Tuesday, May 26, 2015

आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

आपली प्रगती साधन्यासाठी स्वाभिमानाने स्वबलावर उभे राहण्यासाठी जी मानसिकता बनवावी लागते ती क्षमता आमच्या समाजव्यवस्थेत व धुरिणांत मुळातच नसेल तर आपल्याला मुळात संस्कृतीच नाही असे म्हणावे लागते. आर्थिक सक्षम समाजच संस्कृती घडवू शकतात. यासाठी समाज-विजिगिशुता लागते. प्रगतीची भीक नव्हे तर प्रगतीत सर्जनात्मक सहभाग लागतो. मागचे गुणगौरव सोडा...आज भारतात कोणत्वी नेमकी संस्कृती आहे याचा शोध घेऊन पहा. आम्ही उभारणारे नव्हे तर उध्वस्त करणारे बनलो आहोत. खुनशी जातियवादाने आमचाच नाश आरंभला आहे तरी त्याचे भान नाही. उलट जोतो कोणत्या ना कोणत्या झुंडीत जाऊ पाहतो आहे. झुंडीशिवाय जगता येणे ज्या समाजात अशक्य बनून जाते त्या समाजाची काय संस्कृती असणार? जेथे साहित्यरचनाही जातीयच भावनेतून लिहिल्या अथवा वाचल्या जातात ते काय संस्कृतीचे निर्माण करणार? 

साधे पाण्याचे घ्या. आपल्याकडे दुष्काळ पडला तरी इस्त्राएलच्या शंभरपट पाऊस पडलेला असतोच. तरी पावसाने ओढ दिली कि पाण्याची बोंबाबोंब सुरुच. आमचा शेतकरी शक्य असुनही, हजारो वर्ष शेतीत असुनही पाण्याचे नियोजन त्याला करता येत नाही. परत वर स्वत:ला तो सिंधु संस्कृतीचा वारसदार म्हणवतो. पाच हजार वर्षांपुर्वी ज्या कौशल्याने त्यांनी पाण्याचे नियोजन केले त्यामुळे सिंधू लोक तत्कालीन ज्ञान जगाशी व्यापार करत सुबत्तेला पोचले. आम्ही आजचे? ते जुने जाऊद्या, ७२च्या दु:ष्काळात बनवलेली जवळपास ९५% गांवतळी आज गाळ भरुन क्रिकेटची मैदाने झाली आहेत. जलसंधारणाचा कार्यक्रम आपल्याच स्वार्थासाठी का होईना स्वत: राबवावा हे आजही आम्हाला समजत नसेल तर आम्ही दरिद्रीच राहणार. नेत्यांना तेच हवे. अब्जावधी रुपये कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवत आमचे जलसंधारनातील महनिये जर तालुकेच्या तालुके खरेदी करण्याच्याच मोहिमेवर असतील तर दुसरे काय होणार? जेथे पाणी मुबलक असते तेथे एवढी उधळपट्टी कि पाहुन वाटते...हे लोक दुष्काळातच सडायच्याच लायकीचे आहेत.

जर प्रजेलाच अक्कल नसेल तर नेत्यांकडुन कोणत्या प्रामाणिकपणाची अपेक्षा करणार? शेतकरी दुर्बल झाला आहे तो यामुळे आणि दु:ष्काळ वा अतिवृष्टी झाली तर प्यकेजेस येणार-कर्जमाफ्या होणार-वीज्बिले माफ होनार....खात्रीच असतेना हो! मग कशाला कष्ट करा? पारावर चकाट्या पिटायला आणि नेत्यांच्या मागेपुढे हिंडण्यात ज्यांना कार्यशीलता वाटते असा कोणताही समाज कधीही प्रगती करुन स्वत:च्या पायावर उभा राहु शकत नाही.

आणि ही बेईमानी वृत्ती कोणत्या क्षेत्रात नाही? भारतातील बहुसंख्य कंपन्यांचे ताळेबंद हे लबाड्यांनी भरलेले असतात. ब्यंकांचे ताळेबंदही याला अपवाद नाहीत.

मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार?

एकीकडे आमच्या भागात प्रकल्प नाहीत म्हणून बोंब मारायची आणि एखादा प्रकल्प येवू घातला रे घातला कि आमच्याच स्वयंसेवी संस्था ते राजकारणी त्या विरोधात बोंब मारु लागतात. एन्रोन ग्यसवरचा प्रकल्प होता...तेंव्हाही तेच आणि जैतापूर प्रकल्प आण्विक आहे तेंव्हाही तेच. मुदे बदलतात...पण विरोध राहतातच...त्यासाठी खोट्यांचा आश्रय घ्यायला आम्ही कमी करत नाही.

अशा बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती कशी घडणार?
.
 आणि काही लोक चालले भ्रष्टाचार निर्मुलन म्हणजेच क्रांती असा नारा द्यायला.

 आपल्या प्रजेची मानसिक भ्रष्टता व त्यामुळेच आलेली नवनिर्मानातील पंगुता यावर आपण कधी चर्चा करनार आहोत?
 भारताने असा काय मौलिक शोध गेल्या हजार वर्षांत लावुन दाखवलाय कि ज्याचा जागतीक अर्थव्यवस्थेवर व जीवनव्यवस्थेवर प्रभाव पडलाय?

 आमच्या शिक्षणव्यवस्थेने आमची सृजनात्मकता मारुन टाकलीय. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. आम्हीही आमच्या पोरांना असेच गुलाम बनवणार यात शंका नाही.

 मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय?

आणी मग हेच स्वत:हुनच गुलाम बनलेले पुरातन संस्कृतीच्या गौरवगाथांत रमत आपल्या भ्रष्ट मानसिकतेचे उदात्तीकरण करु पाहतात. लोकांनाही त्यात रमायला आवडते. निर्माणाचे सोस संपतात. चीन हे शत्रुराष्ट्र म्हणायचे, सीमावाद खेळत बसायचे आणि चीनलाच भारतात अब्जावधी डालर्सच्या गुंतवणुकींचे साकडे घालायचे...हा अजब धंदा भारतीयच करु शकतात!

ही मानसिकता आम्ही कशी आणि का बनवून घेतली?

Wednesday, May 20, 2015

विचार आणि भाषा

विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत. पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषा ही कृत्रीम अवस्था आहे. मनुष्याने ती गरजेसाठी पुराकाळापासून विकसीत केलेली आहे. त्याची, पुराकाळातील माणसाची, अभिव्यक्ती आपण आजच्या परिप्रेक्षात समजावून घेऊ शकण्यात तोकडे पडतो ते त्यामुळेच. पुरातन मानव मिथ्गकांतुनच जगाकडे पाहत होता. शब्दांत (भाषेत) उतरलेली मिथके आणि त्याला अभिप्रेत मिथके यात पुरेसे साम्य असण्याची शक्यता नाही, कारण कोणत्या शब्दाने त्याला काय अभिप्रेत होते हे आपण नीट समजावून घेऊ शकत नाही, घ्यायचे झाले तर खुप प्रयास करावे लागतात, थोडे आदिम बनावे लागते. कारण आपले विचार, आजचे, वरकरणी भाषेत झाले आहेत असे वाटले तरी अगणित विचार भाषाविहिन असतात, आणि त्यांना आपण सुप्त अथवा अव्यक्त विचार म्हणत असलो तरी ते मानसिकतेवर परिणाम करत असतात. 

दुसरे असे कि जगभरच्या मानवाच्या विचारपद्धतींत अथवा मानसिकतेत एक प्रकारचे नैसर्गिक समानत्व आहे. अभिव्यक्तीच्या पद्धती वेगळ्या असतील, पण मिथ्थकथा नाहीत, भाषा नाही, कला नाही असा जगात एकही मानवी समुदाय नाही. स्थानिक भौगोलिक संरचनांमुळे निर्माण होणा-या मानसिक प्रभावांतून अभिव्यक्त्यांचे स्वरुप बदलत असले तरी अभिव्यक्ती ही असतेच. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठपणा ठरवायचा प्रयत्न चुकीचा ठरतोइ तो यामुळेच.

भाषा ही माणसाची नैसर्गिक आणि मुलभूत गरज आणि उपज आहे असे मानशास्त्रज्ञही मानतात. भाषेचा प्रवास हा विलक्षण आहे. तो प्रत्येक काळात, प्रत्येक मानवी समुहाच्या आणि व्यक्तीकेंद्रित संस्कृतीचा उद्गार आहे. एक उदाहरण देतो, कारस्थान हा शब्द एकोणिसाव्या शतकापर्यंत, खटपटी-लटपटी करुन बुद्धीमानता दाखवत यश मिळवणारा/री यांना उद्देशुन वापरला जाई. आता मी कोणाला कारस्थानी म्हटले तर तो माझा गळाच आवळायला धावेल. इतिहासात अनेक शब्द आणि संज्ञांचे असे झाले आहे, याला कारण शब्द हे काळाप्रमाणे, त्या काळच्या सांस्कृतिक गरजांप्रमाणे अर्थ बदलत जातात, वेगवेगळ्या छटा धारण करत जातात किंवा भाषेतुनच बाद होत जातात. जसे जाते, उंबरा, उखळ ई अनेक शब्द मराठीतुन बाद होत चालले आहेत. किंवा उद्या हे शब्द राहतीलही कदाचित पण त्या शब्दांनी निर्दिष्ट होणारे अर्थ वेगळे असतील.

हा भाषेचा प्रवास पिढी-दर-पिढी बदलत जातो, आणि तीच भाषेची गंमत आहे. आता आपण प्राचीन काळात जाऊ. गो, म्हणजे गाय, या शब्दातुन गाय, आकाश, ढग, नदी, झरे ई अनेक अर्थ परिस्थितीजन्य अर्थभेद दाखवतात. यात त्या काळच्या माणसाने कशी कल्पना केली असेल हे आपण (समजायचे असेल तरच) समजु शकतो. पण पर्यायी शब्दांची अडचणही एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरायची सवय लावत असेल असेही आहे.

शब्द किंवा भाषा ही नेहमीच तोटक्या असतात. नवीन शब्द निर्माण करण्यात आजचा आधुनिक माणूस कमी पडतो असे म्हटले जाते., व्याकरणाची मोडतोड करत व्यामिश्र नि गुंतागुंतीचा, विद्यमान भाषेत न मांडता येणारा विचार, मांडायचा तर भाषेला आहे तशी वापरुन ते साध्य करता येत नाही. भाषांना प्रवाही ठेवायचे कि प्रमाणभाषांच्या नादान्या करत भाषा बंदिस्त करत नेत तिचा विकास खुंटवायचा हे आपल्याला पहावे लागेल. थोडक्यात भाषेचा प्रवाह जेवढा अग्रगामी ठेवला जाईल तेवढीच ती विचारांना शब्द देण्यात यशस्वी ठरेल. आदिमानवांच्या गुहाचित्रांतील रेषांत जो जोम आढळतो तो आधुनिक चित्रकारांना साधता येत नाही याबद्दल अनेकदा कला क्षेत्रात चिंता असते. पुरातन मानवांनी शब्द निर्माण केले पण त्यात आपण आधुनिक काळात किती भर घालु शकलो हा एक प्रश्नच आहे.

थोडक्यात विचार भाषेत येत नसून भाषा हे विचारांचे माध्यम आहे. म्हणजेच आपण नकळत विचार भाषेत अनुवाद करुन मांडतो. नि म्हणूनच विचारजसे येतात तसेच्या तसे मुलार्थाने कधीही मांडता येत नाहीत, तीच भाषेची सर्वात मोठी अडचण आहे. भाषेच्या उपयुक्ततेसहित ही सर्वात मोठी असलेली भाषेची अडचण समजावून घेता आली पाहिजे, भाषेला रुढ व्याकरण अथवा शब्दमाला यापार जात व्यक्त व्हायला हवे! गुंतागुंतीच्या विचारांना नवे शब्दरुप देता यायला हवे.

त्यासाठी आपला मानवी समाज तेवढा प्रतिभाशाली आहे काय?

नागरिकांचा आर्थिक जाहिरनामा

नागरिकांचा आर्थिक जाहिरनामा

आम्हा भारतीय नागरिकांना शाश्वत वर्तमान आणि भविष्यासाठी खालीलप्रमाणे अर्थव्यवस्थेची रचना हवी आहे.

१) आम्हाला जम्मु-काश्मिर, पुर्वोत्तर राज्ये ते देशातील सर्व अविकसित भागांत संतुलित प्रमाणात उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण हवे आहे. जेथे प्रमाणाबाहेर केंद्रीकरण झाले आहे तेथील उद्योग अन्य विभागांत कसे हलवता येतील व नवीन उद्योगांना परवानगी दिली जाणार नाही असे कायदे / धोरण हवे आहे.

२) अविकसित भागांतील नैसर्गिक ते कृषी उत्पन्न संसाधनांवर प्रक्रिया/अर्धप्रक्रिया करणारे उद्योग हवे आहेत. आमची नैसर्गिक संशाधने या सर्व देशाची मालमत्ता असून त्यांची येथेच कसलीही प्रक्रिया न करता निर्यात करण्याचे धोरण आम्ही साफ नाकारतो. अन्न-धान्ये, फळ-भाज्या ई. ते खनिजे व इतर संसाधनांवर त्या-त्या प्रदेशातच उद्योग (खाजगी अथवा सरकारी भागीदारीत) निघायलाच हवेत.

३) यासाठी नव-उद्योजक प्रतिभांना प्रशिक्षण/वित्तपुरवठा/एक-खिडकी परवाना या सुविधा अग्रक्रमाने दिल्या जातील याबद्दल धोरण / कायदे अत्यावश्यक आहेत.

४) प्रत्येक प्रदेशात मोठे उद्योगांच्या प्रमाणात मध्यम व लघु उद्योगांचे प्रमाण ठरवुन दिले पाहिजे. विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर त्या प्रदेशात/ शहरात नवे उद्योग होणारच नाहीत यासाठी बंधने घातली पाहिजेत.

५) विदेशी गुंतवणुका रिटेल अथवा भांडवली बाजार यांसारख्या क्षेत्रात न घेता रस्ते, वीज, अवजड कारखाने, वाहतुक ई.. सारख्या पायाभुत संरचनेला उपयुक्त अशाच क्षेत्रात घेतल्या गेल्या पाहिजेत.

६) शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणाचे धोरण रद्द केले पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य हे शासनाचेच घटनात्मक कर्तव्य आहे. त्यातुन त्यांनी अंग काढून घेऊ नये.

७) सरकारी उद्योग निर्गुंतवणूक न करता शासनाच्याच अखत्यारीतील बाब रहावी. अधिकाधिक राष्ट्रीय गरजेच्या क्षेत्रात सरकारी उद्योग असलेच पाहिजेत. अर्थात अधिकाधिक कार्यक्षमतेसाठी अधिकारी/सेवकांवर आवश्यक नियंत्रणे ठेवलीच पाहिजेत. उत्पादकता दाखवणार नाहीत अशा कर्मचारी/अधिकारी यांना त्वरित निलंबनासाठी कायद्यांत आवश्यक बदल झालेच पाहिजेत.

