Thursday, April 25, 2024

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

 ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेहरूनी भारताला युनोच्या सुरक्षा समितीचे भारताला स्थायी सदस्यत्व मिळत असुनही ते चीनला मिळावे अशी शिफारस केली अशा स्वरूपाचे इतिहासाची मोडतोड करणारे विधान केले आहे. अफवांना इतिहास समजत त्यावर नव्या अफवा पसरवण्याचा आणि पंडित नेहरूंची बदनामी करत राहण्याचा हा कुटील डाव आहे यात शंका नाही.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने भारताला सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व ऑफर केले आहे अशी अफवा सर्वात आधी १९५० व नंतर १९५५ मध्येच पसरवण्यात आली होती. पंडित नेहरूंनी या अफवेचे संसदेत खंडनही केले होते. पंडित नेहरू अलिप्ततावादी चळवळीचे प्रणेते आणि सर्वमान्य नेते असल्याने अमेरिका भारताला अशी ऑफर देऊच शकत नव्हते आणि तशी ऑफर कधीही भारताला मिळालेली नव्हती, आणि अमेरिकेला तशी ऑफर देण्याचाही अधिकार नव्हता याचे ज्ञान विदेशमंत्री जयशंकर यांना असले तरी ते केवळ नेहरूद्वेषापोटी दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत हे दुर्दैव.

 

 वेळेस चीन हा माओच्या नेतृत्वाखाली एका रक्तरंजित क्रांतीतून स्वतंत्र करण्यात आला होता. त्याने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केली. पण युनोचे सदस्यत्व होते ते रिपब्लिक ऑफ चायनाला. नेहरूंची सहानुभूती अर्थात रिपब्लिक ऑफ चायनाला होती, माओच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला नाही हे आधी लक्षात घ्यावे लागते. त्याच काळात रशिया विरुद्ध अमेरिका शीतयुद्धाचीही सुरुवात होत होती. द्वितीय विश्वयुद्धानंतर नव्या तणावाच्या दिशेने जागतिक वाटचाल सुरु झालेली होती. अशा स्थितीत जागतिक शांततेसाठी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (त्याने चीन व्यापले आणि रिपब्लिक ऑफ चायनाचे सरकार तैवान बेटावर हद्दपार झाल्याने) आता पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला आंतरराष्ट्रीय समुदायात सामावून घेणे आवश्यक होते. ही गरज नेहरूंची नव्हती कारण ते रिपब्लिक ऑफ चायनाचे समर्थक होते, कम्युनिस्ट चीन सरकारचे नाही. ही गरज जागतिक समुदायाची होती. नेहरूंमुळे चीनला सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व मिळाले असे म्हणणे तत्कालीन अंतरराष्ट्रीय  राजकारण माहित नसल्याचा परिपाक आहे. चीनचा राजकीय इतिहासही माहित नसल्याचे लक्षण आहे. त्यावेळेस खुद्द नुकताच स्वतंत्र झालेला भारत अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व करत होता तो अमेरिका आणि रशिया या दोन्ही साम्राज्यवादी राष्ट्रांना दोन हात दूर ठेवण्यासाठी, त्यांच्या राजकारणाला बळी पडण्यासाठी नाही. नेहरूंची सहानुभूती असली तर ती रिपब्लिक ऑफ चायनाला होती, पीपल्स रिपब्लिकला नाही.

 

१९५५ साली स्थायी समितीच्या सदस्यत्वाची ऑफर रशियाने आपले पंतप्रधान बुल्गानिन यांच्यामार्फत दिली होती अशीही अफवा होती. पण याही अफवेला समर्थन देणारा एकही पुरावा “अफवा पसरवण्यात वस्ताद” असलेल्या रा. स्व. संघाने वा अन्य कोणीही दिला नाही. शिवाय अशी ऑफर अमेरिका किंवा रशियाने दिली असती तरी भारताला स्थायी सुरक्षा समितीचे सदस्यत्व देण्याचे पात्रता कोणा एका राष्ट्रात नव्हती, संयुक्त राष्ट्र संघ ही शेकडो राष्ट्रांनी मिळून बनलेली आहे याचेही भान आमच्या विद्वान विदेशमंत्र्यांना नसावे हे दुर्दैव आहे.

याचा अर्थ असा नाही कि भारत किंवा चीन नवस्थापित संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थायी सुरक्षा समितीवर असावेत असे कोणालाच वाटत नव्हते. पण तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाचे घोषणापत्रही संदिग्ध होते व त्याला अंतिम स्वरुप आले नव्हते. चीनला स्थायी समितीचे सदस्यत्व दिले तर जागतिक तणाव कमी  होईल हे वाटणारा गट प्रबळ निघाल्याने चीनला ते स्थान मिळाले. पण तरीही रिपब्लिक ऑफ चायना कि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना याबाबत जागतिक गोंधळ सुरु होता. युनोचे सदस्यत्व रिपब्लिक ऑफ चायनाला होते, ते कायम ठेऊनच पीपल्स रिपब्लिकला सदस्यत्व द्यावे असाही मतप्रवाह होता. चीनचे नेतृत्व कोणते सरकार करते याबाबत खुद्द पीपल्स रिपब्लिक आणि रिपब्लिक ऑफ चायनामध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. शेवटी १९७१ साली रिपब्लिक ऑफ चायनाचे स्थायी समितीचे (म्हणजे तैवानचे) सदस्यत्व रद्द करून ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला दिले गेले. नेहरू तेव्हा जिवंतही नव्हते. भारताचे वैर होते ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाशी, रिपब्लिक ऑफ चायनाशी नाही हे आपल्याला आज माहित असणे गरजेचे आहे. आणि भारताने (नेहरूंनी) आपली सदस्यत्वाच्या त्याग करून रिपब्लिक ऑफ चायनाला (म्हणजे आजच्या तैवानला) तो बहुमान दिला हे म्हणणेही अडाणीपणाचे लक्षण आहे.

 

दुसरी बाब अशी कि चीनच्या ऐवजी भारताला सुरक्षा समितीवर घ्यावे असे पूर्वीपासून वाटणारा एक गट जसा अमेरिकेत होता तसाच रशियातही होता. असे वेगवेगळ्या विचारांचे गट जगभर असतात पण त्यामुळे सदस्यत्व मिळणे अथवा रद्द करण्याची कृती संयुक्त राष्ट्रसंघ करतो असे म्हणणे संयुक्त राष्ट्रसंघाच्याच कार्यपद्धतीची यत्किंचितही माहिती नसल्याचे लक्षण आहे.  खरे तर हा संयुक्त राष्ट्रसंघाचा केला जाणारा अवमान आहे आणि तोही भारताच्या विदेशमंत्र्याकडून व्हावा ही गंभीर बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची कार्यप्रणाली त्यांच्या घटनेवर चालते आणि असे सदस्यत्व मिळवण्यासाठी राष्ट्रसंघात बहुमताचा पाठिबा आवश्यक असतो. त्यामुळे चीनबाबत केवळ द्वेष्ट्या बुद्धीने नेहरूंवर गरळ ओकण्याचा या सरकारला कसलाही अधिकार नाही.

 

 

 

अकेमेनिड साम्राज्याने भारताला काय दिले?



अकेमेनिड साम्राज्याच्या जवळपास दोनशे वर्षाच्या राजवटीच्या काळात पर्शियन समाजसंस्कृतीचा पश्चिमोत्तर भारतावर आणि भारताचा पर्शियन साम्राज्यावर सांस्कृतिक प्रभाव पडणे स्वाभाविक होते. सत्ताधारी आपले सर्वच स्थानिक शासित जनतेवर लादु शकत नाहीत. ते शक्यही नसते. ज्यांच्यावर राज्य करायचे आहे त्यांच्या आशा-आकांक्षा आणि सांस्कृतिक प्रेरणांना चिरडणे कोणत्याही शासकाला परवडनारे नसते हा जागतिक इतिहास आहे. उलट सांस्कृतिक देवाण-घेवाण करत एक सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच शासकांचा प्रयत्न असतो हे आपल्याला इतिहासावरून लक्षात येईल. अर्थात जो शासक हे समजावून घेण्यात अयशस्वी ठरतो त्याची सत्ता अप्रिय होत जाते हाही इतिहास आहे.

अकेमेदिड साम्राज्याची राजधानी झाग्रोस पर्वतराजीत असलेल्या पर्सेपोलिस येथे होती. येथील अपादान प्रसादात अकेमेनिड साम्राज्यात येणा-या विविध भागांतील नजराणा देणा-या व्यक्तींची चित्रे कोरलेली आहेत. त्यात सिंध भागातील भारतीयांचेही चित्रण आहे. या चित्रणावरून तत्कालीन भारतीय कशी वेशभूषा करायचे व कशा प्रकारची शिरोभूषणे घालायचे याचे दिग्दर्शन होते. याच काळात पर्शियन भाषेत भारताचे पूर्वापार प्रसिद्ध हिंदवे हे नाव हिंदुश असे झाले आणि हेच नाव ग्रीक इतिहासकारांनी इंदोई म्हणून स्वीकारले. आजचे इंडिया हे देशनाम आणि हिंदू हे धर्मनाम यातूनच विकसित झालेले आहे. पर्शियन सत्ता फार मोठी असल्याने पर्शियन नावांचा प्रचार जगभर झाला. मगी हे पारशी धर्मातील पुरोहिताचे संबोधनसुद्धा जागतिक पातळीवर पसरले. मगी या शब्दावरूनच जादूसाठी लोकप्रिय असणारा “Magic” हा शब्द विकसित झाला. हे मगी पुरोहित भारतात आले होते व कृष्णाच्या नातू सांबाला झालेला कृष्ठरोग त्यांनी बारा केला होता व सूर्यपूजा त्यांनीच भारतात आणली अशी महाभारतात येणारी पुराणकथा या सांस्कृतिक आदान-प्रदानाचे एक उदाहरण होय.  

भारतीयांमुळे अकेमेनिड सैन्यात भारतीय हत्तीदलाचा समावेश तर झालाच पण भारतीय पद्धतीच्या धनुर्विद्येचा परिचयही पाश्चात्य जगाला झाला. युरोपमधील प्लेटीला शहराजवळ इसपू ४७९ मध्ये झालेल्या युद्धात भारतीय सैनिक सुती वस्त्रे घालून, धनुष्य व लोखंडी पाती लावलेले बाण घेऊन मोठ्या प्रमाणात त्या युद्धात सामील झाले होते असे ग्रीक इतिहासकार हिरोडोटस याने नोंदवून ठेवले आहे. जंगली गाढवे आणि घोड्यांनी ओढले जाणारे रथही भारतीय सैनिक वापरत असत असे त्याने म्हटले आहे. गांधारी सेना मात्र भाले घेऊन युद्धात येत असेही त्याने नोंदवलेले आहे. तत्कालीन जगातील वेगवेगळ्या सैन्यपद्धती आपल्याला त्यामुळे उमगून येतात. अथेन्सला उध्वस्त करणा-या सैन्यात भारतीय सैन्याचाही मोठा वाटा होता. नक्ष-ए-रुस्तुम येथील दारियस (पहिला), क्झेर्क्सेस, (पहिला), पर्सेपोलिस येथील दारियस (दुसरा) याच्या कबरीच्या घुमटावर भारतीय सैनिकांचे चित्रण केलेले आहे.

