Sunday, July 24, 2016

वैदिकांना याची एवढी निकड का?

सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती हे सिद्ध करण्यासाठी काय उपद्व्याप चालले आहेत हे पाहिले तर थक्क व्हायला होते. सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे व ती वैदिक संस्कृती असल्याचे अनेक दावे केले गेले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असाच दावा करत एक ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असा दावा केला. याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्याचा एकही पुरावा नव्हता आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर घोड्यांभोवती फिरते! त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व होते हे दाखवण्याची त्यांना निकड होती. त्याशिवाय सिंधु संस्कृती वैदिकांची निर्मीती हे कसे सिद्ध करणार?

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक (The Deciphered Indus Script-1999) प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आनली. या लेखात त्यांनी वैदिकवाद्यांच्या बनावटगिरीवर कठोर टीका केली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी बैलाच्या (Unicorn) मुद्रेला संगणकीय आधार घेत पुर्ण करत तो बैल घोडा असल्याचे कसे दाखवले आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. (http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm या लिंकवर हा लेख उपलब्ध आहे.) यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली.

प्रश्न हा कि सिंधू संस्कृतीचे निर्माते हे वैदिक आर्य हेच होते हे सिद्ध करण्याची निकड वैदिकवाद्यांना का भासते? त्यासाठी बोगस दावे आणि चक्क फोर्ज-याही का केल्या जातात? एतद्देशियांचे (हिंदुंचे) सांस्कृतिक संचित लुबाडत वैदिक सांस्कृतिक स्ववर्चस्वतावाद निर्माण करणे हाच एकमेव उद्देश त्यामागे आहे हेच त्यातून दिसत नाही काय?

Friday, July 22, 2016

असे घडले असते तर

जर काही असे घडले असते तर आपण सुसंस्कृत देशाचे नागरिक आहोत हे दिसले असते.

१) १९९० ला काश्मीरी पंडितांचे जे हत्याकांड आणि निर्वासन झाले याबाबत देशभरातील मुस्लिमांनी आक्रोश केला असता....

२) हिंदुंनीच बाबरी मशीद न पाडता न्यायालयीन आदेशाचा सन्मान ठेवला असता.

३) अखलाख प्रकरणात बहुसंख्य लोक त्याच्या बाजुने जसे उभे राहिले तसे मुस्लिमही बहुसंख्येने वेमुला किंवा अन्य कोणत्याही गैरैस्लामी अन्यायाविरुद्ध उभे राहिले असते
.
४) साध्वी ते पार सा-या महंतांची अधार्मिक वक्तव्ये जशी बहुतेकांनी फेटाळली तशीच झाकिरची बेवकुफ वक्तव्ये मुस्लिमांनीच फेटाळली असती.

५) मी वैदिक हे स्वतंत्र धर्माचे आहेत, हिंदुंशी संबंध नाही हे म्हणू शकतो...मी आजही जीवंत आहे....केवळ व्यंगचित्र काढले म्हणून चार्ली हेब्दो प्रकरणी नृशंस हत्याकांड होऊनही किती मुस्लिम निषेध करायला सामोरे आले? जगभरचे आले कि नाही हे सोडून देवू...भारतातील किती आले?

६) भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना संघ मान्य नाही व ते त्याबाबत बिनधास्त बोलतात. मी तर संघ हिंदुंचा नसून वैदिक धर्मियांचा आहे असे म्हणतो. किती मुस्लिम मिम किंवा भारतातील मुस्लिम तत्वज्ञानकेंद्रीत संघटनांचा जाहीर विरोध करतात?

७) आयसिसबद्दल भारतीय मुस्लिमांची नेमकी काय भुमिका आहे हे किरकोळ प्रतिक्रिया वगळता व्यापकपणे का दिसत नाही?

८) तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या वर्चस्वतावादाविरुद्ध महात्मा फुलेंच्या काळापासून जो रोष दिसून येतो तसा रोष अजलाफ मुस्लिमांचा अशरफांबद्दल का दिसून येत नाही? मुस्लिम धर्म चालवनारे अशरफ आहेत कि अजलाफ आहेत? कि दोहोंची मिलीभगत आहे आणि खाजगीत ज्याने त्याने आपली गुलामी स्विकारली आहे?

९) तथाकथित हिंदुंत एक वर्ग आहे जो मुस्लिमांचा द्वेष करतो. संघटनाही आहेत. काही कृतीही केल्या आहेत. पण आम्हीच त्यांच्या विरोधात तुमच्यापेक्षा जास्त रान उठवत असतो. या देशातील मुस्लिम हे भारतीय मुस्लिम आहे यावर मी आणि अगणित कितीतरी श्रद्धा ठेवतात. असंख्य मुस्लिमही अशीच भावना बाळगतात हा माझाही अनुभव आहे. पण राष्ट्रहिताच्या बाबी येतात तेंव्हा इमाम ते सामान्य मुस्लिम कोठे दडी मारतात? कि दारुल हरब नि दारुल इस्लम खाजगीत घट्ट डोक्यात बसला आहे? मग तुमच्या कोणत्याही भुमिकांवर विश्वास कसा ठेवायचा?