८) भारतीय पीकवैविध्य जपण्यासाठी शेतक-यांसाठी व्यापक मोहिम चालवली पाहिजे. शेतमालाला उत्पादनखर्च
+ नफा = किंमत मिळालीच पाहिजे. गोदामे/वाहतुक/देशांतर्गत व निर्यातीसाठी मुक्त बाजारपेठ या सेवा व सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. निर्यातीवर कसलीही बंधने न ठेवता कोणत्याही शेतमालाच्या आयातीबाबतचे विपरित स्थितीत गरज असले तरी धोरण ठरवतांना शेतक-यांच्या स्वायत्त परिषदेच्या संमतीनेच ते धोरण ठरवले गेले पाहिजे.

९) भारतातील शेती-उत्पादनांवर आधारीत पारंपारिक टिकावु खाद्यपदार्थ जे बनु शकतात त्यावर अधिक संशोधन करुन ते बनवण्याचे लघु-सुक्ष्म उद्योग वाढतील असे पुरक प्रोत्साहनपर धोरण आखत बाजारापेठेसाठी सहाय्यकारी भुमिका असले पाहिजे.

१०) पशुपालन उद्योगाबाबत सरकारचे धोरण नाही. त्याची निकड असून शेळ्या-मेंढ्या-गायी-म्हशी ई. बाबत सकस वृद्धीसाठी व्यापक व पारंपारिक या व्यवसायांतील (पशुपालक) समाजघटकांना प्राधान्य देण-या धोरणाची गरज आहे. यासाठी सहकारी अथवा कार्पोरेट तत्वावर याच लोकांच्या संस्था कशा उभ्या राहतील यासाठी प्रशिक्षण व सहाय्य या बाबी आखल्या गेल्याच पाहिजेत.

११.. देशातील जवळपास दहा कोटी लोकसंख्या भटक्या-विमुक्तांची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत ते खिजगणतीतही नाहीत. त्यांच्यासाठी, त्यांची पारंपारिक व्यवसाय क्षमता/कौशल्ये अधिकचे आधुनिक प्रशिक्षण देत (शिक्षणाची अट न ठेवता) अन्य उद्योगव्यवसायांत कसे सामावुन घेतले जाईल अथवा त्यांना व्यवसायाच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी धोरणाची आणि त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.

१२. गृहोद्योगाबाबत, ज्यांना आधीच स्वमालकीचे घर आहे, त्यांना केवळ गुंतवणुकीसाठी दुसरे घर अथवा प्लोट घेता येणार नाही यासंबंधी निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्याशिवाय सर्वसामान्यांना निवारा मिळु शकणार नाही. गुंतवणुकी, ज्यातुन उत्पादकता वाढेल अशाच क्षेत्रात करण्याविषयी धोरणात बदल करणे आवश्यक आहे.

१३. उर्जा क्षेत्रात भारताला मोठी वाटचाल करायची आहे. कोणताही उर्जाप्रकल्प राजकीय अथवा अन्य कारणांनी रखडणार नाही यासाठी कायद्यांची गरज आहे. स्थान ठरवण्याआधीच त्या संदर्भात येऊ शकणारे आक्षेप/आक्षेपक यांच्याशी चर्चा करुनच स्थाननिर्धारण केले गेले पाहिजे. नंतर विरोध करणा-यांवर कठोर कायदेशिर कारवाई झाली पाहिजे.

१४. शासकीय प्रकल्प वगळता भुमी अधिग्रहणासाठी सरकारने मध्यस्थ अथवा दलालाची भुमिका घेऊ नये. शेतक-यांच्या जमीन विकण्याच्या अथवा न विकण्याच्या स्वातंत्र्यावर  घाला घालु नये.

१५. जलस्त्रोतांचे न्याय्य संधारण व पाण्याचे संतुलित व सर्व प्रदेशांत न्याय्य वाटप या साठी राष्ट्रीय धोरण आवश्यक आहे.

भारताचे आर्थिक धोरण कसे असावे याबाबत मी हा रफ आराखडा बनवला आहे. यात नागरिकांच्या कर्तव्यांबाबतचा भाग सामाविष्ट नाही तसेच शिक्षण धोरणही सामाविष्ट नाही. ते मी मला वाटते तसे नंतर मांडतो. सध्या या महत्वाच्या मुद्द्यांना धरुन आपण व्यापक चर्चा करुयात. यात आवश्यक तेथे बदल आणि सुधारणा करुयात. आणि अंतीम आराखडा शासन/माध्यमे यांसमोर मांडुयात. यात प्रत्येक मित्राचा सहभाग अपेक्षीत आहे. जे पटत नाही ते का पटत नाही आणि पटते ते का पटले व त्यात अजुन काय भर घालता येईल हे मांडणे अपेक्षीत आहे.

तर चला मित्रांनो....चर्चा करुयात!

Monday, May 18, 2015

पिचलेल्यांना पिचवण्याचे कारस्थान

भारतात अनेक भटके, निमभटके व विमुक्त समुदाय आहेत. घटनेने एस.सी व एस.टी अशी विभागणी करत अनेक समुदायांची सोय राष्ट्रीय पातळीवर लावली असली तरी भटक्या-विमुक्तांना मात्र न्याय मिळाला नाही. विमुक्त जाती/जमातींना तर स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९५२ पर्यंत वाट पहावी लागली. घटनेत त्यांच्यासाठी कसलीही सोय नसल्याने त्यंच्या विकासाच्या कसल्याही स्वतंत्र योजना आल्या नाहीत. राष्ट्रीय पातळीवर त्यांचे कधी एस. सी. तर कधी एस. टी. तर जमल्यास ओबीसी असे वेगवेगळ्या राज्यात वाटप करण्यात आले. महाराष्ट्राने डी.एन.टी./एन. टी. ही विचित्र विभागणी केली. शेड्युल्ड ट्राइब्ज अथवा कास्टस्साठी जशा स्वतंत्र तरतुदी केल्या गेल्या तशा तरतुदी सर्वात अधिक हलाखीची व सामाजिक अन्यायाची परिस्थिती असुनही यांच्या वाट्याला काही आले नाही. शिक्षणाच्या बाबतीतच घोर अंधार असल्याने आहे तेही आरक्षण त्यांना उपयोगाचे नव्हते. पारंपारिक व्यवसाय कायद्याने अथवा बदललेया औद्योगिक/आर्थिक परिस्थितीने बाद झाल्याने आज तेही कुचकामी ठरले. असंख्य लोकांची आज मतदार याद्यांतही नांवे नाहीत....त्यामुळे ना राशन कार्ड ना आधारकार्ड. कारण त्यांना घरच नाही. त्यांना जमीन वाटप करण्याचे प्रावधानही नाही. पंचवार्षिक योजनांतील तरतुदे हास्यास्पद वाटाव्यात अशा असतात व त्या खर्चही केल्या जात नाहीत.

कुंभमेळ्याला हजारो कोटींची खैरात उधळणारे सरकार भटक्या विमुक्तांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे हे आपण स्वातंत्र्योत्तर काळापासून पाहत आहोत. फासेपारध्यांसारख्या समाजगटांना तर केवळ संशयापोटी पोलिसयंत्रणा एवढी छळत असते कि या अमानवीपणाचे गा-हाणे कोणी आणि कोठे करावे?  वडारांची पोरे पोरी लहाणपणापासून पाटी-पेन्सीलीऐवजी हातात हातोडे/घण घेऊन दगडफोडी करतांना दिसत असतील तर आमची सामाजिक जबाबदारी कोणत्या सरकारने पार पाडायची? धनगरांची अवस्था तशीच बिकट. त्यांच्या वाड्या-वस्त्या आणि माळरानांवरील जगणे पाहिल्याखेरीज त्यांच्या वंचना-हलाख्या समजणार नाहीत. हे समाज आजही जात पंचायती व त्यातील अनिष्ट प्रथा-परंपरांना चिकटून असेल तर दोष कोणाचा? ते काय भारताचे नागरिक नाहीत?

शिक्षणाचे प्रमाण कमी असले तरी त्यांना तांत्रिक कौशल्यांचे विशेष प्रशिक्षण देत, सुलभ कर्जे व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे खरे तर अशक्य नव्हते. आताही वेळ गेलेली नाही. पण त्यासाठे तरतुद कोणी करायची? वसंतराव नाईक भटके-विमुक्त जाती-जनजाती विकास महामंडळ नामक एक संस्थान महाराष्ट्राने स्थापले आहे, पण आज ते पुरेशा आर्थिक तरतुदींच्या आणि पुरेशा व्यवस्थापकीय यंत्रणेच्या अभावात असुन नसल्यासारखे आहे. यामुळे या शोषित/वंचित समाजघटकाला सामाजिक न्याय मिळत नाही. सरकारी अधिका-यांपर्यंतही अज्ञानामुळे हे लोक पोहोचू शकत नाहीत. इतर नेत्यांना यांच्याशी (हक्काचे मतदार नसल्याने) काह्वी घेणेदेणे नाही.

एकुणातच एकविसाव्या शतकातही पिचलेल्या पिचवण्याचे कारस्थान जोरात आहे.

Monday, May 11, 2015

आक्रंदणा-या मित्रा.....

माझ्या आक्रंदणा-या मित्रा,
जवळ ये
शांत बैस
तुझा आकांत
ज्यांच्यासाठी आहे
ते गप्प आहेत
बहिरे आहेत
पण ज्याविरुद्ध आहे
ते मात्र सैतानासारखे
तुझा आकांत दबवत आहेत.....
हरकत नाही
पण तू आकांतत रहा
मीही तुझ्या आकांतात
माझाही आकांत मिसळतो
निखळत्या ता-यांचा असेल तसा....
न ऐकणारे ऐको न ऐकोत
या सैतानी झुंडीला
आपण तोंड देवु...
तू एकाकी नाहीस
तुझ्या क्षीण आकांतात
माझाही क्षीण आकांत मिसळला
तर आकांत थोडा तरी
कानी पडेल....
आपल्याच लोकांच्या!

Sunday, May 10, 2015

वादाला का भीता?







