Sunday, January 8, 2017

प्रज्ञावंत घडवण्याची गरज!

Image result for intellectualism

कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! पिढीमागून पिढी असा शृंखलाबद्ध प्रवास मानवी समाज करत असतो. आई-वडिल, शिक्षक आणि समाज हे नव्या पिढीवर काहीना काही संस्कार करणारे घटक असतात. समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. अमेरिकेतील मुलगा जी स्वप्ने पाहिल ती स्वप्ने भारतातील मध्यमवर्गातील मुलगा पाहीलच असे नाही. किंबहुना अशीही स्वप्ने असू शकतात याची तो कल्पनाही करू शकणार नाही. शेवटी व्यवस्था स्वप्नांनाही बंदिस्त करते.

याकडे आपल्याला अत्यंत व्यापकपणे व अनेक अंगांनी पहावे लागेल. नवीन पिढी घडवणारा महत्वाचा घटक असतो व तो म्हणजे शिक्षण! विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण!  शिक्षण म्हणजे जुलमाचा रामराम नसते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:तच एक स्वतंत्र विश्व असते, व्यक्तिमत्व असते. बाह्य प्रभाव जेवढे व्यक्तिमत्व घडवायला कारण घडतात त्याहीपेक्षा त्याच्या आंतरिक प्रेरणा महत्वाच्या ठरतात. या आंतरिक प्रेरणा लहानपणी सुप्तावस्थेत असल्या तरी व्यवस्था अशी असावी लागते कि वाढत्या वयाबरोबर त्या प्रेरणांचे सुयोग्य प्रस्फुटन होत सामाजिक संरचनेत महत्वाची भर घालणारा नागरिक तयार व्हावा. 

पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. आमच्या द्रुष्टीने ’सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने ठराविक विषय लादत, सर्वात पास होणे बंधनकारक करत, ज्याला अधिक मार्क तो हुशार अशी धारणा बनवून बसलो आहोत.  थोडक्यात मार्क हाच आमचा गुणवत्तेचा एकमेव निकष आहे. मेरिट अथवा गुणवत्ताही आम्ही त्यावरच मोजतो. "९७% मिळूनही प्रवेश नाही आणि ’त्यांना’ ५०% ला प्रवेश..." अशा प्रकारच्या सामाजिक दुहीतही अडकतो. ही एक वंचना आहे हे मात्र आपण मुलात समजावून घेतलेलेच नाही. मुळात ९७% मिळाले म्हणून त्याचे गुणवत्ता जास्त आणि कमी मिळाले म्हणुन गुणवत्ताच कमी असे ठरवण्याचे साधनच अस्तित्वात नाही. ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतलेली फसगत आहे.

मुळात आपली शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. ’नैसर्गिक कल’ आणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संध्या आम्ही नाकारलेल्या आहेत. थोडक्यात प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या भावी पिढ्या कशा घडणार नाहीत याचीच पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. सरच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत. पुन्हा वर आम्ही भावी विकासाच्या गप्पा मारतो ही तर मोठी विसंगती आहे. खरे म्हणजे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांना खुरटवणारी, संकुचित करणारी, त्यांचे कुतुहल व स्वप्ने छाटणारी, कौशल्याचा अभाव असणारी पिढी घडवत आहोत हे आमच्या लक्षात कधी आले नाही. या नव्या पिढ्याही मग तशाच पुढच्या साचेबंद पिढ्या घडवत जाणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

आज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. येथे असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच!

