Thursday, August 29, 2024

सस्सानिद साम्राज्याचा अस्त आणि हुणांचे आक्रमण

 


भारतीय उपखंडावर आजवर झालेल्या ज्ञात आक्रमणांचा आणि सत्ताविस्ताराचा वेध घेत असताना आपण त्याचा भारतीय संस्कृतीवर झालेल्या ब-या वाईट परिणामांचीही चर्चा करत आहोत. भारत ही नेहमीच आक्रमकांना आकर्षित करणारी सुवर्णभूमी होती. इराण आणि मध्य आशिया हा तुलनेने अविकसित आणि रानटी व भटक्या टोळ्यांनी व्यापलेला होता. भारतातील समृद्धीमुळे त्यांचे लक्ष इकडे वळाले आणि शक-कुशाण आणि नंतर हुणांनीही आक्रमणे केली, पश्चिमोत्तर भारतावर सत्ताही प्रस्थापित केल्या याचा इतिहास आपण पाहत आहोत. ग्रीस आणि इराण सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या प्रबळ असल्याने साम्राज्य विस्तारासाठी आणि व्यापारी मार्गांवर स्वामित्व ठेवण्यासाठी त्यांनीही भारतावर आक्रमणे केली. आपण मागील लेखांमध्ये कुशाण या मध्य आशियातील जमातीने भारतातही आपले साम्राज्य कसे पसरवले याचा इतिहास पाहिला. तोवर कुशाण वगळता पंजाबच्या पार सत्ता स्थापन करण्यात कोणालाही यश मिळालेले नव्हते.

जगाचा इतिहास पाहिला तर कोणतीही सत्ता अमरपट्टा घेऊन आलेली नसते हे आपण सहज पाहू शकतो. भारतातही मौर्य साम्राज्य बलाढ्य असतानाही ते विखंडीत होत नष्ट झाले. तत्पूर्वीचे नंद साम्राज्याही एका शतकभराच्या कालावधीत नष्ट झाले होते. कुशाणांनी स्थापन केलेली सत्ता इसवी सनाच्या ३२५च्या आसपास आकुंचित होत नष्ट झाली. एका साम्राज्याचा अस्त अनेक कारणांनी होत असला तरी अनेकदा तो अस्त नव्या बलाढ्य सत्तेच्या उदयामुळे झालेला असतो हे अनेक उदाहरणांवरुन पाहता येते. कुशाण सत्तेचा अस्त व्हायला जबाबदार झाले ते भारतात उदयाला आलेले गुप्त साम्राज्य आणि इराणमधील नव्याने उदयाला आलेले सस्सानियन (सस्सानिद) राजघराणे.

इराणमधील प्राचीन अकेमेनिड  साम्राज्याच्या अस्तानंतर बराच काळ इराणमध्ये सातत्याने सत्ताबदल होत राहिले.  इसवी सनाच्या २०५ मध्ये पार्थियन साम्राज्याचा अंत घडवून सस्सानियन राजघराण्याचा उदय झाला. हे पारशी धर्माचे अनुयायी असलेले घराणे. आर्देशीर (पहिला) हा या घराण्याचा संस्थापक. इस्तखर या शहरात या राज्याची स्थापना करण्यात आली. हे ठिकाण अकेमेनिड साम्राज्याची राजधानी पर्सेपोलीसपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होते. राज्यस्थापना केल्यानंतर बल्ख प्रांतावर पर्शियन सस्सानियनानी हल्ले सुरु केले. तेथील कुशाण सत्ता उखडून टाकण्यात आली. अर्देशीर (पहिला)चा पुत्र शापूरने या सीमा पश्चिमोत्तर भारतापर्यंत वाढवल्या. कुशाणांची उरली सुरली सत्ताही संपुष्टात आली. कुशाणांना हरवून जेथेही सत्ताविस्तार केला तेथे नेमलेल्या प्रांत अधिका-यांना त्यांनी “कुशाणशाह” असे नाव दिले. सस्सानिदांची कुशाणशाही नाणी तक्षशिला आणि त्यापारच्या भागात आढळली आहेत. त्यावर कुशाण नाण्यांच्या शैलीचा प्रभाव पहायला मिळतो. भारतात या सत्तेचा विस्तार सिंधू नदीच्या पश्चिम किना-यापर्यंत पोचला असावा असा अंदाज सापडलेल्या कुशाणशाही नाण्यांवरून बांधला जातो. अफगाणिस्तान मध्ये नंतरच्या काळात ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यांची मुळे सस्सानिदांपर्यंत पोचतात ती अशी.

