Sunday, July 28, 2013

हे अवघे विश्व ...

कधी तेजाळत्या ता-यांवर
तर कधी
स्वत:च स्वत:त आटलेल्या 
शूण्यवत कृष्णविवरांत लिलया 
वावरत असतो मी...
कृष्णविवरांत होत शुण्य
तर ता-यांत
प्रकाशगर्भ मी....

कोठे ना कोठे...
कोणत्या ना कोणत्या रुपात
असतो अस्तित्वमान मी...
अगदि निरास्तित्वातही....
असतो विद्यमान मी!

हे अवघे विश्व
माझ्यात असते घोंगावत निरंतर
आणि मी असतो प्रत्येक मनुष्यमात्रात...प्राणिमात्रांत
आणि
जगत असतो चेतन जडात
कोठे अल्पायू...कोठे दीर्घायू
तर कोठे असीम अजरामर
मीच करत असतो खेळ
माझाच माझ्याशी...
भातुकलीच ही
जीवन-मरणाची....
आणि दोहोंत असलेल्या
अनादि अजरामरतेची...!

प्रत्येकजण "मी" आहे...
प्रत्येकाचा "मी" माझ्यात आहे
माझा "मी" प्रत्येकात आहे...
हाच विश्वाचा अनुपमेय
ऐक्याचा अनवरत सोहोळा आहे.....!

Thursday, July 25, 2013

ही रात अशी ओढाळ....

ही रात अशी ओढाळ
ही रात अशी लडिवाळ
क्षितिजांच्या ओठांतून गाते
चांदणे प्रितीचे हळुवार!

तिच्या दिठीत घुमते वारे
तिच्या दिठीत चांद अन तारे
तिच्या दिठीत अलवार सुस्कारे
तिच्या दिठीत रोमांचित जगणे

ही रात्र अशी ही लहरी
ही रात्र अशी ही चिंतनवेडी
स्मशानांत जागुनी बघते
जीवनाची अंतिम फेरी!

Wednesday, July 24, 2013

जाणार कोठे?

मृत्यू हुंदडत असतो
चोही बाजुनं...
जाणवत असतात त्याला आपले
श्वास-नि:श्वास
भ्रमांमधले भ्रम...विभ्रम...
येथून तेथली निरंतर
व्यर्थ जीवघेणी धाव...
धपापत्या उरांचा घेत असतो तो
मोहस्पर्श
अजाणांना अजाणतेत
असतो कसा
रमवत तो!

...खेळच त्याचा असला
हसत असतो...
दशदिशांतून वाकुल्या दाखवुन...
माहित असते त्याला ठाम
कितीही धावले तरी
जाणार कोठे हे
जावून जावून?

Tuesday, July 23, 2013

कशा कशावर बंदी घालणार?



महाराष्ट्र शासनाने डांसबारवर बंदी आणली होती. २००६ मद्धे उच्च न्यायाल्याने व आता सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. महाराष्ट्र शासन मात्र डांसबार बंदीबाबत आग्रही असून नवे विधेयक आणुन त्यामार्फत बंदी पुढे व्यापक पायावर चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. हे पुरेसे नव्हते म्हणून कि काय गुटखा-पानमसाला बंदीनंतर आता खर्रा, खैनी, सुगंधी तंबाखू, मावा आदि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. जनतेच्या नैतिक आणि शारीर आरोग्याची एवढी चिंता शासनाला आहे हे वरकरणी समाधानकारक वाटत असले तरी शासनांना असे बंदी आणण्याचे नैतीक अधिकार आहेत काय हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

शासकीय कारभार घटनात्मक चौकटीत चालावा हे बरोबर आहे. त्यासाठी घटनात्मक चौकटीत राहून कायदेही बनवता येतात व त्यांची अंमलबजावणीही करता येते हेही खरे आहे, परंतू कायद्यांना मानवी चेहरा देण्याचे कार्य कायदे बनवणा-यांना करावे लागते. सवंग लोकप्रियतेसाठी घेतले जाणारे निर्णय शेवटी जनतेच्याच हिताविरोधात जाणार असतील आणि संभाव्य अहित रोखण्याची कोणतीही योजनाच शासनाकडॆ नसेल तर या निर्णयांकडे वेगळ्या नजरेने पाहणे आवश्यक आहे.

तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ, दारू, गांजा, गर्द ते कोकेनादि द्रव्ये नशील्या पदार्थांच्या यादीत येतात. नशेची तीव्रता कमी-अधिक असली तरी अंतता: ही द्रव्ये मानवी आरोग्यास कमी-अधिक प्रमाणात घातकच आहेत याबाबत विवाद असण्याचे कारण नाही. मानवी आरोग्याला घातक असणारे पदार्थ (जरी ते नशील्या पदार्थांच्या यादीत नसले तरी) अगणित आहेत. पण आपण त्यावर नंतर बोलू. अंमली पदार्थांच्या यादीत तंबाखू, नार्कोटिक ते अल्कोहोल येत असतांना शासन बंदी घालतांनाही कसा दुजाभाव करत आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. या बंदी आदेशात कच्च्या तंबाखुचा समावेश नाही. प्रक्रिया केलेल्या तंबाखुवर मात्र आहे. कच्ची तंबाखू ही गोरगरीबांची चैन मानली जाते. प्रक्रियाकृत तंबाखुपेक्षा कच्च्या तंबाखुपासून आरोग्याला होणारा धोका मोठा आहे. असे असुनही त्यावर मात्र बंदी घालण्याचे साहस सरकार दाखवू शकत नाही. क्रमाक्रमाने सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य उत्पादनांवर बंदी घातली जाऊ शकेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जातो...पण "बंदी" चे अंतिम मतितार्थ व फलितेही पहायला हवीत.

गुटखा बंदी येवूनही महाराष्ट्रात चोरमार्गाने गुटखा मोठ्या प्रमाणात येतो. अनेकदा काही चोरटा माल पकडलाही गेला आहे. किती सोडला गेला याची आकडेवारी प्रशासन कधीही देणार नाही हेही उघड आहे. मावा-खर्रा बनवणे हा हस्तोद्योग असल्याने व त्याचा कच्चा माल बंदी नसल्याने बाजारात सर्रास उपलब्ध असल्याने त्यावरील बंदी ही केवळ धूळफेक आहे. टप-यांवर मावा उपलब्ध झाला नाही तरी घरी व्यसनी मनुष्य तो अत्यल्प श्रमात बनवू शकतो. त्यामुळे बंदीचा मतितार्थ काय हे लक्षात यायला हरकत नाही. प्यकबंद सुगंधी तंबाखू, खैनी ई. गुटख्याप्रमाणेच मुबलकपणे काळ्या बाजारात मिळु लागतील हेही वेगळे सांगायची गरज नाही. मग साध्य नेमके काय होणार आहे?

बंदीच घालायची तर तंबाखुपासुनच सुरुवात करायला हवी. सिगारेट, बिड्या या सर्वांवरच बंदी आणायला हवी. अर्थातच तंबाखूजन्य उत्पादने करणा-या लघु ते मोठ्या उद्योगांवर बंदी आणायला हवी. त्याशिवाय सर्वच नागरिकांचे स्वास्थ्य सुरक्षित राहणार नाही आणि नागरिकांच्या स्वास्थ्याची नैतीक जबाबदारी शासनावर असल्याने अशी बंदी काही काळ व्यसनींसाठी तापदायक ठरली तरी दिर्घ काळात तिचे सद्परिणाम दिसनार असल्याने तेही शासनाला धन्यवादच देतील.  परंतू शासन दुजाभाव करते. समतेचे तत्व पाळत नाही. म्हणजेच घटनात्मक तरतुदींचेच उल्लंघन करते. डांसबारबाबतही शासनाने नेमके असेच दुजाभावाचे धोरण राबवले होते. बंदी बेकायदा ठरवायला अनेक कारणंपैके हेही एक कारण होते. थ्री स्टार ते त्यावरील होटेलांत डांसबारला बंदी नाही. ती सामान्यांच्या बार्समद्धे. जणु जनसामान्यांची नैतिकता आणि उच्चवर्गीयांची नतिकता यात मुलभूत फरक आहे असाच सम्देश शासनाने दिला होता.

तंबाखुजन्य पदार्थांबाबतही नेमके तसेच होत आहे. सुट्ती/कच्ची तंबाखू ही जनसामान्यांची आहे तर प्रक्रिया केलेली तंबाखू व अन्य तत्जन्य उत्पादने ही तुलनेने वरच्या वर्गांत लोकप्रिय आहेत. शासनाला सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या आरोग्याशी काहीही घेणेदेणे नसून उच्चवर्गीय नागरिकांच्याच आरोग्याची काळजी आहे कि काय असा एक अर्थ त्यातून निघु शकतो. पण ते तसेही नाही. कारण दारू, बिडी व सिगारेटवर मात्र बंदी आलेली नाही. भविष्यात आणता येईल, सध्याची बंदी हा एक टप्पा आहे असे म्हनावे तर ते शक्य नाही हे पुढील विवेचनावरून लक्षात येईल.

आजमितीला तंबाखू उद्योगाने जवळपास ऐंशी लाख रोजगार निर्माण केला आहे व दिवसेंदिवस त्यात भरच पडत चालली आहे. प्रत्येक बजेटमद्धे वित्तीय तूट भरून काढण्यासाठी बिड्या-सिगारेट/दारू/तंबाखुवर कर वाढवण्याचा अत्यंत सोपा मार्ग वापरला गेला आहे.  सरकारी तर्कशास्त्र अजब असते असे म्हणतात ते खोटे नाहीय. उदा. बिड्यांवरील कर दरहजारी ९८ रुपयांनी वाढवला तर सरकारला ३६.९ अब्ज रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळेल व १५.५ लाख मृत्यू वाचतील असा दावा २००४-५ मद्धे एका केंद्रीय अहवालात केला गेला होता. सिगारेटबाबतही असेच अंदाज दिले गेले होते. म्हणजे एकीकडे सरकारला बिडी-सिगारेटमुळे लक्षावधी लोक मरतात हे मान्य आहे...कर वाढवल्यामुळे मृत्यू कमी होतील असा अंदाज करायलाही ते चुकत नाही. मग कर वाढवण्याऐवजी ती उत्पादनेच पुर्णपणे का बंद करत नाही असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही. कारण हा प्रश्न वरकरणी दिसतो तेवढा तो सोपा नाही.

सरकारला एवढा मोठा रोजगार घालवता येणे परवडणार नाही. त्यातून येणा-या अवाढव्य कररुपी उत्पन्नावर तुळशीपत्र ठेवायलाही ते तयार होणार नाही. त्यामुळे मद्य ते तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांवर संपुर्ण बंदी कधीही घालणार नाही. तंबाखुच्या व्यसनींना पर्याय मिळणे यामुळे बंद होणार नाही हे उघड आहे. म्हणजेच सरकारी गल्ल्यात येणारे कररुपी उत्पन्न कमीही होणार नाही. आरोग्याचा धोका, ज्याची शासनाला एवढी काळजी वाटते त्याबद्दल कौतूक होईल हे खरे आहे, कदाचित निवडनूकीत त्याचा फायदाही मिळेल...पण मूळ उद्देश्य साध्य होनार नाही.

बंदीचा अर्थ भारतात नव्या भ्रष्ट मार्गांना वाव देणे असा असतो. १९६१ पासून गुजरातमद्धे संपुर्ण दारुबंदी आहे. गुजरातमद्धे मिळत नाही असा दारुचा ब्रंड सांगा म्हटले तर कदाचित आजच्या लोकप्रिय नेत्याचीही पंचाईत होईल. चोरट्या दारुचा धंदा हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा एक समांतर भाग आहे. एवढेच नव्हे तर तळागाळातल्या लोकांची गरज भागवायला हूच नांवाचे गावठी मद्य बनवायचे हजारो कुटीरोद्योग आहेत. २००९ मद्धे ही दारू पिऊन १३६ लोकांचा मृत्यू झाला होता. नंतरही तुरळक घटना होत आल्या आहेत. या हुचमुळे आरोग्याचे वाटोळे लक्षावधींचे झालेले असनार आणि होत राहनार हे उघड आहे. महाराष्ट्रातही वर्धा, गडचिरोलीतील दारुबंदी कशी केवळ कागदोपत्री आहे व अधिका-यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन आहे हे सर्वज्ञात आहेच.

