Monday, November 26, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (७)

जाती नष्ट करायचे प्रयत्न अयशस्वी का ठरले?



जातिसंस्था हे हिंदुंच्या अध:पतनाचे, अन्याय्यपुर्ण समाजरचनेचे आणि शोषणाचे प्रमूख कारण आहे म्हणुन ती उध्वस्त केली पाहिजे असे आजवरच्या सर्वच पुरोगामी विचारवंतांनी म्हटले आहे. जातिसंस्था नष्ट करण्यासाठी गौतम बुद्धापासुन ते मध्ययुगीन असंख्य संतांनी प्रयत्न केले आहेत असेही आपण वाचत असतो. आधुनिक काळात महात्मा फुले, महर्षि शिंदे, डा. बाबासाहेब आंबेडकर,

सावरकर ई. असंख्य विचारवंतांनी व समाजधुरिणांनी जातिसंस्थेवर कठोर प्रहार केले आहेत व त्यातील अनेकांनी जात्युच्छेदनासाठी अविरत प्रयत्नही केले आहेत असेही आपण पहातो. पण प्रत्यक्षात जातिसंस्था नष्ट होण्याऐवजी दिवसेंदिवस जातीय जाणीवा, नेणीवा व प्रेरणा अधिक टोकदार-धारदार होत चालल्याचे आपण पहातो आहोत. असे जर होत असेल तर एक तर जातिसंस्थेबाबतची विद्वानांची मते गफलतपुर्ण तरी आहेत अथवा भारतीय समाज आजही इतका मतिमंद आहे कि त्याला जातीय जाणीवा जोपासण्यात आपला विनाश आहे हे समजत नाही किंवा जातिसंस्था टिकून राहणे त्याला आपल्या ऐहिक (व कदाचित पारमार्थिकही) हिताचे आहे असे वाटत असावे. आज प्रत्येक जातीच्या व पोटजातींच्याही संघटना आहेत, प्रत्येक संघटना आपापल्या जातीत जन्मलेल्या संतांची व महामानवांची तळी उचलत जातीअंतर्गत विवाहांसाठी वधु-वर मेळावे घेत असतांना आपण पहात आहोत. प्रत्येक जात आपापल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक मागण्यांसाठी पुढे सरसावत आहे असेही आपण पहातो. राजकारणात आज जात ही कधी नव्हे एवढ्या कळीचा मुद्दा बनली आहे. साहित्यक्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. जातनिहाय साहित्यसंमेलने होत आहेत. समिक्षक शक्यतो स्व-जातनिहाय साहित्याचीच समीक्षा करतांना दिसत आहेत. स्वजातियांचे कसेही असले तरी स्वीकारायचे आणि अन्यजातियांचे धिक्कारायचे अथवा दुर्लक्षीत ठेवायचे ही प्रवृत्ती एकविसाव्या शतकात कळसाला पोहोचली आहे. गेल्या शतकापासून ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी एवढ्यापुरताच हा सूप्त संघर्ष मर्यादित राहिलेला नसून तो जाती-विरुद्ध-जाती असा बनल्याचे वास्तव वाढत चालले आहे.

असे का होते आहे? जातिव्यवस्था जर एवढी दोषपुर्ण आहे तर जातीय जाणीवा हे समजावून सांगितल्यानंतरही का तीव्र होताहेत? का कथित पुरोगामीही शक्यतो स्वजातीतच व तेही ब्राह्मण बोलावून लग्न लावत आहेत? जाती अंत करणारी कोणतीही चळवळ अत्यंत अत्यल्प परिघातच का यशस्वी झाली आहे? पुरोगाम्यांची वैचारिकता समाजाच्या मनाशी पोहोचण्यात अपेशी ठरत आहे कि मुळात पुरोगाम्यांची व्युहनीतीच समूळ चुकीची आहे? ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेली जातीयव्यवस्था अन्याय्य आहे हे खरे मानले तर मग खुद्द ब्राह्मणही या जातीव्यवस्थेचे साडेपाचशे भागात तुटलेले जात घटक कसे बनले आहेत? त्यांच्यातही आपसात भेदाभेद का आहे?

जगातील कोणताही समाज स्वत:च्या मानसिकतेला रुचेल अशी व्यवस्था बनवतो व तशाच व्यवस्थेत राहणे पसंत करतो. ज्या क्षणी व्यवस्था चुकीची अथवा अन्याय्य वाटु लागते तेंव्हा तो ती व्यवस्था बदलतो व नव्या व्यवस्थेचे अनुसरण करू लागतो. आज आपण घटनात्मक लोकशाही असलेल्या देशात रहातो. घटनेच्या चौकटीतच आपले जीवनव्यवहार असावेत अशी अपेक्षाच नव्हे तर सक्ती आहे. जातीभेद घटनेला मान्य नाहीत. स्वातंत्र्य, समता व बंधुता या उच्च मूल्यांचा पुरस्कार घटना करते. तरीही विषमतेचे मूळ असलेले जातीभेद कमी न होता वाढत आहेत...फक्त या भेदांचे व्यावहारीक रुप काही प्रमाणात बदलले आहे एवढेच.

मला वाटते कोठेतरी गंभीर गफलत झालेली आहे. त्यावर आपल्याला जातीविशिष्ट दृष्टीकोनातुन विचार करुन भागणार नाही. जातिनिर्मुलनाचे आजवर झालेले प्रयत्न व त्यांचे यशापयशही आपल्याला पाहिले पाहिजे.

भगवान बुद्ध

भगवान बुद्ध हा जातीसंस्थेवर प्रहार करणारा, जातीभेदातीत समाजरचना करू इच्छिणारा धर्मसंस्थापक होता अशी साधारण मान्यता आहे. पण आपण सारे हे विसरतो कि बुद्ध जातिसंस्थेबद्दल कोठेही बोलत नाही. त्याचा विरोध वर्णसंस्थेला आहे. जातिसंस्था व वर्णसंस्था या सर्वस्वी भिन्न बाबी आहेत हे आपण मागील लेखांत पाहिलेच आहे. गौतम बुद्ध तत्वत: विरोध करतो ते वर्णव्यवस्थेला.

"न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो

कम्मना वसलो होति, कम्मणा होति ब्राह्मणो..

जन्माने कोणी चांडाळ अथवा ब्राह्मण होत नसून कर्मानेच कोणी ब्राह्मण अथवा चांडाळ होतो असे बुद्ध येथे सांगतो व ते वर्णव्यवस्थेच्या मूळ रुपाशी सुसंगतच आहे. पण बुद्ध जातिव्यवस्थेबाबत बोलत नाही कारण ती तेंव्हाही व अगदी दहाव्या शतकापर्यंत लवचिकच होती, समाजव्यवस्थेचे व्यंग नव्हते हे आपण पाहिले आहेच. व्यवहारातील वर्णव्यवस्था बुद्धाला मान्य होती व तो स्वत: खतिय (क्षत्रीय) व त्यातल्या त्यात शाक्यकुलीन असल्याचा अभिमान बाळगत असे. त्यामुळेच कि काय वर्णव्यवस्थेची उतरंड बुद्धाने ब्राह्मण-क्षत्रीय अशी न करता क्षत्रीयाला उच्च स्थानी बसवून केल्याचे स्पष्ट दिसते. प्रवज्जा घेतल्यानंतरच वर्णभेद मावळतो असे बौद्ध तत्वज्ञान आहे. समाजव्यवहारातील वर्णभेदाचे वास्तव त्याला मान्य आहे.

त्यामुळे बुद्ध हा जातिसंस्थेला विरोध करनारा होता असे म्हणने ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत चुकीचे आहे.

यानंतर आठव्या अथवा नवव्या शतकात लिहिले गेलेले वज्रसुचिकोपनिषदात जीव, देह, ज्ञान, कर्म अथवा धर्म यापैकी कशानेही ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही असे उद्घोषित केले असले तरीही सर्व रोख वर्णव्यवस्थेकडेच आहे. जातिसंस्थेकडे नाही हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागते.

जातिसंस्थेवर हल्ले दिसतात ते सरळ मध्ययुगात. याचाच अर्थ असा होतो कि तोवर जाती अस्तित्वात असल्या तरी भेदाभेदाने कळस गाठला नव्हता. संतांनीच जातिंवर हल्ले सुरु केले. संत बसवेश्वर, नाथपंथीय, सिद्ध, हे जातिभेदांविरुद्ध स्पष्ट भुमिका घेतांना दिसतात. तीही अस्पृष्य जातींबाबत सहानुभुतीची तर ब्राह्मणीव्यवस्थेच्या विरोधी. अन्य जातींबाबतीतील भेदांबाबत कोणी संत बोलत नाही. मग बलुतेदार जातींत भेदभाव नव्हता कि काय? संतांनाही आपल्या जातींचा अभिमान का होता? तसेच तत्कालीन अस्पृष्यांना ज्ञानबंदी खरोखर होती काय हा प्रश्नही अनेक संतांबाबत उद्भवतो. तसे असते तर चोखा मेळा व त्याचे कुटुंबिय अभंग लिहु शकले असते काय? हा प्रश्न उद्धटपनाचा वाटेल पण त्याचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजे. जातीय दृष्टीकोनातून व एकांगी भुमिकेतून आपल्याला कसलेही उत्तर गवसायची संधी नाही.

तुकाराम म्हणतात "ज्याचा संग चित्ती...तुका म्हणे तो ते याती..." म्हणजे जातिसंस्था नष्ट व्हावी असा रोख तर नाही पण उलट अपवादात्मक संत वगळता व्यवहारातील जातीभेद त्यांनाही मान्यच होता असे चित्र दिसते. रामदासांनी तर उघडपणे अंत्यजांविरुद्ध व शुद्रांविरुद्ध भुमिका घेतलेली दिसते. ब्राह्मणविरोधी भुमिका कारु-नारु जातींची तर शूद्र-अस्पृष्यांविरुद्धची भुमिका ब्राह्मणी संतांची असे चित्र निर्माण झालेले दिसते ते सोळाव्या-सतराव्या शतकात. तत्पुर्वीच्या पाच-सहाशे वर्षांत रुजलेल्या जन्माधारीत जातीव्यवस्थेचे परस्पर संघर्षातून व वर्णीय श्रेणीबद्धता लादण्याच्या प्रयत्नांतुन निर्माण झालेल्या दोन्ही गटांच्या मानसिकता व तेंव्हाची व्यावहारिक वास्तवे या संतसाहित्यातून स्पष्ट होतात.

परंतु दोन्ही गट जातिअंताला अनुकुल होते असे विधान मात्र करता येत नाही. ब्राह्मण या व्यवस्थेचा लाभार्थी असल्याने ही व्यवस्था नष्ट करणे त्याला सोयीचे नव्हते असे विधानही सरसकटपणे करता येत नाही, कारण धर्मकार्यापलीकडे ब्राह्मणांशी अन्य जातीयांचा विशेष संबंधही येणार नाही अशी बंदिस्त चौकट आधीच निर्माण झालेली होती. ब्राह्मणांनी आपली जीवनशैली स्वतंत्रपणे बनवून त्या कोषात जगत स्वत:ला सर्वात आधी बंदिस्त करुन घेतले होते व त्यांच्या अनुकरणातून अन्य जातीयांनीही स्वत:ला बंदिस्त करायला सुरुवात केली असे डा. आंबेडकर आपल्या "CASTES IN INDIA : Their Mechanism, Genesis and Development" या प्रबंधात म्हणतात. प्रत्येक बंदिस्त जातींची स्वतंत्र जीवनशैली यातून विकसीत झाली असे म्हटले तर प्रश्न असा उद्भवतो कि ब्राह्मणांनी आपल्याला बंदिस्त करण्याची सुरुवात का केली? वंशशुद्धता टिकवणे हे त्यामागे खासच कारण नव्हते कारण कोणताही वंश शुद्ध नाही हे ब्राह्मणांना महाभारतातील युधिष्ठीरवचनावरुन व पौराणिक साहित्यातुन माहित होतेच. त्यांची रचना करनारेही बव्हंशी ब्राह्मणच होते...आणि त्यासाठी (वंशशुद्धीसाठी) बंदिस्त केले म्हणावे तर बंदिस्त होण्याआधीची त्यांची सामाजिक स्थिती नेमकी काय होती हा प्रश्न पडतो. उत्तरादाखल म्हणता येईल कि त्याआधी वंशशुद्धी अस्तित्वात नव्हती व त्यांच्या अंतर्गत रचनेतही पुरेशी सैलता होती. अन्यथा नवनवीन ब्राह्मण जातीही अस्तित्वात आल्या नसत्या. असो.