मग आम्ही आमची नवीन पिढी स्बल, सक्षम व प्रज्ञावंत बनवू शकलो नाही तर आमचे भविष्यही तेवढेच मरगललेले राहणार यात शंका नाही. आम्ही सर्व प्रश्नांवर आंदोलने करत आलेलो आहे. पण आमच्याच भवितव्याचा कळीचा प्रश्न जो आहे त्याबाबत मात्र आम्ही थंडगार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या इंटरन्यशनल म्हणवणा-या शाळांत भरमसाठ पैसे भरून मुलाला प्रवेश मिळवला कि आपण कृतकृत्य झालो असेच सर्व पालकांना वाटते. मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कशात करियर करावे हेही एकुणातला ट्रेंड पाहून ठरवले जाते. पण ज्याला हे सारे करायच आहे त्यालाच विचारात घेतले जात नाही. मतामतांच्या गलबल्यात तो दुर्लक्षितच राहतो व शेवटी मिळेल ती वाट चालू लागतो. एका अर्थाने आम्ही परिस्थितीशरण पिढी बनवत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्या व्यवस्थेतच दोष आहेत हे मान्य करू. हा दोष आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतील भरकटलेल्या दिशेमुळे निर्माण झाला आहे हेही आपण स्विकारू. पण चुका कधी ना कधी दुरुस्त कराव्याच लागतात. एका रात्रीत व्यवस्था बदलत नाही हे मान्य केले तरी व्यवस्था बदलासाठी मानसिकता बनवणे व पुढाकार घेणारे काहीजण तरी पुढे येणे महत्वाचे असते. आणि येथे तर पुढाकार पालकांना घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी पालकांनाच शिक्षण म्हणजे नेमके काय याची जाण व भान देणे आवश्यक आहे. वर्तमानाचेच ते आव्हान आहे. 

आज आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. राष्ट्रवादही आपापले स्वरूप बदलतांना दिसत आहे त्यामुळे भविष्यातील जागतिकीकरण नेमके कसे असेल हेही आपल्याला अंदाजावे लागेल. जागतिक ज्ञान अशी संकल्पना असली तरी सर्वच ज्ञान जगातील सर्वांनाच उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक राष्ट्रे आपापली गुपिते जपत असतात. त्यामुळे इतरांनी विकसीत करावे व मग त्यापासून आपण शिकावे अशी योजना भविष्यात अस्तित्वात येईलच असे नाही. खरे तर ज्ञानावर समस्त मानवजातीचा अधिकार हवा. पण तसे वास्तव नाही. आणि आपली सुरुवात तर ज्ञान म्हणजे काय या प्राथमिक स्तरावरच घुटमळते आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे अजून अगणित नागरिकांना तर माहितच नाही.  ते माहित नसेल तर भविष्यातील ज्ञान-क्रांतीच्या दिशा कोणत्या असतील हे नेमके कसे समजणार? त्या शोधण्यासाठी आम्ही भारतीय कसा प्रयत्न करणार? आजही उच्चविद्याभुषित या संदर्भात गोंधळलेले दिसतात. सामान्यांची मग काय गत असणार? 

भविष्यातील बुद्धीवाद आज आहे तसा राहणार नाही. भविष्यातील सामाजिक व आर्थिक आव्हानेही वेगळी असतील. त्याची प्रारुपे बदलतील. प्रश्नांचे गुंतवळे वेगळ्या स्वरुपात सामोरे येतील. किंबहुना जीवनशैलीच अत्यंत वेगळी बनलेली असेल. पण ती कशी असेल हे ठरवण्याचीही शक्ती आम्ही प्रगल्भ पिढ्यांच्या अभावात घालवून बसलेलो असू. प्रगल्भ पिढी घडते ती बंधमुक्त शिक्षणातून. मानवी प्रेरणांना अवसर देणा-या खुल्या व्यवस्थेतून. आज आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागणार आहे तो शिक्षणाबाबत, तिच्या पद्धतीबाबत. कार्यक्षम अंमलबजावणीबाबत. पालक ते शिक्षक आणि सभोवतालची व्यवस्थाच सक्षम नवी पिढी बनवू शकते. आम्हाला केवळ साक्षर नकोत तर बौद्धिक झेपा घ्यायला निरंतर सज्ज अशा प्रगल्भ वाघांची पिढी घडवायची आहे. त्यातच आमच्या समाजाचे, राष्ट्राच उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल.

-संजय सोनवणी

(Published in Daily Sanchar, 8-1-2017)

2 comments:

  1. संजय सर , चांगले लिहिले आहे -अभिनंदन !
    चौथ्या पॅरीग्राफ मध्ये तिसऱ्या ओळीत "सरच प्रज्ञावंत होऊ लागले"या जागी "सर्वच प्रज्ञावंत"--- असे हवे -- अतिशय सोपे करून सांगता आपण - म.गांधींची धाटणी अशी होती !आपण मांडलेले प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत . आजची माध्यमे आणि सभोवारचा परिसर हे मनावर रोजरोज किती वारेमाप बोजा टाकत असतात . ( गडकरी आणि संभाजी ब्रिगेडचे उदाहरण अगदी जिवंत आहे आपण हिरीरीने सहभाग घेत खरेतर सर्व समाजासमोर आपण दिलेल्या प्रवेशाचे जाहीर वाचन करावे ही नम्र विनंती आहे - आज त्यांची भाषा तैलचित्र फाडण्याची आहे - कदाचित फाडलेही असेल आत्तापर्यंत ? सामान्य बाळबोध जीवनात हे माहीतही नसते की बरोबर काय आणि चूक काय ? संघ ज्याप्रमाणे मुस्लिम समाज हिंदूंवर कसा अन्याय करतो आहे आणि छुपा विस्तारवाद राबवत आहे असे विष कालवत असतात अगदी तसाच समांतर संभाजी ब्रिगेडचा हा कार्यक्रम आहे . आपणासारख्या तद्न्य लोकांनी समाजाच्या धुरीण लोकांना घेत संभाजी ब्रिगेडचा विरोध केला पाहिजे -हा जातीयवादाचा मुद्दा अजिबात नाही - पण समाजाला वेठीस धरण्याचा आहे !
    संघ परिवार आणि भाजप यांना तर आयता विषय मिळत आहे - मने दुखावली जाऊन त्यांच्या पारड्यात आयतेच झुकते माप पडणार आहे .)
    असो - थोडे विषयांतर झाले
    डॉ आंबेडकर १८९१ ते १९५६ आणि गडकरी १८८५ ते १९१९ असे समकालीन पाहिले आणि कायद्याचे त्यांचे अफाट ज्ञान पाहिले तर डॉक्टरांनी कधी गडकरींचा निषेध केला का ?
    तरुण पिढीपुढे आज जर असे विध्वंसक आदर्श ठेवले गेले तर काय होईल ?
    आज शिक्षण एकतर फक्त पदवी आणि आर्थिक यशाशी जोडले गेले आहे आणि आपली मुले इतर सामाजिक भान ठेवणे आवश्यकच मानत नाहीत. आदित्य ठाकरे आणि सेना यातही हाच प्रश्न आहे त्याच्या भोवती परप्रांतीयांचा गराडा आहे ही एकाच बातमी अनेक प्रश्न निर्माण करते आहे !
    सर, आपण धडाडीने पुण्यात घणाघाती भाषणे करत या मुद्याना हात घातला पाहिजे - आपण हे करू शकता !
    जावेद अख्तर यांनी परवा छान विवेचन केले " धार्म ही संग्रहालयात ठेवायची गोष्ट आहे "
    मग उरतात फक्त परंपरा ! आपला प्रत्येक सण हा देवतांशी निगडीत आहे - खरीखोटी विधाने करत त्या देवांना आपण म्हणता तसे वैदिकांनी दावणीस बांधले आहे - आणि अगदी मनापासून आपल्या आतल्या आवाजाला विचारले तर ?
    आजकाल कोणीही देव धर्म यावर विश्वास ठेवत नाही - पण तसे निःसंदिग्धपणे सांगतही नाही एकप्रकारे आपण खोटारडेपणे जगत आहोत ! तीच गोष्ट इतिहास आणि जातीपातीची !
    नुसता भ्रश्टाचार हा मुद्दा भारताच्या समोर नाही तर ही सामाजिक कीडही समूळ काढून टाकली पाहिजे - आजकाल बाळबोध रित्या समाजात संभाजी उद्यानात संभाजीचा पुतळाच नाही - काय हा अन्याय - असा विचार रुजवणे फारच सोपे आहे हेपण लक्षात असावे . स्त्रिया आणि तरुणांना हा विचार लगेच पटेल आणि खरोखर एकप्रकारे संगीत नाटकेच काळाच्या पडद्याआड जात असताना कोण हे गडकरी ? असे कॉन्व्हेंट च्या मुलांना आणि त्यांच्या परिवारात वाटणे अगदी सहज शक्य आहे - पण तीच गोष्ट राम मंदिराची झाली नाही - हेही लक्षात ठेवले पाहिजे -
    तसे पाहिले तर हा नियम राबवून शनिवारवाडा आणि परिसरात काका मला वाचावा , आणि गारदी- राघोबादादा , तसेच त्यांना मागे ओढणारी आनंदीबाई यांचा पुतळा उभारा आणि स्वराज्याला न्याय द्या असा हाकारा जर कोणी केला तर ते ऐतिहासिक सत्याला धरूनच असेल
    सर कराल का हे काम ?आमचा तुमच्यावर विश्वास आहे !
    धन्यवाद !
    या विषयावर अनंत लिहिता येईल पण तूर्तास इतकेच -

