Thursday, February 27, 2025

विद्रोह मेला आहे!

 “पारंपारिक विचार, सिद्धांत आणि जगण्याच्या पद्धतीला आव्हान देत नवे विचार सकारात्मक परिवर्तनाच्या भावनेने जे मांडतात त्यांनाच विद्रोही म्हटले जाते. आपल्याकडील विद्रोही म्हणवणारे लोक मात्र विशिष्ट जाती धर्माला शिव्या देण्याला आणि निंदा करत राहण्याला विद्रोह मानतात. जे नवविचारांचे सैद्धांतिक सृजन करत समाज बदलवण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना विद्रोही मानणे अथवा अशा लोकांनी स्वत:ला विद्रोही समजणे हेच मुळात विद्रोहाचा अर्थ न समजल्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील विद्रोह कधीच मेला आहे.” ही पोस्ट मी फेसबुकवर पाच डिसेंबर २०२४ रोजी टाकली होती. त्यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली. काही लेखकांशी प्रत्यक्ष भेटीतही चर्चा झाली. अर्थात या चर्चेचे निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्याचा आणि मी लिहिलेल्या पोस्टच्या मुख्य हेतूशी त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही या विषयावर विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्यापक विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त झाल्याने येथे विद्रोही साहित्य सम्मेलनाचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.

 

गेला काही काळ जेथे अ. भा. मरठी साहित्य संमेलन असेल तेथे समोरच विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरवण्याची प्रथा पडलेली आहे. “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात ज्यांना प्रवेश मिळालेला नसतो अशीच मंडळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात जातात” अशीही टीका यात सहभागी होणाऱ्या लेखकांवर होत आलेली आहे. दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक  एवढ्या दूर जाणे कसे परवडेल या विवंचनेत गोंधळलेले दिसले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे या वेळचे आयोजक सरहदचे संजय नहार यांनी मात्र अत्यंत वेगळी भूमिका घेतली. दिल्लीतील साहुत्य संमेलनात मराठीतील सारे ‘आवाज’ प्रतिध्वनित व्हावे म्हणून त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवातच अथवा शेजारीच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. तसे लिखित पत्रही दिले, पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पदाधिकाऱ्यानी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. “आम्ही अ. भा. साहित्य संमेलनाविरुद्ध असल्याने तुमच्याच मांडवात आम्ही कसे येणार?” अशा स्वरूपाचा प्रश्नही विचारला गेला.

 

१९९९ साली बाबुराव बागुल या प्रख्यात साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरले होते. तेव्हापासून या संमेलनाची परंपरा जवळपास अव्याहत आहे असे म्हटले तरी चालेल. महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथे १८७८ साली झालेल्या पहिल्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष न्या. म. गो. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणाला उत्तर देतांना “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवांचे हित होईल याचे बीज नाही. हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोडया दादांचे संमेलन आहे.” असे म्हणून या संमेलनास जाण्याचे नाकारले. हे पत्र हेच विद्रोही साहित्य संमेलनाची प्रेरणा बनले असे चळवळीतील मंडळी मानते. अर्थात त्यांना म. फुले यांच्या वरील विधानाचा सखोल अर्थ कधी नीट कळाला आहे असे जाणवत नाही. अखिल मानवांचे हित हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे व त्यापासून नुसते विद्रोहीच नव्हे तर अ. भा. साहित्य संमेलनानेही तो डोक्यावर घेत आपली भूमिका व्यापक करण्याची आवश्यकता होती पण ते दुर्दैवाने अद्याप झालेले दिसून येत नाही. या अर्थाने पाहिले तर दोन्ही संमेलने घालमोडया दादांची आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नाही.

 

विद्रोह ही एक व्यापक संकल्पना आहे. गतकाळात जे झाले ते तसेच्या तसे पुढे चालवत राहतात वा तसा प्रयत्न करतात वा तेच चांगले होते असे मानतात ते प्रतिगामी असतात तर जे सतत स्वत:त आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक बदल घडवून आणतात त्यांना पुरोगामी म्हणतात. हे बदल कसे होत आहेत, त्यात अडथळे नेमके कोणते येत आहेत आणि कसा समाज घडवावा वाटतो याचे चित्रण करण्याचे काम व वर्तमान व भविष्यवेधी चिंतन-विश्लेषन करण्याचे काम विचारवंत करत असतात. त्यांना आपण पुरोगामी साहित्यिक व विचारवंत म्हणू शकतो. अखिल मानवजातीचे हित हाच सर्वांच्या चिंतनाचा, आचार-व्यवहाराचा पाया असला पाहिजे हे तर जागतिक मान्य वास्तव आहे. अर्थात त्यासाठी स्वत:त आमुलाग्र बदल घडवण्याची आणि अत्यंत संवेदनशिलतेने जगाकडे पाहण्याची आवश्यकता असते. मागील विचारवंत/साहित्य्यिक यांच्या आकलनात, सिद्धांतात, जीवनविचारांनाही आव्हान देत नव्या अभिनव कृती निर्माण करत अधिक व्यापक जीवन कवेत घेतात ते किंवा समाजविषयक पुढे नाणारे सिद्धांत व विचार जे मांडतात त्यांना विद्रोही लेखक-विचारवंत म्हणता येईल. हे अ. भा. साहित्य संमेलनालाही लागू पडते. परंतु वास्तव काय आहे? 

