Tuesday, September 29, 2015

शून्य महाभारत...



१९९१ सालची गोष्ट आहे. मी तेंव्हा औंध येथे राहत होतो. माझे एक प्रकाशक मित्र आणि मी एके सकाळी औंधमधीलच त्यांच्या एका मित्राला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यात माझा सहभाग काहीच नसल्याने हालचे निरिक्षण करत होतो. नजर भिंतीवरील क्यलेंडरवर पडली. त्यावर एक चित्र, अनेकदा आधीही पाहिलेले, कृष्ण गीता सांगतोय आणि अर्जून अत्यंत विनम्रतेने गुढग्यावर बसून ऐकतोय.
मी त्या चित्रात जरा गुंगून गेलो. क्षणात असे वाटले कि समजा महाभारत युद्धात कृष्ण जर कौरवांच्या बाजुला गेला असता तर? बरे, त्यात अशक्य काहीच नव्हते.

कृष्णाकडे मदत मागायला दुर्योधनही गेला होता आणि अर्जुनही. आधी कोण आले यावर निकाल न देता आधी कोणाला पाहिले यावर कृष्णाने आपली सेना आणि शस्त्र हाती न घेणारा कृष्ण यात निवड करायला अर्जुनाला सांगितले. पण आधी आला होता तो दुर्योधन. समजा पहिला प्रश्न दुर्योधनाला विचारला असता तर आणि त्याने कृष्णालाच मागून घेतले असते तर?

या कल्पनेने मला अनेक वर्ष झपाटले. शेवटी ९७-९८ मद्ध्ये कधीतरी ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. तत्वज्ञान किती निसरडे आहे आणि गतकाळातील त्याच घटना याचे बाजू बदलताच संदर्भ कसे बदलतात आणि नवी गीताही कसा आकार घेऊ शकते याचे विदारक दर्शन मी अवघ्या शंभरेक पानांत केले. द्रोण, भिष्म आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे द्रौपदीची चिरवेदना अभिव्यक्त केली. नवी गीताही लिहिली. पांडवांचे कृष्णाने बदललेल्या भुमिकेवरचे जे बदललेले विचार आहेत ते मानवी तळाला ढवळून काढणारे आहेत.
मानवी जीवन आणि त्याकडे पहायचे आपले दृष्टीकोन हे स्थायी नसतात. क्षणभंगूर असतात. आपल्याला जे प्रिय वाटते ते प्रिय वाटायला लावलेही गेलेले असू शकते. शेवटी मानवी जीवन काय आहे?

विभ्रमांतील भ्रम आणि आपण तरीही किती उरफोड करत आपल्यालाच सत्य माहित आहे असा आव आनत असतो! जीवन त्यामुळेच विलक्षण आणि जगण्यायोगे बनून जाते...

शून्य महाभारत...

यातुनच मानवी कोलाहलाची अंतिम शुन्यता मी दाखवली आहे!

(नवीन आवृत्ती प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केली आहे व तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. वाचकांच्या मेल्स आनंद देवून जातात. लोक विचार करत नाही, तळगर्भात जायचा प्रयत्न करत नाहीत हा समजही भ्रम या सदरात मोडतो!)

Monday, September 28, 2015

आम्हाला सत्य का नको आहे?

ज्ञानाची रचना हे जगातील उपलब्ध ज्ञान समजावुन घेतल्याखेरीज होणार नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली कारण प्राकृत, संस्कृत, अरबी, चीनी ते पार आपल्याल माहितही नसलेल्या भाषांतील उपलब्ध प्राचीन साहित्य, शिलालेख ईईई सर्व त्यांनी आपल्या भाषेत तर नेलेच पण त्यावर अभ्यासपुर्ण प्रस्तावना/विश्लेशने लिहिली. कथासरित्सागर असो कि गाथा सप्तशती, मीदोज ओफ़ गोल्ड हे अल मसुदीचे प्रवासवर्णन असो कि रिचर्ड बर्टनचे अरेबियन नाइट्स....अगणित उदाहरणे आहेत. त्याहीपेक्षा उत्खनने, पुराणवस्तुंचे संशोधन यात युरोपियनांनी आघाडी घेतली. नियाच्या Aurel Stein यांनी शोधलेल्या प्राकृत भाषेतील (ज्या पुरातन मराठीशी साधर्म्य दाखवतात) पाट्या असोत कि बुद्धिस्ट स्तूप...यातही त्यांनी आघाडीच घेतली. एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये अनुवाद करण्यासाठी काय कष्ट उपसले हे पाहिले तर थक्क आणि नतमस्तक व्हायला होते. ते जाऊद्या, आपल्याच येथल्याच खरोष्टी आणि ब्राह्मी लिपीतील लेख शोधून ते वाचायला ब्रिटिशच आले होते. येथले मुखंड त्यात कामी आले नाही.
जिज्ञासा म्हणजे काय हे तर त्यातून दिसतेच पण आपल्याला आपली शरम का वाटायला हवे तेही यातून ठळक होते. आम्ही आमचे काही जतन करण्याचा प्रयत्न करणे तर दूर त्याचे वाटोळे कसे करता येईल हे पाहण्यात आम्ही धन्यता मानली. १८८३ साली प्रसिद्ध झालेले मल्हारराव होळकरांचे मराठी चरित्र मला टोरोंटो विद्यापिठाच्या वेबसाईटवर डिजिटल स्वरुपात मिळाले....भारतात नाही. आम्ही फक्त पुरातनाचा गवगवा करण्यात धन्यता मानली. बोगसपणा करत "आमचे वेद किती पुरातन आहेत आणि राम किती जुना..." याच्या छातीफोड गप्पा हाणण्यात धन्यता मानली. प्रसंगी खोटेपणा व फोर्जरीचाही वारेमाप उपयोग केला. सिंधू संस्कृतीच्या मुद्रांतही अशीच फोर्जरी करुन जगभर लाज घालवली. वैदिक विमानांचे लाज काढणारे प्रकरण तर अगदीच अलीकडचे.
कशाला हे? आम्हाला सत्य का नको आहे? आम्हाला ज्ञान का नको आहे? आम्हाला जागतिक ज्ञानावर कुरघोडी करायची असेल तर आमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवायला हव्यात हे का समजत नाही? आम्ही डिजिटल ईंडियाच्या नव्या थापा सुरू केल्या आहेत...पण आम्ही त्यात ०.१% सुद्धा पुढे सरकलो नाहीत हे वास्तव काय सांगते? कोठे मेलीत आमची विद्यापीठे आणि कोठे डुबल्यात त्यांच्या कोट्यावधीच्या ग्रांटी? टुकार गमजा मारत जगणारी गांडुळे फेसबुकापुरत्या डरकाळ्या फोडतात, एवढीच आमच्या जगण्याची फलश्रुती आहे कि काय?
भिकारचोट रिकामटेकडेपणा भारतात किती आहे ते व्यस्त आणि व्यस्त असलेल्या व्हाट्सप ते फेबुवरुन दिसतेच. हे लोक त्याच इंटरनेटचा उपयोग आहे त्या ज्ञानासाठी किती करतात हा प्रश्न विचारला तर उद्वेगजनक उत्तर मिळेल. पण प्रश्नच विचारायचे आम्ही विसरून गेलोत. आणि आमच्याकडे सारीच उत्तरे आहेत या शेखचिल्ली स्वप्नांत दंग राहत थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे याची जाण घालवून बसलोत.
आमचे सारे काही असे आहे...म्हणून काहीच नाही. गतकाळातल्या गमजा थापा मारून टिकत नाहित. आणि अशा लोकांना भविष्यकाळ काय असणार?

Saturday, September 26, 2015

जनांचा राम जनांचाच रहावा...



वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे कि राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही पुष्कळ संशोधन करण्याचे प्रयत्न झाले आहेत. रामायणातील ग्रह-नक्षत्रस्थितीनुसार प. वि. वर्तकांनी रामजन्माची तारिख इसपू ४ डिसेंबर ७३२३ अशी काढली होती. कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलिकडे नेत नाहीत. भारतीय पुरातत्ववेत्ते एच. डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत. पण अलीकडेच इंस्टिट्यूट ओफ सायंटिफ़िक रिसर्च ओन वेदाज या संस्थेने प्ल्यनेटोरियम संगणक प्रणाली वापरत रामाचा जन्म इसपू १० जानेवारी ५११४ रोजी झाल्याचा दावा केला आहे. हे विधान शास्त्रीय वाटत असल्याने, संगणक-प्रणालीवर आधारित असल्याने रामकाळ पुरातन आहे असे सिद्ध झालेच आहे असे समजून "वैदिक" आनंद वाढला असल्यास आश्चर्य नाही. पण हे "संशोधन" प्रसिद्ध होताच वैदिक गोटातुनच वैदिक ज्योतिषवेत्ते श्री. नर्तक गोपाळ देवी दासी यांनी रामायणातीलच ग्रह-नक्षत्र पुराव्यांवरूनच १० जानेवारी ही तारिख चुकीची आहे असे दाखवून देत  संगणक प्रणालीत काहीतरी विसंगती आहे असे प्रतिपादन केले आहे. म्हणजे रामायणातील एकाच उल्लेखावरून केली गेलेली गणिते वेगवेगळे निष्कर्श देतात हे कसे याचे उत्तर मिळत नाही.

असो. भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्न करण्याची हौस आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलिकडे जात नाहित हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खो-यातील काही लोकांनी गंगेच्या खो-यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पुर्वी हा भाग ग्रामीण संस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी. बी. लाल यांनी केलेली उत्खनने त्यासाठी अभ्यासयोग्य आहेत. रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पुर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते. तरीही आपण या तारखेच्या दाव्याचा रामायणातीलच प्रमाणांच्या आधारावर पुनरावलोकन करु.

पहिली अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आता जे वाल्मिकी रामायण आपल्यासमोर आहे त्यातील बालकांड व उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असे बव्हंशी विद्वानांनी मान्य केले आहे. यातील रामाचे दैवतीकरण, जे अन्य कांडांत आढळत नाही ते या दोन्ही कांडांत असून भाषाशैलीही वेगळी आहे. शिवाय रामायणाचे अखेरचे संस्करण इसवी सनाच्या चवथ्या शतकात झाले अशीही विद्वमान्यता आहे.

