Saturday, June 30, 2012

निरर्थक ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद...




फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपुर्ण बुद्धीनिष्ठ्तेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देवू शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजनारे हे शतमुर्ख मात्र द्न्यानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळुनही विद्वत-अडानी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हनजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातुन हे लोक बाहेर कधी येतील ते येवोत.

"वाद" या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमद्धेच होवू शकतो. ज्यांना मुळात "विचार" कशाशी खातात याचेच द्न्यान नाही त्यांनी ब्राह्मण-ब्राह्मनेतर वादात पडुन स्वत:चेच नाक छाटुन घ्यायचा चंग बांधला आहे. अर्धवट द्न्यानावर आधारीत हे पुस्तके लिहितात, स्वत:च्या समाजात विचारवंत म्हणुन मिरवुन घेतात. त्यावर कोणीही टीका केली तर लगेच "भटाळलेला", "आरेसेसने दत्तक घेतलेला" वगैरे शेलकी विशेषणे वापरुन मोकळे होतात. यात या मंडळीला काय विकृत आनंद होत असेल तो असो, पण बहुजन म्हणवना-यांचे वाटोळे मात्र करण्यात आज ब्राह्मण नव्हेत तर असेच उथळ बहुजनीय विचारवंत आघाडीवर आहेत हे दुर्दैव आहे.

द्न्यानसत्ता निर्माण करण्यात एक द्न्यानावरील निष्ठा लागते. ब्राह्मनांचे वर्चस्व झुगारायचे असेल तर त्याच तोडीचे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक द्न्यान निर्माण करावे लागते याचा विसर सर्वच समाजाला पडला आहे. फुले-बाबासाहेबांना अंतिम मानत कधीही द्न्यानवृद्धी होणार नाही हे यांच्या गांवीही नाही. त्यांचे काय मानावे? तर त्यांची अगाध द्न्याननिष्ठा, तर्ककठोर होत स्वत:ची मते तपासत पुढे जाण्याची प्रवृत्ती. यांना फुले आंबेडकर मुळात समजलेलेच नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. अपवाद असतात...पण अपवादांनीच नियम सिद्ध होतो.

जुनी दैवते नष्ट करायचा अथक प्रयत्न करायचा आणि नवी दैवते निर्माण करण्यात मात्र कुचराई करायची नाही आणि वर म्हणे हिंदु धर्म संपवायचा...हे असे करत राहिले तर बापजन्मी त्यांना हिंदु धर्म संपवता येणार नाही. नवीन धर्म स्थापन करायचा...सर्वांना प्रिय वाटेल म्हणुन शिव हे नांवही द्यायचे...मग मुळात जो शैव धर्म पुरातन काळापासुन अस्तित्वात आहे, एवढे अवाढव्य तत्वद्न्यान उपनिषदे, तंत्रशास्त्रे ते आदी शंकराचार्यांनीच निर्माण करुन ठेवले आहे त्यांचाच उद्घोष करायचा तर नवीन धर्म आणि नवी धर्मसंहिता. म्हणजे त्यांना अभिप्रेत "शिव" हा शिव शंकर नसून अन्य कोणीतरी शिव या जातीयवाद्यांना अभिप्रेत असावा असे म्हणने क्रमप्राप्त आहे. मग शिव हा देशाला जोडनारा धागा आहे असे म्हनने गैर आहे. काहीतरी दडवण्याची ही चाल आहे.

गौतम बुद्धाला पुराणकारांनी विष्णुचा दहावा अवतार का ठरवले यावर यांनी खरे तर मुलभुत विचार करायला हवा. "असुरांमद्धे मायामोह" निर्माण करुन त्यांना पथभ्रष्ट करण्याचे कार्य बुद्धाने केले म्हणुन बुद्ध हा दहावा अवतार (काही पुराणांत नववा अवतार) ठरवण्यात आला हे यांच्या गांवीही नसते...कारण अभ्यास कोणी करायचा? पुराणे जाळुन टाका हे म्हनने सोपे असते परंतु त्यांचा तटस्थ अभ्यास करत त्यांतील खोट वा सत्य शोधायचे कोणी?

ब्राह्मनांना वेदांची-स्मृतींची चिकित्सा कधीच मान्य नव्हती आम्हालाही बहुजनीय महापुरुष, त्यांनी स्थापलेले धर्म वा त्यांच्या विचारांची चिकित्सा मुळीच मान्य नाही. काय फरक उरला? द्न्यान फक्त चिकित्सेनेच पुढे जावु शकते याचे भान नको कि काय? ब्राह्मण समाज शिव्या घालायला सोपे टार्गेट आहे. त्यांना शिव्या द्यायला फार धाडसाची गरज नसते. त्यांनाही अशा शिव्यांमुळे काहीएक फरक पडत नाही. उलट ते आत्मकेंद्रित होत एक दिवशी अत्यंत थंड डोक्याने बहुजनांचा असा बौद्धिक काटा काढतील कि हे सैरभैर होत भरकटत जातील. उथळ लोक सांस्कृतिक संघर्ष कधीच जिंकु शकत नसतत हा जगाचा इतिहास आहे. ब्राह्मण काही आकाशातुन पडलेले नाहीत...किंवा ते बाहेरुनही आलेले नाहीत. समजा ते आले असले तरी मग त्यांच्याबरोबर कथित क्षत्रीय, वैश्यही आलेच कि! मग तुम्ही क्षत्रीय-वैश्यांना कोणत्या नियमांनी एतद्देशीय ठरवता? तेही तुमच्याइतकेच याच देशाचे, सम्स्कृतीचे भाग आहेत.  होते आणि राहतील.

गतकाळातील द्न्यात-अद्न्यात अन्यायांबद्दल गळे काढणे सोपे असते. ब्राह्मनांनी शिक्षणबंदी घातली...ठीक आहे. मग एवढ्या बहुजनीय संतांनी आपापले अभंग लिहिले कसे? का प्रत्येक संताला एक ब्राह्मण लेखनिक भेटला होता? भेटला असेल तर ब्राह्मणांना बहुजनियांचे अभंग लिहिण्यात कमीपणा वातला नाही हे तरी सिद्ध होते किंवा त्यांना लिहिण्या-वाचनावर बंदी नव्हती एवढेच सिद्ध होते. चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका हे जर अस्पृश्य होते तर कोण ब्राह्मण त्यांचे अभंग लिहून घ्यायला जाईल? म्हणजे चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती...द्न्यानबंदी नव्हती. वेदबंदीने तसाही काही फरक पडनार नव्हता कारण ते त्यांच्या धर्माचे प्रतीक नव्हतेच! शिकायच्या बाबतीत बहुजन समाज आजही आळशी आहे. शाळांतुन गळत्या होतात त्या यांच्याच. तेथे काही प्रबोधन करायचे नाही आणि सारी खापरे दुस-या जातीवर थोपुन मोकळे व्हायचे हा धंदा कसा चालेल?

मी याला संभ्रमावस्था म्हणतो. संभ्रमी समाजाचा अंतता विनाशच होतो. एखाददुस-याबाबत संभ्रम आपण समजु शकतो पण जे द्न्यान नव्हे तर फक्त संभ्रम निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनले आहेत ते समाजघातकी आहेत असेच म्हणावे लागते.

स्वत:च्या टिर्या बडवत द्न्यानसाधना होत नसते. द्न्यानाला शुद्ध करायचे कि अर्धवट द्न्यानाने विकृत कृत्या करायच्या? बाबासाहेबांनी जेही लिहिले ते साधार व सप्रमाण लिहिले. कोठेही कधीही अश्लाघ्य भाषा वापरली नाही. फुलेंनी तर्ककठोर युक्तिवाद करत बहुजनवादाचा पाया घातला. आज बहुजनवादाचा गळा घोटण्याचे कार्य  फुले-आंबेडकरांचेच नांव घेत केले जात आहे याचा खेद आहे.

आजचा बहुजनवाद हा सृजनशील नाही. आणि सृजनात्मक विचारधारा जे निर्माण करु शकत नाहीत त्यांचा विनाश हा अटळ असतो. कत्तली, दंगली, तोडफोड अशी भाषा करायला अक्कल लागत नाही...पण मग अशी भाषा करत बाबासाहेबांच्या संविधानात्मक तरतुदींचाच घोर अवमान करत असतो हे कधी समजणार?

आपलीच आराध्ये पायतळी तुडवणा-या अशा महामुर्खांना आपल्या अशा कृत्यांची-विधानांची शरम कधी वाटणार?

इतिहास हा धादांत असत्ये ठोकत नव्याने लिहावा लागत नसतो तर त्याची परखड चिकित्सा करत समोर आणावा लागतो. इतिहास ही गोष्ट भेळ-भजी खाण्याची वा चकाट्या पिटण्याची बाब नसते.

आणि सर्वात महत्वाची बाब असते ती ही कि इतिहास घडवायचा असतो! नव्या पिढ्यांना भावनीक आत्मविश्वास देनारा...दिगंताकडे पुढे जायला प्रेरीत करनारा इतिहास.

पण आज हे बहुजनीय म्हनवणारे विचारवंत जो इतिहास घदवत आहेत त्यांवर पुढील पिढ्याच थुंकतील...
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हाच एक कायमचा इतिहासात जमा होईल!



Friday, June 29, 2012

वारीसंगे चालताना…



(वारीचा इतिहास सांगणारा हा माझा लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्समद्धे प्रकाशित झाला आहे).

श्री विठ्ठलाच्या दैवत माहात्म्याचा इतिहास किमान इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. श्री विठ्ठल म्हणजे दैवतप्रतिष्ठा प्राप्त केलेला पौंड्रवंशीय कुरुब - धनगरांचा महान शिवभक्त आणि सम्राट. पौंड्रपुर म्हणजे आजचे पंढरपुर ही त्याची राजधानी. वारीची प्रथाही श्री विठ्ठलाला दैवत माहात्म्य प्राप्त झाले , त्या काळाइतकीच जुनी आहे , असे म्हणता येते. म्हणजेच वारीचा इतिहास हा २२०० वर्षे इतका जुना असल्याचे म्हणता येईल. अर्थात आज ज्या पद्धतीने वारी निघते तशी ती पुरातन काळी निघत नव्हती , एवढे नक्की. कालौघात श्री विठ्ठलही शैवाचा वैष्णव बनला. नामदेवांपासून ते तुकोबारायांपर्यंतच्या संतांनी श्री विठ्ठलाला कृष्ण-विष्णू रुपातच पाहिले. त्यामुळे वारीचे स्वरुपही बदलले. या वारीच्या इतिहासाचा आपण येथे आढावा घेऊ या ...
श्री विठ्ठल हा मूळचा धनगर-कुरुबांचा देव होता , हे मत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ' श्री विट्ठल : एक महासमन्वय ' या महनीय ग्रंथात मांडले आहेच. आजही सोलापूर जिल्हा व त्यास लागून असलेल्या कर्नाटकच्या भागात धनगर-कुरुबांची संख्या लक्षणीय आहे. धनगर-कुरुबांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले तर एक महत्त्वाची बाब लक्षात येते व ती म्हणजे आषाढ महिन्यात (अगदी आजही) विविध दिशांना आपल्या मेंढ्यांच्या कळपासह गेलेले धनगर आषाढ महिन्यात परत येतात. पावसाळा संपला की कार्तिक महिन्यात ते पुन्हा चाऱ्याच्या शोधात आपले पशुधन घेवून चहूदिशांना बाहेर पडतात.
पौंड्रपुर तथा पंढरपूर ही त्यांची राजधानी असल्याने व त्यांचे आद्य आराध्य दैवत श्री विठ्ठलही तेथेच असल्याने त्यांचे सर्वप्रथम एकत्र होण्याचे स्थान असणे स्वाभाविक होते. श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपले पशुधन वाढेल , ही श्रद्धा या प्राथमिक वारीचे कारण बनली. विठ्ठल ही देवता किमान सहाव्या शतकापर्यंत फक्त धनगर-कुरुबांची आराध्य देवता होती , असे आपल्याला दिसते. याचाच अर्थ असा की वारीचा प्रारंभ धनगरांनी केला. ही वारी आपल्या पशुधनासहितची होती. तिचे स्वरूपही काहीसे प्राथमिक होते.
सहाव्या शतकापर्यंत या अवैदिक विठ्ठलाचा बोलबाला अन्य समाजांतही होवू लागला. विठ्ठल हे नाम अगदी ब्राह्मणही धारण करू लागले. सहाव्या शतकातील एका ताम्रपटात ' जयद्विठ्ठ ' नामक ब्राह्मणाला गावाचे दान दिले आहे , अशी नोंद आहे. हा ब्राह्मण पंढरपूरचाच होता. मध्वाचार्यांनी (इ.स. ११९९-१२७८) ज्ञानेश्वरपूर्व काळातच आपल्या आठ बालयतींपैकी तिघांना विठ्ठलाची मूर्ती पुजेसाठी दिली होती , असे श्री. द. रा. बेंद्रे सांगतात. याचाच अर्थ असा की , श्री विठ्ठल ही देवता आता फक्त धनगरांपुरती मर्यादित न राहता त्याचे प्रभावक्षेत्र विस्तारित होवू लागले होते. याच काळात विठ्ठलाचे मूळचे शैव रूप जावून त्यास क्रमश: वैष्णव रूप प्राप्त होवू लागले. आषाढी-कार्तिकीला आता फक्त धनगर-कुरुबच नव्हे , तर कुणबी , ब्राह्मण ते अन्य बलुतेदार-अलुतेदारही सामील होवू लागले. ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनीही पंढरीची वारी केली होती , असे नामदेव महाराज म्हणतात. आता विठ्ठल हे सर्वच समाजाचे दैवत बनू लागल्याने आषाढी-कार्तिकीचे परिप्रेक्ष बदलले... अर्थातच वारीचे स्वरुपही पालटू लागले.
महाराष्ट्रातील तेराव्या-चवदाव्या शतकाचा कालखंड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. वाढती सामाजिक विषमता , जातीनिष्ठ अन्यायांची परंपरा , वैदिक कर्मकांडांचे वाढलेले स्तोम यामुळे एक अभिनव संतपरंपरा सुरू झाली. या संतांनी एकही प्रख्यात वैदिक देवता आपल्या सामाजिक/आध्यात्मिक चळवळीसाठी न स्वीकारता अवैदिक विठ्ठलाला आपले मुख्य आधार मानले व समतेची चळवळ सुरु केली ... समतेची , मानवी करुणेची गुढी उभारली. राष्ट्रसंत नामदेव , चोखा मेळा , ज्ञानेश्वर , गोरोबा कुंभार , परिसा भागवत आदी संतांच्या मांदियाळीने वारीला एका सामाजिक चळवळीचे रुप दिले , ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नवी क्रांती घडवणारी घटना होती. नामदेव अत्यंत उत्साहाने म्हणतात ... ' आले आले रे हरीचे डिंगर ... वीर वारीकर पंढरीचे '. संतच नव्हे तर सर्वच समाजासाठी श्री विठ्ठल हा पतीतपावन बनला , तो याच काळात. कारण स्वत: श्री विठ्ठलालाही वैदिक परंपरेने शूद्र मानलेले. त्यामुळे समतेच्या गुढीसाठी सर्वच संतांनी विठ्ठलाला आपले आराध्य मानले नसते तरच नवल होते.
त्यामुळे वारीचे स्वरुप आणखी बदलले. आषाढी-कार्तिकी या परंपरा कायम राहिल्या असल्या तरी एकादशीला महत्त्व मिळाले ते वैष्णव परंपरेमुळे. आता वारी निघू लागली ती टाळ-मृदंगांच्या साथीने ... भक्तिरसाने ओथंबलेली संतरचित भजने गात. भीमथडी चिंब भिजू लागली ती संतांच्या उत्कट आत्मोद्गारांनी. विठ्ठल हा त्यांचा नुसता देव नव्हे , तर सखा बनला. व्यथा-वेदनांवर केवळ फुंकर घालणारा नव्हे , तर प्रसंगी प्रत्यक्ष अवतरुन संकट-विमोचन करणारा मुक्तिदाता बनला. जनमानसातील श्री विठ्ठलाची प्रतिमाही त्यानुसार बदलत गेली. वारीला सर्वच जाती-पंथांच्या समाजांत एक महत्त्वाचे स्थान निर्माण होवू लागले. नामदेवांनी तर देशभर श्री विठ्ठलाची महत्ता पसरवली.
नामदेवांनंतर शंभर वर्षांनी (सन. १४५०) एकनाथांचे पणजोबा भानुदासांनीही वारीची परंपरा कायम ठेवली. परंतु या मधल्या काळात वारीची संतनिर्मित परंपरा काही प्रमाणात क्षीण झाल्याचे दिसते. एकनाथांच्या काळात महाराष्ट्रावर सुलतानी संकट आले होते. अशा अत्यंत अस्थिर व शोषित-अन्यायग्रस्त कालात एकनाथांनी वारकरी संप्रदाय पुनर्जिवित केला. असंख्य अभंग तर लिहिलेच , त्याखेरीज विपुल ग्रंथरचनाही करुन गुलामीतील स्वबांधवांना पुन्हा समतेच्या वारकरी चळवळीकडे आकृष्ट केले. फक्त समतेचाच नव्हे , तर फारसी-ऊर्दुच्या प्रभावाखाली जावू लागलेल्या मायमराठीचा नव्याने उद्घोष केला... वारी पुन्हा नव्या जोषात सुरू झाली.
एकनाथांच्या निर्वाणानंतर नऊ वर्षांनी जन्माला आले ते महान संत तुकोबाराय. त्यांनी सामाजिक वेदनांवर नेमके बोट ठेवत ज्या अजरामर रचना केल्या आहेत त्यांना तोड नाही. त्यांच्यानंतर अशा असामान्य प्रतिभेचा संत जन्माला आला नाही. तुकोबांनी त्यांच्या काळात वारकरी संप्रदायाला अपरंपार वाढवले. गुलामी राजवट नष्ट करणारे छत्रपती शिवराय घडले तो काळ निर्माण करण्याचे सर्व श्रेय तुकाराम आणि त्यांच्या पूर्व संतपरंपरेकडे नि:संशयपणे जाते.
तुकोबारायांनंतर वारीपरंपरेत आणखी एक अभिनव बदल घडला. तुकारामांचे चिरंजीव नारायणमहाराज यांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडीची संकल्पना सन १६८५ मध्ये निर्माण केली. त्यात नंतर अनेक संतांच्या अशाच पालख्या त्यांच्या-त्यांच्या मूळस्थानापासून वा जेथे ते दिवंगत झाले त्या स्थानांपासून पंढरीला येवू लागल्या. आपल्या महान पूर्वसुरींना हे अभिनव अभिवादन होते. परंतु अशा दिंड्यांत शक्यतो ज्याची पालखी त्याच संताचे अभंग म्हणण्याची प्रथाही पडली. वारकरी संप्रदायही जातींत वाटला गेल्याचे चित्र दिसू लागले. आता आतापर्यंत ज्ञानेश्वरांच्या पालखी-दिंडीत तुकारामांचे अभंग म्हटल्यास पार मारामाऱ्या होत. सुदैवाने आता असे प्रकार घडत नाहीत. घडूही नयेत , कारण ज्या जातीअंताच्या महनीय कार्यासाठी संतांनी वारीप्रथेला अध्यात्म-समतावादी बनवले त्यांच्यावर हा केवढा अन्याय होइल ?
तुकोबारायांनंतर निळोबांनी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे वाहिली.
वारी आजही सुरु आहे. आधुनिक काळात तिच्यात बदल घडत आहेत , पुढेही घडत राहतील. परिवर्तनशीलता हाच जीवनाचा नियम आहे. वारीची पद्धत बदलेल , पण श्रद्धा तीच राहील. धनगर-कुरुबांनी २२०० वर्षांपूर्वी सुरु केलेली ही परंपरा नवनवे आशय घेत पुढे जात राहो , हीच सदिच्छा!  

वैद्यकीय क्षेत्राकडुन नैतिक अपेक्षा बाळगायचा अधिकार काय?


