Saturday, January 21, 2017

आव्हाने स्वीकारतांना!

Image result for challenges of future

अनेकदा असे म्हटले जाते कि आजकाल तंत्रज्ञानाचा वेग अचाट वाढला आहे. एक व्हर्जन येते न येते तोच त्याहीपेक्षा प्रगत व्हर्जन बाजारात हजरच असते. हे खरे आहे कि मानवी जीवनाला सुखद व्हावे यासाठी तंत्रज्ञाने नवनवीन संशोधन करत प्रगत होतात व त्यामुळे नवनवीन उत्पादने आपल्यासाठी आणत असतात. तंत्रज्ञानाचा वेग अधिक नसून ते शिकण्याचा आपला वेग कमी आहे हेही एक वास्तव आहे हे मात्र आम्ही विसरत असतो. शिवाय तंत्रज्ञानांची गरज कितपत आहे याचाही अंदाज आम्हाला कधीच येत नाही. कारण ते ठरवणारी साधने नेहमीच बाह्य असतात. आम्ही तंत्रज्ञान वापरू अथवा न वापरू, ती शिकण्यात आम्हाला रस असतो काय, तेवढी जिज्ञासा असते काय हा प्रश्न मात्र अवश्य असतो.

मागील लेखात मी यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीच्या आव्हानाबाबत लिहिले होते. हे खरे आहे कि भविष्यात अगदी शेतीची कामेही यंत्रमानव करतील. यंत्रमानवीकरणाची हीच गती कायम राहिली तर येत्या पंधरा-वीस वर्षात आज आहे तिच्या दहा टक्केही श्रमिकांची गरज राहणार नाही. चीनमद्ध्ये उपसंपादकाचे काम अत्यंत वेगात व अधिक अचूक करु शकतील अशी कृत्रीम बुद्धीमत्ता वापरण्याचा प्रयोग नुकताच झाला. तो यशस्वीही ठरला. म्हणजे कल्पक, जिज्ञासू , अभ्यासू व बौद्धिक मेहनत घेऊ शकणा-यांचीच फक्त भविष्यात गरज असेल काय हा प्रश्न आपल्यासमोर आजच उभा ठाकला आहे व तशी स्थिती निर्माण झालीच तर तिला कसे तोंड द्यायचे याचीही खबरबात आपल्याला नाही हे वास्तव आहे. आज जी स्मार्ट मशिन्स निर्माण होताहेत त्यांचा सरासरी आयक्यू १०० एवढा आहे. तंत्रज्ञानातील प्रगती याच वेगाने सुरु राहिली तर पुढील पंचविस वर्षात अमेरिकन नागरिकांच्या सरासरी आयक्यूच्या ९०% पेक्षा जास्त आयक्यू असणारी कृत्रीम बुद्धीमत्ता तयार होईल. म्हणजेच एकट्या अमेरिकेतील पाच कोटी रोजगार जातील असा तज्ञांचा होरा आहे. जगात काय होईल याची कल्पना केलेली बरी.

या स्मार्ट मशिन्स, म्हणजे कृत्रीम बुद्धीमत्ता असलेले यंत्र वा संगणक मानव काय काय करू शकतील? काही उदाहरणे आपण येथे अवश्य पाहुयात. श्रमिकांची जागा घेणे हा एक भाग झाला. तेथे अधिक बुद्धीमत्तेची गरज नसते. आजकाल फोकल्यंड वगैरे ब-यापैकी श्रमिकांची जागा घेतच आहेत व त्यामुळे रोजगार कमी होतोय असेही फारसे दिसत नाही. पण सध्या मुळात श्रमिकांचीच कमतरता जगभर भेडसावते आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम न जाणवता उलट काम वेगाने होऊ लागले आहे असे एकीकडे चित्र आहे. पण ही झाली आजची अवस्था. मनुष्याची गरज असते नियंत्रण ठेवण्यासाठी व स्थिती पाहून त्वरित निर्णय घेण्यासाठी. 

पण आता तंत्रज्ञान फार पुढे जाते आहे. अगदी वैद्यकिय क्षेत्रातही कृत्रीम बुद्धीमत्ता वापरात येवू लागली आहे. उदाहरणार्थ जॉन्सन एंड जॉन्सन या कंपनीने २०१३ मध्येच सिड्यसिस मशीन बनवली आहे. आता कोणत्याही भूलतज्ञाची गरज राहणार नाही अशा पद्धतीने हे वैद्यकिय मशीन काम करते. रेडिओलोजीसारख्या अत्यंत तज्ञतेची गरज असलेल्या क्षेत्रातही संगणकीय कृत्रीम बुद्धीमत्ता डायग्नोसिस करण्यासाठी वापरता येईल असे संशोधन पुर्ण झाले आहे. मानसशास्त्रासारख्या क्षेत्रातही मानसिक समस्यांचे विश्लेशन नजिकच्याच काळात संगणक करू लागतील अशी चिन्हे आहेत. म्हणजे भविष्यात जनरल फिजिशियनची तर मुळीच गरज राहणार नाही अशी ही चिन्हे नाहीत काय?

थोडक्यात हे होणारच आहे. यावर काही नीतिविदांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कृत्रीम बुद्धीमत्ता कविता करु शकेल काय? तत्वज्ञानाची स्वतंत्र निर्मिती करू शकेल काय? मानवी प्रतिष्ठा यामुळे लयाला जावून उलट एक विलक्षण संघर्ष भुतलावर माजणार नाही काय? यामुळे तिसरे महायुद्ध होईल काय? मला वाटते या प्रश्नांपेक्षा महत्वाचे हे आहे कि मानवाचेच नेमके काय होईल. भस्मासुरासारखी मानवजातीची अवस्था होऊ शकेल असे अनेक सायंस फिक्शनमद्ध्ये दाखवले जाते. अनेक भयपटही या थीमवर निर्माण झालेत. पण एक बाब येथे लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे एकीकडे रोजगार जातील हे जितके खरे आहे तितकेच अनेक रोजगारही उपलब्ध होणार आहेत. फक्त रोजगाराचे स्वरूप मात्र पुर्णतया बदललेले असेल. मानवाकडून अपेक्षित असलेले कामही तितकेच बदललेले असेल. कारण मानवाच्या गरजाही बदललेल्या असतील. अर्थव्यवस्था चालते ती मानवी गरजांवर. गरजा सातत्याने बदलत आलेल्या आहेत. अगदी जागतिकीकरणाआधी आपल्या ज्या गरजा होत्या त्यात व आजच्या गरजांत जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. 