रामाचा जन्म पुनर्वसू नक्षत्रावर पाच ग्रह उच्चीचे असतांना चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी माध्यान्ही झाला असे प्रक्षिप्त व उत्तरकालीन रचना असलेल्या बालकांडात नमूद आहे. जानेवारी महिन्यात चैत्र येवू शकत नाही हे उघड आहे. म्हणजेच प्रक्षिप्त असलेल्या बालकांडातील एक तर तिथीच चुकीची आहे किंवा १० जानेवारी ५११४ ही तारिख तरी समूळ चुकीची आहे. म्हणजे, तिथी बरोबर असेल तर १० जानेवारी ही तारिख येणार नाही आणि तिथीच चुकीची असेल तर, कितीही काटेकोर असले तरी, संगणकीय उत्तरांना अर्थच राहणार नाही. ही गफलत आधी विचारात घ्यायला हवी आणि म्हणूनच वैदिक ज्योतिषीही ही तारीख मान्य करत नाहीत.

दुसरे म्हणजे ग्रहांची समस्या. भारतियांनी राशी व ग्रह हे ग्रीकांकडून घेतले. वेदांमद्ध्ये ग्रहांचा निर्देश नाही. वैदिक साहित्यात नाक्षत्र कालगणना आहे. ग्रहाधारित पंचांग प्रथम "यवनजातक" या अनुवादित पुस्तकातून प्रथम आपल्याकडे आले ते इसवी सनाच्या दुस-या शतकात. रामायणातीत तिथी ही ग्रह-नक्षत्राधारित आहे. भारतियांना ग्रह-राशीच इसवी सनापुर्वी माहित नव्हत्या तर "पाच ग्रह उच्चस्थानी असता..." हा उल्लेखच उत्तरकालीन आहे, ग्रीकांशी संपर्क आल्यानंतरचा आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच ही तिथी "बनवण्यात" आली असून ती मुळात वाल्मिकीची नाही. बनावट तिथीवरून शोधलेली कोणतीही प्रमाणे बनावटच असणार हे उघड आहे.

याशिवायचे महत्वाचे प्रमाण म्हणजे रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणुसच कोठे होता? युगसंकल्पना मोहक असली तरी भ्रामक ठरते ती यामुळेच.

आता आपण रामसेतुकडे वळू. रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा तरंगत्या पाषाणांचा पूल वानरसेनेने बांधला अशी एक श्रद्धा आहे. श्रद्धेचे वास्तवाशी काही घेणेदेणे असतेच असे नाही. हा वालुकाष्मांनी बनलेला पुल मानव निर्मित नाही. मानारच्या उथळ सामुद्रधुनीतुन जाणारी ही रांग एके काळी श्रीलंका भारतीय उपखंडाशी जोडला होता असे दर्शवते. नासानेसुद्धा २००२ साली हा पट्टा नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही असेच म्हटले होते. कार्बन डेटींगनुसार या सेतूचे वय साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणने मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरेल हे उघड आहे.

आता आपण खुद्द रामायणातील विसंगत्यांचा वेध घेऊयात. रामायणाच्या उपोद्घातातच, एकदा नारदमुनी भेटायला आले असता वाल्मीकी त्यास विचारतात कि, "हे मुनिश्रेष्ठा, सांप्रत पृथ्वीवर गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवचनी आणि कोपला असता देवांतही भिती उत्पन्न करणारा असा गुणसंपन्न पुरुष कोण आहे?" यावर नारदमुनी म्हणतात, "इक्ष्वाकू वंशात जन्मलेला राम हा तुम्ही विचारता तसा आदर्श पुरुष आहे." वाल्मीकींच्या विनंतीवरुन नारदाने रामचरित्र सांगितले. नंतर क्रौंचवधाची घटना घडली व आदिकाव्य जन्माला आले. तदनंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वाल्मीकीने रामकथा लिहायला घेतली. या काव्याचे मुळचे नांव "पौलत्स्यवध" असे होते. यावरून एक बाब दिसते ती अशी कि वाल्मीकीला नारदाने सांगेपर्यंत रामकथा माहितच नव्हती. पण प्रत्यक्ष रामायणात वाल्मीकी हेही एक प्रत्यक्ष घटनांत भाग घेणारे पात्र आहे. म्हणजे वाल्मीकीला राम माहितच आहे. असे असतांनाही उपोद्घातातील कथा येते ही मोठी विसंगती नाही काय? मुळच्या वाल्मीकी रामायणातही फार मोठे फेरबदल केले आहेत याचेच ही विसंगती म्हणजे निदर्शक आहे.

शिवाय रावणाची लंका कोणती यावरही अनेक विद्वानांनी संशोधन केले आहे. माधवराव किबे यांचे म्हणने असे आहे कि रामायणातील लंका ही श्रीलंका नव्हे कारण रामायणाचा सारा अभ्यास केल्यानंतर रामाचा एकुण प्रवास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त झाल्याचे दिसत नाही. विंध्य पर्वताच्या अमरकंटक शिखराच्या आसपास छत्तीसगड भागातच ही लंका वसली असावी. या भागातील अनेक आदिवासी जमाती स्वत:ला रावणाचे वंशज म्हणवून घेतात हेही येथे उल्लेखनिय आहे. पुरातत्ववेत्ते एच. डी. सांकलियाही रामायणातील लंका ही विंध्य पर्वतराजीतील एखाद्या मोठ्या तलावापारची वा नदीपारची नगरी असावी असे मत व्यक्त करतात. आपली मते सिद्ध करण्यासाठी त्यांनी रामायणांतर्गतच येणा-या वर्णनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे रावणची लंका नेमकी कोणती हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो हेही येथे लक्षात घ्यायला पहिजे.

खरे म्हणजे मूळ रामकथा ही एक वीरकाव्य (पवाडा) अथवा लोककथा स्वरुपात जनमानसात लोकप्रिय होती असे आता अनेक विद्वान मानतात. तिची विविध प्राकृत संस्करणेही वेगवेगळ्या भागांत प्रचलित होती. वाल्मीकीने त्यांचे संकलन करत आपल्या प्रतिभेने इसवी सनाच्या दुस-या किंवा तिस-या शतकात रामकथा पाच कांडांत फुलवली. या कांडांत राम दैवी अवतार असल्याचे कसलेही सुचन नाही. "पौलत्स्यवध" या नांवावरुन त्यात रावणाच्या मृत्युच्या घटनेपाशीच ही कथा संपत होती असे दिसते. गुप्तकाळात वैष्णव संप्रदायाला जोर चढल्यानंतर त्याला बालकांड व उत्तरकांड जोडण्यात आले व रामाचे दैवतीकरण करण्यात आले.

अन्य भागांतही महाकाव्य स्वरुपात प्राकृत भाषांतही व जैन-बौद्ध धर्मिय साहित्यातही रामकथा प्रचलित होती. पण प्रत्येक ठिकाणी रामकथेने वेगवेगळी रुपे घेतली. ती त्यांना उपलब्ध असलेल्या मुळ वीरकाव्याच्या प्रादेशिक/भाशिक रुपांतरांच्या आधारावर वेगवेगळी बनली. उदाहरणार्थ बौद्धांच्या अनामकजातकात सीतात्यागाचा उल्लेख नाही. जैन रामायणातही वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक प्रसंग आहेत. शिवाय वाल्मिकी रामायणाचेही अनेक पाठभेद आहेत. सध्या भांडारकर प्राच्य विद्यामंदिराने तयार केलेले रामायणाचे एक प्रमाणित संस्करण उपलब्ध आहे.

वरील सारांशरुपाने केलेले विवेचन पाहता, बालकांडातील तिथी प्रमाण मानून जी तारीख काढण्यात आलेली आहे ती विश्वसनीय ठरत नाही. राम ही अगदी ऐतिहासिक व्यक्ती होती असे गृहित धरले तरी ती मुळात महाकाव्यातून नव्हे तर लोककाव्यातून लोकप्रिय झालेली व्यक्ती आहे हे स्पष्ट दिसते. लोकप्रिय लोककथांवर/जनकाव्यांवर महाकाव्याचे साज आपापल्या प्रतिभेने महाकवींनी चढवले आहेत, पण काल्पनिकतेत सत्य व कथेचे मूळ हरवून जाते. त्यामुळेच विविध रामकथांत विसंगत्या व कथावस्तुत फरक दिसतात. राम ही सर्व भारतियांत सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे हे सत्यच आहे. जवळपास प्रत्येक गांवात वनवासाच्या काळात राम-सीता येवून गेलेले असतात. सीता न्हाण्याही असतात. महिलांच्या ओव्यांतुनही राम-सीता असतात. राम-सीतेची ही लोकप्रियता संस्कृतातून प्राकृतात आलेली नसून प्राकृत लोकसाहित्यातुनच आलेली आहे असे स्पष्टपणे म्हणता येईल. आपापले अजेंडे राबवण्यासाठी रामकथेचा गैरवापर करत स्युडो-सायंसचा वापर करत रामाचा काळ कितीही मागे न्यायचा प्रयत्न केला तरी तो विश्वसनीय असू शकणार नाही, कारण ज्या पायावर हे प्रयत्न होतात तेच मुळात ठिसूळ आहेत. जनांचा राम जनांचाच रहावा...त्याला अजेंड्याचे आयुध म्हणून वापरू नये एवढेच या निमित्ताने म्हणता येईल!

-संजय सोनवणी

(आज महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.)

Friday, September 25, 2015

असुरक्षिततेकडून कट्टरतेकडे...!

