Sunday, July 30, 2017

चिनी ड्रॅगनला ट्रम्प यांचा धक्का?


चिनी ड्रॅगनला ट्रम्प यांचा धक्का?


सत्तेत आल्यापासून प्रथमच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताचा समावेश आण्विक पुरवठा गटात (एनएसजी) करून घ्यावा यासाठी स्वत: तर पाठिंबा दिलाच आहे; पण अन्य देशांनीही भारताच्या प्रस्तावाचे समर्थन करावे, असे आवाहन केले आहे. भारताच्या या महत्त्वाच्या गटात शिरकाव होण्यात सर्वात मोठा अडथळा चीनचा आहे. या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे ४८ सदस्य देश अशा सहभागास एकमुखाने मान्यता देत नाहीत तोवर हा प्रवेश अशक्यच आहे. या गटाचे सदस्य बनल्यावर भारत आंतरराष्ट्रीय आण्विक व्यापाराच्या मोजक्या नियंत्रक देशांमध्ये मोडेल. भारत आणि चीन एकीकडे डोकलाम पठारावर एकमेकांविरुद्ध उभे असताना ट्रम्प प्रशासनाकडून हे ठोस आश्वासन व अन्य सदस्यांना आवाहन यावे याला निव्वळ योगायोग म्हणता येत नाही. या पाठिंब्याला अजून एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन हे लवकरच बीजिंगला भेट देत आहेत. या भेटीचा उद्देश चीनचा भारतविरोध मावळण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणूनही पाहण्यात येत आहे. ओबामा प्रशासनाची काही धोरणे ट्रम्प यांनी बासनात गुंडाळली असल्याने भारताच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाबाबत ट्रम्प काय भूमिका घेतील ही शंका होती. पण ट्रम्प यांनी तो पाठिंबा नुसता जिवंतच ठेवलेला नाही, तर अन्य सदस्य राष्ट्रांनाही आवाहन करून अमेरिका भारताच्या सदस्यत्वासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले आहे. डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवरील हा पाठिंबा सूचक आहे हे उघड आहे.
एनएसजीचे सदस्य होण्याचे भारताला अनेकविध फायदे आहेत. एनएसजीचे सदस्य झाल्यानंतर भारताला एनएसजीच्या सदस्य देशांकडून आधुनिक आण्विक तंत्रज्ञान मिळवणे सोपे जाईल. सध्या फक्त समृद्ध युरेनियमसाठी अमेरिकेवर अवलंबून असलेल्या भारताला कोठूनही, अगदी नामिबियासारख्या देशातूनही आण्विक इंधन आयात करता येईल. अणुऊर्जेसाठी लागणारी सामग्रीही भारताला उत्पादित करता येईल तसेच भारतातील आण्विक ऊर्जेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढण्यास हातभार लागेल. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईलच, पण निर्यातीतही वाढ करता येईल. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज दिला आहे. भारत सदस्य झाल्यावर अशा दहशतवाद समर्थक राष्ट्रांच्या एनएसजीमधील प्रवेशाला विरोध करू शकेल. आज भारतात आण्विक ऊर्जेला विरोध करणारे काही घटक प्रबळ असले तरी भारताची ऊर्जेची भविष्यातील मागणी पूर्ण करायला इतर अपारंपरिक साधनांबरोबरच आण्विक ऊर्जेचीही कास धरावीच लागणार आहे. याही दृष्टीने भारताचे एनएसजीमधील सदस्यत्व महत्त्वाचे आहे.
एनएसजीमधील भारताच्या सदस्यत्वाचे प्रयत्न माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुश प्रशासनाच्या कार्यकाळातच सुरू केले होते. अमेरिकेसोबतच्या अणुकराराबाबत मुत्सद्दी डॉ. मनमोहनसिंग यांनी आपले सरकारही पणाला लावले होते. त्या वेळी डावे आणि आज एनएसजीमधील सहभागासाठी आटापिटा करणाऱ्या भाजपने या कराराविरुद्ध मोठा गदारोळ केला होता. सरकारात आल्यानंतर मात्र देशाची म्हणून काही धोरणे असतात, त्यांना मुरड घालता येत नाही हे विद्यमान भाजप सरकार व ट्रम्प प्रशासनाने दाखवून दिले. अमेरिकेबरोबर झालेल्या अणुकरारामुळेच भारताच्या एनएसजीमधील समावेशाच्या आशा वाढल्या हे अमान्य करता येत नाही.
यातील मुख्य अडथळा उरला आहे व तो म्हणजे चीन. चीनचा वरकरणी विरोध आहे तो भारताने आण्विक अप्रसार करारावर (एनपीटी) सही केलेली नाही त्यामुळे भारत सदस्य बनण्यास अपात्र आहे या कारणामुळे. तसा विरोध अन्य काही सदस्यांचाही होताच, पण भारताने या करारावर सही करण्याचे प्रथमपासून टाळले. कारण अशा करारावर सही करणे भारतासाठी आत्मघातकी ठरले असते. एनपीटी करारानुसार १९७० पूर्वी ज्या देशांनी अणुचाचणी केली आहे तेच देश अण्वस्त्रसज्ज देश म्हणून ओळखले जातील व अन्य सदस्यांना अण्वस्त्रसज्ज राष्ट्राचा दर्जा गमवावा लागेल. चीन भारताची याबाबत स्पष्ट भूमिका आहे ती अशी की, एकतर सर्वच राष्ट्रांनी आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत, अन्यथा सर्वच सदस्य राष्ट्रांना अण्वस्त्रे ठेवण्याचा अधिकार असावा. चीन व पाकिस्तानसारखे अण्वस्त्रसज्ज आणि तेही शत्रू शेजारीच असताना भारताला अण्वस्त्रविरहित होणे परवडणारे नाही हे उघड आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका न्याय्य व समन्यायाची आहे व सार्वभौमता जपण्याची आहे. किंबहुना एनपीटी ही भेदभावाने भरलेली व वैश्विक निकडींची पर्वा न करणारी आहे अशी टीका सातत्याने भारताने केली आहे. अमेरिका व अन्य अनेक सदस्य राष्ट्रांना ही भूमिका पटवून देण्यात भारताला यश आले आहे. चीन मात्र एनपीटीवर भारताने सही करायचा हट्ट धरून आडमुठेपणा करत आहे.
असे असले तरी भारताने गेल्याच वर्षी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचे (एमटीसीआर) सदस्यत्व मिळवले. चीनला मात्र अद्यापही हे सदस्यत्व मिळालेले नाही. भारताने आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणात दिलेली ही मात आहे असे मानले जाते. एमटीसीआरच्या सदस्यत्वामुळे भारताला क्षेपणास्त्र विकासात इस्रायल, रशियासारख्या या तंत्रज्ञानात अग्रणी देशांबरोबर सहकार्य करणे शक्य झाले आहे. एनएसजीइतकेच एमटीसीआरचेही सदस्यत्व महत्त्वाचे आहे. एनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यानंतर वेसेनर अरेंजमेंट व ऑस्ट्रेलिया समूहाचे सदस्यत्वही खुले होणार आहे. वेसेनर अरेंजमेंट पारंपरिक शस्त्रास्त्रांची निर्यात आणि तंत्रज्ञानांच्या दुहेरी वापरांवर प्रतिबंध घालते, तर ऑस्ट्रेलिया समूह रासायनिक/जैव अस्त्रांच्या निर्यातीवर प्रतिबंध घालतो. हे चारही समूह आजच्या जगात मुख्य नियंत्रक मानले जातात. यांचे सदस्य होणे म्हणजे उच्चभ्रू राष्ट्रांच्या गटात सामाविष्ट होणे. भारताने आण्विक अप्रसार करारावर सही केली नसली तरी भारताची बाजू या गटांना चीनचा अपवाद वगळता मान्य आहे असेच दिसते. अमेरिकेचा पाठिंबा हा त्याचे चीनशी कसे संबंध असतील यावर ठरतो. भारताला आशिया-प्रशांत महासागरी क्षेत्रात सबळ केल्याखेरीज चीनला शह देता येणार नाही हे अमेरिकेला माहीत आहे. ट्रम्प प्रशासनाने हे वास्तव लक्षात घेतल्याचेच त्याच्या भारताला दिलेल्या पाठिंब्यावरून दिसते. शिवाय भारताशी संरक्षण सामग्रीचा व्यापार वाढावा ही अमेरिकेची इच्छा आहे. किंबहुना अमेरिकन काँग्रेसला ट्रम्प प्रशासनाने सादर केलेल्या एनएसजीच्या भारतीय समावेशाला पाठिंबा देण्याबाबतच्या अहवालात ही बाब स्पष्टपणे अधोरेखित केलेली आहे. थोडक्यात, आशिया खंडातील शक्ती समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे हे खरे असले तरी भारतालाही यामुळे कडवे आव्हान उभे करता येणार आहे आणि चीन नेमके हेच ओळखून असल्यामुळे भारताच्या एनएसजी गटात सामील व्हायला चीन विरोध करतो आहे. पण चीन किती काळ हा विरोध करत राहणार हा प्रश्नच आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर या एका मुद्द्यावरून एकाकी पडणे चीनलाही परवडणारे नाही. आण्विक प्रसारबंदी करारावर भारत सही करत नाही म्हणून आम्ही पाठिंबा देत नाही हा बहाणा फार काळ टिकण्याची शक्यता नाही. अमेरिकेने त्यासाठी आता पुन्हा एकदा सर्व सदस्य राष्ट्रांना भारताच्या समावेशासाठी होकार द्यावा हे आवाहन चीन किती काळ टाळू शकणार एवढाच काय तो प्रश्न आहे. डोकलाम भागात चीनने सुरू केलेल्या आक्रस्ताळेपणाला हीसुद्धा एक पार्श्वभूमी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. भारताचे वर्तन युद्धखोर, आक्रमक व अनैतिक आहे हे दाखवायचा प्रयत्न त्या सदस्यत्वाच्या विरोधापोटीही असू शकतो.
एनएसजीमधील भारताचा प्रवेश म्हटले तर तोंडावर येऊन ठेपला आहे. चीनही आंतरराष्ट्रीय दबाव अजून किती काळ झेलू शकेल याचीही शंका असली तरी भारताला चीनचे नाक अजून दाबण्याखेरीज पर्याय नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीत हा तर सोडाच, पण डोकलामचाही विषय काढला गेला नाही. यामागील कारणे काहीही असोत, पण भारताला आपल्या मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवावी लागेल व हे महत्त्वाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी चीनचा विरोध स्वीकृतीमध्ये बदलावा लागेल.

(Published in Divya Marathi.) 
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sanjay-sonawani-writes-about-donald-trump-administration-5658638-PHO.html


Saturday, July 29, 2017

मानवाभिमूख अर्थ-तत्वज्ञान!

Image result for humanity paintings
आर्थिक प्रेरणा नेमक्या काय आहेत यावरुन मानवी संस्कृतीचे मापदंड ठरतात हे आपण मागील लेखात पाहिले. आजचा काळ हा जागतिकीकरणाचा आहे. यातून एक नवीन अर्थसंस्कृती निर्माण होत आहे व ती अर्थातच समाजसंस्कृतीवरही प्रभाव टाकत आहे. इतकी की मानवी नातेसंबंधांचीही पुनर्रचना होऊ लागली आहे. या नवीन रचनेला विरोध करणारे जसे परंपरावादी आहेत तसेच साम्यवादीही आहेत. मानवी स्वातंत्र्य आणि कायद्याची किमान बंधने या आधारावर जागतिकीकरण उभे असून त्यामुळे जगभर त्याचे लाभार्थी वाढत असले तरी अनेक राष्ट्रे मात्र समाजवादी नियंत्रकांच्या भुमिकेतून बाहेर पडत नसल्याने त्यांच्या विकासाचा दर तुलनात्मक दृष्ट्या वाढलेला नाही. पण साम्यवादी चीनने राजकीय धोरण व आर्थिक धोरणात फारकत केल्याने चीनचा अभुतपुर्व विकास झाला हेही आपण पहातो. चीनमधील मानवी स्वातंत्र्याची गळचेपी जगजाहीर आहे. म्हणजे एकीकडे आर्थिक विकास करत स्वातंत्र्याचा गळा मात्र पुरता दाबून टाकणे हे चीनचे धोरण आहे. अर्थात त्यामुळे चीनची समाज-संस्कृतीही या घटकाने बाधित आहे.
विविध प्रकारच्या राष्ट्रीय आर्थिक व राजकीय धोरणांच्या गलबल्यात आजचे जागतिकीकरण अडकले आहे. पण यावर गंभीर विचार अनेक आंतरराष्ट्रीय फोरम्सवर होत असतो. जागतिक मानवाचे हित कशा प्रकारे साध्य होईल यावर आज जगात अनेक तत्वज्ञाने आहेत. अगदी जागतिकीकरण नकोच ते संपुर्ण बंधनविरहित जागतिकीकरण हवे या टोकाच्या भुमिका मांडणारे जसे आहेत तसेच सुवर्णमध्य काय असू शकतो याचीही संगतवार मांडणी करणारे विचार आहेत व त्यांना एकत्र एका मंचावर आणत चर्चा घडवून आणणारेही आहेत. यातून किमान या विचारधारांचे उणे-अधिक लोकांना ठरवता येऊ शकते.
उदाहणार्थ गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय थिंक टॅंक मानल्या जाणा-या होरेसिस या संस्थेने स्वित्झरलँड येथे एक परिषद भरवली होती. या परिषदेत भारतातून फक्त तीन राजकीय पक्ष निमंत्रित करण्यात आले होते. यात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व स्वर्ण भारत पक्ष या तीन पक्षांचे प्रतिनिधी निमंत्रित होते. या पक्षांत स्वर्ण भारत पक्ष अगदीच नव्याने स्थापन झालेला असला तरी त्याचे अर्थ-राजकीय तत्वज्ञान हे वेगळे असल्याने त्याला निमंत्रित केले गेले. या परिषदेत भारताचे भविष्यातील अर्थ-तत्वज्ञान काय असावे यावर तिनही पक्षांनी आपापली मांडणी केली. त्याच पद्धतीने अन्य देशांतून आलेल्या विद्वानांनी व राजकीय पक्षांनीही आपापली भुमिका व तत्वज्ञान मांडले. भारतात तथाकथित उजवी व डावी मांडणी यापेक्षा स्वतंत्रतावादी मांडणी स्वर्ण भारत पक्षाचे संस्थापक संजीव सभ्लोक यांनी केली. या मांडणीत सरकारचे किमान नियंत्रण आणि नागरिकांना विकासाचे घटनात्मक चौकटीत स्वातंत्र्य हा त्यात महत्वाचा मुद्दा होता. बाबुशाहीचे प्रस्थ नष्ट करणे यावरही धमासान झाले. थोडक्यात भारताची व्यापक प्रगती व्हायची असेल नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे हा त्या मांडणीचा गाभा होता. भाजपने "मेक इन इंडिया" वर भर दिला. या चर्चा सत्रांतून होणारा फायदा एवढाच की भावी अर्थ-राजकीय तत्वज्ञान पुढे जायला मदत होते. प्रश्न हा आहे की मानवी संस्कृती ही अधिकाधिक प्रगल्भ आणि उन्नत होत "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।" या उदात्त ध्येयाकडे कशी वाटचाल करेल हा. मानवी स्वातंत्र्याची गळचेपी करत, त्याच्यावर अनेकविध बंधने लादत त्याच्या अर्थविकासात अडथळे निर्माण करून, शासनाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुलाम करून हे साध्य होणार नाही हे तर नक्कीच!
त्यासाठीच अर्थप्रेरणा आणि त्या प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्यासाठी कोणते अर्थ व राजकीय तत्वज्ञान देश अंगिकारतो यावर त्या त्या देशाची संस्कृती ठरेल हे नक्कीच आहे. आणि सर्व देशांच्या संस्कृतींचा एकुणातील ताळेबंद म्हणजे आपल्या जगाची संस्कृती. कोठे प्रगती आहे पण स्वातंत्र्य नाही ते प्रगतीही नाही आणि स्वातंत्र्यही नाही अशा विरोधाभासी स्थितीत अनेक राष्ट्रे आज अडकलेली आहेत. नीट अर्थतत्वज्ञान नसल्यामुळेच आज व्हेनेझुएला हा देश कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली कसा चिरडला गेला आहे आणि नागरी जीवन अस्ताव्यस्त होत गुन्हेगारीचा कसा विस्फोट झाला आहे हे आपल्याला पहायला मिळते. यातून आपण काही धडा शिकायला हवा. काही दशकांपुर्वीच समाजवादी बंधनांत अडकलेल्या भारतावर एवढी आर्थिक अवनती कोसळली होती की चंद्रशेखर सरकारवर सोने गहाण ठेवायची वेळ आली होती हे आजच्या स्थितीत कोणाला खरे वाटणार नाही. नरसिंहराव सरकारने समाजवादाला काही प्रमाणात मुरड घालत जागतिकीकरणाचे पर्व आणल्याने भारतात मोठी अर्थक्रांती झाली आणि त्यामुळे समाजक्रांतीही घडली हे वास्तव आहे. अर्थात नरसिंहरावांचे जागतिकीकरण केवळ उद्योग-धंद्यांपुरते मर्यादित राहिले, त्यांनी शेतीक्षेत्राला मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून वगळले यामुळे ’इंडिया विरुद्ध भारत’ यातील दरी संपायच्या ऐवजी रुंदावत गेली व ती काही प्रमाणत द्वेषपुर्णही झाली. अर्थात विकासाच्या वेगालाही मर्यादा बसली. एक पाय खुला आणि दुसरा पाय पोतड्यात घालून रेस जिंकता येणार नाही हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. भविष्यात राजकीय पक्ष आपापल्या अर्थविचारधारेत कालसुसंगत व न्याय्य बदल करतील आणि ही दरी बुजवत ख-या अर्थाने एकोप्याची संस्कृती निर्माण करतील एवढी आशा मात्र आपण नक्कीच करू शकतो. बंधनांची समाजवादी अर्थव्यवस्था आकर्षक वाटली तरी ती शोषित-वंचितांसह व्यापक हित करू शकत नाही हे आपण अनुभवले आहे. आजच्या शोषित-वंचितांना अधिक पंगू न बनवता मुळात त्यांनाच समर्थ करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. जागतिक अर्थव्यवस्थांनाही ते लागू आहे.
’एक जग: एक राष्ट्र’ या संकल्पनेकडे जायचा जागतिकीकरण हा एक महत्वाचा टप्पा आहे हे अमान्य करता येणार नाही. पण हा टप्पा न्याय्य पद्धतीने अंगिकारला जातो आहे काय या प्रश्नाचा विचार केला तर त्याचे उत्तर "नाही" असेच येते. काही मोजक्या बलाढ्य़ राष्ट्रांची आणि कार्पोरेट हाउसेसची अनिर्बंध मक्तेदारी या टप्प्याला गालबोट लावते आहे असेही चित्र आपल्याला पहायला मिलते. समाजात जशी विषमता आहे तशीच राष्ट्रा-राष्ट्रांतही आहे आणि ही दरी कशी बुजवायची यासाठी ठोस उपाय आजच्या जगाकडे आहेत असे दिसत नाही. राजकीय कुरघोड्या करून तणाव वाढवण्यावरच आजच्या जगाचा भर दिसतो. त्यासाठी कारण कोणतेही असू शकते. यामुळे मानवतावादाचे तत्व अद्याप तरी अर्थ-राजकीय साम्राज्यशाहीच्या दबावाखाली चिरडले गेल्याचे जागतिक चित्र आपल्याला दिसते. चीनची दादागिरी व विस्तारवाद आणि अमेरिकेची दादागिरी व नियंत्रणवाद यात तत्वत: फरक करता येत नाही तो यामुळेच. त्यामुळे जागतिक संस्कृतीचे म्हणाल तर ती आज मध्ययुगीन संस्कृतीपेक्षा फारशी वेगळी आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही. आपल्याला आधी निकोप अर्थसंस्कृती निर्माण करायचे मार्ग शोधावे लागतील, उपलब्ध अर्थ-तत्वज्ञानांना अधिक मानवाभिमुख करावे लागेल. मानवाच्या अविरत जिज्ञासा व विकासाच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अवकाश द्यावे लागेल. कदाचित नव्या पिढ्या अत्यंत अभिनव असे अर्थ तत्वज्ञान नि म्हणूनच सामाजिक तत्वज्ञान शोधतील. मानवतेच्या व्यापक पायावर कदाचित आजवरच्या अवशेषग्रस्त संस्कृत्यांपेक्षा अधिक उन्नत मानवी संस्कुती आम्हाला निर्माण करता येईल. आणि यात जगातील सर्वच मानवी समुदायांनी हातभार लावत अधिक उज्वल भवितव्याकडे वाटचाल करत राहणे, पुराणपंथी मानसिकतेला तिलांजली देणे अर्थातच अभिप्रेत आहे.
(Published in Dainik Sanchar, Indradhanu supplement)

