Tuesday, November 24, 2020

शेती वाचेल तर देश वाचेल

शेती हा पुरातन उद्योग आहे. मेहेरगढ येथील सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांनुसार भारतातील शेतीचा उगम इ.स. पुर्व किमान १०,००० वर्ष एवढा जातो. तो त्याहीपेक्षा पुरातन असला पाहिजे. सिंधु संस्कृतीत शेती ही अत्यंत भरभराटीला आली होती. नद्यांचे प्रवाह बांध घालुन अडवणे, पाटांद्वारे पाणी शेतीला पुरवणे या कला सिंधु मानवाने साधल्या होत्या. त्यामुळेच वैभवशाली अशी ही संस्क्रूती नगररचना, उद्यमी आणि व्यापारातही प्रगत झाली. या संस्कृतीचा व्यापार पार अरब-मेसोपोटेमिया, सुमेरादि देशांपर्यंत पोचला होता. त्याला कारण होते शेतीचे भरभक्कम बळ आणि त्यामुळे आलेली समृद्धी आणि त्यातुनच आलेली साहसी वृत्ती. आजही भारतात ५५% जनसंख्या रोजीरोटीसाठी शेतीवरच अवलंबून आहे. औद्योगिकरणाने अधिकाधिक जनसंख्या सामावून घ्यावी अशी अपेक्षा कोणत्याही विकसनशील अर्थव्यवस्थेकडून असते. पण तसे झाले नाही. आज भारतात दारिद्र्य आहे व असंख्य बेरोजगार तरुण "नोकरीसाठी दाही दिशा" हिंडत असले किंवा आरक्षणाच्या रांगेत असले तरी औद्योगिकरणाचा आणि सरकारी उद्योगांचा वेगही जवळपास थांबलाच असल्याने त्यांना सामावून घेता येणे शक्य नाही. शिवाय शेतीही अनेक कारणांनी तोट्यात जात असल्याने शेती करणे हा आतबट्ट्याचा, किंबहुना आत्महत्याच करायला भाग पाडणारा व्यवसाय बनला आहे. 

२०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सरकारने म्हटले होते. पण ते कसे करणार यासाठी मात्र ठोस उपाययोजना सरकारकडे असल्याचे दिसत नाही. "देशाला अन्नसुरक्षा तर शेतक-याला उत्पन्न सुरक्षा" अशी घोषणाही अरुण जेटली यांनी केली होती. अर्थसुरक्षा हा समाजाचा मुख्य आधार आहे हे तर खरेच आहे. परंतू घोषणांवर कोणाचेही उत्पन्न वाढत नसते याचे भान आपल्या अर्थव्यवस्थेने गमावले आहे. शेती नफ्यात आणने हे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्याच वेळीस शेतीवर अवलंबून असलेली अवाढव्य जनसंख्या अन्य औद्योगिक क्षेत्राकडे वळवण्याचीही गरज आहे. या दोहोंत समतोल साधला गेल्याखेरीज ना शेतीचा प्रश्न सुटणार ना आचके देत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेची समस्या संपणार. 

शेतीच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण आधी पाहू. शेतीची घटत चाललेली उत्पादकता ही एक मोठी समस्या बनलेली आहे. उदाहणार्थ चीनशीच तुलना केली तर कडधान्यांचे आपले उत्पादन चीनपेक्षा प्रति हेक्टर ३९% नी कमी आहे. भाताच्या बाबतीत हेच प्रमाण ४६% नी कमी आहे. आपण अधिक उत्पादन देऊ शकणा-या बियाण्यांच्या विकासात मागे पडलो हे एक कारण या कमी उत्पादकतेमागे आहे पण त्याही पेक्षा मोठे कारण आहे ते बदलत चाललेल्या पर्यावरणाचे. अवकाळी पाऊस, गारपीट, सुका वा ओला दुष्काळ आपल्या शेतीच्या पाचवीला पुजले आहेत. या बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करुन भारतातील एकंदरीत पीकपद्धतीतच बदल घडवून आणावा यासाठी अनेक शिफारशी होत असतात. पण सरकारी अनास्था विकराळ आहे. ती कशी हे आपण खालील उदाहरणावरून पाहू शकतो.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००८ सालीच हवामान बदलाविरुद्ध राष्ट्रीय योजना (National Action Plan on Climate Change ) घोषित केली होती. त्यामध्ये हवामान बदलाने होणारे दुष्परिणाम रोखणं आणि त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी भविष्यातील योजना ठरवणं हा प्रमुख उद्देश होता. राष्ट्राचा विकासदर अबाधित ठेवायचा असेल आणि नागरिकांच्या एकूणातील राहणीमानात भरच घालायची असेल तर बदलतं हवामान हा त्यातील प्रमुख अडथळा आहे हे त्यांनी ओळखलं होतं असं म्हणायला वाव आहे. ऊर्जानिर्मितीसाठी अधिकाधिक नैसर्गिक साधनं (सौर आणि वायु ऊर्जा) वाढवण्यावर या योजनेत भरही दिला गेला होता. हवामान बदलामुळे भविष्यात पाण्याचं दुर्भिक्ष वाढणार असल्याने पाण्याचं संतुलित संवर्धन करणं आणि त्यासाठी पर्याय शोधणं यावर अधिक भर दिला होता. हरित भारत आणि हिमालयातील पर्यावरणशुद्धी अशाही घोषणा ही योजना आखताना दिल्या गेल्या होत्या.

महाराष्ट्र सरकारनेही केंद्राच्या सूचनेप्रमाणे वातावरणीय बदलावर काम करण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली होती. २००८ साली. महाराष्ट्र सरकारने कथित तत्परता दाखवत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुनिता नारायण, रघुनाथ माशेलकर, अनिक काकोडकर इत्यादी दिग्गजांचा समावेश असलेली जंगी १९ सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने महाराष्ट्रातील हवामान बदलांचा अंदाज घेत राज्य सरकारला उपाययोजना सुचवणं अपेक्षित होतं. पण या समितीने कमाल अशी केली की हे काम दिल्लीच्या द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्युटकडे (टेरी) हे काम रुपये ९८ लाखांच्या फीवर सोपवलं. हे झालं लगोलग, म्हणजे २००९ मध्ये. खरं म्हणजे या समितीची वर्षातून किमान दोन वेळा वातावरण बदलावर चर्चा करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी बैठक घेणं अभिप्रेत होतं. प्रत्यक्षात सुरुवातीच्या ३३ महिन्यांत, म्हणजे जवळपास ३ वर्षांत, या समितीची एकच बैठक झाली. म्हणजे सरकार आणि या समितीचे विद्वान सदस्य याबाबतीत किती गंभीर होते हे दिसून येतं.

बरं टेरीने तरी काय केलं? महाराष्ट्र शासनाने जबाबदारी सोपवून आता दशकापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, पण आजतागायत टेरीने कसलाही अहवाल अथवा सूचना सादर केलेल्या नाहीत. पीकपद्धतीत बदल कसा घडवून आणावा यासाठी कसलेही प्रयत्नही झालेले नाहीत. शेतक-यांनीही याबाबत अनास्था दाखवलेली आहे.

आज आपले कृषी संशोधन बेतास बात असून आजही आपण मोन्सेटोकडेच किंवा देशी-विदेशी बियाणे कंपन्यांकडे डोळे लावून बसलेलो आहोत. स्वत:ची निर्माण क्षमता पूर्ण गमावलेली आहे.  जलसंधारणाबाबत आपण उदासीन आहोतच. ज्या अवैज्ञानिक पद्धतीने जलयुक्त शिवार कल्पना राबवली गेली त्यातून जलपर्यावरणाचे हित होण्यापेक्षा दिर्घकालीन नुकसानच होईल असे एकंदरीत दिसते. 

पुढची महत्वाची समस्या म्हणजे शेतीत कोणतेही नवे भांडवल येत नाहीय. त्यामुळे शेतीचे अत्याधुनिकीकरण करणेही असंभाव्य बनलेले आहे. शेतक-यांवर शेतमाल विक्रीबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बंधने असल्याने त्यांचे तर अतोनात नुकसान होतच होते पण आता सरकारने कायदे बदलुनही शेतमाल बाजारपेठा वाढवण्याची व्यवस्थाच केली नसल्याने त्यांना शेवटी बाजार सामित्यांचाच आधार वाटत आहे हे चित्र काय दर्शवते? उद्यमी प्रेरणा या समाजवादाने मारून टाकल्याने नवे शेतमाल व्यावसायिक निर्माण होण्याची शक्यता नाही. शेवटी घाऊक खरेदीसाठी या समित्याच मक्तेदारी जपत राहणार असल्याने किंवा नवे पण मोजके भांडवलदार घाऊक खरेदीदार यातून निर्माण होणार असल्याने शेतक-यांचे कसलेही हित यात नाही. भांडवलदारांचा पाया विस्तृत करणे अभिप्रेत होते हे या नव्या कायद्याने होणार नाही हे उघड आहे. 

कंत्राटी शेती अथवा भाडेपट्ट्यावर शेतजमीनी घेऊन भांडवल ओतत शेतीउत्पादन करू पाहणारे या अडथळ्य़ांमुळे शेतीपासून दूर राहतात असे नीती आयोगच सांगतो. मग शेतीत नवे भांडवल येत तिच्यात कसे प्राण फुंकले जाणार? समाजवादी तत्वांवर आधारीत बंधने किंवा तथाकथित स्वातंत्र्य अंतत: विघातकच ठरतात हा अनुभव असुनही बाजार समित्या आणि जीवनावश्यक वस्तू कायदे हटवले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. आयात-निर्यातीवरही कधीही बंधने घातली जातात, कधीही उठवली जातात ती याच समाजवादी तत्वांमुळे. पण यात अंतत: शेतक-याचे अहित. बाजारभाव बाजाराच्या पद्धतीने ठरू लागले, कोठे विकायचे हे बंधन राहिले नाही आणि बाजारपेठा व्यापक झाल्या तर शेतकरी सुज्ञ आणि बाजार केंद्री निर्णय घेत स्वत:हुनच पीक पद्धती बदलेल हे सरकारच्या गांवीही नाही. 

कमाल जमीनधारणा कायद्यामुळे व्यक्तिगत शेतीक्षेत्राचा विस्तार होण्याऐवजी दिवसेंदिवस तुकडीकरण वाढत चालले आहे. उत्पादकता कमी होत जाण्यामागे हेही महत्वाचे कारण तर आहेच पण यामुळेच शेती करण्यासाठी नवे भांडवलदारही प्रवेशू शकत नाहीत. त्यावरही बंधने आहेत. खरे तर हे संपत्तीच्या अधिकाराच्या घटनात्मक तत्वाविरोधात आहे. पण शेड्य्ल ९ मुळे त्यालाही न्यायालयांत आव्हान देता येत नाही एवढी समाजवादी धोरणांने शेती व शेतक-याची नाकेबंदी करून ठेवली आहे. शेती हा अंगभूत तोट्याचा विषय नसून केवळ शासनप्रणित धोरणांमुळे शेती तोट्यात जात आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. 

आणि नेमके यामुळेच जागतिकीकरणाचे कसलेही लाभ शेतक-यांपर्यंत पोहोचलेले नाहीत.  किंबहुना उद्योग क्षेत्राला जागतिकीकरणानंतर जे स्वातंत्र्य दिले गेले ते शेती क्षेत्राला दिले गेले नाही. ५५% लोकसंख्या अवलंबुन असलेले क्षेत्र बंदीवासातच राहिले. केवळ १४% रोजगार देणारे उद्योगक्षेत्र मात्र जागतिकीकरणाचे लाभ उचलत राहिले. त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण झोणे अनिवार्यच होते. त्यामुळे लोकांत असंतोष उसळणेही स्वाभाविकच होते आणि तो तसा उसळतोही आहे. जर शेतीला चांगले दिवस खरेच आणायचे असतील, शेतक-याचे भविष्य ख-या अर्थाने सुधरवायचे असेल तर तत्काळ काही उपाययोजना केल्या पाहिजेत. सर्वप्रथम जीवनावश्यक वस्तु कायदा, कमाल जमीनधारणा कायदा आणि  जमीन अधिग्रहण कायदा यांना तत्काळ मुठमाती देत शेतमालाचा बाजार ख-या अर्थाने नियंत्रणमुक्त केला पाहिजे. बाजारभाव बाजाराच्याच नियमाने ठरले पाहिजेत. त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. भाजीपाला किंवा अन्नधान्य महाग होऊ नये म्हणून सरकारने अयशस्वी काळजी करण्यापेक्षा नागरिकांचीच क्रयशक्ती वाढेल अशी अर्थरचना करणे गरजेचे नाही काय? अन्नसुरक्षेसाठी शेतक-यांच्या अर्थसुरक्षेला गळफास लावण्याचा अधिकार सरकारला का असावा? आपल्याला हे प्रश्न उपस्थित करणे भाग आहे. शेतीच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे. ५५% लोकसंख्येचे हित त्यात सामावलेले आहे.

