Thursday, January 23, 2025

कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेले भय किती खरे?

 



मानवी इतिहासात पूर्ण क्रांती घडवणारे अत्यंत महत्वाचे शोध लागले आहेत. शेतीच्या शोधाने मानवी जीवनात क्रांतीकारी बदल घडवला होता. भटका समाज त्यामुळे स्थिर होऊ लागला. पण हा बदल पचवणे ज्यांना अन्नाच्या शोधासाठी भटकंती करायची हजारो वर्ष सवय होती त्यांना केवढे जड गेले असणार याची आपण कल्पना करू शकतो. पण बदल न स्वीकाणारे मागे फेकले जातात. शेतीमुळे मानवी संस्कृती बहरली. कोणतेही नवे तंत्रज्ञान आपल्यासोबत काही साईड इफेक्ट्सही आणत असते. शेतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचे काय करायचे हा प्रश्न जसा उपस्थित झाला व त्यातून व्यापाराचा शोध लावला गेला असला तरी अतिरिक्त शेतीउत्पादन साठवण्याच्या पद्धतीमुळे अनेक नव्या रोगांचा जन्म झाला. या रोगांसाठी प्रतिकारक्षमता विकसित होण्यास अनेक पिढ्या गेल्या, यात कोट्यावधी लोकांचे मृत्यूही झाले. व्यापारामुळे रोगरायाही दूर दूर पर्यंत पसरवण्यास हातभार लागला. ज्या जनजाती या शेतीप्रधान मानवापासून दूर राहून आदिम जीवन जगत होत्या त्या जेंव्हाही या कृषीमानवाच्या साहचर्यात गेल्या तेंव्हा ते या जीवाणू-विषाणूशी कधी लढलेच नसल्यामुळे त्यांचे शिरकाण झाले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात युरोपियन गेले तेच ही "जैविक अस्त्रे" सोबत घेऊन आणि जरी त्यांची स्वत:ची प्रतिकार शक्ती नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेली असली तरी तेथील मूळ रहिवाशांचे तसे नव्हते. त्यामुळे एकार्थाने हा वंशसंहारच होता. त्याच वेळीस मानवी भाषेत बहुरंगी भर पडत गेली. दैवत संकल्पना ते नितीतत्वांमध्ये अमुलाग्र बदल झाला. ही मोठी उलथापालथ होती. 


त्यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे यंत्रांचा. यंत्रयुगाने पारंपारिक व्यवसाय-धंद्यांची वाताहत केली. यंत्रयुगाला विरोध करणारे मानवशास्त्रज्ञही वाढले आणि ते शाश्वत जीवनपद्धतीचा पुरस्कार करू लागले. अशाही लोकांनी अपार प्रसिद्धी मिळवली असली तरी यंत्रयुगाने मानवी जीवनाला व्यापून टाकले. अर्थव्यवस्थेचे नियम बदलले. या युगाला आनुषंगिक नवी नितीशास्त्रे जन्माला आली. जगण्याच्या पद्धती बदलल्या. एका धावेमाःगुण दुसर्या अधिक जीवघेण्या दहावी सुरु झाल्या. पण यंत्रयुग टाळता आले नाही कारत त्यात तोट्यांपेक्षा फायदेच अधिक होते. जगणे अधिक सोयीस्कर झाले. अर्थात विषमतेचाही विस्फोट झाला. ती कशे टाळता येईल याविषयी चिंतन झाले असले तरी ते सरकारी पातळीवरील उपाययोजना एवढ्यापुरतेच मार्त्याडीत राहिले. जीवनाचे प्रश्न बदलले. नंतर संगणक युग आले. त्यानेही भीतीची लाट निर्माण केली. रोजगार जातील या भीतीने मानवजाताच गळाठून गेली. पण तसे झाले नाही. उलट लाखो नव्या नोकऱ्या जन्माला आल्या. पुन्हा समाजजीवनात नवी उलथापालथ झाली. मानवी नाते संबंध बदलू लागले. जग जवळ येऊ लागले पण मानवी मने मात्र दूर गेली असे या स्थितीचे वर्णन केले जाते. 


आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय) आणि यंत्रमानव (रोबोटिक्स) तंत्रज्ञानाने जगातील असंख्य लोकांची झोप उडवलेली आहे. ही नवी क्रांती आहे असे मानले जाते. उद्याच्या जागातील सामाजिक आणि अर्थजीवनावर याचे काय विपरीत परिणाम होणार आहेत हे सांगू पाहणा-या विचारवंतांची दाटी सध्या वाढलेली दिसते. अलीकडेच लंडन येथे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात शिखर परिषद झाली व दोन दिवसाच्या चर्चेनंतर ए.आय. मध्ये गंभीर, विनाशक आणि नुकसानदायक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे उपस्थित होऊ शकतात कारण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात अशा अपायकारक संभावना आहेत असे घोषित केले गेले. या घोषणापत्रावर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीनसारख्या अठ्ठाविस देशांनी सह्या केल्या असून नवीन निर्बंधांना तयार करून लागू करण्याबाबत सहमती दर्शवलेली आहे.


कोणतेही नवे तंत्रज्ञान आले कि त्याच्या दुरुपयोगाबद्दल शंका घेऊन त्याला घाबरून जाणे हे आपल्या जगाला नवे नाही. समाजविघातक प्रवृत्तींची जगात वानवा नाही हे तर अजून एक दुर्दैवी वास्तव आहे. दहशतवादी संघटनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विनाशक गोष्टी करवू शकतात. विकृतबुद्धी लोक ए.आय. वापरून बनावट व्हिडिओ बनवून बेमालूमपणे ते खरेच आहेत असे वाटतील या पद्धतीने प्रसारित करून कोणालाही बदनाम करू शकतात. सायबर गुन्हेगारी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन आर्थिक ते खाजगी माहितीचा अपहार करू शकतात. आधीही हे होतच होते पण आता त्याचा वेग वाढेल अशी चिन्हेही दिसू लागलेली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता खरे तर अजून बाल्यावस्थेत आहे, पण तिच्यात प्रतिक्षणी वेगाने सुधारणा केली जाते आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचे वरील तोटे जरी असले तरी कामाच्या व निर्णयक्षमतेच्या वेगात व अचूक हाताळणीच्या बाबतीत ए. आय. अत्यंत यशस्वी ठरत असल्याने ते बलाढ्य कॉर्पोरेटसाठी आणि साध्यासोप्या दैनंदिन सोयींसाठी सर्वसामान्यांना फायद्याचे ठरते आहे हेही एक वास्तव आहे.


मनुष्य ज्या गोष्टींना सरावलेला असतो अशाच वैचारिक पर्यावरणात राहणे पसंत करतो. नवे ज्ञान हे जुने परिचित पर्यावरण नष्ट करत असल्याने त्याची भिती वाटणेही स्वाभाविक आहे. त्या भीतीत फार काही वावगे असते असेही नाही. नव्या ज्ञानाला जग नेहमीच घाबरते तर चतुर लोक त्याचा आधी फायदा घेऊन प्रगती करतात. आता “माणसाचे काय?” हा गंभीर प्रश्न जगभर चर्चेत नेहमीच येत असतो. आता तर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाला आव्हान द्यायला उभे ठाकलेले आहेत. उद्या आताचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन क्वांटम प्रणालीवर चालणारे संगणक येतील तेंव्हा त्यांच्या अचाट क्षमतेमुळे आताचे संगणक बाद होऊन नवी अतिशक्तीशाली प्रणाली येईल तेव्हाही आज होते आहे तशीच चर्चा हिरीरीने केली जाईल. सामाजिक आणि नैतिक प्रश्न उठवले जातील यात शंका नाही.

पण मानवी प्रवृत्ती हीच नवेनवे शोध घेण्याची आहे. त्याचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. आज आहे त्यापेक्षा नवे, वेगळे आणि अधिक क्षमतेचे कसे निर्माण करायचे हा ध्यास त्याला नैसर्गिकपणे जडलेला आहे. जुनी नीती रद्दबातल ठरवून नवी नीतीमुल्ये जन्माला घालणेही त्यातच आले. 


