Thursday, October 21, 2021

मोहम्मद पैगंबरांचे विवाह!

 मोहम्मद पैगंबरांच्या अनेक विवाहांबद्दल अधून मधून चर्चा होत असते. प्रथम हे लक्षात घ्यावे लागते कि अरब हे कबिला जीवनातील होते आणि बव्हंशी कबिले इस्लाम-पुर्व काळात आपापसात लढयांमद्ध्ये गर्क असत. वाळवंटी प्रदेशामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी असल्याने मांसाहारावरच अधिक भर होता. माणसाच्या खाद्यप्रथा, वस्त्र संस्कृती व धर्मसंस्कृतीवर ज्या पद्धतीने जीवनयापन करावे लागते त्याचा मोठा पगडा असतो. या सामाजिक संस्कृतीकडे तेथील भौगोलिक परिस्थितीच्याच चौकटीत पहावे लागते.

पैगंबरांनी आयुष्यात एकुण तेरा विवाह केले. काही सुत्रांच्यानुसार ही संख्या १६ आहे. याखेरीज त्यांच्या दासीही होत्या अशी मान्यता आहे. त्यांची पहिली पत्नी खदिजा ही त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्ष मोठी होती. ती विधवा होती. श्रीमंत होती. विवाहानंतर उभयतांना ६ अपत्ये झाली. त्यामुळे खदिजा ही पैगंबरांपेक्षा जास्त वयस्कर नसावी असे काही विद्वान मानतात. पैगंबरांना सुरुवातीच्या काळात तिने मोठी मदत केली. ती व्यावसायिक व्यवस्थापनात कुशल होती. पैगंबरांना कुराण स्फुरू लागले व त्यांना विरोध सुरु झाला त्या काळात खदिजा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. खदिजाच्या मृत्युपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. या काळात ते मक्केतच होते. हा काळ त्यांच्या दृष्टीने संघर्षपुर्ण होता.
अरब टोळ्यांत निरंतर असनारा अंतर्गत संघर्ष संपवायचा असेल तर त्यांच्यात एकवाक्यता आणने गरजेचे होते. प्रत्येक टोळीची स्वतंत्र पाषाणदैवते होती व ती सर्व मक्का येथे स्थानापन्न होती.
मदिनेला हिजरत केल्यानंतर पैगंबरांनी सावदा या इस्लाम स्विकारलेल्या व त्यामुळे त्रास व कष्ट स्विकाराव्या लागणा-या मुलीशी विवाह केला. ९ वर्षेय अयेशाशी नंतर पाठोपठ विवाह केला. आयेशा ही अबु बक्रची मुलगी होती आणि अबुही इस्लाम सर्वप्रथम स्विकारण-यांपैकी होता. या काळात इस्लाम स्विकारलेले लोक कमी होते. आयेशाचा विवाह आधी एका गैर-इस्लामियाशी ठरलाही होता. पण अबु बक्रच्या विनंतीनुसार त्यांनी तिच्याशी विवाह केला. आयेशा अल्पवयीन होती व तिच्याशी विवाह केल्याबद्दल पैगंबरांवर आरोप केला जातो. पण अरब मुली लवकर वयात येत आणि लग्न ठरल्त्यानंतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष विवाह झाला.
खदिजाप्रमानेच इस्लामच्या प्रसारात आयेशाचा मोठा वाटा आहे. ती विद्वान तर होतीच पण पैगंबरांच्य देहांतानंतर जवळपास ४४ वर्ष इस्लामच्या प्रसारात घालवली. हदिथमधील बरेच लेखन तिचे मानले जाते.