... होय, संजय सोनवणी हे एक तटस्थ वृत्तीचे आणि ठाम भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. वेगवेगळ्या साहित्य प्रवाहात कणखर आणि परखड भूमिका घेऊन त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले असले तरी त्यांनी सत्याची कास सोडली नाही. त्यांच्या काही भूमिकांविषयी मतभेद जरूर असू शकतात; मात्र हा माणूस नेक वृत्तीचा आणि साहित्य क्षेत्राशी प्रामाणिक आहे हे मान्य करावेच लागेल.
सध्या एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे दिवस आहेत, तर दुसरीकडे या स्वातंत्र्याचा अतिरेकही केला जातो. मध्यंतरी  पेरूमल मुरूगन या लेखकाने या व्यवस्थेला कंटाळून स्वतःतील लेखकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, हा  आपल्याकडील काळाकुट्ट इतिहास आहे. ही मुस्कटदाबी कुणा एका विचारधारेकडून, समाजाकडून होते असे नाही. सत्य काय हे जाणून न घेता केवळ आपला स्वार्थ पुढे दामटण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे.
क्षमा आणि शांतीचा संदेश देणार्‍या आपल्या देशात आजवर अनेक समाजद्रोह्यांनी थयथयाट सुरूच ठेवला आहे. राजकीय लाभापायी इथल्या पोखरलेल्या व्यवस्थेने अशा दुष्प्रवृत्तींना सातत्याने खतपाणी घातले. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा तो स्वबळावर पूर्ण करू शकतोय. इतकी समज आणि कुवत त्याच्यात निर्माण होण्याइतपत बदल नक्की झालाय. मात्र तरीही समाजाच्या अनेक गरजा आज दुर्लक्षित आहेत. साहित्य आणि संस्कृती हा आपल्या आदर्श समाजरचनेचा पाया आहे. तो मात्र दिवसेंदिवस तकलादू होत चालला आहे.
’महाराष्ट्र भूषण’ श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची संपूर्ण हयात शिवसेवेसाठी घालवली. युगपुरूष शिवरायांचे चरित्र तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी जे कष्ट घेेतले, जे कार्य उभे केले त्याला तोड नाही. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज घडू शकेल, लोकापुढे शौर्य आणि पराक्रमाची मशाल तेवत राहील यादृष्टिने बाबासाहेबांनी जे कार्य उभे केले आहे त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांचे हे काम अद्वितीय आहे. महाराष्ट्र सरकारने उशीरा का होईना पण त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे सारे असताना काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्यांच्यावर खोटे आरोप घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राला जात, धर्म, प्रांत यावरून भांडत राहणे परवडणारे नाही, हे ठाऊक असूनही केवळ स्वतःचा स्वार्थ पुरा करण्यासाठी काहीजण आपल्यात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू ठेवत आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लेखन केले त्यातील आपल्याला हवा तो भाग, हव्या त्या पद्धतीने घेऊन टाळकी भडकवण्याचे काम वेगात सुरू आहे. आजची विचारी तरूणाई अशा भूलथापांना बळी पडणार नाही, मात्र त्यांच्यापुढे यातील सत्य आले पाहिजे. बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातील काही वाक्ये उचलून, त्याचे कपोलकल्पित संदर्भ जोडून समाजात दुही निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे. अशा बिकट वेळी संजय सोनवणी या लढवय्या लेखकाने अत्यंत अभ्यासपूर्वक, जिद्दीने सत्य पुढे आणण्याचा चंग बांधला. बाबासाहेबांचे पुस्तक त्यांनी अभ्यासले आणि तथाकथीत काही अविचारी लोकाचे सर्व आरोप पुराव्यासह खोडून काढले. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जे आक्षेप घेतले जात होते ते राजकीय हेतूने, पूर्वग्रह ठेवून आणि जातीय भूमिकेतून होते हे सिद्ध झाले. अशाने आधीच बंद पडत चाललेली आपली दुकानदारी बंद होणार, हे ध्यानात येताच काही ब्रिगेडी टाळकी पेटून उठली आहेत. वाटेल त्या थराला जाऊन, खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे ठरवून हे लोक आपले घोडे पुढे दामटत आहेत. संजय सोनवणी यांनी मुद्देसूदपणे आणि अभ्यासपूर्वक बाबासाहेबांवरील सर्व आरोप फेटाळून लावल्याने यांची गोची झाली आहे.
संजय सोनवणी हे मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की ज्यांचे पुस्तक अमेरिकेत, व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरंस बुक’ म्हणून ठेवण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजीत त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांचे साहित्य जगभर वाचले जाते. वंचित, उपेक्षित, भटके विमुक्त, आदिवासी, दलित यांचे सुखदुःख मांडण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या सूड भावनेने वागणार्‍या माणसाला न्यायालयात अधिकृत माफी मागण्यास भाग पाडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर मार्गाने लढत दिली. हिंदू आणि हिंदुत्व या दोन्हीपासून हजारो मैल दूर असणार्‍या सोनवणी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील आरोप विवेकाने खोडून काढले आहेत. त्यासाठी लागणारी सच्चाई आणि अच्छाई त्यांच्याठायी आहे. जातीपातीच्या बाहेर पडून अशी न्याय भूमिका घेणार्‍या आणि धाडसाने सत्य पुढे आणणार्‍या सोनवणी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास पूत्र आहेत. त्यांनी शिवकाल जिवंत केला आहे. एव्हरेस्टसारख्या उंचीचा हा ध्येयवेडा माणूस अनेकांच्या हृदयावर राज्य करतोय. ज्यांचा प्रत्येक श्‍वास शिवमय होऊन गेलाय, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण शिवाजीराजांच्या प्रेमात घालवलाय त्यांच्याविषयी आमच्या मनात श्रद्धाभाव आहे. बाबासाहेबांवर केवळ ‘ब्राह्मण’ म्हणून टीका करणे हे काही ‘ब्रिगेडियर’ नेत्यांचे कारस्थान आहे. संभाजीनगर येथे बोलताना बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ बद्दल अभिनंदन करणार्‍या शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मात्र पक्षाची नसून ती त्यांची स्वतःची आहे, असे केविलवाणे विधान केले. यातून पवारांसारख्या नेत्याची विखारी वृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला जवळून पाहता आली.
संजय सोनवणी यांच्या चिकित्सेनंतर नगर येथील ‘शिवप्रहार’ या संस्थेचा अध्यक्ष असलेल्या संजीव भोर नावाच्या एकाने सोनवणी यांना धमक्या देणे सुरू केले आहे. त्याने सोनवणी यांना सूड भावनेने  आव्हान देऊन नगरला बोलवून घेतले. आजपर्यंत अनेकवेळा लेखकांना काळे फासले गेले, त्यांच्यावर शाई टाकण्यात आली, लेखकांचा निषेध करण्यात आला किंबहुना लेखकाला स्वतःतील लेखक मेल्याचेही जाहीर करावे लागले. मात्र मराठीच्या इतिहासात प्रथमच असा एक लेखक पुढे आला की ज्याने आव्हान देणार्‍याला ठामपणे सांगितले,  की ‘‘ठिकाण आणि वेळ तू ठरव, तू मला काळे फासण्याच्या आधी मी तुझ्या कानाखाली ओढतो. तुझ्या मुस्कटात ठेऊन देतो!’’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सांगितले होते की, ‘‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या!’’ सोनवणी यांनी ज्या बेडरपणे हे आव्हान स्वीकारले ते पाहता आता स्वातंत्र्यवीरांचे विचार खोलवर रूजलेत असे मानायला हरकत नाही.
मात्र या संजीव भोरने संजय सोनवणी यांना बोलवण्याचा आततायीपणा केला. आपली आता काही खैर नाही हे ध्यानात येताच त्याने काही महिला गोळा केल्या. संजय सोनवणी यांच्या अंगावर या महिलांना सोडायचे आणि विनयभंग, ऍट्रॉसिटी असे गुन्हे दाखल करायचे असे कारस्थान त्याने रचले. याची माहिती मिळताच नगरला गेलेल्या सोनवणी यांनी माघार घेतली आणि भोर याचा कुटील डाव हाणून पाडला.
आगरकरांनी विचारले होते की, ‘‘वादाला का भीता?’’
ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांची चर्चेची तयारी असते. ते कोणत्याही तात्त्विक वादाला कधीही घाबरत नाहीत. मात्र संजीव भोर याच्यासारख्या भ्याड माणसाने सोनवणी यांच्यासारख्या दिग्गजाला आव्हान देऊच नये. भोर याच्या आडून हे आव्हान सरळ सरळ ‘संभाजी ब्रिगेड’चे आहे हे पुरते ठाऊक असल्याने सोनवणी यांनी ते स्वीकारले पण भोरने पळपुटेपणा करत कट रचला.
बाबासाहेब पुरंदरे आणि संजय सोनवणी यांच्यात वैयक्तिक काहीही संबंध नाहीत. बाबासाहेबांच्या लेखनावर चुकीचे आक्षेप घेतल्याने  संजय सोनवणी यांच्यासारखा एक सत्लेखक दुखावला गेला आणि त्याने सत्य पुढे आणण्याचे काम धाडसाने केले. पुरंदरे आणि सोनवणी या दोन मात्तबर लेखकांची भेट ‘चपराक’च्या पुढाकाराने लवकरच घडवून आणत आहोत, मात्र यात कसलेही राजकारण, स्वार्थ नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. केवळ सत्य पुढे यावे आणि आजच्या तरूणाईच्या मनात जे जातीभेदाचे विष कालवले जात आहे ते दूर व्हावे या प्रांजळ भूमिकेतून संजय सोनवणी यांच्यासारख्या खमक्या लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्यावर सध्या राळ उडवण्यात येत असून त्यांची वैयक्तिक बदनामी केली जात आहे. हे सारे संतापजनक आहे. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वजण संजय सोनवणी यांच्या पाठिशी राहणे, बाबासाहेबांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव करणे हे आपले कर्तव्यच आहे. 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


Friday, May 8, 2015

धक्कादायक वास्तव !

माणुस हा अन्य प्राणीविश्वापेक्षा एक "विशेष" प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे. कृत्रीमरित्या उपलब्ध नैसर्गिक साधनांना स्वसुखासाठी वापरायची, नवनवे शोधायची उपजत कला त्याच्यात आहे. त्याच्यात मिथके बनवायचीही तेवढीच कला प्रबळ असल्याने अनेकदा ती कला त्याच्या बुद्धीवादावर मात करते. स्वसमुह/जाती/धर्म/राष्ट्र हेच त्याच्या जगण्याचे केंद्रबिंदू बनत गेल्याने आपापले समुह व तिची संस्कृती पुरातन व श्रेष्ठ कशी हे ठरवण्याची व ते सिद्ध करण्याची त्याची कला पुराणकाळातच नव्हे तर आजही जीवित आहे. आपापला समुह श्रेष्ठ ठरवायचा म्हणजे अन्य समुहांना दुय्यम स्थान आपसुक दिले जाते. हा प्रकार आजचा नाही. सर्व पुरातन साहित्यातील मित्थके आपण पाहिली तर याचा प्रत्यय येईल. आधुनिक काळात तरी ही प्रवृत्ती कमी होईल असा होरा होता, परंतू दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही.

आपल्या पाळामुळांबाबत प्रत्येक समुह उत्सुक असतो. आपण कोण, कोठुन कशासाठी आलो आणि जगण्याचे प्रयोजन काय हे प्रश्न तत्वज्ञानात चर्चिले जातात. पण माणुस तेथेच थांबत नाही. भौतिक दृष्ट्याही आपले मुळ स्थान काय आणि आपण कसे पसरलो यावरही तो विचार करतो हे मात्र विशेष आहे. खरे तर याची सुरुवात युरोपियनांनी अठराव्या शतकात केली. एकोणिसाव्या शतकात या शोधाला सिद्धांताचे स्वरुप येऊ लागले आणि त्याची भिषण परिणती हिटलरच्या उदयात झाली. हे तत्वज्ञान व सिद्धांत म्हणजे आर्य वंश सिद्धांत होय. निळ्या डोळ्यांचे, सोनेरी केसांचे, उंच-धिप्पाड नि गोरेपान असे आर्य कोठल्यातरी मुलस्थानातुन रथांवर आरुढ होत सर्वत्र घोंघावत पसरले, अनेक प्रदेश पादाक्रांत केले, स्थानिक लोकांना जिंकले व त्यांच्यावर आपली भाषा व संस्कृती लादली असा हा सिद्धांत. यालाच आधी आर्य आक्रमण सिद्धांत म्हणयचे. भारतातही याच आर्य टोळ्यांनी आक्रमण करुन दास-दस्युंना गुलाम बनवले व त्यांच्यावर जातीव्यवस्था लादली असा हा सिद्धांत. टिळकांनी या सिद्धांताला नुसते स्विकारले नाही तर पुष्ट्यर्थ ’आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथही सिद्द्ध केला. विष्णू शास्त्री चिपळुनकर तर ब्रिटिशांना जाहीरपणे "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव" म्हणू लागले. दक्षीणेतील प्रतिक्रिया स्वाभाविक तीव्र होती. विजेते आर्य विरुद्ध पराजित द्रविड अशी देशाचीच उभी वांशिक फाळणी झाली. भारतीय राजकारण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या आर्य सिद्धांताभोवतीच फिरु लागले. त्यातुनच मुलनिवासी विरुद्ध परकीय आर्यभट हाही संघर्ष उभा राहिला. भारतीय इतिहास, संशोधने, साहित्य या सर्वांवर या आर्य सिद्धांताची गडद छाया आजही पडलेली दिसते. बहुजनांमद्ध्ये मानसिक हीणगंड निर्माण करायची सोय या भारतातील आर्य सिद्धांतकारांनी लावली तर सध्या मुस्लिम-ज्यु असलेल्या सेमिटिक भाषागटाच्या लोकांना भाषिक/वांशिक/बौद्धिक क्षेत्रात न्युनाने पहायला लावायची सोय युरोपियन (नंतर अमेरिकाही) विद्वानांनी लावली. त्यचेही जागतिक पडसाद आपल्याला युरोपियन विरुद्ध मुस्लिम संघर्षात पडलेले दिसतील.

हिटलरने केलेल्या वंशसंहारानंतर युरोपिय जगाने भाषा बदलली. त्यांनी आर्य हा शब्द वंश या अर्थाने वापरायचे बंद केले तर "पुरा-इंडो-युरोपियन" भाषा बोलणा-यांचा समुह व त्याची आक्रमणे/निगर्मणे या स्वरुपात तोच सिद्धांत कायम ठेवला. भारतीय आर्यवाद्यांनाही आपण आता बाहेरचे आहोत हे सांगणे राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे वाटू लागल्याने वैदिक आर्य भारतातलेच व ते येथुनच आशिया-युरोपात पसरले हे सांगायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर सिंधु संस्कृतीचे संस्थापक वैदिक आर्यच असे नु७सते दावे करुन ते थांबले नाही तर तो दावा पक्का करण्यासाठी घग्गर-हक्रा नदीला ऋग्वेदातील सरस्वती नदी ठरवायचा घाट घातला. आज इंटरनेटवर तुम्ही शोध घ्याल तर सर्वत्र घग्गरच्या ऐवजी सरस्वतीचे नांव दिलेले आढळेल. भारतीय पुरातत्व विभागानेही, भाजपा सरकार आल्यानंतर, डिसेंबर १४ मधील पुरातत्वीय अहवालांत सरस्वतीचेच नांव घग्गराइवजी वापरल्याचे दिसेल. थोडक्यात संस्कृती वर्चस्वाचा अट्टाहास वैदिकांनी सोडला नाही व युरोपियनांनीही हे उघड आहे. 

पण हे वास्तव आहे काय? संशोधकांनी सत्यांना व भौतिक/लिखित पुराव्यांना स्विकारायला हवे हा विद्वतमान्य संकेत आहे. हा शोध घेण्याची सुरुवात मी प्रथम २००७ मद्ध्ये केली. दोन्ही गट जे पुरावे वापरतात तेही तपासले आणि २०१४ पर्यंत झालेल्या आशिया खंडातील उत्खननांचे अहवालही अभ्यासले. त्यातुनच "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" हा ग्रंथ सिद्ध झाला. माझे निष्कर्श सांगण्यापुर्वी आधी आपण या आर्य सिद्धांताचा व सिंधु संस्कृतीवरील मालकीहक्काचा प्रवास कसा झाला हे पाहणे रोचक ठरेल.

सिंधु संस्कृती सापडण्यापुर्वी....

१. वसाहतवादी इंग्रजांना आणि राष्ट्रवादी जर्मनांना आपले वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करायचे होते आणि इतिहासही मागे न्यायचा होता.(युरोपचा इतिहास अन्य जागतिक संस्कृत्यांपेक्षा ब-यापैकी अर्वाचीन आहे, ग्रीसचा इतिहासही इसपु आठव्या शतकापार जात नाही. विल्यम जोन्सपासुन ख-या अर्थाने ही सुरुवात झाली. ऋग्वेदाचा, त्यातील भाषा व ल्यटीनादि युरोपियन भाषांतील काही वरकरणी साधर्म्य पुर्वीच त्यांच्या लक्षात आलेले होते. म्यक्समुल्लरने वेद व अवेस्ता यातील आर्य/ऐर्या/अरियाना वगरे समान वाटलेल्या शब्दांतून आर्य वंश सिद्धांत प्रथम मांडला. निळ्या डोळ्याचे, सोनेरी केसाचे, उंच धिप्पाड गोरे आर्य आणि त्यांचे धडाडत आक्रमनासाठी धावणारे रथ याची युरोपवर एवढी मोहिनी पडली कि आपण आशिया-युरोपला संस्कृती देणारे, आर्यभाषांचे निर्माते आहोत असे वाटू लागले. अर्थात म्यक्समुल्लरच्या लक्षात यातील वांशिक धोका लक्षात आल्यावर "आर्य वंश" ही संज्ञा मागे घेतली आणि आपल्याला आर्य भाषा बोलण-या लोकांचा भाषिक गट असे म्हणायचे होते असे त्याने स्पष्टही केले. पण जो काही परिणाम व्हायचा होता तो झालाच. पुर्ण युरोपात आर्याभिमानाची लाट उसळली. अमेरिकेतही १८९९ पासुनच आर्य वंश आणि गोरे याची मांडणी होऊ लागली. 

२. भारतीय लोकांनी, विशेषता: वैदिकांनी, स्वाभाविकपणे ते आक्रमक आर्य म्हणजे आपलेच पुर्वज असा ग्रह करून घेतला. कारण हा शब्द वेदांतुनच आला होता. या सिद्धांताने सत्ताधारी ब्रिटिश आणि वैदिक एकाच मुळाचे ठरत होते. ते ब्रिटिशांच्या पथ्यावरच पडणारे असल्याने त्यांनी या सिद्धांताला खतपाणीच घातले. पुढे टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहून वेदांचे निर्माते हे मुळचे उत्तर ध्रुवाजवळ राहणारे होते हे ऋग्वेदातील प्रमाणांवरुन सिद्धही करुन दाखवले. तत्पुर्वी महात्मा फुल्यांनी याच सिद्धांताचा आधार घेत विदेशी आक्रमक आर्य आणि येथील शुद्राति-शूद्र मुलनिवासी अशी मांडणी करत वैदिक व्यवस्थेवर हल्ले चढवले.