Saturday, July 22, 2017

आर्थिक प्रेरणा आणि संस्कृती

Image result for collapse of ancient civilizations

कोणत्याही समाजाचे आर्थिक तत्वज्ञान काय आहे, ते कसे राबवले जाते आणि त्या अर्थतत्वज्ञानाची उद्दिष्टे नेमकी काय आहेत यावरुन त्या समाजाची संस्कृती ठरत असते. किंबहुना जागतिक संस्कृत्यांचा पुरातन काळापसून ते आजतागायतपर्यंत अभ्यास केला तर धर्म नव्हे तर अर्थतत्वज्ञान व आर्थिक स्थितीचा फार मोठा प्रभाव मानवी संस्कृतीवर राहिला आहे असे आपल्याला दिसते. किंबहुना अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची हवी व ती कोणत्या प्रकारच्या राजकीय व प्रशासकीय प्रणालीमार्फत राबवली जावी याबाबतचे संघर्ष जगभर आजही सुरु आहेत. प्रत्येक प्रबळ राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या अर्थतत्वज्ञानाचा प्रबळ समर्थक असतो तो यामुळेच. ज्यांना अर्थतत्वज्ञानच नाही अशा पक्षांना दिर्घकाळ राजकीय भवितव्य नसते हेही इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. आपण सिंधू काळापर्यंत मागे गेलो तर ती व तिला समकालीन असलेली इजिप्त, असिरियन व चीनी संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भुभागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक परिस्थित्यांचा वापर करत बलाढ्य बनलेल्या आपल्याला दिसतात. प्रत्येक संस्कृतीचे सामाजिक, धार्मिक विचार वेगवेगळे असले तरी एकच महत्वाचा दुवा म्हणजे ती उत्पादक व व्यापा-यांची संस्कृती होती. त्यामुळे अर्थजीवन भरभराटीला आले व प्रत्येक संस्कृतीने जी ऐहिक झेप घेतली ती अवशेषांच्या रुपाने का होईना आज आपण पाहू शकतो. तज्ञांच्या मते युद्धे व पर्यावरणातील बदलामुळे सनपूर्व १७५० च्या दरम्यान या संस्कृत्यांना आहोटी लागली. सिंधू संस्कृतीचे लोक पाऊस कमी पडू लागल्याने शहरांकडून ग्रामीण भागांत सरकले. मध्यपुर्वेत सुरु असलेल्या युद्धांमुळे व्यापार थांबला हेही कारण आर्थिक पडझडीला होते. यामुळे झाले असे की तटबंदीयुक्त, सुबक नगरे होती तीच कंगाल होत शेवटी अवशेषग्रस्त झाली. मग नव्याची निर्मिती कोठून होणार? कला-संस्कृतीतही घसरण झाली. निर्माणकर्ते समाज नवनवीन शोध लावण्यापेक्षा जगण्यापुरते तरी कसे कमावता येईल या विवंचनेने ग्रासले. थोडक्यात संस्कृतीचे अध:पतन आर्थिक आरिष्टामुळे झाले. तत्कालीन ज्ञात संस्कृत्यांत जगभर थोड्याफार फरकाने असेच झाले. अर्थशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करत सिद्धांत मांडायची सुरुवात फार नंतर सुरु झाली असली तरी माणुस टोळ्या करुन रहात होता तेंव्हापासून अत्यंत प्राथमिक स्वरुपाचे का होईना अलिखित अर्थशास्त्र विकसीत झालेले होते. त्या अर्थशास्त्राला अनुकूल अशी शेती, व्यापार, गुलाम व्यवस्था सर्वत्र आकाराला येत गेली. ग्रीक-रोमनांनी जरी आद्य लोकशाहीचा पाया घातला असे मानले जात असले तरी त्यांची अर्थव्यवस्था ही गुलाम केंद्रित होती. हा एक विरोधाभासच म्हणायला हवा! भारतातील शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेला व्यापार यंत्रणेने बळ पुरवले. पण शेती व व्यापार यावर राज्यसंस्थेचे आधी कडक निर्बंध होते असे दिसत नाही. श्रेणी संस्था अधिक प्रबळ होती. चर्मकारापासून ते सोनारांपर्यंत प्रत्येक कारागिरांच्या जशा श्रेण्या होत्या तशाच सेवा पुरवणा-यांच्याही श्रेण्या होत्या. या श्रेणीप्रमुखांच्या संमतीखेरीज राजा कोणतेही अधिकचे कर आकारू शकत नव्हता. कौटिल्याने अर्थशास्त्रात तर श्रेणीप्रमुखांना एकत्र येत राजाविरुद्ध कट करू नये यासाठी उपाय सुचवले आहेत. अर्थात तसे कट कधी घडल्याचा एकही दाखला नाही. उलट उत्पादक व व्यापारी श्रेण्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपण चवथ्या शतकापर्यंत भारताची आर्थिक भरभराट झाल्याचेच पाहतो. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या आर्थिक अध:पतनापासून धडा घेत नवी अर्थरचना आकाराला आली व ती स्वतंत्रतावादी असल्याने व चार्वाक ते आगमिक शास्त्राने त्यांना तात्विक बळ पुरवल्याने देशाचे भरभराट झाली होती असे आपल्याला म्हणता येईल. पण मधल्या काळात कशीबशी टिकून असलेली व्यवस्था पुन्हा कोलमडली आणि नवी बलुतेदारी अर्थव्यवस्था स्विकारल्याने पुन्हा एकदा नवे आर्थिक आरिष्ट सुरु झाले. गुप्तकाळापासुनच सामंतशाही व मंदिरशाहीचे वाढलेले प्रस्थ, परकीय आक्रमणे आणि धर्मतत्वज्ञानांतील आंतरकलह यामुळे हे अध:पतन सुरु झाले असे मानले जाते. यामुळे भारत पुन्हा आर्थिक व म्हणुनच सामाजिक अंध:कार युगात फेकला गेला तो आजतागायत फारसा बाहेर पडलेला नाही. या झंजावातात श्रेणीव्यवस्था पार जमीनदोस्त झाली आणि अकराव्या शतकाच्या आसपास तिने शेवटचा आचका घेतला. या नव्या आर्थिक आरिष्टाने समाजव्यवस्थाच सैरभैर झाल्याने इहवादी भारतीय परलोकवादी बनत गेले. आगमशास्त्रांच्या स्वतंत्रतावादी तत्वज्ञानाची जागा सावकाश वैदिक स्मृतीप्रणित बंदिस्त समाजव्यवस्थेच्या तत्वज्ञानाने घेतली. आर्थिक व्यवस्था व समाजसंस्कृतीचे नाते असे परस्परावलंबी असल्याने जो सामाजिक मनोगोंधळ होत जातो त्यातून संस्कृतीचे अध:पतन होत नवनिर्माणाच्या उर्मी मारल्या जातात. कोणत्याही दरिद्र समाजात सामाजिक जाणीवा प्रगल्भपणे विकसित होण्याची क्षमता नसते. एका अवनतीतून सावरण्यासाठी दुस-या नव्या अर्थसिद्धांताची गरज असते. पण ब्रिटिशकाळाने तीही शक्यता संपवली व आम्ही आयात केलेल्या आर्थिक रचनाशास्त्राला प्राधान्य देत बसलो. खरे म्हणजे आर्थिक स्वतंत्रतावाद विरुद्ध कौटिल्याचा राज्य-नियंत्रित अर्थवाद यावर धमासान भारतात पुर्वीच होऊन गेले होते. कौटिल्याने अनेक उद्योग सरकारद्वारा चालवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात वस्त्रोद्योग, सुवर्ण, खाणी ते पार वेश्यालयेही सरकारने चालवावीत अशा सूचना दिल्या. सरकारी मालकीचे उद्योग ही संकल्पना भारतात समाजवाद अथवा साम्यवादाकडून आलेली नाही तर ती प्रथम कौटिल्याकडून आलेली होती. गुप्त काळात काही प्रमाणात तर नंतर मोठ्या प्रमाणात कौटिलिय अर्थतत्वज्ञान राजसंस्थेने वापरले. त्याची परिणती खाजगी व्यवसायांच्या स्वातंत्र्याचे हरण होण्यात झाली. नंतर तर मग अशी स्थिती आली की राज्यसंस्थाही उद्योग चालवू शकल्या नाहीत आणि खाजगी क्षेत्राचे कंबरडेच मोडले असल्याने चरितार्थापुरता व्यवसाय असे त्याचे स्वरूप बनले. त्यात दहाव्या शतकानंतर आलेल्या दुष्काळांच्या रांगेने तर होती तीही अर्थव्यवस्था पार धुतली गेली. बलुतेदारी पद्धतीचा उगम यातुनच झाला आणि त्यातून व्यवसायाधिष्ठित सामाजिक व्यवस्था नाहीशी होत तिचे जातिव्यवस्थेत रुपांतर झाले व ती कठोर बनायला हातभार लागला. थोडक्यात अर्थतत्वज्ञानातील ही फार मोही गफलत होती व तिचे परिणाम समाज-संस्कृतीवर होणे अपरिहार्य होते. तसा तो झालाही. पण आमच्या सामाजिक विचारवंतांनी आर्थिक इतिहासाकडे आणि आर्थिक प्रेरणा व संस्कृती यातील संबंध नीटसा न अभ्यासल्यामुळे आमचे नवे शास्त्रशुद्ध अर्थतत्वज्ञान जन्माला येणे शक्य नव्हते. म्हणजेच अर्थव्यवस्था समाजसंस्कृती कशी असेल हे ठरवते. कंगालांच्या आर्थिक प्रेरणा या नेहमी भ्रष्टतेकडे झुकतात हा जागतिक अर्थपर्यावरणाचा इतिहास आहे. त्यातून जी समाजसंस्कृती अस्तित्वात येते ती ना धड राजकीय, ना आर्थिक, ना धड प्रगल्भ समाजव्यवस्था साकारते. भारतीय परिप्रेक्षात विचार केला तर आपले सांस्कृतिक अध:पतन का झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. बौद्धिक क्षेत्रात मागास राहिलेले अर्थमागासच राहतात. आणि अर्थ-मागासांच्या सांस्कृतीक उत्थानाची शक्यता धुसर असते हे ओघाने आलेच. आर्थिक स्थिती व एकुणातील सांस्कृतिक स्थिती यातील अनुबंध तपासावा लागतो तो यामुळेच. विषमता, भेदभाव, गलिच्छ पातळीवर जाणारी आपापसातील स्पर्धा, झुंडशाही, सर्वोपरी होऊ पाहणारी धर्मशाही, विकासाचे घसरते मापदंड याची मुळे माणसाच्या अर्थप्रेरणा नेमक्या काय आहेत व कोणते अर्थतत्वज्ञान त्याला अभिप्रेत आहे यातही असतात. कारण मानवी संस्कृतीचे ते अविभाज्य अंग आहे. आज काय व्यवस्था आहे ते पाहिल्याखेरीज आम्हाला भविष्यात कोठे आंणि कसे जायचे आहे हे ठरवता येणार नाही हे उघड आहे. कोणती अर्थरचना आम्हाला उपकारक ठरेल आणि तशा प्रेरणा निर्माण व्हायला व स्विकारायला आमची मन:स्थिती तयार असेल काय याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे.