आयेशानंतर पैगंबरांनी अनेक विवाह केले. ते बव्हंशी मक्केतील युद्धात झालेल्या विधवांशी. या बहुविवाहांमागे अनेक कारणे दिली जातात.
१) विविध टोळ्यांशी रक्तसंबंध जुळवत त्यांचा विरोध सौम्य करणे.
२) विधवांबाबतचे त्यांचे अनुकंपेचे धोरण.
३) इस्लामचा प्रसार.
काहीही असले तरी पैगंबरांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्युपर्यंत दुसरा विवाह केला नाही हे एक वास्तव आहे. अरबांत बहुपत्नीकत्व (भारतात होते तसेच) ही सर्वसाधारण बाब होती. अल्पवयीन मुलीशी विवाह (जे भारतातही विपुलतेने होत) नवीन नव्हते. सुरुवातीच्या काळात इस्लामियांची संख्या कमी असल्याने मुली द्यायच्या कोनाला हाही प्रश्न उपस्थित झाला असेल.
इस्लामच्या निर्मितीला आणि त्या धर्मश्रद्धांना तत्कालीन समाजस्थिती आणि जेथे हा धर्म स्थापन झाला त्याचा भुगोल विचारात घ्यावा लागतो. पैगंबरांनी धर्माच्य नांवाखाली आपापसात लढणा-या अरबांत ऐक्य साधले. इस्लाम नंतर झपाट्याने पसरला. पण अरबी भुगोल आणि त्यानुसार असणा-या खाद्य आणि इतर वेषभुषेसहितच्या प्रथाही अन्य भागांतील भुगोलांचा विचार न करता अंधपणे लादल्या गेल्या अथवा धर्माच्या नांवाखाली स्विकारल्या गेल्या. अरबस्तानातील वाळुची वादळे, उष्मा यामुळे पुरुषांना तोंड झाकणारा सफा व पायघोळ वेष आवश्यक होता तसाच स्त्रीयांना बुरखा. अन्यत्र मात्र हा वेष हेच इस्लामचे प्रतीक ठरवले गेले. तत्कालीन गरजा या सर्वत्र व सार्वकालिक व अपरिवर्तनीय बनवल्या गेल्या. अन्य प्रांतांतील धर्मांतरित मुस्लिमांनी यावर फार गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही. आंधळा परंपरावाद हा सर्वच धर्मियांना दिर्घकाळात अडाणी, अप्रागतिक आणि कर्मठ बनवत नेतो. पैगंबरांनी त्यांच्या काळापुढे जाऊन आपले त्या परिस्थितीत पुरोगामीत्व दाखवले.
नंतर धर्मात क्रांती घडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. इजिप्तचे अध्यक्ष सिसि यांनी याच वर्षी इस्लाम जागतिक हिंसेचा प्रमुख स्त्रोत बनत आहे व ते टाळण्यासाठी धर्मग्रंथांचे नव्याने अर्थ लावले गेले पाहिजेत असे म्हटले होते. पण आयसिस दुसरीकडे याच धर्मक्रांतीच्या नांवाखाली मुलतत्ववादाकडे गेली आहे. अन्यत्र इस्लाम हा अजुनही रुढीवादी म्हणुनच ओळखला जातो. धर्म ज्या काळात, जेथे, ज्या परिस्थीतीत निर्माण झाला त्या स्थित्या आज अस्तित्वात नाहीत, त्यामुळे आपापल्या प्रदेशाच्या निकडीनुसार त्यात बदल घडवायला हवा हे इमाम-मुल्लांना व सर्वसामान्य मुस्लिमांनाही समजायला हवे.

