Thursday, November 28, 2013

प्रकाशासाठी....!

माझ्यासमोर खडा 
भरभक्कम
अंधाराचा सरळसोट
पहाड
चारी बाजुंनी होणारे त्याचे
ओंगळ स्पर्श
बेभान विचकट 
हसणारी
उपेक्षांची वादळे
कधीही रसातळाला 
पाठवू शकतील मला
अशी
पण मी प्रयत्न करतोय
चढायचा
तो अंधाराचा
भिषण कडा
हात चेमटत असले तरी
पाय सोलवटत असले तरी
ठेवून जातो शरीरातील
वाहता
रक्तमय प्रकाश
माझ्यासारख्या वेड्यांना
मी पोहोचलो तरी होतो
कुठवर हे समजण्यासाठी...!

कोसळलो जरी मी मधेच
खाईत अंधाराच्या
माझे प्रकाशमय रक्त
खुणावत राहील
अंधारकड्यापारच्या
प्रकाशाला
स्वच्छ आणि तेजोमय
पण
जोवर थकून कोसळत नाही मी
चढत राहिलेच पाहिजे...
कासाविस वेदनांना
अंधारात लपवलेच पाहिजे...

प्रकाशासाठी....!

वडार समाजाचा इतिहास



वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नांवे मिळालेली दिसतात. उदा. महाराश्ट्रात वडार म्हणत असले तर कर्नाटकात त्यांनाच वड्डर म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला वड्डोल्लु वा ओड्डर असे म्हटले जाते तर तमिळनाडूत ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणुन ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यात त्यांना ओड अथवा ओडिया म्हणून ओळखले जाते.

मूळ व मूळस्थान:

आजवर जे लिखित संदर्भ सापडलेले आहेत त्यावरून ओडिसा हे वडारी समाजाचे मुलस्थान आहे असे विविध संशोधकांनी सिद्ध केले आहे.  १८७१ सालच्या जनगणणेच्या अहवालात "देशाच्या विविध भागात सापडणारे वड्डा(र) हे मुळचे ओडिसा व आंध्र प्रांतातील आहेत." असे नमूद करुन व्यवसायानिमित्त ते इतरत्र पांगले असे नोंदले आहे. "वड्डा" या शब्दाचा शब्दश: अर्थ होतो "ओड्र देशाचा. म्हणजे ओडिसाचा" असे १९०९ मद्धे थर्स्टनने नोंदवले आहे. ओड शब्दातुनच ओडिया, ओड्ड, वोडे, वडार, वड्डर, ओटन, वोड्डे ई. हे शब्द प्रांतनिहाय प्रचलित झाले.  ओडिया लोक राजपुतानामार्गे पंजाबमद्धे विस्थापित झाले असे हयवदन राव यांनी पुराव्यांनी दाखवून दिले आहे. (१९२७) हे झाले इंग्रजकाळातील वडार समाजाबाबतचे संशोधन.

आपण अजून मागे गेल्यास "ओड" "आंध्र" ही नांवे औंड्र या पुरातन मानववंशापासुन आली आहेत असे दिसून येते. औंड्र हा भारतातील एक पुरातन मानवगण आहे. या गणाचे वास्तव्य प्राचीन काळापासुन ओडिसा, आंध्र व काही प्रमाणात महाराष्ट्र हे राहिले आहे. ऐतरेय ब्राह्मणानुसार हे विश्वामित्राचे पुत्र होते व त्याने "शूद्र व्हाल व दक्षीणेत राज्ये वसवाल" असा शाप दिला होता. महाभारतानुसार औंड्र, पुंड्र हे बळीराजाचे पूत्र होते. त्यांनी स्थापन केलेली राज्ये त्यांच्या नांवावरुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील साडेचारशे वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन घराणेही औंड्र उर्फ आंध्र जातीचे होते.

थोडक्यात ओड उर्फ वड्डर, ओडर, वडार यांचे मुळ औंड्र या अतिप्राचीन मानवगणात जाते. ती ओळख व नांवाची खुण वडार समाजाने जतन करुन ठेवली आहे.

महाभारत व ऐतरेय ब्राह्मणातील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी हा एक पुरातन मानवगण होता याबाबत शंका राहत नाही. आजचे वडार हे याच मानवगणाचे अंश होत असे म्हनणे वावगे होत नाही. औंड्र/पुंड्र हे मानवगण शिवभक्त होते त्यामुळेच कि काय आंढ्र-ओडिसामद्धे आजही विपूल प्रमाणात पुरातन शिवमंदिरे आढळतात.

मुळ व्यवसाय:

वडारांच्या व्यवसायाचे मूळ शोधायला गेलो तर आपल्याला लाखो वर्ष मागे जावे लागते. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली, त्यातील एक म्हणजे पाषाणयुग अथवा अश्मयुग होय. आदीमानवाने पाषाणांपासुन विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली तेथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून हातकु-हाड, तासण्या, पाटे-वरवंटे ई. बनु लागले तर गारगोट्यांपासुन बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. हे काम कष्टाचे असणार यात शंका नाही. जेथे उत्तम प्रतीचा दगड मिळत असे तेथे अशी हत्यारे व अन्य मानवोपयोगी वस्तु बनवण्याचे लघुत्तम कारखानेच सापडले आहेत. महाराष्ट्रात धुळे, नेवासे, बोरी, चिरकी येथे अशी हत्यारनिर्मिती केंद्रे उत्खननांत सापडली आहेत. याचा अर्थ असा होतो कि पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तु बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. किंबहुना याला आद्य व्यवसाय म्हणता येईल.

पुढे शेतीचा शोध लागला. माणुस स्थिर झाला. घरे बांधु लागला. उत्तरेत गाळाच्या मातीचे प्रमाण जास्त असल्याने घरबांधणीसाठी दगडाऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या वीटांचा तर काही ठिकाणी लाकडाचा उपयोग होऊ लागला. सिंधू संस्कृतीतील सर्व घरे आपल्याला वीटांत बांधलेली दिसतात तर दगडाचा उपयोग फारच कमी व मर्यादित दिसतो. मात्र दक्षीणेत वेगळी स्थिती होती. दक्खनचे पठार व सह्याद्री बेसाल्ट जातीच्या पाषाणाच्या विपूलतेसाठी प्रसिद्ध आहे. पाषाणकार्यात तरबेज लोक दक्षीणेतच अधिक प्रमाणात विकसीत होणे स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वसत्या दक्खनेत त्यामुळेच बनल्या असाव्यात.

जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. याचा शोध इसपू १००० च्या आसपास लागला. नेवासे येथे असे पुरातन जाते मिळुन आले आहे. पाटा-वरवंट्यावर धान्य बारीक करण्याऐवजी लोक जात्यांचा वापर करु लागले. वडार समाजातील एक शाखा त्यात प्राविण्य मिळवून एक पोटजात बनली.

वडार समाज हा मुळचा पाथरवट समाज. पत्थरांशी नाळ जोडलेला. घरे-नगर-किल्ले यांची बांधकामे ते लेण्यांची रचना-खोदकाम यात निष्णात. महाराष्ट्रात आजवर हजारापेक्षा अधिक लेणी सापडलेली आहेत. सातवाहन काळात लेणी खोदण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. बौद्ध-शैव-जैन लेण्यांची समृद्धता पाहून आजही चकित व्हायला होते. खडकाच्या अखंडतेचे अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे हे आजही सोपे काम नाही. त्यावेळीस मर्यादित साधनांच्या मदतीने असे शिक्ल्पवैभव निर्माण केले गेले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्याने.

सातवाहन काळात वडारांना सेल वढकी अथवा वढकी असे म्हटले जात असे.अनेक शिलालेखांत ही नांवे पाथरवटाचा पर्यायवाची म्हणून हा शब्द आला आहे. किल्ल्यांची रचनाही याच काळात सुरु झाली. त्यासाठी लागणारे पत्थर घडवणे, गवंड्यांच्या मदतीने त्यांची रचना करत अभेद्य असे बुरुज व तटबंद्या निर्माण करणे या कामात मध्ययुगापर्यंत हा समाज अग्रेसर होता.