तक्षशिला येथे भिर टेकाडावर केलेल्या उत्खननात अकेमेनिड काळातील बांधकामांचे अवशेष मिळाले आहेत. तक्षशिला हे तत्कालीन मोठे विद्यापीठ म्हणून नावारूपाला आलेले होते. तक्षशिला येथून जाणा-या व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या देऊन हे विद्यापीठ चालवले होते. धम्मपद या ग्रंथावरून दिसते कि गौतम बुद्धाचा अनुयायी कोसलचा राजा पसेनदी, अंगुलीमाल आणि राजगृहचा दरबारी वैद्य जीवक यांनी तक्षशिला येथेच प्रशिक्षण घेतले होते. चंद्रगुप्त मौर्य आपल्या तारुण्यावस्थेत असताना तक्षशिला येथे शिक्षण घ्यायला आला होता. अलेक्झांडरचे आक्रमण होईपर्यंत आणि ग्रीकांशी सामना करेपर्यंत तोही याच भागात होता असे ग्रीक सुत्रांवरून कळून येते.

अकेमेनिड काळात ज्योतिषशास्त्रात पर्शियन लोकांनी मोठी प्रगती केली होती. भारतीयांनी भाकीत वर्तवण्याचे शास्त्र पर्शियन लोकांकडून आणि नंतर ग्रीकांकडून घेतले असे डेव्हिड पिंग्री हे विद्वान लेखक म्हणतात. मौर्यांची राजधानी पाटलिपुत्र येथील राजवाड्याच्या बांधकाम शैलीवर, विशेषता: स्तंभ रचनेवर, पर्शियन शैलीचा प्रभाव पडला. मौर्यकाळातील सिंहमुद्रा निर्माण करताना तर निश्चितपणे पर्शियन शैली वापरण्यात आलेली आहे.  किंबहुना शिलालेख आणि पाषाण कोरून/खोडून गुंफा बनवण्याची पद्धतही पर्शियनांकडून आली. दारियस (पहिला) याचा बेहीस्तून शिलालेख कायमस्वरूपी आज्ञा खोदुन ठेवण्यासाठी एक आदर्श बनला. मौर्य सम्राट अशोकाने देश-विदेशात असंख्य शिलालेख, स्तंभलेख कोरण्याची सुरुवात केली ती पर्शियनांच्या अनुकरणाने असे मानले जाते.

लेणी खोदण्याची कला आपल्याकडे पर्शियन लोकांमुळेच आली. अनातोलिया येथील लिसियन पवया गुंफा आणि बराबर येथील आज अज्ञानाने लोमश ऋषी गुंफा म्हणून ओळखल्या जाणा-या लेण्यांमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे. अकेमेनिड काळात ही कला व्यापा-यांसोबत भारतात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो.  सारनाथ येथील अशोकाने इसपू  तिस-या शतकात निर्माण केलेला अशोकस्तंभ आणि अकेमेनिड राजधानी पर्सेपोलिस येथील स्तंभरचनेत व कलेत काही तपशील वगळता खूप साम्य आहे. ही सांस्कृतिक देवाण-घेवाणीची उदाहरणे मानली जातात.

भारतीय खरोष्ठी लिपीवर अर्माईक वर्णमालेचा प्रभाव आहे. सम्राट अशोकाच्या खरोष्ठी लिपीतील शिलालेखांत या लिपीचा प्रभाव जाणवण्याइतपत स्पष्ट आहे. अर्माईक भाषेतही अशोकाचे शिलालेख असून त्या भाषेवर जुन्या पर्शियन भाषेतून घेतलेले अनेक शब्द अवतरतात. उदा. लिपी हा शब्दच मुळात जुन्या पर्शियन भाषेतील “दिपि” या शब्दातून आलेला आहे. म्हणजेच अकेमेनिडसाम्राज्याने टाकलेला भाषिक प्रभाव नंतरही टिकून राहिला. किंबहुना लिहिण्याविषयकचे अनेक शब्द पर्शियन भाषेतून आलेले आहेत. खरोश्ती लिपी तर अर्माईक लिपीतूनच विकसित झाली असे दावे अनेक भाषाशास्त्रद्न्य करतात. शिलालेख कोरण्याची पद्धतही भारतीयांनी पर्शियन लोकांकडून अकेमेनिड काळातच घेतली असे म्हणायला हरकत नाही.

मौर्य काळातील मथुरेत व सारनाथ येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये परदेशी वेषभूशेतील मृण्मयी प्रतिमा आढळून आलेल्या आहेत. त्यात पर्शियन वेषभूषेच्याही अनेक प्रतिमा आहेत. पर्शियन लोकांनी फक्त पंजाबपर्यंतच्या भागात आपला सांस्कृतिक प्रभाव टाकला नाही तर हा प्रभाव सुदूर पूर्वेपर्यंत पडला होता असे या प्रतिमा आणि बांधकाम शैलीवरून दिसते.

पर्शियन भाषेचा सर्वात मोठा प्रभाव ऋग्वेदावर आहे, पण ऋग्वेदाची निर्मितीच मुळात दक्षिण अफगाणिस्तानमध्ये झालेली असल्याने ते स्वाभाविकही आहे. पण वैदिक मांडली भारतात आल्यापासूनच पर्शियन भाषेतील काही शब्द स्थानिक प्राकृत भाषांत रुळू लागलेले होते, पण त्याची गती अकेमेनिड साम्राज्याच्या काळात वाढली. अकेमेनिड साम्राज्याचा धर्म पारशी, झरतुष्ट्राने स्थापन केलेला. हा धर्म तसा वैदिक धर्माच्या अगदी निकट जाणारा. पण या दोन धर्मात पुरातन वैर असल्याने वैदिक धर्मियांना भारतात आश्रय घ्यावा लागला व त्यांनी आपली पर्शियन नाळ तोडण्याचा अर्थात आटोकाट प्रयत्न सुरु केला. नंतरच्या वैदिक साहित्यात पश्चिमोत्तर भारतील लोकांना त्याज्ज्य व निंदनीय आचरणाचे मानले गेले. हाही अकेमेनिड साम्राज्याने पश्चिमोत्तर भारतावर केलेल्या शासनाचा एक परिपाक होता.

यानंतर या भागावर आले ग्रीकांचे राज्य. त्याचा आढावा आपण पुढील लेखात घेउयात.

-संजय सोनवणी

७७२१८७०७६४

 


Thursday, April 11, 2024

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

 



पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्या आसपास सायरसचा मृत्यू झाल्याने त्याचे पुढील विस्तार करण्याचे धोरण अर्धवट राहिले. त्याच्या मृत्युनंतर काही काळाने दारियस (पहिला) बंड करून सत्तेवर आला. त्याने सत्तेत जम बसवल्यानंतर इसपू पाचशे अठरामध्ये सायरसचे अपूर्ण राहिलेले विस्ताराचे काम सुरु केले. पर्शियन सेना झेलम नदीपर्यंत, म्हणजे आजच्या पंजाबपर्यंत, पुढे घुसल्या आणि तेथवर अकेमेनिड साम्राज्याचा विस्तार झाला.
त्यावेळी भारताच्या पंजाब ते गांधारपर्यंतच्या भागात शिबी, अहिर, शुद्र, दरद, तक्षकसारख्या अनेक जमातींची अनेक स्वतंत्र पण छोटी राज्ये होती. या जमाती-जमातींत कधी मैत्रीचे तर कधी शत्रुत्वाचे संबंध असत. सुपीक प्रदेश असल्याने धनसंपत्तीही मुबलक होती. जमातीची लोकसंख्या मर्यादित असल्याने व जमातवाद हा मानसिकतेवर राज्य करणारा प्रबळ घटक असल्याने राज्यविस्तार हा कोणाचाही हेतू नसे. हे चित्र त्या काळात देशात सर्वत्र होते. उत्तर व पूर्व भारतात याच काळात बुद्ध-महावीर यांसारखे धर्मसंस्थापक उदयाला आले. तेव्हाचे बौद्ध व जैन साहित्य आपण पाहिले तर तेव्हाही उत्तरेत शाक्य, मल्ल, लिच्छवी, अंग, वंग, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन इ. बहुतेक राज्य ही जमात-राज्यच होती हे आपल्या लक्षात येईल. मगधच्या बिंबीसाराचे राज्य त्यातल्या त्यात मोठे होते आणि त्याने महावीर व गौतम बुद्धाला उदार आश्रय दिला होता. असे असले तरी साम्राज्यनिर्मिती असे व्यापक ध्येय भारतात सुरु झाले ते नंद सम्राटांमुळे आणि त्यावर कळस चढवला तो सम्राट चंद्रगुप्ताने. पण त्यालाही ग्रीक आक्रमणाची पार्श्वभूमी होती. पश्चिमोत्तर भारतात मात्र जमात-राज्यांची प्रथा दीर्घकाळ टिकून राहिल्याने सायरस व दारियससारख्या विस्तारवादी आणि महत्वाकांक्षी सम्राटांना ही संधी वाटली असल्यास आश्चर्य नाही. शिवाय या भागातील उत्पादन, व्यापार यामुळे आलेली समृद्धी त्यांना जास्त आकर्षित करणार हे उघड होते आणि तसेच झालेही.
हिंदूकुश आणि ब्राहुई पर्वतरांगांनी पूर्व पर्शिया (किंवा इराण) हा भाग भारतापासून भौगोलिक दृष्ट्या तोडलेला तर आहेच पण या भागातील पर्वतमय दुर्गमतेने आणि विषम हवामानाने या भागाला तसे कंगालच ठेवले होते. या भागात टोळ्यांचेच राज्य राहिले आहे. सन १७४७ मध्ये मोहम्मदशहा अब्दालीने हा भाग अफगाणिस्तान नाव देत स्वतंत्र केला आणि अफगाणिस्तान (प्राचीन इराणचा भाग) स्वतंत्र केला. त्यासाठी त्याला अफगाणिस्तानचा ‘राष्ट्रपिता’ असे म्हटले जाते. सायरस व दारियसच्या काळात अफगाणिस्तानची स्थिती नेमकी काय होती हेही आपण पाहिले तर भारतीय राजे या भागात घुसण्यास का उत्सुक नसायचे हे आपल्या लक्षात येईल. त्यावेळेस खुश्कीचाच मार्ग व्यापारासाठी वापरला जात असल्याने पूर्व व पश्चिम आशियाला जाणारे व्यापारी मार्ग याच भागातून जात. बाल्ख-कंदाहार हे व्यापारी मार्गांचे जंक्शन असल्यामुळे ही शहरे भरभराटीला आली असली तरी स्थानिक उत्पादन मात्र नगण्य असे. सिंधू संस्कृतीतील व्यापा-यांनी कंदाहार प्रांतात मुंदीगाक आणि आमु दरिया नदीच्या खो-यात शोतुर्गाई ही शहरे वसवली ती कच्च्या मालाची सुलभ आयात व्हावी यासाठी, पण या भागात सत्ता वसवावी असे वाटावे असे कररुपी उत्पन्न मात्र कमी असल्याने सत्ताधा-यांकडून तसे प्रयत्न झालेले दिसत नाही. पण बोलन आणि खैबर खिंडीतून पश्चिम व मध्य आशियातून भारतात स्थलांतरे व आक्रमणे होण्याची प्रक्रिया मात्र कायम राहिली. पण या भागात सायरसच्या आधी दीर्घकाळ सत्ता स्थापित करण्यात मात्र कोणी यशस्वी झाल्याचे दिसत नाही. सायरसने मात्र ही परंपरा बदलली आणि आपल्या साम्राज्याचा एक भाग म्हणून सिंधू नदीपर्यंत सत्ता विस्तारली व पहिल्या दारियसने ती सीमा अजून पुढे झेलम नदीपर्यंत विस्तारली. थोडक्यात भारतातील एक सुपीक व समृद्ध भाग पर्शियन साम्राज्याचा भाग बनला. स्थानिक सत्ता सायरस व नंतर दारियस आणि त्याच्या वंशजांचे मांडलिक म्हणून काम करत असल्या तरी खरी सत्ता चाले ती अकेमेनिड सम्राटांनी नेमलेल्या क्षत्रपांमार्फत.
अकेमेनिड साम्राज्याचा मुख्य धर्म झरथूस्त्री (पारशी) हाच राहिला. हा धर्म ख्रिस्ती धर्माच्या उदयापूर्वी जगात सर्वात मोठा धर्म बनला तो अकिमेनिड सम्राटांच्या काळात. कारण हे साम्राज्य झेलम नदीपासून ते पार इजिप्तपर्यंत पसरले होते. पश्चिम इराणमध्ये सापडलेल्या दारियसच्या बेहिस्तून शिलालेखात त्याच्या विशाल साम्राज्यात मोडणा-या सर्व प्रदेशांची नावे खोदलेली आहेत. दारियस (पहिला)च्या काळात अवेस्ता प्रथमच गायीच्या चामड्यावर लिप्यांकित करण्यात आला. भारताच्या पश्चिमोत्तर भागात (अगदी तक्षशिलेतही) या धर्माने चांगले पाय रोवले होते आणि याचे वर्णन अलेक्झांडरच्या भारत आक्रमणासंदर्भात माहिती देत असतांना डायोडोरस या इतिहासकाराने करून ठेवलेले आहे. राजाचा जो धर्म तो प्रजेचाही धर्म बनून जातो तो असा. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे प्रशासन सांभाळण्यासाठी या सम्राटांनी नवी व्यवस्था बनवली. पर्शियन भाषेला राजव्यवहारात महत्व आले. व्यापारवृद्धी हा त्याचा प्रधान उद्देश असल्याचे त्याने कार्यांद्राचा स्कायल्याक्स या ग्रीक दर्यावर्द्याला सिंधू नदीचे सर्वेक्षण करून या नदीतून सुएजच्या द्वीपकल्पापर्यंत जहाजे हाकारण्याच्या मार्ग शोधण्यासाठी नियुक्त केले होते यावरून दिसते. हिरोडोटसने दिलेल्या माहितीनुसार या नदी व समुद्रमार्गे स्कायल्याक्स इजिप्तमध्ये गेला व त्यानंतरच दारियसने भारतातील आपला साम्राज्यविस्तार करून सिंधू नदीच्या दक्षिण भागातल्या जमातीवरही आधिपत्य मिळवले व सागरी व्यापार आपल्या ताब्यात आणला.
दारियसचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांनीही भारताचा दारियसने जिंकून घेतलेला भारतीय भाग आपल्या ताब्यात ठेवला असला तरी इसपू ३३० मध्ये मेसोडोनियाचा अलेक्झांडरच्या वादळापुढे अकेमेनिड साम्राज्य कोलमडून पडले व नष्ट झाले. त्यावेळेस दारियस (तिसरा) सत्तेवर होता. भारतीय भागावरील त्याची पकड गेलेली असून अनेक मांडलिक राजे स्वतंत्र झालेले दिसतात ते पुन्हा अलेक्झांडरचे मांडलिक होण्यासाठी. तिस-या दारियसच्या काळातही अनेक भारतीय सैनिक व सेनानी पर्शियन साम्राज्याच्या सेनेत होते असेही इतिहासावरून दिसते. आताच्या कुर्दीस्तानमधील अराबेला येथे अलेक्झांडरच्या सैन्याशी पर्शियनांचे युद्ध झाले. या युद्धातील पराजयाने पर्शियन साम्राज्याचा अस्त केला. या युद्धात दारियस (तिसरा)च्या बाजूने भारतीयांचे हत्तीदळ उपस्थित होते असे ग्रीक इतिहासकार नोंदवतात.
शेवटच्या काळात विस्कळीत झाली असली तरी जवळपास दोनशे वर्ष पंजाब-सिंध-गिलगीट-बाल्टीस्तान या विस्तृत भागावर पर्शियन सत्ता आपली पकड ठेऊन होती. या काळाने भारतीय कला, भाषा, वास्तुरचना, लेण्याची व शिलालेख खोदण्याची कला भारताला दिली, पण भारतीयांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम केला. त्यामुळे पाठोपाठ ग्रीक आक्रमण झाल्यानंतर त्यांनाही विशेष प्रतिरोध झाला नाही.
-संजय सोनवणी


Sunday, April 7, 2024

गुढीपाडवा: महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्याचा महोत्सव

 


(गौतमीपुत्र सातकर्णी)

महाराष्ट्राच्या दृष्टीने गुढीपाडवा हा पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात प्राप्त केलेल्या महाविजयाचे स्मरण करणारा आणि त्यानिमित्त सुरु झालेल्या संवत्सराचा उत्सव म्हणून फार मोलाचा दिवस आहे. ज्ञात इतिहासातील महाराष्ट्राचे आद्य राजघराणे म्हणजे सातवाहन आणि याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णीने शक नृपती नहपान या महाराष्ट्र गिळंकृत करणा-या सम्राटावर महाविजय प्राप्त करून महाराष्ट्र परकीय जोखडातून मुक्त केला आणि राजकीय दृष्ट्या आजच्या महाराष्ट्राला एक तर केलेच पण आपल्या साम्राज्याच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही विस्तारल्या. महाराष्ट्राला भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात बलाढ्य तर केलेच पण आजच्या मराठी भाषेची पूर्वज माहाराष्ट्री प्राकृत भाषेलाही देशव्यापी माहात्म्य प्राप्त करून दिले. इतके कि उत्तर भारतातील विद्वानही माहाराष्ट्री प्राकृत भाषेला सर्वश्रेष्ठ मानत आपल्या साहित्यकृती या भाषेत लिहित असत. आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैवाने आम्हीच मराठी माणसे एवढी कृतघ्न कि सातवाहन घराण्याचे आमच्यावरील अपार ऋण तर विसरलोच, पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असताना त्याशी संबंध नसलेल्या भाकडकथांवरच जास्त विश्वास ठेवत गेलो आणि या उत्सवाचे मांगल्य आणि महत्व विसरून गेलो. या दिवशी रावणाला ठार मारून राम अयोध्येत परत आला अशी कथा असो कि या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करून कालगणना सुरु केली अशी उत्तर काळातील व्रतराजामध्ये येणारी कथा असो, तिच्यावरच आम्ही अंधश्रद्धेने विश्वास ठेवत गेलो आणि या स्वातंत्र्याच्या महोत्सवाचे मांगल्य मात्र हरपून बसलो. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या उत्सवाचा इतिहास डोळसपणे पहायला हवा.

इसवीसनपूर्व २२० मध्ये महाराष्ट्रातील जुन्नर भागात आंद्रा नदीच्या खो-यात सातवाहन घराणे उदयाला आले. आंद्राचे कृत्रिम संस्कृत रूप बनवण्याच्या नादात पुराणकारांनी त्याचे रूप आंध्र असे बनवून या घराण्याचे मुलनामही बदलण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. या घराण्याचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकसंघ नव्हता. अनेक राज्यात वाटला गेला होता. आंदरा नदीच्या खो-यातील असल्याने स्वाभाविकच जुन्नर ही या घराण्याची पहिली राजधानी बनली. छिमुख सातवाहन हा या घराण्याचा मुळपुरुष. पुढे राज्याचा विस्तार वाढल्यानंतर पैठण येथे राजधानी हलवली गेली. ही सत्ता पुढे साडेचारशे वर्ष, म्हणजे इसवी सन २३० पर्यंत कायम राहिली. या घराण्याचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळची उभारणी सातवाहन काळात झाली. "तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन" अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख,  विमल सुरी लिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य “पउमचरीय’, हालाच्या "गाथा सप्तशती" सारखा नितांतसुंदर काव्यसंग्रह, "लीलावई" सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या "प्राकृतप्रकाश" या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्री भाषेला समृद्धी दिली. आजही महाराष्ट्राचे भूषण असलेल्या असंख्य लेणी खोदायची सुरुवातही त्यांच्याच उदार सहाय्याने झाली. पुर्वी रट्ठांचा (रठ्ठ म्हणजे छोटा प्रदेश) समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले व या भूभागाला महारठ्ठ (संस्कृतमध्ये महाराष्ट्र) हे सार्थ नाव दिले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच. त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही.

 

या घराण्याने साडेचारशे वर्ष राज्य केले असले तरी हा सर्वच प्रवास निर्वेध झाला नाही. त्यात अडथळेही आले. यात क्षहरात वंशाच्या नहपान या सम्राटाने महाराष्ट्रावर आक्रमण केले. त्यांच्या रानटी आक्रमणात महाराष्ट्र चिरडला गेला. कुशाण सत्ताधा-यांनी विविध प्रान्तांवर नेमेलेल्या शक क्षत्रपांमधून हे घराणे उदयाला आले. मंदसोर येथे राजधानी असलेला नहपान पराक्रमी व महत्वाकांक्षी होता. त्याने सत्तेत येताच आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण आखले आणि प्रबळ फौजेच्या जोरावर त्याने सुंदर सातवाहनचा पराजय केला. त्याने नाशिक, पैठण जिंकून तर घेतलेच परंतु पार पुण्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला. कोकणही सातवाहनांच्या ताब्यातून घेऊन तेथील व्यापारी बंदरांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. सातवाहनांचे राज्य सातारा व क-हाड भागापुरतेच उरले. अशाच काळात सातवाहन घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला. हा धाडसी, शुर तर होताच पण अत्यंत धोरणी होता. आपली शक्ती कमी आहे तर नहपानाची अवाढव्य हे त्याने ओळखून गनिमी काव्याचा आधार घेत नहपानाशी संघर्ष सुरु केला. स्वातंत्र्यप्रिय मराठी सैनिक त्याला येऊन सामील होऊ लागले. हा लढा सोपा नव्हता. नहपानाचे साम्राज्य आता उत्तर आणि दक्षिणेतही विस्तारलेले होते. तब्बल वीस वर्ष हा संघर्ष चालला. दरम्यान एका आख्यायिकेनुसार गौतमीपुत्राने काही कुशल हेर म्हणून त्याच्या राज्यात घुसवले आणि नहपानाला भरमसाठ दानधर्म करायला उद्युक्त तर केलेच पण त्याच्या सैन्यदलाची अनेक गुपिते माहित करून घेतली.  शेवटी त्याने नाशिक जवळ नहपानाची सेना अचानक कोंडीत पकडून अतिशय निकराचे युद्ध केले आणि इसवी सन ७८ मध्ये नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात वंस निर्वंस करस." (क्षहरात वंशाला निर्वंश केले.) महाराष्ट्राला तर स्वातंत्र्य मिळालेच पण शेजारील अन्य राज्यातही त्याचा अफाट विस्तार झाला. “पेरीप्लस ऑफ अरेथ्रीयन सी” या तत्कालीन ग्रीक पुस्तकात गौतमीपुत्राच्या काळातील महाराष्ट्राच्या समृद्धीचे वर्णन आलेले आहे.

