Tuesday, June 26, 2018

सुरक्षित गुंतवणुकीसाठी "रिलायंस निवेश लक्ष्य"



म्युच्युअल फंडाद्वारे सर्व प्रकारची आर्थिक उद्दिष्टे पुर्ण करण्याची संधी मिळते हे आपण पाहिले आहे. यासाठीच वेगवेगळी उद्दिष्टपुर्ती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड डिझाईन करण्यात आलेले असतात. केवळ इक्विटी प्रकारच्या, तुलनेने अधिक जोखिम असणा-या ( म्हणूनच अधिक परतावाही असु शकणा-या) फंडांमध्ये सर्व गुंतवणूक करण्यापेक्षा जोखिम नसलेले आणि दिर्घकाळात सुरक्षित चांगला परतावा देणारेही फंड गुंतवणुकीसठी वापरावेत असा सल्ला अर्थ तज्ञ अनेकदा देत असतात. दिर्घ काळासाठी सुरक्षित गुंतवणूक करु इच्छिणा-यांसाठी डेट फंड हा पर्याय आघाडीवर असुन त्यात अधिक सुविधा देणारा "रिलायंस निवेश लक्ष्य" हा ओपन एंडेड डेट म्युचुअल फंड नुकताच गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे.

डेट फंड म्हणजे काय हे आपण आधी समजावून घ्यायला हवे. या फंडातील रक्कम सरकारी अन्य रोखे आणि मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते. यात स्थिर परतावा मिळण्याची खात्री असते. भांडवल बाजारातील चढ-उताराचा यावर काहीही परिणाम होत नाही कारण शेयर मार्केटशी या गुंतवणुकीचा संबंध नसतो. सरकारचेच रोक्यांबद्दलच्या व्याजदराबाबतचे धोरण बदलले तरच हॊ शकला तर किंचित परिणाम या गुंतवणुकीवर होऊ शकतो. पण या निर्माण झाल्या तरच आणि त्याही तात्कालिक अवस्था राहतात. दिर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर गुंतवणुकदारांना चांगला आणि खात्रीशिर लाभ मिळु शकण्याची सुविधा या प्रकारच्या फंडामध्ये असते. त्यामुळेच रिलायंस निवेश लक्ष्य नव्या आणि सुनियोजित प्रकारे आखणी केलेल्या फंडाचे गुंतवणूक लक्ष्य २५ ते ३० वर्षांसाठीचे आहे.

गुंतवणूकदार आपल्या मुलांचे भावी शिक्षण, आपल्या निवृत्तीनंतरच्या काळासाठीची तरतुद आणि इतर अन्य कोणत्याही दिर्घकालीन उद्दिष्टाची पुर्ती करण्यासाठी गुंतवणूक करु इच्छितात त्यांच्यासाठी "रिलायंस निवेश लक्ष्य" हा एक उत्तम पर्याय असू शकतो. "रिलायंस निवेश लक्ष्य" या फंडाने % ते .१३% या वार्षिक परतावा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मनी मार्केट आणि सरकारी रोख्यांत गुंतवणूकी केल्या जातील आणि त्यांचे वितरण परिस्थितीप्रमाणे बदलण्यात येईल त्यामुळे सरकारी धोरणांत यदाकदाचित नकारात्मक बदल जरी झाला तरी परताव्यावर परिणाम होऊ देण्याचा प्रयत्न केला जाईल.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी हा एक सुरक्षित पर्याय आजवर मानला जात होता. पण सध्या एनपीएच्या समस्येने जवळपास सर्वच बँकांना ग्रासले आहे. शिवाय गेल्या काही वर्षांत मुदत ठेवींवरील व्याजात घटच होत आलेली आहे. भारतातच २०१० साली मुदत ठेवींवर ११% व्याज मिळत होते. ते आता केवळ .% वर आले आहे. म्हणजे परताव्यात घटच होत आली आहे भविष्यातही हाच ट्रेंड राहण्याची शक्यता आहे. त्यात मुदत ठेवींवरील व्याज हे करांच्या कक्षेत येते वजावट मिळत नाही. पण डेट फंडात करबचतीचे मार्ग काही प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा आणि सुरक्षितता मिळु शकते हे आपल्या लक्षात येईल.