महाराष्ट्रात बंदीकाळात डांसबार सर्वस्वी बंद होते हे खरे नाही.  गेल्या सात वर्षाच्या डांसबारबंदी काळात महाराष्ट्राची नैतिकता वाढली असा एकही इंडिकेटर नाही त्यामुळे भविष्यात सर्वच बार (पंचतारांकितही) बंद ठेवल्याने नैतिकता वाढणार आहे असेही नाही. तंबाखूजन्य उत्पादनांवरील बंदीमुळे महाराष्ट्राच्या एकुणातील आरोग्यात भर पडलेली नाही हे लोकांनीच गुटख्याला/पानमसाल्याला शोधलेल्या पर्यायांमुळे सिद्ध होते. आता या पर्यायांवरही बंदी घातली तरी मुळ तंबाखूवरच बंदी नसल्याने नवे पर्याय शोधायच्या मागे आमची कल्पक प्रजा लागलेली असनार याबाबत शासनाने कसलीही शंका बाळगू नये.

बंदी हे समाजस्वास्थ्य वाढवण्याचे साधन आहे या भ्रमातून शासनाने बाहेर यायला पाहिजे. सामाजिक नैतिकतेचा झेंडा उचलायचा असेल तर कायदे करणा-यांनाही नैतीकतेचे मग तेवढेच भान असले पाहिजे. व्यसने दूर करण्यासाठी व्यसन निर्माण करणारे पदार्थ बंदच करायचे तर ते मग सर्वस्वी बंद तरी केले पाहिजेत. त्यात दुजाभाव करने न्याय्य असू शकत नाही याचेही भान सरकारने ठेवले पाहिजे. निवडक उत्पादनांवर बंदी घटली कि त्या मुळ पदार्थांपेक्षा विघातक पर्यायांकडे लोक वळतात हे समजले पाहिजे. दुर्दैवाने आपले प्रशासन बरबटलेले असल्याने  या बंद्याही तशा पोकळच राहतात याचेही भान असले पाहिजे. परंतू विधीमंडळ ते प्रशासनच जेंव्हा अनैतिकतेच्या डोसाच्या जीवावर नैतिकतेच्या व समाजस्वास्थ्याच्या पोकळ बाता करू लागतात तेंव्हा त्यांचे हेतू तपासून घेण्याचे काम सुजाण नागरिकांनी केले पाहिजे. कशाकशावर बंद्या आणल्या म्हणजे आमचे नेते व प्रशासनाचे मानसिक आणि शारीरीक (आणि आर्थिक) आरोग्य सुधारणार आहे आणि जनसामान्यांचे बिघडणार आहे याची चिंता आता आपल्यालाच करावी लागनार आहे.

कशावरही बंदी घालणे हे उत्तर नसते...उलट ते प्रश्नच वाढवत नेते...कठीण प्रश्नांची सोपी उत्तरे शोधणे राज्यकर्त्यांना नेहमीच सोयीचे असते...प्रश्नाच्या मुळावरच घाव घालणे आपल्याच मुळावर येईल असे तर त्यांना वाटत नसावे?

-संजय सोनवणी

Saturday, July 20, 2013

एक गर्भ-सूर्य....

कधी कधी जीवनच असे बनून जाते
कि रात्रीचे पावसाळे होतात
कालांधाराचा पाऊस झेलत
उजेडाचे आडोसे शोधावे लागतात...
उजेडाची व्याख्याही बदलत जाते
काजव्यांनाच सूर्य म्हणायची वेळ येते!
(सूर्य पाहिलाच नाही कधी...)

अशा काळात जगतोयत आम्ही
ज्या काळात फक्त आग ओकत्या हिंस्त्रतेचे
डोळे दशदिशांतून
ओसंडत येतात
ती श्वापदे आपले बळी शोधण्यासाठी आपली ओंगळ
बोटे अंधाराच्या फटींत घुसडतात
...

खूप सूर्य
गर्भांतच
मरून पडलेले सापडतात...
आम्ही अंधार-वर्षा
तुडवत राहतो
या क्षितीजापासून
त्या क्षितीजापर्यंत
एक गर्भ-सूर्य जपण्याच्या प्रयत्नात...

Friday, July 19, 2013

आभाळ उतरले...


  • आभाळ उतरले माझ्या इवल्या डोळ्यांत...
    आभाळ भरले माझ्या इवल्या ह्रुदयात...
    कण-कण देहाचा व्यापुन म्हणाले आभाळ
    "चल वेड्या आली, आता झरण्याची वेळ!"

    मी झरलो जेथे अथांग होती धरती
    ती चुंबत मी विरत गेलो तिचीया गात्री
    "ती आणि मी" हा अपार होता सोहोळा
    अन मी उगवत होतो होवुन मृदूल त्रुणपाती...
    तिच्या कुशीमधुनी, जगण्या जीवन गाणे...
    आभाळ म्हणाले "वेड्या...यालाच म्हणती जगणे..."

Thursday, July 18, 2013

मी तुरुंगात होतो ते दिवस...




सांगली येथील कारागृह नदीकाठीच आहे. याच कारागृहातुन वसंतराव पाटील यांनी कसे पलायन केले व नदी ओलांडुन पायात गोळी घुसुनही कसा इंग्रजांच्या हाती धत्तुरा दिला ही कथा मला आधीच माहित होती. आता मला याच तुरुंगात यावे लागेल व एक नाही दोन नाही तब्बल ४१ दिवस काढावे लागतील याची मला कल्पना नव्हती.

माझ्यासोबत माझा अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीत स्टाफ असलेला आणि अत्यंत दुर्दैवाने या स्थितीत अडकलेला मुकुंद मुळे होता. माझा भाऊ विनोद मला जेलपर्यंत सोडायला आलेला होता. खालच्या कोर्टाने आमचा जामीन नाकारला होता. "मी व मुळे हे गुंड प्रव्रुत्तीचे असल्याने साक्षीदारांवर दडपण आणतील..." असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता आणि तो कोर्टाने ग्राह्य धरला होता. जामीन नाकारला होता त्यामागची गोम आम्हाला आधीच माहित असल्याने आश्चर्यही वाटलेले नव्हते. जेलकडे जातांना सोबत मुल्ला नांवाचा पोलिस शिपाई होता. वाटेत विनोद उद्याच सेशन कोर्टातुन जामीन करुन आणतो याचा विश्वास देत होता. माझ्या मनात तोवर कादंब-या वाचुन तुरुंगाविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या. म्हणजे आरोप सिद्ध शिक्षा न झालेल्या कैद्यांसाठी स्वतंत्र आणि चांगली व्यवस्था असेल अशी आशा वाटत होती. कच्च्या कैद्यांसाठी तुरुंगात वेगळी व्यवस्था असते का हा माझा प्रश्न मुल्ला अगदी ठामपणे उडवत म्हनत होता...साहेब, उद्या संध्याकाळी तुम्ही बाहेर...खालचा जज विकला गेला म्हणुन तुमच्यावर ही वेळ आली.

मुल्लावर विश्वास बसत होता कारण कस्टडीत असतांना त्यानेच मला घरुन चादर आणुन दिली होती. मच्छर चावतात म्हणुन ओडोमास तोच आणुन द्यायचा, अगदी सणाची पुरणपोळी त्यानेच डब्यातुन आणुन खावू घातलेली. मला सिगारेट प्यायची तल्लफ आली कि स्वत:हुन गजांजवळ येवुन विचारायचा..."साहेब...आलीय का?" (इतर कैदी लोकांना वाटायचे मला संडासला जायचे आहे.) मी हो म्हटलो कि तो ते कोठडीचे दार उघडायचा आणि मला बाजुच्या कोप-यात मनसोक्त सिगारेट पिवू द्यायचा.
   
पण आता एक रात्र का होईना जेलमद्धे काढावी लागणार यामुळे मी फारच अस्वस्थ झालो होतो. आता आपण खरेच एक क्रिमिनल आहोत यावर विश्वास बसु लागला होता. खरे तर आजचा दिवस सणाचा होता. जामीन झाला असता तर आम्ही दोघे घरी उशीरा रात्री का होईना पण पोहोचुन कुटुंबियांसह घालवु शकलो असतो...पण ते होणे नव्हते.

जेलचे द्वार अवाढव्य. ते पाहुनच उर दडपला. मुळे तर पार हबकुन गेला. गडी आधीच सुकडा आणि घाबरट...तोवर म्यजिस्ट्रेट कोठडी म्हनजे एखादा सभ्य प्रकार असेल असाच माझा आणि त्याचाही समज. पण काय, शिक्षा झालेल्या कैद्याप्रमाणे आत पहिल्या गेटात तपासणी. नागडेच केले नाही कारण मुल्ला! पैसे नाहीत...खिशातील सिगारेट नाहीत...खिशात गर्द वगैरे असे अंमली पदार्थ नाहीत वा ब्लेडादि शस्त्र नाही याची खात्री करुन घेत त्यांनी आम्हाला पहिल्या गेटमधुन आत सोडले. विनोद आणि मुल्ला वळुन पाहता दिसनार नाहीत कारण ते महाद्वार बंद झालेले. नंतर दुसरे झाडी ओलांडत आम्ही दुसरे महाद्वारही ओलांडले...परत तेही बंद झाले आणि मुक्त जगाशी असलेला काही तासांचा संबध तुटला. तत्पुर्वी आम्ही १० दिवस पोलिस कोठडीत बंदच होतो. त्या आमच्या सोबती जेलगार्डने दिलेली ओशट वास मारणारी एक कांबळ घेत मधल्या आमराईतुन वाट काढत अजुन एक दार ओलांडले आणि सांगली जेलचे दर्शन  घडले. बराकींतुन येणारा उजेड सोडला तर बाहेर कोणाही जीवंत माणसांचे चिन्ह नव्हते. विनोद मागे पडला होता. ओळखीचे जग मागे पडले होते. हे एक वेगळेच अद्न्यात आणि अद्भुत जग होते. समोर डाव्या-उजव्या बाजुला दोन दुमजली इमारती आणि समोर एकमजली इमारत होती. गार्डने आम्हाला डावीकडील इमारतीत नेले. तो आमच्या एकही प्रश्नाचे उत्तर देत नव्हता त्यामुळे अद्न्याताचे भय वाढतच चालले होते.

गार्डचे नांव साठे आहे एवढेच त्या प्रवासात समजले होते. त्याने डावीकडील दुमजली इमारतीत नेले. चाव्यांनी ते बंद अवजड भरभक्कम गजाड दार उघडले. १०० फूट लांब आणि ३० फूट रुंद...( हे मी नंतर खुप दिवस रहावे लागल्याने पावलांनी अंदाज घेत मोजले) असा तो हाल. त्यात जवळपास १२५-१३० कैदी. दुस-या टोकाला टी.व्ही. (ब्ल्याक व्हाइट) आणि त्या परिसरात मात्र बरेच अंतर मोकळे आणि मर्यादित कैदी कोंडाळे करुन बसलेले. इतरत्र मात्र एवढी दाटी कि सांगता सोय नाही. साठेने आम्हाला मधल्या प्यसेजमद्धे झोपलेल्या कैद्यांना अक्षरश: लाथाडत त्या टोकाला नेले. तोवर टी. व्ही. बघण्यात मग्न असलेले त्या बराकीतील सर्वश्रेष्ठ कैदी जरा सावधान झाले. एक जण उठुन उभा झाला. तो या बराकीचा नेता, वार्डन,  हे लगेच लक्षात आले. उंच-धिप्पाड आणि येशु ख्रिस्तासारखा दाढीधारी चेहरा. साठेने सांगितले, "यांची व्यवस्था लाव मुजा..." आणि तो निघुन गेला.