कामाचे स्वरूप असे असल्याने हा समाज साहजिकच एक काम संपले कि दुस-या कामासाठी दुसरीकडे विस्थापित होत होता. भटकेपण या समाजाला चिकटले ते या समाजाची अपरिहार्यता म्हणुन. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या त्या कामात प्राविण्य मिळवणा-यांच्या पोटजाती बनु लागल्या. मण्ण अथवा माती वडार हे मृत्तिकाकार्यात कुशल. गाडीवडार हे दगडाची खाण करुन दगड वाहण्यात तसेच विहिरी-तळी खोदणारे, पाथरवट हे लेणी-मंदिरे ई. कामांत कुशल. कल्ल वडार हे जाती, पाटे, वरवंटे यात कुशल.

मुळात या व्यवसायात जितके कौशल्य हवे असते तितकेच ते काम कष्टाचेही. मोठमोठे पाषाणखंड तोडुन चिरे घडवणे ते दगडी वस्तु बनवण्यासाठी शारीरिक शक्तीचीही तेवढीच आवश्यकता. त्यामुळेच कि काय महाबली बजरंग या समाजाचे आराध्य न बनता तरच नवल. या समाजात स्त्रीयांनाही बरोबरीचे स्थान. स्त्रीया पुरुषांइतकीच कष्टाची कामे करत असत.

या समाजाने आजवर निर्माण झालेल्या महाकाय वास्तू, लेणी, किल्ले, वाडे, सामान्य घरे ते रस्ते, तळी, विहीरींच्या निर्मितीचे काम केले आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे, अत्यंत मोलाचा आहे...किंबहुना आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो तो याच समाजाने बांधकाम केलेल्या वास्तुंच्या अवशेषांतुन. त्यांचे कौशल्य किती उच्च दर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी ठायी मिळतात. दुर्दैवाने ज्या राजांनी अथवा धनिकांनी बांधकामे करवून घेतली त्यांच्या नोंदी मिळत असल्या तरी वडा-यांबाबतच्या नोंदी मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाही. निर्माणकर्त्यांची नांवे सहसा कोठेही मिळत नाहीत. पण काहीही असले तरी समाजसंस्कृती घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा होता हे नाकारता येत नाही.

पुराकथा:

भारतातील प्रत्येक समाजाचा स्वत:चा असा पुरा-इतिहास आहे व तो त्यांनी पुराकथांतून जपला आहे. आपापल्या व्यवसायाचा-सामाजिक स्थितीचा, सामाजिक अवस्थेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत कधीतरी या पुराकथा निर्माण झाल्या. वडार समाजही त्याला अपवाद नाही.
वडार समाजातही अनेक पुराकथा आहेत.येथे आपण काही मोजक्या पुराकथांचा मागोवा घेऊ.

१. शिव-पार्वती एकदा भूलोकी संचार करायला आले. नेमका तेंव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उष्म्यामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घर्मबिंदूंतून कुदळ-फावड्यासहित एक माणुस निर्माण केला. पार्वतीच्या घर्मबिंदूंतून एक स्त्री घमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिव-पार्वतीने विहिर खोदायला सांगितली. जोडप्याने काही वेळात विहिर खोदली. विहिरीतील पाणी पिउन शिव-पार्वती तृप्त झाले. त्यानंतर शिव-पार्वतीने जोडप्याला अमूल्य उपहार दिले. पण जोडपे खूष झाले नाही. यावर शिव संतप्त झाला व त्याने शाप दिला कि "तुम्हाला पोट भरण्यासाठी घामच गाळावा लागेल..."

आपले काम कष्टाचे आहे या जाणीवेतून ही शापकथा कधीतरी निर्माण केली गेली हे उघड आहे. पण त्याच वेळीस आपली निर्मिती शिव-पार्वतीपासून झाली आहे हा शैव असण्याचा अभिमानही त्यातून जपला गेला आहे.

२. प्रचंड दुष्काळ पडल्याने भगिरथाचे भाऊ पाण्याच्या शोधात पृथ्वी खोदू लागले. खोदत खोदत ते पार पाताळापर्यंत जाउन पोचले. तेथे एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते...पण या खोदाईने त्यांची समाधी भंग पावली त्यामुळे ते संतप्त झाले. मुनीने त्यांना केवल कृद्ध नजरेने जाळुन टाकले. व "तुमचे वंशज खोदकामच करत राहतील..." असा शाप दिला. इकडे आपले भाऊ दिसत नाहीत म्हटल्यावर भगिरथ त्यांना शोधत पाताळात येऊन पोहोचला. आपले भाऊ जळून खाक झालेले आहेत हे पाहून तो दुक्खी झाला व मुनीची करुणा भाकली. मुनी म्हनाला, "जर तू गंगा पाताळात आणली तर गंगेच्या स्पर्शाने तुझे भाऊ जीवंत होतील." भगिरथाने पुढे गंगा पृथ्वीवर आणली व त्याचे भाऊ जीवंत झाले. हेच आपले पुर्वज होत असे ही पुराकथा सूचित करते.

३. रासमाल या ग्रंथात वडारांसंबंधी एक कथा येते. गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्त्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रीयांपैकी जस्मा या सुंदर स्त्रीवर सिद्धराजाचे मन गेले. पण ती त्याला वश होईना. एकदा कामातूर सिद्धराज तिला महालात नेण्याचा हट्ट करू लागल्यावर जस्मा पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला व आदवे यणा-या वडारांनअ ठार मारले. मग जस्माने आत्महत्या केली. मरतांना तिने सिद्धराजाला शाप दिला कि, "तुझ्या तलावात कधीही पाणी साठनार नाही." आणि वडारांना ती म्हणाली कि, "यापुढे वडारांत सुंदर स्त्रीया निपजनार नाहीत."

वडार स्त्रीया मुळातच पुरुषांइतकीच कष्टाची कामे  उन्हातान्हात करत आल्या असल्याने तसेही सुखवस्तू नागरस्त्रीयांत असणारा नाजूकपणा त्यांच्यात असणे अशक्यच होते. मानवी मन हे अत्यंत गहन आहे आणि ते आपल्या वास्तवाचे कारण शापकथांत-पुराकथांत शोधत असते आणि मनाची समजूत काढून घेत असते. सर्वच मानवी समुदायांनी अशाच पद्धतीने पुराकथांची निर्मिती केली आहे हे आपल्या लक्षात येईल.

अवनतीचा कालखंड

मध्ययुगात, विशेषत: बाराव्या शतकानंतर, वेठबिगारीची प्रथा सुरु झाली. वेठ म्हणजे राजसत्तांनी फुकटपणे निर्मानकर्त्यांना आपली कामे करण्यासाठी जवळपास फुकटात राबवून घेणे होय. एक शिवराय आणि संभाजीराजांचा काळ सोडला तर ही प्रथा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत सुरु होती. यामुळे वडा-यांपासून ते चांभार, लोहार, मातंग ई. निर्माणकर्ते समाजघटक पुरते नागवले जायला सुरुवात झाली. म्हणजे कौशल्यांत कमी पडायचे तर नाही पण मोबदला काहीच नाही. यामुळे इतर समाजांप्रमाणेच वडार समाजावर औदासिन्य न येते तरच नवल. त्यात आधी व्हायची तशी भव्य कामे होईना झाली कारण राजकीय अस्थिरता. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकत आणि दुस-या सहस्त्रकात हा खूप मोठा फरक दिसून येतो. शिवाय मुस्लिम राजवटीत तर आपण बांधून घेतलेल्या वास्तूसारख्या दुस-या वास्तू पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून निर्माणकर्त्यांचे हात तोडने ते ठार मारणे असे उद्योग करत. हे आपण ताजमहालाच्या बाबतीतील दंतकथांत पाहु शकतो. याची परिणती कौशल्ये विकसीत करणे सोडा, आहे ती कौशल्येही मागे सारली जाऊ लागली. वडार समाजही त्यात मागे राहिला नाही.