शेतीचे भविष्य वरील परिप्रेक्षात पाहिले तर ते निश्चितच अंध:कारमय आहे. जागतिक विकसनशील देश, विकसित देश आणि महासत्ता बनू पाहणारा आपला देश यांची तुलना केली तरी आपल्या शेतीची वाटचाल आत्मनाशाच्याच दिशेने सुरु आहे असे स्प्ष्ट दिसते. ५५% लोक शेतीवर अवलंबून असल्याने व त्यांचे अर्थजीवन दिवसेंदिवस ढासळतच चालले असल्याने त्यांना आता शेती नफेदायक ठरेल असे वाटत नाही. पिढ्यानुपिढ्या शेतजमीनीचे तुकडीकरणच होत राहिल्याने उत्पादकता तर घटतेच आहे पण ती कसणे अशक्य होत जानार आहे हेही उघड आहे. भुमीहीन शेतमजुरांची अवस्थाही बिकट होत जाणार आहे. मुळात शेतमजुरी हा अर्धवेळ रोजगार आहे. शेतीचे भवितव्य असे चिंताजनक होत चालले आहे.

बरे आधुनिक पद्धतीने शेती करावी तर सरकारी कायदे हेच मुख्य अडथळे आहेत. म्हणजे शेती ही समस्या नसून सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण हीच मोठी समस्या बनून बसला आहे. म्हणजे शेतीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर त्यावरही कमाल शेतजमीन मर्यादा कायद्यामुळे ते होऊ शकत नाही. बिगर शेतक-याला शेतजमीन शेतीसाठी विकत घेता येत नसल्याने बाहेरचे भांडवल येण्याचीही शक्यता नाही. आणि शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने तो स्वत: नवे भांडवल शेतीत आणू शकण्याची शक्यता नाही हा एक तिढा आहेच. शेतमालाच्या बाजारपेठेवर सरकारी नियंत्रणे असल्याने खुल्या अर्थव्यवस्थेचे त्याला कसलेही लाभ नाहीत. आपलेच सरकार आपल्या व्यवसाय स्वातंत्र्यावर बंधने घालते आणि ते आम्ही शन करतो हा अजब प्रकार देशात घडत आला आहे. त्यात पुरेशी शितगृहे व गोदामे नसल्याने वाया जाणा-या शेतमालामुळे होणारे नुकसान वेगळेच. उदा. २० ते ३०% फळ-फळावळ व भाजीपाला केवळ साठवणूक क्षमतेच्या अभावामुळे वाया जातो.

याशिवाय महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे शेतमालावर प्रक्रिया करून, त्यांचे आयुष्यमान व दर्जा वाढवून विकण्यासाठी प्रक्रिया उद्योगच नाहीत. भारतात आजमितीला केवळ २% शेतमालावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे कारखाने आहेत. हे प्रमाण न वाढल्याने ना रोजगार निर्मिती होत ना वाया जाणा-या शेतमालाचे प्रमाण कमी होत. हे नुकसान केवळ शेतक-याचेच नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेचेही आहे हे कोण लक्षात घेणार?

शेतीने अनेक दिग्गज नेते दिले. पण अभावानेच त्यांनी आपली नाळ शेतीशी कायम ठेवली. भारतात दरवर्षी एवढ्या इंजिनियर्सचे पीक येते पण त्यांनी शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी तंत्रे शोधण्याचे मु्ळीच काम केले नाही. अगदी निर्जलीकरणासारख्या जगभर वापरल्या जाणा-या प्रक्रियापद्धतींची साधी तोंडओळखही करून दिली गेली नाही. आपण शिक्षणपद्धतीतून समाजाला पुढे नेण्यासाठी कल्पक विद्यार्थी घडवण्यात सपशेल अपेशी ठरलो आहोत याचा दुसरा काय पुरावा असू शकतो?

शेतीवर अवलंबून असलेली जनसंख्या ५५% वरून किमान ३०%वर आणणे ही आपल्या अर्थव्यवस्थेची पहिली जबाबदारी आहे. हे करायचे म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगक्षेत्र वाढत तेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. रोजगार पाहिजे तर तेवढ्याच लोकांना कौशल्य प्रशिक्षण लागेल. आता उद्योगक्षेत्र वाढवायचे तर त्यासाठी नवे लघु, मध्यम ते मोठे उद्योजक आहेत त्याच समाजातून पुढे यायला हवेत. त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असेल. नव-उद्योजकांना कर्ज खडे करणे मुश्किल तेथे बाकी भांडवल कसे उभे केले जाणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आमच्याकडे मुळात योजनाच नसल्याने आमचा भर विदेशी गुंतवणुकीवरच आहे. पण उद्योगसुलभतेत आमचा क्रमांक ब-यापैकी खाली असल्याने तेही अल्प प्रमाणातच येते आहे. भविष्यात जास्त आले तरी एवढ्या मोठ्या संख्येने ते रोजगार उत्पन्न करू शकणार नाही हे उघड आहे. भारतीयालाच नवा उद्योग सुरु करायचा असेल तर एवढ्या सरकारी कागदोपत्री परवानग्या लागतात की जवळपास एक वर्षाचा वेळ आणि अकारण पैसा त्यातच वाया जातो. समाजवादी व्यवस्थेचे हे अंगभूत वैशिष्ट्य आहे की ते आपल्याच नागरिकांवर विश्वास ठेवत नाही आणि यातुनच मल्ल्यासारखे व्यवस्थेचा साळसुदपणे गैरफायदा घेणारे निर्माण होतात. शेतीत आहेच तसाच उद्योग जगतातील सरकारी हस्तक्षेप कमी होत नाही तोवर शेती व औद्योगिक प्रगतीची शक्यता नाही. जी होईल ती अगदी दहा टक्क्यावर जरी गेली तरी शेतीवरील बोजा हटण्याची त्यामुळे शक्यता नाही. यामध्ये भविष्यातील असंतोषाची बीजे आहेत हे आताच ध्यानात घ्यावे लागेल.

याचाच अर्थ असा की शेतीवरील बोजा सध्या तरी हटवता येईल अशी कोणतीही योजना दृष्टीपथात नाही. किंबहुना अन्य क्षेत्रातील रोजगारच गेल्या सहा वर्षांपासून कमी होत चालल्याने बोजा वाढण्याचीच शक्यता आहे. या बेरोजगारीच्या विस्फोटाने आधीच अनेक सामाजिक समस्यांना जन्म दिला आहे. त्यात पुढे भरच पडेल की काय अशी साधार शंका आहेच. त्यामुळे सरकारवर एकीकडे समाजवादी अनावश्यक कायद्यांच्या कचाट्यातून सोडवणूक करण्यासाठी दबाव कायम ठेवत असतांनाच आपल्याला लघुत्तम उद्योगांची वाढ करता येईल काय हे पहायला हवे. शेतीपुरक, म्हणजे अगदी निर्जलीकरणापासून ते पशुपालनापर्यंत, लघुत्तम पातळीवर का होईना, पण आधुनिक तंत्रज्ञान सुलभतेने वापरत उद्योग स्वत:च कसे वाढवता येतील हे पहायला पाहिजे. आपले नैसर्गिक साधनसामुग्रीचे स्त्रोत औद्योगिक प्रक्रियेत कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवा क्षेत्रात अजुनही अनेक क्षेत्रे अस्पर्श आहेत. ती शोधत त्यात व्यवसायांच्या संधी निर्माण करायला हव्यात. आपली शिक्षणपद्धती असे तरुण घडवायला अनुकूल नाही. किंबहुना इतिहास-भुगोलात मारत नेत त्याला प्रत्यक्ष जीवनाचे धडे ते देत नाही. आपण यावर या लेखमालिकेत सुरुवातीलाच बरीच चर्चा केली आहे. पण व्यवस्था ते शिक्षण देत नाही म्हणून आपण झापडबंद होत अंधारातच चाचपडत राहण्यात काय हशील? आम्हाला स्वयंशिक्षणाची सवय लावावी लागेल. त्याखेरीज आम्ही शेतीची व म्हणूनच अर्थव्यवस्थेची आव्हाने पेलू शकणार नाही.

शेतीचे भवितव्य हे एका अर्थाने देशाच्याच अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे. शेतीवरील बोजा हटवायला आम्हालाच पुढे यावे लागेल. सरकार कायदे बदलणार नसेल तर ते बदलायला भाग पाडावे लागेल. आपल्या लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढवावा लागेल. स्वतंत्रतावादी आर्थिक धोरणे का असावीत हे समजावून घ्यावे लागेल. समाजवाद ऐकायला गोंडस वाटतो पण तो मुठभरांचाच भांडवलवाद जपण्यासाठी व नागरिकांना कंगाल ठेवण्यासाठी असतो हे भारतात गेल्या सत्तर वर्षात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच शेतकरी, शेतमजूर, भटके-विमिक्त, मेंढपाळ-गोपाळ अजुनही अपवाद वगळता आपले आर्थिक उत्थान घडवू शकलेले नाहीत. किंबहुना त्यांचे शोषणच होत आले आहे. केवळ आश्वासने, वेगवेगळ्या आयोगांच्या नेमणूका आणि निवडणुकांत वाटले जाणारे धन यावरच आम्ही संतुष्ट आहोत. ही आत्मघातकी अल्पसंतुष्टता आम्हाला त्यागावी लागेल. जगात शेती कोठे चालली आहे, तिच्या भविष्यातील दिशा काय असणार आहे यावरही आपण विचार केला पाहिजे. आम्हाला जगाशी स्पर्धा करायची असेल तर प्रथम आमच्या डोळ्यावर पडलेली झापडे आम्हाला हटवावी लागतील.

शेती जागतिक संस्कृतींचा आणि अर्थव्यवस्थान्चा मूलाधार राहिली आहे. आजही भारत सर्व संकटांत तरत असेल तर केवळ शेतीमुळे. आणि तरीही शेतकरीच शोषित रहावा हे नव-उद्योग संस्कृतीचे स्वार्थी अप्पलपोट्टे हुकुमशाहीवादी क्रूर धोरण आहे. शेतीचे पुरातन आणि भविष्यातिलही  महत्व समजून न घेतल्याचे ते लक्षण आहे. शेतकरी नेतेही अप्पलपोट्टे आणि स्वार्थाने मूर्खांच्या हातातील बाव्हले बनलेले गुलाम आहेत हे लपून राहिलेले नाही. स्वतंत्रतावादी तत्वाना मूठमाती देण्याचे धोरण या देशाचे हित करू शकत नाही. “शेती वाचेल तर देश वाचेल” एवढेच काय ते आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे.

-संजय सोनवणी

(सुभाष कच्छवे संपादित भूमिका या दिवाळी विशेषांकात प्रासिद्ध झालेला लेख.)


Sunday, November 22, 2020

केंद्राला काश्मीरचा विकास खरेच हवा आहे काय?