 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे की ही चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी साहित्य-संस्कृती आणि विचारधारेचा पुरस्कार करते. परंतु म. फुले यांचे ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्रापासून “प्रेरणा” घेत आजतागायत विद्रोही म्हणवणाऱ्या सहित्यिक-विचारवंतांची काय अवस्था आहे? त्यांचे विचार-साहित्य आणि त्यांचे वास्तवातील वर्तन यात किती साम्य आहे? अपवाद सोडले तर आपल्या हाती या निकषांवर चर्चा केल्यानंतर निराशाच हाती येईल. अखिल मानवांचे हित व्हावे असे तुमच्या ग्रंथांत काय आहे हा प्रश्न आजच्याही अखिल भारतीय संमेलनात सामील होणाऱ्या लेखक-कवींना विचारता येईल आणि त्याचे उत्तर आजही कोणाकडे आहे असे दिसत नाही.

 

समतावाद हा अत्त्यंत सुंदर शब्द आहे हे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा. पण हा समतावाद केवळ जातीवर आधारित आपला गोतावळा गोळा करत असेल तर त्यांना समतावादी कसे म्हणता येईल? की एखाद्या वर्गाला, जातीला किंवा धर्माला आपल्या वंचनेचे कारण मानत त्यावर सातत्याने अनाभ्यासी टीका करत वर्तमानात आणि भविष्यात समता अस्तित्वात आणण्यासाठी आणि भविष्यातील समाज कसा असावा यावर अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय अंगानेही विचार करत नवी मांडणी करता येत नसेल किंवा आजवर करता आली नसेल तर त्याला ‘विद्रोह’ हा शब्द कसा वापरता येईल. हे वंचित राहू इच्छिणाऱ्या वंचितांचेच संमेलन आहे असे का म्हणता येणार नाही?   

 

शाहू, फुले आंबेडकर हे विद्रोही व पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळीचे आराध्य आहे व त्यांच्याच विचारांचे अनुसरण करत ही मंडळी चालत असते. किंबहुना शाहू-फुले-आंबेडकरांचे हे पुरोगामी राज्य आहे असेही वारंवार, अगदी राजकीय पटलावरूनही उद्घोषित होत असते. महाराष्ट्रात सामाजिक चळवळी नव्या नाहीत. असे असूनही सामाजिक वास्तव मात्र वेगळे आहे आणि आज तर ते पार बदललेले आहे हे वास्तव स्वीकारायची आणि जबाबदारी घ्यायची यांची तयारी आहे काय? समाजातील अगदी जातीभेद मोडण्याचीही क्रांती यांना करता आली नाही. किंबहुना अगदी जातीअंताच्या चळवळी करणार्यांच्या सभांतील वक्त्यांची आधी जात सांगितली जाते. हे कसले जातीअंत करण्याचे लक्षण आहे? जाते सोडा, पोटजातीन्चेही निर्मुलन ही मंडळी करण्यात घोर अपयशी ठरली आहे. मुळात विद्रोहाचा आधारच जर जात-धर्म असेल तर दुसरे काय होणार? महात्मा फुलेंनी व नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजव्यवस्थेसाठी अर्थ-सिद्धांत बनवत वंचित समाजसापेक्ष मांडणी केली होती. शाहू महाराजांनीही शेतकी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष क्रांती केली. आर्थिक उन्नती हा मानवाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या उद्गारास कारण ठरतो हे सर्वच शा.फु.आ. उद्घोष करणारे विसरून गेले. खरे तर शाहू, फुले आणि आम्बेडकरांच्या पुढे या मंडळीने एकही पाउल टाकले नाही, उलट मागे मागेच सरकत जात आपले नैतिक स्वास्थ हरपून बसल्याचे दिसून येईल. असे असतांना सर्व समाज शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा (म्हणजे समतावादी, अर्थवादी आणि भविष्यवादी) बनेल आणि या तिघांचे नाव घेतले तर आपल्या मागे येईल असा खुळचट विचार जन्माला येउच कसा शकतो.

 

हे कधी झाले असते? जर या चळवळीतील सामाविष्ट घटकांनी या तिघांना सोयीचे तेवढे न स्वीकारता त्यांच्या विचारांत आधुनिक परिप्रेक्षात भर घालून म. फुले म्हणाले त्याप्रमाणे अखिल मानवहिताची भूमिका घेत नवी साहित्य संस्कृती आणि समाज संस्कृती घडवण्यासाठी आपले विचार व लेखण्या झिजवल्या असत्या तर! केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलन समाजातील एकाच विशिष्ट घटकाचे प्रतिनिधित्व करते, ते आपल्याला स्थान देत नाही म्हणून जर विद्रोही साहित्य संमेलन भरवले जात असेल तर मुळात हेतूच दांभिक असल्याने सामाजिक परिवर्तनात ते काही मोलाचा वाटा उचलू शकले असे आजवर तरी दिसले नाही. हे महात्मा फुलेंच्या अपेक्षेच्या विपरीत नाही काय? विद्रोही म्हणवणारे ग्रंथकार उदंड झाले...पखालींचे भारवाही झाले एवढेच काय ते म्हणता येईल.  