३. जर्मनांनी मात्र जर्मन हेच मुळचे आर्य आणि जर्मनी हेच त्यांचे मुळ स्थान असून त्यांच्याच पुरातन पुर्वजांच्या एका शाखेने वेद लिहिले असे दावे सुरु केले. आर्यांच्या मुळ स्थानाबाबत युरोपात अनेक ग्रंथ लिहिले गेले. भारतातही काही वेगळे झाले नाही. या सिद्धांताचा प्रभावच तेवढा होता. पण यामुळे देशात वांशिकदृष्ट्या दोन तट पडले. भारतातील लोकसंख्येची विभागणीही रिस्ली, हिरालाल वगैरे मानवशास्त्राच्या संशोधकांनी, रिस्ली वगैरेंनी, विविध वांशिक आधारांवर केली गेली. (दुर्दैव म्हणजे आपण आजही तेच संदर्भ वापरत असतो.)

सिंधू संस्कृती सापडल्यानंतर:

१. १९२० साली सिंधू संस्कृतीचे अवशेष उजेडात यायला लागले. एवढी प्रगत आणि भव्य संस्कृती येथे असू शकेल याची कल्पनाही त्यावेळीस केली गेलेली नव्हती. उलट आर्य येण्यापुर्वी येथे आदिवासी, अडाणी, भाषाही धड न बोलणारे लोक राहत होते असा समज होता. पण उत्खनित पुरावेच येथील लोक अत्यंत पुढारलेले होते असे सरळ दाखवत असल्याने ते नाकारताही येत नव्हते.

२. मग आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केली व तेथील लोकांना हरवून दक्षीणेत हाकलले असा सिद्धांत पुढे आणला गेला. ऋग्वेदातील काही द्राविडी-सदृष्य शब्द यासाठी आधार म्हणून वापरले गेले. यामुळे द्राविडी लोकांचा वेगळा राष्ट्रवाद उफाळला. उत्तरेतील भाषा आणि तेथील लोक हे त्यांच्या द्वेषाचे कारण बनले. स्वतंत्र द्राविडीस्थान मागण्यापर्यंत मजल गेली. तेथील राजकारण द्राविड्सेंट्रीक बनले. आजही ते तसेच आहे.

३. बहूजनांना सिंधू संस्कृतीचा मात्र मोठाच भावनिक आधार मिळाला. सिंधू संस्कृतीचे निर्माते बहुजन आणि ती नष्ट करणारे आक्रमक आर्य वंशीय असा हा सामाजिक संघर्ष बदलला.

४. वैदिक जनांना आपण या भुमीत परके ठरण्याचा धोका लगेच लक्षातही आला. गोळवलकर गुरुजींनी तर "पुरातन काळी उत्तर धृव वाराणशीला होता" असे विधान करून आर्यही एतद्देशियच ठरवायचा प्रयत्न केला. पुढे डा, नि. र. व-हाडपांडे यांनी नवा ग्रंथ लिहून टिळकांचा सिद्धांत ऋग्वेदाच्याच आधारे रद्दबातल ठरवला व आर्यांचे मुळस्थान भारत आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

५. युरोपियन विद्वान आता "आर्य" हा वंश निदर्शक शब्द वापरायचे बंद झाले. पण त्यांनी इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत पुढे आणला. या सिद्धांतानुसार या इंडो-युरोपियन भाषाकुटुंबाचे पुर्वज पुरातन काळी कोणत्यातरी एकाच ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या लाटा क्रमश: भारत, इराण, अनातोलिया, ग्रीस ते युरोप अशा पसरल्या असे सांगितले जावू लागले. बरे मूळ स्थान कोणते या वादाचा निकाल अजुनही लागलेला नाही. दक्षीण रशियातील अंड्रोनोवो, सिन्थास्टा संस्कृती ते अनातोलिया अशी वेगवेगळी मुलस्थाने आजही धडाडीने भांडली जात आहेत. विशेष म्हणजे सारेच विद्वान तेच ते पुरावे वापरत सोयिस्कर अर्थ काढत असतात.

६.  १९७० नंतर उपग्रहीय छायाचित्रांमुळे आजची घग्गर ही एके काळी खूप मोठी होती असे जाणवू लागले. मग ती म्हणजेच ऋग्वेदातील हरवलेली सरस्वती नदी होय असे दावे केले जावू लागले. या दाव्यांमागे खरे कारण होते ते हे कि या नदीच्या काठांवर हजारापेक्षा अधिक सिंधू संस्कृतीची स्थाने सापडली आहेत, ती पाकिस्तानातील एकुण संख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहेत. घग्गरला सरस्वती बनवले कि आपोआप त्या संस्कृतीवरही वैदिक मालकी सांगता येणार होती. स्वाभाविकच अनेक विद्वान हरवलेली सरस्वती सापडली असे दावे करू लागले. खरे तर सर आरेल स्टीन यांनी १९४० च्या आसपासच तसा दावा केला होता. पण त्यावेळी आक्रमक आर्यांच्या कैफात असले्ले आणि सिंधू संस्कृतीची प्रगल्भता न समजलेल्या वैदिकांच्या तेंव्हा लक्षात आले नाही. पण १९७० नंतर त्यांनी घग्गर म्हणजेच सरस्वती असे दावे सुरु केले. 

७. पण आता घग्गरच्या प्रत्यक्ष पात्रांत व उपनद्यांत जी भुशास्त्रीय आधुनिक तंत्रज्ञानांनी  जी परिक्षणे केली त्यावरून घग्गर ही कधीही मोठी बारमाही, ऋग्वेदात वर्णण केलेल्या सरस्वतीसारखी हिमालयातून - पहाडांतुन उसळ्या घेत, सर्व नद्यांपेक्षा मोठी नदी, "नदीतमे, अंबीतमे"  नव्हती. ती पावसाळ्यावर अवलंबून असलेली एक सामान्य नदी होती. सनपुर्व १७५० मद्ध्ये जलवायुमान बदलल्याने ती बारमाही वहायची थांबुन फक्त पावसाळ्यापुरतीच वाहणारी नदी बनली. नदीतील पाणीच कमी झाल्याने सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आपल्या वसाहतपद्धती व पीकपद्धती बदलल्या. हे सर्व जागतीक पातळीच्या भु-पर्यावरण-शास्त्रज्ञांनी व पुरातत्वविदांनी मान्य केले आहे. त्यामुळे सरस्वती म्हणजे घग्गर हा दावा सर्वस्वी निराधार ठरलेला आहे.

८. पण मायकेल ड्यनिनो (नांवावर जावू नका, पाश्चात्य असला तरी हा वयाच्या सतराव्या वर्षापासून हिंदू आहे.) यांनी The Lost River: On The Trail of the Sarasvati हे पुस्तकही लिहिले. आर्य येथीलच हा सिद्धांत बळावला. यात अनेक सामील झाले. त्यात महत्वाचे नांव म्हणजे श्रीकांत तलागेरी. यांनी वैदिक आर्य (तेही फक्त भरत टोळीचे व त्यातीलही पुरु गटाचे) ऋग्वेदाचे निर्माते आहेत आणि ते कसे भारतातून (हरियानातून) क्रमाक्रमाने इराणमद्ध्ये गेले व तेथून पुढे युरोपात कसे आर्य भाषा व संस्कृती नेली याचे विवेचन सुरु केले. इराणी लोकही त्यांच्या दृष्टीने भारतीयच, अनू टोळीचे लोक असा त्यांचा दावा. डेव्हिड फ़्राउली (यांच्याही नांवावर जाऊ नका....हे पाशात्य असले तरी यांनीही धर्म बदलला असुन त्यांचे सध्याचे नांव पंडित वामदेव शास्त्री आहे) हेही या गटात सामील झाले. (किंवा केले गेले)

९. आता युरोपियन विद्वान कसे गप्प बसतील विशेषत: मायकेल विट्झेल या हार्वर्ड विद्यापीठाच्या भाषाविद असलेल्या प्राध्यापकाने तलागेरी यांच्या सिद्धांतावर हल्लाच चढवला. तलागेरीही मग काय गप्प बसतात? त्यांनी दुप्पट आवेशाने त्यांच्यावर हल्ला चढवला. विशाल आगरवाल, कल्याणरमन ई. भारतीय विद्वान त्यांच्या मदतीला आले. एवढेच नव्हे तर ग्रीक विद्वान कझानास हेही मदतीला धावले. अर्थात कझानास यांचा सिद्धांत तलागेरींसारखा नाही. त्यांचे मत असे कि आर्य हे सनपुर्व दीड नाही तर सनपुर्व तीन हजार वर्षांपुर्वी आले, ऋग्वेद हा सिंधू काळापुर्वीचा आहे आणि एवढ्या आधी आर्य भारतात आल्याने ते भारतीयच! या वादात अनेकदा सभ्यतेची मर्यादा ओलांडली गेलेली आहे. 

१०. आता सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य ठरवायचे म्हटल्यावर ऋग्वेदाचा पुर्वी मान्य असलेला इसपू १५०० हा काळही मागे नेणे गरजेचे होते. रथ आणि घोडॆ तर आर्यांचे प्रिय. सिंधू संस्कतीत त्यांचे अवशेष दुर्मिळातिदुर्मीळ...जे अल्प आहेत तेही उत्तर-सिंधू काळातील. मग आयडियाची आयडिया अशी वापरली गेली कि मानवी प्रतिभा थक्क होईल.

११. आधी एस. आर. राव व बी बी लालांसारखे अर्किओलोजिस्टस सिंधू संस्कृतीला घोडे माहित होते, आ-यांची रथचक्रे माहित होती असा दावा करत होते. आता नवे विद्वान (उदा. विशाल आगरवाल, कल्याणरमण ई.) उलटा दावा करत आहेत. त्यांचे म्हणणे असे कि ऋग्वेदात कोठेही आ-यांच्या चाकांचा उल्लेख नाही. ते रथ होते कि साध्या गाड्या होत्या हेही स्पष्ट नाही. विट्झेल यांनी शतपथ ब्राह्मणात "श्याम-अयस" हा शब्द आला असल्याने, व हा शब्द लोखंडाचा वाचक असल्याने ते इसपू ५०० मद्ध्ये तयार झाले असावे असा दावा केला होता. गंमत म्हणजे आता "श्याम-अयस" चा अर्थ लोखंड होतच नाही, शतपथ ब्राह्मण  खूप आधी, म्हणजे लोहयुग येण्यापुर्वीच लिहिले गेले आहे असाही प्रतिदावा केला गेला.थोडक्यात ऋग्वेद हा सिंधु संस्कृतीपुर्व आहे असे सिद्ध करायला कोलांटउड्या मारल्या गेल्या.

११. काही युरोपियन विद्वान मात्र या वादंगाकडे इकडे दुर्लक्ष करत उत्खनने आणि त्यातून समोर येणारे पुरावे पाहता आपली मते सुधारतही होते. यात एडविन ब्रायंट, केनोयेर, शाफर, एर्दोसी यांसारखे विद्वान अग्रणी म्हणता येतील. भारतात गेल्या सनपुव सात हजार वर्षांपासून शेती, गृहरचना, खाद्य पद्धती ई. मद्धे सातत्यपुर्ण प्रवाह दिसून येतो असे त्यांनी उत्खनित पुराव्यांवरून सिद्ध केले. त्यामुळे काही इंडो-युरोपियन विद्वानांची पंचाईत झाली असली तरी ते मोठ्या प्रमाणावर इंडो-युरोपियनांचे भारतात आगमन झाले नसले तरी "झिरपण्याच्या सिंद्धांता"प्रमाणे (ट्रिकल डाऊन थियरी) सातत्याने आगमन होत राहिले असले पाहिजे व त्यातूनच आर्य भाषा भारतात (उत्तरेत) पसरल्या असाव्यात अशी मांडणी चालुच ठेवली.

१२. भारतीय विद्वान उत्खनित पुरावे लक्षात घेत उलट आपली  "भारतीय आर्य" थियरी रेटतच राहिले. अर्थात त्यांनी अनेक बाबींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. भारतात जसे कोणते नवीन लोकांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले नाही तसेच ते भारताबाहेर भारतातून झाल्याचेही पुरावे नाहीत. जगभर मनुष्य जवळपास दहा हजार वर्षांपुर्वीच स्थायिक झाला होता याचे अनगिनत पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यामुळे वैदिक लोक भारतातून अफगाणिस्तानच्या मार्गाने युरोपापर्यंत फोचले, ऋग्वेद हा हरप्पापुर्व आहे वगैरे दावे युरोपियन विद्वानांनी हास्यास्पद ठरवले.

१३. बरे, अवेस्ता आणि खुद्द ऋग्वेदातील भुगोल हा ब-यापैकी समान आहे हे तर उघडच आहे. भाषा, संस्कृती, धर्म, देवासूर संकल्पना यात कल्पनातीत साम्य तर आहेच पण दोन्ही धर्मांना आपापसातील व्यक्तीही माहित होत्या हेही स्पष्ट आहे. यामुळे तलागेरी असे म्हणतात कि भारतीय पुरु आर्य जेंव्हा विस्तारासाठी इराणमद्ध्ये आले त्यापुर्वीच भारतीय अनू टोळीचे लोक तेथे वसलेले होते. ऋग्वेद जेंव्हा निम्म्याहून अधिक रचला गेला होता तेंव्हा अवेस्ताची रचना सुरु झाली. म्हणजे ऋग्वेद हा अवेस्तापुर्वच आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाच्या मंडलांची कालानुक्रमणिका सर्वस्वी नव्याने बनवली आहे. यासाठी जिज्ञासुंनी त्यांची “Rigveda: A Historical Analysis” व “The Rigveda and The Avesta: The final Evidence” ही पुस्तके अवश्य वाचावित.

१४. तलागेरींचे विधान चुकीचे अशासाठी आहे कि भारतातून सनपुर्व सात हजार वर्षांपासून जसे नवे लोक आलेले नाहीत तसेच अन्य भागांत विस्थापित झाल्याचे त्या-त्या भागात (इराण-अफगाणिस्तान ई.) कसलेही भौतिक पुरावे नाहीत. व्यापारानिमित्त सिंधू संस्कृतीचे लोक अन्यत्र (मेसोपोटेमिया-इजिप्तपर्यंत) जात होते तसेच तिकडचेही व्यापारी इकडे येत होते. ब्यक्ट्रिया-मार्जियाना अर्किओलोजिकल कोम्प्लेक्स नांवाने ओळखल्या जाणा-या उत्तर-पुर्व इराण, उत्तर अफगाणिस्तान वगैरे भागातील उत्खननांत सापडलेली ही संस्कृती. हिचा काळ सनपुर्व २३०० ते सनपुर्व १७०० एवढा आहे. तिथे सिंधू लिपी असलेली पण त्या संस्कृतीची स्वतंत्र रचना असलेल्या मुद्रा जशा सापडल्यात तशाच सिंधू संस्कृतीच्याही सापडल्या आहेत. अर्थ एवढाच कि त्या दोन्ही संस्कृत्या व्यापारी (व सांस्कृतिकही) आदान-प्रदान होत होते. असे आदानप्रदान जगभरच्या सर्वच संस्कृत्यांत झाले आहे.भारतात वैदिक धर्म कसा आला याचे पुरावे शतपथ ब्राह्मणाने दिलेले आहेत. पण घग्गर म्हणजेच सरस्वती या आग्रहापोटी तिकडेही दुर्लक्ष केले जाते आहे.

