापर्यंत केवळ १६ प्रमुख गोत्रे होती हे प्रवरमंजिरी सांगते. महाभारतात मुळात केवळ चार गोत्रे होती ती पुढे आठ बनली असे सांगितले आहे. पण पुढे गोत्रे ब्राह्मणांतही खूप वाढत गेली. आधीच्या धर्मांतरितांना एखाद्या वैदिक ऋषीचेच गोत्रनाम दिले जात असे. पण जसजसा धर्मांतरांचा विस्तार वाढला तसतसा ब्राह्मण वर्णातही गोंधळ सुरु झाला. आधी वैदिक धर्म कुरु-पांचाल व नंतर राजाश्रय मिळाल्याने गंगेच्या खो-यातही पसरला.

मुळात भारतात आलेले मुळचे वैदिक संख्येने अल्पसंख्य असल्याने त्यांनी आपल्यातीलच जवळपास २७ व्यक्तींना धर्मप्रसाराचे कार्य  दिले. हे प्रचारक इतरत्र पसरू लागले. परंतु उत्तर भारतात, कुरु-पांचाल व नंतर बिहार प्रांत वगळता त्यांना सहजासहजी बस्तान बसवता आले नाही. बालेय देश (महात्मा बळीच्या वंशजांची राज्ये, अंग, वंग, कलिंग ई.) वैदिक प्रचारकांना प्रवेशही करू देत नव्हते. दक्षीण भारत (विंध्याच्या पलिकडील प्रदेश) त्यांना माहितही नव्हता हे  शतपथ ब्राह्मण व मनुस्मृतीवरूनच दिसते.  अगस्ती (ऋग्वेदातील अगस्ती नव्हे) हा दक्खनेतील पहिला प्रचारक मानला जातो. सर्व पुराकथा या बाबीकडेच निर्देश करतात. वैदिक धर्माचा परिचय दाक्षिणात्यांना इसवी सनाच्या पहिल्या-दुस-या शतकाच्या दरम्यान झाला हे वि. का. राजवाडेंनी राधामाधवविलासचंपुच्या प्रस्तावनेत नोंदवलेले आहे.

एक येथे लक्षात घेतले पाहिजे, वैदिक आर्य आक्रमण वा निर्गमण सिद्धांत जरी गृहित धरला तरी तरी वरील विवेचनास काहीही बाधा येत नाही. कारण आक्रमक असले अथवा स्थलांतरीत तरी त्यांची मुळ संख्या ही कमीच होती. वैदिक आर्य भारतातीलच हा तलगेरींसारख्या पुनरज्जीवनवादी संशोधकाचा सिद्धांत खरा मानला तरी वरील मतांना बाध येत नाही. कारण वैदिक धर्म हरियाणात स्थापन झाचे ठाम प्रतिपादन आहे. त्या स्थापनेनंतर धर्म अन्यत्र पसरला असे त्यांचेच प्रतिपादन आहे. याचाच अर्थ असा कि धर्म प्रचारानेच पसरला हे कोणताही सिद्धांत गृहित धरला तरी अमान्य करता येत नाही.