डा. मिलिंद कुलकर्णी यांचा ६ जुलैच्या लोकप्रभाच्या अंकातील "नायक आणि नालायक" हा लेख वाचला. (सर्वांनी वाचावा) या लेखात कुलकर्णींनी सत्यमेव जयते या आमिरखानच्या वैद्यकीय व्यवसायावरील एपिसोदवर व डा. सुदाम मुंडेमुळे वैद्यकीय व्यवसाय हा कसा संशयाच्या छायेत आला आहे यावर दुसरी बाजु मांडली आहे. ती सर्वस्वी मान्य करता येत नसली तरी या दुस-या बाजुचाही विचार करने आवश्यक आहे.

वैद्यकीय क्षेत्रात अनेक अपप्रवृत्ती आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे, परंतु त्या दूर करण्यासाठी नवनवे कायदे करणे हा मार्ग नक्कीच नाही. ज्याही समाजात नियंत्रणासाठी नवनवीन बंधक कायद्यांची गरज भासते त्या समाजाला असंस्कृत समजावे असेच नीतिशास्त्र सांगते. सुदाम मुंडेंनी जे केले त्यासाठी सर्वस्वी त्यांनाच जबाबदार समजावे हा अतिरेकी विचार आहे. खरे तर माता-पिता, पती व स्वत: गर्भपात करुन घेणारी स्त्री हेच प्रमुख दोषी आहेत, असतात व त्यांनाच शोधुन आधी आत घालायला हवे व कठोर शिक्षा द्यायला हवी. दुकान थाटुन बसलेल्या डाक्टराला कोणी गर्भलिंग निदान करायला सांगत व समजा तो गर्भ मुलीचा निघाला तर गर्भपात करवून घ्यायला अव्वाच्या सव्वा पैसे मोजायला तयार असेल तर काय डाक्टराने राजा हरिश्चंद्र बनत ते नाकारावेत? प्रश्न कृर आणि बेकायदेशीर वाटेल, पण अनीतिमान समाजाने नैतीकतेचा भार फक्त वैद्यकीय व्यवसायावरच का टाकावा? येथे मंत्री-संत्री ते पार न्यायाधिश भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकत राजरोसपणे कायद्यांचा भंग करत असतात, सैन्यातील भ्रष्टाचारही आज जगजाहीर आहे...याचे कारण म्हणजे मनुष्य कोणीही असो, कोणत्याही पदावर असो, तो आला आहे याच भ्रष्ट मानसिकतेच्या समस्त समाजातुन. आणि फक्त तो डाक्टरांनीच करु नये अशी अपेक्षा बाळगतांना त्यांचीही बाजु समजायला नको? त्यावर प्रामाणिक उत्तरे शोधायला नकोत?

मुली सोनोग्राफी करणा-या डाक्टरांना नको आहेत कि समाजाला?  एखादा डाक्टर प्रामाणीकपणे कितीही म्हटला तरी हित-संबंधी अशा डाक्टरांवर कोठुन ना कोठुन तरी वजन आणतो वा प्रलोभने दाखवून आपला कार्यभाग उरकुन घेतो. "मुलगी नको" ही दुष्ट व समाजविघातक मानसिकता बदलण्यासाठी आपण काय करत आहोत हा खरा प्रश्न आहे. वैद्यकीय आणि इंजिनियरींगसारखी सर्व कोलेजेस सरकारमार्फतच चालवली गेली पाहिजेत कि ज्यायोगे आज होतो तसा कोट्यावधी रुपयांचा खर्च विद्यार्थ्याला, त्याच्या आई-बापाला करावे लागु नयेत याबद्दल आपली मुळात काही एक तरी भुमिका आहे काय?  सरकारने स्वत: एकंदरीत गरजेप्रमाने नवीन मेडिकल कोलेजेस उघडत राहुन वैद्यकीय शिक्षण स्वस्त करण्या ऐवजी खाजगी दर्जाहीन मेडिकल कोलेजेसना प्रोत्साहन देवून खरे तर वैद्यकीय व्यवसायाला अनैतीक बनवायला भाग पाडले आहे. असे जर चित्र असेल तर सरकारवर खटले भरणार कोण? पेशंट्सना खात्रीशीर दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सेवा मिळणार कशी?

कितीही नैतीकतेचा आव आणला वा किमान वैद्यकीय व्यवसायाने तरी नैतीक असावे अशी अपेक्षा अनैतीक समाजाकडुन होत असली तरी अन्य व्यवसायांप्रमाणेच वैद्यकीय सेवा हाही एक व्यवसाय आहे, उद्योग आहे व डाक्टरांना आवडो-न-आवडो, त्यांना आहे त्याच व्यवसायातुन आपल्या गुंतवणुकीची वसुली करत चरितार्थ चालवावा लागणार, हे वास्तव भावनेच्या लाटांवर वाहत जाणा-या समाज कधी समजावून घेणार?

प्रत्येक आस्थापनांच्या बाबतीत अत्यंत किचकट कायदे आहेत व त्यांची सर्वस्वी अंमलबजावणी जवळपास अशक्य अशीच आहे. पाळता येणार नाहीत असे हे किचकट कायदे करतांना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे हाच एकमेव हेतु असल्याचे दिसते. डा. मुंडेच्या निमित्ताने सर्वत्र सोनोग्राफी केंद्रांवर धाडी पडत आहेत. त्यातील ख-या किती व खोट्या किती हे आपल्याला कदाचित कधीही समजणार नाही.

समाजात मुलींचे प्रमाण संतुलित असायला हवे हे खरे आहे. जेथे शिक्षण कमी अशा धुळे-नंदुरबार ते विदर्भात स्त्रीयांचे प्रमाण ब-यापैकी संतुलित आहे, पण उलट शिक्षित समाज जेथे अधिक आहे त्या पश्चिम महाराष्ट्रात मात्र खालावलेले आहे. म्हणजे आम्ही कोणत्या लायकीचे शिक्षित पैदा केले? कोणती सामाजिक नैतीकता आमच्या शिक्षणपद्धतीने व सामाजिक रचनेने त्यांच्यात निर्माण केली? या अपयशाला दोषी कोण?

मुलींचे प्रमाण कमी असुनही अद्यापही वधु पक्षाकडुन अवाढव्य हुंडे मागायची हिम्मत कोण करतोय? खरे तर हुंडा पुढे मुलींनाच मिळु लागेल अशी असमता आम्हीच निर्माण केली आहे. एक दिवस हाच मुर्ख समाज बहुपतीत्वही अपरिहार्य करत जाईल. कारण पुरुषांना पुरेशा स्त्रीयाच उपलब्ध असनार नाहीत.

सोनोग्राफी मशीन्सवर पाबंदी आणली वा त्यांचा वापर कितीही कायद्यांच्या भिंगात आणला तरी स्त्री-भृण हत्या थांबतील या भ्रमात राहण्यात अर्थ नाही. उलट ब्रष्टाचार वाढेल. देखरेख करणा-या यंत्रणांना कमाईचे साधन मिळेल. लोक मुंडेचा प्रकार विसरुन जातील...कारण मुंडे आपोआप निर्माण होत नसतात तर समाजच त्यांना बनवत असतो. पुन्हा नव्या पद्धतीने हेच चालु राहील. मुलींना गर्भातच ठार मारले जाईल. या हत्यांचे पातक सर्वच समाजाचे होते व आहे व पुढेही राहील.

"यत्र नार्यस्तु पुज्यंते, रमंती तत्र देवता" हे आपल्याला समजावुन घ्यावे लागणार आहे व सर्वांनीच डोळे उघडुन प्रबोधनाची व्यापक चळवळ उभारायला हवी. कायदे कुचकामी होते आहेत आणि कितीही नवीन बनवले तर "सापडला तो चोर आणि नाही तो शिरजोर" अशी स्थिती राहील. एखादे बेकायदेशीर प्रकरण उजेडात आल्यानंतरच भराभर काही तशीच प्रकरणे का उजेदात येतात? त्याआधी का नाही? कारण ते ते प्रशासकीय विभाग अशा एखाद्या सापडलेल्या अपराध्यात एक नवी संधी शोधतात. नवी लुट सुरु करतात. कारण समाजालाही तेच हवे असते. समाजच महाभ्रष्ट असतो तेंव्हा अशी नाटके सुरु होतात...माध्यमेही भावनीक चर्चेत मश्गुल होतात...पण आजाराचे मुळ कारण शोधायचे नसते...कारण ते पचनी पडनारे नसते. कोणा एका समुदायाला आरोपीच्या पिंज-यात उभे पाहणे या विकृतीचा आनंद सर्वांनाच घ्यायला आवडतो.

मग एखादा डाक्टर तरी एखाद्या आजारी माणसाला आजाराचे मुळ कारण सांगुन सोपे उपचार करील कशाला? असे नाही कि काय कि रांडांकडे राजरोसपने वा लपुन छपुन जायचे, गुप्तरोग ते एडस विकत घ्यायचा आणि डाक्टरांनी मात्र कसलाही स्वार्थ न पहाता त्यांना रोगमुक्त करायचे? असे नाही काय कि दारु पिवुन वाहने चालवत्त अपघात घडवायचे आणि उपचारादरम्यान कोणी मेला तर कथित संतप्त नातेवाईकांनी दवाखानेच तोडायचे? दारु विकणा-याला मात्र काही कलंक नाही! आणि खरे तर तोही का असावा? पिणा-याला अक्कल नाही त्याचे काय करायचे? कोणीही व्यावसायिक जेंव्हा आपल्या धंद्याची रिस्क वाढते आहे हे पहातो तेंव्हा तो आपल्या सेवांचे मूल्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे वसुल करणारच हा अद्द्याहृत न्याय आहे. नाहेतर अशा संभाव्य नुकसाने काय त्याने आपल्या खिशातुन मोजायच्या? यात काहींवर अन्याय होतोच पण त्याला जबाबदार कोण असतो? आजकाल मोठ्या व्यक्तित्वाच्या माणसाला आपत्कालीन स्थितीत दाखल करुन घ्यायला मोठमोठे दवाखाने नाखुष असतात कारण तो नेता जरी नैसर्गिक मेला तरी अनुयायी जणु डाक्टरच दोषी ठरवत दंगा करतात. नुकसान करतात. डाक्टरांच्या द्रुष्टीने पहा कि,...त्यांना काय अशा आपत्कालीन स्थित्या उद्भवू शकतात हे माहित नसते? ते का चुका करतील? तणावाच्या अशा स्थितीत त्यांचे निर्णय चुकले तर जबाबदार कोण? डाक्टर कि हे हरामखोर अनुयायी/नातेवाईक? 


आणि तशी अपेक्षा बा्ळगायचा आपल्याला अधिकार तरी काय?

Wednesday, June 27, 2012

त्यांना कोण आवाज देणार?


मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटींत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीच्या उंच्या-खोल्या मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पुर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो कि राजकीय विचार. अर्थविचार असो कि सामाजिक विचार. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. अशा अगणित विचारांच्या संदर्भ व्युहात विचारकलह निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसे घडतेही. किंबहुना तसेच घडणे अभिप्रेत असते. फक्त विचार कलह हा सृजनात्मक असावा, विध्वंसक नसावा, एवढीच काय ती अपेक्षा बाळगता येते.

वैचारिकतेशी प्रत्येकाचे एक इमान असावे असेही अभिप्रेत असते. विचार बदलु शकतात. जसे नवे जीवन दृष्टीक्षेपात येते, नवे अनुभव येतात तसे विचार बदलणे...मग ते व्यक्तिगत जीवनाबाबत असोत वा सामाजिक जीवनाबाबत, धर्मतत्वांबाबत असोत कि जीवनमुल्ल्यांबाबत. परिवर्तनशीलता हाच निसर्गाचा नियम आहे. उलट जे गतकाळालाच चिकटुन बसतात व गतकाळातील आमचे सारे काही श्रेष्ठच होते व तसेच जीवन-नियम आजही कायम असावेत असे जे मानतात त्यांना आपण सनातनी, प्रतिगामी असे म्हणतो. काळ हा नेहमीच पुरोगामी-अग्रगामी असा असतो. नवीन कालसापेक्षतेत जे नवविचार देतात, समाज विचारांना एकंदरीत समृद्ध करत नेण्याच्या कार्यात हातभार लावतात त्यांचे विचार पटले वा नाही पटले तरी एकुणातच विचारकलहातुन नवविचार निर्माण होण्याचे अनवरत प्रक्रिया सुरु होते. जेंव्हा अशी प्रक्रिया थंबते तेंव्हा अंधारयुग निर्माण झाले असे मानले जाते. भरतात काय किंवा युरोपात काय, अशी अंधारयुगे येवून गेली आहेत. समाजजीवन कोणत्याही नव-विचारचैतन्याला मुकलाय असे घडुन गेले आहे.

सॉक्रेटिसने तरुणांनाच प्रश्न विचारत वैचारिक क्रांती घडवण्याचा प्रत्यत्न केला. आपल्या विचारांशी प्रतारणा न करता त्याच्या सरकारने त्याला या कृत्याबद्दल जी शिक्षा दिली...हेमलॉक विषाचा पेला पिण्याची ती त्याने पळुन जाण्याची सहज संधी उपलब्ध असतांनाही नाकारली. तो विष प्याला आणि मरता-मरताही तत्वद्न्यानाचा नव-अनुबंध निर्माण करत. हे अतुलनीय धैर्य व स्व-विचारनिष्ठा जगाच्या इतिहासात क्वचित पाहण्यात येते. ग्रीसने जगाला ज्या अद्भुत वैद्न्यानिक, तत्वद्न्यान व साहित्याच्या देणग्या दिल्या त्याला कारण असे विचारस्तंभ होते म्हणुन!

आपण भारतीय मात्र जे मृतवत राहिलो ते राहिलोच. वेद-उपनिषदे, रामायण महाभारत..पुराणे यात अडकुन पदलो ते पदलोच. चवथ्या शतकात पृथ्वी सपाट नसुन ती गोल आहे व स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडणारा आर्यभट पुढे ब्रह्मगुप्त, परमादीश्वरादि खगोलद्न्यांनी साफ फेटाळुन लावला. तोवरच काय, पार कोपर्निकस (सतरवे शतक) येईपर्यंत पृथ्वी सपाट आहे याच भ्रमात अवघे जग राहिले. द्न्यानेश्वरांपर्यंत आर्यभटाची ही कृती पोहोचली ती शंकराचार्यांच्या मार्गे. पण जवळपास ९०० वर्षांनी द्न्यानेश्वरांनीही आर्यभटाचाच हात धरत पृथ्वी फिरते, सुर्य स्थिर आहे...पण ज्याप्रमाणे नांवेतुन जातांना आपल्याला तीरावरील वृक्ष स्थिर असुनही मागे जातात असा भास होतो तद्वतच न चालता सूर्याचे चालणे वाटते, असे म्हटले. (द्न्यानेश्वरी ४:९७-९९) पण एका गणिती सिद्धांताचे आध्यात्मीक रुपकात रुपांतर केल्याने गणिताचे...शास्त्राचे हत्या झाली आहे हे आम्हाला समजलेच नाही! पायची पाच डिजिटपर्यंतची किंमत काढणारा पहिला गणितद्न्य आर्यभटच. sin  आणि cos या गणिती संद्न्या निर्माण करणाराही आर्यभटच! खरे तर आर्यभटाचा अभिनव विचार न हेटाळता अथव अध्यात्मात घुसवत त्याला परलोकवादी सिद्धांतात बदलवत न बसता त्याची शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध प्रगती करण्याचा विविधांगी प्रयत्न झाला असता तर कदाचित भारत हाच विद्न्यानातील एक महासत्ता बनला असता. गुलामीत खितपत रहावे लागले नसते. या जाती-पातींतील व्यर्थता तेंव्हाच कळुन चुकली असती. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी.

मला अनेकदा प्रश्न विचारला जातो तो हा कि गतकाळाची एवढी चर्चा का? मला वाटते ती आवश्यक आहे, कारण इतिहासाकडे डोळे उघडुन पाहिले नाही तर आपल्याला आपल्या चुका कदापि कळणार नाहीत. वर्तमानाचे आकलनही असेच धुसर होत जाईल मग भविष्य काय असणार? आपण इतिहासाकडे जातीय द्रुष्टीने व धार्मिक अहंकारांच्या भावनांतुन पाहतो. पुर्वीही तसेच घडत होते. रामकथा जैन व बौद्ध धर्मियांनी आपापल्या सोयीने पुन्हा लिहुन काढली. वैदिकांनीही बालकांड आणि उत्तरकांड घुसवत आणि मुळ कथेत सोयिस्कर घालघुसड करत रामकथेची वाट लावुन टाकली. महाभारताचे तर विचारुच नका! आम्ही सत्याचे बुरुज अंधविश्वासाच्या गहन धुक्यात गडप करुन टाकले. आमची बुद्धी आजही तशीच चालत आहे हे अजुन एक दुर्दैव. एकेक जात आपल्या प्राचीनत्वाच्या नव्या मित्थकथा निर्माण करत नवी पुराणे लिहित आहेत. कोणाचीही चिकित्सा कोणालाही नको आहे. भावना दुखावतात. दंगे-धोपे होतात...हिंसक हल्ले होतात.

मग टोळ्या करुन राहणा-या हिंसक आदिमानवात आणि या आधुनिक आदिमानवांत फरक तो काय? अशी कोणती मानसिक प्रगती त्याने केली आहे? होत्या त्याच मानसिकतेत राहत ज्या विचारव्युहांत आपण अदकलो आहोत त्यामुळे वरकरणी आपण एक "विचारकेंद्रबिंदु" आहोत असे वाटले तरी त्या बिंदुत्वात एक महत्वाचे न्यून राहते ते हे कि पुढे जाण्याचा मार्ग खुंटला असतो. होतो तेथेच...आहो तेथेच आणि अजरामर तिथेच अशी अवरुद्धविचार स्थिती निर्माण होते.

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

इतिहासाचे अन्वेषन करत रहावेच लागणार आहे. त्याखेरीज आम्हाला आमच्या मुर्खपणाचे रहस्य समजणार नाही. ते रहस्य जोवर समजणार नाही तोवर आम्ही आपापली खुरटी शिस्ने मिरवीत "जय अमुक... जय ढमुक" करण्यात आणि आम्ही केवढे संवेदनाशील आहोत हे तोडफोडी करुन सिद्ध करण्यात धन्यता मानत राहु.

शेवटी ज्यांना गटार-विचार-व्युहात कसलेही स्वत:चेही तत्वद्न्यान नसतांना रमायचे आहे त्यांना कोण आवाज देणार? समाजिक मागासपणा एक वेळ दूर होईल, पण या बौद्धिक मागासपणाचे आपण काय करणार?

Tuesday, June 26, 2012

दंभ-विकृत विचारवंतांपासुन सावध रहा!


सामान्यपणे सामान्य हे सहसा दांभिक असतात असा आपला समज असतो. राजकारण्यांबाबत तर बोलायलाच नको कारण दांभिक असणे हे त्यांच्या पेशाचे एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. परंतु साहित्त्यिक-विचारवंत म्हणवणारे जेंव्हा दांभिक बनतात, वागतात, आचरण करतात तेंव्हा मात्र चिंता वाटते. खाजगीत असणारा आणि जाहीर प्रतिमा बनवत तिला तडा जावू नये म्हणुन मुखवटे पांघरणा-यालाच आपण साधारणतया दांभिक म्गणतो. पण स्वत:चे विचार इतरांच्या व स्वत:च्याही सोयीसाठी हवे तेंव्हा हवे तसे वाकवणा-यांना आणि तरीही वर विचारशिरोमणी म्हनवून घेणा-यांबाबत तर दांभिकच नव्हे तर दंभ-विकृत अशीच संद्न्या शोभुन दिसेल. दुर्दैवाने असे विचा दंभ विकृत महाराष्ट्रात आहेत हे महाराष्ट्रचे दुर्दैव म्हणावे लागेल.

