Thursday, January 30, 2014

राहूल गांधींची मुलाखत ...



गेल्या दहा वर्षात प्रथमच राहूल गांधींनी अर्णब गोस्वामींना ८० मिनिटांची प्रदिर्घ मुलाखत दिली आणि मोदी भक्तांनी आणि मिडियाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या मंडळींना मोदी करण थापरच्या मुलाखतीतून पळून जावे लागले ह्पोते हे मात्र सोयिस्करपणे विसरले गेले. राहुलला अडचणीत आनणारे प्रश्न वारंवार विचारले जावुनही त्यांनी तसे केले नाही. राजकीय नेता म्हणून राहुल गांधी अजुन गेंड्याच्या कातडीचे झाले नाहीत हे मात्र सिद्ध झाले. (आणि होऊही नये...)

अर्नब जानीवपुर्वक मोदी विरुद्ध राहुल असे द्वंद्व पेटवण्याच्या प्रयत्नांत असतांना रहुलनी फक्त तीन वेळा त्यांचे नांव घेतले. अर्नब पत्रकार आहे व त्यांना टी.आर.पी. हवा आहे हे उघड आहे. परंतु हा संघर्ष राहुल विरुद्ध मोदी हा नसून दोन विचारधारांमधील आहे हे राहुलनी अधोरेखित केले. भाजपची विचारधारा सत्तेच्या केंद्रीकरणाकडे जात असून आपल्याला सत्तेचे विकेंद्रीकरण हवे आहे असे राहूल म्हणाले. किंबहुना हाच खरा आधुनिक भारतासमोरील व लोकशाहीसमोरील कळीचा मुद्दा आहे हे अर्णब यांनी लक्षात घेतले नाही. आम आदमी पक्षाचे यश हा याच जनभावनेचा संदेश आहे हे उघड आहे. भारतीय लोकशाहीला सत्तेचे केंद्रीकरण परवडनारे नाही, हे आपण आणिबाणीच्या काळात अनुभवले आहे.

पुर्वी या बाबत कोन्ग्रेसने काय केले हा खरे तर गैरलागू प्रश्न आहे. पिढ्या बदलतात तसे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचेही विचार कालानुरुप बदलतात. राहूल जर बदलाचे सुतोवाच आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे.

अर्णबनी शिख हत्याकांड आणि गुजरातचा नरसंहार एकाच तराजुत मोजला. शिख हत्याकांड सर्वस्वी वाईटच होते पण ते सरकार प्रायोजित नव्हते आणि कोंग्रेसने शिख समुदायाची त्यासाठी जाहीर माफी मागितली आहे, तसे भाजपने केलेले नाही. गुजरातमधील दंग्यांच्या केसेस अन्य राज्यात चालवाव्या लागल्या एवढी नामुष्की होऊनही ज्यांना त्यांचे समर्थ करावे वाटते त्यांनी खुशाल करावे.

राहुल गांधींचा मुख्य भर महिला व तरुनांचे सबलीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामीण भारताचा व एकुणातीलच देशाचा विकास यावर होता. ते वारंवार तेच सांगत होते. परंतु पत्रकारांना सहसा विकासाबाबत बोलायचे नसते. माहिती अधिकार, पंचायत राज, अन्नसुरक्षा, लोकपाल, रोजगाराचा हक्क इत्यादी जमेच्या बाजू सध्याच्या केंद्र सरकारकडे आहेत. गेल्या दहा वर्षात जेवढ्या राजकारण्यांवर, उच्च-पदस्थ अधिका-यांवर खटले भरले गेले, जेलयात्रा करावी लागली ती तशी तत्पुर्वी झाली होती काय या प्रश्नाचा विचार करण्याचे तारतम्य राहुल अथवा कोंग्रेसच्या टीकाकारांत नाही, हे कशाचे लक्षण आहे?

आज भारत हा जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे आणि नव्या पिढीच्या आकांक्षा साकार व्हायच्या तर राजकारणातील त्यांचा सहभाग वाढणे आवश्यकच आहे. राहुल गांधी त्यासाठीच प्रयत्न करत आले आहेत. कार्यकर्त्यांनीच आपला उमेदवार निवडावा यासाठी त्यांनी १५ लोकसभेच्या जागाही मुकर्रर केलेल्या आहेत. या जागा कमी आहेत याबद्दल कुचेष्टा करतांना इतर पक्षांनी याबाबत काय केले हा प्रश्न नाही काय?

ही बाब मान्य केलीच पाहिजे कि हा दोन विचारधारांमधील संघर्ष आहे...व्यक्तींमधील नाही. व्यक्तिकेंद्रीत राष्ट्रीय राजकारण करण्याचे व राबवण्याचे दिवस संपले आहेत. भाजपाची विचारधारा (जनस्मरण कमी असले तरी) काय आहे हे आणि ती खरोखरच लोकशाही मुल्यांना जपणारी आहे काय या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहित आहे. कोंग्रेस (केवळ पक्ष म्हणून नव्हे) ही एक विचारधारा आहे. या धारेत स्वातंत्र्योत्तर कालात चढ-उतार झाले असतील, आणि आता ती लोकशाहीची मुल्ये जपत नव्या परिवर्तनाला स्वीकारत असेल तर तिचे स्वागत करायला हवे.