काश्मीरबाबतची ३७० आणि ३५ (अ) ही घटनेतील कलमे रद्द केली गेल्यानंतर जम्मु-काश्मीर आणि लद्दाखमधील सर्व समस्या सूर्य उगवल्यावर धुके विरावे तशा विरून जातील आणि काश्मीरमध्ये अनेक उद्योग त्यामुळे येऊ शकणार असल्याने काश्मीर निसर्गसौन्दर्याचे जसे नंदनवन आहे तसेच उद्योग धंद्यांचेही नंदनवन होईल असा प्रचार अत्यंत जोरकसपणे सरकारकडून केला जात होता. त्यानंतर तब्बल एका वर्ष उलटून गेल्यानंतर तेथे भारतातील कोणीही नागरिक काश्मीरमध्ये शेतजमीन सोडून निवासी कारणासाठी जागा घेऊ शकतील असा अध्यादेश काढण्यात आला आहे. म्हणजेच ३७० रद्द केल्यापासून अजून एक इंचही जागा गैरकाश्मीरीने विकत घेतलेली नाही. औद्योगिक कारणासाठी जी जमीन दिली जाणार आहे ती आपल्याकडे आपण जसे एम.आय.डी.सी. कडून लीजवर घेतो तशीच सरकारने अधिग्रहित केलेल्या जमीनीतूनच लीजवरच घ्यावी लागणार आहे. ३७० रद्द होण्याआधीही गैर-काश्मिरी या पद्धतीने तेथे जमिनी लीजवर घेऊन उद्योग व्यवसाय चालवतच होते. मग ३७० हा काश्मीरच्या औद्योगिक विकासात अडथळा होता असा अपप्रचार का केला गेला हा खरा प्रश्न आहे आणि मग अन्य पश्चिमोत्तर राज्यांत असलेल्या कलम ३७१ चे काय असाही प्रश्न तेंव्हाही उठला होता आणि आताही उठतो आहे. हे सारे खरे म्हणजे काश्मिरींचे, विशेषता: तेथील मुस्लिमांचे दमन करण्यासाठी केले गेले आहे असा आरोप काश्मिरी नेते आणि राष्ट्रीय विरोधी पक्ष करत असतील तर त्याचे वर्तमान केंद्र सरकारकडे काय उत्तर आहे?

कारण ३७० हटवन्याआधीपासून काश्मीरमध्ये प्रचंड सैन्यदले उतरवण्यात आली. आजही ती तैनात आहेत. निरंतर कर्फ्यू आणि संपर्क साधनांवर निर्बंध आणल्याने काश्मीरची आधीच ढासळलेली अर्थव्यवस्था चकनाचूर झाली. गेल्या हंगामात सफरचंदे आणि इतर शेतीउत्पादन होते तेथेच सडले. शेतक-यांचे कंबरडे मोडणारी ही घटना असतांनाही केंद्र अथवा केंद्र-शासित प्रशासनाने कसल्याही मदतीचा हात पुढे केला नाही. 

पण त्याच वेळीस उद्योग-व्यापार विभागांचे अधिकारी मात्र देशभर फिरून आता काश्मीरमध्ये गुंतवणूक करा अशी आवाहने करत फिरत होते. उद्योजक, शिक्षणसंस्थांचे प्रमुख आणि पर्यटन व्यवसायांचे धुरीण यांना भेटत होते. येथील जमीनीं आणि सौदर्यांचे आकर्षण असलेल्या अनेक व्यक्ती आणि संस्था जम्मू काश्मीर मधील स्थिती निवळण्यासाठी आणि सरकार काय सोयी-सवलती जाहीर करते यावरच प्रामुख्याने नजर ठेऊन होत्या. 

खुद्द मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी त्यांच्या आखाती राष्ट्रांना दिलेल्या भेटीत जम्मु-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. खरे तर श्रीनगरला गुंतवणुकदाराची एक बैठक पंतपधान मोदींच्या उपस्थितीत आक्टोबर २०१९ मध्येच होणार होती. पण ती पुढे ढकलली गेली आणि आजतागायत प्रलंबित आहे. 

काश्मिरची सर्वात मोठी व मुलभुत समस्या म्हनजे तेथील सातत्याने अस्थिर व आता जवळपास संपुष्टात आलेली अर्थव्यवस्था. ललितादित्यासारख्या असंख्य काश्मिरी राजा/सम्राटांनी व्यापार व उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत तेथील अर्थव्यवस्था सबळ ठेवली होती. नंतरच्या काळात ती क्रमशा: ढासळत सामान्य बनली. आता नंतर तर ती परावलंबी झाली. केंद्राच्या मदतीखेरीज त्यांचा अर्थसंकल्प पुरा होऊ शकत नव्हता. आता तर काश्मीरचे विभाजनही करून त्यांचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. खरे तर हे काश्मिरींचे अवमूल्यन होते आणि त्याचा समाज-मानसशास्त्रीय परिणाम समजावून घेण्याचा कसलाही परिणाम झालेला नाही.

पर्यटन हा तेथील सामान्यतया ७०% अर्थव्यवस्था सांभाळत असे. गेल्या चार वर्षात पर्यटन खालावत जात आता जवळपास केवळ ०% वर आले आहे. तो पुन्हा वाढवायला सुरुवात करावी तर या आघाडीवरही सुमसाम शांतता आहे. हस्तकला उद्योग हा काश्मिरची शान, पण त्यात परंपरा जपत असतांनाच आधुनिकता आणण्याचे कसलेही प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे ते बेरोजगार झाले आणि आता काश्मिरीच्या नांवाखाली पंजाबी यंत्रमागावर बनलेल्या शाली/गालिचे विकले जातात. या उद्योगातील लोक बव्हंशी भुमीहीन असल्याने त्यांच्या परवडीला पारावर राहिलेला नाही. फळबागा हे एक तेथील अर्थव्यवस्थेतील महत्वाचे साधन. पण साठवणुकीच्या अपु-या सोयी, प्रक्रिया उद्योगांचा अभाव आणि बाजारपेठेत अस्थिर परिस्थिर्तीने झपाट्याने गमावत चाललेले स्थान यामुळे तीही तेवढी किफायतशिर राहिली नाही. त्यामुळे काश्मिरमध्ये बेरोजगारीचा विस्फोट झाला आहे. ३७० रद्द केल्यानंतरच्या कर्फ्यू काळात तर बेरोजगारीने नवे उच्चांक गाठले होते. बेरोजगारांना शाश्वत व भविष्याबाबत हमी देईल अशा रोजगाराचीच सोय नसेल वा तसे वातावरणही नसेल तर युवक काय करणार?  आणि अर्थस्थितीच सामाजिक स्थिती ठरवत असते हा जगभर कधीही आणि कोठेही लागु पडणारा सिद्धांत आहे याचे विस्मरण आमच्या या सरकारला झाले आहे. कोणत्याही धर्म द्वेषाने शांतता आणता येत नाही याचे भान सरकारही जेंव्हा गमावते तेंव्हा जी विपरीत स्थिती निर्माण होते ती आता काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे.  

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक यावी, तेथील अर्थव्यवस्था सुधारावी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा म्हणजे फुटीरतावादाकडे वळू पाहणा-या तरुणांना रोखता येईल आणि काश्मीर वैभवाच्या शिखराकडे वाटचाल करु लागेल हे स्वप्न नवे नाही. पण तसे आजतागायत होऊ शकलेले नाही. खरे तर काश्मिरी संस्कृती, मानसिकता आणि त्यांच्या विकासाच्या कल्पना समजावून घेण्यात आलेले घोर अपयश यामुळे काश्मीरची प्रगती झालेली नाही. ३७० कलम असे होण्यातील फार मोठा अडथळा होता असा एक समज आहे. तो खरा मानला तरी आता गुंतवणुकीचा ओघ वाढायला हरकत नव्हती. पण तसे झालेले नाही याचा अर्थ सरकारचा हेतू शुद्ध नव्हता असा तर्क करण्यास हरकत नसावी. 

मुळात येथे गुंतवणूक कशी यावी? ती काश्मीरच्या एकंदरीत मानसिक आणि भौगोलिक रचनेला साजेशी असेल याचा विचार करुन सरहद संस्थेचे संजय नहार यांनी त्यावर बारकाईने अभ्यासाने काम करून अंमलात येऊ शकणारा पहिला धोरणात्मक प्रस्ताव त्यांनी सरकारला तर पाठवला होता. सरकारनेही त्याचे स्वागत केले. चर्चा केल्या. त्यावर अंमलबजावणीही सुरु करण्याची आश्वासने देण्यात आली. 

सरहद संस्था गेली तीस वर्ष काश्मीरमध्ये शांतता आणि विकास तसेच अनाथ आणि गरीब काश्मिरी मुलांचे शिक्षण यावर मुलभूत काम करत आहे. झाली आहे. काश्मिरी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने त्यांचे स्वप्ने, आकांक्षा, गरजा आणि  एकुणातील मानसिकता याचा त्यांचा सखोल परिचय आणि अभ्यास असल्याने त्यांनी “पुणे मॉडेल” या नावाने सादर केलेला धोरणात्मक प्रस्ताव फार महत्वाचा होता व आहे. हा प्रस्ताव सामाजावून्ब घेण्याआधी आपण काश्मिरी इतिहास, संस्कृती आणि तेथील भौगोलिक स्थितीमुळे तयार झालेली मानसिकता यावर एक नजर टाकूयात.

पाच हजार वर्षांचा लिखित इतिहास असलेले हे एकमेव राज्य. सांस्कृतिक आणि राजकीय उलथापालथी या राज्याने जेवढ्या पाहिल्या त्याला तोड नाही. येथील सामाजिक रचनाही त्यामुळे स्वतंत्र आणि वेगळी होती आणि तिचे रूप आजही आजच्या धर्म वेगळा झाला असला तरी समाजरचनेत प्रतिबिंबित झालेले आहे.

इतिहासात डोकावले तर आपल्याला इसवीसनाच्या सहाव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत काश्मीरने भारताचेच नव्हे तर आशिया खंडाचे बौद्धिक व वैचारिक नेतृत्व केले. शैव , बौद्ध व जैन तत्वाद्न्यानाला येथे स्वप्रतीभेने नवी वळणे देण्यात आली. आज जगभर पसरलेल्या वज्रयानी बौद्ध धर्माची निर्मिती येथलीच. अभिनवगुप्तसारखे प्रकांड पंडित, लल्लेश्वरीसारखी शैवयोगीनी जी मुस्लिमांनाही “लल्ल अरिफा” नावाने तेवढीच परी आहे ते येथीलच. सहिष्णुता हा येथील समाजजीवनातील रुजलेला घटक. सुफी पंथाने येथेच सर्वप्रथम प्रवेश केला. लाल चौकातील हनुमानाला मुस्लीम सुफी संस्कारांत वाढल्याने पीर म्हणून भाजतात आणि चक्क नवसही बोलतात. राजकीय पटलावर पाहिले तर आठव्या शतकात कर्कोटक घराण्यातील सम्राट ललितादित्याने खो-याच्या बाहेर पडून तिबेट, इराण, तुर्कस्थान तर जिंकलेच पण सिंध, पंजाब, मध्यदेश एवढा विशाल प्रांत आपल्या अंमलाखाली आणला. तिबेटला तीनदा हरवले. लदाख भारताला जोडला. चीनला राजकीय मुत्सद्दीपणात शह दिला. शासनव्यवस्थेचे नवे तत्वज्ञान निर्माण केले. ललितादित्याच्या साम्राज्याच्या विशालतेची तुलना फक्त सम्राट अशोकाशी होऊ शकते. ग्रीको-रोमन स्थापत्यकारांपासुन गांधार व तिबेटमधील शिल्पकारांनाही आपल्या राज्यात उदार आश्रय दिला. त्यानेच मध्यदेशातुन अत्रिगुप्त या विद्वानाला त्यानेच काश्मिरला आणले. हा अत्रिगुप्त म्हणजे संपुर्ण भारतावर धर्म-तत्वज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरश: एकाधिकारशाही गाजवणा-या अभिनवगुप्ताचा पुर्वज. शैव तंत्र सिद्धांतांना त्याने अपरंपार शास्त्रीय रुप तर दिलेच पण व्याकरण ते नाट्य या विषयांवरही आपली छाप सोडली. अफगाणिस्तान व तिबेटमध्ये प्रथम बौद्ध धर्म गेला तो काश्मिरमधुन आणि या बुद्धीझमवर शैव तंत्रांची अपरंपार छाया आहे. काश्मिरमधुनच शेकडो ग्रंथ तिबेटियन भाषेत अनुवादित केले गेले व तिकडे जात कश्मिरी बौद्धांनी तिबेटला बौद्धमय केले. भारतातील असंख्य विद्वान शैव सिद्धांत समजावुन घ्यायला काश्मिरमध्ये जात. थोडक्यात काश्मिर हा वैचारिकतेचे एक चैतन्यमय उर्जाकेंद्र म्हणून प्रदिर्घकाळ देशाला मार्गदर्शक राहिले.

