Friday, October 30, 2015

अनेक भाषांचे पितृत्व असलेली वैदिक भाषा


     ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन धार्मिक साहित्य मानले जाते हे खरे नाही. गाथांची रचना ऋग्वेदपुर्व आहे असे भाषाविद मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले आहे. त्याहीपुर्वी इसपू २४०० मधील पिर्यमिडमद्ध्ये कोरलेले "पि-यमिड टेक्स्ट"  (Piramid Texts) हे सर्वात प्राचीन व लिखित स्वरुपात असलेले धार्मिक साहित्य आहे. उलट ऋग्वेद व अवेस्त्याचा तसा पुरातनत्वाचा लिखित पुरावा काहीएक उपलब्ध नाही. ऋग्वेदाची भाषा ही  मुळची होती तशीच उरलेली नसून तीवर अनेक वेळा संस्कार झालेले आहेत. त्याकडे वळण्याआधी वैदिक भाषेबद्दल विद्वानांची विविध मते काय आहेत हे आपण प्रथम पाहू.

१) ऋग्वेदाच्या भाषेचे अवेस्त्याच्या भाषेशी निकटचे साम्य असून काही ध्वनी बदलले कि त्याचे सरळ वैदिक संस्कृतमद्ध्ये रुपांतर होऊ शकते. ....ऋग्वेदातील दहावे मंडल वगळता उर्वरित भागाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि त्यावर अनेक संस्करणे झालेली असून ती उणे केली तर एकाच कोणत्यातरी शुद्ध भाषेचा संबंध लागतो. ऋग्वेदाच्या संपादकांनी अन्य धार्मिक साहित्याच्या भाषेला काही प्रमाणात तरी आपलेसे केलेले दिसते. अशा भाषिक उधारीची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आहेत. ऋग्वैदिक व्याकरणही अशा भाषिक प्रदुषनाने दुषित असल्याचे अनेक संकेत मिळतात. वैदिक भाषा ही पाश्चिमात्य भाषा होती, जशी अवेस्त्याची ज्यात र आणि ल हे वर्ण मिश्र होऊन जातात.  ऋग्वेदातील व्याकरणही दोन भाषांचा संघर्ष दाखवते असा जे. ब्लोख यांच्या वैदिक भाषेबद्दलच्या कथनाचा सारांश आहे.

२) प्राकृत भाषांना कोणत्याही एकाच उगमापर्यंत नेता येत नाही. त्या किमान संस्कृत भाषेतून तर नक्कीच उगम पावलेल्या नाहीत, ज्याप्रमाणे भारतीय विद्वान आणि होप्फर, लास्सेन, ज्यकोबी वगैरे समजतात. वैदिक भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरण हे प्राकृत प्रकृतीशी मिळते, अभिजात संस्कृतशी नाही, त्यामुळे संस्कृतमधुन प्राकृत भाषा विकसित झाल्या हे मत मान्य करता येत नाही असे रिचर्ड पिशेल स्पष्टपणे, अनेक उदाहरणे देत नमूद करतो.

३) प्राकृत भाषांतील अनेक शब्द व प्रत्यय संस्कृतपेक्षा वैदिक भाषांशी अधिक मेळ खातात. प्राकृत जर संस्कृत भाषेतून उत्पन्न झाली असती तर असे झाले नसते. वैदिक भाषा व प्राकृत भाषा पुरातन प्राकृतातुनच उत्पन्न झाल्या असाव्यात कारण त्याशिवाय असे साम्य आढळून आले नसते. वैदिक भाषेत ऋकाराऐवजी उकार, (वृंदऐवजी वुंद) अनेक ठिकाणी होणारा वर्णलोप (उदा. दुर्लभ ऐवजी दुलह) इत्यादि. वैदिक भाषा ही संस्कृताशी समकक्ष नसून प्राकृताशी समकक्ष अथवा प्राकृतसमान आहे असे हरगोविंददास टी. सेठ सप्रमाण दाखवून देतात.

४) अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या भाषेमद्ध्ये तर ध्वनीशास्त्रदृष्ट्या पुष्कळ साम्य आहे. यज्ञ- यस्न, असूर-अहूर, देव-दएवा, सोम - हओम, सप्त - हप्त, मित्र- मिथ्र, मगवन- माघवन इत्यादि देवतानामांत तर साम्य आहेच पण अनेक मंत्रही ध्वनी बदलुन जसेच्या तसे वैदिक भाषेत रुपांतरीत करता येतात. मात्र इ व ओ या स्वरांचे अनेक प्रकार अवेस्तनमद्ध्ये होतात तसे ते वैदिक भाषेत होत नाहीत. फरक आहे तो वाक्यरचनेच्या व शब्दसंग्रहाच्या बाबतीत. शब्द समान असले तरी अर्थ विभिन्न झालेले दिसतात. सायनाच्या भाष्यानुसार जेंव्हा ऋग्वेदातील अनेक शब्दांचा अर्थ लावायला अडचण भासू लागली तेंव्हा पाश्चात्य विद्वानांनी अवेस्त्याच्या भाषेची मदत घेतली. अवेस्त्याची भाषा वैदिक भाषेला अधिक निकटची आहे याबाबत आता कोणाही विद्वानाच्या मनात शंका नाही. किंबहुना अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या धर्मकल्पनांतही कमालीचे साम्य आहे.

५) अवेस्त्याची भाषा ही वैदिक भाषेपेक्षा अधिक पुरातन आहे असे मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले असून ऋग्वेदाच्या मुळ भाषेवर किमान पाच संस्कार झाले असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

६) ऋग्वेदातील १०. ७१.१-२ या ऋचांवरुन स्पष्ट दिसते कि वैदिक ऋषींनी नवीनच भाषा बनवली. जसे धान्य पाखडले जाते त्याप्रमाणे शब्द पाखडून भाषा बनवली असे ऋषी या ऋचांत म्हणतो. अनेक बोलीभाषांतून शब्द घेत ही नवी भाषा बनली असल्याचे निर्णायक पुरावे ऋ. ८.१.५.५ आणि ८.९५.५ या ऋचांतही मिळतात. पाश्चात्य विद्वानांनी संस्कृत आधी व प्राकृत बोलीभाषा हा क्रम दिला तो चुकीचा आहे असे मत डा. प्रमोद पाठक यांनी मांडलेले आहे.

७) म्यक्समुल्लर म्हणतात, "ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसूक्त हे भाषा आणि आशयाने खूप नंतरचे आहे. वसंत, ग्रीष्म हे ऋतू ऋग्वेदात अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. शूद्र शब्दही अन्यत्र येत नाही." (A History of Ancient Sanskrit Literature”, by F. Max Muller, 1859, page 570) याचा अर्थ एवढाच कि या सुक्ताची रचना वैदिक लोक/प्रचारक भारतात आले व वैदिक भाषेत सुधारणा करण्याच्या अंतिम टप्प्यात, ती अधिक सुडौल बनवल्यानंतर झाली आहे. कोलब्रुकसुद्धा म्हणतात कि या सुक्ताची रचना वैदिक भाषेला अधिक संस्कारित व शुद्ध बनवल्यानंतर ही रचना झाली आहे. (Miscellaneous Essays, Volume 1, By Henry Thomas Colebrooke, see footnote, 1837, page 309)

८) ऋग्वैदिक भाषेत जवळपास ६% शब्द हे द्रविड, मुंड च कोल भाषेतून आलेले आहेत.

वरील अल्प विवेचनावरून लक्षात येणारी महत्वाची बाब म्हणजे वैदिक भाषा ही संस्कृत नाही तर प्राकृताप्रमाणेच, पण एक स्वतंत्र, अनेक भाषांचा आधार घेत बनलेली भाषा आहे. सेठ म्हणतात त्याप्रमाणे ती भाषा कोणा एकाच प्राकृत भाषेतून निर्माण झालेली नाही, परंतु या भाषेवर स्थानिक प्राकृतांचा प्रभाव निश्चयाने आहे. परंतू ऋग्वेदाच्या धर्मकल्पना आणि ऋग्वेदाची भाषा यावर उत्तर अफगाणिस्तानात स्थापन झालेल्या पारशी धर्म व धर्मग्रंथाच्या भाषेचाही निकटचा संबंध असल्याने ऋग्वेदाची मुळ भाषा ही अवेस्त्याच्या निकटची, समकक्ष असणार हे उघड अहे. विट्झेल म्हणतात त्याप्रमाणे मुळ ऋग्वेदाच्या भाषेत अनेक वेळा बदल केले जात शेवटचे संस्करण हे इसपूच्या तिस-या शतकात किंवा त्याहीनंतर झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ऋग्वैदिक भाषा ही मुळची अवेस्त्याच्या समकक्ष व भारतात आल्यानंतर त्यात मुर्घन्य वर्णांचा समावेश होत प्राकृत व्याकरण व शब्दसंग्रह घेत अनेक संस्करणांतुन गेलेली आहे. त्यामुळे वैदिक भाषेला आपण एकार्थाने मिश्र भाषा म्हणू शकतो.

ऋग्वेद हा पठणपरंपरेने जसाच्या तसा जपला गेला असता तर हे भाषिक वैविध्य व तेही प्राकृत व अवेस्त्यासमान, पण प्राकृतही नव्हे किंवा संस्कृतही नव्हे, अशा वैदिक भाषेत आले नसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात कि वैदिक भाषेत जे शब्दवैविध्य व रचनासैलत्व आहे ते पाणिनीच्या संस्कृतातून गायब झालेले आहे. वैदिक भाषेवर अवेस्त्याची भाषा, भारतातील तत्कालीन प्राकृत भाषा यांचा एकत्रीत प्रभाव स्पष्ट दिसतो. स्वभावत:च दोन्ही भाषांतील शब्दही ध्वनीबदल करत वैदिक भाषेत आलेले असल्याने शब्दवैविध्यही दिसते. म्हणजेच वेळोवेळी ऋग्वेदाच्या भाषेवर संस्कार करण्यात आले आहेत. ही भाषा स्वतंत्र नाही. तिचे पितृत्व अनेक भाषांकडे जाते.

थोडक्यात अवेस्तन समकक्ष भाषेचा पाया घेत त्यावर इतर अनेक अन्य प्राकृत व द्रविड/मुंड/कोल या भाषांचे संस्कार करत जी अत्यंत वेगळी  बनवली गेली ती (व नंतर वैदिकांनाही समजायला अवजड जायला लागली ती) सर्वस्वी नवीन व अर्वाचीन भाषा म्हणजे वैदिक भाषा!

      त्यामुळे ऋग्वेद निर्मितीपासून होते तसेच्या तसे पाठांतराने जतन केले गेले या दाव्याला काही अर्थ नाही.

Thursday, October 29, 2015

वेद आणि वेदाज्ञा



खरे तर वेद तीनच आहेत. सामवेदाला स्वतंत्र वेद मानता येत नाही कारण तो ऋग्वेदातील ऋचांचे गायन करण्याबाबतचा वेद आहे. अथर्ववेद तसे पहायला गेला तर ऋग्वेदविरोधीच आहे. तो विशेषकरून जादु-टोण्याची वेद आहे. या वेदात यतुकर्मे असून यज्ञोपयुक्त सुक्ते आजीबात नाहीत. ऋग्वैदिक देवतंचे स्थानही यात अध:पतीत झालेले आहे. यजुर्वेद मात्र पुर्णतया याज्ञिक कर्मकांडाने भरलेला आहे. यज्ञ ही वैदिकांची मुख्य धर्मसंस्कृती मानली तर अथर्ववेद त्यात मुळीच बसत नाही. आणि या वेदाला चवथा वेद उशीरापर्यंत मानले जातच नव्हते यातच या वेदाला वैदिकच किती मानत होते हे दिसते. अथर्वन ब्राह्मण भारतात आजही अत्यल्प आहेत एवढे सांगितले की पुरे.

भारतात वेदाज्ञा, वेदमान्यता याचे स्तोम मध्ययुगात तरी खूप होते असे दिसते. किंबहुना भारतातील कोणत्याही विचारधारेला वेदमान्यतेचे नाटक करावे लागे. त्याखेरीज तत्कालीन विद्वान त्या तत्वधारेला महत्वच देत नसत!

प्रत्यक्षात कोणत्या वेदमान्यता आहेत हे मात्र तपासून पहायचे कष्ट तत्कालीन विद्वानांनीही घेतलेले दिसत नाहीत.

कारण-

१) ऋग्वेदात समाजरचनेबाबत कसलेही दिग्दर्शन नाही. अगदी वर्णव्यवस्थेचेही.
२) सामाजिक नीतिनियमांबाबत ऋग्वेद प्रचंड परस्परविरोधी आहे. म्हणजेच नैतिकतेचा मापदंडही ऋग्वेद नाही.
३) ऋग्वेदात अन्य विरोधी समाजघटकांबाबत अत्यंत हिंसक आणि विद्वेषी घोषणांची/कृत्यांची रेलचेल आहे.
४) ऋग्वेद सांख्य, वैशेषिक आदि तत्वज्ञानांच्या विरोधात आहे.
५) ऋग्वेद मुर्तीपुजेच्या विरोधात आहे.
६) यजुर्वेदात मुर्तीपुजेचा ठाम विरोध आहे.
७) ऋग्वेदात विवाह आणि अपत्यजन्म (त्यातही पुत्रजन्म) महत्वाचा आहे. संन्यास ऋग्वेदाला मान्य नाही.

यापुढे जाऊन ऋग्वेद अथवा अन्य कोणताही वेद जे सांगत नाहे त्या धर्माज्ञा वेदमान्य म्हणून वैदिकांनी कोणत्या वैदिक अधिकाराने काढल्या हा खरा प्रश्न आहे. गुरू ही संकल्पना खुद्द वेदांत नाही. आश्रम संकल्पनाही वेदांत नाही. मग या संकल्पना वेदमान्य का मानल्या गेल्या?

केवळ वैदिकांनी सांगितल्या म्हाणून?

त्या नंतरच्या वैदिक धर्मातील सुधारणा असू शकतात असे आपण म्हणू. पण वेदमान्यता आहे तर वेदांतच मुळात त्याला आधार काय बरे?

तो त्यांनी गुह्यसुत्रे ते स्मृत्यांतही दिलेला नाही. श्रौत हे वेदांनाच आधारस्तंभ मानणारे कडवे वैदिक तर स्मार्त हे स्मृत्यांनाच मुख्य आधारस्तंभ माननारे वैदिक! स्मार्तांनी पंचायतन घेतले तो त्यांचा नाईलाज. पण तात्विक आधारस्तंभ काय तर स्मृत्या. याबद्दल सविस्तर मी क्रमश: लिहिणंच...पण मुख्य प्रश्न हा आहे कि वेदमान्यता या गोष्टींत कोठे आहे?