माणसाला अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ आणि कल्पक बनवणे हे प्रत्येक नव्या तंत्रद्न्यानाचे उद्दिष्ट असते. मानवी जीवन सुखकर व्हावे व साधी दैनंदिन कामे करण्यात वेळ न घालवता अधिकाधिक सर्जनशील कार्याकडे मानव जातीला कसे वळवता येईल हे पाहणे तंत्रज्ञानाचे ध्येय असते. आताची कृत्रिम बुद्धीमत्ता नेमकी काय आहे आणि मग तिचे भविष्य काय असणार आहे याचा विचार आपण पुढील लेखात करूयात. हे तंत्रज्ञान माणसाला खरेच घातक ठरणार आहे काय? तिच्यात असलेली सामर्थ्ये आणि मर्यादा यावर चर्चा करूयात. 


-संजय सोनवणी

Tuesday, January 21, 2025

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

 

जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीयांना जनानखान्यामध्ये टाकले जात असल्याच्या समजुतीने जनानखाना या समाजव्यवस्थेतील एका गूढ व्यवस्थेला तिरस्कारानेही पाहिले जात असे हेही आपल्याला माहित आहे. अंत:पूर हा शब्द समान अर्थाचा असला तरी तो मात्र सोज्वळ वाटत असल्याचेही आपल्याला दिसते. जनानखाने जिंवा हरम हे मुस्लिमांचे असल्याने व त्यांनी जिंकलेल्या हिंदू राजांची संख्या जास्त असल्याने या हरलेल्या हिंदू राजांच्या बायका, पोरी ते त्यांच्या परिवारातील स्त्रिया जनानखान्यात टाकल्या जात असत आणि त्यांच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केले जात असत अशी बव्हंशी मान्यता असल्याने या संस्थेकडे तिरस्काराने पाहिले जाते असे आपल्याला साधारणपणे म्हणता येईल. पण या समजुतीपार जाऊन पाहिले तर वेगळेच दर्शन घडेल आणि प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत या संस्थेने जवळपास जगभर राज्य केल्याचे आपल्या लक्षात येईल. वैदिक व हिंदू हेही ही संस्था “अंत:पूर” या नावाखाली चालवत होते याची वर्णने आपल्याला रामायण-महाभारतात तर मिळतातच पण कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही या व्यवस्थेचे निर्देश मिळतात.  राजघराणी असोत, पुरोहित असोत कि त्यांचे अनुकरण करणारे आणि स्वत:ला वरिष्ठ समजणारे समाजघटक असोत, प्रतिष्ठेसाठी आणि स्त्रियांवरील अधिकार जतन करण्यासाठी ही व्यवस्था पाळली असल्याचे आपल्याला सर्वत्र दिसेल. जनानखान्यांतील घटनांवर अनेक काल्पनिक कथा – कादंब-याही लिहिल्या गेलेल्या आहेत.

या व्यवस्थेचा आढावा घेण्याआधी अंत:पूर या वैदिक/हिंदू व्यवस्थेवर आपण एक नजर टाकू. त्यानंतर मुस्लिमांचे आणि विशेष करून मोगलांचे जनानखाने ही व्यवस्था नेमकी काय होती, त्यातील स्त्रियांचे जगणे कसे होते, कट-कारस्थानांचे ते केंद्रही कसे बने इत्यादीची आपण सविस्तर चर्चा करू. मोगल जनानखान्यांची सविस्तर चर्चा अशासाठी कि त्याबद्दल समकालीन इतिहासकारांनी सविस्तर लिहुन ठेवले आहे. तसे मात्र हिंदू रजवाडे-सरदार यांच्या राणीवसा किंवा जनानखान्यांबाबत तेवढे  लिहिलेले दिसत नाही. किंबहुना हिंदू राजे आणि सरदारही अनेक विवाह तर करतच असत पण अनेक अंगवस्त्रेही ठेवत असत. या स्त्रियांची व्यवस्था खास सुरक्षित भागात असे  आणि तेही कटाक्षाने या स्त्रीयांना शक्य तेवढ्या बंदोबस्तात ठेवत असत. पण त्याबाबत मात्र फारसे लेखन झालेले नाही. त्याचा केवळ पुसटश्या संदर्भावरून अंदाज बांधावा लागतो. असे असले तरी अंत:पूर, रानीवसे किंवा जनानखान्यातील किरकोळ फरक सोडता भेद दिसून येत नाही. कारण मुख्य हेतू घराण्यातील स्त्रीयांना आणि मुलींना समाजापासून, कुदृष्टीपासून दूर ठेवत सन्मान जपणे हा तर असेः पण या स्त्रियांनी परपुरुषाकडे आकृष्ट होऊन लैंगिक वा प्रेमसंबंधात गुरफटू नये हाही एक उद्देश असे. सर्वसामान्यही माजघराचा वापर तेवढ्यासाठीच करत असत हेही आपल्याला दिसते. एनकेन प्रकारेन स्त्रीयांना बंदिस्त करून टाकणे हाच या प्रथेचा उद्देश्य होता. असे म्हणतात कि जनानखाने स्त्रियांच्या मूकअश्रू आणि वेदनांचे भंडार आहेत यातही अतिशयोक्ती नसली तरी बुद्धीमान आणि काही कुटील स्त्रियांनी त्या बंदिस्तपणावरही मात करत इतिहास घडवला असल्याचे आपल्याला दिसून येते.