खरे म्हणजे मानवी गरजांचा वेग भागवायला तंत्रज्ञान मागुन पळत असते. किंवा अनेक गरजा कृत्रीमरित्याच अशा उत्पन्न केल्या जातात कि सगळ्यांना ती जणू आपली नैसर्गिक गरजच आहे असे वाटू लागते. त्यामुळे त्यावेळीस उपलब्ध असलेले उच्च आयक्युचे कृत्रीम बुद्धीधारी संगणक वा यंत्रमानवही जी कामे करू शकणार नाहीत त्यांची निर्मिती होईल हे ओघानेच आले. किंबहुना अर्थव्यवस्थाच एक असे नवे रुप घेईल जे आजच्या अर्थव्यवस्थांपेक्षा संपुर्ण वेगळे असेल. रोजगार हा शब्दही कदाचित मानवी शब्दकोशातुन हद्दपार होइल. कसा यावरही आपण पुढे विचार करणारच आहोत. पण येथे लक्षात घ्यायचा प्रश्न असा कि आम्ही भविष्यातील जीवनाबाबत किती सजग आहोत? त्यासाठीच नव्हे तर ज्या क्रांतीकडे जग निघालेलेच आहे, त्यात आम्ही कोणती भर घालू शकतो? आम्ही एका तरी क्षेत्रात कृत्रीम बुद्धीमत्ता व बुद्धीमान यंत्रमानव निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत काय? अशा यंत्रमानवांचे कारखाने काढत जगाला पुरवठा करण्याचा विचार तरी करत आहोत काय? 

दुस-याच भागात मी म्हटल्याप्रमाणे मुळात आमची शिक्षण व्यवस्थाच इतकी बंदिस्त आणि आदिम आहे कि त्यापुढे गुरुकुलांतील शिक्षण बरे वाटावे. मुळात आमच्या शिक्षणपद्धतीला मुळात कसल्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा आधार नाही. व्यावहारिक/जीवन स्पर्धेत अडकलेले पालक आपले अपत्य अमुकच का शिकावे तमुक का नाही या विचारांनी नव्हे तर आपले अपत्य काय शिकले तर त्याला व म्हणुन पालकांना भविष्यात व्यावहारिक फायदा होईल त्याचाच विचार करतात आणि शिक्षणपद्धती त्याला साथ देते. नव्हे त्या विचारसरण्यांना प्रोत्साहन देते. बरे, व्यावहारिक फायदा म्हणजे तरी काय? तर आज ज्या क्षेत्रात मागणी आहे त्यातच पोरा-पोरींना कसेबसे ढकलत त्यांना एकदाचे एखाद्या नोकरीला चिकटवायचे. हे झाले कि त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. दशकापुर्वी आयटी क्षेत्रात मोठी मागणी होती म्हणून कोणीही त्या क्षेत्रात शिक्षण मिळवायला धडपडू लागले होते. फायदा झाला तो शिकवणा-या संस्थांचा. आज या क्षेत्रातील मागणी-पुरवठा पार बदलून गेला आहे हे जीवंत उदाहरण आहे. अनेक क्षेत्रांचे तसे झाले आहे. 

आपल्याला भविष्य हे नेहमीच अनिश्चित असते आणि आज जे व्यवहार्य शिक्षण वाटते ते उद्या तसे राहणार नाही याचे भान क्वचितच येते. पाल्याला "योग्य ते सर्व काही बदलत्या स्थितीत शिकू शकेल...सर्व स्थितीला तोंड देईल..." असे मुलभुत शिक्षण द्यायला मात्र आम्ही तयार नाही. पाल्याची नैसर्गिक बुद्धीमत्ता कशी फुलेल, बहरेल यासाठी योग्य वातावरण व शिक्षण पद्धती हवी हे आम्हाला समजत नाही. आम्ही किती फी भरतो त्यावर शिक्षणसंस्थांचा दर्जा ठरवतो. पण मुलात खोट अभ्यासक्रमात आहे...परिक्षा पद्धतीत आहे हे मात्र कधी समजावून घेत नाही.

शिक्षणाचेही मुलभूत तत्वज्ञान असते याचा विसर सर्व व्यवस्थेला पडला आहे. त्यातुनच बनचुकेगिरी, बनवेगिरी व शैक्षणिक व्यभिचाराला उत आला आहे. आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने शिक्षण देणा-यांना व्यभिचारी व्यापारी बनायला प्रोत्साहन देत पुढील पिढ्यांचे पंख छाटुन टाकण्याच्या उद्योगाला हातभार लावत आहोत हे पालकांच्या लक्षात येईल तो सुदिन! आम्हाला भविष्यातील आव्हानांचा वेध घेत त्या आव्हानांवर स्वार होणारी पिढी घडवायची आहे आणि त्याचा मार्ग आम्ही ही पिढी कशी घडवायला हातभार लावतो यावर अवलंबून आहे. 

(Article published in dainik Sanchar)

दिलेरखान-संभाजी प्रकरण...सत्य काय?

दिलेरखानाला शंभुराजे जाऊन मिळाले त्यामागे एक कट होता. दुर्दैवाने तो कट फसला. कटाच्या सिद्धीसाठी ज्या वावड्या जाणीवपुर्वक उठवल्या गेल्या त्यात नंतरच्या बखरकारांनी आपलेही हात धुवून घेतले. पण काय होता हा कट? तो कशामुळे फसला? शिवाजी महाराजांचा त्यात कोणता सहभाग होता? काय पुरावे आहेत त्याचे? इतिहासकारांच्या नजरेतून नेमके काय सुटले?
अवश्य पहा हाही एक शिवाजी महाराज व संभाजीराजांचा एक गनीमी कावा जो दुर्दैवाने यशस्वी झाला नाही.

Pls click on the following link to watch complete video.

Sunday, January 15, 2017

तत्वज्ञानाचे अपहरण

बहुजन गुलामीचे कारण तत्वज्ञानाचे अपहरण हे ही एक कारण असते. भाश्ढांचा उपयोगही वर्चस्वतावादासाठी केला जातो. या पार्श्वभुमीवर सांख्य तत्वज्ञानाचा उगम नेमका कोणत्या परंपरेने केला होता हे पाहणे महत्वाचे आहे. खालील व्हिडियो अवश्य पहावेत व प्रतिक्रिया नोंदवाव्यात ही विनंती.