ऋग्वेदात जाती नाहीत. ऋग्वेदात वर्ण नाहीत. बरीचशी उपनिशदे वैदिक नाहीत तर वेदविरोधी आहेत. दर्शनांचीही तीच गत आहे. आणि ते तात्विक विरोध दूर ठेवले तरी अमुकला मान्यता तमुकला नाही असे वेदांत कोठेच नमूद नाही. मग वेदमान्यता ही यांची कल्पनाशक्ती होती काय यावरही विचार करायला हवा.

हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. ज्या बाबींचा मुळात उल्लेखच वेदांत नाही त्या वेदमान्य कशा? वेदमान्य म्हणून वैदिकांसाठी अनुकरनीय कशा? आणि वैदिकांनीच वेदांत जे मान्य आहे ते अव्हेरले असेल (उदा. गोमांसभक्षण) तर ते तरी वैदिक राहिलेत काय?

विचार करा. वैदिकतेचे स्तोम या देशात खूप माजवले गेलेले आहे. त्या स्तोमाने वैदिकांसह सर्वांचाच होम केला आहे.

विचार करा!

Wednesday, October 28, 2015

वैदिक टोळ्यांतील आंतरिक संघर्ष

वैदिक धर्माची सुरुवात एकाच टोळीत/जमातीत झाली नाही. ऋग्वेदाचा व त्यातील दैवतकल्पनेचा विकास हा अनेक टोळ्यांच्या दैवत संकल्पना पण यज्ञकेंद्रित होत एकत्र होत झाला. या ३०० ते ५०० वर्षांच्या काळात वैदिक टोळ्यांचेही आपापसातील संबंध बदलत राहिले. मित्र असलेल्या टोळ्या शत्रू बनत आपासात झगडलेल्या दिसतात. ऋग्वेदात एकंदरीत जवळपास ४८ टोळ्या शत्रू अथवा मित्रभावाने अवतरतात. ऋग्वेद मित्र टोळ्यांचा उल्लेख पंचजन असा करतो, पण या पाच टोळ्या नेमक्या कोणत्या हे कोठेही स्पष्ट नाही. यदू, तुर्वश, अनु, द्रुह्यु आणि पुरू या त्या पाच टोळ्या असाव्यात असा तर्क केला जात असला तरी या टोळ्या एकत्र अथवा आसपास राहत होत्या असे दिसत नाही. उदाहरणार्थ यदू-तुर्वंश यांचा नेहमी एकत्र उल्लेख येत असून या टोळ्या फार दुरुन वैदिकांच्या सहाय्यार्थ येत असत असे उल्लेख मिळतात. शिवाय दाशराज्ञ युद्धात या टोळ्या सुदासाच्या विरुद्ध लढलेल्या आहेत. तुर्वश/तुर्वायण नंतरच्या काळात वैदिक साहित्यात विद्वेषानेच उल्लेखले गेले आहेत. तुर्वश अर्थात तुराणी लोक वैदिकांच्या दृष्टीने नंतर शापित झाले याचे कारण त्यांनी सुदासाविरुद्ध युद्ध पुकारले असे म्यक्समुल्लेरही नोंदवतो.

पर्शुंचीही हीच गत आहे. पर्शु (पर्शियन) टोळ्यांनी वैदिक टोळ्यांना अनेकदा आश्रय दिला आहे. ऋषींना दानेही दिली आहेत. (ऋ. ८.६.४६) परंतू हेही लोक नंतर सुदासाविरुद्ध उभे ठाकलेले दिसतात. फार कशाला, पुरू म्हणवणारी टोळीही सुदासाच्या विरोधात गेली. सुदास हा तुत्सू टोळीचा. बहुदा त्याच्या काळात वैदिक धर्माचा तोच आश्रयदाता होता. त्याने दाशराज्ञ युद्धात या सर्व टोळ्यांचा पराभव केला. खंडण्या वसूल केल्या. या युद्धानंतर पुरुंचाही उल्लेख वैदिक साहित्यातून गायब होतो. शतपथ ब्राह्मण तर पुरुंना राक्षस व असूर म्हणुन निंदते. महाभारतात पुरुचे नांव अवतरते, पण टोळीचे म्हणून नव्हे तर ययाती-शर्मिष्ठेचा मुलगा म्हणून. या पुरुचा ऋग्वेदातील पुरू टोळीशी संबंध नाही.

पुरू - पौरु हे पुरातन शब्द असून त्यांचा अर्थ पुष्कळ, पुरातन, पहिला माणूस वगैरे होतो. पुरु हे जसे टोळीनाम होते तसेच अनेकांच्या नावातील ते विशेषणही होते, मग ते वैदिक असोत कि अवेस्तन. उदा. पुरुमिळ्ह, पुरु आत्रेय, पुरुहन्म अशी नांवे ऋग्वेदात जशी येतात तशी अवेस्त्यातही येतात. उदा. झरथुष्ट्राच्या वडिलांचे नांव पौरुषास्प होते. पौरु-दाक्ष्ती, पौरु-बंघ, पौरु-चिस्त, पौरु-जिर वगरे पुरु-केंद्रित नांवे अवेस्त्यात अवतरतात. सोल लेव्हिन या भाषाविदाने पुरु-पौरु हे शब्द अतिपुरातन असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे. दोहोंचा अर्थ एकच!

पुरु एके काळी ऋग्वैदिक धर्माचे आश्रयदाते होते, जसे यदू-तुर्वश वगैरे. परंतू नंतर हे संबंध पुर्ण बदललेले दिसतात. दाशराज्ञ युद्धामागे धार्मिक वर्चस्वतावादाचेच कारण होते असे काही विद्वान मानतात. उदाहरणार्थ हे दाशराज्ञ युद्धातील सुदासशत्रू "अयाज्ञिक" होते असे ऋग्वेदच सांगतो. शिवाय या दहापैकी पाच टोळ्या आर्य तर पाच अनार्य होत्या असेही नमूद आहे. येथे आर्य हा शब्द वंशवाचक नही हे स्पष्ट आहे. अग्नीपुजक लोक हे आर्य होते तर अन्य व्रत करणारे, इंद्राला अथवा देवांना न मानणारे ऋग्वैदिक लोकांच्या दृष्टीने अनार्य होते. तुर्वश हे सुरुवातीच्या काळात देवाच्या बाजुने होते. म्हणून ते वैदिक टोळ्यांचे मित्रही होते. तुर्वंश लोकांनीच झरथुष्ट्राचा खून केला हाही इतिहास आहे. ही घटना दोन्ही धर्मग्रंथांत नोंदली गेलेली आहे. हेच तुर्वश नंतर ऋग्वैदिक सुदासाच्याही विरुद्ध अन्य टोळ्यांबरोबर उभे ठाकले हाही इतिहास आहे.

मग झरथुष्ट्राच्या मृत्युनंतर तुर्वश, अनू वगैरे टोळ्यांच्या धर्मभावनांत काही बदल झाला का? कि या युद्धाचे कारण धार्मिक नसून सर्वस्वी राजकीय होते? ऋग्वेद याबाबत काही भाष्य करत नाही. ही घटना झरथुष्ट्राच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी झालेली असल्याने अवेस्ता तर या युद्धाचा उल्लेखही परत नाही.

असे असले तरी ऋग्वैदिक धर्माचा विकास सहजासहजी झाला नाही. ऋग्वेदरचना सलग चालू राहिली असेही दिसत नाही. सुरुवातीला ऋग्वैदिक धर्म यज्ञकेंद्रित असला तरी त्यातील कर्मकांडेही साधी होती. त्यांत अवडंबर नव्हते. ब्रह्मन, क्षत्र व विश हे शब्द अवतरत असले तरी ते वर्णवाचक नव्हते. मंत्रकर्ता कोनीही असो तो त्याक्षणी ब्राह्मण असे तर लढावे लागे तेंव्हा तो क्षत्रीय असे. विश म्हणजे ग्रामीण वसाहती व त्यात राहणारे लोक. अशी रचना अवेस्त्यातही होती. उदा. ब्राह्मण शब्दाऐवजी अग्नीपुजा करणारा तो अथ्रवण. योद्धा असेल तो रथेस्ट्रा. बाकी लोक दास. पण हे जन्माधारित नव्हते.

याचे कारण म्हणजे ऋग्वैदिक धर्म हा टोळ्यांनी निर्माण केलेला धर्म. लोकसंख्याच मुळात मर्यादित होती. त्यात कर्मप्रधान अथवा जन्मप्रधान कायमचे वाटप करता येणे सर्वस्वी अशक्य होते. शिवाय या धर्माला आश्रय देणा-या टोळ्याही काळानुसार बदलत गेल्या. झरथुष्ट्राचा धर्म नंतर राजाश्रय मिळत गेल्याने झपाट्याने पसरतही गेला. अशा स्थितीत या धर्माचा निभाव लागणे प्राचीन इराणात सोपे राहिलेले नव्हते. त्या स्थित्यंतराकडे आपण नंतर जावू. पण ऋग्वैदिक काळात हा धर्म तुलनेने अत्यंत साधा होता हे येथे लक्षात घेऊ. इतर वैदिक संस्कारांपैकी फक्त तीन संस्कार या काळात जन्माला आलेले दिसतात. ऋग्वेदातील तत्वज्ञानही प्रचंड विरोधाभासने भरलेले दिसते.

आधी श्रेष्ठ असनारा असूर वरून आपले स्थान गमवत इंद्र श्रेष्ठस्थानी पोहोचलेला दिसतो. वैदिकांना रुद्र, मरुत, विष्णू, भारती वगैरे शेकडो नवीन देवता सामाविष्ट कराव्या लागलेल्या दिसतात. आणि याच वेळेस देव विविध असले तरी अंतता: त्या एकच आहेत असे तात्विक समाधानही करून घ्यावे लागल्याचे दिसते. यात वैदिक ऋषींतील आंतरसंघर्षही डोकावत राहतो. अगस्त्याने मरुत व इंद्र यांच्यातील हवीचा फार मोठा संघर्ष कसा सोडवला याचे विवेचन मागील लेखात मी केलेलेच आहे. प्रदिर्घ काळात विविध मनोवृत्तीच्या व विविध धर्मांची पार्श्वभुमी असलेल्या लोकांनी बनवलेल्या धर्मात हा आंतरिक संघर्ष असणे स्वाभाविकच आहे.

आता हा प्रश्न पडतो कि प्राचीन इराण (दक्षीण अफगाणिस्तान) येथे अशी काय स्थिती उद्भवली कि वैदिक धर्माला अन्यत्र आश्रय शोधावा लागला? अनेक विद्वान आर्य आक्रमण अथवा सामुहिक विस्थापनामुळे वैदिक धर्म भारतात आला असे मानतात, ते खरे आहे काय? काही लोक वैदिक धर्म भारतातच स्थापन झाला असे म्हणतात, त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? वैदिक वंशावळ व महाभारतातील वंशावळ का जुळत नाही? अनेक प्रश्न आहेत. पण आपण एकामागून एक प्रत्यक प्रश्नाचा विचार करुयात!

Tuesday, October 27, 2015

ऋग्वैदिक स्थित्यंतरे: असुरांकडून देवांकडे!

वैदिक धर्माचा मुख्य स्त्रोत म्हणजे ऋग्वेद. तो आज ज्या क्रमाने आणि ज्या मंडलांत आपल्यासमोर उपलब्ध आहे त्या क्रमाने मुळात तो रचला गेलेला नाही. आजचा ऋग्वेद दहा मंडलांत असून त्यातील तिसरे ते सातवे मंडल प्राचीन असल्याचे मानले जाते. बाकी मंडले मध्यकालीन व उत्तरकालीन मानली जातात. उदाहरणार्थ दहावे मम्डल उत्तरकालीन आहे. प्रत्येक मंडलातही प्राचीन, मध्यकालीन व उत्तरकालीन दाखवता येतील अशी सुक्ते व मंत्र आहेत. थोडक्यात ऋग्वेद कालानुक्रमानुसार आपल्याला उपलब्ध नाही. शिवाय त्यात विस्मरणात गेलेला/नष्ट झालेला भागही भरपुर आहे. वेदव्यासांनी विस्मरणात जाऊ लागलेली वेदराशी प्रयत्नपुर्वक गोळा करून तिची संगतवार  मांडणी चार भागात केली असे वैदिक परंपरा मानते.

ऋग्वेदाचे रचना सुरू होऊन ती संपायला सरासरी तिनशे ते पाचशे वर्ष लागली असावीत असे विद्वान मानतात. हा धर्म एकाएकी, कोणा प्रेषिताने निर्माण केलेला नसून तो क्रमश: दैविक/कर्मकांडीय पद्धतीने विकसीत होत गेलेला धर्म आहे. ऋग्वेदाला किमान दहा ऋषीकुटुंबातील सुमारे साडेतिनशे मंत्रकर्त्यांनी पिढ्यानुपिढ्या हातभार लावलेला आहे. मुख्य दहा कुटुंबातील ऋषीही एकाच जमातीतून आलेले नाहीत. भृगू, काण्व, अगस्त्य सारखे ऋषी स्वतंत्र धर्म परंपरेतून येत वैदिक परंपरेत आपल्याही परंपरांचे मिश्रण करत सामील झालेले दिसतात. याबाबत सविस्तर चर्चा आपण स्वतंत्र लेखात करु.

मुळात वैदिक धर्माची सुरुवात झाली त्याआधी कोणता ना कोणता धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राचा धर्म नवधर्म नसून जुन्या असूर धर्माचे एकेश्वरी प्रकटन होते. हा धर्म देव संप्रदायाच्या विरोधात होता. असूर-मेघा (अहूर-माझ्दा) हाच सर्वश्रेष्ठ पुजनीय तर देव हे वाईट अशी त्या धर्माची झरथुस्ट्राने रचना केली. याचा अर्थ असूर धर्म व देव धर्मही झरथुस्ट्राच्या पुर्वीही विस्कळीत स्वरुपात का असेना विद्यमान होता. दोन्ही धर्मपरंपरांत संघर्षही होता. त्यांची कर्मकांडेही भिन्न होती. याशिवायही इतर अनेक धर्म होते. त्याबद्दलची त्रोटक माहिती अवेस्ता आणि ऋग्वेदातून मिळते. ती माहिती अशी...यज्ञ न करणारे. अन्य व्रत करणारे, इंद्राला देव न मानणारे, लिंगपुजा करणारे अशा लोकांची अस्पष्ट माहिती ऋग्वेद देतो. या लोकांचा द्वेष वैदिक लोक करायचे. अवेस्त्यातही झरथुस्ट्राच्या धर्माचा द्वेष करणारे, अग्नी न पुजणारे, देवांना पुजणारे, तुराण्यांसारखे समाज येतात. तुराणी म्हणजे तूर प्रांतात राहणारे लोक. ऋग्वेदात हेच लोक तुर्वश नांवाने व त्याच अर्थाने येणारे लोक. हे तुराणी झरथुस्ट्राचे प्रकांड शत्रू होते. अनेक युद्धात वैदिक टोळ्यांसोबत हे सामील दिसतात तर दाशराज्ञ युद्धात हे वैदिक टोळ्यांचे शत्रू बनलेलेही दिसतात. झरथुस्ट्राचा अग्नीत जाळ्य़्न खून तुराण्यांनीच केला व त्याचे वर्णन जसे अवेस्त्यात आहे तसेच ऋग्वेदातही आहे.