कौटिल्याने अर्थशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्याला हिंदू/वैदिक राजांच्या अंत:पुराची कल्पना येते. राजमहालात राजस्त्रीयांसाठी, राजकन्यांसाठी आणि राजपुत्रांसाठी वेगळे कक्ष असावेत आणि राजाचे शयनगृह स्वतंत्र आणि संरक्षित असले पाहिजे असे कौटिल्य म्हणतो. अंत:पुरातील स्त्रियांनी बाहेरच्या जगाशी संबंध ठेवता कामा नये असेही निर्देश तो देतो. अंत:पुराचे रक्षक स्त्रिया, तृतीय पंथी (हिजडे, क्लीब, किन्नर), बुटके किंवा कुबडे असले पाहिजेत. राजाच्या स्नानापासून ते वेष करेपर्यंत स्त्री सेविकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या कशा निवडल्या पाहिजेत याचे विवेचन करून कौटिल्य म्हणतो कि अंत:पुरात कोणतेही शस्त्र किंवा विषारी वस्तू येणार नाहीत याची काळजी राजाने घ्यायला हवी. याच अध्यायात कौटिल्य म्हणतो कि राण्यांनी किंवा नजीकच्या नातेवाईकांनी राजाचा खून केल्याची उदाहरणे आहेत. उदा. भद्राश्व नावाचा राजा राणीच्या महालात असताना तेथे बिछान्याखाली लपून बसलेल्या राजाच्याच भावाने खून केला होता. करुश नामक राजाचा खून अंत:पुरातच त्याच्या मुलाने केला होता तर अनेक राण्यांनीच आपल्या पतीचा खून विष घालून केला होता. राणीकडून कसलाही धोका नाही याची विश्वासू सेविकांकडून खात्री करून घेतल्याशिवाय राजाने कोणत्याही राणीच्या शयनगृहात जाता कामा नये. राजाने आपल्या कोनात्याही राणीला कोणी तपस्वी, जादुगार किवा बाहेरच्या स्त्रीयांनाही भेटू देऊ नये. अंत:पुरातील राणीच्या (आणि स्वत:च्या सेवेसाठी) ठेवलेल्या स्त्रिया (दासी-बटकीणी) या नेहमीच स्वच्छ आणि उत्तम वेशभूषा करणा-या असल्या पाहिजेत. वयाच्या ८० वर्ष उलटलेल्या स्त्री-पुरुष सेवकांनी  अंत:पुरातील स्त्रिया व राजस्त्रियांची निष्ठा वारंवार तपासून पाहिली पाहिजे. असे बरेच नियम सांगून कौटिल्य म्हणतो कि राणीशी जर कोणी अनैतिक संबंध ठेवतो आहे असे लक्षात आले तर त्याची शिक्षा म्हणजे त्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारणे. (अर्थशास्त्र- १.२०-२१)

