Wednesday, July 23, 2014

कवट्या महांकाळ....


"सहदेव भाडळी" हे तांत्रिक पुस्तक आमच्या लहाणपणी फारच लोकप्रिय होते. त्यासोबत अशी अनेक तंत्र-मंत्रांची पुस्तके सर्क्युलेट व्हायची. मी मिळेल ती पुस्तके वाचत असे त्यात हीसुद्धा. त्यात काही प्रयोगशील असेल तर प्रयोगही करत बसायचो. म्हणजे कार्व्हरचे पुस्तक वाचले तर शेगदाण्यांपासून दूध बनवायचाही प्रयोग केला...त्याचा चहा करायला लावून तोंड वाकडेही करून घेतले. असो. आता या पुस्तकांचा पगडा बसला आणि तांत्रिक साधना करून अद्भूत शक्तींना वश करायचे मनावर घेतले.

मी तेंव्हा सातवीत होतो. मला तेंव्हा मित्र असे नव्हतेच. मी एकटा माझ्याच स्वप्नरंजनांत भटकत असे. त्यामुळे सारा परिसर पायतळी अनेकदा तुडवलेला. कोठे काय हे सगळे पाठ. साधनेला साधनं लागतातच. पहिली हवी होती ती माणसाची कवटी. ती तर हवीच. वरुड्याच्या शिवेजवळ एक जुनाट मसनवटा होता. दुर्लक्षित, झुडपांनी व्यापलेला...केवळ विशिष्ट आकारांच्या उंचवट्यांमुळे तेथे कधी काळी माणसं गाडली आहेत हे लक्षात यायचं. आता एखादं थडगं उकरणं भाग होतं. लोकांनी पाहिलं तर दगडं फेकून मारलं असतं. गांवाकडे सहा-सातनंतर सुमसाम व्हायची. वीज नव्हतीच. त्यामुळे रात्र म्हणजे काय सुम्म रात्रच. मी दिवस मावळल्यानंतरची वेळ ठरवली. एके दिवशी दिवसाच जावून कोणतं थडगं उकरायला सोपं जाईल याचा अदमास घ्यायचा प्रयत्न केला. जुनाट असल्याने वरची माती जाम घट्ट झालेली, त्यावर गवत उगवलेले..काहींना तर झुडपांनीच अदृष्य करुन टाकलेलं. आता थडगं किती खोल असतं हे मला काय बोडक्याचं माहित? पण एक निवडलं...आणि त्याच संध्याकाळी कपचीदार दगडानं उकराउकरी चालू केली.

प्रार्थना एकच होती जी बाजू उकरतोय ती डोक्याकडचीच निघू दे. कारण दगडानं उकरणं एवढं सोपं जात नव्हतं. अंधार वाढू लागला तसा सारी झुडपंही मला भुतांगत दिसायला लागली. पण म्हटलं...तुम्हाला लेको वश करून नाचवणार आहे...भेदर्लो असलो तरी बरच उकरलं...पण अजुन काय गवसेना...

बरंच खोदावं लागणर हे पुन्हा सकाळी जाउन पाहिल्यावर लक्षात आले. थोडी उकराउकर करत अंदाज घ्यायचा प्रयत्नही केला. पुन्हा अंधार पडायला लागल्यावर तिकडं.

तीन दिवसानंतर बराच खाली गेलो. त्याच्या दुस-या दिवशी मग दिवसाच उद्योग केला. थोड्या प्रयत्नांतच मी खजिन्याजवळ पोचलो. चक्क मान वळवलेली, मणक्यापासून सुटी झालेली कवटी दात विचकत पहुडलेली. वर उचलली. मातीचे ओघळ तोंडातून डोळ्यांतुन बदाबदा पडले. भराभरा जमेल तशी माती पुन्हा लोटली. जवळच एक छॊटा ओढा होता. निरगुडीच्या दाटीत लपवली. जागा लांबून दहा वेळा तरी पाहिली असेल...कारण तिला हलवायचे म्हणजे रात्रीच ते काम करावे लागणार होते. जागा विसरून चालणार नव्हतं.

आनंदाच्या लाटांवर स्वार मी घरी आलो. (शाळेत मी क्वचित जायचो.) त्या दिवशीची कामे केली. सायंकाळी परत तिकडे. कोणी नाही हे पाहून कवटीचा ताबा घेतला. माळ ओलांडला आणि ओढ्याला माळाईच्या डोहाजवळ आलो. तीच माझ्या साधनेची जागा असनार होती. त्या डोहाकाठी एक शमीचं वाळकुटलेलं खुजं जुनाट झाड झाड होतं. त्याखालीच माळाईचा शेंदरी तांदळा. मी झाडावरच्या दुबेळक्यातल्या फातलेल्या जागेत कवटी घुसवली. खाली उतरलो. कोणाला दिसनार नाही ना याचा अदमास घेतला. परतलो ते मध्यरात्री परत येण्यासाठीच.

आम्ही तेंव्हा जिजाबाच्या वड्यात रहायचो. म्हणजे चार बाय दहाची खोली होती. स्वयंपाकासाठी आणि जरुरी सामान ठेवण्यापुरती ती कामाची. बाकी आम्ही ओसरीत नाहीतर खालच्या अंगणात झोपायचो. सारे लवकर झोपी जात त्यामुळे सटकणे हे काही अवजड काम नव्हतेच.

अनावर उत्सुकतेने मी साधनेचे तंत्र पुन्हापुन्हा आठवत होतो. मंत्र तर पाठ कधीच झालेले. आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त झाल्यावर काय काय करायचे याचे स्वप्नरंजन. सारे झोपलेत याची खात्री करत करत बराच वेळ गेला मग निघालो.

रात्र कितीही झाली तरी  चांदण्याचा धुसर प्रकाश असतोच. खेड्यातल्या माणसाला तो पुरतो. मी माळ ओलांडला. शमीवरची कवटी ताब्यात घेतली. छती धडधडत होती हे खरे. पण आलो डोहाच्या काठावर. ब-यापैकी पानी होते. (आजही असते. हा डोह मी "...आणि पानिपत" मद्ध्ये एक पात्रच बनवून टाकला आहे. या डोहाशी माझ्या अनेक रमणीय आणि तेवढ्याच दु:खद आठवणी निगडित आहेत.)

शर्ट व चड्डी काढली. नागडा झालो. कवटी घेऊन पाण्यात उतरलो. छातीपर्यंत पाण्यात आलो. कवटी दोन्ही हातात घेतली. हात उंचावले. "ऒम -हीं क्लीं स्त्रीं..." पासुन पुनश्चरणे सुरू झाली. हळु हळु भिती गेली. मंत्र मी मोठ्यानेच म्हणत होतो. तेथे ऐकायला येणार तरी कोण होते म्हणा...

भुतांशिवाय?

किती वेळ गेला हे माहित नाही. पुस्तकातील वाक्य आठवत होतो...साधकाने संयम ठेवला पाहिजे...निष्ठेने वाट पहावी लागते वगैरे. माझ्यात सम्यमच संयम दाटून भरला असल्याने मला घाई नव्हती. पण मी भुतांना वश करणार होतो हे नक्की...

अनेक दिवस असेच गेले. काही खाडेही झाले. भूत काही दिसलं नाही मग वश काय होणार?

अजून काही दिवस गेले आणि मी कवटी डोहात फेकून दिली.

नवे प्रयोग समोर दिसायला लागले होते ना....!

प्ल्यंचेट आणि मी


अकरावीत होतो. पाबळला भाड्याच्या खोलीत आम्ही चार मित्र रहायचो. आमचे जेवण आम्हीच आळीपाळीने करायचो. माझ्या स्वयंपाकात प्रयोगच जास्त असल्याने कधी मजा तर कधी हजा व्हायची. तेथले वाचनालय हे खरे घर. वाचायला मनसोक्त मिळायचे. एकदा प्ल्यंचेटवरील एक पुस्तक वाचनात आले. मग सोडतो काय? मीही प्ल्यंचेट करायचे ठरवले. मित्रांना पटवायला लागलो. प्ल्यंचेटचे वाचलेले रसभरीत तर काही भयंकर किस्से सांगितले. मित्रांत एक साहेबराव म्हणून मित्र होता. आता तेवढेच नांव आठवते. त्यालाही मग मुड आला. मग बाकीचेही सारे पटले.