येथे मुद्दा हा कि देव आणि असूर या दोन विरोधी धर्मांचे प्राबल्य ऋग्वेदापुर्वीही अस्तित्वात होते. सोबत दुसरेही धर्म प्रवाह होतेच. ऋग्वेदात देवधर्म आणि असूर धर्म या दोहोंचे मिश्रण दिसत असले तरी सुरुवातीला वैदिक धर्मावर असूर धर्माचा प्रभाव होता. उदा. ऋग्वेदात आधी असूर वरुण ही देवता सर्वश्रेष्ठ मानली जात होती. ऋग्वेदात वरुणाला वारंवार अत्यंत आदराने "असूर वरुण" असे तर संबोधले जात होतेच पण अग्नी, इंद्र व मित्रालाही "असूर" ही आदरार्थी संबोधने लावलेली आहेत. "जो प्राण देतो, म्हणजे असू: देतो तो असूर" हा असुराचा मुळचा अर्थ. असूर वरूण म्हणजेच अहूर माझ्दा असे विद्वान मानतात. त्याबद्दलचा वाद बाजुला ठेवला तरी ऋग्वेदातच वरुणाचे माहात्म्य घटत ती जागा देव इंद्राने  घेतली. ही ऋग्वैदिक धर्मातील मोठे क्रांती म्हटले तरी चालेल. देव हेच असूर (देवानां असूरा:...) ते असूर दुष्ट हा प्रवास ऋग्वेदातच दिसून येतो. याचे कारण तत्कालीन देव मानणारे विरुद्ध असूर मानणारे या दोन संप्रदायांतील संघर्षात पहावा लागतो.

एकच धर्मात दोन विरोधी मुलतत्वे मिसळत जावीत हे फक्त ऋग्वेदात दिसते. असूर वरुणाचे माहात्म्य घटत इंद्राचे माहात्म्य वाढले. इंद्राचे असूर हे संबोधन गळालेले दिसते. असे असले तरी समकालेन जगात असूर संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे प्रबळ असल्याचे दिसते. उदाहरणार्थ अस्सिरियन संस्कृती. ही संस्कृती असूर तत्व प्रधान असून राजेही स्वत:ला अशूर हे संबोधन लावून घेत असत. हे असूर संस्कृती पालत असले तरी ते मुर्तीपुजक होते. झरथुष्ट्राच्या अहूर (असूर) संप्रदायाप्रमाने अग्नीपुजक व एकेश्वरवादी अमूर्त दैवत मानणारे नव्हते. ऋग्वेदावरील सुरुवातीचा असूर वर्चस्वाचा भाग गृहित धरला तर ऋग्वैदिक लोकही वेदकाळ सुरु होण्यापुर्वी असूर धर्म/संस्कृतीचेच पाईक होते असे म्हणावे लागते.

अवेस्त्याचा धर्म आणि ऋग्वेदाचा धर्म यातील साम्य म्हणजे हे दोन्ही धर्म मुर्ती/प्रतिमा पुजा मानत नाहीत. "न तस्य प्रतिमा अस्ती" हे यजुर्वेद ठासून सांगतो. यज्ञात दिल्या जाणा-या हवीमार्फत अमूर्त देवतांची पूजा करणे हे दोन्ही धर्मातील मुख्य साधर्म्य.

झरथुस्ट्राचा गाथा (अवेस्त्याचा प्राचीन भाग) आणि ऋग्वेदाच्या प्राचीन रचना या समकालीन आहेत. ऋग्वेद रचना व्हायलाच ३०० ते ५०० वर्ष लागली. हा काळ थोडा नव्हे. या काळात ऋग्वैदिक धर्मातही स्थित्यंतरे घडली. अनेक वेगवेगळ्या टोळ्यांतील लोक या धर्माचे पाठीराखे अथवा शत्रू बनत गेले. दानस्तुती सुक्तांतून याची माहिती आपल्याला मिळते. ज्या टोळ्या पाठीराख्या झाल्या त्यांची दैवतेही ऋग्वेदात सामील होत गेली. त्यांना हवी द्यायचा कि नाही यावरचेही वाद होत ते शेवटी तडजोड करत सामील होत गेले. उदा. अगस्ती हा ऋषी वेदरचनेत नंतर सामील झाला. त्याने जादुटोण्याचे मंत्र निर्माण केले जे ऋग्वेदात काण्वांशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. अगस्ती हा आर्यच नव्हता असे क्युपर म्हणतो. काण्व हेही मुळचे वैदिक परंपरेतील नाहीत. सुत्र साहित्यात काण्वांना "अ-ब्राह्मण" म्हटले गेलेले आहे, कारण तेही जादूटोण्याचे समर्थक. मरुत आणि रुद्र दैवतांचाही समावेश ऋग्वेदात ही दैवते मानणा-या टोळ्यांमुळे झाला. अगस्ती त्यातील प्रमूख. त्यानेच मरुतांना (वादळाची प्रतीक-दैवते) यांना यज्ञात हवी द्यायचा कि नाही हा वाद मिटवला. (ऋ. 1.165, 1.170 आणि 1.171) भृगुही ऋग्वेदरचनेत सर्वात उशीरा सामील झाले.

याचा अर्थ असा कि ऋग्वेद रचला जात असतांनाच तो अनेक स्थित्यंतरांतून गेला. अनेकविध टोळ्यांनी त्यात सहभाग घेतला.  त्या त्या टोळ्यांची दैवते ऋग्वेदात सामील होत होत ऋग्वैदिक देवतांचे संख्या ६४५ पर्यंत गेली. या काळात रचला गेलेला सर्व ऋग्वेद उपलब्ध आहे असे मात्र नाही. आज उपलब्ध आहे तो संपादित, क्रम बदललेला ऋग्वेद. त्याची भाषाही मुळची उरलेली नाही. पण प्रतिपाद्य विषयाबद्दल खालील मुद्दे स्पष्ट होतात ते असे:

१) ऋग्वेद रचनेआधीही वैदिक लोकांचाही कोणता ना कोणता  धर्म होता. त्याला आपण असूर प्रधान अथवा अन्य दैवते प्रमूख मानणारा  धर्म म्हनू शकतो.
२) हे लोक प्रतिमापुजा करत असावेत जे त्यांनी या धर्माची स्थापना करतांना टाळले व "त्याची प्रतिमा असू शकत नाही" असे म्हटले. याचा अर्थ प्रतिमा पुजकांचाही धर्म होता जो ऋग्वैदिकांनी समूळ अव्हेरला.
३) झरथुष्ट्र असूर धर्माची प्रतिमापुजक विरहित, अग्नीकेंद्रित रचना करत असतांनाच याही धर्माची जवळपास तशीच, पण वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. दोन्ही धर्मातील दुष्ट शक्ती व सृष्ट शक्ती यांची नांवे (विरोधी अर्थाने झाली असली तरी) समान आहेत. ऋग्वैदिक धर्म आधी असूरकेंद्रितच होता, जो नंतर देवकेंद्रित झाला.
४) स्वाभाविकपणेच झरथुस्ट्राचा धर्म व वैदिक धर्म यात संघर्ष निर्माण झाला. त्याचे प्रतिबिंब देवासूर कथांत पडलेले आहे.
५) दोन्ही धर्मांची सुरुवात तत्पुर्वी अस्तित्वात असलेल्या धर्मकल्पनांतुनच झाली. एका अर्थाने दोन्ही धर्म प्राचीन धर्मात सुधारणा घडवनारे होते. सर्वस्वी नवीन नव्हते.
६) हे दोन्ही धर्म अस्तित्वात येत असतांना समकालीन अजुनही अनेक धर्म होते जे स्वतंत्र अस्तित्व प्राचीन इराणमद्ध्ये  (आताचा अफगाणिस्तान धरून) टिकवून होते. त्यांच्यात रक्तपाती संघर्ष वर्चस्वासाठी होत होते. ही युद्धे ऋग्वेदाने व अवेस्त्याने नोंदवलेली आहेत.

याचाच अर्थ असा कि ऋग्वेद-धर्म अचानक निर्माण झाला नाही. त्याची धर्मतत्वे त्याच्या पुर्ण रचनेपर्यंत बदलत राहिली. त्या अर्थाने ऋग्वैदिक धर्माला एकजिनसी म्हणता येत नाही. याला आपण एकाच धर्मातील बहुविधता म्हणू शकतो. या बहुविधतेची कारणे अनेक आहेत व ती दानस्तुतींवरुन स्पष्ट दिसतात. त्यावर आपण नंतर चर्चा करुच. पण वेदांपुर्वी इराणमद्धेही कोणताच धर्म नव्हता व वेदरचनाकारांचाही तत्पुर्वी दुसरा धर्म नव्हता असे मानायचे काही कारण नाही. 

Sunday, October 25, 2015

वैदिक धर्म भारतात कसा आला?

भारतीय संस्कृतीचा, त्यात जन्माला आलेल्या धर्मांचा संगतवार अभ्यास करतांना प्रादेशिकता, कालानुक्रमता आणि तत्कालीन परिस्थित्या यांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ वैदिक धर्माची स्थापना मुळात कोठे झाली? ते वैदिक धर्म स्थापन करण्याआधी ते लोक कोणत्या धर्माचे होते? या धर्माच्या स्थापनेत भाग घेणारे कोनकोणत्या टोळ्यांचे होते? त्यांचे सामाजिक व धार्मिक जीवन नेमके कसे होते? त्यांच्या समकालीन संस्कृत्या व धर्म कोनते? आणि हा धर्म कसा पसरला? ही प्रक्रिया सुरु होण्याआधीचे धर्मग्रंथ कोणते आणि कालौघात नंतर लिहिले गेले ते कोणते आणि ते कोणत्या प्रदेशात लिहिले गेले? ज्यांच्यात पसरला ते कोणत्या धर्माचे? ज्यांच्यात पसरला नाही ते कोणता धर्म पाळत राहिले?

या प्रश्नांना न भिडता, त्यांची समाधानकारक उत्तरे न शोधता कधीही कोठलाही ग्रंथ उचलून व त्यातील उद्घृते फेकून पाळामुळांबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून कोणालाही कसलेही तथ्यप्रधान उत्तर मिळणार नाही हे उघड आहे. उदा. वैदिक आर्य भारतात बाहेरुन आले असा एक मतप्रवाह अहे. ते आक्रमक म्हणून आले कि स्थलांतरीत म्हणून आले याबद्दल मतभेद आहेत.  असे असले तरी आजचा विचारप्रवाह स्थलांतरीत म्हणून आले याकडे झुकतो. याविरुद्धचा प्रवाह आहे तो म्हणतो कि वैदिक आर्य हे भारतातीलच असून ते स्थलांतरे/आक्रमणे याद्वारे भारताबाहेर इराणमार्गे युरोपात पसरले. तिसरा मतप्रवाह माझा असून वैदिक धर्म अवेस्त्याचा समकालीन असून दक्षीण अफगाणिस्तानात निर्माण झाला व धर्मप्रसाराच्या मार्गे भारतात आला.

हा धर्म भारतातील नाही याची प्रमाणे थोडक्यात अशी:

१) सिंधू किंवा उत्तरसिंधुकालीन समाजजीवनाचे कसलेही चित्रण ऋग्वेदात नाही.
२) ऋग्वैदिक संस्कृती ही पशुपालकांची संस्कृती असून स्थिर, नागरी व कृषीप्रधान नाही.
३) ऋग्वेदात येणारा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान हा आहे तर अवेस्त्याचा भुगोल उत्तर अफगाणिस्तान आहे.
४) दोन्ही धर्मांत व भाषेतही विलक्षण साम्य आहे.
५) दोन्ही धर्मग्रंथात एकमेकांच्या धर्मात असलेल्या व्य्क्ती व संघर्ष हुबेहुब आले आहेत, अर्थात शत्रुत्वाच्या भावनेने. उदा. ऋग्वैदिक नोढस गौतम अवेस्त्यात येतो तर अवेस्त्याचे झरथुस्ट्र, विश्तास्प, अरिजास्प आदि ऋग्वेदात येतात. पुरु-पौरु हे दोन्ही ग्रंथांत येतात.
६) त्या भुभागातील दास-दस्यु हे अवैदिक समाज अवेस्त्यातही येतात. जर वैदिक धर्म भारतात स्थापन झाला असा आग्रहच धरायचा असेल तर अवेस्त्याचा पारशी धर्मही भारतातच स्थापन झाला असे मान्य करावे लागेल, आणि ते वास्तव नाही.
७)ऋग्वेदात उल्लेखिलेल्या बहुतेक जमाती पश्चिमोत्तर भारत व अफगाणिस्तानासहित इराण व तुर्कमेनिस्तानातील आहेत व त्या आजही अस्तित्वात आहेत. उदा. तुर्वश (तुर प्रांतातील तुराणी/तुर्क ), पख्त (पख्तुन), भलानस (बोलन खिंडीतील लोक), दास-दस्यु (अफगाणिस्तानातील लोक), पर्शू (पर्शियन लोक), गांधारी (गांधार प्रांतातील लोक), पार्थव (पार्थियन लोक), अलिन (काफिरीस्तानातील लोक.) ही अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही जमातनामे अवेस्त्यातही येतात!

थोडक्यात अवेस्त्याचा काळ तोच ऋग्वेदाचा काळ. त्यामुळे ऋग्वेदाचा काळ जितका मागे नेला जाईल तितकाच अवेस्त्याचाही काळ मागे न्यावा लागेल हे उघड आहे. परंतू अन्य समकालीन संस्कृत्या, उदा. ग्रीक, इजिप्शियन, मितान्नी, अस्सिरियन वगैरे या दोहोंचा काळ सनपुर्व १५०० पलीकडे जावू देत नाहीत हेही वास्तव लक्षात घ्यावे लागते.