कौटिल्याने हे कायदे अथवा नियम बनवले ते इसवी सन तिस-या शतकातील जेही वैदिक सामाजिक वास्तव होते त्याला अनुलक्षून हे उघड आहे. कायदे काल्पनिक अपराध किंवा वर्तनाबद्दल निर्माण होत नाहीत. राजा किंवा कर्तबगार पुरुषाचे शत्रू अनेकदा घरातूनच निर्माण होत असत हेही एक जगभरचे वास्तव आहे. त्यामागे स्त्रियांच्या चिरडल्या गेलेल्या आकांक्षा आणि स्वप्ने नाहीत असे म्हणता येणे अवघड आहे. अंत:पुरात काय काय कारस्थाने घडली याची अनेक उदाहरणे रामायण आणि महाभारताने तसेच अनेक पौराणिक कथांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेच. असे असले तरी अंत:पुरातील स्त्रीयांचे जगणे, त्यांच्या व्यथावेदना प्राकृत साहित्य वगळता ऐतिहासिक लेखनातून फारशा उजेडात आलेल्या दिसत नाहीत. हिंदू समाज स्त्रियांबद्दल अधिक उदार असल्याने राजस्त्रिया असोत कि सामान्य स्त्रिया, त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळत असेल याचे दर्शन आपल्याला तरंगवइ किंवा लिलावइसारख्या मराठी प्राकृतातील प्रेमाख्यानांतून मिळते. कौटिल्य मुख्यता: वैदिक अंत:पूर संकल्पनेबद्दल बोलत असल्याने स्वाभाविकच त्याच्या लेखनात स्त्रीयांना दुय्यमस्थान आहे आणि टोळीजीवनातून आलेल्या धर्मांबाबत ते स्वाभाविक आहे.  पण जनाखान्यासारखीच अंत:पूर ही वैदिक संस्था भारतात अस्तित्वात होती आणि पुढील चर्चा पाहता दोन्हीतील गुण-दोष यात विशेष फरक नव्हता हे वास्तव आपल्या लक्षात येईल. कित्तेक कटकारस्थाने, प्रेमप्रकरणे, हत्या, सत्तेच्या उलथापालथीची नाट्ये या तथाकथित बंदिस्त जागी घडली असतील याची कल्पनाही आपल्याला येणे शक्य नाही. आणि दोन्ही प्रथांचा उगम स्त्रीविषयकच्या स्वामित्वभावात आणि त्यांना केवळ भोगवस्तू मानण्याची प्रवृत्तीत आहे हे आपल्या लक्षात येईल.

 हरम अथवा जनानखाना

हरम म्हणजे असे राखीव क्षेत्र जेथे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश वर्जित असेल. हरममध्ये विवाहित स्त्रिया, विधवा, दासी, नर्तकी, गायिका, धर्मशिक्षिका, रक्षिका व तृतीयपंथी रक्षक व अधिकारी यांचा समावेश असे. बाहेरच्या व्यक्तींना (विशेषता: पुरुषांना) तेथे प्रवेश निषिद्ध असे. स्त्रिया मनात येईल तेव्हा बाहेर जाऊ शकत नसत आणि अनुमतीने गेल्या तरी त्यांना बाहेर पडतांना पडदा अनिवार्य असे. पालखी किंवा हत्तीवारीत पडदेबंद अंबारीत त्या बसत. जनानखान्यात त्यांचे आयुष्य हे आरामदायक असे. त्यांच्या सुखसोयींची दर्जाप्रमाणे विपुल व्यवस्था असे. जनानखाण्यातील स्त्रीयांना दर्जाप्रमाणे स्वतंत्र महाल दिले जात. ते सुशोभित असत. जनानखान्याचा भाग मुळात स्वतंत्र निर्माण केला जात असे जेथे बागाही असत. मोगल हरममध्ये स्त्रियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक खाती असत.  त्यांना भोजन शाही बावर्चीखान्यातून पुरवले जाई. शाही खजान्यातून यासाठी पैसे पुरवले जात. उपलब्ध नोंदीनुसार मोगल बादशहांच्या हरमच्या भोजन व्यवस्थेसाठी रोज एक हजार रुपये खर्च केले जात. विविध देशातील स्वयंपाकी बावर्चीखान्यात तैनात असत अशी माहिती अबूल फजल देतो. बादशहाही राजधानीत असेल तेव्हा आपले भोजन हरममध्येच करत असत. पाणी आणि मद्यादी पेये पुरवण्यासाठीही खास खाते निर्माण केलेले असे. त्यांना किमती वस्त्रे व अलंकारांचीही ददात नसे. हरमला लागुनच बाजार, शाळा, खेळाची मैदाने आणि मेवा-मिठाईची दुकानेही असत. या सर्वांची व्यवस्था कठोर नियमांनी चालवली जाई. सम्राटाची आई किंवा लाडकी बेगम जनानखान्याच्या व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी असे तर सम्राटाच्या रखेल्या या दुय्यम स्थानावर असत. अर्थात सेविका आणि हिजडे हे कनिष्ठ स्थानावर असले तरी काही हिजड्यांनी बादशहावरही आपला प्रभाव टाकून राजकीय वर्चस्व स्थापित केले असल्याचे आपल्याला दिसते. बादशाहा जननखान्यात येई तेव्हा त्याच्या भोवती नपुसक रक्षकांचे कडे असे. 