मोगल शासनकाळापासुन हा प्रदेश पुन्हा एकदा देशापासुन वैचारिक व भावनिक दृष्ट्या तुटत गेला. मुळात हिमालयाच्या पर्वतराजीने वेढलेल्या या भागातील माणसाची मानसिकताही पहाडी भागांतील माणसांप्रमाणेच साधी-सरळ, निष्कपट पण तेवढीच लढाऊ व स्वातंत्र्यप्रिय. राजकीय उठावांचा इतिहास कश्मिरला नवा नाही. असे असले तरी येथील मुस्लिम सुफी तत्वज्ञानाकडेच्घ आकर्षित झालेले होते. उर्वरीत भारतातील लोकांनी काश्मिरशी नंतर फारसे संबंध वाढवायचा प्रयत्न केला नाही. राजकीय उद्दिष्ट्ये वगळता वैचारिक चळवळींशी त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. मराठ्यांनी उत्तरेत पार पातशाहीवर नियंत्रण आणले पण त्यांचीही पावले काश्मिरकडे वळाली नाहीत. काश्मिरचे वैचारिक क्रांतीचे तेज मलूल होत गेले आणि आता ते पार विझले आहे की काय असे म्हणायची वेळ आली आहे. काश्मिरी माणुस हा फक्त उथळ आणि सवंग पण भडक राजकीय विचारव्युहांचा गुलाम झाल्याचे चित्र आहे आणि त्याला काश्मिरी लोकांची चूक जेवढी जबाबदार आहे त्यापेक्षा अधिक तथाकथित राष्ट्रभक्तांचे एकतर्फी विखारी प्रचारही जबाबदार आहेत. आज तेथे, मग ते पंडित असोत की मुस्लिम, त्यांचे इतिहास व संस्कृतीचे आकलन सापेक्ष व तथ्य नव्हे तर केवळ समजांवर आधारित आहे आणि त्यात प्रत्येकजण आपले समज हाच इतिहास मानतो. त्यामुळे इतिहासापासुन शिकण्यासारखे काश्मिरकडे प्रचंड काही असतांनाही आता गैरसमजाने भरलेला इतिहासच एक रोडा बनला आहे की काय अशी शंका येते.

हा इतिहास आणि वर्तमानाने निर्माण केलेली आव्हाने या कात्रीत समाज मानसिकता उद्रेकी बनण्याचा धोका असतो. आणि ते तसे काही बाबतीत झालेही. काश्मिरींना विकास हवा आहे पण तो त्यांच्या पद्धतीने. त्यांच्या पर्यावरणाला धक्का न लागू देता आणि त्यांच्या संस्कृतीला धक्का न लागू देता. त्यांचा स्वाभिमान जपत त्यांना विकास हवा आहे. जमिनी आणि स्त्रियांवर डोळा ठेवून काशीरामध्ये यायच्या गमजा करणारे “संघ” बहाद्दर त्यांना नको आहेत.

"पुणे मॉडेल"ने  या सर्वांचा विचार करूनच काश्मीरमध्ये उद्योग-व्यवसायाबद्दल कसे धोरण असावे याची सविस्तर रूपरेखा तयार केली आणि त्यावर मी एक पुस्तिकाही लिहिली. हा प्रस्ताव जनतेने उचलून धरल्यावर राज्य व केंद्र सरकारनेहे तत्वता: का होईना या प्रस्तावाला मान डोलावली.  

काय आहे हे मोडेल?

काश्मीर, लद्दाख आणि जम्मुची भुरचना ठिसुळ अशा हिमालयीन पर्वतराजीने व्याप्त आहे. कसलेही अभियांत्रिकी अवजड उद्योग तेथे स्थापन करता येणे शक्य नाही. कच्च्या मालाच्या वाहतुकीत अडथळे असल्याने आणि ते मुख्य भूमीवरून आणावे लागणार असल्याने महाग पडेल त्यामुळे तेथे इंजिनियरिंग, केमिकल अथवा इलेक्ट्रोनिक उद्योग उभे करता येणे अत्यंत खर्चिक व म्हणुनच अशक्य असणार आहे. अशा स्थितीत शिक्षण, आरोग्य, फळप्रक्रिया, पर्यटन आणि पशुपालन हेच उद्योग काश्मीरच्या एकंदरीत प्रकृतीला साजेसे राहतील. गुंतवणूक आली तर याच क्षेत्रात यावी हे खरे असले तरी ती कशी तर स्थानिकांना आत्मसन्मान देत त्यांचीही भागीदारी घेत काश्मिरी जनतेला नेतृत्व देत त्यांना सामावुन घेण्यासाठी आली पाहिजे. काश्मीरी मानसिकता आणि सध्या त्यांच्या मनात जो क्षोभ आहे तो पाहता त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य धोकेदायक ठरू शकते. काश्मीरमध्ये अत्यंत महत्वाची अशी फिल्म सिटी स्थापन करण्यात यावी म्हणजे काश्मीरचे सौंदर्य  आणि तेथील कला अभिव्यक्ती जगासमोर जात पर्यटनाला वेग मिळेल असाही प्रस्ताव यात सामील आहे आणि अ.भा. मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि मुंबई फिल्म सिटीचे माजी कार्यकारी संचालक श्री, लक्ष्मीकांत देशमुख यांचे सहकार्य घेऊन हा सविस्तर प्रस्तावही पुणे मॉडेल अंतर्गत समाविष्ट आहे. छोट्या व्यावसायिकांना वित्तपुरवठा ही मोठी गंभीर समस्या आहे हे ओळखून त्यावरही सरकारने काम करावे अशी सुचना संजय नहार यांनी तर केलीच मन स्वत:ही महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांचा सहभाग असलेली एक आंतर-राज्य मायक्रो फायनान्स बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन केली. म्हणजे सल्ला देतांना अंमलबजावणीत स्वत:चाही प्रत्यक्ष सहभाग देणारी ही कृती.  

नहार एवढेच करून थांबलेले नाहीत तर दहशतवादाने पिडीत विभागातच शिक्षण संस्था काढण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षण संस्थाना तर आवाहन केलेच पण दोडासारख्या दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या भागात सरहदतर्फे शिक्षणसंस्था काढण्याची पावलेही उचललेली आहेत. या मॉडेलमध्ये जमीन स्थानिकांची, शिक्षक, व्यवस्थापकही तेथलेच असावेत अशी व्यवस्था आहे तरच स्थानिक खुल्या दिलाने स्वागत करतील, संशयाने पहात बहिष्कार घालणार नाहीत. .सरहद संस्था शिक्षकांना तसेच तेथील स्थानिकांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण आणि साधनांचा पुरवठा करणार आहे. यातून काश्मीरींच्या मनात विश्वास तर निर्माण होईलच पण आपल्या वेदनांवर कोणीतरी फुंकर घालते आहे, ही भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील विश्वकर्मा इंस्टिट्यूट, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ ते स.प., के.जे.एस, अर्हमसारख्या आघाडीच्या शिक्षण संस्थांनी काश्मीरमधील शिक्षणाची गरज भागवण्यासाठी तेथे संस्था सुरु करण्यासाठी आणि “आत्मसन्मान, रोजगारर्निर्मिती आणि स्थानिक नेतृत्व" या त्रिसुत्रीवरच काम करण्यासाठी सरहदच्या माध्यमातूनच प्रस्ताव दिला होता. इतरही उद्योग तेथे जातील. पण त्यांचा भर जमीनी घेणे, प्लाँटिंग करणे अशा अनुत्पादक गोष्टींवर राहू शकतो. जमीन घेतल्यानंतर पाच वर्षात तेथे उद्योग उभा राहिला नाही किंवा प्रस्तावित उद्योगापेक्षा वेगळेच उद्योग सुरु करण्यात येत असतील तर त्या जमीनी पुन्हा मुळ मालकांना देण्याचेही धोरण ठरवावे लागेल. काश्मीरच्या भु-पर्यावरणाला कसलाही धोका पोहोचेल असे उद्योग तेथे येता कामा नयेत अशी खुद्द लद्दाखी जनतेचीही अपेक्षा आहे.

काश्मीरचे नंदनवन अबाधित राहत तेथे आर्थिक सुबत्ताही यावी, उत्तम शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा काश्मीरमधील असंतोष, क्षोभ आणि अविश्वास संपवण्याचा एकमेव राजमार्ग आहे. ३७० कलम काढल्यावर बुभुक्षिताप्रमाणे तेथील जमीनींवर लक्ष ठेवत, सरकारी सोयी-सवलतींवर डोळा ठेवत स्थानिकांचा सहभाग टाळला गेला तर मात्र जम्मू काश्मीरच्या जनतेचे भारताशी एकरूप होणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. याचा केंद्र आणि राज्य सरकार बरोबर गुंतवणूकदारांनीही विचार करायला हवा. संजय नहारांचे पुणे मॉडेल महत्वाचे व अनुकरणीय ठरते ते येथेच.

पण गेल्या वर्षभरातील घटना पाहिल्या तर केंद्र सरकारला काश्मीरचा विकास व्हावा असे खरोखर वाटते काय हा प्रश्न पडतो. जम्मूभागात व खो-यात सरकारने आजवर अधगृहीत केलेली जमीन आहे दहा हजार एकर. महाराष्ट्रातील अप्रगत भागातील एम.आय.डी.सी.चे क्षेत्र याच्या खूप मोठे असते आणि असे असले तरीही या आधीगृहीत केलेल्या जमिनीपैकी एक इंचही वितरण झालेले नाही यावरूनच काय ते लक्षात यावे. 

यासाठी कोरोनाची लाट हा एक बहाणा आहेच! ही आपत्ती मानली तरी विकासाच्या योजना पुढे सरकवत राहणे अशक्य नव्हते. नाहीही. पण सरकारला खरेच काश्मीरचा विकास हवा आहे की काश्मिरींना सतत दडपनाखाली ठेवत सांस्कृतिक दमन करायचे आहे हा प्रश्न आहे आणि उत्तर समाधानकारक नाही हे उघड आहे. यामुळे काश्मिरी जनता आणि तेथील अर्थ आणि सामाजिक व्यवस्था प्रगतीशील व्हावी यासाठी वाहून घेतलेल्या संजय नहार यांच्यासारख्या मोजक्या लोकांचीही अडचण होते. काश्मिरी जनता मुख्य प्रवाहात यायचे असेल तर पुणे मॉडेल उपयुक्त आहे पण भाजपा सरकार आणि संघाला मुळात काश्मीरची भूमी हवी आहे पण तेथेल लोक नको आहेत असे चित्र निर्माण झालेले आहे. ते बदलायचे असेल तर अजूनही वेळ गेली नाही. 

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहेच. त्यावरील खोटारडे राजकारण आता पुरे झाले. आता तेथील लोकांनाही आपलेसे करत त्यांच्या विकासात हातभार लावला पाहिजे. त्यांचे सातत्याने दमन करून नव्या उद्रेकाला वाव देण्यात कसलेही शहाणपण नाही!

-संजय सोनवणी

Wednesday, November 4, 2020

जैन आणि सेक्युलॅरिझम

जैन धर्माची स्थापना भगवान महावीरांनी केली अशी साधारणतया मान्यता असली तरी ते खरे नाही. तेविसावे तीर्थंकर पार्श्वानाथांची ऐतिहासिकता सिद्ध झाली असून त्यांचा काळ इसवी सनापूर्वीच आठवे शतक मानला जातो. यजुर्वेदातले उल्लेख सत्य आहेत असे मानले तर आद्य तीर्थंकर भगवान ऋषभनाथ हेही ऐतिहासिक पुरुष होते असे मानावे लागते आणि डा. सर्वपल्ली राधाकृष्णनसारख्या सारख्या विद्वानांनी ते मान्यही केले आहे. यजुर्वेदात ऋषभनाथ, अजितनाथ आणि अरिष्टनेमी या इतिहासातील तीर्थांकारांची नावे आलेली असून जैन धर्म वेदपूर्व प्राचीन समन परंपरेतून निर्माण झाला. भागवत पुराणानेही ऋषभनाथ जैन धर्माचे संस्थापक असल्याचे नोंदवलेले आहे.