 

समाजात विद्रोहाची आवश्यकता असतेच. विद्रोह हा कोणत्या जाती-धर्म वा वंशाचा कोणत्यातरी अन्य जाती-धर्म किंवा वंशाविरुद्ध नसतो. विद्रोह आधी स्वत:विरुद्ध, आणि नंतर समाजातील जेही काही अनिष्ट आहे, कालसुसंगत वा प्रागतिक नाही त्याविरुद्ध असतो. विद्रोहाची संकल्पनाच जातीनिष्ठ करून टाकली गेल्याने काय अनर्थ झाला आहे हे कोणाच्या लक्षात येईल तो सुदिन.

 

आणि “प्रस्थापितांच्या, पुरुषवर्चस्ववादी, ब्राह्मणी, भांडवली. विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटीत कृती केली पाहिजे.” असे आमीन शेख (राज्य कार्यकारिणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) हे २०२३ च्या वर्धा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरील एका लेखात म्हणतात. त्यांच्या विवेचनातील प्रत्त्येक मुद्द्यावर स्वतंत्र तात्विक्ज प्रतिवाद करता येईल, पण पुरुषवर्चस्वतावाद किंवा भांडवली व विषमतावादी व्यवस्था जर ब्राह्मणी (म्हणजेच वैदिक) संस्कृतीची उपज असेल तर ती इतरांनी कशी स्वीकारली आणि आजही ती तशीच्या तशी का आहे, त्याविरुद्ध स्वसमाजात कोणत्या समतावादी नव्या विचारप्रेरणा रुजवल्या हाही प्रश्न विचारता येईल. किंबहुना जी स्थिती ओढवली आहे तिचे ऐतिहासिक समाजशास्त्रीय विवेचन तरी केले आहे काय हा प्रश्नही विचारता येईल. आणि भांडवली म्हणायचे तर मुळात जातीच व्यवसायांतून निर्माण झाल्या,  आपत्तीच्या काळात व्यवसाय सुरक्षित राहावेत, स्पर्धा होऊ नये म्हणून जाती बंदिस्त केल्या गेल्या. ही भांडवलशाही नव्हती काय? भांडवली व्यवस्थेविरुद्ध बोलायला साम्यवाद्यांना आवडते हे गृहीत धरले तरी साम्यवादाचे एकाधिकार भांडवली व्यवस्थेतच अंतत: रुपांतर होते हे साम्यवाद्यांच्या लक्षात येत नाही काय आणि अशी एकाधिकारशाही (म्हणजेच सरकारी) असलेली भांडवलशाही त्यांना स्वीकारार्ह आहे काय? साम्यवाद मानवी स्वातंत्र्याचे अपहरण करणारा सर्वात दुष्ट घटक आहे यावर त्यांनी कधी विचार केला आहे काय?

 

थोडक्यात विद्रोहीन्ना मुळात विद्रोहाची व्याख्या काय आहे हे समजावून घ्यावे लागेल. स्वत:च्या तत्वज्ञानाची सखोल मांडणी करावी लागेल आणि दिशा ठरवावी लागेल. अन्यथा त्याला केवळ विरोधासाठी विरोध असे रूप प्राप्त होईल आणि ते तसे होतही आहे.

 

अ.    भा. साहित्य संमेलन

 

वरील विवेचनाचा अर्थ असा मुळीच नाही कि अ. भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात सहभागी होणारे साहित्यिक मराठी समाजाच्या साहित्यिक जाणीवा वाढवण्यासाठी आणि वाचकांना विचार प्रगल्भ करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरले आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. गेली ९७ वर्षे सतत भरत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने वाचक व नवे साहित्यिक घडवणे, काळानुसार बदलणाऱ्या साहित्यिक प्रेरणांचे अवगाहन करत आधुनिक काळातील बदलत असलेल्या अभिव्यक्तीच्या साधनांनाही पारंपारिक साहित्य प्रवाहात सामाविष्ट करून घेणे अशी कामे तर कधीच हातात घेतली नाहीत. संमेलनाला केवळ उत्सवी व दिखाऊ रूप राहिले. तात्विक-साहित्यिक वाद-विवाद होत व्यापक विचारमंथन होण्याऐवजी हा परस्परांचे उणे-दुणे काढण्याचा सोहोळा बनला. आजवरची साहित्य संमेलने अपवाद वगळता साहित्यबाह्य कारणांमुळेच गाजलेली आहेत. समाजापुढे नव्या साहित्य संकल्पना मांडण्याऐवजी गतकाळाच्या नावाखाली स्व-गुणगान गात बसण्याची कुप्रथाच यामुळे सुरु झाली. सामाजिक प्रश्नांशी आपले काही देणे-घेणे आहे याचे भान तर कधीच आले नाही. आले तर ते केवळ ठरावांपुरते बासनात बांधून ठेवण्यासाठी.