 

शकांपासून महाराष्ट्राला मुक्त केले हे गौतमीपुत्राचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य. या स्वातंत्र्योत्सवाचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवत्सर त्या दिवशी सुरु केले. जैन मराठी प्राकृतात सातवाहनचा उच्चार सालाहन असा केला जात असे. त्याच शब्दाचे संस्कृत रुपांतर शालिवाहन शक होय. हा आनंद घोषित करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. तेव्हापासून या दिवसाला गुढीपाडवा म्हणायची प्रथा निर्माण झाली जी आजतागायत सुरु आहे, पण मुळचे कारण मात्र आपल्याला माहित नसावे हे एक दुर्दैव होय.

 

सातवाहन घराणे हे तत्कालीन खुल्या समाजव्यवस्थेतून आलेले. त्यांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. बौद्ध-जैनांना त्यांनी उदार आश्रय दिला. जैनांची लोहगड, पाले व खानदेशातील लेणीही याच काळात निर्माण झाली. नाशिकच्या तसेच इतर अनेक लेण्यात त्यांचे महत्वाचे शिलालेख कोरलेले आहेत. यात भिक्षुसंघाला दिलेले दानलेखही आहेत. त्यांनी मंदिरांना सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करवून घेतले. पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरकाळ टिकणारी झाली ती त्यांनी बांधलेल्या चेउल आणि कल्याण येथील व्यापारी बंदरांमुळे. त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गांमुळे. उद्योग-व्यवसायाला व विदेश व्यापाराला दिलेल्या अपार प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. साहित्यदृष्ट्या हा काळ अपार समृद्धीचा होता. रामावरील पहिले महाकाव्य मराठी प्राकृतात त्यांच्याच कारकिर्दीत इसवी सन ४ मध्ये लिहिले गेले असावे ही बाब तर मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावी अशी. शास्त्र-विज्ञान यातही त्यांच्या काळाने अद्भुत प्रगती केली. एकंदरीत सातवाहन हे आजच्या महाराष्ट्राचे सर्व दृष्ट्या संस्थापक होत.

 

आणि याच घराण्याच्या बलशाली सम्राटाने, गौतमीपुत्र सातकर्णीने शक आक्रमकावर जो महान विजय प्राप्त करून त्याला युद्धात ठार मारले या महाविजयाची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्योत्सवाची ही स्मृती आजही आपण गुढीपाडव्याच्या रूपाने ठेवतो. घरोघर गुढ्या उभारून या महान सम्राटाला मानवंदना देत असतो. फक्त त्यामागील इतिहास तेवढा आपल्याला माहित नसतो. एक बाब लक्षात घेतली पाहिजे कि जेथेही सातवाहनांचे साम्राज्य होते तेथेच हा उत्सव साजरा केला जातो, अन्यत्र नाही.

 

हा उत्सव आपला स्वातंत्र्योत्सव आहे हे आपण विसरता कामा नये. या स्वातन्त्र्याचा शिल्पकार गौतमीपुत्र सातकर्णी होता आणि त्याला आपण मानवंदना देण्यासाठीच गुढी उभारत असतो याचे भान ठेवले पाहिजे. हा कोणत्याही धर्माचा सण नाही, तो सर्वच मराठी माणसांचा उत्सव आहे हे सर्वांना माहित असले पाहिजे.

 

-संजय सोनवणी 

अकेमेनिड साम्राज्याचा भारतातील विस्तार!


भारतात झालेल्या वैदिक आर्यांच्या शरणार्थी म्हणून झालेल्या विस्थापनाचा आणि त्यांच्या येथील आजही स्वतंत्र ठेवलेल्या वैदिक धर्माच्या भल्या-बु-या परिणामांची चर्चा आपण मागील लेखांत केली. त्यांच्यानंतर किमान पाचशे वर्ष कोणतीही स्थलांतरे अथवा आक्रमणे झालीच नसतील असे नाही, पण एक तर ते प्रमाण नगण्य असावे किंवा विस्थापित येथीलच संस्कृतीत मिसळून गेल्याने त्यांचे स्वतंत्र अस्तित्व दाखवून देता येत नाही असेही असेल. पण दुसरे ज्ञात आक्रमण व वायव्य भारतात सत्ता स्थापन करणारे पर्शियातील अकेमेनिड घराण्याच्या पहिल्या सायरसचे होय. या घराण्याने जवळपास इसपू ५१८ मध्येच गांधार व सिंध प्रांतावर स्वारी करून स्वात खो-यासह बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला. पुढे इसपू ३३४ पर्यंत, म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमणापर्यंत, पंजाबपर्यंत विस्तारलेली अकेमेनिड सत्ता या भागात टिकून राहिली. गंधार प्रांताची राजधानी पुष्कलावती ही होती तर तक्षशिला ही हिंदुश प्रांताची प्रांतिक राजधानी होती व तेथील क्षत्रपातर्फे या भागातील कारभार बघितला. अवाढव्य एकेमेनिड साम्राज्य तेव्हा २३ भागांत वाटले गेलेले होते, व त्यातील विसावा भाग “हिंदुश” (सिंधू नदीचे खोरे) होता. सर्वात जास्त उत्पन्न या भागातून येत असे व तेही दरवर्षी साडेआठ टन सोन्याच्या स्वरूपात. किंबहुना या समृद्धीसाठीच सायरस व नंतर दारियस (पहिला) यांनी या भागावर ताबा मिळवला असेच दिसते. शिवाय या पर्शियन घराण्याची सत्ता जरी भारताच्या पश्चिमोत्तर भागापर्यंतच सीमित असली तरी तिचा सांस्कृतिक प्रभाव संपूर्ण भारतावर पडला जो आजही शेष आहे.

आज इराण-अफगाणिस्तान नावांनी परिचित असलेला हा प्रदेश पर्शिया या व्यापक नावाने ओळखला जात होता. या प्रदेशाची ऐतिहासिक माहिती मिळायला सुरुवात होते ती अकेमेनिड साम्राज्याच्या काळापासून, म्हणजे इसपू ५५० पासून. या साम्राज्याची निर्मिती झाग्रोस पर्वतराजीच्या परिसरातील भटक्या पर्शियन टोळ्यांनी केली. प्राचीन इराणमधील हे पहिले ऐतिहासिक साम्राज्य मानले जाते. सायरस द ग्रेट या साम्राज्याचा संस्थापक होय. त्याने अकेमीनस या सायरसच्या मुळ पुरुषाने सनपूर्व सातव्या शतकात स्थापन केलेल्या छोट्या राज्याचे साम्राज्यात रुपांतर केल्याने त्याच्या नावावरून या साम्राज्याला अकेमेनिड साम्राज्य ही ओळख मिळाली.  या साम्राज्याचा विस्तार अफाट होता. या साम्राज्याची व्याप्ती सिंधू नदीच्या खो-यापासून ते इजिप्तपर्यंत पसरली होती.  सायरस हा एक महायोद्धा व धुरंधर राजानितीद्न्य होता. त्याने आपण जिंकलेल्या प्रांतांवर सुनियोजित शासन करण्यासाठी सत्रपी (गव्हर्नर) नेमले. दारियस(पहिला) याने सर्वप्रथम बाल्ख, अरिया, अराकोशिया (आजच्या अफगाणिस्तानातील प्रांत) जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले आणि प्रत्येक प्रांतावर सत्रपाची नियुक्ती केली. बहुतेक सत्रप राजघराण्याशी संबंधित असत. हे साम्राज्य राजवंशातील सत्तासंघर्षाने दुबळे होत गेले आणि शेवटी इसपू ३३४ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने या साम्राज्याचा अस्त केला.

भारताचा विदेश व्यापार सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरु होता. किंबहुना सुमेर, इजिप्त सारक्या देशांशी व्यापार करणा-या भारतीय व्यापा-यांना पर्शिया (प्राचीन इराण) मार्गानेच प्रवास करावा लागे. त्यामुळे पर्शियन टोळ्यांशी त्यांचा आधीपासूनच परिचय होता. व्यापारामुळे सिंधू नदीचे खोरे भरभराटीला आलेले होते. तक्षशिला हे व्यापारी मार्गांचे जंक्शन असून हे व्यापारी व उत्पादक श्रेण्यांचे पूर्वापार केंद्र होते. तक्षशिला विद्यापीठही चालवले जाई ते या श्रेण्यांनी दिलेल्या दानातून. येथे अन्य धार्मिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक व व्यापारी शिक्षणही दिले जात असे. तक्षशिला शहर एका अर्थाने पश्चिम भारताची आर्थिक राजधानी होती असे म्हणायला हरकत नाही. त्या मानाने पर्शियाचा प्रदेश प्रतिकूल हवामानाचा. तेथेही व्यापारी केंद्रे असली तरी उत्पादनात हा प्रदेश पुढारलेला नव्हता. त्याला पूर्व व पश्चीमेतून येणा-या उत्पादनांवर बव्हंशी अवलंबून रहावे लागे. साम्राज्याची स्थापना करताना व्यापारी मार्ग व उत्पादनाची केंद्रेही आपल्या कब्जात ठेवणे सायरसला वाटणे स्वाभाविक होते. अन्यथा सैन्याला पोसणे व युद्धमोहीमा काढणे शक्य झाले नसते. किंबहुना व्यापारी मार्गांवर ज्यांचे स्वामित्व त्यांचेच साम्राज्य अशी व्यवस्था निर्माण होऊ लागण्याचा हा काळ होता.  बव्हंशी युद्धेही व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठीच झाली हाहे एक महत्वाचा इतिहास आहे. महत्वाकांक्षी अकेमेनिड साम्राज्याचे लक्ष तक्षशिला आणि त्या भागातील देवलसारख्या प्राचीन बंदरांकडे गेले नसते तरच नवल होते. आणे ते गेलेही. प्रथम त्यांनी गांधार प्रांत ताब्यात घेत सिंधू नदीच्या खो-यापर्यंत विस्तार केला आणि पुढे पंजाबपर्यंत सत्तेचा विस्तार केला.