अमावस्येच्या रात्री प्ल्यंचेट यशस्वी होते असे लेखकाने आवर्जून सांगितले असल्याने तिची वाट आतुरतेने पाहू लागलो. आली. त्या दिवशी प्ल्यंचेटला लागणा्रे सामानही तयार केले होते. सामान म्हणजे काय...तर एक पाट (जो आमच्याकडे नव्हता...शेजा-याकडून आणला), ए टू झेड स्वतंत्रपणे लिहिलेला एक मोठा कागद आणि एक नाणे. लयच उत्सूक होतो आम्ही. बाकीच्यांत थोडे भयही होते. मी काय, अमावस्येच्या मध्यरात्री मानवी कवटी हातात घेऊन ओढ्याच्या डोहात कमरीवढ्या पाण्यात तंत्रसाधना करण्याचे दिव्य पराक्रम पुर्वी केलेच असल्याने निर्धास्त होतो. त्या दिवशी स्वयंपाकाची पाळी माझी होती. मला सहज जमणारी आणि भरपूर प्रयोग करायची संधी देणारी खिचडी त्यादिवशी कसलेही प्रयोग न करता भराभर त्या दिवशी बनवली. (म्हणून बहुदा चांगली झाली असावी...कारण त्या रात्री तरी कोणीच बोंब मारली नाही.)

रातचे बारा वाजेपर्यंत प्ल्यंचेट कसे करायचे याची आम्ही उजळनी करत बसलो. एकदाचे बारा वाजले. आम्ही पाटाभोवती न जमणारे गंभीर चेहरे करून बसलो. पाट, त्यावरील कागद आणि नाणे आधीच ठेवलेले होते. नाण्यावर चौघांनी बोट ठेवले.

आता मृतात्म्यांना आवाहन करायचे होते. ज्याचे बोट थरथरू लागेल त्याच्यात प्ल्यंचेट आले हे समजून इतरांनी प्रश्न विचारायचे होते. प्रश्न आधीच ठरलेले होते. (पोरी-बाळींशिवाय काय प्रश्न असणार आमचे?) उत्तरांची कमालीची उत्सूकता होती. आज ती मिळनारच याची खात्री होती.

आधी मनोमन आवाहने केली.

काहीच झाले नाही.

मग ओरडून आवाहने केली.

आमच्या ओरडण्याने आम्हीच हललो तेवढेच...मृतात्मा काही केल्या आमच्या हातात किंवा आमच्यात शिरायला तयार होईना.

शेवटी मस्तानीच्या रूहलाही आवाहन करून झाले.

करता करता वाजले दोन. पण कसचे काय?

मग यच्चयावत विश्वातल्या मृतात्म्यांना आणि ज्या कोणी नालायकाने प्ल्यंचेट हा चाळा शोधला त्याला घाल घाल शिव्या घातल्या. त्या शिव्यांचा जोर ओसरला...

तसे सारे माझ्यावर त्याच शिव्या मोठ्या प्रेमाने (?) बरसू लागले...

आता डा. दाभोळकरांचा खुनी शोधायला ज्या कोणी महामुर्खाला प्ल्यंचेटची कल्पना सुचली त्याला त्या शिव्या परत करतोय!

Sunday, July 20, 2014

राष्ट्रवादाची व्यर्थता!

 एक जग:एक राष्ट्र (६)

राष्ट्रवाद लोकांचे पोट भरू शकत नाही आणि नागरिकांना एकमेकांपासून सुरक्षीतही ठेवू शकत नाही.. राष्ट्रा-राष्ट्रात आपापल्या राष्ट्रांवर तेवढेच प्रेम असणारे आपासात तेवढेच प्रेम करु शकत नाहीत. सांस्कृतिक, भाषिक, वांशिक, धार्मिक (भारतासारख्या देशात जातीयही) संघर्ष थांबत नाहीत. गुन्हेगारी, दहशतवादादि घटना थांबत नाहीत. राष्ट्रा-राष्ट्रांतील (विशेषत: शेजारी राष्ट्रांशी) कसलाच संघर्ष नाही असे राष्ट्र सापडणे अवघड आहे. समाजात राहतांना सामान्य प्रतीची माणसे जसा न्यूनगंड जपतात तसा न्युनगंड छोट्या अथवा दुर्बल राष्ट्रांतही जपला जातोच. असे असुनही राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रासाठी सर्वस्वाचा, प्रसंगी प्राणांचाही त्याग या राष्ट्रवादी मुलतत्वांचा प्रत्येक नागरिकावर मारा होतच असतो. असाच तात्विक मारा धर्मवादी लोक आपापल्या अनुयायांवर करत असतात. अनेकदा धर्म आणि राष्ट्र या दोन भावनांत द्वंद्व उभे ठाकल्याचे दिसते. आर्थिक प्रेरणा, परस्पर शांततामय सहजीवनाच्या प्रेरणांवर या प्रेरणा मात करत असल्याचे आपल्याला अनेक राष्ट्रांतर्गतच्या विध्वंसक व हिंसक घटनांमधून दिसते.

हे संघर्ष अधिकच उग्र होतात अथवा बनवले जातात ते कोणाची वा कोणत्या राजकीय विचारसरणीची सत्ता असावी या प्रश्नाबाबत. जगात सत्तांतरे होतच असतात. अनेक सत्तांतरे रक्तरंजित असल्याचेही आपण पाहतो. सत्तांतरे शांततामय आहेत म्हणून कौतूक करुन घेण्याचे कारण नाही कारण दोन विचारसरण्यांतील संघर्ष सामजिक जीवनाला "एकमय" करत नसून अधिक विखंडने करत जातो. जेवढ्या राजकीय विचारसरण्या तेवढी राष्ट्रे एका राष्ट्रात नांदत असतात असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. अन्य विचारसरण्यांना सत्तेच्या बळावर दडपायचे सौम्य अथवा उग्र कार्य कसे पार पाडले जाते या दोन्हीचा अनुभव भारताने घेतला आहेच. जगाचा अनुभव वेगळा नाही.

मुळात विशिष्ट विचारसरणीचे राष्ट्र असले तर देशाचे अपार हित होईल व मानवी जीवन सुखमय, कल्याणकारी होईल असे दावे राष्ट्रांच्या इतिहासाने पोकळ ठरवले आहेत. साम्यवादी विचारसरणीची कित्त्येक राष्ट्रे कोसळलेली आपण पाहिली आहेत. लोकशाहीवादी म्हनवणारी राष्ट्रे अथवा त्या देशातील काही किंवा बव्हंशी नागरिक हुकुमशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भलामन करतांना आपण, अगदी भारतीय संदर्भातही, पाहिले आहेत. त्यामुळे वरकरणी राष्ट्रे जी राजकीय व्यवस्था अवलंबतात त्या राष्ट्रातील नागरिक त्या व्यवस्थेचे सर्वस्वी समर्थक असतातच असे नाही. मानवी स्वातंत्र्याची कल्पना मान्य केली तरी ते स्वातंत्र्य माणसासाठी, व म्हणून समष्टीसाठी हितकारक ठरतेच असे नाही. तसे झाल्याचे चित्र आजही नाही.

मग या सा-यात राष्ट्राचे स्थान काय असते?

राष्ट्र म्हणजे विशिष्ट कायदा, विशिष्ट शासनपद्धती, प्रशासनपद्धती, अर्थव्यवस्था (तीही बदलती) असलेला आणि संरक्षणव्यवस्थेने संरक्षित केलेला एक भौगोलिक तुकडा एवढेच राष्ट्र या संकल्पनेचे प्रत्यक्ष वास्तव स्थान राहते. बाकी इतर सा-या कृत्रीमरित्या जोपासल्या गेलेल्या, जोपासायला भाग पाडल्या गेलेल्या भावना होत.

मनुष्य आदिम होता तेंव्हा जगण्यासाठी, सुरक्षित रहात वंशविस्तार करण्यासाठी टोळीची, राज्यांची आणि नंतर राष्ट्रांची व व्यवस्थेची गरज भासली. त्यात वावगे काहीएक नव्हते. मानव कसा प्रगल्भ होत गेला याचीच ती चिन्हे आहेत. पण जगण्याची कांक्षा ही मानवी
मनाची, स्वभावाची, प्रेरणांची मूलकारण आहे आणि त्यात बदल झालेला नाही. होणार नाहे आणि होऊही नये...पण या सा-यात जगण्याचेही मोल काय राहते?

जगण्याचे मोल देवुनही मनुष्य अनेकदा किमान भावी पिढ्यांसाठी का होईना प्राणांचा त्याग करत राहिला आहे...

कधी योग्य तर कधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने.

माणसासाठी व्यवस्था येते हे खरे आहे पण ज्याच्यासाठी म्हणून व्यवस्था येते तो माणुसच व्यवस्थेचा अपरिहार्य बळी होत जातो हे आपण दैनंदिन जीवनातही अनुभवत असतो. अमुकच व्यवस्था चांगली हे ठरवायचे खरे तर कोणतेच निकष नाहीत. शेवटी व्यवस्था राबवनारेच व्यवस्थेचे मूल्य निर्धारित करत असतात आणि ती चांगलीच वाटावी यासाठी मानसशात्रीय प्रयोग करत असतात. "चांगले शासन" काय असते हे कोण ठरवते? जगभरचा लोकशाह्या, राजेशाह्या आणि हुकूमशाह्या पाहिल्या तर तेच (सत्ताधारी) चांगल्या शासनाच्या व्याख्या लादत व पटवत सत्तेवर आलेले दिसतात.