मी बावचळल्या अवस्थेत आता काय करायचे, या विचारांत तसाच उभा राहिलो. मुळे तर पार गळाठुन गेला होता. सर्वत्र एक कोंदट वास भरला होता. तो एकत्रीत वास बीड्या-गांजा आणि गर्दचा असतो हे नंतर कळाले.... सवयच झाली तेंव्हा. खिडक्यांवर नासके कपडे काय आणि साठवुन ठेवलेले अन्न काय...सर्वत्र सर्वांचा वास...येथे आम्हाला रहावे लागेल? होय...रहावेच लागेल. मी कोणत्याही परिस्थितीला सहज अडजस्ट होणारा...पण या बिचा-या मुळेचे काय? त्याला किती हाल-अपेष्टा सहन करु द्यायच्या?

एप्रील २००३. उन्हाळा कडक होता. जेलमद्ध्ये पंखे असण्याचे कारण नव्हते. ते लाड कोण पुरवणार? मला आता शिक्षा झालेल्या कैद्यासारखे वाटु लागले होते. संताप उमदळत होता. पण आलेले भोग भोगण्याखेरीज गत्यंतरही नव्हते...

एकाच दिवसाचा तर प्रश्न होता ना?
   
मुजा (त्याचे पुर्ण नांव मी येथे देत नाही.) मला म्हनाला..."बैठो भाईसाब...ये चद्दर छोडिओ...आपको बढिया देता..."

हे भाईसाब हे नांव मला जे चिकटले ते चिकटलेच. बसलो. मला वाटले मुजा आम्ही का कशासाठी जेलमद्धे आलो यावर वायफळ प्रश्न विचारेल आणि उत्तरे देण्यात आपल्याला आपला जी विचार करायची गरज वाटतेय ते काही होणार  नाही. पण तो जास्तच सुज्ञ निघाला. त्याने काही प्रश्न विचारलाच नाही. त्याने हुकुम सोडला आणि काही वेळातच अंथरायला, पांघरायलाच काय उशालाही घेता येतील एवढ्या चादरी (कांबळी) आमच्याजवळ जमा झाल्या.

तुरुंगाबद्दल माझ्या समजुती वेगळ्या होत्या. तुमच्याही असतील. त्या सर्वच कोसळल्या हेही खरे. कोणच्याही वाट्याला असे दुर्दैव येवू नये. दुर्दैवातील सुख आणि तुरुंगवासीयांची माणुसकी काय असते हेच मला येथे सांगायचे आहे.

त्या रात्री झोपेपर्यंत ते माझ्याशी आणि मुळेशी सहज संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या खाण्याच्या आग्रहाला नकार देत होतो. आश्चर्य म्हनजे त्यांना माझे नांव माहित होते. आमच्यावर काय आरोप होते हेही माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माहित होते...वर्तमानपत्रेच ती..कशाला कसर ठेवतील? मला वर्तमानपत्रे वाचायला मिळाली नसली तरी तुरुंगात वर्तमानपत्रे येतातच की हे मी विसरलोच होतो!. माझी एवढी प्रसिद्धी (?) वर्तमानपत्रांनी केलेली होती कि मी आज ना उद्या येथे येणारच हे या तुरुंगवासियांना माहितच होते...,मुजाने ते खात्रीशीरपने सांगितल्यावर आणि नंतर अनेक त्याच तुरुंगातील कैद्यांशी भेट झाल्यावर लक्षात आले...कि माझा संशय निराधार नव्हता,...अत्यंत सुडबुद्धीने कायदेप्रणाली राबवत माझा विनाश करण्याचा हा कट होता...आणि मी त्याचा एकटाच बळी नव्हतो...

असो. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सहा वाजता सर्वांना उठवले गेले. मग सर्वांना जोडी-जोडीने एका रांगेत बसवण्यात येवुन गार्डने गिनती केली. रात्रीच्या गिनतीशी ती बरोबर म्यच झाल्यावर मग दार उघडले. आम्ही बाहेर पडलो.
    
उगवत्या उन्हातील जेलचे द्रुष्य रात्रीपेक्षा आल्हाददायक होते. दोन दुमजली बराकींच्या मधोमध एक पाण्याचा विशाल सिमेंट-कोंक्रीटचा ट्यांक होता व नळावर कैदी बांधव स्नान करत होते.  खाली मैदानावर एकीकडे काही तरुण कैदी वोलीबाल खेळत होते तर डाव्या बाजुला एक काळाकुट्ट मध्यमवयीन माणुस कैद्यांकडुन व्यायाम करुन घेत होता. आम्हीही त्यात सामील व्हावे नाहीतर शिक्षा होईल असे एका कैद्याने म्हटल्यावर मग आम्ही दोघेही त्या व्यायामकर्त्या कैद्यांच्या रांगेत आलो आणि जमेतील तसे हातवारे करत व्यायाम शिकु लागलो. ते झाल्यावर मग साने गुरुजींचे "खरा तो एकची धर्म...जगाला प्रेम अर्पावे..."
    मला मी दहिगांव (संत) येथे पहिलीत असतांनाचे दृष्य आठवले. आमचे आनंदा मास्तर हेच गीत डोळ्यांत अश्रु आणत आम्हाला पाठोपाठ म्हणायला लावायचे. गुरुजी भावूक होवून रडतात म्हणुन आमच्याही डोळ्यांत पाणी यायचे. येथेही डोळ्यांत अश्रु आले खरे, पण येथील परिस्थिती वेगळी होती. माणुसकीचे धिंडवडे निघाल्याचे पहावे लागल्यानंतर ही प्रार्थना म्हनावी लागणे हे त्या प्रार्थनेचेच एकार्थाने धिंडवडे होते. बाजुला वोलिबाल खेलणारे त्यांच्या नादात होते...त्यांचा नेम चुकला कि तो बाल इकडे येवुन आदळे. पण त्या कंडक्टर ओफ़ प्रार्थना सेरेमोनीची हिम्मत नव्हती कि त्यांना थांबवावे.
    प्रार्थना संपली. मी व मुळे परत आमच्या बराकीकडे निघालो. वाटेत मुजा भेटला..."भाईसाब...कहां थे आप?"
    मी त्याला सांगितले...तो म्हणाला, "आज के बाद कभी मत जाना...कोई जरुरत नहीं"
    मी सुटकेचा निश्वास सोडला. मला कोठे हौस होती आणि मुजा हा काही जेलर नव्हता हे खरे... आणि मी अजुन जेलरला पाहिलेच कोठे होते?
    पण एक संरक्षक कवच मिळाल्याचा आनंद होताच. कारण या नव्य जगात आम्ही तसे जगू शकण्याची सुतराम शक्यता नव्हती हेही खरे.
    तेवढ्या वेळात दोन्ही इमारतींच्या वरांढयांत भलीथोरली पातेली घेवुन चहावाटप सोहोळा सुरु होता. हातात पाट घेवून कैद्यांची रांग लागली होती. पाट म्हनजे अल्युमिनियमचे भांडे. त्यात मिळेल तेवढा चहा घेतला जात होता. मुजाने आम्हाला चहापानासाठी बोलावले. त्या रांगेत उभे राहणे मला शक्यच नव्हते. मी तसे म्हणाल्यावर तो हसला...म्हणाला "भाईसाब...आप अंदर आवो...आपको कौन बोल रहा हैं कतार में खडा होने को?..."
    मी आत गेलो. पहातो तर काय एक छोटी विटांची चुल पेटलेली होती आणि त्यावर चहा-पुनर्प्रक्रिया उद्योग सुरु होता. चहाची अधिकची पत्ती आणि त्यात साखर घालुन नव्याने चहा बनवला जात होता. आम्ही तरीही "नाही" म्हणत होतो. पण मुजाने तो चहा पाजलाच. तो दिव्य चहा केवळ आग्रहाने प्यायलो हेही खरे. नंतर सवयच झाली.
    त्याचे आभार मानून आम्ही परत बाहेर आलो.
    जेलमद्धे ही चहापत्ती आणि साखर कशी आली हा प्रश्न मला सतावत होताच!
    त्याची उत्तरेही पुढे  मिळाली...आणि असा चहापान आपचा दैनंदिन कार्यक्रम बनला हे मात्र खरे.
    अन्य कैदी मात्र त्या जेलचा चहा...खरे तर त्याला चहा म्हनण्यापेक्षा गढुळलेले रंगीत पाणी यापेक्षा दुसरा शब्द वापरता येत नाही, तोच पित असत.
    मला सिगारेटची प्रचंड तल्लफ आली होती. माझ्याकडे पैसे नव्हते. असते तरी तेथे  कोणतेही दुकान नव्हते. मुळे मस्त निर्व्यसनी. पण त्याला माझी सवय माहित. पण तो आधीच एवढा गोंधळलेला...बावरलेला तो त्या या नव्य भयकारी व्युहात काय करनार?
    मी आपला "काही तासांचा तर प्रश्न आहे..." अशी समजूत घालत वेळ कसा पुढे जात नाहीहे याचीच चिंता करण्यात मन रमवू लागलो. 
    आणि माझ्या कानावर हाक पडली..."सोनवणीसाब..."
    मी बघीतले तर काय तर तात्या! एक वृद्ध गृहस्थ. मी इस्लामपुरच्या कोठडीत असतांना तेथे थंड फरशीवर झोपावे लागल्याने माझी पाठ दुखायला लागली होती. तेंव्हा हा तात्याही त्याच कोठडीत बुटलेगिंगच्या आरोपात (?) होता. त्यानेच रुपयाचा एक तेलाचा पाउच आणुन माझ्या पाठीची मस्त मालिश केलेली. त्याचे पोलीस कस्टडीतील असने हे पोलिसांच्या आपराधिक गणपुर्तीचे एक साधन.
    पण तो येथे कसा? या जेलमद्धे? मला प्रश्न पडले...कारण काही गुन्ह्यांचा कोरम भरुन पोलिस अशा नेहमीच्या आरोपींना जामीन मिळू देतात असे मला तोच म्हणाला होता.
    माझ्याकडे विचारायला खुप प्रश्न होते. पण माझ्यापेक्षा अधिक त्या नि:ष्पाप माणसाच्या विझत्या डोळ्यांत होते. तो उठला...अत्यंत दयनीय स्वरात म्हणाला..."सायेब...त्यांनी माझा जामीन केला नाही...फुकट लटकवले मला..."
    मला महित होते कि बोगस केस केल्या कि आपली क्राइम रजिस्टरची आकडेवारी सिद्ध करत मग बुटलेगर्सना सोडुन द्यायचे  ही खास पोलीसी रीत. पण तात्याच्या बाबतीत अघटीत झाले होते. त्याचा जामीन झालाच नव्हता. तो आमच्याप्रमानेच येथे एक कैदी म्हणुन आला होता.
    तो पुढे आपले गा-हाने अधिक गाणार हे मला माहित होते आणि त्यात वावगे काही नव्हते. पण तो मला चकित करत  म्हणाला..."साहेब, सिगारेट नाही?"
    मी म्हटलो..."नाही..."
    त्याने विचारले..."साहेब...काही पैसे आहेत तुमच्याकडे?’
    मी म्हणालो "नाही."
   
    खरे तर पाणी माझ्या डोळ्यांत तरळायला हवे होते...पण तोच रडु लागला. त्याचे रडने कसे आवरावे हेच मला कळेना. मुळे त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला. पण एकाएकी तो सावरला...मला म्हणाला..."साहेब...थांबा...मी आलोच..."
    आणि तो गेलाही.