घुर्ये म्हणतात कि वैदिक धर्मात अन्य विविध प्रदेशात राहणारे लोक घुसु लागले, त्यात ब्राह्मण वर्णात शिरणा-यांची संख्या अधिक होती. घुर्ये या लोकांना New recruits अशी संज्ञा देतात. ते म्हणतात कि अन्य प्रांतांतील ब्राह्मण आनुवांशिकी शरीररचना, चेहरेपट्टी व त्वचेचा रंग याबाबतीत एकमेकांशी कसलेही साम्य दर्शवत नाहीत, त्यामुळे ते मुळचे वैदिक आर्य होते असे म्हणता येत नाही. उलट एकाच प्रातातील ब्राह्मण मात्र त्याच प्रांतातील खालच्या जातीतील माणसांशी जास्त शारिरीक (आनुवांशिकी) साधर्म्ये दर्शवतात. म्हणजेच प्राचीन काळी त्या त्या भागातील लोक हे एकमेकांशे जैविक दृष्ट्या अधिकाधिक जवळचे असले पाहिजेत. आर्यपुर्व भारतियांचा वैदिक धर्मातील प्रवेश हेच यामागील कारण होय. (पहा- Caste and Race). एस. देवदास पिल्लै म्हणतात कि स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेणारे अनेक ब्राह्मण हे ना वैदिक कर्मकांडांचा गाभा जाणत ना त्यांना पुरोहितकार्याचे ज्ञान आहे, अनेक ब्राह्मण पोटजातींत ब्राह्मणांना एरवी निषिद्ध असलेल्या खाद्यप्रथाही आहेत. यावरून घुर्येंचे मत बरोबर वाटते. (Indian Sociology Through Ghurye, a Dictionary, By S. Devadas Pillai)

घुर्ये यांनी एपिग्राफिका इंडिका या ग्रंथात प्रकाशित दिडशे दानपत्रे (ताम्रपट व शिलालेक) यांचे विश्लेशन जे केलेय ते महत्वाचे आहे. या पटांत एकूण  ३१६१ ब्राह्मणांचा उल्लेख आहे ज्यांना जमीनी दान केल्या गेल्या. यात आसाम, राजस्थन व मध्यप्रदेश धरून उत्तर भारत, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू प्रांतांत दिल्या गेलेल्या दानपत्रांचा समावेश आहे. हे ताम्रपट/लेख इ.स. पाचव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा कालातील आहेत.घुर्येंची निरिक्षणे अशी:

१) या दानलेखांत ज्यांना दान दिलेले अहे अशांची एकूण १२४ गोत्रे नोंदलेली आहेत. त्यातील ७७ गोत्रे ही अन्य प्रांतांत, अगदी निकटच्या प्रांतातीलही, लेखांतही पुनरोल्लिखित नाहीत.

२) फक्त १२ गोत्रे ही सर्व प्रांतात (वर उल्लेखलेल्या) सारखी मिळून येतात. त्या १२ पैकी भरद्वाज व कश्यप ही गोत्रे सर्वाधिक वेळा उल्लेखलेली आहेत. म्हणजे ही गोत्रे अधिक चलनात होती. ("Widest curency" त्यांचे शब्द)

३) या १२४ गोत्रांपैकी २१ गोत्रे ही गोत्र-प्रवरांची माहिती देणा-या समकालीन धर्मग्रंथात आढळून येत नाहीत.

४) छत्तीसगढ भागातील गोत्र-प्रवरे शंका प्रबळ करतात कि ही गोत्रे सर्वस्वी अनार्य (अवैदिक) परंपरेतून आलेली आहेत.

५) जुन्या काळातील ताम्रपटांत गोत्रे व प्रवरे यांची सांगड इतक्या चुकीच्या पद्धतीने घातलेली आहे कि जणू काही कोणी ब्राह्मण म्हणवण्याचा केवळ फायदा उचलण्यासाठी ती "बनवून" टाकलेली आहेत. (पहा, Gotra, डा. जी.एस. घुर्ये)

घुर्येंची निरिक्षणे खालील बाब अधोरेखित करतात.

१) भारतातील असंख्य ब्राह्मण उपजाती या मुळच्या वैदिक नाहीत.
२) अनेक मुळचे धर्मांतरीतही ब्राह्मण नसतांना बनावटगि-या करत ब्राह्मण बनले.
३) त्यामुळेच ब्राह्मण समुदायात विविध प्रांतांत आनुवांशिकी साम्य मिळत नाही.

(आर्य-अनार्य हे शब्द घुर्येंनी वापरले आहेत. या शब्दांना वांशिक रंग असल्याने वैदिक-अवैदिक या संज्ञा मी वापरल्या आहेत.)