Sankhya Darshan is non-Vedic (हिंदी) - Part 1


Saturday, January 14, 2017

यंत्रमानव व कृत्रीम प्रज्ञेचे आव्हान!

Image result for artificial intelligence

समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती अहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते अन्य राष्ट्रे कोणत्या दिशेने प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. परकीय प्रभावाने समाजाची दिशा ठरने अनेकदा अडचणीचे असते कारण मुळात त्यांच्या प्रगतीचा मुलगाभा न समजताच अनुकरणातुन ही दिशा नाइलाजाने स्विकारावी लागत असते. आपल्याला तसे होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पदली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही. 

पण संगणकांनी तसे करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanic based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून झाले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला कधी ना कधी यश मिळेल यातही शंका नाही. शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक घेऊ लागतील अशी शक्यता येत्या २०-२५ वर्षांत नाकारता येत नाही. 

समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. या सर्वांत कायदा महत्वाचा रोल बजावत प्रायोगिक पातळीवर सोडले तर अन्यत्र असे घडू दिले जानार नाही हा आपला आशावाद आहे. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र  पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. 

याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे एव्गळ्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील  असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अत्य्हवा निराशाआद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरे यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीमत्ता ही आव्हाने आहेत हेही मात्र खरे.

वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील्क याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.

शिवाय सारी कामे यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने तो काही केल्या "खरेदीदार" होणार नाही.  थोडक्यात संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. किंवा सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही सर्वसामान्यांना सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. या सर्व शक्यतांवर आपल्याला सविस्तर विचार करणे भाग आहे कारण पुढील २०-२५ वर्षांत या सर्व घडामोडींत आपली भुमिका काय असेल, येणा-या परिस्थितीत आम्ही लाभाचे अधिक वाटेकरू बनत आमची किमान हानी कशी होईल याची रणनीति आम्हाला ठरवावीच लागेल. 

आजचा आमचा समाज मुळात शिक्षण म्हनजे काय व ते कसे द्यायला हवे याबाबतच चाचपडत आहे. आमचे सामाजिक प्रश्न अजुनही जातीपाती व धर्मधारित विवादांत अडकले आहेत. आरक्षण हाच आमच्या आजच्या सामाजिक गहन चर्चेचा व आंदोलनांचा विषय बनलेला आहे. आम्ही एवढे झापडबंद झालो आहोत कि आरक्षण ही एक सोय आहे, सामाजिक विकासाचा एकमेव मार्ग नाही हेही समजावून घेण्यात आम्हाला अपयश आले आहे. आमचे विचारवंतही त्याच प्रश्नांभोवती फिरत आपली विचार-रणनीति ठरवत आहेत. या सर्वांतून प्रगल्भ समाज निर्माण होण्याची प्रक्रिया कुंठित होत आहे. अशा वातावरणातून किंचित का होईना बाहेर येत भविष्यातील जगाचेही अवलोकन करत स्वत:ला सज्ज करण्याची आजच गरज आहे हे आम्हाला समजावून घेण्याची निकड आहे.

-संजय सोनवणी

(Published in Dainik Sanchar, 15/1/2017)


Friday, January 13, 2017

सोलापुरात उमटला मुक समाजाचा साहित्यिक आवाज!

Image may contain: 6 people, people standing

"आवाज उद्याचा...उद्गार उद्याचा" हा नारा देत भारतातील पहिले "आदिवासी धनगर सहित्य संमेलन" ७ व ८ जानेवारीला पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही आम्ही नवविचारांनी नवे आशय देवू शकतो हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वैशिष्ट्य होते. या संमेलनात विविध विचारप्रवाहच नव्हे तर समाजघटकही वक्त्यांच्या रुपात सहभागी होते. या विविध विचारप्रवाहांना गंभीरतापुर्वक समजावून घेणा-या हजारावर श्रोत्यांची दोन दिवस सलग उपस्थिती हेही एक वैशिष्ट्य होते. भुतकाळ समजावून घेत वर्तमानाचे विश्लेशन करत भविष्याच्या दिशा ठरवणे हे साहित्याचे अंगभूत वैशिष्ट्य असते. ते या संमेलनत एवढे प्रकर्षाने दिसले कि प्रस्थापित साहित्य संमेलनांनाही त्याची दखल घेणे भाग पडले.

या पहिल्यवहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. हा एक ऐतिहासिक बहुमान माझ्या वाट्याला आला. आदिम समाजाशी आधुनिक युगातही नाळ घट्ट करत त्यांच्या भावविश्वात सहित्यिक दृष्टीकोनातुनही मला जोडून घेता आले. या समाजाला साहित्याची, नवविचारांची भूक आहे याची तीव्र जाणीव या सम्मेलनाने झाली. अनेक वक्ते असे होते कि त्यांना कधी जाहीर बोलण्याची संधीही मिळाली नव्हती. पण त्यांच्या भाषणांत जो गंभीर अभ्यास, विश्लेशनात्मक पद्धती व भविष्याच्या दिशांचा विचार उमटत होता ते पाहून अशा व्यासपीठाची तीव्र गरजही लक्षात आली. प्रस्थापितांनी ज्यांना कधी जवळ केले नाही, ज्यांचे जीवन साहित्याचा विषय बनू शकतो याचा विचार केला नाही त्यांनी स्वत:चे विश्व बनवण्यासाठी कष्ट उपसले तर काय चूक हा प्रश्नही माझ्या मनात उपस्थित झाला होता. या संमेलनाने ती वाट करून दिली. रानावनांत खुल्या आभाळाखाली वाढलेली, बहरलेली धनगर संस्कृती नव्या युगावर धनगरांचेच पुर्वज मौर्य व सातवाहनांप्रमाणे नव्या युगावरही आपला ठसा उमटवायला सज्ज झाल्याचे चित्र ठळक झाले ही या संमेलनाची फलश्रुती होती.

