Thursday, May 29, 2025

कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत उतरण्याचे धोके...

 




मागील लेखात आपण भविष्यात सर्व शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात गेली आणि त्यांनी शेतीचे पूर्ण नियंत्रण घेतले, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील यावर संक्षिप्त चर्चा केली होती. भारतात व जगात उद्योग-सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत घुसणार नाही आणि सर्व शेतीचे नियंत्रण आपल्या हाती घेणार नाही हा आशावाद जागतीकीकारणाचा वेग वाढतच असलेल्या काळात टिकण्यासारखा नाही. आता राजकीय सत्तासुद्धा भांडवलदारांच्या कब्जात गेलेलं आपण पाहतो आहोत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगभर सध्या टयारिफच्या माध्यमांतून आयात-निर्यात धोरणांत बदल घडवून आणत काय धुमाकूळ घालत जागतीक अर्थव्यवस्थेची दिशाच बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे हे आपण पाहातोच. या आयात-निर्यातीत शेतमालाचाही समावेश असल्याने जगाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे याचा अंदाज येतो. सध्याचे जग मुठभर भांडवलदारांचे असून एकूण ८०% संपत्तीचा वाटा केवळ २०% भांडवलदारांकडे असून हळूहळू केवळ पाच टक्के लोकांच्या हातात ९०% संपत्तीची मालकी जाणे सहज शक्य आहे. उरलेले ९५% लोक हे मध्यमवर्गीय, गरीब ते अतिगरीब या गटात जाणार हेही तेवढेच निश्चित आहे.

अशा स्थितीत शेतीची मालकीही त्यांच्याच ताब्यात जाणे अपरिहार्य आहे. पण त्यासाठी प्रत्येक देशाला शेतीविषयक कायद्यांत व्यापक बदल घडवून आणावे लागतील. जनमताचा विरोध या नव्या व्यवस्थेत कितपत टिकेल याची शंकाच आहे कारण जनमत बदलवण्याची साधनेही या भांडवलदारांच्याच हातात आहेत. न परवडणारी शेती करत बसण्याऐवजी ती भांडवलदारांना विकून टाकावी, येणा-या पैशांची पुन्हा त्यांच्याकडेच गुंतवणूक करत भरघोस उत्पन्न मिळवण्याची आणि पुन्हा शेतीतच किंवा त्याआधारीत प्रक्रिया उद्योगातच आणि पुरवठा साखळीत कायम स्वरूपी नोकऱ्या मिळवून कसे सुखी समाधानी जगता येईल याची स्वप्ने दाखवत जनमत बदलवण्याची आणि भाडोत्री विचारवंतांमार्फत त्याला नैतिक बळ देण्याची हमखास यशस्वी होणारी युक्ती ते सहज वापरू शकतील आणि तेच सरकारवर कायदे बदलण्यासाठी दबाव आणू शकतील.

याशिवायही अनेक नव्या युक्त्या शोधल्या जातील.भारतात कमाल जमीन धारणा कायदा आणि जीवनावश्यक वस्तू कायदा हे कायदे कोणा एका व्यक्तीकडे ठराविक प्रमाणाच्या बाहेर अतिरिक्त जमीन जाऊ नये आणि शेतमालाच्या अतिरिक्त साठवणुकीमुळे खाद्यान्नाचा तुटवडा पडू नये या उद्देशाने तयार केले गेले. जेव्हा हे कायदे बनले तेव्हा जमीनदार, रजवाडे, यांच्याकडे प्रमाणाबाहेर शेतजमिनी होत्या व त्या कुळांकडून कसून घेतल्या जायच्या. यात कुळांचे भयानक शोषण होत होते. त्यामुळे कुळकायदा तर आणला गेलाच पण एका शेतमालकाकडे अधिकाधिक किती जिरायती आणि बागायती क्षेत्र असावे यावर राज्यनिहाय मर्यादा घातल्या गेल्या.

कारखाने कितीही जमीन घेऊ शकत असले तरी ते त्या जमिनीचा वापर बिगरशेती कारणासाठीच करतील हेही बंधन घातले गेले. त्यामुळे फक्त शेती करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र जमिनी घेऊ शकत नाही पण ते करार शेती करू शकतात. यात शेतीची मालकी बदलत नाही. अनेक शेतकरी कॉर्पोरेट्ससोबत करारशेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) करू शकतात. यामुळे त्यांना स्थिर उत्पन्न मिळू शकते, पण कॉर्पोरेट्सच्या अटींमुळे त्यांचे स्वातंत्र्य कमी होऊन नफ्याचे आहे तेही प्रमाण टिकत नाही त्यामुळे ही पद्धत फारच मर्यादित प्रमाणात वापरली जाते.

पण कॉर्पोरेट शेतीला अनुमती मिळाली तर कॉर्पोरेट्स बियाणे, खते आणि बाजारपेठ नियंत्रित करतील, ज्यामुळे उरल्यासुरल्या शेतकऱ्यांची स्वायत्तता कमी होईल. शिवाय खालील धोके आहेतच.

१. अन्नसुरक्षा आणि किंमती: कॉर्पोरेट क्षेत्र प्रामुख्याने नफ्यावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना अन्न मिळवणे कठीण होऊ शकते. कॉर्पोरेट्स काही विशिष्ट, उच्च नफा देणाऱ्या पिकांवर (जसे बायोटेक पिके) लक्ष केंद्रित करू शकतात, ज्यामुळे पारंपरिक पिकांची विविधता कमी होऊ शकते. याचा परिणाम अन्नसुरक्षेवर आणि पर्यावरणावर होईल.

२. पर्यावरणीय परिणाम: कॉर्पोरेट शेतीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, कीटकनाशके आणि फक्त विशिष्ट आणि जनुकीय बदल घडवलेल्या मर्यादित पिकांचा वापर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होईल आणि जैवविविधता नष्ट होईल. आधुनिक पद्धती वापरल्याने आज होतो तसा पाण्याचा अतिवापर होणार नाही पण प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.

३. ग्रामीण अर्थव्यवस्था: भारतासारख्या देशात, जिथे ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे ते अक्षरश: बेरोजगार होतील कारण कॉर्पोरेटस शेतीत मोठ्या प्रमाणात एआय आणि रोबोटिक्स वापरतील. शेतकऱ्यांना जमिनीचे मोबदले मोठ्या प्रमाणात मिळतील खरे, पण त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत त्यांचे अज्ञान असल्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी होऊ शकते, ज्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी आणि स्थलांतर वाढेल. याशिवाय स्थानिक बाजारपेठांवर कॉर्पोरेट्सचे नियंत्रण वाढल्याने छोटे व्यापारी आणि मध्यस्थांचे नुकसान कारण नवीन सक्षम पुरवठासाखळी निर्माण करण्याचे सामर्थ्य या कॉर्पोरेटसमध्ये असेल.

४. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम: शेती हा भारतातील अनेक समुदायांचा सांस्कृतिक आणि सामाजिक आधार आहे. कॉर्पोरेटीकरणामुळे पारंपरिक शेती पद्धती, अन्नवैविध्य आणि स्थानिक ज्ञान नष्ट होऊ शकते. सामाजिक असमानता वाढेल, कारण कॉर्पोरेट्सना फायदा होईल, तर शेतकरी वर्ग रसातळाला जाईल.

५. मूलभूत शेतकऱ्यांचे काय होईल?: कॉर्पोरेट शेतीत यांत्रिकीकरण आणि ऑटोमेशनचा वापर वाढेल, ज्यामुळे शेतीतील मजुरांची गरज कमी होईल. यामुळे छोटे शेतकरी आणि शेतमजूर बेरोजगार होतील. ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढेल, ज्यामुळे शहरी झोपडपट्ट्या आणि सामाजिक समस्या वाढतील. जे शेतजमिनी विकणार नाहीत अशा शेतकर्यांना बियाणे, खते आणि इतर संसाधनांसाठी शेतकरी कॉर्पोरेट्सवर अवलंबून राहतील, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढेल. शिवाय कॉर्पोरेट्स अशा स्वतंत्र शेतकऱ्यांना कमी किंमतीत पिके विकण्यास भाग पाडू शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होईल.

खरे तर कॉर्पोरेट शेती आली तर शेतमालाचे उत्पादन वाढेल, पिके अधिक शास्त्रशुद्ध होतील, ग्राहकांना अधिक दर्जेदार खाद्यान्न उपलब्ध होईल व शेतीला एक शास्त्रीय शिस्त लागेल हे खरे असले तरी खाद्यवैविध्य लोप तर पावेलच पण जैववैविध्य धोक्यात येईल. प्रक्रिया केलेले खाद्यांन्न ग्राहकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जाईल व त्याचे सवय लावावी लागेल. ग्रामीण बेरोजगारीत प्रचंड वाढ झाल्याने या वर्गाला कोणत्या क्षेत्रात सामावून घ्यावे हा गंभीर प्रश्न सरकार व समाजासमोर उभा राहील. सामाजिक असंतोष वाढेल हे वेगळेच. पण हे भविष्य आहे हेही तेवढेच खरे. शेतकरीच एकत्र येऊन शेती-कॉर्पोरेट स्थापन करतील तर या संभाव्य धोक्यांपासून सुटका करून घेता येणे मात्र शक्य आहे.