आता भारतातील अनेक पुरोगामी असे मानतात कि वैदिक आर्यांनी पश्चिमोत्तर भारतावर आक्रमण केले व एतद्देशियांना गुलाम करुन त्यांच्यावर जातीव्यवस्था लादली! समजा त्यांचा तर्क आपण खरा मानला तरी त्यातून ज्या समस्या निर्माण होतात त्यांचे निराकरण कसे करायचे यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. महत्वाची अडचण ही कि ऋग्वेद अथवा वेदोत्तर साहित्य अशी कसलीही घटना नोंदवत नाही. छोटी-मोठी युद्धे नोंदवणारे वैदिक ऋषी एवढी मोठी घटना, जी रक्तरंजित व अनेक युद्धांनी साध्य केली गेलेली नोंदवायला विसरले नसते. विसरले तरी तिचे पडसाद कोठे तरी उमटले असते. ऋग्वेदातील दास-दस्यु म्हणजे भारतीय नव्हेत तर इराण-अफगाणिस्तातील लोक. त्यामुळे या दास-दस्युंचा संबंध "गुलाम" याशी जोडत हरलेले भारतीय ते दास-दस्यू असा लावला येत नाही. खुद्द झरथुस्ट्र स्वत:ला  ’दख्युनाम सुरो’ (दस्युश्रेष्ठ) म्हणवत असे तर दाह (दास) हे अवेस्त्यातील प्रतिष्ठित समाज आहेत. दास म्हणजे गुलाम हा अर्थ ऋग्वेदाला अभिप्रेत नाही. त्यामुळे आर्य आक्रमण सिद्धांत उरबडवेपणा करण्यासाठी वापरता आला तरी ते वास्तव नाही. मुळात दास हे विशेषण अवमानास्पद नव्हते. उदा ऋग्वैदिक महत्वाचा राजा सुदासाच्या नांवातही दास आहे तसेच दिवोदासाच्या नांवातही दास आहे. त्यामुळे ऋग्वेदातील दास-दस्युंशी झालेली युद्धे इराणातील भिन्नधर्मी समाजाशी झालेली युद्धे आहेत. त्यांचा आर्य आक्रमण सिद्धांताशी काहीही संबंध नाही.

मग प्रश्न असा उद्भवेल कि वैदिक धर्म भारतात कसा आला? नेमका कधी आला? हा धर्म भारतात आला तेंव्हा भारतातील विविध भागांतील नेमकी काय स्थिती होती? कोणत्या धर्मकल्पना होत्या? कोनती राजकीय परिस्थिती होती? हा धर्म प्रसार कसा झाला? धर्मांतरित वैदिक नेमके कोण होते? त्यांनी वैदिक साहित्यात नेमकी काय भर घातली? ऋग्वेदातील ऋग्वैदिक धर्म आणि नंतरच्या वैदिक धर्मात कसा फरक पडला? मुळचा धर्म आपले अस्तित्व हरपून बसला कि त्याचीही मुळ धारा अव्याहत चालू राहिली?

या प्रश्नांची उत्तरे आपण क्रमाक्रमाने शोधुयात.

सर्वज्ञ तलगेरी?



माझे मूळ पुस्तक नीट न वाचताच श्रीकांत तलगेरी यांनी शुद्धोदन आहेर यांनी लिहिलेल्या "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या माझ्या पुस्तकावरील अभिप्रायावर आपली प्रतिक्रिया दिली आहे असे स्पष्ट दिसते.अन्यथा त्यांनी एवढी अज्ञानमुलक विधाने आपल्या "आर्यांचे उगमस्थान - एक अज्ञान" या लेखात केली नसती.  श्री. आहेर यांनी त्यांची भुमिका नंतर स्पष्ट केली असली तरी काही स्पष्टीकरणांची अपेक्षा माझ्याकडून बाळगली आहे, त्यामुले खालील थोडक्यात प्रतिसाद.

श्री. तलागेरी यांनी माझ्या "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" माझ्या पुस्तकातील पहिलेच प्रकरण काळजीपुर्वक वाचले असते तर त्यांचा "आर्य वंश" गोंधळ झाला नसता. मी आर्य वंश संकल्पनेला "एकोणिसाव्या शतकातील सर्वात मोठी बौद्धिक दिवाळखोरी म्हणजे आर्य वंश सिद्धांत" असे स्पष्ट केले आहे. तथाकथित "आर्य भाषा" किंवा इंडो-युरोपियन भाषा  (इंयुभा) या ती भषा बोलणा-या एका विशिष्ट ठिकाणी राहणा-या व नंतर आक्रमणे अथवा स्थलांतराने य भाषा अन्यत्र पसरल्या असे हा सिद्धांत मानतो. युरोपियन विद्वान या इंयुभा बोलणा-यांचे मुलस्थान अजुनही शोधत असले तरी ते दक्षीण रशिया, काकेशस पर्वत, मध्य आशिया वगैरे मानतात व त्यांच्यातीलही वाद अजून संपलेला नाही. तलागेरींसारखे लोक इंयुभा बोलणा-यांचे मुलस्थान भारतातील हरियाना असून तेथील वैदिक "आर्यांच्या" काही टोळ्या अफगाणिस्तान मार्गे युरोपापर्यंत पोहोचल्याने इंयुभांचा प्रसार झाला असे हिरीरीने प्रतिपादित करत असून सिंधू संस्कृती ही वैदिक आर्यांचीच व वेद हे सिंधूपुर्व काळातील असेही प्रतिपादित करत असतात. हे सारे सिंधू संस्कृतीवर वैदिक मालकीहक्क प्रस्थापित करण्याची एक वर्चस्वतावादी राजकीय चाल आहे हे उघड आहे. 

मी माझ्या पुस्तकात वर्चस्वतावादी युरोपियन व तलागेरींसारख्या हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) विद्वानांच्या मतांना छेद देणारे विवेचन असंख्य भाषिक, उत्खनित, ग्रांथिक (अवेस्ता व ऋग्वेदाची तुलनात्मक चिकित्सा) पुराव्यांवर केले असून कोणाच्याही स्थलांतर अथवा आक्रमणांनी भाषेतील काही शब्द/संज्ञा पसरल्या तरी त्यामुळे भाषागट निर्माण होत नाहीत हे सिद्ध केले आहे. उदा. तसे झाले असते तर उत्तरेतील तथाकथित आर्यभाषा आणि दक्षीणेतील द्राविडीभाषा भौगोलिक साहचर्य व संपर्क असूनही त्या वेगळ्या गटांच्या झाल्या नसत्या आणि सारा दक्षीण भारताचा प्रचंड भुगोल ओलांडून श्रीलंकेत पुन्हा तेथे कथित इंयुभा गेली नसती. त्यामुळे "भाषेचे जैविक/वांशिक संबंध" माणसे पसरल्याने अथवा आक्रमणे केल्याने निर्माण होत नाहीत हे उघड आहे. 

पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यांचे कोणा एका विशिष्ट स्थानातून, मग ते कोठलेही असो, स्थलांतर अथवा त्यांची आक्रमणे यामुळे आज इंयुभा गट निर्माण झाला हा सिद्धांतच मुळात आर्यवंश सिद्धांतालाच नव्या वेष्टनात गुंडाळून पेश करण्यासारखे आहे व मतितार्थही तोच आहे हे तलागेरींना माहित नसावे असे नाही. अन्यथा त्यांनी वंश व भाषागट यात घोळ घालत माझ्या पुस्तकाच्या प्रतिपाद्य विषयाकडे दुर्लक्ष करत आपले अज्ञान दर्शवले नसते. मी माझ्या पुस्तकात "भारतातून बाहेर" आणि "बाहेरुन भारतात" या दोन्ही सिद्धांतांना पुराव्यांनिशी आव्हान दिले आहे व तेच तलागेरींना खटकले आहे हे दिसते. मुळात इंयुभा विस्तार सिद्धांतच फोल असून तो अप्रत्यक्षपणे वांशिक श्रेष्ठत्वतावादाचेच निदर्शन करतो हे लक्षात घेतले पाहिजे. आर्यवंशवादी आणि आर्यभाषगटवादी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरता कामा नये. भाषांचा इतिहास पाच-सहा हजार वर्ष जुना नसून त्याला किमन ६०,००० वर्षांचा इतिहास आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

दुसरे असे कि भाषागट सिद्धांता्ची चर्चा करतच मला वैदिक धर्माचे मुळस्थान कोणते हे शोधायचे मुख्य आव्हान होते व उर्वरीत पाच प्रकरणे त्याच विषयाला वाहिली आहेत. पुस्तकाच्याच शिर्षकात "Origins of the Vedic Religion..." असे स्पष्ट नमूद असता तलागेरींना मात्र "मुलस्थान कशाचे?" हा प्रश्न विचारावासा वाटतो यात त्यांचे पुर्वग्रहदुषित अज्ञान दिसून येत नाही असे कोण सुज्ञ म्हणेन? वैदिक आर्य भारतातीलच, सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच हे हिरीरीने सिद्ध करु पाहणारे तलागेरी जर कोणी वैदिक धर्म कोठला आणि त्याचे निर्माते कोण हे शोधत असतील तर ते  मात्र "अज्ञान" "गोंधळ" वगैरे म्हणत असतील तर, श्री. आहेर म्हणाले त्याप्रमाणे, हा ज्ञानबंदीचाच वर्चस्ववादी प्रकार आहे. माझा कसलाही गोंधळ झालेला नाही, झालाच असेल तर तो सर्वस्वी श्री. तलागेरी यांचा आहे. झापडबंद वर्चस्वतावादी विचारसरणीने ज्ञान पुढे जात नसून निरपेक्ष पद्धतीनेच संशोधन पुढे जाते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

(published in today's Maharashtra Times. last few lines are edited while publishing...)




Monday, October 19, 2015

...आणि पानिपत.



...आणि पानिपत.

- राकेश पाटील





हि एक समाजैतीहासिक कादंबरी. वरुडे गावातील महार समाजाच्या चार पिढ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास लेखक संजय सोनवणी ह्यांनी तत्कालीन राजकीय इतिहासाच्या एक विस्तृत कालखंडाच्या पार्श्वभूमीवर चितारला आहे. साधारणता: शिवकालीन काळात शेवटच्या टप्प्यात हा इतिहासपट सुरु होतो. पुढे शिवरायांच्या स्वराज्याच्या न्याय्य आणि प्रजाहितदक्ष सामाजिक व्यवस्थेच्या आठवणी तेवढ्या उरत जातात. उत्तरोत्तर मराठेशाहीतील सामाजिक व्यवस्था कशी मोंगली रूप धारण करते आणि पेशवाईत अक्षरश: विषमतेचा कडेलोट होत जातो. त्या सामाजिक स्थित्यंतराचा हा विस्तृत काळपट. भिमनाक - रायनाक आणि येळ्नाक उर्फ हसन - सिदनाक - पुन्हा भीमनाक असा हा चार पिढ्यांचा सामाजिक इतिहास. सुमारे १०० वर्षांचा ह्या सामाजिक इतिहासाची सुरुवात शिवाजीमहाराजांच्या निधनाच्या आसपास होते आणि शेवट पानिपतावर!

औरंगजेब महाराष्ट्रात उतरतो आणि स्वराज्याच्या पडझडीला सुरुवात होते. संभाजीची हत्या , राजारामाचे पलायन, शाहू-येसूबाईला अटक अशा त्या कोसळत्या काळात मोगलांच्या वरवंट्याखाली स्वराज्याची व्यवस्था पार भरडली जाते. तरीही शिवाजीच्या प्रेरणेने भरलेला माणूस त्या मोगलाइचे आव्हान पेलून उभा राहतो. परंतु राजकीय व्यवस्था रंग बदलू लागते. एके काळी औरंग्झेबाची झोप उडवणारे संताजी-धनाजीमध्ये यादवी माजते. शाहुच्या सुटकेने स्वराज्यामाध्येच अंदागोंदी माजते आणि शाहू-ताराबाई, सातारा-कोल्हापूर अशी उभी फुट मराठेशाहीत पडते. त्याची परिणीती पुढे पेशवाईच्या वर्चस्वात होऊन शेवटी ह्या व्यवस्थेची शंभरी पानिपतावर भरते. असा साधारण इतिहास राजकीय इतिहास आहे. कादंबरीत हा इत्यंभूत इतिहास दक्खन-महाराष्ट्रापासून ते उत्तरेत दिल्लीपर्यंत अवघ्या हिंदुस्तानच्या पार्श्वभूमीवर अत्यंत बारीकसारीक तपशिलासह वावरत असतो. ह्या राजकीय इतिहासाचा वापर एका पार्श्वाभूमिसारखाच ठेवून लेखकाने त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सामाजिक इतिहासाची अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे.

एकीकडे हिंदुस्तानांत मोगल साम्राज्याचे विघटन. नवाब-निजाम-वजीर-उमराव ह्यांनी पोखरून काढलेले दिल्लीचे साम्राज्य. मुल्लामौलवीनि अब्दाली-नादीरशहा अशा परकीयांशी संधान बांधून नामधारी केलेलं दिल्लीच्या बादशहाचं तख्त. तर दुसरीकडे दख्खनेत नामधारी झालेलि मराठ्यांची छत्रपतीची गादी. पेशवा-सरदार-सुभेदार आणि ब्राह्मणी व्यवस्थेने नामशेष केलेलि शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना. दिल्लीपासून ते दख्खनेपर्यंत झालेलं हे राजकीय पानिपत. त्यातून निर्माण झालेली सामाजिक अनागोंदी, रयतेची लुटालूट, नासधूस...म्हणजेच सामाजिक पानिपत!

कादंबरी मुख्यत: वरुडे गाव आणि गावकरी ह्यांच्या दैनंदिन जीवनावर बेतलेली आहे. गावातील पाटीलकी, त्या पाटीलकिसाठीची साठमारी, गावातील मोरबा बामण, बलुतेदारी, महार-येसकरी, त्यांची म्हारकी, भावकी...आणि ह्या सर्वांचा मिळून चाललेला गावगाडा... लेखकाने वरुड्यातील ह्या समाजव्यवस्थेला कादंबरीत मध्यवर्ती स्थान दिले आहे. आणि ह्या गावगाड्याचे बदलत्या राजकीय व्यवस्थेने बदललेले रंगरूप ह्याचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे ...आणि पानिपत.
रायानक महार हा कादंबरीतला मध्यवर्ती नायक. त्याचा बाप भिमनाक महार हे वरुड्यातील एक शहाणपण. शिवाजी राजांच्या काळातील महार समाजाच्या सामाजिक अधिकारांवर आणि त्याआधी बिदरच्या बादशाहने विठू महाराला बहाल केलेल्या सनदेवर भाष्य करणारा म्हातारा भिमनाक आणि पुढे चिंध्या रामोशी आणि महार पोरांनी दरोडेखोरी चालू केली तेव्हा बदलत्या काळात त्याला पाठींबा देणारा भिमनाक कादंबरीच्या सुरुवातीच्या काळातील सामाजिक व्यवस्थेचा साक्षीदार असतो. ह्या भिमनाक महाराची पुढची पिढी म्हणजे त्याची दोन मुले रायनाक आणि येळ्नाक. हा रायनाक कादंबरीचा मूळ नायक असावा अशी त्याची मध्यवर्ती भूमिका आहे. कधीकाळी रायनाक संताजीच्या लष्करात पाइक होता. स्वराज्यासाठी शौर्याने लढताना तो जायबंदी होऊन पुन्हा गावात येउन म्हारकीची कामे इमानेइतबारे करतोय. जी धर्म व्यवस्था, जी समाज व्यवस्था रायनाकला पदोपदी तुडवत राहते तिच्याशी तो इमानदारीने निभावत राहतो. कधी बंड करून उठतो आणि आपल्या मित्राच्या बायकोवर वंगाळ नजर टाकणाऱ्या शिंप्याचा खून देखील करतो. कधीतरी दरोडेखोर बनायचं स्वप्न उरी बाळगतो. पण शेवटी त्याच्यातला माणूस ह्या क्षणिक हैवानीवर मात करून उरतो. त्याची बायकोच्या बाळंतपानात गुदारल्याने मेल्या भावाची बायको सिदनाकचा साभाळ करताना रायनाककडे ओढली जाते. गावातही तशी कुजबुज चालते. पण ह्या दुनियादारीला रायानाक आपल्या जन्मजात माणुसकीने जिंकून उरतो. कधी मोघली सैन्याचा मार खाऊन गावाशी बेईमानी न करणारा रायानाक . कधी येलणाकने दिलेल्या अशर्फ्या महारवाड्याला जगविण्यासाठी वापरणारा रायानाक . कधी दुष्काळात गांजलेला रायनाक. चिंध्या रामोशी आणि महार दरोडेखोर पकडले गेले तेव्हा हकनाक मार पडलेला रायनाक. निजामाने गाव जाळलं तेव्हा ढसाढसा रडणारा रायनाक. पाटलाच्या मळ्यावर राबणारा रायनाक. अशा अनेक रूपांत रायनाक महार कादंबरीत वावरतो. अश्रुनी भिजलेला इतिहास सांगत राहतो!