भय हा मानवी जीवनाला आदिम काळापासून बळकट मिठी मारून बसलेला घटक आहे. आदिम भय हे नैसर्गिक प्रकोप, सृष्टीतील अनाकलनीय घडमोढी, वन्य प्राणी ते अंध:काराच्या गुढगर्भात लपलेल्या काल्पनिक अदृष्य अशा शक्तींचे जसे होते तसेच स्त्रीच्या जननशीलतेचे कोडे माहित नसल्याने स्त्रीबद्दलही होते. मृत्यू कधीही केंव्हाही जीवन हिरावून घेते त्यामुळे मृत्यूभय तर सर्वव्यापी बनले. जीवनातील अकल्पनियता, अनिश्चितता याने आदिम काळापासून ग्रासलेला मानूस आजही त्यातून सुटला नाही.

धर्माची निर्मिती झाली तीच मुळात या भयावर मात करण्याचे उपाय शोधायला. माणसाने सुष्ट शक्तींना देव मानत त्यांची अर्चना केली. त्यांना बळी दिले तर दुष्ट शक्तींचा नायनाट होईल या भावनेने त्याने आदिम कर्मकांड निर्माण केले. प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धती बनवल्या. आपलीच दैवते श्रेष्ठ कशी हे सिद्ध करण्यासाठे त्याने अन्य मानवी टोळ्यांनाही वेठीला धरले. कधी आपली दैवते लादली तर शत्रू प्रबळ असेल तर त्याची स्विकारली. भयाची एक दुसरी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया असते व ती म्हणजे स्वत:ला भयमुक्त दाखवण्याची केविलवानी धडपड. जर दैवी शक्ती श्रेष्ठ आहेत व ज्याचे अपत्य मानव (म्हणजे आपले लोक) आहेत असे मानतो तर आपणही इतरांचे जीवन आपल्या कह्यात त्यांना जिंकून आणू शकतो ही भावना जगभरच्या लोकांत प्रबळ दिसते ती यामुळेच. धर्माचा, देवतांचा जन्म ही मानवी भयाची अपरिहार्य उपज होय. भयावर मात करण्यासाठी, आयुष्य़रेखा अचानक खंडित होऊ नये यासाठी देवतांची त्याला गरज होतीच. आणि देवतांना संतुष्ट करायचे तर कर्मकांडेही आवश्यक. यामुळे यातुनच धर्माची निर्मिती झाली असे आपल्याला दिसते. आदिम काळी टोळीगणित धर्म होते. टोळीगणिक म्रूत्युनंतरच्या जीवनाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. महाराष्ट्रातील आदिम दफनांत मयताचे घोट्यापासून पाय तोडून मगच दफन केले जाई असे उत्खननांतुन दिसते. मृताचे भूत नंतर चालत परत येऊ नये अशी कल्पना त्यामागे असावी. म्हणजे मृतांबद्दलचेही जीवंतांना भय होतेच!

नैतिकता ही समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेली दुसरी अपरिहार्य बाब. स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, एकमेकांत चोरी करावी कि नाही, शत्रु असेल तर त्याची चोरी केलेली चालेल कि नाही, स्वटोळीअंतर्गत एखाद्याने खून करणे, त्याची संपत्ती लुटने न्याय्य कि अन्याय्य, न्याय्य असेल तर कोणत्या स्थितीत आणि अन्याय्य असेल तर कोणत्य स्थितीत, जिंकलेल्या गुलामांचे काय करायचे, जिंकलेल्या धनाचे वाटप कसे करायचे....या बाबतीतही नियमन गरजेचेच होते. कारण त्यावरून होणा-या संघर्षात टोळीअंतर्गतही अव्यवस्था माजत होती. नीतितत्वे व त्यातुनच जन्मलेले आदिम कायदे टोळीअंतर्गत संघर्षाने सुरक्षितता धोक्यात येवू नये म्हणून आवश्यक बनून गेली. यातुनच हळुहळू राजव्यवस्था/गणराज्यव्यवस्थांचा उदय झाला हे खरे असले तरी मानवी आदिम भयाने माणसाची पाठ कधीच सोडली नाही, कारण नित्याने अनुभवायला येणा-या असुरक्षिततेला त्याला कधीच तोडगा सापडला नाही.

मानवी तत्वज्ञानाचा जन्मच मुळी या अनिश्चिततेची कारणे शोधत त्यावर तात्विक उपाय शोधण्यासाठी झाला. कोणत्यही धर्माचे आदिम तत्वज्ञान हे मृत्यूभोवतीच फिरते, अनिश्चिततेभोवतीच फिरते हा योगायोग नाही. हे जग माया आहे, मिथ्या आहे असे तत्वज्ञान जसे उगवले तसेच भरपुर मजेत जगुन घ्या...स्वर्ग नाही कि नरक नाही असेही सांगत जीवनाला आधार देणारे तत्वज्ञ होतेच. ग्रीक तत्वज्ञ हे नहमीच जडवादी राहिले व भयावर मात करण्यासाठी त्यांनी निसर्गालाच वापरुन घ्यायचे ठरवले. त्याउलट भारतीय तत्वज्ञान हे बव्हंशी परलोकवादी, अध्यात्मवादे व भक्तीवादी राहिले. कोनते तत्वज्ञान श्रेष्ठ हा येथे मुद्दा नसून मानवी जीवनाला भयावर मात करण्यासाठी कसे सामोरे जायचे यासाठी लावल्या गेलेल्या या सोयी होत्या. कर्ताकरविता परमेश्वरच असल्याने जेही काही घडते ते पुर्वनियोजितच असते हा नियतीवाद ग्रीकांत होताच. म्हणजे जे घडणार ते अटळ आहे, ते ठरलेले आहे व त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे एकदा ठरल्यावर परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही. भारतियांनी पूजा, भक्ती, जप-तप यातून विधीलिखित बदलता येते, मोक्षाचा मार्ग गाठता येतो या श्रद्धेवर भयावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मकांडांची रेलचेल वाढणे स्वाभाविकच होते.

परंतू येथे हे लक्षात घ्यायला पाहिजे कि धर्माने अथवा तत्वज्ञानाने वा नीतिशास्त्राने मानवी भयावर आजही उतारा दिलेला नाही. अनिश्चितता आणि असुरक्षितता यातून कोणीही मूक्त झाला नाही. देव-धर्मावर हल्ला करणारे पुरोगामी जर या असुरक्षिततेच्या भावनेला सुयोग्य पर्याय देवू शकले असते तर देवा-धर्माची गरजही लोकांना पडली नसती. तसा पर्याय न देताच केवळ नकारात्मक टीका करत ते जातात तरीही ९९.९९९९९% लोक कोणत्या ना कोणत्या प्रमाणात धार्मिक/श्रद्धाळू राहतात असे का याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.

असुरक्षितता

माणसाला प्रत्यही अगणित घडामोडींतून जावे लागते व बहुतांशी वेळा त्याचा ज्या घडामोडींशी संबंधही नसतो अशा घडामोडींतून निर्माण होणा-या स्थितीचे लाभ-तोटे सहन करावे लागतात. म्हणजे पुढच्या क्षणी नेमके काय होनार आहे याचे निश्चित गणित त्याच्याकडे नसते. तो गरीब होणार कि श्रीमंत, तो जीवंत राहणार कि मरणार यापासून आज बायको/पती तरी कसे वागणार...हे प्रश्न कधी उघड तर कधी सुप्त पातळीवर त्याच्या मनात चालुच असतात.

बरे, हे व्यक्तीपुरते मर्यादित नसते. समाज एकमय अभंग असा कधीच नसतो. असावा हे नैतिक स्वप्न झाले. पण प्रत्यक्षात तो जात, धर्म, वंश, विचारधारा, पंथ, देवता, नास्तिकता, पुरोगामित्व, राजकीय पक्ष, व्यावसायिक तथा कामगार संघटना वगैरेंमद्ध्ये सुद्धा विचित्रपणे विभागलेला असतो. समजा एखादी व्यक्ती अमूक धर्माची व दुसरी दुस-या धर्माची. धर्म म्हनून ते स्वाभाविकपणे दोन वेगळ्या पातळ्यांवर वाटले गेलेले असतात. पण व्यावसायिक संघटना म्हणून दुस-या धर्माची व्यक्ती व एका विशिष्ट धर्माची व्यकी समव्यावसयिक असेल तर तिथे दोघे मात्र व्यावसायिक हितासाठी एकत्र येतात. आधी धर्मिक कारणांसाठी ते विरोधी पातळीवर असतात तर दुसरीकडे व्यावसायिक हितासाठी मात्र एकत्र असतात. हा विरोधाभास आहे आणि मनुष्य प्रत्यही या विरोधाभासात जगतो. कारण त्याला धार्मिकही हित हवे आणि व्यावसायिकही.

आणि नेमके या हितसंबंधातच जेंव्हा संघर्ष होतो तेंव्हा मनुष्य धर्म/जात/पंथ संघटन निवडतो....व्यावसायिक क्वचित. असे नेमके का होते यावर विचार करायला हवा. खरे तर व्यवसाय ऐहिक सूख देणारी प्रत्यक्ष बाब झाली. धर्म/जात/पंथ/विचारधारा नाही. धर्माच्या नांवाखाली अब्जधीश व्यावसायिक असो कि मजूर, खांद्याला खांदा लावून संघर्षात उतरु शकतात एक वेळ, पण व्यवसायांच्या नांवाखाली नाही. कारण हितसंबंधांचे वेगळेच कडबोळे जन्माला आलेले असते.