-संजय सोनवणी 


Thursday, April 3, 2025

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!


 


२०५० पर्यंतवाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते विचारमंथन नाही तर प्रत्यक्ष प्रयोगही केले जात आहे. अमेरिका आज जगातील एक पुढारलेला देश मानला जातो. तेथील शेतीच्या समस्याही उग्र झालेल्या आहेत. अमेरिकन शेतकऱ्यांनी अन्न उत्पादनाची प्रभावी पातळी गाठावी यासाठी आणि आजच्या समस्या कायमच्या सोडवण्यासाठी त्यांने पावले उचलायला आधीच सुरुवात केली आहे. आधीच तेथे शेतीवर आणि त्यावलंबित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या केवळ १०.४% एवढी आहे. त्यामुळे शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व भविष्यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी सन २०५० पर्यंतची उद्दिष्टे ठरवण्यात येत आहेत. नवीन तंत्रज्ञानासह बहुआयामी पद्धतीने शेती व्यवसाय  चालवण्यासाठी अभिनव मार्ग शोधले जात आहेत. अन्न आणि शेतीच्या आलेखाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांकडून अनेक भाकीते वर्तवण्यात आली असून पुढील २५ वर्षांत शेतीवरील जीवन कसे दिसेल यावर त्यांनी मते नोंदवली आहेत.

 अन्नाची मागणी वाढते आहे!

अन्नाच्या मागणीमागे दोन मोठे घटक असतात. त्यात एकूण लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न. यात अमेरिकेत वाढच होतांना दिसते. तज्ञांच्या मते २०१६ मध्ये ७.४ अब्ज असलेली जगाची लोकसंख्या २०५० मध्ये ९.१ अब्जपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसारमोठ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक स्तरावर शेतकऱ्यांना २०१७ च्या पातळीच्या तुलनेत ७० टक्के अन्न उत्पादन वाढवावे लागेल. जागतिक उत्पन्न पातळीतही विकसनशील देशांमध्ये वाढ होत असून तेथील अन्नाची एकूण  मागणीही वाढत जाईल. या देशांना अधिक प्रथिनयुक्त आहार कसा पुरवता येईल हेसुद्धा आव्हान असेल. .

 आरोग्याबाबत अधिक जागरूक लोकसंख्या असलेल्या अत्यंत विकसित देशांमध्ये एक वेगळा ट्रेंड उदयास येत आहे. मक्यासारख्या स्टार्च-आधारित पिकांवर लक्ष केंद्रित केल्याने सोयाबीन आणि इतर शेंगदाण्यांसारख्या वनस्पती-आधारित पिकांकडे दुर्लक्ष होते आहे पण ते चित्र बदलावे लागेल असे असे सिन्जेंटा व्हेंचर्स येथील कॉर्पोरेट व्हेंचर कॅपिटलचे प्रमुख डेरेक नॉर्मन म्हणतात. ते किमान साधन-स्त्रोतांमध्ये अधिक पिके उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इतर कंपन्यांना मदत करतात.

 शेती एकत्रीकरणाला गती

२०१२ च्या कृषी जनगणनेने शेतकऱ्यांच्या साधारण वयोमानात मोठा बदल उघड केला आहे ज्याचा भविष्यावर मोठा परिणाम होइल असे तज्ञ म्हणतात. पहिल्यांदाच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांची संख्या ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरूण शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. हा फरक लक्षणीय आहे४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रत्येक शेतकऱ्यांमागे २.१ वयस्कर शेतकऱ्यांचा समावेश आहे. थोडक्यात तरुण शेतकरी कमी होत आहेत. खरे तर जेव्हा वयस्कर शेतकरी व्यवसाय सोडतात तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी किमान तेवढेच तरुण सामील होत गेले पाहिजे पण तसे होत नाही. त्यामुळे अमेरिकेतील शेतीचे एकत्रीकरण लक्षणीय आणि जलद होईलअसे कृषीतद्न्य विडमार म्हणतात. आपल्याकडे कमाल जमीन धारणा काय्द्यापुले शेतीच्या एकतरीकरनास अडथळे आहेत हे तर सर्वज्ञात आहे. अमेरिकेतील स्थिती मात्र वेगळी आहे. अमेरिकेतील एकत्रीकरण प्रक्रियेमुळे शेतीची गतिशीलता मोठ्याअधिक व्यवस्थापकीय गुंतागुंतीमध्ये बदलेल. थोड्क्यात कॉर्पोरेट शेतीचा वेग वाढेल आणि शेतीचे सध्याचे एकल शेती हे स्वरूप आमुलाग्र बदलून जाईल. मी भारतीय शेतकऱ्यासाठी  “एक गाव:एक कंपनी: एक व्यवस्थापन” हे पुस्तक लिहून भारतीय शेतकरीही कॉर्पोरेट होऊन किफायतशीर शेती कशी करू शकतील यावर विस्तृत लिहिले आहे. पण आपण मुळात स्थितीस्थापक असल्याने एकल शेती व तीही तुकड्यांची त्यामुळे ती नफ्यात न येता एकूण अन्नधान्याच्या उत्पादनातही अनेक कारणांनी मागे पडत आहे.

अमेरीकन तज्ञाच्या मतानुसार शेती एकत्रीकरणामुळे बाह्य कामगारांची अधिक आवश्यकता निर्माण होईल किंवा रोबोटिक्ससारखे उच्च-तंत्रज्ञान मदतीला येइल अशी अपेक्षा आहे. "जर तुमच्याकडे रोबोट असेलतर ते कामगार समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते," असे कृषीतद्न्य विडमार म्हणतात. दुग्ध उत्पादक कामगारांना पर्याय म्हणून रोबोटिक मिल्कर्स वापरतात. आता शेती-उपकरणे उत्पादक मानवी चालकांशिवाय शेतातील काम हाताळण्यासाठी रोबोटिक ट्रॅक्टर आणि स्प्रेअरच्या प्रोटोटाइपची चाचणी घेत आहेत.

 रोबोटिक यंत्रसामग्री ए.आय.ने सुसज्ज असल्याने ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय कामे नियंत्रित करता येतात. ड्रोन तंत्रज्ञान शेतीच्या वापरात भरभराटीसाठी सज्ज आहेच. बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिंच ग्लोबल रिसर्चच्या अहवालानुसारपुढील १० वर्षांतकृषी ड्रोन उद्योग अमेरिकेत १००,००० नोकऱ्या आणि ८२ अब्ज डॉलर्सची आर्थिक उलाढाल निर्माण करेल. २०५० पर्यंत शेतीमध्ये ड्रोनचा संभाव्य वापर प्रचंड असेल.   

२०५० पर्यंत  जनुक संपादित बियाण्यांपासून जवळपास सर्वच पिके घेतली जातील आणि त्यामुळे पिकांची विस्तृत विविधता आणि उत्पादकता वाढेल असा अंदाज आहे. भविष्यातजनुक संपादनामुळे शेतकऱ्यांना आपापल्या गरजांनुसार विशिष्ट पिकांच्या उत्पादक जाती निवडता येतील. जनुक संपादनामुळे व्यापक उत्पादनात अडथळा आणणारे नैसर्गिक गुणधर्म काढून टाकून पिकांची अधिक विविधता निर्माण होईल. 

भविष्यात पाण्याची उपलब्धतापर्यावरणीय परिणाम आणि मातीचे आरोग्य हे शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे करतील परंतु नवीन तंत्रज्ञान त्यांना या समस्यांना अधिक कार्यक्षमतेने तोंड देण्यास मदत करेल असेही कृषीतज्ञांचे मत आहे. उदाहरणार्थसिंजेंटासोबत सहयोग करणाऱ्या इस्रायली कंपनी फायटेकने एक देखरेख प्रणाली विकसित केली आहे ज्यामध्ये सतत वनस्पती-वाढ सेन्सर्समाती-ओलावा सेन्सर्स आणि एक सूक्ष्म हवामान परीक्षण युनिट आहे. त्यामुळे व्यक्तिगत रोपांचीही स्वतंत्र देखभाल करणे व तत्काळ इलाज करणे सोपे जाईल.

थोडक्यात भविष्यातील विविध आव्हानांचा आत्ताच विचार करून त्यावर उपाय शोधायचे कार्य सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या व पिकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक अचूकपणे वापरण्यावर भर कसा दिला जाईल आणि भविष्यातील अन्न-धान्य, फळे, भाजीपाला यांची आरोग्यदायी गरज कशी पूर्ण केली जाईल यावर प्रगत देशांचाही भर आहे. मातीचे आरोग्य वाढवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील यावरही या संशोधनात भर तर आहेच पण सिंचन व्यवस्था सूक्ष्म स्तरापर्यंत नेत पाण्याचा अकारण गैरवापर कसा थांबवायचा यावरही भर आहे.