दुसरीकडे ह्या सामाजिक पडझडीच्या काळात विषमतेला आव्हान देणारे आणखी एक स्थित्यंतर घडून येते. ते म्हणजे रायनाकच्या भावाचे, येलनाकचे धर्मांतर. राजगडावरील लढाईत अशार्फिखान बहादुरीने लढणाऱ्या येलनाकला गिरफ्तार करतो. त्याला इस्लामच्या समानतेत आणतो आणि येलनाकचा हसन बनतो. हा अशार्फिखान सुद्धा मोरबा ब्राह्मणाचा बाटलेला चुलता अन्ता जीवाजी असतो. हसन अशर्फिखान सोबत मोगली साम्राज्यात परततो. हसनला अमिना बिवी प्राप्त होते आणि बख्तियार नावाचा त्याचा शहजादा! कादंबरी इथे मुस्लिम धर्मांतराच्या विषयाला हात घालते. इस्लाम स्वीकारणारे अशर्फिखानासारखे सवर्ण हिंदू तसेच हसनसारखे दलित हिंदू ह्यांच्यामाध्यमातून तत्कालीन हिंदू-मुस्लिम धर्मांतरे आणि त्यातील सामाजिक व्यवस्थेतील अभिसरणावर कादंबरी भाष्य करीत राहते.

ऊतरेत मोगल बादशाहीच्या धामधुमीत हसन एका महत्वाच्या लढाईत खुद्द जुल्फीकारखानाला ठार करण्याचा पराक्रम गाजवतो. अशर्फिखान हसनला त्याच्या लढाईच्या तंत्राबद्दल विचारतो तेव्हा हसन शिवाजीराजाची आठवण काढतो. शिवरायांच्या प्रजाहीताची वृत्ती हसन त्याच्या जहागिरीच्या कारभारात बाळगताना दिसतो. ह्याउलट त्याचा मुलगा बख्तियार अत्यंत अय्याश निपजतो. अशर्फिखान आणि सय्यद बंधूंशी संधान बांधून तर त्यांच्यानंतर नजीबखान रोहील्याच्या साथीने हसन आणि बख्तियार उत्तरेत नावारूपाला येतात. येळनाक उर्फ हसनच्या माध्यमातून कादंबरी उत्तर हिंदुस्तानातील आणि दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक इतिहासावर भाष्य करते. त्यातून पुढे अब्दाली, मराठे शिंदे-होळकर, जाट-राजपूत-नवाब ह्यांचे राजकीय डावपेच आणि त्यातून घडलेले पानिपतचे युद्ध हा कादंबरीचा उत्तरार्ध आहे.
मराठेशाहीच्या अंतर्गत यादवीने, शाहुच्या मोगली मांडलीकत्वाने, पेशव्यांच्या बामणशाहीने शिवरायांच्या स्वराज्याच्या मुलभूत संकल्पनेलाच सुरुंग लागल्याने सामाजिक व्यवस्था पार ढेपाळत गेलेली असते. राजकीय व्यवस्था देखील तशीच अध:पतित होत जाते. गावगाड्यावर ह्या बदलत्या सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे ओरखडे उठत राहतात. सत्तासंघर्ष, दुष्काळ, वतनदारी, आपसातील यादवी, वेठबिगारी, महारांचे नरबळी, तामाशाबाजी अशा विविध स्तरांवर सामाजिक अध:पतन घडत राहते. ह्या सामाजिक पानिपताचा थेट महाराष्ट्रातून पार दिल्लीपर्यंत एका विशाल भौगोलिक आणि राजकीय परिप्रेक्षात वेध घेण्याचे काम कादंबरीने केले आहे.

गावातली पाटीलकी आणि त्यासाठीच्या काळेपाटील , पवारपाटील ह्यांच्यातील सत्तासंघर्ष देखील गावगाड्याच्या पाचवीला पुजलेली व्यवस्था. शाहू-ताराबाई संघर्षात भवानराव पाटील स्वत: रायनाकसोबत धनाजीजाधवला जाऊन मिळतो... आणि त्या खोट्या लढाईत भवानराव हकनाक बळी जातो. मराठ्यांच्या आपसातील बेबनावाचा असा फटका गावावर पडतो. पाटलाची बायको सती जाते तेव्हा अवघ्या काही ओळीत लेखकाने सतीचा जो हृदयद्रावक थरार उभा केलाय...! 

.. अमृत पाटलाची बटिक चांगुणा आणि तिचा मुलगा संताजी. संताजी आणि भिमनाकची दोस्ती. चांगुणा एक म्हारीण असल्याचे समजल्याने पाटलाचे झालेले अध:पतन. ह्या सर्व मानवी भावभावनांचा गुंता कादंबरी उलगडत राहते.
एकेकाळी गावात ब्राह्मणी व्यवस्थेचा कट्टर समर्थक असलेला मोरबा ब्राह्मण स्वत:च ह्या सामाजिक पानिपताने हादरून जातो आणि उतारवयात तो ह्या भटकुलशाहीविरोधात बंड करून उठतो. गावात सतीची चाल विरोध करून बंद पाडतो! त्यासाठी ब्रह्मवृंद मोरबालाच वाळीत टाकतो. मानवी भाव-भावनांना लेखकाने किती टोकावर नेउन ठेवलेय, ते कादंबरीच्या पानापानात जाणवत राहते.

रायनाकचा मुलगा सिदनाक महार हा कादंबरीच्या सुरुवातीला अवतरतो खरा, परंतु तेव्हा म्हातारा झालेला रायानाक कथानकाचा ताबा घेत जातो. कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात पेशवाइतिल निघृण जातीय विषमतेच्या व्यवस्थेचा सिदनाक बळी ठरतो. शिवाशिविच्या बामणशाहीने पुण्यात महारांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात मोरबा ब्राह्मण निवर्तल्याचा सांगावा घेवून पुण्यात आलेला सिदनाकची सावली ब्राह्मणावर पडली. सिदनाकचा निघ्रून शिरच्छेद करून त्याच्या मुंडक्याचा चेंडू करून खेळवला गेला. शिवरायांच्या स्वराज्यातील सामाजिक सलोख्याचे आणि न्यायव्यवस्थेचे इथे खर्या अर्थाने पानिपत होते !

इतपत बदलत्या व्यवस्थेचे अन्याय सहन करून उभा राहिलेला रायनाक सिदनाकच्या ह्या अमानुष हत्येने पुरता कोसळतो. सिदनाकचा मुलगा भीमनाक बापाची वेडी धर्मनिष्ठा सोडून आपल्या आज्जाच्या वळणावर गेलेला. रायनाक त्याला उत्तरेत येळ्नाककडे जाऊन धर्मांतर करण्याचा सल्ला देतो. स्वत: कितीही निष्ठेने ह्या धर्मव्यवस्थेत पिचून राहिलो तरीही शेवटी येळ्नाकने हसन होऊन जे धर्मांतर केले त्या निर्णयापुढे त्याने शरणागती पत्करली, ती अशी.

रायनाकचा नातू भिमनाक आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठतो. आयुष्यभर हिंदू राहून पिचत राहिलेला रायनाक त्याला मुस्लिम होण्याची प्रेरणा देतो. उत्तरेत हसन-बख्तियारकडे पाठवून देतो. भीमनाकचा बालमित्र पाटलाचा लेकावळा संताजी मराठी सैन्यात होता. त्याच्या ओळखीने भीमनाक आणि त्याची बायको सुंद्री दोघे उत्तरेत निघालेल्या भाऊच्या मराठी सैन्यात बुणगे बनून सामील होतात. ऐन पानिपतावर तो बालमित्रच सुन्द्रीला घेवून चक्क पळून जातो. भिमनाक अगतिक तरीही सुडाने पेटलेला.

भीमनाक आपला सूड उगविण्यासाठी भाऊची , पेशव्याची गर्दन मारण्याच्या तयारीत. त्यासाठी तो भाऊच्या शामियाण्यापर्यंत पोहोचतो पण... तसाच तो दुसरीकडे बख्तियारपर्यंत पोहोचतो. त्याला मराठी लष्करातील खबरा पुरवतो. बख्तियार त्याला वापरून घेतो पण दोघांमध्ये कोणतीही आपलेपणाची भावना उरलेली नाही. बख्तियारचाचा म्हणजे काही येलनाक नव्हे. अमिरजादा बख्तियारलां भिमनाक मध्ये स्वारस्य उरलेले नाही. काही ऋणानुबंध उरलेले नाहीत. भिमनाकला बख्तियारचाचा आणि इस्लाम मध्ये स्वारस्य उरलेले नाहीये. मानवी भावभावनांचा हा कल्लोळ लेखकाने कादंबरीभर पेरून ठेवलाय...

अखेर पानिपत घडते. मराठी लष्कर उद्ध्वस्त होते. पखाल घेऊन फिरणारा भिमनाक देखील युद्धाच्या भीषणतेणे पुरता कोसळतो. त्याच्या हाती जखमी भाऊ सापडतो. पण आता सूडच शील्लक राहिलेला नाही. माणुसकी पुन्हा एकदा सर्व अध:पतनातून जिंकून उरते. तो भाऊला वाचवतो. जीवावर खेळून यमुनापार करतो. महिनाभर त्याची सेवा करून भाऊला जगवतो. भाऊला त्याच्या सुडाची कहाणी सांगतो. भाऊ हेलावून जातो आणि क्षमा मागतो! पुरता हरलेला भाऊ मन:शांतीसाठी उत्तरेकडे निघून जातो.

मागे उरतो एकाकी भिमनाक... तसाच वरुड्यात एकाकी रायनाक...आणि उरते ते पानिपत, चार पिढ्यांच्या सामाजिक इतिहासाचे. राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर चितारलेली सामाजिक इतिहासाची हि एक सामाजैतिहासिक कादंबरी. मराठी कादंबरीतला एक मैलाचा दगड. ...आणि पानिपत.


---राकेश पाटील

...आणि पानिपत 
लेखक : संजय सोनवणी
प्राजक्त प्रकाशन 
मुल्य : ४००/-

Sunday, October 18, 2015

काहीतरी बोला!

या हिंस्त्र झालेल्या
नपुंसकांच्या कोलाहलात
माणूस हरवतो आहे...

माणसांनो
जेथेही असाल
जागे व्हा
या कोलाहलावरही
तुमचा साधा मानवतेचा शब्द
मात करेल...

पण बोला...

गप्प राहणे म्हणजे
या विकृत्यांना
समर्थन देणे
स्वत:ही विकृत आणि नपुंसक
असल्याचे सिद्ध करणे

आणि मग एक दिवस स्वत:चाही विनाश करुन घेणे!

नको असेल विनाश
मानवतेचा विध्वंस...

तर जागे व्हा...

काहीतरी बोला!

वेद हे हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहेत काय?



सध्या वेद हे हिंदू धर्माचे मुख्य अंग आहे असे मानले जाते. पण हिंदू धर्माची व्याख्या मात्र होत नाही, कारण तशी व्याख्या करण्यात वेदच अडचणीचे ठरतात हे धर्माभ्यासकांना माहितच आहे. एक तर वेद पठण, वेदोक्त संस्कार व वैदिक कर्मकांड करण्याचा/करवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रैवर्णिकांना आहे, ज्यांची लोकसंख्या अधिकाधिक १५% आहे. उर्वरितांना तसे अधिकार कधीही नव्हते व नाहीत त्यामुळे वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत आहेत असे मानणारे दांभिक ठरतात हे उघड आहे. परंतू वैदिकही हिंदुच आहेत या जाणीवपुर्वक जोपासल्या गेलेल्या भ्रमापायी अनेकांचा गैरसमज होतो हेही वास्तव आहे. हिंदू शब्दाची व्याख्या का झाली नाही यासाठी आपण आधीचे व्याख्या करण्याचे प्रयत्न पाहुयात.

खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.

१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.

२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.

३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.

४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे. शिवाय हिंदू कोड बिल हे बौद्ध व जैन धर्मियांनाही लागु असल्याने तेही हिंदू ठरतील, पण ते वास्तव नाही.

५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:

अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.

ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.

६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम

अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.

श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)

 आता वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत अथवा धर्मग्रंथ होऊ शकत नाहीत त्याचीही तपासणी केली पाहिजे. ती खालीलप्रमाणे-

१) वैदिक धर्मग्रंथांत (हिंदू नव्हे) इंद्र, वरुण, नासत्य, मित्र, इत्यादि जवळपास ६४५ देवता आहेत. यात एकही अन्य हिंदू पुजतात ती देवता नाही. यजुर्वेदात तर "न तस्य प्रतिमा अस्ति" म्हणत मुर्ती/प्रतिमापुजेचा निषेध तर केलाच आहे. (यजु. ३२.३) पण ऋग्वेद ७.२१.५ आणि १०.९९.३ मद्ध्ये शिवाची "शिस्नदेव" म्हणून निर्भत्सना केली असून लिंगपुजकांचा केवढा ्द्वेष वेदरचैते करत असत याचे स्पष्ट दिग्दर्शन होते. विनायक गणपतीला वैदिक लोक तर विघ्नकर्ता मानत असत, विघ्नहर्ता नव्हे हे तर सर्वविदित आहे. म्हणजे ज्या देवता हिंदू भजतात, त्यांचा निर्देशच मुळात वेदांमद्ध्ये अवमानात्मक येतो ते ग्रंथ अर्थातच हिंदुंचे धर्मग्रंथ असू शकत नाहीत.