महाराष्ट्राला संस्कृती दिली ते ४३० वर्ष राज्य करणा-या सातवाहन घराण्याने. हे घराणे पुढे आले ते धनगरांतूनच. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा मराठीतील आद्य महाराष्ट्री प्राकृतातील काव्यसंग्रह. त्यातील जनजीवनाचे लोभस चित्रण हा आजही जागतिक वाड्मयात चर्चेचा व अभ्यासाचा विषय. आजच्या मराठीचा हा आद्य स्त्रोत. एका धनगरानेच मराठी साहित्य संस्कृतीचा पाया घातला. पण त्याची जाण मराठी सारस्वताने कधी ठेवली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाने तर कधी त्याचा नामोल्लेखही केला नाही. पण सोलापुरमधील ग्रंथदिंडीत मानाने विराजमान होती "गाथा सप्तशती". एवढेच नव्हे तर ग्रंथदालनाचेही नांव होते "हाल सातवाहन ग्रंथनगरी." हालाच्याच पावलावर पाऊल ठेवत धनगरी ओव्या आजपर्यंण्त कालौघातील भाषाबदल पचवत आजवर पोहोचले. आता पुन्हा नव्या स्वरुपात नवा साहित्य-उद्गार निघेल याची ग्वाही या संमेलनाने दिली. मीही माझ्या भाषणात, "जरी प्रस्थापित मराठी साहित्यातून धनगरांना अदृष्य ठेवण्यात आले असले तरी धनगर साहित्याची स्वतंत्र शैली निर्माण करणार..." असे सांगितले. हे उद्गार वृत्तपत्रांचे मथळे बनले. एकविसशे वर्षांनंतर हाल सातवाहनाचा जयजयकार महराष्ट्र भुमीवर निनादला.

या संमेलनात विविध परिसंवादांतील सहभागी सिद्धराम पाटील, सौ. संगीता चित्रकुटे, विकास पांढरे, सुभाष बोंद्रे, सारख्या विविध वक्त्यांनी धनगरी समाजाचे साहित्य व माध्यमांतील चित्रण समाधानकारक का नाही यावर अत्यंत अभ्यासपुर्ण चर्चा केल्या. परिसंवादांचे अध्यक्ष असलेल्या घनश्याम पाटील, सचीन परब यांच्यासारख्या महनीय अभ्यासक वक्त्यांनी त्यात अधिक आशय भरत चर्चांना निर्णायक स्वरुप दिले. प्राचार्य शिवाजी दलनर, डा. यशपाल भिंगेंने इतिहास व वर्तमानातील आव्हानांवर गांभिर्यपुर्वक विचार मांडले. अगदी आरक्षणावरही मुद्देसुद चर्चा झाल्या. कोणावरही टीका अथवा आगपाखड न करता एका संवेदनशील विषयावर चर्चा झाली हे विशेष. अन्यथा वाद आणि साहित्य संमेलन हे समीकरणच बनलेल्या काळात "निर्विवाद" झालेले हे एकमेव साहित्य संमेलन म्हणावे लागेल. अगदी समारोप सत्राचे अध्यक्ष व राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही राजकारणाला नव्हे तर साहित्य प्रेरणांना आपल्या भाषणात महत्व दिले हे महत्वाचे आहे.

हे साहित्य संमेलन भरवण्याचा विचार येणेच मुळात क्रांतीकारी होते. डा. अभिमन्यू टकले, जयसिंगतात्या शेंडगे, छगनशेठ पाटील यांनी नुसती कल्पना माम्डुन न थंबता हे संमेलन प्रत्यक्ष नेटकेपने होईल यासाठी अविरत कष्ट उपसले. अमोल पांढरे यांनी गेले तीन-चार महिने रात्रंदिवस मेहनत घेतली. संमेलनात एकदा निवेदन करत असतांना त्यांच्या आनंदाश्रुंचा बांध फुटला. एवढी ध्येयावरील अविचल निष्ठा आजकाल दुर्मिळ झाली आहे. पण एक इतिहास घडला तो या चौघांमुळे व त्यंना साथ देणा-या समाजबांधवांमुळे हे साहित्य इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल हे मात्र नक्कीच.

धनगरांचे स्वतंत्र संमेलन भरवणे म्हणजे जातीवाद नव्हे काय असा प्रश्न आधी मला काही लोक विचारत. मी एवढेच उत्तर देई कि "मला अध्यक्ष निवडले आहे यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे!" आणि खरेच संमेलनात जवळपास ४०% वक्ते हे अन्य समाजांतील होते. कसलाही भेदभाव अथवा कोणा जातीचे माहात्म्य गाण्याचा प्रयत्नही नव्हता. सर्वच वक्ते समरसून तळमळीने बोलले. आज महाराष्ट्रातील गढूळलेल्या जातीय वातावरणात सर्वैक्याचा संदेश देणारे हे संमेलन घडले हे या संमेलनाचे सर्वात मोठे यश होय. धनगरांनी भरवलेले सर्व जातीय संमेलन हेच त्याचे स्वरुप राहिले. यासाठी अखिल धनगर बांधव कोटीश: अभिनंदनास पात्र आहेत यात शंका नाही.

आता मुक समाजही बोलू लागले. राज्यकर्ते असोत कि समाजातील वर्चस्वतावादी घटक...ते जर घाबरत असतील तर संख्येला नव्हे तर विचारांना. समाज विचार करणारा व्हावा हे त्यांना मान्य नसते. धनगरच काय अन्य भटक्या विमुक्तांकडे, ओबीसेंकडे पाहण्याची जी साहित्य-उदासिनता आली आहे ती यातुनच! आता ते होनार नाही. अनेक समाजबांधवही आता आपला साहित्य उद्गार काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनासाठे लातूर शहराने निमंत्रण दिल्याचे श्री. संभाजी सूळ यांनी घोषित केले आहे. हा प्रवाह फोफावत एका नदाचे रुप घेईल...सारे बांधव साहित्य-विचारी होत प्रगल्भ भारताच्या दिशेने वाट चालतील याचा मला विश्वास आहे. त्यातच माझी कृतार्थता आहे.

येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषात भंडारा उधळत या संमेक्लनाचे अभिनव व खास धनगरी सांस्कृतिक पद्धतीने या संमेलनाचे उद्घाटन झाले. हा येळकोट साहित्याच्या विशाल वैश्विक प्रांगणात असाच निनादत राहील व नव्या पिढ्या अत्यंत सक्षमतेने आपल्या संवेदनांना...विचारांना मूक्त आवाज देत राहतील याचा मला विश्वास आहे.

