Friday, June 26, 2015

जागतिक महामंदी?

जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा महामंदीची लक्षणे असून एकमेकांशी स्पर्धा करणा-य पतधोरणांपासून जगभरच्या मध्यवर्ती ब्यंकांनी फारकत घ्यावी असे रिझर्व ब्यंकेचे गव्हर्नर डा. रघुराम राजन यांनी म्हटले आहे. गेला काही काळ आपल्या अर्थव्यवस्थेतील धोके आणि शाश्वत अर्थव्यवस्थेची गरज दाखवून देतांना मीही अनेकदा हीच भिती व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थांनी डा. राजन यांचे म्हणने अत्यंत गांभिर्याने घेतले पाहिजे. डा. राजन हे स्पष्टोक्ति केल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत.

खरे म्हणजे ब्यंकांनी आपल्या वित्तवितरण धोरणातील प्राथमिकताच बदलायला हव्यात. जेंव्हा आर्थिक, नैसर्गिक आणि मानवी संसाधनांच्या गुंतवणुकी या जीवनावश्यकतेच्या उत्पादनक्षेत्रांत होण्याऐवजी मानवास क्रुत्रीम सुखाचा भ्रम देणा-या तंत्रद्न्यानांत/त्या अनुषंगिक उत्पादनांत व त्यांच्या विपनण व्यवस्थेवर विशिष्ट मर्यादेबाहेर होवू लागतात तेंव्हा आर्थिक अराजकाच्या दिशेने वाटचाल सुरु होते, जी आता सुरु झालीच आहे. खरे तर प्रत्त्येक अर्थव्यवस्थेने एक संतुलन साधले पाहिजे. गुंतवणुकीच्या स्त्रोतांचे विभाजन हे जीवनावश्यक आणि मानसिक गरजावश्यक असे संतुलित प्रमाणात व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षांतील एकुणातीलच जागतीक अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहिली तर गुंतवणुक ही अन्याय्य पद्धतीने तंत्रद्न्यानाधारित...आणि त्यातल्या त्यात मानवास कार्यक्षम न करणा-या पण आभासी प्रतिष्ठा देणा-या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि शेती/पशुपालन, शेतीआधारित व इतर लघुउद्योग यांसारख्या पायाभुत क्षेत्रांतुन क्रमशा: घटत चालली आहे असे चित्र आपल्याला दिसुन येईल.

तंत्रद्न्याने ही मानवी जीवन सुखकर होण्यासाठी विकसीत व्हायलाच हवीत. त्याआधारीत उत्पादने बाजारात यायलाच हवीत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्याचा वेग आणि पुरवठा आणि ते प्रत्येकाच्या गळी उतरवण्यासाठी वापरले जाणारे मानसिक आणि पर्यायाने आर्थिक गुलामी आणनारे तंत्र विघातक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. या तंत्रद्न्यानांनी मानवी उत्पादकता, सर्जनशीलता वाढवण्यात हातभार लावला असता तर वाईट वाटण्याचे कारण नव्हते. सध्याची व्हर्चुअल सुख देणारी तंत्रद्न्याने तर मानवी समुहाला एकत्र आनण्याऐवजी "एकाकी" करत चालली आहेत असेच दुर्दैवी चित्र दिसते आहे. सामाजिक मानसशास्त्राचा बळी जर ही तंत्रज्ञाने घेत असतील तर आपणही त्यांचा वापर किती व कसा करावा यावर गांभिर्याने चिंतन करायला हवे.

पण मुलभूत समस्या ही आहे कि लोकांनी स्वतंत्र बुद्धीने विचारच करु नये अशी एकजिनसी सामाजिक मानसिकता बनवायच्या अवाढव्य प्रयत्नांत जागतिक अर्थव्यवस्था आहेत. ही मानसिकता बनवली जातेय व आपण त्यानुसारच जीवनाचे निर्णय घेतोय याची किंचितही जाणीव ही नवी व्यवस्था हौ देत नाही. हुकुमशाहीए राष्ट्रे जनमानसिकता अशा प्रकारे बनवायचा प्रयत्न करत असत. भारतात हे प्रयोग आजचे नाहीत. पण किमान त्याला विरोध तरी होतो...पण अर्थव्यवस्थेच्या ब-या वाईटाचे सारेच समान भागीदार बनु लागल्याने हे संकट हवेहवेसे वाटू लागणे हेच या नवमानसिकतेचे मुख्य लक्षण आहे.

नीतिशास्त्रात सुख म्हणजे काय यावर नितांत चर्चा झालेली आहे. कोणत्याही नीतिविदाने अजून परिपुर्ण म्हणता येईल अशी व्याख्या केलेली नाही. सुख ही मनाची अवस्था आहे याबाबत मात्र एकमत आहे. म्हणजे सुख ही व्यक्तिसापेक्ष बाब आहे. सुखाचे नियम व्यक्तिपरत्वे बदलतात. पण आता सुखाच्या नवीन व्याख्या आपल्या अर्थव्यवस्थांनीच बनवल्या असून सर्व जनप्रवाह त्या लाटेवर स्वार झाल्याचे चित्र आपल्याला दिसेल. यातुनच जे यापासून वंचित आहेत त्यांच्यातील असंतोषही धधगत राहतोय.

पण येथे हा प्रश्न उद्भवतो कि या तंत्रद्न्यानांनी खरेच मानवी जीवन सुखकर होते आहे काय? ते खरेच आरामदायी होते आहे काय? कि नवे ताणतणाव हीच तंत्रद्न्याने व त्यांचा अनिर्बंध वापर करत मानवी जगाला नवीन संकटपरंपरेत नेत आहेत? या आधुनिक संसाधनांमुळे नैसर्गिक स्त्रोत कसे नष्ट होत प्रुथ्वीला एक नष्ट न होवु शकणा-या कच-याची कुंडी बनवतील, ही खरी असलेली भिती क्षणभर दुर जरी ठेवली तरी मानवाची एकुणातील सर्जनशील कार्यक्षमतेचा अंत घडवण्याच्या दिशेने आपण नेटाने वाटचाल करत आहोत. एकुणात बौद्धिकतेचे व मानवी स्वातंत्र्याचे हे स्वखुशीने होऊ दिलेले अपहरण आहे असे म्हटले तर ते वावगे कसे ठरेल?

आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत कितपत जागरुक आहोत हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. आमच्या भविष्याच्या दो-या आमच्या हातून कधीच निसटल्या असून ही जगड्व्याळ, कृत्रिमतांच्या पायावर उभी असलेली अर्थव्यवस्थाच आमच्या बौद्धिक, आत्मिक विचारांच्या दिशा ठरवत आहे. थोडक्यात आम्ही मानवी ठराविक दिशेनेच विचार करणारे रोबो बनत चाललो आहोत. डा. राजन सारख्यांचा इशारा आम्ही कुचकामी व दुर्लक्षित ठेवण्याचीच शक्यता जास्त आहे.

Thursday, June 25, 2015

सांस्कृतीक आणीबाणी

आणीबाणीच्या आठवणी निघत आहेत. आणीबाणी लागली तेंव्हा मी दहा-अकरा वर्षांचा असेल. रहायचो वरुड्यात. आमच्या गांवात आणीबाणीची दहशत होती खरे पण ती कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियांसाठी जबरदस्ती पकडून न्यायचे म्हणून. स्वेच्छेने नसबंदी करुन घेणारे अत्यंत तुरळक. नसबंदी केल्यावर पैसे दिले जायचे. त्या आशेने नसबंदी करुन घेणारे महाभागही होतेच. पण अधिक करुन दुरुन जीपचा धुरळा उडतांना दिसला कि बाप्प्ये लोक लपायला माळ, ओढे गाठत. आम्हाला गम्मत वाटे. सरकारी कर्मचा-यांना कोटा पुर्ण करणे भाग असल्याने मग काही म्हातारेही पकडुन नेले जात. आमच्या गांवचा पुजारी जिजाबा हा म्हातारा...पण त्याचीही सक्तीची नसबंदी झाली. म्हातारा वेदनांनी रात्र रात्र एवढा विवळायचा कि विचारु नका. लोकांनी नसबंदीची धास्त खाल्ली होती.

संततीनियमनासाठी निरोध वाटपाचे काम तेंव्हा शिक्षकांकडेच असायचे. माझे वडील शिक्षक. निरोधाचे फुगे कसे बनवायचे हे आम्हाला आमच्या पाटलानेच शिकवले. त्या फुग्यांनी आमचे बालपण रंजक केले. बाकिच्या बाप्प्यांनी त्याविना उत्सव केले असणार हे उघड आहे.

दुसरी धास्ती लेव्हीची. विशिष्ट धान्य सरकारजमा करावे लागे एवढे आठवते. एकदा काय झाले, आमच्या गांवातील एका वस्तीवर एकाच्या घराला लागली आग. ती पसरत गंजीपर्यंत गेली. सारा गांव घर विझवायला धावलेला. पण तो माणुस म्हणतोय...घर नंतर आधी गंज वाचवा. लोकांना काही कळेना...पण बाबा कोकलून बोलतोय म्हटल्यावर लोक गंजीकडे वळले. गंजीतुन जी काही धान्याची पोती निघाली म्हणता....आम्हा पोरांना वाटले खजिना म्हणतात तो हाच!

तिसरी धास्ती म्हणजे तगाईच्या वसुलीची. एवढ्या सक्तीची वसुली मी कधी पाहिली नाही. देणेकरी तगाईदाराची भांडी-कुंडीही उचलून नेली जात. माझ्या समक्ष तीन-चार घरांचे हाल असे झालेले पाहिलेले आहेत.

बाकी सरकारी अधिकारी ठिकाणावर आले होते. वक्तशीरपणा वाढला होता. साठेबाज-काळाबाजारवाले गळाठले होते. पण इंदिराजी चांगले करताहेत हे कोणाला वरील कारणांमुळे वाटणे शक्य नव्हते. मोहन धारिया आमचे त्यावेळचे हिरो होते. त्यांचे भाषण एस. पी. कोलेजच्या मैदानावर पुण्यात होते. ते भाषण ऐकायला जाण्यासाठी मी भयंकर दिव्य करत गेलो...परत आलो. पण ते भारावलेपण लवकरच जनता पक्षाच्या तमाशाने हिरावले गेले. आणिबाणी का वाईट होती ते मला वरील प्रसंगांपुरतेच प्रत्यक्ष माहित आहे. पण आता वाटते....बुडवे लोक...तगाई काय किंवा अन्नधान्य काय, किंवा लोकसंख्येत भरमसाठ भर घालण्याचा जन्मजात परवाना आपल्याला मिळालाय असे माननारे लोक तेंव्हाही होते आणि आता तर फारच आहेत.

आणिबाणी वाईट होती काय? अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा किती गळा घोटला गेला हे तेंव्हा मला माहित नव्हते आणि आता जेही काही इतरांचे वाचुन माहित आहे त्यावरुनही मला तो काळ चुकीचा होता असे वाटत नाही. ज्यांनी कधी दुष्काळ पाहिला नाही, मिलोच्या भाकरी किंवा सुकड्या खाल्ल्या नाहीत त्यांना त्याचे महत्व समजणार नाही. य देशात ज्या बाबी सक्तीच्या हव्यात त्या कधीच नसतात आणि नको त्या टुक्कार (अ)सांस्कृतिक सक्त्या करायचे प्रयत्न् होतात...दहा दहा पोरे काढायच्या सुचना दिल्या जातात त्या नतद्रष्टांना तर आणिबाणीबद्दल बोलायचा अधिकारही नाही.

लोकांमधील अप्रामाणिकपणा तेंव्हाही होता आणि आता तर त्या अप्रामाणिकपणाचा विस्फोट झाला आहे. प्रशासनाने आपली पकड एवढी घट्ट केली आहे कि मंत्री-संत्री प्रामाणीक असले तरी हतबल व्हावेत. भ्रष्टाचाराचा विळखा प्रशासनामुळे अधिक वाढला आहे हे अमान्य करण्याचे काहीएक कारण नाही. जनतेलाही प्रामाणिक अधिकारी नकोत. सर्व क्षेत्रांत माफिया घुसलेले आहेत.

अडवाणी आणीबानीच्या शक्यतेबाबत बोलले. त्यांना खोमच्यात टाकल्याचा उद्वेग त्यांनी व्यक्त केला यापार त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देता येत नाही. आणीबाणी आजही तशी आहेच...फक्त तिचे रुपडे बदललेय. ते सांस्कृतिक दहशतवादाची पातळी गाठते आहे....आणि ग्व्याड लागणा-या भक्तांच्या मांदियाळीमुळे ती तशी सुसह्य वाटतेय...

पण या अघोषित सांस्कृतीक आणीबाणीची भयावहता कल्पनातीत असणार आहे ते आम्हाला कसे कळणार?

Wednesday, June 24, 2015

Sonawani is no Talageri.!


No trifling thinker, this Sanjay Sonawani. His book was released by Dr. Vasant Shinde, Vice-Chancellor, Deccan College


By Sanjeev Sabhlok 
Trying to find more about Sonawani, I chanced upon his blog. This blog post shows his book was released by none other than Dr. Vasant Shinde, Vice-Chancellor, Deccan College.  [Shinde's profile on DC website and his CV]
This is no mean achievement: to get the head of the most academically sound and eminent institute of archaelogy in India (and one of the few such institutes in the world) to release a book. There were a couple of other academics present at the event, as well.
Sonawani is no Talageri.
The man's intellect is powerful and has been able to attract some top academics of India.