या पार्श्वभूमीवर आपण कोठे आहोत? आजच कुपोषितांची संख्या चिंताजनक पातळीवर पोचलेली आहे. शेतीचे वेगात तुकडीकरण होत आहे. भारतीय शेतीला अनुकूल नवे तंत्रज्ञान शोधण्यात आमच्या तंत्रज्ञांना वेळ नाही किंवा त्यांच्याकडेच भांडवल नाही. शेतीतही नवे भांडवल येण्याची प्रक्रिया जवळपास थंडावलेली आहे. शेती आजच परवडणारी राहिलेली नाही. शेतकर्यांच्या आत्महत्यांचा विस्फोट झाला आहे. २०५० साली आमची शेती कोठे असेल याची कल्पनाच करवत नाही असे विदारक चित्र आजच आहे.

-संजय सोनवणी 

Thursday, March 6, 2025

माणूस जिवंत करण्यासाठी!

 आमचे डोळे फुटलेले आहेत

कानात लाव्हा भरला आहे

कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत

हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत

पिशाच्चे नंगानाच करत आहेत चारी बाजूंनी

राज्यकर्ते आणि राज्यकर्ते होऊ पाहणाऱ्या

हैवानांचा हैवानांशी संघर्ष

आम्हाला मनोरंजक वाटतो आहे

त्यातच आम्ही आमच्या वांझ मनोरंजनांची

आणि झगड्याची सोय लावत

एकमेकांचा जीव घेण्यासाठी

आतुर झालो आहोत....

वेदनांमध्ये क्रूर आनंद घेण्यात आम्हाला तृप्तता वाटू लागलीय

आणि

स्मशानांतली धग आम्हाला अपार शांती देऊ लागलीय...

ही कोणती अभद्र शांती उपभोगतोय आम्ही?

हा कोणता नृशंस आनंद प्रिय वाटतोय आम्हाला?

अरे, जिवंत करा तुमचे फुटलेले डोळे

आणि करा साफ

लाव्हा भरलेले कान

आणि जरा बघा कोणता विनाश चालून येतोय

आणि जरा ऐका

विझत चाललेल्या आत्म्यांचे अखेरचे आक्रोश...

अरे उठून सज्ज व्हा या हैवानांचा

नाश करण्यासाठी

माणूस जिवंत करण्यासाठी!


-संजय सोनवणी

ए.आय.चे भविष्यकालीन जगावर काय परिणाम होतील?


 


मानवी इतिहासात असे अनेकदा झाले आहे की काही शोधांनी सुरुवातीला अत्यंत गारुड गाजवले. त्याच वेळेस हे शोध भीतीदायक आहेत असेही निक्षून सांगणारे वाढले. काळानुसार शोधातील जे उपयुक्त आहे तेवढे लोकांनी स्वीकारले. ते शोध एवढे अंगवळणी पडत गेले की ते अभिनव शोध आहेत असे वाटणेही बंद झाले आणि त्या शोधांबद्दलची भीतीही कोठल्या कोठे विरून गेली. यंत्रांचा शोध हा एक असाच टप्पा होता. दहा माणसांचे काम अधिक अचूकतेने एक यंत्र करू लागल्यानंतर मानवी श्रम आणि कौशल्यांचे काय होणार हा असाच एक भयदायक प्रश्न जगात  उसळला होता. महात्मा गांधीही यंत्रयुगाचे विरोधक होते हे सर्वश्रुत आहे. त्यामागील नैतिक धारणा व निर्माण होणाऱ्या नैतिक समस्या या अशा विचारवंतांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा मुख्य गाभा होता. त्यांनी वर्तवलेल्या नैतिक शक्यता बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरल्या असल्या तरी फार भयदायक आहे किंवा त्यामुळे काहीतरी विपरीत घडते आहे असे बव्हंशी जगाला वाटले नाही. उलट ते यंत्रांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या वापराकडे एवढे झपाट्याने वळाले की हाताने बनवलेल्या वस्तू ते केवळ शोभेखातर किंवा गतकाळाच्या स्मरणरंजनात रमण्यासाठी करू लागले.

आज एआयची जी धास्ती दाखवली जाते तिचेही असेच होईल यात शंका नाही. तसेही एआयने अनेक माध्यमांतून जगाच्या नकळत ताबा घेतलेलाच आहे. अवाढव्य प्रमाणातील माहितीचा साठा परस्पर जमा केला जातो आहे. त्याचाच वापर करत एआयची अनेक साधने बाजारात येत आहेत. त्याचा वापर करणारेही अगणित आहेत. पण एआयच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्याने त्या साधनांचा उपयोग करणारे सामान्य लोक मात्र आता हळूहळू त्यापासून दूरही जात आहेत. अर्थात ही एआयची बाल्यावस्था आहे, ती वेगाने प्रगल्भ होत जाईल आणि अधिक अचूक होत मानवी जीवनातील अनेक क्षेत्रे ते कब्जात घेत जाईल असा आशावाद व भयवाद जोपासणारे मात्र अधिक आहेत हेही खरे.

उत्पादन पद्धती, उत्पादन डिझाईन पद्धती मुळात गणिती असल्याने त्यातील एआयचा वापर अधिक अचूकतेने मोठ्या प्रमाणावर होत जाईल. १९९८ साली मी माझ्या वाशिंग्टन सॉफ्टवेअर्स लि. या कंपनीमार्फत मेकॅनिकल डिझाईन्सची दहा सॉफ्टवेअर उत्पादने बाजारात आणली होती. सेंट्रीफ्यूगल फॅन्स ते प्रेशर व्हेसल्सचे यांत्रिक आराखडे त्यामार्फत अक्षरश: सेकंदात आणि बिनचूक मिळत. हे सॉफ्टवेअर वापरणारा स्वत: तंत्रज्ञ असण्याची आवश्यकता नव्हती. जी डिझाईन्स करायला एरवी काही तास ते आठवडे लागणाऱ्या आणि किमान एक ते अधिकाधिक पंधरा अनुभवी मेकॅनिकल डिझाईन तंत्रज्ञांची आवश्यकता असलेल्या डिझाईनचे काम काही सेकंदात व्हावे आणि तेही तांत्रिक दृष्ट्या, कोणतीही मानवी चूक न होऊ देता याचे त्यावेळेस अभियांत्रिकी तंत्रज्ञांनाही आश्चर्य वाटत होते. यामूळे कुशल तंत्रज्ञांची गरजच संपेल या भीतीमुळे अनेक तंत्रज्ञांनीच ही उत्पादने नाकारली. खरे तर भारतातील एआयची सुरुवात या उत्पादनांपासून झाली. पण भारतीय लोक नेहमीच आपल्याच ज्ञानाला अव्हेरण्यात आघाडीवर असतात. ही उत्पादने त्यामुळे त्या काळात बाजारात फार मोठा जम बसवू शकली नाहीत. पण तांत्रिक अचूकतेसाठी अशा प्रकारच्या ए.आय. उत्पादनांची नेहमीच आवश्यकता राहील. तीच गोष्ट प्रक्रिया उद्योगांची. एकूण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत, क्षणोक्षणी प्रक्रियेत जाणारा कच्चा माल व प्रक्रीये दरम्यानचे असंख्य गुंतागुंतीचे रासायनिक, उष्मागतिकी पॅरामीटर्स एकाच वेळेस अचूकतेने सांभाळत अपेक्षित दर्जाचे अंतिम उत्पादन निर्माण व्हावे यासाठी ए.आय. निश्चितच उपयुक्त आहे व या क्षेत्रातील त्याचा वापरही वेगाने वाढत आहे. गणिती क्रिया यंत्र व उत्पादनांना उपयुक्त असल्या तरी मानवी जीवन मात्र गणितापारचे आहे. ते तर्काच्या सीमांपार जाणारे आहे. दिलेल्या गणिती पद्धतीने उत्पादने अधिक अचूकपणे बनवता येणे शक्य झाले तरी वेगळ्याच नवीन उत्पादनाची किंवा प्रक्रिया पद्धतीची संरचना अशा कृत्रिम बुद्धिमत्तेला बनवता येणे शक्य नाही. त्यामुळे मानवी हस्तक्षेप व ज्ञानप्रक्रियेत भर घालण्याचे कार्य माणसालाच करत राहावे लागणार आहे.