राहूल अट्टल राजकारणी नाही आणि हीच त्यांच्या जमेची बाजू आहे. संवेदनशील राजकारणी असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांने सरकारला अनेक निर्णय फिरवायला कोंग्रेसच्या व्यासपीठाचा उपयोग केला याला अनेक लोक "नौटंकी" म्हणून हीणवतात. वस्तुस्थिती अशी आहे कि कोंग्रेसमद्धेच आता जुने नेते आणि राहुलमुळे नव्या पिढीचे नेते अशी दुफळी झालेली आहे. जुन्यांना आपली सत्ताकेंद्रे व त्यामुळेच आलेली मनमानी सोडायची नाहीय. ती सोडायला भाग पाडण्यासाठी राहूल कोंग्रेसच्याच व्यासपीठाचा उपयोग करत असतील आणि त्याचा फायदा आम्हाला-तुम्हालाच होणार असेल तर त्याला हास्यास्पद ठरवणा-यांच्या बुद्धीचा विचार करायला हवा.

अलीकडच्याच चाचण्यांमुळे आज चित्र असे दिसते कि संधीसाधु पक्ष आणि त्यांची काहीही होवो---सत्तेतच रहायचे अशा मनोवृत्तीची नेतृत्वे भाषा बदलू लागली आहेत. अशाच संधीसाधुंमुळे देशाचे वाटोळे झालेले आहे. त्यांना कसे हटवायचे व नवी सत्ता-विकेंद्रित अवस्था कशी आनायची हे नागरिकांसमोरील मोठे आव्हान आहे. पंचायत राजमुळे सत्तेचे वितरण झाले पण ते अधिक सक्षम करायला हवे याबाबत दुमत असायचे कारण नाही. भ्रष्टाचाराची अधिकाधिक प्रकरणे माहितीच्या अधिकारामुळेच उजेडात आलीत. तत्पुर्वी प्रकरणे उजेडात येत नव्हती म्हणून भ्रष्टाचार होत नव्हता असे आहे कि काय? अधिक प्रकरणे उजेडात आली म्हणून ब्रष्टाचार-भ्रष्टाचार ओरडण्यापेक्षा यामुळेच भविष्यातील भ्रष्टाचार नियंत्रणात येईल हे आपण लक्षात घ्यायला हवे.

मी राहूल अथवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. पण विचारधारा महत्वाची आहे. लोकशाही समृद्ध होईल अशाच विचारधारेला समर्थन देणे ही आजच्या उद्रेकी आणि विक्षोभी काळाची गरज आहे.


Saturday, January 18, 2014

काश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष!



१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-मशिदीमधून नारा उठला...पंडितांनी इस्लाम स्विकारावा नाहीतर मरणाला तयार रहावे. (काश्मिर में अगर रेहना हैं...अल्ला हो अकबर कहना हैं! )आणि सुरु झाला एकच आकांत...शेकडो पंडित मारले गेले. काहींना जाहीरपणे फासावर लटकावले गेले. स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि जवळपास साडेतीन लाख काश्मिरी पंडित एकाएकी देशातच शरणार्थी झाले. अब्रु गेली, संपत्ती गेली आणि शरणार्थी छावण्यांत त्यांना आश्रयाला धावावे लागले...जेथे साध्या मुलभूत सुविधाही नव्हत्या!

फारुक अब्दुल्लांनी, मुख्यमंत्री असून सा-या जबाबदा-या धुडकावल्या. जगमोहन नामक राज्यपालाच्या हाती सुव्यवस्थेच्या धुरा गेल्या. पण आकांत थांबायचे नांव घेत नव्हता. हुरियत आणि जम्मु-काश्मिर लिबरेशन फ्रंटने जिहाद पुकारला होता.

आता या घटनेला २४ वर्ष उलटुन गेली आहेत. म्हणजे एक पिढी गेली आहे. काश्मिर टाईम्सचे संपादक ओ. एन. कौल हे माझे मित्र होते. त्यांच्या तोंडून ऐकलेल्या अत्याचाराच्या कहान्या अंगावर काटे उभे करणा-या होत्या. आधी फारुक अब्दुल्ला आणि आता त्यांचे सुपुत्र काश्मिरची धुरा सांभाळत आहेत. पण अजुनही नि:ष्कासित झालेल्या पंडितांचा प्रश्न सुटलेला नाही. देशातच निर्वासित व्हावे लागणे याच्या वेदना कोणी नीट समजावून घेत नाही. हिंदुत्ववाद्यांना (पक्षी वैदिकवाद्यांना) लोकभावना भडकवायचे साधन मिळते यापार त्यांच्या दृष्टीने पंडितांचे अस्तित्व नाही.

त्यांना लगेच गुजरातचा नरसंहार आठवतो. आनंदाच्या उकळ्या फुटतात. पण या सा-यात "माणूस" मेला, बलात्कारीत झाला याची जाण आणि भान राहत नाही. या देशात सर्वांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. नरसंहाराची भूमिका असणा-यांना या व्यवस्थेत स्थान नाही...मग तो कोणीही असो.

काश्मिरी पंडितांच्या ससेहोलपटीबद्दल आमचे भान तसेच न्याय्य असले पाहिजे. आजही २४ वर्ष उलटुनही पंडितांना त्यांच्या भुमीत जायचे साहस होत नाही. त्यांनी जगायचे मार्ग शोधले असले तरी त्यांची त्या भुमीशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्या भुमीतुन हाकलले गेले गेल्याचा शोक-संतप्त उद्गार अत्यंत स्वाभाविक आहे. "काश्मिरी पंडितांखेरीज काश्मिरचे सौंदर्य उणे आहे..." असे काश्मिरचे राज्यकर्ते म्हनत असतात...पण त्यातला प्रामाणिकपना किती यावरही विचार करायला हवा. काही पंडित काश्मिरला परतत आहेत हे खरे आहे...पण त्यांच्या कायमस्वरुपी संरक्षणाचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे!