मी अनेक दांभिक खोटारडे लेखक पाहिले अनुभवले आहेत ते प्रकाशक या नात्याने. एकच हस्तलिखित शिर्षके बदलुन दोन-तीन प्रकाशकांना देत मानधने लाटणारे लेखक मी जसे पाहिले आहेत तसेच नवीन लेखकांच्या हातात काही रुपये टिकवून त्यांची लेखने स्वत:च्या नांवावर प्रसिद्ध करुन घेणारे लेखकही पाहिले आहेत. तो त्यांचा पोट जाळण्याच्या कसरतीतुन निर्माण झालेला उपद्व्याप आहे असे एक वेळ म्हणत त्यांना क्षमाही करता येइल, पण जे स्वत:ला विचारवंत म्हणतात, मिरवतात, ज्यांना समाजाने भरभरुन सन्मान दिले आहेत, ज्यांना गमावण्यासारखे उतार वयात उरलेले नाही, असे विचारवंतही जेंव्हा दंभ-विकृत होतात तेंव्हा चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

मी अशाच एका विचारवंताचा आजतागायत तीनदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. हे विचारवंत पुण्यात एकदा बालगंधर्वच्या एका कार्यक्रमाला तत्कालीन वादांमुळे उपस्थित राहिले नव्हते. त्यांना धमक्या आल्या असल्याचा कयास होता. मी फ़ेसबुकवर तेंव्हा सक्रीय होतो. मी ती आशंका व्यक्त केली तर त्यांच्याच (वरकरणी संघटनात्मक दुरावलेल्या) तरुण कार्यकर्त्याने माझ्यावर आगपाखड केली. त्यानंतर मला या विचारवंतांचा फोन आला व त्यांनी मला सांगितले कि काहीही असले तरी मला वाद नकोत, तेंव्हा कृपया फ़ेसबुकवरील तुमची विधाने मागे घ्या. मी त्यांचा एवढा आदर करत होतो कि मी ती विधाने डीलीट केली. प्रथमच मला माझी विधाने मागे घ्यावी लागली. त्याचा खेद नाही. त्यानंतर माझ्या एका मित्राने बौद्ध धर्म आणि त्यांची मते याबाबत एक लेख त्यांच्या ब्लोगवर प्रसिद्ध केला. त्यातील भाषा अश्लाघ्य असली तरी मी त्यांचा (माझ्या मित्राचा) निषेध का केला नाही म्हणुन माझ्यावर शाब्दिक हल्ले झाले. त्यांचा आविर्भाव असा होता कि जणु काही माझे मित्र माझे ऐकुन लिहितात...किंवा त्यांना जे गैरसोयीचे वाटते त्याचा मी निषेध केलाच पाहिजे. हे मला काय गुलाम समजतात कि काय? असो. या प्रकरणानंतर माझा या महनीय महाविचारवंतांबाबत भ्रमनिरास झाला तो झालाच. त्यांनीही नंतर सार्वजनिक जीवनात घ्यायच्या तेवढ्या वैचारिक कोलांटउड्या घ्यायच्या त्या घेतल्याच. म्हनजे एका नवीन धर्माशी आपला काही संबंध उरला नाही असेही ते जाहीरपणे म्हणालेच आणि पुन्हा त्या नवधर्मनिर्मितीच्या प्रक्रियेत सामील झाले ते झालेच. उच्चवर्णीय आणि बौद्ध धर्मीयांची नाळ जुळवण्याच्या राजकारणात ते अडकुन राहिले ते राहिलेच. त्याचे वेळी लोकायताचा आदर्शही ठेवत अजुन एका नव्या धर्माची संहिता लिहिण्याचा सन्मान त्यांनी मिळवायचा तो मिळवलाच.

हे आज लिहिण्याचे कारण म्हणजे माझे अजुन एका मित्रालाही आजच असा दंभ-दुष्टतेचा अनुभव आला. माझे मित्र त्यांना भेटायला गेले होते. चर्चेत अनेक विषय झाले. त्या चर्चेचा सारांश माझ्या मित्रांनी फ़ेसबुकवर प्रसिद्धही केला. त्यात काहीएक वावगे नव्हते. प्रसिद्ध माणसांचे जीवन हे "खाजगीपणाची" सीमा ओलांडुन बसलेले असते. पण खाजगी चर्चेतील आपल्या स्वीकृत्या आपल्या जाहीर प्रतिमेच्या विरोधात जाताहेत हे लक्षात येताच त्यांनी माझ्या मित्राला फोन करुन त्यांनी लिहिलेला मजकुर ४५ मिनिटांत उडवुन टाकायचा आदेश दिला. माझ्या मित्रासमोर दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी तो फ़ेसबुकवरुन उडवला. ही दहशतच आहे हे माझे स्पष्ट मत बनले आहे.

हे विचारवंत अत्यंत भावनीक, प्रगल्भ आणि संवेदनशील आहेत असा माझा समज होता. खरे तर मला त्यांच्याबद्दल अत्यादर एवढा होता कि माझे एक पुस्तक मी त्यांना विनम्रतापुर्वक अर्पणही केले होते. परंतु तुकारामांचा मोकला-ढाकळा विद्रोह त्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही असे या व अशा अनेक अनुभवांवरुन म्हणावे लागत आहे.  आपल्याच विचारांशी वारंवार प्रतारणा करणा-यांना मी विचारवंत मानुच शकत नाही. नव्या पुराव्यांच्या द्न्यानांच्या परिप्रेक्षात मते बदलतात हे मला मान्यच आहे पण मुलभुत मतेच ज्याची स्थिर नाहीत त्यांची मते ही कस्पटासमान असतात हेच काय ते खरे...अभ्यास कितीही असो.   बुद्ध, तुकाराम, लोकायत तत्वद्न्यान या भुलथापा मारायच्या बाबी नव्हेत. त्या अत्यंत गंभीर आणि चिरंतन बाबी आहेत. त्यांवर विशिष्ट स्वार्थी द्रुष्टीकोन बाळगत लिहिणे हा त्या महनीयांवरील अन्याय आहे.

महाराष्ट्राची एकुणातच वैचारिक पीछेहाट होते आहे. त्याला जर स्वतंत्र प्रतिभेचे विचारवंत म्हनवनारे जर हातभार लावत असतील तर ती एक शोकांतिका आहे. खाजगीत एक आणि जाहीर दुसरे बोलणारे राजकारणी आम्हाला माहित आहेत. विचारवंतांकडुन तशी अपेक्षा नाही. जेही विचारधारा स्वीकारली आहे, ती न गोंधळता, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, कसल्याही स्वार्थाचा, टीका-स्तुतीचा विचार न करता मांडत राहणे हे खरे श्रेय:स्कर आहे. अशांनाच मी विचारवंत मानतो, अन्यथा असे दंभ-विकृत विचारवंत जन्माला येतात जे कोणत्याही, अगदी त्यांच्याही समाजाच्या भल्याचे नसतात. माणसाचे विचार बदलु शकतात. पण त्या विचारपरिवर्तनाची अशीही एक दिशा असते...त्यामागे नवे चिंतन, नवे पुरावे वा नवा दृष्टीकोन असू शकतो. पण कोलांटउड्या घेत जे स्वत:चे शंकराचार्यपद निर्माण करु पाहतात ते कधीही टिकावू चिरंतन असे असू शकत नाही.

Monday, June 25, 2012

शैव आणि जैन धर्मातील साम्ये व विभेद...





शैव धर्म हा जगातील सर्वाधिक पुरातन धर्म आहे याबाबत आता सर्वच विद्वनांत एकमत आहे. सिंधु संस्कृतीच्या काळात या धर्माने कलस गाठायला सुरुवात केली. लिंगपुजा हा या धर्माचा आद्य प्राण होय. ही एकार्थाने प्रतीक पुजा होती. निर्मितीचे...अगदी विश्वनिर्मितीचे मुळही त्या काळातील समाजाने लिंगप्रतीकात पाहिले. आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, पूजा आणि संन्यास या महत्वाच्या तत्वांवर शैवांचा पुरातन काळापासुन ते आजतागायत विश्वास आहे.

शैव सिद्धांतांत, स्वत: शिव जरी कफल्लक मानला गेला असला तरी त्याचा मित्र कुबेर हा असूर मात्र धनाढ्य मानला गेला आहे. सिंधु संस्कृती जशी व्यापार, शेती, उत्पादकतेमुळे धनाढ्य बनत गेली तसतशी सुखासीनता वाढत गेली. पंचमकार साधनादि तंत्रांकडे समाज आकर्षित होवू लागला. समाजात अशा कालात नेहमीच एक उदासीनता येते व विचारवंत नवीन तत्वधारांच्या शोधात लागतात. याच काळात (इसपु. ३२००) या प्रक्रियेला प्रतिक्रिया म्हणुन एक नवीन विचारधारा उदयाला आली व ती म्हणजे समन संस्कृती. या विचारधारेतुन निर्माण झालेला धर्म म्हणजे जैन (जिन) धर्म. ज्याने कर्मेंद्रियांवर विजय मिळवला तो जिन अशी अत्यंत साधी व्याख्या होती. शैव योग हा या तत्वधारेचा मुलाधार बनला. कारण योगाचा अर्थही कर्मेंद्रियांवर विजय असाच आहे.


कोणताही नवीन धर्म ज्या धर्मातुन तो उदयाला आला त्याची सर्वस्वी कास सोडत नाही हे आपण ज्यु धर्मातुनच उदयाला आलेल्या ख्रिस्चन आणि इस्लाममद्धे सहज पाहु शकतो. शैव आणि जैन धर्मातील साम्ये पाहुन मग आपण त्यांच्यातील विभेदही पाहुयात.

१. शैव धर्म आत्म्यावर विश्वास ठेवतो. जैनही ठेवतात.
२. आत्मा हा सर्वोपरी असुन स्वत:तच तो संपुर्ण द्न्यानी आहे, परंतु कर्मबंधांमुळे त्याला अद्न्यानाचा आभास होतो हे दोन्ही धर्मांच्या तत्वद्न्यानाचा मुळ गाभा आहे. पुनर्जन्मावर दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
३. प्रत्येकाला मोक्षाचा अधिकार आहे. दोन्ही धर्म मुलत:जातीयता मानत नाहीत.
४. कर्मबंधातुन मुक्ती म्हनजेच मोक्ष अशी दोन्ही धर्मांची श्रद्धा आहे.
५. ओंकार हा दोन्ही धर्मांनी श्रेय:स्कर व श्रेष्ठ मंत्र मानलेला आहे.
६. ब्रह्मचर्याला दोन्ही धर्मांनी विशेष स्थान दिले आहे. शैव यती आणि जैन हे प्राय: आजन्म ब्रह्मचारीच असत.
७. शिव हा नग्नच असतो. सर्वच तिर्थंकर हेही नग्न असतात व त्यांच्या प्रतिमाही विवस्त्रच बनवल्या जातात.
८. षैव व जैन धर्म हे अवैदिक धर्म मानले जातात.

अशी अनेक महत्वाची साम्ये असतांनाच महत्वाचे विभेदही पाहिले पाहिजेत. ते असे:

१. शैव धर्मात हिंसा, बळी याला महत्व आहे. जैन धर्म हा अत्यंत टोकाची अहिंसा हे आपले मुलतत्व मानतो.
२. सत्याला व अस्तेयाला दोन्ही धर्मात महत्व असले तरी अपरिग्रह हे अत्यंत महत्वाचे तत्व जैनांनी शोधले.
३. शिव व शक्तीच्या आद्य मिलनातुन विश्वाची निर्मिती झाली अशी शैव श्रद्धा आहे, परंतु जैन मात्र विश्व हे कोणीही निर्माण केले नसुन ते आहे तसेच अनादी अनंत आहे असे मानतात. एका अर्थाने बिग ब्यंग सिद्धांत विरुद्ध स्थिर विश्व सिद्धांत यात विभेद असावा तसाच हा विभेद आहे.

हे महत्वाचे विभेद दोन धर्मांत असले तरी ते अतंर्गतत: सुसंगतच आहेत कारण जैन धर्म हा शैव धर्माची पुढची पायरी होता. आधीचे दोष दूर करत पुढे जाणे हीच मानवी समाजाची प्रागतिकता असते.

जैन धर्म आणि शैव यांतील अत्यंत महत्वाचे साम्य म्हणजे जैनांच्या चोवीसपैकी २० तीर्थंकरांच्या नांवात "नाथ" हे शिववाचक पद आहे. शिवाला आदिनाथ मानले जाते...हे आपल्याला माहितच आहे..वृषभनाथांचे पर्यायी नांव हेही आदिनाथ असेच आहे. एवढेच नव्हे तर नंदी (वृषभ) हे शिवाचे एक प्रतीक असून आद्य तीर्थंकर वृषभनाथांचे प्रतीकही वृषभच आहे. थोडक्यात जैन विचारधारा ही शैव धर्माला पर्याय म्हणुन नव्हे तर शैव सिद्धांत पुढे नेण्यासाठी झाली असे स्पष्टपणे म्हणता येते.

जैन धर्मानंतर या दोन्ही धर्मांना पर्याय म्हणुन एक नवीनच धर्म उदयाला आला व तो म्हणजे वैदिक धर्म. सरस्वती नदीच्या काठी जन्माला आलेला, वसिष्ठ ऋषीने प्रवर्तीत केलेला हा धर्म अत्यंत विरोधी तत्वद्न्यान घेवुन पुढे आला. या धर्माची महत्वाची मुलतत्वे अशी:

१. आत्मा-मोक्ष-पुनर्जन्म-प्रतीक पुजा या तत्वांवर विश्वास न ठेवता अग्नीच्या (यद्न्याच्या) माध्यमातुन हविर्द्रव्ये अर्पण करत निसर्ग-रुपकमय देवतांना प्रसन्न करुन घेणे.
२. ब्रह्मचर्य-संन्यासावर विश्वास नाही. निपुत्रिकाला कोणतीही गती नाही हा विश्वास.
३. लिंगपुजा पुर्णतया नाकारली. नागरी अवस्थाही नाही आणि पुर्ण गृहस्थी जीवनाचा त्यागही नाही अशी मध्यम जीवनव्यवस्था.
४. मुर्तीपुजा सर्वस्वी अमान्य.
५. पुरुषसत्ताक पद्धतीचा पुरस्कार.

हा धर्म इसपु १००० च्या आसपास एका परिणत अवस्थेला पोहोचला होता. परंतु त्याचा प्रचार उत्तर भारतात काही प्रमानात झाला असला तरी तो सर्वमान्य धर्म नव्हता. याचे कारण म्हणजे वैदिक धर्मात असलेली वर्णव्यवस्था. यद्न्यकर्मांतील क्लीष्टता आणि त्यामुळेच पुरोहितांचे वाढलेले स्तोम. शिवाय यद्न्य हे खर्चीकही असत. सर्वांना ते परवडणे शक्यही नव्हते. त्यामुळे पुजादि अत्यंत सोपे मार्ग सांगणारा मुर्ती/प्रतीकपुजक शैव धर्म अव्याहत वाढतच राहिला तसाच जैन धर्मही. हे दोन्ही धर्म मानवी समुदायांना मानसिक समाधान देण्यात सक्षम होते.

पण यानंतर जन्माला आला तो बौद्ध धर्म. हिंदु धर्माला आव्हान देणारा धर्म म्हणुन बौद्ध धर्माकडे आजही लोक पाहतात. पण मुलात हिंदु नामक धर्मच अस्तित्वात नसल्याने गौतम बुद्धाने मग नेमक्या कोनत्या विचारधारेच्या विरुद्ध आणि कोणत्या विचारधारेच्या समर्थनार्थ आपले तत्वद्न्यान निर्माण केले हे पाहणेही रोचक ठरेल.

त्यासाठी आधी आपण बौद्ध धर्माची मुलतत्वे पाहुयात:

१. बौद्ध धर्माला मुळात मुर्तीपुजा मान्य नव्हती.
२. बौद्ध धर्माने यद्न्यांतील पशुहिंसा नाकारली, पण यद्न्यांना विरोध केला नाही.
३. बौद्ध धर्माने इंद्र-वरुणादी वैदिक देवता स्वीकारलेल्या आहेत.
४. बौद्ध धर्माचा आत्मा-मोक्ष-पुनर्जन्मावर मुलत: विश्वास नाही. (फार उत्तरकाळात याही सद्न्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. पण थेरवाद, जो मुळ बौद्ध धर्म आहे, तो या संकल्पनांना मान्यता देत नाही.)
५. बौद्ध धर्म हा मुलत: पुरुषप्रधान आहे. स्वत: गौतम बुद्धांनी भिक्खु संघात स्त्रीयांना प्रवेश नाकारला होता. पण त्यांचा शिष्य आनंद याच्या आग्रहाने अत्यंत खेदाने त्यांनी स्त्री प्रवेश मान्य केला.
६. बौद्ध धर्म मांसाहाराला विशिष्ट स्थितीत अनुद्न्या देतो.
७. बौद्ध धर्म कोणताही आत्यंतिक मार्ग न स्वीकारता मध्यम मार्ग स्वीकारतो.
८. विश्वनिर्मितीबाबत बुद्ध मौन आहेत. अनित्यतावाद हा बौद्ध धर्माचा पाया आहे.

थोडक्यात बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म यांच्यात सुसंगती आहे. मी एका पुर्व लेखात लिहिले होते कि बौद्ध धर्म ही वैदिक धर्माची सुधारणा आहे. शैव अथवा जैन धर्माचा त्याशी ऐतिहासिक संबंध नाही. बौद्ध धर्माने जरी समन सम्स्कृतीची, सांख्य तत्वद्न्यानाची उसनवारी केली असली तरी हा धर्म म्हणजे वैदिक धर्मासाठीचा नवसुधारणावाद होता.

अर्थात तो वैदिक धर्मियांनी मान्य केला नाही. जरी बौद्ध धर्माचे सर्वाधिक अनुयायी ब्राह्मणच झाले असले तरी ब्राह्मणांनीच भारतातुन बौद्ध धर्म हद्दपार केला हा इतिहास विसरता येत नाही.

त्याउलट जैन धर्माशी शैव धर्मीयांचे कधीही वाकडे झाल्याचा इतिहास नाही. जैनांबाबत शैव नेहमीच सहिष्णु राहिले आहेत. आजतागायत भारतात जैन-हिंदु असा वाद झालेला नाही. कोणत्याही खेड्यात जैन दुकानदाराचे एखादेच कुटुंब असते...पण कोणालाही विद्वेषाने वागवले गेल्याचा इतिहास नाही.  त्या धर्माचा सुधारणावादही कोणाच्याही पचनी पडलेला नाही. वैदिक धर्म हा जगातील आद्य मिशनरी धर्म. बौद्ध धर्मही मिशनरी तत्वावरच वाढला. वैदिक धर्म हा जगातील आद्य मिशनरी धर्म. बौद्ध धर्मही मिशनरी तत्वावरच वाढला.  त्यांनी धर्मप्रचारक निर्माण केले. ख्रिस्ती मिशनरी त्याच चालीवर वागु लागले.  सामाजिक कारणांसाठी एखाद्या मृत धर्माचे पुनरुत्थान करणे मी समजु शकतो, परंतु तसे करत असतांना आपण नेमक्या कोणत्या विचारधारेचे अंगिकरण करत आहोत हे समजणेही गरजेचे आहे. बौद्ध तत्वद्न्यान आणि वैदिक तत्वद्न्यान यात साम्ये अधिक विभेद कमी असे चित्र आहे.

परंतु शैव तत्वद्न्यान आणि जैन तत्वद्न्यान यात साम्ये अधिक आणि विभेद कमी असे चित्र आहे म्हणुनच जैन धर्म कोनताही सामाजिक विवाद निर्माण न करता अखिल समाजाच एक भाग म्हणुन अव्याहत जीवित आहे, एवढेच!

Sunday, June 24, 2012

शिंपी समाजाचा इतिहास



शिंपी. जगाची अब्रू झाकणारा समाज. या समाजानं घडवला एक संत. ज्यानं कपड्यांचे तुकडे जोडता जोडता तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला समाज जोडला. प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट शिवला. देशभर फिरून त्यानं ज्ञानाचा दिवा लावला. म्हणून संत नामदेव हेच नाव या समाजानं अभिमानानं आणि भक्तिभावानं धारण केलं. कोणत्या सामाजिक पार्श्वभूमीतून नामदेवांनी एवढं मोठं काम केलं, ते समजण्यास मदत होईल असा हा शिंपी समाजाचा इतिहास. सांगताहेत ज्येष्ठ सामाजिक इतिहासकार संजय सोनवणी. 