    आम्ही त्या जेलमधील प्रात:कालीन गोंधळाचे, भांडनांचे अलिप्त साक्षीदार होत तात्याची वाट पहात होतो. आज सायंकाळी आम्ही या जेलमद्धे नसणार हा दिलासाच किती आश्वस्त करनारा होता...मी कधीतरी हे अनुभव कथा कादंब-यांत वापरणार होतो...लिहिलेच कदाचित तर आत्मचरित्रातही. एका अर्थाने जशी इस्लामपुरची कोठडी, माझी निघालेली धिंड हे थ्रिल मी अलिप्तपणे अनुभवले होते तसेच हेही एक थ्रिल होते. मी निरपवाद मनाने हे सारे न्याहाळत होतो.
    तात्या आला.
    त्याच्या हातात दोन छोट्या विल्स सिगारेट होत्या.  डोळ्यांत पाणी होते. म्हणाला...
    "साहेब...माझ्या कशात मी दडवुन दोन रुपये आनले होते...आणि तेवढ्यात एवढेच मिळाले कि हो..."
    कढ माझ्याही घशात दाटुन आला होता...पण मी त्याने दिलेल्या सिगारेट घेतल्या.
    जेलमद्धे मिळते तरी काय काय हा प्रश्न मला आता सतावू लागला होता...
    मी जेलमधुन बाहेर पडेपर्यंतही हा तात्या आतच होता. मी त्याला माझ्या अन्य स्थानिक मित्रामार्फत नंतर जामीन देवून त्याला मुक्त केले...मग त्याच्या गांवीही गेलो...तो उत्सव काही वेगळाच होता. 

    अकरा वाजले. (तुरुंगात घड्याळ ठेवता येत नाही. दर तासाला टोल पडतात.) कैदी अजुनही कोंडाळी करुन पटांगनात गर्दी करुन होते. तोवर जेवणही वाढले गेले होते. आम्हाला खाण्यात कसलाही रस नव्हता. पण तरीही हे सारे कैदी कशाची तरी वाट पहात होते. त्यांचे डोळे त्या मधल्या बंद द्वाराकडे लागले होते. त्यापलीकडे ती आमराई, छोटे शेत आणि मग उप-दरवाजा आणि कैद्याला मुक्त करणारा कडेकोट बंद असा महादरवाजा. मी मुळेशी पुण्यात काय चालले असेल, बाकी संचालक आणि व्यवस्थापक मंडळी दैनंदिन कामकाज कसे पहात असतील...यावर बोलायचा प्रयत्न करत होतो...पण मुळे मुकच होता. तो काहीतरी माझ्यापासुन लपवत आहे असे मला वाटु लागले. मला त्यावेळी वाटले होते कि तो अकारण या स्थितीत सापडल्याबद्दल खंतावलेला असावा. पण ते तसेही नव्हते. पुढे मला कळाले कि त्याने माझ्याशी पोलिसी दडपनाला बळी पडुन आणि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी गद्दारी केलेली होती. खरे तर त्याची काहीएक गरज नव्हती. त्याचा मुळात जेही काही असेल त्याशी काहीएक संबंधच नव्हता.  पण त्याबाबत त्याने मला एकदाही सांगितले नाही कि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी पोलिस म्हणतील तसे स्टेटमेंट न्यायाधिशासमोर लिहून दिलेय......अगदी ५१ दिवस एकत्र असतांनाही त्यावर तो काही बोलला नाही. ते मला कळाले जवळपास दोन वर्षांनंतर...मग मात्र त्याने माझे तोंड चुकवले ते चुकवलेच! त्याचीही गरज नव्हती. कारण कसेही स्टेटमेंट दिले असले तरी सत्य बदलणार तर नव्हते!
    असो. हे महत्वाचे नाही.

    अकरा वाजले.  एक गार्ड आला...एका विशिष्ट स्टाईलमद्धे त्याने ज्यांची पत्रे आली होती त्या नांवांचा पुकारा केला. ज्यांची आली होती ते खुष होते तर ज्यांची आली नाही ते निमुट होते. ज्यांना पत्रांची आशाच नव्हती ते आत बराकीत बसुन आपापल्या वाट्याचे ते कदान्न खात बसले होते.
    नंतर अर्ध्या तासात अजुन एक गार्ड अवतरला. त्याचा पुकारा होता ज्यांचा जामीन झाला आहे आणि आता मुक्त आहेत अशांचा. हा पुकारा आदल्या दिवशी उशीरा ज्यांचा जामीण झाला असतो त्यांच्यासाठीचा. आमचा असणे शक्यच नव्हते. काल सायंकाळीच तर आमचा जामीण नाकारला गेला होता...पण आज सायंकाळी आमचाही जामीण-मूक्त असा पुकारा होनार यावर विश्वास होता...किती वेळ उरला बरे? सायंकाळी पाच वाजता? ओके. तेवढी वाट पाहण्याची हिम्मत होती.
    आणि ज्यांचा जांमीण झाल्याचा पुकारा होत होता...ते ज्या आनंदाने आपापले सामान घ्यायला धावत होते...एकमेकांना मिठ्या मारत ऋणानुबंध जतावत बाहेर मुक्त हवेचा श्वास घ्यायला प्रमुदितपणे धावत होते...
    बारा वाजता बंदी. म्हनजे सर्वांनी आत जायचे. मग गिनती. एक प्रथा. एक कैदी ज्यादा वा कमी भरता कामा नये. आकडे जुळले कि मग गार्ड बाहेरुन कुलुपबंद करणार. आम्हीही आत आलो. आजच बाहेर पडणार म्हणुन काही वेळ सहकैद्यांशी गप्पा मारण्यात, त्यांना जाणुन घेण्यत काय हरकत होती?
    मुजा पहिला. मुजा स्वत:बद्दल बोलायला तयार नव्हता. दुसरा एक काळाकुट्ट पण लोखंडाच्या कांबीसारखी शरीरयष्टी असलेला आणि २८ चो-यांचे गुन्हे दाखल असलेला क्रुष्णा. (पैकी ८ गुन्हे त्याने खरोखरच केले होते आणि त्यांत मात्र तो निर्दोष ठरला होता. आणि जे त्याने केलेच नाहीत त्याबद्दल मात्र सुनावण्या सुरु होत्या...त्याची रोजच सांगली कोर्टात तारीख असे. त्याने एके दिवशी जजला सरळ सांगितले ...(त्याचा वकील नव्हता...अडानी तो स्वत:च स्वत:चा युक्तिवाद करत असे...) अहो महाराज जे गुन्हे मी केले त्यात तुम्ही निर्दोष ठरवलेत कि हो...आता मी हे काय बी गुन्हे केलेले नाहीत...सोडा कि आता तरी मला...त्यावर जज हसला होता म्हणे.) मी तेथे असेपर्यंत तरी त्याला मुक्त केले गेले नव्हते. असे म्हणतात कि जेलमधील सहकैद्याला चुकुनही स्वत:चा खरा पत्ता द्यायचा नसतो. पण मी त्याला दिला होता आणि म्हणालो होतो..."लेका...सरळ डोअरबेल वाजवुनच घरात ये...नाहीतर पाईपवरुन चढुन यायचास सरळ बेडरुममद्धे..." हा बराच काळ त्या जेलमधील विनोद बनला होता. पण क्रिष्णा कधी बेल वाजवुनही ना आला ना पाईपवर चढुन...)
    अजुन एक वल्ली होता. त्याला शिक्षा झालेली नव्हती. (हे उप-कारागृह असल्याने येथे फक्त कच्चे कैदी ठेवले जात.)  मध्यमवयीन पण काटक माणुस. पण तो गेली तीन वर्ष येथे होता. कारागृहीय शेतात काम करुन कमाई करुन पट्ठ्या जगत होता. तो एका सहकारी ब्यंकेत शिपाई होता. शिपाई म्हनजे येथे ओफिसबोय असे घ्यावे. आणि त्या ब्यंकेत म्हणे महाघोटाळा झाला आणि २०-२२ लोक पकडले गेले त्यातील हा महाभाग. बाकी सारे जामीनावर बाहेर...पण हा मात्र जामीण घेतच नव्हता. त्याचे म्हनने हे कि
शिक्षा किती होईल समजा झाली तर? तर ५ वर्षे. काय करायचे बाहेर जावून? सारे दळींदर लोक...हरामी बायको आणि कुत्र्याच्या अवलादीचा समाज...येथेच बरा आहे...आश्चर्यकारक खरे पण खरेही. बाहेरचा समाज हा या कैद्यांपेक्षा नालायक असतो हे मीही अनुभवत नव्हतो काय? तो त्या दिवशीही आमराईतुन कै-या घेवुन आला होता. त्या दिवशी जरी मी व मुळे जेवलो नसलो तरी त्या कै-या मात्र खाल्ल्या होत्या. नंतर तर जेलमधील, पण मुजाच्या हंडीतुन प्रक्रिया झालेले जेवण खातांना, चवीला त्याने आनलेल्या कै-या हा अम्रुततुल्य अनुभव असायचा.
    हे चालले होते हे खरे पण मनात पाच कधी वाजतात हे होतेच. एक एक क्षण जड वाटत होता. ते ओझे वाढत होते आणि त्या ओझ्याखाली मी अनेक प्रश्नांची उत्तरे देत होतो,...प्रश्न विचारत होतो...हा माझा येथील अखेरचा दिवस...गोळा करता येतील तेवढे अनुभवाचे क्षण गोळा करुयात...
    पुढचे ४० दिवस मला तेच करावे लागणार होते...फक्त मला त्याची त्यावेळी जाणीव नव्हती एवढेच.

    चार वाजले. गिनतीनंतर गजाड दार उघडले. अतीव उत्सुकतेने आम्ही बाहेर आलो. 
    चार ते पाच...एक तास...खरे तर ६० मिनिटं...आणि अधिक खोलात जायचे तर ३६०० सेकंद. एक सेकंद केवढा जीवघेणा असु शकतो? जवळ येवुन विचारपुस करणा-यांबद्दल चीड. मी बाहेर पडताक्षणी जयंत पाटील ते विजय पाटीलांची प्रेस कोन्फरंस घेवून कशी वाट लावणार...इस्लामपुरच्या जजांपासुन ते मला अकारण अटक करणा-या पोलिस इन्स्पेक्टर सर्जेराव गायकवाडाला कसा हाय कोर्टापुढे खेचणार...माझ्या योजना ठरलेल्या होत्या. फक्त पाच वाजता माझा व मुळेचा जामीण यायला हवा.
    पाच वाजले. पण ते द्वार उघडले नाही. मुळेचा चेहरा वेदनांनी पिळवटत चालला होता. मी त्याचा हात हाती घेतला...मुळे...काळजी करु नकोस...आपण काहीएक चुक केलेली नाहीहे... हे जे चाललेय ते एक दु:स्वप्न आहे...विरेल ते...नक्कीच विरेल...
    पण तसे व्हायचे नव्हते.
    जामीनाचा पुकारा आला. छाती फुटेल एवढ्या आवेगाने...कानांत आत्मा आणुन जामीण झालेल्यांचे नांव ऐकले...

    आमचे नांव त्यात नव्हते.
   
    मग जरा जेलमधील जीवन अंगवळनी पडले. बंधु विनोदने मला व मुळेला चड्ड्या, टूथपेस्ट-ब्रश आणि काही कपडे पाठवले. तेथेच लक्षात आले...आमचा जामीण सेशन कोर्टानेही नाकारला आहे. आणि आता हाय-कोर्टाखेरीज पर्याय नाही.
    उन्हाळ्याच्या कोर्ट सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. म्हणजे एकच बेंच बसनार. अवघ्या महाराष्ट्रातील कोणत्याही केसेस असोत त्या एकाच बेंचसमोर येणार....आणि त्यात आमचे दुर्दैवातील महादुर्दैव असे कि कर्णिक महोदयांची एम.पी.एस.सी. परिक्षा घोटाळ्याची केसही तेंव्हाच हाय कोर्टसमोर यायची होती.
    असो. मीच नव्हे तर राज्यातील असे हजारो बंदी त्या उन्हाळी सुट्ट्या आणि अशाच दिर्घकालीन चालणा-या केसेसमुळे अडकुन पडले असतील.
    त्यांत आम्हीही होतो हे आमचे नशीब!
   