Thursday, January 16, 2014

आणि म्हणे आमचा विट्ठल...


विट्ठलाचीच जे आण-भाक
त्या चोखा मेळ्याला नि
नामदेवाला बडवणारे बडवे
साने गुरुजींनी दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी
प्राणांतिक सत्याग्रह करुन मंदिर खुले झाल्यावर
श्री विट्ठलाचे प्राण (?) मुर्तीतुन काढुन 
घागरीत भरणारे बडवे
श्री विट्ठलाला 
निरंकार सदाशिवाला
सोवळ्या-ओवळ्यात घालणारे बडवे
विश्वाची अंगाई गाणा-या विट्ठलाला
निजेला पाठवणारे बडवे
अस्पृश्यांचा-शुद्र-अवैदिकांचा बाट लागतो म्हणून
वर्षातून एकदा
ज्याने विश्वाचा कणकण व्यापला
त्या महेश्वराचा
बाट काढणारे बडवे
तीर्थकुंडात मुतनारे बडवे...
...
आणि म्हणे आमचा विट्ठल...

विट्ठल यांच्या बापजाद्यांना कधी समजला तरी होता का?


स्त्रीया आपल्या जबाबदा-यांचे काय करणार?

स्त्रीयांचे प्रश्न गंभीर आहेत हे खरे आहे. बलात्कार, बलात्काराचे प्रयत्न, विनयभंग ई. प्रकार स्त्रीयांविरुद्धचे गंभीर गुन्हे आहेतच. विवाहोत्तर काळात हुंड्यासाठी, मुलगा होत नाही यासाठी व अन्य अनेक कारणांसाठी स्त्रीयांना बळी पडावे लागते....छळले जाते. व्यावसायिक संस्थानांत लिंगभेद पालला जातो, वरिष्ठ स्त्रीयांचा गैरफायदा घेतात असे आरोपही आपंण माध्यमांतुन वाचत असतो...पहात असतो. सरकारने वेळोवेळी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जनभावनांचा उद्रेक लक्षात घेऊन कठोरातिकठोर कायदे केले आहेत हेही आपल्याला माहितच आहे. 

पण येथे प्रश्न असा आहे कि या सर्वच कायद्यांचा सदुपयोग होतो कि दुरुपयोग?

प्रश्न महत्वाचा आहे. जर दुष्प्रवृत्ती पुरुषांत असतील तर स्त्रीया त्यातुन अगदीच मुक्त आहेत असे म्हणणे मानवशास्त्राला धरुन होणार नाही. लैंगिक वासना पुरुषांत आहेत तशा त्या स्त्रीयांतही आहेत. स्वार्थ, हाव, सुडाची भावना इ. स्त्रीयांत नसतात असे कोणीही म्हणू शकणार नाही. त्यामुळेच कायद्यांचा दुरुपयोग स्त्रीया करत नाहीत, करणार नाहीत असे म्हणता येत नाही. नवीन बलात्कार विरोधी कायदा तर अशा दुरुपयोगांना बराच वाव देतो असे म्हनायला प्रत्यवाय नाही. 

कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे, हुंडाबंदी कायद्याचे, ४९८ (अ) चे आजवर मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झालेले आहेत हे एक वास्तव आहे. ओल्याबरोबर सुकेही जळते ही म्हण व्यवहारत: ठीक असली तरी न्यायाच्या दृष्टीने ती योग्य नाही. नव-याबरोबरच ज्यांचा कधी कधी अपराधाशी दुरान्वयानेही संबंध नसतो अशा दीर, भावजयी, ननंद, सासु-सासरे यांनाही आरोपी केले जाते. हे फिर्यादी स्त्री स्वत:च्या मर्जीने करते असे सर्वस्वी नसले तरी कोणाच्या तरी सांगण्यावरुन "धडा" शिकवण्यासाठी सरसकट मोट बांधली जाते असे अनेक केसेसवरुन दिसते. अशा प्रकरणांत दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी जवळ जवळ ३०% गुन्हे हे केवळ छळवादासाठी व सुडबुद्धीने दाखल केलेले असतात असे सर्वोच्च न्यायालयाचेच निरिक्षण आहे. काही गुन्हे तर आपला व्यभिचार लपवण्यासाठीही दाखल केले जात असतात हे आनखी विशेष! 

निर्भया प्रकरणानंतर वाढलेल्या दबावापोटी केंद्र सरकारने नवा बलात्कार विरोधी कायदा संमत केला. या कायद्याने बलात्काराची/लैगिक गुन्ह्यांची व्याख्या अधिकच व्यापक केली आहे. वरकरणी हे चित्र समाधानकारक वाटले तरी प्रत्यक्षात हा "कडक" कायदा झाल्यानंतरही बलात्कारांची संख्या कमी झालेली नाही. उलट या कायद्याची सुरुवातच दुरुपयोगांपासून होतेय कि काय अशी साधार शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुरुषजगतात, प्रकटपणे बोलण्याचे धाडस करणारे अल्प-स्वल्प असले तरी, एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे हे वास्तव अमान्य करता येत नाही. तुटलेली अथवा फसलेली प्रेमप्रकरणे, वरिष्ठांबद्दलचा द्वेष-मतभेद, सहका-यांबाबतचा द्वेष यातून खोटी प्रकरणे नोंदवली जाण्याची शक्यता आहे...काही केसेसमद्ध्ये तसेच घडतही आहे. पण स्त्रीवादाला अंगावर घेण्याची कोणाचीही प्राज्ञा नसल्याने प्रकटपणे तशी साधी शंकाही व्यक्त करण्याची मुभा राहिलेली नाही, कारण जेही काही घडते ते कायद्याप्रमाणेच अशी जनधारणा या कायद्यांमुळेच होते आहे.

