Sunday, December 29, 2019

धनगर आणि मी

काय झालं, आम्हाला जळगांव जिल्ह्यात असतांना शाळेत रेव्हरंड टिळकांनी लिहिलेली एक प्रार्थना होती.
"मेंढपाळ हा प्रभु कधी ने हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला"
खरे तर मेंढपाळात प्रभु कसा असतो हे मला पहिली-दुसरीत समजणे शक्य नव्हते. तिसरीत आलो ते पार पुणे जिल्ह्यात आणि आमच्या वरुडे गांवाजवळच शिंगाडवाडी. तेथे धनगरांची वस्ती.
मेंढपाळ दिसला की मला ती प्रार्थना आठवे. धनगर मला प्रभुच वाटायचा. ती कोकरं, मेंढरं आणि त्यांच्यात हरवलेला धनगर पाहुन हरखुन जायला व्हायचं. धनगर हा प्रभु नसतो...ती वर्चस्वतावादी समाजाची एक रम्यात्मक कल्पना आहे हे मला समजायला वेळ लागला. असे असले तरी माझ्या कल्पनेतील धनगर हा सृजनाच्या महोत्सवाचा सर्जक वाटला.
धनगर समाजावर माझे अतोनात प्रेम आहे. मी धनगरांची बाजु लावून धरतो म्हणुन बहुतेक लोक मला धनगरच समजतात आणि चक्क "जातीयवादी"ही म्हणतात. मला त्यांची पर्वा नसते हे तर उघडच आहे. का मी एवढे प्रेम करतो? केवळ यशवंतराव होळकरांसारखे अद्वितीय पुरुष या समाजातुन आले म्हणुन की काय? केवळ धनगरांचा इतिहास हाच मानव जातीचा इतिहास आहे म्हणून की काय? ते खरे तर दुय्यम भाग आहेत. केवळ ते वंचित, शोषित आहेत म्हणुनही माझे त्यांच्यावर प्रेम नाही.
मी सर्वांवर प्रेम करतो पण धनगरांवर जास्त करतो हे वास्तव आहे. हा माझा दुजाभाव आहे असे अनेक मित्र मला म्हणतात पण मला तो दुजाभाव असला तरीही प्रिय आहे. याचे कारण एवढेच आहे की मला मानवतेच्या जेवढ्या खुणा येथे जतन केलेल्या दिसल्या त्या अन्य समाजांत त्या प्रमाणात नाही.
साधेपणा, भोळेपणा आणि केवळ माणुसकीची जाण यापोटी स्वत:चे नुकसान धनगर सहज करुन घेतो. निसर्गाशी आणि खुलेपणाशी त्याची जुळलेली नाळ आजही कायम आहे. या गोष्टी मला आवडलेल्या आहेत. पण त्याच वेळीस मुजोर समाज त्यांना दाबत त्यांच्या नैसर्गिक आशा-आकांक्षाची जेंव्हा गळचेपी करतो तेंव्हा मला संताप येतो.
धनगरांनी आपली मुल्ये कायम ठेवत आधुनिक जगातील विकासाचा केवळ भागीदार नव्हे तर नेतृत्व करावे असे मला वाटते. त्या नेतृत्वाचा त्यांच्याकडे चंद्रगुप्तापासुनचा इतिहास आहे.
आज अंधार आहे हे खरे असले तरी उजाडतच नाही असेही नसते. मग ते पुन्हा नेतृत्व करत मानवतेचा, समतेचा इतिहास पुन्हा रचु शकणार नाहीत असे नाही. आणि ही क्षमता धनगर समाजात आहे यावर माझा विश्वास आहे.
त्यांना कोणाचे उसणे नेतृत्व घेण्याची गरज नाही. फक्त इतिहास आणि क्षमता नव्याने समजावून घेणे गरजेचे आहे. ही सर्जकता नव्याने उफाळून येईल असे मला वाटते खरे.