१०) संशयाच्या वातावरणात मैत्र होत नसते. भुमिका स्पष्ट तर हव्यातच कृतीतुनही दिसायला हव्यात. धर्मांधांशीचा लढा, हिंदु/वैदिक असोत कि मुस्लिम, जोवर कृतीतुन सिद्ध करत नाहीत तोवर लढला जाणार नाही. तुमची आजवरची या लढ्याबाबतची कृती काय आहे? इतिहासात जायला नको...वर्तमानकाळात काय आहे?

तर हे काही प्रश्न आहेत तर काही विधाने आहेत. मानवजातीला...किमन भारतियांना अमन-सुखात जगायचे असेल तर या विधानांची...प्रश्नांची एकदाची सोय लावावी लागेल. भारतीय घटना स्वतंत्रतावादी आहे. ती महनीय आहे. य स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही बेवकुफांसारखा करणार असू तर उद्या घटना अंमलात राहीलच असे नाही. कोणाही बेवकुफ धर्मांधाचे सरकार येईल आणि घरोघर अखलाक नाहीतर अन्य कोणे मारला जाईल.

आम्हाला आमचा देश मध्यपुर्व होऊ द्यायचा आहे काय यावर सर्वांनी विचार करावा.

Sunday, July 10, 2016

गणिताचे गणित!

शास्त्रज्ञ बनण्यासाठी गणितावर प्रभुत्व आवश्यकच आहे हा भ्रम भारतीयांत प्रबळ आहे. अन्यत्रही आहेच. यामुळे अनेक शास्त्राच्या नवनवीन संकल्पना माडू शकण्याची क्षमता असलेले पण गणितात कच्चे असलेले विदयार्थी शास्त्रज्ञ होण्यापासून मुकतात. खरे तर गणित एक भाषा आहे जी शास्त्रीय संकल्पनेची तार्किक परिणती दर्शवते. सोळाव्या शतकापर्यंत आज रुढ असलेल्या गणितीय पद्धती अथवा संकल्पना अस्तित्वातही नव्हत्या. गरजेप्रमाणे त्यांचा विकास होत गेला. पुढेही होत राहील. गणिती भाषेत जे सांगितले जाते ते अंतिम सत्य असते असा दावा शास्त्रज्ञही करत नाहीत.

एके काळी पायथागोरस ने गणितालाच परमेश्वर मानत एक धर्म स्थापन केला होता हे अनेकांना माहित असेलच. गणित हेच परिपुर्ण आहे नि म्हणून ते इश्वर आहे अशी या धर्मामागची श्रद्धा होती. गणित हे संकल्पना अत्यंत काटेकोरपणे मांडण्याचे साधन आहे यात वाद नाही. परंतू संकल्पना आधी मानवी मनात येते, स्वयंप्रेरणांनी ती प्रक्रिया होत विकसित होते. त्यानंतर गणित येते. उलटे होत नसते. नाहीतर प्रत्येक गणिती शास्त्रज्ञ झाला असता.

जगाच्या इतिहासात गणितात कसलेही गम्य नसलेले अनेक लोक सर्व रुढ संकल्पनांना आव्हान देत महान शास्त्रज्ञ झालेले आहेत. डार्विन, लव्हाझिए व लेनोस ही त्याची काही उदाहरणे आहेत. गणिती विचार करण्याची क्षमता आणि गणीत यात फरक करावा लागतो. गणिती विचार करण्यासाठी गणीती आसण्याची गरज नाही. भौतिकविद युजिन विग्नर म्हणतात कि आइंनस्टाईन, फर्मी, बोर, फीनम्यन यांची विचारप्रात्यक्षिके कल्पकतेतून सोडवण्याची क्षमता त्यांच्या गणिती क्षमतेपेक्षा मोठी होती. इ. ओ. विल्सन म्हणतात कि शास्त्रज्ञ हा गणितीची, जेथे गरज आहे तेथे, मदत घेऊ शकतो. त्याला स्वत:ला गणितज्ञ असण्याची गरज नाही. एडिसनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "मी गणिती भाड्याने घेऊ शकतो...गणिती मला नाही."

गणितावरचे प्रमानाबाहेरचे अवलंबित्व शास्त्राच्या काही शाखांचा समाधानकारक विकास होऊ देत नाही. विश्वोत्पत्ती शास्त्र आणि सुक्ष्म स्तरावर घडणा-या भौतिकी घटना, या दोहोंचे उदाहरण येथे घेता येईल. मानवी गणितीय संकल्पना त्या घटनांचे विश्लेशन करण्यात पुरेशा ठरत नाहीत. किंबहुना कोणतीही रुढ गणितीय पद्धत त्यांचे विश्लेशन करू शकत नाही. याचे कारण म्हणजे शेवटी या घटना मानवी मेंदुत काल्पनिक पण तर्कदृष्ट्या संकल्पिल्या गेलेल्या असतात. या संकल्पना आणि प्रत्यक्ष वास्तवे जी प्रयोगातुनही सिद्ध होत नाहीत वा वेगळेच अकल्पनीय, विश्लेशनाच्या पलीकडचे परिणाम दर्शवतात त्यातून काढले जाणारे अन्वयार्थ परिपुर्ण असण्याची शक्यता नाही. ही मानवाची मर्यादा आहे नि म्हणून गणिताचीही आहे. किंबहूना नियम तोडत केला गेलेला विचार/संकल्पना ही क्रांतीकारक असू शकते. गणिताची पर्वा संकल्पकाने करू नये...ती गणिती करतील.