    जेलमद्धे दर मंगळवारी जेलर कांबळे कैद्यांची तपासणी करायला येत असत. खरे तर जेलमद्धे केस वाढवलेले असणे हे महत्पाप. कांबळे मुजाला त्याच्या या मस्तकीय आणि चेहरीय केसव्रुद्धीबाबत लेक्चर देत असे. मग नंतर मी. मला तो "लबाड...चोर...बदमाश" म्हणत पुढे जाई. मुळेला बोलायला त्याच्याकडे शब्द नसत. या पद्धतीने तो आपला साप्ताहिक कार्यक्रम उरकुन पुढे जाइ.
    येथे या जेलर कांबळे महोदयांबद्दल थोडक्यात लिहिणे उचित ठरेल. हा माणुस महाभ्रष्ट होता, कैद्यांना जे अन्न ते औषधांचे अनुदान असे ते तो जवळपास स्वता: लाटत असे. जेलमद्धे कसलीही औषधे उपलब्ध नसत. उदा. मला डायबेटीस होता आणि ग्लायकोमेटच्या गोळ्या मला देणे हे जेल प्रशासनाला बंधनकारक होते. त्या मला कधीच मिळाल्या नाहीत. अर्थात जेलमधील जेवण हे (प्रक्रिया करुनही) एवढे भारी असे कि मला गोळ्या न घेता कधीही मधुमेहाचा त्रास जाणवला नाही. शरीरातील साखर वाढायला त्या अन्नात काही शर्करी असायला हवी कि नको? जगातल्या मधुमेहींनी ही खास तुरुंगीय ट्रीटमेंट घरातच घेतली तर मधुमेह नाहीसा होईल हे मी अनुभवाने सांगू शकतो.
   
    दर शुक्रवारी जेलमद्धे सायंकालीन एक कार्यक्रम असे,  म्हणजे सांगलीतील अनिरुद्धबापुंचे भक्त जेलमद्धे येत आणि कैद्यांना सत्संग घडवत. (हे मी नंतर येरवडा जेलमद्धेही पाहिले आहे.) या सत्संगींमुळे जेल पवित्र होईल असा काहीतरी समज असावा. मी एक कार्यक्रम आवर्जुन...मुजा फारच विरोधात होत आणि खरे तर नाईलाज म्हणुन मुद्दाम अटेंड केला. बाकीचे मात्र तो प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने अटेंड करत असत. अनिरुद्ध बापुंच्या आई-वडील ते भाऊ-बहीणी या स्मरणानंतर अनिरुद्ध बापु हे क्रुष्णावतार असे वंदन झाले कि मानवी जीवनाचे तात्विक वाभाडे निघायला सुरुवात. मद्धेच भजने...आणि त्या साधकांच्या तत्वद्न्यानाची पोपटपंची बरसात.
    माझे एवढे मनोरंजन कोणीच कधी केलेले नसेल!

    तो तुरुंग होता. खरे आहे. तुरुंगाने तुरुंगासारखे असने यातच तुरुंगाची महत्ता आहे आणि त्यात वावगे वाटायचे कारण नाही. पण त्याच तुरुंगात गर्द, अफु आणि अन्य मादक द्रव्यांच्या आरोपात असनारे कैदी होते. पण तुरुंगात हीच सर्व द्रव्ये मुबलक उपलब्ध होती. उदाहरणार्थ याच जेलमद्धे आयुष्यातील पहिला गांजा मी प्यालो...
    येथे साखर, मिठाया, तिखट ते साखर...सारेच उपलब्ध होते...पण पैसे द्यायची ताकद पाहिजे. आणि हे पैसे कसे येत? मी स्वत:च नंतर आणले असल्याने खात्रीशीर अनुभवाने सांगतो...जेलगार्डला बाहेर ५०० रुपये दिले कि तो ३०० रुपये मागवणा-यापर्यंत पोहोचवत असे. त्यात त्याला समजा १ किलो बटाटे घेवुन ये असे सांगितले कि त्यावेळी ५-६ रुपये किलोचा बटाटा २०-२२ रुपये किलोने तो आत आणुन द्यायचा. माझ्या सिगारेटी याच मार्गाने इम्पोर्ट होत! मी विनोदाने म्हणे "साला दुबईत रहिल्याप्रमाणे वाटतेय!"
   
    मला पैसे कोण आणुन देत होते? एक काळे नावाचा माझा एक पुण्यातील स्टाफ होता. तो मी आत आहे म्हणुन सांगलीत येवुन काही काळासाठी स्थाइक झाला होता. त्याला ना माझ्या बंधुंचा पाठिंबा होता ना कंपन्यांची वाट लावून नंतर लगोलग राजीनामा देवुन मोकळ्या झालेल्या संचालकांचा. त्याने तेथील गार्ड पुरेपुर पटवुन मला सिगारेट ते पैसे स्वत:च्या खिशातुन खर्च करत आत पाठवले.
    मी त्याचा क्रुतज्ञ आहे.
       
    सांगली जेलमद्धे मी मानवी जीवनाची फसगत म्हणजे नेमके काय असते हे अनुभवले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपली प्रत्येकाने फसगत केली आहे असे वाटतच असते. मीही या तत्वाला अपवाद नव्हतो. प्रत्येक माणसाची स्वत:ची एक बाजु असतेच. कोणती बाजु न्याय्य हे अन्यायी लोकांनी न्याय्य लोकांना सांगायचे कि न्याय्य लोकांनी अन्यायींना?
    आणि काय न्याय आणि काय अन्याय याची व्याख्या नेमकी कोणी करायची?
    कोणाची व्याख्या खरी धरायची?
    चार भिंतीआंत गाडुन बसना-यांसाठी ते ठीकही असते कारण त्यांनी मुळात जीवनाचा हा नग्न चेहरा कधी पहिलेलाही नसतो.


    दिवसांमागुन दिवस जात होते. तो एम.पी,एस.सी.चा प्रश्न माझी केस हायकोर्टासमोर येवु देत नव्हता. आमचा जामीण होता होत नव्हता.
    जेलीय रुटीन मीच बदलले. हीही एक गम्मतच आहे. आयुष्यात मी कधी नशीबावर विश्वास ठेवला नव्हता...आता जरा बसतोय...पण ते नंतर. झाले काय एके सकाळी मी उदास मुळेचा हात हाती घेतला आणि त्याच्या हस्तरेषा बघु लागलो. माझे वडील उत्तम ज्योतिषी आहेत. शिकायला माझ्यासारखा विद्यार्थी नसेल. मी खरे तर मुळेला धीर देण्यासाठी काही भुलथापा मारणार होतो. पण गम्मत सांगतो...मी मुळेचा हात पहातोय हे दिसताच २०-२५ कैदी बाजुला जमा झाले आणि आपापले हात चोळत माझ्याकडे अपार उत्सुकतेने पहायला लागले.
    तुम्हाला नवल वाटेल...उर्वरीत २५-२६ दिवसांत मी किमान ७-८०० हात पाहिले. प्रत्येकाचा अंतरात्मा मला हे काकुळतीने विचारु पाही कि जामीण कधी होनार? कोणी साध्या मारामारीत आत होता तर कोणी कौटुंबिक अदावतीत आत आला होता. कोणी चोर होता तर कोणी गर्द-गांजा अशा मादक पदार्थांच्या विक्रीप्रकरणी आत होता. एक पत्रकार बायकोने बलात्काराची तक्रार केली म्हणुन आत होता. कोणी आपण निर्दोष असल्याचे सांगत होता तर कोणी कोणाच्या तरी बदली म्हणुन आत आलेला होता. 
    खरे काय खोटे काय हे सांगायला मी तज्ञ नव्हे, पण बव्हंशी लोक अमावस्या...अष्टमी व पौर्णिमेचा जवळपास अटक झाले होते वा त्यांचे अपराध त्याच काळात झाले होते.
    सायंकाळचा मीच एक प्रवचनकारही बनलो. धर्म काय...विश्वनिर्मिती काय...आणि जगण्याचा अर्थ काय असे मी मलाच जीवन यत्किंचितही न कळता ठोकुन देवु लागलो.
    वेळ जात होता ना...
    आणि लोकांनाही खूप प्रश्न असत...स्वत:चे असत तसेच जगाबाबतही असत.
    जमेल तेवढी उत्तरे देण्यापलीकडे मी काय करू शकत होतो?
    खरे तर मला तरी कोठे काय माहित होते? साधा माझा जामीन कधी होनार हेही माहित नव्हते. मी येथे का आहे हे तर त्याहुनही माहित नव्हते. बाह्य जगाशी पुरता संपर्क तुटलेला होता. काळे चिठ्ठ्यांमधुन कळवे तेवढेच त्रोटक...

    माझे प्रवचन टी. व्ही. सुरु करतावेळी संपायचे.
    एकच दूरदर्शनचा च्यनेल...तीच "ठंडा ठंडा डर्मी कूल"ची जाहिरात..त्या असह्य उकाड्यात हवीशी वाटायची....कसलाही कार्यक्रम असो...पाहिलाच जायचा...

    खालच्या मजल्यावरील टी.व्ही. वरच्या मजल्यावर गेला कि मुजा आम्हाला वर घेवुन जाई. त्याचा मोठाच वट होता तिथे.
    तो आत का?
    त्याने म्हणे त्याच्या बायकोला ठार मारले होते.
    पार विधानसभेत त्याच्या या कृत्यावर गदारोळ झाला होता.
    पण त्याच्या बायकोचे प्रेतच अद्याप सापडले नसल्याने कायदाही त्याला फक्त आत ठेवत होता...काहीच करु शकत नव्हता.

    आम्ही या जेलमधुन बाहेर यायच्या तीन दिवस आधी एक कन्नडीगा वयोव्रुद्ध कैदी याच जेलमद्धे आला. त्याला स्वाभाविकच सर्व कैद्यांची रांग संपते तेथे, म्हणजे संडासाशेजारी, जागा मिळाली. तो आजारी होता. त्याला उठवत नव्हते. मी मुजाला विनंती केली. मुजाने जेलर कांबळेला भेटुन विनंती केली कि त्या शरणाप्पाला दवाखान्यात दाखल करावे. कांबळेने ऐकल्याचे नाटक केले.
    तो कैदी तसाच पडुन राहीला. मी व मुजाने त्याला जे आमच्याकडे सर्वोत्क्रुष्ठ होते ते त्याला भरवायचा प्रयत्न केला. त्याने ते सारे ओकुन काढले. आम्ही चिंतेत पडलो.  त्याची तब्बेत पराकोटीची बिघडत गेली. पण रात्र झाली होती. दार बंद होते. कोणी गार्ड तेथे नव्हता.
    दुस-या दिवशी सकाळीच आम्ही त्याला बाहेर काढले. गार्डना हाक मारली. ते त्याला मेन गेटजवळ घेवुन गेले. मुजा त्यांच्यासोबत गेला.
    काही वेळाने मुजा परत आला...तो अस्वस्थ होता...
    तुरुंगाच्या दारापाशीच तो बिचारा शरणाप्पा मरुन गेला होता
.
    पण त्याचा म्रुत्यु जाहीर असा झाला कि जणु तुरुंग प्रशासनाने आजारी शरणाप्पाला सिव्हिल होस्पिटलमद्धे दाखल केले होते तेथे उपचार करत असतांना त्याचा म्रुत्यु झाला.

    आणि त्यानंतर दोनच दिवसांनी माझ्या व मुळेच्या जामीनाचा आदेश आला.
   
    आम्ही मुक्त झालो.
    आम्हाला घ्यायला विनोद आणि त्याचे सासरे आले होते. दादासाहेब आढावांनी आम्हा दोघांना जामीण दिला होता. जेलचा दरवजा आम्हाला बाहेर काढुन परत बंद झाला.


    मी बाहेर आल्यानंतर प्रथम काय केले असेल तर शरणाप्पाच्या म्रुत्युबद्दल जेल प्रशासन ते ग्रुहमंत्र्यांना पत्रे पाठवली...
   
    त्याची दखल एवढीच कि जेलर कांबळेसाहेबांची बदली झाली.

    कायद्याकडुन आपण काय अपेक्षु शकतो?
    त्यानंतरची माझी लढाई काय होती हे नंतर कधीतरी...
    तत्पुर्वी मी मुळात आत कसा गेलो हे समजावुन घेण्यासाठी या http://sanjaysonawani.blogspot.com/2011/07/blog-post_5657.html  लिंकला भेट द्यावी ही विनंती.