वस्त्रांशिवाय माणसाची आपण कल्पनाच करु शकत नाही. आदिम काळात, म्हणजे सरासरी एक लाख वर्षांपूर्वीच माणूस चामडं आणि वल्कलांचा उपयोग वस्त्र म्हणून करु लागला.  मनुष्याला अन्य प्राण्यांसारखी हवामानाला तोंड देता येतील अशी नैसर्गिक देणगी नसल्याने त्याला
अंगरक्षणासाठी वस्त्रांची गरज भासणे स्वाभाविक आहे. चामड्याचा उपयोग करुन तो कृत्रिम निवारेही बनवायला शिकला. निवारे बनवण्यासाठी चामड्याचे अनेक तुकडे जोडणे आवश्यक होतं. त्या गरजेपोटीच त्याने अत्यंत तीक्ष्ण आणि पातळ अशा सुया चक्क दगडांपासून, हाडांपासून बनवल्या. त्यामुळे शिवणकाम सुलभ झाले.
कठीण पाषाणांपासून मनुष्य हत्यारे बनवायला लाखो वर्षांपूर्वीच शिकला होता. आता अशा दर्जेदार सुया बनवेपर्यंत त्याने जी प्रगती केली ती नक्कीच विस्मयकारक आहे. अशा अनेक दगडी (गारगोटी) सुया फ्रान्समधील सोलुटर या प्रागैतिहासिककालीन (इसपू२२०००) स्थानावर सापडल्या आहेत. या सुयांच्या अग्रभागी आजच्या सुयांना असतात तशी भोकेही होती हेही विशेष. यातूनच मनुष्य स्वत:साठी वस्त्रेही शिवायलाही शिकला. हे शिवणकाम करण्यासाठी दोरा म्हणून अर्थातच चामड्याच्या पातळ वाद्या वापरल्या जात. हे प्राथमिक दर्जाचे कातडी कपडे होते. त्यामुळे त्याच्या हालचालीही सोप्या झाल्या. थोडक्यात माणसाने शिवणकलेचा शोध चाळीस-पन्नास हजार वर्षांपूर्वीच लावला होता, असे अनुमान काढता येऊ शकते.
मनुष्याने वनस्पती धाग्यांचे  म्हणजे ताग, प्यपिरस इत्यादींचे वीणकाम करत त्यांचा उपयोग वस्त्रांसाठी सुरु केला तोही याच समांतर कालात. जॉर्जिया आणि झेकोस्लाव्हाकिया येथे विणलेल्या वस्त्रांचे २० ते २८ हजार वर्ष एवढे जुने पुरावे मिळाले आहेत. लोकरीचाही उपयोग वस्त्रांसाठी याच काळात सुरु झाल्याचे उपलब्ध पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते.
भारतातील शिवणकलेचा इतिहासही जागतिक इतिहासाच्या जवळपास समांतर जातो. भारतात अग्रभागी टोक असलेल्या सुया सापडल्या नसल्या. तरी धारदार आणि पातळ टोचण्या मात्र सापडल्या आहेत. अगदी महाराष्ट्रातील सावळदा, इनामगांव आदि ठिकाणीही त्या सापडल्या आहेत. पण भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कापसापासून सुती वस्त्रे बनवण्याची साध्य केलेली कला. परदेशी प्रवाशांनी भारतात झाडांना लोकर येते असे नमूद करुन ठेवले आहे. कारण त्यांना कापूस माहीत नव्हता. हिरोडोटसने भारतीय तलम कपड्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.
सिंधु संस्कृतीत पुरातन विणलेल्या वस्त्रांचे अवशेष सापडले आहेत. वैदिकजन मात्र लोकरीपासूनच बनवलेली वस्त्रे वापरत असत, असेही ऋग्वेदावरुन दिसते. भारतातून सिंधू काळापासूनच सूत कातणे, विणणे या कला विकसित होवून त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होत असे. या काळात शिवणकला माहीत होती, असे ऋग्वेदातील २.३२.४ या ऋचेवरुन दिसते. तो उपयोग फक्त स्त्रियांसाठी कंचुकीसदृश चोळी शिवण्यासाठी केला गेला असावा, असे अनुमान आहे. पण त्याबाबत ठोस असे काही सांगता येत नाही. पण जातक कथांतून इसपू ६००मध्ये स्त्रिया या शिवलेल्या कंचुक्या वापरत असत. त्यांना बाह्या असत पण गुंड्या नसत. कंचुकीच्या पुढील काळात वेगवेगळ्या फॅशन आल्या तरी त्या मर्यादित वर्गापुरत्याच होत्या असे दिसते.
भारतातील समशितोष्ण हवामानामुळे शिवलेली वस्त्रे वापरण्याची प्रथा जवळपास नव्हती. कमरेभोवती वा संपूर्ण शरीरभर विशिष्ट पद्धतीने गुंडाळलेले वस्त्रे हीच भारतीयांची जवळपास काही हजार वर्षे वेशभूषा राहिली. शिवलेल्या वस्त्रांशी भारतीयांचा परिचय झाला तो आधी ग्रीक आणि पुढे कुशाणांमुळे. परंतु त्यांचे विशेष अनुकरण देशात झाले नाही. जी वस्त्रे शिवली जात ती घरगुती पातळीवर. या काळात भारतीय स्त्रियाही शिवलेल्या कंचुकी (चोळी) तर पुरुष कंचुक (पायघोळ चोगा) परिधान करु लागले. अर्थात ते फक्त उच्चभ्रू समाजापुरतेच मर्यादित राहिले. विदेशी लोकांमुळे भारतात नव्या वेशभूषांची फॅशन आली एवढे मात्र खरे. शिवणकला ही आधी स्त्रियांचीच मक्तेदारी होती असेही इतिहासावरुन दिसते. आपल्या कंचुक्या स्त्रिया स्वत:च शिवत.
महाराष्ट्रात गाथा सप्तशतीवरुनही स्त्रिया शिवलेल्या चोळ्या सर्रास वापरत, असे पुरावे मिळतात. पुरुषांचा वेष मात्र बराच काळ  परंपरागत,न शिवलेला असाच राहिला. बौद्ध भिक्षू मात्र संघाटी नामक शिवलेला अंगरखा वापरु लागले होते. त्याचेच रुपांतर पुढे कंचुक या पायघोळ सद-यात झाले जे अनेक पुरुष वापरू लागले. असे असले तरी सामान्य प्रजेच्या परंपरागत वेषभूषेत फारसा फरक पडला नाही. पण सातव्या-आठव्या शतकाच्या दरम्यान भारतीय हवामानाला साजेशा बंड्या, बाराबंद्या आणि कोप-या या नवीन फॅशन पुढे आल्या. नवजात मुलांसाठी अंगडी-टोपडीही आली. या नव्या फॅशन्स लोकप्रिय होऊ लागल्या. हे कपडे शिवण्यासाठी विशेष कौशल्याची गरज भासू लागली. त्यामुळे या शिवणकलेत विविध जातींतील तरबेज लोकांनी प्रवेश केला.
दहाव्या शतकाच्या आसपास शिवणकाम करणा-यांची स्वतंत्र जातच बनू लागली. भारतात शिंपी ही तशी अर्वाचीनकाळात उदयाला आलेली तुलनेने अत्यंत नवीन जात आहे. पंढरपूर येथील चौ-यांशीच्या लेखात (सन ११९५-९७) शिंप्यांचा स्पष्ट उल्लेख मिळतो. यावरुन महाराष्ट्रात तोवर शिंपी जात स्थिरस्थावर झाली होती असे दिसते. नामदेव महाराजांचा जन्म सन १२७० चा आहे. म्हणजेच तोवर शिंपी जात महाराष्ट्राच्या समाजजीवनात चांगलीच रुळलेली असणार आहे.
या जातीत अहीर, भावसार (बाहुसार), चतुर, मराठा अशा अनेक पोटजाती पडल्या. या पोटजाती त्यांचे मूळ जाती किंवा कूळस्वरुप (म्हणजे मुळात ते ज्या जातीचे वा कुळाचे होते) स्पष्ट करतात. संत नामदेव महाराजांमुळे नामदेव शिंपी ही एक स्वतंत्र पोटजात बनली. शिंपी समाजात जैन, लिंगायत आणि मुस्लिमही आढळतात. शिंपी हे त्या काळात तीन प्रकारची कामे करत. कपडे विकणे, रंगवणे आणि शिवणे. पुढे त्यातूनच रंगारी ही स्वतंत्र जात बनली. मुस्लिम पद्धतीच्या पोषाखांची लाट महाराष्ट्रात खूप उशिरा म्हणजे पंधराव्या शतकानंतर आली.
कपड्याच्या व्यवसायात येण्यापूर्वी शिंपीमंडळी पशुपालन (अहीर), शेती (मराठा, चतुर), कपड्यांचा व्यापार (बाहुसार), वस्त्रे रंगवणे आदि व्यवसायात होतीच. त्यामुळे शिंपिकाम स्वीकारले तरी मूळचे व्यावसायही कमीअधिक प्रमाणात सुरूच राहिले. या मंडळींची शेतीही असे, असे दिसून येते. या व्यवसायत स्थिरता येताच पुढे त्यांनी शेती स्वत: न कसता कुळांना खंडाने देण्याची पद्धत सुरू झाली. नामदेव महाराजांनी एकाठिकाणी स्वतःला कीर्तन कुळवाडी म्हणजे शेतकरी म्हटले आहे. हा संदर्भ महत्त्वाचा मानायला हवा.
तत्कालीन शिंपी समाज हा ब-यापैकी सधन होता असे अनुमान काढता येते.  तत्कालीन शिंपी हे कापड विकण्याचे आणि तेच शिवून देण्याचेही काम करत. असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक बरकत असणे स्वाभाविक मानता येते. शिंप्यांना ‘शेठ’ (शेट/शेटी) ही उपाधी लावली जात असे. आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. विशेषतः खान्देशात तर शिंपी एकमेकांना ‘शेठ’ म्हणूनच संबोधताना आढळतात. संत नामदेवांच्या पूर्वजांना शेट किंवा शेटी ही उपाधी असल्याचं संतांच्या अनेक अभंगांतूनच दिसून येतं.
गोणाई दामासेठी जाले पाणिग्रहण। संसारी असोन नरसी गावी ।।
दामशेटी हरुषिला । दासी जनीने ओवाळीला ।। ( संत जनाबाई)
द्वारकेहुनि विठू पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला।। ( संत एकनाथ)
नामदेवांच्या कुटुंबाचे मूळपुरुष यदुशेटी. त्यापुढच्या पिढ्या म्हणजे हरिशेटी, गोपाळशेटी, गोविंदशेटी, नरहरीशेटी या सगळ्यांच्या नावापुढे शेटी ही उपाधी आहेच. म्हणजे काही पिढ्यांची सधनता या कुटुंबात निश्चितपणे दिसून येते. नामदेवाचे  वडील दामाजींनाही दामा’शेटी’ ही उपाधी  होतीच.
नामदेवांनी आपला जन्म शिंपी कुळात झाल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे. त्यामुळे त्यांच्या जातीविषयी अन्य काही संतांप्रमाणे वाद नाही. ते जीवनभर हाच व्यवसाय करत असावेत असेही अनुमान या अभंगावरून करता येते,
सिंपियाचे कुळीं जन्म मज जाला।
परि हेतू गुंतला सदाशिवी ।।
रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवी ।
आराणूक जीवी नोव्हे कदा ।।
सुई आणि सुतळी कात्री गज दोरा ।
माडिला पसारा सदाशिवी ।।
नामा म्हणें सिवी विठोबाची अंगी ।
म्हणोनियां जगी धन्य जालों ।।
या प्रसिद्ध अभंगात नामदेव आपल्या जातीचा कुळाचा उल्लेख अभिमानाने करताना आढळतात. हिंदीतही नामदेवांच असंच एक पद आहे,
सीवणा सीवणा सीऊ सीऊ। रामबिना हूँ कैसे जीऊँ।।
अनंत नामका सिऊ बागा। जा सीवत जमका डर भागा।।
सुरतकी सुई प्रेमका धागा। नामेका मन हरिसी लागा ।।
हीच परंपरा फक्त वारकरीच नाही तर देशभरातल्या अन्य संतांनीही पुढे चालवल्याचे दिसून येते. त्यातून त्या त्या समाजाचा जातिविषयक न्यूनगंड दूर करण्याचे काम झाले. असे असले तरी शिंपी समाज हा ‘यातिहीन’, ‘शूद्र’ असाच मानला गेला होता. ‘कहां करू जाती, कहां करू पाती’ असं जातींच्या पलीकडे गेलेल्या नामदेवांनाही जातिभेदाचे चटके भोगावे लागलेच. त्यामुळे नामदेवांनीही विठ्ठलाला साकडे घातलाना आपल्या जातीचा उल्लेख केलेले हिंदी पद प्रसिद्ध आहे,
हीन दीन जाती मोरी पंढरीके राया।
ऐसा तुमने नामा दरजी कू बनाया ।।
उत्तम व्यवसाय, सधनता आणि विठ्ठलाला नैवेद्य देण्याच्या अधिकाराएवढे सामाजिक वजन असूनही त्यांना जातीवरून बोलणी खावीच लागली. पुढे नामदेवांचे परमभक्त झालेल्या परिसा भागवतांनी नामदेवांची जातीवरून केलेली टवाळी अभंगातून मांडून महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवजच ठेवला आहे. ‘तू शिंपी नामा, आम्ही उत्तम याति’ असं परिसा भागवतांकडून नामदेवांना ऐकून घ्यावे लागले होते. हा ज्ञानाचा दुजाभाव होता. ज्ञानाच्या क्षेत्रात नामदेवांनी मारलेली मुसंडी तत्कालीन उच्चवर्णींयांना सहन होताना दिसत नाही. पण त्यांना नामदेव सोडत नाहीत. आपल्या अभंगातून सरळ उत्तर देतात,

वेश्या होती तेचि पतीव्रता जाली।
मागील ते बोली बोलों नये।।
विष्णुदास नामा विठ्ठली रंगला।
तो शिंपी वहिला म्हणो नये।।

याच आशयाचा आणखी एक अभंग आहे

काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ।
तया अमंगळ म्हणो नये।।
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी।
उपमा जातीची देऊ नये।।

नामदेवांचे घराणे श्री विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त होतेच. पंढरपूरला असताना विठ्ठलाचा नैवद्य दाखवण्याची जबाबदारी या घराण्याकडेच होती. यातून एक तर्क निघतो तो म्हणजे एक तर अद्याप वारीची परंपरा सुरु झाली नव्हती.  विठ्ठल मंदिर तोपर्यंत बडव्यांच्या ताब्यात गेले नव्हते. त्यामुळेच नामदेवांना ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी १२९१ च्या आसपास त्यांना आळंदीला जावे लागले. वारीची परंपरा आधीपासून असती आणि ज्ञानेश्वरादी संत जर वारकरी असते तर त्यांची भेट पंढरपुरीच झाली असती. समजा वारीची परंपरा पूर्वापार असेल तर यातून निघणारा दुसरा अर्थ असा की, मग ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे नव्हते. ते पंढरपुरी त्यामुळेच कधी गेले नव्हते. ज्ञानेश्वर हे मूळचे नाथसंप्रदायी होते हे त्यांच्याच अमृतानुभवावरुन स्पष्ट दिसते. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे आद्य जनक आणि आद्य संत नामदेव महाराजच ठरतात. संत ज्ञानेश्वर समजा जर नंतर वारकरी संप्रदायात प्रवेशले असले तरी ते केवळ नामदेवांमुळेच, असे त्यांच्या जीवनातील कल्पित कथा दूर सारुन पाहिले असता स्पष्ट होते. भागवत धर्माची ध्वजा देशभऱ नेण्याचे अचाट कार्य नामदेवांनी केले. फक्त शिंपी समाजालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला अभिमान वाटेल असे हे कार्य!

द्न्यानेश्वर व नामदेवांच्या भेटीबाबत वा अगदी उभयतांच्या उत्तर भारत-भ्रमणाबाबत माहिती देणारे जे आत्मचरित्रात्मक अभंग आदी या नांवाने प्रसिद्ध आहेत तेच मुळात उत्तरकाळात कोणीतरी अन्य व्यक्तीने लिहिलेले आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. आदीमद्धे अगदी नामदेवांनंतरच्या संतांचीही नांवे यतात त्यामुळे ते अभंग नामदेवांनी लिहिले असनणे शक्य नाही.

नामदेव स्वत: सं<त होते एवढेच नव्हे तर चोखा मेळा, कर्म मेळा, जनाई, सोयराबाई अशा अनेक संतांनाही त्यांनी घडवले. चोख मेळ्याला अस्पृष्य मानले जात होते याचा एकही पुरावा नाही. चोख्यअ मेळ्याचा "बडवे मज मारिती..." वगैरे जे काही अस्पृश्यता दर्शक अभंग आहेत ते उत्तरकाळात कोणीतरी घुसवले असावेत अशी दाट शंका यावी अशी परिस्थिती आहे.  या अशा घालघुसडवाल्यांपासुन कोणताही संत...अगदी द्न्यानेश्वर...तुकारामही सुटलेले नाहीत. असो.