Friday, October 15, 2021

ती नाजूक पावले

 ती नाजूक पावले
स्वप्नात
अजुनही
कधी कधी
वाजतात
स्वप्न विखरून पडते
त्या नाजूक पायतळी
....
तिने जायलाच हवे होते काय?

Saturday, October 9, 2021

सांस्कृतिक अपहरण?

 

भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मी म्हणालो होतो कि...
"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर जाऊन बोला. तुम्ही शहाणे आणि खरे असाल तर समोरच्यांपैकी किमान दोन लोक तरी तुमचे विचार समजावून घेतील. दोनाचे चार आणि चाराचे आठ व्हायची प्रक्रिया त्यातुनच सुरु होईल. समतेचे विचार ख-या समतावादी आचरणातुनच जातात. विचार हे सर्वांसाठीच असतात. तुमचे विचार पक्के असतील तर कोणाहीपुढे कधीही तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. सत्याचा तोच महिमा आहे. कोणी संस्कृतीचे अपहरण केले असे आपण म्हणतो तेंव्हा फक्त आरोप करुन चालत नाही तर पुराव्यानिशी तसे सिद्ध करावे लागते. आमचा सांस्कृतिक अभ्यासच मुळात नगण्य आहे....मग नुसते आरोप करुन आमची संस्कृती काय होती आणि अशी का झाली हे कसे समजणार? आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल? पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार? बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार? आम्ही गेल्या वर्षी हीच अभिवादने करतांना जिथे होतो तिथेच आजही आहोत आणि पुढच्या वर्षीही तिथेच राहणार असू तर आम्ही पुरोगामी कसे?
"संस्कृतीची अपहरणे झाली आहेत. पुरातन वारसा नाकारायच्या नादात आम्हीच आमचेच व्यास-वाल्मिकी ते कालिदास नाकारत गेलो आहोत. आम्ही सारेच नाकारायच्या नादात आम्हाला संस्कृतीच नव्हती हेच उरबडवेपण करून सांगत आहोत. पण सिंधू संस्कृती आज समजते ती तत्कालीन कुंभारांच्या मृद्भांड्यामुळे, शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे, गवंड्यांच्या शिस्तबद्ध बांधकामांमुळे, मुर्तीकारांच्या रचनांमुळे आणि अलंकार बनवणा-या कारागिरांच्या कुशल कारागिरीमुळे. आम्हाला ही संस्कृती समजते ती देशोदेशी व्यापार करणा-या तत्कालीन साहसी, दर्यावर्दी व्यापा-यांमुळे आणि त्यांना लागणारी शिडाची भव्य जहाजे बनवणा-या सुतारांमुळे. वैदिकांचे साहित्य आम्हाला आमचा इतिहास सांगत नाही. वैदिक साहित्यात आमचा इतिहास शोधणे मुर्खपणाचे आहे. आमचा इतिहास प्रत्यक्ष पुराव्यांनी सामोरा आहे....शाब्दिक नाही...आणि प्रत्यक्ष जे असते तीच संस्कृती असते....लेखनात चो-या, प्रक्षेप होऊ शकतात....प्रत्यक्ष वास्तवदर्शी वस्तुंत नाही. आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा आहे...लेखनिकांचा नाही हे आपण समजावून घेतले पाहिजे.
"सांस्कृतिक अपहरण झाले आहे हे खरे मानले तरी आमचे काय होते हे शोधायची आमची तयारी नाही. किंबहुना सारे काही नाकारायचेच ठरवले असेल तर मग आज आम्हाला आमची संस्कृतीच नाही हेही मान्य करावे लागेल. बरे, तेही ठीक आहे असे समजू. पण मग आम्ही नवी संस्कृती घडवायला तरी तयार आहोत काय? नाही. संस्कृती ही अर्थकारण, सत्ताकारण आणि त्याहीपेक्षा मोठे म्हणजे ज्ञानकारण यातून साकार होते. अर्थकारण म्हणावे तर आमचा डोळा गेला बाजार नोक-यांवर. सत्ताकारण म्हणावे तर ते आजही भिकेच्या तुकड्यांवर. आणि ज्ञानकारण....ते तर आम्हाला आजही दुरचे स्वप्न झाले आहे. त्याच्या अभावात संस्कृतीचे पुनर्रचना अशक्य आहे, याचे भान आम्हाला जर येत नसेल तर आमचे कसे होणार यावर आम्हीच नीट विचार केला पाहिजे."