शापूर हा पराक्रमी राजा होता. त्याने भारतातील तक्षशिलाच नव्हे तर रोमनांचाही पराभव करून आपली सत्ता एन्टीओकपर्यंत वाढवली. रोमन सम्राट व्ह्यलेरिअन याला त्याने पकडून जन्मभर आपल्या कैदेत ठेवले. अनातोलियापर्यंत त्याने झेप घेतली. अनातोलिया हा प्रांत आताच्या पश्चिम आशियातील टर्की देशाचा भाग आहे. थोडक्यात भारतापासून ते पश्चिम आशियाच्या टोकापर्यंत हे साम्राज्य पसरले होते. पण नंतरचा शासक दुस-या बेहरामच्या काळात सिस्तन (शकस्तान) प्रांताचा शहा ओम्रीज्दने बंड पुकारले व ‘राजांचा राजा’ असे बिरूद घेत स्वातंत्र्य घोषित केले. तक्षशिला (गांधार) प्रांतही त्याच्याच अखत्यारीत होता.   त्याच्या बंडाला आता सत्ताच्युत झालेल्या कुशाणांनीही पाठींबा दिला. पण हे बंड दीर्घकाळ टिकले नाही. बेहराम (दुसरा) याने पूर्ण शक्तीनिशी बंड चिरडून टाकले. ओम्रीझ्दच्या दुस-या बेहरामने केलेल्या पराभवाचे भित्तीचित्र नक्ष-ए-रुस्तुम या ठिकाणी कोरले गेलेले आहे. बेहरामने स्वत:च्या पुत्राला शकस्तान प्रांताचा शहा घोषित केले. सस्सानियन सत्ता पुन्हा स्थापित  झाली.

या सस्सानीद प्रांत-अधिका-यांनी कुशाणशहा हे नुसते नाव घेतले नाही तर त्यांच्या वेशभूषेवरही कुशाणांचाच प्रभाव राहिला हे त्यांनी पाडलेल्या नाण्यांवरील चित्रणावरून लक्षात येते. कुशाणही पारशी धर्माचे अनुयायी असल्याने त्यांना हे अनुकरण जड गेले नसावे. नाना देवतेचे प्रतीकही त्यांनी शिरोभूषणात अभिमानाने मिरवले. थोडक्यात भारतातील सस्सानीद सत्ता ही एक प्रकारे कुशाण सत्तेचाच विस्तारित भाग होता असे म्हणता येईल.

अर्थात याही साम्राज्याचा नाश होणे नियत होते. या साम्राज्याच्या विनाशाला कारण झाले ते मंगोलिया प्रांतातून मध्य आशियात विस्थापित झालेली एक उपद्रवी भटकी पण लढाऊ जमात. यांचा उल्लेख चिनी कागदपत्रात झ्वांग-नु असा येतो, तेच हे हूण. त्यांनी सस्सानियन साम्राज्यावर हल्ले करायला सुरुवात केली. सुरुवातीचे अनेक हल्ले त्यावेळचा सम्राट दुसरा यझ्देगर्दने परतवण्यात यश मिळवले आणि त्यांना ऑक्सस नदीच्या पल्याड हुसकावून लावले. तरी हूण पुन्हा एकत्र झाले आणि त्यांनी पाचव्या शतकाच्या अंतिम चरणात इराणवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. प्रचंड लुटपाट आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे सस्सानिद साम्राज्य कोलमडले. अस्थिरता निर्माण झाली. सम्राट फिरोजने तरीही एकवार पुन्हा हुणांशी उरल्या-सुरल्या शक्तीनिशी बल्खजवळ झुंज दिली. हुणांनी यावेळेस अत्यंत हिस्त्र पद्धतीने युद्ध केले. या भीषण युद्धात फिरोज ठार मारला गेला. त्याची सेना तर नष्ट झालीच पण फिरोजचे शवही मिळाले नाही. त्याचे चार पुत्र आणि भाऊही मारले गेले. पुढचे सस्सानिद राजे हे मांडलीकाच्या दर्जाला पोचवले गेले. भारतावरील त्यांची सत्ता नष्ट झाली. हे साम्राज्य सातव्या शतकापर्यंत कसेबसे टिकून राहिले असले तरी त्याचा प्रभाव मात्र ओसरलेला होता. अरब मुस्लिमांनी या साम्राज्याच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला.