Prakrit-Pali World Conference

First International Prakrit-Pali World Conference
Being organized by Sarhad.

Objective
Prakrits and Pali are the ancient colloquial and literary languages that were extensively used by Buddhists, Jainists, and Hindus for over a couple of millennium to keep alive the rich tradition of religious and philosophical thought. Rich treasures of the knowledge, poetry, plays, and folklore have been preserved in these languages of the then masses and have helped to enlighten the common people across the country. Some of these languages became official and religious languages in Central Asia, Chinese Turkmenistan, Ceylon, Brahmadesh, Tibet and elsewhere as well. Detailed studies are ongoing on academic levels and religious circles but the importance of these languages is still unknown to the masses in general though the present colloquial languages are direct descendants of them. These languages represent the largest population belonging to the three religions.
The first International Conference is intended to connect intellectuals and laymen with the tradition that once had connected half of the world. However, today these languages and religious and secular literature written in them except for limited academicians and religious masters mostly remain unknown to the people thus depriving them of their own linguistic and literary heritage.
Keeping in view the neglect towards Prakrit-Pali languages, we have decided to organize a three-day International conference in Pune in which we are inviting the scholars in these languages from across the world to cover a variety of the topics of concern and deliberate on the future course of action to revive/preserve these languages. Their relationship with modern languages also needs to have a fresh look. Also, we intend to help people to remove deeply rooted misconceptions about the origin and the flow of these languages in the modern context.
This conference invites not only linguists but also the scholars who have deeply studied the Prakrit and Pali literature, secular or religious, and can provide new insights.
Suggested topics:
Although the participants can submit their papers in their areas of expertise not mentioned here, we desire to cover the following areas those we think important.
1.     The origins of the Prakrits, Pali and their inter-relationship.
2.     Ancient grammars of Prakrits and Pali and their impact on the literature.
3.     Prakrits used by Jain’s in their religious texts.
4.     Impact of north Indian Prakrits and Pali on modern north Indian languages and dialects.
5.     Impact of Jain Maharashtri on modern Marathi language.
6.     Classification of the Prakrit on the Niya Slates found in Chinese Turkmenistan and its significance.
7.     Prakrits in Drama, epics, poetry, epigraphs and numismatics in the period from 6th century BC till 3rd century AD. and their evolution.
8.     Kacchayano’s Pali Grammar and its impact on Pali Buddhist canon.
9.     The development of Prakrits to the modern languages, an evolutionary journey.
10.                         Social life and norm-changes as depicted by Prakrit literature at different times.
11.                         Philosophical thought appearing in Prakrit and Pali religious literature and its social implications.
12.                         Contribution of Jain’s in keeping alive and enriching Prakrit languages through the centuries.
The above stated are the topics at the minimum should be covered in this first-ever conference we have intended. Also, we expect the papers being submitted should provide the new views and dimensions to the subject matter covered in the paper submitted. Repetition of traditionally held views should be avoided. No propagandist paper will be entertained.

Friday, December 27, 2019

शैक्षणिक मानसशास्त्र (२)



एखाद्या मुलाला का शिकावे वाटते आणि एखाद्याला का शिकावे वाटत नाही? एखाद्या विद्यार्थ्याला एका विषयात गती असते तर अन्य विषयांत प्रयत्नपुर्वक का खुरडावे लागते? एखादा विद्यार्थी सर्वच विषयांत प्रवीण का होतो? एखाद्या वर्षातील सर्व-विषय प्राविण्यात सातत्य का राहत नाही? विशिष्ट विद्याशाखा निवडण्यामागे नेमक्या कोणत्या प्रेरणा कार्यरत असतात? आवड, सामाजिक लाट की कौटुंबिक दबाव? प्रतिभासंपन्न (म्हणजे आपल्या ज्ञानविषयात अधिकची भर घालण्याची क्षमता असणारे) नेहमीच अल्प का असतात? यात काही उपजत अथवा श्रद्धाळू समजतात तशा दैवी प्रेरणा कार्यरत असतात काय? 