शास्त्रज्ञ इ. ओ. विल्सन म्हणतात, "During my decades of teaching biology at Harvard, I watched sadly as bright undergraduates turned away from the possibility of a scientific career, fearing that, without strong math skills, they would fail. This mistaken assumption has deprived science of an immeasurable amount of sorely needed talent. It has created a hemorrhage of brain power we need to stanch."

अमूक भाषा येत असेल तरच विद्वान, अन्यथा नाही या अशास्त्रीय विचारांच्या प्रभावात भारताने खूप काही गमावले हे आपल्याला माहितच आहे. गणितही एक भाषा आहे. ती आली तर उत्तमच, पण ती येत नसेल तर शास्त्रीय संकल्पना मांडताच येणार नाहीत या भ्रमात रहायचेही कारण नाही. शास्त्र हे मानवी कल्पक/संकल्पक बुद्धीची बटीक असते. त्यासाठी गणित अनिवार्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

Saturday, July 2, 2016

जातिसंस्थेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन

***राघव काळे***
पुस्तकाचे नाव : जातिसंस्थेचा इतिहास
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशन : प्राजक्त प्रकाशन, पुणे.
मूल्य : 220 रुपये
संपर्क ः 9890956695


भारतीय जातिसंस्थेच्या निर्मितीबाबत अनेक सिध्दान्त आहेत. आक्रमक आर्यांनी एतद्देशियांना हरवून त्यांच्यावर जातिसंस्था लादली, ब्राह्मणांनी स्वार्थासाठी जातिव्यवस्था निर्माण करून मनुस्मृतीद्वारे जातीच्या बेडया कायम केल्या, ते जातिसंस्था आदिम असून ती आधीपासून अन्याय्य व विषमतामूलक होती असे मानणारा विचारप्रवाह एकीकडे आहे, तर जातिसंस्थेचे समर्थन करत वर्णसंस्थेचेच पुढील रूपांतर म्हणजे जातिसंस्था असे मानणाराही एक विचारप्रवाह आहे. या विचारप्रवाहांतील संघर्ष हे हिंदूंच्या समग्र व्यवस्थेतील सध्याच्या सामाजिक कलहांचे कारण बनले आहे. त्यात जातिअंताचे काय, हा प्रश्न चर्चेत असला तरी निरुत्तरित राहतो आहे.
संजय सोनवणी यांचे 'जातिसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक मात्र वर उल्लेखलेल्या मतप्रवाहांना पुरता छेद देते. धर्म-समाज-अर्थ-मानववंश इत्यादी शास्त्रांची कास धरत त्यांनी जातिसंस्थेच्या उगमाच्या आजवर प्रचलित असलेल्या सर्व सिध्दान्तांना सुरुंग लावत सर्वस्वी नवा सिध्दान्त मांडला आहे व जातिसंस्थेकडे नव्याने पाहण्याची नजर दिली आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. सोनवणी हे एक बहुजनहितैषी संशोधक लेखक असले, तरी बहुजनवाद्यांच्या मांडणीलाही आव्हान देणारे त्यांचे हे संशोधन आहे. त्याच वेळीस हिंदू समाजात वर्चस्वतावाद जपणाऱ्या काही गटांनाही या पुस्तकामुळे धक्का बसणे स्वाभाविक आहे.
सोनवणी यांनी पुढील सूत्रात या पुस्तकाची मांडणी केली आहे -
  1. माणसाची जसजशी प्रगती झाली, नवे शोध लागले, तसतसे नवे व्यवसाय निर्माण झाले. व्यवसाय म्हणजेच जाती. व्यवसायांचा शोध मुळात मानवी इतिहासात सावकाश व क्रमबध्द रितीने लागला असल्याने जाती आदिम होत्या या मतात कसलेही तथ्य नाही. यासाठी उदाहरणार्थ ते म्हणतात, लोखंडाचाच शोध लागला नाही, तर लोहार कोठून येणार? वस्त्रांचाच शोध लागला नाही, तर विणकर कोठून येणार?
  2. जाती (म्हणजेच व्यवसाय) हे कोणालाही कोणावर लादता येणे शक्य नसून लादणाऱ्यांनीच सारे शोध लावले आणि कोणी कोणते काम करायचे हे ठरवले असे होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे जाती कोणी बनवल्या व इतरांवर लादल्या, हे मत समाजेतिहासाच्या आधारावर टिकत नाही.
  3. इतिहासात नवीन जाती जशा निर्माण झाल्या, तशाच व्यवसायच नष्ट झाल्याने अनेक जातीही नष्ट पावल्या. त्या कशा, हेही ते अशा अनेक जातींची ससंदर्भ माहिती देत जातिव्यवस्था अपरिवर्तनीय व बंदिस्त होती हे मत कसे चुकीचे आहे, हे सिध्द करतात.
  4. जातिव्यवस्था अपरिवर्तनीय बनायला दहाव्या शतकानंतरची बदलती राजकीय व आर्थिक स्थिती, श्रेणी व्यवस्थेचा अंत आणि 1022पासून भारतात सर्वत्र लागलेल्या दुष्काळाच्या रांगेला कारण ठरवतात. प्राप्त स्थितीत तरून जायला निर्माण झालेली गावगाडयाची पध्दत विषमतेला धर्मापेक्षाही कशी कारणभूत ठरली, हेही स्पष्ट करतात.