या सत्तेने पश्चिमोत्तर भारतावर फारसा वेगळा प्रभाव टाकण्यात यश मिळवले नाही. त्यांचा सांस्कृतिक ठसाही उमटला नाही. गुप्त साम्राज्याचा विस्तार या काळात होत असला तरी त्यांनी सस्सानिदांची सत्ता उखडून फेकण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. सस्स्सानिद साम्राज्याचा अंत घडवल्यानंतर दुस-या हूण टोळीने भारतावर आक्रमण करून गांधार (पेशावर प्रदेश) काबीज केला. पुढील आक्रमणाला गुप्त सम्राट स्कंदगुप्त (४५५६७याने निकराने प्रतिकार केला. ४५८ च्या पूर्वी झालेल्या या घनघोर लढाईचे वर्णन ‘हूणैर्यस्य समागतस्य समरे दोर्भ्यां धरा कम्पिता’ (स्कंदगुप्त आपल्या बाहुबलाने हूणांबरोबर युद्ध करीत असतापृथ्वी कंपित झाली) या शब्दांत कोरीव लेखात केले आहे. यानंतर जवळजवळ ४० वर्षांपर्यंत हूणांना भारतावर आक्रमण करण्याचे धैर्य झाले नाही. ते केले तोरमान या हुण राजाने. हुणांचे आक्रमण आणि भारतात झालेल्या राजकीय उलथापालथीचा इतिहास आपण पुढील लेखात पाहू.

 

-संजय सोनवणी

 

Thursday, August 15, 2024

शक-कुशाणांचे आक्रमण

 




अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर काही काळात इसपूच्या पहिल्या शतकात पश्चिमोत्तर भारतावर आक्रमण झाले ते शकांचे. शक (सिथीयन) मुळचे मध्य आशियातील गवताळ प्रदेशात राहणारे भटके लोक. ते उत्तम प्रतीचे घोडेस्वार आणि योद्धे होते. ग्रीकांच्या सत्तेचा अस्त बल्ख प्रांतातून घडवून आणायलाही हीच जमात कारणीभूत झाली.

राजा मोएस हा पहिला शक अधिपती मानला जातो. त्याने अफगाणिस्तानपाठोपाठ गिलगीट-बाल्टीस्तानमधील व्यापारी मार्गांवर सत्ता स्थापन केली. काबुल-कंदाहार ही शहरेही या काळात भरभराटीला आली. या काळात अफगानिस्तानाच्या भूमीत नव्याने सांस्कृतीक अभिसरण झाले. भारतीय भागावरही त्याची सत्ता असल्याने त्याने जी नाणी पाडली ती द्वैभाषिक होती. एका बाजूला गांधारी प्राकृत तर दुस-या बाजूला ग्रीक भाषा असे त्यांचे स्वरूप होते. अझेस या शक राजाच्या मृत्युनंतर दक्षिण अफगाणिस्तान गोन्डोफारेस या पार्थियन राजाच्या अंमलाखाली आला. (इसपू २०.) अराकोशिया, सिस्तान, सिंध आणि पंजाब एवढा भाग त्याच्या आधिपत्याखाली होता. काबुल खोरेही जिंकून घेत तक्षशिला ही त्याने राजधानी बनवली. पण ही राजवट अल्पजीवी ठरली. गोन्डोफारेसच्या मृत्युनंतर विखंडीत होत गेली आणि प्रभावहीन बनली. असे असले तरी शक प्रान्ताधीपाती (क्षत्रप) भारताच्या विविध भागांवर राज्य करतच राहिले. उत्तरेतील आणि पश्चिमेकडील नहपान, रुद्रदामन हे आपल्याला परिचित आहेतच. पण या शकांनी भारतीय समाजव्यवस्था स्वीकारून ते येथेच मिसळून गेले. त्यांचा वेगळा प्रभाव फारसा शिल्लक राहिलेला आढळून येत नाही.