    ReplyDelete
  2. संजय सर ,
    डकरी पुतळा आणि त्यापुढील प्रज्ञावंत हा लेख विचारात घेतले तर , कुणीच जास्त प्रतिसाद दिलेला नाही , खरेतर धो धो पत्रांचा पाऊस पडेल असे वाटले होते , पण हाय !
    म्हणजे समाजाच्या काही वर्गाचा या घटनेला मूक पाठिंबा आहे का ???
    सर आपण लेख अगदी सुंदर लिहिला आहे , आपण त्यात अनेक मुद्दे अजून घालू शकता . लहान मुलात टापटीप हा मुद्दा फार महत्वाचा आहे -गरज सरो आणि वैद्य मरो ही वृत्ती इतकी बळावली आहे की रेकॉर्ड जपून ठेवणे आणि जागच्या जागी वस्तू ठेवणे हा जो संस्काराचा भाग आहे तो आज कुठे दिसतच नाही , त्यामुळे मुलांचीच गैरसोय होत असते - तुमच्या घरी प्रत्येकाने हे अनुभवलेत असेल !
    धर्म आणि वाद प्रतिवाद आणि धर्माचे रक्षण हे मुद्दे फारच गौण आहेत . समजा सर्व मुसलमान भारतातून निघून गेले तर भारतातील सर्व धार्मिक प्रश्न संपतील का ?अजिबात नाही , धर्म एक , पण मग प्रकरण जातीवर घसरेल इतकेच - त्यापेक्षा माणूस आणि त्याची सर्व तऱ्हेने उन्नती असे साधे सोपे ध्येय हवे - आता प्रश्न असा उभा राहतो - उन्नती म्हणजे काय ?
    प्रज्ञावंत घडवणे फारच गुंतागुंतीचे काम आहे .
    आज सर्व कौटुंबिक सुखाची- उन्नतीची व्याख्या ही आर्थिक यशाशी जोडली गेली आहे ग्रॅज्युएशन आणि लग्न त्यापुढे फ्लॅट खरेदी - एक कार आणि होणाऱ्या मुलाला कॉन्व्हेंट शिक्षण असे चाकोरीबद्ध जीवन समाज जगत आहे - त्यातच हा शिवाजी कोण हे गडकरी कोण ? मॅड लोक आहेत - रोज शिवाजी शिवाजी ओरडत असतात अशा गप्पा मारणारा आणि धन्य मानणारा वर्ग फार वेगाने तयार होतो आहे - आम्ही जणू असहायपणे इथे राहात आहोत , आमची खरी जागा परदेशातच आहे - पण ??? असे समजणारा वर्ग फक्त ब्राह्मणात नाही तर सर्व जातीत आहे .
    आणि एकीकडे संभाजी ब्रिगेड सारखे उन्मत्त लोक आहेत , ज्यांनी शिवाजी हा स्वतःची खाजगी प्रॉपर्टी करून टाकली आहे .
    खरेतर इतिहास इतका वैभवशाली आहे कि एकेक रत्न पाहिले तर आपल्याला आनंदच मिळत जातो . शिवाजी महाराज , आणि त्यांचे कार्य हा तर फारच थोर विषय आहे तो असा एका संघटनेने बंदिस्त करणे पापच आहे - आणि ते म्हणतील तेच अंतिम सत्य ही भूमिका तर लोकशाहीला मारकच आहे
    तुकाराम महाराज, रामशास्त्री प्रभुणे ज्ञानेश्वर , नामदेव असे एकापेक्षा एक आपल्याकडे प्रज्ञावंत होऊन गेले . त्यांनी रोखठोक सवाल केले आणि सत्याची कास धरली -पण हे कोणी समजून घेत नाही ! अरेरे - काय हे आपले दुर्दैव ! ! ! आपल्या लेखाना कुणीच प्रतिक्रिया देत नाही ??

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...