या सर्व प्रश्नांचा एकत्रीत विचार केला तर असे लक्षात येईल की विद्यार्थ्याचे व्यक्तिगत मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र यांच्या परस्पर प्रभावांतून वरील बाबी जन्माला येतात. मुळात कशासाठी शिकायचे आणि काय शिकायचे याची आपंण अत्यंत ढोबळ मांडणी केलेली असल्याने आपले अभ्यासक्रमही ढोबळ असतात. त्यात बाल, किशोर आणि युवा मानसशास्त्राचा विचार केला गेलेला असतोच असे नाही. एका अर्थाने सामाजिक मानसशास्त्रातुन अभ्यासक्रम जन्माला येत असल्याने ते ढोबळ असणे स्वाभाविक होऊन जाते. व्यक्तिगत मानसशास्त्र मात्र वेगवेगळे कल दाखवत असते. शिक्षणात आस्था असणे आणि नसणे याचा संबंधही थेट मानसशास्त्राशी येऊन पोहोचतो.  एखाद्याला शिक्षणात आस्था नाही याचे कारण अनेकदा दिलेल्या अभ्यासक्रमात आकर्षित करेल असे काहीच नाही असे असण्यात असू शकते. अभासक्रमात/शालेय वातावरणात रस नाही म्हणजे त्याला काहीच शिकण्याची आवड नाही असे असू शकत नाही कारण मुळात शिकणे हीच एक उपजत व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व्यवहारातुनही शिक्षण मिळतच असते. शाळा-महाविद्यालये शिस्तबद्ध शिक्षण देतात एवढेच पण त्यातही शास्त्रशुद्धपणा व मानसशास्त्राचा विचार केला जात नसल्याने शिस्तबद्ध शिक्षण हे मुलांन खुले आकाश देत ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याची संधी देण्यापेक्षा त्याला विचारबंदिस्त करते असे आपल्या लक्षात येइल. 

नैसर्गिक कल असलेल्या विषयात विद्यार्थी चमक दाखवू शकतो पण अन्य विषयही सक्तीचे असल्याने तो त्यात रखडती वाटचाल करतो. एखादा विद्यार्थी सर्व विषयात विशिष्ट काळापर्यंत प्रवीण आहे असे दिसत असले व त्याला हुशारांच्या यादीत टाकले जात असले तरी ते सातत्य टिकून राहतेच असे नाही. शिक्षण प्रेरणा बदलत गेल्या तर असे होतांना आपल्याला अनेकदा दिसते पण समजत नाही. विद्यशाखा निवडत असतांना अनेकदा त्या क्षेत्रातील आपल्या कलापेक्षा किंवा आवडीपेक्षा त्या क्षेत्रात उपलब्ध असणा-या संधी महत्वाचा प्रभाव टाकतात आणि त्या विद्यार्थ्याची अवस्था प्रवाहपतीतासारखी होत जाते. यात सामाजिक मानसशास्त्र व्यक्तीगत मानसशास्त्रावर मात करते. पंण यातुनच विद्यार्थ्याची मानसिकता अस्थिर होत जाते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

ज्ञानप्रेरणा उपजत किंवा दैवी असतात व त्यामुळेच प्रतिभावंत घडतात असा एक सार्वत्रिक समज आहे. प्रतिभावंतांची संख्या कमी दिसत असल्याने हा समज बळावला असणे स्वाभाविक आहे. पण आपण त्यावर पुढील भागात चर्चा करुयात.