मोहंमदशाह रंगीला या मोगल बादशहाच्या जनानखान्याच्या मुख्य रक्षक असलेल्या जावेदखान या हिजड्याने आपल्या हेरगिरीच्या आणि पराक्रमाच्या बळावर एवढे सामर्थ्य प्राप्त केले होते कि त्याने शेवटी सफदरजंग या पातशाहीच्या वजीराला आव्हान दिले होते आणि वजीरपदावर आपला दावा ठोकला होता. राजमाता उधमबाई त्याच्या उत्कर्शामागे होती असेही म्हटले जाते. उधमबाई ही नर्तकी होती पण मोहंमदशाह रंगीलाने तिच्याशी विवाह केला होता. त्याचा मृत्यू १७४८ साली अचानक आजारी पडून झाला. त्याच्या मृत्युनंतर अह्मद्शहा पातशहा बनला आणि जावेदखानचा राजकीय उत्कर्ष सुरु झाला. उधमबाईच्या दबावामुळे त्याला नबाबबहादूर हे पूर्वी कोणाला न मिळालेली पदवी तर मिळालीच पण सहा हजाराची मनसबदारीही मिळाली. त्याची मनमानीही सुरु झाले. वजीर सफदरजंगाशी पंगा घेतल्याने त्याची परिणती अशी झाली कि ६ सप्टेंबर १७५२ रोजी त्याला चर्चेसाठी बोलावून त्याचा खून करण्यात आला आणि त्याचे प्रेत यमुनातीरी फेकून देण्यात आले. मोहंमद शहाच्या अचानक आजारी पडण्यामागे त्याचा किती हात होता हे आज आपल्याला माहित नसले तरी जनानखान्यात चालत असणा-या कटकारस्थाने आणि प्रेमप्रकरणांचा राजकारणावर किती प्रभाव पडे याचे दिग्दर्शन यातून होईल जावेदखान आणि उधमबाई यांच्यातील प्रेमसंबंधाची चर्चा अनेक काळ दिल्लीत होत राहिली होती असे इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात.

जनानखान्यात फक्त स्त्रिया राहत नसत. गर्भवतींची प्रसृतीही येथेच केली जाई. पुरुष अपत्ये वयात येईपर्यंत येथेच वाढत. मनुचीच्या म्हणण्याप्रमाणे बादशहाच्या जनानखान्यात अक्षरश: हजारो स्त्रिया असत. त्यात अनेक वंशांच्या मुस्लीम स्त्रिया तर असतच पण राजपूत आणि ख्रिश्चन स्त्रियाही असत. बाबर आणि हुमायूनचा जनानखाना तुलनेने छोटाच म्हणावा लागेल कारण अकबराच्या जनानखान्यात पाच हजार स्त्रिया होत्या. जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेबचा जनानखानाही असाच मोठा होता. याचे कारण या सम्राटांनी विस्तृत प्रदेश जिंकून तर घेतलेच पण जिंकलेल्या सत्तांशी राजकीय संबंध ठेवण्यासाठी कधी खुशीने किंवा कधी दबावाने त्यांच्या कन्यांना आपल्या जनानखान्यात स्थान दिल्याने ही संख्या वाढणे स्वाभाविक होते.