पुढे आले इंग्रजांचे राज्य. ही एक वेगळीच आफत ठरली. त्यांनी अनेक क्षेत्रंत आधुनिक तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली. परंपरागत कौशल्ये मागे पडू लागली. त्यांचे वास्तुरचना शास्त्र आल्याने वडा-यांचा रोल फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणने एवढ्यापुरताच मर्यादित झाला. उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित कारण दगडाचे असल्याने त्यांचे आयुष्य मोठे...फारतर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी भटकंती. रेल्वे-रस्ते-घरे यासाठी दगडफोडी, तळी-विहीरी खोदने एवढेच सामान्य दर्जाचे काम वडा-यांना उरले. पिढ्या-दर-पिढ्या कौशल्ये विस्मरणात गेली. एके काळी भव्य आणि कलात्मक लेणी-किल्ले-वास्तू-मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या उदरात जायला लागल्या.

याची अपरिहार्य परिणती म्हणजे ढासळलेली आर्थिक स्थिती. बकालपणा. यातुनच येणारे वैफल्य. त्यातून या समाजाला उदरभरणासाठी व्यवस्थेचे कायदेही मोडावे लागले. इंग्रज सरकारने सारी जमात गुन्हेगारांच्या यादीत घालून टाकली. दमन करना-या इंग्रजी राजवटीत ते अपरिहार्यच होते. आपण स्थानिक लोकांच्या कला-कौशल्यांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा अंत घदवत आहोत याची जाण परकी सत्तांना येणे शक्यच नव्हते.

आज तरी परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्य आले आहे पण भटक्या समाजांना स्थिर करण्यासाठी आपले सरकारही कृतीहीन आहे. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. प्रचंड इतिहास असलेला हा समाज आज आधुनिक तंत्रज्ञाने आल्याने कोणाच्या खिजगणतीतही नाही. आपल्या आस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करत आहे.  त्याला सुयश लाभो या शुभेच्छा!



Wednesday, November 20, 2013

अंतरीच्या कविता




"अंतरीच्या कविता" हा संजय ऐलवाड यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला पहिला-वहिला कवितासंग्रह. चपराक प्रकाशनाने शानदार समारंभात प्रसिद्ध केलेला. हा संग्रह उल्लेखनीय अशासाठी आहे कि कवीने आपल्या जगण्याचा भवताल अत्यंत उत्कटतेने आपल्या कवितांतून व्यक्त केला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून धडपड करत मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील एकुर्का या छोट्या खेड्यातुन पुणे गाठणारा हा तरुण. व्यसनी वडिलांमुळे घरातील पडझड, आईला होणारी मारहाण, तरीही नेटाने ती ओढत असलेला संसाराचा गाडा इत्यादि दु:खद परिस्थितीने संजयला साहित्याकडे वळवले. आपल्या वेदना कवितेत अभिव्यक्त करत राहिला. कविता ही तशीही मानवाच्या वेदनांचा हुंकार असते. ती वेदनांना मायेची पाखर देते. संजय कवितेत रमत गेला. त्याचे पुस्तक झाले.

संजयच्या भाषेत अर्थातच मराठवाडी गोडवा आहे. "बाप" या कवितेत संजय म्हणतो:

"मह्या मायेच्या डोळ्यात
काहुरांनी काला केला
ओसाडल्या दाही दिशा
बाप बांधावरी मेला"

वेदनांचा पसारा हा असा छळत असतांना माणुसकीचे, भवतालाच्या वेदनांचे भानही संजयला सुटत नाही. "कायदा" या कवितेत संजय म्हणतो:

"घुमटावरच्या पारव्याने
गाभारातल्या देवाला प्रश्न केला
का नाही कायदा आम्हासाठी?
नाही तर आम्हीही केली असती फिर्याद
काळजात बाण मारुन जीव घेणा-या पारध्यावर..."

तर "अस्तित्व" या कवितेत संजय म्हणतो:

"...आणि याच समाजात
कोलमडुन पडणारे वृक्ष
दिसतात पावलोपावली
सुकलेल्या झाडाचं जीवन असं
कधी दारिद्र्य तर कधी गरीबी..."

आज शिक्षणामुळे आजवर मूक राहिलेल्या समाजांतील तरुणांना अभिव्यक्त व्हावेसे वाटत आहे. कविता, नाटक, कथा, कादंब-या यातुन ते आपले हृद्गत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, कोणत्याही प्रस्थापित कवीच्या प्रभावाखाली न येता, स्वत:ची शैली बनवत व्यक्त करु लागले आहेत. आपल्या व्यवस्थेत सर्वांना व्यासपीठ मात्र मिळत नाही हे दुर्दैव. अनेकजण लेखन मधेच सोडुन देतात ते प्रकाशकांच्या अभावामुळे. शहरी प्रकाशक शक्यतो प्रसिद्ध लेखकांनाच प्राधान्य देतात...आणि प्रसिद्ध व्हायला आधी प्रकाशक नको का? एकंदरीत आपला साहित्यव्यवहार संकुचित आहे. सामाजिक जाणीवांचे भान असणारे प्रकाशक फारच म्हणजे फारच कमी आहेत. चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील अशाच दुर्मीळ प्रकाशकांपैकी एक. त्यांनी हा संग्रह प्रकाशित करून उद्या भवतालातून बाहेर पडुन वैश्विकतेचा प्रवास करु शकेल अशा कवीला प्रकाशात आणले आहे.

रसिकांनी संजयचा हा कवितासंग्रह अवश्य वाचावा...व एका संवेदनशील कवीच्या भवतालाच्या वेदना व आशांचा पट अनुभवावा!

अंतरीच्या कविता
संजय ऐलवाड
चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य: रु. ५०/-

Saturday, November 16, 2013

मी नवा धर्म स्थापन केला होता त्याची गोष्ट!



धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!

(अगणित धर्म कालौघात अशाच ठार वेड्यांनी स्थापन केले. काही टिकले...अगणित अदृष्य झाले तर काही स्मृतीशेष आहेत. पण धर्म जर चिरंतन असेल तर अनेक धर्म मुळात नष्टच का होतात? नवीन धर्म स्थापनच का होतात? धर्माचे नष्ट होणे नियत असेल तर शाश्वत धर्म असुच कसा शकतो? कि शाश्वत नसणे हेच धर्माचे मुलतत्व आहे? प्रश्न अगणित आहे कारण मीही तो येडचापपणा तथाकथित नकळत्या वयात केला होता. मी त्यालाच चिकटून नंतर जरा "हुशारीने" चमत्कारांचे वलय दिले असते तर काय सांगावे, आज तो कदाचित दखलपात्र धर्म झाला असता. पण ही हुशारी मानवविध्वंसक असते. धर्म बदनाम व त्याज्ज्य बनतात ते त्यामुळेच. मी तसा हुशार नव्हतो हे किती बरे झाले!

मी स्थापन केलेल्या धर्माची कथा अशीच बोधक आहे. अवश्य वाचा.)


मी नवा धर्म स्थापन केला तेंव्हा मी नववीत होतो. माझ्या धर्माचे नांव होते "जीवन धर्म". येथे जीवन हा शब्द "पाणी" या अर्थाने आहे. या धर्माला एकूण नऊ अनुयायी मिळाले. त्यात माझ्या वयाचे (१४-१५) पाच तर बाकी बाप्प्ये होते.

त्याचं असं झालं. मी तेंव्हा वरुडे (ता. शिरुर) या गांवात राहत होतो. माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने तशी आम्हाला बरीच गांवे बदलावी लागली पण या गांवात मात्र आमचा मुक्काम प्रदिर्घ काळ (५-६) वर्ष होता. वरुड्यात चवथीपर्यंतच शाळा असल्याने पाचवीसाठी मी चिंचोलीच्या शाळेत जात होतो. तेथे सातवीपर्यंतची शाळा होती. रोज पायी जाणे-येणे व्हायचे. तसा पावसाळा मला पहिल्यापासुनच प्रिय. पावसाळ्यात माझा चालीव प्रवास फार मजेशीर असायचा...आनंदवणारा...सुखावणारा...सर आली कि चिंब भिजायची मजा मी कधी सोडली नाही.