थोडक्यात जातींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन इंग्रजी राजवट येईपर्यंत तरी अत्यंत वेगळा होता असे म्हणावे लागते. इंग्रजी राजवट येण्याआधीचे सामाजिक वास्तव दाखवेल असे संतसाहित्य व फुटकळ प्रबंध वगळता साहित्य आपल्याकडे जवळपास नाही. पण ते वास्तव कटु होते असे आपल्याला अनुमान काढता येते. यामागील कारणांची चर्चा आपण मागील लेखांत केली असल्याने येथे पुनरावृत्ती करत नाही, पण प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र बनले होते एवढे मात्र पुन्हा नमूद करतो. दोन राष्ट्रांत जेही संघर्ष असू शकतात ते अस्तित्वात होतेच व आर्थिक पातळीवर अपवादात्मक समाज सोडले तर सारेच रसातळाला जावून पोहोचले होते. त्यातून परस्पर हीनभावना आणि द्वेष याची भर पडलेली दिसते.

इंग्रजी आमदनीत पाश्चात्य विचारसरण्यांशी संबंध आलेल्या नवशिक्षीत मंडळीला आपल्या समाजातील दोष दिसू लागले. ख्रिस्त्यांमधील तुलनेने अधिक असलेली सामाजिक एकात्मतेची भावना नव-विचारवंतांना आकर्षित करती झाली. एवढेच नव्हे तर अनेक उच्चजातीयांनी धर्मांतरेही केली. भारताची अवनतीचे मुख्य कारण जातीभेदप्रणित विषमता आहे म्हणुन ते नष्ट केले पाहिजेत अशी धारणा बनू लागली. परंतु असे लोक अत्यल्प होते. सतीबंदीचा कायदा करुन इंग्रजांनी हिंदू धर्मातील अनिष्ट परंपरेला तिलांजली द्यायला भाग पाडले असले तरी जातीव्यवस्थेबाबत इंग्रज उदासीन राहिले. उलट या संस्थेचा अभ्यास करुन आपली राजवट टिकवण्यासाठी तिचा अभ्यास करवून घेत तिचा उपयोग करुन घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काही इंग्रजी वंशोद्भ्यासकांची (Ethenologists) मते आपण गेल्या प्रकरणात पाहिलीच आहेत.

जात्युच्छेदन हे विचारवंतांसमोरील एक ध्येय बनले तरी त्याला छेद देणा-या एका भयंकर सिद्धांताचा एकोणिसाव्या शतकात जन्म झाला आणि जात्युच्छेदनाची दिशाच भरकटली. तो सिद्धांत कधीच कालबाह्य झाला असला तरी अनेक ब्राह्मणी व अब्राह्मणी विचारवंत आजही त्या सिद्धांताचे बळी ठरले आहेत व त्यामुळे मुळात दोहो पक्षांची मुलभुत वैचारिक मांडणीच सदोष झाल्याने जात्युच्छेदन साधता येणे त्यांनाही साध्य झालेले नाही. काय होता हा सिद्धांत?


आर्य वंशवादाचा स्फोट: वैचारिकतेची फरफट

इंग्रजांना राज्य चालवण्यासाठी व प्रशासनासाठी येथील कुशल शिक्षीत मानवी श्रम हवे होते. ब्राह्मण वर्ग त्यात आघाडीवर असणार असा त्यांचा होरा होता व तो खराही झाला. इंग्रजी शिक्षणात अर्थात ब्राह्मण आघाडीवर होते. पाश्चात्य विचारांपुळे त्यांच्यात जशी सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे तशीच उद्या राजकीय स्वातंत्र्याचीही जाणीव वाढीला लागेल हे इंग्रजांना कळत होते. त्यांना राजनिष्ठ ठेवण्यासाठी त्यांना अजून काही हवे होते...काहीही झाले तरी अखेर इंग्रज हे वेगळ्या संस्कृतीचे व वंशाचे लोक होते. एतद्देशीय पुढारलेल्या वर्गाला आपलेसे करता आले नाही तर येथे दीर्घकाळ राज्य करता येणार नाही हे त्यांना माहित होते. त्यांच्याशी एकात्मकता दाखवण्यासाठी इंग्रजांच्या कामी आला तो आर्य वंशवाद.

जर्मन पंडित म्यक्स मुल्लरने या आर्य सिद्धांताला मोठे बळ दिले. खरे तर त्याला "आर्य" हा शब्द वंश म्हणुन वापरायचा नव्हता तर एक इंडो-युरोपियन भाषिक गट म्हणुन वापरायचा होता. युरोपियन व संस्कृत भाषांतील काही साधर्म्यांवर आधारित हा एकभाषिक लोकांच्या मुळस्थानाबद्दलचा सिद्धांत होता. हे इंडो-युरोपियन भाषा बोलणारे कधीकाळी एका ठिकाणी वास्तव्यास असून पुढे ते भारत व युरोपात टोळ्या-टोळ्यांनी पसरले असे या सिद्धांताचे मुख्य प्रतिपादन होते. या सिद्धांतानुसार आर्य हे भारतावरील आद्य आक्रमक ठरत होते ज्यांनी येथील दास-दस्युंना पराजित करुन गुलाम केले. हे सर्व मुळचे गुलाम म्हणजे आजचे शूद्र जातीय. ब्राह्मण हे आर्यवंशीय. आद्य आक्रमक. या सिद्धांतामुळे एक मोठीच सांस्कृतीक उलथापालथ झाली. हा सिद्धांत इंग्रजांच्या फारच सोयीचा होता. कारण आता ब्राह्मणही त्यांचे पुरातन रक्ताचे बांधव ठरत होते...पण त्याचे वेळीस त्यांची एतद्देशीयांशीची नाळही तुटत होती. विष्णुशास्त्री चिपळुनकरही इंग्रजांना "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव" असे संबोधत असत. टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहून त्या सिद्धांतात भरच टाकली.

दरम्यान महात्मा फुलेंनीही याच सिद्धांताला स्वीकारुन "आर्यभट" या संकल्पनेचा ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्यासाठी वापर केला. आक्रमक आर्यांनी बलीस्थानावर आक्रमण करुन येथील दास-दस्युंना कपटाने हरवले असे सिद्धांतन त्यांनी केले. त्यावर आधारीत नवीन संघर्ष सुरु झाला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला जातीय नव्हे तर वांशिक परिमाण लाभले. हा एक गंभीर धोका होता जो ब्राह्मणांनी वंशश्रेष्ठत्वाचे प्रमाणपत्र आयतेच मिळत असल्याने सहज स्वीकारला.

आर्य सिद्धांत चुकीचा होता खरे पण याच सिद्धांताचा आधारर घेत जर्मनीत आर्यवंशवादी हिटलर उदयाला आला. भारतात हिटलरचे समर्थक वाढले. आजही खूप आहेत. जातीय अहंभाव ठीक होता असे एक वेळ म्हणता येईल, परंतू वांशिक अहंकारामुळे जी एक विचित्र जातीय तेढ निर्माण झाली, ती जात्युच्छेदनाची दिशा बदलली. बराचसा जातीअंताचा लढा वांशिक पायाकडे झुकल्याने जात्युच्छेदनाचे तत्वज्ञानही बदलले व जातीनिर्मिती ही आक्रमक आर्य-ब्राह्मणांनी एतद्देशीयांवर निरंकुश सत्ता गाजवण्यासाठीच केली असे प्रतिपादन अट्टाग्रहाने होवू लागले. याची परिणती जातीनिर्मिती व तिचे व्यावहारिक वास्तव समजावून घेण्याकडे कल होत ती कशी नष्ट करता येईल इकडे प्रामुख्याने लक्ष जाण्याऐवजी ब्राह्मणद्वेषात झाली. कारण ते परकीय होते...आक्रमक होते व एतद्देशीयांना (मुलनिवासींना) गुलाम करनारे होते. ब्राह्मणांनीही आर्य सिद्धांत स्वीकारला असल्याने त्यांच्या वांशिक अहंभावात भर पडली. त्याचे प्रतिबिंब गतशतकाच्या व आताच्याही पुरोगामी चळवळीत उमटले असल्याचे चित्र दिसते. आजही चळवळीतील अनेक विचारवंत ब्राह्मण हे परकीय असून वेगळ्या वंशाचे आहेत असे मानुन जातरचनेविषयक वैचारिक संरचना करतात. त्यामुळे जात्युच्छेदनाचा मार्गही अवरुद्ध होत एका विचित्र वळनावर येवून थांबला आहे....कारण मुळातच जातीव्यवस्थेचे आकलन या बनावट वंशसिद्धांताने ग्रासलेले आहे. त्यामुळे जातिसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन हाच मुळात जातविद्वेषावर (वंशविद्वेषावर) उभा ठाकल्याने त्या व्यवस्थेचे तटस्थ आकलन कमी पडत आपण भरकटत तर जात नाही आहोत ना यावरही आपल्याला चिंतन करने गरजेचे आहे.

तसेच पुरोगामी विद्वानांनी जात्युच्छेदनाचे जे अनेक मार्ग सुचवले आहेत ते कितपत व्यवहार्य आहेत व ते का यशस्वी ठरले नाहीत यावरही आपण पुढील भागात चर्चा करुयात...



(क्रमश:)






Monday, November 19, 2012

...कोणाच्या बापाचे काय जाते?




वाढते व तेही केंद्रीत औद्योगिकरण...चराऊ कुरणांचा नाश...उरलाय  त्यांचा खालावत चाललेला दर्जा...जनावरांची उपासमार...पर्यावरणाचा ढासळता समतोल...धनगरांची कुरणांच्या शोधातील वाढती पायपीट...गांवगुंडाची बेसुमार खंडणी-वसूली...




राष्ट्राच्या सकल उत्पादनात अजुनही वाढवता येण्यासारखा मोलाचा वाटा असुनही मेंढपाळांचे मुलभूत अधिकार नाकारणे ही कसली लोकशाही? पर्यावरणाचा खून पाडत प्रगतीच्या गप्पा हाकणे ही कसली प्रगती?





देशाच्या सकल उत्पादनात ९% वाटा (शेतीचा १४% आहे) घसरत जात धनगर व पर्यायाने पशुपालक समाज एक दिवस या संपूर्ण उद्योगातून बाहेर हाकलला जाणार...आजही देशाचे कुरणांबाबत धोरणच नाही...कुरणे बळकावणे सहज सोपे आहे...हजारो वर्ष धनगर वहिवाटीने कुरणांचा वापर शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी करत आहेत...त्यांच्या नैसर्गिक हक्काकडे कोणाचेही लक्ष नाही...




कोणी एक कुरण बळकावले कि दुस-या जागेच्या शोधात वणवण करायची...उघड्यावरचे फिरस्ते संसार..मुलाबाळांना शिक्षण नाही....धरणांखाली, सेझखाली, औद्योगिक वसाहतींखाली....कुरणे चाललीच आहेत...पर्यायी व्यवस्था नाही...चराऊ गवताच्या नव्या सकस जाती शोधण्यासाठी कसलेही प्रयत्न नाहेत...अपारंपारिक वनीकरणाने अधिकच घात केलेला...



इकडे शेती आणि शेतमालासाठी आंदोलने होतात...रक्त सांडते...दुसरीकडे असला जहरी अन्याय...बहुदा पशु आणि पशुपालकांना या व्यवस्थेत स्थानच नसावे...शेळ्या-मेंढरे मूक...धनगर मूक...नेते येथे चरू शकत नसल्याने ते मूक-बधीर...पर्यावरण मरो कि धनगर मरोत...कोणाच्या बापाचे काय जाते?


For more details also see...

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (६)



जात-भावनेने कळस कसा गाठला?



औद्योगिकरण हे कोणत्याही, त्यातल्या त्यात भारतासारख्या देशाला, अभिशाप आहे असे गांधीजी म्हणत. स्वयंपुर्ण ग्रामव्यवस्था, जी भारतीय अर्थव्यवस्थेचा हजारो वर्ष कणा राहिली आहे तीच स्वातंत्र्यानंतर राबवली जाईल असा विश्वास लोकांना गांधीजींमुळे होता. देशभर उठलेले स्वातंत्र्याचे आंदोलन हे जनसामान्यांसाठी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा परंपरागत उद्योगपद्धतीच्या/अर्थव्यवस्थेच्या पुनर्जीवनासाठी होते हेही वास्तव आतातरी येथे समजावून घ्यायला हवे. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षात तसे काही झाले नाही हा भाग वेगळा. तसे होणे अशक्यही होते हेही खरे.