पार्थियन सत्ता अल्पावधीत नष्ट होण्याचे कारण घडले ते मध्य आशियातील युएची शाखेतील कुशाणांच्या आक्रमणाचे. कुशाणांनी अफगानिस्तनचा भूभाग झपाट्याने आपल्या अंमलाखाली तर आणलाच पण उत्तर भारतही क्रमश: त्यांच्या प्रभावाखाली गेला. या साम्राज्याचा संस्थापक कुजूल कडफिसेस हा होय. (पहिले शतक) त्याने तक्षशिला हीच आपली पहिली राजधानी बनवली. कुशाण साम्राज्याचा काळ भारताच्या इतिहास व संस्कृतीवर मोठा प्रभाव टाकणारा काळ मानला जातो. त्यांनी भारतातच आपली राजधानी वसवून अफगाणिस्तान ते मध्य आशियापर्यंत एक विशाल साम्राज्य उभे केले. या काळात बौद्ध धर्माचे वर्चस्व वाढल्याचे आपल्या लक्षात येते. मध्य आशियात बौद्ध धर्म तर गेलाच पण या विस्थापित बौद्धांनी पाली व गांधारी प्राकृत भाषेवर संस्कार करत वेगळ्याच परिणत भाषेचा विकास सुरु केला. तिचे विकसित रूप म्हणून संस्कृत भाषेचा उदय दुस-या शतकापर्यंत झाल्याचे आपल्याला आढळून येते. कुशाण काळाची ही एक मोठी उपलब्धी मानता येईल. पुढे संस्कृतचा स्वीकार वैदिक, हिंदू, जैन आणि अन्य धर्मियांनीही करायला सुरुवात केली कारण स्थानपरत्वे अर्थबद्दल न होता किमान शब्दात व्यापक अर्थ देण्याचे सामर्थ्य त्या भाषेत होते.

कनिश्क या घराण्याचा सर्वात बलाढ्य सम्राट होय. याच्या काळात अफगाणिस्तानातील बल्ख हे जागतिक व्यापारी मार्गांचे भरभराटीला आलेले मध्यवर्ती केंद्रबिंदू बनले. एका अर्थाने बल्ख प्रांत जागतिक संस्कृतींचे मिलनस्थल बनला. साम्राज्याचा व्याप मोठा असल्याने या काळात व्यापारी मार्गांना सरक्षण मिळाल्याने व्यापारही मोठ्या प्रमाणात भरभराटीला आला. भारतातील हिमालयीन भागातून मध्य आशियाला जोडणारे प्राचीन व्यापारी मार्गही या काळात मोठ्या प्रमाणात व्यापार, राजकीय आणि लष्करी हालचालीसाठी वापरले गेले. तक्षशिलेवरून अफगाणिस्तानात जाणारे व्यापारी मार्गही या काळात मोठ्या वर्दळीने व्यापले जावू लागले. सांस्कृतिक अभिसरणाच्या या काळाने भारतातील कलाशैलीवरही मोठा परिणाम केला. “गांधार शैली” या काळातच परिणत अवस्थेला पोचली.

