Monday, July 27, 2015

राइट टू प्रायव्हसी

अलीकडच्या सर्वच गदारोळात सर्वच नागरिकांच्या दृष्टीने खरे तर अत्यंत महत्वाची आणि मुलभूत मानवी अधिकारांवर गदा आणू शकणारी गंभीर बाब दुर्लक्षित राहिली. ही बाब म्हणजे २२ जुलै रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात "भारतीय घटनेनुसार नागरिकांच्या मुलभूत अधिकारांत प्रायव्हसीचा अधिकार सामाविष्ट नाही." असे ठामपणे म्हटले. यावर महाराष्ट्रात साम टीव्हीचे संपादक संजय आवटे वगळ्ता कोणीही जाहीर चर्चा घडवून आणली नाही. याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात याबद्दल आपण चर्चा केलीच पाहिजे.

आपले खाजगीपण, जोवर स्वत:ची उघड करण्याची इच्छा नाही तोवर,  गोपनीय ठेवण्याचा प्रत्येक व्यक्तिचा अधिकार आहे. सरकार अथवा कोणतीही खाजगी संस्था अथवा व्यक्ति या अधिकारावर घाला घालू शकणार नाहीत असे मानवाधिकार जागतिक जाहिरनाम्यात १९४८ सालीच कलम १२ अन्वये घोषित केले आहे व जगातील सर्वच राष्ट्रांनी यानुसार कायदे करावेत असा आग्रह केला आहे. त्यानुसार अनेक राष्ट्रांत हा कायदा लागू आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ व १९ नुसार भारतिय नागरिकांना गोपनियता जपण्याचे स्वातंत्र्य आहे असे आजवर मान्य केले गेले असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २७ पैकी फक्त २ खटल्यांत (१९५४ व १९६३ सालच्या) भारतियांना घटनेने असा काही अधिकार दिला नाही असे निकालांत नमूद केले आहे.

हे प्रतिज्ञापत्र आधार कार्डाच्या माध्यमातून व्यक्तींची गोपनियता सरकार व आधारसाठी ज्या खाजगी संस्थांनी (बायोमेट्रिकसह) जी माहिती गोळा केली आहे, तिच्या संरक्षणावर व संभाव्य गैरवापराबाबत प्रश्न उभे करत जी याचिका दाखल झाली होती त्या संदर्भात दाखल केले गेले होते हेही येथे लक्षणीय आहे. आधार कार्डासाठी जी माहिती (विशेषत: बायोमेट्रिक) गोळा केली जाते ती व्यक्तिच्या गोपनियतेच्या अधिकाराचा भंग करते व ते अघटनात्मक आहे असा दावाही याचिकेत केला गेला आहे.

मुळात प्रश्न असा आहे कि खरेच आपल्याला आपली खाजगी माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार घटना देते कि नाही? घटनेचे कलम २१ म्हणते कि प्रत्येक नागरिकाला जिविताची आणी व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी सरकार देत आहे. कोणत्याही व्यक्तिचे कायद्याने घातलेल्या मर्यादांव्यतिरिक्त जीवित अथवा स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. थोडक्यात कोणाच्याही व्यक्तिगत स्वातंत्र्यावर शासन अथवा अन्यांना घाला घालता येणार नाही असाच याचा अर्थ होतो. यातच खरे तर व्यक्तिच्या आपले खाजगीपण जपण्याचाही अधिकार गृहित धरला गेला आहे. त्यामुळे २७ पैकी २५ खटल्यांत झाजगीपण जपणे हा मुलभूत अधिकार मान्य केला गेला आहे. अर्थात घटनेतील हे कलम काही प्रमाणात अस्पष्टही आहे हे उघड आहे कारण यात खाजगीपणाची व काय खाजगी राहू शकते याची व्याख्या नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात जशी काळाची गरज बदलत जाईल तशी या कलमात सुधारणा होऊ शकते असे म्हटले होते.

गेल्या २०-बावीस वर्षात नवीन तंत्रज्ञानामुळे कोणाचीही माहिती गोपनिय राहणे अशक्य होऊ लागल्याने गोपनियतेच्या अधिकाराची चर्चा सुरू होणे स्वाभाविक होते व सुस्पष्ट व्याख्येचीही गरज होती. आधार कार्ड योजना कोंग्रेस सरकारने जेंव्हा सुरु केली तेंव्हा आधारसाठी जमा होणा-या माहितीला कसलेही संरक्षण नव्हते. खाजगी कंपन्या तसेच व्यक्तिगत संगणकावरील डाटाही चोरीला जाऊ लागण्याच्या असंख्य घटना घडत राहिल्या आहेत. एवढेच नव्हे तर आधुनिक साधने वापरत व्यक्ति/संस्थावर होणारी खाजगी गुप्तहेरांकरवीची हेरगिरी, फोन ट्यपिंग, फोनची बिले, तत्संबंधी ध्वनी व संदेशांचाही डाटाही गैरमार्गाने मिळवणे, व्यक्ती-संस्थांना अनाहुतपणे एलेक्ट्रोनिक माध्यमांतुन पाठवला जाणारा पत्रव्यवहार/जाहिराती, व्यक्तीचा मेडिकल इतिहास, लैंगिक आवडी, आर्थिक स्थिती ईत्यादि बाबीही गोपनिय ठेवता येणे अवघड बनत चालले. त्यामुळे अशा सर्वच बाबींसाठी व्यक्तिला आपले खाजगीपण जपण्याचा मुलबःउत अधिकार देणे आवश्यक असल्याचे सरकारला पटू लागले. यातुनच २०११ साली "राईट टू प्रायव्हसी" विधेयक आणण्याचा घाट घातला गेला. नागरिकांनी व माध्यमांनी यावर फारशी चर्चाच न केल्याने या विधेयकासाठी दबावगटही निर्माण करता आला नाही. तरीही या बिलावर संसदेत बरीच चर्चा झाली, अनेक बदल केलेही गेले पण हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

२०१३ साली हे विधेयक पुन्हा नव्याने प्रस्तावित केले गेले. त्यात आधार कार्ड अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी दिली असलेली बायोमेट्रिक माहितीही राईट टू प्रायव्हसीत सामील करण्यात आली. पण तेंव्हाही हे विधेयक संमत झाले नाही. २०१४ साली नवे सरकार आल्यावर या विधेयकाच्या मसुद्यात अजून काही बदल केले गेले. काही बाबी नव्याने घुसवल्या गेल्या तर काही वगळल्या गेल्या. यात व्यक्तिगत संवेदनशील माहितीला आधी असलेले संरक्षण डायल्युट केले गेले. आधारसाठी घेतली जाणारी माहितीलाही संरक्षण दिले गेले नाही. एवढेच नव्हे तर २०११ च्या विधेयकात पत्रकारांनी पत्रकारितेच्याच हेतुने (पण खाजगी बाबींना स्पर्ष न करता) प्रसिद्धीसाठी जमा केलेली माहिती या कायद्यात अपवाद केली गेली होती, जी २०१४ च्या विधेयकातून बाद करण्यात आली आहे. याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा भंग म्हटले जाऊ शकते.
   
आता सर्वोच्च न्यायालयात भारतियांना खाजगीपण जपण्याचा मुलभूत अधिकार नाही असे केंद्र का म्हणते हे लक्षात येईल. घटनेची व्याख्या संदिग्ध आणि काही बाबी तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अवतरल्याने मुळचे कलम प्रायव्हसीच्या अधिकारासाठी पुरेसे नसणे स्वाभाविक आहे. त्यासाठीच राईट टू प्रायव्हसी बिल आणण्याचे घाटले. या बिलाचे (२०१३ च्या मसुद्याचे) महत्व खालील कारणांनी प्रत्येक नागरिकाला महत्वाचे आहे.

१) आधार कार्डामुळे व्यक्तिचे खाजगीपण सर्वार्थाने संपुष्टात येऊ शकते व तिचा वापर राजकीय/धार्मिक/सांस्कृतिक दमनासाठी करु शकते.
२) कंपन्यांची गोपनिय माहिती इलेक्ट्रोनिक माध्यमांतून जी अधून मधून ह्यक होत असते, अथवा डाटा प्रोसेस करणा-यांकडून परस्पर विकली वा नष्ट केली जाऊ शकते, याला कायद्याचे पुरेसे संरक्षण नाही.
३) विवाह/घटस्फोट/लैंगिक निवडी/शारिरीक व्याधींचा व आर्थिक इतिहास/राजकीय-धार्मिक मते/ खाजगी पत्रव्यवहार याचा शासन अथवा खाजगी संस्था / व्यक्ति दुरुपयोग करु शकतात.
४) सरकार ही संस्था आधारसाठी जमा केलेला डाटा प्रोसेस करणार असल्याने त्या डाट्याचा उपयोग ज्यासाठी जमा केला गेला आहे तो न करता नागरिकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आणण्यासाठी करू शकते.

हे झाले थोडक्यात. खाजगीपणाचा व्यक्तिगत अधिकारास अपवाद आहेतच. ते खालील अपवादत्मक परिस्थितीतच सरकारला वापरता यावेत यासाठी २०११ च्या विधेयकात तरतुदी आहेत त्यातील काही अशा:

१) राष्ट्राच्या सार्वभौमतेला सुरक्षेला, शास्त्रीय, आर्थिक व अन्य संवेदनशिल माहितीला धोका पोहोचण्याची साधार शंका असेल तर,
२) एखादा संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी,
३) सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असेल अथवा एखाद्या गुन्ह्याच्या तपासात आवश्यक असेल तर सक्षम् अधिका-याच्या अनुमतीने ई.

हे अपवाद केले गेले असले तरी या अपवादांचीही नीटस व्याख्या २०१४ चेही विधेयक करत नसल्याने घटनात्मक कलम २१ मधील तरतुदीबद्दल जी संभ्रमावस्था होती ती कायमच राहण्याचा धोका आहेच. सध्या मिडिया जी स्टिंग ओपरेशन्स करतात त्याबाबत व्यक्तिच्या गोपनियतेच्या अधिकाराचा भंग होत असला तरी त्याबाबत या संभाव्य कायद्यातही सुस्पष्टता नाही.

आताचे सरकार ज्या विचारधारेने चालत आहे ती पाहता आधार तसेच अन्य माध्यमांतुन व्यक्तिच्या गोपनियतेच्या अधिकाराचा भंग होण्याची, गैरवापर होत दमनशाही आणता येण्याची शक्यता आहे हे अमान्य करता येणार नाही. ही भिती ठळक होण्याचे कारण म्हणजे केंद्रानेच प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे भारतियांना आपली व्यक्तिगत माहिती खाजगी ठेवण्याचे मुलभूत अधिकार नाहीत असे म्हटले आहे. म्हणजेच हे राइट टू प्रायव्हसी बिलही (२०१४) हे सरकारही पास करण्याची शक्यता धुसर दिसते आहे. खरे तर व्यक्तिस्वातंत्र्यात अर्थातच त्याची गोपनियता ठेवण्याचे स्वातंत्र्य अभिप्रेत आहेच. पण हे सरकारला मान्य असल्याचे दिसत नाही. आधार कार्डामुळे आपली सर्वच माहिती शासनाच्या व ज्या खाजगी संस्थांनी ती जमा केली आहे त्यांच्या मर्जीनुसार वापरली जाऊ शकते. ही माहिती (युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांकामुळे) कोणालाही मागे घेता येणार नाही त्यामुळे व्यक्तिवरील नियंत्रण आपसूक यंत्रणांच्या हातात जाऊ शकते. शिवाय ही माहिती ज्या सर्व्हर्सवर स्टोअर करुन ठेवली आहे ते सर्व्हर विदेशांत असल्याने अन्य कोणतेही सरकारसुद्धा तो डाटा बेकायदेशिरपणे वापरू शकते. या आणि त्याशी निगडित भित्या अनेक आहेत. त्यामुळे प्रायव्हसीचा अधिक काटेकोर कायद्यातून आपल्याला अधिकार व संरक्षण मिळवावे लागेल. अन्यथा आपण आपले स्वातंत्र्यच् गमावून बसण्याचा धोका आहे आणि त्याची आपल्याला सर्वात अधिक काळजी असायला हवी.
 