वाचक सहजपणे माध्व ब्राह्मण, दीक्षितार, नंपुतीरी, ओडिया, चित्पावन, देशस्थ ब्राह्मणात शारिरिक तुलना करून पाहू शकतात. भारतीय संस्कृती कोशसुद्धा (खंड ६, पान ३२३) म्हणतो कि ब्राह्मण वर्णातील लोक एकवंशीय नव्हते. अनेक अनार्य तसेच द्रविडांनाही ब्राह्मणत्व दिले गेले. म्हणजेच त्यांचे धर्मांतर केले गेले. धर्म प्रचार करायचा तर हे स्वाभाविक होते.गुप्त राजांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिल्यामुळे वैदिक ब्राह्मण महत्ता वाढल्यावर त्या धर्मात जाण्याची प्रथा वाढली असू शकते.

येथे आपल्याला तीन प्रकारचे ब्राह्मण भेटतात. पहिले म्हणजे मुळचे वैदिक स्थलांतरितांपैकीचे, पण कालौघात येथील स्थानिकांत रक्तसंबंधाने मिसळून गेलेले ब्राह्मण. दुसरे म्हणजे धर्मांतरीत ब्राह्मण व तिसरे म्हणजे केवळ ब्राह्मण असण्याचे फायदे लाटण्यासाठी बनावटगि-या करत बनलेले ब्राह्मण. आरंभ काळातील ब्राह्मण हे आपल्याला कट्टर वैदिक दिसतात. त्यांच्या मुळच्या ग्रंथांत मुर्तीपुजेचा साधा उल्लेखही येत नाही. पण गुप्तकालोत्तर ग्रंथांत श्रौत-स्मार्त असे फरक दिसायला लागतात. कारण वैदिक धर्माला मुर्तीपुजा मान्य नसतांना, केवळ यज्ञ हे कर्मकांड निहित असतांनाही नंतर वैदिक झालेले काही प्रांतातील ब्राह्मण आपल्या मुळच्या पुजेलाही चिकटून बसले याचे कारण ते धर्मांतरित आहेत व मुळचे संस्कारही सोडू शकले नाहीत यात आहे. एका अर्थाने ते द्वैधर्मी ठरतात. म्हणजे एकीकडे ते  सर्व संस्कार वैदिक पद्धतीने करतात तर दुसरीकडे वेदांना निषिद्ध अशी मुर्तीपुजाही करतात. काही तर तेही न करता केवळ स्वार्थभावनेने जुन्या काळातच स्व्यंघोषित ब्राह्मण बनले आहेत. भुमिहार, सांचोरा, नंपुतीरी, चित्पावन वगैरे असे ब्राह्मण आहेत. घुर्येंनी जे ताम्रपट अभ्यासलेत ते  पाचव्या शतकानंतरचे, गुप्तकाळ व गुप्तकालोत्तर आहेत हेही उल्लेखनीय आहे. अर्थात  धर्मांतराची परंपरा उत्तरेत सर्वात आधी सुरु झाली. नंतर ती अन्य प्रांतात क्रमश: पसरत गेली असे एकंदरित प्रसाराचे जे टप्पे मिळतात त्यावरून दिसते.

वैदिक धर्म विरोधी बुद्ध-महावीर-चार्वाकादी गंगेच्याच खो-यात (बिहार) इसपू सहाव्या शतकात उदयाला आले कारण त्यांच्या काळात वैदिक धर्म तेथेच तेवढा प्रचलित होता. अन्यत्र नाही म्हणून त्याला विरोधाचे कारनही नव्हते. अन्यत्र हा धर्म जसजसा पसरत गेला तसतसे धर्म स्विकारणारे जसे मिळाले तसेच विरोध करणारे मुळ धर्माचे लोकही त्यांच्या विरोधात उभे ठाकले हे आपल्याला दुस-या तिस-या शतकानंतरच घडलेले दिसते.  कारण अन्यत्र प्रचार होण्याचा काळ याच्या एक-दोन शतके आधीचा.