आपली न्यायव्यवस्था मुळात अत्यंत ढिसाळ आहे. पोलिस कोणत्याही प्रकरणात गुन्हे दाखल करुन कोणालाही अडकवू शकतात हे एक कटु वास्तव आहे. महिलांच्या तक्रारींना प्राधान्य असल्याने शहानिशा करुन गुन्हे दाखल होण्याची शक्यता नसते. "लैंगिक शोषण" या प्रकाराची कधीही नीट व्याख्या होऊ शकत नाही. त्यात आपल्याकडे गुन्हा दाखल झालाय म्हनजे आरोपी हा गुन्हेगारच असतो असा ठाम विश्वास असल्याने आरोपीची जी आर्थिक/सामाजिक वाताहत लागते त्याबाबत सहानुभुती मिळण्याची शक्यताच नसते. आणि नेमक्या याच भितीपोटी अनेक दुष्प्रवृत्ती ब्यकमेलिंगचा सढळ वापर करु लागतात. स्त्रीयांविरुद्धच्या गुन्ह्यात नेमके असेच अनेकदा घडते हे मी जवळुन पाहिले आहे. 

म्हणजे येथे स्त्री ही शोषक तर पुरुष व त्याचे नातेवाईक शोषित बनून जातात. 

यावर गांभिर्याने समाजालाच विचार करावा लागणार आहे. स्त्री ही अबला असते हे खरे आहे पण ती अबलाच असते असे नाही. मानवी दुष्प्रवृत्ती अपरिहार्यपणे स्त्रीतही असतात. कायद्यांचे संरक्षण वाढवल्याने पुरुषवर्ग बदलु शकत नाही हे ड्यनिश स्त्रीवर झालेल्या ग्यंगरेप केसमधुन सिद्ध झाले आहे. गरज आहे ती समाज मानसिकता बदलायची. मग ती स्त्रीयांचीही का असेना!

बरे, ही बाब अत्यंत गंभीर होते जेंव्हा सामाजिक चळवळीतील स्त्रीयाही कळत-नकळत कायद्यांचा दुरुपयोग करण्याच्या बाजुने असतात. जेंव्हापासून तेजपाल प्रकरण घडले तेंव्हापासून "याचा-त्याचा तेजपाल करुन टाकु" अशा चर्चा स्त्रीवाद्यांतच ऐकायला मिळतात. अगदी काही समाज संघटनांतील स्त्रीयाही असे जेंव्हा बोलू लागतात तेंव्हा त्या तशी कृती करणारच नाहीत असे म्हणता येत नाही. खरे तर अशा स्त्रीया स्त्रीवादाचाच पराभव करत असतात पण प्रत्यक्ष जीवनात मात्र स्त्रीवादाच्या अथवा चळवळीच्या नांवावर स्त्री आहे म्हणुन प्रतिष्ठाही मिळवतांना दिसतात. 

हे समाजचित्र काही सुदृढ मनोवृत्तीचे म्हणता येणार नाही. स्त्रीवरील खरेखुरे अत्याचार जर निंद्य असतील तर कायद्यांचा दुरुपयोग करून पुरुषांची वाताहत करणा-या अथवा तसे प्रयत्न करणा-या स्त्रीयाही तेवढ्याच निंद्य समजल्या जायला हव्यात.

पण "स्त्री-दाक्षिण्य" ही आपली संकल्पना नेमकी अशी आहे जेंव्हा स्त्रीला गरज असते तेंव्हा कधीच कामाला येत नाही पण निंद्य स्त्रीयांच्या बाबतीत तेवढी अवेळी जागृत होते. हा आपला सामाजिक दांभिकपणा म्हनता येईल काय?

स्त्रीयाही अन्यायी असू शकतात हे आपण पुरातन काळापासुन जागतिक इतिहासात पाहु शकतो. वर्तमानात तर सारेच संदर्भ बदलले आहेत. स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य या संकल्पनांमुळे स्त्रीया कधी नव्हे तेवढ्या साहसी व प्रगत झाल्या आहेत. ही बाब अत्यंत महत्वाची असली, स्वागतार्ह असली आणि स्त्रीयांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी अशी आकांक्षा असली तरी दुष्प्रवृत्तींचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो हे मान्य केले पाहिजे. त्याबाबत स्त्रीविरोधी कायदे नाहीत ही आपल्या एकुनातीलच स्त्री-पुरुष समतेच्या मार्गातील त्रुटी नव्हे काय?

समतेचा व्यापक अर्थ येथे संकुचित होत आहे हे एक वास्तव आहे. भयमुक्त समाजाची रचना यात होत नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आज जर स्त्री कर्मचा-यांना नोकरीत प्राधान्य द्यायचे कि नाही हा प्रश्न कार्पोरेट जगाला पडत असेल, किंवा घरात येणारी सून कोणत्याही क्षणी आपल्याला कोठडीत पाठवू शकते ही धास्ती असेल तर भयमुक्त समाज कसा अस्तित्वात येईल? 