Very clever: Sanjay Sonawani’s hypothesis for the RV/Sanskrit culture & the Indus Valley “script”



Very clever: Sanjay Sonawani’s hypothesis for the RV/Sanskrit culture & the Indus Valley “script”


By Sanjeev Sabhlok
Rarely do I come across much sense in the various writings on ancient Indian history (particularly the OIT-AIT etc. theories). When you read most of the writings, it appears that people are looks at things from fairly pre-conceived perspectives, and they are merely TWISTING the facts to suit their preferences. 
At least that's the impression I got with most OIT "theorists". I've not paid much attention to alternative hypotheses (since there are too many of them). I've merely rejected OIT as being a bunch of nonsense.
But Sanjay Sonawani has no preconceived ideas and is willing to think more deeply. He is not content to debunk OIT but aims to find the truth. That's a far more ambitious project than what I started (a couple of weeks) to undertake. I'm not sure I'm going to spend much more time on these issues, since I don't intend to waste time on ancient history, but let me make a few notes on the broader issues, while I'm on the topic.
Sonawani is not a trained historian or scholar but jurors don't need to be trained criminlogists or forensic scientists. Jurors need to ask questions and make sure the facts fit the story being advocated. Sonawani asks sharp and pointed questions, and dismisses evidence that doesn't stack up. That's what I like about his work. Then he TENTATIVELY offers alternative possibilities. That's another good sign. Not the boor Talageri whose writings are littered with arrogant challenges to everyone in the world. Sonawani is the exact opposite of Talageri – even though both are untrained in any relevant discipline.
I won't comment on Sonawani's entire thesis till I've reviewed it carefully, but from what I've understood of his work so far (I've only reviewed a small bit), this is his deduction:
– Indo-European (or whatever these are called) languages came to India tens of thousands of years ago, along with the very early migrations that are well documented.
– Rig Vedic CULTURE (which is an offshoot of Zoroastrian culture) came into India from south Afghanistan in around 1500 BC through a SMALL group ofpreachers.
– These preachers settled in north India, in small pockets, but kept their proselytising momentum towards the East.
– Rig Vedic leaders absorbed a number of local language Prakrit influences and composed RV in around 1000 BC. Sanskrit was invented to combine the old Afghan language and the local prakrit.
– The Indus Valley civilisation is TOTALLY distinct to the RV culture, and was a major trading culture, with extensive roots in the middle-East. 
– Indus Valley seals are labels for goods that were exported. They contain three pieces of info: the corporate brand/ logo, the product name and quantity. The seals contain NO evidence about the IV culture.
– It is FUTILE to try to link IV culture either with Dravidian or with RV/Sanskrit. It was a robust PRAKRIT culture, the SAME as what prevails TODAY in these regions. There is total continuity of culture/ artefacts (even names) and we should look at the UNDERLYING folk culture of these places to make deductions about the IV people. They didn't disappear – they continue exactly where they are.
Maybe Sonawani is on to something.
One thing is clear: OIT is RUBBISH. So also AIT (particularly the "invasion" bit).
Buddhism didn't influence the East through invasions. It spread through proselytisation. 
It appears RV preachers found themselves a niche as Brahmins and became politically influential. They were also very clever and absorbed whatever local culture/s they found. Hence they spread their RV religion.  
Apart from his book (which I've linked earlier, separately), you should download and read his article on the IV script, here.

If you found this post useful, then consider subscribing to my blog by email:

डिग्र्या बोगस?

सध्या देशभर अनेक नेत्यांच्या डिग्र्यांबद्दल बरीच वादंगे होत आहेत. काहींच्या डिग्र्या बोगस आहेत तर काहींबाबत संशय आहे. माझे म्हणने जरा वेगळे आहे.
अपवाद वगळता भारतातील बहुसंख्य विद्यापीठांच्या डिग्र्या बोगसच आहेत. त्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे मिळवल्या म्हणून त्या डिग्र्यांचे महत्व काडीएवढेही वाढत नाही. त्या कचराकुंडीच्या फेकायच्या लायकीच्या असतात. नोक-या मिळवायच्या तर या डिग्र्या शिडीसारख्या कामाला येतातही, पण नोकरी मिळवायला स्पर्धा परिक्षा द्याव्याच लागतात. याचाच अर्थ डिग्र्यांमुळे विद्यार्थी सक्षम व ज्ञानवंत-ज्ञानार्थी होतो हे खुद्द सरकारलाच मान्य नाही.
मी पुणे विद्यापीठाचा एम. कोम. चा डिग्री होल्डर आहे. त्या पदवीचा मला जीवनातील उपयोग शुन्य. मला या पदवीने कणभरही व्यवहारज्ञान शिकवले नाही. म्हणजे ती कुचकामीच कि!
पदव्या हव्या असतात कारण समाज अकारण त्याला महत्व देतो. व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या पदवीने ठरवतो.
आम्ही आमची दृष्टी स्वच्छ केली तर कोणि अशा लबाड्या मुळात करणार नाही. आमची शिक्षणपद्धतीच मुळात बोगस आहे...त्याचे काय करायचे हा आमच्यापुढील खरा प्रश्न असला पाहिजे!

Monday, June 22, 2015

पण योग कोठे राहील?

माझ्या या ब्लोगवरील मित्रांनी मला हा लेख करायला प्रवृत्त केले याबद्दल, आप्पा-बाप्पां सहित सर्वांचे आभार. खरे तर मी याबाबत फेसबुकवर अत्यंत त्झोडक्यात लिहिले होते. ते असे

"दिन साजरे करायची पाश्चात्य पद्धत "आम्हीही त्या स्पर्धेत मागे नाही." हे दाखवण्यासाठी सुरु केली जात आहे हे समजावयास हरकत नाही. व्ह्यलेंटाईन डे अर्थात प्रेमदिवसाला विरोध करणारेच योगदिवसाचे जागतिक आयोजक आहेत हे विशेष. प्रेमदिवस साजरा केल्याने संस्कृती डुबते असे समजणा-यांना योगदिवस साजरा केल्याने संस्कृती वाढते असे एकाएकी वाटू लागले असेल त्यांचा योगशास्त्रावर काडीमात्र विश्वास नाही हे सरळ आहे. रामेदावाचार्यांच्या योगाने किती संस्कृती वाढली आणि योगाचे किती वाटोळे झाले हे कपाळभाटी या मुळात अस्तित्वात नसलेल्या अयोग्यशास्त्राने सिद्धच केले आहे. यांच्या प्रवर्तक प्रधानसेवकांना साधे पद्मासन घालता येत नाही हे त्यांनीच झळकावलेल्या अनेक छब्यांमधुन दिसते. याउलट योगशास्त्री अय्यंगारांनी ख-या योगाला प्रवर्तीत केले, पण झटपट योगी होऊ पाहत सारे रोग दूर करु इच्छिणा-यांच्या पचनी तो कठीण योग कसा पचनी पडायचा? त्यांना कशी प्रसिद्धी लाभायची? बरे, योग व्यायामाच्या पायरीपुरता आणि श्वासांवरील नियंत्रणाच्या पातळीपर्यंतच ठेवायचा कि त्यातील आध्यात्म हा जो मुख्य हेतू आहे, चित्त-वृत्ती-निरोधादि, त्यावर लक्ष द्यायचे हे लाखो शाळांतुन शिक्षकांना आणि कार्यालयिन कर्मचा-यांना, पार सैनिकांनाही, वेठीला धरुन हे कसे सांगितले जाणर आहे? हा कोणता अभिनव "वेठयोग" साधला जातोय?

मी व्यक्तिश: योगाला "आत्मयोग" मानतो. ही सामुदायिक बाब नाही. योगदिन साजरा करणे म्हणजे योगाला त्याच्या पातळीपासून घसरवणे. योग ही निरंतरची प्रक्रिया आहे...जशी प्रेम.

प्रेमदिन काय आणि योगदिन काय...प्रेमाची आणि योगाची प्रतिष्ठा घसरवणारे दिवस आहेत!

योग हे बाह्य नव्हे तर आंतरिक प्रक्रिया आहे हे या अयोगशास्त्र्यांना माहित तरी आहे काय?"

यावर जी मोदीभक्तांनी आणि वैदिक असलेल्या व योग आपल्याच पुर्वजांची मालमत्ता आहे हे समजणा-या "भाविक" सनातन्यांनी जी खडाजंगी उडवून दिली त्याची कल्पना तुम्ही करु शकता.

योग हा वैदिक नाही हे तर उघड आहे. ऋग्वेद ते अन्य ब्राह्मणांपरयंतच्या वैदिक साहित्यात योग डोकावतही नाही. ऋग्वेदाच्या काळापुर्वीच किमान १००० वर्ष योग हा सिंधू संस्कृतीत प्रचलितच नव्हता तर शिव योगमुद्रेत ध्यानस्थ बसलेला दाखवला जात होता. योगावर पहिला सखोल ग्रंथ पातंजलींनी लिहिला. पातंजली हा शिवाच्या ओंजळीतून जन्माला आला म्हणून त्याला पातंजली नांव पडले अशी आख्यायिका लोकप्रिय आहे. ते वास्तव नसणार हे उघड आहे. पण आद्य योग शिवाने मानवजातीला दिला ही जनधारणा वैदिकही बदलवू शकले नाहीत हे वास्तव आहे.

योग हा तंत्रशास्त्राचा एक भाग आहे. योगाला, विशेषत: नाथपंथियांनी, प्रेअतिष्ठा मिळवून दिली. पातंजल योगात आसने हा भाग अत्यंत दुय्यम आहे. योग ही संकल्पना अतिव्यापक आहे. गीतेत संन्यासयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, कर्मयोगादि प्रकार सांगितले आहेत ते तर राम्देवबाबा नामक "योगौद्योजक" विदुषकाच्या कानीही नसावे.  योग ही मानसिक आरोग्याची वृद्धी करत मनाला सर्वव्यापी विश्वात्मकतेशी जुळवण्याची प्रक्रिया आहे. योग हा शब्दच मुळात "युज" या धातुपासून बनला असे मानले जाते. युज म्हणजे जुळवणे. थोडक्यात व्यक्ती आणी विश्व यांत तादात्म्य स्थापन करणे हा योगाचा प्रमूख उद्देश्य आहे. ब्रह्मसुत्रे सांगतात कि द्रष्टा आणी दृष्य हे जेंव्हा एकाकार होतात तेंव्हा योग साधला जातो.

योगासने म्हणजे योग नव्हे. ती पहिलीही पायरी नाही कि अंतिमही नाही. ज्यांना आपण योगासने समजतो ती सौम्य व्यायामाची पद्धत आहे. व्यायामाचे म्हणून जेही फायदे होतात ते यांतही होतात. त्यात जगावेगळे काही नाही. पातंजलींनी आसनांना महत्व दिले नाही ते यामुळेच.

योग म्हनून जो सध्या मार्केटिंग केला जात आहे तो योग नाहीच. उत्तम संभोगासाठी जशी अनेक आसने कल्पिली गेली आहेत तशीच आरोग्यासाठीची ही आसने आहेत. यातील अर्थ योग या उदात्त आणि उच्च संकल्पनेशी लावत जर कोणी स्वत:ला योगी समजू लागत असेल तर त्याची कीव करायला हवी. योगासनांपेक्षा इतर अन्य उत्तम सौम्य व्यायामपद्धतीही आहेत.

योगाचा धर्माशी संबंध आहे काय? याचे उत्तर स्पष्टपणे नाही असेच द्यावे लागेल. योग हे तत्वज्ञान आहे, एक आध्यात्मिक जीवनमार्ग आहे...धर्म नाही. आणि तत्वज्ञानाला आपली मिरासदारी मानत २२ इंची छात्या फुगवत चिनी चटयांवर योगासने करत धर्मप्रेम-राष्ट्रप्रेम जागवत बसतात ते तर मुळीच धर्मप्रेमीही नाहीत कि राष्ट्रप्रेमीही.

शिव हीसुद्धा संकल्पना आहे. सृजनाची. निर्मितीची. निर्मितीच्या संकल्पनेतच योगाचा अर्थ सामावला आहे. निर्मिती वैश्विउक आहे. निर्माता आणी निर्मितीतील अद्भूत ऐक्य योगाद्वारे साधण्याचे प्रयत्न् होतात.

अर्थात तेही प्रयत्नच राहतात. हजारो वर्ष जगलेल्या योग्यांच्या धादांत खोट्या कथा चवीने चघळल्या जातात. भारतीय माणसाला स्वनिर्मित लबाड्यांत जगायला आवडते. येथेही तेच होते...एवढेच खरे.

उथळ-योग तसाही विकला जातच होता. आता फार तर या योगाला स्वच्छता अभियानाप्रमाणे काही दिवस "अच्छे" येतील. योगगुरू म्हणुन मिरवणारे अधिक झळकतील.

पण योग कोठे राहील?



भाषांचा उदय कधी झाला?

भाषांचा उदय कधी झाला हा प्रश्न जेवढ्या महत्वाचा आहे तेवढाच कशासाठी झाला हाही प्रश्न अनेकदा चर्चिला गेला आहे व तो वर्तमानातही मानसशास्त्र ते मानववंशशास्त्राच्या अंगाने चर्चेत असतो. भाषा हा मानवसमाजाच्या अस्तित्वाचा, सांस्कृतिक जीवनाचा, सातत्याने विकसित होत असणारा मोलाचा गाभा आहे हे नाकारता येणार नाही. किंबहुना भाषेच्या अस्तित्वाखेरीज मनुष्य हा पुरा-आदिम अवस्थेतच राहिला असता व कसलीही भौतीक प्रगती त्याला साध्य करता आली नसती, असेही म्हणता येऊ शकते. भाषेचा उदय कसा झाला असावा व त्याच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य,  ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. असे असले तरी मानवी जिज्ञासा अपार असते. जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक)  भाषा आहेत. काही भाषा मृत झाल्या असुन काही मृत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही. पण ही गरज का आहे आणि भाषा कशी निर्माण होते हा मानवी कुतुहलाचा पुरातन विषय आहे. माणसाला अन्य प्राणीजमातीपासून वेगळा करणारा एकच घटक म्हणजे माणसाला अवगत असलेली संभाषणाची (भाषेची) कला. किंबहुना ज्याला बोलता येते तोच माणूस असेही म्हटले जाते.

    भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. पृथ्वीतलावर पहिले संभाषण अडम व इव्हने केले व नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर टोवर ओफ बाबेल येथे नौकेतुन उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही. त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले व त्यानंतरच माणसाने पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मुळच्याच भाषेला जगभर विविध रुपात नेले असा हा बायबलचा दावा. हे येथे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे याच "एकस्थाननिर्मिती"च्या बायबली मिथ्थकथेचा पगडा आजही पाश्चात्य भाषाशास्त्र ते भौतिकी शास्त्रावर आहे हे आपल्याला पुढे पहायचेच आहे.