जातिव्यवस्था जन्माधारीत कशी बनत गेली व त्यात कोण-कोणते घटक मूख्य अथवा अंशत: का होईना सहभागी होते हे आपण गेल्या भागापर्यंत पाहिले आहे. जातिव्यवस्था मुळची जन्माधारीत नव्हती. दहाव्या शतकानंतर अनेक कारणांनी ती जन्माधारीत बनू लागली. एका अर्थाने एका विशिष्ट परिस्थितीत तगून राहण्यासाठी बनवलेली ती एक तात्पुरती व्यवस्था होती. परिस्थिती बदलताच अशा व्यवस्था आपसूक तुटतात व नव्या सामाजिक व्यवस्था आकार घेत असतात. हे प्रवाहीपण साधारणतया सर्व समाज जपत असतात. परंतू भारतात तसे घडले नाही.

सतरावे शतक ते जवळपास १८१८ पर्यंत भारताने राजकीय उलथापालथींचा अत्यंत धामधुमीचा काळ पाहिला. हा काळ सामान्यांसाठी लुटारुंचाच काळ होता असे म्हटले तरी फारसे वावगे ठरणार नाही. परस्पर प्रांतांची जाळपोळ करणे, खंडण्यांसाठी खणत्या लावणे अथवा गांवेच्या गांवे, शेतेच्या शेते जाळुन टाकणे हे नियमीत कृत्य बनलेले होते. एतद्देशीय सत्ताही त्यात मागे नव्हत्या. त्यामुळे सुलतानी आपत्तीत अडकलेले शोषित त्यांची सत्ता पुरेपूर स्थिर होण्याच्या आतच नव्या संकटात सापडले. भारत हा कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार होवू शकतो म्हणुन औद्योगिक क्रांतीनंतर युरोपियनांनीही आपला मोहरा भारताकडे वळवला होताच. इंग्रज त्या स्पर्धेत विजेते ठरले. १८१८ नंतर त्यांचे सत्ता स्थिर झाली. १८५७ च्या बंडाने थोडा झटका दिला असला तरी एक नवी पण स्थिर व त्यातल्यात्यात प्रशासकीय दृष्ट्या समर्थ अशी सत्ता स्थापित झाली.

हे खरे असले तरी जातीसंस्था परिवर्तीत होत नवे रूप धारण करण्याची संभावना उरली नाही कारण युरोपातील औद्योगिकरणामुळे येथील सर्वच निर्माणकर्ते घटक आहे तेच व्यवसाय गमावून बसू लागले. हर्बर्ट रिश्लेच्या अनुमानानुसार जवळपास ५०% लोकांनी आपले पारंपारिक व्यवसाय गमावले. म्हणजे पारंपारिक व्यवसाय वाढणे तर दूर पण आहे ते व्यवसाय गमावून लोकांना जगण्याची अन्य साधने शोधावी लागली. म्हणजे समाजव्यवस्थेला बदलाची संधीच उरली नाही. काही गुन्हेगारीकडे वळाले तर काही शेतमजुरीकडे. काही सरकारी मिलतील त्या नोक-या, अगदी सैनिकीही, स्वीकारु लागले. फ्रांक डी. झ्वार्टच्या मते इंग्रजी व्यवस्थेत जातीव्यवस्था कधी नव्हे इतकी कठोर बनली. हे मत विवादास्पद मानले जात असले तरी इंग्रजी अंमलात असंख्य लोकांना आहे तेही पारंपारिक व्यवसाय सोडुन अन्य उपजिविका शोधाव्या लागल्या व त्यांच्या हालांत भरच पडली हे तर उघड आहे. असे असले तरी भारतीय लोक जातीय उच्च-नीच भावनेने ग्रस्त असल्याने रेल्वेतून एकत्र प्रवास करणार नाहीत असा इंग्रजांचा प्राथमिक कयास भारतियांनी चुकीचा ठरवला हेही एक वास्तव आहे.

तरीही जातीभेद, उच्चनिच्चता हा भारतीय जातीसंस्थेचा एक अपरिहार्य भाग मानला जातो. तसे वास्तव नाही असे म्हणने चुकीचे ठरेल. आजही आपण त्याचा अत्यंत कटु अनुभव घेतच असतो. ही मानसिकता कशी विकसीत झाली हेही पहाणे आवश्यक आहे.

जातीसंस्थेकडे पहाण्याचे प्राय: चार दृष्टीकोण आहेत. पहिला म्हणजे ब्राह्मणी दृष्टीकोन जो जातिसंस्थेचा धर्माच्या पायावर विचार करतो व त्याचे समर्थन करतो. आधुनिक युगात याला अनेक अपवाद असले तरी जातिसंस्था ही आज कालबाह्य असली तरी ती मुलत: धर्माधिष्ठितच होती असा त्यांचा एकुणातील निर्वाळा असतो. दुसरा दृष्टीकोण म्हणजे पाश्चात्यांचा. हर्बर्ट रिश्ली हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो कि भारतिय जातीव्यवस्थेत खुपच उच्च-निच्चता पाळतात ही एक अंधश्रद्धा आहे. प्रत्यक्ष व्यवहारात अस्पृष्यांचा अपवाद केला तर अन्य उच्च ते निम्नस्तरीय जाती यांत रोटीबंदी नाही. यूल अर्थात याविपरित मत मांडतो. रिश्लेच्याच सर्व्हे नुसार जातनिहाय व्यवसाय बंधने पाळली जात नसुन विणकर-लोहार-धनगरादि आता शेतकरी बनलेले दिसतात तर चर्मोद्योगात आता फक्त (तेच नियत उद्योग आहेत असे) फक्त ८% लोक उरले असून अन्य शेती अथवा शेतमजुरीत गेले आहेत. तीच बाब अन्य व्यवसायांची झाली असल्याचे निरिक्षणही तो नोंदवतो. तिसरा दृष्टीकोण निर्माणकर्त्यांचा (म्हणजे उत्पादक घटकांतुन आलेले, परंपरेने शूद्र मानले गेलेले) असून या दृष्टीकोनाचे प्रवर्तक महान समाजनेते म. फुले होत. त्यांच्या मते विजित आर्यांनी बळीदेशावर आक्रमण करून, त्यांना पराजित करून दास-दस्यु बनवुन त्यांना शूद्रातिशूद्र बनवून दास्यात लोटले आहे व ते मूख्य शोषक आहेत. चवथा दृष्टीकोण हा बाबासाहेब प्रणित असून "शूद्र पुर्वी कोण होते?" या ग्रंथांतुन त्यांनी आपले मत सुस्पष्ट केलेले आहेच. जातिव्यवस्थेचे निर्माते ब्राह्मण अथवा मनू नव्हे हेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

ही मतमतांतरे अनेक बाबतीत परस्परविरोधी आहेत हे उघड आहे, आणि ते जातीसंस्थेची गुंतागुंत व विशिष्ट भुमिकेतून इतिहासाचे केलेले अवगाहन पाहता स्वाभाविकही आहे. यातून उच्चनीचतेची भावना अथवा मानसिकता नेमकी कोणत्या तत्वांनी जन्माला येते याचा उलगडा होत नाही. व्यवस्थेचा फायदा फक्त उच्चवर्णीयांना झाला व शुद्रातिशुद्रच दरिद्र होत गेले हे अर्धसत्य आहे. प्रशासनासाठी सत्तांना जे घटक आवश्यक वाटले त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असला तरी ते सर्वांसाठीचेच वास्तव नव्हते. बहुसंख्य घटकांच्या दारिद्र्याचे कारण बदलत्या अर्थव्यवस्थेत होते आणि त्याला जबाबदार अधिकाधिक उत्पन्न कमीत कमी खर्चात मिळवू पाहणा-या सत्ता होत्या. इंग्रजांच्या दृष्टीने भारत ही कच्च्या मालाची स्वस्त पुरवठादार आणि पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ होती. एतद्देशीय व्यवसाय व कला यांचा प्रवास वेगाने अधोगतीकडे सुरु झाला होता. यामुळे एकुणातील समाजव्यवस्थेला समूळ हादरा बसणे स्वाभाविक होते. या स्थितीत जातींची भूमिका काय होती? समाजमानसशास्त्र अशा स्थितीत कसे वागू शकते?

जाती जन्माधारीत बनून साताठशे वर्ष होवून गेल्याने व ज्या अवस्थेत त्या जन्माधारित बनल्या त्या स्थितीत समुळ बदल होत त्याआधीची एतद्देशियांची मूक्त बाजारपेठ पुन्हा आलीच नसल्याने जातीय बंध घट्ट होत जाणे स्वाभाविक होते. नवपरिवर्तनाची दिशा मिळेल अशी अनुकूल स्थिती आलीच नाही. विवाहसंस्थेमुळे स्वजातीतच विवाह करण्याची पद्धत रूढ झाली असल्याने भावकीचे भावात्मक बंधही तेवढेच दृढमूल होत जाणे स्वाभाविक होते. जगण्याचा संघर्ष जसजसा तीव्र होत जातो तसतसा समान प्रश्नांनी ग्रसित विभिन्न समाजघटक आकुंचित होत आपल्या जगण्याचा आधार बनवणारी भावनिक व व्यावहारिक अशी संघटने बनवतात. स्व-जातींबाबत, व त्यातल्या त्यात पोटजातींबाबत असे संघटन होणे सोपे होते. हे संघटन घटनाविरहित नसते. अलिखित असली तरी या संघटनाची एक घटना बनतेच व तीच जातपंचायतींमार्फत भारतात वापरली गेली. तेराव्या शतकानंतर ती क्रमश: अधिक बंधयुक्त होत गेली. इंग्रजकाळात तिने कळस गाठला.

धर्ममार्तंडांची यात नेमकी काय भुमिका होती? भारतात राजव्यवस्थेने अथवा धर्मसत्तेने जातपंचायतींच्या निर्णयांत हस्तक्षेप केल्याची उदाहरणे अपवादात्मक आहेत. ब्राह्मनांच्या गोतसभा असत व त्यांचेही निर्णय धर्ममार्तंड व राजसत्ता स्वीकारत. इंग्रजपुर्व काळापर्यंत ही पद्धत सर्रास होती. राजसत्तेने जातीसंस्थेस उत्तेजनही दिले नाही कि ती संपावी असेही प्रयत्न केले नाहीत. छ. शिवाजी महाराजांनीही रुढीप्रमाणे चालत आलेल्या सामाजिक रुढींत हस्तक्षेप टाळला. या एकुणातील स्थितीमुळे प्रत्येक जात ही एक स्वतंत्र व्यवस्था बनत गेली. जातपंचायतींचे अधिकारही अमर्याद म्हणता येतील एवढे वाढत गेले. एवढेच नव्हे तर ब्राह्मणांना प्रत्युत्तर म्हणुन अनेक जातींनी आपापल्या स्वतंत्र उत्पत्तीकथा बनवायला सुरुवात केली. काहींनी स्वतंत्र जातिनिहाय पुराणेही लिहुन घेतली. शिव हा सर्वांचा पुर्वज...कोणी शिवाच्या जीभेतून तर कोणी अश्रुतून...व जातीनियमावली वेगळी, यामुळे प्रत्येक जात स्वतंत्र पातळीवर एक स्वतंत्र धर्मही बनत गेली. चाली-रिती, कुलप्रथा व कूलदैवत अनेक जातींचे एकच असले तरी तत्संबंधी वेगवेगळ्या प्रथांचे निर्माण करण्यात आले. मित्थके बनवली गेली. यात ऐतिहासिकतेचा भाग क्वचितच होता. वर्णव्यवस्थेचा पगडा पोथ्या-पुराणकारांनी वाढवल्याने प्रत्येक जात आपापले जातीय मूळ क्षत्रियत्व अथवा ब्राह्मणत्वात शोधु लागली...मग ते धनगर-गवळी असोत कि पुर्वास्पृष्य. सोनारांनी व कोष्ट्यांनी आपले मूळ ब्राह्मणत्वात शोधले. वर्तमान जातीय अवनतीला कोणाला परशुराम कामी आला तर कोणाला कोणत्यातरी दैवताचा शाप! या सर्वांतून प्रत्येक जात आपापला अंतर्गत जातीअभिमान वाढवत राहिली. बाहेरही त्याची अभिव्यक्ति होत राहिली. परस्पर-हीणभाव यातून वाढत गेला. अस्पृष्य मानले गेलेले घटकही परस्परांना हीण मानू लागले. ही सारी समाजमनाची एक वेगळीच अभिव्यक्ती होती. आपले मूळ प्रत्येक जातीने स्वतंत्रपणे शोधायला सुरुवात केली. हे एकार्थाने एकाच समाजाचे विघटन होत प्रत्येक जातीसमुहाचे स्वतंत्र बेट बनण्यासारखे होते.