Tuesday, July 16, 2013

कामाचे दोष समजावून घ्यावेत...

 
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपण परंपरेने मानत असतो. यातील धर्म हा शब्द आजकाल "रिलिजन" या अर्थाने घेतला जातो, पण ते वास्तव नाही. धर्म हा अत्यंत व्यापक शब्द असून तो पारंपारिक धर्माशी संबंधित नसून सकल मानवी समाजाच्या नैतीक जीवनधारणांशी संबंधित आहे. अनेक शब्द कालौघात नवनवे अर्थ धरण करत जात असतात. अनेकदा तर शब्दार्थांचीही उलटापालट झालेली असते. उदाहरणार्थ प्राचीन काळी "असूर" हा शब्द प्राणवान-वीर्यवान अशा चांगल्या अर्थाने घेतला जात असे. कालौघात असूर हा शब्द दुष्ट या अर्थाने वापरला जावू लागला. पुरुषार्थातील "काम" हा शब्दाचे असेच झाले असून त्याला वेगवेगळ्या अर्थकळा लाभल्या असल्या तरी मुख्यत्वे तो कामवासनेशी जोडला गेल्याने "काम" विषय आपल्या सांस्कृतीक जीवनातील चर्चेतून बाद होत गेला. तरीही भारतातच कामभावनेला (वासनेला) वाहिलेला जगातील पहिला ग्रंथ वात्स्यायनाचा "कामसूत्र" मौलिक असुनही असे व्हावे ही खरे तर शोकांतिका आहे व त्याचे अनेक सामाजिक दु:ष्परिनाम होत आलेले आहेत. असो.

काम या शब्दाचा मुलार्थ "इच्छा" असा आहे. इच्छा हा मानवी वर्तनावर मुलगामी परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. इच्छेखेरीज यच्चयावत विश्वात काहीही घडत नाही. निसर्गाच्या बाबतीतही असाच नियम लागू पडतो असे चिद्वादी विद्वानांचे मत आहे. त्याला ते यदृच्छा म्हणतात. इच्छा ही निसर्गात नैसर्गिक स्वरुपातच अस्तित्वात असते व त्यामुळेच प्रत्यक्ष कार्य घडु शकते असे चिद्वाद्यांचे मत आहे. आगमशास्त्रात काम हाच मानवी जीवन व मुक्तीचा मुख्य प्रवाह आहे हे मान्य करुन अगणित तांत्रिक ग्रंथांची निर्मिती झाली आहे. इच्छा ही मनाशी जोडली गेल्याचे आपण ऋग्वेदात "त्यानंतर प्रथम जेंव्हा मनोरुपी बीज निर्माण झाले तेंव्हा मनाच्या ठिकाणी काम (वासना, इच्छा) उत्पन्न झाला" (ॠग्वेद १०.१२९.४) असे नोंदवलेले पाहतो.  अथर्ववेदातही काम अथवा इच्छा ही एक महान वैश्विक शक्ती मानलेली आहे. ग्रीक तत्वज्ञ अरिस्टाटलने आपल्या "रिपब्लिक" या ग्रंथात नमूद केले आहे कि आदर्श मानवाचे ध्येय गाठण्यासाठी इच्छांच्या पुर्तीला पुढे ढकलत राहिले पाहिजे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात कि निर्वाणप्राप्तीसाठी भिक्खुंनी इच्छांचा प्रवाह पुर्णतया रोखला पाहिजे. म्हणजेच "इच्छा" अर्थातच काम याकडे पाहण्याचे तात्विक दृष्टीकोन वेगवेगळे असल्याचे लक्षात येईल. 

मानसशास्त्रात "इच्छा" (Desire) या भावनेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. भावना आणि इच्छा यांत अनेक मानसशास्त्रज्ञांनी भेद केलेलाही आपल्याला दिसतो. भावना या तरल पातळीवर माणसात वावरतच असतात, परंतू प्रत्यक्ष कृती मात्र इच्छेच्या सहास्तित्वाखेरीज घडू शकत नाही असा त्यांचा अभिप्राय आहे आणि तो संयुक्तिकही आहे. धर्म, अर्थ आणि मोक्ष या तिन्ही मानवी प्रेरणा प्रत्यक्षात साध्य करायच्या असतील तर त्या इच्छेखेरीज शक्य नाही असाच या पुरुषार्थांचा अर्थ आहे. 

कोणतेही उद्दिष्ट, कोणत्याही भावनेची पुर्ती (मग ती वासना का असेना) इच्छेखेरीज प्रत्यक्ष कर्मात बदलू शकत नाही हे उघड आहे. किंबहुना कर्म करण्याची इच्छा असल्याखेरीज कर्म अस्तित्वातच येवू शकत नाही. आणि कर्माखेरीज मानवी जीवनव्यवहार अशक्य आहे. अगदी "भूक" लागणे हीसुद्धा शरीराचे इच्छाप्रदर्शन असते ज्याची नोंद मानवी मेंदू घेतो आणि तिच्या पुर्ततेची इच्छा करत अन्न सेवनाचे कर्म करतो. वासनेचेही तसेच आहे. वात्स्यायन म्हणतो, "काम हे शरीरधारणेस आवश्यक असल्याने आहाराशी त्याचे साधर्म्य आहे. शिवाय धर्मार्थाचे अंतिम फळ हे कामात्मकच आहे." (कामसूत्र: १.२.४६-४७)

पण पुढे लगेच वात्स्यायन म्हणतो कि, "कामाचे दोष समजावून घ्यावेत. याचक येईल म्हणुन स्वयंपाक करण्याचे कोणी सोडत नाही अथवा जनावरे खातील म्हणुन कोणी धान्य पेरायचे थांबत नाही." कामसूत्र: १.२.४८) 

वात्स्यायनाने जरी वासनेशी निगडीत अशी कामशास्त्राची मांडनी केली असली तरी "काम" या शब्दाचा अर्थ व्यापक आहे याची त्याला जाणीव होती. जीवनातील कोणतेही कार्य इच्छेखेरीज होऊ शकत नाही, त्यामुळे केवळ आगामी अनिश्चिततेचे भय आहे म्हणुन इच्छा कर्मात बदलू नयेत असे नाही असाच त्याचा अभिप्राय आहे. मिशिगन विद्यापीठाने (२००८) इच्छा आणि भय या दोन्ही मुलभूत भावना मेंदुच्या एकाच केंद्रकात सहअस्तित्वात असतात असा अभिप्रय संशोधनांती नोंदवलेला आहे. भावी परिंणामांच्या भयाने अनेक इच्छा प्रत्यक्ष कार्यरुपात येत नाहीत.   
   
धोडक्यात "काम" हा शब्द फक्त शारिरीक वासनांशी निगडीत नाही त्यामुळे पुरुषार्थांपैकी "काम" या पुरुषार्थाचा विचार करीत असतांना कामाला फक्त शारीरवासनेशी जोडता येत नाही. शारीर वासनाही तेवढीच महत्वाची आहे...कारण पुनरुत्पादनाचे ते एकमेव साधन आहे. (आता विज्ञानाने काही पर्याय दिले आहेतच...) ते नैसर्गिक आहे आणि त्याकडेही तेवढ्याच मोकळ्या मनाने पाहिले गेले पाहिजे. खजुराहो ते गडचिरोलीच्या मार्कंडा मंदिरातील कामशिल्पे उदारपणे स्वीकारनारा समाज कामवासनेबद्दल विधी-निषेधात्मक गारुडात अडकला ही सामाजिक चुकच होती. आद्य कामशास्त्र महादेवाचा अनुचर नंदीने सांगितले अशी आख्यायिका वात्स्यायनाने नोंदवून ठेवली आहे.  खजुराहो अथवा मार्कंडा ही शैव स्थानेच आहेत. परंतू अन्य धर्म/पंथांनी कामवासनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिरंजित आणि विकृत केला हे सहज दिसून येते.

इच्छांवरील नियंत्रण हा पौर्वात्य तसेच पश्चिमी विचारवंतांनी आपल्या चिंतनात महत्वाचा गाभा मानला आहे आणि ते संयुक्तिकच आहे. कारण इच्छा अनंत असतात आणि त्यांतील असंख्य इच्छांची पुर्ती ही समाजविघातक असू शकते हे जगाने वारंवार अनुभवलेले आहे. त्यामुळे धर्म या पुरुषार्थाशी कामाची सांगड घालणे अनिवार्य होवून जाते. सुरुवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाने धर्म हा अखिल मानवी जीवनाच्या नैतिक धारणांशी निगडीत आहे. या नैतिक धारणा म्हणजे सर्वांच्याच ऐहिक जीवनाला सुखावह करणे या मुलभूत तत्वाशी जोडल्या गेलेल्या असतात. या नैतिक धारणांच्या आधारावरच इच्छा आणि त्या पुर्ण करण्याची साधने ठरवली जायला हवीत हे उघड आहे. गांधीजींनी "साधनशुचिता" या तत्वाला याच सर्वोच्च नैतिक पातळीवर उचलून घेतल्याचे आपल्याला अलीकडच्याच इतिहासावरुन स्पष्ट दिसते. कामवासनापुर्तीलाही नैतीकतेचे भान असलेच पाहिजे याबाबत आक्षेप घेता येणार नाही. 

थोडक्यात "काम" हा शब्द फक्त शारीरीक वासनेशी निगडित नसून त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे. मानवी जीवनव्यवहार काम (इच्छा) भावनेखेरीज कर्मात बदलू शकत नाहीत हे वास्तव आहे. आणि कर्माखेरीज विश्वाचा गाडा तसुभरही चालू शकत नाही. फक्त इच्छांना आणि त्यातुन उत्पन्न होणा-या कर्मांना नैतिकतेचे...म्हणजेच धर्माचे अधिष्ठान असलेच पाहिजे असा आग्रह धरणे अधिक योग्य राहील. 

-संजय सोनवणी

दुसरी हरीत क्रांती कि विनाशाची नांदी?


भारतीय उपखंडात शेतीची सुरुवात किमान दहा हजार वर्षांपुर्वी झाली असे मेहेरगढ येथील उत्खननातून सिद्ध झाले आहे. भारतीय उपखंड पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपुर्ण असून अपार जैववैविध्य हा भारताचा एक अनमोल ठेवा आहे. भारतीय शेतक-यांनी पुरातन काळापासून नवनवे वाण विकसीत केले. ते वाण भारतीय हवामानाला, पर्जन्यमानाला आणि एकंदरीत भौगोलिक स्थितीला अनुसरून होते. परंतू स्वातंत्र्यानंतर पहिल्या हरीत क्रांतीची उद्घोषणा आणि राबवणुक झाली आणि संकरीत (हायब्रीड) वाणांनी भारतीय शेतीत प्रवेश केला. या वाणांनी देशी वाणांना पुरते मागे सारले. आता दुसरी हरीत क्रांती आणायचे घाटते आहे ती जनुकीय बदल केलेल्या बियाण्यांना मुक्तद्वार देण्याची.

संकरीत बियाणांमुळे भारताचे अन्न-धान्य उत्पादन वाढले ही बाब खरी असली तरी देशी वाणांतून मिळनारे पोषणमूल्य त्यात नव्हते. शिवाय रसायनी खते, कीटनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढलेला आणि अनिवार्य वापर यामुळे मानवी आरोग्याला जसा धोका बसू लागला तसा शेती आणि  अन्य जैवसाखळीलाही धोका पोहोचु लागला. हे परिणाम सावकाश होत असल्याने त्याचे गांभिर्य कोणाला जाणवणे शक्य नव्हते. शिवाय कृषिपद्धत खर्चीक होत गेली. बियाण्यांचा पुनर्वापर अशक्य बनत गेला. भरमसाठ उत्पादने वाढली तरी ती निकस बनत गेली व आरोग्यविघातक बनत गेली. अमेरिकेत  २००३ साली Centers for Disease Control ने नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यातून पुढे आलेली बाब म्हणजे हायब्रीड अन्न खाना-या नागरिकांच्या रक्तात कीटकनाशकांचे प्रमाण मोठ्या प्रमानावर होते, पण स्त्रीयांतील प्रमाण मात्र धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलेले होते. एका अर्थाने हे स्लो पोयझनींगच नव्हे काय?