  5. वर्णांना व जातींना एकत्र समजत सामाजिक विश्लेषण केल्याने जाती-वर्णांप्रमाणेच अनादी व अपरिवर्तनीय समजल्या गेल्या, असे स्पष्ट करत सोनवणी एक अत्यंत धाडसी सिध्दान्त मांडतात व तो म्हणजे वर्णव्यवस्था ही वैदिक धर्मातील अंतर्गत व्यवस्था असून जातिव्यवस्था ही अवैदिकांची, म्हणजे वेदपूर्व धर्म पाळत राहणाऱ्या लोकांची व्यवस्था आहे. त्यांच्या मते हे दोन्ही धर्म आजही वेगळे असून वैदिक (म्हणजे जन्मजात वेद व वेदाधिकार असलेले) आणि अवैदिक (म्हणजे त्यांच्या मते हिंदू) हे दोन धर्म एकत्र समजले गेल्याने हा जातीय गोंधळ निर्माण झाला आहे. पाश्चात्त्य विद्वानही वर्ण व जात या दोहोंचा इंग्लिश अनुवाद 'कास्ट' असाच करतात व ते चुकीचे आहे, हे ते दाखवून देतात.
थोडक्यात, जातिसंस्थेचे हे सर्वस्वी नवे आकलन आहे. जातिअंताची दिशाही ते देतात. आपले मुद्दे अधिक स्पष्ट व्हावेत म्हणून जवळपास चौदा जातींचा इतिहासही देतात. अगदी ब्राह्मण या वर्णाचाही इतिहास ते देतात. वैदिक व हिंदू हे दोन धर्म वेगळे आहेत हा त्यांचा सिध्दान्त मात्र वादळी ठरू शकतो. किंबहुना हिंदू धर्माच्या सध्याच्या रचनेला विपरीत तडा देऊ शकतो व भावी प्रगतीच्या मार्गात खीळ घालू शकतो. तो कोणाच्या पचनी पडणे शक्य नाही. वैदिक धर्म व पौराणिक धर्म यांच्या मिश्रणाने आजचा हिंदू धर्म बनला आहे अशी सर्वच विद्वानांची मान्यता असताना सोनवणी वैदिक-अवैदिकतेवर भर देतात, ही या पुस्तकातील मोठी त्रुटी आहे.
असे असले, तरी सोनवणींनी या पुस्तकाद्वारे जातिसंस्थेबाबत असंख्य भ्रम दूर करण्याचे अमोल कार्य केले आहे, यात शंका नाही. खरे तर हे संशोधन खूप पूर्वीच झाले असते व अधिकाधिक लोकांपर्यंत गेले असते, तर आजची जातकलहांची तीव्रता कमी झाली असती असे वाटल्याखेरीज राहवत नाही. समाजातील जातीय द्वेष आणि विखार थांबवायचे असले, तर मुळात जाती बनल्याच कशा हे समजून घेतल्याखेरीज गत्यंतर नाही. अत्यंत सखोलपणे, ठिकठिकाणी संदर्भ देत सोनवणी आपल्याला जातिनिर्मितीच्या प्रवाहात खेचून घेतात. भारताच्या संस्कृतीच्या घडणीत सर्व जातींचे बरोबरीचे योगदान कसे आहे, हेही ते दाखवून देत कोणतीही जात उच्च अथवा कनिष्ठ नाही, हेही ते बरोबर बिंबवतात. यामुळे जाती नष्ट झाल्या नाहीत, तरी सर्व जाती परस्परांचा आदर तरी करतील हा सोनवणींचा आशावाद खरा होऊ शकेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हे संशोधन करत असतांना सोनवणींनी अनेक विद्याशाखांचा उपयोग केला आहे, याची प्रचिती पुस्तक वाचताना येते. पूर्वसुरींच्या दिग्गजांच्या मतांना खोडून काढण्यात ते अनमान करत नाहीत. पुराव्यांचे बळ असल्याने ते हे सहज करू शकले.
जातिव्यवस्थेसारख्या संवेदनशील विषयांवरील रूढ प्रमेयांना धक्का देणारे, स्वप्रज्ञेने केलेले संशोधन जाहीरपणे मांडण्याएवढा निर्मळ काळ आज नाही. असे असतानाही सोनवणी यांनी अत्यंत तर्कनिष्ठतेने वस्तुनिष्ठ संशोधन करत पुराव्यांसहित ठामपणे आपली मांडणी केली आहे. हे पुस्तक नुसत्या अभ्यासकांसाठी नव्हे, तर चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता व सामान्य वाचक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Friday, July 1, 2016

आधुनिक पेशवे-छत्रपती?



पुर्वी छत्रपती पेशव्यांना वस्त्रे द्यायचे, आता फडणवीस छत्रपतींना वस्त्रे देत आहेत असे विधान शरद पवार यांनी केले. अलीकडे राजकारणी नेते अफजलखान, निजाम, औंरंगजेबाचे सैन्य वगैरे शेलके शब्द विरोधकांना वापरत मराठी राजकारण आजही सरंजामदारी युगात अडकलेले आहे आणि त्याचा उद्धार होणे शक्य नाही याबाबत विश्वास देत आहेत. शरद पवारांनी केलेले विधान उपहासात्मक असो कि "कहीं पे निगाहें...कहीं पे निशाना" या थाटाचे असो, ते जातीवादीच आहे असे बहुसंख्य विश्लेशकांचे मत आहे व वाहिन्यांवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. कोण किती जातीयवादी आहे हे सांगण्याची मोहिम जोमात आहे.