लोकांना "पटते" म्हणजे नेमके काय?

पटते कि पटायला भाग पाडले जाते? मनापासून पटले तर नेमके "मनापासून" म्हणजे काय? हे मनच जर "कंडिशंड" केले गेले असेल तर त्या पटन्याला तरी नेमका कोणता अर्थ राहतो? त्यामुळे "मनापासून पटले" हा शब्द एखाद्या दहशतवाद्याला उच्चारणे शोभेल तसेच साळसूद नागरिकांनाही शोभेल. मग हे मनापासून पटलेलेच नंतर कोठे जाते? स्ट्यलिनला सर्वेसर्वा मानत भक्ती करणारेच जेंव्हा त्याचाच पुतळा उखदून फेकतात, सद्दाम हुसेनचाही पुतळा उखदला जातो यातच मानवाचे पटणे हे किती तात्कालिक आणि भावनिक ख-या खोटया लाटांवर हिंदकळनारे अथवा वाहून जाणारे असते यासारख्या घटनांवरून दिसते.

पुन्हा प्रश्न. मग यात राष्ट्रवाद कोठे राहतो?

राष्ट्राचे म्हनून जे भावनिक स्थान असते ते कोठे जाते? परकीय आक्रमणांना आपल्याच देशातील राष्ट्रप्रेमी म्हणवणारे बंडखोर वाट करून देतात अश घटना जर घडत असतील, सत्ता पालटांसाठी परकीय सत्तांची मदत घेत असतील तर त्याला राजकीय मुत्सद्दीपनाच्या भोंगळ व्याख्येत टाकता येत नाही. मुळात राष्ट्रवादच तकलादू आहे एवढेच काय ते अशा घटनांपासून सिद्ध होते.

आणि तरीही राष्ट्रवादाची मोहिनी लोकांवर असते याचे कारण काल्पनिक अथवा प्रत्यक्ष भयांवरचा उतारा म्हणून राष्ट्रवाद कामाला येतो.
आणि म्हणूनच तो लोकांना हवासाही वाटतो. त्यासाठी ते प्रसंगी आर्थिक, शारिरीक आणि पारिवारिक यातना सहन करायला तयार होतात. गंमत म्हणजे धर्मवादही अशाच अवस्थांतून जात असतो.

राष्ट्र सुरक्षा देते, कायद्याचे (प्रसंगी चुकीचे असले तरी) राज्य देते, स्थिर (अनेकदा अस्थिर असली तरी) अर्थव्यवस्था देते, भवितव्याचे (खोटे भ्रमित असले तरी) आमिष दाखवते, जगात आपले राष्ट्र, आपली संस्कृती व परंपरा कशा महान आहेत हे (खोट्या असल्या तरी) गायची संधी देते, आणि महत्वाचे म्हनजे राष्ट्रासाठी त्याग, प्रसंगी प्राणत्यागही करण्याची प्रेरणा देते.

आणि हे लोकांना हवेच असते असे नाही. परक्यांचे राज्य नाही...आमच्याच लोकांचे आहे ही टोळीभावना कथित "स्वातंत्र्य" जपण्यासाठी स्वकियांची गुलामगिरी सहज स्वीकारत असते...प्रसंगी त्याहीविरुद्ध बंड करत असते.

म्हणजे मानवी प्रेरणाच मुळात अस्थिर आहेत असे म्हणता येईल. त्यांना वास्तवाचा स्पर्श कधीच नसतो असेही उग्रवादी विधान करता येईल.

पण त्याची मुळे ही आपल्याच जागतिक व्यवस्थेत दडलेली आहेत याचा आपण कधी विचार करणार?

मुळात राष्ट्रवाद हवा आहे कारण इतर राष्ट्रांचे सह-अस्तित्व आहे म्हणून. नसते तर त्याची कोणतीही गरज अथवा महत्ता अथवा अपरिहार्यता नसती.

तिसरे-चवथे महायुद्ध करत संपुर्ण राष्ट्रेच व त्यासोबत आपण सर्वांनीच संपवून घ्यायचे कि भुतलावरील सर्वच राष्ट्रांचे अखिल मानवजातीने एकमते, स्वहस्ते विसर्जन करत यच्चयावत विश्वात एकुलता एक प्रगल्भ प्राणी म्हनून सध्या ज्ञात असलेल्या मानवजातीचा खरा सन्मान करायचा?

उत्तर आपल्याच हातात आहे!

Saturday, July 19, 2014

मग माणसाच्या स्वातंत्र्याचे काय?

 एक जग:एक राष्ट्र (५)


राष्ट्रवाद हा पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप आहे काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पुरातन टोळीवाद हा समान उद्दिष्टे, वंश आणि भाषेच्या आधारावर उभारलेला होता. म्हणजे प्रत्येक टोळी स्वतंत्र वंश असेच असे नाही तर समवंशीयांच्याही अनेक टोळ्या बनत असत. समान भाषिक गटांच्याही वेगवेगळ्या टोळ्या असत. मग त्या वेगळ्या का होत? तर उद्दिष्टांतील भिन्नता व टोळीनायकांची सत्ताकांक्षा यामुळे एका टोळीतुन अनेक टोळ्या बाहेर फुटुन निघालेल्या आपल्याला दिसतात. ऋग्वेदाचाच दाखला घेतला तर किमान ४८ टोळ्या नोंदल्या गेलेल्या दिसतात. या टोळ्या समानभाषिक-समान वंशीय व समान प्रदेश  वाटून घेणा-या असल्या तरी त्यांच्यातील वेगळेपण हे त्यांच्या उद्दिष्टांत पहावे लागते. यात राजकीय उद्दिष्टे जशी सामील आहेत तशीच धार्मिक उद्दिष्टेही सामाविष्ट आहेत. ऋग्वेदाची रचना झाली ती मुळच्या भरत टोळीतून फुटुन निघालेल्या तुत्सू नामक टोळीमद्ध्ये. भरत टोळी त्याही पुर्वी पुरु टोळीचा भाग होती. पण तुत्सुंनी सुदासाच्या नेतृत्वाखाली खुद्द पुरू संघाशी युद्ध करुन त्यांना पराजित केले असा ऋग्वैदिक इतिहास सांगतो. या युद्धाचे तत्कालीन कारण धार्मिक स्वरुपाचे होते. (सुदास-शत्रू वैदिक यज्ञधर्मास मानत नव्हते.) असो. यावरून दिसनारी बाब ही कि नवी टोळी बनणे हे आधीच्या टोळीतील राजकीय/धार्मिक महत्वाकांक्षी व्यक्तींच्या भिन्न उद्दिष्टांमुळे होते. शत्रुत्वे जपायला समान भाषा अथवा वंश आडवे येत नाहीत हा पुरातन इतिहास आहे.

म्हणजे उद्दिष्टांनी टोळ्यांना अलग अस्तित्व दिले असे म्हणता येईल. राष्ट्रांना हाच टोळीवाद लागू पडेल काय यावर विचार करायला हवा.

राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादिंचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या काढता येत नाहीत. असे असले तरी भारतासारख्या राष्ट्राला "राष्ट्र" या संकल्पनेत टोळीवादाला काही प्रमाणात का होईना बगल द्यावी लागते. कारण समान भाषा नाही. समान इतिहास नाही. (जो आहे तो उलट परस्परसंघर्षांचा इतिहास आहे.) समान परंपरा अथवा समान धर्म नाही. संस्कृतीबाबतही तसेच गोंधळ आहेत. म्हणजे सर्वजन पाळतात ती संस्कृती वैदिक कि अवैदिक यावर गेले दीड शतक तरी गंभीर विवाद आहेत. भौगोलिक आस्था ही प्रत्यक्षात स्थानिक पातळीपुरती मर्यादित आहे.