१५. प्रत्यक्ष भौतिक पुराव्यांनी सिंधु संस्कृतीचा धर्म हा शिव-शक्तीप्रधान होता याचे मुबलक पुरावे उपलब्ध असतांनाही चुल्हाण व धातुंच्या भट्ट्यांना वैदिक यज्ञांचे अवशेष सिद्ध करायचा प्रयत्न करत सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच असेही दावे केले जाऊ लागले. शिव हा अवैदिक होता व ऋग्वेद लिंगपुजेचा निषेध करतो दोन संस्कृती व धर्मकल्पनांत काडीइतकेही साम्य नाही. खरे तर सिंधु संस्कृती ही शैव संस्कृती होती असे सरळ विउधान करता येईल एवढे पुरावे आहेत, पण वैदिक विद्वान वैदिकतेच्याच कैफात असल्याने त्यांनी ते कदापि केले नाही.

आजवरची समस्या ही होती कि भारतीय हे युरोपियन व वैदिक विद्वानांच्याच मतांवर बव्हंशी अवलंबुन होते. या दोघांचाही वर्चस्वतावादी कावा त्यांच्य लक्षत येणे त्यामुळे शक्यही नव्हते. नवे सरकार आल्याने माध्यमांनीही वैदिक संशोधकांची मते हिरिरेने प्रसिद्ध करायला सुरुवात केली. घग्गर नदी म्हणजेच सरस्वती असा सर्वसामान्यांचा ग्रह होऊ लागला. यातुन आपल्या संस्कृतेचे अपहरण करायचा कट प्रत्यक्षात येतो आहे हे समजणे शक्यच नव्हते. सांस्कृतिक अपहरणे व त्यातुन बहुजनांचा न्युनगंड वाढवायचा प्रयत्न याबाबत प्रत्येकाला खेद वाटला पाहिजे.

यामुळेच मी "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation"  हा ग्रंथ् लिहायला प्रेरित झालो. आर्य सिद्धांत अथवा पुरा-इंडो-युरोपियन" बोलणा-यांचा समुह व त्यांची निगर्मणे हा सिद्धांत मुळात खरा आहे काय यावर मी यात उहापोह केला असुन प्रत्यक्ष वास्तव धक्कादायक आहे. आपल्याला, अगदी युरोपियनांनाही, मिथकांतुन बाहेर काढ्णारे आहे. घग्गर सरस्वती आहे काय, ऋग्वेद-अवेस्ता यातील आंतरिक संबंध, ऋग्वेद कोठे लिहिला गेला, हा धर्म भारतात कसा आला, ते शुद्र म्हणजे नेमके काय व त्यांचा भारतीय संस्कृतीशी असलेला आंतरिक संबंध काय यावर मी यात उहापोह केला आहे. हे करतांना मी भाषाशास्त्रीय, उत्खनित, आनुवंशिकी, धर्मशास्त्रीय, मानवशास्त्रीय ते मानसशास्त्रीय शेकडो पुराव्यांचा वापर केला आहे. एकार्थाने हा पुर्तातन काळाकडे पाहणारा तिसरा, स्वतंत्र दृष्टीकोन आहे जो तटस्थतेने पुराव्यांच्या प्रकशातच मांडणी करतो. मिथके उध्वस्त करतो...निर्माण करत नाही. स्च्वच्छ नजरेतुन गतेतिहासाकडे पहायचा हा एक प्रयत्न आहे.

वर्चस्ववादी तत्वज्ञान व त्यासाठी पुरावेही मोड-तोड करत वापरणे हे या सुबुद्ध भारतात चालणार नाही याचाही हा एक इशारा आहे.

-संजय सोनवणी
(Published in Lokmudra)

( Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation
लेखक: संजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, 
३०३, वर्धमान हाईट्स, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता, पुणे - ४११००२. मो. ९८९०९५६६९५
मुल्य- रु. ३२०/- मात्र.

Thursday, May 7, 2015

इतिहासातील कुणबीणी म्हणजे कोण?

सद्द्या कुणबीण या शब्दावरुन/संज्ञेवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्राला वादांचे प्रचंड अकर्षण आहे. मराठी
लोक आठव्या शतकातील उद्योतन सुरीच्या गाथेतुनही भांदकुदळ आहेत असेच म्हटले आहे.  हरकत नाही. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन क्रीत स्त्री, शय्यासोबतीसाठी खरेदी केलेली स्त्री, दासी/बटीक/जित स्त्री आहे असे मी म्हटले होते. ते पटत नसल्याने आपण कुणबीण ही संज्ञा  इतिहासात कोणत्या अर्थाने वापरली जात होती
याचाही शोध घेऊ.

१) भारतीय संस्कृतीकोश खंड दुसरा पान ३९९ वर पुर्वी राजे, सरदार, जमीनदार ई. स्रीमान लोक तरुण स्त्रीयांन आपल्या पदरी दासी ठेवत त्यांना कुणबीण म्हणत असे दिले आहे. येथे हा शब्द जातीयवाचक नाही.

२) कुटुंबातील दासी व्यभिचारिणी झाली की तीला बटिक अथवा कुणबीण म्हनत. पेशवाईच्या काळात राजे-रजवाडे, सरदार, श्रीमंत पुरुष आपल्या पदरी कुणबीणी अथवा बटकी बाळगत. पुर्वी दुष्काळ पडला म्हणजे माणसे हलाखीने आपली मुलेबाळे विकत. प्रत्येक सुखवस्तु माणसाकडे कुणबीण ही असायचीच, अशी प्रथा होती. परदेशी लोक भारतात आल्यावर त्यांनीही बटीक बाळगल्या आहेत. म्यलेटने ६५ रुपयांना एक कुणबीण खरेदी केली होती असा उल्लेख आहे. बटकी किंवा कुणबिणी राजेरजवाड्यांना व सरदारांना नजराना म्हणुनही दिल्या जात. हेडे-चारण ई. लोकांचा बटकी विकायचा व्यवसाय असे. (संदर्भ: भारतीय संस्कृती कोश, खंड दुसरा, पान ४५) येथेही कुणबिण कोणत्या एखाद्या विशिष्ट जातीची असे असा उल्लेख नाही.

३) "शेतकऱ्यांच्या बायका पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत. मध्यम वर्गातील काही जातीच्या किंवा घराण्यातील स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडता येत नसे. देवांगना, गणिक  वगैरे वर्ग समाजात होते. तमाशातही भाग घेत. वाघ्या-मुरळी सर्व महाराष्ट्रात आढळत. कुणबिणी बाळगण्याची चाल महाराष्ट्रात होती."
संदर्भ : मराठी विश्वकोश, http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=1&limitstart=


४) "राज्यांतील अठरा मोठीं खातीं. यांच्या वर्गीकरणाचे तीन प्रकार आहेत, ते असे ( मोलस्वर्थ व  क्यांडी यांच्या कोशाप्रमाणें. ) : ( १ ) उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने. ( २ ) तोप-पील; उष्टर; फरास; शिकार; रथ; जामदार; जवाहीर; जिराईत; नगार; दारू; वैद्य; लकड; इमारती; मुदबख; कुणबिणी; खाजगत; थट्टी येणेंप्रमाणे- ( ३ ) खजिना दफ्तर; जामदार; पील; जिराईत; अंबर; फरास; मुदबख; नगार; सरबत; आवदार; शिकार; तालीम; दारू, उष्टर; बकरे; तोप; तराफ.
(संदर्भ: केतकर ज्ञानकोश. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1520-2012-10-22-07-21-32

५.) अदिकल – अंबलवासी जातिसमूहापैकीं एक वर्ग-हे मूळचे ब्राह्मण आहेत असें म्हणतात; परंतु भद्रकालीच्या देवळामध्यें उपाध्यायाचें काम केल्याकारणानें व मांस आणि दारू यांचे नैवेद्य दाखविले म्हणून ते भ्रष्ट झाले. ते यज्ञोपवीत धारण करितात, क्षुद्र देवतांच्या देवळांमध्ये उपाध्यायाचें काम करतात, व दुसरीं देवळांतलीं कामें करतात. लग्न आणि वारसा या बाबतींत ते मक्कत्तयम नियमांप्रमाणें वागतात. ते वृद्धि व सुतक दहा दिवस पाळतात. दहा गायत्रीमंत्र जपतात; त्यांच्याच जातीचे लोक त्यांची भिक्षुकी करितात. त्यांच्या बायकांस आदियम्मा असें म्हणतात. नम्बुद्रि बायकांसारिखे दागिने या वापरतात पण बाहेर जातांना त्यांच्यासारखी ताडाची छत्री घेत नाहींत व त्यांचेप्रमाणें नायर कुणबीण बरोबर नेत नाहींत. [ Castes and Tribes of S. India. Census Report – Travancore (I9II) ]

http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1592-2012-10-23-05-13-48

६)  "ह्याशिवाय गुलामांचाही एक वर्ग होता. अनैतिक गुन्हे केलेल्या किंवा बेवारशी स्त्रिया, मुले, पुरूष इत्यादींना गुलाम समजत. पैकी स्त्रीला कुणबीन म्हणत. ती चांगल्या आचरणाने गुलामीतून मुक्त होई. शिवशाहीत व पेशवाईत २ ते २५ रूपयापर्यत कुणबीण विकत मिळे. त्या वेळी हिंदुस्थानात गुलामांची चाल होती. संदर्भ : http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=&start=18

७) संत कान्होपात्राला बेदरच्या बादशहाने आपली ’कुणबीन" बनवायचा प्रयत्न केला होता. तो फसला. कान्होपात्रा कुणबी जातीची नव्हती. संदर्भ: http://medievalsaint.blogspot.in/2014/03/saint-kanhopatra.html

८) शनिवारवाड्यात कुणबिणींच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र दार ठेवलेले होते. शनिवारवाड्यासमोर कुणबिणींचे बाजार भरत हे सर्वांना माहितच आहे.

वरील बाब पाहता कुणबिणी/बटीक ही एक संस्था होती, त्यात विशिष्ट जातीच्याच स्त्रीया असत असे कोठेही दिसत नाही. वेश्या आणि कुणबिणीतील पहरक हा कि कुणबीण ही विकत घेतलेली स्त्री असायची. आपत्तीमुळे स्वत:हुन विकणे, विकले जाणे, पळवुन नेवुन विकणे असे प्रकार होत होते. कुणबिणी विकत घेणारे ऐपत असणारे सर्वच समाजघटक होते. एकाच विशिष्ठ जातीचे लोक कुणबिणी बाळगत  असेही दिसत नाही. किंबहुना कुणबिणी बाळगणे ही तत्कालीन प्रतिष्ठेची बाब होती. शिवकालातही कुणबिणींच्या विक्र्या होत असेही दिसते. किंबहुना ही संस्था जगभरची आहे.

आता प्रश्न हा पडतो कि कुणबीण हा शब्द आला कोठुण? "कुणबी" या कृषीवलघटकाशी हा स्त्रीवाचक शब्द आल्याने कुणब्याच्या बायका-पोरीच कुणबिणी बनत असत असा अवमानकारक अर्थ निघणे व संताप येणे स्वाभाविक आहे. पण खरेच तसे आहे काय हे कुणबिण या शब्दाबाबत दिल्या गेलेल्या माहितींत कुणबिणी या कुणब्याच्या बायका असत असा निर्देश कोठेही नाही. मग काय असावे?

भाषांत अनेक शब्द अपभ्रंश होऊन बाहेर जातात किंवा आपल्याकडे येतात. शब्दकोशात येणारे अर्थ असे:

१) कुणबीण (p. 172) [ kuṇabīṇa ] f (कुणबी) A female domestic slave. 2 The wife of a कुणबी.( सनी पवार या एका एका मित्राने मोल्सवर्थ डिक्शनरीवरुन दिलेला हा एक अर्थ आहे.

येथेही दोन वेगळे स्वतंत्र अर्थ दिलेले आहेत. इंग्रजीत कुणबीण या शब्दाला अत्यंत जवळ जाणारा मात्र अर्थ तोच असणारा एक शब्द आहे व तो म्हणजे concubine . या शब्दाचा ओक्स्फ़ोर्ड शब्दकोशाने दिलेला अर्थ आहे : chiefly historical (In polygamous societies) a woman who lives with a man but has lower status than his wife or wives. आणि A mistress.

प्राचीन रोममद्ध्ये कुंकुबिना ही एक संस्था होती. यात शरीरसुखासाठी ठेवलेल्या (पत्नी नसलेल्या) स्त्रीयांना कुंकुबाईन म्हटले जायचे. बायबलमद्ध्येही याचा उल्लेख मिळतो. या ल्यटीन शब्दावरुनच आजचा इंग्रजी शब्द साधला गेला आहे.

युरोपचा महाराष्ट्राशी संबंध आला तो किंचीत शिवपुर्व काळात. तत्पुर्वी सातव्या आठव्या शतकापासुन युरोपिय व्यापारी येतच होते. दहाव्या शतकात चेऊल बंदरावर येणा-या युरोपियनांबद्दल मीडोज ओफ गोल्ड या अल मसुदीच्या प्रवासवर्णनात कोकणातील जे वर्णन केले आहे त्यात महिनोनमहिने भारतातच रहाव्या लागणा-या विदेशियांना स्त्रीया बरोबर आणल्या नसल्याने सहवासासाठी स्त्रीया ठेवण्याची पद्धत होती असे नमुद केले आहे. या स्त्रीयांना तो कोंकूबिन असेच संबोधतो.(द्वितीय खंड, पान २३१-५५)


प्राचीन रोम/बायबल यातील संदर्भ पाहता कुंकुबिन या शब्दाचा अपब्रंश मराठीत जवळ वाटणारा ’कुणबीण’ झाला असण्याची शक्यता अधिक आहे. तो मी काल म्हटल्याप्रमाणे मराठी कुणबीण शब्दाचा अपभ्रंश नाही हे मी येथे सांगु इच्छितो.