(क्रमश:)

Thursday, December 26, 2019

येशुचरित्रातील हरवलेली वर्ष आणि काश्मीर


येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अज्ञात कालखंडाबाबत बिब्लिकल आणि अन्य अकेडमिक संशोधकांत एक प्रकारचे अनावर कुतुहल आहे. त्यातूनच अनेक सिद्धांत जन्माला आलेले आहेत. येशुचा मृत्यू क्रॉसवर झाला की नाही याबाबतही अनेक विवाद उत्पन्न झालेले आहेत. येशुचा मृत्यू क्रॉसवर झाला नसेल तर मग त्यानंतर येशू कोठे गेला याबाबतही वेगवेगळ्या थिय-या मांडल्या गेल्या आहेत. त्यांना कल्पोपकल्पित म्हणून सहज उडवता येणे शक्य असले तरी त्यातील शक्याशक्यतांची तपासणी करणे आवश्यक आहे.

नव्या करारानुसार येशू ख्रिस्ताचा जन्म इसपू सहामद्ध्ये गॅलिलीमध्ये मेरी या कुमारी मातेच्या पोटी झाला. त्याचे पालन-पोषण जोसेफ नामक सुताराच्या घरी झाले. त्याची वय वर्ष बारापर्यंतचीच थोडीफार माहिती मिळते. पण वय वर्ष १२ ते एकोणतीस या काळाबद्दल नवा करार मौन आहे. इतर विद्वानांच्या मते येशु या काळात सुतारकामच करत राहिला. पण त्याचेही पुरावे संदिग्ध आणि ओढून-ताणून लावल्यासारखे वाटतात. उदाहणार्थ, मार्क-. मधील विधान , "हा तो सुतार तर नव्हे ना?" या विधानावरून येशू त्या प्रांतात ओळखला जात असला पाहिजे अन्यथा अशी ओळख दाखवली गेली नसती. पण ही ओळखही संदिग्ध आहे हे उघड आहे. यावरुन येशू त्याच प्रांतात स्थायिक होता हे सिद्ध होत नाही. वयाच्या २९ वर्षानंतरच त्याने धर्मोपदेश करायला सुरुवात केली. त्याआधी त्याने ज्ञानप्राप्तीसाठी कोठे प्रवासच केला नसेल असाही तर्क लावता येत नाही. सुतारकाम हा त्याच्या पित्याचा व्यवसायच होता त्यामुळे त्याचाही सुतार म्हणून उल्लेख होत असणे स्वाभाविक आहे. यामुळे अजुन तर्कांना उधान आले येशुच्या हरवलेल्या वर्षांत नेमके काय झाले हे शोधण्याचे एक स्पर्धाच सुरु झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

चवथ्या-पाचव्या शतकात राजा आर्थरच्या काळातील अर्थुरियन दंतकथांत तरुण वयात येशू इंग्लंडमध्ये येऊन गेला होता आणि तो उत्कृष्ठ बांधकामतज्ञ होता असे आपल्याला पहायला मिळते. येशुची आई विधवा झाल्यानंतर जोसेफने आपल्या येशुला आपल्या पंखांखाली घेतले अशा काही दंतकथा स्चवतात. अर्थात या दंतकथा बायबलमधील कथांशी विसंगत आहेत. त्यामुळे पुढेही अनेक दावे होत राहिले. येशुच्या या हरवलेल्या वर्षांबाबत १२व्या शतकात दावा केला गेला की येशू मृत्युनंतर पवित्र आत्म्याच्या स्वरुपात इंग्लंडमध्ये येऊन गेला होता. पण हे झाले क्रॉसवरील मृत्युनंतर. या दाव्याला त्या काळात जरी अद्भुतरम्यतेच्या मोहात प्रसिद्धी मिळाली असली तरी या दाव्यावर विश्वास मात्र ठेवला गेलेला दिसत नाही.