पण त्याच वेळीस पिवळे ठक्क पडलेले गवताळ रानोमाळ हळुहळु ज्या नजाकतीने सरारुन हिरवाई धारण करे ते सावकाश होणारे परिवर्तन मला थक्क करे. पण त्याहून मोठी मौज वेगळीच होती. ती म्हणजे रस्याच्या कडेला खड्डे-चरांत पाण्याची जी डबकी बनायची त्यात हळुहळु चिकट-बुळबुळीत इवल्या करड्या-काळसर रंगाच्या अंड्यांच्या माळा दिसू लागत. मी रोज पाहत असे. ती अंडीही मोठी होतांना. एखाद चुकार दिवशी बेडुक-माशांची इवली पिल्ले आणि शेवाळ त्यांची जागा घेतांना दिसत. साताठ महिने कोरड्या ठक्क पडलेल्या त्या भेगा पडलेल्या भुतळावर हे जीवन कसे फुलते? मला प्रश्न पडायचा. अत्र्थात उत्तर नव्हते आणि मास्तरला विचारले तर तेही सांगत नसत.

सहावीला शाळेसाठी मी गणेगांवचा रस्ता धरला. गांवातील बरीचशी मुले गणेगांवलाच जात असत म्हणून! या मार्गावरही माझा पावसाळ्यातला एकमेव छंद म्हणजे पावसाळ्यात माळांचे होणारे विस्मित करणारे परिवर्तन आणि काहीच नसलेल्या डबक्यांत उलणारे जीवन. कोठुन येते हे जीवन? कोणी आणली ती अंडी? कोठुन आले ते शेवाळ?

प्रश्न आणि प्रश्नच.

मी वाचायचो खूप. कथा-किर्तनालाही हजेरी लावायचोच. एका बुवाला भीत भीत विचारलं तर तो सांगे "ही सगळी पांडुरंगाची कृपा...तो आहे म्हणून आपण आणि सारी प्राणिजात..." सहावीलाच असतांना मी पहिल्यांदा आणि शेवटचा पंढरपूरला आई-वडिलांसोबत गेलो. चंद्रभागेत लोक एस्टीच्या खिडक्यांतून नाणी फेकत होते. पांडुरंग पाहिला. ही दगडाची मुर्ती काही केल्या जीवनाचा निर्माता असू शकत नाही एवढेच काय ते माझ्या मनाने घेतले.

अशीच सातवीही गेली. आठवीला एक वर्ष पुण्यात पुणे विद्यार्थी गृहात होतो. तेथेही शिक्षकाने पहिल्याच दिवशी :"आज शिकवणार नाही. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा..." असे सांगितले. मी धीर धरुन (खेड्यातून आलो असल्याने माझ्यात प्रचंड न्युनगंड  होता.) "जर पृथ्वी जन्माला आली तेंव्हा उकळत्या रसाचा गोळा होती तर या पृथ्वीवर जीवसृष्टी कशी आली?" सरांनी उत्तर दिले नाही. म्हणाले, हे वर्ष संपल्यावर या प्रश्नाचे उत्तर देईल...! झालं. माझ्या शंकेचं काही कोणी हरण करेना आणि कितीही पुस्तकं वाचनालयातली वाचली तरी उत्तर मिळेना.

पुणे विद्यार्थी गृहाचं एकंदरीत धार्मिक. भारतीय संस्क्रुती आणि हिंदू धर्म किती महान असून तो जगभर कसा पसरला होता या आख्याईका आम्हाला देसाई नांवाचे एक निवृत्त शिक्षक मोकळ्या तासाला येऊन सांगायचे. तात्पुरता प्रभावितही व्हायचो...पण माझा मूळ प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. गणपती अथर्वशिर्ष व गीतेचा सोळावा अध्याय त्यांनीच आमच्या कडुन तोंडपाठ करुन घेतलेला. गणपती अथर्वशिर्षाचा मज गरीबाला झालेला फायदा म्हणजे गणेशोत्सवात अगदी ब्राह्मण घरांतही आम्हा काही मुलांना घेऊन जात. ११ किंवा एकविस वेळा गणपतीसमोर ते म्हटले कि आम्हाला प्रत्येकी एक-दोन रुपयांची दक्षीणा मिळे व केळे किंवा अन्य एखादे फळही मिळे. थोडक्यात चंगळ व्हायची.

धर्माशी माझा दुसरा परिचय येथे झाला. म्हणजे खेड्यात किर्तनकार सांगत तो धर्म आणि येथे कळे तो धर्म वेगळे होते. दोन्हीही हिंदुच हा त्यातला एक भाग. पण विरोधाभासी. (हिंदुत्ववादी हा शब्द मी प्रथम येथे ऐकला.) येथे विनोबांची "गीताई" तोंडपाठ केलेली. "कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये" पासून ते "स्थिरावला समाधीत..." वगैरेंवर प्रवचनेही होत आणि मग माझे चिंतनही. (आठवीतल्या पोराच्या चिंतनाची योग्यता ती काय असनार...पण करत असे हेही खरे.)

परिस्थीतीमुळे माझे पुणे विद्यार्थीगृह सुटले. परत गांवी आलो. नववीला मी कान्हुर (मेसाई) येथे प्रवेश घेतला. वरुड्यावरुन रोज चालत जाऊन-येऊन असे. हे अंतर बरेच....साताठ किलोमिटरचे. माझे जुने निरिक्षण पुन्हा सुरु झाले. आणि एके दिवशी मला वाटले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मी त्या दिवशी दांडी मारली आणि एका डबक्याकाठीच त्यात विहरणा-या इवल्या मासोळ्या पाहत बसुन राहिलो.

पाणी...यालाच जीवनही म्हणतात. कशातच कोठे नसलेले जीवन पाण्यातच अवतरते. माणसाचे शरीरही बव्हंशी पाणीच आहे. इतर प्राण्यांचेही तसेच. म्हणजे पाणी हेच जीवनाचे निर्माते. बाकी सारे देव-बिव झुठ. सारे धर्म झुठ! आकाश आणि पाणी हेच आपले निर्माते. पाणी हाच सर्वांचा धर्म. बस्स ठरले...!

प्रशांत पोखरकर हा माझा पाचवीपासून बनलेला पहिला मित्र व सहाध्यायी. तो चिंचोलीत रहायचा. मी त्याला सायंकाळी घरी गाठले आणि त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता ओढतच पठारावर घेऊन गेलो. त्याच्याच शेताच्या बांधावर बसून मी मला लागलेला "अलौकिक शोध" आणि नव्या धर्माची आवश्यकता यावर त्याला भरभरुन सांगत राहिलो. तो माझा नेहमीचाच नि:सीम श्रोता त्यामुळे त्याने शांतपणे सारे ऐकून घेतले. मग विचारले "आपल्या नव्या धर्माचे नांव काय?"

त्याने "आपल्या" म्हटल्याने मला अपार हुरुप चढला. "जीवन धर्म" मी म्हणालो आणो हेच नांव का हेही त्याला सांगितले. झाले. एका नव्या धर्माची उद्घोषणा झाली आणि पहिला अनुयायाही मिळाला.

आता धर्म म्हटले कि तत्वज्ञान आणि कर्मकांडही आले.

ते आम्ही हायस्कुलला दांड्या मारुन प्राथमिक का होईना तयारही केले, पुढे ते तीन-चार वर्ष विकसीतही होत राहिले.

येथे हे सांगायला हवे कि मला इतर धर्मांची काय माहिती होती? माझे वाचन प्रचंड होते. पंचक्रोशीतील एकही ग्रंथालय मी सोडलेले नव्हते. स्वत:ला "अतिशहाणा" "किंवा "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणता येईल एवढे इतरांच्या तुलनेत माझी माहिती बरीच होती. इतर धर्मांची फार माहिती नसली तरी तोंडओळख नक्कीच होती. मला त्यातला एकही धर्म पटलेला नव्हता. असो.

तर झाले. धर्माचे कर्मकांड म्हणजे...