२) शिवाला यज्ञाचा विध्वंसक मानले जाते. यज्ञांत शिवाला हवि दिला जात नाही. शैव अथवा शैवप्रधान मुर्तीपुजक लिगरुपाने शिव-शक्ती पुजा करतात, यज्ञ हा शैवांचा अर्थात हिंदुंचा कर्मकांडाचा भाग नाही. रुद्र आणि शिव यांचा काडीएवढाही संबंध नाही हे मी अन्यत्र दाखवून दिलेलेच आहे.

३) वेद अथवा वैदिक समाजरचना ही पुरुषसत्ता प्रधान असून वेदांत फक्त अदिती, रात्री, पृथ्वी, सरस्वती व उषस या स्त्रीदेवता आहेत. अदिती (देवतांची माता) सोडली तर बाकी नदी व निसर्गातील घटनांच्या स्त्रैण प्रतिनिधी आहेत. हिंदू शैवप्रधान धर्मात मात्र शिव व शक्ती हे नेहमीच युग्म स्वरुपात समतेने पुजले जातात.

४) शिवपुजा सिंधू पुर्व काळापासून प्रचलित असून वेदरचना ही अत्यंत उत्तरकालीन आहे. त्यात शिवप्रधानता नसल्याने ते हिंदू धर्माचे अंग होऊ शकत नाहीत. वेदरचना भारतात झालेली नाही. एतद्देशियांचा धर्म हा वैदिक धर्मापेक्षा सर्वस्वी वेगळा असल्याचे हेच कारण आहे. त्यामुळे वैदिक साहित्य हे हिम्दू धर्माचा स्त्रोत नाहीत.

५) वैदिक लोकांत जानवे घालण्याची प्रथा नव्हती. फक्त यज्ञप्रसंगी यज्ञोपवित (जानवे) घालण्याची प्रथा होती. परंतू हा धर्म भारतात आल्यानंतर या धर्माच्या लोकांनी अन्य धर्मियांपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी जानवे नित्य घालण्यास सुरुवात केली. (The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor)

६) वैदिक आचार व तत्वज्ञान सर्वस्वी वेगळे असून त्या धर्माबाहेर जे लोक होते त्यांना ते शूद्र म्हणत. त्यांना वेदाधिकार असण्याचे कारण नव्हते व नाही कारण त्यांचा धर्म सर्वस्वी स्वतंत्र होता. त्यांचे स्वत:चे पुरोहित होते व आहेत, जे आज मागे ढकलले गेले आहेत...उदा गुरव. कारण पोटर्थी वैदिकांनी बव्हंशी देवतांचे अपहरण केले अथवा स्वसमाधानासाठी त्यांना वैदिक देवतांशी जुळवायचा अयशस्वी प्रयत्न केला. शक्तीला अदितीशी तर शिवाला रुद्राशी, विठ्ठल-बालाजीला (जे शैव होते) त्यांना वैदिक विष्णुशी जुळवायचे प्रयत्न केवळ पोटार्थी कारणासाठी होते, एकधर्मीय होते म्हणून नाही.

७) वेदांशी हिंदुंचा कधी संबंधच आला नसल्याने वैदिक धर्म म्हणजे हिंदू हे कोनालाही मान्य होण्याचे कारण नाही.

८) वैदिक स्मृत्या या वैदिक धर्मापुरत्या मर्यादित होत्या. अन्यांनी त्या पाळल्याचे एकही उदाहरण नाही. शिशुनाग, नंद, मौर्य, सातवाहन ते हरीहर-बुक्क हे सारे  सम्राट शूद्र होते. वैदिक धर्मनियमांनुसार शुद्रांना राजेपण तर सोडाच...संपत्तीसंचय करण्याचाही अधिकार नाही. (पहा - मनुस्मृती)

९) वेदांतील एकही देवता हिंदू व्यक्ती पुजत नाही, त्यांची मंदिरेही नाहीत. वेदांतिल त्या देवता वैदिक धर्मियांच्याच होत्या त्यामुळे हिंदुंना त्या पुज्य वाटण्याचे काही कारण नाही.

१०) वैदिक मंत्र त्रैवर्णिकांसाठी तर पुराणोक्त शुद्रांसाठी अशी वाटणी पुरातन काळापासुन होतीच. पुराण्काळ नंतरचा नसून "पुराण" या शब्दातच पुरातनता निहित आहे. पौराणिक मंत्र हे सर्वस्वी आजही ज्या देवता हिंदू पुजतात त्यांबाबत असून वैदिक मंत्र हे वैदिक देवतांचे असतात. ही विभाजनी सरळ सरळ दर्शवते कि शुद्रांचा धर्म वेगळा होता व आहे तर वैदिकांचा वेगळा आहे.

वरील अल्प विवेचन पाहता वेद हे हिंदु धर्मियांचे ना मुलस्त्रोत आहेत ना धर्मग्रंथ आहेत. ते वैदिकांचे धर्मग्रंथ असून त्यांच्याशी व ते प्रमाण मानणा-यांशी हिंदुंचा संबंध नाही. वेदांमद्ध्ये हिंदुंना उपयुक्त असे काहीएक नसून उलट हा जन्माधारित विषमतेचे तत्वज्ञान मांडणारे ग्रंथ आहेत हे पुरुषसुक्तावरुनच स्पष्ट दिसते. विषमतेच्या तत्वज्ञानाच्या प्रभावात हिंदुही ती उच्चनीचता व जातीभेद पाळु लागले हा त्यांचा दोष असून वैदिक आपला  प्रभाव निर्माण करण्यात त्यामुळेच यशस्वी झाले असे म्हणने क्रमप्राप्त आहे. हा वर्चस्वतावादी प्रभाव झिडकारुन लावल्याखेरीज हिंदुंचे कल्याण नाही एवढेच!

(हिंदुंचे तत्वज्ञान व त्यांचे धर्मसाहित्य कोणते याबाबत सविस्तर नवीन लेखात देतो.)

Saturday, October 17, 2015

वैदिकांपासून सावध!

"गाय मारणा-याला ठार करणेच योग्य" अशा आशयाचा लेख वेदांचा हवाला देवून तुफैल चतुर्वेदी यांनी पांचजन्यमद्ध्ये लिहिला असून तसे वेदांत आदेशच आहेत असेही प्रतिपादन केले आहे.

वैदिक धर्मांधांनी किती अधम पातळी गाठली याचे हे एक शर्मनाक उदाहरण आहे. मुळात वेदात असली कसलीही धर्माज्ञा नाही. दुसरी बाब म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ नाहीत. त्यामुळे वेदात काय सांगितले ते हिंदुंना कधीच लागु नव्हते व नाही. मुस्लिमद्वेषाच्या नावाखाली हिंदुंवर वैदिकता थोपण्याचे आणि भारतीय मुस्लिमांना भयभीत करण्याचे हे कारस्थान आहे.

गाय, बैल व इतर (पाच नखे असलेले अभक्ष प्राणी वगळता) अन्य खाद्य प्राणी वैदिक खात असत व यज्ञांतही बळी देत असत. गोवधासाठी गोमेध यज्ञ तर अश्वासाठी अश्वमेध यज्ञ केला जात असे. (संदर्भ-The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor. आणि पहा ऋग्वेद १.१६२.२, ६.१७.१, १०.८५.१३, कृष्ण यजुर्वेद- ८.२१, १.६२.२, शुक्ल यजुर्वेद अध्याय २४...)असे खूप संदर्भ वेदात व वैदिक साहित्यात येतात. तरीही वैदिकांची लबाडी अशी कि आताही कोणाला वेदच माहित नाहीत असे समजून कोलांटउड्या मारतात. लांड्यालबाड्या करून लोकांना फसवायचा आणि भडकवायचा काळ गेला आहे हे यांनी लक्षात ठेवावे.

हिंदुंनी वैदिकांपासून आता तर जास्तच सावध असले पाहिजे. वेदवर्चस्वता लादण्याची आणि मुस्लिम द्वेषाला हिंसेची धार देण्याची रणनिती अंमलात आणन्याची ही तयारी दिसते आहे!

माणसांच्या हत्येचे लंगडे समर्थन करणा-या प्रवृत्तीचा निषेध!

संघर्ष शेवटी स्वत:शीच असतो!

प्रत्येकजण आपापल्या स्थितीचे अपत्य असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा धनी असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा गुलामही असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा अनिवार्य बळी असतो...
संघर्ष कोणाचा कोणाशीही वाटत असला
तरी प्रत्येकाचा संघर्ष शेवटी स्वत:शीच असतो!

. . .

दांभिकांचा, सोयधरू लोकांचा सुळसुळाट जेंव्हा कोणत्याही समाजात होतो तेंव्हा हे निश्चित समजून चालावे कि त्या समाजाचा विनाश अटळ आहे.
बाकी सारे अरण्यरुदन आहे.

. . .

बामसेफ अथवा तत्सम संघटनानी पसरवलेल्या अविचारी, अनभ्यासी, सांस्कृतिक अज्ञानातून, आमचे लोक सोडा, विचारवंतही जोवर बाहेर पडत नाहीत, निरपेक्षपणे आपली भुमिका निश्चित करत नाहीत तोवर ते ज्यांच्यासाठी काम करतो असा आव आणतात त्यांचेच वैचारिक वाटोळे करत राहतील यात शंका नाही.
असे पुरोगामी म्हणवणारे समाजाला प्रतिगाम्यांएवढेच विघातक आहेत. कारण यांना ना धड आगा ना धड पीछा ...काही माहितच नाही....किंवा जे मानायचे ते केवळ सोयीचे ...म्हणून हे वारंवार पराजित होतात.
आज भारतात जर प्रतिगाम्यांचा, तात्पुरता का होईना, विजय होत असेल तर त्याला तेवढेच जबाबदार हे तथाकथित निर्बुद्ध पुरोगामी आहेत...
कारण प्रतिगाम्यांएवढीच निर्बुद्धपणची बीजे त्यांनीही रुजवून ठेवलेली आहेत...
आणि म्हणुनच आज "पुरोगामी" हा शब्द शिवीसारखा बनला आहे...याचे भान यांना येत नाही हे अधिकचे दुर्दैव आहे!

. . .

मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.

. . .
वातावरणातील दाटून आलेला उन्माद सामान्य जनतेलाही भयभित करून सोडत आहे.
उन्माद्यांच्या झुंडी सावजांच्या शोधात आहेत.
विवेकी लोकांची जबाबदारी कधी नव्हे एवढी वाढली आहे.

. . .

आपल्याला आजचे आहे ते ज्ञान आत्मसात करत भविष्यकालीन ज्ञानाकडे जायचे कि भुतकालीन गहन अज्ञानाकडे जायचे याचा निर्णय आम्ही घेणार आहोत काय?
घेणार नसू तर आम्हाला कसलेही भविष्य नाही!

. . .

मागे अनंत काळ, विश्वाच्या जन्मापासून, पृथ्वीवर सूर्य उगवला...नितनियमाने मावळला आहे. जेंव्हा पृथ्वीवर पहिल्यांदा सूर्य उगवला असेल तेंव्हा तो पहायला मानवजात अस्तित्वातच नव्हती...
सूर्य पुढेही नितनेमाने उगवत राहील...सृष्टीच्या अंतापर्यंत...
पण तो पहायला पृथ्वीतलावर माणुस असेल कि नाही हा खरा प्रश्न आहे....!

. . .

Friday, October 16, 2015

पैगंबरांचे विवाह

मोहम्मद पैगंबरांच्या अनेक विवाहांबद्दल अधून कधून चर्चा होत असते. प्रथम हे लक्षात घ्यावे लागते कि अरब हे कबिला जीवनातील होते आणि बव्हंशी कबिले इस्लाम-पुर्व काळात आपापसात लढयांमद्ध्ये गर्क असत. वाळवंटी प्रदेशामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी असल्याने मांसाहारावरच अधिक भर होता. माणसाच्या खाद्यप्रथा, वस्त्र संस्कृती व धर्मसंस्कृतीवर ज्या पद्धतीने जीवनयापन करावे लागते त्याचा मोठा पगडा असतो. या सामाजिक संस्कृतीकडे तेथील भौगोलिक परिस्थितीच्याच चौकटीत पहावे लागते.
पैगंबरांनी आयुष्यात एकुण तेरा विवाह केले. काही सुत्रांच्यानुसार ही संख्या १६ आहे. याखेरीज त्यांच्या दासीही होत्या अशी मान्यता आहे. त्यांची पहिली पत्नी खदिजा ही त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्ष मोठी होती. ती विधवा होती. श्रीमंत होती. विवाहानंतर उभयतांना ६ अपत्ये झाली. त्यामुळे खदिजा ही पैगंबरांपेक्षा जास्त वयस्कर नसावी असे काही विद्वान मानतात. पैगंबरांना सुरुवातीच्या काळात तिने मोठी मदत केली. ती व्यावसायिक व्यवस्थापनात कुशल होती. पैगंबरांना कुराण स्फुरू लागले व त्यांना विरोध सुरु झाला त्या काळात खदिजा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. खदिजाच्या मृत्युपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. या काळात ते मक्केतच होते. हा काळ त्यांच्या दृष्टीने संघर्षपुर्ण होता.
अरब टोळ्यांत निरंतर असनारा अंतर्गत संघर्ष संपवायचा असेल तर त्यांच्यात एकवाक्यता आणने गरजेचे होते. प्रत्येक टोळीची स्वतंत्र पाषाणदैवते होती व ती सर्व मक्का येथे स्थानापन्न होती.
मदिनेला हिजरत केल्यानंतर पैगंबरांनी सावदा या इस्लाम स्विकारलेल्या व त्यामुळे त्रास व कष्ट स्विकाराव्या लागणा-या मुलीशी विवाह केला. ९ वर्षेय अयेशाशी नंतर पाठोपठ विवाह केला. आयेशा ही अबु बक्रची मुलगी होती आणि अबुही इस्लाम सर्वप्रथम स्विकारण-यांपैकी होता. या काळात इस्लाम स्विकारलेले लोक कमी होते. आयेशाचा विवाह आधी एका गैर-इस्लामियाशी ठरलाही होता. पण अबु बक्रच्या विनंतीनुसार त्यांनी तिच्याशी विवाह केला. आयेशा अल्पवयीन होती व तिच्याशी विवाह केल्याबद्दल पैगंबरांवर आरोप केला जातो. पण अरब मुली लवकर वयात येत आणि लग्न ठरल्त्यानंतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष विवाह झाला.
खदिजाप्रमानेच इस्लामच्या प्रसारात आयेशाचा मोठा वाटा आहे. ती विद्वान तर होतीच पण पैगंबरांच्य देहांतानंतर जवळपास ४४ वर्ष इस्लामच्या प्रसारात घालवली. हदिथमधील बरेच लेखन तिचे मानले जाते.
आयेशानंतर पैगंबरांनी अनेक विवाह केले. ते बव्हंशी मक्केतील युद्धात झालेल्या विधवांशी. या बहुविवाहांमागे अनेक कारणे दिली जातात.
१) विविध टोळ्यांशी रक्तसंबंध जुळवत त्यांचा विरोध सौम्य करणे.
२) विधवांबाबतचे त्यांचे अनुकंपेचे धोरण.
३) इस्लामचा प्रसार.
काहीही असले तरी पैगंबरांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्युपर्यंत दुसरा विवाह केला नाही हे एक वास्तव आहे. अरबांत बहुपत्नीकत्व (भारतात होते तसेच) ही सर्वसाधारण बाब होती. अल्पवयीन मुलीशी विवाह (जे भारतातही विपुलतेने होत) नवीन नव्हते. सुरुवातीच्या काळात इस्लामियांची संख्या कमी असल्याने मुली द्यायच्या कोनाला हाही प्रश्न उपस्थित झाला असेल.
इस्लामच्या निर्मितीला आणि त्या धर्मश्रद्धांना तत्कालीन समाजस्थिती आणि जेथे हा धर्म स्थापन झाला त्याचा भुगोल विचारात घ्यावा लागतो. पैगंबरांनी धर्माच्य नांवाखाली आपापसात लढणा-या अरबांत ऐक्य साधले. इस्लाम नंतर झपाट्याने पसरला. पण अरबी भुगोल आणि त्यानुसार असणा-या खाद्य आणि इतर वेषभुषेसहितच्या प्रथाही अन्य भागांतील भुगोलांचा विचार न करता अंधपणे लादल्या गेल्या अथवा धर्माच्या नांवाखाली स्विकारल्या गेल्या. अरबस्तानातील वाळुची वादळे, उष्मा यामुळे पुरुषांना तोंड झाकणारा सफा व पायघोळ वेष आवश्यक होता तसाच स्त्रीयांना बुरखा. अन्यत्र मात्र हा वेष हेच इस्लामचे प्रतीक ठरवले गेले. तत्कालीन गरजा या सर्वत्र व सार्वकालिक व अपरिवर्तनीय बनवल्या गेल्या. अन्य प्रांतांतील धर्मांतरित मुस्लिमांनी यावर फार गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही. आंधळा परंपरावाद हा सर्वच धर्मियांना दिर्घकाळात अडाणी, अप्रागतिक आणि कर्मठ बनवत नेतो. पैगंबरांनी त्यांच्या काळापुढे जाऊन आपले त्या परिस्थितीत पुरोगामीत्व दाखवले.
नंतर धर्मात क्रांती घडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. इजिप्तचे अध्यक्ष सिसि यांनी याच वर्षी इस्लाम जाहतिक हिंसेचा प्रमुख स्त्रोत बनत आहे व ते टाळण्यासाठी धर्मग्रंथांचे नव्याने अर्थ लावले गेले पाहिजेत असे म्हटले होते. पण आयसिस दुसरीकडे याच धर्मक्रांतीच्या नांवाखाली मुलतत्ववादाकडे गेली आहे. अन्यत्र इस्लाम हा अजुनही रुढीवादी म्हणुनच ओळखला जातो. धर्म ज्या काळात, जेथे, ज्या परिस्थीतीत निर्माण झाला त्या स्थित्या आज अस्तित्वात नाहीत, त्यामुळे आपापल्या प्रदेशाच्या निकडीनुसार त्यात बदल घडवायला हवा हे इमाम-मुल्लांना व सर्वसामान्य मुस्लिमांनाही समजायला हवे.