रिलायंस निवेश लक्ष्य फंडाचे धोरण असे आहे की २५ ते ३० वर्ष या दिर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करुन गुंतवणुकदारांना सुरक्षित खात्रीशिर परतावा देणे. सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक ही सरकारद्वाराच हमीप्राप्त असल्याने गुंतवणुकदार निर्घोर राहू शकतात. आपली मुले, नातवंडे यांच्या भविष्याची तरतूद करुन ठेवण्याचा हा उत्कृष्ठ मार्ग हा फंड देतो. सेवानिवृत्तीचा काळ चांगला घालवण्यासाठीही हा फंड आकर्षक ठरतो

शिवाय अचानक कोणाला पैशांची गरज असल्यास त्याला आपली गुंतवणूक केंव्हाही काढुनही घेता येते. त्यामुळे लिक्विडिटी हीसुद्धा समस्या उरत नाही. गुंतवणूकीच्या दिवसापासुन तीन वर्षांनंतर या फंडावर येणा-या व्याजाला इंडेक्सेशन करसवलती मिळतात, त्यामुळे करबचतही होऊ शकते. कोणाला नियमित विथड्रॉवल करायचे असल्यास तीही सुविधा या फंडाने दिली आहे.

वरील बाबी लक्षात घेता दिर्घकालीन वित्तीय उद्दिष्ट असलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक नवे आकर्षक वित्तीय साधन रिलायंस निवेश लक्ष्यच्या रुपाने उपलब्ध झाले आहे. हा फंड गुंतवणुकदारांसाठी १८ जुनला खुला झाला असुन अंतिम मुदत ही जुलै २०१८ आहे. आपल्या गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घेऊन आणि या फंडाची कागदपत्रे पाहून आपण आपल्या गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.


या वेबसाईटवरही आपल्याला या फंडाची माहिती मिळेल

Sunday, June 17, 2018

जनुकांचे सांस्कृतिक राजकारण!


वैदिक धर्म भारतात आक्रमणाद्वारे आला नाही तर शरणार्थींच्या माध्यमातून आला आणि धर्मप्रचाराने पसरला हे वास्तव समजावून घेणे वेदाभिमानी विद्वानांना मान्य करणे अवघड जाते. वैदिक संस्कृती येथीलच अणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच हे ठरवण्यासाठी जनुकीय विज्ञानाचा गैरवापर केला जात आहे हे या निमित्ताने लक्षात येते. डीएनएमधून फार तर त्या व्यक्तीची आनुवांशिकी व अन्य जैविक माहिती समजत असली तरी त्यातून भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी अमूर्त बाबी समजत नाहीत.

राखीगढी येथे उत्खननात सापडलेल्या मानवी सांगाड्यांतील जनुकांचा अभ्यास करून त्यातून काय निष्कर्ष निघतात हे घोषित झाले आणि भारताचा इतिहास नव्याने लिहावा लागेल, असा दावाही केला गेला. सिंधू संस्कृतीचे लोक एेतद्देशीयच असून आजही त्यांचेच वंशज पंजाब-हरियाणा प्रांतात राहतात आणि आर्य आक्रमण सिद्धांत खोटा आहे या इतिहासकारांनी आधीच मान्य केलेल्या सिद्धांताची पुष्टी झाली असली तरी जे नवे दावे केले गेलेत ते मात्र टीकेचे कारण बनले आहेत.

पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे की, राखीगढी येथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांच्या डीएनए चाचण्यांचे निष्कर्ष प्रयोगशाळेतून येण्यापूर्वीच गेल्या वर्षी “हे निष्कर्ष राजकीयदृष्ट्या खळबळजनक असतील!’ असे डॉ. वसंत शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यावर ‘दिव्य मराठी’मध्ये मी गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये लेख लिहिला होता आणि त्यात डीएनए चाचण्यांतून परस्परविरोधी निष्कर्ष कसे काढले जातात आणि ते निष्कर्ष राजकीय हेतूंनी कसे प्रेरित असतात हे लिहिले होते. खरे तर निष्कर्ष हाती येण्याआधी डॉ. वसंत शिंदे यांनी असे विधान करणे हे राजकीयच होते. त्यावर अनेक विद्वानांनी टीकाही केली होती.

आता उशिरा का होईना डॉ. वसंत शिंदे यांनी प्रयोगशाळेतून आलेल्या डीएनए परीक्षणाच्या अहवालानुसार सांगितले आहे की थोडाफार इराणी अंश सोडला तर सिंधू संस्कृतीचे लोक एेतद्देशीयच होते. त्यामुळे आर्य व वैदिक संस्कृती किंवा वैदिक पर्व येथीलच असून आर्य आक्रमण सिद्धांत बाद ठरतो. अनेक संघवादी विद्वान “वैदिक आर्य येथलेच” ही जी मांडणी करत आले होते त्यांना समर्थन देण्यासाठी राजकीय कारणांसाठीच संशोधन वापरले जात आहे की काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती पुरातत्त्व विभागानेच निर्माण करावी ही बाब चिंतेची आहे. याची काही कारणेही आहेत.