पण एकोणिसाव्या शतकात रेनेसांनंतर युरोपियन विद्वान बायबलवर अंधविश्वास ठेवता या काळाबद्दल गांभिर्याने विचार करू लागले. कथा-कादंबरीकारांना आपली कल्पनाशक्ती स्वैर सोडता आली. त्यातून मजेशीर तर्क मांडले गेले. १८६९ मध्ये लुइस जेकोलियट या लेखकाने कृष्ण आणि येशुत साम्य पाहिले आणि बायबल हे मुळचे नसून भारतीय पुराणकथांचा तो नवा अवतार आहे असा दावा केला. कृष्णकथा आणि येशुच्या कथेत त्याने अनेक साम्यस्थळे शोधली होती. भारत आणि येशू ख्रिस्ताची सांगड घालायला येथून सुरुवात झाली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

पण सर्वात अधिक गाजला तो १८८७ मधील निकोलस नोटोविच या युद्ध-पत्रकाराचा यांचा दावा. त्याने भारताला भेट दिली होती. काश्मीरमार्गे लडाखला गेल्यानंतर हर्मीस मठात त्याला म्हणे "लाइफ ऑफ सेंट इसा" नामक तिबेटियन भाषेतील एक जुने हस्तलिखित मिळाले. इसा हे येशुचे अरेबिकमध्ये होणारे रुपांतर आहे हे सर्वांना माहितच आहे. नोटोविचने या हस्तलिखिताचा अनुवाद केला आणि १८९४ मध्ये प्रथम फ्रेंचमध्ये प्रसिद्ध केला तर त्याचा अनुवाद भारतीय जैन विद्वान वीरचंद गांधी यांनी प्रदिर्घ प्रस्तावना लिहून "अननोन लाईफ ऑफ जिजस क्राईस्ट" या नावाने प्रसिद्ध झाला. नोटोविचच्या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी तर मिळाली पण हे पुस्तक म्हणजे एक थापांचे पोतडे आहे असे टीकाकार उच्च रवात सिद्ध करण्याचा प्रयत्न करु लागले.

वीरचंद गांधी हे बहुभाषिक आणि जैन धर्मासहित अनेक धर्मतत्वज्ञानाचे विद्वान होते. शिकागो येथे भरलेल्या पहिल्या धर्मसंसदेत त्यांची भाषणे एवढी गाजली की नंतर त्यांना अमेरिकेतच पाचशेहून अधिक व्याख्याने द्यावी लागली. बायबलवर त्यांची हुकुमत होती. बायबलवरीत जैन बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे हे त्यांनी ओळखलेच होते, पण येशुपर्यंत ही धर्मतत्वे कशी पोहोचली या गुढाचे उत्तर त्यांना नोटोविचच्या पुस्तकात सापडले. यातील हस्तलिखिताच्या अनुवादातील माहितीत काही विसंगती अवश्य आहेत. असे असले तरी तो भाग नंतर कोणाची घुलघासड (जे भारतीय प्राचीन साहित्यात नित्यश: होत आलेले आहे.) मानली तरी आरंभीचा भाग अगदीच दुर्लक्षणीय नाही.

यातील माहितीनुसार येशू वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन रिवाजानुसार आपल्या विवाहाच्या चर्चा सुरु होताहेत हे लक्षात आल्यानंतर घरातून सटकला आणि व्यापारी तांड्यासोबत सिंधकडे जायला निघाला. तेंव्हा भारत, विशेषत: काश्मीर हे विविध धर्म-तत्वज्ञानांचे केंद्र होते. त्याने पुढे पंजाब ओलांडून जगन्नाथ पुरीपर्यंत प्रवास केला. जैन बुद्धिस्ट विद्वानांशीही त्याने धर्मचर्चा केल्या. वेदांचा अभ्यास केला. त्याने ब्राह्मण क्षत्रियांवर विषमतायुक्त वागणुकीसाठी प्रहार केले आणि वैश्य आणि शुंद्रांत तो अधिक रमला आणि त्यांना समतेचा उपदेश करु लागला. मुर्तीपुजेलाही त्याने विरोध केला. यामुळे चिडलेल्या ब्राह्मण क्षत्रियांनी येशुची हत्या करायचे ठरवले. येशूला शुद्रांकरवी ही माहिती मिळताच तो नेपाळमध्ये सटकला. तेथे पालीचा अभ्यास केला. बुधाचे तत्वज्ञान समजाऊन घेतले. मग हिमालयीन प्रदेशात (काश्मीर) काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो पुन्हा परतीच्या वाटेला लागुन पर्शियात आला. या सातव्या अध्यायापर्यंत जो भाग येतो त्यात बिब्लिकल विचारांची बीजे दिसतात. नंतरचा भाग तो इझ्राएलमध्ये गेल्यानंतर काय झाले ते त्याचे क्रुसिफ़िकेशन कसे झाले याचा वृत्तांत देतो. या नंतरच्या वृत्तांतामुळे नोटोविचवर लबाडीचा आरोप झाला. याचे कारण असे कि भारतातून येशू निघुन गेल्यानंतरचा वृत्तांत लडाखमध्ये लिहिल्या गेलेल्या हस्तलिखितात येणे शक्य नाही हे सर्वांचेच मत पडले. यात एकच शक्यता होती ती म्हणजे येशुसोबत एखादा भारतीय शिष्य असण्याची ज्याने येशुला क्रॉसवर मारल्यानंतर परत येवून हा समग्र वृत्तांत लिहिला. पण ही एक शक्यता आहे जी अगदीच अविश्वसनीय मानता येत नाही.