मग हे कोणते राष्ट्र आहे? वास्तव पाहिले तर लक्षात येईल कि हे "राजकीय" राष्ट्र आहे. म्हणजे लोकशाहीप्रणित केंद्रवर्ती सत्ता व तिचे उतरत्या क्रमाने सत्ता विभाजन व कायद्यांची संरचना हा त्याचा पाया असून इतर सारे मुद्दे दुय्यम आहेत. प्रत्यक्षात दुय्यम मुद्देच समाजजीवनावर व्यापक प्रभाव टाकत आहेत हे भारतीय परिप्रेक्षात लक्षात येइल. भारतीय राष्ट्रवाद हा तुलनेने सौम्य असण्याची हीसुद्धा कारणे आहेत. पण आपण हाच प्रकार जगभरच्या सर्व राष्ट्रांत कमी-अधिक प्रमानात, बदलत्या अग्रक्रमांनुसार पाहु शकतो. उदा. चिनी राष्ट्रवाद परंपारिक चिनी तत्वज्ञाने, अमेरिकेचा प्रागतिकतावाद, मार्क्सवाद, माओवाद, वंशवाद आणि परंपरेने साम्राज्यकाळापासून चालत आलेला विस्तारवाद यावर आधारीत आहे. तो इतका बहुविध आणि म्हणुनच गोंधळयुक्त आहे कि ल्युसियन पायसारख्या विश्लेषिका "राष्ट्र म्हणून चीनी व्यक्तीमत्वात ठोसपणाचा अभाव आहे." असे म्हणतात.

राष्ट्रवादी म्हनून जर्मन लोक कितीही कडवे मानले गेले तरी या राष्ट्रवादाचा जन्म खूप अलीकडचा, म्हणजे नेपोलियन च्या युद्द्धोत्तर काळातील आहे. नाझी काळानंतर जर्मनीचे विभाजन झाल्यानंतर "राष्ट्रवाद" हा विषयच लोकांच्या दृष्टीने नकारात्मक बनला. शीतयुद्धाच्या कालात काही प्रमाणात सौम्य राष्ट्रवाद पुन्हा उभा राहिला आणि जर्मनी एकत्रही झाला. द्वितीय महायुद्धपुर्व कालात जर्मन राष्ट्रवाद हा जवळपास काल्पनिक "आर्यन वंश" या संकल्पनेवर उभा करण्यात हिटलरला यश मिळाले. पण त्या यशामागे ढासळलेली अर्थव्यवस्थाही कारण होती. हा राष्ट्रवाद टिकला नाही.

या पार्श्वभुमीवर अमेरिकेचा राष्ट्रवाद पाहिला तर वेगळीच तत्वे सामोरी येतात. हान्स कोहन हा तत्वविद म्हणतो कि अमेरिकन राष्ट्रवाद हा वांशिक नव्हे तर नागरी राष्ट्रवाद असून नागरिकत्व हा त्याचा पाया आहे. त्याला संयुक्त संस्थानांनी संस्थात्मक स्वरुप दिले असून कायदे, नागरिकत्वाच्या संकल्पना आणि अमेरिकेच्या संस्थापकांची संस्कृती या मिळून अमेरिकन राष्ट्रवाद बनतो. अर्थात १९१४ पुर्वी वांशिक भेद हा अमेरिकन राष्ट्रवादातील एक प्रभावी घटक होता.

मुस्लिम राष्ट्रवादही प्रत्येक मुस्लिम राष्ट्रात वेगळ्या पद्धतीने राबवला गेला आहे. त्यावर सविस्तर विवेचन नंतर आपण करू. पण म्हणजे राष्ट्रे खूप आहेत पण प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद इतके वेगवेगळे रंग घेऊन आहे कि शेवटी राष्ट्र ही संकल्पनाच अव्याख्येय बनुन जावी.

प्रत्येक राष्ट्र हे राजकीय दृष्ट्या स्वतंत्र रहावे, पर-आक्रमणाचा प्रतिकार करायला सज्ज रहावे, सीमा या सम्रक्षीत तर रहाव्यातच पण जमल्यास त्या विस्तारता याव्यात, देशांतर्गत नागरिकांना विकासाच्या व्यापक संध्या मिळव्यात व आर्थिक विकास दर वृद्धींगत रहावा, कायद्याचे राज्य असावे इत्यादि अपेक्षा प्रत्येक नागरिकाच्या (राष्ट्र कोणतेही असो) आपापल्या राष्ट्राकडून असतात असे आपल्याला दिसते. राष्ट्रवाद केवळ एवढ्याच ऐहिक बाबींपुरता मर्यादित राहत नसून तो धर्म, संस्कृती, भाषा, वंशवाद व आपल्या राष्ट्राची महत्ता इत्यादि अद्रुष्य पातळीवर वावरणा-या बाबींवर अधिक अवलंबून राहतो.

प्रत्यक्षात राष्ट्रांची सार्वभौमता ही आधुनिक काळात गौण बनत चालली आहे हे आपण मागील लेखांत पाहिले. जगातील सर्व राष्ट्रे विरुद्ध एकच राष्ट्र असा वेडेपणा हिटलरनेही केला नाही. याचे महत्वाचे कारण केवळ सामरिक आहे असे नसून सर्वच बाबतीतील परस्परावलंबितता कधी नव्हे एवढी आधुनिक काळात वाढली आहे. संपर्काची साधने जशी विकसीत होत आहेत तसतशी जागतीक सांस्कृतीक सरमिसळीचा वेगही अत्यंत वेगाने वाढला आहे. राष्ट्रा-राष्ट्रांत संघर्ष असला तरी नागरिक मात्र त्या-त्या राष्ट्रांतील संस्कृत्यांतील तत्वांवर (अगदी वस्तुंवरही) बहिष्कार घालतात असे चित्र मात्र आता पुसट होऊ लागले आहे व पुढे ते कदाचित राहणारही नाही.

टोळीवाद ही पुरातन काळातील एक अपरिहार्य मानवी निकड होती. त्यातून गणराज्ये, नगरराज्ये, राज्ये, साम्राज्ये ते राष्ट्रे अशी मजल गेल्या पाच हजार वर्षातील ज्ञात इतिहासाने मारली आहे. सत्तेचे उपजत भान ही मानवी प्रेरणा कालातीत राहिली आहे हेही आपण पाहतो. राजकीय गुलाम्यांविरुद्धचे स्वातंत्र्यलढे आजही जगात कोठे ना कोठे सुरु आहेतच. कोठे ते हिंसक आहेत तर कोठे अहिंसक...पण संघर्ष आहेत हे तर वास्तव आहे. यामुळे वैश्विक व्यवस्था सतत दोलायमान राहत अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते आहे.

राष्ट्रवाद, त्याची कोनतीही राजकीय व्यवस्था असो, प्रिय वाटला तरी त्याच्या प्रिय वाटण्यामागे सुरक्षिततेची आदिम भावना आहे हे तथ्य नाकारता येत नाही. भुमीवर मालकीची भावनाच नाही या काळापासून माणसाने भुमी, जल, आकाशावर मालकीहक्क प्रस्थापित करण्याची मजल गाठलेलीच आहे. प्रत्येक राष्ट्र त्यातील आपापला हिस्सा अधिकारवाणीने, युद्धखोर कृतीने अथवा करारान्वये मिळवायच्या प्रयत्नांत आहे. जगातील सर्वच नागरिक आपापल्या अस्तित्व व भवितव्याच्या प्रश्नाने भेडसावलेलेच आहेत. कधी युद्ध होईल अथवा कधी अचानक दहशतवादी हल्ला होईल हे कोणत्याही राष्ट्रातील नागरिक सांगू शकत नाही. कोठे तणाव अधिक आहे तर कोठे कमी. पण तणाव आहेत हे वास्तव आहे.

यात राष्ट्राचेच स्वातंत्र्य अबाधित नाही तर मग माणसाच्या समग्र स्वातंत्र्याचे काय होणार?

Friday, July 18, 2014

"वैदिक" चाळे...?


 
एक पत्रकार व वादग्रस्त (अ)योगगुरू रामदेवबाबा यांचे सहकारी वेदप्रताप वैदिक यांनी आपल्या पाकिस्तान भेटीदरम्यान स्थानिक पत्रकाराच्या मदतीने मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मूख्य सूत्रधार हाफीज सईद याची २ जुलैला भेट घेतली. ही भेट सईद व वैदिक यांनी नाकारलेली नाही. या भेटीमुळे भारतात वादळ उठणे स्वाभाविक होते. २६/११ च्या जखमा अजुनही ओल्या असतांना, या हल्ल्यामागील सुत्रधारांना जेरबंद करण्याच्या अथवा पाकिस्तानात घुसून ठार मारण्याच्या वल्गना वैदिकवादी एकीकडे करत असतांना वेदप्रताप वैदिक यांनी खुद्द सईदचीच भेट घ्यावी व काश्मिरसंबंधातही अत्यंत स्फोटक विधान करावे याचा अर्थ नीट समजावून घ्यावा लागणार आहे. मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत केवढे अंतर आहे हेही या निमित्ताने लोकांनी समजावून घावे लागणार आहे. भाजपाच्या मागील कार्यकालात कंदाहार प्रकरण झाले होते व मौलाना अजहर मसूद सहित तीन अतिरेकी खुद्द तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या बंदोबस्तात कंदाहारला मूक्त करण्यात आले होते हेही या निमित्ताने प्रकर्षाने आठवते. दहशतवाद्यांशी लढ्याबाबत भाजपा व तिच्या मातृसंस्था तोंडी कितीही उग्रवादी भाषा वापरत असले तरी त्यांची कृती मात्र विपरित असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत भाजपचेच समर्थक पत्रकार जेंव्हा भारताला मोस्ट वांटेड असलेल्या हाफीज सईदला भेटतो तेंव्हा प्रश्नचिन्ह उठणे स्वाभाविक आहे.