पेशवे म्हणजे ब्राह्मणच असा दृढ समज असंख्य महाराष्ट्रीयनांचा आहे. खरे तर पेशवे म्हणजे राजातर्फे राजनैतिक पाहूण्यांसमोर प्रथम पेश होणारा सेवक. हा शब्द अभारतीय आहे. फारसी भाषेतून हा शब्द आलेला आहे. हे पद पंतप्रधान पदाचे वाचक नाही. पंतप्रधानाच्या समानार्थी येणारा शब्द म्हणजे "वजीर". पेशवे पद हे तसे अप्रसिद्धच म्हतले पाहिजे, कारण या पदाची सामान्य राजनयिक जबाबदारी. अधिकार अगदी किरकोळ. हे पद वंशपरंपरागत नसे. हे पद शिवाजी महाराजांनी निर्माण केले. शिवकालीन अष्टप्रधानांबद्दल कोणी लोकशाहीच्या बीजारोपणाचे उदाहरण देत असले तरी अष्टप्रधानास विशेषाधिकार नसत. संभाजी महाराजांनी आपल्या हत्येच्या कटात सामील असल्याच्या आरोपावरुन मोरोपंतांना अटकेत टाकले होते व कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पुढे काही काळ प्रल्हाद निराजी पेशवे असावेत असा इतिहासकारांचा अंदाज आहे.

पुढे मात्र संभाजी महाराजांनी अटकेतच असलेल्या मोरोपंतांच्या पुत्राला, निळोपंत यास, कैदेतून मुक्त करून पेशवाई दिली. पण त्यामागे कटवाल्यांना अजून संधी मिळु नये, शांतता राखावी हा प्रमुख हेतू होता. अन्य पदे, मुजुमदार (अमात्य), सेनापती वगैरेही वंशपरंपरागत नव्हती.

शाहु महाराजांना सातारच्या गादीवर आणण्यात बाळाजी विश्वनाथाचा वाटा मोठा होता. कोल्हापुर गटाची कारस्थाने बाळाजीने मोडुन तर काढलीच पण आंग्रेंसारखे ताराबाईच्या बाजुला असलेले बलाढ्य सरदारही त्याने शाहुच्या बाजुने शक्ती-युक्तीने उभे केले. प्रसंगी कर्ज तर काढलेच पण एकदा त्याचे अपहरणही झाले होते. त्याने जीवावरची संकटे झेलली. राजसबाईला हाताशी धरुन ताराराणीला शेवटी पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले.अशा रितीने शाहुंना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अधिकृत वारस म्हणुन जनमान्यता व बव्हंशी सरदार मान्यताही लाभली. बाळाजी विश्वनाथ हा शाहुंचा अत्यंत मुत्सद्दी आणि विश्वासु सहकारी बनला तो त्याने शाहुंना केलेल्या अनमोल मदतीने. याचीच परिणती बाळाजील पेशवेपद मिळण्यात झाली.( १७ मे १७१३)  बहुतेक सर्व प्रशासकीय स्वातंत्र्य बाळाजीच्या हवाली करुन सातारा येथे शाहु सुखाने राहु शकले.

बाळाजीनंतर बारामतीच्या नाईकांना पेशवेपद द्यावे या मताचा गट प्रबळ होता. पण शाहू महाराजांनी बाजीरावाला ते पद दिले. बाजीरावाने त्या संधीचे सोने कसे केले ह इतिहास सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे पेशवेपदाची प्रतिष्ठा वाडली. एवढी कि बाळाजीपासुनच्या पुढच्या काळाला पेशवाई असेच म्हटले जाते. हे सर्व ब्राह्मण होते. याला काही त्यांचा दोष म्हणता येणार नाही. दिली तख्तातही असेच राजकीय फेरफर होत वजीर महत्वाचा बनून बादशहा हे पद अधिकाराच्या दृष्टीने दुय्यम बनले. कारण औरंगजेबानंतरचे बादशहा बव्हंशी अकार्यक्षम होते. तसेच येथील शाहुमहाराजांनंतरच्या छत्रपतींचे झाले. पुढे तर छत्रपती  पदावरील वारसाची निवड करण्यात पेशव्यांनीच भुमिका निभावली.

पेशवे पदाची अप्रतिष्ठा दुस-या बाजीरावाने केली हे सर्वांना माहितच आहे. पेशवेपदाला हपापलेल्या राघोबादादाने तर खून करण्याइतकी मजल गाठली होती. तसे जगाचाच इतिहास राजकीय सत्तापिपासा आणि त्यासाठी केली गेलेली कटकारस्थाने यांनी भरला आहे. मराठेशाहीही त्याला अपवाद नव्हती हे आपल्याला शांतपणे समजावून घ्यावे लागंणार आहे.