Sunday, July 26, 2015

दासी नामयाची!



मोलाने काम करायला जी स्त्री अथवा मुलगी ठेवली जाते तिला मोलकरीण असे म्हटले जाते. म्हणजे तिचे श्रम खरेदी केले जातात. आजकाल मोलकरणी घरकामासाठी असतात व एक मोलकरीण अनेक घरांचे घरकाम सांभाळते तशी स्थिती पुर्वी नव्हती. स्त्रीयांनाच नव्हे तर पुरुषांनाही घरकाम ते शेतकाम करण्यासाठी ठेवले जाई. त्यांना घरगडी असे म्हटले जाई. शेतात कामासाठी सालावरही माणसे घ्यायची प्रथा होती (आज ती अत्यंत तुरळक झाली आहे.). त्या गड्याला सालगडी म्हटले जाई. अर्थात पुरुष आणि स्त्रीयांच्या कामाची विभागणी वेगळी असे. मोलाने काम करणा-या स्त्रीया वीणकाम, शिवणकाम इत्यादि कामांबरोबरच घरकामेही करीत असत. मुळात मोलाने कामाला स्त्री अथवा पुरुष घेण्याची प्रथा कशी सुरु झाली याचा इतिहास अत्यंत रंजक असला तरी वेदनादायक आहे. संत जनाबाई ज्या काळात, म्हणजे तेराव्ह्या शतकात, जन्माला आल्या त्या काळातील ही संस्था पाहण्यापुर्वी आपण अजुन दुरच्या इतिहासात या व्यवस्थेची पाळेमुळे शोधण्यासाठी जायला हवे.

गडी ते मोलकरीण या व्यवस्थेची पाळेमुळे गुलाम प्रथेत जातात. ४०-५० हजार वर्षांपुर्वी माणूस जेंव्हा पृथ्वीवर अन्न व शिकारीच्या शोधात टोळ्या करुन भटकत असे त्या काळात अन्य टोळ्यांशी त्याचा संघर्ष होणे स्वाभाविक होते. टोळ्यांमद्ध्ये युद्धेही होत. युद्धात हरलेल्या टोळीतील पुरुषांना मारुन टाकत स्त्रीयांना मात्र गुलाम केले जाई. याचे कारण पुरुष गुलामांना सर्वकाळ बंधकतेत ठेवणे अशक्य असे. स्त्रीया मात्र टोळीची जनसंख्या वाढवण्यात हातभार लावू शकत. अशा गुलाम स्त्रीयांची संतती ही टोळीचाच भाग व मालमत्ता असल्याने त्यात प्रत्यवाय नसे. माणूस प्रगती करत नंतर पशुपालक मानव बनला. आता त्याचा अन्य टोळ्यांशीचा संघर्ष हा चराऊ कुरणांसाठी होऊ लागला. याही काळात गुलामी प्रथा चालुच होती.

शेतीचा शोध माणसाला इसपू १२००० वर्षांपुर्वी लागला असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील ठिकाण एवढे जुने आहे. प्रत्यक्षात याहीपुर्वी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीने मानवी जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवला. पहिला बदल म्हणजे आजवर भुमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा जो विषयच नव्हता तो आला. प्रत्येकाने आपल्याला सोयीची व उपजावू जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातुनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. स्त्रीवरीलही व्यक्तिगत अधिकार एका व्यक्तिच्याच वारसाचा प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झाला. त्या अधिकाराला वैधता देणारी संस्था म्हणजे विवाह संस्था.

शेतीच्या शोधाने माणूस स्थिर झाला म्हणून त्याची युद्धायमानताही संपली नाही. नद्या, जलाशये इत्यादिकाठच्या सुपीक जमीनींसाठीचे संघर्ष सुरुच राहिले. शेतीसाठी आरंभकाळात मानवी श्रमाची नितांत आवश्यकता असल्याने गुलामांचीही गरज पडॆ. ते मिळवण्यासाठीही दूरदुरवर आक्रमणे होत. युद्धात जिंकलेल्या, आता नुसत्या स्त्रीयाच नव्हेत तर पुरुषांनाही पकडून आणले जाऊ लागले. पुरुष व स्त्री गुलामांचे जीवन अर्थातच अत्यंत दयनीय व कष्टप्रद असे. ही अत्यंत अमानवी प्रथा होती. आधुनिक काळापर्यंत ती अमेरिका व अन्य देशांत सुरुच राहिली.

गुलामांची खरेदी-विक्री जवळपास जगभर खुलेआम सुरु असे. ती वैध होती. किंबहुना अर्थव्यवस्थेचा ती आधार होती. राजे लोक त्यावर कर वसूल करत. भारतातही ही प्रथा होतीच. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात याबाबत विस्तृत वर्णन आहे. त्या काळात चार प्रकारचे गुलाम असत. घरातल्या गुलामापासून जन्मलेले, वारसाहक्काने मिळालेले, खरेदी केलेले अथवा जिंकून आणलेले असे ते प्रकार होत. काही लोक कर्ज चुकवण्यासाठीही स्वत:हून गुलाम होत अथवा आपले गुलाम अथवा मुले गुलाम म्हणून देत. त्रैवर्णिकांना (म्हणजे वैदिक ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्यांना) मात्र गुलाम करता येत नसे. युद्धात जिंकलेल्या या त्रैवर्णिकांना मात्र दंड भरला नाही तरच गुलाम करण्याची परवानगी असे. गुलामांची खरेदी विशिष्ट कालावधीसाठीही असे. अशा गुलामांना गहाण पडलेले गुलाम म्हणत. अशा गहाण गुलामांचा तो कालावधी संपला कि मुक्त होत असत. मोबदला देऊनही गुलामीतुन मुक्तता मिळविता येत असे. मोबदला देऊनही गुलामीतुन मुक्त केले नाही तर असे कृत्य करणा-या मालकास गुलामास जोवर मुक्त केले जात नाही तोवर कैदेत टाकण्याची प्रथा होती. गुलामांची पुनर्विक्री अथवा गहाणवट गुलामाच्या मर्जीनुसार करु नये असेही कौटिल्य म्हणतो. गुलामाची व्यक्तिगत संपत्ती (जी अर्थातच नगण्य असे) ती त्याच्या वारसांना/नातलगांना देण्यात यावी, पण असे कोणी नसले तरच ती मालकाला ठेवता येई.

अर्थात हे झाले कायदे. प्रत्यक्षातील जीवन कसे असेल याची आपण कल्पना करु शकतो. गुलामी प्रथेमुळे मोलावर कामाला घेणे ही प्रथा अस्तित्वात असली तरी कमी होती. नागरी जीवनामुळे सुस्थितील लोकांना आपल्या घरातील कामांसाठी स्त्रीयांची गरज पडे. त्या मोलाने काम करत. घरगडी अथवा सालगड्याची प्रथाही जुनीच आहे. असे असले तरी स्त्रीयांची खरेदी-विक्री मात्र पेशवेकालापर्यंत चालू असलेली दिसते. दुष्काळ/दारिद्र्य यामुळे अनेक स्त्रीयां-मुलांना कुटुंबियच विकत असत. जगण्याचा संघर्षच एवढा तीव्र असे.

मध्य्युगात, म्हणजे संत जनाबाईच्या काळात, यादवांचे स्थिर राज्य जवळपास तिनशे वर्ष लाभल्यामुळे सांस्कृतिक जीवनाला बहर आला होता. या काळातील गुलामपद्धतीची वर्णने मिळत नाहीत. त्यामुळे गुलाम पद्धती असली तरी ती अल्प प्रमाणात असावी. संत साहित्यात "दास" हा शब्द येतो. तसेच अनेक शिलालेखांत वा दानपट्ट्यांत दान देणा-यांच्या नांवात नमीदास, चमीदास अशी दासांत नांवे येतात. दास म्हणजे आर्यांनी हरवलेल्या दास-दस्यू जमातींचे लोक असा एक सर्वसाधारण समज आहे, त्यामुळे यावरही चर्चा करणे येथे गरजेचे आहे.

दास हा शब्द प्रथम ऋग्वेदात येतो. ऋग्वेद हा आक्रमक अथवा स्थलांतरित वैदिक आर्य टोळ्यांनी भारतात आल्यावर येथील दास-दस्यु जमातींना हरवल्यानंतर लिहिला असा सार्वत्रिक समज आहे. पण ते वास्तव नाही. दास/दस्यु लोक भारतातील नव्हेत. हा समाज मुळचा इराण-अफगाणिस्तानमधील. दास हे समाजनाम ावमानकारक नव्हते. खुद्द ऋग्वेद ज्या राजांच्या काळात रचला गेला त्यांच्याच नांवात "सुदास" (चांगला दास), "त्रसदस्यु" (इतरांना त्रस्त करणारा दस्यु) अशी नांवे येतात. दास हा समाज खूप मोठा होता. पारशी धर्माचा प्रेषित झरथुस्ट्र हा स्वत: दास समाजातील होता. त्याला अत्यंत आदराने "दख्युमा" असे म्हतले जाई. दख्युमा म्हणजे दस्युंमधील श्रेष्ठ. संस्कृतातील स हा पर्शियन भाषेत ह अथवा ख असा उच्चारला जातो. दास समाजाला "दाहवे" असे अवेस्त्यातील नांव आहे. ऋग्वेदाची रचना भारतात नव्हे तर दक्षीण अफगाणिस्तानातील हरस्वैती (संस्कृत- सरस्वती) नदीच्या खो-यात झाली. दास हा शब्द सन्मानकारक असला तरी दास समाजाशी (म्हणजेच पारशी धर्माशी) संघर्ष असल्याने पुढे दास हा शब्द वैदिक लोकांनी अवमानकारक बनवला. तरीही दासांचे प्रसंगी सहाय्यही ते घेत असत असे ऋग्वेदावरुनच दिसते. आणि ते स्वाभाविकही आहे. अनेक दासांनी ऋग्वेदिक मंत्ररचनाकारांना दानेही दिलेली दिसतात.