हाफीज सईद कोण आहे?

लष्कर ए तय्यबा या सध्या जगभर बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेची समाजसेवी शाखा म्हणजे जमात-उद-दवा. या संघटनेची पाकिस्तानात अनेक धर्मादाय इस्पितळे आहेत. काही शाळाही ही संघटना चालवते. वरकरणी समाजसेवी बुरखा पांघरल्यामुळे जगभरातून या संघटनेकडे देणग्यांचा पूर वाहत असतो. वरकरणी समाजसेवा हा या संघटनेचा उद्देश दिसत असला तरी तरुण दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कृतीकार्यक्रम आखणे व अंमलातही आनणे ही कामे ही संघटना करत असते. या संघटनेचे अनेक दहशतवादी प्रसिक्षण केंद्रे पाकव्याप्त काश्मिरमधील मुजप्फराबाद या भागात आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सहभागी कसाबसहित सहभागी तरुणांना प्रशिक्षण याच भागातील तळांवर दिले गेले. तेथुनच त्यांना मुंबईला समुद्रमार्गे रवाना करण्यात आले. २६/११ चा आतंक कोणीही भारतीय विसरू शकत नाही.

हाफीज सईद हा या संघटनेचा प्रमूख आहे. २६/११ च्या गुन्ह्यातील तो मुख्य सूत्रधार व आरोपी असून भारताने त्याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे नोंदवली आहे. पण अद्याप तरी पाकिस्तानने त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.सईद हा स्वत: अत्यंत बंदोबस्ताने व पुरेसे गुपित पाळून रहात असतो. एका पत्रकाराने "हाफीज सईदला भेटायला आवडेल का?" असे विचारल्यावरून आपण होकार दिला व पत्रकाराने फोन करुन भेट ठरवून दिली असा दावा भारतात परतल्यावर वैदिक यांनी केला आहे. वैदिक यांचे कार्य फक्त पत्रकारितेपुरते मर्यादित असते तरी अशी भेट सहजी कोणी घालून देवू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

वेदप्रताप हे बाबा रामदेवांचे निकटचे सहकारी मानले जातात. पाकिस्तानात ते सईदला मोदींचा दूत म्हणुन भेटल्याची चर्चा माध्यमांत व राजकीय वर्तुळांत आहे. त्य्यामुळे ही भेट निखळ पत्रकार म्हनून जर वैदिक यांनी घेतली असती तर त्या भेटीचा वृत्तांत त्यांनी लगेच प्रसिद्ध केला असता. पण तसे घडलेले नाही. त्यामुळे ही एका पत्रकाराने स्वतंत्रपणे घेतलेली भेट आहे या दाव्यात कितपत तथ्य असेल? या भेटीत सईद यांनी आपल्याला ते मोदींना शत्रु मानत नसून आपण दहशतवादी नसल्याचे व आपल्या विरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचे सांगितले असे म्हटले आहे.

मोदी समर्थकांच्या दृष्टीने ही भेट म्हणजे "मोदी-कावा" असून सईदला धडा शिकवण्याच्या रणनीतीचा एक भाग असू शकते. मोदीमाहात्म्य ज्यांच्या डोक्यात खुपच गेले आहे आणि मोदी म्हणजे कुटील बुद्धीमत्तेचे धनी आहेत या विश्वासाच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांना एक प्रश्न पडायला हवा तो हा कि अशी भेट झाली म्हणजे सईदला पकडायची अथवा ठार मारण्याची दिशा कशी मिळेल? विघातक दहशतवादी कारवायांची आखणी करून जो त्यांना अंजाम देवू शकतो, ज्याचे जगभर शत्रू आहेत तो माणूस आजवर जर सुरक्षित राहू शकतो तो एका पत्रकाराला भेट दिल्यानंतरही स्वत:ची सुरक्षितता राखु शकणार नाही काय?

ही भेट का घेतली? ही शिळोप्याच्या गप्पा मारायला झालेली भेट निस्चित नव्हती हे शेंबडे पोरही सांगू शकेल. त्या भेटीत खरोखर काय चर्चा झाली हे स्वत: सईद किंवा वैदिक सांगत नाही तोवर कदाचित आपल्याला समजणारही नाही. प्रश्न असा आहे कि भारताच्या शत्रू क्रमांक एकला वैदिक यांनी भेटावे काय? वर म्हटल्याप्रमाणे एक पत्रकार म्हणून तो अधिकार त्यांना नक्कीच आहे. परंतू ते मोदींचे प्रतिनिधी म्हणून भेटले असतील तर मात्र अत्यंत गांभिर्याने या प्रकाराकडे पाहिले पाहिजे. ते जर सईद यांच्या मनात भारत वा मोदी यांच्याबदल काय चालले आहे हे जानण्यासाठी भेटले असतील तर त्याला मुर्खपणा या सदरात न टाकता देशद्रोह या सदरात टाकून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, कारण भारतीय न्यायालयांनी एकदा निर्नय दिल्यानंतर त्यात उठाठेव करण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला नाही.

खरे तर प्रधानमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहोळ्याच्या वेळीसच पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना जी विशेष वागणूक दिली गेली व कलम ३७० ची चर्चा ज्या वेगाने उठवली गेली व त्याच्या शंभरपट वेगाने दाबून टाकली गेली तेंव्हाच या प्रकरणात काहीतरी शिजते आहे याची कल्पना यायला हवी होती. 

काश्मिर आणि वैदिकांचे तारे!

वैदिकांनी हाफीज सईदचे भेट घेतली हे भेटीच्या पुरेशा तपशिलाच्या अभावात दिर्लक्षीत करता येईल. परंतू काश्मीरबाबत आपली जी भुमिका पाकिस्तानात डान न्युज (Dawn News)  वाहिनीवर मुलाखत देतांना वैदिक यांनी मांडली आहे ती जास्त विघातक, विभाजनवादी आणि पाकधार्जिनी आहे.

वैदिक यांच्या मताप्रमाणे व्याप्त काश्मिर आणि सध्याचा भारताचा भाग असलेला काश्मिर यांतील जनतेने एकत्र यावे व स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य उपभोगावे व त्याला पाकिस्तान आणि भारताने सहाय्य द्यावे. स्वतंत्र काश्मिरी, त्यांचे उद्योग आणि वैभव यामुळे सध्याचा काश्मिर खरोखरच स्वर्ग बनेल. त्यांचे नागरिक इस्लामाबाद-कराचीतील नागरिकांप्रमाणे जसे स्वतंत्र असतील तसेच भारतातील नागरिकांप्रमाणेही स्वतंत्र असतील.

अशा रितीने त्यांनी मुलाखत देतांना काश्मिरच्या स्वतंत्र अस्तित्वाचे तत्वज्ञान मांडले. भारतात आल्यानंतर त्यांनी या मुलाखतीबाबत छेडले असता आपले म्हनने १८० अंशाच्या कोनात बदलले व धादांत खोटे बोलत "मला जी आजादी म्हणायचीय ती माणसाला-नागरिकाला असनारी आजादी" म्हणायचे होते." असे विधान केले. हेही विधान अजब अशासाठी आहे कि काश्मिरमधील (पाकव्याप्त काश्मिर वगळता) पारतंत्र्यात आहेत असे त्यांना म्हनायचे आहे काय?

भाजपच्या मागील कार्यकालाच्या दरम्यान व्याप्त काश्मिर पाकिस्तानला कायमचा देऊन टाकावा आणि सध्याची ताबारेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा मानण्यात यावी असे म्हनायची टूम निघाली होती. पुण्यातही या विषयावर एका काश्मिरी विद्वानाचे व्याख्यान झाले होते. आता वैदिकांच्या मुखातून त्याही पुढची मुक्ताफळे बाहेर पडत आहेत. यातून देशात एक वैचारिक गोंधळ उडवून देण्याचा डाव नाही असे कोण म्हणेल?

वैदिक हे रा. स्व. संघाचे हस्तक आहेत असा आरोप राहूल गांधींनी केला आहे. तसेच वैदिक व हाफीज सईद यांचीही भेट घालून देण्यात पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाने पुढाकार घेतला असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय आरोप किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न असला तरी त्यांचे महत्व कमी होत नाही. मुळात एका बिनीच्या दहशतवाद्याशी शत्रू राष्ट्रातील पत्रकाराची भेट होऊ शकते ती वर म्हटल्याप्रमाणे शिळोप्याच्या गप्पांसाठी नव्हे. या मुलाखतीनंतर जर वैदिक काश्मिरबाबत आपले तारे तोडत असतील तर आधीची सईदबरोबरची भेट ही वेगळ्या दृष्टीकोनातून पहावी लागते तरच या दोन बाबींचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते.