पहिली बाब म्हणजे ऋग्वेदाचा काळ. हा काळ कसल्याही स्थितीत इसपू दीड हजार वर्षांपलीकडॆ जात नाही आणि ज्या तीन सांगाड्यांतील डीएनए तपासले गेले ते आहेत इसपू तीन हजारमधील! जेव्हा वेद लिहायलाही सुरुवात झाली नव्हती तेव्हाची ही माणसे होती. शिवाय त्यांच्याबरोबर ज्या वस्तू पुरल्या गेल्या त्यातही किंवा संपूर्ण राखीगढीच्या आजवर झालेल्या उत्खननात वैदिक संस्कृतीचा भाग वाटेल अशी एकही वस्तू सापडली नसताना वेद काळ व वैदिक संस्कृतीशी सांगड घालण्याचा कालविपर्यासाचा प्रयत्न यातून होत आहे हे उघड आहे. टोनी जोसेफसह अनेक विद्वान या विचित्र निष्कर्षांवर टीका करू लागले आहेत ते यामुळेच.
अनेक वैदिक विद्वान सिंधू संस्कृतीचे संस्थापक वैदिक आर्यच होते हे दाखवण्यासाठी ऋग्वेदाचा काळ मागे खेचण्याचा आटापिटा करत असतात. पण त्याला पुरातत्वीय अथवा साहित्यिक पुरावे साथ देत नाहीत हे एक वास्तव आहे. खुद्द ऋग्वेद या नव्या संशोधनाला साथ देत नाही. सिंधू संस्कृतीतील एकाही वैशिष्ट्याचा उल्लेख त्यात नाही. त्यामुळे सिंधू संस्कृतीचे लोक एेतद्देशीय होते पण म्हणून ते वैदिक संस्कृतीचेही निर्माते होते हे मत अशास्त्रीय ठरते.

ऋग्वेद आणि अवेस्ता या समांतर काळात झालेल्या रचना असून खुद्द झरुथुस्ट्राचा उल्लेख किमान तीन वेळा ऋग्वेदात आलेला आहे. एवढेच नव्हे तर नोढस गौतम हा ऋग्वैदिक ऋषी अवेस्त्यात उल्लेखला गेला आहे. याशिवाय इतर अनेक समकालीन व्यक्ती एकमेकांच्या ग्रंथात अवतरतात. ऋग्वेदात उल्लेखल्या गेलेल्या ९०% नद्या या आताच्या अफगाणिस्तानातील असून पर्शू (पर्शियन), पार्थव (पार्थियन), तुर्वसा (तुर्क), पख्त (पख्तुन अथवा पठाण) इ. त्याच भूभागातील जमाती ऋग्वेदात असंख्य वेळा अवतरतात.
नद्यांचे म्हणाल तर सरस्वती (हरहवती), गोमल (गुमल), शरयू (हरोयू), रसा (रहा) आदी ऋग्वेदात व अवेस्त्यातही उल्लेखलेल्या नद्याही त्याच भागातील आहेत. अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या भाषेतही कमालीचे साम्य तर आहेच, पण देवता-असुर यांच्या नावातही साम्य आहे. दोन्ही धर्मांचे कर्मकांड अग्नीभोवतीच फिरते. वैदिक संस्कृती येथलीच असा दावा करायचा असेल तर पारशी धर्माची संस्कृतीही येथलीच असे म्हणावे लागेल इतके साधर्म्य दोन्ही धर्मांच्या भूगोलात, भाषेत, सोम संस्कृतीत आणि धर्मकल्पनांत आहे. फरक एवढाच की ऋग्वेदात जे देव आहेत ते अवेस्त्याच्या दृष्टीने दुष्ट आहेत तर त्यांचे पूजनीय असुर (अहूर) ऋग्वेदाच्या दृष्टीने दुष्ट आहेत. या दोन धर्मातील संघर्ष देवासुर युद्धांच्या मिथक कथांतून वैदिक साहित्याने जपलेला आहे. हा धर्म भारतात शरणार्थी म्हणून इसपू एक हजारच्या आसपास आला तोच या दोन धर्मांतील संघर्षात हार झाल्याने. ही स्मृतीही शतपथ ब्राह्मणाने विदेघ माथवाच्या पुराकथेच्या स्वरूपात जपलेली आहे.