सामान्य मानवी जीवनात एआयने काही उपयुक्तता निश्चितच दिल्या असल्या तरी उपयुक्त काय हे ठरवण्याचे कार्य माणसालाच करावे लागते. चॅट-जीपीटी सारखी साधने आजही आणि भविष्यातही तारतम्यानेच वापरावी लागतील. मुळात प्रश्न कोणता विचारायचा आहे, कोणती माहिती हवी आहे, का हवी आहे, दिलेली माहिती बरोबर आहे की चुक हे ठरवत त्यातून नेमके कोणते आकलन करून घ्यायचे आहे हे ठरवणारी शेवटी व्यक्तीच असेल. म्हणजेच या साधनांचा वापर कसा करायचा हे मानवी बुद्धीच ठरवणार आहे. विचार करणारे संगणक येतील असे अनेकांना वाटत असले तरी विचार कसा करायचा याचे कोडींग शेवटी मनुष्याच करणार असल्याने आणि कोणत्याही प्रश्नाला अगणित कोन असल्याने आणि व्यक्तीपरत्वे काय महत्वाचे हे ठरवता येणे शक्य नसल्याने शेवटी किती संभावनांचा समावेश या प्रणालींत करता येईल यावर मर्यादा आहेत. आणि हे एक ‘निर्विकार’ साधन आहे. त्याला नैतिकता, विवेक आणि कल्पकता अशा मानवी बाजूंचा स्वभान असणारा पैलूच नसल्याने हे फक्त मानवाला सहायक ठरणारे, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ करणारे एक उपयुक्त सांगकामे सहायक एवढेच राहणार आहे.

भविष्यात आजचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन किमान ३६ क्युबीट्सचे क्वांटम (सूक्ष्मयामिकी) प्रणालीवर चालणारे संगणक येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने वेगाने प्रयत्न होतही आहेत. असे संगणक अचाट शक्तीचे व आज कोणतीही प्रणाली हाताळू शकते त्यापेक्षा शेकडो पटीने वेगवान व आज सोडवता येतात त्याहीपेक्षा किचकट समस्या लीलया हाताळू शकतील अशा प्रणाल्या त्यामुळे अस्तित्वात येवू शकतील. खरे तर आजचे संगणक त्यामुळे बाद होतील आणि नवीनच अजब-गजब तंत्रज्ञान मानवी जगाला प्रभावित करत जाईल. हे झाल्यावरचे जग कसे असेल याचा मासला मी माझ्या “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत दाखवला आहेच. पण वास्तवात पाहिले तर हा क्वांटम तंत्रज्ञांनाकडे जाणारा प्रवास प्रदीर्घ आहे. याचे कारण म्हणजे परमाणुच्या सूक्ष्म स्तरावर आजच्या भौतिकीचे नियम मुळात लागू पडत नाहीत. किंबहुना सूक्ष्म स्तरावरील भौतिकी घटनांचे आकलन आजची शास्त्राला पुरेशा प्रमाणात झालेले नाही. त्या अर्थाने मुळात सूक्ष्मयामिकी अद्याप तरी बाल्यावस्थेत आहे. आणि जोवर ती मानवी आकलनात येत नाही तोवर त्यावर आधारित कोणतीही प्रणाली बनवता येणे अशक्य आहे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे कार्य कदापि करू शकत नाही हे आता सर्वांच्याच लक्षात आलेले आहे.

थोडक्यात उद्याचे जग आरंभीच्या गारुडातून बाहेर येत स्वत:चीच बुद्धी वापरू लागेल अशीच शक्यता जास्त आहे.

 

-संजय सोनवणी 

Thursday, February 27, 2025

विद्रोह मेला आहे!

 “पारंपारिक विचार, सिद्धांत आणि जगण्याच्या पद्धतीला आव्हान देत नवे विचार सकारात्मक परिवर्तनाच्या भावनेने जे मांडतात त्यांनाच विद्रोही म्हटले जाते. आपल्याकडील विद्रोही म्हणवणारे लोक मात्र विशिष्ट जाती धर्माला शिव्या देण्याला आणि निंदा करत राहण्याला विद्रोह मानतात. जे नवविचारांचे सैद्धांतिक सृजन करत समाज बदलवण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना विद्रोही मानणे अथवा अशा लोकांनी स्वत:ला विद्रोही समजणे हेच मुळात विद्रोहाचा अर्थ न समजल्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील विद्रोह कधीच मेला आहे.” ही पोस्ट मी फेसबुकवर पाच डिसेंबर २०२४ रोजी टाकली होती. त्यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली. काही लेखकांशी प्रत्यक्ष भेटीतही चर्चा झाली. अर्थात या चर्चेचे निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्याचा आणि मी लिहिलेल्या पोस्टच्या मुख्य हेतूशी त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही या विषयावर विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्यापक विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त झाल्याने येथे विद्रोही साहित्य सम्मेलनाचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.

 

गेला काही काळ जेथे अ. भा. मरठी साहित्य संमेलन असेल तेथे समोरच विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरवण्याची प्रथा पडलेली आहे. “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात ज्यांना प्रवेश मिळालेला नसतो अशीच मंडळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात जातात” अशीही टीका यात सहभागी होणाऱ्या लेखकांवर होत आलेली आहे. दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक  एवढ्या दूर जाणे कसे परवडेल या विवंचनेत गोंधळलेले दिसले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे या वेळचे आयोजक सरहदचे संजय नहार यांनी मात्र अत्यंत वेगळी भूमिका घेतली. दिल्लीतील साहुत्य संमेलनात मराठीतील सारे ‘आवाज’ प्रतिध्वनित व्हावे म्हणून त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवातच अथवा शेजारीच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. तसे लिखित पत्रही दिले, पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पदाधिकाऱ्यानी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. “आम्ही अ. भा. साहित्य संमेलनाविरुद्ध असल्याने तुमच्याच मांडवात आम्ही कसे येणार?” अशा स्वरूपाचा प्रश्नही विचारला गेला.

 

१९९९ साली बाबुराव बागुल या प्रख्यात साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरले होते. तेव्हापासून या संमेलनाची परंपरा जवळपास अव्याहत आहे असे म्हटले तरी चालेल. महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथे १८७८ साली झालेल्या पहिल्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष न्या. म. गो. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणाला उत्तर देतांना “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवांचे हित होईल याचे बीज नाही. हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोडया दादांचे संमेलन आहे.” असे म्हणून या संमेलनास जाण्याचे नाकारले. हे पत्र हेच विद्रोही साहित्य संमेलनाची प्रेरणा बनले असे चळवळीतील मंडळी मानते. अर्थात त्यांना म. फुले यांच्या वरील विधानाचा सखोल अर्थ कधी नीट कळाला आहे असे जाणवत नाही. अखिल मानवांचे हित हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे व त्यापासून नुसते विद्रोहीच नव्हे तर अ. भा. साहित्य संमेलनानेही तो डोक्यावर घेत आपली भूमिका व्यापक करण्याची आवश्यकता होती पण ते दुर्दैवाने अद्याप झालेले दिसून येत नाही. या अर्थाने पाहिले तर दोन्ही संमेलने घालमोडया दादांची आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नाही.

 

विद्रोह ही एक व्यापक संकल्पना आहे. गतकाळात जे झाले ते तसेच्या तसे पुढे चालवत राहतात वा तसा प्रयत्न करतात वा तेच चांगले होते असे मानतात ते प्रतिगामी असतात तर जे सतत स्वत:त आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक बदल घडवून आणतात त्यांना पुरोगामी म्हणतात. हे बदल कसे होत आहेत, त्यात अडथळे नेमके कोणते येत आहेत आणि कसा समाज घडवावा वाटतो याचे चित्रण करण्याचे काम व वर्तमान व भविष्यवेधी चिंतन-विश्लेषन करण्याचे काम विचारवंत करत असतात. त्यांना आपण पुरोगामी साहित्यिक व विचारवंत म्हणू शकतो. अखिल मानवजातीचे हित हाच सर्वांच्या चिंतनाचा, आचार-व्यवहाराचा पाया असला पाहिजे हे तर जागतिक मान्य वास्तव आहे. अर्थात त्यासाठी स्वत:त आमुलाग्र बदल घडवण्याची आणि अत्यंत संवेदनशिलतेने जगाकडे पाहण्याची आवश्यकता असते. मागील विचारवंत/साहित्य्यिक यांच्या आकलनात, सिद्धांतात, जीवनविचारांनाही आव्हान देत नव्या अभिनव कृती निर्माण करत अधिक व्यापक जीवन कवेत घेतात ते किंवा समाजविषयक पुढे नाणारे सिद्धांत व विचार जे मांडतात त्यांना विद्रोही लेखक-विचारवंत म्हणता येईल. हे अ. भा. साहित्य संमेलनालाही लागू पडते. परंतु वास्तव काय आहे? 

 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे की ही चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी साहित्य-संस्कृती आणि विचारधारेचा पुरस्कार करते. परंतु म. फुले यांचे ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्रापासून “प्रेरणा” घेत आजतागायत विद्रोही म्हणवणाऱ्या सहित्यिक-विचारवंतांची काय अवस्था आहे? त्यांचे विचार-साहित्य आणि त्यांचे वास्तवातील वर्तन यात किती साम्य आहे? अपवाद सोडले तर आपल्या हाती या निकषांवर चर्चा केल्यानंतर निराशाच हाती येईल. अखिल मानवांचे हित व्हावे असे तुमच्या ग्रंथांत काय आहे हा प्रश्न आजच्याही अखिल भारतीय संमेलनात सामील होणाऱ्या लेखक-कवींना विचारता येईल आणि त्याचे उत्तर आजही कोणाकडे आहे असे दिसत नाही.

