Wednesday, April 26, 2017

जागतिकीकरण आणि शेती!

जागतिकीकरण जसजसे भारतीय अर्थव्यवस्थेला विळखा घालत गेले तसतशा शेतक-यांच्या आत्महत्याही हरसाल वाढत गेल्या, याला मी योगायोग मानत नाही. कोणी मानुही नये. याचे कारण खुले धोरण जरी इतर उद्योगांच्या बाबतीत राबवले गेले असले तरी शेती व पशुपालन मात्र त्यातून सर्वस्वी वगळण्यात आले. म्हणजे या क्षेत्रावरची समाजवादी बंधने नुसती तशीच राहिली नाहीत तर जागतिकीकरणाच्या काळात ती अजुन वाढवण्यात आली. शेतक-याला लाचार ठेवणे, भिकारी ठेवणे हेच जणू सरकारांचे आद्य कर्तव्य बनले. 

मी २००२ साली खुल्या धोरणाचे प्रणेते माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या निवासस्थानी याबाबत प्रश्न विचारला होता. तेंव्हा ते म्हणाले होते शेतीमाल व त्याची किंमत हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे तेथे खुले धोरण आणून चालणार नव्हते. शिवाय आपला शेतकरी स्पर्धा करण्यास सक्षम नाही. मला हे उत्तर त्यावेळीस पटले होते, पण वास्तव पाहता रावांच्या धोरणातील ही सर्वात मोठी विसंगती होती आणि ती आजतागायतच्या सर्व सरकारांनी तशीच ठेवली आहे. भारतातील अन्य उद्योगक्षेत्राला एक न्याय आणि दुस-या पायाभुत उद्योगाला दुसरा न्याय लावून सरकारने विषमता वाढवण्यात एवढा हातभार लावला कि हा वर्ग संपण्याच्या बेतात आला आहे. भारतीय मानसिकता लक्षात घेता पुढच्या वर्षी कोणीही तूर लावायचे पाप करणार नाही. आता सरकार हळूच निर्यातीचे दार उघडेल आणि आता झालेले अतिरिक्त उत्पादन (तेही अर्धेअधिक सडल्यावर) निर्यात करेल. म्हणजे तुरीचे पुन्हा दुर्भिक्ष निर्माण होईल. हा येडचापपणा नेहमीच व सातत्याने होत आला आहे. पण त्याचे परिणाम आता येवढे भयावह होत चालले आहेत कि कडेलोट अगदी निकट येवून ठेपलेला दिसतो. शेतक-यांना जागतिकीकरणामुळे लाभ त्यामुळे झाला नाही, आर्थिक दरी वाढत गेली व त्यातून मानसिकता ढासळत आत्महत्येच्याच उर्म्या दाटून आल्या तर नवल नाही. हे सारे पाप सरकारने केले आहे.

शेतक-यांचे नेते हे शेतक-यांचे शत्रू आहेत. मग कोणीही काहीही म्हणून मिरवो. शेतक-यांच्या भावना व वित्तीय स्थितीशी खेळ करणे हाच त्यांचा धंदा बनलेला आहे. शेतक-यांना त्यांच्याच जीवावर लढून त्यांना मदतीचे चार तुकडे मिळवून दिले कि हे धन्य होतात. कृषीविभाग का ठेवला आहे आणि तो करतो तरी काय याचे उत्तर मिळत नाही. राज्य घटनेलाच छेद देणारे शेतीविरोधी कायदे आजही ठेवून कोणता समाजवाद यांना जपायचा आहे व समाजाचा घात करायचा आहे हे समजत नाही. माझे स्नेही अमर हबीब यांनी या कायद्यांविरुद्ध आवाज उठवला असला तरी ते "खाते-पिते" नेते नसल्याने त्यांचा आवाज क्षीण आहे. या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येवू नये अशी तरतूद करुन लोकशाहीचा गळा घोटण्यात आला आहे. शेतीप्रश्नाबाबत लिहिणारे तथाकथित विद्वान याबाबत मात्र ठार मुके-बहिरे बनुन जातात.

तात्पुरत्या मलमपट्ट्या करुन शेतीप्रश्न सुटणार नाही. मग उत्पादन अधिक होवो कि कमी. रड तशीच राहणार आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांचा अभाव, साठवणूक क्षमतांचा अभाव याची तर आम्हाला लाज वाटले पाहिजे. शेतक-यात आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर प्रश्नांच्या मुळाशी जात कायमचा मार्ग काढायला पाहिजे. 

Sunday, April 23, 2017

राष्ट्र संकल्पनेनंतर पुढे काय?


राष्ट्र ही संकल्पना मानवी इतिहासातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामागे आधीच्या व्यवस्था अव्यवस्त्य्हेत बदलल्या हे कारण महत्वाचे आहे. स्वातंत्र्य:समता:बंधुता या महनीय तत्वांची देणगी जगाला दिली ती फ्रेंचांनी. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीची व प्रबोधनकाळाचीही पार्श्वभुमी होती. धर्मसत्ता आणि राजसत्तांतील युती व संघर्षही जगाने या काळात पाहिले. पोपने धर्मसत्ताच सर्वोपरी असून पोपचे आदेश न मानल्यास राजांनाही धर्मातुन काढुन टाकण्याचा अधिकार आहे असे दावे सुरु केले आणि संघर्ष सुरू झाला. त्यात पोपच्या पदासाठीच धर्मांतर्गत संघर्ष सुरु झाल्याने पोपही कमकुवत बनला याचा फायदा युरोपियन राज्यकर्त्यांनी उचलला. याच काळात सरंजामदारांचेही वर्चस्व जवळपास जगभर वाढल्याचे आपल्याला दिसते. सरंजामदारांशिवाय राज्यही करता येत नाही पण त्यांचे वर्चस्वही हटवता येत नाही अशा पेचात तत्कालीन राज्यव्यवस्था सापडल्याचे आपल्याला दिसते. सरंजामशाहीमुळे राज्यसत्ता दुर्बळ ठरु लागल्याने औद्योगिकरण व व्यापार यामुळे धनाढ्य बनलेल्या वर्गाला प्रबळ राज्यसत्तेची गरज भासू लागली होती. सरंजामशाहीच्या तसेच अनियंत्रित राजेशाहीच्या तत्वांनाही छेद देईल असे नवे तत्व या वर्गाला हवे होते.
अशा वेळीस राष्ट्रवादाचे तत्व पुढे आणले गेले. एक वंश, एक प्रदेश, एक धर्म, समान इतिहास, परंपरा आणि हितसंबंध या मुलतत्वांवर प्राथमिक राष्ट्रवाद अस्तित्वात आला. मध्ययुगाच्या अखेरीस युरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वरील तत्वांना सुसंगत ठरेल अशी परिस्थितीही होती. प्रादेशिक निष्ठा महत्वाच्या बनल्यामुळे मातृभुमी...पितृभुमी या उदात्त दृष्टीने आपल्या भौगोलिक प्रदेशाकडे पाहिले जावू लागले. यातुन समाजाचे अंतरंग व बहिरंगही बदलू लागले. त्यामुळे राष्ट्रवादावर उभारलेली, पण ईश्वरदत्त मानली गेलेली राजसत्ता राष्ट्रनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली.
यातुन पुर्वी जी सातत्याने सीमा बदलत असनारी, प्रादेशिक अभिमानाचा विशेष जोर नसणारी व्यवस्था स्थिर होत विशिष्ट भौगोलिक सीमांतर्गतचे आपले भावनिक अधिष्ठाण असनारे राष्ट्र व त्याचा अनिवार अभिमान असा राष्ट्रवाद अस्तित्वात आला. पण सर्वच राष्ट्रे (युरोप) महत्वाकांक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय कलहांचे रुप बदलले. आपापल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संघर्ष सुरु झाला. त्यासाठी इतर राष्ट्रांचे हितसंबंध धोक्यात आले तरी चालतील ही भावना प्रबळ झाली. परस्परांत युद्धे वाढु लागली. त्यामुळे राष्ट्रभावनाही प्रबळ होत गेल्या. युद्धात हार झाली कि सामर्थ्यवाढीचे उद्योग व पुन्हा सुडासाठी युद्धे असा क्रमच बनला. सत्ता संपादन, रक्षण आणि प्रादेशिक विस्तार ही राज्यांची प्रमूख वैशिष्ट्ये बनली.
यातुनच प्रजेचाही राज्यव्यवस्थेत वाटा असला पाहिजे या भावनेतून राजसत्तेचे एकहाती नियंत्रण कमी करत लोकशाहीची स्थापना अपरिहार्य वाटु लागली. शासन हे प्रजेचे प्रजेतर्फे चालवले जाणारे असावे, कारण राजा नव्हे तर प्रजा सार्वभौम आहे या तत्वाचा प्रभाव वाढत होता. इंग्लंडमद्धे अशा रीतीने लोकशाहीची स्थापना झाली. लोकशाहीसोबतच राज-सत्ता, हुकुमशाही सत्ता, लष्करी सत्ताही काही राष्ट्रांत होत्या वा तशा सत्ता आणण्याचे प्रयत्नही सुरु होते. उदा. नेपोलियनने फ्रांसमद्धे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
हे सारे होत असले तरी म्हणुन साम्राज्यवाद संपला असे नव्हे. माणसाला मानवी स्वातंत्र्याबद्दल अजून खूप शिकायचे होते. आजही शिकला आहे असे नाही. सम्राटांचा साम्राज्यवाद जावून आता राष्ट्रांचा साम्राज्यवाद सुरु झाला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढणारे उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती तसेच आपल्या देशाला लागणारी स्वस्त साधनसामुग्रीही स्वस्तात व सातत्याने मिळवण्याची गरज होती. त्यातुन वसाहतवाद पुढे झेपावला. आफ्रिका, आशिया, अमेरिकादि खंडांवर यूरोपियनांनी कब्जा मिळवत वसाहतवादी साम्राज्ये स्थापन केली. अमेरिकेने पहिले स्वातंत्र्ययुद्ध छेडुन स्वातंत्र्य मिळवले व एक नवीनच राष्ट्र संकल्पनेचा पाया घातला.
पहिले महायुद्ध हे वर्चस्ववादाच्या भावनेने गाठलेल्या टोकाचे फळ होते. या युद्द्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वामुळे अनेक छोटे प्रदेश अस्मितेच्या बळावर राष्ट्र म्हणुन उदयाला आले. ही छोटी राष्ट्रे आर्थिक व लश्करी दृष्ट्या कमकुवत असल्याने यूरोपातील अंतर्गत संबंध तणावाचे बनू लागले. यातुन राष्ट्रवाद सौम्य न होता टोकाचा वाढत गेला. जर्मनीत नाझी तर इटलीत फ्यसिस्ट पक्षांची सरकारे केवळ अतिरेकी राष्ट्रवादाच्या परिणती होत्या. त्यात साम्यवादी सत्तांचाही उदय रशियाच्या रुपाने झाला होताच. शासनाची पद्धत कोणतीही असली तरी राष्ट्रवाद हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा मुलभुत गाभा होता. त्यातुनच विनाशक दुसरे महायुद्धही घडले. जगाचा नकाशा बदलला. आजवर जागतीक घडामोडींपासून अलिप्त असनारे "स्वतंत्र जग" अमेरिका या युद्धात पडले व त्यातुनच एक बलाढ्य जागतीक सत्ता म्हणुन उदयाला आले. या युद्धातुन नवी राष्ट्रे निर्माण झाली. बव्हंशी स्वतंत्र होवून तर इस्राइलसारखी नवनिर्मिती म्हणुन.
हा सिलसिला पुढेही चालु राहिला. साम्यवादी जग विरुद्ध भांडवलशाहीवादी जग असा नवा संघर्ष सुरु झाला. त्यातुनहे अनेक राष्ट्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण करत अमेरिका व रशियाने जगाचा नकाशा स्थिर राहु न देण्याचा निर्धार केला. भारतानेही ७१च्या युद्धातुन बांगलादेशाची निर्मिती घडवली. पुढे सोव्हिएट रशियाही कोलमडला व पुन्हा अनेक राष्ट्रे स्वतंत्रपणे जगाच्या नकाशावर आली....
सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याची आकांक्षा असणारे, त्यासाठी संघर्ष करणारे अनेक समाजगट जगात आजही आहेत. तज्ञ म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक राज्य हे राष्ट्र राज्यच आहे असे नाही व त्याशी सहमत व्हावे लागते. लष्करी अथवा पोलिसी बळावर अशी स्वातंत्रे नाकारली जातात. एका अर्थाने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राज्यात समतेचे व स्वातंत्र्याचे मूलतत्व पाळतेच असा दावा करता येत नाही.
या राष्ट्रांच्या इतिहासावरुन स्पष्ट दिसते कि ब-याचशा राष्ट्राची सीमा ती राष्ट्रे म्हणुन स्थापन झाली तेंव्हापासुन तशीच राहिली आहे असे म्हणता येत नाही. आजही आखाती राष्ट्रांतील संघर्ष जागतिक तणावाचे कारण बनू पाहतो आहे. अंतर्गत संघर्ष नाही असे राष्ट्र आज अभावानेच भुतलावर असेल. कोणत्याही राष्ट्राची सीमा कायम राहिलेली नाही. विस्तारवादाचे धोरण कळीचे बनलेले आहे. आम्हाला "राष्ट्र" ही संकल्पना आज महनीय आहे असे वाटत असतांनाच हे लक्षात घेतले पाहिजे कि अद्याप मुळात राष्ट्र या संकल्पनेची सर्वमान्य व्याख्या नाही. राष्ट्र ही संकल्पना भावनिक आहे व या विविध संकल्पनांत होणा-या संघर्षामुळे जगातील प्रत्येक नागरिकाचे, म्हणजेच आपलेही होरपळून निघालेले आहे. राष्ट्र संकल्पनेला इसिससारख्या संघटनांनी धार्मिक मुलतत्ववादाची फोडणी दिल्याने हा राष्ट्रवाद राष्ट्रविनाशक बनतो आहे. जागतिक मुल्यांची व्याख्या करण्याचा व त्यानुसार जग चालवायचा आपल्यालाच अधिकार आहे या भावनेतून आज महासत्ता असणारे अमेरिका व रशिया वागत आहेत.
आम्ही राष्ट्र, राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीने प्रभावित असतो हे खरे असले तरी राष्ट्र म्हणजे काय याची आपली व्याख्या सुस्पष्ट नसते. अनेक जागतिक विद्वान आज राष्ट या संकल्पनेच्याच अपरिहार्यतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. "राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे..." असे काही विचारवंतांना का वाटते तेही समजावुन घ्यायला हवे. याचे कारण म्हणजे जग कोणत्यातरी नव्या व्यवस्थेकडे आज ना उद्या जाणारच आहे. त्या बदलांची दिशा काय असेल हे आम्हालाही समजून घ्यावे लागेल. उत्तमात उत्तम अशे भविष्यातील कोणती व्यवस्था असू शकते याची प्रारुपे आम्हालाही बनवावी लागतील. कारण जगात जेही होते त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक व सामाजिक परिणाम आमच्यावरही होतच असतो.
त्यामुळे राष्ट्र संकल्पनेनंतर पुढे कोणती नवी संकल्पना येऊ शकते, ती अस्तित्वात येतांना कोणत्या अडचणी व संघर्ष उद्भवणार आहेत यावरही आपल्याला विचार करणे भाग आहे!
-संजय सोनवणी