वैदिक हे हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) विचारसरणीचे आहेत. रा. स्व. संघाशी ते सरळ निगडित् नसले तरी अशा अनेक विद्वानांप्रमाणे ते अप्रत्यक्षरित्या संघाचे काम पुढे नेत असतात. सध्या मोदी आणि संघ यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत हे ज्या पद्धतीने भाजपावर स्वत:चे वर्चस्व बळकट करत नेत संघाचे पंख कापत चालले आहेत त्यावरून दिसून येते. अमित शहांसारख्या वादग्रस्त इसमाला त्यांनी भाजपाची अध्यक्ष नेमण्याची परंपरागत पद्धतही मोडकळीस काढत ज्या पद्धतीने अध्यक्षपदावर आणले ते संघाच्या कर्मठ (बे)शिस्तपद्धतीला साजेशे नाही. संघाचा ३७० चा अजेंडा एका मंत्र्याने जोरात उचलला आणि मोदींच्याच इशा-यासरशी गपगार झाला. मोदींवर मुस्लिमद्वेषाचे आरोप आहेत तसेच गुजरातेतील मुस्लिम कत्तलीचेही आरोप आहेत हे वास्तव आहे. तसेच देशपातळीवर घडवावे असा संघाचा होरा असल्यास आश्चर्य नाही. परंतू मदरसे आणि हाज यात्रेबाबतची मोदी सरकारची भुमिका संघाच्या पचनी कशी पडनार?

त्यामुळे वैदिक हा मोदीचा दूत कि रा, स्व. संघाचा दूत हा प्रश्न आला कि वैदिक संघाचा दूत असून मोदींना ब्यकफुटला नेण्याचे कारस्थान असण्याची शक्यता वाटने स्वाभाविक आहे. संघ परंपरेला ते साजेशे आहे. अनेक घातपातांसाठी संघप्रणित हिंदुत्ववादी दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे सहाय्य घेतल्याचे आरोप आहेत. समझौता एक्स्प्रेस स्फोटांचे उदाहरण बोलके आहे. अशा स्थितीत वैदिकची सईदशी भेट भारतीय उच्चायुक्तालयाने घालून दिली कि दस्तुरखुद्द आयएसआयने हेही तपासले गेले पाहिजे.

वैदिक यांची हाफीज सईदशीची भेट ही पत्रकारितेच्या दृष्टीकोनातून झालेली नाही हे उघड आहे. त्यामागील कुटील डाव काय होते हे आपल्याला कदाचित समजणारही नाही. परंतू काश्मीर स्वतंत्र व्हावा हे आपले मत जाहीरपणे आणि तेही पाकिस्तानात व्यक्त करून त्यांनी देशद्रोह केला आहे. . त्यांच्यावर यथोचित कारवाई व्हायलाच हवी यात शंका नाही. सर्वच विरोधी पक्षांनी (स्वत: मोदींनीही) याबाबत तळाशी जाऊन सत्यशोधन करायला हवे.

पाकिस्तानशी युद्ध हाच पर्याय असा साहसवाद दाखवत सातत्याने प्रचार करना-या संघाची व भाजपाची ही नीति आता म्हणे "मित्रनीति" मद्ध्ये बदलली आहे आणि तिचे स्वागत करा असे त्यांचेच बगलबच्चे सांगत फिरत आहेत हे अजुनच विनोदी आहे. एक तर त्यांनाच "संघनीति" अजून समजलेली नाही किंवा ते उर्वरित भारतियांना मुर्ख समजत आहेत.

(हा लेख ताज्या "कलमनामा" साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे.)



Thursday, July 17, 2014

पुरोगामी...?

मानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय? अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्रागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.

शेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.

पुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.

वैदिकांना मी विरोध करतो कारण ते प्रतिगामी आहेत. ते कालबाह्य वर्णव्यवस्था, वैदिक स्तोम, परंपरा-संस्कृत्यांच्या इतिहासातील खोटारडेपणा करत आपले वर्चस्व आजही कसेबसे टिकवायच्या प्रयत्नांत मशगूल असतात. पण वैदिक विचारव्यवस्थेला विरोध करणारे स्वत: विरुद्धार्थाने तेवढेच प्रतिगामी असतात त्याचे काय? वैदिक विषम व्यवस्थेला जे सर्वोपरी मानतात ते त्रैवर्णिक, मग ते आज कोणत्याही जातीचे असोत, ते माझ्या दृष्टीने वैदिक आहेत. जे वैदिक नाहेत तरीही स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानतात तेही वैदिकच होत. भले वैदिक धर्मात त्यांचे स्थान धर्मबाह्य का असेना. जे या उच्च-नीचतेच्या अमानवी व अवैज्ञानिक संकल्पनांतून बाहेर पडले आहेत व जन्माधारीत कोणत्याही प्रकारचा जन्मसिद्ध वर्णीक वर्चस्वतावाद आपापल्या आत्म्याला साक्षी ठेवून जे नाकारतात, ते त्यांच्या धर्मातील कोणत्याही वर्णात जन्माला येवोत, त्यांना वैदिक मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी मानुही नये.

पण म्हणून अमुक वर्णात अथवा जातीत जन्माला आला म्हणून त्यांचा निरंतर द्वेष करत स्वत:चा नव-वर्चस्वतावाद आणु पाहतात ते कोण आहेत? त्यांना कोण पुरोगामी म्हणेल? ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील! मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय? द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात! पण विचार तर पुढे न्यायचा नाही, त्याच द्वेषाच्या चौकटीत अडकुन रहायचे...

पुरोगामी या संकल्पनेची याहून मोठी कुचेष्टा व विटंबना अजून काय असू शकेल?

Wednesday, July 16, 2014

राष्ट्रांची फसवी सार्वभौमता!

 एक जग : एक राष्ट्र (४)


राष्ट्रवाद हा शिकवावा लागतो. ती नैसर्गिक प्रेरणा नाही. लहानपणापासून पालक व नंतरच्या समाज व शैक्षणिक जीवनात आपले राष्ट्र, त्याच्या समृद्ध परंपरा, उज्ज्वल इतिहास आणि चारित्र्यसंपन्नतेच्या ख-या-खोट्या संकल्पनांचा मारा करत आपापल्या राष्ट्राबाबतचा जाज्वल्य अभिमान निर्माण सर्वत्रच केला जात असतो. याचा अर्थ "राष्ट्रवाद" ही नैसर्गिक प्रेरणा नाही. समुहजीवनासाठी व सुरक्षिततेसाठी जसा आदिम काळात टोळीवाद विकसीत झाला तसाच आधुनिक काळात राष्ट्रवाद विकसीत झाला आहे असे म्हणता येईल.

कोणत्याही राष्ट्राचा इतिहास अथवा परंपरा स्वतंत्र बेटासारख्या नसतात. कोणत्याही प्रदेशाचा इतिहास हा अन्य प्रदेशांशी निगडित असतो. परंपरांबाबतही असेच म्हणता येईल. पुरातन काळापासून, जेंव्हा जमीनीवर मालकी ही संकल्पनाही उदयाला आलेली नव्हती तेंव्हापासून, मनुष्य हा सर्वच बाबतीत देवान-घेवान करत आला असल्याचे आपल्याला दिसून येईल. एवढेच नव्हे तर कालौघात जे अयोग्य वटले त्याचा त्याग करत नव्या संकल्पना विकसीत करत गेला असल्याचे दिसून येईल. संपर्काची साधने ज्या काळात अतीव मर्यादित होती त्या काळातही सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृती परस्पर देवाण-घेवाण करत असल्याचे इतिहासात पाहता आपल्याला दिसते. अमुकची संस्कृती श्रेष्ठ आणि तमुकची कनिष्ठ असे ठरवायचे कोणतेही प्रमाण उपलब्ध नसून संस्कृत्यांची अंगभूत वैशिष्ट्ये ही त्या त्या समाजांच्या प्रदेशनिहाय निकडीतून जन्माला आलेली आपल्याला दिसतात. अरबांचे टोळीजीवन व श्रद्धा-संकल्पना ही त्यांच्या वाळवंटी प्रदेशातील अपरिहार्य निकड होती. त्यातील टोळीअभिमान आणि आक्रमकता आणि त्या अनुषंगाने जन्माला आलेल्या नैतिक संकल्पनांकडे त्यांच्या अधिवासाच्या परिप्रेक्षात पहाव्या लागतात. सुपीक प्रदेशातील नैतिक तत्वे आणि त्यांची नैतिक तत्वे यांची तुलना होऊ शकत नाही. पण ती आपण करत असतो आणि सांस्कृतिक तुलना करत जात असतो, ही चुक नव्हे काय?