 

समतावाद हा अत्त्यंत सुंदर शब्द आहे हे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा. पण हा समतावाद केवळ जातीवर आधारित आपला गोतावळा गोळा करत असेल तर त्यांना समतावादी कसे म्हणता येईल? की एखाद्या वर्गाला, जातीला किंवा धर्माला आपल्या वंचनेचे कारण मानत त्यावर सातत्याने अनाभ्यासी टीका करत वर्तमानात आणि भविष्यात समता अस्तित्वात आणण्यासाठी आणि भविष्यातील समाज कसा असावा यावर अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय अंगानेही विचार करत नवी मांडणी करता येत नसेल किंवा आजवर करता आली नसेल तर त्याला ‘विद्रोह’ हा शब्द कसा वापरता येईल. हे वंचित राहू इच्छिणाऱ्या वंचितांचेच संमेलन आहे असे का म्हणता येणार नाही?   

 

शाहू, फुले आंबेडकर हे विद्रोही व पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळीचे आराध्य आहे व त्यांच्याच विचारांचे अनुसरण करत ही मंडळी चालत असते. किंबहुना शाहू-फुले-आंबेडकरांचे हे पुरोगामी राज्य आहे असेही वारंवार, अगदी राजकीय पटलावरूनही उद्घोषित होत असते. महाराष्ट्रात सामाजिक चळवळी नव्या नाहीत. असे असूनही सामाजिक वास्तव मात्र वेगळे आहे आणि आज तर ते पार बदललेले आहे हे वास्तव स्वीकारायची आणि जबाबदारी घ्यायची यांची तयारी आहे काय? समाजातील अगदी जातीभेद मोडण्याचीही क्रांती यांना करता आली नाही. किंबहुना अगदी जातीअंताच्या चळवळी करणार्यांच्या सभांतील वक्त्यांची आधी जात सांगितली जाते. हे कसले जातीअंत करण्याचे लक्षण आहे? जाते सोडा, पोटजातीन्चेही निर्मुलन ही मंडळी करण्यात घोर अपयशी ठरली आहे. मुळात विद्रोहाचा आधारच जर जात-धर्म असेल तर दुसरे काय होणार? महात्मा फुलेंनी व नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजव्यवस्थेसाठी अर्थ-सिद्धांत बनवत वंचित समाजसापेक्ष मांडणी केली होती. शाहू महाराजांनीही शेतकी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष क्रांती केली. आर्थिक उन्नती हा मानवाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या उद्गारास कारण ठरतो हे सर्वच शा.फु.आ. उद्घोष करणारे विसरून गेले. खरे तर शाहू, फुले आणि आम्बेडकरांच्या पुढे या मंडळीने एकही पाउल टाकले नाही, उलट मागे मागेच सरकत जात आपले नैतिक स्वास्थ हरपून बसल्याचे दिसून येईल. असे असतांना सर्व समाज शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा (म्हणजे समतावादी, अर्थवादी आणि भविष्यवादी) बनेल आणि या तिघांचे नाव घेतले तर आपल्या मागे येईल असा खुळचट विचार जन्माला येउच कसा शकतो.

 

हे कधी झाले असते? जर या चळवळीतील सामाविष्ट घटकांनी या तिघांना सोयीचे तेवढे न स्वीकारता त्यांच्या विचारांत आधुनिक परिप्रेक्षात भर घालून म. फुले म्हणाले त्याप्रमाणे अखिल मानवहिताची भूमिका घेत नवी साहित्य संस्कृती आणि समाज संस्कृती घडवण्यासाठी आपले विचार व लेखण्या झिजवल्या असत्या तर! केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलन समाजातील एकाच विशिष्ट घटकाचे प्रतिनिधित्व करते, ते आपल्याला स्थान देत नाही म्हणून जर विद्रोही साहित्य संमेलन भरवले जात असेल तर मुळात हेतूच दांभिक असल्याने सामाजिक परिवर्तनात ते काही मोलाचा वाटा उचलू शकले असे आजवर तरी दिसले नाही. हे महात्मा फुलेंच्या अपेक्षेच्या विपरीत नाही काय? विद्रोही म्हणवणारे ग्रंथकार उदंड झाले...पखालींचे भारवाही झाले एवढेच काय ते म्हणता येईल.  

 

समाजात विद्रोहाची आवश्यकता असतेच. विद्रोह हा कोणत्या जाती-धर्म वा वंशाचा कोणत्यातरी अन्य जाती-धर्म किंवा वंशाविरुद्ध नसतो. विद्रोह आधी स्वत:विरुद्ध, आणि नंतर समाजातील जेही काही अनिष्ट आहे, कालसुसंगत वा प्रागतिक नाही त्याविरुद्ध असतो. विद्रोहाची संकल्पनाच जातीनिष्ठ करून टाकली गेल्याने काय अनर्थ झाला आहे हे कोणाच्या लक्षात येईल तो सुदिन.

 

आणि “प्रस्थापितांच्या, पुरुषवर्चस्ववादी, ब्राह्मणी, भांडवली. विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटीत कृती केली पाहिजे.” असे आमीन शेख (राज्य कार्यकारिणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) हे २०२३ च्या वर्धा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरील एका लेखात म्हणतात. त्यांच्या विवेचनातील प्रत्त्येक मुद्द्यावर स्वतंत्र तात्विक्ज प्रतिवाद करता येईल, पण पुरुषवर्चस्वतावाद किंवा भांडवली व विषमतावादी व्यवस्था जर ब्राह्मणी (म्हणजेच वैदिक) संस्कृतीची उपज असेल तर ती इतरांनी कशी स्वीकारली आणि आजही ती तशीच्या तशी का आहे, त्याविरुद्ध स्वसमाजात कोणत्या समतावादी नव्या विचारप्रेरणा रुजवल्या हाही प्रश्न विचारता येईल. किंबहुना जी स्थिती ओढवली आहे तिचे ऐतिहासिक समाजशास्त्रीय विवेचन तरी केले आहे काय हा प्रश्नही विचारता येईल. आणि भांडवली म्हणायचे तर मुळात जातीच व्यवसायांतून निर्माण झाल्या,  आपत्तीच्या काळात व्यवसाय सुरक्षित राहावेत, स्पर्धा होऊ नये म्हणून जाती बंदिस्त केल्या गेल्या. ही भांडवलशाही नव्हती काय? भांडवली व्यवस्थेविरुद्ध बोलायला साम्यवाद्यांना आवडते हे गृहीत धरले तरी साम्यवादाचे एकाधिकार भांडवली व्यवस्थेतच अंतत: रुपांतर होते हे साम्यवाद्यांच्या लक्षात येत नाही काय आणि अशी एकाधिकारशाही (म्हणजेच सरकारी) असलेली भांडवलशाही त्यांना स्वीकारार्ह आहे काय? साम्यवाद मानवी स्वातंत्र्याचे अपहरण करणारा सर्वात दुष्ट घटक आहे यावर त्यांनी कधी विचार केला आहे काय?

 

थोडक्यात विद्रोहीन्ना मुळात विद्रोहाची व्याख्या काय आहे हे समजावून घ्यावे लागेल. स्वत:च्या तत्वज्ञानाची सखोल मांडणी करावी लागेल आणि दिशा ठरवावी लागेल. अन्यथा त्याला केवळ विरोधासाठी विरोध असे रूप प्राप्त होईल आणि ते तसे होतही आहे.

 

अ.    भा. साहित्य संमेलन

 

वरील विवेचनाचा अर्थ असा मुळीच नाही कि अ. भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात सहभागी होणारे साहित्यिक मराठी समाजाच्या साहित्यिक जाणीवा वाढवण्यासाठी आणि वाचकांना विचार प्रगल्भ करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरले आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. गेली ९७ वर्षे सतत भरत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने वाचक व नवे साहित्यिक घडवणे, काळानुसार बदलणाऱ्या साहित्यिक प्रेरणांचे अवगाहन करत आधुनिक काळातील बदलत असलेल्या अभिव्यक्तीच्या साधनांनाही पारंपारिक साहित्य प्रवाहात सामाविष्ट करून घेणे अशी कामे तर कधीच हातात घेतली नाहीत. संमेलनाला केवळ उत्सवी व दिखाऊ रूप राहिले. तात्विक-साहित्यिक वाद-विवाद होत व्यापक विचारमंथन होण्याऐवजी हा परस्परांचे उणे-दुणे काढण्याचा सोहोळा बनला. आजवरची साहित्य संमेलने अपवाद वगळता साहित्यबाह्य कारणांमुळेच गाजलेली आहेत. समाजापुढे नव्या साहित्य संकल्पना मांडण्याऐवजी गतकाळाच्या नावाखाली स्व-गुणगान गात बसण्याची कुप्रथाच यामुळे सुरु झाली. सामाजिक प्रश्नांशी आपले काही देणे-घेणे आहे याचे भान तर कधीच आले नाही. आले तर ते केवळ ठरावांपुरते बासनात बांधून ठेवण्यासाठी.