भारतात कोणा राजाने छत्रपती ही पदवी धारण केल्याचे उदाहरण नाही. काही अभिषिक्त राजांचे दाखले आपल्याला रामायण महाभारतापासून ते पुराणांत मिळतात. युधिष्ठिर, राम वगैरे सुपरिचित उदाहरणे. राज्याभिषेक अर्थातच दोन प्रकारचा...एक वैदिक व दुसरा तांत्रिक म्हणजे शैव अथवा शाक्त. शिवाजी महाराजांनी दोन्ही प्रकारचे राज्याभिषेक करून घेतले. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची एवढी सखोल माहिती मिळत नाही, त्यामुळे तो वैदिक कि शाक्त हे समजत नसले तरी संभाजीमहाराज स्वत: शाक्त पंथाचे अनुयाये असल्याने तो शाक्त असण्याची शक्यता आहे.

असे असले तरी इतिहासकाळात अथवा पुराणांतरी "छत्रपती" हे  बिरूद कोणी वापरल्याचे दिसत नाही. चक्रवर्ती, राजाधिराज, राजराजेश्वर, राजाधिराज इत्यादी पदव्या पुराणांतरी जशा आहेत तशाच शिलालेख अथवा नाण्यांवरही दिसतात. पण छत्रपती ही पदवी दिसत नाही.

छत्रपती या शब्दाच्या उगमाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. त्यातील महत्वाची अशा, आपल्या अनुयायांना छत्रछायेत घेतो तो छत्रपती किंवा छत्र-चामर धारण करायचा अधिकार ज्या व्यक्तीस आहे तो छत्रपती. दुय्यम अर्थ असा कि ठरावीक क्षेत्रावर अधिकार असलेली व्यक्ती म्हणजे क्षेत्रपती-छत्रपती.

शिवाजी व संभाजी महाराजांनी या पदव्या घ्याव्यात हे कोणे सुचवले हे आपल्याला आज माहित नाही. पण महापराक्रमाने, प्रजाहितदर्शी धोरण राबवल्याने छत्रपती म्हटले कि हे दोनच छत्रपती आठवतात एवढी महत्ता छत्रपतीपदाला आली. पंण पुढे ती केवळ एक वंशपरंपरागत पदवी बनली असल्याचे दिसते. राजर्षि शाहू महाराज त्याला अपवाद.

फडणवीस हा शब्द माराठी अथवा संस्कृत नाही. हाही शब्द फारसी-उर्दू मिश्रणातून आलेला. कारकुणांची बसायची जागा तो फड आणि कारकुन म्हणजे फडणवीस असा याचा साधारण ढोबळ अर्थ. कारकुन शब्दही तसा उर्दुच. त्या काळात मराठीवर फारसी भाषेचे वर्चस्व मोठे होते. त्यामुळे बरीच पदनामे ही फारसोद्भव असत. त्यामुळे ही पदे धारण करणारे ब्राह्मणच होते असेही नाही.

आता आपल्याला मध्ययुगाचा सांस्कृतिक इतिहास पाहिला पाहिजे. लेखन-वाचन-पत्रव्यवहार-करारनामे वगैरे करणारा एकच एतद्देशेय वर्ग होता तो म्हणजे ब्राह्मण. कायस्थ हे त्याखालोखाल या पदांसाठी लायक समजले जात. या काळातील; सांस्कृतिक, विशेषत: जातींमधील संक्रमणे व अदलाबदली विलक्षण आहेत. इतिहासात कायस्थांनी ब्राह्मण असल्याचे जे दावे केलेले दिसतात ते यामुळेच. असे अनेक मुळच्या ब्राह्मण नसलेल्या जातींबाबतही झाले व काहींनी ते दावे खरेही करून घेतले.

आज ज्या कोणची अमूक जात आहे असे मानले जाते त्याची जात तीच अगदी पुर्वीपासून होती हे मानणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच. पण आपण आज एकविसाव्या शतकात आहोत. आधुनिक काळात आहोत. ज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. पण आपल्या सामाजिक व राजकीय संकल्पना मध्ययुगात होत्या तशाच वेडपट आणि अज्ञानमुलक आहेत. त्यातून आपली सुटका झालेली नाही. किंबहुना त्यातून सुटावे असे आपल्यालाच वाटत नाही.

शरद पवारांच्या अथवा अन्य नेत्यांच्या वक्तव्यांवरुन हेच चित्र दिसते. खरे म्हणजे मध्ययुगातील पदव्यांचे आणि त्यावरून जातींचे स्तोम माजवण्याचे, त्यांचा माज करण्याचे अथवा दुस-यांना हिनवण्यासाठी त्यांचा वापर करण्याचे काहीएक कारण नाही. ब्राह्मण विरुद्ध मराठा हा वाद अलीकडेच पेटवला गेला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने त्यात मोठी भुमिका बजावली. हा वाद ब्राह्मण विरुद्ध बहुजन आहे अशी मांडनी करण्याचा प्रयत्न करत ब्राह्मण विरोधाचे रान पेटवले गेले. ब्राह्मणांच्या काहीच चुका नाहीत असे म्हणायचे धाडस खुद्द ब्राह्मणही करणार नाहीत. पण प्रत्येक सामाजिक दोषाचे खापर ब्राह्मणांवर फोडायची जी टुम निघाली त्यामागे केवळ राजकारण होते व आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