नामदेवांच्या घराण्याचे मूळ गाव रिळे. ते सांगली जिल्ह्याच्या शिराळे तालुक्यात आहे. शिराळे गावच्या पश्चिमेकडून बिळाशी रस्त्यावर रिळे नावाचे गाव आहे. नामदेवांचा मूळपुरुष यदुशेट याच ठिकाणी वास्त्यव्याला होता, असे मानले जाते. यादवांचे साम्राज्य असताना मराठवाडा परिसर समृद्ध होता. सगळा व्यापारउदीम तिथे एकवटला होता. अशाकाळात यदुशेटींचे कूळ आजच्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावी गेले. पुढे दामाशेटी कुटुंबासह पंढरपुरात आले. त्यामुळे त्या काळात क्वचितच आढळणारी स्थित्यंतरे या घराण्यात आढळतात. या घराण्यात व्यापारानिमित्त प्रवास असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. एखाद्या स्थिर शेतकरी जातीत नामदेवांचा जन्म झाला असता, तर ते जसे देशभर फिरले तसे फिरण्याची मानसिकला असती का, हे तपासायलाच हवे.
पण एक नक्की की नामदेवांच्या रुपात शिंपी समाजाला एक आदर्श मिळाले. आपल्या शिंपी पोटजातीपुढे त्यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाऊ लागले. आज फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जवळपास देशभरातील शिपी समाज नामदेवांना आपला आदर्श मानतो. विशेषतः मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या हिंदी भाषक पट्ट्यात आपले आडनाव नामदेव लावण्याची परंपरा आहे. तिथे विविध पोटजातींतील शिंपीही एकच आडनाव लावतात. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह सबंध उत्तर भारतात शिंपी समाज नामदेवांचे नाव लागतोच पण हा प्रभाव दक्षिण भारतातही आहे. ‘तीर्थयात्रांमुळे नामदेवांचा प्रभाव दक्षिण भारतातील विखुरलेल्या दर्जी, छिप्पिगा या अल्पसंख्य लोकांवर पडला. तेव्हापासून ती अल्पसंख्य ज्ञाती आपणांस नामदेव म्हणवू लागली व मद्रास (तामिळनाडू) राज्यातील भूसागर व मल्ला या ज्ञाती नामदेव हेही आपल्या ज्ञातीचे समानार्थक नाव मानू लागले.’ याशिवाय आंध्रप्रदेशातील शिंपी स्वतःला नामदेव मेरू म्हणवून घेतात.
नामदेवांच्या काळातील भारतातील शिंप्यांची उपकरणे म्हणजे कात्री, सुया आणि गज. गजाने कापड मोजणे, दोरीने ग्राहकाची मापे घेणे, कात्रीने कपडा कापणे आणि सुई-दो-याने शिवणे. शिवणे हातानेच करावे लागत असल्याने ते अर्थातच अत्यंत किचकट, कौशल्याचे पण कष्टाचे काम असे. त्यामुळे अर्थातच या कामाचा मोबदला चांगला मिळत असेल अशी आपली कल्पना होईल. पण बारा-व्या तेराव्या शतकानंतर महाराष्ट्रात बलुतेदारी पद्धतीचा प्रवेश झाला आणि या समाजाची आर्थिक अवनती व्हायला सुरुवात झाली. ज्या प्रमाणात काम त्या प्रमाणातील मोबदलाच थांबला. कापड व्यापारही वैश्यांच्या ताब्यात जावू लागला. त्याचाही फटका शिंपी समाजाला बसला. यादवकाळानंतर इस्लामी सत्ता जशा महाराष्ट्रात स्थिर झाल्या त्याचा समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. त्यात वारंवार येणारी अवर्षणे. मुस्लिम काळात महाराष्ट्रात उच्चभ्रू सत्ताधारी आणि लष्करी वर्गाच्या वेशभूषेत बराच बदल झाला. शिंपी समाजाने या नव्या वेषभूषांचे शिवण आत्मसात केले असले तरी सर्वच शिंपी समाजाला ती कामे मिळू शकत नव्हती. शहरांत स्थिर झालेल्यांनाच त्या कामांचा लाभ होई. कापडव्यापार त्यांच्या हातातून गेल्याने त्यांना व्यापा-यांच्या मेहरबानीवर व्यवसाय करावा लागू लागला.
युरोपात मात्र या उद्योगाची भरभराट होत होती. नित्य नव्या फॅशन्स स्त्री-पुरुषांसाठी पुढे आणल्या जात होत्या, त्या लोकप्रियही होत होत्या. सैनिकांसाठी गणवेश शिवण्याचाही उद्योग मोठा होत चालला होता. हाताने कपडे शिवत बसणे, तेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर शक्यच नव्हते. त्यामुळे पंधराव्या शतकापासूनच शिलाई मशीन बनवण्याचा प्रयत्न  युरोपात सुरू झाला. पण परिपूर्ण आणि उपयुक्त शिलाई मशीन बनायला १८३० साल उजाडावे लागले. बार्थेल्मी थिमोनियर या फ्रेंच संशोधकाने नवीन कार्यक्षम शिलाई मशीनचा शोध लावला. त्यानंतर दहा वर्षांत त्याने ८० मशीन्स बनवून सैनिकी गणवेश शिवण्याचा कारखानाच टाकला. पण त्याचे दुर्दैव असे की हाताने शिलाई करणा-या शिंप्यांनी एका रात्री त्याच्या कारखान्यावर हल्ला केला आणि त्याच्या मशीन्सची तोडफोड केली. एकच मशीन वाचले. ते घेवून तो इंग्लंडला पळाला. १८५७ साली त्याचा गरीबीत मृत्यू झाला. पुढे होवे आणि सिंगर यांनी अमेरिकेत होवेच्या आराखड्यावर आधारित शिलाई मशीनला १८४४ साली बाजारात आणले. आजतागायत सिंगर मशिन्सनी शिलाई मशीनच्या जगावर अधिराज्य गाजवले. एक इतिहास घडवला.
भारतात शिलाई मशीनचा प्रवेश झाला तोच १९व्या शतकाच्या अखेरीस. आधी नवीन तंत्राला विरोध झाला असला तरी एक-दोन दशकांत भारतीय शिंपी मशीनला सरावले. त्यात वेळोवेळी होत गेलेल्या बदलांनाही आत्मसात करत गेले. इंग्रज काळात भारतीय सैन्याच्या वेशभूषेत बदल होऊ लागलेला होताच. पण या बदलांचाही फारसा आर्थिक लाभ शिंपी समाजाला होवू शकला नाही. पन्नासच्या दशकात रेडीमेड कपड्यांनी तर खेडोपाडी पसरलेल्या शिंप्यांवर वाताहत होण्याची पाळी आणली. जे शिकले ते अन्य व्यवसायांत शिरले. सरकारी वा कारखान्यांत नोक-या करु लागले. जे नाही शिकले ते परंपरागत व्यवसाय कसाबसा करत राहिले.
रेडीमेड कपडे शेवटी कुशल कारागीरालाच शिवावे लागत असले तरी त्यात अन्य जातीय पुरुष-स्त्रिया मोठ्या प्रमाणात घुसल्या. त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढली. खुद्द शिंपी समाजाचे या व्यावसायातील स्थान आता डळमळीत झाले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान पार रसातळाकडे चालले आहे. सर्व पोटजातींच्या संघटना आहेत. पण त्यांचे महत्कार्य म्हणजे वधु-वर मेळावे घेणे. समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न होत नाहीत. नामदेव महाराजांसारखे महान राष्ट्रसंत या समाजातून आले.  त्यांनी ज्ञानदीप उजळवून जगाला प्रकाश दिला. प्रत्येकाच्या हृदयात करुणेचा सागर निर्माण केला. अशा नामदेवांना घडवणारा समाज तो हाच, यावर आता सहजी विश्वास बसणे अवघड आहे!


(टीप: हा लेख श्री. सचीन परब यांच्या साक्षेपी संपादनाखाली आषाढी एकादशीनिमित्त प्रसिद्ध होत असलेल्या रिंगण या संत नामदेव महाराजांवरील विशेषांकात प्रसिद्ध होत आहे. या लेखातील संत नामदेवांबद्दलची माहिती, अभंग हे श्री. परब यांनी टाकुन या लेखाची गुणवत्ता वाढवली आहे. मी त्याबद्दल त्यांचा नितांत आभारी आहे.)











नामदेवे रचिला पाया...


पंढरीची वारी हा वारक-यांसाठी एक आनंदसोहोळा असतो. त्या आनंदामागील कारणे ही फक्त भाविक असतील अथवा नसतील. पण ही एक परंपरा आहे हे तर नक्कीच आहे. वारकरी मंडळी द्न्यानेश्वरांना वारकरी संप्रदायाचे आद्य संत मानतात. किंबहुना "द्न्यानदेवे रचीला पाया...तुका झालासे कळस" अशीच आपली मान्यता आहे. या मान्यतेचे दोन अर्थ होतात...एक म्हणजे द्न्यानरायांपुर्वी वारीची प्रथाच नव्हती. दुसरा अर्थ होतो तो हा कि नामदेवांचा या संप्रदायाच्या उभारणीत कोणताही आद्य हातभार नाही. यातुन अजून निर्माण होणारा प्रश्न म्हणजे चोखोबाचा. एकाच समकालात गोरोबा, चोखोबा, जनाई असे अनेक बहुजनीय संत जर नामदेवाच्या मांदियाळीत येतात तेथे द्न्यानेश्वरांचा नेमका संबंध काय?

द्न्यानेश्वर हे कट्टर नाथपंथीय होते. योग हा त्यांचा साधनामार्ग होता. अमृतानुभव या त्यांच्या महनीय तत्वद्न्यानाने मंडित ग्रंथात शैव तत्वद्न्यान ठासुन भरलेले आहे. द्न्यानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिला. या ग्रंथात एकाही ठिकाणी द्न्यानेश्वरांनी विट्ठलाचा साधा उल्लेखही केलेला नाही. अगदी आद्य नमनातही.

राहिली द्न्यानेश्वरांच्या अभंगांची बाब. द्न्यानेश्वर एक कि किमान तीन याबाबत विद्वानांत वाद आहेच. पण त्या जंजाळात न जाता मी येथे एवढेच नमुद करतो कि द्न्यानेश्वरांचे म्हणुन जे अभंग आहेत त्यांचा समारोप "बाप रखमादेवू वरु विट्ठल" असा असतो. आता हे सर्वांना माहितच आहे कि द्न्यानेश्वरांच्या माता-पित्यांचे नांव रखुमाई- विट्ठल असेच होते. मी याबाबत द्न्यानेश्वरांचे महाराष्ट्रातील गाढे अभ्यासक डा. द.भि. कुलकर्णी यांना एक प्रश्न विचारला होता...तो असा...

"द्न्यानेश्वरांनी आपल्या अभंगांची समाप्ती आपल्या माता-पित्यांना उद्देशुन का केली नसेल? कारण एकाही अभंगात द्न्यानेश्वर समाप्ति वगळता विट्ठल भक्तीचा उल्लेख करत नाहीत."

यावर दभि म्हणाले होते..."तुझा तर्क योग्य आहे. पण तो सिद्ध करता येणे आज अशक्य आहे."

माझे म्हणने आहे कि हाच तर्क सिद्ध होतो कि द्न्यानेश्वर हे कधीही वारकरी संप्रदायाशी निगडीत नव्हते तर ते नाथ संप्रदायाचे अखेरपर्यंत अनुयायी होते. त्यांनी व त्यांच्या भावंडांनीही ज्या समाध्या घेतल्या त्या अगदी नाथ संप्रदायाला साजेशा. वारकरी संप्रदायात खरे तर समाधीची पद्धतच नाही. ती असुही शकत नाही.

उलट नामदेव लहानपनापासुन पंढरीच्या विठुरायाला परंपरेने नैवद्य देत होते. कारण नैवद्याचा अधिकार त्यांच्याच घराण्याकडे होता. याचा दुसरा अर्थ असा कि तेंव्हा विट्ठल मंदिरावर बडव्यांचा अधिकारच नव्हता. किंबहुना विट्ठल हा अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणुन  तोवर उदयाला आलेलाच नव्हता. आला असला तरी तो एखाद्या विशिष्ट मानवी समुदायांपर्यंतच मर्यादित होता. द्न्यानेश्वर जर वारकरी संप्रदायाचे असते तर द्न्यानेश्वर आणि नामदेवांची भेट पंढरपुरलाच खुप आधी झाली असती, पण दंतकथा सांगतात कि द्न्यानेश्वरांची किर्ती ऐकुन नामदेव द्न्यानेश्वरांना भेटायला आळंदीला गेले. म्हणजे दोन वेगळ्या संप्रदायांची तत्कालीन महनीये एकमेकांना भेटली. आणि याचाच दुसरा अर्थ असा कि द्न्यानदेवांचा वारकरी संप्रदायाशी काहीएक संबंध नव्हता. असता तर किमान वारीच्या निमित्ताने त्यांची भेट पंढरीलाच झाली असती.

आता द्न्यानेश्वर जर वारकरी संप्रदायाचे मुळात नव्हतेच तर त्यांनी नामदेवांबरोबर उत्तर भारतात एकदा प्रवास केला ही कथा खोटी ठरते. उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तर भारतातील द्न्यानदेवांच्या यात्रेचा एकही पुरावा उपलब्ध नाही, नामदेवांचे म्हणावे तर त्यांची उत्तर भारतात असंख्य मंदिरे आहेत. द्न्यानेश्वरांचे एकही नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या तत्वद्न्यानाचा गौरव खुद्द नामदेवही करतांना दिसत नाहीत. याचे कारण द्न्यानदेव हे निकृष्ठ होते म्हणुन नव्हे तर नाथपंथीय तत्वद्न्यान आणि वारकरी समुदायाचे तत्वद्न्यान हेच विभिन्न होते. नाथ संप्रदायाही तसा जातीभेदातीत...पण द्न्यानेश्वर हे वर्णपद्धतीचे समर्थकच होते. नामदेवांना अखिल भारताने स्वीकारले...इतके कि त्यांच्या नांवाची जातच बनली. उतरेपासुन दक्षीणेपर्यंत नामदेव अवघा आकाशची झाला.

आता विट्ठल हा पौंड्र वंशीय पशुपालक, धनगर कुरुबांचा पुरातन राजा होता हे फक्त मीच नव्हे तर डा. रा. चिं. ढेरे सुद्धा सांगतात. पौंड्रंक विट्ठल म्हणजेच पांडुरंग विट्ठल हे पुन्हा सांगायलाच हवे काय?

आता विट्ठलाची वारी. ही परंपरा पुरातन अगदी जेंव्हा पौंड्रपुर तथा पंढरपुर पशुपालक धनगर-कुरुबांची राजधानी बनली तेंव्हापासुन पंढरीची वारी सुरु झाली. कधी? जेंव्हा या महाराष्ट्रात पशुपालन हाच महत्वाचा उद्योग होता आणि आपल्या राजांना दायभाग आणि कृतद्न्यता व्यअक्त करण्यासाठी हे धनगर-कुरुब-गवळी पंढरीची वाट चालत असत. पुढे सम्राट देव बनला. पण ती वाट थांबली नाही. आजही पंढरपुर जेथे स्थित आहे त्या सोलापुर जिल्ह्यात आणि सीमावर्ती कर्नाटकी प्रदेशात धनगर-कुरुबच बहुसंख्येत आहेत. नंतर जे कुणबी (शेतकरी) झाले तेही या पंढरीच्या रायाची...त्यांच्या प्राचीन सम्राटाची भक्ति आजही त्याच निष्ठेने करत असतात.

वारी पुरातन आहे. आज वारी स्वार्थी झाली असली तरी वारीच्या उद्देश्य एकच तो म्हणजे पंढरीच्या सम्राटाला आपले भागध्येय वाहणे.

नामदेवांनी या परंपरेला भक्तीचे अनावर अधिष्ठाण दिले. नामदेव कारण मुळचे अहिर होते. शिंपी जात ही भारतात सर्वात उशीरा जन्माला आलेली जात. त्यामुळे नामदेवांचे नांव घेत काही जातीय संघटना बनल्यात. पण नामदेव हे एकमेव राष्ट्रीय व्यक्तिमत्व आणि त्याची साक्ष अवघा देशच देत असतो.

नामदेवे रचिला पाया...हेच काय ते सत्य आहे.










Monday, June 18, 2012

बाबासाहेबांचा पराभव कोण करतंय?



खरे तर या विषयावर मी पुर्वीच लिहायला हवे होते. कालच माझे परम मित्र प्रा. हरी नरके आणि शुद्धोदन आहेर यांचे डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्राबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत १७ जानेवारीच्या नवशक्तीतील लेख वाचले आणि असे वाटले कि या विषयावर लिहायलाच हवे. प्रा. नरके यांच्या मते आंबेडकरी चळवळीच्याच समर्थकांना (पळशीकर आणि यादव) उधळुन फेकायच्या कटात आंबेडकरी जनता आपसुक सापडली आहे आणि प्रा. नरके पुढे म्हणतात..."पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकून पितील."

शुद्धोदन आहेरसाहेब म्हणतात...…"जर या व्यंगचित्रातून जातिसंस्था समर्थक संदेश जात असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड ते खपवून घ्यायचे काय? हा मुद्दा चर्चेलाही न घेणारी मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी आहेत काय?"


मी या दोन्ही मतांपार जात माझी निरिक्षणे नोंदवू इच्छितो...

ब्रिगेडने हल्ले केले, तोडफोड केली तर ते तालीबानी असतात...एम. एफ. हुसेनच्या चित्राविरुद्ध तोडफोड करणारे बजरंगदलीय रानटी असतात, टाईम्सच्या कार्यालयावर केवळ एखादी बातमी विरोधातील (आणि म्हणुन ती खोटीच) आली म्हणुन हल्ला करणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे शतृ असतात...तर मग पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करनारे वेगळे कसे ठरतात? आहेर साहेबांनी त्यांचा निषेधच केला आहे हे महत्वाचे आहेच. पण अन्य चळवळीतील म्हनवणा-या संघटना याबाबत मुग गिळुन का गप्प आहेत?

बाबासाहेबांचे व्यंगचित्र अभ्यासक्रमातील पुस्तकात आले. खरे तर राजकीय व्यंगचित्रे उत्तुंग व्यक्तिमत्वांवरच काढली जातात. ऐरे-गैरे हे कधीच व्यंगचित्रांचे विषय नसतात. मागे एकदा टाइम्सने रतन टाटांचे एक व्यंगचित्र प्रकाशित केले होते. टाटांनी त्या व्यंगचित्राचा व टाइम्सचा निषेध केला होता. टाइम्सने त्यांचे पत्र चक्क वाचकांच्या पत्रव्यवहारात छापुन त्यांना त्यांची जागा दाखवुन दिली आणि मुख्य पानावर ते व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध करुन टाटांना सुनावले कि आम्ही गांधीजींची, नेहरुंचीही व्यंगचित्रे ते प्रसिद्धीच्या कळसावर असतांनाही प्रसिद्ध केलेली आहेत. टाटांना असा झटका कोणी दिला नसेल.

खरे तर जेम्स लेन प्रकरणी जी चुक मराठा समाजाने केली तीच चुक काही वाट चुकलेल्या आंबेडकरवादी म्हणवना-यांनी केली. त्यांनी  भांडारकर संस्थेवर कसलाही विवेक न वापरता, सरसकट जबाबदारी थोपवत हल्ला केला... तसाच यांनी पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला केला. फरक काय आहे? आजच्या बुद्धीवंतांना समर्थनच करायचे झाले तर मग दोन्ही हल्ल्यांचे करावे लागेल. पण एकही सुद्न्य विचारवंत तसे करनार नाही. करुही नये.

पण तरीही व्यंगचित्रात जातीयतावाद शोधणे याचा अर्थ असा होतो कि जातीयता इतरांच्या मनातुन जावो-न-जावो-  ती खुद्द आमच्याच मनात जीवंत आहे. प्रत्येक बाबीकडे आम्ही निखळ दृष्टीकोनातुन पाहुच शकत नाही. आम्हीच जातीयवादी आहोत, मग जातीय-अंताची लढाई आम्ही खरेच लढत आहोत काय हाही प्रश्न आम्हाला स्वत:ला विचारावा लागणार आहे.

आम्ही भारतीय नको तिथे भावनाशील असतो आणि हवे तेथे षंढ असतो. हा आमचा हिजडेपणा शतकानुशतके आम्हाला गलितगात्र करत आला आहे. बाबासाहेबांनी या देशाला, या अखिल समाजाला एक नवी दृष्टी देण्याचा अविरत प्रयत्न केला. त्यांच्या अनुयायांनीच बाबासाहेबांना धाब्यावर बसवावे, त्यांची तत्वे पायतळे तुडवावीत...जे महनीय उदात्त व्यक्तित्व...गोतम बुद्ध त्यांनी एक आदर्श म्हणुन स्वीकारावे त्याला कनभरही समजुन न घेता एक नवा तालीबानवाद निर्माण करावा याचे मला वैषम्य वाटते. मग प्रा. नरके म्हणतात त्याप्रमाणे......"पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकून पितील."

मी सहमत आहे.

ज्यांने खरे तर समाजाचे आदर्शभुत होत नवे पायंडे पाडायचे, मोकळ्या मनांची क्षितिजे विस्तारायची. तेच जर असे दहशतवादी होणार असतील तर तेच आंबेडकरवादाचे हत्यारे ठरतील.

माझे नुकतेच "दहशतवादाची रुपे" हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात मी दहशतवाद अपवादानेच या देशात केला आहे असा धर्म म्हणजे बौद्ध धर्म असे म्हटले होते. मला वाटते हे नवबुद्ध मला माझे विधान बदलायला भाग पाडतील. मग ब्राह्मणी दहशतवाद काय, मराठ्यांचा काय आणि आंबेडकरवाद्यांचा काय...आशय एकच असेल...कारणे वेगवेगळी असतील...परिणाम मात्र समान विघातक असतील...आणि त्याची जबाबदारी या बेजबाबदारांनाच स्वीकारावी लागेल. आपण एका सबळ, क्षमाशील आणि व्यापक विचारांच्या समाजरचनेच्या दिशेने निघालो आहोत कि केवळ गतानुगतीकतेच्या वांझ भावनांत रमत आपला भविष्यकाळ उद्ध्वस्त करणार आहोत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर शोधणे आजच्या विचारकांसमोरील आव्हान आहे.

ते विशिष्ट व्यंगचित्र योग्य कि अयोग्य, संयुक्तिक कि असंयुक्तिक, जातीद्वेषाने आहे कि केवळ तत्कालीन स्थितीचे व्यंग-प्रतिबिंब आहे हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. त्यावर अगदी मनमोकळी चर्चा होवु शकते आणि ती व्हावी. गरज नसली तरी व्हावी. काळाची चौकट बदलली असली तरी व्हावी असे वाटत असेल तरी व्हावी.