Wednesday, April 12, 2017

सवर्ण-उच्चवर्णीय?

उच्चवर्णीय, सवर्ण यासारखे शब्द वापरणे म्हणजे वैदिक असल्याचे अथवा वैदिकवाद मान्य असल्याचे लक्षण होय. हिंदुंमध्ये कधीही वर्णव्यवस्था नव्हती. वैदिक धर्म येथे आल्यावर हिंदुंच्या तत्कालीन आगमशास्त्रांनीही वर्णव्यवस्थेचा समूळ विरोध केला आहे. कोणी उच्च व कोणी खालचे ही सामाजिक मांडणी विघातक असून या शब्दांवर पुर्ण बहिष्कार घातला पाहिजे.

एकोणिसाव्या शतकातेल विद्वानांनी वैदिक समाजव्यवस्था म्हणजेच भारतीय समाजव्यवस्था असे चुकीचे गृहितक धरुन आपापल्या सामाजिक तत्वज्ञानाची मांडणी केली. हिंदू व वैदिक या स्पष्ट दोन समाजधारा आहेत हे त्यांना माहित नव्हते असे नाही. आर्य-अनार्य, अभिजन-बहुजन, वेदोक्त-पुराणोक्त वगैरे धार्मिक भेद त्यांच्या समोर होतेच. दोन धर्मांच्या दोन व्यवस्था आहेत हे त्यांने लक्षात घ्यायला हवे होते. 

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद यातुन निर्माण केला गेला खरा पण स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानणारे अथवा असलेले अनेक समाजघटक वैदिक किंवा वैदिकवादी असुन त्यांचे वर्तनही वैदिक वर्चस्ववादाला साजेशे असले तरी ते "ब्राह्मणेतर" म्हणवत या चळवळीच्या मुळावर आले हा इतिहास आहे. हिंदुंचे खरे नुकसान ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे झाले व वैदिक वर्चस्ववाद मात्र सामाजिक जीवनातून तसुभरही हलला नाही. 

माध्यमांनी सवर्ण-उच्चवर्णीय वगैरे शब्द सातत्याने वापरत वैदिकवादालाच खतपाणी घातले. सर्व सामाजिक चळवळी या शब्दाशी येऊन धडकल्या. यातुन आपण आपल्याला वैदिक समाजव्यवस्थाच मान्य असल्याचे दाखवत जातो आहोत याचे भान आले नाही.

जाती म्हणजे पारंपारिक व्यवसाय. सर्वांचेच सामाजिक व सांस्कृतिक योगदान बरोबरीचे असल्याने कोणी जन्माने उच्च अथवा नीच असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यवसायांमधे आर्थिक चढौतार येतात. आज पारंपारिक व्यवसाय जवळपास संपले आहेत. त्या अर्थाने जातीही संपत चालल्या आहेत. जातीव्यवस्थेच्या उद्गमाबाबत गोंधळ घातला गेल्याने व तिची नाळ कारण नसतांना मनुस्मृतीशी घातली गेल्याने द्वेष वाढला असला तरी जातीव्यवस्थेचे काल्पनिक गारुड संपले मात्र नाही.  सर्व जाती समान असुन सर्वांनाच त्यांच्या व्यवसायाएवढाच पुरातन इतिहास आहे हे मी "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकातून सप्रमाण दाखवून दिलेले आहे. हा इतिहास निश्चितच गौरवशाली असल्याने कोणीही अकारण अथवा वैदिकवादी म्हणतात म्हणून हीण मानणे हे अनैतिहासिक व अधार्मिक आहे ही आदिम हिंदू परिषदेची अधिकृत भुमिका आहे. 

वैदिक धर्म भारतात आला. सुरुवातीला या धर्माला विशेष कोणे राजाश्रय दिला नाही. गुप्त राजवटीने या धर्माला मूक्त राजाश्रय दिला व वैदिक तत्वज्ञान समाजात झपाट्याने पसरू लागले. तत्कालीन आगमिक पंडितांनी या वैदिक वर्णव्यवस्थेचा खंदा विरोध केला. दहाव्या शतकापर्यंत हिंदू आगमिकांनी वैदिकांचा वारू रोखून धरला. वैदिक पुन्हा मुलतत्ववादी बनले व निबंधकाळात स्मृत्यांची नव्याने रचना करत, विविध राजांचा आसरा मिळवत आपली धर्मतत्वे समाजाच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला हा इतिहास आहे. हिंदु आपली मुळची समतेची परंपरा विसरत गेले व उच्च-नीचतेचे भ्रम जोपासू लागले. याला मुळ कारण भारताची झालेली आर्थिक अवनती होती. जगण्याचा संघर्ष बिकट झाला होता. संतही या वर्ण-जाणीवांनी प्रभावित झालेले होते. दहाव्या शतकापुर्वी असले चित्र आपल्याला दिसून येत नाही.

त्यामुळे आता तरी वैदिक मुलतत्वांना हिंदू धर्मातून हटवत हिंदुंचा मुळचा समतेचा मार्ग चालावा लागेल!

-संजय सोनवणी

Tuesday, April 11, 2017

पुण्यश्लोक अहिल्या!

(एकपात्री प्रयोगासाठी)

अवघ्या जीवनानेच जिच्याशी संगर मांडला, जिचे सुखाचे क्षण हाती येतात न येतात हिरावले गेले नि दुर्भाग्याच्या खोल खाईत जिला भिरकावले गेले ती मी अहिल्या. अहिल्याबाई होळकर. जग मला आज पुण्यश्लोक म्हणते. लोकमाता म्हणते. टिपु सुलतान मला "तत्वज्ञ महाराणी" म्हणे. ब्रिटिश मला अठराव्या शतकातील सर्वित्कृष्ठ महिला प्रशासक म्हणत. आज देशातील एक पुरातन मंदिर सापडणार नाही ज्याचा मी जिर्णोद्धार केला नाही. एक नदी नाही जेथे मी घाट बांधले नाहीत. रस्ते किती बांधले...किते दुरुस्त केले हे आता मलाही आठवत नाही.  पांथस्थांसाठी देशभर किती बारवा बांधल्या याची तर गणतीही कधी केली नाही.

माळव्याची महाराणी म्हणून मी माझी कामे माळव्यापुरतीच सीमित ठेवली नाहीत. माझे श्वसूर मल्हारबाबांची राष्ट्रीय दृष्टी नेहमीच माझ्या नसानसांत खेळ्त राहिली. शेकडो शासक राज्य करत होते त्या देशाला अखंड धाग्यात गुंफले ते मी!

इंदोरला...महेश्वरला उद्यमी नगरे म्हणून मी भरभराटीला आणले. प्रजेला सूख होईल असे असंख्य कायदे केले. यात्रेकरुंना लुटणा-यांनाच यात्रेकरुंचे रक्षण करायला लावले. त्यांना पोटापाण्यालाही दिले. माझे नांव निघाले तरी दुष्टही सज्जन बनून जात. रंगेल लावण्या लिहिणारेही भक्तीरसाचे महिमान गाऊ लागावेत असे माझे महिमान. देशात शासक कोणीही असो...अहिल्यादेवींना लोकहिताचे काम करायचे आहे असे म्हटले कि कोणी आडकाठी केली नाही. माझे...थोरल्या सुभेदार मल्हाररावांनी पराक्रमाच्या जोरावर स्थापिलेले राज्य...इंदोर...एक छॊटासा तुकडा...पण माझे राज्य केवळ इंदोरवरच नव्हते. अवघ्या देशावर चालायची माझी आध्यात्मिक आणि नैतिक सत्ता.

होय.

इंग्रजी कवयित्री जोआना बेली म्हणते..."अहिल्या म्हणजे परमेश्वराला पडलेले सुंदर स्वप्न!"

होय. त्रिखंडी किर्ती झाली माझी. माझ्या हयातीत. पण या सा-यांमागे माझ्या काळजात सतत हेलकावणारा यातनांचा धगधगता ज्वालामुखी होता. एकामागुन एक आलेल्या झंजावातांनी मला कोलमडवुन टाकण्याचा चंग बांधला होता जसा. एक गेले कि दुसरे संकट माझ्यावर हिमकड्यांप्रमाणे कोसळायला सज्ज असे.

खराय कि सांबसदाशिवाने  मला कोसळु दिले नाही. कोलमडु दिले नाही. चिरंतन सखा असल्यासारखा तो माझ्या सोबत माझा हात धरून चालत राहिला. लोकांच्या वेदनांच्या कालडोहात  आपली दु:खे विसर्जित करायला सांगत राहिला.

आणि मी जगले ती वेदनांच्या लाटांवर स्वार होत दि:कालाच्या सीमा पार करण्यासाठी. होय...मी जगले ती प्रजेची आई होण्यासाठी! मला स्वत:ला ना पुरतं पुत्रसूख मिळालं...ना कन्यासूख...सारी सुखं येत माझ्या ओंजळीत...पण बुडबुड्यासारखी. काही आनंद मला मिळतो न मिळतो तोच हिरावून घेतले जाण्यासाठी. होय. दु:खाने माझी पाठ न सोडण्याची प्रतिज्ञाच केली होती जशी!

कोण मी? एक सामान्य धनगराची पोर. मराठवाड्यातील चौंडी या दुष्काळी गांवावरील धनगर पाड्याच्या पाटलाची...माणकोजी शिंदेची पोर. निजामाच्या अन्यायी राज्यात भरडल्या गेलेल्या सर्वच नागरिकांत आम्हीही. कसली स्वप्ने पडणार होती आम्हाला? मेंढरं घेऊन रानोमाळ भटकनं हाच ज्यांचा युगानुयुगांचा जगण्यासाठी धंदा त्यांना कोण वाली?