 

 

मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद! या बाबतीत विद्रोही आणि अ.भा.म.सा.सं. हातात हात घालून चालतात असेच चित्र दिसून येईल. अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्याही विचारप्रभावात होऊ नये अशी अपेक्षा असली तरी तसे होत असते. कारण मुळातच साहित्यिक या जातीय वा प्रतिगामी विचारप्रभावांचे बळी असतात असेही साधारणपणे दिसून येईल. जातीयवाद लेखकांच्या विविध कंपुंत जसा आहे तसाच तो समीक्षकांमद्ध्येही आहे. किंबहुना कोणत्याही साहित्यिकाची साहित्य समीक्षा करतांना अथवा करायला लावतांना त्यामागे जातीय संदर्भ नाहीत असे क्वचितच घडते. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक केवळ जातीय पाठबळ नसल्याने अथवा कोणा कंपुंत सामील न झाल्याने हयातीतच साहित्यबहिष्कृत झाले आहेत हे आपण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. साहित्यिकच मुळात बव्हंशी जातीय प्रेरणांनी ग्रसित असल्याने त्याचे प्रतिबिंब जसे त्याच्या साहित्यात पडते तसेच या सर्व साहित्यिकांच्या साहित्य संमेलनांवरही पडणे स्वाभाविक आहे. अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनावर "हे संमेलन ब्राह्मणी आहे..." असा आरोप पुर्वीपासुन होत आला आहे. म्हणजे अध्यक्ष जरी कोणत्याही जातीचा असला (खरे तर ठरावीकच जातींचे) तरी एकुणातच संमेलनावर ज्या विषयांचा व चर्चकांचा प्रभाव राहत आला आहे हे पाहता या आरोपाला पुष्टीच मिळत आली आहे. अगदी पूर्वी होत असलेल्या संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतही उमेदवाराची "जात" हाही एक घटक छुपेपणाने कार्यरत असायचा हे गुपित राहिलेले नव्हते. आता केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणने किंवा नेमणे या आरोपातून कशी सुटका करायची हेही ठरवावे लागेल.

 

किंबहुना मराठी साहित्याची ब्राह्मणी, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी झालेली आहे. मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. ओबीसींतील काही मोठ्या जातीही साहित्य संमेलन घेत आल्या आहेत. फारशा चर्चेत राहिले नसले तरी आगरी समाजाचे साहित्य संमेलन गेली १५-१६ वर्ष भरत आले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलने होतात....यामागील सामाजिक व साहित्य प्रेरणा नेमक्या कोणत्या याचा अभ्यास कधी होईल?

बरे, हे काम करणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नाही हे महामंडळाचे म्हणणे मान्य केले तरी प्रश्न हा राहतोच की किमान अशा व्यापक समाज-साहित्यिक प्रश्नांवर विचारमंथन घडून येईल असे परिसंवाद तरी ठेवता येतील की नाही? आज जागतिकीकरणाने झपाट्याने जी सामाजिक  उलथापालथ होते आहे तिचे प्रतिबिंब साहित्य संमेलनात पडणार तरी आहे की नाही? किंबहुना साहित्यिक तरी त्यात पुढाकार घेत आहेत काय?

 

 

स्वसंतुष्टता ही साहित्यिकांची प्रवृत्ती का बनते आहे? खरे म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी लेखक अभावानेच तळपले आहेत. कारण यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता येईल, अशी मुळात यांच्यात तशी क्षमता आहे असेच दिसत नाही. त्यामुळे समाजमनावर आज या साहित्यिकांचा कसलाही व्यापक प्रभाव नाही.

 

साहित्य संमेलन म्हणजे आपल्या जीवन विषयकच्या धारणांचा जागर असतो. समग्र मानवी जगण्याचे चित्रण करत मनुष्याला त्याचा आरसा दाखवत भविष्याचे दिशादिग्दर्शन करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. हेतुशिवाय लिहिले गेलेले साहित्यही अप्रत्यक्षरित्या हेच हेतुबद्ध कार्य करत असते. त्यामुळे साहित्याचे प्रयोजन काय हा प्रश्न तसा निरर्थकच ठरतो. प्रत्येक लेखकाचे साहित्य हे त्या लेखकाचे समाजविषयकचे, स्वत:बद्दलचे आकलन याचा कलात्मक आविष्कार स्वरुपात असल्याने त्यातच त्याचे साहित्य विषयकचे प्रयोजन स्वयंसिद्ध असते. त्याचा दर्जा काय हे वाचक आणि समीक्षक ठरवतील, पण प्रत्येक साहित्यकृतीचे व साहित्त्यिकाचे लेखनकार्य सूप्त अथवा जागृत स्वरुपात काही ना काही प्रयोजन घेऊनच होत असते. असे असले तरी आज मराठी साहित्याचे प्रयोजन आजच्या सहित्यातून काय दिसते हे पाहिले तर एकुणच साहित्यिकांच्या आकलन-मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते हे मान्य करावेच लागेल.

 

थोडक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही दोषांपासून अलिप्त नाही. या संमेलनांतून काहीतरी भरीव निष्पन्न झाले आहे असा या संमेलनांचाही इतिहास नाही. मराठी साहित्य संस्कृती खुरडत चालली आहे याचे कारण नेमके यात आहे. म. फुले यांचे विधान अखिल भारतीय साहित्य साम्मेल्नानेही गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वांचे हित होईल असे आमच्या साहित्यात अद्यापही काहीच का येत नाही, तेही पुराणपंथीच का राहते आहे? भविष्यवेधी साहित्यिक उद्गार आमच्याकडे क्वचितच का उठतात? वर्तमान आमच्या साहित्यिकांच्या कवेत का येत नाही? आम,ही आजही काही विशिष्ट व्यक्तींचे साहित्यिक देव्हारे उभे करून ते म्हणजेच साहित्यिक आणि त्यांनी लिहिले तेच साहित्य असे स्वत:च्या सोयीचे मापदंड का उभे करत आहोत?  जी. ए. कुलकर्णी यांनी सांगीतलेल्या एका बोधकथेचा मतितार्थ असा होता...”आम्ही विशिष्ट झाडाची उंची हाच मापदंड बनवून त्यापेक्षा उंच झाडांचे शेंडे छाटून टाकण्यातच धन्यता मानतो.”

 

माझ्या मते अखिल भारतीय साहित्य संमेलनही असेच करत आहे. बदलाची गरज आहे. परिवर्तन हा सृष्टीचा मुख्य गुणधर्म असेल तर नक्कीच. विद्रोही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही नाव सृजनाचा प्रोत्साहक घटक बनणार नसेल तर ती राहिली काय किंवा न राहिली काय, वाचकांना काय फरक पडतो.

 

दिल्ली येथे होत असलेले साहित्य संमेलन अनेक बाबीत बदल घडवून आणू शकते. विद्रोही साहित्य संमेलनाला स्वत: खुले निमंत्रण देऊन संजय नहार यांनी चांगला पायंडा पाडला होता. या निमंत्रणाचा स्वीकार झाला असता तर साहित्य क्षेत्रात एक नवी वाट बनू शकली असती, पण तसे हा लेख लिहीपर्यंत तरी झालेले नाही. हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने याचे एक वेगळे महत्व आहे. किमान येथेतरी साहित्यिक स्वमग्नतेच्या भूमिकेतून बाहेर पडत वैश्विक जरी नाही होऊ शकले तरी किमान राष्ट्रीय दृष्टीचे होतील ही अपेक्षा!

 

-संजय सोनवणी 

 

 

 

 

Monday, February 24, 2025

ए-आय: बौद्धिक मक्तेदारीच्या दिशेने?


 


गेल्या काही दशकांत जगातील अधिकाधिक लोकांची बुद्धी घटते आहे, बुद्धीचे विषम वितरण गतिमान झालेले आहे असे दिसते. ज्याप्रमाणे संपत्ती मुठभर लोकांकडे केंद्रित होत आहे त्याच प्रमाणे बुद्धीचेही संकलन मर्यादित लोकांकडे होऊ लागलेले आहे आणि ही प्रक्रिया गतिमान झालेली आहे. ज्याप्रमाणे अधिकाधिक लोकांच्या संपत्तीला वित्तसंस्थांच्या मार्फत मोठीमोठी कर्जे घेऊन वा समभाग किंवा कर्जरोखे याचे वितरण करत एकाच कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेशनमध्ये भांडवल गोळा करत त्यावर आधारित उद्योगांवर जगातील आर्थिक गाडा चाललेला आहे त्याच प्रमाणे हीच कॉर्पोरेशन्स व सरकारेही विखुरलेल्या बुद्धिमत्तेचे एआयसारख्या साधनांमार्फत एकत्रीकरण करत त्याचा प्रभावी वापर करत जनतेवरच ज्ञान-स्वामित्व गाजवण्याचा उद्योग करत आहेत असे आज आपल्याला दिसून येईल. तुम्ही म्हणाल, भांडवलाचे एकत्रीकरण करता येईल, पण बुद्धिमत्तेचे भांडवलशाही किंवा मक्तेदारी कशी निर्माण होणार?