Sunday, January 8, 2017

प्रज्ञावंत घडवण्याची गरज!

Image result for intellectualism

कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! पिढीमागून पिढी असा शृंखलाबद्ध प्रवास मानवी समाज करत असतो. आई-वडिल, शिक्षक आणि समाज हे नव्या पिढीवर काहीना काही संस्कार करणारे घटक असतात. समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. अमेरिकेतील मुलगा जी स्वप्ने पाहिल ती स्वप्ने भारतातील मध्यमवर्गातील मुलगा पाहीलच असे नाही. किंबहुना अशीही स्वप्ने असू शकतात याची तो कल्पनाही करू शकणार नाही. शेवटी व्यवस्था स्वप्नांनाही बंदिस्त करते.

याकडे आपल्याला अत्यंत व्यापकपणे व अनेक अंगांनी पहावे लागेल. नवीन पिढी घडवणारा महत्वाचा घटक असतो व तो म्हणजे शिक्षण! विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण!  शिक्षण म्हणजे जुलमाचा रामराम नसते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:तच एक स्वतंत्र विश्व असते, व्यक्तिमत्व असते. बाह्य प्रभाव जेवढे व्यक्तिमत्व घडवायला कारण घडतात त्याहीपेक्षा त्याच्या आंतरिक प्रेरणा महत्वाच्या ठरतात. या आंतरिक प्रेरणा लहानपणी सुप्तावस्थेत असल्या तरी व्यवस्था अशी असावी लागते कि वाढत्या वयाबरोबर त्या प्रेरणांचे सुयोग्य प्रस्फुटन होत सामाजिक संरचनेत महत्वाची भर घालणारा नागरिक तयार व्हावा. 

पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. आमच्या द्रुष्टीने ’सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने ठराविक विषय लादत, सर्वात पास होणे बंधनकारक करत, ज्याला अधिक मार्क तो हुशार अशी धारणा बनवून बसलो आहोत.  थोडक्यात मार्क हाच आमचा गुणवत्तेचा एकमेव निकष आहे. मेरिट अथवा गुणवत्ताही आम्ही त्यावरच मोजतो. "९७% मिळूनही प्रवेश नाही आणि ’त्यांना’ ५०% ला प्रवेश..." अशा प्रकारच्या सामाजिक दुहीतही अडकतो. ही एक वंचना आहे हे मात्र आपण मुलात समजावून घेतलेलेच नाही. मुळात ९७% मिळाले म्हणून त्याचे गुणवत्ता जास्त आणि कमी मिळाले म्हणुन गुणवत्ताच कमी असे ठरवण्याचे साधनच अस्तित्वात नाही. ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतलेली फसगत आहे.

मुळात आपली शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. ’नैसर्गिक कल’ आणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संध्या आम्ही नाकारलेल्या आहेत. थोडक्यात प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या भावी पिढ्या कशा घडणार नाहीत याचीच पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. सरच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत. पुन्हा वर आम्ही भावी विकासाच्या गप्पा मारतो ही तर मोठी विसंगती आहे. खरे म्हणजे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांना खुरटवणारी, संकुचित करणारी, त्यांचे कुतुहल व स्वप्ने छाटणारी, कौशल्याचा अभाव असणारी पिढी घडवत आहोत हे आमच्या लक्षात कधी आले नाही. या नव्या पिढ्याही मग तशाच पुढच्या साचेबंद पिढ्या घडवत जाणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

आज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. येथे असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच!

मग आम्ही आमची नवीन पिढी स्बल, सक्षम व प्रज्ञावंत बनवू शकलो नाही तर आमचे भविष्यही तेवढेच मरगललेले राहणार यात शंका नाही. आम्ही सर्व प्रश्नांवर आंदोलने करत आलेलो आहे. पण आमच्याच भवितव्याचा कळीचा प्रश्न जो आहे त्याबाबत मात्र आम्ही थंडगार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या इंटरन्यशनल म्हणवणा-या शाळांत भरमसाठ पैसे भरून मुलाला प्रवेश मिळवला कि आपण कृतकृत्य झालो असेच सर्व पालकांना वाटते. मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कशात करियर करावे हेही एकुणातला ट्रेंड पाहून ठरवले जाते. पण ज्याला हे सारे करायच आहे त्यालाच विचारात घेतले जात नाही. मतामतांच्या गलबल्यात तो दुर्लक्षितच राहतो व शेवटी मिळेल ती वाट चालू लागतो. एका अर्थाने आम्ही परिस्थितीशरण पिढी बनवत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्या व्यवस्थेतच दोष आहेत हे मान्य करू. हा दोष आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतील भरकटलेल्या दिशेमुळे निर्माण झाला आहे हेही आपण स्विकारू. पण चुका कधी ना कधी दुरुस्त कराव्याच लागतात. एका रात्रीत व्यवस्था बदलत नाही हे मान्य केले तरी व्यवस्था बदलासाठी मानसिकता बनवणे व पुढाकार घेणारे काहीजण तरी पुढे येणे महत्वाचे असते. आणि येथे तर पुढाकार पालकांना घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी पालकांनाच शिक्षण म्हणजे नेमके काय याची जाण व भान देणे आवश्यक आहे. वर्तमानाचेच ते आव्हान आहे. 

आज आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. राष्ट्रवादही आपापले स्वरूप बदलतांना दिसत आहे त्यामुळे भविष्यातील जागतिकीकरण नेमके कसे असेल हेही आपल्याला अंदाजावे लागेल. जागतिक ज्ञान अशी संकल्पना असली तरी सर्वच ज्ञान जगातील सर्वांनाच उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक राष्ट्रे आपापली गुपिते जपत असतात. त्यामुळे इतरांनी विकसीत करावे व मग त्यापासून आपण शिकावे अशी योजना भविष्यात अस्तित्वात येईलच असे नाही. खरे तर ज्ञानावर समस्त मानवजातीचा अधिकार हवा. पण तसे वास्तव नाही. आणि आपली सुरुवात तर ज्ञान म्हणजे काय या प्राथमिक स्तरावरच घुटमळते आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे अजून अगणित नागरिकांना तर माहितच नाही.  ते माहित नसेल तर भविष्यातील ज्ञान-क्रांतीच्या दिशा कोणत्या असतील हे नेमके कसे समजणार? त्या शोधण्यासाठी आम्ही भारतीय कसा प्रयत्न करणार? आजही उच्चविद्याभुषित या संदर्भात गोंधळलेले दिसतात. सामान्यांची मग काय गत असणार? 