कनिश्काने मात्र आपली राजभाषा ग्रीक हीच ठेवली. तो पारशी धर्माचा अनुयायी होता आणि नाना देवतेचा भक्त होता. त्याच्या असंख्य नाण्यांवर नाना देवीची प्रतिमा असल्याने चलनाच्या धातूतुकड्यांना नाणे ही सद्न्या पडली ती आजतागायत वापरात आहे. हीही कुशाण साम्राज्याची एक छाप म्हणता येईल. त्याने काढलेल्या नाण्यांवर शिव आणि गौतम बुद्धाच्याही प्रतिमा आढळून येतात. याचा अर्थ त्याने भारतीय धर्मांनाही बरोबरीचे स्थान दिले होते. या काळात जैन धर्मानेही मोठी उचल घेतली. कुशानांची भारतातील दुसरी राजधानी मथुरा येथिल कंकाली टीला येथे झालेल्या उत्खननात कुशाण काळातील असंख्य जैन प्रतिमा आणि जैन विहारांचे अवशेष मिळाले आहेत. या काळात कुशाण साम्राज्यात कला आणि साहित्यालाही बहर आल्याचे दिसते. या काळात एका जैन लेखकाने माहाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेल्या ‘अंगविज्जा’ या ग्रंथात कुशाणकालीन समाज व धर्मव्यवस्थेचे विस्तृत वर्णन वाचायला मिळते. कुशानांनी भारतीय धर्म व समाजव्यवस्थेवर परिणाम केला असला तरी सर्व धर्मांना त्यांनी आदराने वागवलेले दिसते.

कनिष्काची सत्ता काश्मीरवरही होती. कुशानांनी काश्मीरमध्ये कनिश्कपूर आणि हुश्कपूर ही शहरेही वसवली. काश्मीरमधील कुंडलवन येथे कनिश्काने भिक्खू वसुमित्राच्या अध्यक्षतेखाली बौद्धांची चवथी धर्मसंगीती भरवली होती. पहिल्या शतकात भरलेल्या या धर्मसभेत अश्वघोशासहित पाचशेहून अधिक बौद्ध विद्वान उपस्थित होते.

व्यापारी मार्गावरील नियंत्रण हाच मुख्यता: सत्तास्थापनेचे कारण असल्याने कुशाणानी तक्षशिलेपासून चीन व मेसोपोटेमियाकडे जाणा-या व्यापारी मार्गांची देखभाल केली व व्यापा-यांना विशेष संरक्षण पुरवले. देशी उत्पादनांनाही त्यामुळे भरभराटीचे दिवस आले. अर्थव्यवस्था बळकट झाली. या व्यापारी मार्गावरच असलेल्या हुंझा आणि बामियान येथे भव्य बुद्धप्रतिमा निर्माण केल्या गेल्या. बौद्ध आणि जैन मठ व विहाराचीही निर्मिती अगदी मध्य आशियातही केली गेली.

कुशाण सत्ता दक्षिण भारतात पसरू शकली नाही याचे कारण म्हणजे सातवाहन साम्राज्य. बलाढ्य सत्ता असलेल्या सातवाहनांनी कुशाणाना दक्षिणेत प्रवेश करू दिला नाही. उलट गौतमीपुत्र सातवाहनाने शक क्षत्रप (प्रांताधिकारी) नहपानाशी युद्ध करून त्याला नाशिकजवळ झालेल्या युद्धात ठार मारले.

कुशाण राजवट हा भारतातील एक महत्वाचा अध्याय होय. या राजवटीचा अंत होण्याचे कारण म्हणजे भारतातून गुप्त साम्राज्याचा होऊ लागलेला विस्तार आणि बल्ख प्रान्तावरील सस्सानियान या पर्शियन घराण्याचे हल्ले. शेवटी त्यांची बल्ख प्रांतावर सत्ता प्रस्थापित केली. सन २२५ पर्यंत गांधार प्रांतही जिंकून घेतला. कुशाणांची सत्ता आकुंचित होत तक्षशिलेपुरती सीमित झाली आणि चवथ्या शतकात शेवटी गुप्त साम्राज्याचे मांडलिक बनली सुमारे तीनशे वर्षाच्या या कालावधीत त्यांनी ग्रीक आणि पर्शियन धर्मकल्पना भारतात रुजवल्या. अनेक ग्रीक देवी-देवतांचीही मंदिरे या काळात उभारली गेली. गौतम बुद्धाच्या तत्कालीन प्रतिमांवर ग्रीको-पर्शियन शैलीचाही मोठा प्रभाव दिसून येतो.