धर्म/देवतांची निर्मिती भयापासून मुक्तता करण्यासाठी झाली हे जरे खरे असले तरी धर्मही मानसाचे भय वाढवण्यात हातभारच लावत राहिले आहेत हेही आपण सहज पाहू शकतो. धर्माचे काम म्हणजे मानसाला खरे स्वातंत्र्य बहाल करत त्याला जीवनाचे सौंदर्य उलगडून दाखवत वस्तुत: भय अस्तित्वात नसू न त्या मिथ्या कल्पना आहेत हे समजावून सांगण्यासाठी व्हायला हवा होता. पण धर्माने उलत अधिकाधिक बंधनेच निर्माण केली असे आपण इतिहासात डोकावता पाहू शकतो. युरोपातील प्रबोधनाची चळवळ धर्माच्या अतिरेकी बंधनांच्या विरुद्ध उमटलेली बुद्धीवादी प्रतिक्रिया होती. धर्माने माणसाने कोणते कपडे घालावेत, काय खावे-काय प्यावे यापासून ते कय पहावे यावरही बंधने आणत त्याला भयमुक्त नव्हे तर भययुक्त करण्याचा चंग बांधला. पण ज्यांना धर्म हाच आपला तारणहार, मुक्तिदाता वाटतो त्यांनी ही बंधने विनातक्रार स्विकारली. जे बुद्धीवादी होते त्यांनी यातील भंपकपणा ओळखला. त्यांची चूक ही झाली कि त्यांना, ज्यामुळे धर्म निर्माण झाले ते भय, याला सक्षम पर्याय त्यांना देता आला नाही. जोवर मानवी जीवनावर पुढच्या क्षणाला काय होईल या असुरक्षिततेचे, अनिश्चिततेचे सावट आहे तोवर त्याला मानसिक आधाराची गरज आहे ही जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्यामुले धर्म विरुद्ध बुद्धीवाद हाही संघर्ष जगभर उभा राहिला आहे. दोन्हीही बाजू बव्हंशी टोकाच्या असून यात सर्वसामान्य मानसांची ससेहोलपट होते याचे मात्र भान उभय पक्षी नही हेही एक वास्तव आहे.

विज्ञानामुळे धर्माची गरज कमी होईल हा भ्रमही दूर झाला आहे. मंगळयानाच्या प्रक्षेपणाआधी इस्रोच्या शास्त्रज्ञांनीच तिरुपतीला जावून प्रार्थना केली होती ही घटना या संदर्भात बोलकी आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल कि नाही हे अनिश्चितता शास्त्रज्ञांतही असल्यामुळे त्यांनीही अखेर दैवी शक्तीलाच शरण जायचे ठरवले असेल तर येथे एक विरोधाभास व द्वंद्व दिसते. खुद्द भौतिकशास्त्रात अनिश्चिततेचे तत्व हे मुलकणांच्या वर्तनासंदर्भात वापरले जाते. मानवी मानसिकतेवर तर याचा प्रचंड पगडा आहे. पण या मानसिकतेचा फायदा धर्मवादी खुबीने करुन घेत माणसांनाच नागवतात, अधिक असुरक्षित करुन सोडतात हेही तेवढेच खरे आहे.

याचे कारण मुळात आपल्या आदिम भावनांत आहे. असुरक्षिततेचे कारण आपण मुळात ऐहिक घटनांत न शोधता पारलौकिक घटनांत शोधतो याची आपल्या जागृत मनाला अनेकदा जाणीवही नसते. ऐहिक घटनाच एवढ्या अनेकदा अनाकलनीय असतात कि त्यांचे निरपेक्ष विश्लेशन करण्यात माणूस अयशस्वी होतो अथवा तसा प्रयत्न तो करत नाही.  याचीच एक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून तो घटनांवरच आपले अधिकाधिक नियंत्रण कसे राहिल या प्रयत्नांना लागतो. मग ते आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, राष्ट्रीय असेल, धार्मिक असेल, जातीय असेल किंवा पंथिक. यादी मोठी होऊ शकते. परंतू किमान काही लोक आपल्या भयातूनच वेगळा मानसिक नृशंसपणा जन्माला घालतात व वेगळ्याच गुलाम्या लादण्याचा प्रयत्न करत अन्य घटकांत वेगळीच असुरिक्षतता उत्पन्न करण्याच्या मागे लागतात. आणि यातून कोणताही घटक कसा सुटत नाही हे आपण सध्यकालातील काही घटनांचा आढावा घेत पाहुयात.

संघटन का होते?

आदिम काळात माणूस टोळ्या करून रहायचा ही त्याची अपरिहार्यता होती. पण टोळी म्हणजे संघटनच असते. हे संघटन बाहेरुन होणा-या हल्ल्यांना संघटितपणाखेरीज तोंड देता येणार नाही यातुनच होते. अगदी राजे, सरदार यांचेही संघ कसे असायचे हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. महाराष्ट्रातील "राजमंडळ’ हा प्रयोग अशाच समविचारी नसले तरी सम-उद्दिष्टांना साध्य करणा-यांचा संघच होता. कार्ल मार्क्सनंतर श्रमिक-कामगारांचेही संघ बनायला लागले. भारतात जातीय/धार्मिक/पंथीय संघ पुर्वांपार होतेच. प्रत्येक संघाचे शत्रुसुद्धा ठरलेले असत. किंबहुना शत्रु असल्याखेरीज संघ बनत नाही हेच संघाच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण आहे. संघ हे अभेद्य राहतात असेही नाही. प्रसंगोपात्त त्यांच्यातही फूट पडते. आपापसातही संघर्ष उभे राहतात याचीही जगभरातील अनेक उदाहरणे आहेत.

बरे, कोणते ना कोणते तत्वज्ञान हे कोणत्याही संघाचा आधारभूत पाया असतो. त्यात अलौकिक, उदात्त अशी वाटणारी ध्येये जशी असतात तशी ऐहिक विचारसरणीही असते. धर्मवाद्यांचे जसे तत्वज्ञान असते तसे ते निधर्मिवाद्यांचेही असते. साम्यवाद्यांचे असते तसेच समाजवाद्यांचे व भांडवलशाहीवाद्यांचेही असते. प्रत्येक गटाला वाटते कि विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता त्यांच्याच तात्विक व ऐहिक मार्गाबाबतच्या विचारसरणीत आहे.

आणि एकदा विचारसरणीने जन्म घेतला कि अनुयायी वाढवण्याची जबाबदारीही अर्थातच आली. आणि हे सोपे नसते. म्हणजे धर्म/पंथाची झुंड "भले तरी होईल...आणि नाही झाले तरी प्रयत्न करुन पहायला काय हरकत?" या विचाराने वाढते. या झुंडीतील लोक आज दत्ताला दिसले तर उद्या तेच लोक तुळजाभवानीलाही किंवा साईबाबालाही दिसनार नाही असे नाही. पण नव्या विचारसरणीच्या लोकांना मात्र प्रयत्नपुर्वक प्रयत्न करून अनुयायी मिळवावे लागतात. मिळवले तर ते टिकवावेच लागतात. कम्युनिस्टांनी त्यासाठे केवढे उपद्व्याप केलेत हा आता जागतिक इतिहास आहे. असो.

पण मुळात संघटन होण्यामागे मानवी जीवनातेल असुरक्षितता आहे व त्यावर मात करण्यासाठी माणूस धर्म किंवा विचारधारा यांच्याशी अक्षरश: "नियतीशरणता" दर्शवतो हे वास्तव नाही काय? देव/धर्म मानणारे व देव/धर्म न मानणारे यांच्या संघटनांत मौलिक भेद नाही कारण दोन्हींचा जन्म मुळात मानवाला मुक्ती/मोक्ष देत संकटमूक्त करण्यासाठी होत असतो. किंबहुना वरकरणी तरी ते तसे दाखवण्यात यशस्वी होतात. खरे हेतू काहीही असोत. स्वत: भारतातील बाबा-साध्व्या अत्याचार करत जात कोठडीबंद होतात. म्हणजेच स्वत:चे जीवन जे सुरक्षित करु शकले नाहीत ते दुस-यांचे काय करणार? पण अनुयायी हे समजावून घेण्याच्या मानसिकतेत नसतात. किंबहुना अनुयायांची विचारशक्तीच या मंडळीने एवढी खंडित केलेली असते कि त्यांच्या विवेकाचा मृत्यू झालेला असतो. अशा स्थितीत ज्या बाबींनी  धर्म अथवा अन्य संघ निर्माण केले त्या बाबीचे निराकरण कसे होणार?

पण सर्वात महत्वाची बाब येथे समजावून घ्यावे लागते. एक संघटन होते तिचा स्वसंघटनेतील लोकांच्या हिताचा जरी असला तरी परसंघटनेतील हिताचा नसतो तर ते उध्वस्त व्हावे, नष्ट व्हावे हाच असतो. या द्वैतातून जो संघर्ष निर्माण होतो तो आपण सोव्हियेट रशिया व अमेरिका या दोन वेगळ्या, परस्परविरोधी राष्ट्रांतील दिर्घ काळ चाललेल्या शीतयुद्धातून पाहिला आहे. परस्परांनी एकमेकांना संपवण्यासाठी काय कारवाया केल्यात तेही पाहिले आहे. अण्वस्त्रस्पर्धा ही एकमेकांत भय/असुरक्षितता माजवण्यासाठीच होती हे उघड आहे. भयभितांनी भयभितांवर राज्य करण्याचा हा एक अश्लाघ्य, पण अपरिहार्य मार्ग होता असेच म्हणावे लागेल!

असुरक्षितता आणि दहशतवाद

दहशतवादही असुरक्षिततेच्या भावनांतून जन्म घेतो हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल. दुस-या विरोधी गटाला असुरक्षित वाटावे यासाठी दहशतवादी कारवाया केल्या जातात असे दहशतवादाचे मानसशास्त्र सांगते. परंतू दहशतवादीही टोकाच्या असुरक्षित भावनेतुनच निर्मण कसे होतात यावर फारसा विचार केला जात नाही. "धर्म संकटात आहे" अशी हाळी दिली कि धर्मवादी भयभित होत एकत्र येतात. मुळात संघटन अथवा झुंड ही नेहमीच भयग्रस्तांची असते. भय निर्माण करणारी समाजनिर्मित कारणे अनंत असतात. महाराष्ट्राचे एक उदाहरण घेऊ. संभाजी ब्रिगेडच्या उदयापुर्वी ब्राह्मण समाज जातीच्या आधारावर कधीही संघटित होण्याच्या प्रयत्नांत नव्हता. पण ब्रिगेडने समस्त ब्राह्मणांनाच सातत्याने विद्वेषपुर्ण टार्गेट केल्यामुळे ब्राह्मणांची संघटना बनली. एवढेच नव्हे तर ब्राह्मण जातीला अत्यंत विसंगत असे परशुरामाचे प्रतीक निवडले गेले. आम्हीही हत्यार उचलू शकतो हा संदेश त्यातून द्यायचा होता. मध्यपुर्वेतेल मुस्लिम आज ज्या संघर्षातून जात लाखोंचे बळी चाललेत त्यामागेही युरोपिय/अमेरिकन जगाने त्यांच्यात निर्माण केलेली पराकोटीची असुरक्षिततेची भावना आहे. असुरक्षिततेतुन माणसे एकत्र येतात. ते एकतर दबून जगायचा प्रयत्न करतात किंवा त्याउलटची हिंसक प्रतिक्रिया देतात. आम्ही असुरक्षित आहोत तर तुम्हीही सुरक्षित राहू शकणार नाही हा इशाराच त्यांना द्यायचा असतो.