२) कुट्टणी हा वेश्यांसाठीचा एक शब्द संस्कृत वाद्मयात येतो. कुट्टणीमत या ग्रंथात वेश्यांना प्रशिक्षण कसे द्यावे याबद्दल विस्तृत विवेचन आहे. कुणबी हा शब्द "कुटुंबिण" या शब्दावरुन साधला गेला असावा असा इतर अनेक व्युत्पत्त्यांप्रमाणे तर्क आहे. समजा, कुटुंबिण या शब्दापासुन कुणबी हा शब्द साधला गेला असेल तर कुट्टणी या शब्दापासुन कुणबीण हा शब्दही साधला जावु शक्यतो. अर्थात हीही एक शक्यता आहे.

दोन्ही शक्यता पाहता मला पहिली शक्यता अधिक वाटते. पण कुणबीण म्हणजे कुणब्याची बायको नव्हे, हा शब्द जातिशी संबंधीत नसुन वर्गाशी संबंधीत आहे ज्यात हलाखीला पोहोचलेल्या कोणत्याही जातीघटकातील स्त्रीया असत. जी सुंदर आहे व संस्कारक्षम आहे तिला अधिक मुल्य दिले जात असे. त्याचा जातीशी संबंध नाही हे मात्र ठामपणाने मी सांगु शकतो.

"कुणबी" या सज्ञेबद्दल जेथे जेथे वेगवेगळ्या कोशांत माहिती आहे तेथे कुणब्यांच्या काही बायका/स्त्रीया शरीरविक्रय करित असे कोणतेही उल्लेख नाही, तसे असते तर "कुणबीण" या शब्दाची माहिती कुणबी या सदरातच दिली गेली असती. पण प्रत्यक्षात ती स्वतंत्र आहे. म्हणजे दोन सज्ञेमधील फरक माहित असल्याने कुणब्यांनीही तेंव्हा निषेध केला नसावा. अगदी अलीकडेपर्यंतही , ब्रिटिशांनी जातीसंस्थेबाबतील दिलेल्या माहितीतही कुणबी या शिर्षकाखाली कुणबीण हा उल्लेख केलेला नाही अथवा कुनबीण /बटीक ही विशिष्ट जातीची होती असा निर्देश नाही. या वर्गात मझ्या मते सर्वच जातेंतील/धर्मांतील स्त्रीया या वर्गात नाईलाजाने असाव्यात. अन्यथा शिवकाळातही कुणबिणींची खरेदी विक्री झाली नसती. शिवरायंनी या अनिष्ट प्रथेवर लगाम घातला असता. अनेकदा समान शब्द वेगळ्या अर्थाने वापरले जातात हे आपल्याल माहितच आहे. त्यातेलच हा एक प्रकार आहे असे दिसते.

 या संदर्भात अधिकचे संशोधन श्री. राहुल रांजणगांवकर यांनी केले असुन या लिंकवर ते उपलब्ध आहे.

Wednesday, May 6, 2015

राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!

बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकातील काही विधानांबद्दल सध्या वादळ सुरु आहे. तसे हे वादळ आजचे नाही. गेली काही वर्ष ते अधुन मधुन डोके काढत सुरु आहे. पुरंदरेंना राज्य शासनाने "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार दिल्याने हे वादळ आता तांडवात बदलण्याची शक्यता आहे. हा पुरस्कार शिवद्रोह्याला दिला जातो आहे असा प्रमुख आक्षेप असुन त्यासाठी त्यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मानली जाणारी विधाने/पुस्तकातील मजकुराची पाने सोशल मिडियातुन वावटळीसारखी सर्वत्र पसरवली जात आहेत. यांचा प्रतिवाद करण्यासाठी पुरंदरेंचे समर्थकही सज्ज असतातच. पण आरोपक आणि प्रतिवाद्क यांतील एकंदरीत जो उग्र आवेश आहे तो अशा वादांना कधीही पुर्णविराम देवु शकणार नाही हे उघड आहे.

मी हे पुस्तक आजवर वाचले नव्हते. मला प्रासादिक/पाल्हाळीक/प्रवचनी/प्रचारकी/नाटकी पुस्तके वाचायला आवडत नाहीत. अकरावी-बारावीत असतांना पाबळच्या वाचनालयात कधीतरी हे पुस्तक हाती आले होते. पण चाळुन ठेवुन दिले. आता मात्र वाचणे भाग पडले. वाचले आहे. भाषा प्रभावी आणि प्रवाही आहे हे नक्कीच.

पुस्तकाच्या अंतरंगात शिरायच्या आधी नेटवर जी माहिती मिळते ती नमुद करतो. या ग्रंथाच्या सोळा आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या असुन पाच लाख घरांत हे पुस्तक गेले आहे असे विकिपिडियावरील माहितीत म्हटले आहे. हे खरे मानले तर पाच लाख प्रती विकल्या गेल्या आहेत असे म्हणता येईल. कोणत्याही मराठी पुस्तकाच्या एवढ्या प्रती मराठीत विकल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे "पुरंदरेंनी शिवाजी महाराजांना घरोघर पोहोचवले." हे विधान अतिशयोक्त असले तरी बहुसंख्य मराठी जनांपर्यंत पोहोचवले हे मान्यच करावे लागेल. इतर कोणतेही पुस्तकरुपात प्रकाशित शिवचरित्र हा विक्रम मोडु शकलेले नाही असे स्पष्ट दिसते. शिवाय शिवाजी महाराजांवर त्यांनी असंख्य व्याख्यानेही दिलेली आहेत. ग.ह. खरेंसारखे विद्वान इतिहास संशोधक त्यांना गुरुस्थानी लाभले असेही दिसते. "बाबासाहेब पुरंदरे याणी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला." असेही विकीत नमुद आहे. असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल. समजा नसले तरी शिवचरित्र लिहायचे म्हणजे त्यांना त्याकाळी जी साधने उपलब्ध होतील त्यातील काही साधने तरी त्यांना संदर्भासाठी वापरावे लागलीच असतील हे गृहित धरावे लागेल. शिवाय इतिहासकार होण्यासाठी कोणाकडे कसली पदवी असलीच पाहिजे हेही बंधन नसते, त्यामुळे "पदवी दाखवा" हा आक्षेपही योग्य नाही. तरीही शाहीर व इतिहास संशोधक म्हणून त्याही अंगाने राजा शिवछत्रपती या पुस्तकाकडे पहावे लागेल.

ते रा. स्व. संघाशी तरुणपणापासुन संपर्कात होते अशीही माहिती यात नमुद असुन ते स्वत: स्वयंसेवक होते कि नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

त्यांनी इतरही लेखन केले असुन या विषयाशी संबंधीत त्यांचे "जाणता राजा" हे एक महानाट्य असुन त्याचे असंख्य प्रयोग झाले आहेत. अर्थात यावरही आक्षेप आहेत, पण ते नाटक मी पाहिलेले नसल्याने त्याबाबत काही लिहु शकणार नाही. पण हेही नाटक लाखो लोकांनी पाहिलेले आहे. किंमान अशा प्रकारचा महाराष्ट्रात झालेला (होत असलेलाही) एकमेव प्रयोग आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

आता पुस्तकाबाबत आणि आक्षेपांबाबत.

या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध होऊन सहा तरी दशके उलटली असतील. पुरंदरेंचा जन्म १९२१चा. म्हणजे हे पुस्तक लिहायला लागलेला संभाव्य कालावधी लक्षात घेता ते लिहित्यावेळीस तिशीत असावेत. मी चवदावी आवृत्ती (२००१) वाचुन आक्षेपांव्रील खालील निरिक्षणे नोंदवत आहे.

आक्षेप १)

"मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत." (पान ८३) असे सांगुन या विधानावर सर्वात जास्त प्रक्षोभ व्यक्त केला जातो. हे विधान देतांना पुढील संदर्भ दिला जातो.(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) संदर्भासठी खालील लिंक देत आहे.   http://babapurandare.blogspot.in/2010/09/blog-post.html  http://vishvamarathi.blogspot.in/2012/06/blog-post_28.html
सर्चमद्ध्ये अनेक मिळतात. अनंत दारवटकरांनी न्यायालयात विचारलेल्या प्रश्नावर पुरंदरे निरुत्तर झाले असेही सांगितले जाते.

माझ्याकडील आवृत्ती २००१ मधील आहे. १४ वर्ष जुनी. या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ८३ वरच नेमके काय म्हटले आहे हे पाहुयात:

"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"

दोन्ही उद्घ्रुते शांतपणे पडताळुन पहा. पुरंदरेंच्या पुस्तकात या विधानात मुळात ’मराठा’ शब्दच नाही हे सहज लक्षात येईल. हा शब्द कोठुन आणला? हे विधान करतांना लेखकाने तत्कालीन महाराष्ट्रातील अनागोंदी चितारत हे विधान केले आहे हे सलग वाचले तर स्पष्ट दिसते. सरदार-जहागिरदार फक्त मराठा होते कि काय? मुरारपंत जोगदेव सरदार नव्हता काय? तो कोण होता? वरील विधान सरसकट सर्वच महाराष्ट्री जहागिरदार-सरदारांबाबत आहे, त्यात ब्राह्मणाला सुटका दिली आहे असे दिसते आहे काय?

दुसरे महत्वाचे असे कि पुरंदरेंनी मराठा हा शब्द पुस्तकात मराठी माणुस म्हणुन वापरला आहे. जात म्हणून नाही. जेथे जेथे जात अनुस्युत आहे तेथे काय म्हटले आहे तेही पाहुयात:

 "क्षत्रीय मराठ्यांच्या तलवारी आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लेखण्या सुलतानांच्या सेवेंत दासींबटकींच्या अदबीने आणी नेकीने रमल्या होत्या." (पान ५५). विधान स्वयंस्पष्ट आहे. येथे मराठा जातीचा जसा उल्लेख आहे तसेच ब्राह्मणांचाही आहे. अन्यत्र मराठा जात ही कुळवंत अथवा शहाण्णव कुळी या विशेषणासहित उल्लेखली आहे. दोहोंना सारखेच झोडपले आहे असे स्पष्ट दिसेल.

मराठा जातीविषयी येणारा अजुन एक उल्लेख पहा, : "आणि या मंडळींना ओळखलत का? हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती.........पण काय लिहायचे आता?" (पान ३५८)

ही हतबुद्धता संतापाच्या रुपाने कोठे उमटली तर लेखकाला दोष द्यायचा कि परिस्थितीला? महाराजांपेक्षा या अशा "९६ कुळी म-हाटे" (हा पुरंदरेंचा या संदर्भातच पुढच्याच परिच्छेदांत येणारा शब्द), त्यातही निकटच्या नातेवाईक मंडळीला शाइस्तेखान जवळचा वाटला आणि त्याला जाऊन मिळाले. हे वास्तव नसेल तर पुराव्यांनीच खोडले पाहिजे. पण या विधानाबाबत कोणी आक्षेपच घेतल्याचे वाचनात नसल्याने हे विधान सर्वमान्य आहे असा अर्थ सहज घेता येइल.

आक्षेप २) " शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... " हे विधान आक्षेपार्ह मानले गेले आहे कारण यातील "कुजबुज" हा शब्द आणि हे लग्न पंतांनी हौसेने केले, म्हणजे शहाजीराजांना डावलले. एक चाकर शहाजीराजांपेक्षा मोठा झाला का असा हा आक्षेप आहे.

याला जोडुनच दुसरा आक्षेप या विधानावर... "आईसाहेबांवर ते फार माया करीत. ही बाई अशी तशी नाही, हिची जडणघडण कांही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता..........पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. गोत्र? - गोत्र शांडिल्य. पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे शिवबांचे गोत्र एकच होते-सह्याद्रि! प्रचंड अवघड सह्याद्रि! पंत भारदस्त होते. जबरदस्त होते. सह्याद्रीसारखेच!"  (पान १२६)

या विधानातील ’गोत्र’ एकच या शब्दावर आक्षेप आहे, तसेच ’ते फार माया करीत’ आणी ’शिवबांवर  तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता."

पण याच्याच आधी पान १२५ वर काय म्हटलेय तेही पाहुयात.

"राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरा-याचे, मायेचे आणि ममतेचे वडिलधारे पुरुष होते. ते सर्वांवर हक्काने रागवत अन हक्काने प्रेम करत." (पान १२५).

पुन्हा हा पाठचा संदर्भ असतांना हे वाक्य वाचुन काही ओळी (ज्यात सत्तर वर्षीय दादोजींच्या राजकीय अनुभवांबाबत सांगण्यात जातात.) गेल्यानंतर येणारे आक्षेपार्ह मानले जाणारे विधान पाहिले तर कोण सुज्ञ पुरुष ते आक्षेपार्ह मानेल? ’वडिलधारे’ या शब्दातच माया ममतेचा अर्थ सामावला आहे.

राहिले आता गोत्राचे. गोत्र ही वैदिक धर्मीय  संकल्पना आहे. पुरंदरेही "उत्तरेत वैदिक धर्माचा, वैदिक राज्यांचा आणि वैदिक संस्कृतीचा हे सुलतान विध्वंस करत होते, त्याच काळात महाराष्ट्रांतले धर्ममार्तंड पोथ्या उलथ्यापालथ्या करत खल करत बसले होते." (पान २५) असे विधान करतात. या वाक्याला माझा आक्षेप नाही कारण वैदिक धर्म स्वतंत्र आहे, वेगळा आहे हे मी सांगतच आलो आहे. त्यांनी उत्तरेतील कोणाला वैदिक मानले हे मी सांगु शकत नाही कारण त्यांनी ते स्पष्टही केलेले नाही. पण तो येथे मुद्दा नसुन गोत्राचा आहे.

पुरंदरे उपमा-उत्प्रेक्षा पेरत लेखन करतात हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. गोत्र म्हणजे काय? शूद्र वगळता सर्वांना (तीन वर्णांना) गोत्र असते. गोत्र म्हणजे ऋग्वेद रचना करणा-या ऋषींचे थेट वंशज. रक्तसंबंधी. महाभारत काळात गोत्रे फक्त चार होती. ती म्हणजे अंगिरस, कश्यप, भृगू आणि वशिष्ठ. नंतर ती आठ बनली. त्यांच्याच वंशांत गोत्रकर्ते ऋषी झाल्याने ही संख्या आता चारशेच्या पुढे गेली आहे. ही का संख्या वाढली त्याचे उत्तर मी अन्यत्र दिलेले आहे.

वरील विधानात दादोजींचे मुळ गोत्र शांडिल्य दिले आहे पण त्यात शिवबांचे मुळ गोत्र दिलेले नाही. जे नाही ते कसे देणार? पण अनेक जे मराठे आज स्वत:ला क्षत्रीय समजतात त्यांनी याचा विचार करावा. असो.

तर पुरंदरेंनी येथे प्रत्यक्ष सह्याद्रीची उपमा देत सह्याद्री गोत्र ठरवले यात काव्यमय आणि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. त्याच्याच अंगाखांद्यांवर खेळणारे मावळे यांचा नि वैदिक ऋषी गोत्राचा काय संबंध? हा सम्बंध महाराष्ट्रावरील प्रेमापोटी आणलेला आहे. गोत्र सह्याद्री म्हटल्यावर राग येत असेल तर अवघड आहे.