    भाषेच्या निर्मितीबाबत जगातील सर्वच खंड आणि भाषात काही ना काही मिथकथा आहेतच, त्यावरुन माणसाला स्वत:लाच आपल्यातील भाषाकौशल्याबद्दल अनावर कुतुहल व ती दैवी देणगीच असल्याचा ठाम विश्वास दिसून येतो. पण यातुन माणसालाच भाषेचे वरदान का आणि अन्य प्राण्यांना का नाही याचे उत्तर मिळत नाही. आधुनिक काळातही भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यांचा धावता आढावा येथे घेणे अनुचित ठरणार नाही.
    भाषेचा उगम व विकास हा क्रमशा: होत जात असून भाषेचा उदय एकाएकी झाला असे मानता येत नाही असे क्रमविकासवादी (Continuity theories)चे समर्थक मानत होते. भाषा आज आपण जशा पहातो-वापरतो त्या एवढ्या गुंतागुंतीच्या (Complex) असल्या तरीही त्याहीपेक्षा वाढलेल्या नवीन मानसिक गुंतागुंतीच्या अभिव्यक्तीला अनेकदा त्या पुरेसा न्याय न देना-या आहेत कि त्यांचा उगम एकाएकी झालेला असू शकत नाही असे त्यांचे एकुणातील मत आहे.
    स्टिव्हन पिंकर हा या मताचा खंदा पुरस्कर्ता होता. (२) त्याच्या मते जसा मानवी प्राण्याचा क्रमविकास झाला तशीच भाषाही क्रमश: विकसीत होत गेली. या सिद्धांताशी सहमत पण विभिन्न मते असणा-यांपैकी एका गटाचे मत होते कि भाषेचा उगम हा इतरांशी संवाद साधण्याच्या गरजेतुन निर्माण झाला नसुन आदिम स्व-अभिव्यक्तीच्या गरजेतुन निर्माण होत विकसीत होत गेली. असे असले तरी अभिव्यक्तीची अथवा संवादाची निकड मानवातच का याचे समाधानकराक उत्तर या सिद्धांतांनी मिळत नाही असे आक्षेपकांचे म्हणणे आहे.
    अगदी या क्रमविकाससिद्धांतालाही छेद देणारा पुढचा सिद्धात आला तो म्हणजे "क्रमखंडवादी" (Discontinuity Theory) सिद्धांत. या सिद्धांतवाद्यांच्या मते अन्य कोनत्याही प्राण्यात न आढळणा-या एकमेवद्वितीय अशा भाषानिर्मितीचे गुण मानवातच आढळत असल्याने ती बहुदा एकाएकी मानवी उत्क्रांतीच्या क्रमात कोणत्यातरी टप्प्यावर अचानकपणे अवतरली असावी असे या सिद्धांत्यांचे मत आहे.
    नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक होता. परंतु त्याचा सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी असे त्याचे मुख्य मत होते. (३) या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवे शरीरातील, विशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे.
    अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. हे मत फारसे मान्य केले गेले नाही याचे कारण म्हणजे अंतत: वेगळे काही असे या सिद्धांतामुळे सिद्ध होत नाही.
    मी भाषेचा क्रमविकास हा कालौघात होत जातो या मताशी सहमत आहे. पण क्रमविकास मान्य केल्याने मुळात भाषाच का निर्माण होते याचे उत्तर मिळत नाही. याच सिद्धांत्यांचे म्हनने आहे कि एकतर संवाद साधण्यासाठी तरी भाषेची निर्मिती होते अथवा अभिव्यक्त होण्यासाठी. या सिद्धांत्यांनी अर्थातच चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य केला आहे हे स्पष्टच आहे. एपपासुन पुरातन होमो, नियेंडरथल आणि मग आताच्या मानवाचे पुर्वज होमोसेपियन्स अशी या क्रमविकासाची रचना आहे. हा जैविक क्रमविकास आणि भाषेचा क्रमविकास यात फरक करावा लागेल. शिवाय डार्विनचा सिद्धांत सर्व कसोट्यांवर टिकत नाही हे उत्क्रांतीवादी मान्य करतात. त्या वादात येथे न जाता आपण भाषेच्या उगमावर लक्ष केंद्रित करुयात.
    भाषेच्या एकुणातील विकासात मानवाच्या ज्या प्रजाती जन्माला आल्या, म्हणजे पुरामानव ते होमोसेपियन्स, यात सर्व प्रजातींची भाषा एकदिश उत्क्रांत झाली असे मान्य करता येत नाही. प्रत्येक प्रजातीची काही ना काही, अगदी प्राथमिक का होईना भाषा असणे असंभाव्य नसले तरी एका प्रजातीचा मानव नष्ट होत दुसरी प्रजाती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे एका प्रजातीच्या अंताबरोबरच तीही भाषा नष्ट झाली असणे स्वाभाविक आहे.
    असे असले तरी एका मुद्द्यावर प्रचंड विवाद आहे व तो म्हणजे निएंडरथल अणि होमोसेपियन्समद्ध्ये संकर होत आजचा मानव बनला कि निएंड्रथल मानव स्पर्धेत टिकाव न धरु शकल्याने नष्ट झाला?. पहिला सिद्धांत ग्राह्य मानल्यास होमो सेपियनने आपल्या पुर्वजांच्या भाषेतील गुणसुत्रे घेतली असतील असे मानावे लागेल. तसे असेल तर भाषेचा क्रमविकासही संकरातुन झाला असे मानावे लागेल. अर्थात यातील नेमके काय खरे हा वाद अद्याप सुरु आहे.
    दुसरे असे कि पृथ्वीतलावर पसरलेल्या मानवांची भाषा असली तरी त्यांत तंतोतंत म्हणता येईल असे साम्य नाही. एका अर्थाने प्रत्येक भाषा प्रादेशिक आहे. म्हणजे भाषेचा क्रमविकासही प्रादेशिक आहे असे म्हणता येईल. प्रादेशिक भुवैशिष्ट्यांमुळे मानवी संस्कृती व भाषा यावर नेमके कसे परिणाम होतात हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण प्रादेशिक क्रमविकासात पुराऐतिहासिक कालात एखाद्या प्रदेशातील मानवी वस्त्या प्राकृतिक उत्पात, संसर्गजन्य रोगराया तसेच विनाशक लढायांमुळेही नष्ट झाल्या असण्याचे संकेत मिळतात. असे असेल तर अशा नष्ट होणा-या समुदायांच्या भाषेच भवितव्य काय, हाही प्रश्न निर्माण होतो. माणसाबरोबर भाषाही नष्ट होते असे नसून सांस्कृतिक अथवा जीवनशैलीतील बदलामुळेही जुन्या संस्कृतीतील अनेक शब्द बाद तरी होतात अथवा त्यांनाच नवा अर्थ दिला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर जशी बैलगाडी शेतक-याच्या जीवनातून हद्दपार होऊ लागली आहे तसे बैलगाडीशी निगडित शंभरेक शब्द वापरातून बाद होत आहेत. माणसाने संस्कृति विकासाचा टप्पा तेंव्हाच गाठला जेंव्हा त्याने जुन्या संस्कृतीच्या अवशेषांवरच नव्या संस्कृत्यांची इमारत बांधली. त्यामुळे भाषेचा विकास एकदिश, सातत्यपुर्ण राहिला असावा कि खंडश: त्यात विकसन होत गेले असावे याबाबत आपण कसल्याही पुराव्याअभावी सांगू शकणार नाही.

    आधुनिक विज्ञान

    मानवी मेंदुतील "ब्रोका" हे केंद्र भाषेचे उत्पत्तीस्थान आहे असे आधुनिक विज्ञान मानते. या केंद्राला अपघाताने मार लागला तर माणसाच्या भाषिक क्षमतेत गडबड होते हे १८६१ साली लक्षात आल्याने या केंद्राला हा शोध लावणा-या पाल ब्रोकाचे नांव दिले गेले. पण लवकरच (१८७६ साली) कार्ल वेर्निक च्या लक्षात आले कि अजून एक मेंदुतील केंद्रक आहे तेथे आघात झाला तर भाषा समजण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता बिघडते. मेंदुच्या या विभागाला वेर्निक्स एरिया असे नांव दिले गेले. पुढे असे लक्षात आले कि भाषेच्या संदर्भात मेंदुतील अनेक विभाग परस्परावलंबी असुन प्रत्यक्ष बोलण्याची क्रिया व्हायला मेंदुचे अनेक भाग कार्यरत असतात. हे असे असले तरी भाषेची उत्पत्ती (अथवा ती शिकण्याची प्रक्रिया) नेमकी का व कशी होते हे अद्याप उलगडलेले नाही.
    नेओम चोम्स्की यांचे असे मत आहे कि मनुषाकडे जन्मत:च एक वैश्विक व्याकरण असते व यामुळेच मुल अल्पवयातच भाषेचे गुंतागुंतीचे स्वरुप समजुन घेत बोलु लागते. त्याच्या या सिद्धांताला बळ देणारा पुरावा निकाराग्वातील मांग्वा येथील बधीरांसाठी असलेल्या शाळेतुन मिळाला. येथे १९७९ साली जवळपास पाचशे मुकबधीर विद्यार्थी दाखल होते. त्यांना कोणतीही प्रस्थापित खाणा-खुनांची भाषा शिकवली गेली नव्हती. पण काही वर्षांतच या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे खाना-खुनांची भाषा विकसीत केल्याचे आढळून आले. शाळेत दाखल होणारे नवे लहान विद्यार्थी त्या चिन्हभाषेला सुधरवत नेत आहेत असेही निरिक्षण नोंदवले गेले. डिसेंबर १९९५ च्या सायंटिफ़िक अमेरिकनच्या अंकात ही माहिती प्रसिद्ध झाली. पण यामुळेही माणसाला संवादासाठी कोणत्या ना कोणत्या भाषेची गरज भासते, तो ती उपजत कौशल्याने विकसीतही करतो हे समजले तरी ही उपजतता कोठून येते याचे उत्तर मिळत नाही. भाषेचा उगम हे रहस्यच बनुन राहते ते यामुळेच.
    अलीकडेच टेकुमेश फिच यांनी "मातृभाषा" सिद्धांत डार्विनच्या नाते-निवड सिद्धांताचा आधार घेत मांडला होता. या सिद्धांतानुसार आई आणि मुल यांच्यातील संवादाच्या निकडीतुन भाषेचा उदय जाला असावा.  हीच पद्धत निकटच्या नातेवाईकांसाठीही वापरली गेल्याने भाषेच विस्तारही झाला असावा असे हा सिद्धांत सुचवतो. अर्थात या सिद्धांतावरही आक्शेप घेतले गेले. कारण अपत्याशी संवाद अन्य प्राणीजगतही साधायचा प्रयत्न करतेच, पण त्यातून भाषेचा उगम झालेला नाही.
    आपण भाषेची काही लक्षणे सहजपणे पाहु शकतो. माणसाच्या स्वरयंत्रात गुंतागुंतीचे ध्वनी निर्माण करण्याची क्षमता आहे जी अन्य प्राण्यांत नाही. ध्वनी काढतांना तो ज्यात उपजत नाद असेल असेच शब्द निर्माण करतो. तो त्या शब्दांना/ध्वनीक्रमाला अर्थप्रदान करतो. अर्थात तो (आपापल्या समुहात तरी) सातत्य ठेवतो. शब्दांना व्यापक अर्थ प्रदान करण्यासाठी व्याकरणबद्ध वाक्यात त्यांची रचना करतो. समुहातील ऐकणा-याला काय उच्चारले गेले आहे हे समजते. दुसरे महत्वाचे म्हणजे भाषा ही विकासशील राहते.

    विचार आणि भाषा

    विचार आणि भाषा यांचे निकटचे नाते आहे. मनुष्य विचार करतो हाही गुणधर्म माणसाला अन्य प्राणीसृष्टीपासून विलग करतो. भाषा हे विचारांचे वहन करण्याचे माध्यम आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पण येथे प्रश्न निर्माण होईल कि विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत. पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषेचा जन्म नैसर्गिक उपजत जाणीवांतून होत असला तरी भाषा ही कृत्रीम अवस्था आहे हे अअपल्या सहज लक्षात येईल. ती कृत्रीम असल्यानेच भाषांत वैविध्य दिसून येते. ती कृत्रीम असल्याने सर्वच विचार/भावना/मनोवस्थांना भाषा शब्द देण्यात कमी पडते. त्यामुळेच भाषांत नवीन शब्दांची भर सातत्याने पडत आली असल्याचे आपल्याला दिसेल. त्यामुळे भाषेची निकड ही उपजत जाणीवांतून होत असली तरी भाषा मात्र कृत्रीम निर्मित्या होत हे आपल्या सहज लक्षात येईल.
    मनुष्य विचार करतो हे जेवढे खरे आहे तेवढेच खरे हेही आहे कि माणसाच्या विचारक्षमतेतही उत्क्रांती होत राहिलेली आहे. ही उत्क्रांती कधी एकरेषीय तर कधी बहुरेषीय झाल्याचे आपल्याला आढळेल. माणसाला स्वरयंत्र असल्याने गुंतागुंतीचे आवाज तो काढू शकतो. निसर्गातील अन्य आवाजांची प्रयत्नपुर्वक नक्कल करु शकतो. शब्द माणसाने निसर्गातुन नक्कलेच्या द्वारे घेतले कि त्याच्या स्व-अभिव्यक्तीच्या तसेच संवादाच्या निकडीतुन स्वनिर्मित बनले हे आपण आज निश्चयाने सांगू शकणार नाही. असे असले तरी विचार आणि भाषा यात निकटचे नाते आहे हे आपल्या लक्षात येईल.
    निसर्गातील प्राणी-पक्षांच्या आवाजांची नक्कल करत त्याने त्या त्या प्राण्यांची ओळख तसेच स्वर काढण्याच्या प्रयत्नांतून इतरांनाही पटवली असली तरी केवळ नक्कलेत भाषेचा उदय शोधणे धाडसी आहे. स्वत:ची अभिव्यक्ती, संवादाची गरज यातून त्याने स्वतंत्रपणेही अनेक शब्दांना जन्म दिला असणे स्वाभाविक आहे. शब्दांना आधी जन्म मिळला कि अर्थासोबतच शब्द निर्माण झाले या प्रश्नाचे उत्तर जटिल आहे. अमुक  एक शब्दाला अमुक अर्थ आहे वा द्यावा हे इतरांना कसे सांगितले गेले असेल हाही विवाद्य प्रश्न आहे. हातवारे करत आणि शब्द सतत उच्चारत  अमुकला अमुक म्हणायचे अशी सवय लावत एकेका टोळीने व संपर्कात आलेल्या अनेक टोळ्यांनी ठरवले असू शकते.
    भाषेचे केंद्र मेंदुतच असते असे ब्रोका केंद्रकावरुन दिसते. तसे असले तर भाषा स्वयंभू आहेत असे म्हणावे लागेल. पण मानवी प्रवासात तसे असल्याचे दिसत नाही. भाषा स्वयंभु नसून माणसाने ती प्रयत्नपुर्वकच विकसीत केली असे म्हणावे लागेल. क्रमविकास आणि क्रमखंडविकास सिद्धांत परस्परावलंबी असून कधी भाषेचा क्रमविकास सलग तर कधी खंडितपणे झाला असणे स्वाभाविक मानावे लागेल.
    माणसामद्धे भाषेची/बोलण्याची क्षमता एक लक्ष वर्ष जुनी आहे असे चोम्स्की म्हणतो. अलीकडेच अगदी निएंडरथल मानवातही गुंतागुंतीचे ध्वनी निर्माण करता येण्याची क्षमता होती हे पुरातन सांगाड्यांच्या/जीवाष्मांच्या परिक्षणाअंती सिद्ध करण्यात आले आहे.  अर्थात आधुनिक मानवाचा पुर्वज होमो सेपियनने पुर्वीच्या मानवसदृष्य प्रजातींची जागा घेतली. या मानवाचे स्वरयंत्र आजच्या एवढेच विकसीत होते काय हे मात्र तपासुन पहायला कोठलाही पुरावा उपलब्ध नाही. वेगवेगळ्या ध्वनींची निकड पण ते ध्वनी काढण्याची क्षमता नसतांना स्वरयंत्रातच झालेली उत्क्रांती ही एक संभाव्य संकल्पना आहे. तिलाही तसा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.
    असे असले तरी आपण भाषेच्या उद्गम व विकासाबाबत खालील बाबी मान्य करु शकतो. वेगवेगळ्या भागांत व वेगवेगळ्या मानवी समुहांत आधी स्वतंत्रपणे तर नंतर सामुहिकपणे भाषांचा विकास आदान-प्रदानाच्या माध्यमातुनच होत गेला गेही अनेक पुराव्यांनिशी आपण पुढे पाहणारच आहोत.