भारतात मुस्लिम द्वेषने मुस्लिम संघटित झाले, हिंसक कारवायाही त्यांनी केल्या. ब्राह्मण द्वेषामुळे जशी ब्रिगेड अवतरली तसेच ब्राह्मणही संघटित झाले. दलित द्वेषामुळे दलितही संघटित झाले. संघटन सकारात्मक क्वचित होते. विध्वंसकता व इतर समाजघटकांवर/राष्ट्रांवर जरब बसवणे, दबाव गट निर्माण करणे, म्हनजेच इतरांत भय निर्माण करणे हेच छुपे हेतू त्यामागे असतात. उद्योजकांच्या संघटनाही काही वेगळे वागत नाहीत.

थोडक्यात सर्वांनीच सर्वांना असुरक्षिततेलाच जन्म द्यायचा घाट घातला असेल तर नैसर्गिक असुरक्षिततेवर/भयावर मात करण्याची पर्यायी साधने माणूस कसा शोधणार? देव/धर्म या कृत्रीम मार्गांनी ते साध्य झालेले नाही हे आपण इतिहासाचा आढावा घेतला तर सहज सिद्ध होते. पण वैज्ञानिक मार्गांनीही ते ध्येय साध्य होत नाही हेही तेवढेच खरे आहे. सर्वसामान्य माणूस अजून एवढा प्रगल्भही झालेला नाही कि मुळात अनिश्चितता हाच निसर्गाचा नियम आहे आणि ती कोणीही, अगदी विज्ञानही संपवू शकत नाही. भयावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीवन आहे तसे स्विकारत प्रयत्नांतून जेही साध्य करायचे ते प्रयत्न करावेत. माणसाच्या जीवनात माणसांनी ढवळाढवळ करत त्याला अधिक असुरक्षित बनवू नये. यासाठी माणसांना निरिश्वरवादी/निधर्मवादी बनवायचे घाट घालण्यापेक्षा माणसांना माणसांचे मानवी जीवन सामाजिक व कायद्यांच्या चौकटीत जगण्याचे स्वातंत्र्य द्यावे. पुरोगामी म्हणवणारे स्वत:चे संघ बनवतात.

श्रद्धेचे मुळकारण समजावून न घेता त्यामुळे प्रा. शेषराव मोरे जर "पुरोगाम्यांचा दहशतवाद" अशी सज्ञा वापरत असतील तर तो त्यांचा दोष नाही. पुरोगाम्यांचा आहे. माणसाला प्रगल्भ करणे, विचारी बनवणे हे पुरोगाम्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्या श्रद्धांवर हल्ले करण्याचा तेंव्हाच अधिकार आहे जेंव्हा तुम्ही त्यांच्या भयाच्या आदिम भावनेवर मात करण्याचा पर्याय देवू शकाल.  मनुष्य जेंव्हा प्रगल्भ होतो तेंव्हा त्यालाच देव-धर्माच्या बंधनांची गरज भासत नाही. नाहीतर जसा परंपरागत कर्मकांडांचा एक धर्म आहेच तसाच पुरोगाम्यांचाही धर्म बनेल आणि माणसाची मुलभूत समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची बनेल.

मनुष्य यावज्जीव असुरक्षित व भयग्रस्तच राहिल!

-संजय सोनवणी

(साहित्य चपराक, दिपावली विशेषांक - २०१५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)

Sunday, September 13, 2015

गांधीहत्येचा घटनाक्रम असा आहे....


१५ जानेवारी १९४८...गोडसे, आपटे, बडगे, करकरे आणि मदनलाल यांनी हिंदू महासभेच्या मुंबई कार्यालयात बैठक घेतली. नंतर दिक्षितजी महाराजांकडे त्यांनी ठेवलेली स्फोटके/शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. करकरे, आणि मदनलाल यांना दिल्लीला जाण्याचे सांगण्यात आले. गोडसे मात्र पुण्याला आला.
१७ जानेवारी १९४८....गोडसे, आपटे, बडगे आणि शंकर हे सावरकरांना त्यांच्या घरी भेटले. नंतर त्याच दिवशी गोडसे आणि आपटे दुपारी दोनच्या विमानाने दिल्लीला निघाले व साडेसात वाजता पोहोचले.
१९ जानेवारी १९४८...हिंदू महासभा भवनात गोडसे व आपटे बडगेला भेटले.
२० जानेवारी १९४८...सायंकाळच्या प्रार्थना सभेत गोडसेसहित सर्व आरोपींच्या समक्ष मदनलालने स्फोट केला. लगोलग सारे कानपुरला रेल्वेने पळाले.
२२ जानेवारीला सारे मुंबईला पंजाब मेलने निघाले. दुसर्या दिवशी ते मुंबईला पोहोचले. तेथे प्रथम ते आर्य पथिक आश्रमात राहिले, नंतर एका होटेलात.
२७ जानेवारीला बोगस नांवांनी त्यांनी एयर इंडियाचे बुकिंग केले. त्याच दिवशी दिल्लीला पोचल्यावर ते ग्वाल्हेरला गेले, डा. परचुरेला भेटले. तेथेच दंडवते याने त्यांना रिव्हाल्वर दिले.
२९ जानेवारीला वेगवान हालचाली झाल्या. दिल्लीत परत आल्यावर. गोडसेने रेल्वे स्टेशनवरील विश्रामगृहात एन. विनायक राव या नांवाने खोली बुक केली. आपटे, गोडसे आणि करकरेने त्या सायंकाळच्या बिर्ला भवनमधेल सायंप्रार्थनेला हजेरी लावली.
३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी गोडसेने ३ गोळ्या झाडून सायंप्रार्थनेच्या वेळीसच बिर्ला भवनात गांधीजींची हत्या केली.
१५ ते ३० जानेवारीचा एकंदरीत घटनाक्रम न्या. कपूर यांनी दिल्याप्रमाणे आहे. संपुर्ण अहवाल वाचायचे कष्ट घेतले तर अनेक धक्कादायक बाबी दिसतील. सावरकर या खुनाचे मुख्य सुत्रधार होते तर बाकी प्यादी हेही सरळ दिसते. कितीही सारवासारव करायचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही. सावरकर सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटले याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना गोवता येईल असा प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळाला नाही आणि भारतीय दंडविधानाप्रमाणे असा पुरावा नसेल तर दोषी ठरवता येत नाही. मानवत खूनखटल्यातही केवळ प्रत्यक्ष सहभाग व अन्य प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने सुत्रधार मुक्त सुटले होते.
कपूर आयोगाचा अहवाल खालील लिंकवर संपुर्ण उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

http://www.sacw.net/article2611.html

आता...या लोकांच्या बैठका मुख्यत्वेकरून हिंदू महासभेच्या मुंबई व दिल्ली कार्यालयात झाल्या. हिंदू महासभेचे सर्वेसर्वा कोण होते हे सारे जाणतात.
सावरकरांना १७ जानेवारीला प्रत्यक्ष हत्याकांडात सामील झालेले भेटले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे लोक मुंबईलाच आले व किमान चार दिवस तेथे राहिले. ते पुन्हा सावरकरांनाच भेटायला आले होते असे म्हणायला पुरेपूर वाव आहे. अन्यथा पळून जायला त्यांना अनेक जागा होत्या. त्यांना सक्षम शस्त्र हवे होते. ते त्यांना मुंबईतून गेल्यानंतर ग्वाल्हेरला मिळाले. ही व्यवस्था क्रांतीकारकांना शस्त्रे पुरवण्याचा आधीपासून उद्योग करणा-या सावरकरांशिवाय कोण करणार?

हे प्रश्न आहेत व यांची दखलपात्र उत्तरे सावरकरवादी देऊ शकत नाही हे उघड आहे. 