पुरुषांचे जग हे सर्वस्वी अन्यायकारी जसे नसते तसे स्त्रीयांचेही नसते हे खरेच आहे. पण बदलत्या सामाजिक परिप्रेक्षात आणि नवनव्या कायदाप्रणालींत दोघांचेही जीवन संकुचित होते ही मोठी समाजशास्त्रीय समस्या आहे. नातेसंबंधांवर अन्य इतर अनेक सामाजिक/बदलत्या सांस्कृतिक कारणांनी गंभीर परिणाम होतच आहेत त्यात न्यायव्यवस्था व तिचा दुरुपयोग करण्याच्या वाढलेल्या संध्या हेही एक कारण बनत आहे याची नोंद अखिल समाजाने घ्यायला पाहिजे. 

Wednesday, January 15, 2014

...तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे?

मानवी सत्य हे भविष्याकडे क्रमाक्रमाने जात असते....कालच्या सत्याचे अनेक तुकडे आज असत्य म्हणुन नव्या सत्याच्या प्रकाशात फेकून द्यावे लागतात. आजच्या परिप्रेक्षात जुन्या काळातील सत्ये आजही सत्य मानणे हे धर्मवाद्यांसाठी ठीक आहे...तत्वज्ञानात त्याला स्थान नाही. मुळात भविष्य ज्याला आपण म्हणतो तो काळ किती आहे...सांत आहे कि अनंत आहे हेच मुळात आपल्याला माहित नाही. आज तो सांतही असु शकेल किंवा अनंतही असु शकेल किंवा त्याच्या वेगळ्या अजुनही अनेक मिती असतील एवढेच आपण म्हणु शकतो...अंतिम सत्य म्हणावे अशी स्थिती असु शकत नाही....कारण ते नेमके काय हेच माहित नाही. मनुष्य हा विश्वाचे जैवरासायनिक उत्पादन आहे. त्याला त्याच्या मर्यादा आहेत. कमी कि जास्त याबाबत फारतर आपण निर्णय घेऊ शकतो. अर्थात तोही व्यक्तीपरत्वे बदलेल हे ओघाने आलेच! 

मृत्यु...जे जीवंत राहतात त्यांच्यासाठी (इतरांचा मृत्यू) अंतिम सत्य असेल कदाचित...नव्हे असतेच...पण जो मरतो त्याच्या दृष्टीने काय? जो इतरांसाठी खरेच मेला त्याचे अस्तित्व खरेच मेले असते असे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? ते आस्तित्व मानवी नसले तरी काहीतरी भौतिक असतेच...भौतिक गोष्टींचा समुच्चय म्हणजे जीवंत प्राणी...त्याचे पुन्हा विखंडन होणे म्हणजे मृत्यु असे आपण मानतो...अथवा म्हणू शकतो...पण ते सत्य असते काय?

....पुन्हा भौतिक गोष्टीही लवकर वा अत्यंत सावकाश बदलतच राहतात....तेंव्हा तेही अंतिम सत्य नाही...

माणुस अनुभव इंद्रियांमुळे घेतो. कोण घेतो? इंद्रिये विशिष्ट संरचनेची व जानण्याची माध्यमे असतात. पण जाणनेही भौतिक असते. कारण जाननारे इंद्रियही भौतिक संरचनेने बनलेले असते. ती संरचना उध्वस्त होणे म्हणजे आपण मृत्यु मानतो. पण संरचनेतील सामील एकुण घटकांचे काय? ते तर मरत नाहीत. फारतर विखंडित होतात आणि स्वतंत्र वाटचाल करु लागतात. ती वाटचालही बदलांशी निगडित असते. कोणाचा काळ प्रदिर्घ तर कोणाचा अल्प...पण मग आपण "काळ" या राशीशी येतो. प्रश्न हा आहे कि अनुभव घेणारा एक बायालोजिकल उत्पादन आहे तर अनुभव घेनारे इंद्रियही बायालोजिकल उत्पादन...म्हणुणच भौतिक नाही काय?

आणि जर सारेच भौतिक असेल तर अविनाशित्वाच्या नियमाप्रमाने ज्याला कायमचा मृत्यू म्हणता येईल तसा मृत्यू कसा अस्तित्वात असेल? काळ सांत असेल तर मग सर्वच गोष्टीना अंत आहे असे म्हनता येईल...आणि तो जर अनंत असेल तर अस्तित्वही अनंत आहे असे म्हनावे लागेल....नाही काय?

तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे?

Saturday, January 11, 2014

कधी कधी...

कधी कधी अभेद्य
पहाडही निराश होतात
हताश होतात
खांदे पाडून संध्याकाळी
उतरत्या उन्हात 
एकाएकी
मूक होऊन जातात
धुकट नेत्रांनी
आपल्याच लोकांनी केलेले 
आपले 
पराभव
निमूटपने पहात राहतात...!

Friday, January 10, 2014

"माझं आभाळ": सर्वांनी वाचावे असे पुस्तक!