भविष्यातील बुद्धीवाद आज आहे तसा राहणार नाही. भविष्यातील सामाजिक व आर्थिक आव्हानेही वेगळी असतील. त्याची प्रारुपे बदलतील. प्रश्नांचे गुंतवळे वेगळ्या स्वरुपात सामोरे येतील. किंबहुना जीवनशैलीच अत्यंत वेगळी बनलेली असेल. पण ती कशी असेल हे ठरवण्याचीही शक्ती आम्ही प्रगल्भ पिढ्यांच्या अभावात घालवून बसलेलो असू. प्रगल्भ पिढी घडते ती बंधमुक्त शिक्षणातून. मानवी प्रेरणांना अवसर देणा-या खुल्या व्यवस्थेतून. आज आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागणार आहे तो शिक्षणाबाबत, तिच्या पद्धतीबाबत. कार्यक्षम अंमलबजावणीबाबत. पालक ते शिक्षक आणि सभोवतालची व्यवस्थाच सक्षम नवी पिढी बनवू शकते. आम्हाला केवळ साक्षर नकोत तर बौद्धिक झेपा घ्यायला निरंतर सज्ज अशा प्रगल्भ वाघांची पिढी घडवायची आहे. त्यातच आमच्या समाजाचे, राष्ट्राच उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल.

-संजय सोनवणी

(Published in Daily Sanchar, 8-1-2017)

Thursday, January 5, 2017

सर्वैक्याच्या दिशेने...

(पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष संजय सोनवणी यांच्या अध्यक्षीय भाषणाचा सारांश.........)
मित्रहो,
सोलापुरात सुरू होणा-या पहिल्याच आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण आज एकत्र आलेलो आहोत. आदिम काळापासून मुक राहिलेल्या या समाजाचा साहित्यिक उद्गार प्रथमच नागरी संस्कृतीच्या प्रांगणात उमटत आहे. साहित्य धनगरांना नवीनं नाही. किंबहुना साहित्य-कला संस्कृतीचा पायाच धनगर-गवळी आदि पशुपालक समाजाने घातला आहे. मराठीतील, (महाराष्ट्री प्राकृतातील) पहिले काव्य संकलन केले ते हाल सातवाहनं या राजानेच. सातवाहन घराणे धनगर होते. हालाचे हे काव्य संकलन "गाथा सप्तशती" या नावाने जगविख्यात आहे. या संकलनात इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील जनजीवनाची, मानवी भावभावनांची जेवढी वेधक काव्यमय वर्णने मिळतात तेवढी नंतरच्या साहित्यातुनही मिळत नाहीत. हाल सातवाहन स्वत: कवि, त्याच्या स्वत:च्या गाथाही या संकलनात आहेत. कविकुलगुरु म्हणवल्या गेलेल्या कालिदासास कोण विसरेल ? तोही धनगर समाजातुनच आलेला कवी. भटक्या जीवनातून जे धनगर व गोपालक नागरी संस्कृतीत आले ते राजे, कवी तसेच विद्वान म्हणून आपल्याला प्रतिष्ठा मिळवतांना दिसतात. चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, हरीहर-बुक्क हे भारताची संस्कृती प्रतिष्ठित करणारे सम्राट याच जमातीतून आलेले. रोज खुल्या आभाळाखाली, गिरी-कंदरांत मेंढरे अथवा अन्य पशुंसोबत भटकंती असल्याने जगण्याच्या अविरत झुंजीतून पराक्रमही धनगरांच्या रक्तात भिनलेला आहे. त्याचे दर्शन वेळोवेळी इतिहासात झालेले आहे. अलीकडचेच उदाहरण म्हणजे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर, तुळसाबाई होळकर व आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भिमाबाई होळकर. यादी खूप मोठी आहे. एवढे सम्राट, महाकवी व समाजधुरिण देणारा बहुसंख्य समाज मात्र आपल्या आदिम काळापासून चालत आलेल्या पेशातच रमल्यामुळे तो आज नागरी संस्कृतीपासून दुरच राहिल्याचे दिसत आहे. तो आपली निसर्गाची ओढच जपतच राहिला आहे. त्याचवेळी नागरी शैलीचे अंधानुकरण न करता आपल्या कला संस्कृतीचीही जपणुक करत राहिला आहे.
धनगरांची जीवनशैली जशी स्वतंत्र आहे, तशीच त्यांची साहित्यशैलेही. ग. दि. माडगुळकर म्हणाले होते, "धनगरांची कला ही अनगड हि-यासारखी आहे. त्याला पैलू नसतील पण ते खरे हिरे आहेत. ते उकिरंड्यावर पडण्यासाठी नाहीत, मयूर सिंहासनावर चमकण्यासाठी आहेत. धनगर अडाणी असेल पण त्याला अक्षरातील नादब्रह्माची ओळख आहे. म्हणून हे काव्य माळरानावर जसे आहे, तसेच ते सर्वत्र गेले पाहिजे. महाराष्ट्र शारदेच्या व्यासपीठावर याला मानाचे पान मिळायला पाहिजे." धनगरी ओव्या, लोककथा सुंबरानातून मांडल्या जाताहेत गेली हजारो वर्ष. मौखिक परंपरेन या ओव्या-कथा पुढच्या पिढीत प्रवाहित होत राहिल्या आहेत. नवीन पिढ्या त्यात आपल्या कल्पनांचे भर घालत राहिल्या आहेत. त्या लिखित स्वरुपात न आल्याने भाषेचे विविध टप्पे आपल्याला माहित होत नाहीत. पण प्रवाहीपणाच भाषेला जीवंत ठेवतो. यात त्यांच्या धर्मकल्पना, दैवतकथा विपुलतेने येतात. प्रदेशनिहाय धनगरी बोलीही वेगळ्या. अलीकडे या समृद्ध साहित्याला ग्रंथबद्ध करायचे काम होत आहे. पण ते पुरेसं नाही. गुंथर सोंथायमर, सरोजिनी बाबर ही या प्रयत्नातील खूप मोठी नांवे.
धनगरांची नृत्यशैलीही आगळी वेगळी. त्याला गजानृत्य म्हणतात. थोडक्यात डोगर-द-यांत, माळरानांवर राहुन त्यांनी स्वत:च्या वेगळ्या धर्मश्रद्धा, कर्मकांडे, गीतकाव्य व नृत्यशैल्यांना जपले आहे. आद्य कवी हाल सातवाहनही ग्रामीण जीवनातील मुक्ततेला आपल्या काव्यात वाव देतो. किंबहुना स्वातंत्र्य हा धनगरांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे जो त्यांच्या काव्यातून उमटत आला आहे. मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला जे मुख्य कारण होणार आहे ते म्हणजे हालाची गाथा सप्तशती आणि सातवाहनांचे प्राकृतातील शिलालेख. मराठी भाषेचा उदयकालच त्यांच्यापासून सुरु होतो हे आपण येथे लक्षात घ्यायला पाहिजे.
धनगरांचा इतिहास मानवी संस्कृती जेवढी प्राचीन आहे तेवढाच प्राचीन आहे. धनगर-गोपाळांतीलच काहींनी शेतीचा शोध लावला. अनेक धनगर-गोपाळ शेतीकडे वळाले. स्थिर झाले. त्यातुनच अनेक व्यवसाय विकसित झाले. भारतात व्यवसायांच्या पुढे जाती बनल्या. नागरी जीवन सुरु झाले ते सिंधू संस्कृतीपासूनच. पशुपती शिव हा सर्वांचाच त्यामुळेच आराध्य राहिला. धनगरांच्या विठोबा, खंडोबा, बिरोबा, म्हस्कोबा, धुळोबा, जोतिबा इत्यादि अनेक देवता शिवाशीच अभिन्न नाते सांगतात ते यामुळेच. पण मोठा समाज नागरी जीवनाकडे वळाला व पुढे वेगवेगळ्या जातीनामांनी ओळखला जाऊ लागला तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे सर्वांचेच पुरातन पुर्वज पशुपालकच होते. ज्यांनी आपल्या आदिम व्यवसायाचा त्याग केला नाही, आजवर पशुपालकाचेच जीवन जगत आले, त्यांच्याबाबत सर्वांनी कृतज्ञ रहायला हवे.
कृतज्ञ रहा म्हणने ठीक आहे, पण तसे चित्र नाही. नागरी समाजाने धनगर समाजावर नको तेवढे अतिक्रमण केले. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक देवतांचे बाह्य स्वरुप बदलता आले नसले तरी कृत्रीम कथा निर्माण करून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मौर्य, सातवाहन हे धनगरांतून आलेले सम्राट, पण त्यांच्या जन्माबाबत एवढ्या बनावट कथा रचल्या कि सत्य हाती लागुच नये. थोडक्यात ते धनगर होते हे अमान्य करण्यासाठीच बनावट कथा बनवल्या गेल्या. अन्यथा एवढ्या परस्परविरोधी कथा बनवण्याचे कारण काय ? चंद्रगुप्ताच्याच जन्माविषयी किमान सोळा कथा आपल्याला सापडतात. पण त्याच्या गुरुबाबत तो कोण होता, कोणत्या जातीचा होता हे मात्र ठाम माहित असते. असे कसे हा प्रश्न इतिहासकारांनीही विचारला नाही, कारण त्यांना उत्तर द्यायचे नव्हते. सातवाहनांचेही असेच झाले. अलीकडच्या काळातील मल्हारराव, यशवंतराव यांचे पराक्रम व त्यांचे मुळ लपवता येणे तर शक्य नाही म्हणून कल्पोपकल्पित कथा निर्माण करून बदनाम केले गेले. भिमाबाई होळकरांनी १८१७ पासून तब्बल दीड वर्ष इंग्रजांशी स्वातंत्र्याचा अथक लढा दिला, पुढे त्या फितुरीने कैद झाल्या व मरेपर्यंत तब्बल ३६ वर्ष आयुष्य कैदेत घालवले. त्यानंतर १८५७ घडले. एवढे असुनही भारतीय इतिहासाने त्यांची आद्य महिला क्रांतीकारक म्हणून दखल घेतली नाही. दखल घेतली ती पाश्चात्य इतिहासकारांनी. यशवंतरावांच्या पत्नी महाराणी तुळसाबाईंनी यशवंतरावांच्या निधनानंतर १८११ ते १८१७ पर्यंत इंग्रजांनी घोर प्रयत्न करुनही इंदौर संस्थानात पायसुद्धा ठेवू दिला नाही. त्या तर मराठी जनतेला माहितही नाहीत, कारण त्यांच्यावर लिहिलेच गेले नाही. आणि नागरी शैलीत इतिहास मांडायची, कथा-कादंब-या लिहिण्याची रीत धनगरांना माहित नाही. त्यामुळे प्रतिवाद करायला अथवा पुराव्यानिशी सत्य मांडायला येणार कोण? यामुळे दुर्लक्षाचे वातावरण कायम राहिले.