गुप्त काळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्यामुळे वैदिक धर्माचा तिसरा टप्पाही सुरु झाला. वैदिक धर्मात दक्षेण ते उत्तर भारतातील अनेक लोक दाखल होऊ लागल्याने स्मृत्यांतील बंधने सर्वांवर लादता येणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रौत व स्मार्त असे दोन गट वैदिक धर्मात पडले तसेच पंचद्रविड व पंचगौड असे प्रादेशिक दोन विभेदही पडले. श्रौत हे वैदिक धर्माच्या अधिक निकटचे तर  स्मार्त हे मुर्तीपुजक व अद्वैत सिद्धांतही मानणारे. आल्फ हिल्टेबिटल यांच्या मतेही वैदिक परंपरेत अवैदिक परंपरा मिसळुण स्मार्त शाखेचा उदय झाला. खरे तर अवैदिकांनी वैदिक धम स्विकारतांना आपल्याहे परंपरा तेवढ्याच ताकदीने कायम ठेवल्याने जी परिस्थिती निर्माण झाली त्यातुनच ही परंपरा निर्माण झाली. थोडक्यात स्मार्त ब्राह्मण हे सर्वात शेवटी धर्मांतरीत झालेले वैदिक होत. पण कर्मठ वैदिकांनी जी परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांन श्रौत ब्राह्मण असे म्हटले जावू लागले. हे ब्राह्मण वैदिकांची वेदपरंपरा व यज्ञविधान जपण्यात अग्रेसर राहिले. थोडक्यात मुळ वैदिक धर्म यांनी कायम ठेवला. अर्थातच श्रौत ब्राह्मण भारतात अत्यल्प असेच आहेत.

यावरुन एक बाब स्पष्ट होते व ती म्हणजे वैदिक धर्मात सर्वात आधी जे मुलभारतीय प्रवेशले त्यांनी हिरीरीने वैदिक धर्म परंपरा जपल्या. उत्तरकाळात जे वैदिक धर्मात आले त्यांनी वैदिक धर्म तर स्विकारला पण आपल्या अवैदिक परंपराही कायम ठेवल्या. त्यासाठी नवे तत्वज्ञान जन्माला घातले.

यामुळे एक बाब लक्षात घ्यावी लागते ती अशी कि भारतीय ब्राह्मण हे बाहेरचे आहेत या मान्यतेला काही अर्थ नाही. ब्राह्मण हे स्वत:च जवळपास साडेतिनशे जाती-पोटजातींत विखुरले असल्याने ते जातीसंस्थेचे निर्माते आहेत या मतातही तथ्य नाही. आज ब्राह्मणांत वर्णानुसार ते समान असले तरी वैदिक ब्राह्मण (म्हणजे जो यज्ञयाग करतो तो) श्रेष्ठ मानला जात मग दैवज्ञ कुटुंबांचे पौरोहित्य करणारे, ज्योतिषी, पंचाक्षरी व पुजारी अशी जातीय उतरंडही त्यांच्यात आहे. ब्राह्मणात देशभर जवळपास ३५० पोटजाती असून त्यांच्यातही उच्च-नीचतेचा दुराभिमान आहेच.

असे असले तरी वेदोक्त संस्कारांचे व वेदांवरचे अधिकार या सर्वच ब्राह्मणांनी मान्य केलेले असल्याने जरी अनेक हिंदू परंपरा ते त्यांचे वैदिकीकरण करत पाळत असले तरी त्यांचा धर्म मात्र हिंदू नसून वैदिकच ठरतो. 

माझ्या लग्नाची गोष्ट...