सचीन परब या मनमोकळ्या शोधक तरुणाशी माझी प्रत्यक्ष ओळख नंतर झाली....पहिली ओळख त्यांच्या ब्लोगशी. "माझं आभाळ" हा ब्लोग खरंच एका संवेदनशील माणसाच्या अविरत शोधाशी, चिंतनशीलतेशी ओळख करुन देणारा व चिंतन करायला भाग पाडणारा. दोनेक वर्षांपुर्वीची ही गोष्ट असेल तेंव्हा माझा त्यांच्या ब्लोगशी परिचय झाला. काही लेख वाचले आणि त्यांच्या ब्लोगच्या प्रेमातच पदलो. सारे लेख आठवडाभरात वाचुन काढले. वाचकांच्या उत्स्फुर्त वाहवाहीच्या पण चिकित्सक प्रतिक्रियाही वाचल्या. मी त्यांच्या नवीन लेखनासाठी त्यांच्या ब्लोगचा पाठपुरावा करत असे. हा माणूस तसा आळशी असावा हा मी तर्क बांधला कारण बरेच दिवस काहीच नवे येत नसे. पण लिहिण्यासाठी उचंबळून येत नाही तोवर हा माणुस काही लिहित नाही हे लक्षात आले आणि मग मी गुमान नव्या लेखाच्या नोटिफिकेशनची मेलवर वाट पाहू लागलो.

छापील लेखन आणि ब्लोग ही दोन विभिन्न तंत्रे. ब्लोग लिहिणारे असंख्य झालेत ते त्यातील तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे. प्रसारही पटकन होतो असे वाटते यामुळे. पण ते वास्तव नाही. नियमित वाचले जाणारे ब्लोग मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. कारण साधं आहे. फुकट वाचायला मिळतं म्हणून कोणताही ब्लोग वाचावा असे वाचक करत नाही. तो लेखकाची योग्यता एखाद-दुसरा ब्लोग वाचुन ठरवून लेखकाची पत ठरवून टाकतो. सचिन परबांचा ब्लोग मोजक्या नियमीत वाचल्या जाणा-या ब्लोगपैकी एक. त्यातही वैशिष्ट्यपूर्ण.

त्यांच्या सर्व लेखांत विषय वेगळे असले, प्रथमदर्शनी प्रासंगिक वाटले तरी एक आंतरिक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे निखळ मनाने केलेली समाज-समिक्षा. ती अवघड आहे. पुर्वग्रहविरहित लिहिणे आणि प्रश्नाच्या मुळाशी नेणे सहजी होणारे काम नाही. सचिन परबांना हे जमते कारण त्यांचा स्वभावच मुळी नितळ स्वच्छ पाण्याप्रमाणे खरे खरे प्रतिबिंब दाखवणारा आहे. या माणसाला साधे चेह-यावरचे भाव लपवता येत नाही तो लेखनात काय लपवालपवी करू शकणार? हे माझे त्यांच्याबद्दल मत बनले ते पहिल्या भेटीतच! नंतर आम्ही अपरिहार्यपणे मित्र झालो ते झालोच!

ब्लोगचे पुस्तकात रुपांतर होणे हा दुर्मीळ योग. मराठीत कदाचित पहिलाच! मला हे पुस्तक प्रकाशित करावे वाटले ते सचीन परब माझे निकटतम मित्र आहेत म्हणून नव्हे. त्यांच्या लेखनात एक चिरंतनता आहे. माणसाला स्वत:कडे डोळसपणे पहायला लावायची एक विलक्षण शक्ती आहे. नेटवर त्यांचे लाखो वाचक आहेतच पण जो अवाढव्य वाचकवर्ग अजून नेटसाक्षर नाही. अथवा असला तरी छापील वाचल्याखेरीज जीवाचे समाधान होत नाही अशा वाचकांपर्यंत ही विचारसाधना पोहोचावी म्हणून मी हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले.

स्वतंत्र विचारांचे एक मूल्य असते आणि कोणताही समाज नवनव्या विचार-संकल्पनांशी परिचित होत नाही, मोकळ्या आभाळासारखं स्वच्छ व निरामय बनत चिंतन-प्रगल्भ होत नाही तोवर आपल्या समाज बौद्धिक उंचीचा आलेखही गाठू शकत नाही. वाचकांपर्यंत हे मनमोकळं पण चिंतन-प्रगल्भ लेखन पोहोचले पाहिजे या जाणीवेने मी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. एका आधुनिक माध्यमातून झालेले लेखन दुस-या पारंपारिक माध्यमात प्रकाशित करणे यात एक मौजही आहे. भविष्यात सर्वच माध्यमांची एक मजेशीर पण उपयुक्त अशी सरमिसळ होत जाईल याचीही एक नांदी आहे.

वाचक या पुस्तकाला पुष्पच्या अन्य मौलिक प्रकाशनांप्रमाणे उत्तम प्रतिसाद देतील याचा विश्वास आहे. सचीन परबांनी आळस झटकुन जरा लेखनाचा वेगही वाढवावा असा त्यांना माझा "प्रकाशक" आणि एक वाचक म्हणून सल्लाही आहे!

अमर हबीब सरांनी या पुस्तकाला अल्पावधीत अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहून देवून या पुस्तकाच्या महत्तेला उलगडून दाखवले याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे.

-संजय सोनवणी
पुष्प प्रकाशन

पुस्तकाचे वितरकः भारत बुक हाऊस, पुणे फोन 020 32548032/3 मोबाईल 9850784246 

शेतकरी फार शहाणा होता!