१. पहिला पाऊस, मग तो कधीही येवो, धर्माच्या अनुयायांनी त्या पावसात साग्रसंगीत नृत्य करायचे आणि पावसाचे थेंब तोंडात घ्यायचे.
२. नदी-ओढ्यातील वाहत्या पाण्याची फुले वाहून पूजा करायची.
३. वाहत्या पाण्याकडे पाहतच पाण्याच्या वाहतेपणाशी तद्रूप व्हायचे...हे ध्यान.
४. वाहत्या अथवा जलाशयातील पाण्याला ओंगळ-अस्वच्छ होऊ द्यायचे नाही.  असे आणि अनेक काही सोपी पण पाण्याशी निगडित कर्मकांडे तयार झाली.

यात मुर्तीपूजा नाही. व्रत-वैकल्ये नाही. सण नाही. आत्मा-मोक्ष काही नाही.

राहिली तत्वज्ञानाची गोष्ट. ते मी नववीतच लिहायला सुरुवात केले. अकरावीपर्यंत ६०-७० परिच्छेदही तयार झाले. प्रत्येक परिच्छेद "लोकहो..." या संबोधनाने सुरु व्हायचा. आठवतात त्यातील एक-दोन देतो...

"लोकहो,
मनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करु नका
कारण मनाला गुलाम करणे
हे मनुष्यत्वाच्या विरुद्ध आहे."

किंवा;

"लोकहो,
शहाणे लोक पाण्याला भजतात
पाण्यापासुनच सर्व प्राण होतात
आणि त्यातच विसर्जित होतात
पाण्याचे पूजन आणि त्याचेच ध्यान
जो करतो
तोच खरा सुखी होतो..."

वगैरे.

दर्म्यान आमचा धर्मप्रसार सुरुच होता. जी कुचेष्टा व्हायची ती आठवता आज हसायला येते. पण तरीही आम्ही नेटाने आमचे धर्मपालन करत होतो. दहावीत आमचे कान्हुरचे तीन अधिक अनुयायी मिळवणुयात आम्ही यशस्वी झालो. दहावी सुटली. पुढचे शिकायला पाबळला. तेथेही हा प्रचार चालुच राहिला. काही विद्यार्थी अनुयायी बनले. गांवात मोठ्या माणसांशीही माझ्या धर्माबद्दल बोलायला मी बिचकत नसे. अनेकांनी माझी अर्थातच कुचेष्टा केली, हाकललेही. पण गांवातअला एक मारवाडीआणि एक पोस्टमास्तर (हा रजनिशांचा कट्टर अनुयायी होता. मी रजनिशांची अनेक पुस्तके यांच्यामुळेच वाचली.) हे बाप्पे माझे पहिले अनुयायी झाले. पोस्टमास्तर झाला याचे कारण म्हणजे माझा युक्तिवाद हा कि रजनिश दुसरे धर्म आणि महात्मे काय सांगतात त्याचेच निरुपन करतो...घडीत बुद्ध तर घडीत कृष्णावर येतो...काय हे? त्यापेक्षा बघा...मी काय सांगतो ते माझे आहे...आणि ही मात्रा लागु पडली. मग तो जीवनधर्माच्याच असलेल्या आणि संभाव्य तत्वज्ञानाबद्दल बोलत असे. असे थोडे वाढत एकुणात आमचे ९ अनुयायी झाले.

बारावीत असतांना मी मराठीत "भारतात नवीन धर्माची आवश्यकता का?" यावर लेख लिहिले पण ते कोणी छापले नाही. शेवटी मी "भारत में अब नये धर्म की जरुरत" आसा हिंदीत लेख लिहिला. अर्थात हा नवा धर्म म्हणजे जीवनधर्मच कि! हा लेख चक्क आज का आनंद या हिंदी पेपरने माझी दिव्य हिंदी दुरुस्त करुन प्रसिद्ध केला. त्याचा विशेष फायदा झाला नाही. पण पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर मला तेथे बातमीदाराची नोकरी मिळाली.

धर्म तोवर संपला होता. धर्मग्रंथही, जो अपूर्ण होता, मागे पडता पडता जीवनातील पडझडींत नाहीसा झाला. आता आठवले कि हसू येते. पण इतरही धर्म कसे निर्माण झाले असतील यामागची प्रक्रियाही समजते. माझा नि:ष्कर्श एकच:

धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!

(वरील माहिती मी संक्षिप्तरित्या माझ्या अजून अपूर्ण असलेल्या "दिवस असेही...दिवस तसेही" या आत्मचरित्रात दिलेली आहे. तो लेखमालिका स्वरुपात किर्लोस्करमद्धे २०१० मद्धे प्रसिद्ध झाला होता.)

(मी जपलेले माझ्या धर्माचे अवशेष मात्र माझ्यात पुरते रुजलेले आहेत. उदा. मी मुर्तीपुजा करत नाही...व्रतवैकल्य कधीच केले नाही. पाऊस आणि पाणी हे माझे पुजेचे नसले तरी अनावर प्रेमाचे विषय आहेत. मृत्युनंतर एका स्टीलच्या सिलेंडरमद्ध्ये माझे  प्रेत घालु, सीलबंद करून ते समुद्रात दूरवर फेकुन द्यावे असे मी मृत्युपत्रात नमूद करून ठेवलेले आहे.) 


Friday, November 15, 2013

मृत्यू ....

मृत्यू हुंदडत असतो
चोही बाजुनं...
जाणवत असतात त्याला आपले
श्वास-नि:श्वास
भ्रमांमधले भ्रम...विभ्रम...
येथून तेथली निरंतर
व्यर्थ जीवघेणी धाव...
धपापत्या उरांचा घेत असतो तो
मोहस्पर्श
अजाणांना
अधिकच अजाणतेत
असतो कसा
रमवत तो!

...खेळच त्याचा असला
हसत असतो...
दशदिशांतून वाकुल्या दाखवुन...
माहित असते त्याला ठाम
कितीही धावले तरी
जाणार कोठे हे
जावून जावून?

Friday, November 8, 2013

जीवन फार सुंदर आहे...!

जीवन फार सुंदर आहे
ते मी करीत असलेल्या
जीवनावरील अथांग प्रेमामुळे
आणि माझ्या भावनांमुळे
माहित आहे मला
मृत्युच्या महाकाशाच्या पार्श्वभुमीवर
हेलकावे घेत असलेला
हा जीवन-बुडबुडा
फुटेल कोणत्याही 
फसव्या क्षणी
अनंतात विसावण्यासाठी
पण तरीही
मी जीवनावर अपार प्रेम करतो...
सर्वांच्याच! 

मी जगत गेलो
त्याचेच गाणे बनत गेले
मी चालत गेलो
महारस्ते बनत गेले
मी वाईटाला वाईट म्हणत गेलो
निर्भयपणे
चांगले ऋतू फुलू लागले...
मी माणुस बनायचा अविरत 
प्रयत्न करत राहिलो
माणुसकीचे मळे सर्वत्र 
डोलतांना दिसू लागले...
...
सर्वांनी 
बनावे असेच
एक दिवस
प्रार्थनेला
उगवत्या सुर्याचे दिवस 
दिसू लागले!

(आणि खात्री आहे मला...
येईल असा एक दिवस
कारण आशा अजरामर आहेत
आणि माणुसकीचे हुंकार 
अजून विझलेले नाहीत!)

Wednesday, November 6, 2013

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?"

Photo: राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ  :  कुणाचा  वैरी  कुणाचा  कैवारी   ह्या  रोखठोक  दिवाळी   अंक   आयोजित  परिसंवादात   रवींद्र  नाट्य  मंदिर ,  मुंबई   येथे  बोलताना  श्री.  संजय  सोनवणी .