व्यंगचित्रांचे तत्वद्न्यान आपल्या भारतीय समाजाल कोणीतरी शिकवायलाच हवे!


पण दहशतवाद्यांच्या व्याख्येत बसेल अशी कृती ज्यांनीही केली त्यांचा जाहीर निषेध सर्वप्रथम आंबेडकरवाद्यांनीच करायला हवा. तेच बाबासाहेबांच्या तत्वद्न्यान आणि एकंदरीत व्यक्तित्वाशी सुसंगत असेल. पण ज्याअर्थी तसे झालेले दिसत नाही त्याचाच अर्थ बाबासाहेबांचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला आहे असे म्हणावे लागेल.



Sunday, June 17, 2012

दुष्ट सत्ताधा-यांनो...याद राखा...



पिचलेल्याला पिचलेपणाची, शोषिताला शोषितपणाची आणि अर्धमेल्यांना मेलेपणाची सवय होवून जाते. इतकी कि आपण शोषित आहोत, वंचित आहोत याचेही भान सुटुन जाते. आपल्याही समोर आव्हाने आहेत, आपल्याहीसमोर भव्य-दिव्य स्वप्ने आहेत, आपला इतिहासही षंढांचा नव्हता, आपलेही या सर्वच समाजाला काही योगदान आहे आणि दिले त्यापेक्षा अधिक योगदान देण्याची क्षमता आणि हिम्मत आमच्यातही आहे या जाणीवा पुसण्याचे काम सत्ताधारी वर्ग सातत्याने करत असतो हा सर्व शोषितांचा जागतीक इतिहास आहे. आमचाही इतिहास वेगळा नाही. असूच शकत नाही.

पिचलेल्यांना पिचलेलेच राहु देण्यात सत्तेचे भले असते. त्यांचे भले झाले तर मग यांची मत्ता ती काय राहिली? आशेची गाजरे मग हे कोणाला दाखवणार? कोणाच्या बळावर सत्ता अनिर्बंध सत्ता गाजवणार? मावळचे शेतकरी केवळ आपल्या हक्काच्या पाण्यासाठी भांडतात त्यांना दंगेखोर ठरवणे, गोळ्या घालणे किती सोयीचे असते, नाही? लवासाला निर्लज्जपणे पुण्याचे पाणी वळवत पुणेकरांनाच पाण्याचा सदुपयोग कसा करावा हे शिकवणेही किती सोपे असते, नाही? ज्यांच्या पायपोसाजवळही बसण्याची आजच्या सत्ताधा-यांच्या पुर्वजांचीही लायकी नव्हती ते किती सहजपणे त्या महनियांना आज पायतळी तुडवू शकतात हे ज्यांना कळते त्यांचा आवाजही किती सहजपणे दडपला जावू शकतो, नाही? एखाद्या जातीत एखादा महनीय जन्माला आला होता म्हणुन ती आक्खी जातच श्रेष्ठ आणि त्यांचेच (खरे तर काही त्या-त्या जातीतील लोकांचे) फक्त महामंडलांच्या माध्यमातुन पदांचे तुकडे फेकत भले करायचा भ्रम निर्माण करायचा...म्हनजे आपले कर्तव्य संपले असा भ्रम या राज्यकर्त्यांना आहे, नाही?

कोणाला किती निधी द्यायचा हे शेवटी यांच्याच हातात, जो भांडखोर त्याला अधिक निधी मिळणार हे उघडच आहे. म्हणजे मुस्लिमांचे लांगुलचालन करायचे तर मौलाना अबुल कलाम आझादांच्या नांवाच्या महामंडळाला एवढा निधी द्यायचा कि त्याचे शेवटी काय होते हे विचारायलाच नको. मुस्लिम समाज हा संघटीत आहे असा हिंदुत्ववाद्यांचा लाडका तर्क असतो, पण ते वास्तव कधीच नव्हते, आजही नाही. बुद्धीष्ट समाज संघटीत आहे असे वरकरणी चित्र दिसते पण ते तसे असते तर आज रिपब्लिकनांचे एवढे चिंधीपण झाले नसते. ब्राह्मण समाज तर आज कधी नव्हे तेवढा विस्कळीत आहे. त्यांना एकत्र जर कोणी आणत असेल तर ब्राह्मणद्वेषवाद. तोही तात्कालिक परिप्रेक्षात. तसे ब्राह्मण हिताचे एकही महामंडळ नसावे असा माझा तर्क आहे. पण अशी अनेक जातीय महामंडळे आहेत. कोणत्या ना कोणत्या जातीच्या एखाद्या महनियाच्या नांवाने स्थापन झालेल्या. मला जातीयवादी भुमिकेत जाण्याची मुळीच इच्छा नसल्याने मी त्या महामंडळांची नांवेही घेत नाही. मुस्लिम बांधवांची मी येथे लगोलग क्षमा मागतो. परंतू मानव जीवनोपयोगी उद्योग-व्यवसाय आहेत, म्हणजे आन्नोत्पादन, पशुपालन, चर्मोद्योग, त्यासाठी यांची तरतुद काय आहे बरे? त्यांचा विकास व्हावा कि ज्यायोगे त्या फक्त जातींचा विकास नव्हे तर त्यांच्या उत्पादक कौशल्यामुळे देशाचेही अर्थिक सामर्थ्य वाढावे? डहर (ढोर) समाज, जो चर्मोद्योगाचा आद्य क्रंतिकारी घटक होता, त्याला स्थान कोणत्या सरकारी धोरणात आहे? माझे आव्हान आहे, असेल तर सिद्ध करा...नाहीतर हे सरकार अनुत्पादक, निरुपयोगी संस्थानांवर अब्जावधी रुपये उधळते...ते येथे काय करत आहे? प्रश्न विचारायलाच हवेत. आपण प्रश्न विचारायला थांबतो तेथे आपण हिजडे बनलेलो असतो हे विसरुन चालणार नाही.

साखर उद्योगाचेच घेवुयात. हा उद्योग कोणत्या जातीच्या हातात आहे हे मी सांगायची गरज नाही. साखरेशिवाय अडते असे कधी नव्हते व आताही नाही. ज्वारी-बाजरी उत्पादकांना वेगळा न्याय, आणि या भाकड, जलसंपदा लूटत तरीही आम्ही दरिद्र म्हनणा-यांना वेगळा न्याय हे चित्र नाही कि काय? काय म्हणुन यांना हमी भाव द्यावा? द्यायचा तर तो यथायोग्य पद्धतीने ज्वारी-बाजरी-गहु-हरबरे-भात पिकवणा-यांना द्या कि! पण शेती उत्पादनाचे एक असंतुलन या महाभागांनी करुन ठेवले आहे. हे रस्त्यावर येतात. यांच्या उत्पादनाचा उतारा...(उसाचा) दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, यांच्या उसपीकासाठी बहुमोल जलसंपदा अक्षरशा उधळली जात आहे, त्याची लाज नाही. पझ्ण मोबदला तेवढाच हवा...अगदी चाट्या पिकवुनही...हा कोणता न्याय? हे सहकारी साखरकारखाने तोट्यात जातात आणि मग सरकारच्याच तिजोरीवर डल्ला मारतात, कर्जे बुडवतात...हे अब्जावधीचे नुकसान कशासाठी आहे? कोणासाठी आहे? कोणाची लुट हे लोक करत आहेत? या उसवाल्यांमुळे महाराष्ट्रातील जी अधिकची ४०% जमीन सहज ओलिताखाली आली असते ती येवू शकत नाही...याबद्दल कोण बोलणार? भ्रष्टाचाराचे खरे मुळ हे सहकारी साखर कारखाने आहेत...मी तर म्हणतो...हे एकजात सर्वच बंद केले गेले पाहिजेत.

जीवाची बाजी लावुन आज जे आगरी, कोळी, धनगर, कुणबी असे अनेक समाज घटक रातंदिन कष्ट घेत जगायचा व जगाला जगवायचा प्रयत्न करतात त्यांच्याबाबत सत्ताधा-यांची भुमिका ही फक्त लुटारुपनाची नाही कि काय? आम्हाला हेच लोक कसली लोकशाही शिकवत आहेत? फक्त मते देण्यापुरती? आम्हाला ही एकतर्फी लोकशाही नाकारावीच लागणार आहे.

आम्ही ती नाकारणारच! याबाबत या सत्ताधा-यांनी कसलीही शंका बाळगायचे कारण नाही.

आम्ही मुर्खच नव्हेत तर महामुर्ख आहोत. एकार्थाने जगवायलाच काय जगायलाही नालायक आहोत. आशांवर जगणे, भ्रमात जगणे पुरे झाले. ते आम्हाला धड जगु देत नाहीत तर आम्हीही त्यांचे जीणे हराम करुन टाकु शकतो आणि तेवढी तरी शक्ति आमच्यात नक्कीच आहे. माझे मित्र सागर कुलकर्णी यांनी एक लेख मला पाठवला होता. त्याचा मतितार्थ एवढाच होता कि शेतक-यांनी फक्त आपल्या गरजेपुरते पिकवावे, बाजारात एक अन्नाचा कण विकु नये, धनगर-गवळ्यांनी दुधाचा थेंब विकु नये व मांसासाठी एक बकरा-मेंढा विकु नये...बघा हे सारे दुष्ट एका क्षणात भानावर येतील. हरामखोर समाज आणि सत्ताधा-यांना फक्त हरामखोरीच समजते याबाबत कोणी शंका बाळगायचे कारण नाही. हे अशक्य नाही. आम्ही ते नक्कीच करु शकतो हे जर यांना समजत नसेल तर त्यांच्या सत्तेचा मद क्षणार्धात उतरवता येईल. आम्ही चहाशिवाय लाखो वर्षे जगलो आहोत...साखर तुमची तुम्हीच खात बसा...आम्हाला सामान्य शेतक-याने बनवलेला गुळ चालेल...तोही नाही मिळला तर काय बिघडते? आणि पाच-पंचविस वर्षांपुर्वी काय बिघडले होते? पण महाराष्ट्र म्हणजे साखर उद्योग आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचे उधळपट्टी आम्हाला मान्य नाही. तुमचे पाटबंधारे, क्रुष्णाखोरे लव्हासा इइइइ ज्या आर्थिक लबाडीसाठीचीच प्रकरणे आहेत तीही आम्हाला मान्य नाहीत.

आम्ही तुम्हाला ठिकाणावर अगदी सहजपणे आणु शकतो याचे भान ठेवा. निर्दय तुम्ही आहातच, पण एवढेही निर्दय होवू नका कि आम्हालाही निर्दय होणे भाग पडेल. तुमची निर्दयता आमच्याच मतांच्या बळावर आलेली आहे. आम्हीच निर्दय झालो तर तुम्हाला महाराष्ट्राच्या कणभर जमीनीवरही आम्ही पाय ठेवू देणार नाही याची याद राखा....

Saturday, June 16, 2012

क्लिओपात्रा: ...माझी सर्वाधिक गाजलेली कादंबरी...



माझी आजवर सर्वात गाजलेली, विकली गेलेली कादंबरी म्हणजे "क्लिओपात्रा" ही होय. आजवर तिच्या जवळपास ५५००० प्रती विकल्या गेलेल्या आहेत. सध्या बाजारात एकही प्रत शिल्लक नसून नवीन आवृत्तीचा हट्ट अनेक वाचकांनी धरला आहे. लवकरच नवी आवृत्ती प्रसिद्ध होईल.

क्लिओपात्राकडे मी आकर्षित झालो याला कारण घडले ते म्हणजे माझी हैद्राबादच्या सालारजंग संग्रहालयाला दिलेली भेट. या संग्रहालयात क्लिओपात्राचा अत्यंत सुंदर अर्धपुतळा आहे. अन्य असंख्य ग्रीक कलाकृतींबरोबरच याही पुतळ्याने मला मोहविले. मी पुण्याला आल्यानंतर मग तिचीही माहिती जमा करायला सुरुवात केली. १९९० साली इंटरनेटचा जन्म व्हायचाच होता. त्यामुळे विदेशी संदर्भ साधने मिळवणे ही एक जवळपास अवघड अशेच बाब होती. तोवर क्लिओपात्रावरची शेक्सपियरचीच नाटके उपलब्ध होती. क्लिओपात्रावर इंग्रजीतही कोणी कादंबरी लिहिल्यचे दिसत नव्हते. अशा वेळीस माझ्या मदतीला धावले जयकर ग्रंथालय आणि फर्ग्युसन रस्त्यावरील ब्रिटिश लायब्ररी. येथे मला मुबलक संदर्भग्रंथ मिळाले. अगदी सीझरचे आत्मचरित्रही. जसजसे मी अनेक ग्रंथ वाचत गेलो, एक वेगळीच क्लिओपात्रा माझ्या डोळ्यांसमोर साकार होत गेली.

क्लिओपात्रा नुसती अद्वितीय सुंदरी नव्हती. अत्यंत ध्येयवेडी, यशासाठी प्रसंगी क्रुर होणारी, सत्तेच्या मार्गात कोणालाही आडवे न येवू देणारी, आपल्या सौंदर्याचा स्वार्थासाठी मन:पुत उपयोग करुन घेणारी पण तेवढेच आत्मविव्हळ असनारी क्लिओपात्रा. क्लिओपात्रा या नावातच एक अद्भुत मोहिनी आहे...दोन हजार वर्ष झालीत तिला होवुन, परंतु तिचे अद्भुत सौंदर्य, अचाट बुद्धीमत्ता, तिचे कुटील राजकारण, तिची प्रेम-प्रकरणे शेक्सपियरसारख्या नाटककारांपासुन ते चित्रपटनिर्माते, कवि, चित्रकार यांच्यावर एक गारुड टाकत राहिले आहे. ती होती इजिप्तची सम्राद्न्यी, पराकोटीचा संघर्ष करत तिने सत्ता मिळवली खरी...पण रोमन साम्राज्यवादाला आपण तोंड देवु शकणार नाही हे लक्षात येताच तिने शस्त्र म्हणुन आपल्या सौंदर्याचा मुक्त हस्ताने वापर केला. तिने ज्युलियस सीझर, मार्क अंटोनी आणि सीझरचाच पुतन्या ओक्टोव्हियस सीझर यांना एकामागोमाग एक आपल्या जाळ्यात ओढले...पारतंत्र्य टाळले...पण शेवटी तिने आत्मघात करुन घ्यावा लागला.

प्टोलेमी (७ वा) या ग्रीकवंशीय सम्राटाची ही एक मुलगी, तिचा जन्म सनपुर्व ६९ मद्धे झाला. तिचा भावु प्टोलेमी (८ वा) जरी तिच्यापेक्षा लहान असला तरी महत्वाकांक्षी होता...त्याने क्लिओपात्राचा अडसर नको म्हणुन तिला व एका लहान बहिणीला (आर्सिनी)इजिप्तबाहेर हाकलले...पराकोटीचा यातनादायक विजनवास भोगत तिने प्रथम पोम्पी या रोमन योद्ध्याची मदत घेतली...पण इजिप्तवरचे त्याचे आक्रमण फसले...त्याचा अलेक्झांड्रियाच्या बंदरावर उतरताच खुन करण्यात आला. निराश न होता ती सीझर या महायोद्ध्याच्या प्रेमात पडल्याचे नाटक करुन त्याची मदत घेवुन सम्राद्न्यी बनली. सीझर व तिचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही...सीझरचा रोममद्धे खुन झाला. (या हत्येत तिचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.) मग ती मार्क अंटोनी या सीझर खालोखाल दबदबा असलेल्या वीराच्या प्रेमात (?) पडली...पण सीझरचा पुतन्या ओक्टोव्हियस सीझरचा डोळा इजिप्तवर होता. त्याने आक्रमण करताच अंटोनी क्लिओपात्राच्या बाजुने युद्धात उतरला खरा...पण सौन्दर्याचा वापर सत्तेसाठी करण्यास चटावलेल्या क्लिओपात्राने ओक्टोव्हियसवर जाळे फेकायला सुरुवात केली.. पण हे कळताच व्यथित अंटोनीने आत्मघात करुन घेतला. ओक्टोव्हियस मात्र आपल्या जाळ्यात फसत नाही...इजिप्तचे साम्राज्य वाचत नाही आणि अंटोनीने आपल्यावरील अतीव प्रेमामुळे आत्मघात करुन घेतला आहे हे कळताच तिने स्वता:ला विषारी सापांचा दंश करुन घेउन आत्महत्या केली.

जागतीक इतिहासात असे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व झाले नाही त्यामुळे साहित्यिक-कलावंतांवर तिच्या व्यक्तित्वाची मोहिनी आहे...तिच्या व्यक्तिमत्वाचे पदर वेगवेगळ्या द्रुष्टीकोणातुन उलगडण्याचे असंख्य प्रयत्न झाले आहेत आणि पुढेही होतील.

मी प्रथमच या अलौकिक व्यामिश्र अशा व्यक्तिमत्वावर मराठीत कादंबरी लिहिली. (तोवर बहुदा इंग्रजीतही तिच्यावर कादंबरी नव्हती.) क्लिओपात्राचे व्यक्तिमत्व शब्दांत उतरवणे हे आव्हानच होते. बरे तिचा जीवनपट तसा अवाढव्य...असंख्य आणि तीही भव्यदिव्य व्यक्तिमत्वे...ब्रुटस हा खलपुरुष म्हणुन आपल्याला माहित असला तरी अत्यंत भावनाप्रधान व लोकशाहीवर अतुट श्रद्धा ठेवणारा, सीझरचा मित्र असुनही केवळ लोकशाही सुरक्षित रहावी म्हणुन सीझरवर शेवटचा वार करणारा...यातील सर्वच पात्रे चितारणे एवढे सोपे नव्हते. त्यांच्या, विशेषत: क्लिओपात्राच्या, भाव-भावनांचे कल्लोळ व्यक्त करणे हे एक आव्हान तर होतेच...पण त्याहीपेक्षा मोठे आव्हान होते ते मराठी वाचकांपर्यंत क्लिओपात्रा नीट पोहोचवणे. याचे कारण म्हणजे मराठीत शिवकाळ, पेशवाई काळ ते सरळ रामायण-महाभारतातील कथा/व्यक्तित्वांवरच कादंब-या वाचण्याची सवय असणा-या वाचकांना ही परकीय क्लिओपात्रा कितपत भावेल अशी शंका मला व माझ्याहीपेक्षा माझ्या प्रकाशकाला होती.

पण क्लिओपात्राने इतिहास घडवला. न. सं. इनामदारांसारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीलेखकानेही या कादंबरीचे जाहीर कौतुक केले. जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी या कादंबरीची परिक्षणे प्रसिद्ध केली. हजारेक प्रतींच्या आवृतीची सवय असलेल्या मराठी प्रकाशन विश्वाला दहा-दहा हजार प्रतींची आवृती असू शकते हे क्लिओपात्राच्या निमित्ताने कळाले.  ही कादंबरी वाचुन अनेकांनी इजिप्तला भेटीही दिल्या व आधी आणि आल्यावरही माझ्याशी संवादही साधला आहे.


हे यश अर्थात माझे नसुन क्लिओपात्रा या अनवट गुढाला आहे. ही कादंबरी लिहुन मी मराठीत परकीय इतिहासाच्या पार्श्वभुमीवर आधारीत कादंबरीलेखनाची मुहुर्तमेढ रोवली, याचाही मला अभिमान अर्थातच आहे.



-संजय सोनवणी

Wednesday, June 13, 2012

नवीन लेखकांसाठी...


श्री. प्रशिल पाझारे या माझ्या मित्राने पुस्तक प्रकाशन व Copyrights संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. सर्व होतकरु लेखकांना उपयोग होईल म्हणुन मी येथे त्या प्रश्नांची उत्तरे देत आहे.

१. कोपीराइट म्हणजे काय? यालाच लेखकाचे स्वामित्व अधिकार म्हणतात काय?