मेरी म्यग्डालेन




मेरी म्यग्डालेन ही येशु ख्रिस्ताच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे तितकेच विवादास्पद पात्र मानले जाते. ही येशु ख्रिस्ताची एकमेव स्त्री शिष्या होती. अलीकडच्या काळापर्यंत बायबलमधील दुस-या एका मेरीशी (जी वारांगना होती) तिचे साधर्म्य कल्पित तिची यथेच्छ बदनामीसुद्धा केली गेली आहे. पण ते वास्तव नाही हे अलीकडे संशोधकांनी शोधुन काढले आहे. एवढेच नव्हे तर तिचा येशु ख्रिस्ताशी विवाहसुद्धा झाला होता असेही नवे संशोधन समोर आले आहे.

म्यग्डाला भागातुन ग्यलीलीमद्धे आलेली मेरी रुपवती तर होतीच परंतु उच्च घराण्यातुन आलेली होती असे म्हणतात. तिचे वडील धनाढ्य सरदार होते, पण मेरीने अकल्पित जीवन जगण्याचा निर्धार केला आणि ती येशु ख्रिस्ताची शिष्या बनली.
ज्यू धर्मातील घुसलेल्या अनिष्ट परंपरांवर प्रहार करणारा येशू हा खरे तर धर्म सुधारक. तो जन्माला आला ज्यू म्हणून आणि म्रुत्युही पावला एक ज्यू म्हणुनच. पण त्याच्या बलिदानामुळे त्याच्याच शिष्यांनी प्रयत्नपुर्वक ख्रिस्ती धर्म स्थापन केला.
येशुच्या जीवनात तिचे स्थान खुपच उच्च दर्जाचे राहिले आहे. ल्युकनुसार येशुला सुळावर चढवले तेंव्हा ती येशुपासुन गर्भवती झाली होती. अशीही ख्रिश्चनांचीे श्रद्धा आहे कि येशुचे पुनरुत्थान झाले तेंव्हा त्याने पहिले दर्शन मेरीला दिले होते. 


मेरीचे महत्व येथेच संपत नाही. ती तत्वद्न्यानातही अग्रेसर होती. येशुशी तिची झालेली प्रश्नोत्तरे बायबल साहित्यात येतात त्यावरुन तिच्या बुद्धीची झेप दिसुन येते. येशुच्या पुनरुत्थानानानंतर मेरीने सारे जीवन येशुच्या कार्याला वाहुन घेतले. ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेत तिचाही मोठा वाटा असावा असा तर्क बांधता येतो. तिची तपस्या पाहुन देवदुतही तिला भेट देत असत असे म्हणतात. तिचा मृत्यु अल्जेरियामद्धे झाला. आजही तिची समाधी तेथे आहे आणि असंख्य ख्रिस्ती धर्मियांसाठी ते एक तिर्थस्तळ बनले आहे. 


नंतर सनातनी चर्चने मेरी म्यग्डानेलला नाकारले. स्त्रीयांचे महत्व मान्य करायला तेंव्हा चर्च तयारच नव्हती. तिला ते बायबलमद्ध्ये येणा-या ज्या काही समान नांवाच्या मेरी आहेत, त्यातल्या त्यात मेरी नावाच्या अभागी स्त्रीशीच जुळवत राहिले. येशुच्याही आईचे नांव मेरीच होते, जिला चर्च आजही "कुमारिका मेरी" मानते. पण आता मेरी म्यग्डालेन ही स्वतंत्र व्यक्ती होती असे स्पष्ट दिसते. 


मेरीचे चित्रण अगणित कादंब-या, नाटकांतून आधुनिक साहित्यात येते तसेच तिची चित्रेही जगप्रसिद्ध चित्रकारांकडुन रेखाटली गेली आहेत. त्यात लिओनार्दो द व्हिन्सी ते जोसे अन्टोनीलेझ सारखे महान चित्रकारही आहेत.


येशुच्या जीवनावर व त्याच्या तत्वज्ञानावर मेरीचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पण पुरुषप्रधान व्यवस्थेत मेरी म्यग्डानेल दुर्लक्षितच राहिली. मातॄदेवतेच्या उत्सवात तिचीही आठवण, एवढाच या छोटेखानी टिपणाचा उद्देश्य!

Thursday, October 15, 2015

माझ्या विरोधक अमुकभक्त मित्रांनो...!

माझ्या विरोधक अमुकभक्त मित्रांनो, माझे म्हणने सत्य आहे कि नाही ते सोडा. माझ्या सध्यस्थितीवरील पोस्टमधील निरिक्षणे चुकीची आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. ते अधिक चांगले राहील.
विरोधी विचारांना "गद्दार,, मोदी द्वेषी" म्हणून झिडकारता येणार नाहीत. मोदी भारतीय आहेत आणि प्रत्येक भारतियाचा आम्ही आदर करतो. ओबामांनी त्यांना पार मागच्या रांगेत उभे केले हा त्यांचा नव्हे, देशाचा अपमान होता. याचा सल भक्तांना वाटला नाही कारण ते महानिर्लज्ज आणि अविचारी आहेत हेच वरील भक्तांच्या प्रतिक्रियांवरून सिद्ध होते. "इतने बडे शहर में ऐसी छोटी-मोटी घटनाऎं होती रहती है!" असे नामुराद उद्गार काढणा-यांचा आम्ही जेवढा तीव्रतेने निषेध केला त्यापेक्षा जास्त तीव्रतेने निरपराध राष्ट्रभक्त मुसलमानाच्या धर्मांध हत्येचा करणार!
बरे ही एक घटना नाही. धर्मांध सत्तेत नव्हते तेंव्हाही ते तसेच होते पण आता तर जास्त चेकाळले आहेत. विरोध या चेकाळना-या मुर्खांना आहे आणि या चेकाळना-यांची बोलती बंद न करु शकणा-या कृतीहीन पंतप्रधानांना व त्यांच्या बेसुमार मुर्ख विद्वेशी वक्तव्ये व कृत्या करण-या मंत्र्यांना व साधू-सध्वी या अधर्मी लोकांना आहे.
राष्ट्राचे प्रश्न तसेच आहेत आणि वर निर्लज्जपणे गेल्या साठ वर्षात काय केले हा प्रश्न विचारण्याची वारंवार बेमुर्वतखोरी आहे. हे संगणक, तुमचे मोबाईल आणि मंगळावरची स्वारी काय आभाळातून पडली कि काय? पहिला अणूस्फोट घडवून आक्ख्या जगाला चकीत करना-या आणि निर्बंध लादुन घेणा-या इंदिराजी गेल्या साठ वर्षातच झाल्या ना? आण्विक तंत्रज्ञानाचा पाया नेहरुंनी घातला हे तुम्ही विसरलात की काय? आधुनिकीकरणाला सतत विरोध करत ती प्रक्रिया लांबवणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे देश विसरला आहे या भ्रमात काय बरळत सुटलाय हे तुम्हाला कळते काय?
याचा अर्थ ते नेहमीच बरोबर होते असाही नाही. जेथे ते चूक होते तेंव्हा त्यांनाही झोडपले गेले आहे. माझी "सव्यसाची", "गुडबाय प्राईम मिनिस्टर", "आभाळात गेलेली माणसं", "काळोख" इत्यादि कादंब-या आणि गेल्या चार वर्षातील अर्थव्यवस्थेवरील लेख हे कोणावर टीकेची झोड उठवत होते? तुमचे सरकारच नव्हते त्यामुळे तुमच्यावर नक्कीच नाही.
पण एक फरक स्पष्ट दिसतो. कोंग्रेसवाले कधी अंगावर येत उपटसुंभांसारखे तुमच्यासारख्या येडपट, विषय सोडून प्रतिक्रिया देत नव्हते. ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत. भले ते करायचे तेच करायचे किंवा अल्प-स्वल्प स्वत:त्य बदल करायचे. तुम्ही मात्र झुंडशहा आहात आणि याच झुंडशाहीला विरोध आहे हे समजायची अक्कल तुम्हाला नाही. उन्मादाची नशा ही सर्वात भयानक विनाशक असते हे तुम्हाला अजून कळालेले नाही. आणि आम्हाला भारतीय समाजव्यवस्थेच्या पायाला धक्का लावनारे असांस्कृतिक जंत तर आजीबात नकोत. त्यांना वैचारिक विरोध होतच राहणार आणि तो विरोध समजावून घेण्याची पात्रता अंगी बानवा एवढे मी नक्कीच म्हणेल.
"तुम्ही लिहू शकता, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आलाय असे विधान कसे करता?" असा एकाने बेमुर्वत प्रश्न विचारलाय. दादरी करुन टाकु, मारुन टाकु वगैरे धमक्या मला मिळाल्यात...तुम्हा भेकडांना नाही. धमक्या देवुनच आवाज बंद करायचे, अभिव्यक्तीचा संकोच करता येईल अशी बिले पास करण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करायचा...राईट टू प्रायव्हसीवर गदा आण्न्यासाठी झटायचे....हे काय आहे? तुम्ही आंधळे असाल, भारतीय नाहीत हे मला तुम्हाला ठासून सांगायचे आहे.
मला कोणी घाबरवू शकत नाही कि घाबरवून अथवा पैशांनी/पदांनी कोणाच्या विचारसरणीचा गुलाम करु शकत नाही. सर्वच प्रकारच्या सांस्कृतिक/राजकीय बाजारुंना मी विरोध केला आहे आणि करेन. असे आजही असंख्य लोक आहेत. त्यांच्या नादाला झुंडशाही करत लागु नका. भले याला इशारा समजा.
जोवर आताचे सरकार फालतू टुक्कार संदर्भहीन संघीय लाड पुरवत विकासाभिमुख कृती करत नाही तोवर हा विरोध राहणारच. पंतप्रधानांना याची जाणीव करुन देणे हे तुमचेही काम आहे. भविष्यात लिहिल्या जाणा-या इतिहासाचे विकृत खलनायक बनू नका. इतिहस तुम्हा नामर्दांना क्षमा करणार नाही!
माझ्यावर बिन्धास्त टीका करा, शिव्या द्या....कारण मी म्हणजे देश नाही. मला काहीएक फरक पडत नाही. मी माझ्याशी ठाम होतो आणि आहे. पण स्वत:ला तपासून पहा. भांग पिलेल्या उन्मादी अवस्थेत जाऊ नका...
ते आज तुम्हाला तुमच्या भल्याचे अथवा मनासारख्या हिंसक गोष्टी साध्य करण्याचे वातावरण वाटत असेल....
तर मला एकच म्हणावे लागेल...
तुमच्याएवढे देशद्रोही आणि मानवताद्रोही कधीच झाले नव्हते!

Wednesday, October 14, 2015

राष्ट्रपती राजवट लागू करा महामहीम राष्ट्रपती...



रोष प्रकट करण्याचे वादळ वाढत आहे. मार्ग कोणताही असो, रोष व्यक्त होतो आहे हे महत्वाचे आहे कारण परिस्थिती तशी गंभीर व चिंताजनक आहे. एकीकडे आर्थिक गटांगळ्यांनी लोक हैरान आहेत तर दुसरीकडे मानवी अधिकारच संपवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. जनसामान्य आता व्यक्त व्हायला घाबरत आहेत. आम्हाला आर्थिक धोरणे, प्रगती, तत्संबंधी निर्णय यावर साधक-बाधक चर्चा करायला जास्त आवडले असते, पण मुळात सरकारच त्यावर काही बोलत-करत नसल्याने त्यावर चर्चा तरी काय करणार? ते उलट बाष्कळ गोष्टींत रममाण असल्याने अफगाणिस्तानसारखी स्थिती उत्पन्न होईल अशी धास्ती सर्वांत असली तर नवल नाही. शेतक-यांचे अर्थशास्त्र तर पार ठार मारले जात आहे. भविष्यात आत्महत्यांच्या (आणि हत्यांच्याही) घटना वाढतील याची ही भयानक पुर्वसुचना आहे. एवढे असंवेदनशील सरकार भारताला लाभावे यासारखे दुर्दैव कोणते?