(Published in Daily Sanchar, Indradhanu supplement)

असूर "सूर्य" : असूर संस्कृती



Image result for ashur god mesopotamia
जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोती? देवांची का असुरांची? असूर संस्कृती जवळपास अर्धे जग व्यापलेली संस्कृती होती याचे निर्णायक पुरावे आपल्या हाती आहेत. तुलनेने देव-संस्कृती अर्वाचीन. ब्राह्मण ग्रंथांतही असूर व देव हे प्रजापतीचीच अपत्ये असून असूर थोरले असे स्पष्ट निर्देशले आहे. ऋग्वैदिक देवता वरुण, अग्नी, इंद्रादि यांना आरंभीच्या ऋग्वेदकाळात आदरार्थी देव नव्हे तर असूर हे संबोधन वापरलेले आहे. पण असूर संस्कृतीची पुरातनता पहायला आपल्याला फक्त ऋग्वेद अथवा पुराणांवर अवलंबुन राहण्याचे कारण नाही. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता ते असिरिया भागांतील अवशेष व त्यांचे इष्टिकालेख आपल्याला आता पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण असूर संस्कृतीच्या पुरानत्वाची आणि व्यापकतेची माहिती घेऊ शकतो. आज भारतात तरी असूर ही संज्ञा अत्यंत बदनाम झालेली असून पुराणांतील असूरांच्या मुळ कथांचे विकृतीकरण केले गेल्याने आज असूर म्हटले कि दुष्ट, मायावी, मनुष्यघातकी, नरभक्षक इ. वाईट बाबीच मनात येतात. पण आपण पुरातन वास्तव पाहिले तर मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याखेरीज राहणार नाही. वस्तुता: असूर संस्कृतीची व्याप्ती भारत, पर्शिया (इराण-अफगाणिस्तान) ते सुदूर मेसोपोटेमिया व इजिप्त येथवर असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी दिसून येते. 

असिरियन संस्कृती (असुरांची संस्कृती) ही मुळातच "अस्सूर" (अशुर/अशिर) या शब्दापासून बनली आहे. अस्सुर शहर हे टायग्रिस नदीच्या पश्चिम किना-यावर वसलेले होते. त्याचे अवशेष आजही इराकमद्ध्ये पहायला मिळतात. हे शहर इसपू २६०० मद्ध्ये वसवले गेले. अस्सुर ही या नगराचीच नव्हे तर असिरियन लोकांची प्रमुख देवता होती. असिरियन राजांच्या नांवातही "असूर" हा शब्द सामाविष्ट असे, जसे असूर बनीपाल, पुझुर असूर, असूर उबालित, अशूर निरारी वगैरे. असूर ही असिरियनांची मुख्य देवता होती व राजा हा असुराचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. म्हणजे खरा राजा असुरच (म्हणजे सुर्य) आहे व त्याच्यातर्फे मानवी व्यक्ती राज्य करतो अशी संकल्पना असिरियनांची होती. 

असूर म्हणजे सुर्यदेवता. किंबहुना सुर्यालाच असिरियन असूर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सुर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराकथांत देवांचा देव आहे , पर्वताचाही देव आहे आणि असूर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रि
श्चन काळातही असिरियनांनी असुरपुजा सोडली नाही. 

असुराबरोबरच असिरियन लोक अन्य देवताही पुजायचे. किंबहुना प्रत्येक शहराची स्वतंत्र नगरदेवता असायची, जसे आपल्याकडे आजही प्रत्येक गांवाला व नगराला गांवदेव अथवा गांवदेवी असते तसेच. या देवतांत अनू, बल, एन्लिल, इश्तार, नाना (सिन) वगरे देवता होत्या. एका अर्थाने एक मुख्य देवता मानत बहुदेवतावादही असिरियन देवतांत होता असे स्पष्ट दिसते. असिरियन साम्राज्य सत्ताधारी वंश बदलत गेले असले तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले. 

इजिप्तमधील ओसिरिस (ओसायरिस, औसिर, असिरी) ही परिवर्तन, पुनरुत्थान, जन्म आणि मृत्युची देवता मानली जाते, अगदी आपल्या शिवासारखीच. अस्सूर या शब्दाचेच हे इजिप्शियन भाषेतील रुप आहे. ओसिरिसला आकाश, भुमी किंवा सुर्यदेवता "रा"चे अपत्य मानले जाते हेही येथे उल्लेखनीय आहे. 
असूर आणि सुर्य यातील संबंध येथे आपल्या लक्षात आला असेलच. असिरियनांसाठी असूर हा सुर्यच आहे तर काही इजिप्शियन पुराकथांनुसार तो सुर्यपुत्र आहे. हे साम्य येथेच संपत नाही. ऋग्वेदानुसारही "असूर" हे सुर्याचेच एक नांव आहे. फार नंतर प्राचीन इराणमध्ये जन्माला आलेल्या वैदिक धर्मातही असूर म्हणजे सूर्य असाच अर्थ खूप काळ घेतला जात होता. असूर म्हणजे महान (राजाप्रमाणे) प्रमूख, बलाढ्यही मानले जात. "माया" ज्यांना अवगत आहे असेही असूर वैदिकांनी चांगल्या अर्थाने उल्लेखले आहेत. असूर म्हणजे महान (राजाप्रमाणे) प्रमूख, बलाढ्यही मानले जात. "माया" ज्यांना अवगत आहे असेही असूर वैदिकांनी चांगल्या अर्थाने उल्लेखले आहेत. झरथुस्ट्राच्या धर्मात तर असूर हीच मुख्य देवता होती. ऋग्वेदात काही ठिकाणी सुर्यालाच असूर म्हटले आहे. उदा. खालील ऋचा पहा:





पश्यन्नन्यस्या अतिथिं वयाया रतस्य धाम वि मिमेपुरूणि |
शंसामि पित्रे असुराय शेवमयज्ञियाद्यज्ञियं भागमेमि || ( ऋ. १०.१२४.३)
दविधा सूनवो असुरं सवर्विदमास्थापयन्त तर्तीयेनकर्मणा |
सवां परजां पितरः पित्र्यं सह आवरेष्वदधुस्तन्तुमाततम ||  ( ऋ. १०.५६.६)
उक्षा समुद्रो अरुषः सुपर्णः पूर्वस्य योनिम पितुर आ विवेश |
मध्ये दिवो निहितः पर्श्निर अश्मा वि चक्रमे रजसस पात्य अन्तौ || (ऋ. ५.४७.३) 
पतंगमक्तमसुरस्य मायया हर्दा पश्यन्ति मनसाविपश्चितः |
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीनाम्पदमिछन्ति वेधसः | (ऋ. १०.१७७.१)

या ऋचा व ऋग्वेदात विखुरलेले अन्य संदर्भ यावरुन लक्षात येते कि वैदिकांच्या दृष्टीनेही असूर ही मुळची सुर्यदेवताच होती किंवा सुर्यालाच ते असूरही म्हणत असत. असूर देवता निर्मितीचे कारण तर होतीच पण स्वर्गस्थान व अंतरिक्षही असुरांशीच निगडित होते. वैदिक साहित्यात असुर वीरांना स्वर्गाची मुले म्हटले गेले आहे.  असूर आणि सवितृ यांचे "सो्न्याच्या हातांचे" असे वर्णन १.३५.९-१० या ऋचांमध्ये करण्यात आला असून सवितृ हे सुर्याचेच एक नांव आहे हे आपल्याला माहित आहे व अनेक ठिकाणी सवितृलाही "असूर" हे संबोधन वापरले गेलेले आहे. असूर हे सुर्यपुजक होते असे १०.१७७ या ऋचेवरुन एस. कल्याणरमणही म्हणतात. असूर हे समाज म्हणून सूर्यपुजक व असूर हे संबोधन म्हणून सूर्यनिर्देशक असाच याचा अर्थ दिसतो. "पतंग" हा शब्द येथे सूर्याचे नांव म्हणून वापरला आहे. ऋग्वेदात सुर्याला अनेक नांवे असली तरी सुपर्ण असेही एक नांव आहे व ही नांवे असुरांकडेच निर्देश करतात असे डा. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दर्शवले आहे.  अग्नी व प्रकाशालाही असूर म्हटले गेले ते मुळच्या असूर शब्दाच्या मूळ सूर्य अथवा त्यासम अर्थानेच हेही येथे लक्षात घ्यावे लागते. 

वैदिक साहित्यात सुर्यालाच असूर म्हटले जात होते हे वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. वैदिकांनी नंतर असुरांना बदनाम करण्याची मोहिम काढली असली त
री त्याची कारणे सर्वस्वी सांस्कृतिक/धार्मिक संघर्षात आहेत. पण आरंभीचा वैदिक धर्म हाही असूरकेंद्रितच होता हे वरुण -इंद्रादि देवतांना आरंभी "असूर" हे संबोधन आदरार्थाने वापरले आहे यावरून सिद्ध होते. वैदिक साहित्यात नंतर मात्र असूर म्हणजे अंधार वा रात्र असा अर्थ होत होत शेवटी असूर म्हणजे दुष्ट असा अर्थ रुढ झाला. 

अहूर माझ्दा (सं. असूर-मेधा) हा झरथुस्ट्री धर्माचाही एकमात्र 
श्वर. देव हे या धर्मात दुष्ट पापी मानले जातात. अहूर हे असूर शब्दाचे पर्शियन रुप होय. अहूर माझ्दा हा विश्वनिर्माता व वैश्विक न्यायाचा रक्षणकर्ता असून त्याचा सर्वसाधारण शब्दश: अर्थ "उच्चबुद्धीमत्तेचा शक्तीशाली" असा घेतला जातो.  अहुर माझ्दाच्या धर्माची पुनर्स्थापना झरथुस्ट्राने उत्तर अफगाणिस्तानात ऋग्वेदाच्या समकालीन (इसपू १५००) केली. म्हणजे झरथुस्ट्राच्या पुर्वीही हा धर्म होताच परंतू त्यात अनेक अपप्रथा घुसल्या होत्या. त्या दूर करत झरथुस्ट्राने संदेष्ट्याच्या भुमिकेत जात अहूर माझ्द्याचा खरा धर्म लोकांना सांगायला सुरुवात केली. यात अहूर माझ्दा हा श्रेष्ठ ईश्वर असून ते सुर्याचेच एक नांव आहे. जरथुस्ट्री धर्मात प्रार्थना या अग्नी (सुर्याचेच एक रुप) किंवा सुर्यासमक्षच म्हटल्या जातात. झुर्वेनाइट ही झरथुस्ट्री धर्माचीच एक शाखा आहे. ही शाखा सुर्यालाच अहुर-माझ्द म्हणते. एवढेच काय पण खोतानी शक हेही अपभ्रंशित रुपात सुर्याला "अऊरमाझ्दे" म्हणतात. आजही अनेक इराणी बोलीभाषांत सुर्याला "ओर्मोझ्द" असेच म्हटले जाते हे झरथुस्ट्री धर्माच्या प्रकांड अभ्यासिका मेरी जोइस यांनी दाखवून दिलेले आहे. ( Boyce, Mary (1983), "Ahura Mazdā", Encyclopaedia Iranica 1, New York: Routledge & Kegan Paul, pp. 684–687)


असुरांसंबधी अन्य विवेचन करण्याआधी हे विवेचन अत्यंत महत्वाचे वाटल्याने आधीच केले आहे. असूर आणि सुर्य यातील अन्योन्य संबंध वाच
कांच्या लक्षात एव्हाना आलाच असेल. असूर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असूर हीच त्यांची मुख्य देवता होती. असूर हे सुर्याचेच संबोधन होते. सुर्य हा मानवी जगाचा अदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असूर संस्कृती होय.

सुर्य हा तत्कालीन जगाने अत्यंत गुढमय, रहस्यमय दृष्टीने पाहिला असल्यास नवल नाही. दिवस आणि रात्र ही विभागणी चांगले आणि वाईट याप्रमाणे करत आरंभिक कल्पना तेवढ्याच गूढ पद्धतीने विकसित केल्या जाने स्वभाविक होते. असूर या शब्दाची वैदिक व्युत्पत्ती " असू: म्हणजे प्राणवान-वीर्यवान या शब्दाला र हा प्रत्यय लागून असूर शब्द बनतो असे संस्कृतज्ञ म्हणतात. असूर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान, वीर्यवान, पराक्रमी असा आहे हे भारतीय संस्कृती कोश (खंड १, पृ. ३३७) मद्ध्ये सांगितले आहे. परंतू ही व्युत्पत्ती कृत्रीम आहे हे उघड आहे. कारण असिरियन संस्कृतीची भाषा ही सेमेटिक गटातील आहे. या भाषेचा कथित इंडो-युरोपियन भाषांशी काहीही संबंध नाही. असूर, अस्सुर, अशुर, अशेर हे शब्द मानवाच्या आदिम भाषेतील आद्य शब्दसमुहापैकी एक असले पाहिजेत ज्यांचा भाषागटांशी काहीएक संबंध नाही. ड. आ. ह. साळूंखेही "असूर" शब्दाची व्युत्पत्ती अन्य भाषांतच शोधली पाहिजे असे "बळीवंश"मद्ध्ये म्हणतात. त्यामुळे असिरियन (अक्काडियन) लोक भारतात आले व त्यांनी सिंधू संस्कृती वसवली किंवा सिंधू लोकांनी असिरियन संस्कृती वसवली असे काही विद्वान (उदा. मालती शेंडगे, रा. ना. दांडेकर) प्रतिपादित करतात त्यात अर्थ नाही. सुर्याला कोणीतरी अधी असूर म्हणाले आणि तो शब्द विविध टोळ्यांत संक्रमित झाला व काही टोळ्यांनी सुर्यकेंद्रित असूर संस्कृत्या जोपासल्या एवढेच फारतर येथे म्हणता येईल. कोणतीही संस्कृती उदयाला आली कि ती विरोधात अथवा स्वतंत्रपणे इतरही संस्कृत्या निर्माण होतात. असूर धर्म आणि वैदिकांचा देव धर्म यात कशी फूट पडली त्यावरून आपल्या लक्षात येईलच. पुढे ऋग्वेदातच असूर हे मुख्य देवतांचे संबोधन गळून पडते आणि असूर हा शब्द कटाक्षाने केवळ शत्रुंसाठी वापरला जावू लागतो. हा सांस्कृतिक संघर्ष आपण पुढे समजावून घेऊ. अहूरमाझ्दा धर्मात असूर हे सृष्ट तर देव हे दुष्ट आहेत हे आपल्याला माहित आहेच. 

किंबहुना सूर्य हा वैदिक शब्द मुळच्या असूर या शब्दावरुनच साधला गेला असावा हे असूर आणि सुर्यामधील अभेदावरून दिसून येते. मग असूर्यचे सुर्य कसे झाले? त्याचे कारण पुरातन सांस्कृतिक संघर्षात आहे. असूरांच्या विरोधात "सुर" हा शब्द देवासुरांतील झगड्यामुळे निर्माण केला गेला. "सुर" हा शब्द संस्कुतात कृत्रीम व नंतरचा असून असूर हाच मुळचा शब्द आहे, असुर शब्दातील "अ" हा नकारार्थी नसून "असू:" या शब्दाला र हा प्रत्यय लागून तो शब्द बनला आहे असे डा. रा. ना. दांडेकर (वैदिक देवतांचे अभिनवदर्शन, पृ. ४३-४६) म्हणतात. सुर्य जर "सूर" या शब्दापासून बनवला गेला असेल तर असुर्य हाच शब्द मुळचा असायला हवा. असुर हा शब्दच मुळात सुर्यवाचक आहे हे आपण पाहिलेच आहे. 
असूर्य आणि सुर्य हे शब्द सोबतच काही ऋचांमध्ये ऋग्वेदात वापरले गेले आहेत. म्हणजे नंतरच्या काळात असूर्याची जागा सूर्याने घेत असूर शब्द स्वतंत्र (देव वा दुष्ट) उपाधी म्हणून वापरला जाऊ लागल्याचेही आपल्याला दिसते. असुर्य शब्द ऋग्वेदात वेगळ्या संदर्भात, म्हणजे असुरांचे स्थान दाखवण्यासाठी (ऋ. ७.२१.७) वापरला गेला आहे हेही महत्वाचे आहे. ती ऋचा अशी- 

देवाश्चित ते असुर्याय पूर्वे.अनु कषत्राय ममिरे सहांसि |
इन्द्रो मघानि दयते विषह्येन्द्रं वाजस्य जोहुवन्त सातौ || 

येथे देव हे "पुर्वीचे असूर" या अर्थाने घेतले आहेत. देवांनाच पुर्वी असूर म्हटले जायचे याचे भान या ऋचेत दिसते. देव हा शब्दही "दिव" किंवा "द्यौस" या शब्दातून आला आहे. त्याचाही अर्थ प्रकाश अथवा सूर्य असाच होतो हेही येथे लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असुरांशी संघर्ष करणा-या गणांनी असूर हे नांव टाकत देव हे नांव स्विकारले खरे पण मुळबोध कायम ठेवला हेच 
येथे सुचित होते.