वृत्तांत: 

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?" हा परिसंवाद ३१ आक्टोबरला मुंबई येथे "रोखठोक" दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त झाला. यात माझ्यासमवेतच माधव भंडारी, प्रमोद बापट, ज्ञानेश महाराव, प्रा, नम्रता गणेरी यांचा सहभाग होता तर चंद्रकांत वानखेडे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात गणेरी यांनी रा. स्व. वरील महिला सहभागाबद्दलच्या प्रकल्पाच्या निमित्ताने आलेले अनुभव विषद केले व रा. स्व. संघ स्त्रीयांच्या दुय्यमत्वाला प्राधान्य देतो असे नमूद केले. बापट व भंडारी यांनी रा. स्व. संघ वाढत आहे, संघाला समजावुन घ्यायचे तर संघात काही काळ तरी प्रवेश करायला हवा, संघ आदिवासी-वंचित यासाठी अविरत कार्य करतो पण प्रसिद्धीच्या मागे पडत नाही वगैरे विवेचन केले. माझ्या भाषणातील ठळक मुद्दे:

१. रा. स्व. संघ हिंदुत्ववादी नसून "वैदिकवादी" आहे. वैदिकांचा धर्म नेहमीच वेगळा होता व आहे...त्याला अवैदिक हिंदुंचा पाठिंबा मिळु शकत नाही.
२. संघ वाढला याचे कारण मुस्लिम/ख्रिस्त्यांबद्दल निर्माण केलेली काल्पनिक भिती आहे. काल्पनिक शत्रु असल्याखेरीज संघटन होत नाही हे मानसशास्त्र संघाला चांगले माहित आहे.
३. हिटलर हे संघाचे आदर्श राहिले आहे. गोळवलकर गुरुजींचे "विचारधन" संघाचे बायबल आहे. ते हिटलरला आदर्श मानतात. (We, or our Nation defined)
४. पण त्याच वेळीस गंमत म्हणजे संघाला ज्यु सुद्धा प्रिय आहेत कारण त्यांचा मुस्लिमांशी सातत्यपुर्वक चालत असलेला संघर्ष. एकीकडे हिटलरही प्रिय व दुसरीकडे ज्युही प्रिय यात संघाचा वैचारिक व्यभिचार दिसून येतो.
५. आर्य सिद्धांत संघाने सोडला नाही. आता फरक एवढाच केलाय कि आर्य भारतातुन जगभर गेले. आर्य वंशवादातुन हे बाहेर मात्र पडत नाहीत. वैदिक हेच आर्य अशी त्यांची मान्यता असल्याने वेद व संस्कृत हे त्यांचे पंचप्राण आहेत व त्यांच्या दृष्टीने तीच भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे. सरस्वती पुजनाबद्दल ते आग्रही असतात कारण वेद हे सरस्वतीकाठी लिहिले गेले अशी त्यांची मान्यता आहे.
६. सरस्वती नदी नेमकी कुठली याचा अजून तपास लागायचा आहे. वेद हे सनपूर्व आठव्या शतकापार झालेले नाहीत कारण वेदांत झरथुष्ट्रच किमान तीनदा डोकावतो. ॠग्वेदाची मुळ भाषा संस्कृत (वैदिक संस्कृत) असुच शकत नाही कारण प्राकृतातुन संस्कृत कशी क्रमशा: विकसीत झाली याचे भाषिक पुरावे सनपुर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळातील उपलब्ध आहेत. ही भाषाही विकसीत केली ती बौद्धांनी...वैदिकांनी नव्हे. तेंव्हा वेदांची मुळ भाषा ही व्रचदा सिंधी अथवा गांधारी होती एवढेच म्हणता येईल. परंतु भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या खुळातुन या कल्पना गुप्त काळात विकसीत केल्या गेल्या.
७. वैदिकजनांना पुष्यमित्र शृंगाबाबत भलतेच प्रेम असते पण प्रत्यक्ष पुरावे सांगतात कि तो आणि त्याचे वंशज प्राकृताचाच वापर करत होते.... कारण संस्कृत अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे भ्रमित लोकांनी चालवलेले भ्रमसत्र एवढेच संघाचे वर्णण करता येईल.
८. कोणतीही विचारधारा असो...खरी कि खोटी...पण तत्वज्ञान लागतेच. संघाकडे एके काळी गोळवलकर, एकात्म मानवतावाद मांडणारे दिनदयाळ उपाध्याय वगैरे लोक होते. मुखवटा केले गेलेले वाजपेयींनी समाजवादी गांधीवाद मांडला होता. दत्तोपंत ठेंगडी, बिंदुमाधव जोशी वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रांत संघ विचारांना नवे बळ देत होते. परंतु अलीकडे संघाची वैचारिक पातळी खालावली असून "आपण कोठे आहोत?" हे त्यांनाच समजत नाही हे सरसंघचालकांच्याच वक्तव्यांवरुन दिसते.
९. आम्ही संघाचे वैरी नाहीत. किंबहुना म. फुलेंची "एकमय समाज" व बाबासाहेबांची "सामाजिक लोकशाही" संकल्पना आम्हाला कोणाचेही वैरी होऊ देत नाही वा आम्ही कोणालाही वैरी मानत नाही. मनमुक्त विचारस्वातंत्र्याचे आम्ही पुजारी आहोत. शाखा आणि बौद्धिकांमुळे मुक्त विचारक समाज घडू शकत नाही....तर बौद्धिक क्लोन निर्माण होतात. आम्हाला सहप्रवासी हवेत...अनुयायी नकोत.
१०. जे संघ करतो त्याचीच फलस्रुती म्हणजे ब्राह्मणद्वेष्ट्या बामसेफ वा मराठा सेवा संघ यासारख्या संघटना उदयाला येतात. तुमची "समरसता" एक ढोंग आहे. लोकांची अस्मिता जेथे जागी नाही तेथेच घुसणे हे संघाचे सध्याचे कार्य आहे. मंडलोत्तर काळात ओबीसींना आत्मभान यायला सुरुवात झाली. तरी ओबीसी हा संघाचा मुलाधार बनवण्याचा प्रयत्न होतो. ओबीसी कधीच वौइदिक नव्हते त्यामुळे त्यांचे वैदिकीकरण करता येणे या देशात असंभाव्य आहे कारण वास्तव काय...आमचा धर्म काय याचे भान आम्हाला आले आहे.
११. संघाने आपली वैदिकवादी भुमिका बदलावी...नवेच वैश्विक तत्वज्ञान घेऊन पुढे चालावे. पण सध्या तरी संघाचा वैचारिक मृत्यू झाला आहे असेच चित्र आहे.

यानंतर ज्ञानेश महारावांचे भाषण झाले. चंद्रकांत वानखेडे यांने अत्यंत समर्पक शेवट केला. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांनी सातशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश इस्लाममय करता आला नाही...इंग्रजांनी दिड-दोनशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश ख्रिस्तमय करता आला नाही...तेंव्हा इस्लामची भिती दाखवुन संघाने आम्हाला घाबरवायचे कारण नाही.







Saturday, November 2, 2013

सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्रवाद...?


अखंड "हिंदू" राष्ट्र संकल्पनेचे जनक म्हणून वीर सावरकरांकडे पाहिले जाते. सावरकरवाद्यांना याबाबत साहजिकच सावरकरांबद्दल पराकोटीचा आदर असतो. रा. स्व. संघ आजही अखंड हिंदुस्तानचा राग गात असतो. युवा पिढ्यांना हिंदुत्वाचे वेड लावायला ही संकल्पना चांगलीच कामी येत असते. हिंदुत्वाचे वेड म्हणजे मुस्लिम द्वेष हे ओघाने आलेच. आज विशिष्ट समाजघटकांत जी कट्टरता ओसंडून वाहतांना दिसते तिच्या मागे "अखंड हिंदू राष्ट्र" ही संकल्पना प्रबळ असते. तसे नकाशेही हिरिरीने मिरवले जात असतात. असो. येथे आपल्याला सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे नेमके काय स्वप्न होते व ते साकार करण्याची त्यांची नेमकी काय योजना होती हे तपासून पहायचे आहे. 

