Friday, May 27, 2022

सत्याचा एंटिव्हायरस

 पेटून उठतील ना लोक

हो नक्कीच
आज त्यांचे रक्त शेण झालं असलं
मेंदुत गुलामीचा व्हायरस घुसला असला
आणि जे सांगितलं जातंय
तेवढच सत्य आहे
असं त्यांना वाटत असलं
आणि कन्हत कुथत
जगत जरी असले ते
तरी सत्याचा एंटिव्हायरस
करेल ना त्यांना जागं
एक दिवस
तू फक्त सांगत रहा
त्याच निर्भयतेने!
होय...
पेटून उठतील ना लोक...
एक दिवस!

प्राचीन कथन-श्रवण परंपरा आधुनिक रुपात पुन्हा अवतरलीय!

  


 

प्राचीन काळात जेंव्हा लिपीचाही शोध लागलेला नव्हता तेंव्हाच कल्पिणे, कथन करणे व सांगणे या कलेचा अभिनव शोध लागला. माणूस हा प्राणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो कारण त्याला बोलता येते. आपले स्वरयंत्र वेगवेगळे आवाज काढू शकते, निसर्गातील विविध आवाजांची नक्कल करता येते हे अगदी प्रारंभीच्या काळात त्याच्या लक्षात आले. या होमो सेपियन प्रजातीची वैशिष्ट्यपूर्ण दफने, कलात्मक वस्तू व हत्यारांच्या निर्मितीकडे पाहता ही प्रजाती आरंभ काळापासून तर्कसंगत विचार करत असावी हे स्पष्ट होते. विचारांशिवाय आणि अभिव्यक्तीच्या अनावर उर्मीशिवाय संस्कृतीचा आणि भाषेचा जन्म  होऊ शकत नाही. विचार करणे आणि अभिव्यक्तीसाठी भाषा असणे हा मानवाचा स्थायीभाव आहे असे म्हणावे लागते. जीवनव्यवहार जसजसे गुंतागुंतीचे होत गेले तशा आरंभीच्या बाळबोध भाषाही प्रगत गुंतागुंतीच्या व व्यामिश्र झाल्या, नेमकेपणासाठी व्याकरणे आली. या पद्धतीने भाषा विकसित होत गेल्या.

 

केवळ ऐहिक जीवनाबद्दल विचार करत होता म्हणून मनुष्याने भाषा स्वयंभू प्रेरणेने निर्माण केली असे म्हणता येत नाही. मनुष्य विचार करतो त्याचबरोबर अनेक अमूर्त कल्पनाही करतो. अतिप्राचीन काळी मनुष्य आपल्या भवतालाकडे अद्भुतरम्य दृष्टीने पाहत असे. त्याने आपल्या कल्पनाशक्ती वापरत दिसणा-या जगापलिकडचे एक अद्भुत जगही निर्माण केले. त्या जगात स्वर्ग होता, पाताळ होतें, देवी-देवता जशा होत्या तसे सैतानही होते. प-या होत्या, अजरामर बनवू शकणारे अमृतही होते, यक्ष होते, गंधर्व होते, उडते सर्प होते, अवाढव्य गरुड जसे होते तसेच भुते-खेतेही होती. दुध-तुपाचे समुद्र होते तसेच मेरू पर्वतासारखे किंवा बाखू, ऑलिम्पस सारखे देवांचे निवासस्थान असलेले पर्वतही होते. मानवी जीवनातील संघर्षाचे अध्यारोपण या काल्पनिक सृष्टीवर करत त्यांनी त्यांचा संघर्ष नुसता कल्पिला नाही तर त्यांच्यावर कथाही बनवल्या. प्रत्येक देव-सैतानाला त्यांनी स्वतंत्र व्यक्तित्व दिले. आद्य पुराकथा अशा निर्माण झाल्या. जगभरात प्रत्येक भागात अशा पुराकथा आहेत. या पुराकथा प्रत्येक प्रांतात वेगळ्या असल्या तरी मुलभूत गाभा मात्र एकच आहे आणि तो म्हणजे संघर्ष!