तक्षशिला विद्यापीठ हे तेव्हाही जगविख्यात होते. पर्शियन, ग्रीक, मध्य आशियातील विद्यार्थीही तेथे शिक्षणासाठी येत असत. तत्कालीन जगातील तत्वज्ञान तेथे हिरीरीने चर्चा केले जात असे. त्याच बरोबर वैद्यकीय ते अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमही तेथे शिकवले जात असल्याने या विद्यापीठाची ख्याती मोठी होती. अकेमेनिड साम्राज्याने तक्षशिला ही आपल्या हिंदुश प्रांताची राजधानी म्हणून कायम केली. तक्षशिला येथे झालेल्या उत्खननात तत्कालीन अवशेष मिळालेले आहेत. विशेष बाब म्हणजे अकेमेनिड सैन्यात भारतीयांचाही मोठा सहभाग होता आणि ते झेरेक्सेस या अकेमेनिड सम्राटाच्या काळात (इसपू ४८०) ग्रीसवर केलेल्या आक्रमणात सहभागी झाले होते अशी नोंद ग्रीक इतिहासकार हिरोडोटसने करून ठेवली आहे. त्याने भारतीय सैनिकांच्या वेशभूषा आणि शास्त्रांचीही नोंद करून ठेवलेली असून त्या सैन्यातील सामील भारतीय सैनिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमाही विविध उत्खननात सापडलेल्या आहेत. एरियन आणि कर्टीयस या इतिहासकारांनीही नंतरच्या काळात झालेल्या पश्चिम आशियातील युद्धातील भारतीय सानिकांच्या उपस्थितीची नोंद घेतलेली आहे.

अकेमेनिड साम्राज्याने पश्चिमोत्तर भारतावर आधिपत्य मिळवल्याचा हा तो काळ होता जेव्हा पूर्व भारतात महावीर आणि गौतम बुद्ध उदयाला आले होते आणि नव्या धर्मांचा उपोद्घात करत होते. या काळात तक्षशिला आणि सिंधू नदीच्या खो-यात मात्र पारशी धर्माचे वर्चस्व वाढलेले होते. पारशी धर्माच्या वर्चास्वामुलेच अफगाणिस्तान सोडावा लागणा-या वैदिकांच्या दृष्टीने याच काळात पंजाब आणि गांधार त्याज्य व तिरस्करणीय झाला याचे कारण या ऐतिहासिक घटनेत असण्याची शक्यता आहे, कारण पारशी धर्मीय वैदिकांच्या दृष्टीने परंपरागत हाडवैरी होते. या भागातील त्यांच्या दीर्घकालीन वर्चस्वामुळे हा भागच त्यांच्या दृष्टीने त्याज्ज्य झाला असल्यास नवल नाही. अर्थात या भागातील अरण्यात राहणा-या ब्राह्मणांकडून पहिल्या दारियसचा पिता हिस्तास्फेस बरेच काही शिकला आणि त्याने आपल्या धर्मातील यज्ञयागात व मागी तत्वज्ञानात भर घातली असे इसपू चवथ्या शतकातील रोमन इतिहासकार अम्मिनुस मार्सेलिअस याने नोंदवून ठेवले आहे. त्यामुळे पर्शियन मात्र ज्ञानाच्या देवानघेवाणीस महत्व देत होते असे दिसते.

दोन शतके टिकलेल्या या साम्राज्याच्या पश्चिमोत्तर भारताच्या आधीपत्याने भारतीय विचारविश्वातही खळबळ निर्माण केली, त्याबद्दल पुढे.

-संजय सोनवणी 

Wednesday, April 3, 2024

उध्वस्त व्यक्तिमत्वाचे राज्य...महाराष्ट्र राज्य!


जसे माणसाला एक व्यक्तिमत्व असते तसेच व्यक्तिमत्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तीचे जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्व ही बाब मानवी जीवनात महत्व घेऊन बसते. व्यक्तीला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्व जबाबदार असते. राष्ट्र आणि राष्ट्रातील राज्यांचेही तसेच आहे. त्यांनाही व्यक्तिमत्व असते. हे व्यक्तिमत्व त्या राज्याचा अथवा राष्ट्राचा इतिहास, ज्ञानात्मक व संस्कृतीविषयक झालेल्या घडामोडीविषयकचे आकलन, एकुणातील विचारसरणी, भाषा  आणि एकंदरीत सामाजिक मानसिकता यांचा समुच्चय म्हणजे राज्याचे व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. यात अजूनही काही बाबींचा समावेश प्रत्येकजन आपापल्या मगदुराप्रमाणे करू शकतो. पण आपल्या देशातल्या कोणत्याही राज्याचे नाव घेतले तर आपल्या मनात एक प्रतिमा उभी राहते. कोणत्याही राष्ट्राचे नाव आले कि मनात त्यांचेही एक विशिष्ट चित्र उभे राहते. हे चित्र किंवा प्रतिमा म्हणजेच ढोबळमानाने त्या त्या राज्याचे किंवा राष्ट्राचे व्यक्तिमत्व म्हणता येईल.

आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. मराठी माणूस म्हणून आपली ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये आपण परकीय वा परराज्यातल्या लोकांच्या दृष्टीकोनातून पाहिली तर आपले व्यक्तिमत्व काय आहे याचा अंदाज येऊ शकेल. कारण अनेकदा आपल्यालाच आपले व्यक्तिमत्व उलगडलेले नसते. एकाच ढाच्यातल्या व्यक्तींसोबत राहतांना आपणा सर्वांचे मिळून काय व्यक्तित्व बनले आहे याची सहसा जाणीव होत नाही. पण परराज्यातल्या किंवा विदेशी व्यक्तींना मात्र हे सामुहिक वेगळेपण सहज जाणवू शकते. आपण जेव्हा परराज्यात किंवा विदेशात जातो तेव्हा तेथील सामुहिक व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आपल्या नजरेत लगेच भरते आणि आपण त्यांच्याबद्दल भलेबुरे मत बनवतो. दुस-यांबाबत मत बनवणे सोपे असले तरी स्वत:बाबत ते बनवता येणे अशक्य होत असते. अनेकदा आपण आपल्याबद्दल गैरसमज बाळगत त्या आधारावर एक ढोंगी व्यक्तित्व बनवत जातो आणि या घोर फसवणुकीतून एक भलतेच व्यक्तिमत्व तयार होते. तेव्हा महाराष्ट्राचे एकंदरीत व्यक्तिमत्व काय आहे आणि काय दाखवले जाते याचा निरपेक्ष दृष्टीने सारासार विचार करणेही तेवढ्याच गरजेचे बनून जाते. माणसाचे व्यक्तित्व कालसापेक्ष जसे बदलत जाते तसेच राज्य आणि राष्ट्राचेही कसे बदलते हेही पाहणे रोचक ठरते.

युवान श्वांग हा चीनी प्रवासी सातव्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने तेलंगनातून महाराष्ट्रात प्रवेश केला होता. या प्रवासाच्या दरम्यान त्याने जे अनुभवले अथवा पाहिले ते त्याने लिहून ठेवले. तो म्हणतो, “येथिल लोक स्वभावाने साधे आणि प्रामाणिक आहे. शरीरयष्टी उंच (चीनी लोकांच्या तुलनेत) असून शिस्तप्रिय आणि अन्यायविरूद्ध चटकन पेटून उठणारे आहेत. चांगल्याशी चांगूलपणाने वागतात, वाईट वागणाऱ्याची खोड जिरवतात. त्यांचा कोणी अपमान केला तर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता प्रतिशोध घेतात. गरजूने मदत मागितली तर स्वकामे बाजूला सारून मदत करतात. जर काही वाद झाला, तर प्रथम शत्रुला ताकीद देतात, मग दोन्ही जण लढाईस तयार झाले की भाल्याने द्वंद्व करतात. समोरचा पळून जात असेल तर त्याचा पाठलाग करतात, पण शरणागतास अभय असते. योद्धा हरला तर त्याला कठोर दंड न देता, स्त्री-वस्त्रे दिली जातात,तो लज्जेनेच मरतो. येथे शेकडो योद्ध्यांचे शासनाकडून संगोपन केले जाते. कलहापुर्वी हे योद्धे दारू पितात आणि मग दशसहस्त्र योद्ध्यांसमोर भाला घेऊन त्यांना द्वंद्वासाठी आवाहन करतात. या द्वंद्वात कोणी मृत्यु पावल्यास समोरच्याला शासनाकडून कोणतीही शिक्षा होत नाही (तसा कायदा नाही). युद्धापुर्वी ढोलांचा गजर होतो. शेकडो हत्तींस नशा केली जाते, हत्तीस्वार स्वतःही दारू पितात आणि मग हत्तीसमोर येईल त्या शत्रुला तुडवले जाते. त्यामुळे विरोधात उभे राहण्याची शत्रुची बिशादच होत नाही. ह्या सर्व त्यांच्यासवयी पण, येथिल माणसांना अध्ययनाची आवड आहे. ते रूढीनुसार चालत आलेल्या आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करतात.” आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीबद्दल तो म्हणतो कि “सद्य परिस्थितीत, महाराज शिलादीत्य (हर्षवर्धन) यांनी पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत (पंजाबपासून-बंगालपर्यंत) संपुर्ण प्रदेशावर ताबा मिळवलाय. अगदी दुर्गम भागही सोडले नाहीत. फक्त ह्या महाराष्ट्र देशातील लोकांनीच हर्षवर्धनापुढे शरणागती पत्करलेली नाही. ह्यांचा बिमोड करायला, महाराज हर्षवर्धनांनी पाचही नद्यांच्या प्रदेशांतून सैन्य गोळा केलेय, देशोदेशीच्या उत्तम योद्ध्यांना बोलावणे पाठवलेय. स्वतः सैन्याचे नेतृत्त्व पत्कारलेय. पण ईतके सगळे करूनही, अजून तरी महाराष्ट्राच्या सैन्याने हत्यारे टाकलेली नाहीत.”

परकीय प्रवाशाने केलेले हे सध्या उपलब्ध असलेले सर्वात जुने महाराष्ट्री समाजाचे वर्णन. हे वर्णन परिपूर्ण असेल असे नाही पण महाराष्ट्राचे जे व्यक्तिमत्व त्याच्या डोळ्यात भरले ते त्याने लिहून ठेवले. आठव्या शतकात उद्योतन सुरी या परराज्यातील जैन मुनीनेही महाराष्ट्राचे थोडक्यात वर्णन केले आहे. तो कुवलयमाला या प्राकृत काव्यात म्हणतो,

“दढमह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य I

दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे II

म्हणजे “बळकट, ठेंगण्या, धटमुट, काळ्यासावळ्या रंगाच्या दिले, घेतले असे बोलणा-या मऱ्हाट माणसाला त्याने पाहिले.”

दहाव्या शतकात अल मसुदी नामक एक अरबी प्रवासी भारतात आला होता व त्याने चौल, कल्याण या कोकण किनारपट्टीवरील बंदरांना भेट दिली होती. तत्कालीन कोकणातील काही विचित्र चाली-रीतीबद्दलही त्याने लिहिलेले आहे. राजा वा कोणी धनिक मेल्यानंतर त्याचे जवळचे मित्रही स्वत:ला समारंभपूर्वक जाळून घेत असल्याचे त्याने लिहिले आहे. तो झंझ राजाच्या कारकिर्दीत चेउल यथे आला होता. चेउल बंदरावर हजारो बैलांवर माल लादून आणला जात होता व पुढे व्यापारासाठी जहाजे भरून पाठवली जात असल्याचा आणि कोकणातील अनेक विद्वानांना भेटी दिल्याचा उल्लेखही तो करतो.

