Friday, October 11, 2024

अरबांचे पलायन!



बोलन खिंडीतून उतरलेल्या मोहम्मद कासीमची धाड अर्थातच सर्व प्रथम देबल बंदरावर पडली. कारण अरब कैदीही तेथीलच तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण त्याला वाटले होते तेवढ्या सहजपणे सिंधचा राजा दाहीरला त्याला जिंकता आले नाही. बंदर जिंकण्यासाठी तब्बल सात दिवस त्याला संघर्ष करावा लागला. राजपुत्र जयसिंहानेही या युद्धात प्रचंड पराक्रम गाजवला. बंदर जिंकल्यानंतर दाहीरने माघार घेतली खरी पण कासीम सिंधू नदी ओलांडण्याच्या बेतात असताना दाहीरने सर्व शक्ती एकवटून कासीमच्या सैन्यावर अरोर येथे हल्ला केला. येथे मात्र दाहीरचा समूळ पराभव झाला. दाहीरचा शिरच्छेद करण्यात आला. सिंध राज्याचा हा अस्तच होता.
युद्धानंतर दाहीरची पत्नी लाडी हिच्याशी कासीमने जबरदस्तीने विवाह केला तर दाहीरच्या सूर्या व प्रेमल या दोन्ही राजकन्यांना भेट म्हणून खलीफाकडे पाठवून दिले असे चचनामा या तत्कालीन ग्रंथावरून दिसते. दाहीरचा पुत्र जयसिंह मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने आधी कांग्रा राज्यात आश्रय घेतला असला तरी शेवटी काश्मिरनेच त्याला आश्रय देण्याचे धैर्य दाखवले. कासीमचे सिंध-मकरान प्रान्तात अरबांचे बस्तान बसले. देबल बंदर व बोलन खिंडही ताब्यात आल्याने व्यापारी मार्ग अरबांच्या ताब्यात गेले. अर्थात कासीमचे विजय सोपे मात्र नव्हते. त्याला एतद्देशीय सत्तांच्या कडव्या विरोधाला सामोरे जावे लागले.
सिंधमध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर कासिमने उत्तरेकडे आपला मोहरा वळवला पण मकरानमध्ये (बलोचीस्तान) व उत्तरेकडे मोहरा ओलांडल्यानंतर पख्तुनीस्तानादि भागांतील टोळ्यांनीही अरबांना कसून विरोध तर केलाच पण सिंधमध्ये असतांना जाटांनीही त्याला पुष्कळ उपद्रव दिला. तत्कालीन इतिहासकार अल बालाधुरीनुसार सिंध जिंकल्यावर कासिमने हिंदच्या राजांना इस्लाम स्विकारायचा फतवाच काढला होता. शिवाय त्याने उत्तरेतील राजांविरोधात सैन्यही पाठवले. सौराष्ट्रच्या (वल्लभीचे मैत्रक) राज्याने कासीमशी तह करुन टाकला. मिड लोक तर आधीच शरण आलेले होते. फतव्यांपाठोपाठ कासिमचे दहा हजारांचे सैन्य कनोजकडे वाटचाल करु लागले. कनोजला तेंव्हा राजा हरचंदर राज्य करत होता. त्याला कासिमची शरण येण्याची आज्ञा मिळताच त्याने कडवे उत्तर पाठवले. त्या उत्तरात तो म्हणाला, “वकीलांना कैद करण्याची आमच्यात प्रथा नाही, अन्यथा तुझा माज तुझ्या वकीलांना दंडबेड्या ठोकून उतरवला असता. तू तुझ्या अमीराकडे परत जा आणि त्याला सांग की रणमैदानावरच आमची शक्ती तुला पहायला मिळेल." या उद्दाम उत्तरामुळे कासिमला संताप आला असला तरी त्याच्या सेनापतींची कनौजविरुद्ध काहीही करण्याची हिंमत झाली नाही.
काश्मिरने दाहिरपूत्र जयसिंहाला आश्रय दिला असल्याने त्याने आपला मोहरा काश्मिरकडे वळवणे स्वाभाविकच होते. काश्मिरवर स्वारी करण्यासाठी स्वत: मोहम्मद कासिम खलिफाचीच येथील रजवाड्यांना शरण येण्याची आज्ञा घेऊन निघाला होता. पण तो काश्मिरच्या तत्कालीन सीमांपर्यंतच, म्हणजे पंजाबमधील जालंधरपर्यंतच, पोहोचू शकला. तेंव्हा काश्मिरच्या सीमा जालंधरपर्यंत विस्तारलेली होती. त्याला तेथेच काश्मिरच्या चंद्रापीडाच्या सैन्याच्या कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. चंद्रापीडाने आपल्या युद्ध कौशल्याने कासिमला तेथेच रोखले आणि त्याला आपली दिशा वळवायला भाग पाडले. काश्मिर जिंकुन घेता येईल आणि काश्मिरच्या राजा चंद्रापीडाने आश्रय दिलेल्या दाहिरचा राजपुत्र जयसिंहालाही पकडता येईल हे कासिमचे दिवास्वप्नच ठरले. अन्यत्र विजयी ठरलेल्या कासिमला तेथे माघार घ्यावी लागल्याने ती मोहिम त्याने तेथेच सोडली आणि तो हिमाचल प्रदेशातील कांग्रा राज्याकडे वळाला. हे राज्य अरब दस्तावेजांत अल-किराज म्हणून उल्लेखले गेले आहे.
तेंव्हा कांग्रा भागात किरा वंशीय राज्यकर्ते राज्य करत होते. कांग्रा राज्यानेही काही काळ जयसिंहाला आश्रय दिला होता, पण तेथील राजाच्या जानकी नामक लंपट बहिणीने त्याला एके रात्री आपल्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले आणि ते पाप उघडकीला येईल या भितीने आपल्या भावाकडे जयसिंहानेच आपल्याशी अतिप्रसंग केला असा आरोप केल्याचे समजताच जयसिंह तेथून कसाबसा सटकला आणि पुन्हा काश्मिरच्या राजाच्या आश्रयाला गेला अशी माहिती चचनामा देतो, पण ही माहिती कितपत विश्वसनीय आहे याबाबत शंका आहे. पण कांग्रावर कासिमने आक्रमण केले हे मात्र खरे. हे छोटे राज्य कासिमच्या आक्रमणासमोर टिकाव धरु शकले नाही. पण कासिमसारख्या बलाढ्य व कूशल सेनानीला सीमेवरच हरवून अन्यत्र वळायला भाग पाडने हे काश्मीरचा राजा चंद्रापीडाचे मोठेच साहसी कार्य होय.
कासीमने मर्यादित का होईना यश मिळवले आहे आणि यापेक्षा तो अधिक काही साध्य करू शकत नाही हे लक्षात येताच सन ७१५ मध्ये कासिमला अरबस्तानात परत बोलावले गेले. नंतर तिकडेच काही काळातच त्याचा मृत्यू झाला. भारतात तो केवळ चार वर्षच राहिला पण येथील उत्तरपूर्व भागातील सामाजिक जीवनाची व राजसत्तांची पुरती नासाडी झाली. त्याचा मृत्युही नेमका कसा झाला याच्या दोन हकीकती आहेत. अल-बालाधुरी म्हणतो की मोहमद कासिम इराकच्या अमीराशी (गव्हर्नरशी) झालेल्या कौटुंबिक झगड्यात मारला गेला तर चचनाम्यानुसार कासिमने दाहिरच्या ज्या सुर्या आणि प्रेमल या दोन कन्यांना बंदी बनवून खलिफाला भेट म्हणून पाठवल्या होत्या त्यांनी खलिफास "आमचा कौमार्यभंग आधीच खुद्द कासिमनेच केला असून उष्टावलेल्या आम्ही तुम्हाला पाठवण्यात आलो आहोत." असे खोटेच सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या खलिफा लेमान बिन अब्द अल मलिकने त्याला गायीच्या चामड्यात शिवून घेऊन गुदमरवून आत्महत्या करायला भाग पाडले. यातील दोन्ही घटनात खरी कोणती हे सांगणे अशक्य आहे, पण नंतर त्या दोघींचे काय झाले याचीही माहिती दुर्दैवाने मिळत नाही.
दाहीरपुत्र जयसिंह कासिम परत जाईपर्यंत तरी काश्मिरमध्येच राहिला असे दिसते. कासिम परत गेल्यानंतर जयसिंहाने आपल्या राज्यात परत जाऊन कासिमच्या आज्ञेनुसार इस्लाम स्विकारुन हुल्लीशाह हे नाव धारण करत खलीफाचा मांडलिक म्हणून आपली सत्ता स्थापित केली. अर्थात खलीफाने जुनैद या राज्यपालाची नियुक्ती केल्यानंतर मात्र जुनैदने त्याच्याशी कुरापत काढून त्याच्याशी युद्ध केले व त्याला जिवंत पकडून नंतर त्याची हत्या केली. अशा रीतिने सिंध प्रांतावर अरबांची सार्वभौम सत्ता स्थापित झाली.
अरबांनी सिंध प्रांताची अतोनात लुट केली याचेही अनेक दाखले आहेत. पण नंतर काश्मीरच्या सत्तापदी ललितादित्य मुक्तापीड हा समर्थ शासक आला. त्याने मात्र अरब आक्रमक हे या भूमीला धोका आहेत हे ओळखले. त्याने अरबांना पळवून लावण्यात त्याने नुसते यश मिळवले नाही तर त्यांचा पाठलाग करत राज्यपाल जुनैदला ठार मारले आणि तुर्कस्थानपर्यंत काश्मीरचे साम्राज्य पसरवले. हा रोमहर्षक इतिहास पुढील लेखात.
-संजय सोनवणी
May be an image of 1 person and text
Like
Comment
Send
Share