    जीवनव्यवहारांची गुंतागुंत आणि भाषा

    आदिमकाळी, म्हणजे जवळपास अडीच लाख वर्षांपुर्वी, होमो सेपियन हा आजच्या मानवाचा पुर्वज पृथ्वीतलावर विकसीत झाला. त्याचे अस्तित्व त्याने बनवलेल्या अश्म-हत्यारांमुळे आणि त्याच्या जीवाष्मांतुन मिळते. अर्थात या काळाबाबतही अत्यंत विवाद आहेत. आउट ओफ आफ्रिका सिद्धांत सध्या लोकप्रिय असला तरी तो सर्वमान्य नाही. मीही या "एकस्थाननिर्मिती" सिद्धांताशी सहमत नाही.  असे असले तरी जेनेटिक दृष्ट्या सर्वच मानवप्रजाती ही एकजिनसी आहे याबाबत मात्र जवळपास एकमत आहे. असे होण्यासाठी एकस्थाननिर्मिती व त्यांचे विस्थापन आवश्यक नाही. असो.
    विचार, जीवनव्यवहार आणी भाषा यांचा नेमका काय परस्परसंबंध आहे हे आपण येथे थोडक्यात पाहू.
    आदिम काळी माणसाचे जीवन हे अन्य प्राणीप्रजातींशी, निसर्गाशी आणि अन्य मानवी टोळ्यांशी स्पर्धा व संघर्ष करण्याने गजबजलेले असणार हे उघड आहे. माणसाला निसर्गाने अन्य प्राण्यंना दिलीत तशी नैसर्गिक साधने दिलेली नाहीत. पण त्यावरही मात करता येईल अशे विचारशक्ती माणसाला मिळालेली आहे.
    माणसाने आदिम काळीच दगडी, हाडांची (नि लाकडीही) हत्यारे बनवायला सुरुवात केली ती संरक्षणासाठी तसेच मांस खरवडून काढण्यासाठी.  ही हत्यारे बनवायला हवीत हे त्याला समजणे, इतरांना सांगणे, त्यांना कार्यप्रवण करणे आणि त्यांचा वापर अधिक कुशलतेने कसा करायचा हे ठरवणे यासाठी त्याने काही ध्वनी, खानाखुना याचा उपयोग केला असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी नैसर्गिक ध्वनींचीही नक्कल केली असणार. त्याचबरोबर टोळीमधील अंतर्गत व्यवहार, स्त्रीयांचे आगळेपण, अपत्यजन्म, त्याचे रडणे आणि त्याची निरर्थक वाटणारे पण सामान्य आवाज व त्याही आवाजाची नक्कल हेही अपरिहार्य आहे. आद्य पा, बा, मा, मम इत्यादि ध्वनींनाच नंतर विकास करत त्या त्या ध्वनींना मातृ-पितृ व अन्य नातेनिदर्शक व्यापक अर्थ दिला जाणे स्वाभाविक आहे. याला आपण मानसशास्त्रात वापरली जाणारी Babble थियरी म्हणू शकतो.
    येथे हे लक्षात घ्यायला हवे कि अनेक ध्वनी मानवी जीवनात अत्यंत प्राथमिक आहेत तसेच ते वैश्विकही आहेत. प्राथमिक शब्द हे निकडीच्या गरजेतुन बनत जात त्यांची संख्या वाढायला शेकडो पिढ्या गेल्या असणे स्वाभाविक आहे. विविध ध्वनींना जोडून शब्द बनतो. पण हे ज्ञान होत असे अनेक पण सुसंगत ध्वनी जोडत आद्य शब्द बनले असले पाहिजेत.
    थोडक्यात समतालीय ध्वनी हे आद्य शब्दांचे निर्माते ठरले असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना जगातील आद्य वाद्मय, ते धार्मिक असले तरी, काव्यात आहे हे विशेष आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आद्य टोळी धर्मात यात्वात्मक क्रिया करण्यासाठी काही ध्वनी मुद्दाम निर्माण गुढतेचा आभास देण्यासाठीचा वापर झाला असणार. ध्वनी व ध्वनींचा शृंखलाबद्ध ताल्बद्ध आवाजात काहीतरी शक्ती असली पाहिजे असे त्या आदिम काळात माणसाला वाटले असणे नवलाचे नाही.
    म्हणजे आदिशब्द हे जीवनव्यवहार, जीवनाला व्यापून उरलेले भय व त्या भयावर मात करण्यासठीच्या उत्कटतेतुन निर्माण झालेली निकडही भाषेच्या आद्य संज्ञाप्रवाहाला उत्तेजन देणारी ठरली असेल. आजही अनेक मंत्र निरर्थक असले तरी तांत्रिक साधनांत वापरले जातात ते त्यांच्या विशिष्ट ध्वनींमुळे. किंवा विशिष्ट ध्वनींच्या क्रमातुन अर्थपुर्ण शब्दही असेच निर्माण होत गेले आहेत हे आपण पुरातन धार्मिक वाड्मय पाहिले तरी लक्षात येईल. त्यामुळे कधी ध्वनीशृंखलेतुन शब्द आधी व अर्थ नंतर तर कधी मनात अर्थ आधी व त्याला व्यक्त करण्यासाठी शब्द नंतर ही निरंतर प्रक्रिया भाषानिर्मितीस सहाय्यक झालेली दिसते.
    जगभरचे मानव हे एकविध रसायनातुन बनले असल्याने माणसाच्या मुलभूत विचारप्रक्रियेत एक साम्य आपल्याला आढळून येईल. त्यामुळे शब्दांतील अर्थवाहीपणा संक्रमित करणे हे तितकेसे अवघड गेले असेल असे वाटत नाही.
    म्हणजेच भाषा ही एका अर्थाने सार्वजनिक विकसन झालेली मानवी निर्मिती आहे असे आपण म्हणू शकतो. पण ही निर्मिती होत असतांना टोळीअंतर्गत जशी विकसने होत गेली तशीच ती भिन्न टोळ्यांमद्ध्येही नक्कल, उसणवा-या, देवघेव यातुनही (जशी आजही होते) तशीच पुरातन काळीही झाली असणे स्वाभाविक आहे.
    पुरातन मानव हा अन्न व शिकारीच्या शोधात भटकत असे. हे भटकणे रातंदिन नसून जोवर उपलब्ध परिसरात पुरेसे अन्न मिळते तोवर मुक्काम त्याच परिसरात असे. पुरेसे अन्न जमा झाले कि रिकामा वेळही भरपुर असे. थोडक्यत जीवनात फारशी गुंतागुंत नव्हती, पण नैसर्गिक प्रकोप, अचानक होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले यामुळे भयग्रस्तही होते. याच काळात कधीतरी माणसाने, अदृष्य असलेल्या, सुष्ट शक्ती आणि दुष्ट शक्ती अशी विभागणी केली. त्या शक्तींना नांवे देता येईल एवढी भाषेने प्राथमिक अवस्था गाठलेली होती. आद्य, धुसर का होईना पण मिथ्थकथा या काळात विकसीत झाल्या असतील. नृत्य-गायनाचे ओबडधोबड प्रयोगही होत असतील. इसपु ५०-४०,००० मद्ध्ये युरोपात तसेच अन्यत्रही एकाएकी झालेले सांस्कृतिक परिवर्तन दिसते. या काळात दफने अत्यंत शिस्तबद्ध होऊ लागली. अलंकारांची, मृद्भांड्यांची निर्मितीही होऊ लागली. म्हणजेच सौंदर्याच्या आदिम कल्पना व मृत्युनंतरचे जीवनविषयक आदिम् विचार प्रकट होऊ लागले असे म्हणता येईल. अल्तामिरा ते भीमबेटकातील गुहाचित्रेही जवळपास याच काळात चितारायला सुरुवात झाली. या काळातील भाषा माणसाला शिस्तबद्ध अभिव्यक्त करता येण्याइतपत ब-यापैकी प्रगत झाली होती असे म्हणता येते. शिवाय चित्रांतुनच पुढे लिप्यांचा विकास झाला असेही आपण लिप्यांच्या इतिहासावरुन पाहू शकतो. या काळात तत्कालीन मनुष्य जवळपास आधुनिक मानवाप्रमाणे वर्तन तर करत होताच, पण भाषा, नृत्य, संगीतादि कलांचाही तो उत्कर्ष घडवीत होता असे साधारणपणे मानले जाते. गुहाचित्रे ही त्याचा पुरावा आहेत.
    अर्थात भाषेचा विकास प्रत्येक टोळीत सर्वस्वी स्वतंत्रपणे झाला असे मात्र दिसत नाही. आदिमानवाचा अन्य टोळ्यांशी येणा-या संपर्कांतुन नव्या शब्दांची अथवा पर्यायी शब्दांची देवाण-घेवाण, त्यातुन पुन्हा नवीन शोध यातुन आद्य भाषा विकसीत होत राहिली. देवाण-घेवाण फक्त भाषांची नव्हे तर धर्मकल्पना, मिथके तसेच जीवनोपयोगी शोध यांचीही होत होती. त्या शोधांत पुढे स्वतंत्रपणे भरही घातली जात होती. त्या शोधांना ज्या टोळीने शोध लावला त्यानेच नांव दिले असणार हे उघड आहे. त्याच नांवाला अपब्रष्ट वा संस्कारित करुन ते नांव पसरत गेले असे आपल्याला दिसते.
    मानवाला लागलेला सर्वात आदिम व त्याची जीवनपद्धती बदलवणारा शोध म्हणून अग्नीकडे पाहिले जाते. अग्नी हा आताचा संस्कारित शब्द आहे. आद्यकाळी उच्चारसुलभ असे जोडाक्षरविरहित आणि किमान व्याकरण असणारी भाषा असणार हे उघड आहे. आजही अस्तित्वात असलेल्या आदिवासे भाषांत हे वैशिष्ट्य शेष आहे. जीवनाची गुंतागुंत जेवढी अधिक होत जाते तसतशी भाषा गुंतागुंतीची व अर्थस्पष्टतेसाठी व्याकरणनिबद्ध होऊ लागते. भाषांचा विकास आणि मानवी व्यवहारांतील व्यामिश्रता याचा निकटचा संबंध आहे तो यामुळेच. ही व्याकरणनिबद्धता व शब्दांचे विकसित स्वरुप गेल्या काही हजार वर्षांतील आहे. विशेषत: शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी जीवनात जे आमुलाग्र बदल झाले त्याने भाषांवर प्रचंड प्रभाव टाकला असे म्हणता येते.
    असे असले तरी अनेक आदिम शब्द कालौघात रुपांतरे होत का होईना पण टिकून राहिले असे म्हणता येते. आपण अग्नीचा विचार करत होतो. अग्नीचा शोध पुरातन आहे. त्याला आदिमानवाने अग्नीसदृष्ग्यच नांव दिले जे आजही टिकून आहे.
    उदा.  a-ak-ni-iš (आक्निस) भाषा - मितान्नी , प्रदेश - उत्तर सिरिया आणि दक्षीण-पुर्व अनातोलिया,
             ignis (इग्निस) - भाषा ल्यटिन, प्रदेश - इटली
      Ogon (ऒगोन) भाषा- स्लाविक , प्रदेश- पुर्व युरोप
         ugnus (ऊग्नुस) लिथुआनियन, प्रदेश लिथुआनिया
Ugnis (उग्निस)

    वरील सारे शब्द प्राक्रुत अग्गी व संस्कृत अग्नीशी साधर्म्य दर्शवतात. मध्य आशिया व त्याला निकटच्या सीमा प्रदेशात अग्नीशी साम्यदर्शक शब्द पसरलेले आहेत असे आपल्या लक्षात येईल. हीच बाब पितृ, मातृ, भ्राता, देव, असूर इत्यादि शब्दांची. या शब्दांना समांतर शब्द याच प्रदेशात हे शब्द आदिम काळातच जन्माला आले असावेत. अर्थात त्यांची मुळ रुपे अजून थोडी वेगळी असतील. उच्चारही वेगवेगळे होत असतील. या शब्दांची निर्मिती सर्वप्रथम अमुकच प्रदेशात व तमुकच टोळीत झाली असे मात्र आपण म्हणू शकत नाही. भाषाविदांनी अशा साम्यांच्या आधारावर भाषागट कल्पिले आहेत. त्यावर आपण जरी नंतर चर्चा करणार असलो तरी येथे एक बाब लक्षात घ्यायला हवी व ती ही कि भुगोल आणि भाषागट यांत निकटचे साम्य आहे. असे असले तरी अनेक भाषाविदांना "भाषागट" ही संकल्पनाच मान्य नाही. अनेक पुराशब्द वेगवेगळ्या भाषागटांतही समान आलेले दिसतात. एवढेच नव्हे तर अनेक समान शब्दांचा अर्थ मात्र अत्यंत वेगळा अथवा विरुद्धार्थी असल्याचेही आपल्याला दिसते. असे का होते हेही आपण पुढे समजावून घेणारच आहोत.
    आधीचे शब्द उच्चारसुलभ, शक्यतो जोडाक्षरविरहित अणि किमान व्याकरणाने जोडत वाक्यात सामील होत होते. प्राकृत भाषांत आणि जगभरच्या अनेक आदिवासी भाषांत हे प्रकर्षाने दिसुन येते. टोळीजीवनातील निमभटका मानव जसा स्थिर झाला, तसा त्याच्या भाषेची निकड बदलेल्या व व्यामिश्र होऊ लागलेल्या जीवनव्यवहारांमुळे वाढत गेली. त्यातुनच त्याने शब्द वाढवत नेले. आहे त्या शब्दांचे विविधांगी वापर सुरु केले अथवा त्यांच्यात काही वर्णांची भर घालत नवे शब्द तयार केले. शेतीशी निगडित शब्द याच काळात वाढू लागले. राज्यव्यवस्था, मग ती गणसंस्था असो कि राजसंस्था, त्याशी, व्यापाराशी, सैन्य आणि युद्धे याशी, नगररचना आणि त्याशी निगडित सामग्रशी संबंधित व तसेच गुंतागुंतीच्या होऊ लागलेल्या धर्म व तत्वप्रणालीशी संबंधीत शब्द व त्यांन अधिक अर्थवाही करण्यासाठी व्याकरण या गरजा भासणे स्वाभाविक होते. हे सारे माणसाने सर्वस्वी स्वतंत्रपणे केले असे नाही तर देवाण-घेवाणसुद्धा केली. यातुनच भाषांचा विकास होत गेला.
    थोडक्यात भाषांचा उगम माणसाच्या नैसर्गिक अभिव्यक्तीच्या गरजेतुन व त्याला असलेल्या स्वरयंत्राच्या उपलब्धतेतुन झाला. तो बोलु लागला. त्याचे बोलणे परिणत भाषेत हजारो वर्षांच्या प्रवाहातून झाले.
    भाषेचा उगम हा एकाकी (आयसोलेटेड) नसून सामुहिक आहे. मनुष्य विचार करतो, बाह्य घटनंना प्रतिसाद देतो आणि व्यक्तही होतो. भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे माणसाच्या अत्यंत आरंभकाळीच लक्षत आले व अनावर कुतुहलातून त्याने त्या क्षमतेला विस्तारित करत नेले म्हणून भाषा निर्माण झाली असे आपण म्हणू शकतो. नुसत्या नक्कलेच्या प्रवृत्तीतुन विविध ध्वनी निर्माण करण्याची क्षमता वाढली असली तरी त्यातून भाषेचा उदय झालेला नाही, तर नक्कलेची प्रवृत्ती त्याला सहाय्यकारी घटक ठरला एवढेच आपण म्हणू शकतो. माणसाची विचार करण्याची क्षमता भाषेच्या उगमाला मुख्य कारण ठरली व सामुदायिकपणे त्याने भाषा विकसित केली असे आपल्याला म्हणता येईल.
    असे असले तरी गेल्या तीन-चारशे वर्षांपासून एका भाषेने अन्य भाषांवर प्रभाव टाकत मुळ भाषा नष्ट केल्या असे दावे केले जात आहेत. यात इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांताचे युरोपियन जन्मदाते जबाबदार आहेत. या सिद्धांताने भाषिक कमी, सांस्कृतिक प्रश्न अधिक उपस्थित केले आहेत. एका विशिष्ट स्थानावर पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारा मानवी समूह टोळ्याटोळ्यांनी भारत ते युरोप असा पसरला आणि त्यामुळे या भाषेचा प्रचार-प्रसार झाला असे या सिद्धांताचे थोडक्यात म्हणने आहे. या सिद्धांतात तथ्य आहे काय हेही आपल्याला तपासून पहायला हवे.