एकार्थाने प्रत्येक जात ही एक राष्ट्र बनली असे म्हणने येथे वावगे होणार नाही. भटक्या-विमूक्त जाती-जमातीही या तत्वाला अपवाद राहिल्या नाहीत. जातभावनेने कोणत्याही जातीचे आर्थिक उत्थान केले नसले तरी एकात्म जात-सामाजिक भाव आणि सहवेदना दिली. अन्य जातींशीचा सहयोग हा फक्त सामाजिक गरजांपुरताच उरला. मनाने मात्र तो आपल्या जातीचा व म्हणुन आपल्या राष्ट्राचा राहिला. जातीविरुद्ध वर्तन हा भयंकर सामाजिक गुन्हा ठरला असल्याने तसे वर्तन करण्याचे धाडस कोणातही उरले नाही. प्राप्त स्थितीत ज्याही रोजगाराच्या संध्या होत्या त्या प्रत्येकाने मिळवल्या, जीवनशैलीतील बदलही स्वीकारले, परंतू जातीय भावना दृढमुलच राहिल्या यामागे जात ही एकार्थाने संरक्षक कवच म्हणुन काम करत होती हे मूख्य कारण आहे. ते कवच तोडणे अथवा झुगारुन देणे फायद्याचे नव्हते. किमान असल्याने नुकसान तरी नव्हते. कारण व्यापक धर्मापेक्षा जातीधर्म कालौघात सर्वोपरि बनला होता.

पुर्वी व्यवसायावर आधारित जाती बनल्या हे आपण पाहिलेच आहे. इंग्रजकाळ येईपर्यंत त्या व्यवसायाधिष्ठित स्थिर बनल्या हेही आपण पाहिले. पण इंग्रजकाळात मात्र असंख्य लोकांना आपापले परंपरागत व्यवसाय सोडावे लागले असले व अगदी नवीन असेही व्यवसाय स्वीकारावे लागले असले तरी जातिनिष्ठ लवचिकता पुन्हा आलीच नाही, जाती कायमच राहिल्या. याचे कारण आहे ही (इंग्रजी) सत्ताही किती काळ टिकेल व नवी व्यवस्था कशी असेल याबाबत समाजमन साशंक असने स्वाभाविक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात डोकावले व त्यात जनमानसाचे असे प्रतिबिंब नोंदवले गेले नसले तरी ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या त्या आशा आणि साशंकतेच्या हिंदोळ्यावर दोलायमान होत्या असेच म्हणावे लागते. भारतीय जनमानसाने गांधीजींना का स्वीकारले याचे खरे उत्तर त्यांच्या चरख्यात आहे. स्वातंत्र्य मिळाले कि भारत औद्योगिकरणाचा नव्हे तर परंपरागत उत्पादनपद्धतीचा मार्ग चोखाळेल व आपले व्यवसाय पुन्हा बरकतीस येतील ही आशा त्यांना वाटणे स्वाभाविक होते. औद्योगिकरण हे कोणत्याही, त्यातल्या त्यात भारतासारख्या देशाला, अभिशाप आहे असे गांधीजी म्हणत. स्वयंपुर्ण ग्रामव्यवस्था, जी भारतीय अर्थव्यवस्थेचा हजारो वर्ष कणा राहिली आहे तीच स्वातंत्र्यानंतर राबवली जाईल असा विश्वास लोकांना गांधीजींमुळे होता. देशभर उठलेले स्वातंत्र्याचे आंदोलन हे जनसामान्यांसाठी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा परंपरागत उद्योगपद्धतीच्या/अर्थव्यवस्थेच्या पुनर्जीवनासाठी होते हेही वास्तव आतातरी येथे समजावून घ्यायला हवे. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षात तसे काही झाले नाही हा भाग वेगळा. तसे होणे अशक्यही होते हेही खरे.

खरे तर सुरुवातीच्या काळातच नवे भारतीय अर्थशास्त्र विकसीत व्हायला हवे होते. भारतीय मानसिकतेला आधारभूत अशीच त्याची रचना केली जायला हवी होती. अर्थव्यवस्थेची रचना समूळ बदलल्याखेरीज जातीची बेटे विरघळनार नाहीत याचे भान यायला हवे होते. हे सारे मध्ययुग ते ब्रिटिशकाळ येईपर्यंतच्या काळात घडणे शक्य होते, पण आपले त्या काळातील विचारवंत/संत इहलोकीक ध्येयांपेक्षा पारलौकिकतेकडे डोळा लावून बसल्याने त्यांनी जातीभेदाबाबत कितीही विरोध दर्शवला असला, तीवर कठोर प्रहार केले असले तरी प्रत्यक्षात त्याचे अनुसरण अशक्य होते. आर्थिक प्रेरणाच नेहमी संस्कृती घडवत असतात याचे आपले भान सुटले. आजही या स्थितीत फारसा बदल घडलेला नाही. जो बदल दिसतो तो फक्त ४-५% लोकांपर्यंत मर्यादित आहे. साताठशे वर्ष ज्यांच्या अविरत आर्थिक वाताहतीच होत राहिल्यात, आजही पायावर हिम्मतीने व स्वाभिमानाने उभे राहता येईल अशी मानसिक स्थिती निर्माण होईल असे सबळ वातावरण नाही म्हणुन आजही जातच बव्हंशी लोकांना मानसिक आधार वाटते, जातीची अपरिहार्यता म्हणुन नव्हे हेही एक वास्तव समजावून घ्यावे लागणार आहे.

जातीसंस्थेचा हा विलक्षण प्रवास आपण पाहिला. ती उध्वस्त करायची असेल तर नेमके काय करावे लागेल यावरही आपल्याला विचार करायला हवा...त्यावर पुढील भागात...



(क्रमश:)



-संजय सोनवणी

९८६०९९१२०५

Friday, November 16, 2012

एक जग:एक राष्ट्र (३)


राष्ट्र: राष्ट्रवाद आणि विश्ववाद

राष्ट्र म्हणजे नेमके काय यची सर्वमान्य होईल अशी व्याख्या आजही अस्तित्वात नाही. तरीही आपण राष्ट्राबाबत (व राष्ट्र-राज्याबद्दल) वेळोवेळी केल्या गेलेल्या काही व्याख्या पाहुयात.

१. समान वंश, भाषा, संस्कृती, आणि इतिहास असणा-या लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. (या व्याख्येनुसार भौगोलिक सीमा असण्याचे बंधन नाही.)

२. जोसेफ स्ट्यलीनच्या व्याख्येनुसार (१९१३) "राष्ट्र म्हनजे वंश अथवा जमात नसून ऐतिहासिक दृष्ट्या संघटित लोकांचा समुदाय होय."

३. वर्ल्ड बुक शब्दकोशानुसार, अ. "समान देशात (भूभागात) राहणारे, एकाच शासनाखाली संघटित झालेले व साधारणतया समान भाषा बोलणा-या लोकांचे मिळुन राष्ट्र तयार होते." ब. "सार्वभौम राज्य म्हनजे राष्ट्र होय. क. समान भाषा व पुर्वज असलेली जमात अथवा वंश म्हनजे राष्ट्र होय."

४. विविध वंश, एक अथवा अनेक संस्कृती एकाच शासनाखाली संग्रहित होतात तेंव्हा त्यांचे राष्ट्र बनते." (Collins English Dictionery.)

५.  राजकीय इतिहासकार कार्ल ड्युशच्या मते, " राष्ट्र म्हणजे इतिहासाबाबतच्या गैरसमजातुन व शेजा-याच्या द्वेषातून एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र."

६. बेनेडिक्ट अंडरसन यांच्या मते राष्ट्र म्हणजे एक काल्पनिक राजकीय बंधयुक्त समुदाय.

७. राष्ट्र-राज्य म्हणजे जागतीक समुदायाकडुन मान्यताप्राप्त विशिष्ट भुभागावर अस्तित्वात आलेले सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले अस्तित्व ज्यात राष्ट्राचे सर्व किंवा काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.

अशा रितीने राष्ट्राच्या अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला आहे व या व्याख्यांत काळानुसार उत्क्रांतीही झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. अनेकदा राष्ट्र व राष्ट्र-राज्य हा शब्द समानार्थी घेतला जात असल्याने (मीही या लेखमालेत राष्ट्र हा शब्द राष्ट्र-राज्य या अर्थानेच वापरला आहे.) राष्ट्र या शब्दाच्या व्याख्याही तदनुषंगिक वेगवेगळ्या अर्थछ्टा सुचवत असतात हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व व्याख्यांचा विचार करता आपण खालील निष्कर्ष काढु शकतो...

१. जेंव्हा आपण फक्त निखळपणे "राष्ट्र" हा शब्द वापरतो तेंव्हा विशिष्ट भौगोलिक, राजकीय बंधनातीत विशिष्ट वंशीय, भाषिक अथवा धार्मिक समुदायाचे मिळुन राष्ट्र होते असे म्हणु शकतो.  भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालातील द्विराष्ट्रीय सिद्धांत हा भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत या गृहितकावर आधारीत होता असे आपण पाहु शकतो. त्यात भाषा, वंश व संस्कृत्यांचा विचार केला गेलेला दिसत नाही, अन्यथा अनेकराष्ट्र सिद्धांत अस्तित्वात येणे सहज शक्य होते. युरोपात राष्ट्र व वंश, भाषा, संस्क्रुतीचा एकत्रीत विचार करता येणे सहज शक्य होते. याचे मुख्य कारण वांशिक सिद्धांताविषयकच्या तत्कालीन अज्ञानात होते असेही आपण आता म्हणु शकतो. पाकिस्तान हे वांशिकदृष्ट्या (वांशिक सिद्धांत मान्य केला तर) एकसमान नसूनही पाकिस्तानला राष्ट्र-राज्य मान्यता आहे तशीच ती भारतालाही आहे. जगात अशी अनेक राष्ट्रे आहेत जेथे समान वंश संकल्पना राबवता आलेली नाही.

२. राष्ट्र संकल्पनेत समान संस्कृतीचा वैशिष्ट्यपुर्ण आग्रह असतो. एकाच संस्कृतीच्या लोकांना एकमेकांबद्दल एक समान आत्मबंधाची भावना असते असे गृहितक या तत्वामागे आहे. परंतु इतिहास या तत्वाला मान्यता देत नाही. रोमन संस्कृती ही ग्रीक संस्कृतीचीच पडछाया होती असे म्हणने वावगे ठरणार नाही, तरीही इटली व ग्रीस हे ऐतिहासिक काळापासून सर्वस्वी पृथक राजकीय अस्तित्वे म्हणुणच राहिलेली आहेत. दुसरे असे कि कोणतीही सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती पुराऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जरी प्रादेशिक म्हणुन काही वैशिष्ट्ये जागतिक संस्कृत्यांनी जपली असली तरी त्यावर कोणत्या ना कोणत्या बाह्य संस्कृतीचा प्रभाव पदलेला आहे. कधी कधे तो एवढा पडलेला आहे कि मुळच्या संस्कृत्या त्या प्रभावात वाहून गेलेल्या आहेत. भारतापुरते पहायचे तर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती म्हणुन ज्याही संस्कृत्या येथे जन्मल्या त्या कालौघात एवढ्या बदललेल्या आहेत कि मूळ संस्कृत्यांचे अवशेष शोधावे लागतात. जपानचेच उदाहरण घेतले तर जपानी संस्कृतीवर चीनी संस्कृतीचा अमिट प्रभाव आहे. चीनवर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आजही युरोपियन राष्ट्रांच्या संस्कृतीवर (व म्हणुन जागतीक संस्कृतीवर)  आहे. थोडक्यात संस्कृत्या या परिवर्तनीय असतात व त्या सर्वस्वी स्वतंत्र अशा कधीच नसतात. त्यामुळे "समान संस्कृती" हे तत्व राष्ट्र या संकल्पनेला पुरेसे लागू पदत नाही.