पण एक धनगर उदयाला आला होता. स्वपराक्रमाने बाजीराव पेशव्यांच्या साथीने देशात रणमैदान गाजवत होता. मल्हारी मार्तंडाचा अवतारच जसा...मल्हारराव होळकर! मल्हारराव आमच्यासाठी एक चमत्कार होता. त्याच्या पराक्रमाच्या एवढ्या कथा बनल्या होत्या कि एक महाकाव्यच बनलं असतं. आम्ही लहाणपणी त्याच्या कथा ऐकायचो. हरखून जायचो. होय...धनगर आजही तलवार गाजवू शकतात आणि कळीकाळाला धडकी भरवू शकतात हा विश्वास उरी दाटायचा. मेंढरांच्या कळपावर धाड घालायला आलेल्या लांडग्यांवर त्वेषाने भाला फेकतांना तीच रग अंगी दाटायची. मी आता कोठे नऊ वर्षाची झाली होते. चारचौघांसारखेच आपले आयुष्य जाणार या खंतेत होते. शंभु महादेवावर माझी अपरंपार श्रद्धा. त्याला मी विनवायची...ही अरिष्टे टळावीत म्हणून...त्यासाठी शक्ती दे म्हणून...

आणि महादेव खरोखरच इतक्या लवकर पावेल याची मी कल्पनाही केली नव्हती.

नदीकाठी मी वाळुत रेतीची शिवलिंगे बनवत बसले होते. भर माध्यान्ह. तळपतं उन. पण मला भान नव्हतं. घोड्यांच्या भरधाव टापांचा आवाज कानी पडलाच नाही. एकदम कानाजवळ आवाज आल्यावर पाहिलं...आणि क्षणाचाही विचार न करता शिवलिंगांवर ओणवी झाले. एकाएकी लगाम आवळले गेल्याचे, संतप्त कालव्याचे आणि घोड्यांच्या खिंकाळण्याचे आवाज कानी आले. मी पाहिलं. सैन्याचा एक जथाच तेथे उभा होता. संतापाने लालबुंद झालेला त्यांचा म्होरक्या माझ्यावर ओरडत होता. "चिमुरडे...टापांखाली चिरडुन मेली असतीस तर?"

त्याचा आवाज माझ्या कानांत शिरत नव्हता. मी अजुनही शिवलिंगांवर ओणवीच होते. तशीच मी म्हणाले, "माझ्या शिवाला या नतद्रष्ट घोड्यांनी तु्डवले असते तर? त्यापेक्षा मी मेली असती तरी चालले असते."

त्या म्होरक्याने माझ्या बाजुला पाहिले. रेतीतली शिवलिंगे जणु अवघ्या चराचर सृष्टीला आशिर्वाद देत होती. त्या म्होरक्याच्या राकट चेह-यावर पाहता पाहता समाधानाचे हसू फुलले. त्याने मला नांव-गांव विचारले आणि मग सरळ मला बापाच्या ममतेनं पुढे करुन आमच्या घरीच आला की!

तो म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नाही तर मल्हारराव होळकर होता!

त्यांची माझी अशी अवचित भेट होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. माझा माझ्यावरच विश्वासच बसत नव्हता. मल्हारराव होळकर आणि मी त्यांना एवढ्या जवळून पहातेय? छे...स्वप्नच असेल ते. पण होय. ते मल्हाररावच होते. माझे बाबा आणि आईही हरखून गेले होते.

खरा चमत्कार अजून वाट पहात होता. त्यांनी माझा हात त्यांच्या एकुलत्या चिरंजिवांसाठी...खंडेरावांसाठी.. मागितला. बाबा-आईंना स्वर्ग ठेंगणा पडला असेल. झाला. लवकरच माझा खंडेरावाशी विवाह झाला. मी ऋतुमती झाले आणि इंदोरला...माझ्या सासरी रवाना झाले. मातोश्री गौतमाबाईने मला आईची उणीव कधी भासू दिली नाही.

माझे पती खंडेराव! उमदे आणि पराक्रमी. काहीच वर्षांत ते रणमैदानही गाजवू लागले. सुभेदारांनी त्यांच्यावर स्वतंत्र स्वा-याही सोपवल्या. बुंदीचा उमेदसिंगचा राजपाट असो कि जयपुरच्या गादीवर माधवसिंगाची स्थापना....खंडेरावांनी युद्धात वीरश्रीही गाजवली आणि मुत्सद्देगिरीही. चंद्रावतांची रामपु-याची जहागिरी होळकरांना जशी मिळाली तशीच हिंगलाजगडचीही. त्यांचाही पराक्रम होताच तसा! मल्हाररावांच्या पराक्रमाची पताका खंडेराव त्रिखंडात नेईल असे सारे म्हणत. मी आनंदी होते. भाग्यशाली समजत होते स्वत:ला.

पण तसे व्हायचे नव्हते. सुखाचे क्षण अवचित हिरावले जातात तसेच झाले.

दिल्लीला सुरजमल जाट उपद्रव देत होता. मल्हारराव व शिंदे त्यावेळीस दख्खनेत होते. दिल्लीचा जिम्मा खंडेरावांवर होता. जाटाला फिरोजशहा कोटलालाच रोखून मागे ढकलले ते खंडेरावांनी जाटावर आक्रमण करावे आणि त्याचा पुरता बंदोबस्त करावा अशी पातशहाची इच्छा होती. पण पेशवा व मल्हाररावांचा आदेश नव्हता. पातशहा खंडेरावांची विनवणी करत होता...मनधरनी करत होता. पण खंडेरावांनी पातशहाने दिलेली खिल्लतही नाकारली. ते आदेशाचीच वाट पहात होते.

आला. मामंजींचा आदेश आला ..."जाटाचे पारिपत्य करावे..."

झाले. खंडेराव आपली अवघी दोन हजारांची सेना घेऊन जाटाच्या पाठीशी लागले. जाटाचा मुलुख बेचिराख करायला सुरुवात केली. जाटाला कसा प्रतिकार करावा हेच सुचेना. तो घाबरला. खडेराव ऐकत नाही तर त्यानं पुणे दरबाराशी सलुख चालवला. चाळीस लक्ष खंडणी देतो पण खंडेरावांना मागे घ्या असे विनवू लागला. ह्यांची दहशत खाऊन कुंभेरीच्या किल्ल्यात जाउन लपला. खंडेरावांनी कुंभेरीला वेढा घातला. तोवर राघोबादादा, शिंदे आणि मल्हाररावही तेथे येऊन पोहोचले. गड बाका. किल्ल्याच्या आडुन सुरजमल जाटाने हल्ले चालुच ठेवले. खंडेराव किल्ल्याचा एक तरी तट कसा ढासळवता येईल या प्रयत्नांत होते.

त्या दिवशी युद्ध ऐन भरात होते. सुरजमलच्या डोळ्यात खंडेराव सलत होता. तटावरून त्याने निशान साधायला लावले.

साक्षात कळीकाळ यावा तसा तो तोफेचा लोळ खंडेरावावर पडला. माझे सर्वस्व हरपले. मी विधवा झाले.

काय उरलं होतं आता जगात? पतीसोबत सती जावे...स्वर्गी तरी त्यांच्या साथीत जगावे. मी तयारी करायला सांगितले. माझ्या सवतीही तयार होत होत्या. सर्वत्र मरणाच्या विकराळ छाया नाचत होत्या. गौतमाबाई जशा मूक-बधीर बनून गेल्या होत्या. मल्हारराव संतापाने बेभान झाले होते. ते सुरजमल जाटाला म्हणाले, "जाटा...कुंभेरीचा किल्ला उध्वस्त करुन त्यावर मी गाढवाचा नांगर फिरवीन आणि कुंभेरीची माती गंगेत विसर्जित करीन!" तेवढ्यात मी सती जातेय असे कोणीतरी त्यांना सांगुइतले. ते धावत आले,. एवढा करारी महायोद्द्धा पण गलितगात्र झाला होता. त्यांनी मला शुभ्र साडीत पाहिले आणि हंबरडा फोडला..."जाऊ नकोस पोरी...या म्हाता-याला अनाथ करणार आहेस का तु? अगं...आता तुच माझा खंडेराव...नको जाऊस पोरी...नको जाऊस..."

त्यांच्या हंबरड्याने माझं काळीज गलबललं. आलम हिंदुस्तानला "मल्हार आया..." अशी हूल उठली तरी दहशत बसायची. तो महायोद्धा मल्हारराव काळीज फाटेल असा आक्रोश करत होता. चितेकडे अंतिम श्वास घेण्यासाठी निघालेली माझी पावले थबकली. होय. खंडेराव जित्ता होता या अहिल्येच्या रुपात. मल्हारबांना आक्रोशू देण्याचा मला कसलाही अधिकार नव्हता.

मी थांबले. मागे आले. त्यांचे डोळे पुसले.

जगायचा निर्णय घेतला ते पुन्हा पुन्हा मरण्यासाठी.

मल्हाररावांनी नि गौतमाबाईंनी मला राजपाट चालण्यासाठी लागते ते सारे मला शिकवले. मल्हाररावांच्या लष्करी मोहिमांना लागणारी सामग्री पुरवण्याचे काम मी करु लागले. सिरोंच्याचा जागीरदार अडवणुक करत होता तर त्यालाही मी युद्ध करुन वठणीवर आणले. दोहदवर मी हल्ला करून त्याची गढी उध्वस्त केली. मल्हाररावांची सून काय चीज आहे हे मी दाखवून दिलं. मला राज्य चालवता येत होते तशी तलवारही. वेळ पडल्यावर तिचे पाणी दाखवायला मी कचरत नसे.

पानिपत झाले. पराक्रमाची शर्थ गाजवुनही पराजयाचा कलंक लागला. सर्वस्वाचा घात होता तो पराजय. मल्हारराव तरीही मराठेशाहीची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायला झटत होते. इंग्रजांशीही लढत होते. पण ते आता थकले होते. त्यात गौतमाबाईंचे निधन झाले. माझ्यासाठी तर माझी आईच गेली. मल्हाररावांना एवढे थकलेले आणि निराश मी कधी पाहिले नव्हते. गौतमाबाई गेल्या आणि मागोमाग तेही अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

माझा मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. मालेराव मात्र अत्यंत पोरकट आणि क्रुरबुद्धी होता. पण न्यायाप्रमाणे होळकर गादी त्याच्याकडे आली. त्याला वेडाचे झटके येत व त्यात तो अनेकदा क्रौर्याची परिसीमा गाठे. माझे अंत:करण जळत असे. प्रजेवरचा अन्याय पाहवत नसे. खुपदा मला हस्तक्षेप करावा लागे. त्याला दुखवावे लागे. पण इलाज नव्हता. लवकरच तोही आजारी पडला. त्या आजाराने त्याला गिळंकृत केले. मी पुन्हा एकदा रिक्त झाले. शून्य झाले. दुर्भाग्याचे तडाखे उसंत देत नव्हते.

मुक्ताबाईचा मी बालविवाह होऊ दिला नव्हता. बालविवाहाला माझा विरोध होता. पण ती आता वयात आली. पण तिचे रुढीपरंपरेने लग्न करणेही मला मान्य नव्हते. त्यावेळीस मी राजधानी महेश्वरला हलवली होती. राज्यात दरोडेखोरांच्या टोळ्या उपद्रव देत होत्या. मी दरबारात पण ठेवला..."जो तरुण या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल...त्या तरुणाशी मी माझ्या मुक्तेचा विवाह लावून देईन!"

शास्त्री-पंडितांना रुचणारी गोष्ट नव्हती ही. जातीपातींच्या हीण प्रथांनी कुजलेल्या समाजालाही ते मान्य कसे होणार? पण मी ठाम होते. माझा मनगटावरील पराक्रमावर विश्वास होता. यशवंतराव फणसेने खरेच दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मी मुक्ताचा विवाह त्याच्याशी मोठ्या धामधुमीत लावून दिला.

मला वाटले आता तरी सौख्याचे दिवस आले. प्रजेसाठी देशभर काम तर करतच होते...पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र स्थैर्य येतच नव्हते. कटकारस्थाने थांबत नव्हती. रामपु-याचा जागीरदार बंडाच्या पावित्र्यात होता तर मला स्वत:ला मोहिम काढावी लागली. ठार मारले त्याला मी त्या युद्धात. शांततेची आणि पावित्र्याची प्रतिमा म्हणून विख्यात अहिल्याबाई रणचंडीही होऊ शकते हे जसे मी एकदा राघोबादादालाही दाखवले होते तसेच रामपुरच्या चंद्रावतांनाही दाखवले.

मला लवकरच नातू झाल्ला. नथु. त्याला अंगीखांदी खेळवत वृद्धापकाळाचे दिवस कंठावेत म्हटले...तर अल्पसा ज्वर आल्याचे निमित्त झाले...नथु...नथु गेला.