Monday, June 8, 2015

"समरसता" श्री. पतंगे...एक समीक्षा (भाग २)

"सम" शब्दाबाबत विवाद नाही. त्यामुळे समतेच्या सिद्धांताशीही विवाद असण्याचे कारण नाही. समता आणि समरसता या वेगळ्या संकल्पना आहेत. स्वातंत्र्य आणि बंधुतेशिवाय समतेचे तत्व अस्तित्वात येत नाही कारण समतेला पृथक असे अस्तित्व सामाजिक परिप्रेक्षात नाही. समान अधिकार, हक्क, जबाबदा-या या समतेत जशा येतात तसेच जे विकलांग आहेत, शोषित आहेत त्यांना आधार देत सम पातळीवर आणनेही समतेच्या सिद्धांतात निहित आहे. नुसते "सम" समजणे, मानने त्यासाठी पुरेसे नाही तर समानतेला आणण्याचे अविरत प्रयत्न समतेच्या सिद्धांतात अभिप्रेत आहे. "ज्याला सारे आत्ममय झाले तो साम्यबुद्धीने सर्वांशी वागतो." हे बृहदारण्यकोपनिषदातील वचन श्री. पतंगे समरसतेच्या तत्वज्ञानाला बळ देण्यासाठी घेतात. समरसता हा अध्यात्मतील भाव असू शकतो. सर्वांकडे सम दटुष्टीने पाहणे आणि सर्वांना समान करण्यासाठी आणि समान मानण्यासाठी यत्न करणे यात फरक आहे. समरसता ही संकल्पना हिंदुंचे संगठन करण्यासाठी उपयुक्त नाही त्यी यामुळेच.

परंतू स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व पाश्चात्य विचारांत न घेता ही तिन्ही तत्वे आपल्या परंपरेतच आहेत असे श्री. पतंगे विवेकानंदांचा हवाला देत सांगतात. "आपल्या पुर्वजांनी धार्मिक विचारांवरील बंधने काढून टाकली होती. त्याबाबतीत पुर्ण स्वातंत्र्य दिले होते. पण  सामाजिक जीवन मात्र त्यांनी नाना प्रकारच्या कठोर नियमांनी करकचून बांधून् टाकले." असे विवेकानंद म्हणतात. (पृष्ठ १०२) हे विधान अर्धसत्य आहे. "आपले पुर्वज" म्हणजे नेमके कोण? त्यांनी कधी कोणती बंधने घात्तली आणि कोणती काढून घेतली? मला वाटते भारतीय सामाजिक/धार्मिक आणि राजकीय इतिहासाचे पुरेसे परिशिलन नसल्याने हे विधान आले आहे. पाश्चात्य संकल्पना ज्याला "स्वातंत्र्य" म्हणते ते स्वातंत्र्य भारतात कधीही अस्तित्वात नव्हते. धार्मिक अथवा राजकीय (स्वकीयांची सत्ता असली तरी) स्वातंत्र्य अस्तित्वात नव्हते. धार्मिक बंधनांपेक्षा राजकीय बंधने अधिक होती हे राजकीय इतिहासावरुनही दिसते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही याबाबत बरीच माहिती मिळेल. व्यक्तीचे राजकीय, आर्थिक, भावनिक स्वातंत्र्य ही कल्पना भारतात कधीही अस्तित्वात नव्हती हे सत्य मान्य करायला काय अडचण आहे? सर्वकाही आमच्याकडे पुरातन काळापासून होतेच हा अट्टाहास सामाजिक ऐक्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे.

समतेचे म्हणावे तर आध्यात्मिक पातळीवर समता/समरसता अनेकांनी सांगितली आहे. शैव (नाथपंथीय/लिंगायत आणि अन्य शैव सिद्धांत) सिद्धांत समतेबाबत बोलतच अले आहेत.आदी शंकराचार्यांना खरा अद्वैतवाद समजला तो शिवाच्याच रुपातुन अशी दंतकथाही आहे. पण हा अद्भूत असा अद्वैततावादही अध्यात्माच्याच पातळीवर घसरला, व्यावहारिक पातळीवर उरला नाही हे आपल्या सर्वच धर्मेतिहासांतून लक्षात येईल. किंबहुना समतेचा ध्यास घेत स्थापन झालेले नवे धर्मही नंतर विषमतेच्याच गाळात अडकले ते परस्परांतील वाईटच घेण्याच्या वृत्तीमुळे हेही स्पष्ट दिसते. त्यामुळे सन २०० नंतरचा भारतीय समतेचा विचार केवळ आणि केवळ आध्यात्मिक स्वरुपाचा होता. समता उरली नाही कारण काही स्वनिर्मित तर काही परनिर्मित (वैदिक/शैवादि अवैदिक) पारतंत्र्यातच गेले. राजकीय पातळीवर समतेचा तर प्रश्नच नव्हता. चंद्रगुप्त मौर्य सम्राट असुनही त्याला चाणक्य "वृषल"च म्हणत राहिला. नंद न्हावी म्हणून त्याचीही हेटाळणीच आहे. विष्णुपुराणासारखी पुराणे सातवाहनांसारख्या मातब्बर घराण्याला शूद्र म्हणून विशेष जागा देत नाहीत. राजालाच समता नसेल तर जनसामान्यांना कशी असणार? मुळात भारतीय धर्मैतिहास आणि राजकीय इतिहास वैदिक दृष्टीकोनातून लिहिला गेला असल्याने तो भेदभावाने भरलेला आहे. तोच भारताचा खरा इतिहास आहे असे मानत त्यातून समतेची मुल्ये शोधायचा आणी भारतात समतेचे तत्वज्ञान होतेच कि हे दाखवण्याचा प्रयत्न्ब करत त्यात अध्यात्मवाद होता...व्यवहारवाद नव्हे हे मात्र सांगण्याचे टाळले जाते.

त्यामुळेच बंधुभावाचा पुरातन विचारही बाद होतो. विवेकानंद म्हणतात "आपला समाज अतिभयंकर, अतिसैतानी बनला." हेही मत अतिरंजित असले तरी त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल?

आता पुरातन काळात समता-स्वातंत्र्य व समता आधुनिक परिप्रेक्षातली नसेल तर ती होतीच असा अट्टाग्रहही काय कामाचा? दुस-यांचे चांगले ते घ्यावे असे श्री. पतंगेच एका ठिकाणी म्हणत असता, हा दुस-यांचे चांगले नाकारण्याचा प्रयत्न नाही काय? या पाश्चात्य तत्वांना नाकारण्यासाठीच "समरसता" सिद्धांत जन्माला आला नाही काय?

आज सकाळी सकाळीच मला एका संघ स्वयंसेवकाचा फोन आला होता. "समता कि समरसता" हा पुण्यनगरीत प्रकाशित झालेला माझा लेख वाचून त्याने फोन केला होता. अर्थात त्याला माझा लेख आवडला नव्हता. असे लेखन करु नये असे सुचवत त्याने सांगितले कि जिलेबी जशी एकजीव असते तशीच समरसता असते. हे उदाहरण बालिश वाटले तरी समाजाची जिलेबी करता येत नाही....समाज एकरस...एकजीव करता येत नाही. संघाचे स्वयंसेवकही असे एकरस-समरस बनू शकत नाहीत. कारण मुळात ते मानवी प्रेरणांच्या विरोधात आहे.

हिंदुंचे संघटन का करावे यावर पतंगेंनी भाष्य केलेले नाही. हिंदू धर्मातील जातीअहंकार व जातीपाती, वैदिकांचे वर्णीय अहंकार संघाला मान्य नाहीत एवढेतरी पुस्तकांवरुन दिसते. आपण ते विचार प्रामाणिक आहेत असे समजू. हे अहंकार व भेद तोडण्यासाठी समरसता हवी असे जे म्हणणे आहे ती समरसता म्हणजेच प्रत्यक्षात समता होय असेही आपण थोडा वेळ गृहित धरू. परंतू प्रत्यक्षातील व्यवहारवाद काय आहे हेही मग पहायला हवे. वर्ण-जाती तोडुन हिंदू हीच एकमात्र ओळख समजा सर्वांनी ठेवायची तर वर्णांचे आणि जातींचे तत्वज्ञान संघाकडे कोठे आहे? जोवर वर्ण आणि जाती का नकोत, त्या कशा फिजूल आहेत हे सर्वप्रथम स्पष्ट करावे लागेल. ते स्पष्ट केले कि कृती आली. हिंदू धर्माचे शंकराचार्य वैदिकच का? या प्रश्नाचीही सोडवणूक करावी लागेल. (शंकराचार्यांचा वारस कोण असेल यात संघ आणि काशी विद्वत्परिषद सक्रीय सहभागी असते.)  थोडक्यात एकरुप हिंदू ही ओळख मिटवायची तर वैदिक शंकराचार्य (धर्मगुरू) ही प्रथाच सर्वप्रथम नष्ट करावी लागेल. मी २००६ साली किस्त्रीममद्ध्ये याबाबत सविस्तर लेख लिहिला होता. मा. गो. वैद्यांनी माझा चांगलाच समाचार घेत मला व्ह्यटिकनचा हस्तकही ठरवले होते हा इतिहास फार जुना नाही. धर्मकार्यातील कोणाही लायक व्यक्तीसाठी हे पदच मुळात खुले होत नाही तोवर वर्ण-जाती अभिमान घालवायच्या बाता निरर्थक आहेत. अन्य मंदिरांबाबतही (जसा पंढरपुरबाबत झाला) तशाच निर्णयाची गरज आहे. पण १९८३ साली स्थापन झालेला समरसता विचार मंच याबाबत आपले विचारही मांडत नाही. कृती तर खुपच दुरची झाली. वर्णाभिमानी धर्मसत्तेवर कायम ठेवून लोकांनी मात्र समरस व्हावे ही अपेक्षा विघातक आहे, हिंदुंना मुळीच उपकारक नाही याचे भान संघाने ठेवले पाहिजे.

(क्रमश:)
मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Sunday, June 7, 2015

"समरसता" श्री. पतंगे...एक समीक्षा (भाग १)

माझे मित्र श्री. रवींद्र गोळे यांनी मला "समरसता" हे श्री. रमेश पतंगे यांचे समरसतेचे तत्वज्ञान मांडणारे पुस्तक आवर्जुन वाचायला पाठवले याबद्दल त्यांचे नितांत आभार. श्री. पतंगे यांनी त्यांच्या पुस्तकात समरसतेचे तत्वज्ञान मांडतांना अनेक मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. वेद, बुद्ध, कृष्ण यांचे पुरातन दाखले देत बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी, विवेकानंद, गोळवलकर गुरुजी, म. फुले, गाडगेबाबा, हेडगेवार इत्यादि समरसतेचे कसे व कोणत्या महनीय मुल्यांसाठी समर्थन देतात याचे विवेचन यात आहे. एका दृष्टीने हे समरसतेच्या सिद्धांताची मांडणी करणारे तत्वज्ञान आहे व त्यामुळे त्याची समीक्षा त्याच पातळीवर केली जाणे आवश्यक आहे.