Friday, October 4, 2024

अभिजात मराठी

  



 

मराठी भाषा अभिजात आहे की नाही याची चर्चा आपल्याला सोळाव्या शतकापासूनच सुरु झालेली दिसते. “संस्कृत भाषा देवांनी निर्माण केली, मग काय प्राकृत भाषा (म्हणजे माहाराष्ट्री प्राकृत) काय चोरांनी निर्माण केली?” हा प्रश्न  अत्यंत उद्वेगाने संत एकनाथ यांनी विचारला होता. मराठी भाषा स्वतंत्र नसून संस्कृतपासून निर्माण झाली हा दुराग्रह भाषाविद्वानांनीही धरला. एकोणीसाव्या शतकात आर्य आक्रमण सिद्धांतामुळे भारतातील बहुतेक भाषा या संस्कृतोद्भव आहेत व एतद्देशियांना आक्रमक आर्यांची भाषा न पेलल्यामुळे सामान्य लोकांत अपभ्रष्ट संस्कृत म्हणून प्राकृत बोलीभाषा निर्माण झाल्या असा अ-भाषाशास्त्रीय सिद्धांत पुढे आला. भाषाशास्त्राची मांडणी करताना प्राकृत भाषांना मिडल-इंडो-युरोपियन अशी संज्ञा बहाल करत प्राकृत भाषांना दुय्यम स्थान दिले गेले. भाषांचा प्रवाह हा प्राथमिक ओबड-धोबडतेकडून कालौघात सांस्कृतिक परिवर्तनासोबत परिष्कृततेकडे वाटचाल करतो आणि भाषा ही त्या त्या प्रदेशाच्या भुवैशिष्ट्यांमुळे निर्माण होणा-या सामुहिक मानसशास्त्राची उपज असते हे निखळ प्रादेशिक भाषाशास्त्रीय सत्य आर्य आक्रमण सिद्धांत डोक्यावर घेणा-या विद्वानांच्या लक्षात आले नाही. उलट भाषांचा उपयोग सांस्कृतिक दहशतवादासाठी होऊ लागला. संस्कृत ही देवभाषा असून बाकी संस्कृतच्या अपत्यभाषा आहेत हे असत्य लोकांवर बिंबवण्यात भाषिक वर्चास्वतवादी लोक यशस्वी झाले. यामुळे भाषिक न्यूनगंड निर्माण झाला आणि सामाजिक मानसशास्त्र दुय्यम झाले.

आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने बहाल केला आहे. मराठी सोबतच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा दिला गेला आहे. याचेही विश्लेशन गरजेचे असले तरी आपण आधी अभिजात भाषा म्हणजे काय आणि मराठी अभिजात का यावर विचार करूयात.

जीही भाषा स्वतंत्र आहे, कोणात्याही बाह्य प्रभावाखाली तिची निर्मिती झालेली नाही, ज्या भाषेत किमान दीड हर्जार वर्षांपासून लिखित पुरावे उपलब्ध आहेत आणि ज्या भाषेचा प्रवाह सातत्यपूर्ण राहिलेला असून जी मौलिक साहित्य परंपरा दाखवते ती भाषा अभिजात होय.

आजची मराठी भाषा प्राचीन ‘महरठी पाईय’ असे तत्कालीन मराठीत म्हणवणा-या भाषेचा सलग प्रवाह आहे. या शब्दाचे कृत्रिम संस्क्रुत रूप माहाराष्ट्री प्राकृत असे केले गेले. मराठी शब्दांच्या कृत्रिम संस्कृतकरणाचा अट्टाहास मध्ययुगात मोठ्या प्रमाणात बळावल्याने अनेक सांस्कृतिक बाबीही झाकोळल्या गेल्या आहेत. उदाहणार्थ सालाहन किंवा सातवाहन या शब्दाचे केलेले शालिवाहन हे संस्कृत रूप. यामुळे शक संवत्सराची स्थापना करणारे शालिवाहन कोण हा प्रश्न दीर्घ काळ अनुत्तरीत राहिला होता हा इतिहास आहे. असे अनेक गोंधळ या भाषिक अपप्रवृत्तीमुळे झालेले आहेत ज्याचे निराकरण अद्याप व्हायचे आहे.

संस्कृत भाषा अन्य सर्व भारतीय भाषांपेक्षा प्राचीन आहे काय? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आहे की नाही. संस्कृत  भाषेचा जन्म इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या तीनशे वर्षांच्या काळात प्राकृत भाषांवर संस्कार करत क्रमश: झाला. याचे पुरावे आपल्याला प्राचीन नाण्यांवरील व शिलालेखातील भाषेतून मिळतात. वेदांची भाषा आणि संस्कृत भाषा एकच असाही थोर गैरसमज समाजात आहे., वास्तव हे आहे की या दोन्ही भाषा सर्वस्वी भिन्न आहेत. पाणिनी आपल्या अष्टाध्यायी या व्याकरणात वैदिक भाषेचा उल्लेख ‘छांदस’ असा करतो तर संस्कृतचा उल्लेख फक्त ‘भाषा’ असा करतो. वैदिक भाषा संकरीत असून त्यात अवेस्त्याची प्राचीन पर्शियन  भाषा आणि प्राचीन प्राकृत भाषांचा संकर झालेला आहे. एवढेच काय, संस्कृत भाषाही प्राकृत भाषांवर संस्कार करत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेली आहे.

या संदर्भात जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेजया पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन माहाराष्ट्री प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.


खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक छांदस भाषेत उधार घेतलेले आहेत. भाषांचा उगम” या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र आजवर अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक होते.


त्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा गाथा सतसईहा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच अंगविज्जाहा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. पण अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग काळातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. गाथा सप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार? आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल? संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. गुणाढ्याच्या बृहत्कथेचेच काय पण प्राकृतप्रकाश(मूळ नाव- पाअड लख्खन सुत्त) या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचाही भामहकृत संस्कृत अनुवाद झाला. याचे कारण संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली असली तरी प्राकृतातही समांतरपणे विपुल ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला.

 

मराठीचे आज उपलब्ध असलेले आद्य व्याकरण इसवी सनापूर्वी दुस-या शतकातच लिहिले गेले, म्हणजेच मराठी भाषा त्याच काळात प्रगल्भ झालेली होती. ती बोलण्या-लिहिण्यात त्याच्याही खूप पूर्वीपासून असणार हा अंदाज आपण सहज बांधू शकतो. मराठी भाषेत रामकथेवरील विमल सुरीकृत आद्य महाकाव्य ‘पउमचरीय” इसवी सनाच्या पहिल्या शतकातच लिहिले गेले. याच काळातील हाल सातवाहनाने संपादित केलेली गाहा सतसई, नंतरच्या कालखंडात लिहिले गेलेले अंगविज्जा, लिलावइ, वासुदेव हिंडी, समराइच्च कहा, महाकाव्य गौडवहो सारखे असंख्य ग्रंथ हे मराठीचे वैभव आहेत. तेराव्या शतकानंतर उदयाला आलेले संतसाहित्य हे मराठी भाषेच्या विकासातील कळस आहे.  जिवंत भाषेप्रमाणे आपली मराठी कालौघात विकसित होत आजच्या स्वरुपापर्यंत पोचली आहे. बावीसशे वर्षांपूर्वीच्या सातवाहन कालीन मराठीतील असंख्य शब्द आजही आपल्या नित्य बोलण्यात असतात ही बाब भाषेच्या सातत्याचे फार मोठे लक्षण आहे.