प्रथम एक बाब लक्षात घ्यायची बाब अशी कि अपवाद वगळता मराठा समाज आपल्याला "क्षत्रीय" म्हनजेच वैदिक समजतो. क्षत्रीय हा वैदिक व्यवस्थेत ब्राह्मणापेक्षा दुय्यम असतो. अगदी प्राचीन काळापासून ब्राह्मण विरुद्ध क्षत्रीय हा वाद वैदिक धर्मेतिहासात हिरीरीने लढला गेलेला आहे. विश्वामित्राचे आद्य उदाहरण देता येईल. क्षत्रीय असलेल्या विश्वामित्राने ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी किती यातायात केली याच्या असंख्य पुराकथा आहेत. वेदविरोधी क्षत्रीयांनीच उपनिषदे लिहिली असेही आवर्जून सांगितले जाते. ब्रह्मण श्रेष्ठ कि क्षत्रीय हा वाद तर विकोपाक्ला गेला होत्ता. गौइतम बुद्धही क्षत्रीयालाच ब्राह्मणंपेक्षा श्रेष्ठ मानत होता असेही आपल्याला दिसते. शेवटी  क्षत्रीयच कसे नामशेष झाले या  वैदिकांनी कधी परशुरामाचा बहाना दिला तर कधी नंदानेच क्षत्रीय नष्ट केले अशा पुराकथा निर्माण केल्या. मध्ययुगात केवळ रजपुतांना अग्नीकुलोत्पन्न क्षत्रीय अशी मान्यता दिली गेली. एरवी क्षत्रीय नाहीतच अशी वैदिक उद्घोषणा आहे. वेदोक्त प्रकरणात लो. टिळकांनीही हीच भुमिका घेतले होती हे सर्वविदीत आहे. टिळक म्हणाले होते, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर) अर्थ स्वयंस्पष्ट आहे. ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणीही वैदिक नाहीत असा निर्वाळा धर्मेतिहासातील तत्कालीन तज्ञ लो. टिळकांनीच हा निर्वाळा दिलेला आहे, तरीही अनेकांच्या मनात क्षत्रियत्वाचे थोतांड एवढे भरलेले आहे कि कोणीही उट्घतो आणि क्षत्रिय म्हणून मिरवतो! आणि वर गंमत म्हणजे सारे सामाजिक दोष ब्राह्मणांनीच निर्माण केलेत असेही घसे फाडून सांगतो. मग तेंव्हा क्षत्रिय (यांचेच पुर्वज) काय करत होते हे सांगायला यांची वाचा का बसते?

थोडक्यात, ब्राह्म्नण श्रेष्ठ कि स्वत:ला क्षत्रीय मानणारे सत्ताधारी वर्ग श्रेष्ठ यांच्यातील हा कलह आहे. तो आजही जीवित असावा यासारखे दुर्दैव नाही. परंतु वैदिक वर्णश्रेष्ठत्वाच्या गारूडात जे अडकले आहेत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?

मराठीच काय पण भारतातील अन्य राज्यांतील राजकीय कलहातही हा वाद प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या खेळला जात असतो त्यामुळे हे विवेचन करणे गरजेचे होऊन जाते. वर्चस्व कोनाचे असावे यचा निवाडा या लोकशाहीतझी होणे अशक्य झाले आहे. इतर वैदिकेतरांना यात वापरण्यापुरते दुय्यम स्थान आहे आणि ही लोकशाहीची शोकांतिका आहे. जाती-धर्माचा श्रेष्ठत्वतावाद मिरवत सत्तेची नवी समीकरणे बनवल्याने लोकशाही टिकू शकत नाही याचे भान आपल्याला अजून आले नाही.

जाती-धर्माचे राजकारण अज प्रत्येक पक्ष करतो हेही आपल्या लक्षात आले असेलच. तिकीट देण्यापासून याची सुरुवात होते. निवडून येण्याची शक्यता म्हणजे नेत्याच्या जातीचे उमेदवार मतदारसंघात बहुसंख्य अथवा निर्णायक असणे हा एकमेव निकश. यात गुण-लायकी याला महत्व नसते. पैसा आणि जात हेच काय ते निकश. यात लायक नेते वर येणे व लायकीची स्पर्धा होणे अशक्यच. म्हणजे जातीअंताकडे जातो, धर्मनिरपेक्ष होतो म्हणणारे दुतोंडी गांडुळे आहेत असे म्हटले तर वावगे काय?

आपली लोकशाही ही सरंजामदारांची लोकशाही आहे असे म्हटले तरी चालेल एवढे आपण लोकशाहीचे धिंदवडे काढलेले आहेत. आता तर घटनेलाच धर्मग्रंथ म्हणा असेही म्हटले जाते. यासारखा मुर्खपणा आम्ही भारतियच करु जाणोत. घटना परिवर्तनीय असते, धर्मग्रंथाप्रमाणे अपरिवर्तनीय नाही याचेही भान आम्हाला उरलेले नाही. घटना जणु देशाची नसून एकाच व्यक्तीने बनवली आहे अशा भ्रमात राहणा-यांचीही कमतरता या देशात नाही. पण ज्यांच्या मनात मानवतेपेक्षा जाती आणि धर्माचीच वर्चस्वतावादी वृत्ती ठासून भरली आहे त्यांचे वेगळे काय होणार? जातीच्या क्यन्सरने आम्हाला पोखरले आहे.