हा समाज इराण/अफगाणिस्तानातीलच असल्याचे मुख्य पुरावे म्हणजे अजुनही कही विभागांची व शहरांची नावे दास शब्दापासुनच बनलेली आहेत. उदाहरणार्थ दाह ई घुल्मन (दाह=दास) ही साईट सिस्टान या अफगाणिस्तानातील प्रांतात आहे. या स्थानावर पारशी अग्नीमंदिरे सापडलेली आहेत. दाहरदेह (दास-देश) असणारी एक जमात अजुनही याच प्रभागात राहते असे. अशी अनेक उदाहरणे मिळतात. गोव्यातील विद्या प्रबोधिनीचे प्रपाठक प्रमोद पाठक यांनी ही साम्यस्थळे दाखवून स्पष्ट शब्दांत नोंदवले आहे कि दास हे भारताचे कधीच रहिवासी नव्हते हे आर्य आक्रमण/विस्थापन सिद्धांतक कधीच लक्षात घेत नाहीत.

म्हणजेच दास म्हणजे गुलाम हा अर्थ नव्हता. वैदिक धर्मियांचे त्यांच्याशी शत्रुत्व असल्याने त्यांनी दास हा शब्द अवमानकारक बनवला. भारतात दास (अथवा दस्यु) हे समाजाचे नांव कधीच नव्हते. पुढे पारशी धर्मच्या प्रभावामुळे वैदिक धर्माला अफगाणिस्तानात आहोटी लागल्यानंतर या धर्माचे काही लोक विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली  भारतात येऊल सदानीरा नदीच्या परिसरात येत स्थायिक झाले. तेथुन त्यांनी वैदिक धर्माचा प्रचार सुरु केला. इराणमधील आणलेल्या संज्ञा त्यांनी काही अपरिचित जमातींना वापरल्या. विशेष्त: अरण्यात राहणा-या लोकांना ते दस्यु म्हणत. हे नांव त्यांनी दिलेले, येथील नव्हे.

पुढे दास हा शब्द अध्यात्मिक क्षेत्रात घुसला. त्यामुळे अनेक नांवे दासांत बनली. या दास भावात परमेश्वराचा सेवक अथवा राजाचा / धन्याचा सेवक अशीही अर्थछटा घुसली. म्हणजे दास हे समाज नाम न बनता व्यक्तीनाम बनले. दास म्हणजे गुलाम नव्हे. दास म्हणजे सेवक. दासी हे संबोधन सेविकांना अर्थातच चिकटले. पण त्यात अवमानभाव सहसा नव्हता. दासी म्हणजे सेविका, गुलाम नव्हे हा भाव सर्वमान्य होता.

जनाबाई कोण होती यावर येथे आता थोडक्यात चर्चा करु. जनाबाई ही गंगाखेड (जि. परभणी) येथील दमा-कुरुंड या दांपत्याची कन्या. दमा हा पंढरीचा वारकरी होता. त्यांना आरंभी अपत्य नव्हते त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी पांडुरंगाला साकडे घातले. पांडुरंगाने स्वप्नात दमास दर्शन देऊन सांगितले कि "तुला कन्या होईल, पण ती पाच वर्षाची होताच तिला तू पंढरीत राहणा-या दामाजी शिंप्याच्या स्वाधीन कर." पांडुरंगाच्या आशिर्वादाने तिचा जन्म झाला. ती पाच वर्षांची झाल्यानंतर देवाच्या आदेशाप्रमाणे तिला दामाजीच्या घरी पोहोचवले. तेथेच ती नामदेवांच्या संगतीत लहानाची मोठी झाली.

या आख्याईकेबरोबरच अजून एक आख्याईका आहे कि पंढरपुरला गेले असता जनीचे आई-वडील एकाएकी मरण पावले. जनाबाई अनाथ झाली. मंदिरात गेलेल्या दामाजीशेठ यांना ती दिसली. दया येऊन त्यांनी तिला आपल्या घरी नेले.

या दोन्ही आख्याईका असल्या व त्यातील सत्यासत्यता तपासण्याचे कोणतेही साधन आपल्या हाती नसले तरी महत्वाचा भाग असा कि जनाबाई दामाजीपंतांची आश्रीत होती, दासी अथवा मोलकरीण नव्हे. नामदेवाघरी तिला जे काम पडे ते सर्वसामान्य कोणत्याही गृहस्त्रीला करावे लागे तेच. त्या काळी स्त्रीयांची सामाजिक स्थिती, मग ती विवाहित असली तरी, काबाडकष्टांचे असे. दळण दळणे, पाणी भरणे, शेण्या थापणे ते स्वयंपाक करणे अशी अनेक प्रकारची कामे करावी लागत. जनाबाईलाही ही कामे करावी लागत असल्यास नवल नाही. पण जनाबाईचा पिंड हा मनस्वी. विठुरायाच्या भक्तीभावाने ती ओथंबलेली महान संतकवी. हा भक्तीभाव तिच्यात स्वाभाविकपणे संत नामदेवांमुळे आला. नामदेवांनी तिला समकालीन ज्ञानेश्वर ते चोखा मेळ्यासारख्या संतांच्या मांदियाळीत आणले. तिला सर्वच संतांनी सन्मान दिला. स्त्रीयांना हीन लेखणा-या काळात जनाबाईला मुखरित करण्याची, संतपरिचय घडवण्याचीच नव्हे तर जनाबाईला अढळ संतपद देण्याची कामगिरी नामदेवच करु जानोत. भारतीय इतिहासातील ही लोकविलक्षण घटना आहे.

स्वभाव कवयित्रीचा आणि प्रत्यक्ष ऐहिक काम निरस काबाडकष्टाचे या द्वंद्वातून जनाबाई जात होती. याची वेदना जनाबाईच्या अभंगातुन जाणवते. पण तिने यावर विलक्षण तोडगा काढला. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ असे म्हणत जनाबाई येथेच थांबत नाही तर तिच्या कामांत प्रत्यक्ष विठुरायाही तिला मदत करतो असा तिचा भाव आहे. कांदा-मुळ भाजी...अवघी विठाई माझी असे सावता माळी म्हणतात तसा प्रत्यक्ष कामात जनाबाईला पांडुरंग दिसतो...तो तिला मदत करतो. दळू लागतो...तिची वेणी-फणी करतो. हा पांडुरंगाशी जनाबाईचा एकात्मभाव दर्शवतो.

जनाबाई आपल्या अभंगांत स्वत:ला अनेकदा दासी म्हणवून घेते. त्यामुळे ती खरेच ऐहिकार्थाने दासी होती असा अर्थ काही लोक करतात. पण ते खरे नाही. दासी ही सेविका असते आणि ती मोबदल्यात काम करते. अनाथ जनाबाई दासी नव्हती तर ती दामाजीपंतांची आश्रीत होती असेच आख्याईका दर्शवतात. आश्रीताचे पालन-पोषण करणे, स्वत:च्या कुटुंबापैकी मानणे हे सत्कार्य दामाजीपंतांनी केले. नामदेवांठायी असलेला तिचा भाव पाहता आणि नामदेवांनी तिला दिलेली महत्ता ही एक स्नेहल भगिनी आणि आपल्याच पावलांवर पाऊल ठेवत चाललेली शिष्या या अर्थानेच आहे हे तिच्या अभंगांवरुनही दिसते. "म्हणे नामयाची जनी" यात आध्यात्मिक पातळीवर नामदेवांचा विराट मनुष्यतावाद आणि जनीचा तेवढाच उत्कट प्रतिसाद याचा पडसाद दिसतो. दासी हा शब्द येथे आध्यात्मिक अर्थाने येतो. पांडुरंगशरणता...नामाशरणता या दासीभावात आहे. ऐहिक अर्थाने जनाबाई दासी होती असा नाही. दासी असल्याने तिला कष्ट सोसावे लागले हे दामाजीपंत आणि खुद्द नामदेवांवर अन्याय करणारे आहे. ती दामाजीशेटी-नामदेवांच्या परिवारातील अविभाज्ज्य हिस्सा होती हेच काय ते खरे आहे.

नामदेव पुढे उत्तरेत गेले. राष्ट्रव्यापी कार्य हाती घेतले, तेंव्हा जनाबाई काय करत होती? ती त्यांच्याच घरी राहत होती कि ती वेगळी रहायला गेली? तिच्या अभंगांवरुन असे दिसते कि बहुदा या कळात ती स्वतंत्र वेगळी राहत होती. पांडुरंग मंदिरासमोर ती झोपडी बांधुन रहात असावी. या काळात ती विपन्नावस्थेत असावी. जनाबाईने लग्न केले नाही, पण तिच्व्ह्या मनातील वात्सल्यभाव मात्र जागा होता. श्रीविठ्ठलच तिचा पुत्र! ती मातेच्या महन्मंगल वात्सल्याने विठुरायाला म्हणते ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’!

"पक्षी जाय दिगंतरा..." हे जनाबाईचे अत्युत्कृष्ठ भावकाव्यच म्हणावे लागेल. जनाबाईच्या अंत:करणातील मातृभावना यात ओथंबुन भरलेली दिसते. नामदेव दिगंतात विलीन होताच जनाबाईचा आत्मपक्षीही दिगंतरात उडून गेला....

कधीही परत न येण्यासाठी!

-संजय सोनवणी

(मा. सचीन परब संपादित "रिंगण" या आषाढी विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख)

Friday, July 17, 2015

मी हिंदू आहे!