आज तेलाचे भाव कोसळले म्हणून ही अर्थव्यवस्था धुगधुगी बाळगून आहे. ही परिस्थिती मुळपदावर गेली तर त्यावर आमच्याकडे काय उत्तर आहे? सरकारकडेच नाही, तर आमच्याकडे काय असणार? दुष्काळ पडला असे म्हणत नवे कर लादून कोणती अर्थव्यवस्था सावरली जानार आहे हे मुख्यमंत्र्यांना तरी माहित आहे काय? बराक ओबामांना एकेरी संबोधल्यामुळे नंतरच्या भेटींत अमेरिकेने आमच्या पतप्रधानांना मागच्या रांगेत उभे करत नगण्य बांगला देशाच्या पंतप्रधानांना पुढच्या रांगेत घेतले...हा अपमान कोणी ओढवून घेतला? आंतरराष्ट्रीय प्रोटोकाल्स, कि पाहुण्या राष्ट्रप्र्मुखाला "मिस्टर प्रेसिडेंट" असेच संबोधायला हवे हे यांना कोणी शिकवले नव्हते काय? खाजगीत भले तुम्ही त्यांना बारक्या म्हणा...पण जाहीर कार्यक्रमांत त्यांच्या पदाची ( अथवा कोनाचीही) बूज राखावी लागते हे समजत नसेल तर हे कोणत्या संस्कृतीचे? प्रा. हरी नरके मला खाजगीत भाऊ म्हणतात, ते माझे ज्येष्ठ बंधुंसारखे आहेतच, पण एकाच मंचावर असतांना ते माझा उल्लेख करतांना "संजय सोनवणी" असाच करतात. हा प्रोटोकाल आम्ही आणि सर्वच वक्ते पाळत असतांना भारताच्या दिव्य पंतप्रधानांना एका बलाढ्य राष्ट्राच्या अध्यक्षाला एकेरी बोलायची अवदसा कशी सुचली असेल?

आणि समजा सुचली तर ते राष्ट्र भारताचे मित्र राहील, अमेरिकन्स हा अपमान मान्य करतील, असे त्यांना कसे वाटले?

आज आमचा पारंपारिक मित्र नेपाळ आमच्याबरोबर नाही. पाकिस्तान व चीन बरोबर येतील याची सुतराम शक्यता नाही. श्रीलंका असला काय आणि नसला काय...तो तळ्यात-मळ्यात आहे. पारंपारिक महत्वाचा मित्र म्हणजे रशिया. तो आज दुरावला आहे. अमेरिकाही भाकड अतिरेकी उत्साहाने घालवला आहे. जर्मनी, इंग्लंड, आस्ट्रेलिया ई. देश आहेत ते संबंध पुढे रेटत आहे एवढेच. मंगोलिया काही भारताचे कल्याण करायला येवू शकत नाही कारण त्याचे अर्थव्यवस्थेतील आस्तित्व नगण्य आहे.

मग काय मिळवले?

ना देशांतर्गत ना देशबाह्य...

हा काही कोण्या व्यक्तिविशेषाच्या अथवा पक्षाच्या प्रमोशनचा कार्यक्रम नाही. प्रमोशन राष्ट्राचे करायचे असते. राष्ट्रीय विकसनशील, प्रगतीशील भावनांचे करायचे असते. दुस-यांच्या घरी आपण जातो तेंव्हा आपल्या घरातील दुफळ्या सांगत बसलो तर त्याला दुस-या घरातील लोक नालायकी म्हणतात. घरातील समस्या घरात बसुनच सोडवायला लागतात. बाहेर त्यांची बोंब केवळ कर्तुत्वशून्य लोकच मारतात. पण आमच्याच नेत्याने हेही पाप केलेले आहे.

या लोकांनी, ते उद्योगधार्जिने आहेत असा एक आरोप होता, पण उद्योगांचेही काय भले केले आहे हा प्रश्न विचारला तर तेथेही पंचाईतच आहे. ना उद्योगांचे भले, ना शेतकरी-कामक-यांचे भले....

हे काही बरे नाही. उलट मुलतत्ववाद मात्र वाढला आहे. धर्मांध वल्गनांचा महापूर आहे. हत्या होत आहेत. दंगली पेटाव्या यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. भारतीय मुस्लिम, दलित समुदाय ही चाल ओळखून असल्यानेच शांतता बाळगून आहे. खरे तर अभिनंदन त्यांचेच करता येईल अशी स्थिती आहे कारण एवढा विखार यांनीच जन्माला घालण्याचा चंग बांधला आहे.

हा देश विखाराचा नाही. लोकांनी निवडून दिले ते धर्मांध होण्यासाठी नाही. विकासासाठी. पण विकास सोडाच, अधोगतीच सुरु आहे. आज लोकांना डा. मनमोहन सिंगांची आठवण प्रकर्शाने येत असेल तर याला आताच्या सरकारच्या नालायक्या कारण आहेत.

आज आपले पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांची लाट आली असेल तर त्यामागील कारणांचाही विचार करावा लागतो. खरे तर मी मुळात कोनताही सरकारी पुरस्कार घेण्याच्याच विरोधात आहे. पण मिळालेले पुरस्कार परत करने हे अतुलनीय धैर्य आहे. मग पुरस्कार कोनत्या सरकारने दिले, पुरस्काराची रक्कमही परत करा असले प्रतिवाद पोरकट आहेत.

तुम्हाला देश सहिष्णूतेने व विकासाभिमुख चालवावा यासाठी निवडून दिले होते...ते जमत नसेल तर राजीनामा द्या अथवा राष्ट्रपतींनी वटहुकूम काढून राष्ट्रपती राजवट तात्काळ लागू करत पुन्हा निवडनुका घ्याव्यात अशी मागणी पुरस्कार परत करणारे, न करणारे साहित्यिक व तमाम भारतीय जनतेने सुरू करावी. अधिक बळी पडण्याची आता वाट पाहू नये. सर्वांनी एकमुखाने ही मागणी केली पाहिजे.

माझी तर आहेच!

Tuesday, October 13, 2015

अरे साशंक जंतुंनो ....

राखोळलेली
मयत इतिहासाची
गळलेली हाडे चघळत
त्या हाडांच्या कणाकणात
भरलेल्या
आता वासही न मारणा-या
नसलेल्या इतिहासाची
विकृत घाण पोटात गिळत
त्याची नशा मस्तकात भिनवणारे
त्याची धिंड काढणारे
आणि त्याच धिंडीलाच "गौरवगाथा" म्हणनारे...
कशाची हाडे चघळत आहेत?
त्या हाडांची जनुकीय चाचणी केलीय का?
ते हिंदू धर्माची व्याख्या करत नाहीत, कारण
त्यांनाच ती प्रचंड अडचणीची आहे
कारण तेच मुळात हिंदू नाहीत!
ते म्हणतात...हिंदू ही जीवनपद्धती...
ठीक आहे...
पण लेको, कोणाची जीवनपद्धती?
धर्म नसेल तर मग कोणत्या धर्माबद्दल गळे काढताय?
संस्कृती म्हणता तर कोणाची संस्कृती?
जर "वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म"
तर लेकाच्यांनो
गाय-बैल आज
कोणी खात असेल तर तो तुमचाच वैदिक धर्म
किंवा संस्कृती
किंवा जीवनपद्धती जी होती
तीच पाळतात की...
ते तर तुमचे भावबंद व्हायला हवेत
ओरडताय कशाला विकृतासारखे?
कशाला मारकाट करत सुटलात किंवा
तशा वल्गना करत सुटलात?
कशाला हिंदुंच्या कळपात लांडगे होता आहात?
आणि हिंदू धर्म हा तुमच्या दावणीला बांधलेला नाही
आमच्या धर्माचे तुम्ही नव्हते
आणि नाहीत
उगा हा धर्म आणि तो धर्म
असले फुकाचे धर्म आम्हाला शिकवू नका
पहिले
हिंदू धर्मातून चालते व्हा!
आम्हाला इतिहास आहे
इतिहास नसलेले
आपले मूळ नेमके काय
हे माहितही नसलेले
युरोपियनांसारखेच तुम्हीही
बेसलेस आहात
म्हनून तुमच्या मुळाच्या शोधात असता
कधी हे मूळ तर कधी ते...सोयीच्या कोलांटौड्या मारत राहता...
अरे साशंक जंतुंनो
आम्हाला असला फालतू प्रश्न कधीच पडला नाही
कारण आमची नाळ आमच्या भुमीशी आहे...
तुमची नाही!
आणि बांडगुळांना शेवटी कोणती संस्कृती असते?
कसली जीवनपद्धती असते?
तुमचा धर्म, तुमची मुळे तुम्ही अवश्य पहा...शोधा
पण आमच्या धर्मात, आमच्या सहिष्णू वैचारिकतेला
विकृत करू नका
तुमचा धर्म तुम्ही पहा
आम्हाला आमचा धर्म आणि संस्कृती
आणि मानवतेचे गाभारे
जपू द्या
त्यात वीष कालवू नका
ही मानवतेची विनंती आहे...
कोणालाही अमानवी
बनवायचा प्रयत्नही करू नका...
असे सातत्याचे प्रयत्न
तुमच्याच
अंगावर उलटू शकतात
हेही लक्षात घ्या
जर थोडी जरी सुज्ञता असेल तर!

Saturday, October 10, 2015

Land Determines!

Mind has physical existence. Mind is related with brain as brain is center of nervous system. We can precisely say that without brain there cannot be any psychology. Human brain is a very complex system which remains as yet to be understood completely. It is assumed that there are about 86 billion neurons, each connected with ten thousand others. Any physical alteration to the brain causes impact on mind, no matter whether injury or drugs. Human intelligence is connected with evolution of the human brain over the time.

One can say mind is product of the brain. The brain functioning, though complicated, is mostly based on the bio-electric signals. Rather functioning of neurons depends on bio-electricity generated in the body. Mind is overall functioning of the overall excited cells in the brain that varies or fluctuates with several physical reasons and thus changes expressions, moods, understanding etc. It is now proven that body creates electro-magnetic fields as well and also responds to outsider electro-magnetic fields This includes neurons and muscle cells. With magnetic fields many behavioral effects of different intensities have been reported. For example, a pulsed magnetic field originally designed for spectroscopic MRI was found to alleviate symptoms in bipolar patients while another MRI pulse had no effect. A whole-body exposure to a pulsed magnetic field was found to alter standing balance and pain perception in other studies. From this we can surmise that the human mind (brain) responds to the electro-magnetic pulses as the brain too is a generator of such signals of different intensities. 

 It has been observed that sudden changes in geo-magnetism too, such as geomagnetic storms, heavily impact on the minds of the people. It is not that all cells or neurons in the brain excited all the time. There are many centers in the brain those alternatively get activated with need and in response to the outer world, geo-magnetism is one.

 Human psychology is closely associated with brain and so the mind. Brain has physical existence that is made of biological cells of variety of combinations. It has chemistry, also called as neuro-chemistry, that helps overall functioning of the brain, such as generating movement, speaking, thinking, listening, regulating the systems of the body, and countless others. Chemical changes in the brain, intentionally caused or otherwise, impacts feelings and emotions. The overall thinking pattern of the human being is entirely dependent on the bio-chemical activity of the brain. In ordinary course, when there is no sudden change in overall chemistry of the brain, the psychology of the person remains normal.

However, when we say ‘normal psychological condition’, we just want to explain, a psychology that is not disturbing the state of individual mind in question and others. Till the person exhibits accepted norms of the psychology, in thinking and behavior, as similar as others living in his society, the person is considered to be normal, though he may or may not have special qualities.  But general psychology of a Mexican and American cannot be the same. Psychology of the Arab and Indian also cannot be the same. In India alone, geographically connected regions, say like Maharashtra and Gujrath, people have different general psychologies. Rather we can see general psychology or the way of thinking of the people changes with region to region that reflects in their culture. However, before going deep into this issue, we shall focus on the brain.

Brain is a physical entity, as I have already mentioned. Mind is product of it and so the individual psychology. No brain, if minutely analyzed, is identical with other and so the mind and psychology too is not identical. It is brain that gives sense of individuality. Besides genetics, individual brains overall chemical composition is unique. A slightest change in the composition can make transformation in individual psychology. Sometimes it is done with drugs or extra intake of minerals or vitamins.

Barring few, humans cannot consume minerals directly. They are mostly in compound form and in traces. Most of the minerals he gets from his diet. The food that he uses as his diet is produced from some land. The mineral composition in the diet depends mostly in which land it is produced. The water he drinks too consists of natural minerals and its composition too will depend on through which kind of rocks it has flowed and was gathered.

We are well aware that water of some wells is not considered to be potable for its being hard and of odd taste whereas some well carries potable water. And taste of well water will change with well to well and village to village…it is not because there is problem with water but the amount of the minerals diluted in the water and through which kind of rock-veins the water has been flown in to the well. Water will taste according to the diluted minerals and its density. It may remain potable or not. The people drinking water from the wells too consume the same minerals to the given amount those can affect their overall chemistry. This would be in very small quantity, but their physical chemistry will slightly differ than of the people those drink water from different well having different chemical composition.

In cosmopolitan era, we have forgotten many things. But if we probe it will dawn on us that the food grains of certain kind and produced in certain regions had different tastes. Brinjols grown around Krishna River and chilly of Kolhapur had distinct taste and flavor. What brings that? Certainly the mineral distribution in the lands where they are grown! The crop consumes the minerals spread in the soil and gives the distinct flavor. We could taste it and even now.

But just imagine the era, not far back…just few decades ago…the people living in the certain regions used to consume the food grown in the same lands for ages and drank water that had similar mineral composition. They ate same animal those grazed in the lands where grass too contained similar mineral composition.

What would be effect?

The overall body and thus brain will essentially contain the chemical composition that was in their regular diet. The people living in certain regions rich with some minerals in soil and devoid of some, show certain genetic deceases. Many deceases occur because of lack of some or other mineral or excess of some minerals. In body (and brain) minerals are in compound form. Chemical imbalance can cause the psychological stresses. Human genetics too is affected by regional geological differences. The regional genetic marks too are a proof to make our statement true. Otherwise how the scientists could define the regional genes?

Human being is thus, though separate from land, still he always is rooted with the land he lives in.
The overall chemical composition, though differing slightly from person to person, will remain identical in broader sense in every humanbeing in certain region over the time. His genetic structure too will be impacted by the land he lives in.

And so will be impacted his general psychology, his way to look at the outer world and the way he expresses will be somewhat identical that makes his culture and language.

We will see in the next chapters, in details, after all it is land which determines the general psychology and language he speaks, he lives in!



वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...