३. एक धर्म हे तत्व राष्ट्र (व म्हणुन राष्ट्र-राज्य) संकल्पनेचा पाया ठरु शकतो काय यावरही विचार करायला हवा. जगात सर्वात आधी गौतम बुद्धाने सर्व जगभर आपला धम्म प्रस्थापित करण्याची आकांक्षा बाळगली. अर्थात त्यात राजकीय भाग नव्हता. ख्रिस्ती धर्माने तशी स्वप्ने पाहिली व काही प्रमाणात यशस्वीही केली असे वरकरणी दिसते. मुस्लिमांनी त्यावर कडी केली. तुर्कस्थानच्या खलिफाला आपला सार्वभौम सम्राट मानत जगभरच्या वेगवेगळ्या प्रदेशांत मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्या. भारतातही मोगल सम्राट ते पार टिपू सुलतानापर्यंत खलिफाकडुन वस्त्रे घेण्याची प्रथा होती...म्हनजेच एकार्थाने ते खलिफातर्फे राज्य करत असत. आधुनिक काळात मौलाना जमालुद्दिन अफगानी यांनी तर विश्व-इस्लामवादाची संरचना केली. (यावर आपण स्वतंत्र विचार नंतर करणार आहोत.) शिया-सुन्नी विभागणीमुळे इस्लामी राष्ट्र-राज्यांतही कसा संघर्ष पेटत असतो हे आपण आताही पाहत आहोत.

धर्म हे एकमेव राष्ट्र-राज्याचे कारण असू शकत नाही हे आपण प्रत्यक्ष उदाहरनांवरुन पाहु शकतो. आज युरोपियन युनियन ही ढोबळपणे ख्रिस्ती राष्ट्रांची मिळुन बनलेली दिसते. परंतु त्यांच्यातील आंतरकलह हे "एक धर्म" या तत्वाने मिटत नाहीत हेही आपल्याला दिसते. म्हणजे एकधर्मतत्व हे कोणत्याही सध्याच्या सार्वभौम राष्ट्राच्या अस्तित्वासाठीचे एकमेव प्रेरक कारण आहे असे दिसत नाही अन्यथा सध्याच्या एकुणातील राष्ट्रांची संख्या ब-यापैकी घतल्याचे चित्र आपल्याला दिसले असते.

४. समान इतिहास हेही एक महत्वाचे तत्व राष्ट्र संकल्पनेत येते. कार्ल मार्क्सच्या मते राष्ट्र ही संकल्पना खोट्या वा भ्रामक इतिहासाच्या जीवावर बेतलेली असते. समान इतिहास अस्तित्वात नसतो असा मतितार्थ काढायचा नाही. परंतू समान इतिहास हा अत्यंत व्यापक परिप्रेक्षात जातो तेंव्हा तो एकार्थाने जागतीक इतिहास बनतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. बव्हंशी इतिहासाकडे आपण "आमचे व परके यांच्यातील संघर्ष" या दृष्टीकोनातुन पहात जो इतिहास आम्हाला हवासा असतो तो आमचा इतिहास हा समान इतिहास असतो. पण आमचा म्हणजे नेमक्या कोणाचा? जित-विजित घटनांत सामाविष्ट समाजांनी अनेकदा बाजु बदललेल्या असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर असे घडणे स्वाभाविक असते. भारतात हिंदू व मुस्लिमांनी एकार्थाने समान इतिहास उपभोगला आहे. म्हणुन पाकिस्तानची निर्मिती थांबत नाही कारण इतिहासाकडे आमचा व तुमचा ही सरळ विभागणी आहे व दोन्ही बाजु इतिहासाचा अन्वयार्थ आपापल्या हिताचाच काढनार हे उघड आहे. हेच आपण जागतीक पातळीवर पुरातन काळापासून झालेले पाहू शकतो. आपापल्या इतिहासाला सापेक्ष स्वरूप देवून त्याला गौरवशाली, प्रेरक बनवत राष्ट्रभावना वाढवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो हे एक वास्तव आहे. त्यामुळेच लोर्ड अक्टन (Lord Acton) म्हणतो कि "राष्ट्राचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट आहे." आणि ते खरेच आहे.

इतिहासाचे असे प्रांतनिहाय, देशनिहाय तुकडे पडु शकत नाहीत. नि:पक्षपातीपणे लिहायला गेलो तर सध्याच्या प्रत्येक राष्ट्राचा इतिहास हा जागतीक इतिहास आहे हे लक्षात येईल. तोच खरा समान इतिहास होय. समान इतिहासाच्या तत्वावर राष्ट्र ही संकल्पना उभी रहात नाही याला जगातील अनेक राष्ट्रे साक्षी आहेत.

या व अशा अनेक कारणांमुळे राष्ट्र म्हणजे भाषिक, वांशिक, राजकीय अथवा प्राणिज एकता नसून ती भावनात्मक एकता असते असे जर्मन तत्वज्ञ ओस्वल्ड स्पेंग्लर म्हणतो ते मान्य करावे लागते. एवढेच नव्हे तर बेनेडिक्ट अंडरसन म्हणतो कि राष्ट्र म्हणजे अन्य काही नसून ती एक काल्पनिक भावना आहे. ही भावना नैसर्गिक नसून ती जोपासावी लागते. अनेकदा ती भडकवलीही जाते. राष्ट्रवादाचा अतिरेक आपण फ्यसिस्ट इटली आणि नाझी जर्मनीच्या रुपात पाहिला आहे. वंशवाद, सांस्कृतीकता, भाषा, सीमा ई.च्या आधारावर भावना भदकावणे सोपे असते. त्यामुळे लोक एकत्र येतात व समानतेची भावना जागी करतात हे आपण वारंवार पहात असतो. अनुभवत असतो. एक अर्थव्यवस्था, एक राजकीय सत्ता, समान कायदे व प्रत्यक्ष व काल्पनिक राष्ट्रीय सीमा या भौतिक पातळीवर राष्ट्राचे भावनात्मक अस्तित्व ठरवत असतात. याच भावनांवर राष्ट्रांतर्गतच्याही प्रांतीय अस्मिता जोपासल्या जात असतात. त्यामुळेच तत्वार्थाने कोणतेही सार्वभौम राष्ट्र हे अनेक राष्ट्रांचा समूह असते. भारतासारखा देश हा असंख्य जातींनी बनलेल्या राष्ट्रांचा समुह आहे असेही म्हटले जाते ते यामुळेच.

राष्ट्र ही कृत्रीम भावना आहे. दुस-या महायुद्धानंतर वसाहतींना स्वतंत्र होण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग झाला आहे. साम्राज्यवादी शक्तींशी मुकाबला करणे राष्ट्रवादामुळेच शक्य झाले आहे हे राष्ट्रवादाचे ऐतिहासिक कार्य दृष्टीआड करता येत नाही. तरीही ही नव-स्वतंत्र राष्ट्रे नंतर साम्राज्यवादी शक्तींचेच हस्तक बनली हे वास्तव नाकारता येत नाही. स्वतंत्र धोरणे, संपुर्ण राष्ट्रहित, आर्थिक स्वयंपुर्णता व अन्य राष्ट्रांशी समान पातळीवरील स्पर्धा करु शकणारी राष्ट्रे आज जगात नाहीत म्हटले तरी चालेल. सर्वच राष्ट्रे परावलंबी असून परस्पर सहकार्य (मग त्यासाठी आमिषे, दडपण, प्रत्यक्ष कृती ई. मार्ग वापरोत) असल्याखेरीज कोणतेही राष्ट्र आज आपले अस्तित्व टिकवू शकत नाही. अशा स्थितीत विश्ववाद जोपासत जगाची नवी संरचना करणे आवश्यक आहे. ते कसे शक्य आहे व तसे झाले तर मानवी अस्तित्व नेमके कोणत्या स्थितीत परिवर्तीत होवू शकते यावर पुढे आपण विचार तर करुच पण अडथळ्यांचे कोणती शर्यत सुजाण मानवी समुदायाला जिंकावी लागणार आहे त्यावरही चर्चा करू.  

Thursday, November 15, 2012

असण्यात नसून आणि नसण्यात असून...


मी मोजत बसतो
क्षितीज घेऊन उशाला
रक्ताचा वाहता
प्रत्येक थेंब
शरीराच्या रोमारोमातून
जो रिक्त करत मला
चाललाय व्यापत महाकाश...

नाही...
वेदना नाहीत...
हताशा नाहीत...
उलट हे रक्तथेंब
व्याकुळल्या वेदनांचे
पंख फुटलेले
दिव्यभारित स्वप्नपूष्प जसे
मूक्त करायला वेदना
चराचराच्या आणि
रानोमाळी उमटणा-या
आर्त हुंकारांच्या
सादाला प्रतिसाद देत
विश्व व्यापणा-या
वेदनांचे मूक रुदन जसे
.....
वेदनांनाच वेदना कळतात ना?

मी होत चाललोय रिक्त...रिक्त
तसतसा भरला जातोय माझ्यात एक
दिव्य प्रकाश
रक्ताच्या थेंबाथेंबामागोमाग
उसळतोय तोही प्रकाश
द्यायला बळ
त्या स्वप्नपाखरांना...

जाईल वाहुन शेवटचा थेंब
क्षितीजाला देत अखेरचे अर्ध्य
क्षितीजे होतील तुडुंब
प्रकाशाची राने
आणि जातील विझून वेदनांचे
मोकाट उठलेले वणवे...

मी पहात असेल
कोठुन तरी
हा आनंद सोहोळा...
असण्यात नसून आणि नसण्यात असून...

Thursday, November 8, 2012

एक जग:एक राष्ट्र (२)


राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे.....?

स्वातंत्र्य:समता:बंधुता या महनीय तत्वांची देणगी जगाला दिली ती फ्रेंचांनी. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीची व प्रबोधनकाळाचीही पार्श्वभुमी होती. धर्मसत्ता आणि राजसत्तांतील युती व संघर्षही जगाने या काळात पाहिले. पोपने धर्मसत्ताच सर्वोपरी असून पोपचे आदेश न मानल्यास राजांनाही धर्मातुन काढुन टाकण्याचा अधिकार आहे असे दावे सुरु केले आणि संघर्ष सुरू झाला. त्यात पोपच्या पदासाठीच धर्मांतर्गत संघर्ष सुरु झाल्याने पोपही कमकुवत बनला याचा फायदा युरोपियन राज्यकर्त्यांने उचलला. याच काळात सरंजामदारांचेही वर्चस्व जवळपास जगभर वाढल्याचे आपल्याला दिसते. सरंजामदारांशिवाय राज्यही करता येत नाही पण त्यांचे वर्चस्वही हटवता येत नाही अशा पेचात तत्कालीन राज्यव्यवस्था सापडल्याचे आपल्याला दिसते. सरंजामशाहीमुळे राज्यसत्ता दुर्बळ ठरु लागल्याने औद्योगिकरण व व्यापार यामुळे धनाढ्य बनलेल्या वर्गाला प्रबळ राज्यसत्तेची गरज भासू लागली होती. सरंजामशाहीच्या तसेच अनियंत्रित राजेशाहीच्या तत्वांनाही छेद देईल असे नवे तत्व या वर्गाला हवे होते.

अशा वेळीस राष्ट्रवादाचे तत्व पुढे आणले गेले. एक वंश, एक प्रदेश, एक धर्म, समान इतिहास, परंपरा आणि हितसंबंध या मुलतत्वांवर प्राथमिक राष्ट्रवाद अस्तित्वात आला. मध्ययुगाच्या अखेरीस युरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वरील तत्वांना सुसंगत ठरेल अशी परिस्थितीही होती. प्रादेशिक निष्ठा महत्वाच्या बनल्यामुळे मातृभुमी...पितृभुमी या उदात्त दृष्टीने आपल्या भौगोलिक प्रदेशाकडे पाहिले जावू लागले. यातुन समाजाचे अंतरंग व बहिरंगही बदलू लागले. त्यामुळे राष्ट्रवादावर उभारलेली, पण इश्वरदत्त मानली गेलेली राजसत्ता राष्ट्रनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली.