येथे लक्षात घायची बाब म्हणजे आपण मानतो त्याप्रमाने असूर हा शब्द अवमानदर्शक नाही. तो सुर्यनिदर्शक आहे. मानवाला तेजोमान सूर्य पवित्र, यातुमय, गुढ, जीवनदाता, धीर देणारा, अंधाराला (म्हणजेच अनि
ष्टालाही) दूर करणारा वाटला नसला तर नवल नाही. हा शब्द (असूर अथवा सूर्य) मुळचा वैदिक नाही. हा शब्द आदिम शब्दसमुहापैकी एक असून स्थानिक उच्चारपद्धतींप्रमाने वेगवेगळा जसा उच्चारला जात असे तशाच त्याभोवतीच्या पुराकथाही वेगवेगळ्या बनल्या असे दिसते. हा शब्द मुळचा अक्काडियन भाषेतील असावा असा डा. मालती शेंडगे यांचा कयास आहे तर डा. आ. ह. साळूंखे सुचवतात कि असुरांच्या संस्कृतेतर भाषेतच या शब्दाचे मूळ शोधले पाहिजे.

सिंधू संस्कृतीचे लोक आणि मेसोपोटेमियात पुरातन कालापासून व्यापारानिमित्त संबंध होता तसाच तो प्राचीन इराणशीही होता. व्यापारी वस्तुविनिमय जस दोन संस्कृत्यांत होतो तसाच तो काही शब्द व सांस्कृतिक/धार्मिक संकल्पनांतही होत असतो. त्यामुळे ह शब्द एका ठिकाणावरुन दुसरेकडे गेला असा अंदाज बांधता येईल, पण कोठुन कोठे हा प्रवास झाला हे मात्र सांगता येणार नाही. शिवाय सुर्याचा परिचय मानवी समाजाला लाखो वर्षांपुर्वीच झाला असल्याने त्याला विविध प्रदेशांतील मानवाने काहीना काही नांव दिले असणार व ते प्रचारित झले असणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्याचे मुळ शोधण्यापेक्षा असूर म्हणजे मुलत: सुर्य एवढे समजावून घेतले तरी असूरांकडे पहायचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलायला मदत होईल एवढे नक्की! सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर सुर्याचे चित्रण केले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. सिंधू संस्कृती ही मुळ असुरांची संस्कृती. ते वास्तुकलेत निष्णात होते. या स्मृती मयासुराच्या रुपात पुढेही जपल्या गेल्या. 

असूर हे मानवही!


असुरांबाबत अनेक लोकभ्रम आज निर्माण झाले आहेत. असूर ही कोणी काल्पनिक, पुराणकथांनी रचलेली मित्थकथा नाही. असिरियन लोक मानवच होते हे तर स्पष्ट आहे. असूर हा शब्द जसा संबोधन म्हणून वापर
ला जातो तसाच समुहवाचकही वापरला जातो. असूर हे सुर्याचे जसे नांव होते तसे अनेक मानवी समुदायांचेही होते. प्रत्येक समुदायाची संस्कृती ही असूरकेंद्री असली तरी त्यात स्थानिक देवदेवतांनाही स्थान होते. काही असूर मुर्तीपुजक होते तर काही असुराची अर्चना अग्नीमार्फत  (यज्ञ - यस्न) करायचे. ऋग्वेदात अग्नीलाही अनेकदा असूर म्हटलेले आहे. "त्वमग्ने रुद्रो असुर..." असे तैत्तिरिय ब्राह्मणातही (३.११.२.२) म्हटलेले आहे. किंबहुना अग्नीला सुर्याच्याच समकक्ष मानण्याची धार्मिक प्रथा होती. भारतातील असूर मात्र लिंगपुजक अथवा शिव-शक्ती पुजक होते. परंतू सुर्याशी संबंधित काही प्रतीके मात्र शिवाशी जोडलेलीच राहिली. उदा. वृषभ, पर्वत, चंद्रकोर. (चंद्र सुर्यपुत्र आहे असा प्राचीन काळी समज होता.)  

या असुरांचा धर्म नेमका काय होता? 
वैदिक व  झरथुस्ट्री धर्माचे लोक मात्र वेगळ्या पद्धतीचा यज्ञधर्मच पाळत. जे असूर झरथुस्ट्राच्या धर्मात गेले नव्हते ते नेमका कोणता धर्म पाळत याचे विवेचन नसले तरी ऋग्वेदातील "अकर्मन" (कोणतेही कर्मकांड नसलेले), अब्रम्ह (मंत्र नसलेले), अयज्वन, अयज्जु (यज्ञ नसलेले), अव्रत:, अन्यव्रत: (व्रत नसलेले, अन्य व्रत असलेले) असे उल्लेख दास-दस्युंबाबत मिळतात. सर्वात महत्वाचा उल्लेख आहे तो "शिस्नदेव", म्हणजे लिंगाची उपासना करणारे. यांच्याबाबत तर प्रचंड द्वेष व्यक्त केला गेला आहे.  हे दास-दस्यू असूर संस्कृतीचाच भाग असल्याने ही वर्णने असुरांसाठीचीच आहेत असे म्हणता येईल. परंतू त्यातून सर्व असुरांच्या धर्माचा, धर्मतत्वांचा विशेष बोध होत नाही हेही तेवढेच खरे. तरीही आपल्याला झरथुष्ट्री धर्माची तत्वे व उपासनापद्धतीही माहित आहे. ती वैदिकांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. याचे कारण असूर व देवांच्या विशिष्ट सांस्कृतिक इतिहासात दडलेले आहे. असूर व देव हे दोघेही प्रजापतीची संताने होत असे शतपथ ब्राम्हण सांगते. दोघांनाही यज्ञ हवा होता पण देवांनी यज्ञ पळवला व जो अवशिष्ट वाईट भाग होता तो असुरांसाठी ठेवला अशी कथा येथे येते. झरथुस्ट्री धर्मातही यज्ञ होताच पण त्याला हिवण्यासाठी हे कथा बनली हे उघड आहे. पण याचा दुसरा अर्थ असाही होतो कि एके काळी दोन्ही (देव व असुरही) एकच धर्म पाळत असत. पुढे त्यांच्यात फुट झाली ते बहुदा झरथुस्ट्राने असूर धर्माला नवे स्वरुप द्यायला सुरुवात केल्यानंतर. त्यामुळे सुरुवातीला असूरकेंद्री असलेला वैदिक धर्म असूरविरोधी बनला. 

शतपथ ब्राम्हणात अजून एक कथा येते (१०.९.३.७-९) 
ती अशी- सौत्रामणी यज्ञ हा आधी असुरांचाच होता तो नंतर देवांनी घेतला. म्हणजेच काही असुर घटकांचा कर्मकांडात्मक धर्म यज्ञाभोवती फिरत होता तर काहींचा अमुर्त देवतांभोवती तर काहींचा लिंगपुजा, वृक्षपुजा ते अन्य अनाम देवतांची पुजा या भोवती असे दिसते. त्यामुळे एक संस्कृती असली तरी सर्वांतच  मैत्रही नव्हते आणि धर्मही एकच नव्हता. 

आणि हे तत्कालीन स्थिती, भुगोलाचे ज्ञान, जनसंख्या आणि आपापसातील अनेक कारणांनी उद्भवणारे संघर्ष पाहता स्वाभाविकही होते. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे असूर जसे आदरार्थी इंश्वरी नाम/संबोधन आहे तसेच ते मानव समुहांचे व मानवांचेही नांव आहे. देव याला अपवाद नाही. देव हे एक समाजनामही होते हे लक्षात ठेवले पाहिजे. 

येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ऋग्वेदातील असूर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराकथांतील असूर नव्हेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादि जे असूर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. त्यातील काही असूर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असूरांचा त्यांच्याशी संबंध नाही. परंतू आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहतांना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असूर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती मिळते ते पुराणांतुन, महाभारतातुन व काही प्रमाणात ब्राम्हण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराकथांतून झिरपलेल्या कथा कोणत्या हेही समजावून घ्यावे लागते. या कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भुगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही. 

असे असले तरी असूर संस्कृती पुरातन असून तिला विरोध करण्यासाठी असंतुष्टांनी स्थापन केलेली संस्कृती म्हणजे देव संस्कृती. ही कधी आणि कोणी निर्माण केली हे आपण आज सांगू शकणार नाही, पण वैदिक संस्कृती या संस्कृतीचीही निर्माती नव्हे. वैदिक संस्कृती ही असूरांकडून विरोधी गटात, म्हणजेच देवांकडे कशी गेली याचा क्रमबद्ध वृत्तांत ऋग्वेदातच येतो. 


झरथुस्ट्रानेही असुर धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने नव्याने धर्म स्थापन केला नाही तर विस्कळीत धर्माला एकत्र करण्यासाठी नवे तत्वज्ञान रचले. झरथुस्ट्राच्या गाथांत झरथुस्ट्री धर्माआधीच्याही अनेक गाथा आहेत. त्या पारशी पंडितांनी संबोधने बदलून वापरल्या असे मेरी जोइस म्हणतात. म्हणजेच झरथुस्ट्री धर्म स्थापन होण्यापुर्वी खुप आधीपासून असूर संस्कृती व धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राने देवांना दुष्ट व शत्रु मानले. देव हे वाईट, सर्व पापांचे मूळ. अंग्रमैन्यु (इंद्र) हा अहूर माझ्दाचा मुख्य शत्रु. 

म्हणजेच देव (दिव/द्यौस) हा शब्दही अचानक उगवलेला नाही. देवांना माननारे काही समाज होतेच व त्यांचेही वेगळे धर्म होते. कदाचित हा धर्म असुरांना विरोध करणा-या जनसमुहांनी शत्रुत्वातुनही निर्माण केला असू शकेल. पण या धर्माची निर्मिती वैदिकांनी केली नव्हती हे निश्चित. ऋग्वेदात आधी असूरतत्व प्रामुख्याने येत असून वरुण, मित्र, अग्नी, सवितृ, रुद्र, आदित्य, पुषाण, आर्यमान व इंद्राला उद्देशून आदरार्थी संबोधन म्हणून असूर हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदात १०५ वेळा असूर शब्द येतो त्यात ९० ठिकाणी त्याचा वापर पुजनीय/आदरणीय उपाधी म्हणून केला आहे. असूर उपाधी मात्र नंतर नाहीशी होते व असूर हे दुष्ट/मायावी म्हणून अवतरु लागतात. हा बदल झाला आहे त्यामागे इराणमधील विविध टोळ्यांतील संघर्ष व झरथुस्ट्री माझ्दायस्नी धर्माचे वाढलेले प्राबल्य व वैदिकांची झालेली पीछेहाट हे महत्वाचे कारण आहे. या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्याला ब्राह्मण ग्रंथांत ठळकपणे दिसते. किंबहुना काही वैदिकांना भारतात शरणार्थी म्हणून का प्रवेश करावा लागला याचे कारण असूर धर्माच्या प्राबल्यात आहे. ब्राह्मण ग्रंथात देवासुरयुद्धांचे जे अतिरंजित वर्णन येते ते याच शत्रूभावनेतून हेही येथे लक्षात घ्यावे लागते. 

पुरातन काळात सुष्ट व दुष्ट शक्तींना गुढत्व जसे दिले जायचे तसेच मानव आणि त्या शक्तींतील एक संबंधही रुपकात्मक गुढरम्यतेने जोपासला जायचा. पुरावाड्मयात हा गुण (अथवा दोषही) ठळकपणे दिसतो. ऐतिहासिक घटना नोंदवतांनाही अनेकदा प्राचीन ग्रंथांनी त्यांचे मिथकरुपानेच वर्णन केले आहे. त्यामुळे मिथके बनवण्याची प्रत्येक धर्माची पद्धत लक्षात घेतली तरच इतिहासाचे बिंदू हाती लागतात व इतिहासाचे मर्म आपल्याला समजावून घेता येते. त्यांना काही लोक भाकडकथा या सदरत टाकतात ते उचित नाही. "इंद्राने विजय मिळवला" अशा अर्थाची ऋचा येते तेंव्हा याचा अर्थ खुद्द इंद्राने नव्हे तर इंद्राला मुख्य देवता मानना-यांनी विजय मिळवला" असा घ्यावा लागतो. तसेच देवासुरांची युद्धे पाहतांना मिथके कोणती व प्रत्यक्ष घडली असलेली तरीहे मिथकांत आवेष्टित केली गेलेली युद्धे कोणती याचाही नीट धांडोळा घ्यावा लागतो. 

मिथकांतून व पुरात्वीय पुराव्यांतून इतिहास उलगडतो असा. असूरांच्या दृष्टीने देव दुष्ट तर देवांच्या दृष्टीने असूर दूष्ट हे एक द्वंद्व होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याला आशियायी व म्हणुनच आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा बोध नीट्पणे होणार नाही.

-संजय सोनवणी

Sunday, July 16, 2017

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

इसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला तो समस्त मानवजातीला काळिमा फासणारा होता यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखांहून अधिक नागरिक ठार झालेले आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती “सैतानी’ या शब्दातच वर्णन करता येईल. पुरातन स्थळांचा इसिसने केलेला विध्वंस अमानवीयच होता. मध्यपूर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला इसिसचा दहशतवाद युरोपच्याच भूमीवर जाऊन पोहोचेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांचा बदला घेण्यासाठी हा दहशतवाद फ्रान्समध्ये घुसला. ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे आला.

इसिसच्या दहशतवाद्यांनी असिरियन संस्कृतीच्या काळापासून प्रसिद्ध असलेले इराकमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले मोसूल शहर इराकी सैन्याला हुसकावून २०१४ मध्ये ताब्यात घेतले होते. मोसूलला राजधानी बनवत इराकचा जवळपास अर्धा हिस्सा इसिसने व्यापला. मोसूलमधील अल नुरी मशिदीतूनच इसिसचा सर्वेसर्वा अल बगदादी याने इस्लामी खिलाफतीची घोषणा केली होती. धार्मिक पोलिसांनी तेव्हापासून मोसूल व त्या शहराच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. संगीत ऐकणे या साध्या बाबीसाठी नागरिकांचा छळ करत त्यांना ठार मारले होते. या कालावधीत इंटरनेट व फोन वापरायलाही मोसूलमधील नागरिकांना बंदी होती. गैरइस्लामियांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. इसिसने या शहराला जवळपास आपली राजधानी बनवत एक जागतिक धोका बनायला सुरुवात केल्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेणे इराकसाठी अत्यावश्यक बनले होते. अमेरिकन सैनिकांच्या सहकार्याने सुमारे २२ हजार इराकी सैन्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेण्यासाठी युद्ध सुरू केले. गेले काही महिने यासाठी घमासान युद्ध होत होते. हवाई हल्लेही केले गेले. हरतच चाललेल्या इसिसने शेवटी आत्मघातकी प्रतिहल्लेही केले. पण शेवटी मोसूलवर विजय मिळवण्यात इराकी सैन्याला यश मिळाले. गेल्याच आठवड्यात इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी मोसूलमध्ये आले व इसिसवरील विजय घोषित केला.

पण या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासारखी स्थिती नव्हती. प्राचीन वारसा सांगणाऱ्या मोसूल शहराचा पूर्ण विध्वंस झाला आहे. जवळपास साडेआठ लाख नागरिक शहर सोडून गेले आहेत. मृतांचा आकडा अजून जाहीर झाला नसला तरी ती संख्या लाखाच्या आसपास जाऊ शकते. जेथे नजर जाईल तेथे उद्ध्वस्त घरे आणि रस्त्यांवर डबरांचे ढीग आहेत. ज्या अल नुरा मशिदीतून अल बगदादीने खिलाफतीची घोषणा केली होती ती या खिलाफतीचे प्रतीक असलेली मशीदही जमीनदोस्त झाली आहे. लेनिनग्राडची द्वितीय विश्वयुद्धात जशी दयनीय अवस्था झाली होती त्यापेक्षा भयंकर अवस्था आज मोसूलची आहे. युद्ध कधीच रम्य नसते. मोसूलचा ताबा मिळाला असला तरी इसिसचे अजूनही अंडरग्राउंड असलेले काही आत्मघातकी गट कधीही हल्ला करू शकतात म्हणून आसपासच्या गावांनाही इसिसमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा विजय महत्त्वाचा यासाठी आहे की सैतानी आकांक्षांनी प्रेरित एकापाठोपाठ नृशंस कृत्ये जगभर करणाऱ्या इसिसला सर्वात मोठा झटका मिळाला आहे.