मी हिंदू आहे. हिंदू असल्याचा जेवढा अभिमान असायला हवा तेवढा मी बाळगतोच. किंबहुना हिंदू धर्मात घुसखोरी करत विषमतेची वैदिक अहंता जे बाळगतात आणि स्वत:ला हिंदू समजतात त्यांचा विरोध करतो. मी कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. अनेक लोक विरोधाला द्वेष समजतात त्यांची कीव वाटते. शिक्षणाचे भारतियीकरण कि वैदिकीकरण हा प्रश्न मी उपस्थित केल्यावर माधव भंडारींसारख्या खंद्या लढवैय्याला केवढे सारवासारव करावी लागली याचे राकेश शिर्के, राजा कांदलकर आणि राकेश पाटील साक्षीदार आहेत. मला छुपे अजेंडावाले आवडत नाहीत. तुम्ही जे आहात ते खरे रुप दाखवा. मला मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध जास्त आवडतात कारण ते जे आहेत त्याशी जाहिर प्रतारणा करत नाहीत. घरात वैदिक बाहेर हिंदू, वर्तनात वैदिक...म्हणायला हिंदू असले उपद्व्याप या देशातील त्रैवर्णिक वैदिक करत आले आहेत.
कोणीतरी काल प्रतिक्रियेत म्हणाले कि मी वेदांचा द्वेष करतो. म्हणजेच ब्राह्मणांचाही द्वेष करतो. वेद ही फक्त ब्राह्मणांची मालमत्ता नव्हती तर क्षत्रियांचीही होती. वेदांतील नासदीय, भूमी सुक्तांसारखी अनेक सुक्ते मला प्रिय आहेत. ऋग्वैदिक ऋषींच्या भावनिक, श्रधाळू आणि कुतुहलशील सुक्तांबद्दल मला नितांत्य आदर आहे. माझा त्या धर्मातील वर्ण संकल्पनेने निर्माण केलेल्या मानवी विषमतेला विरोध होता आणि आहे. हिंदुंमद्ध्ये (वैदिक स्वत:ला हिंदु समजु लागल्यापासुन) ही वर्णीक उतरंड त्यांच्यातही घुसली आणि विषमतेचे त्यांच्यात नसलेले तत्व तेही पाळू लागले. ते पाळू नये एवढ्यापुरताच वैदिक धर्माशी विरोध आहे.
खूप ब्राह्मण आणि क्षत्रीयही (कलियुगी क्षत्रीय नाहीत असे वैदिकच म्हणतात, पण खूप लोक स्वत:ला क्षत्रीय म्हणवुन घेतात आणी गर्वाने मिरवतात) आजही या वैदिक विकारांनी ग्रस्त आहेत. याच वेळीस खूप लोक असे आहेत कि त्यांनी वैदिक धर्माने दिलेली मक्तेदारी नाकारत समतेचा उद्घोष केला आहे. अशा लोकांना मी वैदिक समजत नाही. धर्म हा नुसता ज्यात तुम्ही जन्माला आलो याने ठरत नसून जे धर्माचे तत्वज्ञान पाळता अथवा नाकारता यावरुन ठरतो. आम्ही ६०% ख्रिस्ती आजच आचरणाने बनलो आहोत. ते बनण्यासाठी धर्म बदलावा लागलेला नाही. आमचा पेहराव ते जीवनपद्धती व विचारसरणी ख्रिस्ती बनलेली आहे, अगदी मुस्लिमांचीही. पण ते स्विकारायचे साहस कोणात दिसणार नाही. संस्कृती व धर्म हा नेहमीच सबलांचा असतो, दुबळ्यांचा नव्हे. आणि सबलता तुमच्याकडे किती शस्त्रे आहेत व तुमची विध्वंसकता केवढी केवळ यावर ठरत नसून आर्थिक आणि मानवी प्रेरणांना प्रोत्साहन देणारे तुमच्या धर्मात काय आहे यावरुन ठरते. तुमच्या धर्मातच मुळात माणसाला माणुस समजायचे तत्व नसेल आणि कळत-नकळत इतरांवर तेच तत्व लादत आले असाल आणी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लादायचा प्रयत्न करत असाल तर तो धर्म स्विकारार्ह असणार नाही. त्याचे सहास्तित्वही ते हिंदु म्हणवुन घेत असल्याने मान्य होणार नाही.
आज सर्व विद्रोही हिंदु धर्माला शिव्या-शाप देत असतील तर नेमक्या कोनामुळे याचा विचार करणे माझ्यासारख्या सामान्य हिंदुला भाग आहे. ज्या धर्माचा एवढा तिरस्कार केला जातो तो जर जे हिंदुच नाहीत पण हिंदु म्हणवतात त्यांच्यामुळे तर मनाला वेदना होणे अपरिहार्य आहे. स्वत:चे वैदिकत्व दूर सारत जे हिंदू होतील व आहेत त्यांच्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. पण वैदिकांनी आपली स्वधार्मिकता जपत हिंदुंच्या कळपात येत शास्ते होण्याच्या प्रयत्नांना विरोध होता व आहे.
विरोध म्हणजे द्वेष नव्हे हे काही मुढांना सांगितलेच पाहिजे. त्यांच्या लबाड्या आम्हाला समजतच नाहीत या भ्रमातही कोणी राहु नये. वैदिक वेगळे आणि हिंदू वेगळे हे धार्मिक तथ्य आहे. हिंदुंचा धर्मग्रंथ कोणता असाही प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे. धर्मग्रंथ असणे हा जर निकश असेल तर वैदिक, बौद्ध आणि जैनांचाही एकमेव असा धर्मग्रंथ नाही. पण ते धर्म आहेत. त्यांचे स्वत:चे विविधतापुर्ण तत्वज्ञान नि कर्मकांड आहे. अगदी.बायबल नि कुराणही, पहायला गेलो तर, धर्मग्रंथ नाहीत तर प्रसंगी विरोधाभासात्मक असलेल्या विचार व तत्वज्ञानांचे संग्रहण आहे. कोणत्याही धर्माला एकवाक्यता देणारा धर्मग्रंथ मुळात अस्तित्वात नाही. असते तर त्या-त्या धर्मांत एवढे विरोधाभास दिसले नसते. फाटे फुटत पंथोपपंथ निर्माण झाले नसते.
मी हिंदु आहे. मी वैदिक नाही. माझ्याप्रमाणेच किमान हिंदू धर्मात असलेले ८५% लोक वैदिक नाहीत. उरलेल्या वैदिकांनी आपली स्वतंत्र धार्मिक मांडणी वेळोवेळी केलेलीच आहे. त्यात हिंदुंना गोवण्याचे व आपले वर्चस्व दाखवण्याचे कारण नाही. मी या बाबतीत स्पष्ट आहे. माझ्या धर्माला माझ्या धर्मातील चुकांबद्दल बोलायचा, टीका करायचा अधिकार आहे. माझ्या धर्मात जे नाहित तेही टिका अवश्य करु शकतात, त्यामुळे वैचारिक दृष्ट्या माझा धर्म पुढे जाईल. पण जे हिंदु नसुनही हिंदुंचा कैवार घेण्याचे नाटक करत आपली वैदिकता जपतील त्यांना तीव्र विरोध सारेच हिंदू करत राहतील.
मला धर्मात फुट पाडत असल्याच्या आरोपांनाही सामोरे जावे लागते. फुट होती आणि आहे तर मी काय बिचारा फुट पाडणार? मी फक्त धर्मेतिहासाचे वास्तव मांडत आलो आहे. त्याला काही भयभीत लोक "फुट" म्हणत असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. आहे ते वास्तव सांगण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझ्या धर्माचे अनिवार नुकसान ज्यांनी केले त्यांबद्दल मला खेद अवश्य आहे. भविष्यातील पिढ्या स्वत:चे हिंदुपण, वैदिकवर्चस्व झुगारुन, जपतील अशी आशा मात्र मला नक्कीच आहे. वैदिकांनी त्यांचा धर्म, वेदादि धार्मिक साहित्य अवश्य जपावे, त्यातील ज्ञान-विज्ञन जगाला अवश्य सांगत रहावे....
फक्त स्वत:ला हिंदू म्हणवत हिंदुंचा बुद्धीभेद करु नये एवढेच!

Thursday, July 16, 2015

परंपरांचा अभिमान...

परंपरांचा अभिमान बाळगत असतांना आपण किती परंपरा कालौघात सोडून दिल्या आहेत हेही पहावे लागते. तरुणांना स्वातंत्र्य देणारा वसंतोत्सव आपण सोडला. वैदिकांचा इंद्रमह म्हणून एक उत्सव असे...तो दोन हजार वर्षांपुर्वीच सोडला. स्वयंवराची संकल्पना सोडली. कौमुदीमहोत्सव एके काळी खूप लोकप्रिय होता, पण तो आता स्मृतीशेष झाला आहे. जैन-बौद्धांचेही असे अनेक उत्सव असत, उदा स्तूपमह, गिरीमह. तेही आज राहिलेले नाहीत. नदीमह हा नद्यांतील स्नानासाठी यात्रा करण्याचा उत्सव होता. बहुदा तो कुंभमेळ्याच्या स्वरुपात आज अवशिष्ट असू शकतो. अर्थात त्यात विशिष्ट नद्यांतील स्नान अभिप्रेत नव्हते. पण ती परंपरा खंडित झाली आहे.

थोडक्यात आपण अनेक परंपरा कालौघात सोडून दिलेल्या आहेत. ज्या संकल्पना काळाशी सुसंगत राहत नाहीत त्या सोडून देणे व नवीन कालसुसंगत परंपरा निर्माण करणे हे कोणत्याही सुबुद्ध समाजाचे लक्षण असते. पण आम्ही कर्मठ झालो आहोत. सतीप्रथेसारखी निघृण परंपरा नष्ट करायला इंग्रजांनाच कायदे करावे लागले तेंव्हा कोठे ती परंपरा सुटली. कर्मठ समाज कधीही अक्षय्य प्रगती करत नाहीत. आज आम्ही परंपरांनाही मुळचा उदात्त हेतु कायम ठेवत कालसुसंगत करण्याचा प्रयत्न न करता उलट त्यंना विकृत करत चाललो आहोत. हे धर्म व संस्कृतीच्या अभिमान्याचे लक्षण नव्हे. यातून समाज पुढे जाणे सोडा, आहे तिथेच ठप्प होईल

आणि ठप्प झालेले समाज कोणतीही ऐहिक अथवा पारमार्थिक प्रगती करु शकत नाहीत.

तर मग हे कुंभमेळे कशासाठी?



भारतीय परंपरेत सामुहिक स्नानांनाही धार्मिक/सांस्कृतिक महत्व आहे हे आपल्याला सिंधू संस्कृतीत सापडलेल्या सार्वजनिक अवाढव्य स्नानगृहांवरुन दिसते. तेथे खाजगी घरांतील स्नानगृहे घराघरातही सापडलेली आहेत. घरात स्नानगृहे असतांनाही सार्वजनिक स्नानगृहेही असावीत याचा अर्थ त्यांचा संबंध धार्मिक कृत्यांशी असावा असे अनुमान करता येवू शकते.  सिंधुपुजनाचा उत्सवही त्या प्रदेशातील नदीबाबतच्या कृतज्ञतेशी जोडता येतो. ब्रह्मपुत्रेचीही अशीच पुजा करण्याची पद्धत आहे. नद्यांचा आणि मानवी संस्कृतीचा निकटचा संबंध असल्याने कृतज्ञतेपोटी नदीतील स्थान आणि तिची पुजा याला महत्व आले असल्यास नवल नाही.

कुंभ मेळाही नद्यांशीच संबंधीत असल्याने त्याचा येथे थोडक्यात विचार करुयात. कुंभ मेळा धार्मिक उत्सव असल्याचे जुने पुरावे मिळत नाहीत. रामायण-महाभारत या उत्सवाचा उल्लेख करत नाहीत. ह्यु-एन-त्संग याने सातव्या शतकात झालेल्या नाशिक येथील कुंभ मेळ्याचे वर्णन करुन ठेवले आहे. पुराणांतरी येणारी कुंभमेळा माहात्म्ये ही गुप्तकाळानंतरची आहेत. अमृतमंथनानंतर झालेल्या अमृतकुंभाच्या मालकीवरुन झालेल्या देवासूर युद्धात विष्णुने मोहिनीरुप घेऊन कुंभ पळवला तेंव्हा त्यातुन चार थेंब चार ठिकाणी नद्यांत पडले म्हणून त्या नद्या व स्थळे अतिपवित्र मानली जातात. त्या नद्या म्हणजे नाशिकची गोदावरी, प्रयाग येथील त्रिवेणी संगम, उज्जैनी येथील क्षिप्रा आणी हरिद्वार येथील गंगा. या प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा दर तीन वर्षांनी क्रमाने भरतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणाची पाळी दर बारा वर्षांनी येते. यातही अर्धकुंभमेळा, महाकुंभमेळा व पुर्ण कुंभमेळा हे फरक आहेतच. महाकुंभमेळा दर १४४ वर्षांनंतर येतो तर दर बारा वर्षांनी येणारा पुर्ण कुंभमेळा फक्त प्रयाग येथेच भरतो.