 

 

मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद! या बाबतीत विद्रोही आणि अ.भा.म.सा.सं. हातात हात घालून चालतात असेच चित्र दिसून येईल. अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्याही विचारप्रभावात होऊ नये अशी अपेक्षा असली तरी तसे होत असते. कारण मुळातच साहित्यिक या जातीय वा प्रतिगामी विचारप्रभावांचे बळी असतात असेही साधारणपणे दिसून येईल. जातीयवाद लेखकांच्या विविध कंपुंत जसा आहे तसाच तो समीक्षकांमद्ध्येही आहे. किंबहुना कोणत्याही साहित्यिकाची साहित्य समीक्षा करतांना अथवा करायला लावतांना त्यामागे जातीय संदर्भ नाहीत असे क्वचितच घडते. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक केवळ जातीय पाठबळ नसल्याने अथवा कोणा कंपुंत सामील न झाल्याने हयातीतच साहित्यबहिष्कृत झाले आहेत हे आपण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. साहित्यिकच मुळात बव्हंशी जातीय प्रेरणांनी ग्रसित असल्याने त्याचे प्रतिबिंब जसे त्याच्या साहित्यात पडते तसेच या सर्व साहित्यिकांच्या साहित्य संमेलनांवरही पडणे स्वाभाविक आहे. अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनावर "हे संमेलन ब्राह्मणी आहे..." असा आरोप पुर्वीपासुन होत आला आहे. म्हणजे अध्यक्ष जरी कोणत्याही जातीचा असला (खरे तर ठरावीकच जातींचे) तरी एकुणातच संमेलनावर ज्या विषयांचा व चर्चकांचा प्रभाव राहत आला आहे हे पाहता या आरोपाला पुष्टीच मिळत आली आहे. अगदी पूर्वी होत असलेल्या संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतही उमेदवाराची "जात" हाही एक घटक छुपेपणाने कार्यरत असायचा हे गुपित राहिलेले नव्हते. आता केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणने किंवा नेमणे या आरोपातून कशी सुटका करायची हेही ठरवावे लागेल.

 

किंबहुना मराठी साहित्याची ब्राह्मणी, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी झालेली आहे. मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. ओबीसींतील काही मोठ्या जातीही साहित्य संमेलन घेत आल्या आहेत. फारशा चर्चेत राहिले नसले तरी आगरी समाजाचे साहित्य संमेलन गेली १५-१६ वर्ष भरत आले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलने होतात....यामागील सामाजिक व साहित्य प्रेरणा नेमक्या कोणत्या याचा अभ्यास कधी होईल?

बरे, हे काम करणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नाही हे महामंडळाचे म्हणणे मान्य केले तरी प्रश्न हा राहतोच की किमान अशा व्यापक समाज-साहित्यिक प्रश्नांवर विचारमंथन घडून येईल असे परिसंवाद तरी ठेवता येतील की नाही? आज जागतिकीकरणाने झपाट्याने जी सामाजिक  उलथापालथ होते आहे तिचे प्रतिबिंब साहित्य संमेलनात पडणार तरी आहे की नाही? किंबहुना साहित्यिक तरी त्यात पुढाकार घेत आहेत काय?

 

 

स्वसंतुष्टता ही साहित्यिकांची प्रवृत्ती का बनते आहे? खरे म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी लेखक अभावानेच तळपले आहेत. कारण यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता येईल, अशी मुळात यांच्यात तशी क्षमता आहे असेच दिसत नाही. त्यामुळे समाजमनावर आज या साहित्यिकांचा कसलाही व्यापक प्रभाव नाही.

 

साहित्य संमेलन म्हणजे आपल्या जीवन विषयकच्या धारणांचा जागर असतो. समग्र मानवी जगण्याचे चित्रण करत मनुष्याला त्याचा आरसा दाखवत भविष्याचे दिशादिग्दर्शन करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. हेतुशिवाय लिहिले गेलेले साहित्यही अप्रत्यक्षरित्या हेच हेतुबद्ध कार्य करत असते. त्यामुळे साहित्याचे प्रयोजन काय हा प्रश्न तसा निरर्थकच ठरतो. प्रत्येक लेखकाचे साहित्य हे त्या लेखकाचे समाजविषयकचे, स्वत:बद्दलचे आकलन याचा कलात्मक आविष्कार स्वरुपात असल्याने त्यातच त्याचे साहित्य विषयकचे प्रयोजन स्वयंसिद्ध असते. त्याचा दर्जा काय हे वाचक आणि समीक्षक ठरवतील, पण प्रत्येक साहित्यकृतीचे व साहित्त्यिकाचे लेखनकार्य सूप्त अथवा जागृत स्वरुपात काही ना काही प्रयोजन घेऊनच होत असते. असे असले तरी आज मराठी साहित्याचे प्रयोजन आजच्या सहित्यातून काय दिसते हे पाहिले तर एकुणच साहित्यिकांच्या आकलन-मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते हे मान्य करावेच लागेल.

 

थोडक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही दोषांपासून अलिप्त नाही. या संमेलनांतून काहीतरी भरीव निष्पन्न झाले आहे असा या संमेलनांचाही इतिहास नाही. मराठी साहित्य संस्कृती खुरडत चालली आहे याचे कारण नेमके यात आहे. म. फुले यांचे विधान अखिल भारतीय साहित्य साम्मेल्नानेही गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वांचे हित होईल असे आमच्या साहित्यात अद्यापही काहीच का येत नाही, तेही पुराणपंथीच का राहते आहे? भविष्यवेधी साहित्यिक उद्गार आमच्याकडे क्वचितच का उठतात? वर्तमान आमच्या साहित्यिकांच्या कवेत का येत नाही? आम,ही आजही काही विशिष्ट व्यक्तींचे साहित्यिक देव्हारे उभे करून ते म्हणजेच साहित्यिक आणि त्यांनी लिहिले तेच साहित्य असे स्वत:च्या सोयीचे मापदंड का उभे करत आहोत?  जी. ए. कुलकर्णी यांनी सांगीतलेल्या एका बोधकथेचा मतितार्थ असा होता...”आम्ही विशिष्ट झाडाची उंची हाच मापदंड बनवून त्यापेक्षा उंच झाडांचे शेंडे छाटून टाकण्यातच धन्यता मानतो.”