Tuesday, September 8, 2015

तुळसाबाई होळकर



महाराजा यशवंतरावांना एकुण दोन अपत्ये झाली. लाडाबाईपासुन भीमाबाई तर मिनाबाईपासुन (काही इतिहासतद्न्यांच्या मते केशरबाईपासुन) मल्हारराव (तिसरे). तुळसाबाईंना अपत्यप्राप्ती झाली नाही. (तुळसाबाई या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह.) मल्हाररावाला (वय वर्ष ६) होळकरी गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट म्हणून महाराणी तुळसाबाई राज्यकारभार पाहु लागल्या. यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. खरे तर यशवंतरावांच्या मृत्युनंतर होळकरी राज्य आपण सहज गिळून टाकू असे इंग्रजांना वाटले होते. त्यांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्तावही पाठवले होते. तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही. इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडली. पण तुळसाबाई कारभार पाहु लागल्यापासुन काही काळानंतर त्यांचा द्वेष करणा-यांची गर्दीही वाढु लागली, कारण माल्कमने त्यांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. काय वाट्टेल ते करुन इंग्रजांना होळकरी राज्य खालसा करणे महत्वाचे वाटत होते.
तुळसाबाईवर करण्यात येणारा पहिला आरोप म्हणजे त्या यशवंतरावांच्या विवाहित पत्नी नव्हत्या. या आरोपाची दखल आपण आधी घेऊयात. ही अन्याबा महानुभाव या जेजुरी येथील गृहस्थाची कन्या होती. ही सुद्धा औरस कि अनौरस यबाबत माल्कमने संशय व्यक्त करुन आपल्या मनोवृत्तीचा परिचय करुन दिला आहे. असो. तुळसाबाई व यशवंतरावांचा परिचय होण्यात शामराव महाडिकांचे अंग होते ही एक दंतकथा तुळसाबाईंबद्दल प्रचलित आहे. १७९९ ते १८०१ या काळात कधीतरी यशवंतराव व तुळसाबाई यांची भेट झाली असावी असा तर्क नरहर फाटक देतात. (श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर) ही भेट उत्तरेत झाली कि खुद्द जेजुरीत याबाबत मात्र माहिती मिळत नसली तरी एकंदरित यशवंतरावांच्या हालचाली पाहता यशवंतरावांच्या पुणे स्वारीच्या दरम्यानच १८०२ मधे ही भेट झाली असेल असे म्हणता येते.
यशवंतरावांची तुळसाबाईंना पाठवलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. मल्हाररावांच्या लग्नानिमित्त तुळसाबाईंच्या नावे पाठवलेल्या दोन कुंकुमपत्रिका प्रसिद्ध असून नरहर फाटक म्हणतात कि उपस्त्रीला (रखेली) विवाहकार्याला निमंत्रण तत्कालीन स्थितीत दिले गेले नसते. अनेक पत्रांतही यशवंतरावांनी तुळसाबाईला "सौभाग्यवती" असे संबोधलेले आहे, त्यामुळे तुळसाबाई या विधीवत यशवंतरावांशी विवाहबद्ध झाल्या होत्या असे स्पष्ट दिसते.
तुळसाबाई स्वभावाने करारी, धैर्यवान व बुद्धीमान होत्या. तसे नसते यशवंतरावांच्या मृत्युनंतर मल्हारावाला मांडीवर बसवून राज्यकारभार त्यांना हाती घेता आला नसता. इंग्रजांच्या संदर्भातील तुळसाबाईंचा पेशव्यांशीही पत्रव्यवहार उपलब्ध असून त्यात त्यांच्या धोरणी राजकारणाचे दर्शन घडते. भीमाबाई व मल्हाररावांची कसलीही त्यांनी आबाळ केली नाही. भीमाबाई आपल्या सावत्र आईच्या राजकारणाला व मुत्सद्देगिरीला साथच देत असे. भीमाबाई व मल्हारराव जातीने महिदपुरच्या युद्धात उपस्थित होते यावरुन संस्थानाचे हित आपल्या सावत्र आईच्या मार्गदर्शनाखाली जपण्यात ही भावंडे अघाडीवर होते असे दिसते. तुळसाबाई, माल्कम व त्याची री ओढणारे इतिहासकार म्हणतात तशी बदफैली व व्यभिचारी असती तर सलग सात वर्ष तुळसाबाईंना राज्य करता येणे, वर्चस्व टिकवता येणे अशक्य झाले असते.
खरे तर यशवंतरावांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरी राज्य सहज ताब्यात घेता येईल असा माल्कमचा होरा होता. त्याने त्यासाठी सुरुवातीपासून जी कटकारस्थाने केली त्याला तोड नाही.
मल्हाररावांचा रिजंट म्हणून तुळसाबाईंनी काम पहायला सुरुवात केली तेंव्हा ब्रिटिशांनीही मल्हाररावाचा वारसा मान्य करत पित्याच्या सा-या पदव्या वापरण्याचा अधिकार मान्य केला होता. तुळसाबाईने तात्या जोग, गणपतराव, अमिरखान, गफुरखान आणि जालीमसिंग या जुन्या सेवक तसेच यशवंतरावांच्या राजकीय मित्रांशी चांगले संबंध निर्माण केले. परंतू आपण अमिरखानाने यशवंतरावांशीही कशी छुपी दगाबाजी केली होती हे आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे. त्याला टोंकची जहागिरी यशवंतरावांनीच दिली होती. गफुरखान हा त्याचा मेव्हणा व होळकर दरबारातील त्याचा प्रतिनिधी. हा गफुरखान अमिरखानाला होळकर दरबारातील वित्तंबातम्या कळवत असे.
बाळाराम सेठ हा अजुन एक अधिकारी होता. गंगधर येथे त्याने तुळसाबाईला मल्हाररावांसहित थांबण्याचा आग्रह केला. परंतू त्यातील काळेबेरे लक्षात येताच तुळसाबाईंनी त्याला देहदंडाची शिक्षा दिली. आपले बिंग फुटले आहे कि काय या शंकेने गफुरखान व अन्य सरदार अस्वस्थ झाले. याची जानीव होताच तुळसाबाई अलोट येथे मल्हाररावांसह निघून गेल्या. म्हणजे तुळसाबाईंच्या सुरुवातीच्याच काळात त्यंना विश्वासघातांना तोंड द्यावे लागले.
आक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला व त्यांना एतद्देशिय देशद्रोह्यांनी साथ कशी दिली हे पुढील घटनाक्रमावरुन लक्षात येते.
या घटनाक्रमात तुळसाबाईंनी मराठा राजमंडलात राहुन ब्रिटिशांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी वकील पाठवून आपल्या तयारीची माहितीही दिली होती. तुळसाबाईला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाबाईविरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाबाईंचा खून करायचे ठरवले.
धर्मा कुंवर हा यशवंतरावांच्या विश्वासातील कारभारी होता. आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला, पण धर्मा कुंवरने दाद दिली नाही. मग इंग्रजांनी आपले लक्ष गफुरखानकडे वळवले. गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी व सक्खा मेव्हना होता. होता. माल्कमने त्याला जाव-याची जागिर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १७१७) आणि तुळसाबाई, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. तुळसाबाई व मल्हारराव (३) ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते.
त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाबाई व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासु सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले कि जणु धर्मानेच तुळसाबाई व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना थोडी पुढे ढकलावी लागली. माल्कमने होळकरांनी ब्रिटिशांशी शिंद्यांनी केला तसाच ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा लकडा लावला. तुळसाबाईंनी त्याला भिक घातली नाही.
मेजर माल्कम २६ नोव्हेंबर १८१७ रोजी तालेन येथे आपले सैन्य घेऊन आला. युद्ध करायचे आधीच ठरलेले होते. खुनाचा एक प्रयत्न फसला होता. नवी योजना आखण्याची गरज होती. दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाबाईंनीही ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. तात्या जोग, जो ब्रिटिशांशी समझौता करावा या मताचा होता त्याला पदावरुन हाकलुन नजरकैदेत ठेवले. मल्हारराव, भीमाबाई व सर्व सेनानी महिदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. या वेळीस होळकरांकडे शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ होते.
यामुळे माल्कम पुन्हा तुळसाबाईंशी तह करण्याच्या मागे लागला. १५ डिसेंबर रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला. या वाटाघाटीतुन काहीही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर नेमके १९ डिसेंबर रोजीच त्यांनी वकिलांची परत रवानगी केली. कारण तुळसाबाई आहे तोवर आपला निभाव लागत नाही हे माल्कमच्या लक्षात आले होतेच आता खात्री पटली. पण दुर्दैवी भाग म्हणजे अमिरखानाने या आधीच, ९ नोव्हेंबर रोजी, इंग्रजांशी तह करुन टाकला होता. माल्कमच्या दृष्टीने ती जमेची बाजु होती. अमिरखानाचा मेव्हणा गफुरखान तर आधीच इंग्रजांना आतून मदत करत होता.
महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १७१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. सारे सैन्य, भिमाबाई-मल्हारराव राजधानीत नव्हते. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.
ब्रिटिशांशी तुळसाबाईलाच तह करायचा होता म्हनून तिला ही गफुरखानाने शिक्षा देण्यात आली असे माल्कमने लिहिले. तो शत्रुच होता. तह करायचा असता तर महिदपुरला सैन्य कशाला पाठवले असते हा प्रश्न आमच्या इतिहासकारांना पडला नाही. सात वर्ष ब्रिटिशांच्या पापी नजरेतून राज्य वाचवले या योग्यतेचे स्मरण केले नाही. वरील घटनाक्रम पाहिला, तुळसाबाईला ठार मारण्याचे दोन अयशस्वी आणि एक यशस्वी प्रयत्न पाहिला तर तुळसाबाई इंग्रजांच्या डोळ्यांत केवढी सलत असेल याची कल्पना येते.
गफुरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुलसाबाईंना ठार मारुन महिदपुरला गेला. २० डिसेंबर रोजी सुरु झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र असतांना दुपारीच तो अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुत्सद्दी महिला. सात वर्ष होळकरी संस्थानाचा घास घ्यायला टपलेल्यांना दूर ठेवणे ही सामान्य बाब नव्हे. पण इतिहासाने महाराणी तुळसाबाईंची यथोचित दखल घेणे तर सोडाच, तिला रखेली, बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला. तसे करणे माल्कमच्या किंवा इंग्रजांच्या दृष्टीने स्वाभाविक असले तरी आम्हा पामरांना तरी तुळसाबाईचे महत्व समजायला हवे होते. "नाही चिरा नाही पणती" अशे अवस्था एका समर्थ महाराणीची झाली. विश्वासघातकी मृत्यू स्विकारावा लागला. इंग्रज मात्र खूष होते...उरलले सुरले होळकरी सामर्थ्य नष्ट करण्यात ते यशस्वी होत आले होते. पण सरळ मार्गाने त्यांना अजुनही विजय मिळवण्याची खात्री नव्हती. पण त्यांचे नशीब थोर एवढे कि गफुरखानासारखे घरभेदी त्यांना मिळतच चालले होते.

आणि नीतिहीन लोलुपांची कमी कधी असते काय?

Sunday, September 6, 2015

आर्थिक असुरक्षा व आरक्षणे





समाज मानसशास्त्र सुदृढ होण्यासाठी पहिला मापदंड म्हणजे सामाजिक अर्थसुरक्षा. सुरक्षिततेच्या अभावात माणूस आधी नातेसंबंध, मग जात आणि शेवटी धर्माला चिकटुन बसत आपली मानसिक व म्हणूनच आर्थिक सुरक्षा शोधत असतो. असुरक्षित मानसिकतेतुन संकुचिततावाद विकसित होत जातो. याला आज भारतातील कोणताही समाज अपवाद नाही. यातुनच वर्चस्वतावादी अथवा न्यूनगंडात्मक भावना जोपासल्या जातात. यातुन समाज मानसशास्त्र अजुनच बिघडत जाते. सामाजिम मानसिक स्वास्थ्याचा पाया हा समाजाच्या अर्थसुरक्षेत आहे याचे आपल्याला भान यायला हवे.