 खरे तर हे आपण अनेक उदाहरणातून पाहू शकतो. पण कृत्रिम बुद्धीमत्तेचेच एक उदाहरण घेऊयात. साधन  कोणतेही असो, त्याचा पाया असंख्य माणसांनी निर्माण केलेल्या माहिती आणि ज्ञानाने निर्माण झालेला आहे. त्यात सुसंगती आणत त्यातल्या त्यात मुद्देसूद पद्धतीने सादर करण्याचे तंत्रही असंख्य तंत्रज्ञांनी विकसित केलेले आहे व ते भविष्यातही अजून कोणते नवे तंत्रज्ञान येईपर्यंत करत राहणार आहेत. पण हे तंत्रज्ञ समग्र प्रकल्पातील एखाद्या तुकड्यावर कार्य करत असतात. समग्र चित्र पुन्हा मोजक्या लोकांच्या हातात असते. तेच हे तुकड्या तुकड्याने असंख्य तंत्रज्ञाकडून विकसित केले गेलेले घटक एकत्र जुळवत अंतिम उत्पादन तयार करत असतात. पुन्हा हेच तंत्रज्ञान सामान्य लोकांसमोर ठेवत असतात. कारखान्यातील उत्पादन पद्धती ते अंतिम उत्पादनासाठी आवश्यक मशीन लर्निंगसारखी साधने ही उत्पादन केंद्रित असल्याने त्यांचा सामान्य लोकांना थेट उपयोग होत नसला तरी या बुद्धीमत्तेचा उत्पादनकेंद्रीत उपयोग असला तरी केंत्याचा उपयोग उद्योगांना होऊन एकुणातील उत्पादन क्षमता व दर्जा वाढवण्याचा उपयोग उद्योगांना होतो तसाच तो सामान्य माणसांनाही अप्रत्यक्षरित्या होणार असतो. ही कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करणारे मानवच असतात. पण तेही त्या सर्व उत्पादन प्रक्रियेतील तज्ञ नसल्याने व त्याची आवश्यकता नसल्याने अनेकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धी त्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या निर्मितीसाठी खर्च होत असते.  म्हणजेच एक साधन निर्माण करण्यासाठी अनेकांची बुद्धी एकत्र आलेली असते. पण प्रत्येकाने वापरलेली बुद्धी ही एका विशिष्ठ पद्धतीच्या साच्यात वापरावी लागत असल्याने त्यात सहभागी तज्ञही साचेबद्ध होत जातात. पण बुद्धीच्या एकत्रीक्ररणाची साचेबद्ध प्रक्रिया सुरूच राहते. साधनाचे उद्देश्य बदलले की प्रक्रिया बदलायची आवश्यकता निर्माण होते. ती प्रक्रिया ठरवणारे घटक मर्यादित असतात. पण त्या साधनाच्या असंख्य घटकांवर काम करणार्यांची संख्या मात्र सहसा कमी होत नाही. सोपे कोडींग लिहिणाऱ्या प्रणाल्या आज अस्तित्वात असल्या तरी साधन (टूल्स) चे उद्देश्य ठरवत त्याचा आराखडा करत त्यांचे शिस्तबद्ध विकास करण्यासाठी वितरण करत अंतिम परिणाम जसा कल्पिला होता तसाच निर्माण होण्यासाठी आपोआप कोडींग करणारे साधन आज तरी मानवी प्रतिभेच्या कक्षात आलेले नाही. त्यामुळे सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता मानवालंबी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत मानवी बुद्धीचे केंद्रीकरण होते आहे. आणि ही साधने वापरणारे घटक पुन्हा मर्यादित आहेत. आर्थिक भांडवलाप्रमाणे बुद्धीचे एकत्रीकरण करणे आणि तिचा समग्र कार्यासाठी वापर करण्याच्या दिशेने सुरु असलेली ही वाटचाल आहे. यातून ज्ञानाचीही मक्तेदारी निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण हे “उपयुक्त” ज्ञान आहे. हे उपयुक्त ज्ञान असणारे मर्यादित परिप्रेक्षात जीवनमान उंचावू शकतात. पण ते आपले ज्ञानात्मक भांडवल विकून. या ज्ञानाची उपयुक्तता संपली की भविष्यात मुळात व्यक्तीला ज्ञानाची आवश्यकताच राहणार नाही कारण ते ज्ञान आपसूक पुरवणारे साधन हाताशी उपलब्ध असेल.

मुळात कृत्रिम बुद्द्धीमत्तेचा उद्देशच माणसांना विचारक्षम करणे हा आहे काय की कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर एकुणातील ज्ञानाला व त्याच्या विकासाला सीमित करण्याचा हेतू त्यामागे आहे? कृत्रिम बुद्धीमत्ता एक प्रकारे ज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने तर निर्माण करण्याचा प्रयत्न होत नाहीय ना यावरही गंभीर विचार करण्याची गरज आहे. भांडवलाचे एकत्रीकरण आणि ज्ञानाचे एकत्रीकरण यात तसा फरक नाही. पण ज्ञानपरंपरेचे बहुमुखी विकसन यामुळे थांबण्याचा जो धोका आहे त्यावर मात्र विचार केला गेला पाहिजे. स्वत: कसलेही विशेष  कष्ट न घेता बसल्या जागी एका क्षणात कोणालाही “ज्ञानवंत” बनवू शकणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने एकुणातील मानवाने आजवर केलेल्या ज्ञानाच्या प्रगतीतील मोठा अडसर बनू लागली असतील तर ती माणसाच्या मुलभूत आळशी प्रवृतीमुळे असे म्हटले तरी फारसे आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही.

आपले जीवन सोपे व्हावे यासाठीच आदिम काळापासून माणसाने अनेक शोध लावले. दैनंदिन कष्टाच्या कामापासून मुक्ती मिळून जास्त व्यापक कार्ये करता यावीत यासाठी त्याने शोध लावले. सुखसुविधा निर्माण केल्या. त्यात भांडवलशाहीची बीजे असली तरी त्याचे प्रमाण सर्वभक्षी नव्हते. पण वर्तमानात मक्तेदारीयुक्त भांडवलशाही आल्यामुळे आणि तिचा हेतू मानवी बुद्धीचा विकास हे नसल्याने बुद्धीही एक उत्पादन (कमोडीटी) मानत तिलाही मक्तेदारीमध्ये बदलवले जाणार असेल तर मात्र मानवजातीने चिंता करावी अशी स्थिती आहे.

मी नुकताच एका  कॉलेजच्या रिसर्च पेपर्सच्या प्रेझेन्टेशन कार्यक्रमाला हजेरी लावली. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आपले रिसर्च पेपर्स व प्रेझेन्टेशंस चॅट-जीपीटीतून  उचललेले होते. त्यात जे आहे ते सर्वच बरोबर आहे असा त्यांचा ठाम विश्वास असावा कारण त्याने पुरवलेल्या रचेनेतील ढोबळ चुकाही त्यांनी दुरुस्त करण्याचे बौद्धिक कष्ट घेतलेले नव्हते. हे सार्वत्रिक असावे असे दिसते. मी गेल्या लेखात म्हटले होते की कृत्रिम बुद्धीमत्ता हे सांगकाम्या मदतनिसासारखे आहे. त्याला स्वत:चे डोके नाही. विश्लेषन क्षमता नाही. त्यात अगणित लोकांनी दिलेल्या माहितीला स्वत:चे डोके न वापरता त्यातल्या त्यात दिलेल्या पद्धतीने मांडण्याचे कौशल्य असले तरी ते शेवटी कृत्रिम साधन आहे. प्रत्येकाने आपापली बुद्धी वापरत त्याचा कितपत उपयोग करून घ्यायचा हे ठरवले पाहिजे. पण तसे होत नाही. हा वेग वाढला तर बौध्दिक मक्तेदारी निर्माण होईल व तशी ती होतही आहे. ही मक्तेदारी समग्र मानव जातीची बौद्धिक अधोगती करत नेत आहे. यातून बौद्धिक साम्राज्यवाद निर्माण होण्याचा धोका आहे आणि तो राजकीय, आर्थिक साम्राज्यवादापेक्षा अधिक विनाशक असणार आहे. स्वबुद्धीविकासासाठी मदतनिस म्हणून ही साधने वापरणे वेगळे आणि बुद्धीच्या बाबतीत परावलंबी होणे वेगळे.