 

माझ्या मते अखिल भारतीय साहित्य संमेलनही असेच करत आहे. बदलाची गरज आहे. परिवर्तन हा सृष्टीचा मुख्य गुणधर्म असेल तर नक्कीच. विद्रोही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही नाव सृजनाचा प्रोत्साहक घटक बनणार नसेल तर ती राहिली काय किंवा न राहिली काय, वाचकांना काय फरक पडतो.

 

दिल्ली येथे होत असलेले साहित्य संमेलन अनेक बाबीत बदल घडवून आणू शकते. विद्रोही साहित्य संमेलनाला स्वत: खुले निमंत्रण देऊन संजय नहार यांनी चांगला पायंडा पाडला होता. या निमंत्रणाचा स्वीकार झाला असता तर साहित्य क्षेत्रात एक नवी वाट बनू शकली असती, पण तसे हा लेख लिहीपर्यंत तरी झालेले नाही. हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने याचे एक वेगळे महत्व आहे. किमान येथेतरी साहित्यिक स्वमग्नतेच्या भूमिकेतून बाहेर पडत वैश्विक जरी नाही होऊ शकले तरी किमान राष्ट्रीय दृष्टीचे होतील ही अपेक्षा!

 

-संजय सोनवणी 

 

 

 

 

Monday, February 24, 2025

ए-आय: बौद्धिक मक्तेदारीच्या दिशेने?


 


गेल्या काही दशकांत जगातील अधिकाधिक लोकांची बुद्धी घटते आहे, बुद्धीचे विषम वितरण गतिमान झालेले आहे असे दिसते. ज्याप्रमाणे संपत्ती मुठभर लोकांकडे केंद्रित होत आहे त्याच प्रमाणे बुद्धीचेही संकलन मर्यादित लोकांकडे होऊ लागलेले आहे आणि ही प्रक्रिया गतिमान झालेली आहे. ज्याप्रमाणे अधिकाधिक लोकांच्या संपत्तीला वित्तसंस्थांच्या मार्फत मोठीमोठी कर्जे घेऊन वा समभाग किंवा कर्जरोखे याचे वितरण करत एकाच कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेशनमध्ये भांडवल गोळा करत त्यावर आधारित उद्योगांवर जगातील आर्थिक गाडा चाललेला आहे त्याच प्रमाणे हीच कॉर्पोरेशन्स व सरकारेही विखुरलेल्या बुद्धिमत्तेचे एआयसारख्या साधनांमार्फत एकत्रीकरण करत त्याचा प्रभावी वापर करत जनतेवरच ज्ञान-स्वामित्व गाजवण्याचा उद्योग करत आहेत असे आज आपल्याला दिसून येईल. तुम्ही म्हणाल, भांडवलाचे एकत्रीकरण करता येईल, पण बुद्धिमत्तेचे भांडवलशाही किंवा मक्तेदारी कशी निर्माण होणार?