पंधराव्या शतकात अफानासी निकितीन हा रशियन प्रवासी भारतभेटीच्या दरम्यान चेउल येथे आला होता. तो आपल्या वृत्तांन्तात त्याने तेथील लोकजीवनाचे उत्तम वर्णन त्याने केले आहे. येथील माणसे खूप कमी कपडे घालतात, पुरुष आणि स्त्रियांचा वर्ण काळा आहे, येथील लोकांना गोऱ्या माणसांबद्दल खूप कुतूहल वाटते, येथील श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून कापड घेतात आणि दुसरे एक कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात, असे वर्णन त्याने केलेले दिसून येते. चौलहून आठ दिवसांचा जमिनीवरील प्रवास करून निकितीन पाली येथे पोहोचला. पाली ते जुन्नर या प्रवासाला त्याला सोळा दिवस लागले व चौल ते जुन्नर हे अंतर एकशे तीस मैल असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. जुन्नर येथे तेव्हा बहमनी सरदार असदखान होता व तो तेथील हिंदू लोकांबरोबर गेली वीस वर्षे युद्ध करत होता, तसेच त्याच्याजवळ उत्तम प्रतीचे अनेक घोडे आणि हत्ती असून त्याचे सैनिक खुरासन, अरेबिया व तुर्कस्तान येथील आहेत, असे तो म्हणतो.

हे झाली परकी प्रवाशांची निरीक्षणे. युवान श्वांग आणि उद्योतन सुरी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे त्यांना भासलेले व्यक्तिमत्व ठळकपणे सांगतात तसे इतर प्रवासी करत नसले तरी त्यांच्या लोकजीवनाच्या वर्णनावरून आपण काही अंदाज निश्चित बांधू शकतो. सातव्या शतकात शिक्षण सार्वत्रिक होते हा अंदाज आपण युवान श्वांगच्या म्हणण्यानुसार काढू शकतो. मराठे माणसे भांडखोर आहेत व रोखठोक शब्दात व्यक्त होतात हे निरीक्षण उद्योतन सुरीने नोंदवले आहे तर कोकण किनारपट्टीवर संपूर्ण महाराष्ट्रातून झाजार्पो बैलांवर माल लादून खिंडरस्त्याने बंदरापर्यंत आणला जात होता हे निरीक्षण मसुदी नोंदवतो. मुस्लीम सत्ता प्रस्थापित झालेल्या काळात आलेला रशियन प्रवासी बहामनी सरदार असदखान हा हिंदूंशी वीस वर्ष युद्ध करूनही जुन्नर भागात त्याला शांतता लाभली नाही हेही निरीक्षण महत्वाचे आहे. त्याचे सैनिक खुरासन, अरेबिया व तुर्कस्तान अशा दूरच्या भागातून आणि वेगळ्या संस्कृतीतून आल्यामुळे त्या संस्कृतीचा परिचयही मराठी माणसास झाला असणार असाही अंदाज आपण बांधू शकतो. सातवे शतक ते पंधरावे शतक या काळात येऊन गेलेल्या प्रवाशांच्या वर्णनात भिन्नता वाटली तरी मराठी माणूस संघर्षशील आहे, प्रेमळ आहे, स्वातंत्र्यप्रिय आहे, शत्रुत्व केले तर तो टोकाला जाऊ शकतो, त्याची भाषा राकट आहे, असे व्यक्तिमत्व विशेष आपण सहज नोंदवू शकतो. आणि विचार केला तर कोणाही मराठी माणसाला ते सहज पटेल. पण ही झाली परकीय लोकांची निरीक्षणे. यापार जाऊन आपण आपले आजचे व्यक्तिमत्व शोधले पाहिजे आणि आपले आजचे व्यक्तिमत्व असे कशामुळे बनले आहे याचेही चिंतन करणे भाग आहे.

कोणत्याही प्रदेशाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आगळे वेगळे असते हे तर आपण सारे जाणतो. स्थानिक भूगर्भीय स्वरूपावरून त्या भागात राहणा-या लोकांची एकुणातील मानसिकता बनते आणि हीच मानसिकता भाषा व वर्तनाच्या रूपातून अभिव्यक्त होते. या अभिव्यक्तीलाच आपण संस्कृती म्हणतो. ज्वालामुखीच्या उद्रेकांनी कोट्यावधी वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि लाव्हा रसापासून बेसाल्ट खडकाचे पठार पसरले ते पार चंद्रपूरपर्यंत विरळ होत जात वेगळ्याच प्रकारच्या खडकांनी बनले व तेलंगणा, छत्तीसगाढ राज्यात प्रबळ होत गेले. राकट देशाकणखर देशा, दगडांच्या देशा। ही ओळख महाराष्ट्राला मिळाली ती अशी. या भौगोलिक स्थितीमुळे महाराष्ट्राचे स्वाभाविकपणे पाच भाग पडले. कोकण, घाट, खानदेश, मराठवाडा व विदर्भ असे हे ढोबळमानाने पाच भाग आहेत. महाराष्ट्र तसा कोकण आणि विदर्भ वगळता निमपावसाळी प्रदेश आहे. अर्थात नेहमीच ही स्थिती नव्हती. महाराष्ट्राचे पुरापर्यावरण पाहिले तर याच भुमीवर एके काळी महाराष्ट्रात पाणथळ जमीनी मोठ्या प्रमाणावर होत्या व पाणघोड्यासारख्या पाण्यातच हुंदडणा-या अनेक प्रजाती येथे निवास करत होत्या हे कोणाला सांगुनही खरे वाटणार नाही. प्राचीन हिमयुगात येथे हिमनद्याही होत्या याचे पुरावे मिळालेले आहेत. सर्व्हे ऑफ इंडियाच्या फ्रांसिस फेडन यांना चंद्रपूरजवळील इरई नदीच्या काठी फारसबंदी दगडांवर हिमनदीच्या  घर्षणाच्या खुणा आढळलेल्या आहेत. त्यावरून महाराष्ट्रातही एके काळे हिमनद्या होत्या या अंदाजाला पुष्टी मिळालेली आहे. पुढे ही स्थिती बदलली. इसपू १८०० च्या दरम्यान कोरडे सत्र सुरु झाले आणि महाराष्ट्र दुष्काळी परिसरात मोडू लागला. तुरळक मानवी वस्ती नद्यांच्या खो-यात विस्थापित झाली. जगण्याचे मार्ग बदलले. जंगले जाऊन माळराने मोठ्या प्रमाणावर तयार झाली. लोक मेंढपाळी ते गोपालन, पक्षीपालन याकडे वळाले. महाराष्ट्राचे दुसरे व्यक्तिमत्व या काळात तयार होऊ लागले. पशुपालक भटके असल्याने त्यांची मनोवृत्तीही संघर्षशील आणि खुल्या आभाळाखाली रहावे लागल्याने व्यापक बनली. पुढे याच पशुपालकांनी स्थानिक सत्ताही निर्माण केल्या. आपापल्या दैवतश्रद्धा आणि धर्मश्रद्धा जतन केल्या. खंडोबा, विठोबा, बिरोबा, जोतीबा, बिरोबा, मायाक्का, मरीआइ, जोखाई, अंबाबाई यासारख्या लोकदेवता या महाराष्ट्राची खरी ओळख. यांची उत्पत्तीच मुळात मराठी श्रद्धायुक्त  मानसिकतेचे प्रतिक म्हणून झाली. त्यात पूर्वजपूजेचाही भाग होताच. महाराष्ट्राच्या सीमा आजच्यासारख्या तेव्हा नसल्या तरी मराठी भाषा ही खास या भूमीचीच उपज असल्याने मराठी भाषा बोलली जाते तो भाग महाराष्ट्राचाच असे समजून चालायला हरकत नाही. अन्य प्रान्तांशी भाषिक-सांस्कृतिक आदानप्रदान झाले असले तरी घेतलेल्या सांस्कृतिक व भाषिक बाबी महाराष्ट्राने आपल्या साच्यात बसवून स्वीकारल्या.

सातवाहनांपूर्वीचा राजकीय इतिहास आपल्याला आज माहित नसला तरी या पाचही भागांवर कोणत्या ना कोणत्या स्था=निक सत्ता होत्या. सम्राट चंद्रगुप्त किंवा अशोकाने या भागाला कागदोपत्री पान्दालिक बनवले असले तरी शासक मात्र स्थानिकच असले पाहिजेत हे अनुमान आपण काढू शकतो कारण भारतीय सम्राटांची ही पूर्वापार रीत आहे. उत्तरेतील साम्राज्ये नष्ट झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रात सातवाहनांचा उदय झाला. माहाराष्ट्री प्राकृताला राजभाषेचे स्थान मिळाले. महाराष्ट्रात बौद्ध आणि जैन धर्मांचेही प्राबल्य वाढू लागले. पहिल्या शतकाच्या आसपास वैदिक धर्माचाही महाराष्ट्रात प्रवेश झाला. परंपरागत हिंदू धर्माने या धर्मांपासून अनेक गोष्टी घेतल्या तसेच दिल्याही. महाराष्ट्रात बेसाल्ट खडकामुळे महाराष्ट्राचे ओळख बनलेली लेणी खोदायला सातवाहन काळातच सुरुवात झाली. डोंगरी किल्ले बांधायची सुरुवातही याच काळातील. सातवाहनांनी व्यापाराला महत्व दिल्याने नगरांची संख्या जशी वाढली तसेच चेउल. कल्याणसारखी बंदरेही तयार करण्यात आली. पेरीक्लीज ऑफ अरीथ्रीयन सी या एका ग्रीक लॉगबुकमध्ये हे बंदरे भरभराटीला आल्याची वर्णने जशी मिळतात तशीच पैठण, जुन्नर, कल्याणसारख्या व्यापार व निर्मिती केंद्रांचीही माहिती मिळते. हाल सातवाहनाने गाथा सप्तशतीमध्ये दरबारी व ग्रामीण कवी-कवयीयित्रीच्या काव्यरचना गोळा करून सातशे गाथांचा संग्रह सिद्ध केला जो जागतिक वाड्मयात स्थान प्राप्त करून बसला आहे. आजचा महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकत्र केला तो सातवाहनांनी. महाराष्ट्र शकांच्या तावडीत सापडला तेव्हा गौतमीपुत्र सातवाहनाने  नाशिकजवळ शक क्षत्रप नहपानाचा पराजय करून त्याची हत्या केली आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा स्वातंत्र्यदिन आपण आजही गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते तेवढ्या भागातच हा दिवस नववर्षाचा दिवस म्हणून साजरा होतो, अन्यत्र नाही. हा सन ही सातवाहनांची देणगी आहे व ती अस्सल मराठी आहे. सातवाहनांनी गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र व कर्नाटकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला. या काळात महाराष्ट्र वैभवाच्या शिखरावर पोहोचला. केवळ सातवाहनांमुळे कुशाण आक्रमक विन्ध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत घुसू शकले नाही. संपूर्ण दक्षिण भारत त्यांच्यामुळे सुरक्षित राहिला. एवढेच नव्हे तर मराठी भाषा व संस्कृती वाढवण्याचे, घडवण्याचे मोलाचे कार्य सातवाहन करू शकले याचे कारण इसपू २२० ते इस २३० अशी साडेचारशे वर्ष टिकलेली त्यांची सत्ता. महाराष्ट्राला एक राष्ट्रीय महत्व मिळाले ते या काळात. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली तीही या काळात. माहाराष्ट्री प्राकृत ही देशातील श्रेष्ठ प्राकृत मानली जाऊ लागली व अन्य प्राकृत भाषिकही मराठीलाच प्राधान्य देऊ लागले तेही याच काळात. पहिल्या शतकात, म्हणजे सातवाहनकाळात रामाच्या जीवनावरील आद्य महाकाव्य लिहिले ते विमल सुरी या जैन मुनींनी तेही माहाराष्ट्री प्राकृतात. वाल्मीकीचे रामायण तिस-या ते पाचव्या शतकात लिहिले गेले. मराठी माणसाला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे. थोडक्यात या काळात महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रखर बुद्धिवैभव, वीरवैभव आणि ऐहिक सौख्यात प्रबळ बनलेले होते आणि तोच मराठी व्यक्तित्वाचा एक भाग बनून राहिला.