Sunday, October 3, 2021

ओडीसी

 ओडीसी

-संजय क्षीरसागर



काल रात्री संजय सोनवणी यांची ' ओडीसी ' हि कादंबरी वाचली. ' ओडीसी '. ग्रीक इतिहासावर आधारित या कादंबरीतील पात्रं, त्यांची पार्श्वभूमी सारं काही अपरिचित ! तरीही हि कादंबरी आपली वाटणारी ! यातील मनुष्य स्वभाव, संवाद, तत्वज्ञान सारं काही इथलचं. या मातीतलंच वाटणारं. जणू काही रोजच्या आयुष्यात अनुभवला येणारं !
या कादंबरीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील सात प्रमुख व्यक्तिरेखा या कमालीच्या परस्पर विरुद्ध असून एका पात्राचा दुसऱ्या पात्रावर अजिबात प्रभाव नाही. पात्र निर्मिती मधील हि विविधतता क्वचित अनुभवास येते. तसेच या सात पात्रांपैकी ६ पात्रं म्हणजे मानवी विकारवश मनाचे पुतळे आहेत. मनात उद्भवणाऱ्या विकारांच्या आहारी जाऊन मनुष्य एखादे कृत्य करून बसतो व परत आपल्या कृतीचे जोरदार समर्थन --- तेही उदात्त भावनेने प्रेरित होऊन केलेलं कृत्य --- असं करतो याचे हे उत्तम चित्रण आहे. सातवी व्यक्तिरेखा हि तत्ववेत्त्याची असून स्थितप्रज्ञ मनुष्यच असतो हे दर्शवणारी आहे.
कादंबरीचा मुख्य नायक आहे ओडीसियस. ओडीसियस हा देखील एक मनुष्यच आहे. तो पण विकारवश होतो. चुका करतो. परंतु, त्यातून धडाही शिकतो. प्रसंगी नियतीवर मात करण्याचं धाडस दाखवतो. माझ्या मते, ओडीसियस म्हणजे मनुष्य जातीच्या विकासाचं प्रतिक आहे. हजारो वर्षे अनेक संकटांना तोंड देत आपली प्रगती साधत आलेल्या मनुष्य जातीचं प्रतिक म्हणजे ओडीसियस ! परंतु, निव्वळ एवढ्याच मर्यादेत ' ओडीसियस ' ला बसवता येत नाही. हेच तर कादंबरीकाराच मुख्य वैशिष्ट्य आहे कि, फक्त ओडीसियसच नव्हे तर यातील सातही पात्रं ठराविक अशा कोणत्याही साच्यात न बसवता येणारी आहेत. हि माणसं मनुष्य स्वभावाचं प्रतिनिधित्व करतात. कधी विकारांच्या अधीन होतात तर कधी निर्मोही बनत तत्ववेत्त्याचे रूप धारण करतात. जणू काही कादंबरीकाराचं मानसिक द्वंद्व या पात्रांच्या रूपाने आपल्या समोर येते.
मानसिक द्वंद्व यासाठी कि, हि पात्रं शब्दबद्ध करताना लेखक या ७ ही व्यक्तिरेखा जगला आहे. या पात्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांचे बव्हंशी संवाद काव्यमय भाषेत आहेत. काव्यमय भाषेत ७ विविध व्यक्तिरेखांचे स्वभाव रेखाटने, संवाद लिहिणे हे कार्य ३० वर्षांचा तरुण करतोय हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. एक लेखक म्हणून व एक वाचक म्हणून पण !
कादंबरीच्या प्रथम आवृत्तीचे मी वर्ष पाहिले तर ते १९९४ असून लेखकाचे जन्मवर्ष १९६४ आहे. म्हणजे या कादंबरीचे लेखन सोनवणीने वयाच्या २९ - ३० व्या वर्षी केले. माझ्या समवयस्क या तरुण लेखकाच्या कलाकृतीकडे एक लेखक म्हणून मी पाहतो तेव्हा प्रथम ईर्षेचा भाव मनात जागुत होतो व नंतर कौतुकाचा ! ईर्ष्या इतक्यासाठी कि, याच वयात मी हे असं का लिहू शकत नाही ? माझ्या लेखणीत, शब्दभांडारात एवढं सामर्थ्यं का नाही ? तर कौतुक यासाठी कि, तिशीच्या आतील व्यक्ती अवघ्या सव्वाशे पानांत कादंबरीमय पण काव्यमय भाषेत तत्वज्ञान लिहिते आणि वाचकांच्या गळी उतरवण्यात, त्यांना अंतर्मुख करण्यात यशस्वी होते.

Saturday, October 2, 2021

देशाला वैभवाच्या शिखरावर नेणारा प्राचीन वस्त्रोद्योग!

 


आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. शिकारी मानव पशुपालक मानव बनला हा मानवी जीवनशैलीच्या बदलाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मनुष्य अद्याप भटकाच होता. चरावु कुरणांच्या शोधात त्याला सतत भटकावेच लागे. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली असावी. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. कल्पना सुचुन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जे सायास पडले असतील...त्यासाठी जी कृत्रीम साधने बनवायला जी प्रतिभा वापरावी लागली असेल तिची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हजारो प्रयत्न वाया गेल्यानंतरच त्याला वस्त्रनिर्मिती जमली असनार. त्यासाठीचा त्याचा पराकोटीचा संयम आदर वाटावा असाच आहे.


 भारतात अकरा हजार वर्ष जुन्या वस्त्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळालेत तर सिंधु संस्कृतीतही हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किचकट व कष्टदायक प्रक्रिया होती. त्यामुळे भारतात विनकरांनी लावलेला महत्वाचा शोध म्हणजे हातमागान्चा. त्यामुळे इसपु ३५०० ते इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर भारताने स्वामित्व गाजवले. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. भारतीय विणकरांनीव अवघ्या जगात भारताची निर्विवादपने शान वाढवली.अगदी इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. याचाच अर्थ असा कि सनपुर्व ३२०० पासुनच भारतीय सुती वस्त्रे जगभर पसरु लागली होती.