पाठोपाठ माझा पोटच्या पोरासारखा जावई..यशवंतराव...तोही आजारपणात गेला.

माझे एक एक अवयव छाटत होती माझी नियती.

मुक्ताने सती जायचा निर्णय घेतला.

किती आकांत केला मी. नाही. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. अटल होती. ऐकता पोर ऐकत नव्हती. एकाएकी मी निस्त्राण झाले. अलिप्त झाले. निर्विकार झाले. जीवन मला अगदी परके परके वाटू लागले. येथे काहीच खरे नाही. काहीच चिरंतन नाही. सारं काही अळवावरच्या पाण्यासारखे. मी उभारलेली मंदिरे भलेही चिरंतन राहतील...पण वेदना मात्र माझ्या नश्वर देहासोबतच नष्ट होतील. वेदनाही ख-या नाहीत. आनंदही खरा नाही. ते नांवही खरे नाही. ते यशही खरे नाही. मग खरे आहे तरी काय?

कि नुसतेच भ्रम?

माझी मुक्ता माझ्या डोळ्यांसमोर चितेवर चढली. निष्प्राण यशवंतरावाचे मस्तक तिने धीराने मांडीवर घेतले. अलिप्तपणे मी सारे पहात होते. माझ्या डोळ्यांत अश्रुचा एक टिपूस नव्हता. हे सारे जसे काही स्वप्नात घडत आहे अशा अलिप्ततेने मी सारे पहात होते.

आगींनी माझ्या पोटच्या लेकराला वेढले. तिच्या किंचाळ्या माझ्या कानावर पडल्या...आगच ती. शेवट आगीत आणि जगणेही आगीत...

या धगधगत्या ज्वालांत जीवंतपणी सतत जळण्याचे नांव अहिल्याबाई आहे.

हे रस्ते...हे घाट...ह्या सराया...ही मंदिरे...ते उभारुन दिलेले असंख्य व्यवसाय...भरभराटीला आणलेले उद्योग...

प्रजेचं पोटच्या पोरांप्रमाने केलेलं प्रतिपालन...

मलातरी स्वप्नवतच वाटतंय!

तुम्हालाही वाटत असेल!

एक अहिल्या होती...सर्वांची अहिल्या...माणुसकीची अहिल्या....पण तीच अहिल्या खरी होती कि

वेदना, वंचना आणि हताशांच्या दाटून येणा-या भग्न काळोखाच्या सावलीत एकाकी जगत राहिलेली...भोगत राहिलेली अहिल्या खरी होती?

मला नाही माहित! मी ते शोधण्याचा तसा प्रयत्नही केला नाही. माझा सांब सदाशिव आहे. त्यानेच मला तुमच्यासाठी बोट धरून चालवले हेच काय ते खरे! त्यानेच मला अपार वेदना सहन करायची शक्ती दिली हेच काय ते खरे!

अहिल्या जनांची होती आणि जनांसाठीच मेली हेच काय ते सत्य!

Saturday, April 8, 2017

आरक्षणकेंद्री विचारपद्धत बदला!


Image result for reservation in india


आरक्षण हा भारतात एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. वंचित-शोषित घटकांसाठी सकारात्मक पाऊल म्हणून आरक्षणाकडे घटनाकारांनी पाहिले. भारतातील वंचित-शोषितता ही मुळात जातीआधारित असल्याने जातीआधारितच आरक्षण दिले जाणे क्रमप्राप्त होते. अर्थात आरक्षण हा नंतर बव्हंशी राजकारण व जातीय अस्मितांचाच विषय बनल्याने आरक्षणमुले किती प्रमाणात शोषितता व वंचितता कमी झाली याचा संगतवार अभ्यास झालेला नाही. आत तर अनेक वरिष्ठ समजले जाणारे समाजघटकही आरक्षणाच्या रांगेत उतरलेले दिसतात. आरक्षणाच्या बाजुने जसा एक प्रबळ मतप्रवाह आहे तसाच आरक्षणाच्या विरोधातही आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. आरक्षण असावे कि नसावे यावर चर्चा करण्यापेक्षा आरक्षण समजा गेले तर आम्ही त्या स्थितीशी तोंड द्यायला कितपत समर्थ आहोत हे तपासत पुढची दिशा ठरवण्यासाठी आता अधिक चर्चा होणे आवश्यक आहे असे मला वाटते.

१९९१ पर्यंत आप्ण समाजवादी सुरक्षित व संरक्षित जगात जगत होतो. ते जग सुरक्षित असले तरी बंधनांनी भरलेले असल्याने प्रगतीही शक्य नव्हती. लायसेंस राज, परमिट राजने तो काळ गाजवला. भ्रष्टाचाराला व अकार्यक्षमतेला त्यामुळे उधान आले. त्यानंतर जागतिकीकरण आले. सरकारी बंधने कमी झाली. त्याचा फायदा आज आपण घेतोच आहोत. त्याच वेळीस जागतिकीकरणाचा अपरिहार्य भाग म्हणून सरकारी उद्योगांचा संकोच होणे अपरिहार्य होते. अनेक क्षेत्रांतून सरकार काढता पाय घेत आहे. अनेक सरकारी उद्योगांतून सरकार आपली गुंतवणूक काढून घेत आहे. सरकारी खात्यांत जेवढ्या जागा रिक्त आहेत त्याही भरल्या जात नाहीत. त्यात वाढ होण्याचे तर गोष्टच वेगळी. उदाहरणच द्यायचे झाले तर भारतात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १८२ मंजूर पोलिस आहेत. युनोच्या मानकानुसार ती संख्या किमान लाखामागे २२२ एवढी तरी असली पाहिजे. त्यात भारतात आहे त्या मंजूर पोलीस संख्येपैकी २४% जागा रिक्त आहेत. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण लाखामागे १४७ एवढेच आहे. 

तीच बाब न्यायाधिशांची. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ तेरा न्यायाधीच आहेत, जे प्रत्यक्षात किमान ५० तरी असले पाहिजे. त्यात आहे त्या जागांतही रिक्त असलेल्या जागांचे प्रमाण मोठे आहे. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयात ६, उच्च न्यायालयांत ४४६ तर खालच्या कोर्टांत ४६०० न्यायाधिशांच्या जागा आजही रिक्त आहेत. मुळात न्यायाधिशांची संख्या किमान पाचपट वाढवण्याची गरज असतांना आहेत त्या रिक्त जागाच भरल्या जात नाहीत. पोलिस व न्यायालये लोकशाहीच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक विभाग असतांना त्यांची ही गत आहे. आपण अन्य खात्यांत काय असू शकेल याची कल्पना करू शकतो. २०१५ मध्ये तर केंद्र सरकारच्या भरतीमध्ये ८९% इतकी घट झाली होती हे केंद्रीय मंत्र्यांनीच लोकसभेत मान्य केले होते. भविष्यात सरकार अनेक बाबींतून हात काढून घेणार आहे. शिक्षण क्षेत्राचेही वेगाने खाजगीकरण सुरु आहे. भारतात लवकरच विदेशी विद्यापीठेही येतील. भारतीय विद्यापीठे त्यांच्यासमोर काय टिकाव धरणार हा प्रश्नच आहे कारण एकुणातील दर्जाच पुर्ण ढासळलेला आहे. उदारमतवादी धोरणांत सरकारने स्वत: कोणतेही उद्योग-व्यवसाय चालवणे बसत नाही. आताच सरकारने एयरलाइन्ससहचे सारे उद्योग विकून टाकावेत अशा मागण्या प्रबळ होत आहेत. सरकार आज काही क्षेत्रात आहे ते लाजे-काजेने व मतपेट्या सांभाळण्यासाठी आहे. पण पुढेही तसेच राहील असे नाही कारण आंतरराष्ट्रीय दबावही वाढत आहेत. थोदक्यात एकंदरीत कल हा पुढे असाच राहणार आहे. याचाच अर्थ सरकार हे काही रोजगार देण्याचे साधन राहणार नाही.

खाजगी क्षेत्रही याला अपवाद राहिले नाही. या दशकात जेवढ्या प्रमाणात नवे उद्योगधंदे सुरु व्हायला हवे होते तेवढे झाले नाहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी विस्ताराचे कार्यक्रम प्रलंबित ठेवले आहेत. हा समजा जागतिक व देशांतर्गत मंदेचा परिणाम आहे. वास्तव हे आहे कि रोजगार नाहीत. त्यात वृद्धे होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. झाली तरी देशात ज्या प्रमाणात दरवर्षी बेरोजगारीत भर पडते आहे ती पाहता बेरोजगारांची संख्या मोठीच राहणार हे उघड सत्य आहे. अशा स्थितीत समजा आरक्षण कायम राहिले किंवा वाढवले तरी ते शोषित-वंचित समाजघटकांची वंचितता कशी आणि किती प्रमाणात कमी करेल हा आपल्यापुढील सामाजिक चर्चेचा मुख्य विषय असला पाहिजे. पण दुर्दैवाने आपले समाजनेते, राजकारणी आणि विचारवंत हे आपले चिंतन (?) आरक्षणकेंद्रीच ठेवतात हे नवल आहे. स्पष्ट सांगण्याचे धाडस त्यांच्या अंगात राहिलेले नाही. किंबहुना आपण नकळत समाजाची फसवणूक करतो आहोत याचे भान त्यांना नाही. आणि हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने उचित आहे असे कोणी म्हणणार नाही. 

आपली सामाजिक चर्चा आरक्षणकेंद्री ठेवण्यात अर्थ नाही. ती आता उद्योग-व्यवसाय केंद्री होत अधिकाधिक खाजगी रोजगारनिर्मिती केंद्री व्हायला हवी. त्यात शेती क्षेत्रालाही सामील करून घ्यावे लागेल. आज अनेक सरकारी कायदे यासाठी अनुकूल नाहीत. वित्तसंस्था भांडवल देण्यास पुढे येत नाहीत. उद्योगव्यवसायाचे प्रामाणिक मार्गदर्शन व प्रशिक्षण याची वानवा तर आहेच पण कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाचीही वानवा आहे. शिक्षणपद्धतीबद्दल आपण आधी जी चर्चा केली ती यासाठीच. सरकारनेच सर्व करावे या मानसिकतेतून आम्हालाच बाहेर पडावे लागेल. कारण मुळात सरकार स्वत:हून काही करण्याच्या स्थितीत नाही. सातव्या पे कमिशनमुळे सरकार आताच वित्तीय ओझ्याखाली दबलेले आहे. त्यात भर घालण्याचा सरकार प्रयत्न करणार नाही हे उघड आहे. मग ते काहीही आश्वासने देवोत अथवा घोषणा करोत. 

आरक्षणकेंद्री विचारपद्धतीने ओपन असो कि आरक्षित, कोणत्याही समाजघटकाचे येथून पुढे भले होण्याची शक्यता नाही. आरक्षण राहिले तरी करियरच्या दृष्टीने पहायचे झाले तर आता तरुणांना प्रगतीसाठी नवे मार्ग शोधण्यासाठी तयार रहायला पाहिजे. आरक्षण असले तरी ते केवळ एक मानसिक आधार आहे असे समजुनच चालावे लागेल. उद्योग-व्यवसाय व कौशल्यकेंद्रित दिशा धरावी लागेल. आजही भारतात असंख्य क्षेत्रे अशी आहेत जी प्रतिभाशाली व साहसी उद्योजक व व्यावसायिकांची वाट पहात आहेत. पण शेजा-याने कांदा लावला कि आपणही कांदाच लावायचा या अनुकरणातून कांद्याचे पीक एवढे येते कि कांद्याचे भाव पडतात. हेच नेमके इकडेही होते आहे. ठराविक क्षेत्रेच करियर म्हणून माहित असतात. तेथे आधीच एवढी गर्दी झालेली आहे कि नव्यांना आता महामुश्किलीने प्रवेश मिळतो. आयटी क्षेत्राचे हे झालेच आहे. स्टार्ट अप साठीही अत्यंत भंगार आणि अव्यावसायिक कल्पना येतात त्यामुळे त्याही संध्यांचा तरुण फायदा घेऊ शकलेले नाहीत कारण बंदिस्त विचारपद्धती. 

जो तो प्रगतीसाठी आरक्षणामागे धावतो व शेवटी नैराश्याच्या किंवा खोट्या आशांच्या गारुडात अडकतो, ती हीच प्रवृत्ती आहे. आपल्याला आरक्षणकेंद्री विचारपद्धतीच प्रथम बदलावी लागेल!