सर्वप्रथम नमूद केले पाहिजे ते म्हणजे सावरकर आणि रा. स्व. संघाचा तिरंग्याबद्दलचा अनादर. प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्यात हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत." म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात कोंग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले म्हणुन २६ सत्याग्रहींना संस्थाने पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यावर १७ एप्रिल १९४१ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले कि, "म्हैसूर राज्य हिंदू सभेने हिंदू संस्थानिकांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत अहिंदू अथवा वाट चुकलेल्या राष्ट्रवादाचे सोंग आणना-या हिंदुंना विरोध केला पाहिजे." याच वर्षी, म्हणजे २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदूडम (हिंदू जगत) उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"

खरे तर इंग्रजांचे बगलबच्चे असलेले हिंदू (आणि मुस्लिमही) संस्थानिक काही अपवाद वगळता स्वातंत्र्य चळवळीच्या सातत्याने विरोधात होते. आपल्या सर्वाधिकारांना आव्हान देवू शकेल अशी कसलीही चळवळ त्यांना आपल्या संस्थानांत नको होती. परंतू जे संस्थानिक हिंदू होते त्यांच्याबाबत सावरकरांना विशेष ममत्व होते. त्याहीपेक्षा त्यांचा नसर्गिक ओढा हा राजेशाहीकडे झुकणारा होता व किंबहुना त्याच पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. नेपाळची हिंदू राजेशाही त्यांना नेहमीच भुरळ घालणारी व आदर्शवत वाटत असे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ हिंदू संस्थानिकांना हिंदुंचे "शक्तिस्थान" मानीत असत. १९ जुलै १९३८ रोजी सावरकरांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले होते कि "हिंदू संस्थानिकांच्या राज्यातील अंतर्गत कारभारात इंग्रजांनी कसलाही हस्तक्षेप करू नये.संस्थानिकांचे बळ घटेल वा त्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे कृत्य करू नये." 

संस्थानांतर्गत कारभार हा संस्थानिकांच्या मर्जीवर चालत असे. त्यामुळे सामान्य नागरिकांना ब्रिटिश सत्तेखाली असणा-या नागरिकांना जे अधिकार उपलब्ध असत त्यापासून वंचित रहावे लागे. कोंग्रेसने संस्थानांतील नागरिकांना मानवाधिकार व लोकशाही हक्क बहाल केले जावेत यासाठी विविध प्रजा मंडळांमार्फत मोठी चळवळ उभी केली होती. पण २७ एप्रिल १९३९ रोजी सावरकरांनी निवेदन जारी केले कि, "त्रावणकोर, जयपूर, राजकोट आणि अन्य हिंदू संस्थानांच्या कारभारात हस्तक्षेप करुन त्यांना दुर्बल केले जाण्याला हिंदू महासभेचा विरोध आहे. हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकणा-या कसल्याही चळवळींना हिंदू महासभेचा विरोध राहील." थोडक्यात सावरकर हे सर्वसामान्य जनतेच्या हितांपेक्षा हिंदू रजवाड्यांच्या हितांना प्राधान्य देत होते.  

यानंतर १९४० साली भरलेल्या हिंदू महासभेच्या बाविसाव्या सत्रात सावरकर म्हणाले, "हिंदू रजवाड्यांनी हिंदू महासभेच्या कार्यात दाखवलेली रुची उत्साहवर्धक आहे. यातून Pan-Hindu (हिंदू जगत) विचारसरणीला प्रोत्साहन मिळत आहे. हिंदू रजवाड्यांच्या अंगातून आमच्या महान पुर्वजांचे रक्त खेळत आहे. आता त्यांनी आम्हाला फक्त सहानुभुती दाखवू नये तर हिंदू चळवळीचे नेतृत्व करावे." १९४५ साली बडोदा येथे भरलेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातही सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना "हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकतील असल्या कोणत्याही आंदोलनात सहभाग घेवू नये" असे जाहीर आवाहन केले. 

संस्थानांतील अंतर्गत कारभार हा सर्वसामान्य हिंदूनाच मारक असुनही सावरकर हिंदू संस्थानिकांच्या मागे सातत्याने ठामपणे उभे राहिले. संस्थाने जरी ब्रिटिश इंडियाच्या अंकित असली तरी अंतर्गत कारभारात ब्रिटिशांचा विशेष रोल नव्हता. त्यामुळे इंग्रजी प्रदेशांत (जेथे जनतेवर ब्रिटिशांचे राज्य होते) लोकांना अनेक नागरिकाधिकार मिळाले होते त्यापासून संस्थानी प्रजा वंचीत होती. या काळात संस्थानांत आणि संस्थानिकांत राष्ट्रीय प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य कोंग्रेस करत होती. प्रजा समित्यांच्या मार्फत नागरिकाधारासाठीची आंदोलने जोर पकडीत होती. कोल्हापुर, औंध, बडोद्यासारखी अनेक संस्थाने कायदेमंडळांत नागरिकांना प्रतिनिधित्वही देवू लागली होती. अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन व्हायलाही तयार होती. तर काही संस्थाने (मग ती हिंदू असोत कि मुस्लिम) मात्र पारंपारिक बुरसटलेल्या विचारांना चिकटून बसलेली होती अणि स्वातंत्र्याची आंदोलने दडपून टाकण्यात अग्रेसर होती. या परिस्थितीत सावरकर मात्र हिंदू संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा उपदेश करत देशभर फिरत होते. 

याची प्रतिक्रिया म्हणुन जे हिंदू संस्थानिक करण्यास आतूर होते (म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र अस्तित्व जपणे) ते मुस्लिम संस्थानिकही करणार हे उघड होते. सावरकरांच्या हिंदू संस्थानिकांना असलेला पाठिंबा व त्यांना काही हिंदू संस्थानिकांकडून मिळत असलेले अर्थसहाय्य यामुळे प्रतिक्रियास्वरुप मुस्लिम संस्थानिक मुस्लिम लीगला अर्थबळ पुरवू लागले. एका परीने इंग्रजांचे छुपे हेतू साध्य करण्याचेच हे कार्य होते. या कार्यपद्धतीने अखंड हिंदुस्तान कसा बनणार होता? सुदैवाने तोवर (१९२० नंतर ते सावरकर कार्यरत होईपर्यंत)  सर्वच संस्थानांतील नागरिकांत राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटली असल्याने भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवता येईल काय याबाबत संस्थानिक साशंक होऊ लागले होते. नवानगरच्या महाराजांनी तर पार मुस्लिम लीगशी संधान सांधून आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मदत मागीतली होती.

काश्मिर जरी मुस्लिम बहूल राज्य असले तरी तेथील महाराजा हिंदू असल्याने सावरकरांना त्यांच्याबद्दलही ममत्व होतेच. काश्मिरने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे हे समजताच सावरकरांना अत्यंत आनंद झाला. १० जुलै १९४७ रोजी सावरकरांनी हरीसिंगांना लिहिले कि "नेपाळप्रमाणेच काश्मीरचे महत्व आहे म्हणुंन काश्मीरमद्धे केवळ हिंदुंचे सैन्य उभारून त्यांनी नेपाळची मदत घेत आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे. त्याने आपले स्वातंत्र नामधारी हिंदी संघराज्याच्या अंकित ठेवणे धोक्याचे ठरेल." हे वाचून बडोद्याचे महाराज व अन्य संस्थानांचे प्रतिनिधीही त्यांना भेटले. सर्वांना सावरकर आपले सैन्यबळ वाढवायला सुचवित होते...स्वतंत्र अस्तित्व टिकवायला सांगत होते...पण ते तसे काही करत नसल्याने सावरकर निराशही होत होते. 

यानंतर स्वत: महात्मा गांधी १ आगष्ट १९४७ रोजी श्रीनगरला गेले व हरीसिंगांना भेटले. तेथे ते चार आगष्टपर्यंत होते. शेख अब्दुल्लांना मुक्त करा, राजा म्हणुन पायउतार व्हा आणि भारतात विलीन व्हा असे सांगितले ही बाबही येथे लक्षात घेतली पाहिजे. 