तरीही त्यांच्यात आणि अन्यांत सांस्कृतिक देवाण-घेवाणी झालेल्याच आहेत हे वास्तव कसे नाकारता येईल?

थोडक्यात राष्ट्राच्या सीमा टोळीपद्धतीने ठरवत, आंतर्गत तथाकथित सार्वभौमता जपत संस्कृती आणि इतिहासाचे वितरण आपापल्या सोयीनुसार करत त्यांचा गौरव रुजवत जी राष्ट्रभावना तयार केली जाते तिचा अंतिम उद्देश्य तरी काय असतो?

इतर राष्ट्रांशी आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्पर्धा करत राष्ट्राच्या नागरिकांमद्ध्येही तीच स्पर्धाभावना निर्माण करणे हे यामागील वरकरणी कारण आहे असे म्हणता येईल. परंतू त्याचे लाभ कितपत होतात? की त्याचे तोटेच अधिक आहेत?

कोणतेही राष्ट्र अलग बेटाप्रमाणे स्वतंत्र आणि इतरांपासून पुरेपूर अलिप्त असे अस्तित्वात असुच शकत नाही. जागतिक घडामोडींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम हा सर्वच राष्ट्रांवर होत असतो. कोणत्याही राष्ट्रात दुष्काळ पडला, युद्धजन्य स्थिती निर्माण झाली अथवा युद्धे सुरु झाली तरी त्याचा परिणाम दुरान्वयानेही ज्या राष्ट्रांशी नाही अशांवरही त्याचा अपरिहार्य परिणाम होतो हे आपण रोजच्या घडामोडींमधुन पाहतो. भांडवलबाजार ते अन्न-धान्याच्या भावांचे इंडेक्स त्या घडामोडींवर ठरतात, फक्त राष्ट्रांतर्गतच्या घडामोडींमुळे नाही. परराष्ट्र धोरणे, (कोणाशी मैत्री, कोणाशी शत्रुत्व, कोणाबाबत अलिप्तता), आर्थिक धोरणे आणि व्यापारनीति ठरवतांना जागतिक संदर्भ अतलपणे येत असतात. या धोरणांत सातत्याने जागतिक बदलत्या स्थितीनुसार बदल घडवावेच लागतात हे उघड आहे. असे निर्णय घेतांना वर्चस्वतावादी राष्ट्रांची धोरणेही विचारात घ्यावी लागतात, नव्हे अनेकदा त्यांचेच ऐकावे लागते.  तशी धोरणे ठरतात.

या राष्ट्रांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकणारा अजून एक मोठा प्रभावशाली घटक असतो व तो म्हणजे बडे भांडवलदार. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या आर्थिक आणि सामरिक निर्णयप्रक्रियेवर अमेरिकन उद्योजकांची केवढी पकड आहे हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक राष्ट्रात हे होते. बहुराष्ट्रीय कंपन्या तर अनेक देशातील सरकारे अप्रत्यक्षपणे स्वत:च चालवत असतात हे अनेक उदहरणांवरून सिद्ध होईल. अनेक सरकारे उलथवली जातात ती स्वदेशाचे सहकार्य घेत आपली अर्थसत्ता निर्माण करण्यासाठी भारताचे एफ. डी. आय. च्या कच्छपी लागणे, नवा भुमीग्रहण कायदा आनणे ई. घटना या दृष्टीने पहाव्या लागतात. माध्यमे बव्हंशी या भांडवलदारांच्याच ताब्यात असल्याने आपणास अनुकूल जनमत तयार करणे, एखाद्या गोष्टीची अपरिहार्यता लोकांना पटवून देणे यासाठी ते माध्यमांचा चपखलपणे कोणाच्या लक्षात येऊ न देता वापर करतात. लोकांना कोणती माहिती द्यावी आणि कोणती देवू नये याची चाळणी आधीच लागलेली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सत्याचा पत्ता कधीच लागत नाही. हाती पडतात ते सत्याचे विकृत तुकडे. आणि त्याच आधारावर ते नागरिक मतदाने करतात आणि सार्वभौम नागरिकाचा असार्वभौम अधिकार बजावण्यात खूष राहतात.

मुळात कोणत्याही राष्ट्राची सार्वभौमता ही एक फसवी बाब आहे. तिला वास्तवाचा कसलाही आधार नाही हे मात्र कोणी लक्षात घेत नाही.

मग अशा परिस्थितीत "राष्ट्र" या संकल्पनेचे काय होते? ती लोकनियुक्त हुकुमशहा, अनिर्बंध भांडवलदार यांना ज्ञानाच्या मुलभूत नागरी अधिकारांवर घाला घालत निरंकुश राजसत्ता आणि अर्थसत्ता उपभोगू देण्याचे साधन आहे कि काय?

आपल्याला यावर मुलभूत विचार करायला हवा!

Friday, July 11, 2014

सावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...

पुणे विद्यापीठाला अखेर सावित्रीमाईंचे नांव दिले गेले. गेले काही दिवस मी सर्व थरांतील प्रतिक्रिया पाहत आलो. (खाजगीतीलही). हे नामांतर अथवा नामविस्तार अत्यंत अहिंसक मार्गाने झाले याबद्दल एका हिंसक आंदोलनानंतर नामांतर झालेल्या काही समाजघटकांना रोष वाटलेला दिसला तर पुण्यातील शैक्षणिक क्रांती घडवणारे अन्य महापुरुष शासनाला/समाजाला कसे दिसले नाहीत असा प्रश्न काही समाजघटकांना पडलेला दिसला. त्याच वेळीस इतर समाजघटकांनाही इतर विद्यापीठांना आपापल्या समाजातील महनियांचे नांव आता लवकर दिले गेले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले तर आता या देशात आमचे स्थान पुसण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही काहीजनांना वाटले.

सावित्रीमाईंचे नांव पुणे विद्यापीठाला दिले जाणे यात जो खरा सांस्कृतिक अन्वयार्थ होता व आहे याचे भान मात्र अवैदिक बहुजन समाजाला आले आहे याचे पुसटसेही चिन्ह मला दिसले नाही.

महात्मा फुले हे वैदिक संस्कृती/धर्म या विरोधात बळीराजाची (म्हणजे पुरातन असूर शिव-संस्कृतीची) कड घेणारे पहिले महात्मा होत. सावित्रीमाईंचा कवितासंग्रह मुखपृष्ठावर शिव ते पहिले नमन शिव येथून सुरु होते. उभयतांनी बहुजनांत वैचारिक क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली. वैदिकांचे अत्याचार अन्याय बहुजन सहन करत आहेत असे असुनही वैदिकांबाबात द्वेषभावना न ठेवता योग्य तेथे सख्यच ठेवले, आदर व सहकार्यही केले. ख-या अर्थाची बळीराजाची उदार हृदयी संस्कृती पुन्हा जीवित केली.

या देशातील सर्वच महिलांना ज्ञानाचे, जागृतीचे आणि आत्मनिष्ठेचे बळ सावित्रीमाईंनी पुरवले. त्यासाठी अगणित अवमान आणी शेवटी एका निष्पाप प्लेगग्रस्त मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला...आणि प्राणही त्यागले.

पण समजा हेही महत्वाचे नाही. संस्कृती कोणाची आणि कशी याचे दर्शन कितीही छपवले गेले तरी छपत नाही. इतर कोणी महान नव्हते असे नाही. पण स्वत: महात्मा फुले म्हणत कि सावित्री त्यांच्याही उद्वेलित स्थितीत आदर्श गुरुचे कार्य करायची. त्यांना महाधीर व्हायची.

या देशात कोणाची संस्कृती अजेय आहे? ती आहे बळीराजाची संस्कृती. आधुनिक काळात एखाद्या महान तत्ववेत्याप्रमाने म. फुलेंनी त्या संस्कृतीचा उद्घोष केला. स्त्रीयांना समता देणारी बळीराजाची संस्कृती कशी असते हे सावित्रीमाईंच्या रुपात दाखवले. आता पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नांव दिले गेले तेथेच कोणाची संस्कृती खरी मानवीय, सहृदय आणि ज्ञानवादी आहे हे सिद्ध झाले. मध्यंतरीच्या काळात पुसट झाली असली तरी ही बळीराजाच्या संस्कृतीच्या स्थापनेची उद्घोषना आहे...आणि म्हणुन त्याचे सांस्कृतिक माहात्म्य अपार आहे.