 

बरे, या कथा ज्याही प्रतिभाशाली मानवाने प्रथम बनवल्या त्या कशा पसरल्या? त्या कथा मौखिक पद्धतीने सांगितल्या जात. शक्यतो या कथा गेय असत कारण त्या सांगणे आणि ऐकणे यात एक आदिम ताल असे. ऐकणारेही सहजपणे ते मुखोद्गत करून आपल्या शैलीत नवीन समुदायासमोर पुन्हा सांगू शकत. कधी कधी सांगणारा त्यात आपल्या प्रतिभेने अधिकची भर घाले आणि मुळ कथा या पद्धतीने बदलत जात विविध प्रांतांत पसरत आणि पिढ्यानुपिढ्या सांगितल्या जात. त्यात प्रांत-कालसापेक्ष पद्धतीने बदलत राहत तरी मुळ गाभा सहसा बदललेला नसे. पण सांगणे आणि ऐकणे, स्मरणात ठेवणे आणि पुन्हा सांगणे हे चक्र अबाधित होते. या काळात पुन्हा नव्या कथांचा जन्म झाला किंवा इतिहासात किंवा वर्तमानात घडलेल्या घटनांना अद्भुतरम्य रूप देत नव्या कथांचा आणि महाकाव्यांचा जन्म झाला. इलियड, ओडीसी, रामायण, महाभारत किंवा गिल्गमेश असो, अशी असंख्य काव्येही याच मानवी प्रेरणांतून निर्माण झाली व पुढे संक्रमीतही झाली.

 

लिपीचा शोध लागल्यानंतर सारे स्मरणात ठेवण्याची गरज नष्ट झाली. स्मृतीतील पुराकथा व पुराकाव्ये शब्दांत लिपीबद्ध केली गेली. त्यासाठी नैसर्गिक साधने वापरली गेली. मग ते इष्टीकावरील लेखन असो की ताडपत्रांवरील. यामुळे सोय झाली खरी पण त्याचा प्रचार करायचा तर पुन्हा प्रती बनवणे आवश्यक झाले. पण कोणत्याही ग्रंथाची अचूक प्रत बनवून घेणे हे अत्यंत खर्चिक होते. त्यामुळे ग्रंथाच्या प्रती सामान्य जनतेला अप्राप्य असत. यातून पुराणिक हा व्यवसाय सुरु झाला. म्हणजे एकच प्रत त्याने वाचायची, निरुपण करायचे आणि इतरांनी ऐकायचे. लोकसाहित्य तर लिखित स्वरूपातही आता-आतापर्यंत उपलब्ध नव्हते. ते तर केवळ मौखिक परंपरेने पिढ्यानुपिढ्या चालत आले. म्हणजेच एकंदरीत कारभार कथन-श्रवण परंपरेचा राहिला. खरे तर मानवी संस्कृती लाखो वर्ष कथन आणि श्रवण या मुलतत्वावरच उभी राहिली. कारण त्यात एक सामुदायिक अनुभूतीही होती.

 

पुढे मुद्रणकलेचा शोध लागला. शिक्षणाने वाचू शकणा-या जनतेचीही वृद्धी होऊ लागली. यातून सर्वात मोठा झटका बसला तो कथन-श्रवण संस्कृतीला. म्हणजे पारायणे, प्रवचने किंवा पोवाडे ही परंपरा अगदी मराठीतही समांतरपणे सुरूच राहिली पण ज्याही लोकांना त्याहीपार जाऊन जीवनदृष्टी देणारे साहित्य हवे होते ते कथन-श्रवण संस्कृतीतून जवळपास हद्दपार झाले. त्याची जागा वाचनसंस्कृतीने घेतली. गेय शैलीची जागा गद्य शैलीने पादाक्रांत केली. लेखनात मग अत्यंत नवे, अद्ययावत प्रयोग सुरु झाले. याने साहित्य जगाला वेगळा वास्तव मानवी चेहरा दिला. मानवी जीवनाचे गहन अंतरंग उलगडले जाईल अशा साहित्याला जन्म मिळाला. लेखन अद्भुतरम्यतेकडून वास्तववादाकडे आले.

 

पण यालाही मर्यादा होत्या आणि आहेत. वाचन करायचे म्हणजे पुस्तक विकत घ्या, किंवा ग्रंथालयातून घ्या, वाचनासाठी वेगळा वेळ काढा आणि त्यासाठी निवांत जागा शोधा. परत सारीच पुस्तके विकत घेता येईल अशी प्रत्येकाची क्षमता नसतेच त्यामुळे गाजलेली अथवा गाजवण्यात आलेली पुस्तके तेवढी विकत घेतली जातात. बव्हंशी लोक मात्र या साहित्यापासून दूरच राहिले. मर्यादित सामुदायासाठे जाहीर कथा किंवा कादंबरीची अभिवाचने होत असली तरी त्यावर मर्यादा होत्या.