१९७९. मी एफ. वाय. बी. कोमला होतो. डा. अशोक वैद्य यांचा कंपाउंडर म्हणून काम करायचो. नियमित कोलेज कधे केले नाही. फक्त सेमिनार व परिक्षेपुरता जायचो. पाबळ (तेच मस्तानीचे) येथे रहायचो. कोलेज राजगुरुनगरला. एसटीचा पास ४० रुपयांत मिळायचा. तेवढे पैसे नसायचेच. त्यामुले ते कधी शक्य झाले नाही. सेमिनार-परिक्षेला वाळूच्या ट्रकने जायचो. डा. अशोक वैद्य यांचे एक मित्र होते पुण्याला. कलतारसिंग पंजाबी. त्यांच्याबरोबर एकदा पुण्यात आलो. त्यांच्या घरी गेलो. तेथे भेट झाली पुष्पा पंजाबीशी. तिचा नववीचा रिझल्ट आला होता. उत्साहाने दाखवत होती. मी प्रेमात पडलो.

कधी व्यक्त केले नाही. डायरी मात्र लिहू लागलो. पुण्याला मला एकटे येता येणे शक्यच नसायचे. पैसे कोठायत? गेलो तर वैद्यजींबरोबर. आम्ही गप्पा खूप मारायचो. त्या काळात मी रशियन कादंब-या अनेक वाचत असल्याने इंप्रेशन मारायला टोल्स्टाय ते शोलोखोव यांच्यावरच जास्त बोलायचो. कपडे म्हणाल तर पायजमा व छपरी शर्ट. ( त्या शर्टाचीही एक कहाणी आहे.) आपल्यातल्या न्यूनता माणूस दुस-या अंगाने भरुन काढायचा प्रयत्न करतो म्हणतात...मी माझी अक्कल पाजळायचा उद्योग केला.
ती दहावी पास झाली. तिला अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून अनेक कोलेजांचे फोर्म रांगेत उभे राहून आणले. पण प्रयत्न होता सेंट मीराजचा. आणि लागला नंबर सेंट मिराजमद्ध्ये. कारण ती फक्त मुलींची शाळा-कोलेज वगैरे. किमान संभाव्य स्पर्धकांचा मी असा बालीश बंदोबस्त केला.

अजून तिला मी तिच्यावर प्रेम करतो हे माहित नव्हते. मी सांगायची हिंम्मत करणे शक्य नव्हते. वर्षामागून वर्षे गेली. मी एम. कोम. करायला पुण्यात आलो. आधी एका मराठी नंतर हिंदी पेपरमद्ध्ये काम करत शिकत होतो. पगार होता दिडशे रुपये. तेंव्हा खानावळ होती महिना २५० ते ३०० रुपयांची. एक वेळचीच खानावळ लावत महिना ५ रुपये भाड्याचे शनिवार वाड्याजवळील शिक्षकांच्या मुलांच्यासाठी असलेल्या होस्टेलमधे आधी आणि नंतर खुद्द दैनिकाच्याच कार्यालयात राहत होतो. डा. वैद्य पाबळलाच सुटल्याने तिच्या घरी जायला निमित्तही नव्हते. माझ्या मित्रांना पिडत तिच्या इमारतीखाली तासंतास उभा रहात ती दिसेल या आशेने उभा रहायचो.

एकदा तिच्या घरी जायची संधी मिळवली. माझ्या हाती त्या दिवशी माझी डायरी होती. घरी ती होती. तिची मम्मीही होती. (बाप महाखडूस) गप्पा मारत बसलो. तिने मला अचानक माझी डायरी मागितली. मी काही देईना. तिने घेतलीच. दोनचार पाने उलटली. मी आता जातो जीव कि नंतर असा बसलो. म्हटलो आता खा खेटर. या घरातला आजचा शेवटचा दिवस नि हे शेवटचे दर्शन. तिचा चेहरा गंभीर झाला. डायरी माझ्या हाती दिली. "तुज्याकडून ही अपेक्षा नव्हती..." ती म्हणाली. मी गारेगार झालो होतो. मी "येतो..." म्हणून जे सटकलो तो सटकलोच.