पण इसिसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला असला तरी अजून अबू बक्र अल बगदादी व त्याचे नेटवर्क जिवंत आहे. त्याची पोहोच अद्यापही जगातील इस्लामी मूलतत्त्ववाद्यांपर्यंत आहे. अल नुरा मशिदीचा विध्वंस म्हणजे बगदादीच्या खिलाफतीचा विध्वंस असे मानण्यात येत असले तरी बगदादीमध्ये नवीन दहशतवादी केंद्रे उभी करण्याची शक्ती आणि तसे तत्त्वज्ञानही असल्याचे मान्य करावे लागते. इस्लामिक राज्याची स्थापना हे ध्येय बाळगणारे व त्या ध्येयासाठी जीव धोक्यात घालू पाहणारे मुस्लिम युवक दुर्दैवाने कमी नाहीत. दीर्घकाळ मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष राज्य चालवल्यामुळे अल कायदासारख्या कसलाही भूभाग ताब्यात नसलेल्या दहशतवाद्यांपेक्षा इसिसचा दबदबा पुढेही राहील असा अभ्यासकांचा कयास आहे. मोसूलमधील पीछेहाटीनंतर काही काळ इसिसकडे येणारा भरतीचा ओघ जरी कमी झाला तरी तो पूर्ण थांबणार नाही. याचे कारण म्हणजे मोसूल पडले असले तरी अद्याप ताल अफार, हौज्जासारखी काही शहरे आणि अनबारसारखे विभाग अजून इसिसच्या ताब्यात आहेत. सिरियामधील युफ्राटिस नदीचे बरेचसे खोरे अजूनही इसिसच्याच नियंत्रणात आहे. मोसूलमधील इसिसचे अनेक बडे दहशतवादी पळून तेथे आश्रयाला गेले असण्याची शक्यता आहे. मोसूलमधील विजयामुळे जरी इराकी सैन्याला मोठे यश आले असले तरी हे सर्व इसिसव्याप्त प्रांत ताब्यात घ्यावे लागतील. शिवाय इसिसने लिबिया, इजिप्त, येमेन, अफगाणिस्तानातही आपले जे तळ बनवले आहेत तेही उद्ध्वस्त करावे लागतील. त्याशिवाय इसिसवरील विजय पूर्ण झाला आहे असे म्हणता येणार नाही. जगावरील इसिसचे सैतानी सावट अजूनही गेलेले नाही.

जगासमोरचा विशेषत: युरोपसमोरचा सर्वात मोठा धोका इसिसचा आहे. युरोपमध्ये एखादे फार मोठे दहशतवादी कृत्य करण्याची त्यांच्याकडून शक्यता आहे. मोसूलमधील कंबरडे मोडणारे अपयश इसिस सहजी पचवणे शक्य नाही. इसिसची रानटी पद्धत पाहता अन्यत्र हिंसाचाराची राळ उठवून देत आपली शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही हे दाखवण्याचा इसिसचा प्रयत्न असेल. भारतालाही इसिसच्या या संभाव्य संकटाची दखल घेत त्याला रोखण्याची व्यवस्था करावी लागेल. बगदादी कोठे आश्रय घेतो हे गुप्तचर यंत्रणांना अद्याप तरी माहीत नाही.

ओसामा बिन लादेनप्रमाणे त्याला शोधून ठार मारायची कितीही इच्छा गुप्तचर यंत्रणांची असली व एकदा तसा प्रयत्नही केला गेला असला तरी अद्यापही त्यात यश आलेले नाही. पण प्रश्न येथे केवळ बगदादीचा नसून ज्या विचारसरणीची इमारत रचत, नव-खिलाफतीचे आकर्षण दाखवत त्याने जो प्रभाव निर्माण केला आहे तो कसा हटवायचा हा मुख्य प्रश्न आहे व त्याला पाश्चात्त्य राष्ट्रांकडे किंवा इराक-सिरियाकडेही उत्तर आहे असे दिसत नाही. मोसूलचे ध्वस्त अवशेष व त्यात काही न समजणारी खेळणारी लहानगी मुले, बहिणींचे सांत्वन करणारे आईबाप, गमावलेले भाऊ, कसेबसे जिवंत असलेले जगण्याच्या शोधात किडूकमिडूक सोबत घेऊन मोसूल सोडणारे अभागी सामान्य नागरिक हे दृश्य पाहून तरी कोणाला करुणेचा पान्हा फुटेल अशी आशा बाळगली तरी दहशतवादी हिंसक मनोवृत्तीकडून तशी अपेक्षा करता येत नाही. इसिसने दहशतवाद केला. त्यांना जवळपास तसेच उत्तर मिळाले आहे. पुढेही हा संघर्ष कदाचित असाच चालू राहील. आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदायाला यापासून धडा घेत इसिस व तत्सम प्रवृत्तींना एकटे पाडण्याशिवाय गत्यंतर नाही.

कडव्या इस्लामवादाचे इसिस हे जागतिक प्रतीक बनले आहे. सर्वच मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इसिसने दूषित केला. स्थलांतरित झालेलेही मुस्लिमच होते, पण त्यांच्यातही इसिसच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने त्यांना आसरा देणाऱ्या राष्ट्रांची पंचाईत तर केलीच, पण स्थलांतरितांनाही स्थानिकांच्या द्वेषाचे कारण बनावे लागले. आपल्या देशात परतायचे त्यांचे स्वप्न इसिसचा समूळ बीमोड कधी होतो यावर अवलंबून आहे. इराक-सिरियाचे पुढचे लक्ष्य इसिसचे नेटवर्क समूळ उखडणे हेच असेल व ते लवकर साध्य व्हावे ही अपेक्षा! दहशतवाद्यांचा कधी ना कधी खात्मा होतोच, पण त्यासाठी काय किंमत मोजावी लागते हे मोसूलचे उद्ध्वस्त अवशेष पाहिल्याखेरीज समजणार नाही याचीही दखल सर्व धर्मांतील मूलतत्त्ववाद्यांनी घेतली पाहिजे. हा त्यांच्यासाठीही धडा आहे

Saturday, July 15, 2017

बौद्धिकतेच्या नाशाच्या दिशेने...


Inline image 1




सजीव उत्क्रांती होत होत आजच्या अवस्थेला पोहोचले असे चार्ल्स डार्विनचा सिद्धांत मानतो. उत्क्रांतीचा नियम खरा की खोटा, प्राण्यांमध्ये झालेले बदल क्रमश: विकसीत झाले की आधीचे प्राणी नष्ट होत त्याच मूळ रसायनात बदल करत निसर्गानेच सर्वस्वी नवे सुधारीत जीव तयार केले या वादात जायचे आपल्याला कारण नाही. पण जेंव्हा आपण मानवी समुदायाचा विचार करतो तेंव्हा मानसीक/वैचारीक उत्क्रांती होत माणूस तंत्रज्ञान व सामाजिक विचारांच्या नव्या बदलांना स्विकारत त्यांना सरावत जातो असे मानले जाते. याला ’सामाजिक उत्क्रांतीवाद’ म्हणता येईल. कोणताही वाद जसा आदर्श स्थितीबाबत बोलत असतो तसाच हाही वाद आहे असे क्षणभर वाटू शकते. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुळात हा सामाजिक उत्क्रांतीवाद आंतरीक आहे की बाह्य यावरच विवाद होऊ शकतो. 

माणसाचे बाह्य जग व रुप प्रचंड बदलले आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. तो नवीन तंत्रज्ञानाच्या घोड्यावर स्वार होत भविष्याकडे धाव घेत आहे आणि लवकरच ग्रहमालांपर्यंत त्याच्या वसतीची मजल जाईल अशी चिन्हेही दिसत आहेत. जगातील एकुणातील संपत्तीची वाढही अत्यंत वेगाने होत असून नवनवीन तंत्रज्ञानांच्या शोधांमुळे मानसाचे जीवन जेवढे बदलेल तेवढ्याच वेगाने त्याच्या एकुणातील संपत्तीतही भर पडेल हेही उघड आहे. परंतू आपण आंतरिक उत्क्रांतीचे चित्र पाहिले तर आपल्याला माणसात काही गुणात्मक फरक पडल्याचे दिसून येणार नाही. उलट तंत्रज्ञानांमुळे मुठभर बुद्धीवंत अमाप जनतेला उथळ-बुद्धी बनवण्याच्या प्रयत्नांत असल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे हेतुपुरस्सर होते आहे असे नाही, पण एकुणातील परिणाम मात्र तसाच आहे. याला कोणी बौद्धिक भांडवलशाही म्हणू शकेल. पण साधनसंपत्तीचे फेरवाटप करा, आर्थिक भांडवलशहा नष्ट करा असे साम्यवादी जसे ओरडू शकतात तसे बौद्धिक फेरवाटप करा असे ते म्हणू शकत नाहीत. साधनसंपत्ती ही वस्तुरुप असते की बुद्धीरुप याचा निर्णय बव्हंशी माणसं करू शकत नाहीत यातच मानवी बुद्धीचा पराभव आहे की काय याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. परंतू बौद्धिक भांडवलशाहीही अस्तित्वात आहे व तीच आजच्या जगाचे एकतर्फी नियंत्रण करते आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. 

म्हणजेच, आमची सामाजिक उत्क्रांती ही बव्हंशी बाह्य आहे. बाह्य घटकांना भला-बुरा प्रतिसाद देण्याइतपतच आमचे अंतरंग बदलले आहे. पण मुलभूत बुद्धीचे काय, तिच्या उत्क्रांतीचे काय आणि या उत्क्रांतीशिवाय आम्ही आमचे सामाजिक जीवन कसे बदलणार याचा विचार आम्ही क्वचितच करत असतो. त्यामुळेच आमचे भविष्यही अनिश्चित बनून जाते व येणा-या प्रत्येक लाटेवर स्वार व्हायची सवय लागते ती यामुळेच. आम्हाला काय उपयुक्त आहे आणि काय नाही हे ठरवण्यासाठी बाह्य फोर्सेस लागतात. मग त्या अगदी दैनंदिन जगण्याच्या वस्तू असोत की आमचे राजकीय-सामाजिक विचार. आम्ही त्या परिघातच आमचे विचारविश्व मर्यादित करतो (किंवा बाह्य फोर्स ते मर्यादित करतात.) आणि या मर्यादितपणाला आम्ही उत्क्रांती म्हणू शकत नाही. गेल्या शतकाच्या आरंभापासून माणुस बदलेल अशी जी तत्वज्ञांना आशा होती ती सर्वच जागतिक समुदायाने खोटी ठरवली आहे ती यामुळेच!

किंबहुना अत्यंत अभिनव तत्वज्ञान, विज्ञान किंवा आर्थिक वा राजकीय विचारांचे सृजन आम्ही करू शकलेलो नाहीत. जे काही झाले आहे ते फार पुर्वीच झाले आहे. आता आम्ही त्याच विचारांना नवी थिगळं लावत वा अनेक विचारांचे मिश्रण करत नव्याचा आव आणत सिद्धांत मांडत आहोत. जगात एकरुपता हवी. जागतिक मानव एक राष्ट्रीयत्वाच्या छत्रछायेखाली यावा हे खरे, पण विचारधारांच्या अप्रगल्भ बजबजपुरीमुळे व त्यांच्यातील सत्ताकारणांच्या संघर्षामुळे आहे तेच समाज व राष्ट्रे आज वैचारिक दृष्ट्या विचित्र विभाजली गेलेली आहेत. हा अर्धवट संघर्ष एवढ्या विकोपाला गेला आहे की आपल्याला नेमके काय हवे आहे, भविष्यातील जग आम्हाला नेमके कसे घडवायचे आहे याचा विचारही लूप्त झालेला दिसतो कारण आमचा सार्वत्रिक बौद्धिक -हास झालेला आहे. आज आम्ही वापरतो ती पोटभरू बुद्धी आहे. कोणाचे कौशल्य यात अधिक तर कोणाचे कमी एवढाच काय तो फरक आहे. परंतू मानवी संस्कृतीच्या विकासाचे बाह्य साधनसंपत्ती हे एकमात्र लक्षण नाही याचे भान आम्ही हरपून बसायला लागलो आहोत. यातच आमची सामाजिक उत्क्रांती की अधोगती हे आम्हालाच शोधायचे आहे.

भारतियांसमोरील आव्हाने अधिक बिकट आहेत. आजचे जग हे विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता नुसती आर्थिक नाही तर बौद्धिकही आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीला निसर्गानेच स्वतंत्र अशा बौद्धिक प्रेरणा दिलेल्या असतात. परंतू आमच्या बाह्य जगाची संरचनाच अशी आहे की ती नैसर्गिक बुद्धीमत्तेला नष्ट करत नेत एका कृत्रीमतेच्या चक्रव्यूहात अडकावते. या कृत्रीमतेचा सोस एवढा आहे की तीच आम्हाला नैसर्गिक प्रेरणा वाटू लागते. आणि या कृत्रीमतेच्या अनैसर्गिक सोसात बुद्धीमत्तेचेही मापदंड बदलत जात त्यात विषमता निर्माण होत जाणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. अशा स्थितीत रास्त सामाजिक व्यवस्थेचा जन्म होण्यासाठी, त्यासाठी उचित राजकीय व आर्थिक व्यवस्था असण्यासाठी जी उत्क्रांती अभिप्रेत आहे ती होणे कसे शक्य आहे?

आम्हा भारतियांसमोर आजच्या व्यवस्थेत अनंत आव्हाने आहेत. ते जातीपातींपासून सुरू होत आर्थिक विषमतेशी येऊन ठेपतात. आमची लोकशाही ही जनांची लोकशाही नसून सरंजामदारांची लोकशाही आहे. पण ती बदलावी व खरी लोकशाही आणावी असे लोकांनाच वाटत नाही. जात हे अनेकांना उन्नतीचे साधन वाटते तर काहींना विपन्नावस्थेचे कारण वाटते. उन्नती हा मानवी स्वातंत्र्याशी निगडित असूनही आम्हीच अनेक पारतंत्र्ये स्वत:हून ओढवली आहेत, आणि गंमत म्हणजे ती पारतंत्र्ये आहेत हेच आम्हाला मान्य नाही. आमचे धार्मिक संघर्ष तर कोणत्याही धर्माने लाजेने खाली मान घालावेत असे बनले आहेत. विचारवंतांनी हा गतीरोध नष्ट करत समाजाला मूक्त प्रवाह बनवण्यासाठी प्रेरणा द्यायची तर तेही या संघर्षांची व्याप्ती वाढवण्यात हातभार लावत आहेत. दुसरी गंमत म्हणजे आम्हा भारतियांना मुळात अर्थविचारच नाही. सैद्धांतिक प्रेरणाच नाहीत. आमची उत्क्रांती दहाव्या शतकात जी थांबली ती आजही त्या थांब्यापाशी अडखळलेली आहे. बौद्धिक क्रांतीच्या चर्चा होण्याऐवजी विद्रोही तरुण साधन-संपत्तीच्या फेरवाटपाबाबत अधिक चर्चा करतात. बाकीचे आहे त्या भ्रष्ट व्यवस्थेचे फायदे कसे उचलता येतील या स्पर्धेत पडतात. ज्यांना जमत नाही ते आपल्या नशिबाला दोष देत जगण्याच्या स्पर्धेत हाती येईल ते मिळवत कसेबसे जगतात. आमची व्यवस्था ही नवयुगातील नवनवे वंचित निर्माण करत एकमेकांना शोषणाचे नवे मार्ग वापरते. अशा स्थितीत आम्ही जगाशी स्पर्धा करू शकत नाही. नव्या जगाच्या निर्मितीचे नेतृत्व करू शकत नाही. आजची बौद्धिक भांडवलशाहीही आमच्या आकलनात नाही त्यामुळे तसे भांडवलदार निर्माण करायची क्षमताही आमच्यात नाही. 