महाराष्ट्राची धार्मिक परंपरा स्वतंत्र असून दैवतश्रद्धाही स्वतंत्र आहेत. त्यावर उत्तर अथवा दक्षिणेचा विशेष प्रभाव किमान दहाव्या शतकापर्यंत नव्हता. वी. का. राजवाडे वगैरे विद्वान लिहितात तसे आर्यांचे येथे कधीही आगमन होऊन येथील समाजसंस्कृतीवर लक्षणीय फरक पडलेला नाही हे समाज-ऐतिहासिक वास्तव आहे. कारण येथील राजकीय सत्ता नेहमीच महाराष्ट्री लोकांच्या हातात होती. अगदी राष्ट्रकुट, होयसळ सारख्या दक्षिणेतील राजवटीनी महाराष्ट्रावर सत्ता स्थापित केली असली तरी ती सत्ता राबवली गेली ती येथील मांडलिक सत्तांच्या मार्फत. यादव घरानेही आधी राष्ट्रकुटांचे मांडलीकच होते. त्यामुळे यादवांचे सुरुवातीचे शिलालेखही दक्षिणी भाषेतील आहेत. त्यामुळे यादव घराणे दक्षिणेतील असावे असे समज निर्माण झाले होते. पण ते मुळचे सिन्नर येथीलच हे आता ऐतिहासिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. पाचव्या भिल्लम यादवाने कलचुरीचा पराभव करून सार्वभौमत्व घोषित करून राज्याभिषेक करून घेतला. कोकणात शिलाहार वंशाची सत्ता होती. हे सारे महाराष्ट्रीय उत्पत्तीचे राजे होते. कोणते राजघराणे मुळचे कोठले याची चर्चा अनेक इतिहासकार करतात व ही राजघराणी उत्तरेतून अथवा दक्षिणेतून आली असे दाखवायचा प्रयत्न करत असतात. पण असे करणे निष्फळ आहे. या संदर्भात पु.ग. सहस्त्रबुद्धे म्हणतात, “त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय करताना हे राजवंश मुळात कोठून आले, त्यांचे अगदी प्राचीन पूर्वज कोणत्या वर्णाचे होते ही चिकित्सा पंडित करतात. ऐतिहासिक जिज्ञासेच्या दृष्टीने व इतिहासलेखनाच्या परिपूर्तीसाठी हा शोध करणे अवश्य आहे. पण एकतर ही चिकित्सा बव्हंशी निष्फळ होते. कोणत्याही घराण्याच्या मूलस्थाना- विषयी निश्चित असा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही आणि येथून पुढे होण्याची फारशी आशा नाही. शिवाय ऐश्वर्यप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घराण्याचा संबंध चंद्र, सूर्य या प्राचीन वंशांशी जोडून देण्याची प्रत्येक राजघराण्याची प्रवृत्ती असल्यामुळे शिलालेख किंवा ताम्रपट यांचा पुरावाही या दृष्टीने विश्वसनीय मानता येत नाही. चालुक्य आपल्याला कधी चंद्रवंशीय तर कधी सूर्यवंशीयही म्हणवितात. राष्ट्रकूट यदुवंशी म्हणवून कधी श्रीकृष्ण तर कधी सात्यकी हा आपला मूळपुरुष असे सांगतात. यामुळे अर्थातच मथुरा, अयोध्या ही त्यांची मूळस्थाने ठरतात. या विधानांना इतिहासात स्थान देणे कठीण आहे.” थोडक्यात महाराष्ट्रातील मांडलिक असोत कि सार्वभौम राजघराणी ही महाराष्ट्रीयच होती. इतिहासात एखाद्या प्रदेशाचे राजकीय महत्व कधी वाढते तर कधी कमी होते व त्याचे सांस्कृतिक परिणामही होत असले तरी अस्सलपणाला कोणताही बाध येत नाही हेच काय ते खरे.

दहाव्या शतकानंतर महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक व आर्थिक घडामोडी घडल्या. सन १०२२ पासून प्रलयंकारी दुष्काळांचे सत्र सुरु झाले. सन १०२२, १०३३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. महाराष्ट्र मुळात निमापावसाळी भूभाग असल्याने या दुष्काळाचा फटका महाराष्ट्रालाही बसने स्वाभाविक होते. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...तेही पुरते ठप्प झाले. मोठ्या प्रमाणात पशू संहार झाल्याने धनगर-गोपालही अवनतीला पोहोचले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही, पैसे असले तरी अन्न उपलब्ध नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते.

 

दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. बारावे शतक ते १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्हॅन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात महाराष्ट्रात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता. समग्र अर्थव्यवस्था भुईसपाट करणा-या या दुष्काळाने निर्माणकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल! या काळात बलुतेदारी पद्धती उदयाला आली. याच काळात व्यवसायाधीश्ठीत सैल जातीव्यवस्था बंदिस्त होत कठोर झाली. उत्पादन केंद्रे बंद पडून सारे कारागीर गावांच्या आश्रयाला आले. बाजारपेठा आकुंचित झाल्या. व्यावासायांच्याच जाती बनू लागल्या. याच काळात वैदिक धर्माने महाराष्ट्रात आपले स्थान भक्कम करत नेले. इह्वादाकडून दैववादाकडे प्रवास सुरु झाला. वर्णव्यवस्थेचे स्तोम वाढले. त्याची लागण व्यवसायाधीश्ठीत जातीन्नाही झाली. कर्मविपाक सिद्धांताने जनसामान्यांची मनोभूमिका व्यापली गेली. राष्ट्रकुट काळात महाराष्ट्रात भरभराटीला आलेला जैन धर्मही या काळात मर्यादित होत गेला. बौद्ध धर्माचे नामोनिशाण उरले नाही. महाराष्ट्रीय दैवतांवर उत्तरेतील दैवतांचे आरोपण करत त्यांना कोठे विष्णूचे वा कृष्णाचे तर कोठे लक्ष्मीचे वा रुक्मिणीचे रूप ठरवण्यात आले. उत्तरेचे सांस्कृतिक आक्रमण व्हायला वैदिक धर्म कारणीभूत ठरला तो असा. त्यातूनच अनेक सामाजिक बंधनांचा उद्रेक झाला. गाथा सप्तशतीतील खुला आणि मनमोकळा समाज संकुचित होत प्रसंगी जातीधीश्ठीत क्रूरही होत गेला. यादवांचा प्रधान हेमाद्री पंडिताने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहून साडेचार हजार व्रतांची निर्मिती केली. समाज इह्वादापेक्षा व्रतवैकल्याच्या मागे लागत गेला. त्यात चवदाव्या शतकात इस्लामी सत्तेने महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली. या सा-या राजकीय, सास्न्कृतीक, आर्थिक आणि प्राकृतिक घडामोडीनी महाराष्ट्राची कंबर तोडली. महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व उत्तरेच्या धार्मिक आणि राजकीय वर्चस्वाने झाकोळले गेले.

 

आजचा महाराष्ट्र संतांनी घडवला असा आपला भावनिक समज असतो. तो खराही आहे. पण संतांनी महाराष्ट्राचे नेमकी कोणत्या प्रकारची मानसिकता घडवण्यात हातभार लावला याची चिकित्सा सहसा केली जात नाही. महाराष्ट्राला दैववादाकडे नेण्यात संतांने मोठी भूमिका बजावली हे कटू असले तरी सत्य आहे. इहवादापेक्षा परलोकवाद महत्वाचा असे लोकांना वाटू लागले असेल तर ते संतांच्या दैववादी भूमिकेमुळे. विठ्ठल, रखुमाई, खंडोबा या अस्सल मराठी दैवतांना उत्तरेतील देवतांशी जोडून घेण्याच्या प्रक्रियेला संतांनी हातभार लावला. तत्वद्न्यानाच्या क्षेत्रातही “ज्ञानेश्वरी”च्या रूपाने हे घडले. संतांच्या भावभक्तीविषयी व मानवतावादी भुमिकेविषयी यत्किंचितही संशय घेता येत नसला तरी मराठी माणसाच्या व्यक्तीमत्वात फार मोठा बदल घडवण्यात संतांनी हातभार लावला. तो इष्ट कि अनिष्ट यावर वेगळी चर्चा व्हायला हवी. शिवाजी महाराज मात्र या भावभक्तीच्या लाटांपासून अलिप्त राहू शकले आणि म्हणूनच संपूर्ण नसल्या तरी महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर पुन्हा एकदा स्वातंत्र्यसूर्य उगवला असे म्हणता येईल. महाराष्ट्राचे अन्य भाग मात्र या क्रांतीपासून दूरच राहीले किंवा ठेवले गेले असे म्हणावे लागेल.

 

पेशवाईचा उदय ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अपरिहार्य घटना होती. या काळात मराठी सेनांनी उर्त्तर व दक्षिण भारत व्यापला. पण तो लष्करी बळावर खंडण्या वसूल करण्यासाठी, महाराष्ट्री लोकांनी आपली सत्ता मात्र प्रस्थापित करणे टाळले. त्यामुळे इंदोर, उज्जैन, धार इ. मराठी संस्थाने निर्माण झाली असली तरी दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याचे धाडस कोणी पेशवा अथवा सरदाराने दाखवले नाही आणि याचे कारण पहिल्या शाहू महाराजांनीच तसे बंधन घातले होते असे एकूण इतिहासावरून दिसते. मोगल पातशहांचे धोरणही याला कारणीभूत ठरले. सनदा द्यायच्या पण ते प्रांत मराठ्यांनी जिंकूनच वसुल्या करायच्या असा एक विचित्र खेळ बनला. राजपूत, जाट, आणि छोटे-मोठे मुस्लीम सरदार या चौथाई प्रकाराने मराठ्यांचे कधीच चांगले मित्र बनू शकले नाहीत. पानिपतप्रकरणी उत्तरेतील एकही सत्ता मराठ्यांच्या सहाय्याला आली नाही हे या स्थितीचेच फलित होते. गुजरात असो कि राजपुताना, अवध असो कि दोआब...बंगाल असो कि कर्नाटक....मराठा सरदारांची ओळख लुटारू अशी बनत गेली. मराठा आक्रमणापासून बचाव करण्यासाठी गावांभोवती कोट उभारण्याची सुरुवात झाली आणि बंगालात खंदक खोदून मराठा सैन्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. इंदोर संस्थान वगळता अन्यत्र कोठेही स्थिर शासन देता आले नाही. महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय वाढवत बाजारपेठा विस्तारित करण्याचे कसलेही धोरण आखले गेले नाही. मुलुखगिरी आणि शेती हेच मुख्य व्यवसाय राहिले आणि त्या गरजापूर्तीसाठी निर्माणकर्ते अल्प मोबदला अथवा बलुत्यावर राबू लागले. उद्योगाला प्रोत्साहनच संपल्यामुळे त्यात वाढ करावी असे वाटण्याचा कोणाला प्रश्नच नव्हता. दहाव्या शतकानंतर जी मानसिकता “ठेविले अनंते तैसेची रहावे” बनत गेल्याने ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. एके काळी उद्योग-व्यापारात आघाडी घेणारा महाराष्ट्र मागे पडला. विलायती वस्तूंना टक्कर घेणे तर शक्यच नव्हते कारण औद्योगीकरण म्हणजे काय हे समजण्याची कुवतही उरलेली नव्हती. कोणताही सामाजिक व आर्थिक विचारवंत महाराष्ट्राला जन्माला घालता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्वाच धूसर होत गेले असे म्हणता येईल.  