 

मराठी अभिजात ठरल्याचे लाभ काय हा एक प्रश्न सातत्याने विचारला जाऊ लागला आहे. मराठी अभिजात ठरणे म्हणजे ती स्वतंत्र भाषा आहे हे अधिकृतरीत्या मान्य होणे. भाषिक न्यूनगंड हा मानवी समुदायाचे मानसिक शोषण करणारा असतो. भाषिक वर्चस्वतावादापासून सुटका होणे आणि आपली भाषा ही आपल्याच पूर्वजांची निर्मिती आहे ही जाणीव वेगळा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करणारी असते. यामुळे केंद्र सरकार अनुदान देईल, भाषेचा अभ्यास वाढेल, मराठी भाषकांकडे तुच्छतेणे पाहणे कमी होईल अशी अपेक्षा असली तरी शेवटी भाषा ही सामुदायिक निर्मिती असल्यामुळे मराठी भाषेचे वैभव दिगंत वाढवण्यासाठी मराठी भाषकांनाच कंबर कासावी लागणार आहे.

 

केंद्र सरकारने प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा दिला आहे हे अनाकलनीय आहे. कारण प्राकृत नावाची कोणतीही भाषा नसून माहाराष्ट्री, शौरसेनी, कशूर, पैशाची, मागधी, अर्धमागधी, गांधारी इ. या पुरातन प्रादेशिक लोकभाषांना एकत्रित रीत्या प्राकृत म्हटले झाते. या भाषा लोकांमधून प्रदेशनिहाय सामुदायिक मानसिकतेतून निर्माण झालेल्या असल्याने त्यांना एकत्रित रीत्या  ‘प्राकृत’ (प्राचीन पाइय अथवा पाअड) असे म्हटले जाते.  मराठी भाषा म्हणजेच माहाराष्ट्री प्राकृत तर बंगाली भाषा ही मागधी व अर्धमागधीचा संकर असलेली प्राकृत. हिंदी भाषा शौरसेनी प्राकृतची वर्तमान अवस्था होय. पाली भाषा ही अर्धमागधीवर संस्कार करत तयार करण्यात आली तर संस्कृत भाषा ही पाली भाषेचीच पुढची, अधिक परिष्कृत अवस्था आहे. पाली भाषेला व मराठी, बंगाली आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे उत्तमच, पण प्राकृत नावाची कोणतीही स्वतंत्र भाषा या देशात नसताना तिलाही अभिजात दर्जा दिला आहे. एक तर हा केंद्र सरकारने अज्ञानाने केलेला विनोद आहे अथवा सर्वच प्राकृत भाषांना एकत्रितरित्या अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे. सर्वच प्राकृत भाषांना त्या प्राचीन आणि स्वतंत्र असल्याने अभिजाततेचा दर्जा असायलाच हवा, बंगाली, आसामी वगैरे प्रादेशिक भाषा या प्राचीन प्राकृत भाषांतूनच आलेल्या असल्याने त्या अभिजातच होत यात शंका नाही, पण याबाबत काहीही स्पष्टता नसल्याने या निर्णयात काहीतरी गफलत आहे हे निश्चित. पण अर्थात सरकार वेळ मिळेल आणि राजकीय गरज असेल तर यावर विचार करेल.

 

सध्यातरी मराठी बांधवानी भाषिक न्युनगंडातून सुटका मिळाली याचा आनंद साजरा करून आपली भाषा अजून कशी सशक्त होईल, आपल्या भाषेत कशी अधिकाधिक ज्ञाननिर्मिती होईल याकडे जोमाने लक्ष पुरवावे. आणि शेवटी, अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा नव्हे तर जीही भाषा स्वतंत्र असते व जिच्यात किमान दीड-दोन हजार वर्षांचा निरंतर मौलिक साहित्य निर्मितीचा इतिहास असतो तीच भाषा अभिजात भाषा असते आणि मराठी भाषा या निकषांवर टिकली आहे हे सार्वकालिक सत्य आता केंद्र सरकारनेही मान्य केले आहे हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

 -संजय सोनवणी 

Tuesday, October 1, 2024

एकात्मतेच्या मानवद्रोही विचारांचा रेटा!

 