Monday, April 3, 2017

पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ


Displaying Balaji_Vishvanath.jpg


मराठेशाही व पेशवाईची विविधांगांनी भरपूर चर्चा होत असली तरी होत नाही ती रणरागिणी ताराराणी व पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथावर. तसे दोघेही समकालीन. ताराराणीने १७०० ते १७०७ पर्यंत संताजी व धनाजीसारख्या वीरांच्या मदतीने मोगलांशी जी झुंज दिली तिला तोड नाही. अनेक युद्धात तिने स्वत: नेतृत्व केले. घोडदळाचे नेतृत्व करण्यात ती कुशल होती. रणनीतित तिचा हात कोणी धरू शकले नसते. १७०५ मध्ये तर तिने नर्मदा ओलांडून माळवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. जदुनाथ सरकार म्हणतात कि देशातील अत्यंत अंदाधुंदेच्या काळात ताराबाईने ज्या पद्धतीने नेतृत्व केले त्याला तोड नाही. पण मराठी इतिहास ताराराणीबाबत म्हणावा तेवढा उदार राहिला नाही हेच काय ते खरे.

बाळाजी विश्वनाथाचीही तीच गत आहे. अतिसामान्य परिस्थितीत सापडुनही त्याने आपला अपार मुत्सद्दीपणा, युद्धकौशल्य व प्रसंगी प्राणही पणाला लावून त्याने पेशवे होण्यापर्यंत मजल गाठली. दिल्लीकडे मराठ्यांचा मोहरा वळवणारा तोच पहिला मराठी राज्याचा पेशवा. परंतू मराठी इतिहासाने त्याची फारशी दखल घेतली नाही. बाजीराव पेशवा ते दुस-या बाजीरावावर भरभरुन स्तुतीसुमनांची व निंदाव्यंजक लेखनांची राळ उडवून देणारे मात्र पेशवाईच्या संस्थापकाची फारशी दखल घेत नाही हे एक वास्तव आहे. परंतू अगदी टिळकांच्याही कोकणस्थ चित्पावनप्रणित राजकारणाचा खरा पाया बाळाजी विश्वनाथानेच घातला हे लक्षात घेतले जात नाही. आपण येथे त्याच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करू!

बाळाजी विश्वनाथ भट मूळ कोकणातील. त्याच्याबाबतची आरंभीची माहिती मिळते ती अशी - श्रीवर्धन येथील महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवाजीच्या सेवेत असावेत अशी शक्यताही रियासतकार व्यक्त करतात. किमान १५७५ च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत देशमुखी होती असे दिसते. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी दोन मुले झाली. पैकी शिवाजीस  कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी ही मुले झाली. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला चार भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. बाळाजीचे लहानपणीच लग्न झाले ते बर्वे घराण्यातील राधाबाईशी. संभाजीराजे होते तोवर कोकणात काही प्रमाणात मोगली व अन्य स्वा-यांचा उपद्रव असला तरी भट घराण्याची देशमुखी सुस्थिर होती. पण संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर मात्र परिस्थिती पालटली. सिद्द्याने उचल खाल्ली. सिद्दी व आंग्रे परंपरागत शत्रू. त्यात भट घराणे आंग्रांना सामील असल्याच्या संशयाने त्याची वक्रदृष्टी भट घराण्याकडे वळाली. बाळाजीच्या जानोजी नांवाच्य भावाला सिद्द्याने पकडून, पोत्यात घालून समुद्रात बुडवले असेही सांगितले जाते. काहीही असले तरी भट घराण्याचा छळ सुरु झाल्याने प्रथम बाळाजीला सपत्नीक मुरुड येथे वैशंपायन कुटुंबियांकडे आश्रय घ्यावा लागला, पण सिद्द्याच्या हशमांनी तेथेही त्याची पाठ पुरवल्यामुळे बाळाजीला भानू कुटुंबियांसोबत साता-याला यावे लागले.

जवळपास कफल्लक झालेल्या बाळाजीला चरितार्थासाठी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. बाळाजी हिशेबात तरबेज असल्याने त्याला रामचंद्रपंत अमात्यांच्या कोठीवर कारकुनाची नोकरी मिळाली. याच काळात धनाजी जाधवाची त्याच्यावर मर्जी बसली. धनाजीने त्याला दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. या कालात मोगलांशी मराठ्यांचा संघर्ष सुरुच होता. त्यात राजाराम महाराजांचाही सिंहगड येथे मृत्यू झाला व युद्धांची सर्व सुत्रे ताराराणीने आपल्या हाती घेतली. संताजी-धनाजी गनीमी काव्याने मोगलांना त्रस्त करत होते. हे सारे बाळाजी विश्वनाथ फार जवळून अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखील काही लढायांत भाग घेतला. त्याचेच फळ म्हणून की काय बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली. आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

१७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि उत्तरेचे सारे राजकारणच पालटले. औरंगजेबाच्या वंशजांत पातशाहीसाठी संघर्ष उडण्याची चिन्हे दिसू लागली. औरंगजेबाच्या मृत्यूची बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेला आझमशहा तत्काळ अहमदनगरला आला व ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. शाहु महाराजांची कैदेतुन सुटका हा तत्कालीन परिस्थितीत परिस्थितीत मोगलांनी टाकलेला अत्यंत मुत्सद्दी आणि यशस्वी झालेला डावपेच होता. मुअज्जम हा लाहोरला असलेला राजपुत्रही तख्तावर हक्क सांगण्यासाठी आग्र्याकडे निघाला होताच. तख्तावर कोण बसणार हे युद्धच ठरवणार होते. अशा स्थितीत रणरागिणी ताराबाई परिस्थितीचा फायदा घेवून आपल्या सीमा वाढवेल यात शंकाच नव्हती. मराठ्यांना आपापसात झगडत ठेवणे अधिक महत्वाचे होते. त्यामुळे सेनापती झुल्फिकार खान व राजपुत सरदारांनी शाहजादा आझमला शाहुची सुटका करण्यास सुचवले. आझमला तो सल्ला मानण्यावाचून गत्यंतर नव्हते. शाहुच्या सुटकेमुळे मराठ्यांत सत्तास्पर्धा निर्माण होवून दोन तट पडतील व ते आपापसात लढत बसतील हा मोगली होरा मराठ्यांनीही खरा ठरवला हे वेगळे. अशा रितीने डावपेचाचा एक भाग म्हणून मोगल सत्तेशी आणि तख्ताशी इमानदार राहणे या अटींवर शाहु महाराजांना १८ मे १७०७ रोजी दोराहा (भोपाळ पासून ३२ किमी) येथे मुक्त करण्यात आले. मोगली सत्तेने शाहुंनाच स्वराज्याचा वारस म्हणुन अधिकृत मान्यता दिली. तशा सनदाही दिल्या व त्यान्वये दक्षीणेतील सहा सुभ्यांची सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकारही शाहुंना बहाल केले. यामुळे शाहु महाराजांचे मनोबल वाढले, तशीच महत्वाकांक्षाही. शाहुंना मुक्त करुन आझम उत्तरेकेडे तातडीने आपल्या भावाचा सामना करायला निघुन गेला. अर्थात आझमने शाहूंना मुक्त केले असले तरी त्यांच्या दोन्ही पत्नी (सावित्रीबाई आणि अंबिकाबाई), येसूबाई आणि शाहुंचा सावत्रभावाला मात्र ओलीस म्हणुन आपल्याजवळच कैदेतच ठेवून घेतले.

शाहुंची सुटका झाल्याची खबर वणव्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. मराठा सरदार अर्थातच द्विधेत पडले. जे गुजराथ व माळव्याच्या सीमावर्ती प्रदेशांत स्वतंत्र सैन्य उभारुन माळवा व गुजराथवर हल्ले चढवत लुट करणारे सरदार होते त्यांना ही मोठी संधी वाटली. सर्वात प्रथम सामील झाला तो बिजागढचा मोहन सिंग रावळ. तापीच्या तीरावर आला असता शाहुंना अमृतराव कदम बाडेही सामील झाला. परसोजी भोसलेनीही तीच वाट पकडली. अशा रितीने एकामागुन एक सरदार शाहुंभोवती जमायला लागले. थोडक्यात गृहयुद्धाची नांदी झाली. ताराराणीच्या सा-या राजकीय योजना आता शाहुंचे काय करायचे या प्रश्नाशी येवून थांबल्या. युद्धाखेरीज पर्याय नव्हता. ताराराणी या रणमर्दानी व मुत्सद्दी ख-या, पण मराठा सरदारांना एका स्त्रीचे युद्धातील नेतृत्व मनोमन मान्य नसावे अशा घडामोडीही होत्याच. त्यात शाहू तोतया आहे अशी हुल उठली. ही हूल उठायला ताराराणी कारणीभूत होती की नाही याची शहानिशा क्लरणे शक्य नाही, पण काहीकाळ संभ्रम निर्माण झाला हे खरे. पण परसोजी भोसलेने एका ताटात शाहूबरोबर भोजन करून हाच खरा शाहू व संभाजीचा पुत्र अशी ग्वाही दिली त्यामुळे अफवेमुळे साशंक झालेले मराठा सरदार जरा अश्वस्त झाले.

ताराराणीने शाहूला गादीचा एकमेव वारस म्हणून मान्य करायला नकार दिला. कारण गेली सात वर्ष तिनेच मोगलांशी अथक संघर्ष करत मराठी राज्य काही प्रमाणात का होईना वाचवले होते. ताराराणीच्य दृष्टीकोनतून विचार करता यात वावगेही काही नव्हते. स्वबळावर तिने मराठी राज्यावर अधिकार मिळवला होता. पण पातशाही सनदा शाहुच्या ताब्यात असल्याने त्याची बाजू नकळत वरचढ झाली होती. सरदारांचे पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीही तिच्या विरोधात होती. पण ताराराणी हार मानणा-यांपैकीही नव्हती. तिने शाहुशी युद्धाचा पवित्रा घेतला. तिने धनाजी जाधवला शाहु खरा कि तोतया याचा अंदाज घेऊन त्याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. बाळाजीही त्याच्या सोबत होता.

खेड (आताचे राजगुरुनगर) येथे युद्धाच्या आदल्या दिवशी बाळाजी शाहुला धनाजीचा प्रतिनिधी म्हणून भेटायला गेला. त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध नाही, पण शाहू तोतया नसून खराच आहे अशी बाळाजीची खातरजमा झाली व त्याने धनाजीला तसे सांगितले. पण धनाजीचा निश्चित निर्णय होत नव्हता. दुस-या दिवशी उभय पक्षत युद्ध सुरु झाले खरे पण ते ऐन भरात असतांनाच धनाजीने युद्ध थांबवले व शाहुच्या गोटात अधिकृतपणे प्रवेश केला. यामागे बाळाजीचेच मुत्सद्देगिरी असावी असा तर्क इतिहासकार देतात. धनाजीसारखा बलदंड सरदार शाहुला सामील झाल्याने ताराराणीची बाजू लुळी पडणे स्वाभाविक होते.

 बाळाजी व धनाजीचे हे कृत्य नैतिक कि अनैतिक हा प्रश्न येथे निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण राजकारणात नीतिमत्तेला थारा देता येत नाही हेही खरे. या प्रसंगामुळे शाहुच्या मनात बाळाजीबद्दल कृतज्ञता निर्माण होते व तसे झालेही. ताराराणीही शांत बसली नाही कि खचलीही नाही. गृहयुद्ध चालुच राहिले व त्याची परिणती कोल्हापूर व सातारा अशा मराठेशाहीच्या दोन गाद्या निर्माण होण्यात झाली. परस्पर सीमाही ठरल्या. तरी घोडी-कुरघोडीचे राजकारण चालुच राहिले. ताराराणीच्याही निग्रहाचे येथे कौतूक वाटल्याखेरीज राहत नाही. बाळाजीने अनेक सरदारांना ताराराणीच्या पक्षतून फोडून शाहुच्या दरबार्ती रुजू करत शाहुचे सामर्थ्य वाढवले. येथे हे लक्षात घेतले पाहिजे कि शाहुचे संपुर्ण जीवन मोगली छावणीत गेल्याने त्याला युद्धेभ्यास नव्हता तसेच राजकारणाचे डावपेचही विशेष माहित नव्हते. पण त्याचा स्वभाव शांत व सखोल असल्याने गुणग्राहकताही त्याच्या अंगी होती. बाळाजीला त्याने उत्तरोत्तर प्रगतीची संधी दिली. नंतर कोल्हापुर गादीसाठीही ताराराणी आणि राजसबाईत वाद पेटला. हा वाद निर्माण करण्याचे काम बाळाजी विश्वनाथानेच करुन शाहुंना जरा उसंत दिली असे जसवंतलाल मेहता आपल्या Advanced Study in the History of Modern India 1707-1813 या ग्रंथात म्हनतात.