शरद पवार किंवा बाकीचे नेते जातीयवादी बोलतात त्याचे नवल वाटत नाही. पेशवे, फडणवीस किंवा छत्रपती हे शब्द जातीनिदर्शक बनवत आहोत हे न समजण्याएवढा निर्लज्जपणा आमच्यातच जर भरला असेल तर त्यांना तरी दोष कोणत्या तोंडाने देणार? वर्चस्व कोणाचे...ब्राह्मणाचे कि क्षत्रीयाचे हेच दाखवण्याचा हा पुरातन उपद्व्याप नाही काय? खरे तर लोकशाहीत एकदा निवडुन आल्यानंतर पंतप्रधान असो कि मुख्यमंत्री...तो सर्वांचाच असतो. त्याला जात-धर्म नसतो. घटनेशी इमानदार राहत जास्तीत जास्त समाजहित होईल असेच काम करणे त्यांच्याकडून अभिप्रेत असते. निर्णयांबाबत टीका करण्याचा, विश्लेशन करण्याचाही अधिकार प्रत्येक नागरिकाचा असतो. यपार व्यक्तीगत जाती-धर्माला मधे आणायचे काम नाही. पण सर्वच चुकत आहेत नि म्हणूनच भारतीय लोकशाहीची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे समजायचा प्रघात आहे. शाहू-फुले-आंबेडकर नांवे घेतली, त्यांचा जयघोष केला म्हणून कोणी पुरोगामी होत नाही. पुरोगामीपणा विचारांत व कृतीत असावा लागतो. उक्तीही प्रतीगामी आणि कृती तर पुरेपूर प्रतिगामी आहेत हेच या वादळावरून दिसते. महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता हेच काय ते खरे. खुद्द शाहु-फुले-आंबेडकरांची वैचारीक पायमल्ली करणारे कोणत्या तोंडाने त्यांचे नांव घेतात हे अनाकलनीय आहे. कोणताही राजकीय पक्ष अथवा कोनतीही सामाजिक संघटना या प्रतिगामीत्वात मागे नाही. कोण डावे कोण उजवे एवढाच वाद घालता येईल अशी आपली सामाजिक स्थिती आहे. इतिहासकाळातील पदे आजही उणे-दुणे काढण्यासाठी वापरली जात असतील तर प्रतिगामीत्वाचा कोणता कळस गाठायचा बाकी राहीला आहे? आज या पदांची कोणती महत्ता आहे? संभाजीराजे भाजपातर्फे खासदार होतात की अन्य पक्षामार्फत हा सर्वस्वी त्यांचा आंणि संबंधीत पक्षांचा निर्णय आहे. ते आता सामान्य नागरिक आहेत. "मराठा जातियवाद्यांचा कळपात गेला" हे विधानच जातीयवादी आहे. लोकांना त्यांच्याबाबत शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आदर वाटणे ही वेगळी बाब झाली. पण ते आज लोकशाहीत सरंजामदारशाही युगातील छत्रपती अथवा पेशवे अथवा फडणवीस उरलेले नाहीत याचे भान लोकांनीही ठेवले पाहिजे. पण राजामहाराजांचे आकर्षण सुटत नाही हे भारतभरचे चित्र आहे.

आम्हाला माणसांशी माणुस म्हणुन नाते बांधणारा माणुस हवा आहे! आमची लोकशाही (?) टिकु शकली तर ती याच पायावर टिकेल. अन्यथा धर्मा-धर्मातच नव्हे तर जाती-जातींतही वर्चस्वासाठी युद्धे सुरु होतील याचे भान आम्हाला आता तरी यायला हवे. लोकशाही टिकते ती सुजाण नागरिकांमुळे व समतेच्या व स्वातंत्र्याच्या पायावर. आमच्या देशात स्त्रीयांना अजून दुय्यम स्थान आहे. धर्मात तर तिला जवळपास स्थानच नाही. अनेक मंदिरांत जाण्याचे आजही बंदी आहे. अनेक जातींबाबतही ही बंदी कायम आहे. मुस्लिमांत तर स्थिती अजून विदारक आहे. साधा समान नागरी कायदा आम्ही अद्याप आणु शकलेलो नाही. अशरफ-अजलफ मुसलमानांतील संघर्ष आजही आहे. ख्रिस्त्यांतही जातीत्यवाद एवढा कि पुर्वास्पृष्य धर्मांतरितांसाठी वेगळे चर्चेस व वेगळ्या स्मशानभुम्या आहेत. आम्ही मानवतेचे विध्वंसक आहोत आणि श्रेष्ठ भारतियत्वाचे वृथा गुणगाण करतो. आमचे निवडणुकांतील सोशल इंजिनियरिंग म्हणजे सोशल डिस्ट्रक्शन आहे हे कोणीतरी समाजाला कान पिळुन सांगायची गरज आहे.

कोण करणार हे?

आम्हा प्रत्येक नागरिकाला हे काम करावे लागेल. मसीहा येत नसतात. तेही एक भ्रमजाल आहे. मसीहा म्हणजे मुर्खांच्या कळपातील कोणी एक अर्धशहाणा. सर्वांनीच शहाणे होत आपणच आपला पुर्णशहाणा मसीहा व्हायला काय हरकत आहे?

-संजय सोनवणी

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...