कुंभमेळ्याचा संबंध ग्रह-सुर्य व राशींशी निगडित आहे. उदाहरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा सुर्य आणि गुरु सिंह राशीत असतील तेंव्हा भरतो. ही खगोलीय घटना आहे व ती नियमित येते. पण मुळात भारतियांना राशी ग्रीकांकडून मिळाल्या असे मानले जात असल्याने कुंभ मेळ्याची सुरुवात भारतियांचा संबंध ग्रीकांशी आल्यानंतर झाली असण्याची शक्यता आहे. किंवा पुरातन नदीमाहात्म्याला ग्रह-राशींशी जोडत त्याची उदात्तता वाढवली गेली असल्याचीही शक्यता आहे. असे असले तरी कुंभमेळ्याची परंपरा फार पुरातन नाही.

कुंभमेळ्यात देशभरातुन नागा साधुंसह विविध पंथोपपंथांचे साधु-साध्व्या, योगी येत असल्याने याचे धार्मिक महत्व वाढले आहे हे सहज लक्षात येईल. अन्य कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात एवढ्या संख्येने साधु-साध्व्या येत नाहीत. त्यामुळेच कुंभमेळ्याला दर्शन पर्वणी असेही मानले जाते. हा कोणत्या धर्म परंपरेचा भाग असे शोधले तर पदरी निराशाच येते. कुंभमेळ्याची सुरुवात वैष्णव परंपरेतुन सुरु झाली असावी असे अमृतमंथनाच्ग्या पुराकथेतुन दिसत असले तरी कुंभमेळ्यात शैव व वैष्नव आखाडेही बरोबरीने सहभाग घेतात असे दिसते. यात शैव आखाड्यांची संख्या अधिक आहे. नाशिकबाबत म्हणायचे झाले तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वर येथे तर वैष्णव आखाडे रामकुंडाला महत्व देतात व स्वतंत्र धार्मिक परंपरांचे भान दाखवुन देतात. एका अर्थाने हा उत्सव धार्मिक नसून सांस्कृतिक आहे हे उघड आहे. असो.

पण नाशिक येथेच २००३ मद्ध्ये झालेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ लोक ठार झाले होते हा मागचाच अनुभव आहे. मेळ्यात सरासरी आठ ते दहा कोटी लोक हजेरी लावतात असे अंदाज आहेत. जगातील हा असा एकमेव उत्सव आहे असेही मानले जाते. येथे कोणत्याही मुर्तीचे दर्शन हे धेय नसून साधुंचे दर्शन व नदीत स्नान हेच उपचार आहेत व पंथोपपंथांच्या पद्धतीने ते होतात. धार्मिक आखाड्यांतील मानपान हा मुद्दा कुंभमेळ्यांतही शिरलेला आहेच. आजच एका साध्वीचे लैंगिक शोषण एका साधुने केल्याच्या बातम्या आहेत. सरकारने या उत्सवाला हजारो कोटींची मदत केल्याने सरकारही बुद्धीवाद्यांच्या टीकेचे शिकार झालेले आहे. त्याहीपेक्षा वाईट बाब म्हणजे कुंभमेळा हा मुळच्या नदीपावित्र्याच्या कल्पनेपासून पार भरकटला आहे.

भारतियांनाना नद्यांचे, जलाशयांचे पावित्र्र्य खरेच होते. अन्यथा असे पुजनोत्सव/स्नानोत्सव सुरु झाले नसते. परंतू आम्हीच जलाशये/नद्या यांचे केवळ विनयभंगच नव्हे तर त्यांच्यावर एवढे पाशवी बलात्कार केले आहेत कि ते शरमुन, भयभीत होऊन संकोचले आहेत. साधुंचे म्हणावे तर त्यांच्यातिल मुळच्या आध्यात्मिक प्रेरणा नुसत्या आटलेल्याच दिसून येत नाहीत तर त्यातील अनेक पळपुटे अथवा समाजातुनच हाकलले गेलेले गांजेकस असल्याचे आपल्याला दिसून येईल. नागा साधुंबद्दल बोलावे तर ज्यांनी संसाराशी नातेच तोडले आहे अशांना अमुकच नदी पवित्र बाकीच्या नाहीत असे वाटावे यातच त्यांचा तात्विक फोलपणा दिसुन येतो. आखाड्यांचे म्हणावे तर ते एवढे मुजोर आणि राजकारणातही हस्तक्षेप करणारे आहेत कि खंदे राजकारणीही त्यांना शरण जातात. यापासून कोणत्याही पक्षाचा नेता अपवाद नाही हेही एक विशेष. शंकराचार्यांच्या निवडीतही आखाड्यांचा मुजोर अधिकार गाजवला जातो. त्यांची गुंडगिरीही सर्वशृत असली तरी एक उदाहरण देतो. १९९८ साली कुंभमेळ्यात जुना आखाडा आणि निरंजनी आखाड्याने दंगल केली आणि ज्योतिर्मठाचे शंकराचार्य पदाचे दावेदार मध्वाश्रमांना मारहाणही केली होती. कारण सरळ होते, मध्वाश्रमांना शंकराच्गार्य पद मिळु नये. अशी अनेक उदाहरणे आहेत. कुंभमेळा म्हणजे आपला स्वामित्वहक्क आहे असे या आखाड्यांना वाटते.

त्यामुळे मुळात धार्मिक संदर्भ नसलेल्या कुंभमेळ्याला धार्मिक संदर्भ दिले गेले आहेत. खरे तर हा लोकसंस्कृतीचा उत्सव. त्याला पुराणकथा जोडल्या गेल्या असल्या व जनसामान्यांना जितेंद्रिय साधु-महात्म्यांचेही दर्शन या निमित्ताने व्हावे हा निर्मळ उद्देश्य असला तरी जेथे साधुत्वच संपलेले आहे आणि नद्यांचे पावित्र्यही हरपवले गेले आहे ....

तर मग हे कुंभमेळे कशासाठी?

का शासनाने त्यासाठी हजारो कोटी खर्च करावेत?

आणि महत्वाचे म्हणजे....का लोकांनी तरी आपली खोटी दांभिकता दाखवण्यासाठी तिकडे फिरकावे?

संस्कृती सांगते कि नद्या आणि जलाशय जपा. त्यांचे पावित्र्य राखा. त्यात घाण करु नका. धर्मही तेथेच आहे.

पण या अधार्मिकांना धर्म कोणी सांगायचा?

Tuesday, July 14, 2015

भारतीय संस्कृतीचा इतिहास

भारताचा विविध उत्खननांतून मिळणारा पुराइतिहास हा किमान ८० हजार वर्ष जुना आहे. तत्कालीन दगडी हत्यारे, दगडी हत्यारे-तासण्या-टोचण्या यातून या शिकारी मानवाची आपल्याला ओळख होते. पुढची ३०-४० हजार वर्ष ही याच मानवाच्या हत्यार कौशल्यातील उत्क्रांतीचीही नोंद ठेवतो. महाराष्ट्रात तर अशा हत्यार/दगडी वस्तू बनवायचे कारखानेही सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकांच्या विपूलतेमुळे हे होणे स्वाभाविक आहे. गारगोट्यांपासून ते हाडांपासूनही बनवली गेलेली हत्यारे आहेत. भारतातील पुरापर्यावरणही कसे बदलत गेले याचे पुरावे उत्खननांतून समोर आलेले आहेत. उदा. महाराष्ट्रात तीस-चाळीस हजार वर्षांपुर्वी पानथळ जमीनी मोठ्या प्रमाणात होत्या. जंगली हत्ती, गेंडा, पाणघोड्यांसारखे प्राणी तर शहामृगासारखे पक्षीही येथे विपूल प्रमाणात असल्याचे पुरावे मिळतात. वीस हजार वर्षांपुर्वी मात्र कोरडे वायुमान सुरु झाले. हिमखंड वितळू लागल्यने सागराची पातळी वढायलअ सुरुवात झाली. या हवामान बदलांमुळे मानवी जगण्याच्या पद्धतींतही बदल होत गेला.

जेथून कलेची अभिव्यक्ती सुरु झाली तेथून मानवी संस्क्रुतीचा प्रकट उद्गार सुरु झाला असे मानले जाते. सरासरी ३५ हजार ते १०००० वर्षांपुर्वीपासूनची भीमबेटका येथे मिळणा-या गुंफाचित्रे या भारतीय अभिव्यक्तीची उदाहरणे आहेत. अशाच प्रकारची गुंफाचित्रे विदर्भातही मिळून येतात. तत्कालीन मानवाच्या जगण्याची पद्धत, नृत्य-कला, शिकारी ईत्यादि बाबी त्या चित्रांतून स्पष्ट होतात. 

सरासरी दहा हजार वर्षांपुर्वीपासून भारतीयांना शेतीचा शोध लागला असे मानले जाते. मेहरगढ येथे ९००० वर्षांपुर्वीच्या शेतीचा शोध लागला आहे. अर्थात हा भाग तुलनेने कोरडा व कमी लोकवस्तीचा असल्याने हा पुरावा समोर आला असला तरी शेतीच्या शोध याहीपुर्वीचा असणार हे उघड आहे. अधिक लोकवस्तीच्या प्रदेशांत बव्हंशी जमीनी पुनर्लागवडी होत आल्या असल्याने पुरातन पुरावे मिळणे जवळपास अशक्य असेच आहे. जगभरातही शेतीचा शोध याच काळात लागला. झार्गोस परवताच्या परिसरात १२ हजार वर्ष जुने शेतीचे स्थळ सापडले आहे. 

शेतीच्या शोधाने शिकारी-पशुपालक माणूस अधिक स्थिर झाला. त्याच्या जगण्याची पद्धत बदलली. शेतीसाठी आवश्यक अशी अवजारे व खाद्य पीकांचे-फळे व भाज्यांचे  "मानसाळवणे" सुरु झाले. संकर करुन नव्या प्रजाती बनवायची कला भारतीयांनी दहा हजार वर्षांपुर्वीच वापरात आणली. सिंधू संस्कृतीचा नागर संस्कृतीचा काळ सनपुर्व ३२०० मद्ध्ये सुरु होत असला तरी पुर्व-सिंधू संस्कृती ही छोटी खेडी करुन फुलत होती याचे पुरावे मिळालेले आहेत. हे लोक अन्यत्रहून कोठून आलेले नव्हते तर जे लोक ज्या-त्या परिसरात शिकार व पशुपालन करुन हजारो वर्ष जगत आले होते त्यांनीच कृषीप्रधान जीवनाचा अंगिकार करत नवीन संस्कृती फुलवली असे प्रसिद्ध पुरात्तत्ववेत्ते जोनाथन मार्क केनोयेर म्हणतात आणि ते संयुक्तिकही आहे. सिंधू व गंगेच्या खो-यांत गाळाच्या जमीनी असल्याने शेतीने तिथे जशी मुळे रुजवली तशीच ती ब्यारतात अन्यत्र, म्हणजे ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कावेरी...कृष्णा अशा अगणित नद्यांच्या खो-यांत रुजवली. 

या काळात भारतातील जलवयुमान (इसपू ६००० ते इसपू १८००) पावसाळी होते. अनुकूल पावसामुळे शेतीची भरभराट झाली. तिबार पीके घेण्याइतपत मजल गाठली गेली. नद्यांवर बांध घालत कालव्यांनी पाणी दुरवर शेतीसाठी वाहून नेण्याचे तंत्र भारतीयांनी शोधले. जलव्यवस्थापनात त्यांनी केवढे झेप घेतली होती हे ढोलावीरा येथील अवाढव्य अवशेषांवरून समजते. 