परंतू भारतात अशी सर्वेक्षणे झाल्याची उदाहरणे मिळत नाहीत. सरकारही याबाबत उदासीनच असल्याचे दिसते. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असतांना शेतक-याचीही आर्थिक विल्हेवाट लावली जात आहे याचे भान आले नाही. किंबहुना हजारो वर्षांत कधीही बियाण्यांचा ग्राहक नसलेला शेतकरी ग्राहक बनला. त्यातही त्याची असंख्यदा फसवणुकही झाली...म्हणजे बियाणेच कुचकामी निघाल्याने पीकच आले नाही...दोबार पेरणी अथवा मोसमच गमवावा लागल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

डा. जोन आगस्टस वोएल्कर या इंग्रज शेतीतज्ञाने सरकारच्या आदेशानुसार १८८९ साली भारतीय शेतीचे सर्वेक्षण केले होते. त्यात त्याने म्हटले होते कि भारतीय शेतकरी हा इंग्रज शेतक-यापेक्षा कूशल असून त्यांची उत्पादन पद्धती इंग्रज शेतक-यांनी शिकून घेतली पाहिजे. त्याने पुढे असेही म्हटले कि भारतीय शेतक-याला गरज असेल तर ती पायाभुत सुविधांची आहे. परंतू भारतीय सरकारने आपल्याच शेतक-याला अडाणी ठरवत आधुनिकतेच्या नांवाखाली भारतीय शेतीचाच दीर्घकालात विनाश घडवण्याचा विडा उचलला. एकीकडे आज शेतकरी पुन्हा पारंपारिक शेतीपद्धतीकडे वळण्याच्या प्रयत्नांत असतांना, सेंद्रीय शेतीला दिवसेंदिवस प्राधान्य मिळत असतांना आणि त्या पद्धतीने घेतलेल्या उत्पादनांना मागणी वाढत असतांना शासन दुसरी हरीत क्रांती घडवण्याच्या बेतात आहे. आणि ही क्रांती साध्य केली जाणार आहे जनुकीय बदल (जेनेटिकली मोडिफाइड) केलेल्या बियाण्यांमार्फत.

त्याची सुरुवात बी टी कापसाच्या बियाण्यांपासून भारतात झाली ती २००२ पासून. मोन्सेटो ही महाकाय कंपनी या बियाण्यांची निर्मिती करते. भारतात महिकोत त्यांची २६% मालकी असून अन्य अनेक कंपन्यांनाही त्यांनी या बियाण्यांचे उत्पादन करण्याचे परवाने दिले. या बियाण्यांबाबत शेतकरी साशंक असले तरी २०१०-११ पर्यंत जवळपास ९०% कपाशीचे उत्पादन हे बी. टी. कपाशीचे होते. बियाण्यांची किंमत जास्त असली तरी ती संपुर्ण कीड-प्रतिबंधक आहे असा मोन्सेटोचा दावा होता. प्रत्यक्षात या कंपनीवर जगभरातून असंख्य दावे दाखल केले गेले आहेत. भारतातील दोन लाख शेतक-यांनी जनुकीय बदल केलेली बी टी कापसाची बियाणी वापरून नुकसान केल्यामुळे आत्महत्या केल्या असा वंदना शिवा यांचा दावा आहे. तो काहीसा अतिशयोक्त वाटला तरी शेतक-यांचे नुकसान झाले हे वास्तव नाकारता येत नाही. या बियाण्यांपासून निर्माण होणारा कापूस हा त्वचेला धोका पोहोचवू शकतो असाही आरोप आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने २०१२ मद्धेच बहुराष्ट्रीय कंपनीला बळी न पदता बी. टी. कापसाच्या बियाण्यांच्या वितरण व विक्रीवर अधिकृतपणे बंदी घातली असली तरी या बंदीचा व्हावा तसा परिणाम झालेला दिसत नाही. पण यामुळे या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येईल.

कापसापर्यंतच हा प्रश्न मर्यादित राहिला असता तर गोष्ट वेगळी होती. पण खाद्यांन्नातही जनुकीय बदल केलेली भाजी-पाला ते अन्न-धान्यांची बियाणी भारतात आणायची तयारी या बहुराष्ट्रीय मोन्सेटोने २००८ पासुनच केली होती. त्याचे फळ म्हणजे केंद्र सरकारने National Bio-Technology Regulatory Bill तयार केले. २०११ साली हे बिल मंजुरीसाठी ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी तो अयशस्वी ठरला. आता ते पुन्हा कधीही संसदेत सादर होऊ शकते. या बिलाला शेतकरी आणि अनेक स्वयंसेवी संघटनांचा विरोध असून वंदना शिवा यात आघाडीवर आहेत. असंख्य ग्रामसभा ठराव करून या बिलाला विरोध करण्याच्या तयारीत आहेत.

तांत्रिक बाबींत न जाता आपण आधी जर हे बिल मंजूर झाले तर काय भयंकर परिणाम होतील यावर विचार करुयात. सर्वात पहिला फटका बसेल तो भारतीय वाणांना. उदा. एकट्या वांग्याचेच ३९५१ विविध वाण भारतात आहेत ते नष्ट होतील. हीच बाब बटाट्यांपासून ते सोयाबीन ते अन्य भाजी-पाला व अन्न-धान्याला लागू पडते.  थोडक्यात भारतीय जैववैविध्य पार संपून जाण्याचा धोका यामुळे उभा राहणार आहे. याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे जनुकीय बदल केलेल्या अन्न-धान्याचा आहारात वापर केला तर त्यातून ज्या संभाव्य मानवी जैवसमस्या उपस्थित होऊ शकतील त्याचे निराकरण कसे करायचे याबाबत सारेच अनभिज्ञ आहेत. त्याचे दु:ष्परिणाम म्हणजे मानवी शरीरात अवांच्छित जनुके शिरुन अपरिवर्तनीय अशी विघातक साखळी निर्माण होऊन पिढ्यानुपिढ्या परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ २०११ मद्धे फ्रांसमधीन केन विद्यापीठातील संशोधक डा. गिल्स एरिक सेरालिनी यांनी उंदरांवर प्रयोग करून लिहिलेल्या तीन शोधनिबंधांतून सिद्ध केले कि जनुकीय बदल केलेले धान्य दिल्यानंतर उंदरांमद्धे कर्करोग निर्माण करना-या पेशी निर्माण झाल्या, तर काही उंदरांच्या आतड्यांना आपोआप गंभीर जखमा  झाल्या. जनुकीय बदल केलेले धान्य आणि सजीवांत जनुकांचा प्रवास होऊ शकतो आणि त्याचे परिणाम काय असतील याबाबत सध्या तरी फक्त अंदाजच वर्तवता येईल अशी परिस्थिती आहे.

इंस्टिट्युट ओफ रिस्पोन्सिबल टेक्नोलोजी या अमेरिकन संशोधन संस्थेने जी. एम. उत्पादनांमुळे मनुष्य, प्रानी आणि पर्यावरनास निर्माण होनारे ६५ दु:ष्परिनाम प्रसिद्ध केले आहेत ही बाबही येथे लक्षात घ्यायला हवी.

आज संपुर्ण जग जी.एम. अन्नधान्याबद्दल साशंक असण्याचे कारण आजतागायत त्यातील संपुर्ण निर्धोकपणा सिद्ध झालेला नाही. दु:ष्परिणाम कोणत्या पिढीत दिसू शकतील याबद्दल शास्त्रज्ञ अद्यापही प्रयोग करत आहेत कारण एका पिढीतून दुस-या पिढीत अवांच्छित जनुके सरकल्यानंतर त्यांची पुढील तीव्रता मोजायचे साधन आज आपल्याकडे नाही.

यामुळे भारतीय वाणांचा समूळ नायनाट होऊ शकतो हा धोका तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे स्थानिय पर्यावरण प्रदुषित होत मुलभूत जैवसाखळी धोक्यात येण्याचे संकट! कीटकनाशक आणि रसायनी खतांच्या प्रचंड वापरामुळे एकुनातच शेतीचे आणि पाण्याचे आरोग्य धोक्यात आले असतांना कृत्रीम बियाण्यांमुळे ते अधिकच धोक्यात येईल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

यातून निर्माण होणारा पुढील धोका म्हणजे भारतेय शेती ही सर्वस्वी बहुराष्ट्रीय कंपनीच्या हाती जाईल. या बियाण्यांना दरवेळी विकत घ्यावेच लागते. केवळ बी.टी. कापसाच्या बियाण्यांची विक्री करून आजवर मोन्सेटोने दहा हजार कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले आहेत. भविष्यात सरकारने अविचाराने हे बिल पारित केले तर हीच रक्कम लक्षावधी कोटींत जाईल. भारतीय शेतीला नियंत्रण करनारी देशबाह्य शक्ती निर्माण होईल. आज जागतिकीकरनामुळे बहुसंख्य भारतीय उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती जात असतांना भारतीय अर्थव्यवस्थेचा जो मुलाधार तोच धोक्यात येणार आहे. थोडक्यात हे नवे आणि पुढील हजारो वर्ष टिकणारे पारतंत्र्य असनार आहे.

भारतीय जनतेने विषान्न खात बहुराष्ट्रीय कंपनीची प्रयोगशाळा बनायचे आहे कि त्याला विरोध करायचा आहे हे ठरवावे लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्या लोबींग करून आपल्या हिताची विधेयके कशी मंजूर करून घेतात हे आपण एफ.डी.आय. प्रकरणात पाहिलेच आहे.

ही दुसरी हरितक्रांती शेतकरी आणि अन्य देशवासियांसाठी सर्व प्रकाराने धोक्याचा इशारा आहे. शेतकरी जागृत होत आहेत. ग्रामसभा सर्वत्र या विधेयकाला विरोध करत आहेत. सर्वांनीच त्यांना पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.

-संजय सोनवणी

Thursday, July 11, 2013

मैत्र निर्माण करता येत नसेल तर...