 खरे तर हे आपण अनेक उदाहरणातून पाहू शकतो. पण कृत्रिम बुद्धीमत्तेचेच एक उदाहरण घेऊयात. साधन  कोणतेही असो, त्याचा पाया असंख्य माणसांनी निर्माण केलेल्या माहिती आणि ज्ञानाने निर्माण झालेला आहे. त्यात सुसंगती आणत त्यातल्या त्यात मुद्देसूद पद्धतीने सादर करण्याचे तंत्रही असंख्य तंत्रज्ञांनी विकसित केलेले आहे व ते भविष्यातही अजून कोणते नवे तंत्रज्ञान येईपर्यंत करत राहणार आहेत. पण हे तंत्रज्ञ समग्र प्रकल्पातील एखाद्या तुकड्यावर कार्य करत असतात. समग्र चित्र पुन्हा मोजक्या लोकांच्या हातात असते. तेच हे तुकड्या तुकड्याने असंख्य तंत्रज्ञाकडून विकसित केले गेलेले घटक एकत्र जुळवत अंतिम उत्पादन तयार करत असतात. पुन्हा हेच तंत्रज्ञान सामान्य लोकांसमोर ठेवत असतात. कारखान्यातील उत्पादन पद्धती ते अंतिम उत्पादनासाठी आवश्यक मशीन लर्निंगसारखी साधने ही उत्पादन केंद्रित असल्याने त्यांचा सामान्य लोकांना थेट उपयोग होत नसला तरी या बुद्धीमत्तेचा उत्पादनकेंद्रीत उपयोग असला तरी केंत्याचा उपयोग उद्योगांना होऊन एकुणातील उत्पादन क्षमता व दर्जा वाढवण्याचा उपयोग उद्योगांना होतो तसाच तो सामान्य माणसांनाही अप्रत्यक्षरित्या होणार असतो. ही कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करणारे मानवच असतात. पण तेही त्या सर्व उत्पादन प्रक्रियेतील तज्ञ नसल्याने व त्याची आवश्यकता नसल्याने अनेकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धी त्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या निर्मितीसाठी खर्च होत असते.  म्हणजेच एक साधन निर्माण करण्यासाठी अनेकांची बुद्धी एकत्र आलेली असते. पण प्रत्येकाने वापरलेली बुद्धी ही एका विशिष्ठ पद्धतीच्या साच्यात वापरावी लागत असल्याने त्यात सहभागी तज्ञही साचेबद्ध होत जातात. पण बुद्धीच्या एकत्रीक्ररणाची साचेबद्ध प्रक्रिया सुरूच राहते. साधनाचे उद्देश्य बदलले की प्रक्रिया बदलायची आवश्यकता निर्माण होते. ती प्रक्रिया ठरवणारे घटक मर्यादित असतात. पण त्या साधनाच्या असंख्य घटकांवर काम करणार्यांची संख्या मात्र सहसा कमी होत नाही. सोपे कोडींग लिहिणाऱ्या प्रणाल्या आज अस्तित्वात असल्या तरी साधन (टूल्स) चे उद्देश्य ठरवत त्याचा आराखडा करत त्यांचे शिस्तबद्ध विकास करण्यासाठी वितरण करत अंतिम परिणाम जसा कल्पिला होता तसाच निर्माण होण्यासाठी आपोआप कोडींग करणारे साधन आज तरी मानवी प्रतिभेच्या कक्षात आलेले नाही. त्यामुळे सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता मानवालंबी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत मानवी बुद्धीचे केंद्रीकरण होते आहे. आणि ही साधने वापरणारे घटक पुन्हा मर्यादित आहेत. आर्थिक भांडवलाप्रमाणे बुद्धीचे एकत्रीकरण करणे आणि तिचा समग्र कार्यासाठी वापर करण्याच्या दिशेने सुरु असलेली ही वाटचाल आहे. यातून ज्ञानाचीही मक्तेदारी निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण हे “उपयुक्त” ज्ञान आहे. हे उपयुक्त ज्ञान असणारे मर्यादित परिप्रेक्षात जीवनमान उंचावू शकतात. पण ते आपले ज्ञानात्मक भांडवल विकून. या ज्ञानाची उपयुक्तता संपली की भविष्यात मुळात व्यक्तीला ज्ञानाची आवश्यकताच राहणार नाही कारण ते ज्ञान आपसूक पुरवणारे साधन हाताशी उपलब्ध असेल.

मुळात कृत्रिम बुद्द्धीमत्तेचा उद्देशच माणसांना विचारक्षम करणे हा आहे काय की कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर एकुणातील ज्ञानाला व त्याच्या विकासाला सीमित करण्याचा हेतू त्यामागे आहे? कृत्रिम बुद्धीमत्ता एक प्रकारे ज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने तर निर्माण करण्याचा प्रयत्न होत नाहीय ना यावरही गंभीर विचार करण्याची गरज आहे. भांडवलाचे एकत्रीकरण आणि ज्ञानाचे एकत्रीकरण यात तसा फरक नाही. पण ज्ञानपरंपरेचे बहुमुखी विकसन यामुळे थांबण्याचा जो धोका आहे त्यावर मात्र विचार केला गेला पाहिजे. स्वत: कसलेही विशेष  कष्ट न घेता बसल्या जागी एका क्षणात कोणालाही “ज्ञानवंत” बनवू शकणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने एकुणातील मानवाने आजवर केलेल्या ज्ञानाच्या प्रगतीतील मोठा अडसर बनू लागली असतील तर ती माणसाच्या मुलभूत आळशी प्रवृतीमुळे असे म्हटले तरी फारसे आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही.

आपले जीवन सोपे व्हावे यासाठीच आदिम काळापासून माणसाने अनेक शोध लावले. दैनंदिन कष्टाच्या कामापासून मुक्ती मिळून जास्त व्यापक कार्ये करता यावीत यासाठी त्याने शोध लावले. सुखसुविधा निर्माण केल्या. त्यात भांडवलशाहीची बीजे असली तरी त्याचे प्रमाण सर्वभक्षी नव्हते. पण वर्तमानात मक्तेदारीयुक्त भांडवलशाही आल्यामुळे आणि तिचा हेतू मानवी बुद्धीचा विकास हे नसल्याने बुद्धीही एक उत्पादन (कमोडीटी) मानत तिलाही मक्तेदारीमध्ये बदलवले जाणार असेल तर मात्र मानवजातीने चिंता करावी अशी स्थिती आहे.