वीरचंद गांधींनी त्यांच्या प्रस्तावनेत बायबलमध्ये डोकावणा-या भारतीय तत्वज्ञानाबरोबरच भारतीय उपखंडतच आढळणा-या असंख्य भारतीय वृक्ष, पक्षी, धातूंचे वर्णन आधाराला घेतले आहे. भारत ते इजिप्तपर्यंत सिंधु काळापासुन व्यापार होत होता. असंख्य व्यापारी तांडे या मार्गाने तर जातच पण समुद्र मार्गही वापरला जाई हे एक ऐतिहसिक वास्तव आहे. इझ्राएल आणि भारतात त्यामुळे अर्थातच पुर्वापार व्यापारी संबंध होतेच. एवढेच नव्हे तर बायबलमध्ये नव्या जुन्या करारात बुद्धिस्ट, हिंदू जैन तत्वज्ञानाची छाप दिसून येते. असे असताना, उन्नोन लाइफ ऑफ जिजस क्राईस्ट या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या लडाखी ग्रंथाला अगदीच फेटाळून लावता येणार नाही असे वीरचंद गांधी म्हणतात.

शिवाय जैन आणि बौद्ध हे दोन जगातील आद्य मिशनरी पद्धतीने धर्मप्रचार करणारे धर्म अहेत. मठ ही संकल्पना याह दोन धर्मांनी जन्माला घातली. साध्वी, भिक्षुणी आणि नन या संकल्पनांतही साम्य आहे. यामुळे येशू ख्रिस्त भारतात येऊन गेल्याची निश्चिती होऊ शकते असे वीरचंद गांधी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात.

दुसरी बाब अशी की कॅथॉलिक विद्वानांनी येशुवर अन्य कोणाचाही प्रभाव असण्याची शक्यताच नाकारली असल्याने बायबलमधील बराच मूळ भाग एक तर संपादित केला आहे किंवा वगळला तरी आहे. डेड सी स्क्रोल्स सापडल्यानंतर या शंकेला बळकटी आली. आजचे बायबल पुर्ण नाही या दाव्यांना पुष्टी मिळाली. चर्चने अद्याप त्यांना अधिकृत मान्यता दिली नसली तरी ते लिखित स्वरुपात सापडल्याने विद्वत्जग चर्चच्या मान्यतेची अर्थातच पर्वा करत नाही. डेड सी स्क्रोल्समध्येही १३ ते २९ या गायब वर्षांत येशुने काय केले याचा वृत्तांत मिळत नाही हे विशेष. त्यामुळे येशू या काळात इझ्राएलमध्ये किमान काही वर्ष तरी नव्हता या दाव्याला पुष्टी मिळते.