आता तिला माझ्या मनात काय आहे हे तर माहित होतेच. माझी आर्थिक स्थिती तर दरिद्र वस्त्रे घालून बसलेली. पण म्हणतात ना...दिल है कि मानता नहीं. मी तिला कोलेजच्या बाहेर तिष्ठत भेटायचा प्रयत्न करायचो...तर ती झुरळाकडे टाकावा तसा कटाक्ष टाके. तिच्या मैत्रिणींना माझी दया येई. माझी निष्ठा पाहून तर एक मैतरणी मला म्हणाली, असला लवर मला मिळायला हवा होता. (कोणता चित्रपट पाहून आली होती कोणासठाऊक!) ती काही त्या लायकीची मला वाटलीच नाही पण मी तिलाच माझा पोस्टवुमन बनवले. माझी प्रदिर्घ (तेवढी मी कथाही लिहित नाही) पत्रे तिच्या माध्यमातून तिला पाठवे. उत्तर कधी आले नाही. तिच्या वाढदिवसाला तर मी एकदा कोलेजच्या पत्त्यावर चक्क तार पाठवली. तिच्या मास्तरणीने तिला झाप झाप झापले हे मला नंतर समजले. पण मामला काही केल्या फिट होईना. उलट बिघडला.

सात वर्ष गेली. तोवर माझी काही पुस्तके प्रसिद्धही झाली होती. आवर्जुन धाकाकत्या हृदयाने मैत्रीणीमार्फत पाठवलीही होती. तिला त्याचे कसले कौतूक?

पण १९८६ साल पावलं. माझा प्री-थिसीस एका इंग्लंडमधील विद्यापीठाने स्विकारला आणि मला आशिया खंडातील धर्मांवर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी निमंत्रित केलं. माझा जीव तर इकडे. मी कळवळून शेवटचं पत्र लिहिलं. "आता तरी हो म्हण...नाहीतर मी चाललो इंग्लंडला..." आणि काय चमत्कार....दुस-या दिवशीच मला उत्तर मिळाले. पहिले उत्तर!
झाले. इंग्लंड रद्द! ती भेटली बाहेर. हृदय तळहातावर ठेवून बोललो. तशी ती भावनिक नाही. पण त्या दिवशी तीही भावूक होती. मी अजून दरिद्रीच होतो. भविष्याची स्वप्ने दाखवायची माझी लायकीच नव्हती.

नंतर मी व्यवसायात पडलो...जाहिरात व्यवसायात. आणि पैशांचा माझ्याकडे ओघ सुरु झाला. भाड्याच्या सायकलने पुणे पालथे घालणारा मी चक्क एम-५० चा मालक झालो. नंतर फियाटही घेतली. (नंतर माझ्या आयुष्यात सगळ्या अत्याधुनिक कार्स येवून गेल्या) एम्प्रेस गार्डन हे आमचे संकेतस्थळ बनले. दर सोमवारी आम्ही भेटायचो. हा सोमवार एवढा मित्र-मैत्रीणींत गाजलेला कि अमिता नायडू "Waiting on Monday!" नांवाची कादंबरी लिहिन म्हणत होती.

१९८९ आले. मी तिला एम्प्रेस गार्डनमधुन तिच्या घराच्या जवळ कोप-यावर सोडायला आलो. कसे कोणास ठाऊक कलतारसिंग पंजाबींनी आम्हाला पाहिलं. काही बोलले नाहीत. घरी जाऊन पोरीवर जाळ काढला. ते तिला घेऊन दुस-या दिवशी माझ्या कार्यालयात रिक्षाने आले. प्रशांत पोखरकरांसोबत मी तेंव्हा चित्रपट पहायला गेलेलो. वाचलो. कारण महाराज सुरा बरोबर घेऊन आलेले.