इकडे उत्तरेतही भाऊबंदकी माजलेली होतीच. शाहजादा आजम व मुअज्जम याच्यात युद्ध झाले. त्यात आझम ठार झाला. मुअज्जम बहादुरशहा नांव धारण करत तख्तावर बसला. तरी त्याला अजुन कामबक्ष या आपल्या धाकट्या भावाचा काटा काढायचा होता. कामबक्ष तेंव्हा हैदराबाद येथे होता. शाहुंना आझमने दिलेली चौथाई आणि सरदेशमुखीची सनद त्याच्या मृत्युबरोबरच बाद झाली होती. त्यामुळे शाहुंनी बालाजीच्या सल्ल्याने प्राप्त स्थितीचा फायदा घ्यायचे ठरवले. नेमाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली शाहुंनी नव्या बादशहाच्या मदतीसाठी कुमक पाठवली. मोगल व कामबक्षात झालेल्या युद्धात कामबक्षचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला. कामबक्ष जखमी अवस्थेत पकडला गेला व नंतर त्याचाही मृत्यु झाला. बहादुरशहा शाहुंना चौथाई आणि सरदेशमुखी द्यायला जवळपास तयार झाला होता, पण ताराराणीचा वकीलही तेथे येवुन ठेपल्याने सारा मामला बिघडला. बहादुरशहाने झुल्फिकार खान व मुनिमखान या आपल्या मंत्र्यांचेच ऐकले व उभयपक्षांना सांगितले कि आधी तुमच्यातले वाद मिटवून कोण अधिकृत वारस आहे हे आधी आपापसात निश्चित करा....त्यानंतरच सनदा दिल्या जातील. मोगलांनी येथेही आपल्या राजकीय मुत्सद्दीपनाची चुणुक दाखवली. ही घटना १७०९ मद्धे घडली.

अर्थात या धामधुमीमुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नव्हता. मयत धनाजी जाधवचा मुलगा सेनापती चंद्रसेन जाधव हा अकार्यक्षम असल्याचे दिसल्याने शाहुंनी बाळाजी विश्वनाथाची "सेनाकर्ते" पदीही नेमणुक केली. (ही पदवी म्हणजे आताच्या क्वार्टर मास्टर जनरल या पदासारखी होती.) पण याची परिणती अशी झाली कि चंद्रसेन सरळ ताराराणीला जावून मिळाला. (१७११). शाहुंनी मग त्याचा धाकटा भाऊ संताजी जाधवला सेनापती बनवले. तोही असाच चंचल असल्याने सरदार नाराज होवू लागले आणि अनेक पुन्हा ताराराणीच्या गोटात जावू लागले. बाळाजीने मग स्वत:च्या जबाबदारीवर महादजी कृष्ण नाईकांसारख्या सावकारांकडुन कर्ज उचलले, स्वतंत्र सैन्य उभारले आणि शाहूंच्या शत्रुंवर तुटुन पडला व त्यांची गादी शाबुत ठेवली..

शाहु महाराजांना बाळाजीची अनमोल मदत झाली नसती तर शाहु सत्ता प्राप्त करु शकले नसते असेच एकंदरीत घटनाक्रम पाहता म्हणता येते. बाळाजीने शाहुंसाठी रस्त्यातील अनेक काटे साफ केले. अनेक शत्रुंना शाहुंच्या बाजुने वळवले. स्वत:ही जीवावरची संकटे झेलली. राजसबाईला हाताशी धरुन ताराराणीला शेवटी पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले. पण किनारपट्टीचे आधिपत्य गाजवणारा कान्होजी आंग्रे अजुनही ताराराणीशी एकनिष्ठ राहिला. त्याला आपल्याकडे कसे वळवायचे हा शाहुसमोरील पेच होता. ते जबाबदारी शेवटी शाहुने बाळाजीवरच सोपवली. पण आंग्रे सरखेल. त्याच्याशी मी कोणत्या अधिकारात चर्चा करू असे बाळाजीने विचारल्यावर शाहुने बाळाजीला पेशवेपद दिले. 

यानंतर बाळाजी आंग्रेंना भेटला. आंग्रेंबरोबर समझौता करण्यात तो यशस्वी झाला. १७१४ मधील ही घटना. यामुळे बाळाजीच्या अलौकिक मुत्सद्दीपणावर शिक्कामोर्तब झाले. बाळाजीला अशाच एका संघर्षात अटक झाल्याचीही घटना घडली. संजय क्षीरसागरांच्या शब्दांत ती अशी आहे...(हुसेनअलीसोबत) तहाची वाटाघाट सुरु असताना सुपे व पाटस परगण्याचा जहागीरदार दमाजी थोराताने हुसेनअली सय्यदच्या प्रेरणेने शाहूच्या विरोधात बंडाळी आरंभली. स. १७१६ मध्ये दमाजीचा बंडावा विशेष वाढल्याने शाहूने बाळाजी विश्वनाथला त्याचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिली. थोराताचे बंड आंगऱ्याप्रमाणेच बोलाचालीने निकाली काढण्याच्या उद्देशाने बाळाजी त्याच्या भेटीस सहपरिवार गेला. तत्पूर्वी बेलभंडाऱ्याच्या शपथक्रियेचा औपचारिक कार्यक्रम पार पडला होता. दमाजीचा मुक्काम त्यावेळी पुण्याच्या पूर्वेस हिंगणगाव येथे होता. या गावाला गढी बांधून थोरात मंडळी राहात होती. पेशवा भेटीस आल्यावर दमाजीने त्यास कैद केले. यावेळी पेशव्याने त्यास शपथेची आठवण दिली असता ‘ बेल म्हणजे झाडाचे पान व भंडारा म्हणजे हळद ‘ अशा तऱ्हेची मुक्ताफळे दमाजीने उधळल्याचे सांगतात. पेशव्याला कैद केल्यावर दमाजीने त्याच्याकडे जबर आर्थिक दंडाची मागणी केली. बाळाजीने आर्थिक दंड भरण्यास तयार व्हावे म्हणून त्यास उपाशी ठेवण्यात आले. खेरीज राखेचे तोबरे भरण्याचा धाकही दाखवण्यात आला. अखेर बाळाजीने आपले सर्व कुटुंब, मुतालिक अंबाजी पुरंदरे व धडफळे कुटुंबातील दोन इसम ओलीस ठेऊन सुटका करून घेतली आणि शाहूकडे धाव घेतली. बिचारा शाहू !

कान्होजीने बहिरोपंतास पकडले म्हणून त्याची पेशवाई काढून त्याने बाळाजीस दिली होती तर त्याची ही तऱ्हा !!! मात्र, यावेळी शाहूने आपल्या पेशव्याची पाठराखण करून सावकार आणि इतर मुत्सद्द्यांच्या मार्फत द्रव्याची जुळणी करून पेशव्याची माणसे सोडवली. पेशव्याच्या कुटुंबाची सुटका होताच शाहूने सचिव नारो शंकर यास थोराताचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. सचिव अल्पवयीन असल्याने हि कामगिरी त्याच्या कारभाऱ्याने उचलली पण थोराताने याही वेळेस शाहूवर मात केली. सचिवाची फौज थोरातावर चालून जाण्यापूर्वीच रोहिडा किल्ल्याखाली सचिवाचा मुक्काम असल्याची बातमी मिळवून दमाजीने नारो शंकरास कैद केले आणि आपल्यावर चालून आल्यास तुमच्या पुत्रास ठार करू अशी धमकी त्याने नारो शंकरच्या आईस दिली. त्यामुळे सचिवाची स्वारी सुरु होण्यापूर्वीच संपुष्टात आली. थोराताच्या कैदेत नारो शंकर चार आठ महिने राहिला. शाहूने सचिवाच्या सुटकेसाठी परत एकदा भला मोठा आर्थिक दंड थोरातास दिला. दरम्यान, हुसेन सय्यद सोबत चाललेल्या तहाची वाटाघाट फळास येऊन उभयतांमध्ये सख्य होताच बाळाजी विश्वनाथने मोगलांचा तोफखाना सोबत घेऊन हिंगणगावावर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात थोराताचा पराभव झाला. बाळाजीने त्यास पुरंदरावर कैद करून ठेवले. थोराताची हिंगणगावची गढी खणून काढली आणि पांढरीवर गाढवाचा नांगर फिरवून आपल्या अपमानाचा सूड उगवला. अशा प्रकारे थोराताचे बंड निवळले..."

१७१८ मद्ध्ये बाळाजीने सय्यद हुसेनकडून चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क शाहुसाठी मिळवले. जेवढा प्रदेश शिवाजी महाराजांच्या अंकित होता जवळपास त्या सर्व प्रदेशावरील चौथाईचे हक्क मिळवणे ही बाळाजीची मोठीच कामगिरी आहे. अर्थात या मोबदल्यात पातशाहीची सार्वभौमता मान्य करावी लागली. पण पातशहाने ही योजना फेटळून लावली व युद्धाची तयारी सुरु केली. त्यामुळे सय्यद हुसेन तातडीने बाळाजी विश्वनाथासह दिल्लीकडे ससैन्य रवाना झाला व सरळ फर्रुकसियर बादशहाची उचलबांगडी करुन नामधारी पातशहाची स्थापना केली. या वेळीस बाजीरावही बाळाजीसोबत होता. सय्यद हुसेनने बाळाजीचे ऐकले याचा हा परिणाम होता. या संधीचा फायदा घेऊन बाळाजी विश्वनाथाने मोगली कैदेत असलेल्या सावित्रीबाई, येसुबाई व इतरांची सुटका मार्च १७१९ मद्धे करुन घेतली. अंबिकाबाई मात्र पुर्वीच मोगली कैदेतच वारली होती. 

इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात कि यामुळे आपणही पातशाही कधीही हलवू शकतो याचा विश्वास आला. बाजीरावाने जे उत्तरेबाबत धोरण ठरवले त्याला ही मोहिम कारणीभूत झाली. या मोहिमेतच तरुण मल्हारराव होळकर एक स्वतंत्र पथक्या म्हणून सामील झाला होता. या दरम्यान एका भांडनानंतर मल्हारराव व बाजीरावात मैत्र निर्माण झाले व त्याची परिणती पुढे मल्हाररावाने बाजीरावाला साथ देण्याचे ठरवले व मराठेशाहीची सरदारकी स्विकारली. पुढे या दोघांनी काय पराक्रम गाजवले हा इतिहास सर्वज्ञात आहे.

या मोहिमेनंतर पुण्याला परत आल्यानंतर काही काळातच, २ एप्रिल १७२० रोजी, बाळाजीचा मृत्यू झाला. त्यावेळीस त्याचे वय ५८ वर्षांचे होते. पेशवेपदी बाळाजी केवळ अपार मुत्सद्देगिरी, साहस आणि धोरणीपणाने चढला. त्याचे आयुष्य तसे संघर्षातच गेले. जीवावरच्या जोखमी घ्याव्य लागल्या. तो युद्धात कुशल नव्हता, पण कोणचाही विश्वास संपादन करून राजकीय कार्य पुढे नेण्याची अचाट क्षमता त्याच्याकडे होती. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईचे पर्व आणण्याचे संपुर्ण श्रेय त्याचे जसे आहे तसेच उत्तर हेच मराठ्यांचे लक्ष्य असले पाहिजे हे त्याने ओळखून आधीच्या दक्षीणकेंद्रित राजकारणाला बदलवले. त्याचीच परिणती पुढे उत्तरेत मराठ्यांचे अधिपत्य निर्माण होण्यात झाली. अर्थात नंतरचे सर्वच पेशवे लायक निघाले असे नाही. इतिहासाने त्यांचे मुल्यमापन वेळोवेळी केलेले आहेच. पहिल्या पेशव्याबाबत इतिहासाने कृपणता दाखवली एवढे मात्र खरे. त्याच्याबाबत बरे वाईट शेरे मारण्यापलीकडे त्याच्या पेशवेपदापर्यंतच्या प्रवासाचे आणि १७१३ ते १७२० या अल्पावधीच्या पेशवेपणाचे मात्र सखोल विवेचन राहुनच गेले आहे.

-संजय सोनवणी 
(Published in Sahitya Chaprak, April-2017 issue)

Saturday, April 1, 2017

पुरातन ज्ञानासक्ति कोठे गेली?