सुबत्तेबरोबरच अन्य गरजा वाढतात. त्या गरजा उपलब्ध सामग्री वापरत नवीन शोध लावत भागवल्या जातात. कलादिंच्या आविष्कारांना वाव मिळतो. सिंधू संस्कृतीचा जागतिक व्यापार इसपू ७००० मद्ध्येच सुरु झाला असे केनोयेर प्रत्यक्ष पुराव्यांनी दाखवून देतात. अफ़गाणिस्तान, इराण, तुर्कस्थान, इजिप्त ते अरबी देशांशी भारताचा व्यापार एवढा पुरातन आहे. त्यात अन्नधान्यापासून ते विविध अलंकार, तांबे, सागवानी लाकडॆ यांची निर्यात समुद्रमार्गे व खुष्कीच्या मार्गाने होत असे. इजिप्तमद्ध्ये भारतीय व्यापा-यांनी वसाहती बनवल्याचे पुरावे आढळून आले आहेत. भारताला तेंव्हा मेलुहा म्हटले जायचे हे तेथील लेखांवरुन स्पष्ट झाले आहे. भारतातील अंतर्गत व्यापारही सर्व प्रदेशांत होत असे. उदाहरणार्थ बराच कच्चामाल (उदा. खनिजे) विंध्याद्रीच्या प्रदेशापासून ते आंध्रातून आणली जात. आंध्र प्रदेशातील मृद्भांडी बनवण्याची पद्धत, महाराष्ट्रातील दायमाबाद येथे सापडलेली अग्नी हवा तेंव्हा उपलब्ध असावा म्हणून तेवत ठेवायची पद्धत आणि सिंधू खो-यातील पद्धत यात साम्य दिसून येते ते यामुळेच. थोडक्यात देशांतर्गत दळण-वळण व व्यापारही मोठ्या प्रमाणावर चालु होता.

सांस्कृतिक जीवन

सिंधू संस्कृती (ज्याला आपण भारतीय म्हणुयात कारण जरी आधी अवशेष सिंधु खो-यात सापडले असले तरी आता ते सर्वत्र मिळाले आहेत व अजुनही उत्खनने सुरु आहेत.) ही कृषी व व्यापारप्रधान संस्कृती होती. ती इसपू २६०० पर्यंत कळसाला पोहोचली. या काळात जलवायुमान उत्तम होते. गंगेच्या खो-यात पाऊस त्या काळात खुपच जास्त असल्याने अरण्ये व पानथळ जागा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे मानवी वस्ती असली व तिच्यात व सिंधु खो-यातील लोकांत सांस्कृतिक व ऐहिक व्यवहार होत असले तरी तेथील वाढीवर मर्यादा होती. परंतू या काळातील देशव्यापी धर्मश्रद्धा या शिव-शक्ती प्रधान व मुर्तीपुजक होत्या याचे मात्र सर्वत्रच मुबलक पुरावे मिळाले आहेत. सिंधु खो-यात इसपू २६०० मधील शिवलिंग तर सापडले आहेच पण त्रिमुखी योगध्यानात बसलेल्या आदिशिवमुद्राही सापडलेल्या आहेत. दायमाबाद येथे इसफु २४०० मधील गारगोटीपासून बनवलेले शिवलिंग सापडले असून अनेक मातृदेवतांच्या प्रतिमा आढळुय्न आलेल्या आहेत असे प्रसिद्ध पुरातत्ववेत्ते दिलीप चक्रवर्ती सांगतात. वृषभाच्या मुद्रा सिंधू संस्कृतीत विपुल तर सापडलेल्या आहेतच पण बंगाल, आंध्र व महाराष्ट्रातील विविध उत्खननांतही लिंग, मतृदेवता आणि वृषभ प्रतिमा मिळालेल्या आहेत. शिव-शक्ती आणि बैलाचे भारतीय संस्कृतीतील महत्व व पुज्यभाव आजही टिकून आहे हे तर स्पष्टच आहे. म्हणजे आजही आपण त्याच संस्कृतीच्या विकसीत धारेचे प्रवासी आहोत.

य संदर्भात डा. रा. ना. दांडेकर म्हणतात कि आदिशिवाचा धर्म आर्यपुर्व काळात भारतात सर्वव्यापी होता. वैदिक धर्मामुळे या धर्माची तात्पुरत्या स्वरुपाची पिछेहाट झाली असली तरी वैदिक धर्म जनमानसाची पकड घेऊ शकला नाही. उलट वैदिकांनाच आपल्या देवता त्यागत अनार्यांच्या देवता स्विकारावे लागले.

बी. बी. लाल यांनी गंगेच्या खो-यात जाखेरा येथे केलेल्या उत्खनांतून तेथील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. गंगेच्या खो-यातील लोक इसपू २००० च्या काळात शेती, पशुपालन व हस्तोद्योगांच्या आधारे जगत असत. ते मासेमारीही करत. येथे सापडलेल्या भांड्यांत पितळ्या, लोटा, माठ व वाट्याही अगदी आपल्याकडे आताआतापर्यंत जशा वापरल्या जात तशाच होत्या. येथे काच व पितळाच्या बांगड्या तर सापडल्याच पण भाजक्या भांड्यांवरील कोरीव आकृत्यांवरून त्यांना त्रिकोण, वर्तुळ याचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते. करकटकासारखी भौमितीक अवजारे, ओळंबे इत्यादि अवजारेही सापडली आहेत. 

त्या काळात (सनपुर्व ३१०० नंतर) सिंधु खो-यात अनेक शहरे व्यापार-उदीमामुळे बनली असली तरी बव्हंशी लोक खेड्यांतच राहत असत. स्त्री-पुरुषांना वैविध्यपुर्ण अलंकारांचे वेड होते असे म्हटले तरी चालेल. अजही गुजराथ, राजस्थन, सिंध प्रांतातील ग्रामीण लोक जवळपास तसेच अलंकार-बांगड्या वापरतांना दिसतात. खेड्यांचे महत्व भारतात आताआतापर्यंत होतेच. 

इसपु १८०० च्या आसपास मात्र जागतिक हवामान बदलायला सुरुवात झाली. सुदूर पश्चिमेतील मेसोपोटेमिया ते चीनपर्यंतच्या संस्कृत्या व जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम झाला. पर्जन्यमान कमी होत गेले. त्यामुळे अर्थव्यवस्थाही गडगडल्या. भारतीय संस्कृतीचा विदेश व्यापार यामुळे ठप्प तर झालाच पीकांवरही त्याचा विपरित परिणाम झाला. नद्याही आक्रसल्या. गंगेच्या खो-यातील पाऊसही कमी झाला असला तरी तो पुर्वीच्या तुलनेत उत्तम म्हणता येईल असा होता म्हणून संस्कृतीचे केंद्र गंगेच्या खो-याकडे सरकले. याच काळात भारताने स्वतंत्रपणे काचेचा शोध लावला हे आता सर्व पुरातत्त्ववेत्ते मान्य करतात. 

वैदिक संस्कृती

ऋग्वेदाचा काळ हा कोणीही जागतिक विद्वान इसपू १५०० च्या पुर्वी नेत नाही. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा सनपुर्व ७००० पासून उत्कर्ष होत ती जलवायुमानातील बदलाने गडगडली त्या काळात वैदिक धर्माचा आरंभ नुकताच झाला होता. वैदिक धर्म हा आक्रमक आर्यांचा असे मानायची प्रथा होती. पण पुरातत्वीय अवशेषांवरुन हा सिद्धांत कधीच बाद झाला आहे. ऋग्वेद रचला गेला तो आताच्या अफगाणिस्तानातील हरहवती (सरस्वती) नदीच्या काठावर. तो इसपू १००० च्या आसपास भारतात आला तो धर्मप्रचारकांच्या माध्यमातून. शतपथ ब्राह्मणातील विदेघ माथवाची पुराकथा ही प्रचारकांचा प्रवास दाखवते. या काळात उत्तर भारतात संस्कृतीचे केंद्र गंगेचे खोरे बनलेले होते. पुढील वैदिक वाड्मय कुरुक्षेत्राच्या परिसरात लिहिले गेले व तेथुन प्रचारकार्य सुरु झाले. त्या वेळीस भारतात योग, श्रमण, संन्यास अशा अवैदिक तात्विक संस्कृत्या पुरेपुर रुजलेल्या होत्या व तत्वज्ञानातही मोठे कार्य होत होते. शैवप्रधान धर्म हाच याही काळात प्रबळ होता. दक्षीणेत तर वैदिक धर्माला खूप उशीरा, म्हणजे इसपु दुस-०या शतकाच्या आसपास प्रवेश मिळाला असे वि. का. राजवाडे सांगतात.

वैदिक संस्क्टृतीचे स्तोम कितीही आज वाढले असले तरी वास्तवे खूप वेगळी आहेत. उदाहरणार्थ भारतात इसपू सातव्या शतकापासूनची चिन्हांकित नाणी मिळतात. प्रत्येक नाण्यावर प्रत्येक जानपदाचे स्वतंत्र चिन्ह आहे. यात कोठेही वैदिक चिन्ह येत नाही. इसपु तिस-या शतकापासुनचे अगणित शिलालेख उपलब्ध आहेत. त्यातील सर्वत्र भाषा प्राकृत तर चिन्हे पुन्हा शैव, बुद्धिस्ट, जैन अथवा परकीय सत्ताधा-यांच्या देवतांची आहेत. गणराज्ये अथवा जानपद हे उल्लेख ऋग्वेदात कोठेही येत नाहीत. पौराणिक वाड्मयात  राजांनी खूप यज्ञ केले असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात यज्ञ केल्याचे फक्त दोन शिलालेखीय उल्लेख आहेत. त्यातील एक पुष्यमित्र शृंगाचा आहे तर दुसरा सातवाहनांचा. हे उल्लेखही प्राकृत भाषेत केले गेले आहेत हेही विशेष. एकाही नाण्यावर अथवा शिलालेखांत वैदिक अथवा संस्कृत भाषा येत नही याचा अर्थ एवढाच कि वैदिक संस्कृती ही अत्यंत मर्यादित होती, व आजही मर्यादित आहे. 

त्यामुळे वैदिक धर्मियांपासून भारतीय संस्कृतीचा इतिहास सुरु होतो हे मत निखालस खोटे आहे. गुप्तकाळात (इ.स. चवथे शतक) वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला व तेथुनच नवनिर्मित संस्कृत भाषेत वैदिकांचा बोलबाला सुरु झाला. त्यापुर्वी वैदिक धर्माच्या प्रबळ अस्तित्वाचे पुरावे इसपु १००० ते तिसरे शतक केवळ आणि केवळ मगध प्रांतातील आहेत. अन्यत्रचे नव्हेत. या धर्माला विरोध करणारे शाक्यमुनी भगवान बौद्ध व महावीरही याच प्रांताशी संलग्न होते हे येथे लक्षत घ्यायला पाहिजे. अन्यत्र हा धर्म विशेष नव्हताच त्यामुळे अन्यत्र विरोधाचा सुरही उमटायचे कारण नव्हते.