 

१८१८ नंतर इंग्रज शासन आले. महाराष्ट्र आपले खरे व्यक्तिमत्व तोवर हरवून बसला होता.  मुंबईचे बंदर व्यापारासाठी वापरायला सुरुवात झाली. तशी दुर्लक्षित राहिलेली मुंबई नावारुपाला यायला लागली. पण त्यात मराठी माणसाचा वाटा फारसा नव्हता. आधुनिक जगाशी जोडून घेण्याचे भान नसल्याने इंग्रज देतील आणि पचेल ते शिक्षण घेण्याकडे आणि सरकारी नोक-या मिळवण्याकडे आणि तेही शक्य नसेल तर रेल्वे किंवा अन्य बांधकामांवर किवा मिल्समध्ये कामगार म्हणून काम करून आर्थिक उत्थान करून घेण्याकडे कल राहिला. सामाजिक सुधारणावादी चळवळी या काळात सुरु झाल्या त्या इंग्रजी शिक्षणाने आणि पाश्चात्य जगाशी होत असलेल्या परीचयामुळे.  त्यामुळे एतद्देशीय धर्म आणि समाजव्यवस्थेतील दोष प्रकर्षाने जाणवू लागले. असे असले तरी देशे उद्योगधंदे उभे करण्यासाठे प्रेरणा देणारा भक्कम विचारवंत याही काळात महाराष्ट्रात जन्माला आला नाही. तंत्रशिक्षणाची चळवळ उभी करण्यात अपयश आले. उदा. मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स सुरु झाली तेंव्हा तिचे चार इंग्रज आणि तीन पारशी एवढेच चेंबरचे सदस्य होते. एकही मराठी माणूस तेथवर जायचा विचारही करू शकला नाही. आजही या अवस्थेत बदल घडू शकलेला नाही. इंग्रजांची शिक्षणपद्धती सुरु झाल्यानंतर दादाभाई नवरोजी, नवरोजी बैयरामजी, जमशेदजी टाटा या तशा मध्यमवर्गीय अवस्थेतुनच येत शिकलेल्या तरुणांनी जागतीक बाजारात/उद्योगात तरुण वयात पाय ठेवला. तसे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या मराठी (व राष्ट्रीय सुद्धा) हिंदू विद्यार्थ्यांबाबत घडलेले दिसत नाही. उलट ते सुरक्षीत नोक-यांतच घुसतांना आणि काही अपवादात्मक तरुण पत्रकारिता/प्रकाशन/समाजकार्य अशा कार्याला लागलेले दिसतात. म. फुले यांनी शेतक-यांचा आसूड व गुलामगिरी हे ग्रंथ लिहून अर्थविचारांचा पाया घातला पण ते कार्य पुढे न्यायला अन्य कोणी समोर आले नाही.

 

ख-या अर्थाने महाराष्ट्रात प्रबोधनाचे पर्व आलेच नाही. इंग्रजांशी स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी महाराष्ट्राने जीवाचे रान केले. लाल-बाल-पाल अशी एक घोषणा लो. टिळकांमुळे बनली. ते राष्ट्राय कॉंग्रेसचे प्रभावशाली अध्यक्षही होते. महाराष्ट्राचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणावर पडायला सुरुवात झाली. शिवाजी महाराज स्वातंत्र्य लढ्याचे एक आयडॉल बनले. इतके कि रवीन्द्रनाथ टागोरांनी त्यांच्यावर प्रदीर्घ कविताही लिहिली. पण गांधीजींचा राष्ट्रीय पटलावर उदय झाला आणि महाराष्ट्र अनुयायांच्या भूमिकेत गेला. महाराष्ट्राने राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवली ती नथुराम गोडसे या कुकर्मी मराठी माणसाने गांधीजींची हत्या केल्यामुळे. सावरकर क्रांतीकारकांचे मुकुटमणी म्हणून प्रसिद्धीस आले असले तरी महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यक असे सर्जक कार्य किंवा सामाजिक उत्थानासाठी प्रेरक तत्वज्ञान लिहिण्याचे कार्य त्यांच्याकडून होऊ शकले नाही. ते तशा निरुपयोगी हिंदुत्ववादासारख्या संकल्पनेशीच अखेरपर्यंत नुसते चिकटून राहिले नाही तर त्यासाठे प्रसंगी राष्ट्राचे विखंदन होईल अशा राजकीय भूमिका घेतल्या. त्यामुळे सावरकर हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिले. महाराष्ट्रीय प्रजेला ऐहिक उत्थानासाठी त्यांचाही उपयोग होऊ शकला नाही.

 

रा.स्व. संघाचे स्थापना मराठी माणसाने महाराष्ट्रात केली आणि ही संस्था मात्र अनेक अडथळे सहन करत जोमाने राष्ट्रीय पातळीवर वाढली. भाजप हे तसे संघाचे अपत्य. देशावर आज सत्ता भाजपची असली तरी ती मराठी माणसांची अल्पांशानेच राहिलेली आहे. आजवर मराठी माणसांना पंतप्रधानाच्या शर्यतीत राहूनही त्या पदाने हुलकावणी दिलेले आहे. राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतील असे नेते महाराष्ट्राने किती दिले हा प्रश्न विचारला तर उत्तर नकारार्थी येते. मराठी भाषेला साधा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करवून घेता आला नाही यावरून महाराष्ट्राची दिल्लीत किती पत आहे हे लक्षात येईल. महाराष्ट्र हा सर्वाधिक कर भरणारे राज्य आहे. राज्यात असंख्य उद्योग जोमाने वाढत आहेत. अनेक उद्योग पळवलेही जात आहेत, पण मराठी माणसाचे त्यात उद्योग किती या प्रश्नाचे उत्तर दोन-पाच टक्के एवढेच येईल. मराठी माणूस नोक-या माह्गान्यात आघाडीवर आहे. आरक्षणासाठी काळाचे सरंजामदारही उग्र आंदोलने करत शासनाला वेठेस धरत आहेत. नोकरी प्राप्त करणे हेच मराठी तरुणांचे स्वप्न बनून गेलेले आहे. कॉर्पोरेट संस्कृती तर मराठीच काय भारतीय माणसालाही अजून नीट अंगीकारता आलेली नाही. सारी उद्योग संस्थाने ही एखादा अपवाद वगळता कौटुंबिक मालमत्ता आहे. मराठी माणसाला तर तेही अद्याप जमलेले नाही. शेतीचे बदहाली आणि शेतक-यांच्या आत्महत्या याचा मात्र सुकाळ आहे. महाराष्ट्रीय मानसिकता ही गतानुगतिक झाली आहे. याला कारण मराठी राजकारणी जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त सामाजिक विचारवंत आणि सहित्यिक जबाबदार आहेत कारण मराठी माणसाला त्याच्या ख-या व्यक्तीमत्वाची जाणीव करून देत त्याला इहवादी बनवण्यासाठी जे प्रेरक विचार आणि साहित्य देण्यात त्यांना अपयश आले आहे. तत्वाद्न्य तर महाराष्ट्राने गेल्या एक हजार वर्षात एकही पैदा केलेला नाही.

 

महाराष्ट्राचे राष्ट्रीय राजकारणात विशेष स्थान नाही याचे कारण सतराव्या शतकापासून मराठी माणसांनी जी उत्तर व दक्षिणेत आपली प्रतिमा बनवून ठेवली आहे त्यात आहे. ही प्रय्तीमा बदलण्यासाठी सक्षम नेतृत्व सामोरे यायला हवे होते व मराठी माणसाबद्दल आस्था आणि विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करण्यासाठे कसोशीने प्रयत्न करायला हवे होते पण तसे दुर्दैवाने झालेले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला घ्यायचे एखादे संजय नहार ठरवतात तर अखिल भारतीय म्हणवणा-यांचे पाय लटपटतात अशी मराठी प्रवृत्ती बनली आहे. एके काळी मुलुखगिरीसाठी का होईना सारा भारत पायतळी तुडवणारे मराठी लोक महाराष्ट्र-कोंबडे झाले आहेत. आणि पराराज्यातले लोक येथे येऊन मराठी माणसे जे काम करतच नाहेत ते काम करू लागले कि त्यांना हाकलायचे राजकारण खेळणारे कूपमंडूक नेते मात्र महाराष्ट्राने पैदा केले आणि लोकांच्या गळ्यातले ताईत ते हृदयसम्राट वगैरे बनले. मग महाराष्ट्राची राष्ट्रीय प्रतिमा काय असणार? कोणते व्यक्तिमत्व देश आणि जगासमोर उभे राहणार?

आज महाराष्ट्र उध्वस्त व्यक्तिमत्वाचे राज्य बनलेला आहे. महाराष्ट्राचे गरजणे हे आपल्या गल्लीपुरतेच सीमित राहिलेले आहे. दिल्ली खरेच दूर राहिलेली आहे. इतकी दूर कि महाराष्ट्राची दखलपात्र राज्य ही अवस्था बनलेली असेल तर ती केवळ येथल्या ४८ जागांमुळे. त्यातला किती वाटा मिळवायचा यावर राष्ट्रीय व स्थानिक पक्ष झगडतात, पण महाराष्ट्राच्या पदरी हे निवडून आणलेले ४८ लोक काय आणतात? हे लोक राष्ट्रीय स्तरावर आपली व राज्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय करतात? हे सारे प्रश्नच आहेत. या प्रश्नांना भिडणा-या मराठी नेत्यांची आज जास्त गरज भासते आहे. आणि मराठी जनतेने स्वाभिमानाने उठून नोक-यांत भविष्य शोधण्यापेक्षा नोक-या निर्माण करण्यासाठी झटू लागणे हे काळाची गरज आहे. ज्ञानसत्ता संपादन करून अर्थसत्ता प्राप्त करण्याची गरज आहे. तरच “गर्जा महाराष्ट्र माझा...” म्हणण्यात काही अर्थ राहील, नाहीतर आहेच आपले...”बिकट वाट वहिवाट यशाची, धोपट मार्गा सोडू नको....”

 

-संजय सोनवणी

 *साहित्य चपराक, एप्रिल २०२४ अंकात प्रसिद्ध.)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...