मी नुकताच एका  कॉलेजच्या रिसर्च पेपर्सच्या प्रेझेन्टेशन कार्यक्रमाला हजेरी लावली. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आपले रिसर्च पेपर्स व प्रेझेन्टेशंस चॅट-जीपीटीतून  उचललेले होते. त्यात जे आहे ते सर्वच बरोबर आहे असा त्यांचा ठाम विश्वास असावा कारण त्याने पुरवलेल्या रचेनेतील ढोबळ चुकाही त्यांनी दुरुस्त करण्याचे बौद्धिक कष्ट घेतलेले नव्हते. हे सार्वत्रिक असावे असे दिसते. मी गेल्या लेखात म्हटले होते की कृत्रिम बुद्धीमत्ता हे सांगकाम्या मदतनिसासारखे आहे. त्याला स्वत:चे डोके नाही. विश्लेषन क्षमता नाही. त्यात अगणित लोकांनी दिलेल्या माहितीला स्वत:चे डोके न वापरता त्यातल्या त्यात दिलेल्या पद्धतीने मांडण्याचे कौशल्य असले तरी ते शेवटी कृत्रिम साधन आहे. प्रत्येकाने आपापली बुद्धी वापरत त्याचा कितपत उपयोग करून घ्यायचा हे ठरवले पाहिजे. पण तसे होत नाही. हा वेग वाढला तर बौध्दिक मक्तेदारी निर्माण होईल व तशी ती होतही आहे. ही मक्तेदारी समग्र मानव जातीची बौद्धिक अधोगती करत नेत आहे. यातून बौद्धिक साम्राज्यवाद निर्माण होण्याचा धोका आहे आणि तो राजकीय, आर्थिक साम्राज्यवादापेक्षा अधिक विनाशक असणार आहे. स्वबुद्धीविकासासाठी मदतनिस म्हणून ही साधने वापरणे वेगळे आणि बुद्धीच्या बाबतीत परावलंबी होणे वेगळे.

-संजय सोनवणी 

Thursday, February 6, 2025

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

  



 

चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए.आय. बनवणार असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. यंदाच्याच अर्थसंकल्पात भारत सरकारने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अभ्यासासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे हाहा:कार उडेल, मानवाचे स्थान धोक्यात येईल अशी भीतीदायक भाकिते वर्तवली जात असतानाच दुसरीकडे अवाढव्य कॉर्पोरेट्स ते सरकारे कृत्रिम बुद्धीमत्तेतील आपली गुंतवणूक वाढवत नेत आहेत असे चित्र आपल्याला दिसते. भविष्यात हा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत नसली तरी एकुणातच कृत्रिम बुद्धिमत्तेचे केले गेलेले चित्रण आणि वास्तवातील ए.आय. यात अजूनही खूप मोठी दरी असल्याने एकुणातच या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात याच गतीने होत राहील की ती घटत जाईल याबाबत जागतिक अर्थतज्ञ साशंक आहेत. असे का व्हावे यामागे काही कारणे आहेत.

चॅटजीपीटी आणि डीपसीकमध्ये नेमके काय अंतर आहे हेही या निमित्ताने लक्षात येवू लागले आहे. उदा. चीनचे हितसंबंध ज्यात गुंतलेले आहेत अशा प्रश्नांबाबतची उत्तरे डीपसीक चीनधार्जिण्या पद्धतीने देते. तसे चॅट जीपीटीबाबत अमेरिकाधार्जिणी उत्तरे मिळतात असा उघड आरोप अद्याप कोणी केला नसला तरी तसे नसेलच असे खात्रीलायकरीत्या विधान करता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारच्या आणि ‘निवडक’ माहितीचा साठा कृत्रिम बुद्धिमत्तेला पुरवला जातो त्यावर आधारित अशीच उत्तरे ही टूल्स पुरवत असतात. स्वत:चे काही वापरण्याची सोय सध्याच्या तरी तंत्रज्ञानात नाही. प्रचंड माहितीचे दिलेल्या गणिती पद्धतीने वेगात विश्लेषण करून निर्णय घेण्यास उपयुक्त माहिती समोर ठेवणे अथवा वारंवारिता असलेल्या कृती करणे या कामात कृत्रिम बुद्धीमत्ता/रोबोटिक्स बऱ्यापैकी यशस्वी होते आहे. पण कृत्रिम बुद्धीमत्ता समग्र नाही तर प्रत्येक क्षेत्रात त्या कामाची उद्दिष्टे निश्चित करून तुकड्या-तुकड्यात तयार केली जाणारी प्रणाली आहे.

मानवी मेंदूत मज्जातंतूंचे जाळे (न्यूरल नेटवर्क) असते जे वेगाने बहुस्तरीय विश्लेषण करून निर्णय घेते त्याप्रमाणेच संगणकीय पद्धतीने ते व्हावे म्हणून “न्यूरल नेटवर्क” ही संज्ञा जशीच्या तशी राबवण्याची कल्पना यामागे आहे. पण यात माहितीचा जोही संच पूरवावा लागतो तो माणसांना. त्यात चुका होऊ शकतात आणि त्याच चुका मग प्रणाली करत राहणार. त्यात वारंवार सुधारणा कराव्या लागतात, आदेश बदलत रहावे लागतात. पण हे स्वत:च विकसित करण्यासाठी जी “प्रज्ञा” आवश्यक असते ती संगणकीय प्रणालीत नसते. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता मानवावलंबित होऊन जाते.

एकाच प्रकारचे काम सातत्याने करावे लागत असेल, जेथे वेगवेगळ्या स्थिती निर्माण होऊन कार्यपद्धतीत बदल करावा लागत नसेल अशा सांगकाम्या म्हणता येतील अशा कार्यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा मर्यादित हेतूने बनवलेले यंत्रमानव उपयुक्त ठरतात हे खरे. माणसाला पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धीमत्ता कधी उभी राहील काय या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी विज्ञान कादंबऱ्या-कथा ते चित्रपटांत शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. सैद्धांतिक पातळीवरही यावर खूप काम झाले आहे आणि होत राहणार आहे. भविष्यात यात कधीकाळी यश मिळेल की नाही यासाठी आपण काही मुद्द्यांवर चर्चा करूयात.