आता दादोजींना ते गुरु मानतात काय? शिक्षक मानतात काय हेही त्यांच्याच शब्दात पाहुयात:

"पण पंतांचे सर्वात बारकाईने लक्ष असे ते शिवबांच्या शिक्षणावर. लिहिणे-वाचणे शिकवण्यासाठी नेमलेल्या गुरुजींपाशी शिवबा बसे. ’ (पान १२७)

यात गुरुजीतुन गुरु आणि शिक्षणातुन शिक्षण हे दोन्ही शब्द आले आहेत. दादोजी गुरु होते असे पुरंदरेंनी ठामपणे कोठेही म्हटलेले नाही. न्यायनिवाड्यांत व अन्य राजकार्यात ते शिवबांना बरोबर ठेवत असे म्हटले आहे पण कोठेही "गुरु" शब्द येत नाही. येतो तो एका संस्कृत सुभाषितात, पण त्याचा अर्थ दादोजी गुरु होते असा काढणे म्हणजे मुद्दाम अनर्थ करणे होय. रामदासांबाबतही असेच आहे, पण त्याबाबत नंतर.

म्हणजे, एकदा वडिलधारेपणा दिला गेलेला माणुस माया करतो यात गैरार्थ काढणे विकृती म्हणता येईल.

हे झाले पुस्तकातील विधानांबाबत. आक्षेपांबाबत आणि त्यातील फोलपणाबाबत. पण दादोजींचा संबंध भोसले घराण्याशी चाकर म्हणून कधीच नव्हता. जोही काही होता तो कोंढाण्याचे सुभेदार म्हनून हे मी सिद्ध करुन दाखवले आहे. जहागिरदाराचा चाकर आणि सुभेदार यातील फरक मोगलकालीन प्रशासन व महसुल पद्धतीबाबत  नीट माहिती नसल्याने सुभेदार हा जहागिरदारापेक्षा मोठा असतो, एकच नव्हे तर परिसरातील अनेक जहागिरदार, मोकासदार, मिरासदार ते वतनदार हे त्याच्या महसुल व स्थानिक न्याय या संदर्भात सुभेदाराच्या अंकित असतात हे लक्षात घेतले पाहिजे. पुरंदरेही दादोजींना "नामजाद सुभेदार" (पान १२६) म्हणुन नंतर नेमले असे म्हणतात. नामजाद सुभेदार हे पद नाही. शिवाजी महाराजांच्या दादोजीसंबंधी चार अस्सल पत्रात "दादोजी कोंडदेवु सुभेदार" असाच उल्लेख आहे. सुभेदार केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल, जमीनी लागवडीखाली आणने, गांवे वसवने, जातपंचायतींच्या निवाड्यांना मान्यता देणे (मजहरनामे) अशा त्याच्या जबाबदा-या असत.

जहागीर, मोकासा हे अस्थिर हक्कांचे स्वामी असत. केंद्रीय सत्तेची मर्जी असेपर्यंत ते कायम रहात अन्यथा ते काढुनही घेतले जात असत. याउलट वतन अथवा इनाम हे मात्र वंशपरंपरेने कायमचे असत. (महाराष्ट्र आणि मराठे, ले. अ.रा. कुलकर्णी, पान २९)

सुभेदार कोणत्याही जहागिरदाराचा चाकर असु शकत नव्हता हे येथे स्पष्ट होईल. त्यामुळे दादोजींबाबतचे सर्वच प्रसंग काल्पनिक/कविकल्पना/प्रक्षिप्त दंतकथा या सदरात टाकुन देता येईल. दादोजींबाबतच्या जुन्या कल्पना दोन-तीन वर्षापर्यंत कायम होत्या. दादोजी आणि शिवराय यांचा संबंध नाही हे इतिहासकार मेहंदळेंनीही ३०-३२ वर्षांपुर्वी मान्यच केले आहे. (संदर्भासाठी पहा: http://sanjaysonawani.blogspot.in/2012/02/blog-post_06.html ) ब्रिगेडी इतिहासकार मात्र उलट माझा लेख येईपर्यंत दादोजींचा उल्लेख "शहाजीराजांचा सामान्य चाकर अथवा नगण्य नोकर " असा करत असत. हे त्यांचेही जर अज्ञान होते तर समजा पुरंदरेंचेही (१९५८ साली) मोगलकालीन महसुलपद्धतीबाबत असेल तर त्यात धक्कादायक काय आहे?

शिवाय प्रस्तुत पुस्तकात दादोजींच्या मृत्युनंतर फक्त एकदाच ओझरता उल्लेख आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. अडिच प्रकरणांत इतर विषयांबरोबरच दादोजी प्रकरण आटोपते. (पुस्तकात एकुण ५२ प्रकरणे आहेत.)

आक्षेप ३) पुस्तकात ब्राह्मण माहात्म्य अधिक असुन शिवाजी महाराजांची प्रतिमा हिंदुत्ववादी व मुस्लिम विरोधी दाखवण्यात आली आहे.

हा आक्षेप अनेक शब्दांत, अनेक पद्धतीने नोंदवण्यात आला असल्याने मी फक्त आरोपाचा गाभा मांडला आहे. वरील आक्षेपांसाठी आपण पुस्तकातील काही नमुने पाहुयात.

यासाठी पान ८० व ८१ वाचले पाहिजे.  यात चार दिर्घ परिच्छेदांत वेदशास्त्रसम्पन्न ब्राह्मण केवढ्या नालायक्यांना पोहोचले होते याचे उद्वेगजनक वर्णन आहे. "नाशिक येथे ऐलतीरावरील मंदिरे फुटत असतांना पैलतीरावर वेदोनारायण पळींपंचपात्री घेऊन तिरिमिरीने भांडत होते. कशासाठी? तर, यात्रेकरुंपैकी ऋग्वेद्यांची पिंडॆ कोणी पाडायचीं आणी यजुर्वेद्यांची पिंडे कोणीं पाडायची यासाठी!!" ते "वेदशास्त्र संपन्न शास्त्री-पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी, ’श्रीगोदातटाकीं आणि श्रीकृष्णातटाकीं स्नानसंध्या करुन हजरतसाहेबास दुवा देत."

ब्राह्मणही या विधानामुळे पुरंदरेंच्या मागे का लागले नाही हे समजत नाही. वरील मजकुरालाच थोड्या अंतराने जोडून "एकदा मने विकली की जपण्यासारखे काही उरतच नाही. कांहीही लिलावाला निघते. बायकासुद्धा!" असे पुरंदरे  ब्राह्मणांची इज्जत काढून म्हणतात. पण आक्षेप याला नाही...

आक्षेप वेगळाच आहे.

वरील विधानानंतर सध्याच्या वादात आक्षेपार्ह मानले गेलेले अंतराने येणारे वाक्य म्हणजे, "ब-या, नीटस, गो-या जातीवंत कुणबिणी" बाजारांत सहज ’पंचविस होनांस पांच’ विकत मिळत होत्या." हे होय.

कुणबी आणि मराठे एकच असल्याने हे विधान मराठा पुरुषांची बदनामी करणारे आहे असे म्हटले जाते. वरकरणी पाहता ते खरेही वाटेल. अर्थात या वाक्याआधीचे ब्राह्मणांबाबतचे उद्वेग कसे व्यक्त झाले आहेत हे आपण थोडक्यात पाहिले.

१६३० च्या प्रलयंकारी दुष्काळात ’पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया, स्वता:ला गुलाम म्हणून  विकून घेत. आया बालकांची विक्री करीत." असे हृदयद्रावक वर्णण डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवले आहे. या दुष्काळाची वर्णने तुकाराम महाराज, रामदास, परमानंद यांनीसुद्धा करुन ठेवली आहेत. तुकोबांचे तर नुसते दिवाळे निघाले नाही तर पत्नी व मुलही गमवावे लागले. या दु:ष्काळात होनाजी निबरे नांवाच्या गृहस्थाने घर व जमीन २५ होनास विकली असे पत्रसारसंग्रह ३२९ मद्धे नमुद आहे. अशी त्याकाळातील अगणित उदाहरणे आहेत. इअतकी कि माणुस मृत माणसाला खात होता. (वरील माहितीसाठी संदर्भ: मराठे आणि महाराष्ट्र, ले. अ. रा. कुलकर्णी, पान १०८ ते ११६) आणि पुरंदरेंचे विवेचन नेमके १६२९-३० या काळातील स्थितीचे आहे. दुष्काळातील आहे.

पुरंदरेंनी कुणबिण शब्द वापरला आहे आणि कुणब्याची बायको अथवा मुलगी म्हणजे कुणबीण असा अर्थ येथे घेतला गेलेला दिसतो.  त्यामुळे वितंड आहे. मराठा म्हणजे कुणबी हे सध्या समीकरण तेजीत असल्याने पुरंदरेंनी मराठा बायकांची बदनामी केली असा समज होने स्वाभाविक आहे.

पण वास्तव काय आहे?

कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको-पोर तर बटकी कोण होती? ती कोणाची बायको-पोर होती?

कुणबीण हा रखेली या शब्दाचा प्रतिशब्द होता. कुणब्याची बायको म्हणून तत्कालीन स्थितीत तो अभिप्रेतही नव्हता. याचे शिवकालापासुन, खुद्द शिअवरायांच्या पत्रांतील पुराव्वे उपलब्ध आहेत. बटकी म्हणजे घरकामासाठी राबणारी. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको/पोर नव्हे तर एखाद्या माणसाची विक्रय झालेली शय्यासोबतीन. भावीण या शब्दाचा अर्थ भावेंची बायको असा होत नाही तसेच हे आहे. दोन्ही सर्वस्वी वेगळ्या संज्ञा आहेत. यात लग्न अभिप्रेत नाही. ब्रिटिश काळ येईपर्यंत, स्त्रीयांची खरेदी/विक्री थांबेपर्यंत ही प्रथा होती. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन रोमन व बायबल काळापासुन चालत आलेल्या ल्यटिन "Concubine" या शब्दाचा तो मराठी अपभ्रंश आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीतील अर्थ आहे "a woman who cohabits with a man to whom she is not legally married, especially one regarded as socially or sexually subservient; mistress.". थोडक्यात ठेवलेली बाई. मग ती विकत घेतलेली असेल वा ती स्वेच्छेने राहत असेल. याचा कुणबी जातीशी संबंध जोडणारे व कुणबी समाजाची स्वत:हुन बदनामी करुन घेणारे किती मुर्ख?

जसा बटकीन या शब्दाचा जातीय अर्थ नाही तसाच कुणबिण या शब्दाचाही जातीय अर्थ नाही. कुणबिणी आणि बटकिणींचे क्रय-विक्रय हा महाराष्ट्रातील (अन्यत्र वेगळ्या नांवांनी) सुरु असलेला फार जुना व्यवसाय आहे. पेशवे काळातही शनिवार वाड्यासमोर कुणबिण-बटकिणींचे बाजार भरत व पाच रुपये ते ऐंशी रुपये दराने त्यांची खरेदी होत असे अशा नोंदी उपलब्ध आहेत. आणि या विकावु स्त्रीया कुणबाऊ समाजाच्या असत असे नव्हे तर बव्हंशी सर्वच जातीतील असत. अशा सर्व स्त्रीयांना कुणबीन अशी संज्ञा होती. यामद्धे एकजातीयता शोधणे अनैतिहासिक आहे. किंबहुना हा वेगळाच वर्ग होता ज्यात कोणत्याही जात/धर्माची स्त्री असु शके.

आक्षेप ४)  हिंदुत्ववादी पुरंदरे मुस्लिम द्वेष्टे असुन शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सेवक/सेनानींबद्दल ते नामोल्लेख करत नाहीत.

आपण पुरंदरेंच्याच पुस्तकातील काही उतारे पाहु.

१. पान २४६ वर पहा. "या वेळीस महाराजांचे मुख्य मुख्य अंमलदार महाराजांच्या बरोबर घोडे दौडीत होते. पुढीलप्रमाणे हे अधिकारी होते. शामराज नीळकंठ रांझेकर (पंत पेशवे).........नुरखान बेग सरनौबत (पायदळाचे सरसेनापती.)." , नेताजी पालकरांच्या सोबतीने सिद्दी हिलाल आहे. त्याचा मुलगा वाहवाह आहे. त्यांची स्वराज्यासाठीची अविरत दौड आहे. मुस्लिम म्हणुन लेखकाने त्यांना हिणवल्याचे दिसत नाही.

२. ’स्वराज्य वाढले. किती साधी माणसे ही? कुणी कुलकर्णी होता. कुणी रामोशी होता. कुणी मुसलमान होता. कुणी न्हावी होता. कुणी भंडारी होता. कुणी देशपांडे होता. कुणी महार होता. कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला." (पान ४०७) .

३. "केळशी येथे बाबा याकूत हे थोर अवलिये राहत होते. अल्लाच्या चिंतनावाचुन त्यांना दुसरे आकर्षण नव्हतें. अमीर वा फकीर त्यांना सारखेच वाटत. सच्चे परवरदिगार रहमदिल होते ते. महाराज त्यांच्या दर्शनास केळशीस आले व त्यांचे दर्शन घेऊन जंजि-याच्या मुकाबल्यास त्यांनी हात घातला." (पान ९३८)

४. औरंगजेब उत्तरकाळात विक्षिप्त झाला. धर्मवेडाने वागु लागला. "बाटवाबाटवी तर फार स्वस्त झाली. खरोखर त्या थोर प्रेषिताच्या पवित्र व ’सत्य’ धर्माची अवहेलना त्याचेच अनुयायी म्हणवुन घेणारे करु लागले. औरंगजेब तर मुळचाच धर्मवेडा. कुराण शरीफ तोंडपाठ करुनहि बिचा-याला त्यांतील ईश्वरी तत्वाचा बोध होऊ शकला नाही." हे सांगुन लेखक म्हणतो...

"औरंगजेबाचे हे धर्मवेडे चाळे महाराजांना समजले. त्यांना अत्यंत दु:ख झाले. कीव आली. रागहि आला. कोणता धर्म असा वेडगळ उपदेश करील, की लोकांवर क्रुर जुलुम करा, अन्याय करा म्हणून? धर्माचा संस्थापक म्हणजे इंश्वराचा अवतार. पेमदयाशांतीचा गोड सागर. कोणत्या धर्मसंस्थापकाने असें सांगितले आहे की, माझ्या शिकवणुकीचा प्रचार करण्यासाठी वटेल ते क्रुर अत्याचार करा म्हणुन? असे कोणीही सांगितलेले नाही." (पान ७५७)

हे वरील वाचता (मी नमुने दिले आहेत...असे अनेक आहेत.) पुरंदरेंना मुस्लिम द्वेष्टे म्हणेल? तरीही अजुन तुमची खात्री पटावी म्हणून सर्वच लोकांबद्दल त्यंची काय भावना आहे हे खालील वाक्यावरुन लक्षात येईल...