- होय. copy right  शब्दाचा हाच मराठी अर्थ आहे. लेखक जे सृजन करतो ते प्रसिद्ध/प्रकाशित होताच लेखकाचे त्या कृतीवर स्वामित्व अधिकार आहेत असे मानले जाते. अनेक लेखक Indian Copyright Act 1957 अन्वये आपल्या लेखनाचे स्वामित्व अधिकार पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी नोंदवुन घेतात. विशेषत: इंग्रजीत लिहिणारे लेखक. प्रादेशिक भाषांतील लेखक जवळपास या भानगडीत पडत नाहीत. याचे कारण म्हणजे मर्यादित बाजारपेठ. नोंदणीची खर्चीक प्रक्रिया. शिवाय लेखन प्रसिद्ध होताच आपोआप लेखकाकडेच स्वामित्वाधिकार येत असल्याने समजा उद्या कोणी त्यातील कथेची, भागाची चोरी केली तरी कायदेशीर अधिकार सुरक्षेत असल्याने असे चौर्य करणा-या व्यक्तीला (दुस-याचे लेखन जसेच्या तसे वा काही भाग बदलत) न्यायालयात खेचु शकतो.

२. लेखकाने आपली कोणतीही रचना प्रकाशित करतांना कोणती काळजी घ्यावी?

-येथे आपण स्वत: प्रकाशित करत आहोत कि प्रकाशकामार्फत यावर आधी चर्चा करुयात. समजा स्वत: जरी प्रकाशित करत असाल तर नेहमी अशा स्वयं-प्रकाशकाकडुन साधारणपणे खालील चुका हमखास होतात ज्या टाळायला हव्यात.

अ. लेखनाचे संपादन त्या त्या क्षेत्रातील माहितगाराकडुन करुन घ्यावे. केवळ ओळखीचा आहे म्हणुन नको.. त्याच्या सुचनेप्रमाने बदल, पुनर्लेखन करावे...यात कंटाळा करु नये.
ब. पुस्तकाचा आकार (डेमी अकि क्राउन...)तो ठरवावा. यासाठी मुद्रकाचे मार्गदर्शन घ्यावे.
क. पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे पुस्तकांचीच कव्हर्स करतात अशाच चित्रकाराकडे ते काम द्यावे. आधी त्याला ३-४ नमुना चित्रे बनवुन द्यायला सांगुन, त्यातील निवडुन मगच सुचना करत अंतिम चित्र बनवायला सांगावे.
ड. छपाई व पुस्तक बांधणी आजकाल सर्वच मुद्रक करत असल्याने ज्याला पुस्तके छापण्याचा अनुभव आहे अशाच मुद्रकाला छपाईचे काम द्यावे. तत्पुर्वी मुखपृष्ठ व आतील कागदाबाबत निर्णय घ्यावा. बाजारात विविध किंमतींचे/दर्जाचे कागद उपलब्ध असतात. ती माहिती व आपण कोनत्या प्रकारचे कागद वापरायचा याचा निर्णय घ्यावा.

हे सर्व करत असतांना, किंबहुना प्रकाशन करण्यापुर्वीच आपण आपले पुस्तक कसे विकणार याचा विचार करायला हवा. एकच पुस्तक असेल तर ते वितरण करण्याचाच खर्च मोठा. वसुली जवळपास अशक्यप्राय असते हे येथे लक्षात घ्यावे. अधिक कमिशनने पुस्तके घेवुन विकनारे काही विक्रेते आहेत....पण मग ते किमान ८५ ते ९०% कमिशन मागतात. शिवाय संपुर्ण आव्रुत्ती (जी मराठीत १०००चीच असते) विकत घेत नाहीत. त्यामुळे स्वत:च्या मित्र-परिवारात/ओळखीत आपण किती प्रती विकु शकतो याचा किमान अंदाज घ्यायला हवा. आपले पुस्तक बेस्ट सेलर असणार हा विश्वास प्रत्येक लेखकाचा असतो, पण ते वास्तव नसते.

समजा तुम्हाला अन्य व्यावसायिक प्रकाशकाकडुन पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर:

अ. आपल्या लेखनाचा विषय कोणता, तशा विषयाशी संबंधीत पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशक कोनते याची माहिती घ्यावी व त्यांनाच हस्तलिखित पाठवावे. मुळ प्रत कटाक्षाने आपल्याकडेच ठेवावी.
ब. प्रकाशक निर्णय द्यायला भरपुर वेळ घेतात. त्यांच्याकडे आधीच हस्तलिखिते भरपुर येत असतात. त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला तर तुमचे पुस्तक प्रकाशित न होण्याचाच धोका असतो. प्रकाशक एकतर स्वत: वाचतो वा अन्य तद्न्यांकडुन वाचुन घेवुन अभिप्राय घेतो. त्यासाठी त्याला पुरेसा अवधी देणे आवश्यक असते.
क. तुमचे हे पहिलेच पुस्तक असेल, तुमचे अन्य क्षेत्रातही नाव प्रसिद्ध नसेल तर प्रकाशक स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित अत्यंत अपवादात्मक स्थितीत करतात. (आत्मचरित्र, चरित्र ई. प्रकारांत ही शक्यता फारशी नसते...पण मग त्या लेखनात ताकदही तेवढीच हवी.) एक तर ते पुस्तक प्रकाशित करायला नकार देतात वा लेखकाकडे १००% ते किमान ५०% प्रकाशन खर्च उचलण्याची अपेक्षा बाळगतात. मराठीत पुस्तक कितीही (कथा-कादंबरी) कितीहे चांगली असली तरी पहिली आवृत्ती संपायला किमान ३ वर्ष लागतात. भरपुर प्रसिद्धी केली तरी दीड वर्ष लागते. कवितांना बाजारपेठ नाही. त्यामुळे प्रकाशक नवीन लेखकांत आपली गुंतवणुक करणे शक्यतो टाळतात.
ड. प्रकाशकाशी, ज्याही अटींवर पुस्तक प्रकाशित केले जाणार असेल, त्या अटी-शर्तींचा करार करावा. प्रकाशक ओळखीचा असेल तर तसे करण्याची गरज नाही...उदा. मी आजतागायत एकाही प्रकाशकाशी करार केलेला नाही.
इ. लेखकाला (कथा-कादंबरी-आत्मचरित्रात्मक लेखक) मानधन (पहिले ते किमान पाचवे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत) मिळत नाही. लेखनावर मराठीत कोणी लेखक जगु शकत नाही. लेखकाच्या म्हणुन १५ प्रती देण्याची प्रथा अहे. पुढे प्रती लागल्यास त्या विकत घ्याव्या लागतात.
फ. पहिली आवृत्ती संपल्यानंतर प्रकाशकाला पुढील आवृत्ती काढण्याची लेखकाची परवानगी घ्यावी लागते. समजा लेखकाला प्रकाशक बदलायचा असला तर त्यानेही प्रकाशकाची परवानगी घ्यायला हवी.

कोणत्या मार्गाने जायचे हे प्रत्येक लेखकाने ठरवायला हवे.

३. प्रकाशनाचे सर्वाधिकार तो करार पद्धतीने विकू शकतो काय? त्याची गरज काय?

- तो नक्कीच विकु शकतो. अर्थात तुम्ही नवलेखक असाल तर तसे सर्वाधिकार मुळात कोणी विकत घेणार नाही. प्रसिद्ध लेखक आर्थिक कारणांमुळे वा नंतर कोणी वारसच नसेल तर सर्वाधिकार विकतात. उदा. जी. ए. कुलकर्णींनी आपल्या सर्वच साहित्याचे सर्वाधिकार विकले होते.

४. आय.एस.बी.एन. (ISBN) बद्दल आपण विचारले आहे. या पत्त्यावर त्यासाठी अर्ज करावा लागतो. Raja Ram Mohan Roy National Agency for ISBN, West Block - 1, Wing-6, 2nd Floor, Sector - 1,R.K. Puram, New Delhi - 110 066.
 या दुव्यावर अर्जाचा नमुना आहे. http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/isbnproforma-revised.pdf

आय. एस. बी. एन. चा विस्तार "इंटरन्यशनल स्ट्यंडर्ड बुक नंबर" असा होतो. जगभर प्रसिद्ध होना-या पुस्तकांची स्वतंत्र ओळख असावी म्हणुन हा नंबर घेतला जातो. यासाठी कोणीही (लेखक, प्रकाशक, शैक्षणिक संस्था ई.) अर्ज करु शकतो. यासाठी संस्था कसलाही चार्ज आकारत नाही.

५. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सारी सव्यापसव्ये करण्यापुर्वी आपल्या लेखनाचा दर्जा खरोखर कसा आहे याचे तटस्थ मुल्यांकण करता आले पाहिजे अथवा अन्य वाचकांची मते विचारात घ्यायला पहिजे. नंतरच या कामाला लागावे, अन्यथा पैसे व वेळ वाया जाण्याचीच शक्यता अधिक असते.

फरसा खर्च करायचा नसेल तर ई-बुक हा सध्यचा आधुनिक प्रकाशन प्रकार आलेला आहे. अजुन तो एवढा व्यापक झाला नसला तरी भविष्यात ई-बुक्सची मागणी वाढेल असे तद्न्यांचे अंदाज आहेत.

माझ्या मते मी बहुतेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत व ती सर्वच नवलेखकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे. तरीही कोणला अजुन काही शंका असल्यास नि:संकोचपणे विचाराव्यात. मी यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल.

Sunday, June 10, 2012

मी इश्वर आहे!


हा लेख केवळ एक सांगायचे म्हणुन. एका मित्राने माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना विचारले कि "तुम्ही "God" वर विश्वास ठेवता का?" तेही एका शब्दात...हो अथवा नाही. मी नाही असे लिहिले. ते खरेच आहे. या यच्चयावत विश्वात मनुष्यावर पुजा-प्राथना-यद्न्यादि कर्मकांडाने संतुष्ट होईल आणि तुमच्याबाबत दयाळु अथवा शापाळु देव/परमेश्वर मुळात कधी अस्तित्वातच असु शकत नाही. हे मी माझ्या ब्रह्मसुत्र रहस्य या ग्रंथात अधिक स्पष्ट केले असले तरी त्याबाबत येथे थोडेसे.

मी जेंव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवत असतो तेंव्हा तो केवळ आणि केवळ माझ्यावर विश्वास ठेवत असतो कारण मीच परमेश्वर आहे. मीच देव आहे.

माझ्याबाहेर कोणीतरी देव आहे आणि तो माझ्यावर सत्ता चालवतो, आपल्या इच्छेनुसार माझे जीवन घडवतो हे मला मुळीच मान्य नाही. मुळात असा इश्वर अस्तित्वातच असु शकत नाही ही माझी खात्री आहे. मी का मी आहे आणि मी तसा का नाही हे फालतु प्रश्न मला कधीच पडत नाहीत कारण मी एक वैश्विक अपघातातुन निर्माण झालेली व्यक्ती आहे. त्यामागे कोणाचे काही नियोजन वा पुर्वप्रयोजन होते असे मानत नाही कारण मुळात ते वास्तव नाही.

मी कोणताही धर्म मानत नाही. धर्म हे मानवाला गुलाम करण्याचे पुरातन साधन आहे. मी सर्वच धर्मांची चिकित्सा करतो ते त्यांची मानवी जीवनातील वास्तव स्थाने दर्शवण्यासाठी. वस्तुत: तत्वद्न्यान नाही तोच धर्म असतो आणि ज्यालाही तत्वद्न्यान आहे ते धर्म नसुन गुलामीच्या बेड्या आहेत असेच मी मानतो.

मी आहे म्हणुन हे विश्व आहे. मी नसेल तेंव्हा हे विश्व अस्तित्वात असणार नाही. मी एक भ्रम आहे म्हणुनच हे विश्वही एक भ्रम आहे. हे विश्व आणि मी एकच असुन मी आहे म्हणुन विश्व आहे यावर माझा विश्वास आहे. विश्वाने मला निर्माण केले नसुन मीच माझ्यासाठी हे विश्व निर्माण केले असल्याने परमेश्वर मीच आहे.

प्रत्येक जीवमात्र ते जडवस्तुंसाठी हेच अंतिम सत्य आहे. कारण त्या जडवस्तुही मीच आहे आणि सजीवही मीच आहे.

काळ हा पुढुन मागे येतो आणि आम्ही मागुन पुढे जातो. तेंव्हा भुतकाळ हा फक्त भावनीक-मानसीक असुन काळ ही राशी अंतर्विरोधाने भरलेली आहे. काळाचे अस्तित्व आहे म्हणुन आम्हाला जीवंत असल्याचा आभास मिळतो...पण आम्ही जीवंत आहोत असे मुळात कशावरुन? काळ ही राशी वजा केली तर आम्ही जीवंत नसुन फक्त आभास आहोत एवढेच सत्य प्रतीत होते.

पण आम्ही जीवंत आहोत अशा भासात का होईना आम्ही आहोत तर मग तो भासमय काळही आम्हीच आहोत आणि आम्हीच महांकालेश्वर आहोत.

मी महांकालेश्वर आहे कारण माझा माझ्या परिप्रेक्षातील काळ मीच आहे. तुम्ही तुमच्याच काळाच्या सीमेत आहात. तुम्ही तुमचे इश्वर आहात तर मी माझा इश्वर आहे.

काळ पुढुन मागे येतो कि मागुन पुढे जातो याची चर्चा कशाला?

कारण त्याचे अस्तित्वच मुळात भासात्मक आहे.

तेंव्हा मीही भासात्मक आहे...तुम्हीही भासात्मक आहात...आणि इश्वर हाही एक भास आहे.

मी इश्वर आहे.

Saturday, June 9, 2012

खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?


यावज्जीव मनुष्य प्रयत्न करत असतो तो आहे या स्थितीपासून स्वातंत्र्य मिळवत अधिकाधिक मानसिक/आर्थिक आणि सत्तेचे अधिकाधिक अवकाश प्राप्त करण्यासाठी. आहे ती स्थिती सुखावह न वाटणे हे मानवी मनाचे एक अव्यवछेदक लक्षण आहे. मग ती स्थीती कोणतीही असो. एकपट धन असणारा दुप्पट धनाची अपेक्षा बाळगत असतो हे पुरातन औपनिषदिक विधान या परिप्रेक्षात ध्यानात घ्यावे लागते.  याला "हाव" हा शब्द पुरेसा नसून तो मानवी मनोभुमिकेवर अन्याय करणारा आहे. खरे तर आपले स्वातंत्र्य, आपले अवकाश सीमित न राहण्यासाठी, किमान ती टिकुन राहण्यासाठी रक्षणात्मक अशी जी आर्थिक/सत्तात्मक/ धर्माधारीत तरतुद मनुष्यमात्र करत असतो, वा स्व-वाच्छित व्यवस्था बनवण्याच्या नादाला लागलेला असतो त्यालाच आपण मानवी स्वातंत्र्याचा अविरत चालत असलेला संघर्ष म्हणतो. परकीय सत्तांशीचा स्वातंत्र्य संघर्षही खरे तर याच मुलभुत भावनांच्या विकारांवर आधारीत असतो. परंतू वैश्विक परिप्रेक्षात स्वकीय आणि परकीय अशी मुळात तरतुदच नसते. जे स्वकीयांच्या म्हणुन स्वातंत्र्याच्या बंडात असतात तेच आपापल्या व्यवस्थेतीलही पारतंत्र्याच्या भावना देणा-या कथित परकियांच्या विरुद्ध पवित्र्यात उभे राहायला सज्ज होतांना दिसतात. त्यामुळे स्वकीय आणि परकीय या शब्दांना जरा तारतम्यानेच घ्यावे लागते.

भारतावर शक, हुण, कुशाणांनी अनेक शतके राज्ये केली. ते तसे परकीयच होते. ग्रीकांनीही काही काळ सीमावर्ती प्रदेशांवर शासन केले. ते येथे असे मिसळुन गेले कि आज त्यांचे स्वतंत्र आस्तित्व दाखवता येणे अशक्यच आहे. मुस्लिमांनी (यात अनेक वंशीय मुस्लीम होते...तुर्क, पर्शियन ते मोगल) भारतावर अनेक शतके सत्ता गाजवली. ते परकीय आहेत, अन्यायकर्ते आहेत म्हणुन राजपुतादिंनी त्या सम्राटांना आपल्या कन्या देण्यात अनमान केल्याचे दिसत नाही. किंबहुना मोगल साम्राज्य टिकण्यात राजपुतांचा मोठाच वाटा होता हे अमान्य करता येत नाही. याची सांस्क्रुतीक परिणती अशी झाली कि मोगल हे रक्ताने जवळपास ७५% भारतीय बनले. याची खंत शाह वलीउल्लाह सारख्या धर्मांध व्यक्तीला एवढी पडली होती कि १७३६ ते पुढेही त्याने भारतातील मुसलमान अजलाफ (हीण) काफिर झाले असुन शुद्ध इस्लाम आणायचा असेल तर जिहाद करायला हवा आणि हा जिहाद शुद्ध इस्लामी रक्ताचाच मनुष्य करु शकतो असा प्रचार करत त्याने भारतावर आक्रमण करण्यासाठी नादिरशहा ते नंतर अब्दालीला प्रेरीत केले. किंबहुना १८५७ च्या बंडाची प्रेरणाही शाह वलीउल्लाहच्या तत्वद्न्यानात होती हे शेषराव मोरेंनी सिद्ध करुन दाखवलेच आहे.

थोडक्यात शाह वलीउल्लाहलाही भारतीय मुसलमान आपले नाहीत, स्वकीय नाहीत म्हणुन भौगोलिकद्रुष्ट्या परकीय पण धार्मिक द्रुष्ट्या स्वकीय वाटल्या अशा मुस्लिम सत्तांना आक्रमणाचे निमंत्रण द्यावे वाटले. त्यातून जो इतिहास घडला तो आपणा सर्वांना माहितच आहे. नाझी हिटलर जर द्वितीय महायुद्धात जिंकला असता आणि सुभाषबाबुंनी भारत जिंकला असता तर आजचा आपला वर्तमान खुप वेगळा असता...किंबहूना हे लिहायला मी एक्तर जन्माला तरी आलो नसतो वा कधीच मारला गेलो असतो. अर्थात इतिहासात जर-तरला विशेष स्थान नसते हे खरे आहे. परंतु या "जर-तर" वर आधारीत वैचारिक सिद्धांत मांडणा-यांची कमतरता नसते. -अगा जे झालेची नाही त्याची वार्ता कशाला- हे या मंडळींना बहुदा माहित नसते. गांधीजींना नथुरामने ठार मारले नसते तर....असे बावळट सिद्धांत मांडत त्यांच्या हत्येची भलामन करणारे नथुरामी या देशात आजही खुप आहेत. हिटलर मेला असला तरी त्याची मानसिक गुलामी करणारे कथित आर्यवादी या देशात कमी नाहीत.

स्वकीय आणि परकीय या तर्तुदी परिस्थितीसापेक्ष बनत जातात त्या अशा. हिटलर परकीय असला तरी तो स्वत:ला व जर्मनांना आर्यवंशीय मानत असल्याने तो येथील आर्यवाद्यांना आपला वाटतो तो असा. पण हा तीढा दिसतो तसा सोपा नाही. मानवी प्रेरणा याच मुळात कोणत्या ना कोणत्या गुलामीत राहण्याच्या असतात कि काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सर्व तरतुदींमागे मानवी स्वार्थांच्या अविरत मशाली तेवत असतात...भडकत असतात. स्वातंत्र्यात असणारेही कोणत्यातरी पारतंत्र्याच्या भावनेत असतात...कोणी धार्मिक पारतंत्र्याच्या भावनेत असतो तर कोणी राजकीय. कोणी प्रांतीय सापत्नभावाच्या भावनेत असतो तर कोणी आर्थिक... कोणी जातीय...परस्पर संघर्ष एवढा तीव्र होत असतो कि शेवटी कोणीच स्वकीय नाही हा साक्षात्कार घेत मानसिक नैराश्याचे बळी होतांना दिसतात.

पण मुळात स्वातंत्र्याचा अर्थच कळालेला नसल्याचे हे लक्षण आहे. मुळात निसर्गाने प्रत्येक मानवाला एक स्वतंत्र असे व्यक्तित्व बहाल केले आहे ते विसरत कोणत्या तरी विचारसमुहाचा गुलाम होण्यात मानवाला धन्यता वाटत असते हे आपण सहज निरिक्षण केले तरी पाहु शकतो. या सर्व दबावांपासुन दुर रहात आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणारे नसतात असे नाही...पण ते कितपत यशस्वी होत असतात?