मनुष्य हा जीवप्रणालीतील सजीव हिस्सा आहे. पृथ्वी सोडता अजून विश्वात मानव आहे की नाही याबाबत साशंकता असली तरी तो शोधही अविरत सुरु आहे. मनुष्याचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. त्याला संवेदना आहेत. त्याच्यात अंतर्स्फुर्ती आहे. तो स्वत:च आपले उद्दिष्ट ठरवू शकतो किंवा भवतालातून ते निवडू शकतो. तो स्वप्ने पाहतो. तो बिकट स्थितीतही वरकरणी अतार्किक वाटले तरी तसे निर्णय घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. तो स्वत:लाच स्वत: विकसित किंवा अध:पतित करत नेवू शकतो. प्रत्येकाच्या स्वभाव प्रेरणा वेगळ्या असून प्रत्येकाची शिकण्याची पद्धत एकजिनसी नसून बहुजिनसी आहे. तो इतिहासाचे, पुरातत्वीय पुराव्यांचे वेगवेगळे आकलन आणि विश्लेषण करू शकतो. त्यामुळेच प्राचीन संस्कृतींचे प्रत्येक इतिहासकाराचे आकलन आणि विश्लेषण भिन्न आहे. एकाच प्रकारच्या दृश्यातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. उदा. एखादे नवे स्थान पाहिले तर कोणाला चित्र काढावेसे वाटेल, कोणाला कविता ‘सुचेल’, कोणाच्या मनात तात्विक विचार येतील तर कोणाच्या मनात उदासीनता जन्माला येईल किंवा कोणाला गावे असेही वाटू शकेल. . प्रतिक्रिया एवढ्याच मर्यादित राहत नाहीत तर त्या अगणित प्रकारच्या संभावनांनी व्यापलेल्या असतात. माणूस इतिहास, वर्तमान आणि नजीकचे किंवा दूरचे भविष्य या बाबतीत शिकलेल्या, शिकवलेल्या, वाचलेल्या अथवा ऐकलेल्या विवेचनाला जसेच्या तसे स्वीकारत नाही तर त्याला स्वत:चे काहीतरी जोडत असतो. अगदी ईश्वर ही संकल्पना घेतली व ती बव्हंशी जगमान्य असली तरी प्रत्येकाच्या ईश्वरविषयक संकल्पना समान असल्याचे आढळून येणार नाही. मुळात मनुष्य हे जैविक उत्पादन असल्याने व मानवी मेंदूत दहा अब्जांपेक्षा अधिक न्यूरॉन्स आहेत. मुळात मानवी मेंदू कसे कार्य करतो हे अद्याप कोडेच राहिलेले आहे. अगदी भाषेच्या संदर्भातही मेंदूतील नेमके कोणते केंद्रक काम करते आणि कसे करते हेच माणसाला अद्याप उलगडले नसल्याने भाषेच्या जन्माचा आणि भाषा शिकण्याच्या कौशल्याची कार्यप्रणाली नेमकी कशी घडते हे अद्याप आपल्याला निश्चयाने माहित नाही.

या अल्प पार्श्वभूमीवर सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता बाल्यावस्थेतही नाही असे म्हणावे लागेल. स्वयंप्रेरणेने विचार करू शकणारे, संवेदना, अंतर्स्फुर्ती असू शकेल असे ए.आय. निर्माण होऊ शकेल काय? नवीन विचार, स्वप्ने पाहणे जमू शकेल काय? तो स्वत:च विशिष्ट उद्देश्य निर्माण करून स्वत:लाच त्या दिशेने विकसित करणारे कोडींग करू शकतो काय? कारण विकासासाठी दृष्टी लागते, दिशा लागते. या जैव प्रेरणा आहेत. त्या यांत्रिक अथवा कृत्रिम नसतात. तिला (सांगितले नसेल तर) विविध पर्यायांतून एकाची तारतम्याने विचार करून निवड करता येणेही शक्य नाही.

आजतरी ए.आय. माणसाचा सांगकाम्या चाकर आहे व ए.आय.चे प्रत्येक साधन (टूल) विशिष्ट हेतूंनी विकसित केलेले आहे. मुळात माहिती कशी पुरवली गेलेली आहे त्याप्रमाणेच ते वर्तन करेल. त्याला ‘स्व-आकलन-संवेदना’ हा गुणधर्म नसल्याने आकलन-निर्णय व त्याचे परिणाम याबाबत ए.आय. उदासीन असते. त्यात सध्याचे ए.आय. तुकड्या-तुकड्यात आणि मर्यादित हेतुकेंद्रीत आहे. त्याच्यात केली जाणारी अवाढव्य गुंतवणूक आणि परतावा यातील गुणोत्तराचा आज एक प्रश्न बनलेला आहे. अशा स्थितीत पुढची वाटचाल कशी होईल? माणसालाच रिप्लेस करणारी समग्र कृत्रिम बुद्धीमत्ता कधी अस्तित्वात येईल काय यावर आपण पुढील लेखात विचार करू.

-संजय सोनवणी  

माणूस जिवंत करण्यासाठी!

  आमचे डोळे फुटलेले आहेत कानात लाव्हा भरला आहे कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत पिशाच्...