पुस्तकाची सुरुवातच समरसता या शब्दाचा शब्दकोशातील (मराठी शब्द रत्नाकर) अर्थ त्यांनी दिला आहे व तो - "मानसिक वृत्तीची एकरुपता, तल्लीनता" असा आहे. आदर्श मराठी शब्दकोशानुसार तोच अर्थ "संयोग, मिलाप, सहवास" असा दिला आहे असे ते म्हणतात. व्यक्तिश: आणि समूहश:ही एखाद्या विषयाशी समरस झाल्याखेरीज कोणालाही आस्वादक बनता येत नाही (पृष्ठ १४) असे म्हणत ते म्हणतात समरसता हा मानवजातीचा असा गुणधर्म आहे की जो मनुष्याचे अन्य प्राण्यांपासूनचे वेगळेपण स्पष्ट करतो. मनुष्याचे वेगळेपण म्हणजे मनुष्याजवळ धर्म आहे, धर्माशिवाय माणूस पशुसारखा असतो. मानवी संस्कृतीचा विकासही समरसतेच्या भावनेने झाला आहे असे विधान करत  हेडगेवारांना हिंदू संघटनाबाबत उद्द्घृत करतात, "परस्परविरोधी विचार आणि आचार असणा-या लोकांचे संघटन होऊ शकत नाही. संघटनेसाठी समान इतिहास, समान आकांक्षा, समान मूल्यविचार, धर्माविषयी समान धारणा आवश्यक आहे. हिंदू समाजात अशी समानतेची अनेक स्थाने आहेत व त्यावर भर देण्याचा मार्ग डा. हेडगेवारांनी स्वीकारला......सामाजिक समरसता हा हिंदू संघटनेचा आत्मा आहे." (पृष्ठ ९७)

पहिली बाब येथे आपण लक्षात घ्यायला हवी ती ही कि धर्मामुळे माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे असे आजीबात नाही. मनुष्य हा बोलतो आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर कृत्रीम साधने शोधत जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करतो ही बाबच त्याला अन्य प्राण्यांपासून वेगळी पाडते. धर्म ही अशाच अनेक कृत्रीम बाबींपैकी एक कृत्रीम बाब आहे जी मनुष्य निर्मित आहे, निसर्ग निर्मित नाही. धर्माची उपयोगिता सामाजिक रक्षण, पारलौकिक जीवनाची सोय आणि आध्यात्मिक समाधान एवढीच आहे. पारलौकिक जीवन हीसुद्धा एक काल्पनिक संकल्पना असली तरी मृत्युभयाने ग्रासलेल्या माणसांना तो एक मानसिक आधार आहे एवढेच. धर्माशिवाय मनुष्य का नाही याची कारणे माणसाच्या नैसर्गिक दुर्बलतेत आहेत, निसर्गात नाहीत. धर्माशिवाय माणूस पशुसारखा आहे हे विधान धाडसी आहे. ग्रीकांचा धर्म कोणता होता हे विचारले तर आज संघाची पंचाईत होऊन जाईल, कारण ज्याला धर्म म्हणता येईल असा धर्म ग्रीकांनी मुळात स्थापनच केला नाही अथवा अवलंबिला नाही. पण ग्रीकांनी प्रत्यक्षप्रमाणदर्शी विज्ञान व तत्वज्ञानाचा पाया घातला, एक अवाढव्य संस्कृती निर्माण केली हे नाकारता येणार नाही. किंबहुना धर्म ही गुढवादी व भयवादी लोकांची उपज असते. ती मानवाच्या अस्तित्वाची पुर्वअट असती तर जगात वेगवेगळे धर्म नसते...अनेक नष्ट झाले नसते व नवीन स्थापनही झाले नसते. धर्मातच एकरुपता असती. वैविध्य नसते. आणि धर्म एकमेकांचे शत्रूही झाले नसते.

थोडक्यात धर्म हा माणसांच्या जीवनाचा मनुष्यनिर्मित आधार आहे, निर्मिती आहे. ती दैवी नाही. धर्माशिवाय मनुष्य पशू असतो हे विधान धाडसी आहे आणि धर्माचे अतिरेकी महत्व वाढवणारे आहे. आधुनिक काळात सर्वच मानवजात बुद्धीवादी होत धर्माची आवश्यकता क्रमश: कमी नेतील अशा तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. वाढवण्याची नाही.

दुसरे म्हणजे समरसता म्हणजे सर्व समाजाच्या मानसिक वृत्तीची एकरुपता असा अर्थ पतंगेंना अभिप्रेत आहे. समरसतेच्या अर्थात एवढीच बाब येत नसून समरसता म्हणजे व्यक्तीगत अस्तित्वांचे सामुदायिक हिताच्या कार्यात विसर्जन. मानसिक एकरुपता या विसर्जनाखेरीज शक्य नाही हे उघड आहे. येथे एक बाब लक्षात घ्यायला हवी ती अशी किहिटलरने थर्ड राईशची कल्पना वापरतांना समरसतेचाच उपयोग केला होता. तो म्हणतो राष्ट्रीयत्वाचा एकरुप आत्मा आणि सामाजिक न्यायाची भावना जर्मन तरुणांच्या हृदयात अशा रितीने एकवटवली पाहिजे कि सर्व जर्मन समाज एकमेकांशी समान प्रीत, समान अभिमान, समान वंश आणि समान आकांक्षा या प्रेरणांनी एकत्रीत होईल आणि अशारितीने अपराजित आणि अभंग राहील. (माईन कांफ, हिटलर, पृष्ठ ३८७) हिटलर एका परीने अगदी जर्मन लोकांच्या समरसतेबाबतच बोलतो आहे. डा. हेडगेवारही काही वेगळे सांगत आहेत असे नाही. हेडगेवारही जवळपास तेच म्हणत आहेत. समान इतिहास, समान आकांक्षा, समान मूल्यविचार ई. काही वेगळे बोलत नाहीत. कदाचित हेडगेवारांची हिटलरच्या अंतिम ध्येयाशी सहमती नसेल हे आपण येथे गृहित धरुयात. पण तरीही या तत्वांचाही विचार केला पाहिजे.

पहिली बाब म्हणजे कोणत्याही मानवी घटकांचा इतिहास समान असु शकत नाही. भारताला (अथवा हिंदुंना) समान इतिहास आहे हे विधान मुळात भावनिक पण अनैतिहासिक आहे. समान इतिहास म्हणजे सर्वांना समान वाटणा-या ऐतिहासिक घटना नव्हेत तर सर्वांनीच इतिहासात जे गाजवले अथवा जे भोगले ते समान असणे होय. कारण इतिहासाकडे राह्ट्रीय अथवा धार्मिक दृषटीने पाहता येत नाही. एकार्थाने मग सर्वांचाच इतिहास जागतिक बनतो, त्याला पृथक करता येत नाही. राष्ट्र-धर्म या आधारावरही नाही. समान इतिहास हा कोणत्यातरी भौगोलिक एककातील सर्वच लोकांचा सर्वांनीच भोगलेला इतिहास. भारत हे त्या दृष्टीने कधीच राष्ट्र नसल्याने भारतातील असंख्य राज्ये/साम्राज्ये व त्यांचे भुभाग याचा इतिहास एवढा वेगवेगळा आहे कि भारतीय उपखंडाच्या इतिहासाला समान इतिहास म्हणता येणार नाही. त्याला राष्ट्रीय इतिहासात गुंफण्याचा प्रयत्न वरकरणी स्तुत्य वाटला तरी शेवटी त्याचे विवेचन तुकडे करुनच करावे लागते, ते अनेकदा परस्परांच्या विरोधात असते आणि म्हणूनच त्याला "समान इतिहास" म्हणता येत नाही कि ज्यायोगे लोक एकत्र संघटित होतील.

तीच बाब मुल्य विचारांची. कोणाची मुल्ये अनुकरणीय ह नेहमीच तीढा असतो. कृष्णाची मुल्य रामाच्या मुल्यांसारखी नाहीत. बुद्ध-महावीरांची मुल्य-विचारसरणी पुन्हा वेगळाच छेद देते. अवैदिकांची पिढ्यानुपिड्या जपलेली एक मुल्यव्यवस्था आहे. वैदिक मुल्यव्यवस्था पुन्हा वेगळीच बाब आहे. यात समानतेचे काही बिंदू सापडून त्याची रेखा बनवता येईल. नाही असे नाही. पण हे पुन्हा स्वतंत्र धर्म आहेत. कारण मुल्यरचना ही जर धर्माशी निगडित करायची असेल तर कोणत्या धर्माची मुल्यरचना...हा प्रश्न उद्भवतो. बौद्ध, वैदिक, अवैदिक, जैन, शीख हे सारे हिंदू धर्मांतर्गत येतात असे समजून जरी सर्वांच्या मुल्यांची मोट बांधली तर अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण होते. मुळात आम्ही हिंदू आहोत हे किती बौद्धांना मान्य होईल? आम्ही हिंदू आहोत असे वैदिकांचे म्हणने असेल तर ते वैदिक अधिकारांचा त्याग करायला किती सज्ज होतील? वर्णव्यवस्थेकडे पतंगेही निषेधाने पहात नाहीत. ज्या वर्णव्यवस्थेचा जन्म ज्या पुरुषसुक्तातून झाला ते पुरुषसुक्त वैदिक पुरोहित मंडळी अवैदिक देवतांसमोत निरलसपणे म्हणत असते. त्याबद्दल या समरसतेच्या तत्वज्ञानात स्पष्ट विधाने हवी होती. हिंदू व्हायचे असेल तर मुळात अशा बाबी आधी हद्दपार करायला हव्यात याचे भान या समरसता तत्वांत आहे काय हा प्रश्न निरुत्तरीत राहतो हे येथे लक्षात घेतले पाहिजे. पतंगे वर्णव्यवस्थेचे खापर मनुस्मृतीवर फोडतात, पण ही व्यवस्था हिंदू व्यवस्था नाही तर वैदिक व्यवस्था आहे आणि ती नेहमीच वैदिकांपुरतीच (आजही) सीमित आहे हे लक्षात घ्यायला हवे. मनुस्मृतीतील शूद्र म्हणजे वैदिकांच्या परंपरागत सेवकवर्ग. (पहा राजवाडॆ, भांडारकर, दांडेकर, राज पृथी.)  त्यांना धनसंचयाचे अधिकार नव्हते व उष्टे अन्न ते जुनी वस्त्रे द्यावीत हा जो मनुचा नियम आहे तो इतर अवैदिकांना (हिंदुंना) लागू असता तर भारतात नंद, मौर्य, सातवाहन, यादवादि अवैदिक सम्राट झाले नसते हे उघड आहे. तेंव्हा वैदिक स्मृत्यांना हिंदुंशी जोडण्यात काय अर्थ आहे? सांस्कृतिक आकलन चुकले तर त्यावरचे उपायही चुकणार हे उघड आहे. अवैदिकांचे माहात्म्य घटण्याची धार्मिकतेपेक्षा इतर अनेक वेगळी कारणे आहेत. पण वैदिकांचेही सांस्कृतिक माहात्म्य कायम अबाधित राहू शकलेले नाही हेही लक्षात ठेवायची गरज आहे.

समान इतिहास आणि धर्माविषयी समान धारणा ही डा. हेडगेवारांनी सांगितलेली संघटनाविषयीची मुलतत्वे कितपत उपेगी ठरतील हे वरील परिप्रेक्ष्यात पाहिले पाहिजे. हा सांस्कृतिक व धार्मिक गोंधळ संपला पाहिजे हे मान्य करुयात. पण त्यासाठी नेमकी काय उपाययोजना आहे? अवैदिकांना वेदाधिकार देऊन हा गोंधळ मिटवू असे वरकरणी म्हणता येईल, पण आता तो अधिकार द्यायची वेळ कधीच टळून गेली आहे. सुधारणांची सर्वाधिक गरज वैदिक धर्मियांना आहे. त्यांनाही त्यांच्या फुले-बाबासाहेबांची गरज आहे. ते असो. हा वेगळा मुद्दा झाला. पण समान इतिहास सर्व समुदायांचा आहे हे खरे नाही आणि धर्माविषयी समान धारणा हाही मुद्दा खरा नाही.

आता आपण संघटनाच्या मुद्द्याकडे वळुयात. संघटनात एक विचार, एक आचार आणि एक आकांक्षा इत्यादि मुल्यांचा समावेश होतो हे आपण सर्वच संघटनांच्या बाबतीत पाहु शकतो. मग त्या कम्म्युनिस्ट असोत कि ख्रिस्ती. किंबहुना प्रत्येक संघटना ही आपल्याच विशिष्ट विचारधारेचे अनुयायी वाढवण्याच्या प्रयत्नांत असते हे आपण जगभर पाहू शकतो. त्या अर्थाने प्रत्येकाला "समरस" झालेले अनुयायी हवे असतात. कोणी त्यासाठी बौद्धिके घेईल तर कोणी क्यडर क्यंप चालवील. उद्देश्य एकच असतो. त्या अर्थाने हेडगेवार (अथवा गोळवलकर) वेगळे बोलत आहेत असे नाही. पण ते संघटनेसाठी व त्यापुरतेच खरे आहे. समस्त मानवीसमुदायाला (ते धर्मीय/राष्ट्रीय का असेनात) ही तत्वे कशी मान्य होतील हा खरा प्रश्न आहे.

पतंगे म्हणतात, " हिंदू संघटन याचा अर्थ जातीपाती, पंथ, भषा इत्यादी भेदांच्या वर उठून आपली ओळख हिंदू म्हणून स्विकारणे ही होय. वर्ण अथवा जातीय अस्मिता कायम ठेवून हिंदू संघटन करणे अशक्य आहे."

किंबहुना समरसता जी हवी आहे ती हिंदू संघटनासाठी. जाती-वर्ण यांचा विलय करत प्रत्येकाने आपली ओळख निखळ "हिंदू" ठेवावी असा ध्येयवाद या विधानात आहे. जात आणि वर्ण या संकुचित अस्मिता होत असेही पतंगे म्हणतात. (पृष्ठ ९७) वर्णाने अस्मिता बाळगणारे तीन गट या देशात आहेत. ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य. यात ब्राह्मण वगळता अपवादाने उर्वरित दोन वर्णांना "वर्ण" म्हणून वैदिक धर्माधिकार आहेत. शुद्रांना ते अधिकार ते वैदिक नसल्याने कधीच नव्हते. आजही नाहीत. आणि त्यांना शुद्र हे नाव वैदिक्जांनी दिले आहे, त्यांनी स्विकारलेले नाही. अवैदिक आपली ओळख आपल्या जातीने करुन देतात. "मी शूद्र आहे" अशी ओळख अवैदिक कधीच करुन देत नाहीत कारण मुळात ती त्यांची ओळखच नाही. ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य अशी ओळख ठेवणारे अस्तित्वात आहेत. त्यामुळे वर्णीय ओळख विसरणे ही वेगळी बाब झाली आणि जातीय ओळख पुसणे ही दुसरी बाब झाली. समजा या दोन्ही ओळखी पुसत एकमात्र "हिंदू" हीच ओळख ठेवायची तर यत्किंचितही भावनिक न होता प्रत्यक्ष स्थितीचा विचार केला पाहिजे.