सिंधू संस्कृतीने वैभवाचे टोक गाठल्यानंतर जी सुखोपभोगाची परंपरा निर्माण झाली त्याची प्रतिक्रिया विरक्ती आणि अपरीग्रहाच्या रूपाने उमटणे स्वाभाविक होते. समाज जेंव्हा संपत्ती निर्माण आणि उपभोग यांना महत्व देवू लागतो तेंव्हा समाजात विषमताही निर्माण होणे स्वाभाविक असते. त्यामुळे समाजात शोषक आणि शोषित अशी वाटणी होणेही अपरिहार्य बनून जाते. समाजात अनेक दोष शिरू लागतात आणि ही अवस्था सिंधुकालातील वैभवशाली स्थितीमुळे निर्माण झाली. तत्कालीन समाजातील विद्वानांनी व विचारकांनी याची प्रतिक्रिया म्हणून जे तत्वज्ञान निर्माण केले त्याला “समन” तत्वज्ञान म्हणतात. समन हा प्राकृत शब्द असून जरी “श्रमण” असे त्याचे कृत्रीम संस्कृतकरण केले जात असले तरी ते चुकीचे असून समन याचा अर्थ “समान” असाच प्राकृत शब्दकोशाने दिला आहे आणि तोच बरोबर व त्या संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारा आहे.

या आरंभीच्या विचारकांनी गृहस्थी जीवनाचा त्याग करून,स्थायी जीवन सोडून वन-अरण्यात मुक्त संचार करायला सुरुवात केली आणि संपत्तीसंग्रहातून निर्माण होणा-या  दु:ख्खाचा निषेध केला. एवढेच नव्हे तर सत्य, अहिंसा आणि सर्व जीवामात्रांकडे समान दृष्टीने पाहण्याचा फिरून उपदेश करायला सुरुवात केली. काहींनी तर वस्त्रांचाही त्याग केला. अर्थात या विचारपरंपरेत अनेक पुरुष व महिला सामील झाले असले तरी त्यांच्या तत्वज्ञानात वेगवेगळेपणा होता. कारण ऐहिक जीवन कसे असावे याबाबत एकमत असले तरी जीवनाचे अंतिम ध्येय आणि ते प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल विभिन्न विचार होते. प्रत्येक विचारकाला आपापले अनुयायीही होते. जीवनाविषयकचे कुट प्रश्न सोडवतांना असे वेगवेगळे मार्ग निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यात कालौघात असंख्य पंथही निर्माण झाले आणि अनेक विस्मृतीतही गेले. उदा. महावीरांच्या काळातच समन परंपरेतील किमान २४-२५ पंथ होते याच्या नोंदी आपल्याला जैन आणि बौद्ध साधनांतून मिळतात. व्रात्य, आजीवक हेही त्यातीलच गट. आज ते पंथ अस्तित्वात नाहीत. आचरण मार्ग आणि अंतिम ध्येयाबाबतचे तत्वज्ञान ज्यांचे उदात्त आणि सर्वसमावेषक होते ते समन पंथ टिकून राहिले. भारतात टिकून राहिलेला आणि सलग इतिहास असलेला “जैन” हा समन परंपरेतील एकमेव धर्म आहे असे आपल्याला दिसून येते. बौद्ध धर्मही समन परंपरेतिलाच पण गेल्या सहस्त्रकात उतरती कळा लागत तो शेवटी भारतातून नामशेष झाला होता. असे असले तरी अन्य देशांत मात्र तो प्रचंड वाढला.

कोणत्याही धर्मात “सर्वधर्म-समभाव” नामक महनीय तत्व आहे की नाही हे त्या धर्माचा इतिहास, तत्वद्न्यान आणि कर्मकांडात्मक जीवनावरून ठरते. तसे पाहिले तर जगातील बव्हंशी धर्म हे एकारलेले असतात, परधर्मीयांबाबत अत्यंत असहिष्णू असतात असे म्हटले जाते. तसा प्रचार तरी केला जातो. या दृष्टीने आपण जैन धर्म आणि सेक्युलॅरिझम याचा विचार केला पाहिजे.

या धर्माचा इतिहास आपण पाहिला तर या धर्माने इतर धर्मांना जसे आपले मौलीक तत्वज्ञान दिले तसेच इतर धर्मांपासून अनेक गोष्टींचा स्वीकारही केला. संघर्षापेक्षा समन्वयाची भूमिका ठेवण्याकडे जैन साधू-साध्वीन्चा कटाक्ष असल्याचे जैन आगमे ते पुराणांतून दिसून येते.

पहिली बाब म्हणजे अन्य धर्मातील देवतास्वीकार. जैन धर्माने बौद्धाम्प्रमाने नंतर भारतात आलेल्या आणि आक्रमकतेने प्रचार करणा-या वैदिक धर्माशी संघर्षाची भूमिका घेतली नाही. वैदिकांची इंद्र-वरुण इत्यादी देवता दुय्यम स्वरूपात क होईना स्वीकारल्या व तीर्थकरांच्या जीवनकथांतही त्यांना स्थान दिले. वैदिक धर्मीयांच्या यज्ञांना त्यांनी मात्र टाळले आणि ते स्वाभाविक होते. सिंधू कालापासून चालत आलेला स्थानिक पुरातन लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो) हा लिंग पुजकांचा, प्रतिमापुजकान्चा धर्म होता. या लोकसंस्कृतीत यक्षांना मोठे स्थान होते. जैन धर्माने प्रत्येक तीर्थकराला  संरक्षक यक्ष-यक्षीणीची एक जोडी असतेच. ऋषभनाथांचे दुसरे पर्यायी नाव आदिनाथ असून त्यातून शिवाशीही तादात्म्य साधले गेले आहे. एवढेच नव्हे तर २४ पैकी किमान सतरा तीर्थकरांच्या नावात “नाथ” हे संबोधन आलेले आहे. ही संघर्षाची नसून समन्वयाची प्रक्रिया होती हे सहज दिसून येते. आपले तत्वज्ञान आणि कर्मकांड स्वतंत्र ठेउनही एकार्थाने हा अन्य धर्मांबद्दल दर्शवलेला आदरभाव आहे असेही आपल्याला दिसते. यामुळे जैनांचा अन्य धर्मियांशी जैनांच्या बाजूने सहसा संघर्ष झालेला दिसत नाही. वैदिक धर्माने अन्य धर्माना एकतर आपल्या पंखाखाली घेतले वा संपवले, पण जैन धर्माबाबत तसे अनेक प्रयत्न करूनही त्यांना ते जमले नाही. याचे कारण म्हणजे समन्वयवादी भूमिकेमुळे जनसामान्यातही या धर्माने स्थान मिळवले होते असेच आपल्याला इतिहासावरून दिसते.

सर्व-धर्म समभावाचे मुलभुइत तत्वज्ञान आपल्याला जैनांच्या “अनेकांतवादात” सापडते. किंबहुना हे तत्वज्ञान जैन तत्वद्न्यानाचा मुलभूत आधार आहे. अनेकांत वाद म्हणतो की सत्य समजायचे अनेक मार्ग आहेत. एकाच गोष्टीकडे भिन्न दृष्टीकोनातून पाहिले की सत्य आणि वास्तविकता वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे येतात. एकाच दृष्टीकोनातून पाहिले तर पूर्ण सत्य सामोरे येऊ शकत नाही. प्रत्येक वस्तू अनंत गुणधर्मांचे प्रकटीकरण असून त्यात तेवढेच विरोधी तत्वांची युग्मे सहअस्तित्वात असतात. प्रत्येक व्यक्तीचे आकलन वेगळे असल्याने त्याला दिसणा-या विशेषता हा त्याच्या दृष्टीकोनाचा परिपाक असतो. हे तत्वज्ञान ईश्वरी आद्न्यांच्या आधारावर आदेशात्मक नसून वस्तू अथवा प्रश्नांकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी देते. अनेक धर्मांची सत्याकडे पाहण्याची वेगवेगळी दृष्टी असते अथवा असू शकते ही मुलभूत मान्यताच असल्याने यात संघर्षाला स्थानच नाही. कोणता धर्म कोणाला अंतिम प्रेषित अथवा ईश्वर अथवा दैवत मानतो कि तो नास्तिक आहे हाही मुद्दा नसून तो व्यक्तीने अथवा एखाद्या समुदायाने त्याच्या दृष्टीने सत्याकडे पाहिले आहे म्हटल्यावर पूजनीय कोण? अंतिम सत्य काय? मोक्ष कशाने मिळेल? मानवाचे अंतिम कल्याण कशात आहे? यासारख्या प्रश्नांकडे पाहण्याच्या इतर धर्म म्हणजे पद्धती आहेत ही मान्यता मुळातच तत्वज्ञानात असल्याने जैनांचा इतरांशी तसाही संघर्ष होण्याचे कारण नव्हते.

बरे, हे झाले तत्वद्न्यानाचे.  मुलभूत धर्म तत्वज्ञान त्या धर्माच्या लोकांनाही बारकाईने माहित असते असे नाही. किंबहुना नसतेच. पण कर्मकांडात्मक मंत्र मात्र रोजच्या म्हणण्यात असतात. त्यांना पावित्र्यही असल्याची श्रद्धा असल्याने त्यातील मुलार्थ तरी मंताजाप करणा-या धार्मिकांस माहित असतो. जैनांचा मूलमंत्र आहे णमोकार मंत्र. हा आहे जैन धर्मातला सर्वात महत्वाचा मंत्र. या मंत्राला मूलमंत्र, महामंत्र, पंचनमस्कार मंत्र किंवा पंचपरमेष्ठी मंत्र असेही म्हटले जाते. खरे म्हणजे जैन तत्वज्ञानाचे मुलभूत सार या मंत्रात आले असल्याने अभ्यासकांच्या दृष्टीनेही हा मंत्र महत्वाचा आहे.

 
या मंत्राची विशेषत: ही आहे की यात कोणाही अमूर्त देवी-देवतेला वंदन केलेले नाही कारण विश्व निर्माता, मानवी जीवनाचा नियंता असलेला, प्रार्थना करुन संतुष्ट होणारा देव किंवा ईश्वर ही संकल्पना जैन धर्मात नाही. जैनांच्या दृष्टीने प्रत्येक जीव किंवा आत्मा हाच देव आहे पण कर्मामुळे आपल्या उच्च कोटीवरुन तो खाली घसरलेला आहे. त्यावर मात करत तो उच्च कोटी प्राप्त करु शकतो व आपल्या मुळच्या इश्वरी रुपाला पोहोचू शकतो. एकमात्र देव तर नव्हेच एकमात्र अरिहंत ही संकल्पनाही जैन धर्मात नाही. हा धर्म समष्टीमधील देवपणाला पाहतो. त्यामुळेच या मंत्रात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधु-साध्वींना वंदन केलेले आहे. कोणत्या अमूर्त दैवत संकल्पनेला नाही. किंबहुना मानवी जगापारच्या महाशक्तीशाली अद्भूत आणि कर्ता-करविता अशा ईश्वराची संकल्पना जैनदर्शन मान्य करत नही तर उलट मनुष्यमत्रात किंवा सर्व जीवांत जैन नुसता देव पाहत नाहीत तर तेच देवकोटीला पोहोचू शकणारे देव आहेत  असे मानतात.

 अरिहंत म्हणजे ज्याने आपल्या काम-क्रोध-लोभ-मत्सर आदि विकारांचा पराजय केला आहे, त्यांच्यावर विजय मिळवला आहे तो अरिहंत. सिद्ध म्हणजे मूक्त जीवात्मा. भारतात एके काळी सिद्ध संस्कृती वेगवेगळ्या धर्मांत व पंथांत पसरलेली होती आणि "सिद्ध" या शब्दाचे पारिभाषिक अर्थ प्रत्येक संप्रदायाने आपापल्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लावले आहेत. जैन धर्मात अभूत सिद्धी मिळवतो तो सिद्ध असा अर्थ नसून निर्वाणप्रसंगी जो सर्व पाशांतून मूक्त आणि स्वतंत्र झालेला असतो तो सिद्ध असा अर्थ आहे. (आचारांग सुत्त १.१९७) मूक्त जीवात्मा म्हणजे सिद्ध असे येथे थोडक्यात म्हणता येईल. किंबहुना अरिहंतानंतरची उच्च कोटी म्हणजे सिद्ध अशी ही संकल्पना आहे.