आणि या सर्वांचे मूळ कारण म्हणजे आम्ही आमच्या मानसिकतेला आव्हान देत नवे न्याय्य राष्ट्र घडवण्याच्या प्रेरणा देणारे नवे विचारवैभव निर्माण केले नाही. तसा प्रयत्नही होत नाही. मागे चर्चा केल्याप्रमाणे या सर्व अध:पाताची सुरुवात आमच्या शिक्षणव्यवस्थेपासून सुरु होते आणि भ्रष्ट समाजात विलीन होते. मग आमची नीतिमुल्येही भ्रष्टच राहणार हे वेगळे सांगायची गरज नाही. आमच्याच पुर्वसुरीच्या उसण्या तत्वज्ञानांना बासणात बांधत जोवर आम्ही नवतत्वज्ञान बनवत बौद्धिक क्रांतीचे, म्हणजेच मनुष्यक्रांतीचे ध्येय प्रामाणिकपणे जोपासत नाही तोवर आमच्या अवस्थेत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. सामाजिक उत्क्रांती झाली तर यातुनच साध्य होईल! अन्यथा जो काही बौद्धिक -हास झालाच आहे तो आम्हाला नित्यनेमाने रसातळाला नेत राहील एवढेच! मानवी स्वातंत्र्यच नैसर्गिक प्रज्ञेचे/बौद्धिकतेचे स्फोट घडवू शकते आणि आपल्याला तेच आधी मिळवावे लागेल. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.  आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा प्राचीन संस्कृत्यांचे अवशेष आज कष्टाने शोधावे लागतात तसेच आमच्याही आजच्या संस्कृतीचे होईल!   

"अंगविज्जा" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश!


Inline image 5



आजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी "अंगविज्जा" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. हा ग्रंथ जैन धर्मियांनी लिहिला असल्याने व तो अंगलक्षणांरून भविष्यकथन करणारा ग्रंथ वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनाला वगळत आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.

हा ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान लिहिला गेला आहे याचे पुरावे ग्रंथातच आहेत. कुशाणकालीन समाज-संस्कृती, नाणी, नांवे आणि देवता या ग्रंथात ठायीठायी आलेल्या आहेत. दक्षीणेत तेंव्हा सातवाहनांची सत्ता होती. माहाराष्ट्री प्राकृत त्या काळात उत्कृष्ठ ग्रांथिक भाषा मानली जात असल्याने हा ग्रंथ उत्तरेत रचला गेला असला तरी लेखकाने ग्रंथभाषा म्हणून याच भाषेची निवड केली. अर्थात त्यावर स्वाभाविकपणे काही शब्दकळांवर अर्ध-मागधीची पुसटशी छाया आलेली आहे. असे असले तरी या ग्रंथातील असंख्य शब्द मराठीत आजही वापरले जातात. उदाहणार्थ कुद्दली (कुदळ), छुरी (सुरी) थाळा, तट्टक (ताट) इत्यादि आजही वापरात असलेले शब्द तर आहेतच पण "कारूकम्म" (कारुकर्म) हा तेंव्हाचा व्यवसायाधिष्ठित शब्द आजही "कारू" जातसमुहासाठी वापरला जातो.

अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत "गृहपती" या संज्ञेने हिंदू धरातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची ओळख मिळते. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत तर जैनांना समन (श्रमण) म्हणत. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्र, यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाही, म्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच प्राचीन नांव होय.

त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही असत व त्यात सर्वच भाग घेत असे अंगविज्जावरुन दिसते.  काही लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत, पण ही वैदिक दैवते तोवर दुय्यम झालेली दिसतात. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.

तत्कालीन लोक अनेक उत्सवही साजरे करीत. त्यांची माहिती देत असतांनाच शिवमह व रुद्रमह हे उत्सव इंद्रमहाप्रमानेच स्वतंत्र रित्या साजरे केले जात. याचाच अर्थ असा की वैदिक रुद्र व हिंदू शिव ही वेगळी दैवते आहेत याचे तत्कालीन समाजाला भान होते. गुप्तकाळात पुराणांनी रुद्र व शिवाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुता: ही दोन दैवते दोन वेगळ्या धर्माची आहेत. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती.  अंगविज्जा लेखनाचा काळ हा पुराणे लिहायला सुरुवात होण्याआधीचा असल्याने असूर-राक्षसांची प्रतिमा जनमानसात पुर्वी चांगलीच होती हे त्यांना देवतारुपात भजले जात असल्याने सिद्ध होते.

तत्कालीन व्यक्तीनांवेही प्राकृतातच आहेत. नांवांचे संस्कृतकरण झालेले नसल्याने अंगविज्जात आलेली व्यक्तीनामे हीच प्रत्यक्ष व्यवहारातीलही नामे होती असे प्रस्तावनेतच श्री. वासुदेवशरण अग्रवाल म्हणतात आणि ते योग्यही आहे. व्यावहारिक नांव प्राकृतात वा अन्य कोणत्याही भाषेत लिहितांना किमान त्यांचे मूळ रूप कोणी बदलत नाही. त्यामुळेच अग्गीमिताचे संस्कृतकरण अग्नीमित्र असे आपण करतो ते चुकीचे आहे. अग्गीमित हेच नांव व्यवहारातील होते व त्याचा तसाच वापर केला पाहिजे. उलट नंतरच्या काळात प्राकृत मूळ नांवांचे संस्कृतकरण केल्याने खूप घोळ झालेले आहेत. सातवाहन नांवाचे संस्कृतीकरण केल्याने शालिवाहन शकाचा काय गोंधळ झाला आहे हे आपण पहातच आहोत. अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांचे सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे या काळात संस्कृत भाषा प्राकृतातून विकसित होत असली तरी जनमानसात तिला अजून प्रवेश मिळायचा होता. संस्कृतचा परिपोष झाला तो गुप्तकाळात. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व असल्याचे कसलेही पुरावे मिळत नाहीत.

कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला "पुराण" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे.  कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दीनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासक, अर्धमासक, ररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्र, अलंकार, मद्याचे अनेक प्रकार, पानगृहे, व्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लसच्या  (सन ७८) प्रवासवर्णनातही येतात. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.   

अंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.

अंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही अत्यंत आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने अन्य जैन, बौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी "अंगविज्जा"मुळे आले तरी पुरेसे आहे.

-संजय सोनवणी

(Published in Dainik Pudhari)
(१४ जुलै २०१७)

Saturday, July 8, 2017

चीन: जागतीक शांतीतील अडसर!


Inline image 1




आपण गेल्याच लेखात तिसरे महायुद्ध होईल काय याबाबत चर्चा केली होती. याच वेळीस चीनने डोकलांग या भुतानी प्रदेशात घुसखोरी करून भारतीय सैन्यासमोर आव्हान उभे केले. डोकलांग भागात भुतान, भारत (सिक्कीम) च्या सीमा येवून मिळतात. हा भाग लष्करी दृष्ट्या त्यामुळेच महत्वाचा आहे. चीनचा इतिहास पाहिला तर नसते सीमावाद उकरून काढत दडपशाही करत भुभाग बळकावणे ही त्याची नीती राहिली आहे. तिबेटवरील चीनचा ताबा असाच आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून घेतला गेला. भारताचाही अक्साई-चीनमधील मोठा भुभाग चीनने १९६२ च्या युद्धानंतर बळकावला. पश्चिमोत्तर भारतातही चीनने अनेकदा घुसखोरी करुन भारताला डिवचले आहे. आता डोकलांगमुळे भारतीय व चीनी लष्कर समोरासमोर उभे ठाकलेले आहे. डोकलांग भाग हा चीनचाच असून त्यावर भूतानचा हक्क नाही म्हणून भारतीय लष्कराने तत्काळ त्या भागातून निघून जावे अशी चीनची धमकी आहे. त्यांनी भारताच्या दोन चौक्याही उध्वस्त केल्या आहेत. भूतानच्या रक्षणाची व राजनैतिक हितसंबंधांची जबाबदारी भारतावर असल्याने भारताला यातून अंग काढता येत नाही. शिवाय भारताची सीमाही डोकलांगशीच मिळत असल्याने डोकलांगवर चीनचा हक्क प्रस्थापित झाला किंवा बळजबरीने तो घेतला तर भारताची डोकेदुखी अजुनच वाढणार असल्याने भारतालाही सुरक्षा दृष्टीने ते अडचणीचे आहे.

चीनचे विस्तारवादी धोरण कधीही लपून राहिले नाही. चीन-पाकिस्तानला जोडणारा आर्थिक महामार्ग पाकिस्तानच्या आगावूपणामुळे व्याप्त काश्मिरमधून गेला आहे. खरे म्हणजे भारतातुनच भारताच्या इच्छेशिवाय हा महामार्ग गेला आहे. खरे तर हे अप्रत्यक्ष रितीने भारतीय भुमीवरचे अप्रत्यक्ष आक्रमण होते पण कोणत्याही भारतीय सरकारने याबाबत कठोर आक्षेप घेतला नाही. डोकलांग भागातील वादही त्या भागातून चीनने रस्ता बांधणी सुरु केल्यानेच निर्माण झाला आहे. दुर्गम हिमालयीन प्रदेशांत रस्त्यांचे जाळे विणायचे काम चीन खरेच व्यापारी हेतुने करतो आहे की आपल्या विस्तारवादाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचा लष्करी वापर करण्यासाठी करतो आहे हा प्रश्नच असला तरी लष्करी हेतू प्राधान्यक्रमाने आहे हे उघड आहे.

अरुणाचल प्रदेशावर चीनने हक्क सांगून फारसा काळ उलटलेला नाही. सिक्कीमच्या सीमेबाबत २००९ सालीही वाद झाला होता. सिक्कीम भारतात १९७५ मध्ये सामील झाला तेंव्हाही चीनने त्याला आक्षेप घेतला होता. २००३ पर्यंत सिक्कीम भारताचा भाग आहे हे मान्य करायला चीन तयार नव्हता. हिमालयाचा पर्वत रांगा आणि तेथली थंड पठारे दुर्गम असल्याने ज्या सीमारेषा आखल्या गेल्या त्या बव्हंशी नकाशावरच आणि त्याचाच गैरफायदा चीन घेत आला आहे.

डोकलांग प्रकरणी भारतावर दडपण आणण्यासाठी एकीकडे चीनने हिंदी महासागरात पाणबुड्या व युद्धनौका उतरवल्या आहेत तर भारताने सीमेवर अधिक सैन्यबळ पाठवले आहे. थोडक्यात अटीतटीची वेळ आली आहे. यातून युद्ध तर उद्भवणार नाही ना हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

१९६२ साली चीनशीच्या युद्धात अमेरिकेने भारताची मदत केली होती हा इतिहास आहे. पण आता स्थिती बदलली असून चीन-अमेरिकेतील व्यापारी संबंध ज्या प्रमाणात वाढले आहेत ते पाहता आताची ट्रंपची अमेरिका भारताच्या सहाय्याला कितपत धावून येईल ही शंका आहे. अर्थात बाहेरची मदत असो अथवा नसो, कोणतेही युद्ध स्वसामर्थ्यावरच लढावे लागते. १९६२ सालच्या युद्धात भारत हरला असला तरे लगोलग १९६७ साली नथुला खिंडीत झालेल्या लढाईत भारताने चीनला सपाटून मार देत हरवले होते. डोकलांगमुळे मोठे युद्ध करायचे तर चीनही त्या स्थितीत आहे काय हा प्रश्न आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा कर्जबाजारी फुगा कोणत्याही क्षणी फुटेल अशी भिती अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. खुद्द चीन सरकारचे कर्ज जीडीपीच्या ४१% आहे. युद्ध खर्चात भरच घालते आणि जागतीक हितसंबंधांचीही युद्धोत्तर काळात फेरमांडणी होत असल्याने अर्थव्यवस्थेचे दिर्घकाळ नुकसानच होते हा इतिहास झाला. त्यामुळे चीन युद्ध करण्याचा धोका पत्करणार नाही असे काहींचे म्हणने असले तरी युद्ध करून युद्धाचेही जे फायदे असतात ते घेण्याचा प्रयत्न चीन का करणार नाही हाही प्रश्न आहे.

डोकलांगपुरती लढाई मर्यादित राहिली तर भारत नथुला खिंडीतील युद्धाची पुनरावृत्ती करु शकतो. पण हे युद्ध व्यापक झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था पाहता भारतालाही ते परवडणार नाही हे उघड आहे. आणि डोकलांगवरील भुतानचा हक्क गमावनारेही भारताला परवडणार नाही. असे केले तर भूतान चीनच्या कह्यात जाण्याचा धोका समोर उभा ठाकलेला आहे. शिवाय दक्षीण आशियातील भारताची पत पुरती घसरेल हे वेगळेच. याचा फायदा पाकिस्तान घेणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. थोदक्यात भारत एका विचित्र तिढ्यात सापडलेला आहे. त्यातून सहीसलामत बाहेर पडत, युद्ध न करता डोकलांगवरील ताबाही निर्विवादपणे भूतानकडे ठेवत "जैसे-थे" स्थिती निर्माण करण्यासाठी भारताला मुत्सद्देगिरी व आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव पणाला लावावा लागेल. हे सारे कसे होते हे आपल्याला नजिकच्याच काळात स्पष्ट होईल.

येथे लक्षात घ्यायची महत्वाची बाब म्हणजे तिस-या महायुद्धाची ठिणगी असल्या वरकरणी छोट्या वाटणा-या विस्तारवादी घटनांतुनही होऊ शकते. साम्यवादी चीन आशियामध्ये आपले वर्चस्व निर्माण करत सीमाविस्ताराच्या मागे आहे. आर्थिक महामार्गांची योजनाही याच विस्तारवादातून होत आहे. पाकिस्तानसारख्या स्वार्थी आणि भारतद्वेषाने पछाडलेल्या राष्ट्राला आपणही स्वत:चे अहित करत आहोत, किंबहुना नकळत अस्तित्वच धोक्यात घालत आहोत याचे भान नाही.  भारताभोवतीचा फास आवळण्याच्या चीनच्या आकांक्षेला पाकिस्तानने बळ दिले आहे. भारताने दाखवावी तेवढी मुत्सद्देगिरी दाखवलेली नाही हेही वास्तव आपण मान्य करायला हवे. आता तर आपण चीनसमोर डोकलांगमध्ये उभे ठाकलो आहोत. पहिली गोळी कोण झाडतो हे महत्वाचे नसून जीही गोळी झाडली जाईल ती जागतिक राजकारणाला विध्वंसकतेकडे नेवू शकते याचे भान चीननेही ठेवले पाहिजे. 

परंतू आज समग्र जगावर प्रभाव टाकू शकेल असे नैतिक नेतृत्व नाही. नव्या जगाच्या रचनेचे तत्वज्ञान विकसित केले गेले नाही. व्यापार, विकास आणि जमेल तसा विस्तारवाद हा आजच्या जगाचा मुलमंत्र बनलेला आहे. यात संघर्षाचे मुद्देच अधिक असणार हे उघड आहे. शितयुद्ध काळात अलिप्ततावादी धोरणाची निर्मिती करणारे नेहेरुंसारखे प्रभावी नेतृत्व आपल्याकडे होते, पण तेही चीनच्या विस्तारवादाला रोखू शकले नाही. अलिप्ततावाद हा योग्य असला तरी प्रतिक्रियास्वरुप असल्याने त्याचे फायदे मर्यादितच होते. डोकलांगचा वाद समजा छोटी लढाई करून अथवा मुत्सद्देगिरीतून सुटला तरी तो प्रश्नांचा अंत नसेल. नवनवीन उपद्रव निर्माण केलेच जातील आणि चीन यात नको तेवढ्या आघाडीवर असतो. असे असले तरीही मानवी समुदायाला आपल्याला कोणत्या प्रकारचे भवितव्य हवे आहे हे ठरवावेच लागेल. राजकीय व आर्थिक सत्ता सामान्य माणसांचे जीवन वेठीला धरत त्याला किती काळ विनाशक भयाच्या टांगत्या तलवारीखाली ठेवणार हा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाला पडला पाहिजे. 

(Published in Dainik Sanchar, Ibndradhanu supplement) 

Friday, July 7, 2017

विषमतेचा पाया समता कशी आणणार?


भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त नेमका कोण होता, हे कष्टाने शोधावे लागते. पण या सार्‍यामुळे सुसंगत इतिहासाची मांडणी कठीण व दुरापास्त झालेली आहे. या गोंधळामुळे एक व्यक्ती दोन वेगळ्या, विभिन्न टोकाच्या विचारधारांची कशी असू शकते हेही हा गोंधळ घालणार्‍यांना उमजलेले नाही. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुण-दोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणे स्वाभाविकपणेच कठीण जाते.