Image result for knowledge curiosity


सिंधू संस्कृतीमधील लोकांचा समुद्रमार्गे सुदुर मेसोपोटेमिया, इजिप्तसारख्या प्रदेशांशी व्यापार होत असे हे आपल्याला माहित आहे. पण पहिले जहाज कसे बनले असेल? समुद्रात ते घालण्यासाठी ते कोणत्या तंत्राने बनवले पाहिजे, कोणत्या प्रकारची लाकडे वापरली पाहिजेत, सुकानू-वल्ही-शिडे हा प्रवास कसा केला असेल? कोण हे आद्य तंत्रज्ञ होते? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या अत्यंत नव्या तंत्रज्ञानाने बनलेल्या पण वापरच केला गेला नसलेल्या जहाजात बसून क्षितीजापलीकडचे काहीच माहित नसलेल्या अज्ञात सागरात त्या नौका घालण्याचे साहस कोणी केले असेल? पहिल्याच प्रयत्नात यश येत नाही. ते कदाचित दिशाही भरकटुन भलतीकडेच गेले असतील अथवा वादळ-वा-यात सापडून मृतही पावले असतील. तरीही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत जीवावरची संकटे झेलण्याची ही उर्मी त्यांच्यात कोठून आली? जे लोक पहिल्यांदाच इच्छित किना-याला लागले तेंव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसेल. नाही? सफलतेचा, धेयप्राप्तीचा आनंद आपण कशात तोलणार? 

अपरिचित अज्ञात लोकांकडे पाहून त्यांना काय वाटले असेल? त्यांच्याशी कसा संवाद साधला असेल? आपण शत्रू नसून मित्र आहोत हे कसे पटवले असेल? त्या किना-यावर्च्या लोकांना अपरिचित, समुद्रात तरंगणा-या "वाहनातून" काही लोक येत आहेत हे पाहुन तो जादुटोणा वाटला असेल कि साक्षात देवच आले आहेत असे वाटले असेल? कदाचित त्यांना ते लोक दुष्ट आहेत असेही वाटले असेल. मग काय घडले असेल? सुरुवातीला अक्षरश: यातील काहीही घडलेले असू शकेल. अनेक लोक किना-यावरील रानटी जमातींनी मारुनही टाकले असतील. 

पण या अद्भूत साहसाची परिणती झाली ती विदेशी व्यापारात. सांस्कृतिक व शोधांच्याही देवान-घेवाणीत. भारताची आर्थिक प्रगती जी सिंधू काळात झालेली दिसते ती या अनाम पण महान शास्त्रज्ञांमुळे. अपार साहस करुन समुद्रापारच्या अज्ञात विश्वाकडे जीवावरचा धोका पत्करुन निघालेल्या पहिल्या खलाशामुळे. समुद्रात माल डुबुन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे हे माहित असतांनाही आपला माल त्यात लादून अज्ञात लोकांशी व्यवसाय करण्याची आंतरिक प्रेरणा असलेल्या व्यापा-यामुळे. 

आज जग फार पुढे आले आहे. आज पार आण्विकशक्तीवर चालणा-या महाकाय युद्धनौका आहेत. पाणबुड्या आहेत. भविष्यात पाण्यातुनच हायड्रोजन वेगळा करुन त्यावर चालणा-या बोटी येतील. कदाचित आज आपल्या कल्पनेतही नसलेले नवीन तंत्रज्ञान येईल. माणुस कल्पक आहे. साहसी आहे. त्याच्यात अनावर नैसर्गिक कुतुहल आहे. त्याला प्रश्न पडतात म्हणून तो उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो. आद्य नौका बनली ती याच आदिम प्रेरणेतून. ज्ञानपिपासेतून. अज्ञाताचा शोध लावण्याच्या प्रवृत्तीतुन. जीवावरचे साहस करण्याच्या वेड्या उर्मीतून. जग हे अशाच लोकांनी घडवलेले आहे. पण यात आज आम्ही कोठे बसतो? आज आम्हाला सारेच तंत्रज्ञान बाहेरुन आयात करावे लागते. आम्ही या ज्ञानात नंतर काही विशेष भर घातली नाही. तशी आम्हाला गरज वाटली नाही. आम्ही धर्माला, धर्ममार्तंडांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानतो. पण ऐकणारे आपणच होतो आणि आपण महामुर्ख होतो म्हणून सोयिस्कररित्या समुद्रप्रवास पाप आहे असे स्विकारले हे कधी कबूल करणार? आमच्याच नवे काही शोधण्यातील उर्मी मेलेल्या होत्या म्हणून आम्ही मागे पडलो हे कोण कबूल करणार? 

सिंधू संस्कृती आमची. पहिली भारतीय नौका बनवून दिक्कालाच्या शोधात निघालेले आम्हीच. कुशल नगररचनेचे तंत्र शोधणारे आम्हीच. आम्ही इतिहास वाचतो ते कशासाठी? ती ज्ञानप्रेरणा, कुतुहलाचे व प्रश्नांचे महत्व समजावून घेण्यासाठी? आम्ही आज जेथे आहोत त्यातुन पुढे जाण्यासाठी इतिहास वाचतो? नाही. आम्ही वाचतो...नव्हे घोकंपट्टी करत राहतो...कशासाठी तर परिक्षेत पास होण्यासाठी. मेरिटमध्ये येण्यासाठी. एकदाची परिक्षा संपली कि पुन्हा सारे विसरून जाण्यासाठी. म्हणजे आम्ही काही शिकण्यासाठी शिकत नाही तर तथाकथित मेरिट लिस्टमद्ध्ये वर यायच्या दुष्टीतून शिकतो. नोकरीसाठी शिकतो. याला कसले मेरिट म्हणायचे? हे मेरिट नसून फक्त स्मरणशक्तीत प्राबल्य आहे एवढे दाखवण्यापुरते हे मेरिट. त्याचा जीवनातील उपयोग शून्य आहे. 

आम्ही प्रश्न विचारणारी पिढी घदवत नाही. आम्ही दिक्कालाचे स्वप्न पाहणारी पिढी घडवत नाही. आम्ही बेरोजगार नोकरदारांची पिढी घडवतो. पालक प्रश्न विचारणा-या मुलांची बोलती बंद करतात. शाळेत शिक्षक अभ्यासक्रमाओपलीकडच्या प्रश्नांवर अघोषित बंदी घालतात. ते इतिहास शिकवतात ते सनावळ्या पाठ करुन घेण्यासाठी व कोणत्या राजाने, सरदाराने काय केले आणि काय परिक्षेत येईल हे सांगण्यासाठी. पण ते घटनांच्या मतितार्थाकडे लक्ष देत नाहीत. मुळ गाभा समजावून सांगण्याचे त्यांची कुवत नाही. मुलात इतिहास का शिकायचा असतो हेच ते सांगत नाहीत. आम्हाला सिंधू संस्कृतीवर चार मार्काचे प्रश्न येणार आहेत ना..मग तेवढेच बघा! तेवढेच लक्षात ठेवा.

मग आम्ही आमच्या पुर्वजांचे अपार कुतुहल, जिज्ञासा, शोधक वृत्ती, साहस व त्याची फलनि:ष्पत्ती कशी सांगणार? नव्या पिढीतुनही तसेच कुतुहलांनी व शोधक वृत्तीने थबथबलेले नागरिक कसे तयार करणार? आज जेही सागरी ज्ञान आहे (किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील) ते आत्मसात करत त्यात नवी भर घालू शकणा-या ज्ञानवंतांची कशी निर्मिती करणार? शोधकाला क्षितीज तोकडे पडेल एवढे काही करायचे आजही बाकी आहे. पण त्या दिशा विद्यार्थ्याला कोण दाखवनार?

मार्क म्हणजे मेरिट या अडानी भावनेतून पालक व शिक्षकही कधी बाहेर पडनार?

उलट आम्ही विद्यर्थ्यांचे कुतुहल मारतो. त्यांच्या प्रश्नांना वेडगळ समजतो. पण अशाच वेडगळ लोकांनी क्रांत्या घडवल्यात. ज्या कळात समुद्र म्हणजे नेमका काय, त्यापार काय आहे हे माहितही नसता नौका बनवेल, त्यात बसुन वादळवारे झेलत अज्ञाताचा प्रवास करेल व नवभुमी शोधून तेथील अज्ञात लोकांशी, भाषाही माहित नसतांना, त्यांच्याशी संपर्क तर साधेलच पण व्यापारही करेल अशी कल्पना करणारा किती वेडपट म्हणायचा? नुसता वेडपटपणा नव्हे तर ठार मुर्खपणा. पण अशाच वेडपट लोकांनी आजच्या ज्ञानविज्ञानाचे व सुखकर जीवन घडवले आहे. आम्हाला अशा वेडपट लोकांची जास्त गरज आहे हे पालकांनी व शिक्षकांनी समजावून घ्यायला पाहिजे.

रोजगार हे शिक्षणाचे उपफल आहे. पण रोजगार हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट नाही. ज्ञानवंत घडवण्यासाठी, मानवजातीचे भवितव्य घडवण्यासाठी स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे नागरिक घडवणे हा शिक्षणाचा महत्वाचा आणि प्रमुख उद्धेश्य आहे. आम्ही आमच्या उद्दिष्टापासुन कोसो दूर आहोत. आम्हाला सिंधू कालात मनाने जायला पाहिजे ते या प्रेरणा समजावून घेण्यासाठी. ज्ञानाची आसक्ति काय असते हे समजून घेण्यासाठी. इतिहास त्यासाठे शिकायचा असतो हे शिक्षकांनी आधी समजावून घेतले पाहिजे व त्यासाठी पालकांनीही सजग राहिले पाहिजे. अन्यथा पाल्यांचे भवितव्य अंध:कारमयच राहनार यात शंका बाळगू नये!

गांधीजींचे स्वप्न आणि परतंत्र आम्ही!


Image result

आपापल्या राष्ट्राबाबत राष्ट्रनेत्यांची काही स्वप्ने असतात. त्यासाठी तत्वज्ञान बनवले जाते. त्यावर राष्ट्र चालले तर देशाची सुवर्णभुमी होईल असे त्यांना वाटत असते. महात्मा गांधी तर राष्ट्रपिता. "राष्ट्र" नामक जगातच एकंदरीत नवनिर्मित असलेल्या संकल्पनेला त्यांनी या देशाच्या भाषा, प्रांत, वंश-जाती, वैविध्यपुर्ण संस्कृत्यांचे अडथळे मोडित काढत सर्वांपंरर्यंत पोहोचवले व राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अभिनव लढ्यामध्ये सर्वांना सामावून घेतले. स्वातंत्य्र्य मिळवलेही. काय होती त्यांची स्वप्ने स्वतंत्र भारत व त्यातील नागरिकांबाबत हे पाहणे जेवढे महत्वाचे आहे तसेच त्यांची स्वप्ने पुर्ण करायच्या दिशेने नंतरच्या राष्ट्रनेत्यांनी कितपत प्रयत्न केले हेही पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.

महात्मा गांधी अर्थतज्ञ नव्हते तरीही त्यांनी देशाचा आर्थिक पाया काय असावा यावर वेळोवेळो चिंतन मांडले आहे. एवढेच नव्हे तर राज्याचे अधिकार कितपत असावेत यावरही आपले सिद्धांत मांडले आहेत. जागतिक परिप्रेक्षात भारताचे स्र्थान काय असावे व पाश्चात्य राष्ट्रांना भारत नेमका कशामुळे प्रेरणादायी ठरेल हेही त्यांनी सखोलपणे मांडले आहे. येथे त्यांच्या सर्वच स्वप्नांचा व त्या स्वप्नांना आधारभूत ठरु शकलेल्या तत्वज्ञानाचा आढावा घेणे शक्य नाही. पण जी स्वप्ने आजही मोलाची व सर्वांनी जपावीत अशी आहेत ती व त्यांची आम्ही कशी पायमल्ली केली आहे ते पाहणे अत्यंत महत्वाचे ठरेल.

"राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो. राज्याला अधिक अधिकार असल्याने शोषण कमी झाल्यासारखे वाटेल पण यात व्यक्तिस्वातंत्र्याचा अपार संकोच होईल आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल. सरकारी नियंत्रनांमुळे भ्रष्टाचार तर वाढेलच पण सत्याची गळचेपीही सुरु होईल. काळाबाजार व कृत्रीम टंचाया वाढतील. एवढेच नव्हे तर व्यक्तीची स्व-सृजनप्रेरणाही यातून नष्ट होत तो स्वत:ला घ्याव्या लागणा-या मेहनतीपासूनही दूर पळेल. सर्वोच्च प्राधान्य हे व्यक्तीस्वातंत्र्याला असायला हवे त्याशिवाय सबळ समाजाचे उभारणी शक्य नाही. व्यक्तीस्वातंत्र्य नाकारणे व शासन सर्वोपरी होणे हे मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध आहे. स्वत:चे "मन" नसलेला माणुस नसल्यासारखाच आहे....राज्याला शरण जाण्याएवढा व्यक्तिस्वातंत्र्याचा अनैतिक व अन्याय्य सौदा नसेल. मला कमी लोकांकडील अधिकतम अधिकार असलेले स्वराज नको आहे तर जेंव्हा नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होईल तेंव्हा सरकारचा विरोध करू शकण्याची सक्षमता असलेले नागरिक असतात तो देश हवा आहे." (३ नोव्हें. १९४७)

वरील अर्थाची त्यांची विधाने स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच्याच महिन्यांतील आहेत. त्यांच्या विचारांचे स्वतंत्रतावादी सूत्र यातून ठळक होते. पण ते सुत्र नवनिर्वाचित सरकारने लगोलग पायतळी तुडवल्याचेही खिन्न चित्र आपल्याला दिसते. त्या काळात साम्यवाद-समाजवाद हे परवलीचे शब्द बनले होते. साहित्य, नाटक, चित्रपटांतून समाजवादी भावनांचाच विस्फोट होत होता. पंडित नेहरुंनी समाजवादी धोरण अंगिकारत राज्याचे अधिकार प्रचंड बळकट केले. लायसेंस राज, सरकारी मालकीचे उद्योग, खाजगी उद्योगांवरील अतोनात नियंत्रने यामुळे भारतीय उद्योगाची वाढ खुंटली. स्पर्धात्मकताच नाहीशी झाल्याने उद्योगांनीही नव्या संशोधनांकडे लक्ष पुरवले नाही. साठेबाजी, काळाबाजार यांना उत्तेजन मिळाले तर भ्रष्टाचाराचा विस्फोट झाला. सरकारी नोकरी, व तीही किमान काम असणारी मिळवणे हेच नव्या पिढीचे स्वप्न बनले. उद्योगधंदे करणे सरकारी बंधनांमुळे अत्यंत अवघड बनले. उलट गांधीजी म्हणाले होते, "जे सरकार किमान शासकीय अधिकार ठेवते तेच सरकार उत्कृष्ठ." पण सरकारने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या अधिकारांचे हात पसरवल्यामुळे नंतरची सरकारे गांधीजींच्याच भाषेत निकृष्ठ सरकारे ठरली.

शेतीवरही जाचक बंधने वाढली. इंग्रजांने द्वितीय महायुद्ध काळात केलेला जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायदा पुढेही चालु तर ठेवला गेलाच त्यात अनेक वस्तुंची भर घातली. कमाल जमीनधारणा कायद्यामुळे शेतीचे क्षेत्र विभाजित होत गेले. शेतमाल कोठे विकायचा यावरही बंधने आली. त्यामुळे शेतक-याला हरित क्रांतीने काही दिले हे खरे असले तरी खुपसे काढून घेत त्याला विकलांग केले हे वास्तव आहे. १९९१ नंतरच्या जागतिकीकरणानंतरही हे जागतिकीकरण व खुले धोरण शेतक-यांपर्यंत पोहोचले नाही. सुमारे ५५% भारतीय समाज आजही नियंत्रणांच्या कचाट्यात राहिला आहे व त्याबाबत काही करावे असे कोणत्याही सरकारला वाटत नाही.

गांधीजींना हे मुळीच अभिप्रेत नव्हते. त्यांनी राज्याचे अधिकार अतिरिक्त झाले की काय स्थिती येते याचे विश्लेशन करत त्या धोक्यापासून सावध केले होते. माणसाच्या नैसर्गिक प्रेरणांविरुद्ध शासन नियंत्रकाच्या भुमिकेत गेल्यावर व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो व मानसाच्या सृजनाच्या नैसर्गिक प्रेरणांचा अस्त होतो हे त्यांचे म्हणने तंतोतंत खरे ठरले. समाजवादामुळे असेच घडले हे आपण पाहिलेच आहे. नव्या नव्या मिळालेल्या स्वातंत्र्याच्या भावनांत भारतीय तेंव्हा एवढ्या भावनोद्रेकात होते कि समाजवाद आपल्या दुस-या स्वातंत्र्याचे अपहरण करतो आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. गांधीजींनी नेहरुंच्या समाजवादी विचारांचे कधीच समर्थन केले नव्हते. उलट त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर कोंग्रेसचे विसर्जन करण्यात यावे असे म्हटले होते, कारण त्यांच्यामते कोंग्रेसचा उद्देश स्वातंत्र्याइतपतच मर्यादित होता. पुढील सरकारे लोकांनीच ठरवावीत असे त्यांचे मत होते. अर्थात तेही झाले नाही.

हे लक्षात न घेता नेहरुंपासून भारतीय नागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी सुरु झाले ती आजतागायत चालू आहे असे म्हणायला काही प्रत्यवाय नाही. गांधीजी संपुर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजुचे होते. त्याचे भारतात कसे धिंदवडे निघालेत हे आपण आजही पाहतो. थोडक्यात गांधीजींच्या मतांविरुद्धचा प्रवास भारताने केलेला आपल्याला दिसतो.

गांधीजी यंत्रांच्या विरोधात होते असा प्रवाद नेहमी केला जातो. गांधीजी जीवनाचेही तत्वज्ञ होते. आदर्श आणि वास्तव यातील सीमारेषा त्यांना चांगलेच परिचित होती. यंत्रविहिन माणसाने स्वबळावर उभारलेले शाश्वत जग ज्यात नैसर्गिक साधनस्त्रोतांची विल्हेवाट लागत नाही तर उलट निसर्गाच्या साहचर्यातच स्वत:चाही विकास घडवतो, हे त्यांच्या यंत्रांना विरोध असण्याची कारणे. यात काहीएक वावगे नाही. हे स्वप्न उदात्त असेच आहे. माणसाला अधिक माणसाकडे आननारे आहे. आज जागतिक माणसाच्या अगणित मानसिक समस्यांचे कारण यंत्रयुगाने (व आज संगणक युगाने)  निर्माण केलेल्या विचित्र परिस्थितीत आहेत. एक दिवस असा येईलही कदाचित जेंव्हा माणुस हे सारे नाकारेल. पण गांधीजी तेवढेच वास्तवदर्शीही होते. त्या काळातील उपलब्ध असलेल्या सर्व यांत्रिक साधनांचा वापर त्यांनी जागतिक मानवापर्यंत पोहोचण्यासाठी केला हे विसरले जाते. आदर्श नजरेसमोर ठेवत वास्तवाला किमान सुसह्य बनवावे हे त्यांचे स्वप्न होते व ते त्यांनी जपले.

"स्वायत्त ग्रामपंचायती" ही गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येजवळ जाणारी व त्यांची लाडकी संकल्पना. थोडक्यात केंद्रीय सत्तेचे पुर्ण विकेंद्रीकरण त्यांना अभिप्रेत होते. यामुळे देशाच्या अखंडतेला धोका पोहोचला असता असा युक्तिवाद काही करत असतात. पण "किमान सरकार...मजबूत सरकार" हा त्यांच्याच स्वतंत्रतावादाचा पाया कोणी लक्षात घेतला नाही.

त्यामुळे आजही होते आहे ते असे. बव्हंशी व्यक्तींनी आपल्या स्वसृजनात्मक प्रेरणा गमावलेल्या असल्याने सरकारी नोकरी आजही बहुसंख्य भारतीय तरुणांची प्राथमिकता आहे कारण त्यात संरक्षण तर आहेच पण भ्रष्टाचारालाही वाव आहे. सरकारी उद्योग अपवाद वगळता अकार्यक्षम तर आहेतच पण तोट्यात जात आहेत. हा तोटा पुन्हा देशातील नागरिकच भरुन काढताहेत हे विशेष. पण त्याची जाण कोणाला नाही. सरकारच्याच हातात जास्त अधिकार गेल्यामुळे "बाबुशाही" नावाची वेगळीच व्यवस्था आकाराला आली आहे ती अनेकदा आज लोकनियुक्त सरकारांनाही झुकवण्याएवढी प्रबळ बनलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्यायासाठी, आपल्या हक्काच्या कामांसाठी मनस्ताप व कालापव्यय सहन करावा लागतो आहे.

आणि नेमकी यातच आपल्या देशाची प्रगती खुंटलेली आहे. स्वातंत्र्याचा संकोच जी भुते जन्माला घालते ती सर्वच दाहीदिशांतुन आज सर्वांच्या अंगावर येत आहेत. गांधीजींच्या स्वप्नातला भारत पार मागे पडला आहे. शेतकरी हा गांधीजींच्या तत्वज्ञानातील एक गाभा, तो आज देशोधडीला लागला आहे. समाजातील सर्व खांद्याला खांदा लावून जात-धर्माच्या पार जात बलाढ्य देशाची निर्मिती करतील अशी त्यांची आशा आम्ही भारतियांनीच धुळीला मिळवली आहे. जेथे इतिहासही जातीय परिप्रेक्षात केवळ लिहिले जात नाहीत तर वाचलेही जातात त्या देशाचे पुढे काय होणार याची आपण चिंता करायला हवी. गांधीजींची शारिरिक हत्या झाली. पण त्यांच्या स्वप्नांची हत्या करण्याचे जे हे पातक घडले त्याचा खटला कोणत्या न्यायालयात चालवणार?

आजही वेळ गेली नाही. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजेच खरे स्वातंत्र्य हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. सरकारचा प्रत्येक गोष्टीत जो हस्तक्षेप होतो आहे त्यामुळे आपलीच वाढ खुंटत आहे हेही समजावून घ्यावे लागेल. परावलंबी नागरिक असतात त्या देशाला स्वतंत्र कसे म्हणावे? आजकाल राष्ट्रवादाबाबत अनेक चर्चा झडत असतात. पण खरा राष्ट्रवाद हा स्वतंत्र व मजबूत व्यक्तींच्या साहचर्यातून, प्रगतीतून आणि ज्ञानपिपासेतून येतो हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल तरच आपण राष्ट्रपित्याला समजावून घेतले असे होईल. अन्यथा जयंती-पुण्यतिथी आणि त्यानिमित्त गोडवे गाणे आणि त्यांच्या खुन्याला शिव्या घालत बसणे यातुनच गांधीप्रेम व्यक्त होत राहील. आणि ते कोणाच्या उपयोगाचे नाही.

त्यांनी स्वातंत्र्याचा केवळ राजकीय स्वातंत्र्य हा अर्थ घेतला नव्हता. संपुर्ण मानवजातीचे स्वातंत्र्य हा त्यांचा उदात्त दृष्टीकोन होता. व्यक्तींचे स्वातंत्र्य हा कळीचा मुद्दा होता. नागरिकांवर किमान अधिकार असलेले सरकार त्यांना हवे होते. आपण यातील काहीएक केले नाही. व्यक्तीच्या सृजनाच्या प्रेरणा आम्ही ठार मारल्या आणि जगाच्या बाजारात कधी तंत्रज्ञानाचे तर कधी भांडवलाचे भिकारी बनलो. भांडवल आपणच निर्माण करू शकतो एवढी क्षमता आपल्यातच असतांना आम्ही त्या निर्मात्यांनाच बेड्यांत जखडले. शेतकरी नागवला. त्याला स्वातंत्र्य दिले असते तर सबसिड्यांची आणि मदतीच्या प्यकेजेसची गरज पडली नसती. ५५% नागरिक समृद्ध झाले असते तर देशही समृद्ध झाला असता. आता तर हे विषय केवळ राजकारणाचे बनले आहेत. अमर हबीबांसारखे काही शेतकरी प्रश्नाच्या मुळकारणाशी जाणारे मोजके लोक सोडले तर अगदी शेतक-यांनाही आपलेच प्रश्न माहित नाही अशी दुर्दैवी स्थिती आहे.

अशा स्थितीत महात्म्याच्या विचारांकडे पुन्हा एकदा नीट पहायला हवे. कोणत्याही महान माणसाची सर्वच मते त्रिकालाबाधित नसतात. जी कालसुसंगत नाहीत ती बाजुला ठेवून आजही जी सुसंगत व उपयुक्त आहेत ती मात्र व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गांधीजींच्या स्वप्नांना पुर्ण करण्याचा अर्थ एवढाच कि नागरिकांना स्वतंत्र करा. जाचक नियमांच्या बेड्यांत बाधू नका. खुला श्वास घेऊ द्या. उडाण भरु द्या. त्यांचे पंख छाटु नका तर त्या पंखांना बळ द्या. आणि एवढेच सरकारचे काम असले पाहिजे!

("समर्थ भारत - स्वप्न : विचार : कृती" या विवेक साप्ताहिकाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात प्रसिद्ध)

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...