 
आचार्य म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शक. ज्याची यात्रा केवलज्ञानाच्या दिशेने सुरु आहे आणि जो मनुष्यमात्राला दिशा देतो, नवे ज्ञान प्राप्त करून समाजाला देतो तो आचार्य तर उपाध्याय म्हणजे शिक्षक किंवा सामान्यातिसामान्यांनाही कोणत्या दिशेने आणि कसे जायचे हे शिकवणारी व्यक्ती. साधू म्हणजे अशी व्यक्ती की ती स्त्री असेल अथवा पुरुष, सर्वांग परित्याग केलेला आहे, तपस्या हाच ज्याचा एकमात्र उद्देश आहे आणि केवलज्ञान मिळवण्याचा अविरत प्रयत्न सुरु आहे ती.

 
या मंत्रातील विशेषत: अशी की ती यच्चयावत जगातील सर्व अरिहंत, सर्व साधू, सर्व उपाध्याय, सर्व सिद्ध आणि सर्व आचार्यांना एकत्रीतपणे नमस्कार केला आहे. कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीला यात स्थान नाही. यात कोणताही विशिष्ट धर्मही अभिप्रेत नाही. एका अर्थाने ही सर्व धर्मीयांची प्रार्थना आहे. ही समष्टीची मुलभूत संकल्पना आहे. सर्व मानवजातीत या पाचही परमेष्ठींपैकी एक होण्याची योग्यता आहे आणि जे झालेत त्या सर्वांना कोणताही धार्मिक अभिनिवेष न आणता नमन करण्याची उदारता आहे. शिवाय या पाचही पदांना विशिष्ट अर्थ आहे आणि आध्यात्मिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही ही संकल्पना लागू पडते. या सर्वांना नुसता नमस्कार करणे हे अनुस्युत नसून प्रत्येक व्यक्तीने यातील पाय-या ओलांडत “केवली” बनावे असे अभिप्रेत आहे. थोडक्यात कोणत्याही कर्ता-करवित्या ईश्वरी संकल्पनेच्या आहारी न जाता मनुष्यालाच देव होण्याची संधी आहे कारण तोच देव आहे असा व्यापक मानवविचार मांडणा-या जैन धर्माचा हा मंत्र आहे आणि साररुपात ते तत्वज्ञान मांडनारा हा मंत्र आहे. या मंत्राचा पहिला शिलालेखीय पुरावा इसवी सन पूर्व १६२ मधील जैन सम्राट खारवेलाच्या उदयगिरी टेकड्यांमधील हाथीगुंफा शिलालेखात मिळतो. हा मंत्र त्याहीपेक्षा पुरातन आहे हे उघड आहे.

ज्या काळात भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षांची रेलचेल उडाली होती, विविध धर्म आणि पंथ तत्वज्ञान व इष्ट देवतांवरून वैचारिक वादंगे माजवत होते त्या काळात हा मंत्र, खरे तर प्रार्थना, जन्माला यावी हे विशेष म्हणावे लागेल. कोणताही धार्मिक अभिनिवेश न आणता, अगदी तीर्थांकारांचेही नाव न घेता एखादा धर्ममंत्र असू शकतो आणि तोच ख-या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक बनू शकतो.

जगातील सर्व धर्मांत सुसूत्रता यावी, वैरभाव कमी व्हावा यासाठी १८९३ मध्ये शिकागो येथे भरवण्यात आलेली पहिली विश्व धर्म संसद ही एकोणिसाव्या शतकातील सर्वात मोठ्या जागतीक धर्म-संस्कृतीच्या चळवळीची सुरुवात होती. परस्पर धर्मांबद्दलचे अज्ञान, समज-गैरसमज, अहंकार, अन्यधर्मियांबद्दलचा तुच्छतावाद किमान सौम्य व्हावा आणि अखिल मानवजातीत बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी कोणती तत्वे उपयुक्त ठरतील यावर चर्चा करण्यासाठी जगभरातून प्रत्येक धर्मातील विद्वानांना तेथे पाचारण करण्यात आले होते. असे असले तरी या संसदेतील काही वक्त्यांनी औचित्यभंग करत विशेषत: हिंदू धर्मावर टीका करण्यात धन्यता मानली. स्वामी विवेकानंदांचे भाषण आधीच होऊन गेले होते. जैन धर्माचे प्रतिनिधी म्हणून तेथे जैन धर्म व तत्वज्ञानाचे प्रकांड विद्वान बॅरिस्टर वीरचंद गांधी उपस्थित होते. २५ सप्टेंबर १८९३ रोजी त्यांचे जैन धर्मावर भाषण होते. पण त्यांनी जैन धर्मावर बोलायला सुरुवात करण्याआधी प्रथम हिंदू धर्मावर केल्या गेलेल्या टीकेचा विद्वत्तापुर्वक समाचार घेतला. धर्म-संसदेच्या इतिवृत्तात लिहिले आहे की त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या आणि टीकाकार खजिल होऊन गेले होते. अन्य धर्मांबद्दलचा तुच्छताभाव कमी व्हावा हे धर्मसंसदेचे ध्येय असतांनाही आपलीच धर्मतत्वे विसरत काही विद्वानांनी औचित्यभंग केला पण बॅरिस्टर वीरचंद गांधी या तरुण विद्वानाने धर्मसंसदेला आपल्या मुळ ध्येयाकडे परत खेचून आणण्याचे अपार मानवतावादी बुद्धीकौशल्य दाखवलेअसे गौरवोद्गार धर्मसंसदेचे आयोजक असलेले रेव्हरंड जॉन बॅरोज यांनी काढले. इतकेच नव्हे तर त्यांनी गांधींचे जैन धर्मावरील भाषण प्रस्तावनेसहित प्रसिद्ध केले. या भाषणाने प्रभावित झाल्याने धर्मसंसदेच्या समारोप समारंभात वीरचंद गांधींना पुन्हा भाषण देण्यासाठी पाचारण केले गेले. हे उत्स्फुर्त भाषण एवढे गाजले की नंतर अमेरिकेत त्यांना शेकडो भाषणे द्यावी लागली.

वीरचंद गांधी यांनी एका अर्थाने सर्वधर्म समभावाचा प्रत्यय या पहिल्या-वहिल्या धर्मसंसदेत दिला ते त्यांना जैन तत्वज्ञानाचा मुख्य गाभा समजला होता म्हणून.

त्या अर्थाने आज जगाला ख-या अर्थाने सर्वधर्म समभाव समजायचा असेल तर हे जैन तत्वज्ञान पुरेसे आहे. असे असले तरी खुद्द जैन धर्मी आज श्वेतांबर-दिगंबर या मुख्य पंथांत विभागले गेलेले तर आहेतच पण अनेक उपपंथांच्या निर्मितीमुळे पंथा पंथांतच सामरस्याचा अभाव आहे. मुलभूत तत्वद्न्यानाचा आशय न समजून घेता कर्मकांडात्मक व्यावाहारांतच तल्लीन होण्याची प्रवृत्ती बळावलेली आहे. अन्य धर्मांशी आजही जैन संघर्ष करत नसले तरी आपल्याच धर्मांतील पंथांत स्पर्धा, असुया व कर्मकांडात्मक बडीवाराची भरमार आहे. जैन इतिहास आणि तत्वज्ञान यावर अलीकडे अधिक गांभीर्याने संशोधक व अनेक साधू-साध्वीही वळाले असले तरी त्यांचे प्रयत्न मर्यादित आहेत. खरे तर आपल्या तत्वद्न्यानाचे महत्व त्यांनाच समजले नसावे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे.

हे अये असले तरी जैन तत्वज्ञान मुळात जैनानीच अनुसरावे व प्रचारित करावे असे काही नाही. जैन तत्वज्ञानात जगाला मार्गदर्शन करत नैतिक मुल्यांची प्रतिष्ठापना करण्याचे सामर्थ्य आहे. आणि धर्म नव्हे पण तत्वज्ञान प्रसारित करण्यासाठी तटस्थ अन्य धर्मांतील विचारवतांनी पुढे यायला हवे आहे.

धर्मद्वेष धार्मिक अहंकारातून येतो. त्यात स्वार्थही निहित असतात...मग ते राजकीय असोत की आर्थिक. या स्वार्थांबाहेर पडत जीवनविषयक मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करत अखिल मानव जातीला स्नेहाच्या, प्रेमाच्या धाग्यात एकत्र बांधायचे असेल तर अनेकांतवाद अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. त्या तत्वद्न्यानाची आधुनिक परिप्रेक्षात नव्याने रचनाही होऊ शकते. मनुष्याला “वैश्विक मानव” बनवण्याचे उदारमतवादी सामर्थ्य जैन तत्वज्ञानात आहे हे मात्र सर्वांनाच लक्षात घ्यावे लागणार आहे!

-       संजय सोनवणी


(आंतर भारती दिवाळी अंक, २०२० मध्ये प्रकाशित)



Monday, November 2, 2020

शैवयोगिनी लल्लेश्वरी!

 



शैवयोगिनी लल्लेश्वरी!

काश्मीर अप्रतीम निसर्गदृष्ट्या भुतलावरील नंदनवन म्हणून जसे जगप्रसिद्ध आहे तसेच अनेक अभिनव तत्वज्ञानांचे, साहित्य निर्मितीचे आणि विचारांचेही नंदनवन राहिलेले आहे. काश्मीर अनेक शतके दक्षीण आशियाचे ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. येथेच शैव तत्वज्ञानाने अभिनव गुप्ताच्या रुपाने कळस गाठला तर चीन, कोरीया, अफगाणिस्तान, चायनीज तुरकमेनीस्तान, तुर्कस्तान या विशाल भुप्रदेशात गेलेला बौद्ध धर्म ही काश्मीरचीच वैशिष्ट्यपुर्ण निर्मिती. शैव आणि बौद्ध तत्वज्ञानांचा संगम करुन बनवला गेलेला हा बौद्ध धर्म जगाने स्विकारला.

येथेच हजारो संस्कृत, पाली, प्राकृत ग्रंथांची तिबेटी-चिनीसहित अनेक भाषांत रुपांतरे झाली. ह्यु-एन-त्संग ते हिचेओ असे चिनी, कोरियन प्रवासी ज्ञानप्राप्तीसाठी काश्मिरला भेट देत राहिले. त्याच वेळेस काश्मीर खो-यात अडकुन न राहता काश्मीरी धर्मप्रचारकांनी विशिष्ट बौद्ध धर्म चीनमध्ये नेला. संघभूती, गौतमसंघ व कुमारजीव हे काश्मीरी बौद्ध प्रचारक चवथ्या शतकातच चीनमधे गेले. कुमारजीवाच्या प्रतिभेने चीनचा राजा एवढा प्रभावित झाला होता की त्याने कुमारजीवाचे चक्क अपहरण केले आणि चीनमध्येच ठेवत शंभराच्या वर बौद्ध ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद करुन घेतला. कर्कोटक वंशाच्या प्रतापादित्याच्या काळात रत्नचिंता या काश्मीरी भिक्षुने चीनला भेट दिली होती. (सन ६९३) त्याने चीनमध्ये मठही स्थापन केला आणि सात संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत अनुवाद केला. गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बृहत्कथेची संस्कृत रुपांतरे झाली तीही काश्मीरमध्येच. एका अर्थाने काश्मीर हे ज्ञान, साहित्य आणि धर्म-तत्वज्ञान निर्मितीचे अनेक शतके केंद्र राहिलेले आहे. उपखंडाच्या बुद्धीवादी, गुढवादी आणि सौंदर्यवादी मानसिकतेला काश्मीरने फार मोठा हातभार लावलेला आहे.

काश्मीरला ललितादित्य (आठवे शतक), दिद्दा राणी (दहावे शतक) आणि पंधराव्या शतकातील झैन-उल-अबिदिनसारख्या महान सम्राटांचीही परंपरा आहे. ललितादित्याने अर्धा भारत तर आपल्या नियंत्रणाखाली आनलाच पण अफगणिस्तान, तुर्कस्तान, बाल्टीस्तान, गिलगिट ते लडाख हे प्रांतही आपल्या नियंत्रणाखाली आणले. तत्कालीन रेशीम मार्गांवर त्यानेच नियंत्रण ठेवले व काश्मीरला एक अर्थसत्ताही बनवले. झैन-उल-अबिदिनचा काळ अत्यंत शांततामय व धर्मिक सलोख्याचा म्हणून ओळखला तर जातोच पण मधल्या काळातुन हतातुन सुटलेले लडाखही त्याने पुन्हा जिंकून घेतले व काश्मीरला जोडले.