एके काळी भारतीय शेतकरी फार शहाणा होता. आपल्याला पुढील मोसमात लागणारे बियाने तोच आलेल्या पीकातून जतन करायचा. प्रत्येक प्रदेशाचे आपापले नैसर्गिक आणि भौगोलिक असे मृत्तिका वैविध्य असते याची जाण त्याला होती. या वैविध्यामुळे येणारे पीक हे भौगोलिक "स्वत्व" घेवून येते हेही त्याला माहित होते. मृत्तिकेचे वैविध्य हे मातीतील विशिष्ट खनिजवितरणाने येते हे भले त्याला माहित नसेल. पण बीजेही मातीची आणि उत्पादनही मातीचे यामुळे पीक हे फक्त "पीक" रहात नसून उपजत वेगळा स्वादिष्टपना हे त्या पीकांचे अंगभूत असे वैशिष्ट्य होते. कृष्णाकाठची वांगी आणि खानदेशी भरिताची वांगी हे पीकवैविध्य उगाच आले नव्हते. मेहरुनची बोरे खाणे हा दुर्मिळ असला तरी वेगळा खाद्यानंद होता. लवंगी मिरची कोल्हापुरची म्हनण्यात जसा आनंद होता तसेच खानदेशी मिरच्यांची चुरचुरी अनुभवण्यात वेगळा आनंद होता. गावरान ज्वारी/बाजरी/नाचणी ते तंभाटे यात वेगळाच स्वामित्वाचा आविर्भाव होता. तेही या शेतातील चांगली कि त्या शेतातील चांगली यावरचा "गावरान" वाद वेगळाच!

एकाच जातीची बोर असली तरी या बांधावरील बोरीची बोरे गोड आणि दुसर्या बांधावरील आंबट...हा प्रकार आधी कळायचा नाही. पण खनीज वितरणातील स्थानिक असमतोल हे त्यामागील कारण हे आता कळते. एका गांवातील माणसे अशी आणि शेजारच्या गांवातील मानसे तशी असे का? या प्रश्नाचे उत्तर आता कळतेय...

पण आता हा भेद संपलाय. कृत्रीम खनिजे पीकांच्या उरावर घालत अनैसर्गिक पीके आम्ही कोठेही घेऊ शकतो! रासायनिक खते असल्याने खनिजांबरोबरच रसायनेही आवडीने गिळतो. पण ती चव कोठे आहे? ते पीकाचे "स्वत्व" कोठे आहे?

अन्नक्रांती करु पाहना-या भारताने नेहरुंच्या काळात त्याचा आरंभ केला खरा...अन्न भरमसाठ वाढले...इतके कि ते गोदामांत सडू लागले...

पण "अन्न" गेले ते गेलेच!

आता त्याची दारु बनवा असे आमचे कृषिमंत्रीच सांगतात. ही वेगळी क्रांती आहे हे मान्य केलेच पाहिजे....

पण आम्ही ज्या अन्नाविषयी खरी क्रांति करायला हवी होती ती केली नाही व निकस खाद्याचे "आधुनिक" प्रवक्ते बनत गेलो याला नेमके कोण जबाबदार यावर आम्हाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे!

Thursday, January 2, 2014

चिरंतन निर्झरिणी....!

तू नेहमीच छमछमतेस... 
तू नेहमीच रिमझिमतेस
तू नेहमीच झिमझिमतेस
खळखळाळतेस जशी
चिरंतन निर्झरिणी
ईश्वराच्या खांद्यांवर
सुरक्षित
निरागस खोडकर
हरिणी जशी...

गडे...
तुझ्या निरागसतेचे
प्रतिबिंब
मी नेहमीच पाहत असतो
माझ्या 
इवल्या हृदयाच्या 
तळ्यात...

स्वप्न जसे.....!

Wednesday, January 1, 2014

सार्थ कि निरर्थ?


"जीवनाचे सार्थक झाले.", "जीवन सार्थकी लावावे" किंवा "जीवन निरर्थक आहे..." अशा स्वरुपाची वाक्ये आपण ऐकत असतो...वापरत असतो. किंबहुना तत्वज्ञानात याबद्दल बराच उहापोह झालेला आहे व त्यांच्या शाखोपशाखाही झालेल्या आहेत. सार्थकता आणि निरर्थकता या केवळ बौद्धिक मनोरंजनासाठी चर्चिल्या जाणा-या बाबी नसून त्यांचा खरेच जीवनाशी संबंध आहे काय हा खरा प्रश्न आहे.

अधिकांश लोक जीवनाला अर्थ देण्यासाठी धडपडत असतात. निरर्थवादी लोक जीवनात ठाम असा अर्थ असण्याचे नाकारत असतात. किंवा "अर्थ आहेही आणि नाहीही" अशी भूमिकाही काही घेतांना आढळतात. "अर्थ" ही एक भावनात्मक संज्ञा आहे. अर्थ म्हणजे जीवनाचे जे काही आकलन झाले आहे वा करावयाचे आहे त्यातून निर्माण होना-या सकारात्मक अथवा नकारात्मक निचोडी भावनेला "सार्थ" अथवा "निरर्थ" असे म्हणता येईल. एका बाजुने ही भावना उपयुक्ततावादाकडे झुकल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही अर्थ काढण्याचा हव्यासच मुळात का असतो या प्रश्नाचे उत्तर, कारण त्यामुळे मानसिक समाधान मिळते असे वरकरणी मिळेल. उदा. आपण मैत्रीतून, प्रेमसंबंधातून ते दैनंदिन व्यावसायिक कार्यांतुन ते धार्मिक-आध्यात्मिक कार्यांतून निर्माण होणा-या मानसिक समाधान अथवा असमाधान याच्या एकुणातील गोळाबेरजेला अनुलक्षून सार्थ अथवा निरर्थ अशी संज्ञा देतो. या संज्ञा तात्कालिकही असू शकतात तशाच जीवनाच्या गतकालातील एकुणातील अनुभवांवरही अवलंबुन असतात असेही आपल्या लक्षात येईल.