आपण काही प्रश्न निर्माण करत यावर विचार करुयात. वर्णाची ओळख संपवली तर तिन्ही वर्णाचे निहित असे अधिकार आणि अस्मिता सोडणे हा पुर्वअट झाली. याच अस्मिता पाहिल्या तर या वर्णीय अस्मितांत ब्राह्मणाने ब्राह्मणाचे अधिकार आणि अस्मिता का सोडायच्या हा प्रश्न उरतो आणि कोणता ब्राह्मण, क्षत्रीय अथवा वैश्य याचे उत्तर देईल आणि अस्मिता सोडेल? अपवाद असतात पण ते संघ आणि संघाबाहेरही आहेतच. संघविचाराने अथवा समरसता विचारांनी प्रेरीत समजा कोणी या अस्मिता सोडत असेल असे म्हणता तर मग विनय सहस्त्रबुद्धेंसारख्या माणसालाही "आम्ही संघात जातपात मानत नाही...पण धारावीतील मातंगाघरी गेलो होतो..." असे का सांगावे वाटते? ते जाऊद्या, संघाबाहेरच्या जात्युच्छेदकता हेच आपले ध्येय मानतात अशा (संघविरोधी...ब्राह्मण विरोधीही) चळवळीतील विचारवंतही विचारमंचांवरुन (व्यासपीठ हा शब्द काहींना खटकतो. मला नाही) वक्त्यांची ओळख करुन देतांना त्यांची जात का सांगतात?

माझे उदाहरण नाईलाजाने देतो. माझी जात निकटवर्तीय वगळता कोणाला माहित नाही. दोन अशाच कार्यक्रमात माझी जात मंचावरुन विचारली गेली...कारण मी सांगत नाही. मग काहींना (मी ओबीसी प्रश्नावरील चर्चेत भाग घेतल्याने) मी ओबीसी असल्याचे साक्षात्कार झाले आणि आता "सोनवणी तुम्ही ओबीसी आहात हे समजले, जातही लवकर समजेल..." असे म्हटले गेले. काही मंडळी सोशल मिडियावरुन स्वत:ची ओळख "मी जात विसरलो...पण मी पुर्वाश्रमीचा  अमुक" अशी करुन देत आता "मी माझी जात सांगितली...आता सोनवणींनी आपली जात सांगावी..." असे जाहीर आवाहन करतात आणि असे आवाहन करणारा सद्गृहस्थ चक्क प्राध्यापक!

मला वाटते, हिंदू संघटनाचे ध्येय बाळगणा-यांनी आपण कोठे चूकत आहोत हे पाहिले पाहिजे. पहिली चूक आहे ती मुळात समरसतेच्या तत्वज्ञानात हे समजले पाहिजे. लोक सहजी वर्ण सोडतील, वैदिकता विसर्जित करतील आणि लोक जातीही विसर्जित करतील हा भाबडेपणा (किंवा कावेबाजपणा) झाला. हे करण्यासाठी समरसतेचे तत्वज्ञान सांगितले, प्रसार केला कि झाले हा मिथ्याभ्रम आहे. मुळात समरसतेचे तत्वज्ञान भ्रम वाढवण्यासाठी असते, संपवण्यासाठी नव्हे.

समरसतेत मुळात मानवी प्रेरणांचा विचार केला गेलेला नाही. त्यांच्या वास्तवाचा विचार केलेला नाही. संघाची ही मोठी गफलत आहे. "समरसतेच्या भावनेने संचित वारसाचा स्वीकार केला जातो आणि समरस होऊन त्या वारसात भर घातली जाते. मानवी संस्कृतीचा विकास त्यातून घडत जातो. समरसता आणि संस्कृती विकास यांचा अशा प्रकारचा अतूट संबंध आहे." असे श्री. पतंगे म्हणतात. (पृष्ठ १६) आणि पुढे पतंगे पं दीनदयाळ उपाध्यायांचा हवाला देत म्हणतात "वैचारिक संघर्ष हा आपला जीवनमार्ग बनू शकत नाही. निरंतर संघर्ष हा समतेचा आधार बनू शकत नाही. मानवी समरसतेसाठी देवाणघेवाण, दुस-याचे चांगले स्विकारायची मनोवृत्ती, विविध विचारांतील ऐक्य शोधणे, दुस-या भाषेत विविधतेत एकता शोधणे आवश्यक ठरते." (पृ. ३१)

खरे म्हणजे यात मोठाच विरोधाभास आहे. पहिली बाब म्हणजे संस्कृती म्हणजे काय? माणसाची विविधांगी अभिव्यक्ती म्हणजे संस्कृती अशी थोडक्यात कोणत्याही संस्क्रुतीची व्याख्या करता येते. संस्कृती हे स्थिर, स्थायी आणि अपरिवर्तनीय कधीच नसते. नुसत्या वैदिक संस्कृतीचा विचार केला तर ती किमान तिनशे ते पाचशे वर्ष घडण्याच्याच स्थितीत होती. नंतर येतो तो तिचा भारतात पसरण्याचा काळ आणि त्यातही नंतर झालेली परिवर्तने. सिंधू संसकृतीही एका रात्रीत बनली नाही. कोणतीही संस्कृती नवविचारांच्या प्रकटीकरणांतून घडत जाते. समरसतेचा भाव आला कि नवपरिवर्तनाचा संबंधच येत नाही. समरसता नवनिर्मितीतील सर्वात मोठा अडसर आहे. एकदा आहे त्यात व मागच्या इतिहासाशी समरस झाले कि नवनिर्माण करणे म्हणजे मागच्या संस्कृतीला आव्हान देणे कसे होईल? समरस होऊन वारशात भर घालता येत नाही तर आहे त्याला आव्हान देऊन भर पड्ते.

न्युटन आधीच्या सिद्धांतकांशी समरस झाला कि तो नवा सिद्धांत मांडू शकणार नाही आणि आईन्स्टाईन न्युटनशी समरस झाला तर तो नवे सिद्धांत मांडू शकणार नाही. समरस लोक संस्कृत्यांचे अंध पाईक असतात तर स्वतंत्र विचार करणारे असमरसच संस्कृतीला पुढे नेतात. त्यासाठी वैचारिक संघर्ष अपरिहार्य असाच असतो. उपाध्याय म्हणतात त्याप्रमाणे नव्हे. वैचारिक संघर्ष नसता तर बुद्ध-महावीर-चार्वाक ई. घडले नसते. किंबहुना वैचारिक संघर्षच मानवी संस्कृतीला अग्रगामी, पुरोगामी बनवणारा महत्वाचा आधारस्तंभ आहे. समरसता हा महामार्ग बंद करु इच्छिते हे श्री. पतंगे यांच्या विधानांवरुनच दिसतेस.

समरस लोक संस्कृतीच्या विकसनातील मोठे अडथळे होत. आणि गंमत म्हणजे "दुस-यांचे चांगले शोधायची वृती...समरसतेत सारे जर एकरस आणी एकाकार आहेत तर "दुसरे" कोठुन आले?

मला वाटते मिथ्याविज्ञान आणि मिथ्यातत्वज्ञानातुन मानवी जीवनाचे, हिंदुंचेही, प्रश्न सुटणार नाहीत.  कारण ज्या आधारावर हे तत्वज्ञान बनलेले आहे ते आधार घेत संस्कृती पुढे जाणे तर दुरच....आहे तेथ्गेच ठप्प होईल...आणि ज्यासाठी समरसता हवी असे म्हटले जाते ते प्रश्नही सुटणार नाहीत.

पुढच्या भागात बुद्ध ते शाहू-आंबेडकरांचे विचार कसे समरसतेला उपयुक्त अथवा समर्थक आहेत हे पतंगेंचे विश्लेशन पाहुयात. येथे एवढेच म्हणेल, एकता हवी कि नको? मी एकतेच्याच बाजुने आहे. आपली कधी नव्हे ती निकड बनली आहे. एवढेच कि समरसता  हा मार्ग नाही. कसा...ते पुढील भागात!


यानंतरचा भाग वाचण्यासाठीए येथे क्लिक करा.

http://sanjaysonawani.blogspot.in/2015/06/blog-post_8.html

Friday, June 5, 2015

त्यात स्त्रीयाच अग्रगामी असतील !


Image result for mother goddesses indus


जगाने आजवर असंख्य व्यवस्था पाहिलेल्या आहेत. एके काळी पृथ्वीतलावर, अगदी भारतातही स्त्रीसत्ताकता होती अशीही काही मते आहेत. कोम्रेड शरद पाटील या सत्ताकतेची ऐतिहासिकता, प्रसंगी पुराकथांतून व शब्दांतून हवा तसा अन्वयार्थ काढतही मांडणी करत आले होते. स्त्रीसत्ताकता म्हणजे स्त्रीयांचे राज्य. स्त्रीमहत्ता आणि शासन ते कुटुंबपद्धतीत, वारसाहक्कासहितचे स्त्रीयांचे अधिकार अंतिम. ग्रीक मिथककथांतही अशी स्त्रीराज्यांची उदाहरणे येतात. अमेझोन स्त्रीयांचे असे एक राज्य होते असे पुराकथेवरुन दिसते. Troy युद्धातही या स्त्रीयांनी भाग घेतला होता असे हिसियड म्हणतो. स्त्रीसत्ताकतेकडून पुरुषसत्तेकडे मानवाने कृष्री संस्कृतीच्या उदयानंतर लगोलग वाटचाल केली असेही दिसते. शरद पाटील ज्या काळाबद्दल बोलतात, म्हणजे मध्य वैदिक आणि उत्तर वैदिक, (यजुर्वेद काळ ते ब्राह्मणकाळ) हा काळ फार फार नंतरचा असल्याने आद्य वैदिक काळ (ऋग्वेदकाळ) हा  मुळात भारतातील नसल्याने भारतीय संस्कृतीत ते संदर्भ अनाठायी आहेत. वैदिक काळ हा इसपू १५०० च्या पलीकडे जात नाही तर सिंधू संस्कृतीचा काळ हा इसपू ३१०० ते इसपू १७०० एवढा आहे. वैदिक ग्रंथांत गणमाता अथवा स्त्रीसत्ताकता शोधत भारतीय इतिहासाची मांडनी करणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच.मातूदेवतांची पूजा ऋग्वेदापेक्षाही प्राचीन आहे. ऋग्वेदकालात जगभरच पुरुष देवतांना महत्व यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे वैदिक साहित्य हे जागतिक संस्कृतीच्या प्रवासात खूप उत्तरकाळात लिहिले गेले आहे हे स्पष्ट होते.

पण खरोखर ज्या अर्थाने स्त्रीसत्ता म्हटली जाते तशी ती अस्तित्वात होती काय हा कळीचा प्रश्न आहे. स्त्रीसत्ता आणि मातृपुजक समाज यात फरक केला पाहिजे. मातृपुजा ही वैश्विक घटना आहे जी आजही पाळली जाते. जननी म्हणून निर्माती आणि म्हणून देवतासदृष अशा स्वरुपात योनीपुजेच्या रुपात मात्रूपुजा सर्वात आधी अवतरली हे वास्तव आहे. आद्य मानवी समाज मातृपुजक होते यात वाद नाही. पण ऐहिक सत्ता स्त्रीयांचीच असे हे काहींचे मत मात्र विवादास्पद आहे कारण त्याला आधार नाही. ज्या ज्या संस्कृतीत
मातृपुजेचे अवशेष सापडले आहेत त्यावरुन त्या समाजांत स्त्रीसत्ताकता वा स्त्रीवर्चस्व होते असे म्हणता येणार नाही असे आता अनेक पुरातत्वविद म्हणतात. मातृपुजा होणे म्हणजे मात्रुसत्ताकता असणे असा अर्थ होत नाही. दोन विभिन्न बाबी असून ऐहिकता आणि गुढगर्भमय रहस्यात्मकतेपोटी होणारी पुजा यात फरक करावा लागतो.  पुजा ज्याची केली जाते ती प्रतिकात्मक बनते, ऐहिक पातळीवर ज्याची प्रतीक म्हनून पुजा केली जाते त्या प्रतीकांच्या जीवंत अस्तित्वांना तेवढेच महत्वाचे स्थान दिले जातेच असे नाही. टोळी जीवनात जोवर शिकार आणि अन्नसंकलन हाच उपजिविकेचा मोठा धंदा होता त्या काळात स्त्रीया अडचणीचे काळ वगळता पुरुषांच्या बरोबरीने या कामांत सहभाग असे. स्त्रीयांवरची सामुदायिक मालकी त्यात निहितच होती. टोळीयुद्धे होत त्यात पुरुष शक्यतो मारले जात तर स्त्रीयांना मात्र गुलाम केले जात असे. गुलाम स्त्रीयांपासुन झालेली मुले ही टोळीचीच संपत्ती असल्याने त्यांना स्वातंत्र्य मिळत असले तरी स्त्रीया या टोळीवृद्धीसाठी गुलाम केल्या जात, व त्या भोगदासी व दुय्यमच असत, हे वास्तव लपत नाही.

स्त्रीसत्ता हा काही विद्वानांना आदर्श संकल्पना वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रीया या कधी राज्ञीपदी विराजमान होत सत्ताधारी झाल्या नाहीत. ते अपवाद आहेतच व तेही अपवादात्मक स्थितीतील. आणि अशा स्थितीतही ज्याला स्त्रीसत्ता असे संबोधले जाते तशी व्यवस्था नसे हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

शेतीचा शोध माणसाला इसपू १२००० वर्षांपुर्वी लागला असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील ठिकाण एवढे जुने आहे. प्रत्यक्षात याहीपुर्वी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीने मानवी जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवला. पहिला बदल म्हणजे आजवर भुमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा जो विषयच नव्हता तो आला. प्रत्येकाने आपल्याला सोयीची व उपजावू जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातुनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. जमीनीवर हक्क...म्हणजे जमीनीत जो बीज पेरतो त्याचा हक्क. 

आणि स्त्रीयांत बीज पेरणारा पुरुषच आहे हे भान आल्याने शेतीवरील मालकी जशी तशीच स्त्री/स्त्रीयांवरील मालकीही पुरुषाचीच ही भावना पक्की होत गेल्याने क्रमश: स्त्रीयांचे स्थान संकुचित होत गेले. यात वैवाहिक नीतिसंबंधांची मात्र संकल्पना नसल्याने स्त्रीयांचे बहुविध संबंध जसे टोळी जीवनात होते तसेच चालुही राहिले. पण त्यापासुन होणारी संतती मात्र ज्याची ती स्त्री आहे त्याचीच मानली जात असे. यातुनच बहुपतीकत्व ही संकल्पनाही समांतरपणे विकसीत होत गेली. मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व कधी नव्हतेच त्यामुळे बहुपतीकत्वातही कसलाही अडसर नव्हता. फक्त अनेकांशी व कोणाशीही स्वैर संबंध ठेवण्यापेक्षा मर्यादित व भोगता येतील एवढ्याच स्त्री-पुरुषांपुरती ही संकल्पना रुढ होत गेली.