 

त्यामुळे वर्तमानात आता एक अभिनव “श्राव्य” क्रांती होते आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईल आजकाल प्रत्येकाच्या हातात असतो. त्याचा उपयोग मोबाईलवर एखाद्या श्राव्य पुस्तके उपलब्ध करून देणा-या कंपनीचे एप डाऊनलोड करून हवे ते पुस्तक निवडून कोठेही एकटे किंवा सामुदायिक पद्धतीने ऐकता येण्यासाठी होतो. अगदी फिरायला निघाले अथवा कार चालवत असले तरी तेंव्हाही श्रवणानंद घेत साहित्याचा आनंद घेता येतो. छापील पुस्तकांची जागा झपाट्याने श्राव्य माध्यम व्यापू लागले आहे. त्यात स्टोरीटेल (storytel) या स्वीडीश कंपनीने आता इतर भाषांबरोबरच हजारो मराठी लोकप्रिय व श्राव्य माध्यमासाठी खास लिहून घेतलेली नवी पुस्तकेही नामवंतांच्या आवाजात ऐकायला उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामुळे जगभरच्या वाचकांप्रमाणेच आता मराठी वाचकांचीही श्रोत्यांत बदल व्हायची प्रक्रिया सुरु झालेली आहे. शिवाय एक पुस्तक विकत घ्यायला जेवढा खर्च येतो त्या खर्चात महिनाभर ऐकता येतील तेवढी आणि हवी ती बव्हंशी प्रसिद्ध पुस्तके निवडता येतात. त्याला मिळणारा मराठी साहित्य-श्रोत्यांचा प्रतिसादही अफाट आहे. एकंदरीत कथन-श्रवण संस्कृती आधुनिक रुपात पुन्हा एकदा अवतरलेली आहे. आणि ही संस्कृती पुरातन असल्याने काय सांगावे उद्या कदाचित “पुस्तक वाचले काय?” ऐवजी “पुस्तक ऐकले काय?” या प्रश्नाकडे लोक वळू लागतील. श्रवण हे मानवी मुलभूत प्रेरणांशी अधिक सुसंगत आहे. साहित्याचा खेड्या-पाड्यांपर्यंतही सर्वदूर प्रसार व्हायला श्राव्य माध्यम फार मोठा हातभार लावू शकते.

 

काळाचे चक्र फिरत असते. आधुनिकता नेहमी पुरातनतेचा हात धरून चालत असते. मुलभूत मानवी प्रेरणा कालौघात दिशा बदलत जात असल्या तरी त्या संधी मिळताच पुरातनाचा हात आधुनिक पद्धतीने धरायला पुढे धावतात. त्यामुळे मानवी विश्वात प्राचीन काळी झालेली मानवी जीवनाला चेहरा देणारी “कथन-श्रवण” क्रांती आधुनिक स्वरूपात आता अवतरली आहे आणि तिचा स्वीकार करावा लागेल.

 

-संजय सोनवणी

दै, नवशक्ती

लेह ते यारकंद- गोठलेली मृतांची नदी श्योकवरून प्रवास!



 लदाख हा भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तर सर्वात मोठा प्रशासकीय भाग आहे. आता हा प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन झाल्यापासून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. मर्युल हे प्राचीन नाव असलेल्या लदाखचा इतिहास पुराश्मकाळाइतका प्राचीन आहे. हा प्रदेश प्राचीन काळी तिबेटी सत्तेचा भाग होते. पण सन ९०० मध्ये तिबेटचा राजा लाग्दार्माच्या हत्येनंतर तिबेटची सत्ता विस्कळीत झाली. त्याचा नातू निमांगोम याने लदाख आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढे लदाखचेही त्याच्या मुलांमध्ये वाटप होऊन लदाखचे तीन भाग पडले. पुढे सन ७५०च्या आसपास काश्मीरचा सम्राट ललीतादित्य याने गिलगीट-बाल्टीस्तान आपल्या कब्जात घेत लदाखही आपल्या स्वामित्वाखाली आणून काश्मीर राज्याला हे प्रांत जोडले. जोझीला या मुख्य पण दुर्गम खिंडीतून काश्मीरचा मध्य आशियाशी चालणारा व्यापार त्यामुळे सुलभ झाला. पण लदाखने ललितादित्याच्या मृत्यूनंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य एकोणीसाव्या शतकापर्यंत टिकले. सन १८३४ मध्ये जम्मूचा राजा गुलाबसिंगाचा सेनापती जोरावरसिंग याने लदाख पादाक्रांत करून तेथील नामग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आणलीत्यानेच गिलगीट- बाल्टीस्तानही जिंकून घेऊन काश्मीर राज्याला जोडले. दोन्ही बाजूचे व्यापारी मार्ग आपल्या स्वामित्वाखाली येऊन व्यापारावर स्वामित्व प्रस्थापित करणे हाच या आक्रमणांचा मुख्य हेतू होता.