त्रावणकोर संस्थानाबाबतही सावरकरांची भुमिका काश्मीरप्रमाणेच होती. त्रावनकोरचे दिवान सी. पी. रामस्वामी अय्यर यांनीही त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्यास विरोध केला होता. ११ जुन १९४७ रोजी त्यांनी त्रावणकोरचे स्वातंत्र्यही घोषित केले. हे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांना लिहिले, "अखंड हिंदुस्तानच्याच हिताच्या दृष्टीने त्रावणकोर हे स्वतंत्र हिंदू संस्थान ठेवण्याच्या तुमच्या नि महाराजांच्या दूरदृष्टीच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. निज़ामाने त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा पुर्वीच केली असून इतर मुसलमान संस्थानिकही तसेच करण्याची शक्यता आहे. हिंदू संस्थानिकांनी तात्काळ एकत्र येवून आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरुन येणा-या हिंदूविरोधी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास आणि आतून होणारा विश्वासघात नष्ट करण्यास सिद्ध व्हावे. हिंदुविरोधी नेत्यांच्या हाताखाली काम करनारी सध्याची घटना समिती हिंदू जगताचा विश्वासघात करून मुस्लिमांचा आणखी मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे." (जुलै ४७) येथे एक बाब नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजे त्रावणकोर संस्थानाने स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत २० जून ४७ ला जिनांनी त्रावनकोरच्या या कृतीचे स्वागत केले. त्रावनकोरनेही पाकिस्तानसाठी आपला स्वतंत्र राजकीय प्रतिनिधी (राजदूत) नेमला. 

या वरील माहितीवरून काय नि:ष्कर्ष निघतो? कसले अखंड हिंदुस्थान सावरकरांना हवे होते? उलट ते तर हिंदु संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा, संस्थानांतील लोकशाहीवादी स्वातंत्र्य चळवळी दडपण्याच्या पक्षात १९३८ पासुनच दिसतात. हिंदू संस्थानिकांना देशभर स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची आवाहने करतांना त्याची प्रतिक्रिया मुस्लिम संस्थानिकांत काय उमटेल याची त्यांना जाणीव नसावी असे म्हणता येत नाही. संस्थानी ऐशोरामात आयुष्य घालवलेल्या संस्थानिकांना आपले अधिकार विसर्जित करण्याची इच्छा असने शक्य नव्हते. पण त्याला अपवाद होतेच. भोर, कोल्हापूर, बडोदा ही संस्थाने त्या दृष्टीने आघाडीवर होती. अन्य संस्थानांत नागरिकांवर अनन्वित अन्याय व अत्याचार होत असतांना, नागरिकांना साधे मानवाधिकारही बहाल होत नसतांना "राजेशाही प्रवृत्तीचे" आकर्षण असनारे सावरकरांनी हिंदू संस्थानांनी स्वतंत्र रहावे असे वाटने स्वाभाविक वाटले तरी ते त्यांच्याच "अखंड हिंदुस्थानाच्या" भुमिकेच्या विरोधात जात नव्हते काय? हिंदू संस्थानिकांच्या पावलावर पाउल ठेवत मुस्लिम संस्थानिकांनीही स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला असता तर भारतात ५६५ राष्ट्रे निर्माण झाली नसती काय? 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते सावरकर काश्मीर ते त्रावणकोरच्या राजांना सैनिकी शक्ती वाढवा असे का सांगत होते याचे उत्तर रामस्वामींना लिहिलेल्या पत्रातच आहे. ते भारतीय संघराज्यालाच हिंदूविरोधी मानत होते. म्हणजे हा लढा ते म्हणतात त्याप्रमाने राष्ट्रीय सीमांपारचा नसून स्वतंत्र हिंदू संस्थानांच्या सीमांपारचा होता. घटना समितीलाही ते हिंदूविरोधीच मानत होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर हिंदू संस्थानांनी भारतीय संघराज्यावर व मुस्लिम संस्थानांवर हल्ला करत ती जिंकावीत आणि मग त्यांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करावे असे त्यांचे विचार होते असे स्पष्ट दिसते. यामुळे भारतात यादवी पेटेल (कारण संस्थाने, हिंदू असोत कि मुस्लिम, ही देशभर विखुरलेली होती) याचे त्यांना भान मात्र नव्हते हेही दिसून येते. काश्मीरबाबतची त्यांची भुमिका तर अत्यंत गोंधळाची दिसते. मुस्लिमबहूल राज्यात केवळ हिंदूची सेना उभारण्याचा व स्वातंत्र्य टिकवण्याचा त्यांचा सल्ला कोणते अखंड राष्ट्राचे स्वप्न दर्शवतो?  उलट विखंडित, पण केवळ हिंदुंच्या, विखुरलेल्या अनेक राष्ट्रांचे संकुचित हिंदुत्ववादी स्वप्न त्यांच्यासमोर होते हे १९३८ पासुनच्या (म्हणजे १९३७ साली इंग्रजांनी त्यांना बिनशर्त मुक्त केल्याच्या काळापासून) त्यांच्या विचारांवरून दिसून येते. खरे तर गांधीहत्येची बीजे याच विचारांत दिसून येतात, कारण गांधीजी संस्थानांच्या विलीनीकरणाबद्दल व लोकशाहीबद्दल सुरुवातीपासूनच आग्रही होते व त्यांना त्यात यशही मिळत होते. पटेलांनी पुढे सर्वच संस्थाने विलीनही करून दाखवली. जुनागढच्या नबाबाला खरे तर पाकिस्तानात सामील व्हायचे होते. पण तेथील ९८% प्रजा हिंदू असल्याने भारताने जुनागढची नाकेबंदी करून नबाबाला भारतात सामील व्हायला भाग पाडले. ही घटना ९ नोव्हेंबर ४७ ची आहे...गांधीजी तेंव्हा हयात होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली १९३८ पासुनच कोंग्रेस निजामाविरुद्ध संघर्ष करत होती. भारताने स्वातंत्र्यानंतर सैन्यदले विसर्जित करावीत असे कधीही म्हटले नसले तरी सावरकर भक्त मात्र सातत्याने तसा प्रचार करत असतात हे त्याहुनही विशेष. खरे तर काश्मिरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळीस सैनिकी कारवाईला गांधीजींनी संमती दिली होती व याबद्दल प्यारेलाल यांनाही आश्चर्य वाटले होते व ते त्यांनी नोंदवुनही ठेवले आहे.. 

सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न कसे विरोधाभासी आहे हे डा. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहित होते. त्यांनी आपल्या "Pakistan or Partition of India" या ग्रंथात नमूद केले आहे कि "आधी हिंदू-मुस्लिमांत द्वेष निर्माण करुन सावरकरांना मोठे हिंदू राष्ट्र आणि छोटे मुस्लिम राष्ट्र एकाच घटनेच्या छायेखाली नांदेल असे का वाटते हे समजत नाही."

थोडक्यात सावरकरवादी आणि रा.स्व.वादी सावरकरांच्या कोणत्या आणि कशा अखंड हिंदुस्तानाबद्दल बोलत असतात यावर त्यांनी चिंतन करणे आवश्यक आहे.  सावरकरांचे विचार आणि कृती यातील विभेद समजावून घ्यायला हवा. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी १५ आगष्टला तिरंगा फडकावला म्हणजे ते भारतीय स्वातंत्र्याविरोधात नव्हते असे सांगत असतांना सावरकरवादी हे सोयिस्करपणे विसरतात कि आधी क्रुपाण-कमंडलुअंकित भगवा फडकावुनच मग तिरंगा फडकावला. तिरंगा सावरकरवाद्यांनी कधीच मनापासून स्वीकारला नाही. हिंदूजगतच्या धर्मांध जाणीवा कोणत्या दिशेने जावू शकत होत्या याचा बोध सावरकरांच्या वरील कृतींवरुन व वक्तव्यांवरून लक्षात यावे. 

-संजय सोनवणी

संदर्भ: 1. Veer savarkar: Thought and Action of Vinayak Damodar Savarkar by Jyoti Trehan
2. Making India Hindu by David Ludden
3. Hindu nationalists and Governance by John McGuire
4. Savarkar Myths and facts by Shamsul Islam
5. Divine Enterprise: Gurus & Hindu nationalist Movement by Lise McKean
6. pakistan or Partition of India by Dr. B. R. Ambedkar
7. अखंड हिंदुस्तान लढा पर्व- बाबाराव सावरकर 
८. Mahatma Gandhi , the Last Phase, Pyarelal

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...