जातककथा, ब्राह्मणे, जैन साहित्यात विविध प्रकारच्या वस्त्रांच्या व विणकर व्यवसायाबाबतच्या नोंदी मिळतात. ढाक्क्याची मलमल, बनारसी वस्त्रे (भारतात बनारसी साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध.) पैठणच्या सुप्रसिद्ध पैठण्या व सुती व रेशमी तलम वस्त्रे, याचे जगावर अद्भुत गारुड पसरले होते. इतके कि भारतीय मलमली वस्त्रंसाठी रोमचे नागरिक एवढा पैसा (सोन्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली आणि त्यामुळे रोमचा बादशहा अस्वस्थ झाला. ही हकीकत इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी (थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवली आहे.


 या निर्माणकर्त्यांनी आपले कौशल्य वापरत असंख्य पोतांची, नक्षांची, संरचनांची वस्त्रे निर्माण केली. देशाची पत जगभर वाढवली. सिंधु संस्कृतीच्या काळानंतर चेऊल, सोपारा, भडोच ई. बंदरांतुन वस्त्रांचे तागे निर्यात होत. भरतकामातही एवढी प्रगती केली कि मार्को पोलो या जगप्रसिद्ध प्रवाशाने तेराव्या शतकात भारताला भेट दिल्यावेळी आपल्या प्रवास वर्णनात भरतकामातील अद्भुत प्रगतीबद्दल भारतीय कोष्ट्यांची/साळ्यांची मनसोक्त तारिफ केली आहे. पेरिप्लसनेही पहिल्या शतकातील आपल्या ग्रंथात येथील मलमली वस्त्रांची तारीफ केलेली आहे.


      विदेश व देशांतर्गत व्यापारामुळे देशाचे आर्थिक वैभव तर वाढलेच पण विणकर व्यावसायिकाचीही  आर्थिक भरभराट होत गेली. हातमागाच्या शोधामुळे हा उद्योग ख-या अर्थाने देशातील पहिला इंजिनियरिंग उद्योग बनला. कापुस व हातमाग भारतातून युरोपमद्धे गेले ते इसपू चवथ्या शतकातील अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीस. थोडक्यात या विणकर व्यवसायाने जगभर अद्भुत गारुड निर्माण केले. त्या काळात  भारतात एक नाही-दोन नाही...जवळपास दोनशे प्रकारची वैविध्यपुर्ण वस्त्रे निर्माण होवू लागली होती...यावरुनच विणकरांच्या प्रतिभेची कल्पना करता येवू शकते. या व्यवसायातील समृद्धी पाहून तिस-या शतकानंतर राजसत्ताही या उद्योगात पडल्याचे आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरुन दिसते. विणकामाचे सरकारी कारखाने निघू लागले. विणकरांना तेथे स्वतंत्र उद्योग सोडुन नोक-या करणे भाग पडु लागले. ही एकार्थाने वेठबिगारीच होती. घायपात, कापुस, लोकर, गवत, झाडांच्या साली व तागापासुन तंतू काढणे, कातणे व त्याची वस्त्रे विणने ही कामे सरकारी देखरेखीखाली होऊ लागली. सूत कातायचे काम विधवा, दंड देण्यास असमर्थ असणा-या स्त्रिया, जोगिणी व वेश्यांकडुन करवून घेवू जावू लागले. या काळात (इसवी सन ३०० ते ६००) विणकरांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर मात्र जशी राजकीय स्थिती बदलली, पुन्हा विणकर स्वतंत्र झाले. पण राजसत्तांनी या उद्योगात उडी घेतल्यापासून शतकापासुनच विणकरांचे काम हे हलक्या प्रतीचे मानले जावू लागले हा आपलाच सामाजिक दोष होता.

 असे असले तरी या व्यावसायिकांनी जिद्द सोडली नाही.  तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे. बु-हाणपुरही या काळात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते.

 
 अठराव्या शतकापर्यंत आपल्या विशिष्ट कौशल्याने जगभर आदराचे कारण बनुन राहिलेल्या वस्त्रोद्योगाला  शेवटचा झटका दिला तो औद्योगिक क्रांतीने. पण याच उद्योगाने भारताला हजारो वर्ष आर्थिक सुस्थितीत ठेवले हा इतिहास आपण विसरता कामा नये.

-संजय सोनवणी

 


ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...