म्हणजे वैदिक धर्म हा आयात झालेला. येथीलच मुळच्या अनेकांने धर्मांतर केले यातुन हा धर्म पसरला असला तरी पुजाप्रधान शैव धर्माला हा धर्म कधीच आव्हान देवू शकला नाही. उलट पश्चिमेपासुन पुर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत शिव आणी देवी संस्कृतीने मात्र पुरातन काळापासून ते आजतागायत आपले गारुड कायम ठेवलेले दिसते. 

भारत हा एवढ्या भाषांचा, प्रादेशिक संस्कृत्यांचा देश असुनही त्यात नेहमीच भावनिक ऐक्य राहिले याचे कारण देशभर विखुरलेली ज्योतिर्लिंगे आणि शक्तीपीठे याचे भान असायला हवे. सिंधू काळापासून चालत आलेला हा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. डा. रा. ना. दांडॆकर म्हणतात त्याप्रमाणे वैदिक दैवते कोणीही कधीही पुजत नव्हते. पण आदिम शिव-शक्तीपुजा मात्र आजही कायम आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती ही पुरातन काळापासुनच शैव होती व आजही शैवच आहे. वैदिक धर्म व संस्कृती या मातीत रुजली नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा विचार करतांना वैदिक धर्म व संस्कृतीला चवथ्या-पाचव्या स्थानावर ठेवावे लागते. ते का यावर आपण स्वतंण्त्रपणे विचार करुयात!

Thursday, July 9, 2015

अर्थव्यवस्थांची पडझड ...

अतिरेकी गृहवित्तपुरवठा केल्याने २००८ साली जागतिक महासत्ता मानल्या गेलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची धुळधान उडाली होती. ग्रीसची वाताहत अशाच अनुत्पादक कर्जांमुळे लागली. आत महासत्तेचा दावेदार असलेल्य चीनलाही अशाच भांडवलबाजारात गुंतवणुकीसाठी दिल्या गेलेल्या अनुत्पादक कर्जांच्या ओझ्यामुळे झटका बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे दावे केले जात असले तरी भारतातही बुडीत कर्जांचे प्रमाण चिंता करावे एवढ्या गतीने वाढत आहे. भारतातील १४ राष्ट्रीयीकृत ब्यंकांचेच बुडीत व संभाव्य बुडीत कर्जाचे आकडे पाच लाख कोटी रुपयांना ओलांडून बसलेत. आज अर्थमंत्री भारताची अर्थव्यवस्था स्थिर व भक्कम आहे असे सांगत असले तरी हे दावे तपासून पहायला हवेत.

भारतीय ब्यंकांवरील या बुडीत कर्जांचे ओझे वाढत असल्याने अर्थातच त्यांना नवीन कर्जे देता येणे कठी जातेय हे उघड आहे. जवळपास आठ लाख कोटी रुपयांच्या ३०० प्रस्तावित प्रकल्पांचा अर्थपुरवठा ब्यंकांनी स्थगित केला आहे. मध्यम व छोट्या प्रकल्पांची काय स्थिती असेल हे आपण सहज समजू शकतो. जी कर्जे बुडीत आहेत ते उद्योग बंद अथवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने ते उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादने व रोजगार यात वाढ करण्याची क्षमता गमावून बसलेले आहेत हे उघड आहे. कर्ज बुडाले आहे याचा अर्थ त्या उद्योगाचे उत्पादनही ठप्प अथवा मंदावले आहे असाच अर्थ होतो.

या ठप्प पडलेल्या उद्योगांनी कर्जे थकवल्याने अथवा बुडवल्याने ब्यंका नवीन प्रकल्पांस कर्ज देवू शकणार नाहीएत. त्यासाठी आवश्यक असणारे भांडवलच जर कमी झाले असेल तर नवीन प्रकल्पच उभे राहणार नाहीत. शिवाय हे नवीन प्रकल्प तरी यशस्वी होऊन प्रामाणिकपणे कर्जे फेडतीलच याची खात्री काय अशी भिती ब्यंकांनाही वाटणारच? बरे, नवीन प्रकल्प झालेच नाही तर राष्ट्रीय उत्पादन आणि रोजगारही वाढणार नाही हेही उघड आहे. हे झाले नाही तर नवी क्रयशक्ती वाढत नाही आणि त्या अभावात सध्याच्या उत्पादनांचीही बाजारपेठ संकुचित होत जाणार आणि अर्थव्यवस्थेला दुहेरी पेच पडू लागतो. आणि नेमके हेच भारतात होत आहे.

म्हणजेच आपणही मोठ्या आर्थिक पेचप्रसंगाकडॆ वाटचाल करत आहोत. गेल्या तीन वर्षांपासून भारतात मंदीचे वातावरण असून दिवसेंदिवस सामान्यांचीही परिस्थिती अवघड होत आहे. रोजगार निर्मिती कमी झाली असून कोणतेही उत्पादन क्षेत्र भरीव वाढ तर सोडाच उणे पातळ्यांवर जावू लागले आहे. घरे वाहने ते पायाभुत उद्योगांची ही स्थिती आहे.

म्हणजे आहे ते उद्योग आजारपणाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची नवी रोजगार क्षमता मंदावली आहे. बुडीत/थकित कर्जांमुळे नवे प्रकल्प भांडवल सहाय्याच्या अभावात रखडले आहेत. यातुन भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या भविष्याकडे वाटचाल करत आहे हे लक्षात येते.

मुळात कर्जे बुडीत होतात त्यामागे उद्योगपतींचा अप्रामाणीकपणा हे एक महत्वाचे कारण बनावे हे आपली आर्थिक नीतिमत्ता किती ढासळली आहे याचे एक लक्षण आहे. मल्ल्याचे किंगफिशर प्रकरण लोक अजून विसरलेले नाहीत. हर्षद मेहता ते केतन पारेख कोणत्या मानसिकतेतुन घडले हेही आपल्याला माहित आहे. ब्यंकांचे अधिकारी किती स्वच्छ असतात हे अगदी छोट्या व्यावसायिकांनाही चांगलेच माहित आहे. राजकारण्यांचा हस्तक्षेप नको तेवढा वाढत चालला आहे. लोकप्रियतेसाठीए आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल परखड भाष्ये न करता विकासदराचे आकडे फुगवून सांगत सर्वांना अफुच्या धुंदीत ठेवण्यात ते मग्न असतात. रघुराम राजन यांच्यासारखे परखड गव्हर्नर मिळाले हे आपले भाग्य असले तरी त्यांनाही आपल्या विधानांवरुन घुमजाव करावे लागले यातच सत्ता ही सत्याची जाणीव करुन देणा-यांच्या मार्गातील अडथळाच कशी बनते याचे विदारक दर्शन घडवते.

आसपास सर्वत्र अर्थव्यवस्थांची पडझड होत असतांना आपण मात्र सुरक्षित राहु हा आशावाद चांगला असला तरी या पडझडीही आपल्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावत आहेत हेही आपल्याला समजत नाही. आज जगातील कोणतीही अर्थव्यवस्था सार्वभौम राहिलेली नाही कारण ती मुळात परस्परावलंबी आहे. आणी म्हणुनच अधिक अनैसर्गिक बनत चालली आहे. अर्थव्यवस्था परस्परावलंबी असण्याचा अर्थ हा नसतो कि आर्थिक मुल्यांकडॆ व नीतीकडॆ सपशेल दुर्लक्ष करावे. प्रत्येक देश अनैतिक अर्थव्यवस्थेच्या रचनांच्या मागे लागले असता त्यातून शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था निर्माण होणे शक्य नाही. ती नाहीच हे सध्याच्या जागतिक आर्थिक पर्यावरणावरुन दिसते. भारतही स्वत:च अनैतिक अर्थव्यवस्थेच्या कच्छपी लागला असेल तर आमची अर्थव्यवस्था जागतिक संकटापासून वाचण्याएवढा सक्षम आहे असा आमचा दावा बालिशपणाचा आहे. मेड इन इंडिया वा मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा घोषणा भक्तांना मोहवू शकतात. पण त्यासाठी पुरेसे वित्त लागते. देशी प्रकल्प सक्षम होऊ देत त्यांत वाढ लागते. तुमच्या देशाची अर्थव्यवस्था स्थिर करायला गुंतवणुकी करायला बाहेरच्या कार्पोरेट्सना रस असण्याची शक्यता नसते. शेवटी नफेखोरी हाच भांडवलदारांचा मुख्य हेतू असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

त्यांना त्यांना पुरेसा नफा मिळवून देण्यासाठी आम्हाला काय त्याग करावा लागतो याचे गणित सरकारने कधी मांडले आहे काय? बरे, परत पुरेसा नफा म्हणजे काय, याची काय व्याख्या आहे? उदाहरणार्थ भुमी अधिग्रहण कायदा हा या अशाच देशी-विदेशी भांडवलदारांसाठी आहे. तो करुनही किती उद्योग खरेच येणार आहेत याची शाश्वती सरकारलाही नाही. देशातील उद्योगांचे भविष्य आधीच टांगणीला लागले असतांना बाहेरील उद्योग भारतात आले कि सारे आलबेल होणार आहे असे मानणे हे आर्थिक अडाणीपणाचे लक्षण आहे. मुळात देशांतर्गत वित्तीय शिस्तीची, उपलब्ध भांडवलाच्या वितरणाची धोरणे आधी स्पष्ट व्हायला हवीत. ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ब-यापैकी स्थिर राहिली ते कृषीक्षेत्र सरकारच्या अजेंड्यावर नाही. त्यात किते ब्यंकांनी वित्तपुरवठा केला आहे हे पाहिले तर त्यातील नकारात्मकतेमुळे आपणच हतबल होऊन जाऊ. किंबहुना या क्षेत्राबाबत कसलेही धोरण नाही. स्वतंत्र बजेट तर स्वप्नवत आहे.

म्हणजेच आमच्या आर्थिक प्राथमिकता अजून स्पष्ट नाहीत. धोरण नाही. आणि हे असेच चालू राहिले तर आपल्या अर्थव्यवस्थेची पोकळ पायावर उभरली जात असलेली इमारत कधीही कोसळू लागेल याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

Friday, July 3, 2015

"शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य"

काल अभाविपने मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या "शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य" या परिसंवादात मी मांडलेले ठळक मुद्दे:

१) मला या कार्यक्रमाला वक्त्यांत एक बहुजन असावा म्हणूण बोलावले गेल्याचे दिसते आहे. आपल्याकडची बहुजन-अभिजन ही वाटणी जातीय आहे, वास्तवाधारित नाही. संस्कृत्यांचे निर्माण सातत्याने करणारे लोक अभिजन तर संस्कृतीचे अनुगामी बहुजन असतात. पण येथे मतीमंद, निर्बुद्ध किंवा अतिसामान्य मानसे केवळ जातीमुळे अभिजन म्हणून मिरवतात.

२) संस्कृती निर्माणकर्ते घडवत असतात. संस्कृती त्यांचीच असते. भारताचे पुरातन संस्कृती त्या त्या काळच्या वडार, गवंडी, कुंभार, चर्मकार आदि लोकांनी घडवली आहे. आज आम्हाला आमचा गेल्या ४०-५० हजार वर्षांचा इतिहस समजतो तो त्यांच्याच रचनांतून. आपल्याकडे मात्र वैदिक सम्स्कृतीपासुनच भारताचा इतिहास सुरु होतो असा मानण्याचा प्रघात आहे. वैदिक संस्कृते ही अल्पसंख्यांकांची संस्कृती असून तिला भारतीय संस्कृती चा आरंभ मानता येत नाही. ही आयात झालेली धर्म-संस्कृती आहे, ती मुळचे भारतीय नाही. संस्कृत ही सर्व भषांची जननी हाही एक भ्रम आहे. प्राकृत भाषा संस्कृतची आई आहेत...कन्या नव्हेत.