दुसरे असे की भारतात, विशेषत: काश्मीरमध्ये येऊन ज्ञानार्जन करावे यासाठी चीन, कोरिया, तिबेट ते मध्य आशियातील विद्वान सातत्याने येत राहिले आहेत. चीन तिबेटमध्ये जो वज्रयानी बुद्धिझम गेला तो काश्मीरमध्येच जन्माला आलेला तेथूनच पसरलेला. असंख्य बौद्ध भिक्षू काश्मीरमधुन तिबेट चीनला नुसते गेले नाहीत तर चीनमध्ये मठ स्थापले. रत्नचिंता, कुमारजीव हे ते महत्वाचे भिक्षू. मध्य अशियातही इराणपर्यंतचे विद्वान येथे येऊन गेल्याच्या नोंदी मिळतात. त्यामुळे येशुसारख्या बुद्धीमान तरुणाने ही किर्ती ऐकून भारत काश्मीरला भेट देण्याचा विचार केला नसेल असे म्हणता येणार नाही. येशुच्या बायबलमध्ये झळकणा-या सिद्धांतांची जन्मभुमी भारत हेही नाकारता येत नाही.

नोटोविच यांचे पुस्तक हे त्यांनीच लिहिले आणि लडाखमध्ये सापडलेल्या मुळ हस्तलिखिताचा अनुवाद म्हणून केवळ प्रसिद्धी आणि धनाच्या आशेने खपवले हा त्याच्यावर आरोप केला त्यात अगदी मॅक्समुल्लर सारख्या विद्वानानेही केला होता हे लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण या हस्तलिखितात त्रुटी आहेतच. ते मुळ कोठे लिहिले गेले, कोणत्या भाषेत लिहिले गेले आणि याचा मुळ लेखक कोण हे अज्ञात आहे. ती भारतीय लेखकांची सवयही आहे. आजही असंख्य ग्रंथांच्या मुळ लेखकांची नावे आपल्याला अज्ञात आहेत. शिवाय या अनुवादात येणारे भारतीय समाजजीवन मात्र -यापैकी अस्सल भारतीय आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतात कुशाणांची सत्ता होती, पण त्याचे विवेचन यात येत नाही. हे सुद्धा भारतीय लेखकांची खास सवय. या काळात जैन, बौद्ध आणि सांख्य-अवैदिकही मुर्तीपुजेविरुद्ध होते. इझ्राएलमध्ये तेंव्हा मुर्तीपुजा सर्रास होती. येशू जन्माला ज्यू म्हणून आला आणि त्याचा मृत्युही ज्यू म्हणुनच झाला. हा विरोध तो येथेच शिकला असल्याचीही शयता नाकारता येत नाही. या हस्तलिखितावर बायबलची छाप आहे हे तर उघडच आहे. कदाचित अध्याय नंतरचा भाग इझ्राएलमधेच घडला असल्याने ही समानता आलेली असावी. या हस्तलिखितातील मजकुराचे अनेक अंगांनी चिकित्सापुर्ण अध्ययन होणे आवश्यक आहे. वीरचंद गांधींच्या प्रस्तावनेतील विवेचनाचाही अनेकांगांनी विचार करणे गरजेचे आहे. 

येशुचा मृत्यू क्रॉसवर झाला नाही, तर तो परत काश्मीरमध्ये आला रोझबल येथे त्याची समाधी आहे असे मानणारा एक वर्गही आहे. त्यावर अनेक विद्वानांनी विस्तृत लेखनही केले आहे. काश्मीरच का हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. येशू खरोखर भारतात आला की नाही हा मुद्दा महत्वाचाच आहे पण समजा त्याने भेट दिली नसली तरी काश्मीरशी संबंध जोडण्याचा प्रयत्नही हे सुचवतो की काश्मीरची भुमी विविध विचार स्विकारण्याची त्यांना आपलेसे करण्याची प्रवृती काश्मीरींमध्ये आहे.  यावर सखोल संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

-संजय सोनवणी

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...