काश्मीरची संतकवी परंपराही तशीच प्राचीन आहे. चवदाव्या शतकातील शिवयोगिनी लल्लेश्वरी (लल्लदेद) ते शेख नुरुद्दिन उर्फ नंद ऋषी या संत कवींनी काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात फार मोलाचा वाटा उचलला आहे. किंबहुना काश्मीरच्याच समन्वयशाली परंपरेचा विराट उद्गार त्यांच्या काव्य-गीतांवर पडलेला आहे. आज काश्मीरमधील जी स्थिती आहे त्या स्थितीचे जे भारतीय समाजाचे आकलन वा त्यांच्यावर ज्या माहितेचा प्रभाव आहे त्यांचा आज कदाचित या माहितीवर विश्वास बसणार नाही. पण गतकाळात काश्मीरी आणि भारतीयही डोकावले तर एक बाब लक्षात येईल ती म्हणजे शांततेचे आणि समन्वयाचे तत्वज्ञान देण्याची व आचरणात आनण्याची क्षमता काश्मीरी आजही बाळगुन आहेत. पण त्यासाठी इतिहासही माहित असण्याची गरज आहे आणि तशाच समाज-सांस्कृतीक विचारांना घेत त्यांच्याजवळ गेले पाहिजे.

लल्लेश्वरीचा जन्म अंदाजे १३२० चा. तेंव्हा आपल्या महाराष्ट्रातील संतकवयित्री मुक्ताबाईनी समाधी घेऊन २३-२४ वर्ष झाली असतील लल्लेश्वरील हिंदु व मुस्लिम समुदायांत सारखाच सन्मान आजतागायत मिळत आला आहे. लल्लेश्वरीला मुस्लिम "लल्ल अरिफा" म्हणतात. लल्लेश्वरी शैव आणि सुफी तत्वज्ञानाचा सुरेख मिलाफ घडवून आणते असे मत अनेक विद्वान तिच्याबद्दल करीत असतात. अर्थात आता या ऐक्याला सुरुंग लावणारी मंडळी लल्लेश्वरी केवळ शैव तत्वज्ञ ते लल्लेश्वरी केवळ सुफी तत्वज्ञान मांडणारी अशी लल्लेश्वरीची सांप्रदायिक मांडणी करु लागले आहेत. असे होण्याचे मुख्य कारण लल्लेश्वरीच्या काव्याचा (ज्यांना ’वाक’ असे म्हटले जाते) काश्मीरींवर असलेला अमिट प्रभाव. संत कबीरांप्रमाणेच लल्लेश्वरीवर दोन्ही समाजांनी मालकी दाखवण्याचा हा केवीलवाना प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. लल्लेश्वरीला आपले वाक लिहितांना अथवा गातांना जाणीवपुर्वक शैव किंवा सुफी विचार घेतलेले दिसत नसून जे काही आलेले आहे ते सरळ तिच्या हृदयातून आले आहे. ते तिचे संस्कार, चिंतन आणि स्वत:च्या अंत:करणातून उत्स्फुर्तपणे उमटलेले उद्गार आहेत. कोणते वाक अथवा विधान कोणत्या तत्वपरंपरेला जवळचे आहे हे शोधत तिच्यावर आपल्या कोणत्याही तत्वधारेचे आरोपन करणे ही आपल्या देशातील अनेक विद्वानांची प्रवृत्ती असली तरी हा या महान संत-कवयित्रीवर अन्याय करणारा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात शैव विचारधाराच समतावादी असल्याने सुफींनीही शैवांकडून काही घेतले तर शैवांनी सुफींकडून गुढवाद स्विकारला असे फार तर म्हनता येईल, पण ही देवाण-घेवाण जाणीवपुर्वक समन्वयवादी म्हणून नव्हे तर मुळातच काश्मिरी जनमानस मुळातच या विचारांना साजेशा असल्याने असे समन्वयात्मक वातावरण आपसुक बनले असे म्हणता येईल.

लल्लदेद (माता लल्ल) जेंव्हा जन्माला आली तेंव्हा काश्मीर एका वेगळ्याच राजकीय आणि वैचारिक घुसळणीतुन जात होता. इस्लामी सत्ता स्थापन झाली असली तेथील इस्लामप्रवेश हा सर्वस्वी वेगळ्या कारणाने घडला. खरे तर तोही इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. थोडक्यात तो असा-
ल्हाचन गुलाबु रिंचेन हा मुळात लडाखी राजपुत्र. तो बौद्ध धर्मीय होता. रिंचेनने आपल्या काकाविरुद्ध बंड केले. पण ते फसल्याने त्याने काश्मीरमध्ये आश्रय घेतला. त्यावेळेस सुहदेव हा राजा काश्मीरमध्ये राज्य करत होता. राजा सुहदेवाने जसे रिंचेनला आपला मंत्री म्हणून नियुक्त केले तसेच स्वात खो-यातील शाह मीर यालाही मंत्रीपदावर बसवले. त्याच काळात झुल्चु या मंगोल आक्रमकाने काश्मीरवर धाड घातली. सुहदेवाला पळून तिबेटमध्ये आश्रय घ्यावा लागला. मोगल निघुन गेल्यावर आपल्या राजाला परत आणण्याऐवजी रामचंद्र या सुहदेवाच्या अमात्याने गादी बळकावली. त्याने रिंचेनला प्रशासक म्हणून नेमले. पुढे रामचंद्राची सत्ता बंड करुन रिंचेनने उधळली आणि स्वत:च गादीवर बसला.
काश्मीरची प्रजा बव्हंशी हिंदु होती. काश्मीरमध्ये बौद्ध धर्माने एक आगळी तात्विक उंची गाठली असली व लोकही त्या धर्माला सन्मान करीत असले तरी अभिनवगुप्तामुळे मुळची शैव विचारधारा प्रबळ होती. प्रजेचा जो धर्म तोच आपणही स्विकारला तर आपले राजकीय अस्तित्व प्रबळ होईल हे त्याने हेरले. हिंदू धर्मात प्रवेश घ्यायचा म्हणून त्याने देवास्वामी या शैव गुरुंची भेट घेतली. देवास्वामीने काश्मीरी पंडितांशी विचारविमर्श केला पण वैदिक धर्माच्या प्रभावाखाली आलेल्या बहुतेक पंडितांचे मत पडले की भिन्नवंशीय आणि भिन्नधर्मीय रिंचेनला हिंदु धर्मात प्रवेश देवू नये. रामास्वामीने रिंचेनला धर्मात घ्यायचे नाकारले. खुद्द राजाला धर्मांतराची परवानगी नाकारली म्हटल्यावर रिंचेन संतप्त झाला.

तेंव्हा मध्यपुर्वेतुन आलेल्या सुफी पंथानेही काश्मीरमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती. बुलबुलशहा हा थोर सुफी संत काश्मीरमध्ये प्रसिद्ध होता. रिंचेनने त्याची भेट घेतली आणि इस्लाममध्ये प्रवेश केला. धर्मांतरानंतर रिंचेनचे नांव सुलतान सद्रुद्दीन शाह असे ठेवण्यात आले. त्याच्या बरोबरच त्याच्या मेव्हण्यासह दहा हजार लोकांनी इस्लाम स्विकारला. एक बुद्ध मंदिराच्या जागेवरच त्याने "बुद मशिद" (बुद्ध मशिद) बांधली. अशा रितीने काश्मीरमध्ये इस्लाम आला व पहिली मशीदही उभारली गेली.

अर्थात सुफी परंपरा आणि भारतात अन्यत्र पसरलेल्या इस्लामी परंपरेत खूप अंतर आहे. सुफी परंपरा ही गुढवादी, आत्मवादी आणि इस्लामची अनेक मुलतत्वे नाकारणारी परंपरा आहे. हीच सुफी परंपरा अन्यत्रही, विशेषत: महाराष्ट्र आणि दक्षीणेत पसरली त्यामुळे समन्वयवादी प्रयत्न हिंदु व सुफी संतांनी एकत्रीतपणे करुन भारतीय संस्कृतीचा आत्मा हरवु दिला नाही. अर्थात रिंचेनची सत्ता केवळ तीन वर्ष टिकली. त्याच्याविरुद्धही बंड झाले आणि त्याला ठार मारण्यात आले. सन १३२० ते १३२३ एवढेच त्याची राजवट. लल्लेश्वरीचे जन्मवर्ष खरे असेल तर तिचा जन्म झाला तेंव्हा रिंचेन सत्तेत आला होता. (काहींच्या मते तिचे जन्मवर्ष सन १३३५ आहे.) काश्मीरची राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचली होती. कट-कारस्थाने आणि बंडांना उत आला होता. पुर्वी शैव आणि बौद्ध या प्रबळ विचारधारांत आता सुफी इस्लामचाही समावेश झाला होता. पुढे नुरुद्दिन नुराणी, ज्याला हिंदू नंदऋषी असे आदराने म्हणतात, त्याने सुफी गुढवाद आणि शैव तत्वांचा मिलाफ करुन नवाच विचार मांडायला सुरुवात केली.

या सामाजिक व राजकीय वातावरणाचा लल्लेश्वरीवर बालपणापासुन परिणाम झाला असने सहज शक्य आहे. प्रत्येकावर असा प्रभाव पडत असला तरी त्या प्रभावाच्या कक्षा व दिशाही वेगवेगळ्या असतात. लल्लेश्वरी शैव वातावरणात वाढली तसेच सुफी प्रभावाचाही तिच्यावर परिणाम होत तिची स्वतंत्र दुष्टी विकसीत होत गेली असे म्हणता येईल. काश्मीरमध्ये मुळात वैदिक प्रभाव वाढण्याआधी स्त्रीस्वातंत्र्य पुरुषाइतकेच होते. काश्मीरला लोक मुळात सती-पार्वतीची भुमी मानतात कारण काश्मीरच्या जागेवर प्राचीन काळी सतीसार नावाचे सरोवर होते आणि तेच कोरडे झाल्यानंतर तेथे मानवी वस्ती होऊ लागली अशी श्रद्धा आहे.

श्रीनगरपासुन चार मैलावर असलेल्या पांडरेस्थान या पुरातन इतिहास असलेल्या गांवी लल्लेश्वरीचा जन्म झाला. सिद्ध श्रीकांत या स्थानिक विद्वानाच्या देखरेखीखाली तिचे शिक्षण झाले. लल्लेश्वरीची बौद्धिक आणि आध्यात्मिक झेप पाहुन श्रीकांतांनी लल्लेश्वरीला शैव परंपरेतील गुढवादाशी परिचित केले. लल्लेश्वरी त्या तत्वज्ञानाकडे आकर्षित झाली आणि असे म्हणतात की तिने लवकरच आपल्या गुरुलाही मागे टाकले एवढा तिच्या आध्यात्मिक उन्नतीचा वेग होता.

लोकस्मृतींनुसार वयात आल्यावर तिचा विवाह पद्मपुर येथील एका सधन परिवारातील युवकाशी झाले. तिचे सासरचे नाव पद्मावती. तिच्या पतीचा स्वभाव वेगळा होता. तिची सावत्र सासु खाष्ट तर सासरा मात्र कनवाळु. पती तिचे आध्यात्मिक प्ररुप ओळखु शकला नाही कारण तो व्यवहारी. दोघांतील दरी वाढतच गेली आणि त्याचा फायदा तिच्या सावत्र सासुने घेतला. ती लल्लेश्वरीला दिवसेंदिवस वाईट वागणुक देवु लागली. काश्मीरमधील दंतकथा सांगतात की तिला जेवण देतांना सासु एक दगड मध्ये ठेऊन वर भात लेपत असे त्यामुळे पाहणा-याला वाटावे की लल्लेश्वरीला भरपुर खायला मिळत आहे, पण प्रत्यक्षात काही शिते वगळता तिला काही खायला मीळत नसे त्यामुळे ती कृश होऊ लागली. जेवण झाल्यावर तो दगड आणि ताट स्वच्छ करुन तिला गुपचुप सासुच्या हवाली करावे लागे. पण तिने तक्रार केली नाही. सासरा मायाळु असल तरी त्यालाही या गोष्टींची खबर नव्हती.