दीर्घ काळ टिकलेली कोणतीही सत्ता समाजजीवनावर एक ठसा सोडून जात असते. शेवटचा कुशाण अधिपती किपुनाडा. त्याची सत्ता सन ३५० मध्ये संपुष्टात आली. परकीय सत्तेचे एक पर्व संपले पण कुशाणांचा प्रभाव मात्र दीर्घकाळ राहिला.

 

-संजय सोनवणी

 


Thursday, August 1, 2024

ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम!


 

ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम!
अलेक्झांरचे भारतावरील आक्रमन फक्त तीन वर्ष टिकले असले तरी ग्रीक आणि भारतीयांचा परस्परसंपर्क पुढेही कायम राहिला. चंद्रगुप्त मौर्याने नंद सम्राटाचा पराजय करून भारतभर एकछत्री सत्ता प्रस्थापित केली ही फार मोठी राजकीय घडामोड जशी होती तशीच चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव करून ग्रीकांशी विवाहसंबंध जोडून एक अंतरराष्ट्रीय सांस्कृतीक परस्पर-सहकार्याचा पायाही घातला. हेलनचे मौर्याच्या पाटलीपुत्र येथील राजप्रासादात झालेल्या आगमणामुळे भारत व ग्रीक यांच्यात एक सांस्कृतीक अनुबंध निर्माण झाला. भारतात ग्रीकांचे येणेजाणे वाढले.
सेल्युकसने मेगास्थानिज या ग्रीक राजदूताला मौर्यांच्या दरबारी पाठवले. अनेक ग्रीक शिष्टमंडळेही येत राहिली. त्यासोबत ग्रीक विद्वान, इतिहासकार, कलाकार भारतात येत राहिले. त्यांची एतद्देशीय विद्वानांशीही चर्चा-विमर्श होत राहिले. त्यातून कला, साहित्य आणि वास्तुशैलीवरही परिणाम होऊ लागला. मेगास्थानिजने भारतातील वास्तव्यावर आधारित इंडिका हा ग्रंथही लिहिला. आज तो पूर्णपणे उपलब्ध नसला तरी त्यातील जे महत्वाचे अंश आहेत ते ग्रीक इतिहासकारांनी जतन केले आहेत.
मेगास्थानिजने लिहिलेला वृत्तांत काही प्रमाणात मिथकीय शैलीत असला तरी त्याच्या दृष्टीकोनातून लिहिलेले भारतीय भूगोल व लोकजीवनाचे वर्णन आजही महत्वाचे आहे. भारतीय समाजरचनेचे आपल्याला आज अज्ञात असलेले पैलूही त्यातून समजतात. या ग्रंथामुळे ग्रीक जगालाही भारताची ओळख पटू लागली. सांस्कृतिक देवाणघेवाणीचे पर्व पुन्हा एकदा सुरु झाले असे म्हणायला हरकत नाही.
तसा भारताला अलेक्झांडरपुर्वी ग्रीक माहीतच नव्हते असे नाही. भारताचे प्राचीन काळापासून व्यापारानिमित्त पश्चिमेकडील देशांशी संपर्क होतेच. पण मौर्यकालात हे संबंध वेगाने वाढले असे म्हणता येईल. त्यात भारताच्या सीमा आता हिंदुकुश पर्वतापर्यंत वाढलेल्या होत्या, त्यामुळे दळण-वळणही सुलभ झालेले होतेच. विशेषता: गांधार-सिंध प्रांतात तर अनेक ग्रीक स्थायीकही झाले होते. सम्राट बिन्दुसाराच्या काळातही या सीमा कायम राहिल्या. बिन्दुसाराची अमित्रघात, सिंहसेन अशीही काही बिरुदे होती. दैमेकस हा सीरियाच्या सम्राटाचा वकील म्हणून याच्या दरबारात उपस्थित होता. इजिप्तचा राजा टोलेमी (दुसरा) याचा डायनोसियस हा ग्रीक वकीलही याच्या दरबारी आला होता. जागतिक राजकिय संबंध याच्याही काळात प्रस्थापित होत राहिले.