पण नंतर वार्ता समजली. मी हतबुद्ध झालो. मी आमचे दादाजी उर्फ दिनेश गंगावणेंना कळवले. ते म्हणाले...आलोच! आम्ही भेटलो. आम्ही तिच्या घरावर धाड घालायचा निर्णय घेतला. त्याच सायंकाळी मी आणि दादाजी तिच्या घरात हजर. बापाने मला पाहिले आणि सन्नकण त्यांच्या मुलीच्या थोबाडीत वाजवली. काही चर्चा करावी अशी स्थिती नव्हती. मी राणीला (हे तिचे घरातील नांव) म्हणालो..."चल..."

एका सेकंदात ती बाहेर पडली. आम्हीही बाहेर पडलो. दार बंद करून बाहेरची कडी लावली. खाली आलो. दादाजींनी रिक्षा करुन दिली. सरळ चिखली गाठली. आईने आम्हा उभयतांना पाहिले. आया मनकवड्या. घरात घेतले. काही विचारत बसली नाही. दादा घरात आले...वेगळे वातावरण पाहून बालसुलभ प्रश्न विचारले...पंचांग काढले...म्हणाले...परवा आळंदीला जावून लग्न लावून टाकु.

तिचा जीव किती भांड्यात पडला मला माहित नाही...पण मला तर स्वर्ग जिंकलो असे झाले होते. खिशात पैसे नव्हते. पिंपरीला माझा क्लायंट होते. परमानंद झमतानी. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी ड्रावरमधून एक सेकंदात ३,००० रुपये काढून दिले. खरे तर एक मराठी पोरगा सिंधी मुलीशी लग्न करतोय म्हटल्यावर त्यांनी, एकुणातील जातीय/प्रांतवादी स्थिती पाहता मदत नसती केली तरी वाईट वाटले नसते. पण केली. मी घरी येईपर्यंत माझ्या बहिणीचेही पिनाककांत दत्त यांच्याबरोबर प्रलंबित असलेले लग्न आळंदीलाच करायचे ठरले होते.

दुधात साखर.

आम्ही घरचे पाचसहा आणि नियोजित वधू-वर एका मालवाहतूक टेंपोत बसून-लटकून आळंदीला पोहोचलो. कोणत्यातरी देवळात आमचे लग्न लागले. दोन हजार रुपये खर्च आला. (दोन लग्नांचा, म्हणजे हजारी एक लग्न पडले.) सायंकाळी आम्ही नव्या भावनिक जगात जायला, नवी आव्हाने घ्यायला सज्ज झालो.

सासरे नंतर मुलगी झाल्यानंतरसुद्धा भेटायला आले नाहीत. सासू तर आईच. मी नसतांना लेकीला भेटून जायची. सास-यांना मी भेटलो लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर.

झमतानींना मी ३००० रुपये परत करू शकलो नाही...म्हणजे त्यांनी घेतलेच नाहीत. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी. त्यांचा फोन आला नाही असा एक वाढदिवस गेला नाही.

हे का सांगत आहे?

प्रेम ही शक्ती आहे. लग्नात तुम्ही किती उधळता याने तुमचे प्रेम किंवा प्रतिष्ठा ठरत नाही. प्रतिष्ठा ही नेक जगूनच मिळते. एकमेकांचे होऊनच मिळते. लग्न करतो म्हणजे आपण एकमेकांना वचन देतो...समाजासमोर! ते वैभव दाखवण्यासाठी नाही. निष्ठा आणि समर्पण दाखवण्यासाठी! मी नंतर चांगलाच वागलो असे नाही. मी रुढ सामाजिक संकेत धिडकारले आणि प्रेमाचे अद्वितीय आविष्कार भोगले...जगलो....पण तेही निष्ठेने,..सवंगपणे नाही.

लग्नात तुम्ही किती खर्च करता हे महत्वाचे नाही....तुम्हाला प्रेम करता येते का, निस्सीम मन:पूत जगता येते का...
हा खरा प्रश्न आहे!

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...