-संजय सोनवणी 

Thursday, February 6, 2025

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

  



 

चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए.आय. बनवणार असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. यंदाच्याच अर्थसंकल्पात भारत सरकारने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अभ्यासासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे हाहा:कार उडेल, मानवाचे स्थान धोक्यात येईल अशी भीतीदायक भाकिते वर्तवली जात असतानाच दुसरीकडे अवाढव्य कॉर्पोरेट्स ते सरकारे कृत्रिम बुद्धीमत्तेतील आपली गुंतवणूक वाढवत नेत आहेत असे चित्र आपल्याला दिसते. भविष्यात हा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत नसली तरी एकुणातच कृत्रिम बुद्धिमत्तेचे केले गेलेले चित्रण आणि वास्तवातील ए.आय. यात अजूनही खूप मोठी दरी असल्याने एकुणातच या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात याच गतीने होत राहील की ती घटत जाईल याबाबत जागतिक अर्थतज्ञ साशंक आहेत. असे का व्हावे यामागे काही कारणे आहेत.

चॅटजीपीटी आणि डीपसीकमध्ये नेमके काय अंतर आहे हेही या निमित्ताने लक्षात येवू लागले आहे. उदा. चीनचे हितसंबंध ज्यात गुंतलेले आहेत अशा प्रश्नांबाबतची उत्तरे डीपसीक चीनधार्जिण्या पद्धतीने देते. तसे चॅट जीपीटीबाबत अमेरिकाधार्जिणी उत्तरे मिळतात असा उघड आरोप अद्याप कोणी केला नसला तरी तसे नसेलच असे खात्रीलायकरीत्या विधान करता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारच्या आणि ‘निवडक’ माहितीचा साठा कृत्रिम बुद्धिमत्तेला पुरवला जातो त्यावर आधारित अशीच उत्तरे ही टूल्स पुरवत असतात. स्वत:चे काही वापरण्याची सोय सध्याच्या तरी तंत्रज्ञानात नाही. प्रचंड माहितीचे दिलेल्या गणिती पद्धतीने वेगात विश्लेषण करून निर्णय घेण्यास उपयुक्त माहिती समोर ठेवणे अथवा वारंवारिता असलेल्या कृती करणे या कामात कृत्रिम बुद्धीमत्ता/रोबोटिक्स बऱ्यापैकी यशस्वी होते आहे. पण कृत्रिम बुद्धीमत्ता समग्र नाही तर प्रत्येक क्षेत्रात त्या कामाची उद्दिष्टे निश्चित करून तुकड्या-तुकड्यात तयार केली जाणारी प्रणाली आहे.

मानवी मेंदूत मज्जातंतूंचे जाळे (न्यूरल नेटवर्क) असते जे वेगाने बहुस्तरीय विश्लेषण करून निर्णय घेते त्याप्रमाणेच संगणकीय पद्धतीने ते व्हावे म्हणून “न्यूरल नेटवर्क” ही संज्ञा जशीच्या तशी राबवण्याची कल्पना यामागे आहे. पण यात माहितीचा जोही संच पूरवावा लागतो तो माणसांना. त्यात चुका होऊ शकतात आणि त्याच चुका मग प्रणाली करत राहणार. त्यात वारंवार सुधारणा कराव्या लागतात, आदेश बदलत रहावे लागतात. पण हे स्वत:च विकसित करण्यासाठी जी “प्रज्ञा” आवश्यक असते ती संगणकीय प्रणालीत नसते. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता मानवावलंबित होऊन जाते.

एकाच प्रकारचे काम सातत्याने करावे लागत असेल, जेथे वेगवेगळ्या स्थिती निर्माण होऊन कार्यपद्धतीत बदल करावा लागत नसेल अशा सांगकाम्या म्हणता येतील अशा कार्यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा मर्यादित हेतूने बनवलेले यंत्रमानव उपयुक्त ठरतात हे खरे. माणसाला पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धीमत्ता कधी उभी राहील काय या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी विज्ञान कादंबऱ्या-कथा ते चित्रपटांत शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. सैद्धांतिक पातळीवरही यावर खूप काम झाले आहे आणि होत राहणार आहे. भविष्यात यात कधीकाळी यश मिळेल की नाही यासाठी आपण काही मुद्द्यांवर चर्चा करूयात.

मनुष्य हा जीवप्रणालीतील सजीव हिस्सा आहे. पृथ्वी सोडता अजून विश्वात मानव आहे की नाही याबाबत साशंकता असली तरी तो शोधही अविरत सुरु आहे. मनुष्याचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. त्याला संवेदना आहेत. त्याच्यात अंतर्स्फुर्ती आहे. तो स्वत:च आपले उद्दिष्ट ठरवू शकतो किंवा भवतालातून ते निवडू शकतो. तो स्वप्ने पाहतो. तो बिकट स्थितीतही वरकरणी अतार्किक वाटले तरी तसे निर्णय घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. तो स्वत:लाच स्वत: विकसित किंवा अध:पतित करत नेवू शकतो. प्रत्येकाच्या स्वभाव प्रेरणा वेगळ्या असून प्रत्येकाची शिकण्याची पद्धत एकजिनसी नसून बहुजिनसी आहे. तो इतिहासाचे, पुरातत्वीय पुराव्यांचे वेगवेगळे आकलन आणि विश्लेषण करू शकतो. त्यामुळेच प्राचीन संस्कृतींचे प्रत्येक इतिहासकाराचे आकलन आणि विश्लेषण भिन्न आहे. एकाच प्रकारच्या दृश्यातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. उदा. एखादे नवे स्थान पाहिले तर कोणाला चित्र काढावेसे वाटेल, कोणाला कविता ‘सुचेल’, कोणाच्या मनात तात्विक विचार येतील तर कोणाच्या मनात उदासीनता जन्माला येईल किंवा कोणाला गावे असेही वाटू शकेल. . प्रतिक्रिया एवढ्याच मर्यादित राहत नाहीत तर त्या अगणित प्रकारच्या संभावनांनी व्यापलेल्या असतात. माणूस इतिहास, वर्तमान आणि नजीकचे किंवा दूरचे भविष्य या बाबतीत शिकलेल्या, शिकवलेल्या, वाचलेल्या अथवा ऐकलेल्या विवेचनाला जसेच्या तसे स्वीकारत नाही तर त्याला स्वत:चे काहीतरी जोडत असतो. अगदी ईश्वर ही संकल्पना घेतली व ती बव्हंशी जगमान्य असली तरी प्रत्येकाच्या ईश्वरविषयक संकल्पना समान असल्याचे आढळून येणार नाही. मुळात मनुष्य हे जैविक उत्पादन असल्याने व मानवी मेंदूत दहा अब्जांपेक्षा अधिक न्यूरॉन्स आहेत. मुळात मानवी मेंदू कसे कार्य करतो हे अद्याप कोडेच राहिलेले आहे. अगदी भाषेच्या संदर्भातही मेंदूतील नेमके कोणते केंद्रक काम करते आणि कसे करते हेच माणसाला अद्याप उलगडले नसल्याने भाषेच्या जन्माचा आणि भाषा शिकण्याच्या कौशल्याची कार्यप्रणाली नेमकी कशी घडते हे अद्याप आपल्याला निश्चयाने माहित नाही.

या अल्प पार्श्वभूमीवर सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता बाल्यावस्थेतही नाही असे म्हणावे लागेल. स्वयंप्रेरणेने विचार करू शकणारे, संवेदना, अंतर्स्फुर्ती असू शकेल असे ए.आय. निर्माण होऊ शकेल काय? नवीन विचार, स्वप्ने पाहणे जमू शकेल काय? तो स्वत:च विशिष्ट उद्देश्य निर्माण करून स्वत:लाच त्या दिशेने विकसित करणारे कोडींग करू शकतो काय? कारण विकासासाठी दृष्टी लागते, दिशा लागते. या जैव प्रेरणा आहेत. त्या यांत्रिक अथवा कृत्रिम नसतात. तिला (सांगितले नसेल तर) विविध पर्यायांतून एकाची तारतम्याने विचार करून निवड करता येणेही शक्य नाही.

आजतरी ए.आय. माणसाचा सांगकाम्या चाकर आहे व ए.आय.चे प्रत्येक साधन (टूल) विशिष्ट हेतूंनी विकसित केलेले आहे. मुळात माहिती कशी पुरवली गेलेली आहे त्याप्रमाणेच ते वर्तन करेल. त्याला ‘स्व-आकलन-संवेदना’ हा गुणधर्म नसल्याने आकलन-निर्णय व त्याचे परिणाम याबाबत ए.आय. उदासीन असते. त्यात सध्याचे ए.आय. तुकड्या-तुकड्यात आणि मर्यादित हेतुकेंद्रीत आहे. त्याच्यात केली जाणारी अवाढव्य गुंतवणूक आणि परतावा यातील गुणोत्तराचा आज एक प्रश्न बनलेला आहे. अशा स्थितीत पुढची वाटचाल कशी होईल? माणसालाच रिप्लेस करणारी समग्र कृत्रिम बुद्धीमत्ता कधी अस्तित्वात येईल काय यावर आपण पुढील लेखात विचार करू.

-संजय सोनवणी  

कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत उतरण्याचे धोके...

  मागील लेखात आपण भविष्यात सर्व शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात गेली आणि त्यांनी शेतीचे पूर्ण नियंत्रण घेतले, तर त्याचे काय परिणाम होऊ श...