भारतात सम्राट अकबराने हरम व्यवस्थेला संस्थात्मक दर्जा दिला असे मानले जाते. त्यानेच जनानखान्यातील स्त्रिया, नर्तकी, दासी, महिला अथवा ख्वाजा (हिजडे-तृतीय पंथी) यांची कर्तव्ये आणि वेतन याबाबत रीतसर आखणी केली. पण ही व्यवस्था त्याहीपेक्षा प्राचीन आहे. गुलबदन बेगम या हुमायूनच्या बहिणीने लिहिलेल्या ‘हुमायूननामा’ या चरित्रपर ग्रंथात हरम (जनानखाना) व्यवस्थेचे व्यापक रूप आपल्याला दिसून येते. या व्यवस्थेत बादशहाची व्यक्तिगत सुरक्षा जशी महत्वाची होती तेवढीच, किंवा त्यापेक्षा जास्त, जनानखान्यातील स्त्रियांनी परपुरुषांच्या संपर्कात येऊ नये यासाठी होती. आणि असे सर्व कडेकोट बंदोबस्त असले तरी काहीतरी क्लुप्ती शोधून बाहेरचे पुरुष आणले जात तर काही प्रेमापोटी आत येत. असे कोणी आगंतुक सापडले तर त्याला तेथीलच भूमिगत फाशीघरात फाशी देवून मारले जाई व त्याचे प्रेत बाहेर फेकले जाई. याबद्दल एक कथा अशी आहे कि औरंगजेबाची छोटी बहिण रोषणआरा बाहेरच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. तिने जनानखान्यातील रक्षक हिजड्यांना पैसे देऊन वश करून घेतले आणि त्याला गुप्तपणे हरममध्ये आणले. काही दिवस त्याच्यासोबत काढल्यावर तिने आपल्या दासींना त्याला हरमबाहेर घेऊन जायला सांगितले, पण दासी घाबरल्या आणि त्याला एका अंधारी खोलीत सोडून पळून गेल्या, सकाळी त्याला कैद केले गेले. तो तरुण खोटे बोलला कि तो तटाच्या भिंतीवर चढून शाही महालाकडे जाणार होता. औरंगजेबाने त्याला म्हंटले कि तू जसा आला तसा त्याच मार्गाने परत जा. तो तरुण परत जाऊ लागला पण जसा तो तटावर आला तसे त्याला हिजड्यांनी साठ फुट उंचीवरून खाली फेकून दिले. त्यात त्याचा अंत झाला.

बर्नियर व मनुचीने वैद्य म्हणून जनानखान्याला भेटी दिल्या आहेत व त्यांनी जे पाहिले त्याचे वर्णन करून ठेवले आहे. त्यावरून जनानखान्यातील विलासी जीवनाची आपल्याला कल्पना येते.  

हरममधील स्त्रीयांना बव्हंशी जीवन हरमच्या सीमांच्या आतच घालवावे लागे त्यामुळे त्यांच्या वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाच्या अनेक व्यवस्था करून दिल्या जात असत. त्या वेळ घालवायच्या त्या आपले सौंदर्य सजवण्यावर तर संगीत ऐकणे वा नृत्य पाहणे यात किंवा मजेशीर खेळ खेळण्यात. त्यांना वाचायला पुस्तकेही उपलब्ध करून दिली जात. आजारी स्त्रीयांना बिमारखान्यात पाठवले जाई. हरममधील स्त्रियांनी बरेच लेखनही केलेले आहे. गुलबदन बेगम (हुमायूनची बहीण) हिने लिहिलेले हुमायूननामा हे पुस्तक प्रसिद्ध आहेच. पण साधारणपणे मोगल स्त्रियांचे आयुष्य बादशहाच्या जीवनाशी बांधलेले असे. बादशहाची आपल्यावरील मर्जी कशी वाढेल यासाठी सतत सुप्त स्पर्धा सुरु असे. राजकीय महत्व आणि आर्थिक लाभ यामागील महत्वाचे कारण असे. अनेक बेगमा व्यापार करत. त्यांच्या जहागिरी सांभाळत. काही तर विदेश व्यापारही करत. त्यातून मिळणा-या धनावर त्यांचाच अधिकार असल्याने त्यांची त्यासाठी अर्थातच मोठी चढाओढ चालू असे. आपापसातील मत्सराला त्यामुळे उधाण येत असले तरी ते उघड करण्यास मात्र बंदी होती. बादशहाला गादीचा वारस सर्वात आधी देण्याची चढाओढ सुरु असे कारण अशा बेगमेला किंवा राणीला सर्वाधिक महत्व प्राप्त होत असे. यामुळे एखादी सवत सर्वात आधी गरोदर आहे हे लक्षात आले कि तिचा काही काही-न-काही औषध नकळत देऊन गर्भपात घडवन्याचीही अनेक प्रकाराने घडत, वैदू/हकीम मंडळी सज्जड मोबदल्यात ही कामे करतही. त्यामुळे वरकरणी खेळकर वातावरण असले तरी सा-या एकमेकांकडे संशयाने पाहत आणि होता होईल तेवढी सावधगिरी बाळगत. त्या अर्थाने जनानखाण्यातील जीवन कितीही विलासी व खेळकर वाटले तरी प्रत्यक्षात ते जीवाच्या भीतीच्या सावटाखाली असे.