एकपतीत्व अथवा एकपत्नीत्व क्रमशा: मानवी समाजांना व्यापत गेले ते नैतिक/भावनिक अथवा धार्मिक भावनांनी नव्हे तर संपत्तीवरील वारसा भावनेने हे येथे लक्षात घ्यायला हवे. शेतीमुळे माणूस स्थिर झाला. मानवी संस्कृतीला अवाढव्य आयाम लाभू लागले. ग्रामसंस्कृतीकडून उद्योग-व्यापार व अन्य कुशल उत्पादनांमुळे भरभराट आली पण त्याच वेळीस समांतरपणे लोकसंख्येचा विस्फोटही होऊ लागला. सिंधू खो-यातीलच लोकसंख्या इसपु ७००० मद्ध्ये सुमारे पाच लक्ष होती ती इसपू २२०० पर्यंत जवळपास पन्नास लक्ष एवढी झाली असा पुरातत्ववेत्त्यांनी एकूण व्याप्ती पाहून अंदाज केला आहे.. टोळीजीवनात अपंग/निर्बलांना स्थानच नव्हते त्यामुळे ती अपत्ये सरळ मारली जात. शिवाय युद्धे सततची असल्याने त्यात लोक मरत ती वेगळीच. स्थिर संस्कृतीत मात्र ही संख्या फोफावत गेली. अपंग अथवा निर्बल वाटणारेही या संस्कृतीत कला-कौशल्यांच्याही विस्फोटामुळे उपयुक्तच ठरत होते. ओझे बनत नव्हते.

अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या सांपत्तीक अधिकारांचे वितरण त्याच्या मरणानंतर कसे हेही प्रश्न निर्माण होऊ लागले व यातुनच औरस व अनौरस अशी विभागणी सुरु झाली. औरस आणि अनौरस ठरवायचे म्हणजे पुन्हा नव्या व्यवस्थेची गरज होती. विधीवत विवाह ही त्यातून काढली गेलेली वाट होती. ऐहिक जीवनाची सोय धर्माद्वारे लावण्याचा व राजसत्तेलाही ती गरजेची वाटल्याने राजकीय मान्यतेचा महामार्ग यातुन काढला गेला.

आधीच्या विभागणीत अनौरसांची (स्त्रीच्या बाजुने असो कि पुरुषाच्या) संख्याच अधिकची असल्यामुळे संपत्तीचे विभाजन औरसांना अधिक आणि अनौरसांना कमी अथवा वंचित ठेवण्याचे धोरण असणे स्वाभाविक होते. त्यामुळे स्त्रीच्या यारापासुन झालेले, स्वपुरुषापासून झालेले आणि पुरुषाला अन्य स्त्रीयांपासून झालेले व त्या स्त्रीयांना अन्य पुरुषांपासून झालेले अशा संततीला कोणते ऐहिक वारसा अधिकार द्यायचे हे जे प्रश्न व असे काही गोंधळ होते जे शमने एरवी अशक्य होते ते विवाहसंस्थेच्या नव्या राजस्विकृत नियमांनी साधायचा प्रयत्न झाला.

याचाच अर्थ असा कि विवाहसंस्थेचा जन्म दैवी अथवा धार्मिक कारणंत नसून व्यावहारिक कारणांत आहे. कृषी व तदनुषंगिक उत्पादन व व्यापार व्यवस्थेची ही अपरिहार्य गरज होती. भावनिकता वगैरे भाव त्याला माणसाने कृत्रीमपणे चिकटवले. यातुन बहुपती व्यवस्थेचाही नायनाट झाला. बहुपत्नीकत्व मात्र पुरुषाने कायम ठेवले. ही त्याची नव्या व्यवस्थेतून आलेली मानसिकता होती.

वरील प्रवास पाहिला तर लक्षात येईल कि बहुपतीकत्व (एकपुरुषत्व) अथवा एकपत्नीत्व (एकस्त्रीत्व) कधीच नैसर्गिक नव्हते तर ती मानवी समाजाची बदलत्या समाजव्यवस्थेतील अपरिहार्यता होती. तिचा अनिर्बंध वापर (व्यवस्थेतील गैरव्यवस्था म्हनून) पुरुषांनी केला तसाच स्त्रीयांनीही. पुरुशांनी विवाहबाह्य संबंध निर्माण केले कारण तसे संबंध निर्माण करायला तयार स्त्रीयांची उपलब्धता होतीच. युद्धात जिंकून आलेल्या स्त्रीया रजवाडे-सरदार अथवा पराक्रमी सैनिकांना मिळत  तर सामान्य पण धन बाळगुन असलेल्यांना गणिका अथवा रक्षेच्या रुपाने. हे अन्याय्य होते कारण तशी सोय युद्धात जिंकलेल्या पुरुषांच्या बाबतीत नव्हती. पण त्यंचीही लैंगिक भूक भागवायची साधने होतीच त्यामुळे स्त्री-पुरुष-व्यवहार हा तारतम्याने पहावा लागतो व यात पुरुषी सत्ता ही नेहमीच स्त्रीयांच्या बाबतीत आपमतलबी राहिली आहे हेही पाहता येते.

तुम्ही म्हणाल, "एक जग: एक राष्ट्र" या संकल्पनेत ही चर्चा कशाला?

उत्तर सोपे आणि अत्यंत साधे आहे. आपण आज आधुनिक म्हणवणारी राष्ट्रभावना जपतो ती जर वैश्विक व्हायची अएल तर स्त्रीयांचे स्थान काय होते, काय आहे आणि काय असायला हवे याची चर्चाही तेवढीच गरजेची आहे. भारतातील स्त्रीवाद हा पाश्चात्य स्त्रीवादाची जवळपास पडछाया आहे. पुरुषविरहित जगाची स्वप्ने काही अमेरिकन स्त्रीवादी विचारवंतीनी पाहत आहेत. त्यातला अतिरेक बाजुला ठेवला तरी पुरुषी अतिरेक त्यामुळे क्षम्य होत नाही.

वैश्विक राष्ट्र हवे असेल तर स्त्रीयांचे स्थान हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनतो तो त्यामुळेच.

किंबहुना ही क्रांती जर कोणी कधी करु शकले, म्हणजे एक जग: एक राष्ट्र" तर त्यात स्त्रीयाच अग्रगामी असतील असे मला वाटते.

बाकी पुढील भागात.

Wednesday, June 3, 2015

समता कि समरसता?


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांनिमित्त यापुढे १४ एप्रिल 'राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्थात वरकरणी हा निर्णय स्तुत्य वाटत असला तरी केंद्रीय निर्णय हे बव्हंशी वादच निर्माण करण्यासाठी केले जातात कि बाबासाहेबांचे विचार पोचवण्यासाठी हा प्रश्न तत्काळ उपस्थित होणे हे स्वाभाविक होते. तसे झालेही. "समरसता" या संघाच्या लाडक्या संकल्पनेमुळे समरसता शब्द चक्क बाबासाहेबांच्या जयंते दिनात घुसवल्याने येथेच बाबासाहेबांच्या विचारांची हत्या केली आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उठणे स्वाभाविक होते. मीही जय महाराष्ट्र वाहिनीवरील चर्चेत या शब्दाचा तीव्र धिक्कार केला आहे.

समरसता हा शब्द संघीय अत्यंत भाविकपणे वापरत असतात. "समरसता" या शब्दात सर्व समाजांनी एकजीव, एकविचारी आणि एकध्येयी बनत आपले अस्तित्व पुर्णपणे समाजात विसर्जित करावे असा अर्थ अभिप्रेत आहे. वरकरणी कोणालाही यात वावगे वाटणार नाही. आदिवासींना संघ "वनवासी" म्हणतो. यातही कोणाला वावगे वाटेल असे वरकरणी तरी दिसणार नाही. समरसता मंचातर्फे संघ अनेक उपक्रम राबवत असतो हे सर्वांना माहितच आहे.

समरसता या शब्दात, सामाजिक परिप्रेक्षात पाहिले तर हा शब्द किती घातक आहे हे सहज लक्षात येईल. समरसतेत मानवी व्यक्तीस्वातंत्र्याची आहुती द्यायची असते. कशात? तर संघाने ठरवलेल्या, मानलेल्या राष्ट्रीय व सांस्कृतिक ध्येयात. समरसतेत व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व उरत नसून कोणत्या तरी विचारप्रणालीत (येथे संघाच्या) स्वत:ला विसर्जित करणे अभिप्रेत असते. म्हणजे व्यक्तीने स्वतंत्र आचार/विचार करायचा नाही. नेता (वा संघप्रमूख) सांगतील तोच आचार आणि तोच विचार. लोकशाहीचा अंत घडवणे म्हणजेच समरसता जपणे होय.

यामुळेच संघाची वैचारिक/बौद्धिक वाढ झालेली नाही हे आपल्या सहज लक्षात येईल. समरसतेत स्वतंत्र विचारच अभिप्रेत नसल्याने वैचारिक वृद्धीचा संबंधच येत नाही. वैचारिक वृद्धीसाठी पुर्व अट म्हणजे विचार कलह. वैचारिक संघर्ष झाल्याखेरीज विचार पुढे जात नसतात. वैचारिक संघर्षांसाठी व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व जपावे लागते. तशी व्यवस्था आणावी लागते. तेंव्हा व्यक्ती निर्भयपणे विचार मांडू शकतात, ऐकू शकतात. ही निर्भयता समरसतेत अभिप्रेतच नाही. कारण मुळात "स्वतंत्र विचार" ही संकल्पनाच समरसतेत बाद होते.

 थोडक्यात समरसता ही हुकुमशाहीची आवश्यक पहिली पायरी आहे. समरस झालेले विरुद्ध स्वातंत्र्य जपणारे याच्यातील हा कलह स्वाभाविक आहे. ताजे उदाहरणच घ्यायचे तर आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलवर केली गेलेली कारवाई. ही कारवाई विचार स्वातंत्र्य नाकारणारी आणि हुकूमशाही वृत्तीची द्योतक आहे हे उघड आहे. आगरकर म्हणाले होते, "विचारकलहाला का भीता?" संघ विचारकलहाला भितो हे उघड आहे आणि भेकडांनी कधी संस्कृती घडवली आहे असे उदाहरण जगात नाही. तरी हे लोक संस्कृतीच्या गप्पा हाकत कल्पोपकल्पित संस्कृतीचे चित्र निर्माण करत स्वत:ची आणि लोकांचीही फसवणूक करत असतात. एक उदाहरण देतो. घग्गर नदीला मारुन मुटकून वैदिक सरस्वती घोषित करण्याचा संघाचा उद्योग सुरु आहे. अलीकडे घग्गरच्या सुकलेल्या पात्रात पाच-पंचविस फुटाचे खोदकाम केले. पाणी लागले तर लगोलग संघविद्वानांनी (?) पुरातन सरस्वतीने उसळुन दर्शन दिले असे प्रवचन सुरु केले. हे एवढे मुर्ख आहेत कि कोणत्याही नदीच्या सुकलेल्या पात्रात खोदले तर पाणी लागणारच कि, एवढे समजायचे भान यांना नाही एवढे वैदिकतेचे भूत यांच्या डोक्यात घुसलेले आहे. आता समरसता मानली कि तुम्हाला सिंधू संस्कृती वैदिक होती, घग्गर हीच सरस्वती हे मानणे भाग पडतेच कि!

तर ही समरसता अशी आहे.

भारतीय घटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तीन उदात मुल्ये स्विकारली आहेत. समता व बंधुता कशी तर प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून.  यात मानवी स्वतंत्र प्रेरणांना उच्च स्थान दिलेले आहे. नुसते देशाचे स्वातंत्र्य नव्हे तर गांधीजींच्या शब्दात मानवांचेही स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. बाबासाहेबांनी म्हटलेय कि सामाजिक लोकशाही ही राजकीय लोकशाहीची पहिली अट आहे. समरसतेत लोकशाहीचा कसलाही संबंध येत नाही. समता हा शब्द संघ नाकारतो कारण त्यांना लोकशाहीच मुळात अभिप्रेत नाही. एकचालकानुवर्ती पंतप्रधान ते संघचालक हे याच तत्वज्ञानाचे अपत्य आहेत. त्यामुळे संघातील अथवा भाजपातील (संघातून आलेले) मंत्री-संत्री चुकुनही स्वतंत्र विचार मांडणार नाहीत...मांडतही नाहीत. याला मी लोकशाहीच्या अंताच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल म्हणतो. आंबेडकर-पेरियार स्ट्डी सर्कलवरील कारवाई त्याचीच निदर्शक आहे.

आम्हाला समता हवी आहे. समरसता नाही. सत्तेचे तुकडॆ मिळतील या आशेने आंबेडकरवादी म्हणवणारे राजेंद्र गवईं किंवा नरेंद्र जाधवांसारखे विकावू लोक दिमतीला घेतले म्हणजे भारतीय जनमानसांत आपली चांगली प्रतिमा निर्माण होईल हा संघाचा/सरकारचा भ्रम आहे. यांची नैतिक लायकी सर्वांना माहित आहे.

बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे तर दुरच पण त्या विचारांनाच हे लोक हरताळ फासत बाबासाहेबांचा एका परीने "समरसता" शब्द जोडत अवमान करत आहेत. सांस्कृतिक अपहरणे करत महनीय व्यक्तींची अपहरणे करण्याचा वैदिक धंदा आजचा नाही. व्यास-वाल्मिकीपासून ते कृष्ण आणि बुद्धाचेही ज्यांनी अपहरण करण्याचे घाट घातले ते आधुनिक काळात थांबतील असा भ्रम कोणीही बाळगू नये. मागे त्यांना काही असले धंदे पचून गेले असतील...पण आपण आज वर्तमानात ज्ञानजगात आलो आहोत. वरकरणी निरुपद्रवी वाटणारे शब्द वापरुन लोकांची दिशाभूल होईल या भ्रमात संघानेही राहू नये. आदिवासी ऐवजी वनवासी शब्द का यामागेही सांस्कृतीक कुटील कारस्थान आहे. वैदिक आर्य बाहेरचे नसून येथलेच आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी जगभर वापरला जाणारा आदिवासी हा शब्द टाकत वनवासी हा शब्द जाणीवपुर्वक घेतला. थोडक्यात संस्कृत्यांचे अपहरण करण्याच्या नादात ते संस्कृत्यांचा इतिहासही बदलत आहेत.

मी चेम्बूर येथे झालेल्या भारतीय साधनसंपत्ती परिषदेत बोलतांना अवैदिकांनी आपल्या सांस्कृतिक अभ्यासाकडे आता तरी डोळसपणे वळाले पाहिजे हे आवाहन केले होते. आपल्याला संस्कती पळवली गेलीय आणि तिला वैदिकतेची पुटे चढवलेली आजच पहायला मिळत आहेत.

मग बाबासाहेबांच्या विचारांशी, घटनात्मक मुल्यांशी ज्या विचारसरणीचा काडीमात्र संबंध नाही, त्यांनी बाबासाहेबांचेही "समरसीकरण" केले आणि काहे दशकांनंतर तेच कायम राहिले तर नवल वाटायचे काहीएक कारण नाही.

आम्हाला स्वातंत्र्यासहितची समता आणि बंधुता हवी आहे....

समरसता नव्हे!

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...