राष्ट्राबाबतची रा. स्व. संघाची एक विशिष्ट भूमिका आहे. सामाजिक व प्रांतीक समरसता हा तिचा गर्भ आहे. एकचालकानुवर्ती संघटन ही या संघटनेचे वैशिष्ट्य आहे. लोकशाही तत्वज्ञानाला त्यात फारसे स्थान नाही. धर्म संस्था ही राजसंस्थेपेक्षा श्रेष्ठ आहे याबाबत संघाचे स्थापनेपासूनचेच मत आहे व त्याचा प्रचार प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मार्गाने होत आलेला आहे. हिंदू राष्ट्र आणि तेही अखंड ही घोषणा तर पूर्वापार आहे. भारतीय जनता पक्ष ही संघाची राजकीय विंग आहे हे सर्वविदित आहे. आपल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवत नेणे हे कार्य भाजपाशासित राज्यात आणि आता गेली सव्वादहा वर्ष केंद्रात सत्ता असल्यामुळे देशभरात सुरु आहे. त्याचे अनेक मासले पहायला मिळालेले आहेत.
संघाचे तत्वज्ञान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या “एकात्म मानव दर्शन” या पुस्तकात सूत्रबद्ध केले. एक प्रकारे हे पुस्तक म्हणजे संघाचे बायबल आहे असे म्हटले तरी चालेल. आजवर भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने देशाचा कारभार हाकत आला आहे ते पाहता उपाध्यायांनी मांडलेले सुत्ररुपी तत्वज्ञान हे त्यांच्ब्या एकूण धोरणांत प्रतीबिम्बित झाले असल्याचे आपल्याला दिसेल. अलीकडेच एक-देश एक निवडणूक हा माझी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी तयार केलेला अहवाल स्वीकारून आपण उपाध्यायप्रणीत राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानाचेच अनुसरण करत आहोत हे भाजप सरकारने दाखवून दिले आहे. पण हा मुद्दा फक्त एक राष्ट्र एक निवडणूक यापुरता मर्यादित नाही. एक देश-एक धर्म, एक संस्कृती, एक कायदा, एक विचारसारणी, एक करव्यवस्था आणि राज्यांचे अस्तित्व नसलेले एकच एक केंद्र सरकार अशा व्यापक संघीय पायावर जात घटनात्मक लोकशाहीने निर्माण केलेल्या तत्वांना संपूर्णपणे दूर सारत एक नवीच संरचना आणणे हा मुख्य उद्देश आहे आणि त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. या एकाच एक एकात्म संकल्प नेत आता नुकतीच सर्व भारतीयांचा डीएनए एकाच आहे असे विधानही सरसंघचालकांनी केले होते. भगवद्गीता हा राष्ट्रग्रंथ म्हणून घोषित करावा हे सुषमा स्वराज यांची मागणीही त्यातलीच. या एकच एकच्या मोहात आपण आहे ती एकताही टिकवू शकणार नाही याचे भान या मंडळीला नसावे हे एक दुर्दैव आहे.
प्रत्येक राष्ट्रात राष्ट्रवादाविषयी वेगवेगळ्या धारणा असतात. प्रत्येक राजकीय पक्षाचे व विचारवंतांचे राष्ट्रवादाविषयी तत्वज्ञान असते. तत्वज्ञातील वेगवेगळे प्रवाह हे त्या त्या राष्ट्रतील विशिष्ठ सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितींवर अवलंबुन असते. आजही राष्ट्र या संकल्पनेची निश्चित अशी व्याख्या नाही त्यामुळे राष्ट्रवादाचीही सर्वमान्य व्याख्या नसणे स्वाभाविक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्र ही संकल्पनाच आधुनिक आहे. "नेशन" हा शब्द बायबलमद्धे जसा येतो तसाच "राष्ट्र" हा शब्द अथर्ववेदात अनेकदा येतो. पण ही नेशन किंवा राष्ट्र ही संकल्पना समान वंश, समान भाषा, समान धर्म अशा संकल्पनेवर आधारित व मर्यादित भुगोलापुरती म्हणजे टोळीजीवनापुरती सीमित होती. एका टोळीचे एक राष्ट्र किंवा नेशन. या संकल्पनांनी आधुनिक काळात व्यापक रुप घेतले. एक विशिष्ट भुभाग, त्यावरील एकच एक सार्वभौम राजकीय व कायद्याची सत्ता व त्याअंतर्गत येणारे व्यक्तीस्वातंत्र्य असलेले नागरिक अशी साधारणपणे राष्ट्राची व्याख्या व्यवहारात आल्याची दिसते. अर्थात यातही अनेक उपप्रकार पडतात. फॅसिष्ट व कम्युनिस्ट राष्ट्रवाद एकीकडे तर लोकशाहीमूलक सहिष्णू राष्ट्रवाद दुसरीकडे अशी साधारण विभागणी राष्ट्रवाद या तत्वात झालेली आपल्याला दिसते.
उपाध्यायांच्या राष्टवादाच्या संकल्पना या बव्हंशी फॅसिष्ट किंवा कम्युनिस्ट धारणांवर आधारित आहेत. एक राष्ट्र, एक धर्म, एक व्यवस्था आणि सर्व नागरिकांचे व्यक्तित्व विसरून ‘समरस’ अथवा एकात्म होणे ही या तत्वद्न्यानाचा पाया आहेत. एक कल्पना वा राजकीय विचार म्हणून याकडे पाहता येते व त्याची चर्चाही करता येते पण हे तत्वज्ञान प्रत्यक्षात राबवणे किती भयावह असू शकते याला जागतिक इतिहासच साक्षी आहे. भारतीय संघविरोधकांनीही कधी उपाध्यायांच्या राजकीय तत्वद्न्यानावर गांभिर्याने चर्चा केली नाही आणि त्याची कटू फळे आता चाखायला मिळत आहेत.