यातुन पुर्वी जी सातत्याने सीमा बदलत असनारी, प्रादेशिक अभिमानाचा विशेष जोर नसणारी व्यवस्था स्थिर होत विशिष्ट भौगोलिक सीमांतर्गतचे आपले भावनिक अधिष्ठाण असनारे राष्ट्र व त्याचा अनिवार अभिमान असा राष्ट्रवाद अस्तित्वात आला. पण सर्वच राष्ट्रे (युरोप) महत्वाकांक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय कलहांचे रुप बदलले. आपापल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संफ़्घर्ष सुरु झाला. त्यासाठी इतर राष्ट्रांचे हितसंबंध धोक्यात आले तरी चालतील ही भावना प्रबळ झाली. परस्परांत युद्धे वाढु लागली. त्यामुळे राष्ट्रभावनाही प्रबळ होत गेल्या. युद्धात हार झाली कि सामर्थवाढीचे उद्योग व पुन्हा सुडासाठी युद्धे असा क्रमच बनला. सत्ता संपादन, रक्षण आणि प्रादेशिक विस्तार ही राज्यांची प्रमूख वैशिष्ट्ये बनली.

यातुनच प्रजेचाही राज्यव्यवस्थेत वाटा असला पाहिजे या भावनेतून राजसत्तेचे एकहाती नियंत्रण कमी करत लोकशाहीची स्थापना अपरिहार्य वाटु लागली. शासन हे प्रजेचे प्रजेतर्फे चालवले जाणारे असावे कारण राजा नव्हे तर प्रजा सार्वभौम आहे या तत्वाचा प्रभाव वाढत होता. इंग्लंडमद्धे अशा रीतीने लोकशाहीची स्थापना झाली. लोकशाहीसोबतच राज-सत्ता, हुकुमशाही सत्ता, लष्करी सत्ताही काही राष्ट्रांत होत्या वा तशा सत्ता आनण्याचे प्रयत्नही सुरु होते. उदा. नेपोलियनने फ्रांसमद्धे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.

हे सारे होत असले तरी म्हणुन साम्राज्यवाद संपला असे नव्हे. माणसाला मानवी स्वातंत्र्याबद्दल अजून खूप शिकायचे होते. आजही शिकला आहे असे नाही. सम्राटांचा साम्राज्यवाद जावून आता राष्ट्रांचा साम्राज्यवाद सुरु झाला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढणारे उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती तसेच आपल्या देशाला लागणारी स्वस्त साधनसामुग्रीही स्वस्तात व सातत्याने मिळवण्याची गरज होती. त्यातुन वसाहतवाद पुढे झेपावला. आफ्रिका, आशिया, अमेरिकादि खंडांवर यूरोपियनांनी कब्जा मिळवत वसाहतवादी साम्राज्ये स्थापन केली. अमेरिकेने पहिले स्वातंत्र्ययुद्ध छेडुन स्वातंत्र्य मिळवले व एक नवीनच राष्ट्र संकल्पनेचा पाया घातला. त्याबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत त्यामुळे येथे एवढेच.

पहिले महायुद्ध हे वर्चस्ववादाच्या भावनेने गाठलेल्या टोकाचे फळ होते. या युद्द्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वामुळे अनेक छोटे प्रदेश अस्मितेच्या बळावर राष्ट्र म्हणुन उदयाला आले. ही छोटी राष्ट्रे आर्थिक व लश्करी दृष्ट्या कमकुवत असल्याने यूरोपातील अंतर्गत संबंध तणावाचे बनू लागले. यातुन राष्ट्रवाद सौम्य न होता टोकाचा वाढत गेला. जर्मनीत नाझी तर इटलीत फ्यसिस्ट पक्षांची सरकारे केवळ अतिरेकी राष्ट्रवादाच्या परिणती होत्या. त्यात साम्यवादी सत्तांचाही उदय रशियाच्या रुपाने झाला होताच. शासनाची पद्धत कोणतीही अस्ली तरी राष्ट्रवाद हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा मुलभुत गाभा होता. त्यातुनच विनाशक दुसरे महायुद्धही घडले. जगाचा नकाशा बदलला. आजवर जागतीक घडामोडींपासून अलिप्त असनारे "स्वतंत्र जग" अमेरिका या युद्धात पडले व त्यातुनच एक बलाढ्य जागतीक सत्ता
म्हणुन उदयाला आले. या युद्धातुन नवी राष्ट्रे निर्माण झाली. बव्हंशी स्वतंत्र होवून तर इस्राएलसारखी नवनिर्मिती म्हणुन.

हा सिलसिला पुढेही चालु राहिला. साम्यवादी जग विरुद्ध भांडवलशाहीवादी जग असा नवा संघ्र्ष सुरु झाला. त्यातुनहे अनेक राष्ट्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण करत अमेरिका व रशियाने जगाचा नकाशा स्थिर राहु न देण्याचा निर्धार केला. भारतानेही ७१च्या युद्धातुन बांगलादेशाची निर्मिती घडवली. पुढे सोव्हिएट रशियाही कोलमडला व पुन्हा अनेक राष्ट्रे स्वतंत्रपणे जगाच्या नकाशावर आली....

सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याची आकांक्षा असणारे, त्यासाठी संघर्ष करणारे अनेक समाजगट जगात आजही आहेत. तज्ञ म्हनतात त्याप्रमाने प्रत्येक राज्य हे राष्ट्र राज्य आहे असे नाही व त्याशी सहमत व्हावे लागते. लष्करी अथवा पोलिसी बळावर अशी स्वातंत्रे नाकारली जातात. एका अर्थाने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राज्यात समतेचे व स्वातंत्र्याचे मूलतत्व पाळतेच असा दावा करता येत नाही.

या राष्ट्रांच्या इतिहासावरुन स्पष्ट दिसते कि ब-याचशा राष्ट्राची सीमा ती राष्ट्रे म्हणुन स्थापन झाली तेंव्हापासुन तशीच राहिली आहे असे म्हणता येत नाही. भारतानेही राष्ट्र म्हणुन असलेली सीमा स्थापनेपासून दोनदा गमावली आहे. विभाजनवादी संकल्पना बाळगणारे खलिस्तानवादी असोत कि काश्मिर असो...भारतात अस्तित्वात आहेतच. त्यासाठी त्यांचा संघर्षही सुरु आहेच. जगात अनेक ठिकाणी असे घडते आहे व जगाची शांतता अधुन-मधुन ढवळुन निघते आहे. व याचीच परिणती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात अविश्वासाचे व असुरक्षिततेचे वातावरण वाढत आहे...आणि लष्करी शक्ती हरप्रकारे वाढवण्याच्या प्रचंड स्पर्धेत सारीच मानवजात आज पडली आहे. यातून तिसरे महायुद्ध होईल कि काय अशी भिती वारंवार व्यक्त होत असते...ती भिती अनाठायी आहे असे म्हनता येत नाही. याचे कारण म्हणजे गेल्या शतकात धार्मिक मुलतत्ववादाचा उदय आणि त्याच वेळीस बलाढ्य राष्ट्रांचा लष्करी शक्तीमुळे उदयाला आलेला सर्वाधिकारीपणा. मानवी मूल्यांची व्याख्या बलाढ्यांनीच करणे हा पुरातन नियम आजही लागू होतो आहे. आखाती देशांत निर्माण केला गेलेला संघर्ष या वर्चस्वतावादाचीच अनेकांपैकी एक परिणती होती.

अशा स्थितीत आज "राष्ट्र" या संकल्पनेची अपरिहार्यता मुळात आहे काय यावर विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय व तो कोठुन येतो आणि या संकल्पनेची मानव जातीला आज उपयुक्तता आहे काय हेही समजावून घेण्याची आवश्यकता आहे. "राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे..." असे काही विचारवंतांना का वाटते तेही समजावुन घ्यायला हवे.

(क्रमश:)

Wednesday, November 7, 2012

एक जग:एक राष्ट्र (१)




व्यवस्थांचा धावता इतिहास...

मानवी इतिहासात पार मागे डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येते की जगभरच्या मानवी समाजांत असंख्य स्थित्यंतरे झालेली आहेत. अनेक नव्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत व त्या कालौघात कोलमडुन नव्या व्यवस्था अवतरल्या आहेत. सध्याचे मानववंशशास्त्र सांगते कि मनुष्य हा प्रथम आफ्रिका खंडात अवतरला व तेथुन तो सर्वत्र पसरला. आज तरी हा सिद्धांत मान्य असल्याने तो गृहित धरुयात. अधिक पुरातन काळी सर्वच खंड एकत्र जोडले गेले असल्याने अथवा हिमयुगात गोठलेल्या समुद्रपृष्ठावरुन चालत जाणे सहज शक्य असल्याने मानवी वितरण सर्वत्र झाले असावे असे अंदाज आहेत. मनुष्य सर्वत्र पसरला हे वास्तव मान्य करून पुढे जावूयात.

पुरातन मनुष्य ही भटकंती का करत होता? उत्तर सोपे आहे. अर्थातच अन्नाच्या शोधासाठी. आदिमानव हा प्रामुख्याने अन्नसंकलक मानव होता. अन्नासाठी एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात जाणे आवश्यक होते. तो टोळीमानव होता. सर्वच मानवी समाज टोळ्यांत विभक्त झालेला होता. पुढे तो शिकारी मानव बनला. त्यानंतर त्याला पशुपालनाचा शोध लागला आणि पशुपालक मानव भूतलावर अस्तित्वात आला. सर्वच टोळ्या पशुपालक वा शिकारी बनल्या असे नव्हे. काही अन्नसंकलकच राहिल्या तर काही शिकार हेच मुख्य उपजीविकेचे साधन मानत राहिले. त्यासाठी भटकणे भाग होते. सध्याच्या अरण्यतील शिकार संपली कि दुस-या अरण्याच्या शोधात भटकणे सुरुच होते. या काळात विशिष्ट भुमीबद्दलची ओढ अथवा मालकीहक्काची संकल्पना निर्माण होणे शक्य नव्हते. जेथे मुबलक अन्न उपलब्ध आहे त्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यापुरते मानवी टोळ्यांत संघर्षही होत. या संघर्षात जो हरेल त्याला गुलाम करणे अथवा हुसकुन लावणे आणी पराजिताच्या स्त्रीयांना मात्र ताब्यात घेणे हे सर्रास प्रकार होत असत.

त्याहीपुढच्या टप्प्यात त्याला शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध ही मानवी इतिहासातील सर्वात महत्वाची क्रांती मानली जाते. या क्रांतीने मानवी व्यवस्था व मानसिकता बदलवायला फार मोठा हातभार लावला. अर्थात सुरुवातीची शेती ही तात्पुरती व भटक्या स्वरुपाची होती. नंतर मात्र मनुष्य जलाशये, नद्या, ओढे असलेल्या व सुपीक जमीनींच्या क्षेत्रांत स्थिर होवू लागला. स्थिर झाल्याने त्याला निवा-यांची आवश्यकता भासली तसेच शेतीसाठी उपयुक्त उपकरणांच्या शोधांचीही. मानसाने आपली कल्पकता व बुद्धीमत्ता पणाला लावत लाकुड, दगड, चर्म, तांबे ते लोह ई. नैसर्गिक संसाधनांना आपल्या उपयुक्ततेत बदलवले.

या स्थिरतेमुळे भुमीवरील मालकीची संकल्पना विकसीत झाली. परंतु कोणती जमीन कोणाची व का हे ठरवण्यासाठीचे कसलेही नियम आरंभी नव्हते. त्यामुळे त्यात व्यवस्था आणने भाग होते. यातुनच आरंभिक गणसत्ता अस्तित्वात आल्या. टोळीसत्ता ते गणसत्ता हा प्रवास मानवाने केला तो त्याच्या तातडीच्या निकडीपोटी. त्यामुळे आपले जीवित, वित्त, भुमी आणि स्त्रीया याच्या रक्षणाची हमी त्याला मिळनार होती. ही सुरक्षा दोन पातळीवरची...स्वगणांतर्गतची आणि गणबाह्यही...होती. अर्थत हे गण टोळ्यांतुनच निर्माण झाले असल्याने अल्पसंख्य असत. स्थिरतेचा एक तोटा म्हनजे लोकसंख्येची वाढ. त्यामुळे अधिकाधिक उपजाऊ भुमीची गरज भासणे स्वाभाविक होते. त्यातून गणांत युद्धे होत असत व गणांतील सर्वच लढु शकणारे लोक युद्धांत भाग घेत असत. या युद्धांत अनेक गण नष्टही होत वा गुलाम बनवले जात. बौद्ध जातकांत दास हा एक वर्ग आहे. तो पराजित गणांतील गुलाम केला गेलेला वर्ग होय. जगभर अशी स्थिती निर्माण झाली. ग्रीकांनी जी नगरराज्ये बनवली ती एकार्थाने (सर्वस्वी जशीच्या तशी नसली तरी) गणराज्येच होती. गणांना आपापल्या गणांचा केवढा अभिमान असे हे आपण पुन्हा बौद्ध जातकांत पाहू शकतो. शाक्य गण हा सर्वात श्रेष्ठ आहे अशी शाक्य गणाची धारणा होती. सिंधु संस्कृतीही ग्रीकांप्रमाणेच नगरराज्यांची बनली असावी असा अदमास काढता येतो. अर्थात त्यासाठी सबळ पुरावा नाही.