३) पण स्मृती इराणी यांनी वेद, उपनिषदे व त्यातील गणित-विज्ञान वगैरेंवर भर देत शिक्षण पद्धतीत बदल घडवायचे सुतोवाच केले आहे. हे शिक्षणाचे भारतीयीकरण नव्हे तर वैदिकीकरण आहे आणि त्यामुळेच ते निंदेस व विरोधास पात्र आहे. भारतीयीकरण हा तुमचा भ्रम आहे, तथ्य आम्हाला माहित आहे.

४) भारतीयांचा विज्ञान व तत्वज्ञानात मोठा गोंधळ झाला आहे. तत्वज्ञानातील संकल्पनांबद्दल वैदिक-अवैदिक तत्ववेत्यांच्या प्रतिभेला सलाम जरी केला तरी त्या संकल्पना जोवर गणिताने व प्रयोगाने सिद्ध केल्या जात नाहीत तोवर त्यांना विज्ञान म्हणता येत नाही. वेदांतील विमानांनी अलीकडेच आपले जगभर हसू झाले. बिग ब्यंग थियरी पासून ते अणूबोंबचे शोध आमच्या पुर्वजांनी लावले होते हे दावे छाती फुगवून करणे निरर्थक व मुर्खपणाचे आहे. एक तर तुम्ही वर्तमानात तरी प्रयोग करून ते दावे सत्य आहेत हे सिद्ध करुन दाखवा किंवा त्यांना कविकल्पना म्हणून सोडून द्या. आर्यभटाने पृथ्वी परिवलन सिद्धांत पहिल्यांदा मांडला हे खरे आहे पण त्या सिद्धांताचा उपयोग आदि शंकराचार्य ते ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानातील दृष्टांतासाठी वापर केला. विज्ञानासाठी नाही. वैदिक गणित हे यज्ञवेद्या बांधण्यापुरते मर्यादित होते...विशाल वास्तुरचना करण्यासाठी शुल्बसुत्रांचा उपयोग नाही हे गणिती जाणतात. ज्याला आज वैदिक गणित म्हटले जाते ते तर विसाव्या शतकातील आहे.

५) भारत ही पुरातन काळापासून जागतिक संस्कृत्यांमधील एक पुल आहे. पोलिनिशियन, अरब, मध्य आशिया, अफगाणिस्तान, चीन-मंगोलिया इत्यादि संस्कृत्यांचे भारतावर व भारताचे त्यांच्यावर ऋण आहे. सर्वस्वी भारतीय असे शोधत बसणे वेडेपणाचे आहे. भारतातील पहिले चर्च सन ५२ म्धे बनले. ख्रिस्ती धर्मप्रचारक सातवाहनांच्या दरबारी आल्याचे पुरावे आहेत. पहिली मशीद भारतात सन ६२९ मद्ध्ये बनली. असंख्य नीतिकथा, मिथककथा यांचे आदानप्रदानही झाले. आपले शिक्षण विद्यार्थ्याला वैश्विक नागरिक करु इच्छि्त असेल तर या बाबींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

६) शिक्षण हे विद्यार्थ्याला विगतातील आभासी, खोट्या वैभवात रमवायचे माध्यम नाही. ते ज्ञानार्थी बनवत अनावर जिज्ञासेने शोध घेत नव्या ज्ञानाची विश्वे खुली करण्यासाठी आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानवंत नव्हे तर पोटवंत बनवते आणि म्हणून सध्याची शिक्षणपद्धती नाकारलीच पाहिजे व ज्ञानाधारित, विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल, आवड ज्यात आहे त्यातच शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देणारी शिक्षणव्यवस्था आपल्याला हवी आहे. पण भारतीयीकरण हे विद्यार्थ्याला संकुचित करत नेत विज्ञानातील झेप अधिकच मारत त्याला मध्ययुगात घेऊन जाईल. गतकाळाच्या वैभवाचे गुणगान म्हणजे भारतीयीकरण नव्हे. युरोपियनांनी बायबल फेकले व विज्ञान हाती घेतले म्हणून आज आपण आधुनिक विज्ञानाची फळे चाखत आहोत. वेद मात्र झुगारायची तुमची इच्छा नसेल तर ज्ञानवंतांचा देश या स्तरावर आम्ही जावू शकणार नाही. तसेही जगातील पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय विद्यापीठ नाही हे वास्तव आहे.

७) भारतात मुळात शिक्षणव्यवस्थाच नव्हती, जी होती ती एका धर्मसमुहापुरती मर्यादित होती. म्हणजेच भारतीय म्हणावी अशी जर शिक्षणव्यवस्थाच अस्तित्वात नसेल तर आज आम्हाला भारतीयीकरण करणारी शिक्षणव्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न पडणारच! शिक्षणाचे फक्त वैश्विकीकरण होऊ शकते कारण आज आपण इच्छा असो कि नसो वैश्विक नागरिक बनलो आहोत. तुमच्याशी संवाद साधतांना हा माईक...स्पीकर्स, आकोस्टिक्स...सारे पाश्चात्य आहे. भारतीय म्हणावे असे आधुनिक आमच्याकडे काही नाही. मग पाश्चात्यांनी शोध लावले त्यापेक्षा प्रबळ शोध आम्ही लावण्यासाठी आमची बुद्धीमत्ता का खर्चत नाही? उदा. बिट सिस्टमवर आजही कंप्युटर चालतात. क्वंटम मेक्यनिक्स वापरुन आम्ही नवीच प्रणाली का शोधू नये? माइक-स्पीकरशिवायही आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल असे अगदी नवे तंत्रज्ञान आम्हाला का शोधता येवू नये? शिवकाळात म्हणे असे तंत्रज्ञान होते. होते कि...असेल....पण आज ते उपयुक्ततावादी पद्धतीने पुन्हा विकसीत करत त्याला जनोपयोगी का बनवता येत नाही? केवळ होते आमच्याकडे असल्या भुलथापा विज्ञानात चालत नाहीत. पुरावे द्यावे लागतात. ज्यांचे पुरावे आजही जितेजागते आहेत त्यांना मात्र समाजव्यवस्थेत तळागाळात दाबले गेले आहे. सन्मान ना भुतकाळात दिला ना आज देत आहेत. वांझ वर्चस्वतावाद हा विघातक आहे....अकारण निर्माण केला गेलेला हीनगंडही तेवढाच विनाशकारी सिद्ध झाला आहे.

८) भारतीयीकरण म्हणजे वैदिकीकरण नाही. तसे करायचा प्रयत्न होतो आणि जोवर होत राहील तोवर मी त्याला खंदा विरोध करणारा एक पाईक असेल. फेकाफेकीतून विकृती निर्माण होते...ज्ञान नव्हे याचे भान असले पाहिजे.

Wednesday, July 1, 2015

तर आम्ही पुरोगामी कसे?

मुंबईत पाच आठवड्यांपुर्वी झालेल्या भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मी म्हणालो होतो कि...

"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर जाऊन बोला. तुम्ही शहाणे आणि खरे असाल तर समोरच्यांपैकी किमान दोन लोक तरी तुमचे विचार समजावून घेतील. दोनाचे चार आणि चाराचे आठ व्हायची प्रक्रिया त्यातुनच सुरु होईल. समतेचे विचार ख-या समतावादी आचरणातुनच जातात. विचार हे सर्वांसाठीच असतात. तुमचे विचार पक्के असतील तर कोणाहीपुढे कधीही तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. सत्याचा तोच महिमा आहे. कोणी संस्कृतीचे अपहरण केले असे आपण म्हणतो तेंव्हा फक्त आरोप करुन चालत नाही तर पुराव्यानिशी तसे सिद्ध करावे लागते. आमचा सांस्कृतिक अभ्यासच मुळात नगण्य आहे....मग नुसते आरोप करुन आमची संस्कृती काय होती आणि अशी का झाली हे कसे समजणार? आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल? पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार? बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार? आम्ही गेल्या वर्षी हीच अभिवादने करतांना जिथे होतो तिथेच आजही आहोत आणि पुढच्या वर्षीही तिथेच राहणार असू तर आम्ही पुरोगामी कसे?

"संस्कृतीची अपहरणे झाली आहेत. पुरातन वारसा नाकारायच्या नादात आम्हीच आमचेच व्यास-वाल्मिकी ते कालिदास नाकारत गेलो आहोत. आम्ही सारेच नाकारायच्या नादात आम्हाला संस्कृतीच नव्हती हेच उरबडवेपण करून सांगत आहोत. पण सिंधू संस्कृती आज समजते ती तत्कालीन कुंभारांच्या मृद्भांड्यामुळे, शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे, गवंड्यांच्या शिस्तबद्ध बांधकामांमुळे, मुर्तीकारांच्या रचनांमुळे आणि अलंकार बनवणा-या कारागिरांच्या कुशल कारागिरीमुळे. आम्हाला ही संस्कृती समजते ती देशोदेशी व्यापार करणा-या तत्कालीन साहसी, दर्यावर्दी व्यापा-यांमुळे आणि त्यांना लागणारी शिडाची भव्य जहाजे बनवणा-या सुतारांमुळे. या वैदिकांचे साहित्य आम्हाला आमचा इतिहास सांगत नाही. आमचा इतिहास प्रत्यक्ष पुराव्यांनी सामोरा आहे....शाब्दिक नाही...आणि प्रत्यक्ष जे असते तीच संस्कृती असते....लेखनात चो-या, प्रक्षेप होऊ शकतात....प्रत्यक्ष वास्तवदर्शी वस्तुंत नाही. आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा आहे...लेखनिकांचा नाही हे आपण समजावून घेतले पाहिजे.

"सांस्कृतिक अपहरण झाले आहे हे खरे मानले तरी आमचे काय होते हे शोधायची आमची तयारी नाही. किंबहुना सारे काही नाकारायचेच ठरवले असेल तर मग आज आम्हाला आमची संस्कृतीच नाही हेही मान्य करावे लागेल. बरे, तेही ठीक आहे असे समजू. पण मग आम्ही नवी संस्कृती घडवायला तरी तयार आहोत काय? नाही. संस्कृती ही अर्थकारण, सत्ताकारण आणि त्याहीपेक्षा मोठे म्हणजे ज्ञानकारण यातून साकार होते. अर्थकारण म्हणावे तर आमचा डोळा गेला बाजार नोक-यांवर. सत्ताकारण म्हणावे तर ते आजही भिकेच्या तुकड्यांवर. आणि ज्ञानकारण....ते तर आम्हाला आजही दुरचे स्वप्न झाले आहे. त्याच्या अभावात संस्कृतीचे पुनर्रचना अशक्य आहे, याचे भान आम्हाला जर येत नसेल तर आमचे कसे होणार यावर आम्हीच नीट विचार केला पाहिजे."

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...