मध्ययुगात संतपरंपरा सुरू झाली. तिचाही इतिहास सांप्रदायिकांकडूनच बव्हंशी समजत असल्याने त्यांनी घालून ठेवलेले घोळ, प्रश्‍न सोडवणे तर दूरच पण गोंधळ वाढवतात. मी या लेखात चोखामेळा आणि विसोबा खेचर या अत्यंत भिन्न परंपरेतील पण महनीय व्यक्तींवर काही दृष्टिक्षेप टाकू इच्छितो. चोखामेळांना व त्यांच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता. याच काळात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे व गोरोबा-सावतांसारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चौदावे शतक हा या संतांचा काळ होय. या संतांनी पंढरीच्या, अवैदिक परंपरेतील व तशा अप्रसिद्ध देवतेला समतेचे आराध्य म्हणून स्वीकारले. ही प्रक्रिया कशी नेमकी सुरु झाली, वारी तेव्हा होती काय हे प्रश्‍न सध्या बाजूला ठेवले तरी नेमक्या तेराव्या-चौदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी हा प्रश्‍न पडतो. तत्कालीन महाराष्ट्रात तेव्हा नेमक्या कोणत्या विचारधारा होत्या हेही आपण पाहूयात. पण काही प्रेरणा महाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली हे तर नक्कीच; पण असे करुनही विठ्ठल भावजीवनात त्यांचे सर्वस्व बनला असला तरी लौकीक जगात विठ्ठल मध्यस्थ बडव्यांमुळे दूरच राहिला हेही एक वास्तव आहे. बडवे शिवाशिव पाळतात, विठ्ठलाला थेट भेटू देत नाहीत हे संतांना दिसत असूनही संतांनी त्यांच्याविरुद्ध आवाज मात्र उठवला नाही हे स्पष्ट दिसते.
वैष्णव वारकरी पंथाचे संस्थापक ज्ञानेश्‍वर की नामदेव हा प्रश्‍न आजकाल चर्चिला जातो. यामागे जातीय दृष्टिकोन आला असल्याने मूळ उत्तर दूरच राहते. पण ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे ही नाथ पंथातील योगी होती, गहिनीनाथांकडून दीक्षा घेतलेली होती, अगदी चांगा वटेश्‍वराला आगमिक अद्वैतवादाचे दर्शन घडवणारे ज्ञानेश्‍वर, अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्‍वर आणि अगदी त्याविरुद्ध विचारधारा असलेले वैष्णव तत्त्वज्ञान घेत वारकरी पंथाचे संस्थापक ज्ञानेश्‍वर याची कशी सांगड घालायची? ज्ञानेश्‍वर व त्यांचे संतमंडळ याबाबत येणार्‍या अनेक कथा विपर्यस्त, अविश्‍वसनीय व तर्काच्या बळावर न टिकणार्‍या आहेत.
उदाहरणार्थ विसोबा खेचर यांच्याबाबतच्या कथाही अशाच आहेत. विसोबांच्या गुरुपरंपरेतील चांगा वटेश्‍वर ज्ञानेश्‍वरभगिनी मुक्ताईचे शिष्य होते अथवा ते ज्ञानेश्‍वरमंडळात सामील झाले होते असे परंपरा मानते. अभ्यासक मात्र चांगा वटेश्‍वराची गुरू असलेली मुक्ताई वेगळीच होती व श्री पर्वतावर राहणारी गोरक्षनाथांची शिष्या होती असे मानतात. विसाजी खेचरांनीही आपल्या गुरु परंपरेत याच मुक्ताईचा उल्लेख केलेला असून तिच्याशी संबंधीत कथाही विसोबा खेचर लिखित षट्स्थलात नोंदवली आहे. पण ती मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्‍वर भगिनी मुक्ताई नव्हे, त्या दोन वेगळ्या व्यक्ती होत. याबाबत विद्वानांत एकमत आहे. किंबहुना विसोबांचा ज्ञानेश्‍वरांशी कसलाही संबंध असल्याचे विसोबांच्या लेखनावरून दिसून येत नाही. त्यात समजा नामदेव निगुरा होते तर ज्ञानेश्‍वर अथवा त्यांच्या भावंडांपैकी कोणीही नामदेवांचे गुरुत्व न घेता त्यांना विसोबांकडे पाठवण्याचे काय कारण असावे? विसोबा आणि ज्ञानेश्‍वर हे दोघेही नाथपंथीय असले तरी विसोबांचा ग्रंथ मात्र लिंगायत (वीरशैव) तत्त्वज्ञानावर आधारीत आहे. म्हणजे विसोबांची तात्त्विक जवळीक वीरशैव तत्त्वज्ञानाशी होती असे दिसते. ज्ञानेश्‍वरांबाबत मात्र असे म्हणता येणार नाही. ज्ञानेश्‍वर एकाच वेळीस नाथपंथीय आहेत आणि वैष्णवही. म्हणजेच वर्ण व्यवस्था न मानणारा अवैदिक नाथपंथ आणि वैष्णव तर वेदांना मानणारे व स्वाभाविकच वर्णव्यवस्थाही मानणारे. ज्ञानेश्‍वर आपल्याला एकीकडे नाथपंथाचे उदात्त तत्त्वज्ञान अमृतानुभवमध्ये सांगतांना दिसतात आणि दुसरीकडे आपले व आपल्या भावांचे उपनयन व्हावे यासाठी पार पैठणच्या ब्रह्मवृंदापर्यंत अयशस्वी साकडे घालतानाही दिसतात. ज्ञानेश्‍वरीतले ज्ञानेश्‍वर मात्र नाथपरंपरेच्या विरुद्ध असलेल्या वर्णव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करताना दिसतात, याचे नेमके काय कारण असावे? ही एक मोठी विसंगती आहे.
विसोबांचा वैष्णव पंथाशी संबंध असल्याचे त्यांच्या उपलब्ध साहित्यावरून दूरान्वयानेही दिसत नाही. विसोबा आळंदीचे नसल्यामुळे ज्ञानेश्‍वर व त्यांचा प्रत्यक्ष परिचय असण्याचीही शक्यता नाही. मांड्यांची कथा ही येनकेन प्रकारेन विसोबांना ज्ञानदेवांशी जुळवण्यासाठी बनवली गेली आहे हे तर उघड आहे. विसोबा बार्शीचे होते हे स्पष्ट होण्याइतपत पुरावे उपलब्ध आहेत. ते पांचाळांपैकी कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेले विणकर समाजातील चाटी आडनावाचे होते आणि कपडा व्यापार हा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. आता विसोबा जर आळंदीचेच नसतील तर ज्ञानेश्‍वरांनी नामदेवांना विसोबांकडे जायला सांगितले ही कथा विपर्यस्त असण्याचीच अधिक शक्यता आहे.
बरे, ज्ञानेश्‍वरांना चांगा वटेश्‍वरांमुळे विसोबा माहीत झाले असे मानले तरी मुळात चांगदेवाचे कोरे पत्र ही कथाही दंतकथेच्याच सदरात टाकून देता येते. ज्ञानेश्‍वरांची चांगदेव पासष्टी म्हणजे अद्वैती शांकरमताचा काव्यात्मक आविष्कार आहे. ज्ञानेश्‍वरांचे पत्र हे त्या अद्वैततेचे नितांतसुंदर निरुपण आहे. दोन योग्यांमधील आत्मसंवाद या रुपातच त्या लेखनाकडे पहावे लागते कारण ते तसे आहेही. पण दंतकथा बनवणार्‍यांनी चांगा वटेश्‍वरांना कोर्‍या पत्राची कथा बनवून एक प्रकारे हिणवले आहे असे दिसते. विसोबा खेचर हे चांगा वटेश्‍वराच्या गुरु परंपरेतील. आता चांगा कोराच राहिला असे म्हणणारे ज्ञानदेव नामदेवांना त्यांच्याच शिष्यपरंपरेतील विसोबाकडे कसे पाठवतील हा प्रश्‍न निर्माण होतो. फार तर नामदेव स्वत:च विसोबा खेचरांकडे गेले एवढेच म्हणता येईल. त्याच्याशी ज्ञानेश्‍वरांचा संबंध जोडणे गैर आहे. शिवाय विसोबा हे चांगदेवांचे नव्हे तर त्यांचे शिष्य असलेल्या कृष्णनाथांचे शिष्य होते. म्हणजे चांगा वटेश्‍वर व विसोबांत सरळ गुरु-शिष्य संबंध नव्हता हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. तसेच ज्ञानेश्‍वर रागाने विसोबांना खेचरा, दूर हो असे म्हटल्याने विसोबांना खेचर हे नाव पडले हेही खरे नाही. विसोबा योगी होते व षट्स्थळ ग्रंथात त्यांनी त्याचे निरुपण वीरशैव व नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली केलेले आहेच. या ग्रंथात एकही संतमंडळातील व्यक्तीचा उल्लेख येत नाही. विठ्ठलाचाही नाही. चांगा वटेश्‍वराशी संबंध आलेल्या ज्ञानेश्‍वरांचाही नाही. विसोबा जर ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्‍वर मंडळात प्रवेश झाल्यानंतर विसोबा योगनिपुण झाले ही कथा थोडी जरी खरी असती तर षट्स्थळात ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख येणे अनिवार्य होते. पण ते तसे नसल्याने खेचराची वेगळी व्युत्पत्ती असणार हे उघड आहे आणि ते तसेच आहेही.
योगकुंडलिनी उपनिषदात कुंडलिनी विद्येनंतर खेचरी विद्येचे विवेचन येते व ही विद्या अत्यंत अवघड असल्याचे म्हटले आहे. ही असाध्य विद्या साध्य झाल्यानंतर जरा-मृत्यूपासून मुक्ती मिळते असे मानण्यात येते. ही विद्या जपाने प्राप्त करता येते तसेच जिभेला मागे टाळूत नेत नासिका रंध्रात घुसवून जी मुद्रा बनते ती साध्य करुनही प्राप्त करता येते. हठयोग हा नाथपंथीयांच्या साधनेतील एक महत्त्वाचा भाग. विसोबा खेचरी मुद्रेत गेल्याने त्यांना खेचर ही उपाधी चिकटली असल्यास नवल नाही. थोडक्यात सर्वांना एकाच मोटकळीत बांधण्याच्या सांप्रदायिकांच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचाही इतिहास गढुळला आहे हे आपल्या लक्षात येईल.
दुसरी बाब म्हणजे चोखामेळा व त्याचा परिवार ज्या जातीघटकातून संतत्वाला पोहोचला त्याचा विचार करता तत्कालीन समाजस्थिती नेमकी काय होती याबाबत कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. त्याच निमित्ताने महाराष्ट्रात अस्पृश्यतेच्या मानवताविहिन संकल्पनेचे गारुड समाजाला नेमके कधीपासून ग्रासू लागले, नेमक्या काही विशिष्ट जातीच अस्पृश्य का ठरवल्या गेल्या ‘याचाही धांडोळा घेणे आवश्यक बनून जाते.
देवगिरीचे यादव
देवगिरीच्या यादवांची सत्ता सन 850 मध्येच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. ही सत्ता सन 1317 साली शेवटचे आचके घेत संपुष्टात आली व इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर कायम झाली. म्हणजेच यादवांच्या उतरणीच्या काळात संतांचा उदय झाल्याचे आपल्याला दिसून येते. खरे पाहिले तर 1296 सालीच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीचा पाडाव केला होता. तात्पुरत्या स्वरुपात रामचंद्र यादवाची पुनर्स्थापना झाली असली तरी खंडणी न भरल्याने मलिक काफरने 1307 साली पुन्हा आक्रमण केले होते. 1317 मध्ये खिल्जीने तेव्हाचा शासक तिसर्‍या सिंघनला ठार मारून देवगिरीचे राज्य त्याच्या साम्राज्याला जोडून घेतले. ही उलथापालथ आणि रक्तपात महाराष्ट्राने अनेक शतके पाहिलेलाही नव्हता. यामुळे जनजीवन विस्कळीत होणे व काहीतरी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक समजायला हवे; पण तसे झाल्याचे चित्र दिसून येत नाही.
ही राजकीय अंदाधुंदी चालू असतानाच संतांचा उदय झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रामचंद्र यादवाच्या काळातच नरेंद्र कवीचे रुक्मीणी स्वयंवर व नागदेव चरित, ज्ञानेश्‍वरांची ज्ञानेश्‍वरी हे ग्रंथ लिहिले गेले अथवा तेव्हा लेखन चालूच होते. संत नामदेव ते चोखा हे बहुजनीय संत याच काळात बहराला येत होते. खरे तर त्यांच्या काळातील ही राजकीय उलथापालथ सामान्य नव्हती. जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर अव्याहत राज्य करणार्‍या राजवंशाचा उच्छेद व्हावा आणि त्याचे कसलेही प्रतिबिंब ज्ञानेश्‍वर, विसोबा ते चोख्याच्या एकाही अभंगात वा लेखनात पडू नये हे विस्मयकारक आहे. केंद्रीय राजकीय व्यवस्था आणि सामान्य नागरिकांत त्या काळात फारसा संबंध नसे हे खरे आहे. खेड्यांतील प्रश्‍न स्थानिक पातळीवरच सोडवले जात. गावचा पाटील सोडला तर इतरांचा राजसत्तेशी काही संबंध येत नसे. हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमणे होतात, भीषण युद्धे होतात आणि प्रदीर्घ काळ राज्य करणारी सत्ता उद्ध्वस्त होते पण त्याचे पडसाद तत्कालीन व नंतरच्याही संतांच्या अभंगात पडू नयेत हे मात्र विलक्षणच होय!
परंतु विषय पंढरीचा आणि श्रीविठ्ठलाचा असल्याने यादवांची अल्प का होईना चर्चा अत्यावश्यकच आहे. पंढरीच्या श्री विठ्ठलाची मूर्ती चंद्रभागेतीरी पूर्वी उघड्यावर होती. बाराव्या शतकात यादवांच्या विठ्ठलदेव नायक नामक पंढरपूरच्या सामंताने यादवांच्या अनुमतीने विठ्ठलाचे पहिले मंदिर बांधले. तत्पूर्वी विठ्ठलाचे भक्तजन हे बव्हंशी धनगर-कुरुब-कोळी होते, हे डा. रा. चिं. ढेरे यांनी साधार सिद्ध करून दाखवले आहे तसेच माणिकराव धनपलवार यांनी विठ्ठलाचे मूळचे रूप शैव होते हेही सिद्ध करुन दाखवले आहे. माझ्या संशोधनानुसार विठ्ठल हे पौंड्र समाजाचे राजे किंवा महान शिवभक्त असावेत असे दिसते. पौड्रिक क्षेत्र, पांडुरंग (पौंड्र समाजाचा म्हणून पौंड्रंकचे सुलभीकरण) हे पुरातन पौंड्र समाजाकडेच निर्देश करतात. किंबहुना पंढरपूर हे मूळच्या पौंड्रपुरचेच सुलभीकरण आहे हेही उघड आहे. शैव असलेल्या एका दैवताच्या मूळ स्वरुपात झालेले हे बदल यादव काळातच झाले आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे. यामागील कारणांचाही शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.
तत्कालीन धर्मस्थिती
तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात अनेक धार्मिक चळवळी झालेल्या दिसतात. एकीकडे समतेचा पुरस्कार करणारे नाथ, वीरशैव आणि महानुभाव पंथांनी महाराष्ट्र भूमी व्यापली असतांनाच वैदिक धर्माचा जोरही राजाश्रयाने वाढत असल्याचे दिसते. मध्यंतरी लुप्तप्राय होऊ पाहणार्‍या वैदिक धर्माने महाराष्ट्रात उचल खाल्लेली दिसते. विसोबा खेचरांचा षट्स्थळ आणि ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव नाथ या शैव धर्मीय पंथाचे उदात्त तत्वज्ञान सांगतात. यात वर्णव्यवस्था व जातीव्यवस्र्थेला स्थान नाही. पण डॉ. सुधाकर देशमुख म्हणतात त्याप्रमाणे वैदिक धर्मीय मूलतत्ववादाने उचल खाल्ल्यामुळे तांत्रिक धर्माने निर्माण केलेले समतेचे वातावरण गढूळ झाले. यादव काळातच मनुस्मृतीच्या धरतीवर देवल स्मृती लिहिली गेली. वैदिक प्रबंध तर एवढे लिहिले गेले की त्याला प्रबंध काळ म्हणतात. यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री पंताचा जवळपास साडेचार हजार व्रते सांगणारा चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथही याच राजवटीत आकाराला आला. पूर्वी व्रते नव्हती असे नाही, पण त्यांची संख्या अत्यल्प अशीच होती. उदा. शंकरभट्टाच्या व्रतार्क मध्ये फक्त 113 व्रते दिली गेली आहेत. शैव विठ्ठलाचे वैदिक वैष्णवीकरणही याच काळात झाले. प्रशासनातील वैदिकांचे प्रमाणही याच काळात क्रमश: वाढत गेल्याचे डॉ. मालती महाजन म्हणतात. वैदिक सत्ता अशा रीतिने क्रमश: वरचढ होत गेल्याने अवैदिक व वेदपूर्व धर्म पाळणार्‍यांवरील (म्हणजे शुद्रांवरील) बंधने या साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात वाढतच गेली.