"स्वराज्य वाढले. किती साधी माणसे ही? कुणी कुलकर्णी होता. कुणी रामोशी होता. कुणी मुसलमान होता. कुणी न्हावी होता. कुणी भंडारी होता. कुणी देशपांडे होता. कुणी महार होता. कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला." (पान ४०७).

यानंतरही त्यांना एकाच जातीचे पक्षपाती ठ्रवायचे असेल तर खुशाल ठरवावे. खरे तर मुस्लिम हा शब्दच मुळात हजार पाने पुस्तकात दोन-तीनदा आला आहे. त्याऐवजी. अफगाणी, मोगल, निजामशाही, अदिलशाही,सुलतान-सुलतानी असेच शब्द अधिकांश वापरलेले आहेत. मुर्तीभंजनाचा खेद व उद्वेग सर्वत्र दिसतो. त्यात काही प्रसंगी अतिशयोक्तीही आहे. पण त्यातुन मराठी माणुस (मी आता मराठा शब्द टाळु म्हणतो.) आपत्तीविरुद्ध, आक्रमकांविरुद्ध आणि पारतंत्र्याविरुद्ध उभा राहत नाही, उलट स्वत्वे विकत गुलाम होतो याची चीड दिसते.

आक्षेप ५) फुटकळ मुद्द्यांना मी आता उत्तरे देत बसत नाही आणि कोणाचा वेळ वाया घालवु इच्छित नाही. पण तरीही आयबीएन लोकमतवर जिजाउंना कुंतीसारखे व्हायचे म्हणजे काय हा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेत केला होता. त्या संदर्भातील वाक्यही पुरेपुर तपासुन घेऊ. तत्पुर्वी याच पुस्तकातील पान क्र. ११३ वरील शहाजीराजांच्या स्वातंत्र्य धडपडईबाबत लिहितांना लेखक म्हणतो, ..." स्वातंत्रेच्छू सर्व धडपडींचे मुळ कोठे असेल आणि त्यांचे अंत:करण चेतवणारी, सुलतानशाहीविरुद्ध बंडाची प्रेरणा देणारी आणि स्वत:च सत्ताधीश ’राजे’ बनावे, अशी महत्वाकांक्षा फुंकरुन फुंकरुन फुलविणारी कोणती शक्ति राजांच्या मागे होती?

"इतिहासाला माहित नाही. पण ती शक्ति, ती व्यक्ति असावी जिजाबाईसाहेब! शहाजीराजांच्या राणीसाहेब!" (पान क्र. ११३)

आता आव्हाडांच्या आक्षेपाकडे जावू.

कुंतीसंबंधाने आव्हाडांनी अर्धवट विधान केले. संपुर्ण विधान असे आहे...जेंव्हा जिजाऊ गरोदर होत्या तेंव्हाचे.

"तिला रामायण , महाभारत फार फार आवडे. राम, हनुमान, सीता, कृष्ण, द्रौपदी, कुंती, विदुला या सर्वांच्या कथा ऐकतांना तिच्या मनावर विलक्षण परिणाम होई. तिला वाटे, आपण नाही का कुंतीच्या पंगतीला बसु शकणार? तिचा भीम, तिचा अर्जुन अत्यंत पराक्रमी निपजले. त्यांनी राक्षस आणि कौरव मारले. सुखसम्रुद्ध धर्मराज्य स्थापन केले. कुंती वीरमाता, राजमाता ठरली. मला तिच्या पंक्तीला बसायचेय! बसेल का?"

सोळाव्या शतकातील स्त्री-पुरुषांची मानसिकता काय होती? कुंतीला वरदानाने देवांपासुन मुले झाली. त्यात कोणाला कधी अश्लाघ्य वाटले नव्हते. विसाव्या शतकातही वाटत नाही. याला ब्राह्मणी अथवा वैदिक मानसिकता म्हणा. पण वरील विधानात "कुंतीला दैवी वराने नव्हे तर प्रत्यक्ष नियोगाने अथवा व्यभिचाराने मुले झाली" हे अलीकडचे आकलन तेथे लादुन कसे चालेल? अर्थ एवढाच आहे कि पांडवांपैकी पराक्रमी असलेल्या भीम आणि अर्जुनाप्रमाणे मुल व्हावे. मग कर्णाचे नांव पुरंदरेंनी घेतले नाही म्हणूनही छाती पिटता येईलच.

कोणतीही मिथककथा लक्षणार्थी घ्यायची कि वाच्यर्थ याचे भान सुटले तर काय होनार? पुराणकथा ऐकतच बहुजन वाढले. आजही किर्तन सप्ते लावणारे कोण आहेत? याच भाकडकतथा सांगणारे बहुतेक किरतनकार आज बहुजनच आहेत. आपलेच पुरुष, स्त्रीया आणि मुले ते ऐकत आहेत. पण त्यांना विरोध नाही.

मग विरोध कोणाला आहे?

कोणालाही करोत. सत्याला अंध विरोध मान्य नसतो. पुरंदरेंवर केले जाणारे आरोप मात्र केवळ वरकरणी ब्राह्मणी द्वेषातुन आहेत. हे, म्हणजे संघीय मुख्यमंत्री सिंधखेडराजाला यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार आणि टुक्कार अनुयायांन्च्या हाती स्वर्ग देणार. नेत्यांचे खरे अंतर्मन तरी कोठे माहित आहे?

तरीही नि:ष्कर्ष:

पुरंदरेंना इतिहास सांगायचा नसुन आक्रमक, पारतंत्र्य आणि स्वराज्य यातील भेद ठळक करण्यासाठी एक प्रेरकता निर्माण करायची आहे असा सर्व पुस्तक वाचल्यानंतरचा एकमेव उद्देश दिसतो. इतर ब्राह्मणी लेखकांनी रामदासांचे फाजील लाड केलेत तसे पुरंदरेंनी कोठेही केलेले दिसत नाही. दादोजी हे शिवजीवनातील एक दुरस्थ पात्र आहे. पण तत्कालीन समजुतींनुसार त्यांनी ते आपल्या कादंबरीत रंगवले आहे. पण त्यात जिजाऊंचा अवमान करण्याचा उद्देश्य दिसत नाही. मुस्लिम द्वेष नसुन स्वजन नाकर्ते आहेत याचा लेखकाला अधिक रोष दिसतो व त्याबद्दलचा संताप काही ठिकाणी व्यक्त झाला आहे. कुणनी-बटकिणी या संज्ञा जातीय नसुनही कुणब्याची पोरगी किंवा बायको असा सरधोपट अर्थ घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात विकत जाणा-या कुणबिणी कोणत्याही जातीतील असत व त्याचा अर्थ  रखेल असा व्हायचा. बटकिण म्हणजे घरकामासाठी विकत घेतलेली बाई. हे शब्द ज्यांनी जन्माला घातले ते दोषी आहेत. स्वराज्यासाठी उपयोगी ठरलेल्या मुस्लिमांना त्यांनी  डावलले आहे असेही दिसत नाही. इस्लामबद्दल शिवाजीमहाराजांच्याच माध्यमातुन लेखक काय म्हणतो हे मी वर नमुद केलेच आहे. त्यात कोठेही इस्लामबाबत द्वेषभावना दिसत नाही. संघविचारी इस्लामचा द्वेष करतात हे जगजाहीर आहे. या कादंबरीपुरते तरी मी म्हणू शकतो कि संघविचाराच्या प्रभावातील ही कादंबरी नाही. कादंबरीत भावनोद्रेकिता, परिस्थितीवरील चडफडाट जसा आहे तशा अतिशयोक्त्याही आहेत. देवगिरीचे साम्राज्य कोसळल्यानंतर परिस्थितीची हतबलता महाराष्ट्रावर आलीच नव्हती असेही कोणी म्हणु शकणार नाही. अतिशयोक्तीचा भाग कादंबरी म्हणून वगळला कि अशा स्वरुपाच्या घटना घडल्याच नाहीत असे म्हणायचे धाडस कादंबरी वाचल्यानंतर कोणी करु शकणार नाही. मागचे पुढचे संदर्भ न घेता एखादेच विधान व शब्द वेठीस धरले तर जगातील सर्वच पुस्तकांवर आक्षेप घेता येतील. पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे. पण त्यांच्यावर आपल्या मनात येईल ते थोपणे योग्य नाही. पुस्तकातील भाषा ही आलंकारिक आहे. प्रभावी व प्रवाही आहे. अलंकारिकतेच्या तत्कालीन खांडेकरी पद्धतीचा तो दोष आहे. तरीही एक साहित्यप्रकार म्हणून त्यात रचनाशैलीचे अनेक दोष आहेत. पण त्याची समिक्षा साहित्य समिक्षकांनी केली पाहिजे.ती समिक्षा करणे हा या लेखाचा उद्देशही नाही. जे आक्षेप घेतले जात आहेत त्यावर भाष्य करणे हा एकमेव हेतु यामागे आहे. मी दिलेली उत्तर शक्यतो पुरंदरेंच्याच मुळ पुस्तकात काय आहे आणि आक्षेप काय आहेत यावर केंद्रित केले आहे.

-संजय सोनवनी

Saturday, May 2, 2015

हिरण्यदुर्ग / संजय सोनवणी



प्रत्येक मराठी वाचकाने लहानपणी चांदोबा मासिक वाचलेले असते. त्यातल्या अद्भूतरसाने भरलेल्या जादूच्या गोष्टी, राजे-राण्या, राजपुत्र, राजकन्या, राक्षस, भुते, वेताळ, जादूगार, पऱ्या यांचे जादुई विश्व आणि त्याबद्दलचे आकर्षण त्याच्या मनात खोलवर दडलेले असते. प्रौढ वयात देखील त्यांना या साऱ्या गोष्टी खुणावत असतात. त्यामुळे पिढ्यानपिढ्या विविध लेखक प्रौढांसाठी देखील असे अद्भूतरम्य वाड्मय लिहीत असतात आणि असे वाड्मय लोकप्रिय होत असते. गेल्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रात गो. ना. दातार या लेखकाने रेनॉल्डसच्या  अशा शैलीतल्या कादंबऱ्यांची ‘कालिकामूर्ती’, ‘अधःपात’, ‘बंधुद्वेष’ अशी बेमालूम रूपांतरे केली होती आणि ती वाचकांच्या पसंतीला इतकी उतरली की आज देखील त्यांच्या नव्या नव्या आवृत्त्या प्रकाशित होत असतात. नंतरच्या काळात नाथमाधव, शशी भागवत, सुहास शिरवळकर आदि लेखकांनी देखील असे विपुल लेखन केले आणि ते वाचकांनी डोक्यावर घेतले. 

‘क्लिओपात्रा’, ‘ओडिसी’ सारख्या ऐतिहासिक पात्रांवर- घटनांवर आधारित चित्तथरारक कादंबऱ्या आणि ‘असुरवेद’, ‘द अवेकनिंग’सारख्या स्वतंत्र कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनात वेगळे स्थान मिळवलेल्या संजय सोनवणी यांनी ‘हिरण्यदुर्ग’ ही अफलातून आणि भली मोठी साडेतीनशे पानांची चित्तथरारक कादंबरी वाचकांना सादर केली आहे. अद्भूतरसावर प्रेम करणाऱ्या वाचकांना जे जे हवे ते सगळे या हिरण्यदुर्ग मध्ये आहे. पुनर्जन्म, शाप, जादू, चमत्कार, दैवी चमत्कार, युद्धे आणि शेवटी नायकाचा शेवट या सर्व मसाल्याची कादंबरीच्या पानोपानी रेलचेल आहे. सिंहभद्र आणि केतुमाल हे दोन प्रवासी एका निबिड अरण्यात एकमेकांना भेटतात आणि कादंबरीला सुरुवात होते. आपण दोघे एकमेकांचे जन्मोजन्मीचे शत्रू आहोत आणि आपल्यापैकी एकाचा विनाश या जन्मी अटळ आहे हे भागधेय त्यांना ठाऊक नाही. ते उशीराने समजते आणि त्यांचे मार्ग भिन्न होतात. यातला सिंहभद्र हा नागवंशीयांचा पक्षपाती आहे आणि त्याच्यावर साक्षात शिवशंकराचा वरदहस्त आहे. तर केतुमाल उर्फ पुलोमा हा गरुडवंशीयांचा पुरस्कर्ता आहे. पण त्याच्या पाठीशी कोणी स्वर्गस्थ देवता उभी राहिलेली जाणवत नाही. सद्यस्थितीतला संघर्ष हा दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. कथानकातली राजकन्या देवसेना ही दोघांना हवी आहे. अर्थातच घनघोर संघर्ष आणि युद्धे झाल्यावर शेवटच्या संघर्षात नायकाचा – सिंहभद्राचा विजय होतो. त्याला त्याचे राज्य मिळते. त्याला देवसेना लाभते. खलनायक पुलोमाचा आणि त्याच्या अनुचरांचं सर्वनाश होतो. 

एकदा वाचायला घेतलेली ही कादंबरी संपेपर्यंत खाली ठेववत नाही हे अगदी खरेच. वाचक हिला डोक्यावर घेतील याची देखील खात्री वाटते. परंतू कादंबरीमध्ये अधूनमधून डोकावणारे मुद्रणदोष वाचताना क्वचित रसभंग करीत राहतात. कथेच्या सुरुवातीला एकमेकांना भेटलेले आणि एकमेकांशी रुजुतेने वागणारे सिंहभद्र आणि केतुमाल ‘आपल्या माणसात’ गेल्यावर त्यांच्या डोक्यावर जन्मोजन्मीच्या इतिहासाचे ओझे लादले जाते आणि ते एकमेकांचे हाडवैरी बनतात हे अगदी वर्तमानाशी नाते सांगणारे आणि प्रतीकात्मक झाले आहे. मात्र पुलोमा खलनायक का आणि सिंहभद्र नायक का? हे वाचकांच्या मनावर नेमके बिंबत नाही. पुलोमाच्या आणि त्याच्या पूर्वजांच्या नावे काही दुष्टकृत्ये काही पानांवर डोकावतात. पण तरी त्यातून पुलोमाचे खलनायक असणे वाचकांच्या मनात पुरेसे ठसत नाही. याचा देखील शोध वर्तमानात घ्यायचा का?
* * *
- विजय तरवडे
हिरण्यदुर्ग / संजय सोनवणी
पाने – ३५२ किंमत रु. ३५०/
प्रकाशक – जालिंदर चांदगुडे
प्राजक्त प्रकाशन
३०३, वर्धमान हाईट्स,
बाजीराव रस्ता, पुणे ४११००२    

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...