तसाही भारतीय समाज इतिहास लेखन व जतनाबाबत उदासीन. शास्त्रशुद्ध इतिहास लिखानाची सुरुवात आपल्याकडे इंग्रजकाळानंतर लडखडत सुरु झाली. तत्कालीन वरिष्ठ नागरी समाजांनी आपापले इतिहास शोधायला सुरुवात केली. प्रसंगी त्यातही अनेकदा खोटेपणा, स्वत:ला उंचावण्यासाठी इतरांना दोष देणे अशा लबाड्या केल्या. मग जे नागरी समाजाबाहेरचे घटक होते त्यांना मुळात असले काही होतेय, याची जाणच नसल्याने लबाड्या काही काळ पचुनही गेल्या. अशा स्थितीत त्यांच्या इतिहासाकडे कोण लक्ष देणार ? कोण त्यांना त्यांचे श्रेय देण्याचा उदारपणा दाखवणार ? आपल सामाजिक वास्तव आपल्याला समजावून घ्यावे लागते. मुक, बुजरा व अशिक्षित धनगर समाज आपला इतिहास जगण्याच्या लढाईत विसरुन गेला होता. असे बव्हंशी बहुजनीय जातींबाबत झाले. एवढे कि आपल्याला इतिहासच नाही असे त्याला वाटु लागले. पण ते वास्तव नाही. एखाद्या खेड्यातील थोरल्या भावाने काबाडकष्ट करत लहान्याला शहरात शिकायला पाठवावे, लहान्याने स्वत:ला प्रगत समजत थोरल्याला मात्र नंतर टाळत रहावे...किंबहुना विसरुनच जावे असा प्रकार घडलेला आहे. या विस्मरणाच्या गर्तेतून बाहेर पडणे आवश्यक होते.
पण अलीकडे धनगर जमात आपल्या कोषातून बाहेर पडू पहात आहे. आपल्या इतिहासाबाबत तो कधी नव्हे एवढा सजग झाला आहे. या सजगतेत अभिनिवेश नाही. जातीय अहंकाराचे पुटे त्याला चढलेली नाहीत. स्वत:चा शोध घेण्याची ही प्रक्रिया आहे व ती सर्वच मानवी घटकांसाठी आवश्यक आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ निकोप इतिहासातून समजतो. संस्कृतीला दिलेल्या योगदानातुन समजतो व भवितव्याच्या उज्ज्वल दिशा त्यातुनच उलगडत जातात. डा. गणेश मतकर, मधुकर सलगरे ते तरुण पिढीचे होमेश भुजाडे असा हा स्वशोधनाचा प्रवास धनगर समाजाने केला आहे. हा प्रयत्न पुरेसा नाही हे उघड आहे. अजुनही इतिहासाची असंख्य दालने अंधारात आहेत. विविधांगाने चिकित्सा करण्याची ऐतिहासिक दृष्टी मिळवायची आवश्यकता आहे. ते कार्य नवीनं पिढी धनगर इतिहास परिषदेच्या माध्यमातून करेल असा मला विश्वास आहे.
साहित्य हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण असतो. आपण मराठी साहित्य पाहिले तर त्यात धनगरी जीवनाचे चित्रण अभावानेच आढळेल. त्यांची स्वप्ने, जीवनशैली, सुख-दु:खे व संघर्षाची परिमाने नागरी समाजापेक्षा अत्यंत वेगळी असुनही, साहित्त्यिक प्रेरणांना आव्हान देणारी असुनही अन्य साहित्यिकांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. हे चित्र समाधानकारक नाही. एक मोठा आदिम संस्कृतीला येथवर घेऊन येणारा समाजघटक साहित्यात मात्र अदृष्य असावा हे अनाकलनीय आहे. किंबहुना आपल्या साहित्यिकांची दृष्टी एवढी विशाल नाही याचेच हे द्योतक आहे. अलीकडे धनगर समाजातुन नवे कवी, कथाकार व कादंबरीकार उदयाला येत आहेत हे खरे आहे. सुरेश पां. शिंदे यांची "मेंढका" व शिवाजीराव ठोंबरे यांची "डोंगरापल्याड" या कादंब-या धनगरांच्या भटक्या जीवनातील आशय समृद्धपणे मांडतात. हाल-अपेष्टा व थोडीबहुत वाट्याला येणारी सुखेही समर्थपणे मांडतात. पण मुख्य प्रवाहाने या कादंब-यांची दखल घेतली असल्याचे आपल्याला पहायला मिळत नाही. ही वृत्ती मराठी साहित्यसृष्टीने सोडली पाहिजे. अधिकाधिक साहित्य निर्माण व्हावे, वाचले जावे व धनगरी जीवनाशी सर्वांनीच साहित्यातून तरी जोडले जायला हवे. आपल्या मुळ संस्कृतीच्या प्रेरणा कोठून आल्या हे आधुनिक समाजाला त्याशिवाय समजणार नाही.
धनगर समाज आपल्या परंपरागत व्यवसायातुन फेकला जायची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर तर त्याला अधिकच हवालदिल केले. चरावू कुरणे हाच ज्या संस्कृतीच्या जगण्याचे साधन तीच हिरावली गेली. भारतात ब्रिटिश काळापुर्वी २२% क्षेत्र हे चरावू कुरणांचे होते. सरकारी धोरणे, लबाड राजकारणी यामुळे महाराष्ट्रात आज अवघे १.८% क्षेत्र हे चरावु कुरणांचे उरले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत मोलाचे भर घालणारा उद्योगही संपण्याच्या बेतात आहे. जे किमान ४०% धनगर आजही मेंढपाळीवर कसेबसे अवलंबून आहेत तेही भविष्याच्या प्रश्नाने ग्रासले आहेत. एक जगण्याचे साधन हिरावून घेतांना पर्याय द्यायला हवा याचे भान कोणत्याही सरकारने ठेवले नाही. त्यामुळे मिळेल त्या अन्य क्षेत्रांत जगण्यासाठी धनगर बांधव प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना एक दिशा व मार्गदर्शन नसल्याने जी ससेहोलपट होते आहे ती पाहून कोणाचेही अंत:करण हेलावल्याखेरीज राहणार नाही. पण हा समाज आजही तेवढाच दुर्लक्षित आहे जेवढा होता. साहित्य काय व माध्यमे काय, तीही त्यांच्याबाबत उदासीनच राहिली असावीत हे दुर्दैवच आहे. बहुतेकांच्या दृष्टीने हा समाजच अस्तित्वात नाही एवढे घोर दुर्लक्ष या समाजाप्रत आहे.
पण हे साहित्य संमेलन हे विराट भविष्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. या मुक बांधवांचा साहित्यिकच नव्हे तर आत्मोद्गार आपल्याला ऐकण्याची ही संधी आहे. धनगर बांधव हा सर्वांचाच आहे, राहणार व सर्वांच्या हातात हात घालून प्रगती करणार याची ग्वाही म्हणजे हे संमेलन आहे. धनगर समाज म्हणजे आजवर नागरी समाजाने अव्हेरलेला थोरला भाऊ. धाकट्या भावाला थोरल्याच्या जवळ घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. या संमेलनात आयोजित विविध परिसंवादांतून व्यापक विचारमंथन होईल, सकारात्मकतेच्या दिशेने सर्वच जातील ही अपेक्षाही आहे. आजच्या जातीय गढूळ वातावरणात भरणारे हे संमेलन म्हणजे सर्वैक्याची घोषणा करणारे महत्वाचे सकारात्मक पाऊल आहे. डॉ. अभिमन्यू टकले, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे, जयसिंगतात्या शेंडगे व त्यांच्या सहका-यांचे मी त्यासाठी आभार मानतो.
धन्यवाद.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...