उपाध्याय राष्ट्राची व्याख्या करताना म्हणतात की ज्याही एका मानवी समुदायासमोर एक व्रत, एक विचार व एक आदर्श आहे आणि जो विशिष्ट भुमीला मात्रूभावाने पाहतो त्याला राष्ट्र म्हणवे. यात एकही अंगाचा अभाव असेल तर त्याला राष्ट्र म्हणता येणार नाही. जशी आत्म्यामुळे व्यक्ति "व्यक्ती" बनते अशा प्रकारचा हा राष्ट्रवादाचा सिद्धांत आहे. आत्मा, परमात्मा अशा अमूर्त संकल्पना तत्वज्ञानात वापरणे ठीक असले तरी मुळात या अमूर्त संकल्पनांचीही सर्वमान्य अशी व्याख्या नाही. तीही व्यक्तीपरत्वे बदलते. राष्ट्राचा आत्मा ही तर अव्याखेय संकल्पना आहे. असा कोणताही आत्मा संकल्पना पातळीवर कल्पना करता आला तरी मानवी समाज हे प्रत्यक्ष व्यावहारिक संबंधांवर टिकून असतात, आध्यात्मिक संबंधावर नव्हे हे लक्षात घेतले गेले पाहिजे. पण असा हा व्यक्तीस्वातंत्र्यालाच आणि प्रादेशिक राज्य या संकल्पनेला नाकारणारा उपाध्यायांचा राष्ट्रवाद आहे आणि तोच भाजपा राबवण्याचा प्रयत्न करत नाही असे कोण म्हणेल? साधू-साध्वींना मिळत चाललेले अपरंपार महत्व, गंगा आरत्या, राम मंदिराचे वाढवले गेलेले अपार माहात्म्य, जय श्रीराम ही बनू पाहणारी राष्ट्रीय घोषणा आणि आज राज्यांचे घटनात्मक अधिकार क्रमाक्रमाने कमी केले जात आहेत हे कशाचे निदर्शक आहे?
उपाध्यायांनी “एकात्मता” हा राष्ट्रवादाचा पाया आहे असे म्हटले आहे. त्यासाठी ते उपनिषदे व महाभारतही वेठीला धरतात. परम्परावादाच्या प्रभावात ते इतर राष्ट्रवादांची चर्चा करतांना त्यांना कोणता राष्ट्रवाद हवा आहे याचे संकेत देतात. नीतिशास्त्रांच्या जवळपास सर्वमान्य सिधांतांची थोडक्यात चर्चा करत प्रकृती व संस्कृती यावर त्यांनी भाबड्या वाटू शकतील अशा चर्चाही केलेल्या आहेत. ते म्हणतात, मनुष्याच्या प्रकृतीत बरे-वाईट सारे असते. त्यात वाईट टाळत आपण जे उत्कृष्ठ बनवायचा / बनायचा प्रयत्न करतो ती संस्कृती असते. "हेच नियम आमच्या धर्माचेही आहेत" असे उपाध्याय म्हणतात. महाभारतातील युधिष्ठिराने केलेली "धारणाद्धर्ममित्याहू". म्हणजे समाजाची धारणा ज्यामुळे होते तो धर्म, अशी ही म्हटले तर व्यापक म्हटले तर कसलीही व्याख्या नसलेली व्याख्या आहे. कारण समाजाच्या धारणा या कालसापेक्ष, परिस्थिती सापेक्ष व प्रांतसापेक्ष बदलत जातात.
शिवाय एकाच समाजातील असलेले असंख्य उपघटकाच्याही वेगळ्या स्वतंत्र अशा धारणा असतात. कोणाच्या धारणा चांगल्या आणि कोणाच्या वाईट हे ठरवायचे काही निश्चित असे मानदंडही नाहीत. चांगले आणि वाईट या संकल्पनाही कालौघात बदलत असतात. द्रौपदीने पाच पती केले किंवा नियोग, नरमेध, गोमेध या पुरातन समाजमान्य संकल्पना आज धर्ममान्य आहेत असे म्हणण्याचे धाडस कट्टर धर्मवादीही करणार नाही. मानव टोळीजीवनात होता तेव्हा इतर टोळ्यांवर हल्ले करणे, त्यांना लुटणे, स्त्री-पुरुषांना गुलाम करणे ही धारणा प्रबळ होती. तोच त्यांचा धर्म होता. अपंण आज या बाबी धर्म्य मानत नाही. म्हणजे कालसापेक्ष दृष्टीकोण बदललेला आहे. शिवाय वर्तमान युगात धारणा जरी म्हटले तरी समाजातील विविध गटांत वेगवेगळ्या धारणा असतातच. त्यात सत्ताधारी वर्गाच्या धारणा व धार्मिक गटांच्या धारणांत कधी संघर्ष तर कधी सहमती असल्याचे दिसते. म्हणजे सर्व समाजाची धारणा एकात्म, एकच एक कधीही असल्याचे आपल्याला आढळून येत नाही. पण तशी आणता येईल असा प्रयत्न करणे, त्यासाठी सत्ता राबवणे हे काही केल्या धर्म्य आहे असे म्हणता येणार नाही. पण धर्माच्या नावावर अधर्माचेच अवलंबन केले जात आहे हे अजून एक दुर्दैव.
बरे, ही एक सुरुवात आहे ती येथेच थांबेल असेही नाही. भाजपाने एखादा मुद्दा पुढे करायचा व तुकड्या-तुकड्यात भारतीय व्फिचार्वंत व राजकारण्यांनी ती चघळत बसायचे. विरोध-समर्थनाचे वादळ उठवायचे आणि तोवर दुसरा मुद्दा पुढे रेटायचा हे खास संघी सवय अर्थातच भाजपाने अंगी पुरती बाणवलेली आहे. घटना बचाओच्या मुद्द्यावर अलीकडची निवडणूक झाली ती तशी योग्यच होती असे म्हणणे भाग आहे. कारण त्यासाठीचे तात्विक मुद्दे उपाध्यायांनीच उपलब्ध करून दिले आहेत. त्यांना कोणत्या प्रकारची समाजव्यवस्था हवी आहे याचे दिग्दर्शनच त्यातुन होते.