गणराज्ये अथवा नगरराज्यांतुनच पुढे राजा व राज्य ही संकल्पना माणसाने विकसीत केली. निवडक ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याने कारभार करणारा राजा हा ईश्वराचे प्रतीक बनून सत्ताधारी बनवला गेला ते कारभाराच्या सुलभतेसाठी. गणराज्यव्यवस्था निर्णयप्रक्रियेत अडचणीची ठरु लागणे व अतिरिक्त महत्वाकांक्षा यातुन राजव्यवस्था आकाराला आली असे ढोबळमानाने म्हणता येते. ही एकार्थाने अल्पनियंत्रीत एकव्यक्तिकेंद्रीत व्यवस्था असते. राजा ही सर्वोच्च व्यक्ती असते. मुलकी अधिकारी, सैनिक व सैनिकी अधिकारी त्यांच्या मार्फत तो सत्ता गाजवत असतो. निर्णयप्रक्रियाही वेगवान असते. अधिकचे प्रदेश जोडुन घेण्यासाठीची आक्रमकता हा राज्यांचा मुलभूत हेतू असतो. गनराज्यव्यवस्था हळुहळु संपत गेली आणि राजेशाहीने त्याची जगभर जागा घेतली. (अपवाद आहेत. जगात आफ्रिका, आशिया ते अमेरिका खंडात अद्यापही टोळीव्यवस्थाच प्राधान्याने होती.)

राजेशाही नेहमीच उन्मुक्त महत्वाकांक्षेला जन्म देते. आक्रमकता ही साम्राज्यवादात बदलते. राजेशाही व्यवस्थेकडुन साम्राज्यवादाकडे जगानेही प्रवास केला. भारतात नंद घराण्याने साम्राज्यवादाचा पाया घातला. बिंबीसाराने प्रथम साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली. (इसपु. ४९९). पुढे नंद, चंद्रगुप्त मौर्य, अशोक, सातवाहनादि राजांनी साम्राज्ये स्थापन केली. एकार्थाने साम्राज्य या संकल्पनेचा विकास भारतातच आधी झालेला दिसतो. चीनमद्धे पहिला सम्राट क्विन शि ह्युंगाई झाला तो सनपुर्व २२१ मद्धे. यानंतर ज्याला आपण जागतीक परिप्रेक्षातील साम्राज्यवादाची सुरुवात प्रथम अलेक्झांडर द ग्रेटने सुरु केल्याचे पाहतो. संपुर्ण जग जिंकुन ग्रीकांच्या अंमलाखाली आनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. पुढे साम्राज्यवादाची धुरा लोकशाहीवादी रोममधील ज्युलियस सीझरने उचलली. परंतु तो हयातीत सम्राट बनू शकला नाही. (मृत्यु-इसपु ४४) परंतु खरे साम्राज्य काय असते हे जगाला दाखवून दिले, व संपुर्ण पृथ्वी नसली तरी जगातील एकमेव अवाढव्य साम्राज्य बनण्याचा रोमनांनी सन्मान पटकावला. उत्तर आफ्रिका, युरोपचा बराच भाग, मध्यपुर्व ते आशिया खंडाचाही बराचसा भाग रोमनांनी अंकित केला. हे साम्राज्य प्रदीर्घकाळ (चार शतके) टिकले पण त्याचा
अंतर्गत ओझ्यानेच पुढे अंतही झाला. या साम्राज्याच्या अंताची विविध कारणे आहेत, परंतू आपण पुढे चर्चेच्या ओघात त्याबद्दल बोलुयात.

जगात पुढेही अनेक भागांत अनेक साम्राज्ये निर्माण होत गेली. खलिफात अथवा इस्लामी साम्राज्ये सातव्या शतकापासून जगभर सत्ता स्थापन करण्यासाठी स्पर्धेत उतरली. तेराव्या शतकात भारतातही इस्लामी साम्राज्य स्थापन झाले. सोळाव्या शतकापासून इंग्रज, फ्रेंच, स्प्यनिश व डचही साम्राज्यस्थापनेच्या कामाला लागले. सर्वाधिक यश अर्थातच इंग्रजांना मिळाले. जवळपास विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्रजांनी जगाच्या बहुतांश भागावर राज्य केले.

हिटलरही संपुर्ण जगावर नाझी (थर्ड राईश) साम्राज्य गाजवण्याच्या महत्वाकांक्षेने झपाटलेला होता. पण विसाव्या शतकात सर्वांचीच साम्राज्ये मिटली व एक नवी जागतीक व्यवस्था आकार घेवू लागली.

टोळीव्यवस्थेतुन गणराज्य व्यवस्था अथवा नगरराज्य व्यवस्था, त्यातुन राजेशाही व नंतर साम्राज्यशाही असा प्रवास जगाने केला. या प्रदिर्घ काळात कोणत्याही गणाची, राज्याची, अथवा साम्राज्यांची सीमा सुनिश्चित अशी नव्हती. त्यांत वारंवार बदल घडणे अपरिहार्य होते. मानवी भावना या आपला प्रदेश, भाषा, संस्कृती व धर्माशीच अधिक घट्ट राहिलेल्या आपल्याला दिसतात. पण त्यातही एकवाक्यता होती असे म्हनता येणार नाही. म्हणजे धर्मांतरे मोठ्या प्रमाणावर झाल्याने धर्म हाच सर्वांना जोडनारा एक समान धागा सर्वांसाठी होताच असे नाही. धर्मांतरितांना धर्मातील मुळ लोक समानता प्रदान करणे शक्य नव्हते हे आपण भारतातील अशरफ (उच्च) आणि अजलफ (हीण) मुस्लिम अशा वाटणीतुन सहज बघु शकतो.अमूक प्रदेशाची अमुक एक व अविकृत अशी संस्कृती आहे ही भावना असली तरी तसा दावा कोणत्याही संस्कृतीला करता येणार नाही एवढी सांस्कृतीक सरमिसळ पुरातन काळापासुन व्यवस्था बदलांमुळे व बदललेल्या राज्यव्यवस्थांमुळे झालेली आहे.

टोळीव्यवस्था, गणराज्य/नगरराज्य व्यवस्था व साम्राज्यव्यवस्था हा प्रवास जवळपास प्रत्येक आधीच्या व्यवस्थेच्या नाशातुन घडत गेला. त्यामुळे नवीन अभिनव व्यवस्था निर्माण होणे स्वाभाविकच होते व तशी ती झालीही. तिला आपण आज "राष्ट्र" व्यवस्था म्हणतो. याचा अर्थ राष्ट्र (नेशन) ही संकल्पना आधी उदयाला आली नव्हती असे नाही. चवदाव्या शतकात समान भाषा बोलणारे, एकाच समान कायद्यांतर्गत येणारे म्हणजे नेशन अशी व्याख्या करत प्यरिस विद्यापीठात विद्यार्थ्यांची "नेशन" म्हणुन विभागणी करण्यात आली. आधुनिक अर्थाच्या "राष्ट्र" या संकल्पनेचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीमुळे झाला. विसाव्या शतकापर्यंत ही संकल्पना जगभर स्वीकारली गेली.

असे असले तरी राष्ट्र म्हणजे नेमके काय? राष्ट्राची निर्मिती नेमकी कशी होते? नेमक्या कोणत्या मुलतत्वांनी मिळुन राष्ट्र बनते? इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा, वंश, प्रादेशिकता व सामाजिक तत्वज्ञानाचा त्यात नेमका कसा प्रभाव असतो? असे अनेक प्रश्न राष्ट्र व राष्ट्रभावना या संकल्पनेशी जोडले गेले आहेत व त्यावर एकोणिसाव्या शतकातील अर्न्स्ट रेनानपासून ते कार्ल मार्क्सनेही सैद्धांतिक उपपत्त्या मांडल्या आहेत. त्यावर आपण पुढील भागात चर्चा करुयात.  

Tuesday, November 6, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (५)


धर्मसंस्था आणि जाती...

सततचे दुष्काळ आणि आक्रमक सत्तांनी भारतात जवळपास संपुर्ण राजव्यवस्था व अर्थव्यवस्थाही ताब्यात घेतल्याने व्यवसाय करणारे संकुचित होत आपापल्या व्यवसायांत अन्य कोणीही पडुन स्पर्धा निर्माण करु नये म्हणुन एक नवी व्यवसायव्यवस्था निर्माण कशी झाली हे आपण मागील लेखात पाहिले आहेच. जातीव्यवस्थेची निर्मिती धर्माने केली नव्हती हेही आपण पाहिले आहेच. असे असले तरी ही नवी व्यवस्था बनत असतांना धर्माची म्हणून काय भुमिका होती हे तपासून पाहणेही तेवढेच आवश्यक आहे. एखादी व्यवस्था कायम होते तेंव्हा त्या व्यवस्थेसाठी बळ देणारे धर्माचे अधिष्ठानही शोधले जाते कारण त्यातून एक भावनिक तत्वाधारही मिळत असतो. त्यातून व्यवस्था ही नियमीत होत जात असते.

आपण हिंदू धर्म हा वैदिक आणि मुर्तीपुजकांच्या दोन विचारधारांचे व व्यवस्थांचे संम्मिश्रण आहे हे मागे पाहिलेच आहे. वर्ण व्यवस्था ही वैदिक धर्माची देनगी आहे तर जातिव्यवस्था ही मुर्तिपूजक समाजाची देणगी आहे. दोन्ही व्यवस्थांत एक साम्य पुर्वी होते व ते म्हणजे दोन्ही व्यवस्थांत लवचिकता होती. वर्णबदल जसा सहज होता तसा जातीबदलही सहज होता. इतिहासात पाहिले असता असे दिसते कि वर्णव्यवस्था ही आधी जन्माधारीत बनली तर जातीव्यवस्था उत्तरकालात. संमिश्रणाच्या काळापूर्वीच वर्ण जन्माधारित बनले असल्याने व वैदिक धर्मशास्त्रकारांनी अन्य सर्व जातींना, त्या वर्णव्यवस्थेच्या चौकटीत बसवायच्या प्रयत्नांत जे वरपांगी वाटप केले त्यातून एक अनर्थकारक परंपरा सुरू झाली.

वैदिकांनी जरी वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार केला असला तरी तो व्यवहारात पाळला जाणे शक्य नव्हते. याचे कारण म्हणजे राजा क्षत्रीय वर्णाचाच हवा असा वैदिक हट्ट असला तरी प्रत्यक्षात शुद्र, वैश्य, ब्राह्मण हे राज्यपाट सांभाळण्यासाठी अयोग्य मानले गेलेले वर्णही सत्ताधारी बनतच राहिले. वैदिकेतर संस्कृती ही अधिक बलाढ्य आणि देशव्यापी असल्याने वैदिक धर्मशास्त्रे उपयूक्त ठरणेही शक्य नव्हते. त्यामुळे स्म्रुतींचे पालन प्रत्यक्षात समाजाने दहाव्या शतकापर्यंत तरी केल्याचे दिसून येत नाही.