जागतीक परिप्रेक्षातील दहशतवादाला असंख्य पैलू आहेत. ख्रिस्ती राष्ट्रे, कम्युनिस्ट राष्ट्रे आणि ज्यु राष्ट्र स्वत:च सर्वात मोठी दहशतवादी केंद्रे आहेत. ख्रिस्ती, ज्यू हेही धर्म जन्मापासून दह्शतवादी कृत्यांत सामील होते हा इतिहास आहे. शिख दहशतवादाने काही दशकांपुर्वी देशभर थैमान घातले होते हे विसरता येत नाही. आत्मघातकी दहशतवाद ज्यूंनी दोन हजार वर्षांपुर्वीच शोधला...वापरला आणि तमिळ वाघांनी त्याचा सर्वाधिक उपयोग केला. वैदिक-अवैदिकांनीही प्राचीन काळी एकमेकांविरुद्ध दहशतवादाचा वापर केल्याचे दाखले मिळतात. अर्वाचीन काळत हिंदुत्ववादी (वैदिकवादी) दहशतवादी संघटनाही छुटपुट का होइना दहशतवादी कृत्ये करतांना दिसतात. जगातील एकही धर्म दहशतवादापासून अलिप्त नाही. राष्ट्रप्रणित दहशतवाद हा शक्यतो ख्रिस्ती राष्ट्रे विरुद्ध मुस्लिम राष्ट्रे किंवा कम्म्युनिस्ट राष्ट्रे  असा माजवला जात आहे. माओवाद्यांनी भारतात आजवर जेवढे लोक मारले ते भारत पाकमद्ध्ये झालेल्या तिन्ही युद्धात मेलेल्यांपेक्षा अधिक आहेत. माओवाद्यांना धर्म नसतो असे म्हटले तरी त्यांचा मूळधर्म कोणता आहे हेही अभ्यासनीय आहे.
दहशतवाद फक्त हिंसकच असतो असे नाही. तो सांस्कृतीक/आर्थिकही असतो. जगभर हा संघर्ष सुरु आहे. तेंव्हा एकाच धर्माला दहशतवादी असे सरसकट लेबल लावता येत नाही, कारण कोणत्या ना कोनत्या स्वरुपात सर्वच धर्म दहशतवादाशी या ना त्या प्रकारे संलग्न आहेत.
ख्रिस्ती-ज्यू दहशतवादाचा झटका भारताला विशेष बसला नाही. (अर्थात इशान्यपुर्व राज्यात आजमितीला ३ ख्रिस्ती दहशतवादी संघटना कार्यरत आहेत व त्यांनाही आंतरराष्ट्रीय फंडींग आहे.) म्हणुन जगात एकमेव इस्लामच दहशतवादी आहे असे सरसकट विधान करता येत नाही. त्यांच्यातही शिया-सुन्नी वाद असून एकमेकांविरुद्ध दहशतवाद माजवला जातो हे पाकिस्तानमधील घटनांवरुन लक्षात येते. भारतात रा. स्व. संघ स्थापनेपासूनच मुस्लिम द्वेष जोपासत आला आहे. गांधीजींच्या खुनानंतर मिठाया वातल्या गेल्या. आप्पासाहेब पटवर्धन यांनी साधनातील (२३-७-४९ च्या) लेखात स्पष्ट लिहिले कि "आमच्या रत्नागिरीतही मिठाया वाटल्या गेल्या...संघापासून दूर राहण्यात राष्ट्राचे, मानवतेचे कल्याण आहे."
संघाची बैठकच चुकीची" या ४८ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात (पान क्र. ४) बाळुकाका कानिटकर म्हणतात, "संघातील पाच वर्षाच्या पोरापासून पंचाऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांची अंत:करणे मुसलमानांच्या द्वेषाने भरली आहेत. कुणी तो प्रकट करतात. कोणी दडवून ठेवतात. पण कधीतरी तो बाहेर पडतोच. मुसलमान या शब्दाऐवजी संघीयांच्या खाजगी वाटाघाटीत व बैठेकींत "लांडा" हा शब्द अनेकवार कानांवर येतो." बाबरी मशीद प्रकरणाने जातीय तेढ व दहशतवादी कृत्यांची संख्या वाढली हे वास्तव नाकारता येत नाही. गुजरात प्रकरण तर ताजेच आहे.
तेंव्हा सर्वांनी तारतम्यानेच चालायला हवे. चुका सर्वांच्याच आहेत. त्या दुरुस्त करण्याऐवजी कटुता वाढवण्याचे प्रयत्न झाले तर दहशतवादी घतनांना आळा बसणार नाही.
मैत्र निर्माण करता येत नसेल तर किमान शत्रुत्व वाढवण्याचे काम करू नये. आपणच फिर्यादी, आपणच वकील आणि आपणच न्यायाधिश बनायचा प्रयत्न करू नये. तपासयंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे. द्वेषातून द्वेषच वाढतो...

आज निमग्न...

आज निमग्न
आहे मी
आभाळाच्या
आभाळमिठीत
झेलत अनंत संवेदनांची
भाववर्षा
चिंब होत एवढा कि
मीच बनत एक मेघ
व्यापू पाहत
सर्वव्यापी आभाळाला
होत अथांग
आणि चिंब भिजवित
माझ्या अवघ्या
विश्वाला...
वर्षत रहायचे हेच काय ते
आभाळस्वप्न
शेवटच्या उरल्या
थेंबापर्यंत
विरुन जायला
महाकाशात!

Wednesday, July 10, 2013

तू असशील... नसशील...

तू असशील नसशील
हे तुला माहित नाही
मी असेल नसेल
हे मलाही माहित नाही
मी परमेश्वर मानतो
का? 
हे मला माहित नाही
तू परमेश्वर मानत नाहीस
का?
हे तुलाही माहित नाही
पण आधी तू कि मी
आधी जाणारा असतो
कि आधी येणारा
हे तुलाही माहित नाही
नि मलाही माहित नाही...

जायचे तर कोठुन आणि कोठे
यायचे तर कोठुन आणि कोठे
हे काहीच जर नाही माहित
तर जाण्या-येण्याला तरी अर्थ 
राहतो कोठे?

खरेच आपण आहोत का?
नसू तर नसण्यात 
दु:ख शोधतो तरी का?
आणि असणारच असू 
असे नाही तर तसे
तर असण्यातील 
असणेपण चिरंतन नव्हे का?

असणे आणि नसणे
निव्वळ एक खेळ
असण्यातील
नसण्याचा...!

Monday, July 8, 2013

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण अलीकडच्या नाशिकच्या जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्वतावादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणुणच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणुन कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. बोधी गया येथे झालेल्या साखळी स्फोटांत शासकीय यंत्रणाच नव्हेत तर सर्वसामान्य नागरिकांनी (नेटक-यांनीही) तात्काळ त्यामागील गुन्हेगार कोण हे घोषित केले एवढेच नव्हे तर त्यावर वाक्युद्ध्येही झडू लागली. परस्पर धर्मांवर/जातींवर/राजकीय पक्षांवर शाब्दिक हल्ले सुरू झाले. असे दरवळेस होते. हे काही "आधुनिक" भारतियांचे लक्षण नव्हे.

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणुन आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनून जाते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या एकुणातल्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो व म्हणुनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकुणातच अंधारयुगातच जगत आहे असे म्हनावे लागते कारण आम्ही क्रमश: इतिहास आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे. चिकित्सा म्हणजे टीका करण्यासाठीच असते असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातींत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणा-या आणि टीकाकारांवर झुंड बनवित सरळ हल्ले चढवणा-या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यांत घट्ट अदकलेले आहेत आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात हे आपण पाहू शकतो. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्यआच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्त्या मात्र त्याच आहेत.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला "पाखंडी" ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडुन गेले आहे...पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्मलंडांना प्रसंगी छळ सोसुनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणुन ते ब-यापैकी आधुनिकही बनले.

आज एकविसाव्या शतकात येवुनही आम्ही मात्र मध्ययुगातच अडकून पडलो. आमची मानसिकता अधुनिक बनलेच नाही. त्यामुळे आजही आमची मदार पुरातन काळातील ख-या-खोट्या गौरवांवर असते अथवा पाश्चात्यांनी शोधलेल्या उत्तरांवर असते. आम्ही आमची विचार करण्याची समग्र पद्धत बदलू शकेल असा एखाद-दुसरा अपवाद केला तर विचारवंत/तत्वज्ञ पैदा केला नाही कारण मुळात तशी मानसिकताच आम्ही जोपासली नाही व ज्यांनी जोपासली त्यांचे पंख जातीय पिंज-यांत बंदिस्त करुन छाटुन टाकले. राजकारण्यांना हे अधिक सोयीचे होते. विखंडित प्रजा हे अनिर्बंध राज्य करण्यास मुक्तद्वार देत असते. त्यामुळे विचारी समाज त्यांना नकोच असतो. किंबहुना त्याचेच प्रतिबिंब आपल्या शिक्षण पद्धत बनवण्यात पडलेले आहे असे दिसते.

समीर मोहिते या धडाडीच्या तरुणाने टाटा समाज विज्ञान संस्थेमार्फत कोकणातील दोन गांवातील सातवी व नववीत शिकणा-या विद्यार्थ्यांचे एक सर्वांगीण सर्वेक्षण केले. त्यातील निरिक्षणे काळजीत टाकणारी आहेत. विद्यार्थी दशेतच जातीय जाणीवा, जातिभेद व लिंगभेद जाणीवा कशा विकसीत झालेल्या असतात व त्यांचे निराकरण करण्याची कसलीही सोय आपल्या शिक्षणपद्धतीत नाही. बव्हंशी विद्यार्थ्यांचे मित्रही आपल्याच जातीतील असतात. याचाच अर्थ असा कि ते कितीही कथित उच्च-शिक्षित बनले तरीही ते फक्त साक्षरच राहनार कारण त्यांच्या विचारपद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची सुविधा आपली समाजव्यवस्थाच उपलब्ध करून देत नाही.   

मानवी मेंदू हा विचार करण्यासाठी, नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी आणि पुर्ण सामर्थ्याने अभिव्यक्ती करण्यासाठी असतो. तेवढी नैसर्गिक शक्ती ही प्रत्येक व्यक्तीत असतेच. प्रश्न असतो तिच्या विकसनासाठी योग्य मार्ग देण्याचा. दिशा देण्याचा. त्यात आम्ही क्रमश: कमी पडत गेल्याने आज साक्षरांची मोठी फौज निर्माण झालीय खरी. पण सुशिक्षितांच्या अभावामुळे असहिष्णुता जोमाने फोफावत चालली आहे. एखाद्या जातीय संघटनांची खोट्या इतिहासाने भरलेली व म्हणुनच उथळ विचारांची चार पुस्तके वाचून "क्रांतीकारक" बनण्याची स्वप्ने पाहणारी तरुणांची पिढी बनते ती यामुळेच. भडक भाषा, विशिष्ट जातीसमुहाला सातत्याने शिवीगाळ केल्याने समाज बदलत नसतो याचे भान तथाकथित विचारवंतांनी व म्हणुण त्यांच्या अनुयायांनीही गमावले असेल तर याचा अर्थ हाच निघतो कि आमची तरुण पिढी घडवण्यात समाज अपयशी ठरला आहे. घडवले जात असतील तर जाती-धर्मांच्या पारंपारिक बेड्यांत अडकवून घेणारे गुलाम.

आणि हे चित्र मुळीच सुखावह नाही. ते बदलावे असे शासनकर्त्यांना वाटने शक्य नाही कारण ते तरी कोठे सुशिक्षित आहेत? ते तरी कोठे आधुनिक आहेत? ज्या शिवराळ भाषांत आपले आपले नेते बोलत असतात आणि श्रोतेही निर्लज्जपणे टाळ्या वाजवत असतात त्यांना समाज सुशिक्षित होणे कसे आवडेल? त्यांना आव्हाने नाही उभी राहणार? सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी त्यांना परंपरेच्या गुलामीत अडकलेले समाजच हवे असणार हे उघड आहे. त्यामुळे ते कसलाही गुणात्मक सामाजिक बदल घडवून आणतील या आशेत राहण्यात काही एक अर्थ नाही.

मनुष्यक्रांती हे समाजाने ध्येय बनवायला हवे. मनुष्य क्रांती ही माणसाला प्रगल्भ नागरिक बनवण्यासाठी व्हायला हवी. ती समाजालाच करावी लागेल. पण त्यासाठी आधी काहींनी तरी गुलामीच्या बेड्यांना तोडावे लागेल. मोकळेपणे चिकित्सा करायला आणि स्वीकारायला शिकावे लागेल. प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि उत्तरेही शोधावी लागतील. प्रज्ञावादाचा आश्रय घेतल्याखेरीज असे घडणे असंभाव्य आहे. आम्ही असे करु शकत नसू तर पुढील पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत याचेही भान असायला हवे. खोटा इतिहास कोणाच्याही कामाला येत नाही...खोटा धर्मही नाही मग खोटी जात काय कामाला येणार हा प्रश्न आम्हीच आम्हाला विचारायला हवा. जातपंचायतींच्या अमानुषपणावर बोलतांना आम्हीही वैचारिक अमानुषच बनलेलो आहोत याचे भान ठेवले कि उत्तर शोधणे सोपे जाईल.

अर्धवट वैचारिकता ही सर्वात अधिक हिंसक असते. असहिष्णू आणि म्हणुनच असंयमी आणि उथळ असते. मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दपार केले आहे. पालकांनाच मूल्यव्यवस्थेचे वावडे असल्याने घराघरांतून दिले जाणारे मूल्यशिक्षणही कधीच बाद झाले आहे. आणि त्यातुनच आजचा आपला सांस्कृतिकतेचा महान वारसा सांगणारा, त्याचा अभिमान बाळगणारा असांस्कृतीक समाज घडला आहे. या दुभंगपनातुन बाहेर पडण्यासाठी सर्वांनाच कंबर कसावी लागेल...

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...