जोझीला खिंडीच्या माथ्यावर कारगील हे प्राचीन व्यापारी शहर असून त्यापासून जवळच सिंधू नदीच्या काठाने बाल्टीस्तानमधील स्कार्डू मार्गे गिलगीटला जाणारा व्यापारी मार्ग होता. आता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. अनेक व्यापारी तेथेच आपले सौदे उरकत असल्याने तेथील कारगिल गावही वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले होते. जोझीला खिंडीतून येणारा मार्ग कारगिलहून सरळ पुढे गेले कि लेह या मुख्य व्यापारी केंद्राशी जाऊन भिडत होता. कारगील येथील सुरु नदीच्या खो-यातूनही एक व्यापारी मार्ग जात असे जो शेवटी लेहलाच मिळे. लेह येथून यारकंद, खोतान या तारीम खो-यातील मुख्य रेशीममार्गावरील शहरांशी जोडणारे मार्ग होते. ल्हासाला जाणारा मार्गही येथूनच जात असे. येथून खनिज मीठ, काश्मिरी केशर, लोकर, शाली, मसाले, अफू, कापूस, नीळ, प्रवाळरत्ने आदी बहुमोल वस्तूंचा व्यापार या मालाची मध्य आशिया आणि ल्हासा येथे वाहतूक होत असे. येथे पश्चिम आशिया, मध्य पूर्व आशिया आणि भारतातून असंख्य व्यापारी येत. त्यामुळे साडेतेरा हजार फुट उंचीवरचे लेह हे सांस्कृतिक सम्मीलनाचेही एक केंद्र बनले होते. पश्चिम आशियातून व्यापारी दोन मदार असलेले उंट वाहतुकीसाठी घेऊन येत. आजही या उंटांचे वंशज नुब्रा खो-यात पहायला मिळतात.

लेह ते यारकंद हे अंतर जवळपास साडेआठशे किमीचे असले तरी मार्ग मात्र अत्यंत कठीण होता. कैलास ते काराकोरम पर्वतराजीतून कोठे कोठे सतरा-अठरा हजार फुट उंचीवरून, हिमनद्यांनी व्यापलेल्या क्षेत्रातून जात असे. काही भाग तर अन्न-पाणी आणि गवताचे दुर्भिक्ष असणा-या भागांतून जात. सध्या चीनच्या कब्जात असलेला सोळा हजार फुट उंचीवरचा अक्साई चीन (हा मुळचा मध्य आशियातील उघूर भाषेतील शब्द, अर्थ होतो पांढरे वाळवंट) हा त्यातलाच एक भाग. लोकवस्तीचा पूर्ण अभाव हाही एक अडथळा होताच. तरीही वर्षाला साधारणपने दोन हजार व्यापारी तांडे या मार्गावरून व्यापार करत असत.

लेह येथे या व्यापा-यांच्या राहण्यासाठी सराया होत्या. घोडे, याक, उंट असे प्राणी येथे उपलब्ध तर असतच पण मालवाहू ह्मालही उपलब्ध असत. त्यामुळे लेह शहर गजबजलेले असायचे. लदाखच्या पठारावर मुळात ऑक्सिजनची कमतरता. मार्गात उंची असलेल्या खिंडी लागल्या कि ही कमतरता असह्य होईल अशी. त्यात कडाक्याची थंडी. हिवाळ्यात तर नद्या-तळीही गोठत. अशा प्रतिकूल हवामानात या अशक्यप्राय दुर्गम मार्गांनी व्यापार करणे हे खरेच एक साहसी कार्य होते यात शंका नाही.