जवळपास बारा वर्ष हा जाच सुरुच राहिला. एके दिवशी तिच्या सास-याने आपल्या घरी एक मेजवानी आयोजित केली. त्या दिवशी सकाळी तिचा सासरा एका झ-याजवळून जात असता तेथे पाणी भरायला आलेल्या स्त्रीयांचे बोलणे त्याच्या कानावर पडले. एक स्त्री लल्लदेदला म्हणत होती, "काय गं, तुझ्या सास-याने आज मेजवानी आयोजित केलीय तर आज तुला चांगले जेवण मिळेल!" त्यावर लल्लदेद उत्तरली, "ते मोठा बोकड कापोत की छोटा, सुनेला दगडाला लेपलेला भातच खावा लागणार!" काव्यात दिलेले हे उत्तर ऐकुन सास-याला धक्काच बसला. लल्लच्या या विधानाची खात्री करुन घेण्यासाठी त्याने ती जेवायला बसताच तिच्या हातातील ताट हिसकाऊन घेतले आणि त्याला तो दगड दिसला. त्याचे मन खिन्न झाले. त्याने वारंवार लल्लदेदची माफी मागितली. पण तिच्यावरील सासुचे अत्याचार जास्तच वाढले. यामुळे लल्लदेदचा संसारामधील रसच आटला. तिने ऐन तारुण्यात घराचा त्याग केला आणि एकांतवासाचे जीवन जगु लागली. ती गांवोगांवी सत्याच्या शोधात फिरे आणि प्रेम आणि दैवी शांतीची गीते गाई. हीच गीते आता "वाख" म्हणून ओळखली जातात.

आपल्या देशात इतिहास लेखनची परंपरा नाही हे सर्वांन माहित आहे. महनीय व्यक्तींचा जीवनप्रवास मिळतो तो दंतकथांतुन. लल्लदेदही याला अपवाद नाही. तिचे जन्मवर्षही निश्चित नाही. काश्मीरी राजांचा इतिहास विविध राजतरंगिण्यांमध्ये येतो पण तो केवळ राजकीय इतिहास असल्याने अगदी जोनराजाच्या राजतरंगिणीतुनही लल्लेश्वरी गायब आहे. सोळाव्या शतकातील एका मुस्लिम लेखकाच्या काश्मीरी संतांच्या इतिहासात तेवढा तिच प्रथम उल्लेख येतो. लल्लदेदनंतर चारशे वर्षांनी लिहिल्या गेलेल्या माहितीत अर्थातच अधिकृतता नाही. लोकस्मृतींत जेवढा आहे तेवढाच तिचा इतिहास. तिची कवनेही लोकांनीच मुखोद्गत पद्धतीने सातशे वर्ष जतन केली. फरक एवढाच की आपल्याकडे संत-महात्म्यांच्या बाबतील चमत्कारांचा समावेशही केला जातो तसे तिच्या बाबतीत एवढे घडले नाही. तिचे अध्यात्म हे ख-या अर्थाने आत्मिक होते. बाह्यांवडंबराचा स्पर्शही त्याला झाला नाही.

"कोणत्या दिशेने आले मी
आणि कोणत्या दिशेने जाणार
नाही माहित मला.
जेथे आहे मी उभी तीच श्रेष्ठ जागा
जर आत्म्याचे सच्चे मार्गदर्शन मला!
केवळ श्वासांवर नियंत्रण मिळवणे
म्हणजे "योग" थोडीच असतो?"
एका वाखमध्ये एक त्रिकालाबाधीत सत्य ती सांगुन जाते-

"एक वेळ मी आभाळात दाटलेले ढग
टाकीन विखरुन
उपसुन काढेल सागरातील सारे जल
आणि बरेही करेल असाध्य रोग
पण मुर्खांना नाही समजावु शकत मी!"

ती विवस्त्र संचार करीत असल्याने तिची कुचेष्टा करनारे, तिला दगड मारणारे काही कमी नव्हते. तरीही ती आत्मविश्वासाने म्हणते,
"करा माझी कुचेष्टा
किंवा द्या मला काहीही शिव्या
मी शरणागत आहे त्या दयाळु शिवाची
मला ना शिव्यांचे दु:ख होत ना दगडांचा त्रास
राखुंडीने घासल्याने जसा आरसा स्वच्छ होतो
तसेच माझे मन निरंतर स्वच्छ होत राहते
या त्रासाच्या राखुंडीने!"
"मी माझा श्वास
घशातच किंचाळी रोखावी तसा रोखला
आणि हृदयात प्रदीप्त झाला एक प्रकाश
दाखवत मला
माझे अस्तित्व काय आहे ते.
मी अंध:काराचे अलंघ्य कडे तो प्रकाश घेऊन
ओलांडले
जागोजागी पेरत त्या प्रकाशाची बीजं!"

एके ठिकाणी ती म्हणाली, "ललदेद, सत्य हवे तर बाहेर फिरणे बंद कर आणि आपल्या आत फिर...सत्य गवसेल तुला!"

लल्लदेदने बाह्य जगाशी नाळ तोडलेली होती. जुनी वस्त्रे गळाली तर तिने विवस्त्र राहणे पसंत केले. आजीवन ती तशीच राहिली. "मुक्तीची स्थिती आली की विवस्त्रपण अमर होते." असे तिचे एक वाख अत्यंत प्रसिद्ध आहे. खरे तर कश्मीरच्या व्यक्तित्वातच लल्लदेद आहे. ती वैश्विकतेचा धाडोळा घेत जीवनाचा अमोघ स्पर्श तिच्या काव्याला देते. तिचे वाख म्हणींसारखे आजही काश्मीरींच्या तोंडी आहेत. काश्मीरमधील १९८९ च्या पंडितांच्या दुर्दैवी हत्याकांडाच्या स्थितीमुळे लल्लदेद काश्मीरमध्ये अधिकच सामयिक बनली आहे कारण तिचे अध्यात्म वा तत्वज्ञान परंपरावादाला चिकटून राहणारे नाही. ते आजही दुभंगलेली मने जोडण्याचे कार्य करु शकते.

आजच्या समाज-राजकीय समजांना एखाद्या प्रांताच्या साहित्यिक/सामाजिक इतिहासावर लादल्याने तथ्यपुर्ण चित्र कधीही सामोरे येणार नसते. काश्मीरच्या इतिहासाबाबत तर हे भान अधिक असायला हवे, पण ते तसे नाही हे आपले दुर्दैव आहे. लल्लेश्वरी उर्फ लल्लदेद ही काश्मीरची गेली सातशे वर्ष काश्मीरच्या आध्यात्मिकतेचे प्रतीक बनलेली कवयित्री. तिचे जीवनही विलक्षण. कोणत्याही प्रतिभावंत साहित्यिकावर त्याच्या काळाच्या समाजधारणांचा व इतिहासाच्या छायांचा अपरिहार्य असा प्रभाव पडत असतो. लल्लेश्वरीही त्याला अपवाद असणे शक्य नाही. शैव, बुदधीस्ट आणि सुफी तत्वज्ञानांचा प्रभाव तिच्या काव्यात जाणवतो की तीचे आत्मिक जीवनाचेच हे स्वयंभू तत्वज्ञान होते आणि त्यात इतरेजन बाह्य प्रभाव शोधतात हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. लल्लदेवीच्या तत्वज्ञानात केवळ सुफी अथवा केवळ शैव मुळ शोधण्याचे वा तसे ठसवण्याचे जे प्रयत्न होतात ते गैर आहेत ते याचसाठी.
शिवाय नंतरच्या काळातील कवी आपले विचार/भावना/समज जुन्या कवीच्या किंवा लेखकाच्या लोकप्रियतेचा उपयोग करण्यासाठी अथवा ते विचार त्याचेच असा भास निर्माण करण्यासाठी घुसवुन देत असतात. अशी आपल्याकडे व्यास, कात्यायन, कौटिल्य अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव ते तुकारामांसारख्या संतांनाही या अर्धप्रतिभेच्या घुसखोर लेखकांनी आपल्या अचना त्यांच्या नावावर खपवुन असेच छळले आहे. त्यामुळे मुळ लेखकाचीच प्रतिमा आपण अकारण धुमिल करत आहोत याचे भान या लेखकांच्या लक्षात आलेले नसते किंवा त्या कृतीमागे अन्य काही कुटील हेतू असतो. असे असल्याने गतकाळातील साहित्याची चिकित्सा अधिक काटेकोरपणे करावी लागणार आणि मुळचे नेमके काय आहे हे ठरवावे लागणार हे निश्चितच आहे. महाराष्ट्रात अनेक संतसाहित्यात प्रक्षिप्त अभंगांची घालघुसड झाली असल्याचे लक्षात आल्यावर चिकित्सक शुद्ध आवृत्या प्रसिद्ध करण्याची गरज भासली. इतिहासाचेही आकलन त्यामुळे बदलण्यास मदत झाली. लल्लेश्वरीही याला अपवाद राहिली नाही. अनेक विद्वानांनी लल्लेश्वरीचेच असे मुळ काव्य तत्कालीन भाषा, शैली, प्रतिमा इत्यदिवरुन निश्चित करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. शिवाय लल्लेश्वरीच्या असंख्य कविता १९७५ पर्यंत तरी काश्मीर खो-यातील लोकांनी मुखोद्गत पद्धतीने जतन केलेल्या होत्या. त्यात कालौघात शब्दबदल होणेही शक्य होते. त्यात घालघुसड होणेही शक्य होते. त्यामुळे विद्वानांना लल्लेश्वरीच्या मुळ रचना, तिची शैली आणि मुळ भाषा शोधत संपादन करणे आवश्यक बनले होते.

सर मार्क आरेल स्टीन यांना शारदा लिपीत लिहिलेल्या केवळ पंधरा कविता एका त्रुटीत हस्तलिखितात मिळाल्या होत्या. दुसरे एक हस्तलिखित सापडले त्यात लल्लेश्वरीच्या ४९ रचना होत्या. १९२० साली ग्रियर्सनने लल्लेश्वरीच्या त्याला लिखित स्वरुपात झालेल्या रचनांचा अनुवाद प्रसिद्ध केला. त्या छापील स्वरुपात उपलब्ध नव्हत्या. त्या जमा करने, मुखोद्गत ठेवतांना नकळत होणारे बदल टिपने हेही एक मोठे आव्हान होते. लल्लेश्वरीच्या नावावर असलेल्या २२८ कवनांपैकी केवळ १३८ कवने लल्लेश्वरीची आहेत असे जयलाल कौल यांनी ठरवले होते. त्यात अजुनही अन्य स्त्रोतांतुन उपलब्ध झालेल्या आणि अस्सल ठरवण्यात आलेल्या कवनांचा समावेश होऊन १९७५ मध्ये पहिल्यंदाच लल्लेश्वरी छापील माध्यमात अवतरली.
असे असले तरी तिला सुफी अथवा शैव गोटात ओढण्याचे प्रयत्न होतात. याचे कारण तिच्या काश्मीरी हृदयावर शतकानुशतके राज्य करण्याच्या अलौकीक शक्तीमुळे हे लक्षात घेतले पाहिजे. तसे पाहिले तर लल्लेश्वरी शिवभक्त होती. शिवयोगिनी होती. पण तिने निवडलेला अध्यात्माचा मार्ग हा स्वतंत्र ओता. तिची अभिव्यक्ती सुफीवादासारखी गुढ असली तरी तत्वज्ञान स्वतंत्र होते. काश्मीरी मनांना धर्म वेगळे असले तरी भावनिक व सांस्कृतीक दृष्ट्या बांधुन ठेवण्याचे तिने अनमोल कार्य केले. अर्थात आपण असे काही कार्य करत आहोत याचे भान त्या उन्मुक्त योगिनीला असेल असे नाही. ती सहृदय अध्यात्मिक अंत:करनाने आपली अभिव्यक्ती करत गेली. अजरामर झाली. आज काश्मीरला समजावुन घ्यायचे असेल आणि काश्मीरींनाही समजवायचे असेल तर लल्लेश्वरीने प्रदीप्त केलेला शुद्ध अंत:करणचा दीप आपल्या हाती असायला हवा!

-संजय सोनवणी
(चपराक दिवाळी २०२० अंकात प्रसिद्ध झालेला लेख)

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...