आज आपण पटेल, गुज्जर, जाट अशा समाजांची आरक्षणासाठी होणारी महाआंदोलने पाहत आहोत. काही वेळा ती हिंसकही झाली आहेत. आज जो आरक्षित समाज आहे तोही या मागण्या व आंदोलनांमुळे अस्वस्थ व असुरक्षित भावनेने ग्रासला आहे. समाजातील वंचित व अवमानग्रस्त घटकांना न्याय देण्यासाठी  आरक्षण ही मूळ संकल्पना तर हरवली आहेच पण आरक्षण असणे म्हणजेच विकास हा काहीतरी वेडगळ समज सर्वांनी करुन घेतलेला दिसत आहे. आरक्षण असणे म्हणजे आपण आर्थिक दृष्ट्या सबल आणि प्रगतांच्या पंक्तीला लगोलग जाऊन बसता येणे असेही होत नाही. तरीही आरक्षणांची आस सुटत नाही कारण आपला समाज मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षित नाही. लोकशाहीत असे असुरक्षित वाटणे हे आपल्या अर्थव्यवस्थेचे आणि लोकशाहीचे घोर अपयश आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

खरे म्हणजे आपली अर्थव्यवस्था अजुनही मुठभर भांडवलदारांना अनुकूल असून वंचितांचे अर्थशास्त्र समजावून घेत तशा कृत्या ते करायला तयार नाही. नोबेल विजेते मोहंमद युनूस यांनी अलीकडेच भारतात गरीबांसाठी ब्यंक असावी असे मत मांडले. त्यांचे मत स्वागतार्ह असले तरी आहे त्याच ब्यंका छोट्या व लघुत्तम व्यावसायिकांसाठी वित्तपुरवठा का करत नाहित हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. रिझर्व ब्यंकेनेही यासंबंधात कधीच ठोस धोरण जाहीर केले नाही. नवी रोजगार निर्मिती गेल्या काही वर्षात जवळपास शुन्यावर आली आहे. वाढते पदवीधर आणि म्हणूनच बेरोजगार हे आजच्या अर्थव्यवस्थेवर अनुत्पादक ओझे आहे याचे भान आपल्याला नाही. यामुळे आर्थिक सुरक्षाही ढासळली असल्याने भारतीय तरुण उद्रेकी मानसिकतेत गेले आहेत व त्यातुनच विविध समाजांची उग्र आंदोलने आरक्षण या विषयाशीच घोटाळत राहत मुख्य प्रश्नाला भिडण्याची त्यांचीही तयारी नाही असे विदारक चित्र आहे.

एकुणात सर्वच समाजांना आर्थिक प्रवाहात आणत त्यांची अंगभूत कौशल्य आधुनिक तंत्रांचा आधार देत अथवा नवीन कौशल्यांचे प्रशिक्षण देत सुलभ कर्जांचा पुरवठा करत त्यांच्या बाजारपेठा विकसित केल्या असत्या तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. आज भारतातील लघुउद्योग जवळपास नाहीसा होण्याच्या बेतात आहे. त्यांच्यासाठी व सुक्ष्मोद्योगांसाठी वित्तपुरवठा करायला ब्यंका फारशा उत्साही नसतात. "शंभर छोटी कर्जे सांभाळत बसण्यापेक्षा एकच मोठे कर्ज सांभाळायला सोपे" ही ब्यंकांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे गृह-वाहनादि कर्जे वगळता जेथे खरेच वित्तसहाय्यांची गरज आहे तेथे ब्यंका फिरकत नाहीत. नाबार्डच्या असंख्य योजना आहेत (कृषीआधारित उद्योग/पशुपालन ई) परंतू त्याचा ताळेबंद समाधानकारक नाही. खरे म्हणजे राष्ट्रीयीकृत ब्यंकाही नाबार्ड योजनेत कर्जांचे अर्ज स्विकारण्यातही टाळाटाळ करतात हा अनेकांचा अनुभव आहे. वर्ष वर्ष हेलपाटे मारुनही प्रकरणे मंजुर केली जात नाहीत.

यामुळे उद्योजकता असली तरी अनेक तरुण त्यातही पडू शकत नाहीत. खरे तर छोट्या व्यावसायिकांसाठी व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान कागदपत्रांच्या आधारावर तात्काळ कर्जे दिली जातील असे कायदे नाहीत. आपण अर्थव्यवस्थेला सबल बनवायचे तर आर्थिक सबल पिढ्या निर्माण करायला हव्यात याचे भान ब्यंकांना नाही. नुसती लोकांची ब्यंक खाती काढून भागणार नाही तर त्यांना पायावर उभे राहता येईल यासाठी सुलभ कर्जेही दिली गेली पाहिजेत. यातुन वंचितांचे अर्थशास्त्र आकाराला येत तळागाळातील माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची शक्यता आहे. आपल्याच साधनस्त्रोतांना येथेच वापरत व्यवसाय करण्याच्या असंख्य संध्या आहेत परंतू त्याकडे आपले अजून लक्ष गेलेले नाही.

आर्थिक सुरक्षा ही व्यक्ती व समाजाच्या सुदृढ मानसिकतेचा पाया आहे. असुरक्षेतून संकुचितपणा व उग्रवाद वाढतो. मानवी प्रवृत्ती या अतिरेकाकडे जातात. यातून पुन्हा सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. "आमच्या आंदोलनात कोणे शहीद झाला नाही म्हणून माध्यमांनी त्याकडे लक्ष दिले नाही..." हे विधान एका अशाच आरक्षण मागणा-या जातीच्या नेत्याचे आहे. म्हणजे कोणी शहिद व्हायला हवा ही जर आपली मानसिकता बनलेली असेल तर आपणच आपल्या समाजाच्या ढासळलेल्या नैतिकतेचे मुल्यमापन सहज करू शकतो.

आज जागतिक महामंदी आहे. दु:ष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतकरी ते भटके-विमूक्त जगायचे कसे या प्रश्नाने ग्रासलेले आहेत. हे अजून किती रसातळाला जाईल हे सांगता येत नाही. भारतीय अर्थव्यवस्था (रुपयाच्या किंमतीसह) गटांगळ्या खाते आहे. कारण मुठभरांची व मुठभरांसाठीची अर्थव्यवस्था ही चिरंतन टिकणारी नसते. जोवर आम्ही वंचितांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सामील करुन घेत नाही, तोवर शाश्वत व स्थिर अर्थव्यवस्था अवतरणे अशक्यप्राय आहे. बेरोजगार हात, मग कोणत्याही समाजाचे असोत, आरक्षणासारख्या बुजगावण्यांच्या खोट्या आशेवर नेत्यांच्या मागे उभे राहतात. यातुन नेते मोठे होतात हे खरे पण त्यातून खरेच तरुणांची आर्थिक सुरक्षा साधली जाते काय हा प्रश्न आपणच विचारत आपल्या आर्थिक मागण्या जास्त नेटाने माम्डल्या पाहिजेत हे भान आपल्याला यायला हवे.

अन्यथा आपली अर्थव्यवस्था तर सुधरणार नाहीच, आपली मानसिकता संकुचित, द्वेषपुर्ण आणि म्हणून उद्रेकी होत जाईल याचे भान आपल्याला असायला पाहिजे!



Tuesday, September 1, 2015

खंडोबा




खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुसंख्य जातींचे कुलदैवत असले तरी त्याचा धनगरांशी आदिम संबंध आहे. तो कुरूब-धनगरांचा प्रिय देव आहे. खंडोबाचा मूळ इतिहास पांडुरंगाइतकाच पुरातन असुनही खंडोबाभोवती बाराव्या-तेराव्या शतकानंतर ज्या पौराणिक कथा बनवल्या गेल्या त्यामुळे त्याचे ऐतिहासिक स्वरुप पार बदलले आहे. भक्त व काही स्वार्थी धर्मपंडित म्हणवणा-यांनी या कथा कधी प्रेमाने तर कधी स्वार्थाने बनवल्या असे दिसून येईल. या कथांच्या जंजाळात फारसे न अडकता आपल्याला मल्हारी मार्तंड खंडोबाचे मुळ स्वरुप येथे शोधयचे आहे.

मल्लारी-माहात्म्य या ग्रंथाने खरे तर अनेक भाकडकथांना जन्म दिला. खंडोबाचे कधी शिव, कधी विष्णू तर कधी इंद्राशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न केला गेला. मार्तंड-विजय, जयद्रिमाहात्म्यसारखे ग्रंथही पुरानकथांच्या पद्धतीनेच ढोबळपणे लिहिले गेले. हे ग्रंथ बाराव्या-तेराव्या शतकानंतरचे असल्याने खंडोबा या लोकदैवताला "प्रतिष्ठा" यापुर्वी नव्हती असा समज होणे स्वाभाविक आहे. महानुभाव साहित्यात खंडोबा (मैराळ) ह क्षेत्रपाळ देव असल्याचे म्हटले आहे. सन ११६० मध्ये बसवेश्वरांनीही मलैय्या, बेंतर, बिरैय्या केटय्या या देवतांची बळी मागणारे म्हणून्ज निर्भत्सना केलेली दिसते. पण पुढे जंगमही खंडोबाचे उपासक बनले हेही ऐतिहासिक वास्तव आहे. असे असले तरी संशोधकांनी सर्व कथांचा अभ्यास करुन जी मते मांडली आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात.