वैदिक धर्म भारतात आक्रमणाद्वारे आला नाही तर शरणार्थींच्या माध्यमातून आला आणि धर्मप्रचाराने पसरला हे वास्तव समजावून घेणे वेदाभिमानी विद्वानांना मान्य करणे अवघड जाते. वैदिक संस्कृती येथीलच अणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच हे ठरवण्यासाठी जनुकीय विज्ञानाचा गैरवापर केला जात आहे हे या निमित्ताने लक्षात येते. डीएनएमधून फार तर त्या व्यक्तीची आनुवांशिकी व अन्य जैविक माहिती समजत असली तरी त्यातून भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी अमूर्त बाबी समजत नाहीत. मग डॉ. शिंदेंनी त्या जनुकांतून ते वैदिक आर्य आणि वैदिक संस्कृतीचे निदर्शन करतात, असे अशास्त्रीय विधान कसे केले हा एक प्रश्न आहे. दुसरी बाब म्हणजे असे विधान करायला कोणता तरी समांतर पुरावा असायला हवा. अगदी ऋग्वेदच गृहीत धरला तर तो लिंगपूजकांचा विरोधी आहे.
तो समाज यज्ञप्रधान असून मूर्ती अथवा प्रतिमापूजक नाही. त्यांना माहीत असलेली नगरे ही दगडांनी (अश्मनमयी) बांधलेली आहेत. सिंधू संस्कृतीतील, अगदी राखीगढीतील घरे मात्र विटांनी बांधलेली आहेत. किंबहुना वैदिक आर्यांना भाजक्या विटा ब्राह्मण काळापर्यंत माहीतच नव्हत्या हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक साहित्याचे परिशीलन करून म्हटले आहे. त्याउलट अफगाणिस्तानातील बॅक्ट्रिया-मार्जिआना पुरातत्त्वीय क्षेत्रात केल्या गेलेल्या उत्खननांत दगडांनी बांधलेली नगरे तर मिळालीच आहेत, पण सोम संस्कृतीचेही अवशेषही सापडलेले आहेत.थोडक्यात पुरातत्त्वीय अवशेषही वैदिक संस्कृती कोठे जन्माला आली याचे स्पष्ट निर्देशन करतात.

त्यामुळेच सिंधू संस्कृती इसपू तीन हजारपासून ते इसपू १८०० पर्यंत वैभवाच्या शिखरावर असताना त्या काळातील कसलेही वर्णन वैदिक साहित्यात येत नाही आणि याबद्दल निकोलस कझानाससारख्या पुरातत्त्वविदानेही बोट ठेवले आहे. वैदिक आर्य जर सिंधू संस्कृतीचे अल्प-स्वल्प घटक जरी असते तरी समकालीन घटनांचे आणि स्नानगृहे ते मुद्रा या सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे, अगदी ओझरते का होईना, उल्लेख त्यात आले असते. प्रत्यक्षात ऋग्वेदच काय पण ब्राह्मण साहित्यही त्याबाबतीत मौन आहे. ऋग्वेदात घोडे व रथ यांचे विपुल उल्लेख असताना सिंधू संस्कृतीत घोड्याचे अवशेष अथवा त्याच्या प्रतिमाही मिळालेल्या नाहीत. पण जे जनुके सांगूच शकत नाहीत आणि ते मात्र सांगायचा प्रयत्न करून वैदिक आर्यांची सिंधू संस्कृतीतील नुसती उपस्थितीच सिद्ध करण्याचा प्रयत्न नव्हे तर त्यांनाच निर्माते ठरवायचा अट्टहास करणे हे विज्ञान नाही तर केवळ सांस्कृतिक वर्चस्वतावादी राजकारण आहे.

“या संशोधनाने भारताचा इतिहास नव्याने लिहावा लागेल!” हे डॉ. वसंत शिंदे यांचे विधान सरळ अर्थाने घेता येत नाही ते यामुळेच. इतिहासात संशोधने व्हावीत, नवी तथ्ये निकोप मनाने स्वीकारली जावीत हे खरेच आहे. पण सांस्कृतिक वर्चस्ववादासाठी व दुसऱ्यांची श्रेये हडपण्यासाठी छद्म-विज्ञानाचा वापर करून जर इतिहास लिहिला जाणार असेल तर तोही नाकारावा लागेल तो यामुळेच!


(Published in Divya Marathi)

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...