जे कोणी बळीराजाची पूजा बांधतात....त्या सा-यांनी म. फुले आणि सावित्रीमाईंना वारंवार वंदना करायला हवी कारण त्या संस्कृतीचा आधुनिक उद्गार ते दांपत्य आहे. ते माळी होते, मग इतरांचे काय काम असा जे विचार करत असतील ते बळीराजाच्या संस्कृतीचे कसे वारसदार असू शकतात?

ते महात्मा फुलेंच्या एकमय समाजाच्या भावनेचे कसे पाईक असू शकतात?

ते माळी असणे ही त्यांच्या अस्तित्वाची खुण नव्हे तर ते कोणत्या संस्कृतीचे पाईक होते हेच खरे त्यांच्या अस्तित्वाचे महनीय उर्जाकेंद्र आहे.

पुरुषसुक्ताचा उद्घोष एकीकडे काही लोक करत असतांनाच बळीराजाच्या संस्कृतीची उद्घोषना करणा-या, शिवमय विश्वाची स्वप्ने पाहणा-या सावित्रीमाईंचे नांव पुणे विद्यापीठाला मिळावे हा बहुजनीय बळीराजाच्या संस्कृतीचा विजय आहे. त्यात जातीय कोतेपणा करू नका.

सावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...!

Tuesday, July 8, 2014

धनगर....धनगड

शरद पवारांनी धनगर समाज चुकुन "धनगड" या नांवाने शेड्युल्ड ट्राइब्जमद्धे सामाविष्ट असतांनाही ती चूक दुरुस्त करण्याऐवजी, तशा केंद्रीय मागासवर्ग आयोग व क्यगच्या सुचना असतांनाही त्यांना "भटक्या जमाती" (Nomadic Tribes) या नांवाने नवा प्रवर्ग निर्माण करुन त्यात टाकले.

आता धनगर ही कोणत्या मानववंश शास्त्रानुसार भटकी जमात झाली? रसेल, इंथोव्हेन सारखे मानववंश शास्त्रज्ञ ते आताचे केंद्रीय मागासवर्ग आयोग चुकाच करत गेले काय? त्या चुका असतील तर मग त्यांनी त्या कशा दुरुस्त केल्या? धनगड नांवाची जातच महाराष्ट्रात अस्तित्वात नाही...तेंव्हा जर ती स्पष्टपणे राज्याच्या शेड्युल्ड ट्राइब्जच्या यादीत आली असेल तर त्यात चुक झाली आहे हे का लक्षात घेतले नाही? आणि जर ही जातच महाराष्ट्रात नाही तर तिला आरक्षण कसे दिले? भटक्या जमातीची (भटक्या आदिवासींची) वैशिष्ट्ये त्यांना अथवा त्यांच्या विद्वानांना माहित नव्हती कि काय? आणि समजा ते भटकेच आदिवासी आहेत तर त्यांची अवस्था स्थिर आदिवासींपेक्षा कशी चांगली असू शकते?

म्हणजे सामाजिक न्याय, शाब्दिक चुक (Anomaly) याचा गैरफायदा व धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला असेल तर याला दोषी कोण? अन्य बहुतेक राज्यांत ही चूक दुरुस्त करण्यात आली असतांना महाराष्ट्रच नेमकी ती करत नाही याचे नेमके कारण काय?

१) तशी मागणी मुळात कोणी केली नाही.
२) केली तरी ती नेमकी कोठे करावी लागेल हे माहित नाही.
३) महाराष्ट्रातील एकुणातील राजकारण एका विशिष्ट जातीभोवती आणि एका विशिष्ट जातीच्या आणि एका धर्माच्या अनुनयाभोवती फिरते. त्यापलीकडे महाराष्ट्रात अनेक वंचित समुदाय आहेत पण त्याकडे लक्ष न देणे परवडण्यासारखे आहे.
४) हा सामाजिक असमतोल जो जाणीवपुर्वक मुजोरीने निर्माण केला गेला आहे तो उद्रेकायचे कारण या सत्ताधा-यांनी आजही जीवंत ठेवले आहे.
५) काय वाट्टेल ते झाले तरी राजकारणात प्रतिस्पर्धी नको, ताटाखालची मांजरे हवीत या भावनेपोटी आदिवासी काय आणि दलित काय यांना वापरुन फेकायचे ही मनोवृत्ती आहे. दुर्दैवाने तसे चमचे सर्वच जाती/जमातींतून मिळतात.

त्यामुळे हा प्रश्न फक्त आरक्षणाचा नसून सामाजिक न्यायाचा आहे. राजकीय न्यायाचा आहे. घटनात्मक अधिकार नाकारले का जातात आणि झुलवले कसे जाते हे समजावून घेण्याचा आहे. दुस-यांचे अधिकार नाकारत स्वत:लाही शोषित समजत आरक्षनाच्या चुली पेटवण्याचा आहे.

धनगर समाज एक उदाहरण आहे. हीच बाब भटक्या विमुक्तांबाबत, कोळी, आगरी, हळबा कोष्टींबाबत राज्य सरकारने आजतागायत केली आहे. स्वार्थाचे किती राजकारण करावे याला काही सीमा असतात. हे काही छत्रपतींचे नांव घेण्यालायक नाहीत.

महाराष्ट्र हा जत्यंधांच्या हाती कधीच गेला आहे. फक्त ब्राह्मनांना शिव्या देत लोकांचे लक्ष्य वळवतात...
एवढेच!

 धनगर-धनगड एकच!

"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण" हा दहा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. "धनगर" छापण्याऐवजी "धनगड" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून "र" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत "ड" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून "धनगड" ऐवजी "धनगर" हा शब्द वापरण्यास यावा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशीच दुरुस्ती करण्यात यावी अशी धनगर समाजाची न्याय्य मागणी आहे. तसेच मिनिस्ट्री ओफ़ ट्रायबल अफेयर्सच्या २००८-९ च्या वार्षिक अहवालात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर इंग्रजी आवृत्तीत "Oraon and Dhangad" असे छापले असून याच अहवालाच्या हिंदी अनुवादात "ओरान, धनगर" असे छापले आहे. याचाच अर्थ आदिवासी मंत्रालयालाही धनगड (धांगड नव्हे) व धनगर एकच असल्याचे मान्य आहे. यामुळे ही छपाईतील चुक आहे असा मुलात दावाच नसून भाषिक उच्चारपद्धतील फरकामुळे झालेला हा गोंधळ आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निर्णयातही  "धनगर/धनगड" ही जात बिहार, उत्तर प्रदेश आणि पस्चिम बंगालमद्ध्ये अनुसुचीत जातींमद्ध्ये मोडत असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुसुचित जमातींमद्ध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आर. व्ही रसेल सारख्या मानववंश शास्त्रज्ञानेही Tribes and Castes of Central Provinces of India (Vol.I) या ग्रंथात धनगर ही जमात आदिवासी असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. २२/१२/१९८९ रोजी सुर्यकांता पाटील यांनी संसदेत धनगरांची अनुसुचित जमातींत नोंद आहे काय असा प्रश्न विचारला असता तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी "महाराष्ट्रातील धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींत आधीच केला असून धनगड व धनगर एकच आहेत" असे विधान केले होते. अशा रितीने धनगर व धनगड एकच असल्याचे असंख्य पुरावे देता येतील, पण विस्तारभयास्तव येथेच थांबतो.

प्रश्न असा आहे कि महाराष्ट्र शासनाने जाणीवपुर्वक धनगरांना अनुसुचित जमातीत असलेले आरक्षण न देता "भटक्या जमाती" म्हणून आरक्षण का दिले हा. धनगर ही निमभटकी, आदिम काळाप्पासून पशुपालनाचा व्यवसाय करणारी, आदिम जीवनशैली, संस्कृती व धर्मकल्पना असणारी जमात असुनही त्यंना "भटक्या जमाती" ठरवणे हेच मुळात चुकीचे होते. वारंवार धनगड/धनगर हे एकच असल्याचे केंद्रीय मागासवर्ग आयोग, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय व विविध उच्च न्यायालयांनी मान्य केले असतांनाही महाराष्ट्रातील धनगरांच्या अज्ञानाचा आणि राजकीय बळ नसल्याचा गैरफायदा शासनाने घेतलेला आहे. डा. देशमुख व तळपे यांना वाटते तसे अन्य आदिवासींच्या हक्कांवर घाला घालण्याचा हा प्रयत्न नसून धनगरांचे न्याय्य हक्क प्राप्त करण्याचा आहे. उलट त्यांनीच यासाठी धनगर बांधवांना साथ दिली पाहिजे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाने "धनगर/धनगड" (धांगड नव्हे) एकच असल्याचा निर्वाळा दिला असल्याने राज्य सरकार आयोगाकडे शिफारस करून महाराष्ट्रातील धनगरांना न्याय देवू शकते व तो द्यावा हीच राज्य सरकारकडून अपेक्षा आहे.

-संजय सोनवणी

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...