वर्णाश्रम संस्थेत जातींना कसे सामावून घ्यायचे व जातींच्या उत्पत्तीची कशी मिमांसा करायची याबाबत फार मोठा गोंधळ दिसून येतो. यातून जी शक्कल लढवली गेली ती जातीसंस्थेला हानीकारकच ठरली. अनुलोम-प्रतिलोम विवाहांतून जो संकर होतो त्यातून विभिन्न जाती बनल्या असे स्मृतीकार सांगू लागले. त्यांच्या द्रूष्टीने जातींना वर्णव्यवस्थेत सामावून घेण्यासाठी जाती कशा बनल्या याची ही व्युत्पत्ती होती...परंतू ती अत्यंत अवैज्ञानिक आणि असंभाव्य आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. शूद्र पुरुषाने ब्राह्मण स्त्रीपासुन निर्माण केलेली संतती म्हणजे चांडाळ जातीचे लोक, शूद्राला क्षत्रीय स्त्रीपासून जी संतती होईल तो क्षत्ता जातीचा...अशा प्रकारे विविध वर्णांतील संकरातून जाती कशा बनल्या याचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु यात वास्तवता नव्हती व म्हणुन तिचा स्वीकारही झाला नाही. जाती या व्यवसायातुनच बनल्यात हे प्रत्यक्ष ज्ञान व भान होते. संकरातून जन्माला आलेली व्यक्ती स्वतंत्रपणे एक सर्वस्वी नवीन उद्योग शोधुन तो व्यवसाय करेल अशी शक्यताच नव्हती. व्यवसायाशी जाती संबंधित नसत्या व त्या केवळ वर्णसंकराने बनल्या असत्या तर संकर एवढे झाले आहेत कि लक्षावधी जाती बनल्या असत्या. त्यामुळे संकरातुन जाते बनल्या नसल्या तरी त्या सिद्धांताचे अल्पांश उपफल म्हणजे जातीअंतर्गत विवाह हाच सुरक्षीत व धर्ममान्य आहे असा समज मात्र समाजमनात क्रमश: रुजत गेला.

डा. अजय मित्र शास्त्री या संदर्भात म्हणतात कि "जाती अस्तित्वात येण्याची महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय हेच होय. परंतू जातींना पारंपारिक सामाजिक संरचेनेत कसे सामावून घ्यायचे या प्रश्नापोटी जातींच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्पष्टिकरणे तयार केली गेली." येथे पारंपारिक सामाजिक व्यवस्था म्हणजे वैदिक वर्णव्यवस्था होय.

धर्माने केलेले दुसरे अपकार्य म्हणजे "कर्मविपाक" सिद्धांताचा जन्म. हा सिद्धांत अकराव्या शतकापुर्वी समाजमनात रुढ नव्हता हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वजन्मीच्या पाप-पुण्यामुळे वर्तमान जन्मातील स्थिती प्राप्त होते असा हा सिद्धांत. आर्थिक अवनतीच्या काळात समाज दैववादी बनत असतो हे आपण आजही पहातो. ज्या संकतमय परिस्थितीचा उहापोह आपण गेल्या भागात केला आहे त्यावरुन आजचे दैन्य हे आपल्याच गतजन्मीच्या पापाचे फळ वाटणे अनैसर्गिक नाही. परंतु याचीच सांगड जातींशीही घातली गेली ती मात्र अत्यंत चुकीची व सर्वच समाजांवर अन्याय करणारी होती. जन्माधारित जातीव्यवस्थेला घट्ट करणारे होती. त्यामुळे परिस्थिती बदलू शकते या भानात भारतीय समाज कधीच आला नाही. व एकदा तात्कालिक स्थितीत बंदिस्त झालेली जातीव्यवस्था पुन्हा मूक्त झालीच नाही.

क्षत्रीय व वैश्य कोठे गेले?

वर्णव्यवस्थेची जातीव्यवस्थेशी सांगड घालण्याच्या प्रयत्नांत वैदिक व्यवस्थेला आधी अपयशच आल्याचे आपण पाहिलेच आहे. शूद्र-वैश्यही राजे होताहेत...सरंजामदार होताहेत हे चित्र वर्णाश्रमाशी जुळनारे नव्हते. राजे/सरंजामदार समतुल्य...मग जात-वर्ण (अगदी वंशही) कोणताही असो, अशा घराण्यांशी विवाहसंबंध निरलसपणे जोडत होते. सातवाहनांनी शकांशी, नागवंशीयांशी विवाहसंबंध जोडले होते. ब्राह्मनांनीही क्षत्रीय, वैश्य ते शूद्रांशी विवाहसंबंध जोडले होते. आतंरजातीय विवाहही मोठ्या प्रमानात होत असत.

क्षत्रीय हा लढवैय्यांचा/सत्ताधा-यांचा वर्ण असे असले तरी प्रत्यक्षात वर्णव्यवस्थेने ज्यांना शूद्र ठरवले असे कुणबी-धनगरादि लोकच सैन्यात मोठ्या प्रमानात असत. राजे अथवा सरदारही बनत असत. तीच बाब वैश्यांसाठी राखुन ठेवलेल्या व्यापाराची. यात जसे ब्राह्मनही पडत तसेच शुद्रही. त्यामुळे जाती व वर्णव्यवस्थेची सांगड बसणे जसे अशक्यप्राय होवू लागले तसा क्षत्रीय व वैश्य या वर्णाला डच्चू देण्यात आला व त्यासाठीही स्पष्टिकरणात्मक कथा बनवण्यात आल्या. त्यामुळे शेती हे वैश्य वर्णीयाचे काम ते शूद्र वर्णाकडे ढकलले गेले...म्हणजेच वैश्यालाही शूद्र मानण्यात आले. व वर्णव्यवस्थेत ज्यांचा समावेश करताच येत नव्हता अशा समाजवर्गाला पाचवा वर्ण मनूस्मृतीनुसार मुळात अस्तित्वात नसतांनाही निर्माण करण्यात आला. यातुन वैदिक व अवैदिक व्यवस्थेचे परिपुर्ण मिलन होण्याऐवजी विसंवादच निर्माण झाला. जातीव्यवस्था अधिक प्रबळ होत गेली व वर्णाश्रम धर्म हा अत्यंत सीमित झाला, परंतू वेदमहत्ता व प्रामाण्य याला अतिरेकी महत्व आल्याने प्रत्यक्ष ब्राह्मण समाज वगळता अस्तित्वातच न राहिलेल्या वर्णव्यवस्थेचे गारुड मात्र वाढत गेले व त्यातुनच वर्णव्यवस्थेने शूद्र ठरवून टाकुनही उच्चवर्णाशी आपापल्या जातींची नाळ भिडवायची एक अनिष्ट प्रथा बाराव्या-तेराव्या शतकानंतर सुरु झाली. यामागचे मानसशास्त्रही तपासून पाहणे आवश्यक आहे. त्याआधी आपण अन्य कारणांचाही शोध घेवूयात.

बौद्ध धर्माचा परिणाम...

भारताचा समाजेतिहास पाहतांना आपण आपली आजची व्यवस्था नेमकी अशीच का आहे याचा विचार करत असतांना बौद्ध धर्माचा उदय, देशव्यापी प्रभाव आणि दहाव्या शतकापर्यंत झालेला जवळपास -हास याचा कधीही विचार करत नाही. येथे बौद्ध तत्वज्ञानाचा उहापोह मला अभिप्रेत नसून देशातील जवळपास ६०-७०% जनता एकतर बौद्ध तरी झाली होती अथवा बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रचंड प्रभावाखाली गेली होती त्या जनतेचे बौद्ध धर्माचा अस्त झाल्यानंतर, पुन्हा आपल्या मुळच्या धर्मात परत यावे लागल्यानंतर त्यांचे धार्मिक स्थान नेमके काय झाले असेल यावर आजतागायत कोणत्याहे समाजशास्त्रज्ञाने विचार केलेला दिसत नाही. परंतु भारतीय समाजजीवन व भावजीवनावर प्रभाव टाकणारा हाही एक घटक आहे हे विसरुन चालणार नाही.

भारतात सुमारे दीड हजार वर्ष बौद्ध धर्माने भारतावर फार मोठा प्रभाव गाजवला. सम्राट अशोकापासून हर्षवर्धनापर्यंत त्या धर्माला आधार देनारे राजे-महाराजे होवून गेले. जे राजे बौद्ध नव्हते असे (उदा. सातवाहन) बौद्ध धर्माचे उदार आश्रयदाते बनले. देशभरात हजारोंच्या संख्येने बौद्ध विहार, स्तूप, लेणी तर उभारली गेलीच, पण नालंदासारखी किमान सहा बौद्ध विश्वविद्यालयेही उभारली गेली. या काळात बहुसंख्य समाज हा बौद्ध धर्माचा अनुयायी बनला होता. आठव्या शतकापासून मात्र या धर्माला भारतात उतरती कळा लागू लागली. त्याची नेमकी कारणे काय या चर्चेत येथे जायचे नसून तेराव्या शतकापर्यंत हा धर्म भारतातुन जवळपास नष्ट झाला हे वास्तव लक्षात घ्यायचे आहे.

जवळपास हजार वर्ष समाजातील मोठा वर्ग बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या वा अनुयायी म्हणुन प्रभावात असलेल्या व्यक्तीघटकांना जेंव्हा पुन्हा स्वगृही परतावे लागले तेंव्हा त्यांचे सामाजिक व धार्मिक स्थान नेमके काय राहिले असेल? माझ्या मते समाजेतिहासातील हा एक कळीचा मुद्दा आहे. बौद्धजन धर्मांतरीत होवून हिंदू बनले नाही. अथवा तशी पद्धतही अस्तित्वात नव्हती. लोक आपापल्या मुळ श्रद्धांकडे परतले असे मात्र म्हणता येईल. परंतू या प्रदिर्घ काळात जे सातत्याने परंपरेने बौद्ध होते, बौद्ध तत्वज्ञान व मित्थकांच्या प्रभावाखाली होते त्यांना त्यांच्याच किती मुळ परंपरा माहित होत्या?

बौद्ध धर्मातील भिक्खु संघात जातीभेद नव्हता हे खरे असले तरी सामाजिक व्यवस्थेतील जातीव्यवस्थेला विरोध नव्हता. तेंव्हा जातीसंस्था लवचीक असल्याने तात्विक विरोधाची आवश्यकताही नव्हती. वर्णव्यवस्थेबाबतची गौतम बुद्धांची मते विख्यातच आहेत. जन्माधारीत वर्णव्यवस्थेला त्यांचा विरोधच होता.

परंतू बौद्ध झालेले कोनत्या ना कोणत्या जातीशी संबंधित होते. कोणी कुनबी तर कोणी कुंभार. बौद्ध परंपरा सोडुन जेंव्हा त्यांनी आपल्या मुळ श्रद्धांकडे परत यायला सुरुवात केली तंव्हा त्यांचे स्वागत नेमके कसे झाले याबाबत एकही ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही. ही स्वगृही परत यायची घटना एकाच वेळीस घडलेली नसून क्रमश: होत गेलेली आहे हे तर स्पष्टच आहे. बौद्ध धर्मात वर्णव्यवस्था नसल्याने वर्णाश्रमवाद्यांनी त्यांचा समावेश शूद्र वर्णात केला हे मात्र ठामपणे म्हणता येते. कारण या काळात मुळात क्षत्रीय/वैश्य हे वर्णच बाद केले गेलेले होते. शूद्र वर्णात समावेश केला गेला याचे नवल नाही वा त्यामुळे सामाजिक फरक पडला असेल असे नाही. पण शूद्रांना हीनत्व देणे मात्र सोपे गेले. ज्या बौद्धांचा पराकोटीचा तिरस्कार ज्या व्यवस्थेने केला त्यांच्याकडे पाहण्याचा दुषित दृष्टीकोण यामागे असणे स्वाभाविक वाटते. त्यामुळे व्यवस्थेत सावकाश का होईना पण जातीघटकांना हीणत्व देत देत त्यांची मानसिकता धर्मशरण बनवली गेली असे वाटते. अर्थात याचा फटका सर्वच व्यावसायिक जातींना बसला. यामागे समकालीन आधी वर्णित केलेली विवाहसंस्था, दुष्काळ, ढासळलेली अर्थव्यवस्था, इस्लामी आक्रमणे ई. कारणेही हातात हात घालुन होतीच.

या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणुन संपुर्ण देशाचीच एक मानसिकता बनणे स्वाभाविक होते. ब्राह्मणांनी या बदललेल्या व्यवस्थेचा स्वार्थासाठी वापर केला असा आरोप करता येतो व तो काही प्रमाणात खराही आहे. ब्राह्मण जवळपास साडेपाचशे जातींत विभागले गेले असले तरी वर्णही ब्राह्मण व जातही ब्राह्मण असे सलगीकरण करणे त्यांना अधिक सोपे गेले.

तरीही जाती-जातींत उच्च-नीचतेचा भाव कसा आला याचे उत्तर आपल्याला शोधणे भाग आहे. जातीव्यवस्थेची ही फार मोठी शोकांतिका आहे. वर्णवर्चस्वाच्या तत्वज्ञानातून जातीश्रेष्ठतेची जाणीव विकसीत झाली कि अन्य कोणते समाज-मानसशास्त्र त्यामागे काम करत होते हे आपल्याला पुढे पहायचे आहे....ते पुढील भागात.  


वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...