ते म्हणतात की आम्ही समाजाच्या संस्थांत, विदेशात जसा मानला जातो, तसा स्थायी संघर्ष असतो हे मानत नाही. असे कोठे दिसत असेल तर तो विकृतीचा द्योतक आहे, प्रकृती अथवा संस्कृतीचा नाही. वर्ग-संघर्षाची कल्पना व राज्य आणि व्यक्तीतील संघर्षाची कल्पना हीच मुळात चुकीची आहे. पुढे ते म्हणतात कि आपल्याकडेही जाती बनल्या पण एक जातीने दुस-या जातीशी संघर्ष करण्याचा विचार केला नाही. वर्णांची संकल्पना ही विराट पुरुषाच्या चारी अंगांशी केली गेली. या चार अंगांत, म्हणजे डोके, हात, मांड्या व पाय, यात संघर्ष नसून एकात्मता आहे. परस्परपुरक असणे व एकात्म असणे हेच जीवन व्यवहाराचे मानदंड असून ते साधणे व परस्पर संघर्ष टाळण्याची वृत्ती जोपासणे महत्वाचे आहे असे उपाध्याय म्हणतात. किंबहुना एकात्म मानव या त्यंच्या संकल्पनेचे हे थोडक्यात सारांशकथन आहे. वैदिक धर्मन आणि संस्कृतीविषयी असणारे त्यांचे प्रेम हे संघाचेही असल्याने यावरही विचार व्हायला हवा.
पुढे जाऊन म्हणतात की वर्ण हे एकाच विराट पुरुषाची अंगे असल्याने अंगांतही संघर्ष कसा होईल? खरे तर वैदिक धार्मिक परंपराच पाहिली तर त्यांचे मत बालीउश बाहे असे दिसून येईल. विश्वामित्राला जन्मजात क्षत्रीयत्व सोडून ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याच्या अनेक कथा वैदिक धर्मसाहित्यात येतात. क्षत्रीय विरुद्ध ब्राह्मण यांच्यात श्रेष्ठ कोण यासाठी झालेल्या संघर्षात क्षत्रीयच कसे नष्ट करण्यात आले या कथा येतात. परशुरामाच्या दंतकथा त्यातुनच बनवण्यात आल्या. वैश्य-शूद्र तर वैदिक साहित्यातून हद्दपारच झाले. जर हे चार वर्ण एकच पुरुषची अंगे होत, जर त्यांच्यात संघर्ष असू शकत नाही तर वैदिक धर्मात हे सामाजिक संघर्ष कसे उद्भवले आणि त्यातून कोनती एकात्मता सिद्ध होते? शिवाय त्यांच्या विवेचनात ना हिंदू (अथवा बहुजन) आहेत, ना जैन, ना बौद्ध, ना आदिवासी संस्कृती ना द्रविड संस्कृती.
आणि याचेच प्रतिबिंब मोदी सरकारने नियुक्त केलेल्या गेल्या बारा हजार वर्षांचा भारताचा इतिहास लिहिण्यासाठी नेमलेल्या सोळा सदस्सीय समितीत पडलेले आहे. या समितीत सारेच्या सारे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण आहेत. या समितीत एकही महिला नाही. प्राकृत, पाली, द्रविड किंवा उत्तर-पूर्वेतील भाषांचा एकही विद्वान नाहे. जैन, बौद्ध, आदिवासी, लोकधर्म (म्हणजे हिंदू) याच्याही अभ्यासकाला स्थान नाही. आता ही फक्त “वैदिक” एकात्मता आहे दुस-यांना त्यात स्थानच नाही असे जर भाजप सरकार सिद्धच करत असेल तर ते उपाध्यायांच्या विवेचनाशी सुसंगत असले तरी राष्ट्रासाठी घातक नाही काय? हे राष्ट्रीय संघर्षाचे मुद्दे नाहीत काय?
मग संघर्षांचा प्राचीन काळापासून ते आजतागायत संघर्षाचा अभाव असलेल्या नेमक्या कोणत्या संस्कृतीबाबत बोलत आहेत हा प्रश्न स्वाभाविकपणेच पडेल.
दाक्षिणात्य नेहमीच उत्तरेच्या तथाकथित आर्य संस्कृती व आर्य भाषांच्या विरोधात असतात ते का हा प्रश्न त्यांना पडला नसेल तरी आपल्याला पडायला हवा. खरे तर समाज जिवंत राहतो तोच मुळात विचारसंघर्षाच्या पायावर. प्रत्यक्षत संघर्षाखेरीज समाज अथवा व्यक्ती जगू शकत नाही. आचार, विचार, जीवनशैली इत्यादि अनेक बाबींवर माणसा-माणसात कधी वैचारिक तर कधी हिंसक संघर्ष सुरुच असतो.
संघाने तर अनेक बाष्कळ संघर्षांना जन्म दिलेला आहे. काही संघर्ष कृत्रिमपणे निर्माण केले जातात हे खरे असले तरी संघर्षाशिवाय जीवन कसे असू शकेल? आणि समजा संघर्षहीण जीवन असते काय आणि ते तसे असण्यासाठी कोणती राजकीय व सामाजिक स्थिती हवी यावर चिंतन करता येईल. ते करावेही पण प्रत्यक्ष जीवनात संघर्षाचे पैलू बदलले तरी संघर्ष संपू शकत नाहीत.
मानवी संघर्षातूनच नवनवे आविष्कार झालेले आहेत, मग ते साहित्यातील असोत की विज्ञानातील. एकात्म किंवा समरसता या संकल्पनेत मुळात कोणताही संघर्ष बसतच नसल्याने त्यातून फक्त विचारहीन व मृतवत समाज पैदा होईल हे उघड आहे. किंबहुना समरस अथवा एकात्म या शब्दातून तेच ध्वनित होते. भारतीय घटनेने या व्यक्तीविकासाला खुंटवना-या संकुचित धर्मविचाराला कधीच मूठमाती दिलेली आहे. आणि समजा त्या विरोधात जायचेच तर त्यापेक्षा व्यापक आणि उदात्त मूल्यांचा आविष्कार करायला पाहिजे. भाजपाला घटना टाकून मनुस्मृतीला घटनेचे स्थान द्यायचे आहे असा जो आरोप होतो त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे ते यामुळेच.