खरे तर यादव हे यदुवंशी गोपालक समाजातून आलेले राज्यकर्ते. वैदिक धर्मानुसार शूद्रच. यादव वंशाच्या कारकिर्दीत यादवांनी कसलेही यज्ञ केल्याची नोंद नाही, कारण त्यांना अवैदिक असल्याने तो अधिकारच नव्हता. यादव काळात शैव मंदिरांची संख्या सर्वाधिक असून बव्हंशी लोक शैवप्रधान धर्माचे अनुसरण करत असत. (महाराष्ट्र गॅझेटियर- इतिहास: प्राचीन काळ: सांस्कृतिक इतिहास) पण याच यादवांच्या उत्तरकाळात वैदिक माहात्म्य वाढत जात नाथ-वीरशैव, महानुभाव या समतेच्या पंथांची पीछेहाट सुरु झालेली दिसते. इतके की मूळचे शैव असलेले पंढरपूर वैष्णव या वैदिक स्थानात बदलवले गेले. वैदिक धर्माचा पायाच मुळात विषमतायुक्त उतरंडीच्या वर्णव्यवस्थेवर आधारित असल्याने बडव्यांचे अतिक्रमण व शिवाशिव यांना वरचढ स्थान मिळणे क्रमप्राप्त होते. हा दोन धर्मधारांतील संघर्ष होता हे येथे लक्षात घ्यायला हवे. हे दोन संप्रदाय नव्हते तर सामाजिक तत्वज्ञानच पुर्णतया भिन्न असलेले दोन वेगळे धर्म होते याचे भान अभ्यासकांनी ठेवलेले नाही.
देवल स्मृतीच्या माध्यमातून वर्णव्यवस्थेचे व जन्माधारित उच्चनीचतेचे स्तोम महाराष्ट्रात पसरलेले दिसते. बाकी सर्व स्मृतींची रचना उत्तरेत झाली असली तरी या स्मृतीची रचना महाराष्ट्रात व यादवकाळातच दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या स्मृतीत वर्णाश्रम-धर्म, शुद्धी-प्रायश्चिते व धर्मांतरितांना परत धर्मात घ्यायची सोय होती असे मानले जाते. त्यामुळे या कालात धर्मांतरांचे प्रमाण वाढले असावे असा तर्क बांधता येतो. राज्यकर्त्यांची साथ असल्याखेरीज धर्मविषयक मतांचा बोलबाला सहजी वाढत नाही. त्यामुळे यादव घराण्यानेही त्यांना प्रोत्साहन दिले असेल अशीही शक्यता आहे.
याउलट विसोबांच्या लेखनाकडे आपण पाहिले तर षट्स्थळात वर्ण-जात याचे एकदाही उल्लेख येत नाहीत. आगमांना व शिवाला सर्वोच्च स्थान असून वेद हे अत्यंत दुय्यम आहेत असे दाखवले आहे. इतकेच काय विसोबा इतर संत करतात तसा आपल्या जाती/व्यवसायाचा पुसटसाही उल्लेख करत नाहीत यावरून दोन धर्मांतील विचारधारांतील भेद दिसून येतो. वैष्णव संप्रदायात सामील झालेले चोखामेळा मात्र आपल्या जातीचा उल्लेख तर करतातच पण वेदमाहात्म्यही सांगायला विसरत नाहीत. हा काळ आगमिक धर्माची पिछेहाट व वैदिक धर्माचे वर्चस्व व आकर्षण कसे वाढत गेले असावे याचा आलेख दाखवतो. तुकाराम महाराजांपर्यंत ही परंपरा घट्ट होत गेलेली दिसते.
अर्थात आगमिक धर्मातील समतेचे तत्व संतांच्या मनातून गेलेले दिसत नाही. पण सामाजिक समता आणि व्यक्तीगत पातळीवरची समता यातील द्वंद्व मात्र कायमच राहिले. महाराष्ट्रातील वैष्णव पंथ हा ना पुरेपूर वैदिक ना पुरेपूर आगमिक राहिला. विठ्ठलपूजेत वर्णाधिष्ठित रचनेचा पाया घालणारे ऋग्वेदातील पुरुषसूक्त त्याचा विठ्ठलाशी कसलाही संबंध नसतांना आवर्जून म्हटले जाते आणि याला मात्र वारकर्‍यांचा कसलाही विरोध नाही. मी असा विरोध केला असता मला टीकेला सामोरे जावे लागले. ते तसे असले तरी पुरुषसुक्ताच्या पायावरील वारकरी चळवळ समतेच्या गोष्टी कोणत्या तत्वज्ञानाच्या आधारावर करतात हा प्रश्न पडल्यास नवल नाही. आजच्या बडव्यांना पुरुषसूक्ताचा अर्थही माहित नाही हेही वास्तव मी पाहिलेले आहे, आणि सांगितला तरी पण ते आम्ही म्हणणारच असा हट्टही आहे.
पुन्हा मागे जातांना, अद्वैत आगमिक शैव सिद्धांतातून प्रगत पावलेला नाथसंप्रदाय नक्की कधी स्थापन झाला याची ऐतिहासिक नोंद मिळत नसली तरी दहाव्या-अकराव्या शतकात गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असावी असा मतप्रवाह आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात निवृत्तीनाथांनी वयाच्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असे सांप्रदायिक वाड्मयानुसार दिसते. विषेष म्हणजे चारही भावंडांची नांवे ही नाथ संप्रदायाच्या परंपरेतील आहेत. इतकेच नव्हे तर समाधी या नाथ संप्रदायातील प्रथेच्या वापर समाधी घेऊन चारही भावंडांनी केला.
नाथ संप्रदाय हा समानतेचा (स्त्री-पुरुषही) पंथ. या पंथाने वैदिक उत्थानसमयीच उचल खावी याचा अर्थ वैदिक विषमतेचे गारुड समाजाला ग्रासू लागले होते. यामुळेच की काय बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कर्नाटकात वीरशैव (लिंगायत) पंथाची स्थापना केली. वेद व वैदिक कर्मकांड नाकारत समतेची अवाढव्य चळवळ त्यांनी उभी केली. विसोबा खेचरांवरचा वीरशैव प्रभाव हा ते कर्नाटकातून आलेले असल्याने होता. महाराष्ट्र निकटचा असल्याने, विशेषत: सोलापूर व नजिकच्या भागात हा पंथ पसरुन ज्ञानेश्वर-चोखा मेळ्यांच्या काळापर्यंत सुस्थापित झाल्याचे दिसते.
चक्रधरांचा महानुभाव पंथ 1267 मद्ध्ये कृष्णाला आराध्य मानत समतेचाच संदेश देणारा पंथ स्थापन झाला. चक्रधर जरी गुर्जर देशातून आले असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ, मराठवाडा व खानदेश ही प्रामुख्याने राहिली. याही पंथाने समतेच्या सिद्धांताला चालना दिली.
वारकरी पंथ
एकंदरीत महाराष्ट्रात वैदिक विरुद्ध अवैदिक हा धर्म-संस्कृती संघर्ष यादवकाळात प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो. समतेचे आकर्षण हा मानवी समाजाचा मूलगाभा आहे. वैदिक वर्णव्यवस्था मात्र ती नाकारते त्यामुळे वैदिक प्राबल्य झुगारण्यासाठी वेदनिषेध केला जाणे स्वाभाविक होते. विठ्ठलभक्ती महाराष्ट्रात अल्प असली तरीही तेव्हाही नवीन नव्हती. तसा हा अवैदिक देव. माणिकराव धनपलवारांच्या मते हे मूळचे शैव स्थान होते. पुंडलिकाचे मंदिर हे प्रत्यक्षात शिवालय आणि त्यासमोर करकटी ठेवून उभा श्री विठ्ठल हे वास्तव पाहता हे मूळचे शिवस्थानच याबाबत शंका घेता येत नाही. विठ्ठलाची मूर्ती ही आधी उघड्यावरच होती व यादव काळात पहिले मंदिर झाले हे आपण वर बघितले. येथे आजवर विद्वानांच्या साक्षेपी नजरेतून सुटलेला महत्वाचा भाग असा की यादवकाळात एकीकडे अवैदिक असलेल्या आगमिक शैव धर्माचा समतेचा बोलबाला चालू असतांना एक दुर्लक्षित शैव स्थानाचे रुपांतर चक्क वैदिक वैष्णव स्थानात नेमके का केले गेले असावे हा. समतेचे पाईक म्हणवणा-यांना नाथ संप्रदाय जवळचा होता. ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे याच समतेच्या पंथाच्या तत्वज्ञानाची पाईक असतांना विषमतेच्या वैदिकतेकडे त्यांनाही का जावे वाटले असेल? की अनेक संशोधक तर्क करतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर एक नसून याच नांवाच्या इतिहासातील दोन व्यक्ती आहेत?
आणि तसे नसले तरी विठ्ठल हा विष्णुच्या सहस्त्रनामांत अथवा चोवीस अवतारांतही न सापडणारा देव हे संतांना माहितच आहे. संतांनाही त्याचेच एक आगळे कुतुहल असल्याचे त्यांच्या अभंगांवरून जाणवते. तरीही तो विष्णू अथवा कृष्ण या रुपात पुढे आणला गेला. असे असले तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. विष्णूसहित शिव…आणिला पंढरी असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केले गेले, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोखा मेळ्यांनी ते स्वीकारले आणि त्यालाच आपले आराध्य बनवले हे एक वास्तव आहे. मग समतेच्या देवाचे हे स्वरुप पालटले याची खंत संतांच्या लेखनात कोठेही का येत नसावी?
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे यादव काळातील जी प्रचंड राजकीय घडामोड घडत होती, साडेतीनशे वर्षाची राजवट कोसळली त्याचे पुसतसेही दर्शन त्यांच्या साहित्यात का येत नाही? त्यापेक्षा ही जी धर्मविषयक उलथापालथ घडत होती तिचेच अनावर आकर्षण संतांना होते असे दिसून येते. त्याचमुळे की काय अन्य राजकीय उलथापालथी, रक्तपात याबाबत ते उदासीन राहिले एवढाच तर्क काढता येईल. अर्थात सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथी होत असतांना त्याचे मानसिक परिणाम जनसमुदायावर होणे स्वाभाविक आहे. पण त्याचे प्रतिबिंब संतसाहित्यात आढळत नाही हे एक वास्तव आहे.
विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारले होते ते, कायम प्रस्थापित झाले. विठ्ठलाचे वर्णन करतांना संतांच्या शब्दांत वेद-तुल्य अशा शब्दकळा पाझरतांना दिसतात. वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही… ते वेदांचा अर्थ आम्हासही ठावा… अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हणजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत हे मान्य करतांना दिसतात. अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ…परब्रह्म सोज्वळ विटेवरी, ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती…तो हा रमापती पंढरिये.. असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळे आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा व त्यांचा परिवारही मान्य करतांना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृश्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो…त्याविरुद्ध बंड करत नाही हे वैष्णव संप्रदायच मुळात वैदिक असल्याने असे झाले असे म्हणता येणार नाही काय?
येथे महत्वाचे पुन्हा लक्षात घेतले पाहिजे, आगमिक धर्म वेद मान्य करत नाहीत आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ-सिद्ध-वीरशैव आदि संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकेच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायातीलच होती. अमृतानुभव हे स्वतंत्र प्रज्ञेचे शैव तत्वज्ञान मांडते.असे असतांनाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातील कोडे आहे.
परंतु संतांच्या समतेच्या चळवळीला अध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही याची कारणे आपल्याला वैदिक तत्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील व व्यवहारातील जन्माधारित जातीने आलेला हीनभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोखामेळ्यांना आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. कारण ज्या मुलभूत तत्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचे तत्वज्ञानच जन्माधारित विषमतेचे होते.
विसोबा खेचरांच्या लेखनात मात्र जातीमुळे येणारा हीनभाव वा श्रेष्ठत्वता भाव कोठेही येत नाही. याचे कारण ज्या धर्माचे तत्वज्ञान ते पाळत होते त्यात आहे. या विसोबांनाही ज्ञानेश्वर मंडळात आणण्याचा अनैतिहासिक प्रयोग सांप्रदायिक चरित्रकारांनी मात्र केला. यामुळे ज्या तत्वज्ञानात्मक पातळीवर वारकरी संप्रदायाची चिकित्सा व्हायला हवी होते ती झाली नाही. खुद्द वारकर्‍यांचा पाया हा श्रद्धा असल्याने त्यांनी या विसंगतीकडे लक्ष देण्याचे कारण नव्हते.
अस्पृश्यता
अस्पृश्यता हा भारतातील एक मोठा कलंक आहे याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु ती नेमकी सुरु कधी झाली आणि का याची कारणे मात्र अत्यंत वेगवेगळी दिली जातात. वैदिक धर्मग्रंथांत चांडाळ-श्वपच-धिग्वन ई. काही जाती अस्पृश्य मानल्या गेल्याचे दिसत असले तरी महार या जातीचा कोठेही उल्लेख मिळत नाही. महार समाज हा मूळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करणारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगत अंगरक्षक म्हणून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हिणकस कामांचा, म्हणजे मृत जनावर ओ्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे इ. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृश्य का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.
बरे ही अस्पृश्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते की सैन्यातील महारांबाबत अस्पृश्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमिनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. गांव पाटीलही होते. आपली समाजाची स्थितीस्थापकता पाहिली तर चोख्याच्या काळातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असावी असा अंदाज बांधता येतो. म्हणजे महारांवरील अस्पृश्यता ही सार्वत्रिक होती काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. असे असले तरी गांवकामगार महार तरी का अस्पृश्य मानला जात होता याचे निराकरण होत नाही.
महारांना जन्म-मृत्युच्या नोंदी ठेवणे, जमिनींच्या सीमा आखणे, सारा मुख्य ठाण्याला पोहोचवणे ई. कामे करावी लागत असल्याने त्यांनी साक्षर असणे क्रमप्राप्त होते. चोखा व त्याचा परिवार अभंग रचून लिहित होता ते त्यामुळेच असे म्हणायला प्रत्यवाय नाही. चोखा व त्याचा परिवार मात्र अस्पृश्य मानला गेला. संतत्वाला जाऊनही अस्पृश्याचा विटाळ तर गेला नाहीच पण गांवगाड्याचा भारही गेला नाही. हे वैष्णव संप्रदायाचे, म्हणजेच वारकरी परंपरेचे सर्वात मोठे अपयश आहे. विषमतामूलक तत्वज्ञानालाच कवटाळून बसल्याने चोखामेळ्यांना या अस्पृश्यतेची खंत असली तरी ती विद्रोहात बदलणे शक्य नव्हते. ही एक शोकांतिका आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
वेठ म्हणजे सरकारी कामे प्रजेकडून मोफत वा अत्यल्प मोबदल्यात करून घेणे. मंगळवेढ्याच्या वेशीचे काम वेठीवर करत असतांना भिंत कोसळून चोख्याला मरण आले. विषमतेच्या काळोखातून विषमतेच्या काळोखात चोखा विलीन झाला. दुर्दैवाने वारकरी चळवळ त्या अंधारातून बाहेर पडली असे आजही म्हणता येणार नाही! विसोबा मात्र समतेचेच तत्वज्ञान जगले, अगदी शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले तरी त्यांना कोणी अडवू शकले नाही. कारण आगमिक धर्म हा नेहमीच समतेचा होता आणि आज समाजाला वारकरी नव्हे तर आगमिक तत्वज्ञानाची गरज आहे. समतेचा पाया असलेले तत्वज्ञान असल्याखेरीज व्यावहारिक समता येणे शक्य नाही. आज सर्व समाज उच्च-नीचता, जातीय अहंकारांनी भरलेला आहे आणि त्यावर मात करायची तर श्री विठ्ठलाला त्याच्या मूळच्याच शैव स्वरुपात पाहिले पाहिजे. एक स्वतंत्र, प्रगल्भ आणि खुले जग निर्माण करण्याची शक्तकी त्याच ठायी आहे हे भारताने दहाव्या शतकापर्यंत पाहिले आहे. आजही त्याचीच गरज आहे!
■ संजय सोनवणी 98609 91205

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...