मुळात मानवी जीवनधारणांचा नेटका अर्थ न समजल्याचे लक्षण म्ह्णजे कोनत्या ना कोणत्या विचार व्युहाची वा सत्तेची (मग ती र्थसत्ता असो कि धर्मसत्ता, संस्कृतीसत्ता असो कि राजसत्ता...) मानसिक गुलामी. या गुलामीमुळे मानव अनेक न पटणा-या गोष्टीही एक तडजोड म्हणुन करत जात गाळात रुतत जातो. किंबहुना तसे केले नाही तर आपल्याच अस्तित्वावर गदा तर येणार नाही ना असा प्रश्नही त्याला छळत असतो. एकार्थाने प्रत्येक व्यक्ती एक दुभंग जीवन जगत असतो. खाजगीत तो जे बोलु शकतो ते जाहीरपणे व्यक्त करायला त्याला एक तर जमत नाही वा खोटी नांवे घेत त्याला स्वता:ला वाचवण्यासाठी अभिव्यक्त व्हावे लागते. पण मग ती अभिव्यक्ती खरी कशी?  त्याचे अस्तित्व खरे कसे? "को अहम", मी कोण आहे? हा प्रश्न त्याला तरीही छळत असेल तर मग प्रतिप्रश्न असा आहे कि त्याने खरेच स्वत:ला समजुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे काय? इतरांनी लिहिलेली तत्वद्न्याने वाचुन वा ध्यानधारणादी करुन "मी कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर जर मिळाले असते तर आजवर यच्चयावत विश्वातील लोकांना ते सत्य समजलेही असते. ते समजत नाही याचे कारण म्हणजे मुळात तत्वद्न्याने हीच मानसिक गुलामी निर्माण करण्यासाठी निर्माण होत असतात याचे आपले भान सुटलेले असते.

मनुष्य जन्मता:च एक संघर्षरत प्राणी आहे. निसर्गाने त्याला असंख्य जीवनावश्यक व स्वसंरक्षक साधने जी अन्य प्राणिजातीला बहाल केली आहेत ती नाकारलेली आहेत. त्यामुळेच डोनिकेनसारखा अभ्यासक मनुष्य हा मुळचा या भुतलावरील नाहीच अशी साहसी विधाने करत असतो. मनुष्याला आहे ती अपार बुद्धी आणि तीचेही वितरण सर्वच मानवप्राण्यात समान नाही. तिची मुक्त-स्वतंत्र वाढ होवू नये याचीही तरतुद माणसानेच धर्म/राज/अर्थसत्तेच्या रुपाने प्राचीन काळापासून करुन ठेवली आहे. "प्रश्न विचारु नका" अशी तंबी धर्मसत्ता देते तर कायद्याचा सन्मान करा असे कायदा बनवणारे धमकावतात. अर्थसत्ता तर शोषणासाठीच असते.

मग माणसाच्या संघर्षाचे परिमाण केवळ निसर्ग वा नियतीशीच्या संघर्षाशी मर्यादित रहात नाही तर तो संघर्ष मानवनिर्मित पारतंत्र्याशी येवून ठेपतो. असंख्य लोक यालाच नियती मानत तिचा निमुट स्वीकार करत जातात आणि आहे त्या बंदिस्त स्वातंत्र्यालाच मन:पूत स्वातंत्र्य समजतात तर असंतुष्ट लोक याहीपेक्षा अधिक चांगली स्थीति आणण्यासाठी बंडे पुकारतात. अव्यवस्थेत नवी अव्यवस्था आणु पहाणा-या या स्थित्या मानवाला दिल्या गेलेल्या बुद्धी नामक एकमेव हत्त्याराचे असे वाटोळे करत जातात. पण नैसर्गिक व्यवस्थेचे आपणच हत्या केली आहे याची जाण व भान मानवी समुदायाला रहात नाही. आपण बुद्धीचे विकसन करत चाललो आहोत कि अध:पतन यावर आपण कधी विचार करतो? आपण सुखकर जीवनासाठी संघर्ष करत, सतत संघर्षरत रहात अंतत: कोणत्या श्रेयाच्प्रत पोहोचत आहोत? थोडक्यात मानवजात सुखी नसेल, पण किमान समाधानी तरी आहे काय? कि आता हा प्रश्नच कालबाह्य झाला आहे? उदा. कल्यानकारी राज्याची संकल्पना आपण सोडुन दिली आहे. आपणच नवनवे कायदे आनण्याची मागणी करु लागलो आहोत. याचा अर्थ आपल्याला स्वत:चे स्वातंत्र्य जखडुन टाकणा-या यंत्रणेचीच कास धरावी वाटु लागलेली नाही कि काय?

आजचा माणुस हा मुळात मानवी व्यवस्थेचा अपरिहार्य गुलाम आहे. स्वकीय आणि परकीय ही त्याची टोळी काळातील आदिम भावना आजही पुरेपूर जीवंत आहे. किंबहूना छपुन राहुनही अभिव्यक्तिचे असंख्य मार्ग आज उपलब्ध झाल्याने ती बळावतच चालली आहे असे दिसते. या परिप्रेक्षात मानवी स्वातंत्र्य हे जसे विस्तारीत व्हायला हवे होते तसे न होता ते मात्र उलटपक्षी अधिकाधिक संकोचायला लागले आहे आणि याची समाजशास्त्रीय काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

संघटनांचे म्हणावे तर त्या मानवी स्वातंत्र्याचा विस्तार घडवून आणण्याचा अविरत प्रयत्न करणा-या विविध परिप्रेक्षातील मानवी समुदायाच्या संस्था असाव्यात असाच मुळात "संघटना" या शब्दाचा अर्थ आहे. जे आहे त्या जातीय/वंशीय/धर्मीय/आर्थिक/राजकीय आणि सामाजिक अवकाशापेक्षा व्यापक अवकाश मिळावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी असतात/असाव्यात. अंतिम उद्देश्य हा अवकाशांचे विस्तारीकरण करत एकूनातीलच मानवी समाजासाठी ते उपयुक्त व्हावे आणि इतरांची अवकाशेही स्वीकारत जात एकजीव अवकाश निर्मान व्हावे हा असावा.

परंतू प्रत्यक्षात मात्र संघटना या प्राय: स्वता:चे, स्वता:च्या अनुयायांचे अवकाश नुसते सीमितच नव्हे तर संकोचत नेण्यात धन्यता मानत जातात हे एक वास्तव आहे. ही एक वंचना असते. या वंचनाखोरांच्या बहुलतेमूळे आजच्या सर्वच जागतीक समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. पारतंत्र्य हे फक्त राजकीय नसते. त्याची परिमाणे असंख्य असतात. पण आपापल्या अनुयायांना या सर्वच संघटना (यात राजकीय पक्ष ते अगदी एन.जी.ओ. ही आले) या पारतंत्रातून बाहेर काढण्यास राजी नसतात कारण त्यांना अनुयायांना पारतंत्र्यात ठेवत थोडके का होईना स्वताचे स्वतंत्र अवकाश हवे असते. त्यासाठीच सारा आटापीटा चालू असतो. विचारांच्या कोलांटउड्या कराव्या लागतात...भागही पडते...कारण ती त्यांची त्यांच्या पारतंत्र्याची एक अपरिहार्य गरज असते...आणि म्हणुन भावनीक लाटेवर स्वार झालेल्या अनुयायांचीही.

पण अनुयायांचाही कधी ना कधी भ्रमनिरास होतो...संघटना फुटत जातात...राजकीय पक्ष फुटत जातात...आर्थिक संस्थाही फूटत जातात...

पण ज्यासाठी मुळात हा सारा मानवी संघर्ष सुरू असतो...ते म्हणजे स्वातंत्र्य...ते कोठे असते?

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? कशासाठी आहे? मनुष्याचे एकमेव हत्यार, जे निसर्गाने त्याला दिले, ती म्हणजे बुद्धी, तीच जर बंदिस्त व्युहात गेली असेल...आम्ही म्हणतो तसाच विचार करा अशी धर्माद्न्या/राजाद्न्या/अर्थाद्न्या असेल आणि ती अगणित गुलाम स्वेछेने पाळत असतील तर माणसाला बुद्धी नावाचे हत्त्यार/साधन आहे हे कसे मानायचे? आणि नव्य विचार करतात असे म्हननारेही जर नवे बंदिस्त अवकाश (मग ते जातीचे असो कि धर्माचे, राजकीय व्यवस्थेचे असो कि अर्थव्यवस्थेचे) निर्माण करण्याच्या नादी लागणार असतील तर खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?

Friday, June 8, 2012

रा. स्व. संघाच्या हिंदुत्वाचे कवित्व!




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डा. केशव बळीराम हेडगेवारांनी नागपुर येथे १९२५ साली केली. हेडगेवार हे मुलत: सशस्त्र क्रांतीचे समर्थक असले तरे नंतर त्यांच्या लक्षत आले कि या खंडप्राय देशात सशस्त्र क्रांती अशक्यप्राय आहे. बाळासाहेब देवरसांनी आपल्या आत्मचरित्रात लिहुन ठेवले आहे कि हेड्गेवारांनी अनेक तरुणांना भगतसिंगाचा मार्ग चोखाळण्यापासुन परावृत्त केले. रा.स्व. संघ हेडगेवारांच्या काळापर्यंत (१९४०) तरी एक आदर्श संघटना होती असे म्हणता येते. म. गांधींनीही या संघटनेची तारीफ केलेली इतिहासात दिसते. परंतु गोळवलकर गुरुजी १९४० मद्धे सरसंघचालक झाले तसे या संघटनेचे खरे दात दिसु लागले.
माधव स. गोळवलकरांचा जन्म  १९०६ साली झाला. म्हणजे ते सरसंघचालक झाले तेंव्हा अवघ्या ३४ वर्षांचे होते.   त्यांचा "Bunch of Thoughts" (विचारधन) प्रसिद्ध असुन हा ग्रंथ म्हणजे गोळवलकर गुरुजींनी दिलेल्या विविध भाषणांचा संग्रह आहे. हा ग्रंथ मला १९८६ साली संघवाल्यांनी भेट दिला. निमित्त होते माझा नुकताच प्रसिद्ध झालेला "Ancient Aryans Thought on Religion"  हा प्रबंध. मला या मंडळीने संघ परिवारात खेचण्यासाठी असंख्य प्रलोभने दाखवली. परंतु जेंव्हा मी इतिहास संकलन समितीच्या पुण्यातील प्रमुखशी भेटलो व त्यांनी मला सुचवले कि "आर्य बाहेरुन आले नाहीत" हे तुमचे या प्रबंधातील मत मागे घ्या...आम्ही ते प्रसिद्ध करतो,..." एका क्षणात माझे डोळे उघडले. संघवादी हे वंशवादी आहेत हे मला समजले. मी गोळवलकर गुरुजींचे विचारधन मग काळजीपुर्वक वाचले. लोक संघाच्या नादी का लागतात याचीही कारणे समजली. बहुजनांतील नव्याने जन्म घेवु पाहणारे विचारवंत यांचे फुल-टायमर कार्यकर्ते बरोबर कसे हेरतात, त्यांना आपल्या कच्छपी कसे लावतात, कशी आमिषे दाखवतात, तारीफांचे पुल बांधत त्यांना कसे आकर्षित करतात ही त्यांची कार्यप्रणालीही लक्षात आली. हे आजही थांबलेले नाही.
रा,स्व. संघ सावरकरांसारखा फक्त हिंदुत्ववादी नसुन वंशवादी आहे हे सत्य आधी समजावुन घ्यायला हवे. त्यांनी जरी वरकरणी हिंदु धर्माचा बुरखा घेतला असला तरी ते मुळात वैदिक व आर्यवादी आहेत. आर्य बाहेरुन आले व तेच आद्य आक्रमक असुन येथील संस्कृतीचे खरे निर्माते होत असा त्यांचा लाडका सिद्धांत आहे. हिंदु धर्म नव्हे तर "वैदिक धर्म, वैदिक सिद्धांत, वैदिक  संस्कृती" हे त्यांच्या तत्वद्न्यानाचे कळीचे मुद्दे आहेत. आर्य बाहेरुन आले हा सिद्धांत राजकीय दृष्ट्या अडचणीचा ठरतो हे लक्षात आल्यावर गोळवलकर गुरुजींनी "पुरातन काळी उत्तर धृव वाराणशी येथे होता" असा दीव्य सिद्धांतही मांडला होता. नशीब तेंव्हा हा भारत देश अवकाशात लटकत होता असे ते म्हणाले नाहीत.
संघाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेण्याचे पुर्णपणे नाकारले. हेदगेवारांनी किमान स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला हे वास्तव असले तरी गोलवलकरांनंतर मात्र ती प्रक्रिया पुर्ण थांबली. याचे मुख्य कारण म्हणजे तत्कालीन मान्य नेते गांधी हे ब्राह्मण नव्हते...कथित वैदिक आर्य नव्हते. त्यांचे नेतृत्व मान्य करणे वैदिक वाद्यांसाठी अशक्यप्राय अशी बाब होती. मनुस्मृती हेच स्वतंत्र भारताचे कायद्याचे आदर्श पुस्तक असेल असे गोळवलकर गुरुजी, सावरकरांच्या पावलावर पावुल ठेवुन म्हनत असत.
दुसरे महत्वाचे असे कि गोळवलकरांचा लोकशाहीवर कधीच विश्वास नव्हता. या संघटनेची आजही "घटना" नाही. ती करण्याची आश्वासने या संघाने सरकारला वारंवार दिली असली तरी ती कधीच अस्तित्वात आली नाही. सरकारी बडग्याने घाईत एक बनवली, पण ती बासणात बांधून ठेवलीय.
 एवढेच नव्हे तर तिरंगा हा राष्ट्रध्वज असल्याचे या संघाला मान्य नाही. आता ढोंग म्हणुन ते तिरंगा फडकावतात...पण तो केवळ देखावा आहे. प्रात:स्मरनात ते आता गांधी व बाबासाहेबांचेही नांव घेतात पण त्यामागे कितपत ढोंग आहे ते सुद्न्य जाणतातच.
संघाचे हिंदुत्व म्हणजे वैदिकवाद असुन मनुस्मृतीचे पुनर्स्थापन हा त्यांचा अंतिम अजेंडा आहे. म्हणुनच हिंदु धर्माची व्याख्या करण्याची त्यांना विशेष गरज भासत नाही. कारण तो आपला धर्मच नाही हे त्यांना चांगलेच माहित आहे. जे मुस्लिम वा ख्रिस्ती नाहीत ते हिंदु अशी सरळसोट व्याख्या आहे. पारशी ज्युंशी त्यांचे काहीएक वैर नाही. तसे तत्वत: ख्रिस्त्यांशीही नाही. पुरातन आर्य असल्याने इंग्रजांना ते आपले पुरातन रक्तबांधवच मानत असत.
हिटलर हे त्यांचे मुलभुत आदर्श आहे हे आता लपुन राहिलेले नाही. एकतंत्रशाही त्यामुळे त्यांना प्रिय आहे. मुस्लिमांचा (हे त्यांना खाजगीत नेहमीच "लांडे" म्हणतात.) हे पराकोटीचा द्वेष करतात, इतका कि हिटलरने ज्युंचा जसा वंशौच्छेद केला तसा मुस्लिमांचाही करावा हे यांचे स्वप्न आहे, तसे प्रयत्न आहेत. मला अनेक संघवादी वाचकांचे फोन येतात तेंव्हा ते "मुस्लमानांना वेचुन ठार करायला हवे" असे म्हणतच असतात.
पण त्यांनी केलेले त्यांच्या दृष्टीने महापवित्र कार्य म्हणजे गांधीजींचा खुन. ते या खुनाला वध म्हणतात. म्हणजे गांधी महापातकीच असले पाहिजेत. सावरकर या कार्याचे बुद्धीवादी प्रणेते होते. कधी संघात तर कधी महासभेत वावरणारा बळीचा बकरा नथुराम त्यांनी निवडला. वैदिकवाद्यांनी एका हिंदुचा निघ्रुण खुन केला.
याचा पुरावा असा:
गोळवलकरांनी ६ डिसेंबर १९४७ रोजी गोवर्धन या दिल्लीनजीकच्या ठिकाणी संघाच्या बैठकीत कोन्ग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना कसे ठार मारायला हवे यावर चर्चा केली. यानंतर दोनच दिवसांनी रोहटक रोड क्यंपात गोळवलकरांनी पाकिस्तान निर्मितीस जबाबदार असलेल्यांना आम्ही नष्ट करु, पाकिस्तानही नष्ट करु अशी जाहीर भुमिका मांडली. याच वेळीस गोळवलकर म्हणाले, हिंदुस्तानात आम्ही मुस्लिमांना राहु देणार नाही. आमचे जेही विरोधक आहेत त्यांना आम्ही संपवुन टाकु....
  यानंतर सहाच आठवड्यांत गांधीजींचा खुन करण्यात आला. या प्रकरनी सावरकरांप्रमानेच गोळवलकरांनाही अटक झाली. वर्षभरात त्यांना चांगल्या वर्तनाच्या हमीवर सोडुनही देण्यात आले. आरेसेस वरची बंदीही हटवण्यात आली. गृहमंत्री कोण होते हे सांगण्याची येथे आवश्यकता नाही. असो.
मुद्दा आहे हिंदुत्वाचा. संघ व त्याच्या अनेक शाखा-उपशाखा स्वत:ला हिंदु धर्मीयांचे तारणहार समजतात. तत्वद्न्य आणि समर्थक समजतात. त्यासाठी असंख्य धादांत खोट्या गोष्टी रचुन सांगत असतात. (उदा. हडप्पा/लोथल येथे सापडलेल्या तंदुर भट्ट्यांचे अवशेष हे यद्न्यकुंडांचे अवशेष आहेत...तात्पर्य सिंधु संस्कृती ही वैदिकांनी घडवली. इति. एम. के ढवळीकर. पु. ना. ओक ते वर्तक असेच तारे तोडत असतात.)
हिंदु धर्माच्या ख-या वाढीस संघ हा फार मोठा अडसर आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. हिटलरच्या एस.एस. संघटनेची सर्वच मुलतत्वे संघ जपत असतो. सांस्कृतीक दहशतवादात यांचा कोणीही हात धरु शकणार नाही. हिंसक दहशतवादात ते आता कसे पडले आहेत हे गांधी हत्या ते फादर स्टेनच्या हत्येपर्यंत व मालेगांव ते गोवा विस्फोटांपर्यंत दिसुन येते.
मुळात हे हिंदु धर्माचे अंग नाही.  संस्कृतीआर्यवादी विकृतांना आपली ध्येये विदेशी संस्कृत्यांतुन उचलावी लागतात यातच सर्व आले. हे हिंदु नाहीत. म्हणुन मी मागील लेखात संघाचा हिंदु धर्माशी काहीएक संबंध नाही असे म्हटले होते आणि तेच सत्य आहे असे माझे मत आहे. हे हिंदु मार्गातील मोठे अडथळे आहेत. हे वैदिकवादी असुन मेंढ्याची कातडी पांघरत हिंदुंच्या (शैवांच्या) कळपात घुसलेली नुसती लबाडच नव्हे तर विघातक मंडळी आहे.
१९५६ मद्धे प्रसिद्ध पत्रकार डी. एफ. कारक यांनी गोळवलकारांबाबत (व संघाच्या बाबत) जे विधान केले होते ते असे:
"Golwalkar was a guru of hate, whose life's malevolent work was — as Jawaharlal Nehru so memorably put it — to make India into a "Hindu Pakistan". That project has not succeeded yet, and may it never succeed either."

द्वेषाच्या पायावर खोटे हिंदुत्व रचणारा वैदिकवादी संघ हा हिंदु धर्माच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे हे नीट समजावुन घ्यावे लागणार आहे. त्याखेरीज हिंदु धर्मासमोरील समस्या संपनार नाहीत. आम्हाला "हिंदु पाकिस्तान" बनवायचा नाहीहे. पण तसे करण्याचा जे प्रयत्न करताहेत त्यांचे बेत हाणुन पाडले पाहिजेत.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...