इसपू २६९ मध्ये अशोक सम्राटपदी आरूढ झाला. पुर्वजीवनात आपल्या आजोबाप्रमाणेच जैन असलेल्या अशोकाने आपल्या चवदाव्या शासनवर्षी कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याने म्यानमारपासून ते हिंदुकूश पर्वतापार बल्खपर्यंत भारताच्या सीमा भिडवल्या. या काळात अफगाणिस्तान, मध्य आशिया, ग्रीस, श्रीलंका इत्यादि देशात बौद्ध धर्म फैलावला व बौद्ध साहित्याला झळाळी मिळू लागली. तिसरी बौद्ध धर्मसंगीतीही त्याच्या कारकिर्दीत व त्याच्याच राजाश्रयाने भरवली गेली. यात बौद्ध धर्मात घुसलेल्या अपप्रथांचे उच्चाटन करण्यावर विशेष जोर देण्यात आला.
सम्राट अशोकाने अकेमेनिड सम्राट पहिल्या दारियसचे अनुकरण करत त्याच्या साम्राज्यात सर्वत्र शिलालेख व स्तंभलेख कोरवून घेतले. आतापर्यंत त्याचे पस्तीसच्या आसपास शिलालेख सापडले आहेत. त्यातील काही अर्माईक भाषेतही आहेत. दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहारजवळील अशोकाच्या ग्रीक भाषेतील तेराव्या शिलालेखात कलिंग युद्धाचा संदर्भ आला असून त्यात अशोकाचे साम्राज्य कोठेकोठे पसरले होते याचे उल्लेख आहेत व अन्य समकालीन ग्रीक राजांचीही नावे आलेली आहेत. या काळात अनेक ग्रीकान्नीही बौद्ध धर्म स्वीकारला होता. मध्य आशियापर्यंत बौद्ध धर्माने आपले स्थान निर्माण केले व शेकडो स्तूप आणि विहार बांधले गेले. भारतीय धर्माने देशाच्या सीमा ओलांडायची सुरुवात सम्राट अशोकाच्याच नेतृत्वाखाली झाली.
असे असले तरी पुढे मौर्य साम्राज्यही विस्कळीत झाले. तोवर सेल्युसिड साम्राज्यही आक्रसत चालले होते. मौर्य काळापर्यंत तरी गौतम बुद्धाच्या मानवी प्रतिमा बनवल्या जात नसत. चैत्य आणि बोधी वृक्ष हीच बुद्धाची प्रतिके मानून त्यांची पूजा केली जात असे. पण पश्चिमोत्तर भागातील ग्रीकांमुळे बौद्ध व हिंदू कलेवर विलक्षण परिणाम झाला. गौतम बुद्धाच्या प्रमाणबद्ध कलात्मक मूर्ती-प्रतिमा बनू लागल्या. यातूनच पुढे गांधार शैली विकसित झाली. ग्रीकांच्या क्युपिड व वज्रपाणीच्या स्वरूपात हेराक्लीजसदृश्य प्रतिमांचा समावेश बौद्ध कलांत झाला. पुढे कुशाणकाळात तर नाण्यांवरही शिव आणि बुद्ध यांच्या प्रतिमा झळकू लागल्या. अर्थात या कलेचा देशव्यापी प्रसार व्हायला काही शतके लागली.
मौर्य सम्राट बृहद्रथाची हत्या करून पुष्यमित्र श्रुंग सत्तेवर आला. त्याच्याही दरबारी हेलीओडोरस नावाचा ग्रीक राजदूत उपस्थित होता. या काळात ग्रीकांनी पुन्हा उचल खाल्ली. मिनांडर बल्खचा राजा बनला आणि त्याने मौर्यांच्या ताब्यात असलेले अफगानिस्तानातले भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. त्याने लक्षशिलेचा प्रांतही त्याच्या सत्तेखाली आणला व द्वैभाषिक (ग्रीक-प्राकृत) नाणी पाडायला सुरुवात केली. त्याने प्राकृत नाव मेनांद्र असे केले असले तरी मिलिंद या नावाने तो बौद्ध साहित्यात प्रसिद्ध आहे. मिलिंदपन्ह या ग्रंथात त्याची बौद्ध धर्माविषयीची आस्था दिसून येते. असे असले तरी त्याने मथुरा, पांचाल आणि साकेतवरही स्वारी केली होती. याच काळातील जैन राजा खारवेल