मुळातच पुरातन काळापासून भारत हे एक राष्ट्र म्हणता यावे अशी स्थिती ब्रिटीश काळापर्यंत कधीही नव्हती हे कटू वास्तव आपण सर्वांनी पचवले पाहीजे. आजचे भारत राष्ट्र हे ब्रिटिश ईंडिया आहे. ते आमच्या राष्ट्रीय भावनांनी बनलेले नाही.
भारतीय राज्यघटनेमुळे ते संघर्ष असला तरी आजतागायत टिकलेले आहे. अन्यथा लदाख आणि उत्तरपूर्व राज्ये भारत राष्ट्र संकल्पनेत कधीच बसू शकली नसती. अशा स्थितीत अखंड भारतच्या किंवा हिंदू (पक्षी वैदिक) राष्ट्राच्या वल्गना भारताच्या आहे त्या अखंडात्मकतेला गंभीर धोका आहेत यात शंका नाही.
आताची एक देश एक निवडणूक ही संकल्पना भारतीय संघराज्याच्या घटनात्मक मागणीशी विसंगत असली तरी त्या विचाराची मुळेही उपाध्यायांच्या तत्वज्ञानात जातात. मुळात भारतीय घटनेबाबत उपाध्याय ( आणि म्हणून संघही) संतुष्ट नाहीत. त्यात एक तात्विक चूक आहे असे त्यांचे म्हणने आहे. ती म्हणजे आपले संविधान संघात्मक आहे. म्हणजे प्रत्त्येक राज्य हे केंद्राचे घटक/सहयोगी संघ आहेत ज्यांनी आपले अधिकार केंद्राला सोपवले आहेत.
हे भारताच्या मुळ चैतन्यदायी कल्पनेशी विसंगत आहे असे सांगून उपाध्याय म्हणतात कि भारतीय संविधान संघात्मक नको तर ते एकात्मक पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांचे काही कारण नाही कारण त्यामुळे प्रादेशिक अस्मिता निर्माण होतात. पंचायती अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनाच अधिक अधिकार देवून राष्ट्राचे कार्य चालवावे असे त्यंचे विवेचन आहे. तेच आपल्या धर्मानुसार होईल असेही ते म्हणतात.
आता राज्यांचे अस्तित्व ठेऊन केंद्राची आणि सर्व राज्यांची एकत्र निवडणुक घेता येणे सद्यस्थितीत अशक्य आहे हे उघड आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक परिमाणे वेगळी आहेत. कोणत्या राज्यात निवडून आलेली कोणती सत्ता किती काळ टिकेल याचे भाकीत कोणालाही करता येणार नाही. उदा. आताचे केंद्र सरकार घटकपक्षांनी पाठींबा काढून घेतला तर कधीही कोसळू शकते. मग निवडणूक न घेताही आहे हेच सरकार समजा आपला कार्यकाळ पूर्ण करेल, पण विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थिती असलेल्या एवढ्या राज्यांचे काय?
मुळात राज्यांचे स्वतंत्र आस्तित्व म्हणजे संघराज्यात्मक व्यवस्थाच रा. स्व. संघाला मान्य नाही याचे तात्विक विवेचन उपाध्यायांनी केलेले आहे. थोडक्यात संघराज्य व्यवस्था संपवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाउल आहे आणि याबाबतची चर्चा गेली १५-१६ वर्ष आधीच सुरु करून दिली गेलेली आहे.
उपाध्यायांना आणि संघाला सेक्युलर या शब्दाला गंभीर आक्षेप आहे. केंद्र सरकारचे वर्तन तसेच आहे हे आजवरच्या अनेक कायदे-उपकायदे अध्यादेश यावरून सिद्ध होते. कारण राज्य हे धर्मराज्यच असले पाहिजे असा उपाध्यायांचा आग्रह आहे. धर्मराज्यात राज्य मनमानी करु शकत नाही असे सांगत ते म्हणतात कि न्यायपालिका, संसद, संविधान यापेक्षा धर्म मोठा आहे. बहुमताने संविधानात संशोधन करणे हे धर्माविरुद्ध आहे. सर्वांनाच धर्मानुसार काम करावे लागेल. धर्मानुसार चालणारे अल्पमतही श्रेष्ठ आहे असा त्यांचा अभिप्राय आहे.
थोडक्यात किती मानवद्रोही तत्वज्ञान उपाध्याय मांडत होते हे यावरून लक्षात यावे. आणि दुर्दैव म्हणजे भाजपा या तत्वद्न्यानाला कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने पुढे नेत आहेत हे भारतीयांच्या लक्षात आले पाहिजे. हा एक प्रकारे लोकशाहीचाच गळा घोटून विषमतामूलक, नागरिकांना कसलेही स्वातंत्र नसलेली आणि म्हणून एकात्म विचारांची वैदिक धर्मसत्ता प्रस्थापित करण्याचा डाव आहे. तो प्रत्यक्षात आणलाही जातो आहे. आज योगी हे धर्मप्रमुखही आहेत आणि उत्तर प्रदेश राज्याची धर्माच्याच आधारे सत्ता गाजवत आहेत. उद्या ते देशाचे पंतप्रधान होणारच नाहीत असे नाही.
तशीही लोकसत्तेकडून धर्मसत्तेकडची वाटचाल सुरु झालेलीच आहे. ‘एक देश एक निवडणूक’ हे या अंधाराकडे नेणा-या मार्गाकडचे गेल्या सव्वादहा वर्षातील सहावे-सातवे पाउल आहे. ही सर्व पावले देशाला कोठे नेतील ह्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
-संजय सोनवणी
(साहित्य चपराकमध्ये प्रकाशित लेख)

अरबांचे पलायन!

बोलन खिंडीतून उतरलेल्या मोहम्मद कासीमची धाड अर्थातच सर्व प्रथम देबल बंदरावर पडली. कारण अरब कैदीही तेथीलच तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण त्य...