लेह ते यारकंद हा मार्ग काराकोरम पर्वतराजीतून खाली उतरायचा. हे मार्ग तसे दोन होते...म्हणजे एक उन्हाळी मार्ग तर एक हिवाळी मार्ग. हे दोन्ही मार्ग काराकोरम खिंडीच्या अलीकडच्या दौलत बेग ओल्डी या स्थानाशी येऊन मिळत. हिवाळी मार्ग हा गोठलेल्या नद्यांच्या पृष्ठभागावरून चालत पार पाडला जात असे. हिवाळी मार्गाला झामिस्तानी मार्ग असे म्हटले जाई. या मार्गावर दिगार-ला  खिंड, सासेर-ला खिंड, (समुद्र सपाटीपासून १८ हजार फुट उंच) कामदेन हिमनदीचा पायथा असे अतिदुर्गम भाग ओलांडले कि दौलत बेग ओल्डी येत असे. या हिवाळी मार्गावर रिमो हिमनदीत उगम पावणारी डावीकडे तिरकस “V” आकार घेत वाहणारी श्योक नदी आहे. हिवाळ्यात गोठलेल्या या नदीवरून बराचसा प्रवास करावा लागायचा. “श्योकया शब्दाचा अर्थ आहेमृतांची नदी”. या नावावरूनच या नदीतील प्रवासाची भयावहता लक्षात यावी. श्योक नदी पार केली कि नुब्रा (सियाचीन) नदीच्या खो-यातून प्रवास सुरु होत असे.

पण या मार्गाचा वापर किते पुरातन असावा? अलीकडेच सासेर-ला खिंडीजवळ डॉ. प्रमोद जोगळेकर यांच्या मार्गदर्शनासाठी उत्खनन झाले. येथे साडेदहा हजार वर्षांपूर्वीच्या भटक्या प्रवासी तान्ड्यांचे तात्पुरते निवास सापडले आहेत.

हिवाळी मार्ग उन्हाळ्यात वापरण्यातील मोठी अडचण म्हणजे या काळात नद्यांतील बर्फ वितळून अति-वेगवान प्रवाह निर्माण होत. ते ओलांडणे सुद्धा अशक्य असायचे. अरुंद -यांमुळे काठाने चालणेही अशक्य. त्यामुळे उन्हाळ्यात मार्ग बदलने भाग पडायचे. या उन्हाळी मार्गाला ताबिस्तानी मार्ग असे नाव होते. हा मार्ग खार्दुंग-ला खिंडीतून पुढे अनेक खिंडी पार करत देस्पांग पठारावरून दौलत बेग ओल्डी येथे मिळत असे. हा मार्ग हिवाळ्यात चुकुनही वापरला जात नसे कारण येथे असलेली हाडे गोठवणारी थंडी. देस्पांग पठार आता चीनच्या कब्जात आहे.

या मार्गावरून घोडे जाऊ शकत नसल्याने याक किंवा मानवी श्रमाचाच उपयोग मालवाहतूक करण्यासाठी केला जात असे. तरीही दिवसाला शेकडो व्यक्तींचा एक तांडा असे किमान चार तांडे या मार्गावरून वाहतूक करत असत.

दौलत बेग ओल्डी येथे हिवाळी आणि उन्हाळी मार्ग एकत्र येत. येथून काराकोरम खिंड उतरावी लागे शाहीदुल्ला या व्यापारी थांब्यापर्यंत यावे लागे. येथून यारकंद किंवा खोतानला जाणारे मार्ग फुटत त्यामुळे हे स्थान महत्वाचे होते. एकोनिसाव्या शतकात जोरावरसिंगने येथवर काश्मीरच्या सीमा विस्तारल्या होत्या. यारकंद येथे पोहोचेपर्यंत अजून कूनलुन पर्वतातील संजू खिंडीसारख्या अनेक खिंडी आणि नद्या ओलांडाव्या लागत.

दौलत बेग ओल्डी हे नाव कसे प्राप्त झाले याचा इतिहासही खूप मनोरंजक आणि उद्बोधक आहे. सध्या येथे भारतीय सैन्याचा मोठा तळ तर आहेच पण जगातील सर्वात उंचीवरची धावपट्टीही येथे आहे. याबद्दल अधिक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

या मार्गावर गेल्या हजारो वर्षांत असंख्य माणसे प्राणी प्रतिकूल हवामानात ओझ्याने म्हणा कि ऑक्सीजनची कमतरता म्हणा, मेल्याने या रस्त्यावर आजही त्यांचे सांगाडे विखुरलेले दिसतात. या मार्गावर धाडसी पर्वतारोहीन्नी या अनाम मृत जीवांना अत्यंत आगळ्या पद्धतीने त्यांच्या अपार साहस आणि धैर्यासाठी आदरांजली म्हणून काराकोरम खिंडीजवळ एक छोटे स्मारक उभे केले आहे. हे स्मारक म्हणजे याक आणि मानवी कवट्या हाडे एकत्र करून अस्थायी स्वरूपाचा स्मृतीस्तंभ आहे!

-संजय सोनवणी

 

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...