याने आपल्या हाथीगुंफा शिलालेखातही (इसपू दुसरे शतक) आपण ग्रीकांना राजगृहपासून मथुरेपर्यंत कसे परतवून लावले याचा उल्लेख केलेला आहे. पुराणांनीही या आक्रमणाचे ओझरते का होईना उल्लेख केलेले आहेत. थोडक्यात मौर्य साम्राज्याचा अस्त घडवूनही पुष्यमित्र शृंगाने आक्रमणे रोखण्यासाठी कसलीही तयारी दाखवली नव्हती. या काळात भारतातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे आपल्याला दिसते.
याचा परिणाम समाजजीवनावरही होणे अपरिहार्य होते. भारहूत येथील बौद्ध स्तूपात मिनांडरची प्रतिमा मिळालेली आहे. सांची येथील स्तूपाच्या अवशेषात बुद्धिस्ट अनुयायी ग्रीक वेशात चित्रित केले गेले आहेत. स्वात खो-यातील बहुतेक बौद्ध स्तुपांत त्याची नाणीही सापडलेली आहेत व एक त्याचा नामोल्लेख असलेला लेखही सापडलेला आहे. त्यानंतरही त्याच्या अनेक वंशजांनी किमान पश्चिमोत्तर भारतावर राज्य केले. या काळात बौद्ध कला आणि प्रभामंडळातील दैवत कल्पनांत ग्रीक मिथकांचा समावेश झाला. या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी त्यांच्या संस्कृतीतील दैवतांचाही त्यांना विसर पडणे शक्य नव्हते. दोन्ही श्रद्धांत अनेकदा अजाणतेपणे कसे बेमालून मिश्रण होऊ लागते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
ग्रीकांमुळे त्यांचे खगोल व ज्योतिषशास्त्रही भारतात प्रवेशु लागले. ग्रह-राशी आधारित पंचांगाशी भारतीयांचा परिचय झाला. तत्पूर्वीचे भारतीय ज्योतिषशास्त्र नक्षत्राधारित होते. ग्रीकांच्या महाकाव्य रचनांचा प्रभावही भारतीयांवर पडला. महाभारत या महाकाव्यावर इलियडचा मोठा प्रभाव आहे हे जागतिक विद्वान दोन्ही महाकाव्यातील अनेक साम्यस्थळांवरून दाखवून देतात. थोडक्यात आक्रमणे आणि सत्ता मानवी अभिव्यक्तीवरही मोठा परिणाम करून जाते. त्याचे अंश जीवित असतात, पण ते अभिनिवेश न आणता शोधावे लागतात.
-संजय सोनवणी
May be an image of 1 person, slow loris and text that says "पुण्य नगरी बेरीज वजाबाकी นิ संजय सोनवणी अलेक्लांडरचे भारतावरोल अकमण आादले ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम! व्यापारनिमित्त पशिमकडील आलेली आहेत. काळात शिलालेख्वानही (इसपू शतक) आपण प्रोकांनोही स्वमाीकारला कलेला पुरागांनीठी अशोकाच्याच सारिवाच्या अलत्क मडਾे राहिलो. न्यासाबत रांहरिले. पिहानांसाचा गोक ललिडिलला तरीत्याच्या नित्रण कন. अजाणतेपणे याचह एक सापडल आहत. अमाईक भपराडा पुन्क म्हणायला चेभारतीय परचय भ्ृत्राधरत माहहीरच प्राকুत भारतायांचर नाटी. पाचीन महाकाव्यावर महाकाय्यातास थोडक्यात, त्याच कलो सनकालीन खाखवेस याने आवल्या Pune Edition Edition Aug 02, 2024 Page No. 06 Powered erelego com अस्ततात, ९८६०१९१२०५"
Like
Comment
Send
Share

हुणांचे आक्रमण: क्रूर काळाचा उदय!

  आपण आशिया खंडातील एका अशांत आणि अस्वस्थ काळाबद्दल येथे चर्चा करत आहोत. मध्य आशियातील हुण टोळ्यांनी त्या काळात आशियाभर उच्छाद मांडला हो...