जीवनाला अर्थ असतो वा नसतो असे त्रयस्थ चिंतकाने सांगणे व तशा बाह्य तत्वज्ञानांच्या आधारे आपापली सार्थकता ठरवणे ही एक सर्वसाधारण बाब झाली. समजा ती व्यक्तीपरत्वे स्वतंत्र शोधातून आलेली भावना असे म्हटले तरीही सार्थकतेला अथवा निरर्थकतेला "स्वतंत्र" असे आस्तित्व आहे काय?

ज्या बाबींमुळे ही भावना निर्माण होते त्याच मुळी परजीवी असतात व त्यावर कोनाचेही पुरेपूर व्यक्तिगत नियंत्रण नसते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व्यवस्था या समूहनिर्मित असतात. परस्पर व्यक्तिघटकांच्या आपापसातील अनंत व्यवहारांतून, विचारांतून समाज नांवाचा एक अवाढव्य पण अजागळ प्राणी निर्माण होत असतो. प्राण्यअला जसे असंख्य अवयव असतात त्याप्रमाणे या अजागळ समाजघटकांतही वेगवेगळ्या विचारधारांचे, आर्थिक व सामाजिक स्तरांचे विविध अवयव असतात. ते परस्परावलंबी असले तरी त्यांचे वेगळेपण असतेच. हे अवयव परस्परांशी कधी सुसंबब्ध तर कधी कलहशील असतात. अशा समाजाय समजा क्ष बिंदुवर असलेला माणुस व त्याचे भान आणि य ठिकाणी उभ्या असलेला माणुस व त्याचे भान वेगळे असनार हे नक्कीच. अशा परिस्थितीत ज्या गोष्टी "क्ष"ला सार्थ वाटतील त्याच गोष्टी "य" ला सार्थ वाटतील असे नाही.

म्हनजे सार्थकतेचे व निरर्थकतेचे भान हे सापेक्ष आहे व ते ठरवणारी परिस्थिती "क्ष" अथवा "य" च्याही हातात नाही. असे असले तरी आहे त्या परिस्थितीला घडवण्यात त्याचा दुरान्वयाने का होईना वाटा आहेच. या दुरान्वयाच्या वाट्याचे भान त्याला असेलच असे नाही. पण तो एकुणातील परिस्थितीचा कोनत्या ना कोणत्या अर्थाने भागीदार असतोच.

शिवाय काय सार्थ आणि काय निरर्थ हे तो कसे ठरवतो?

येथे हे समजावून घेतले पाहिजे कि मुळात सार्थता मुळात अस्तित्वात नसते त्यामुळे निरर्थकताही अस्तित्वात नसते, तर ही एक कृत्रीम भावनिक संकल्पना आहे. "मी काय केले अथवा मी काय साध्य केले तर माझे जीवन सार्थ होइल?" असा प्रश्न जेंव्हा येतो तेंव्हा व्यक्ती बाह्य संस्कारांतून येणा-या वैचारिक/भावनिक मापदंडाशी आपल्या व्यक्तिगत सार्थकतेच्या भावनेशी जोडत असतो असे आपल्या लक्षात येईल. व्यक्ती बाह्य संस्कारांना आपले स्वाभाविक वैचारिक मापदंड जोडनार नाही असे नाही, पण मुळात सार्थकता अस्तित्वात असते काय?

यच्चयावत विश्वातील घटनांतून माणुस अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अर्थाने विश्वात अगणित अर्थ भरलेले आहेत. पण वैश्विक घटनेत अर्थ शोधला तर मानवासाठी तो उपयुक्ततावाद असला तरी मुळात घटनांत अर्थ आहे असे मानले तर प्रत्येक घटनेत हेतुबद्धता असल्याचा आभास तयार होईल. अर्थ घटनांत नसतो तर माणुस अर्थ देतो वा द्यायचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या सापेक्षतेतून घटनांना अर्थ येईल...पुन्हा व्यक्तिपरत्वे काढलेला अर्थही वेगळा असेल!

सामाजिक जीवनपद्धती, विचारसरणी, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था ही सातत्याने बदलत असते. या बाह्य परिस्थित्या जसजशा बदलतात तसतसे जीवनमुल्यांमद्धे, जीवनादर्शांमद्धे व जीवनधेयांमधेही बदल घडत जातो. म्हणजेच सार्थतेचे मापदंदही बदलत जातात असे आपण मानवी समाजशास्त्रीय इतिहासाकडे थोडी जरी नजर टाकली तरी लक्षात येईल. उदा. भारतात जागतिकीकरण येण्यापुर्वी एकंदरीत असलेली सार्थतेची कल्पना आणि आताची कल्पना यात महदंतर पडल्याचे लक्षात येईल.

जीवनातील सार्थकता स्थायी नाही म्हणून निरर्थकताही स्थायी नाही. ती केवळ बाह्य मापदंडांनी बदलत असलेली मानवी "भावना" आहे. प्रत्यक्षात जीवन सार्थही नाही कि निरर्थही नाही.  

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...