१) डा. माणिकराव धनपलवार यांच्या मते मैलार (मल्हार) हा शिकारी मेंढपाळ असावा. मैलाराच्या उपासनेत घोडा व कुत्र्याला महत्व आहे. हे मत डा. रा. चिं. ढेरे यांनाही मान्य आहे. हा मेंढपाळ-श्रेष्ठ मैलार एखाद्या प्रतिस्पर्धी टोळीशी झलेल्या संघर्षात क्षतविक्षत होऊन पडला असावा. खंडोबाच्या पूजाविधीत भंडा-याला (हळदीला) जे महत्व मिळाले ते मूळ जखमी झालेल्या नायकाला केलेल्या हळदीच्या उपचारांत असावे.

२) खंडेराय हा शिवजीप्रमाणेच इतिहासात होऊन गेलेला एखादा महान वीरपुरुष असावा असे मत त्र्यं. ग. धनेश्वर यांनी व्यक्त केले आहे. हा मुळात वीरदेव असावा व तो सन ६२० मद्ध्ये होऊन गेला असावा.

३) खंड म्हणजे वस्त्राचा तुकडा. मैलारास वस्त्रांच्य तुकड्याचा मुखवटा असतो म्हणून खंडोबा हे नांव पडले असावे असेही डा. रा. चिं. ढेरे म्हणतात. पण वस्त्रांच्या तुकड्याचे मुखवटे महालक्ष्मी व अनेक मुर्त्यांना असतात, पण त्यंना वस्त्रवाचक नांव नाही यावरुन ढेरेंचे मत बाद होते.

४) खंड-खांडा हे खंडोबाचे आयुध असल्याने त्यास खंडोबा म्हणतात हे मत बहुतेकांना मान्य असून जनप्रियही आहे.

५)खंडोबा हा शेळ्या-मेंढ्या व गायी-गुरांचा रक्षणकर्ता होता. त्यामुळेव पशुपालन हा ज्यांचा प्रमुख व्यवसाय होता त्यांचे तो दैवत होता. महाराष्ट्रात पैठण येथे खंडक नांवाचा यक्ष वास करत होता. खंडक यक्ष म्हणजेच खंडोबा असे मत म. के. ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे.

६) खंडोबाला बाणाई ही धनगरकन्या पत्नी आहे तशीच म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी आहे. पशुपालक व नागर सम्स्कृती, या दोन्ही समाजातील बायका करणे देवाला आवश्यक होते असे गुंथर सोंथायमर यांनी मत व्यक्त केले आहे.

७) मल्लारी, हे नांव मलय/मैलार या पर्वत-अरण्यवाचक शब्दांतुन आले असावे असेही काही विद्वान मानतात. मार्तंड या शब्दातून प्राचीन सुर्यपुजेचे अंशही खंडोबाला चिकटवले गेले असतील असेही एक मत आहे.

मुख्य मुद्दा येथे लक्षात घ्यायला हवा तो हा कि खंडोबा ही देवता जर मुळात अकराव्या-बाराव्या शतकानंतर उदयाला आली असती तर त्याच्या मुळाबद्दल एवढी मते असायचे कारण नव्हते. जी देवता पुरातन असते, तिचे मुळ स्वरुप कालौघात विस्मरणात जाते व समकालीन संदर्भ कवी/भक्त आपापल्या प्रतिभेने चिकटवत जातात. धर्ममार्तंड त्यात स्वार्थी भर घालत राहतात. त्यामुळे पुराणकथांची व वेगवेगळ्या स्प्ष्टीकरणांची एवढी रेलचेल उडते कि सत्य काय हे शोधणे दुरापास्त व्हावे.

तरीही खंडोबाशी निगडित मुख्य कथा म्हणजे मणी-मल्ल दैत्यांची. या दोन्ही दैत्यांचा संहार केला व मल्ल दैत्याला मारणारा व मरण्याआधी दैत्याची इच्छा म्हणून नांवात मल्ल-हारि=मल्हारी (मल्लाचा विनाश करणारा-ठार मारणारा) आहे हे पुराणकथा सांगतात व मणी दैत्य त्याचा भाऊ होता असेही म्हणतात. जेंव्हा मुळ इतिहास विसरला जातो तेंव्हा त्याचे पौराणिकीकरण चालु होते. तरीही खंडोबाच्या नांवात मल्हारी असल्याने यावर जरा विशेष लक्ष द्यायची गरज आहे.

मल्ल हा प्रत्यक्षत व्यक्ती अथवा दैत्य नसून ते महाराष्ट्रातील एका प्राचीन विभागाचे नांव होते. या प्रांताला महाराष्ट्र नांव का पडले याचे विवेचन करतांना चि. वि. वैद्य म्हणतात, इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इ. वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो, ते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले.

मराठी विश्वकोशात म्हटले आहे कि या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले आढळतात. बृहदारण्यकोपनिषद, रामायण व महाभारत यांतून विदर्भाचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक (राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण), कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा तो अपरांत म्हणजे कोकण, गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते. या सर्व प्रदेशांत प्राकृत भाषा प्रचलित होऊन त्या सर्वांचा मिळून एक मोठा प्रदेश निर्माण झाला व त्यालाच महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले, अशीही व्युत्पत्ती दिली जाते.

पांडुराष्ट्र म्हणजे आजच्या पंढरपुरचा परिसर हे आपण पाहिले. मल्ल राष्ट्र नाशिकच्या दक्षीणेचा होता हे उघड आहे. हे राष्ट्रिक (राष्टिक) आर्य होते हे मत चि. वि. जोशींच्या तत्कालीन आर्य-आक्रमण सिद्धांताला धरुन आहे व ते कसे अनैतिहासिक आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे.

कुसुमावती देशपांडेंच्या म्हणण्यानुसार पांडुराष्ट्र व मल्लराष्ट्र ही अनार्यांची होती.

सर्व कथांचे अवलोकन केल्यावर आणि विद्वानांची मते लक्षात घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे ते असे:
मल्ल हा दैत्य नसून ते प्रदेशाचे अथवा राज्याचे नांव होते हे ऐतिहासिक सत्य आहे. हे राज्य आजचा पुणे जिल्हा ते त्याहुनही दक्षीणेचा भाग यात पसरले असावे. ही शक्यता आहे कि जेजुरी ही मल्लराष्ट्राची राजधानी असावी. कर्हेपठार येथील गिरिदुर्ग या राजधानीचे केंद्र असावा. येथुन तत्कालीन राजा कारभार हाकत असावा व त्याचे नांव मणी असावे.

मणी-मल्ल या दैत्यद्वयाच्या नांवांची सांगड अशी लागते. मल्ल हे राज्याचे नांव तर मणी हे खंडोबाकालीन राजाचे नांव.

मल्ल राष्ट्र हे सातवाहनकाळ सुरु होईपर्यंत अस्तित्वात होते याचे पुरावे उपलब्ध आहेतच. म्हणजेच इसवी सनपुर्व पाचवे ते सनपुर्व तिसरे शतक या काळात खंडोबा नांवाचा एखादा मेंढपाळ वीरपुरुष होऊन गेला असावा. मणीही पशुपालकच समाजातील असावा पण तो अन्यायी असल्याने खंडोबाने बंड करून त्याच्या उच्छेद केला असावा. त्यामुळे मल्ल राष्ट्र हरवणारा म्हनून मल्हारी ही नावाचे व्युत्पत्ती अधिक संयुक्तिक आणि सत्याच्या जवळ जाणारी आहे. मल्लारि...मल्हारी अशी उकल करता येते. शकारि म्हणजे ज्याने शकांवर जय मिळवला अशी जी उपाधी तशीच ही मल्ल राष्ट्रावर विजय मिळवला म्हणून मल्हारी.

पराक्रमी पुर्वजांची पूजा करणे हा धनगर संस्कृतीतील एक महत्वाचा भाग आहे. खंडोबाने मणी राजाच्या संहारानंतर स्वत: राज्यकारभार केला असणे संयुक्तिक आहे. त्याच्या निधनानंतर त्याची शिवावतार समजून लिंगस्वरुपात पूजा करणे स्वाभाविक होते. खंडोबा नांवाचा उगम अन्यत्र शोधण्याची आवश्यकता नाही. हेच नांव मुळचे असणे अधिक सत्याच्या जवळ जाणारे आहे. तसेच खंडोबाच्या आधी मुर्त्या असणे शक्य नाही. खंडोबाची पुजा आधीपासून लिंगरुपातच होत आली असली पाहिजे. मार्तंड ही उपाधी सुर्यपुजेशी निगडित नसून त्याचा अर्थ "मार्तंडाप्रमाणे ज्याचे तेज फाकले आहे असा मल्हारी." असा घ्यावा लागेल.

तसेच बाणाई ही धनगरकन्या असणे स्वाभाविक असले तरी म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी होती ही कथा नंतर कोणीतरी (लिंगायतांनीच) बनवलेली आहे हे उघड आहे. याचे कारण असे कि लिंगायत हा शैव पंथ असला तरी त्याची स्थापना बाराव्या शतकातील आहे. बसवेश्वरांनी खंडोबाचा आधी निषेधच केलेला होता हे आपण पाहिलेलेच आहे.

राजाला दोन किंवा अधिक पत्न्या असने हे त्या काळात गैर नव्हते. म्हाळसा हीसुद्धा धनगरच असण्याची शक्यता आहे. नंतर सामाजिक संदेश देण्यासाठी दोन समाजांतील पत्न्या  दाखवल्या जाणे शक्य आहे. खंडोबाचा घोडा व श्वान (वाघ्या) हे त्याचे मुळ रुप धनगर असण्याचेच द्योतक आहे.

नंतर जवळपास दीड हजार वर्षांच्या कालौघात खंडोबा ह क्षेत्रपाळ, पशुंचा संरक्षक देवता म्हनून मानला जात त्याचे आजचे स्वरुप बनले आहे. मुळ इतिहास नीटसा लक्षात न ठेवला गेल्याने दंतकथांतुन अद्भुतरम्य कथा खंडोबाभोवती गुंफल्या गेल्या. कर्मकांडांचा त्यात समावेश झाला. वाघ्या-मुरळीसारख्या अनिष्ट प्रथाही निर्माण केल्या गेल्या. आज त्या कायद्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. होळकर घराण्याने जेजुरीच्या विकासात अनमोल योगदान दिलेले असून ते सर्वांस माहितच आहे!

* * *

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...