एखादीला अपत्यच नसल्यास तिच्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाणे स्वाभाविक असले तरी अशा अपत्यहीन स्त्रीयांना अन्य प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीच्या अपत्याचे संगोपन करण्याचे समाधान मात्र मिळू दिले जात असे. उदा. महम बेगम ही बाबरची लाडकी बेगम होती. तिने हुमायूनला जन्म दिल्यानंतर तिची चर अपत्ये पाठोपाठ वारली, तेव्हा तिच्याकडे अन्य बेगम, दिलदार बेगमची, हिंदाल आणि गुलबदन ही अपत्ये संगोपनासाठी सोपवण्यात आली. अकबराची पहिली बायको रुकय्या सुलतान बेगम ही अपत्यहीन होती. त्यामुळे तिला राजपुत्र सलीमचा पहिला पुत्र खुर्रम हा संगोपनासाठी सोपवला गेला होता व तिने त्याला प्रचंड प्रेमाने वाढवले असे जहांगीर आपल्या आठवणींत लिहितो. अशी अनेक उदाहरणे मोगल घराण्यात दाखवता येतील.

मोगल सम्राट आपल्या आयांचा (सख्खी आणि सावत्र) खूप सन्मान करत असत असे बाबरनामा आणि हुमायूननामावरून दिसते. अबुल फजलने लिहिलेय कि एकदा सम्राट अकबरची आई लाहोर ते आग्रा असा प्रवास करत होती तेव्हा अकबरानेही तिच्या सोबत नुसता प्रवास केला नाही तर तिच्या पालखीलाही वाहायचे काम केले. त्यांनी एखाद्या वास्तूचे बांधकाम करायचे ठरवले तरी बादशाहा त्याला विरोध न करता शक्य तेवढी मदतच करत असत. गुलबदन बेगम आपल्या हुमायूननाम्यात बादशहाच्या आया, आत्या, बहिणी, यांना किती प्रेम दिले जात होते याचे भावपूर्ण वर्णन केले आहे. बाबरची सर्वाधिक श्रद्धा होती ती त्याची थोरली बहिण ख्वानजादा बेगमवर. ख्वानजादानेही भावासाठी अनेक संकटे झेलली. टोळी जीवनातून हे तुर्कीक मोगल आलेले असल्याने परिवार हा त्यांच्या सर्वात अधिक आस्थेचा विषय होता. हरममध्ये त्याच आस्थेचे पालन केले जात असे. म्हणजे, स्त्रीयांना समाजात दुय्यम स्थान असले तरी मोगल पातशहा सर्वोच्च सन्मानाचे स्थान देत. त्यांच्या सर्व इच्छा पुरवल्या जात. उदा. शहाजहानचे आपली थोरली मुलगी जहानआरा हिच्यावरील प्रेम जसे इतिहासप्रसिद्ध आहे तसेच औरंगजेबाचे झेबुन्निसावरचे. अर्थात झेबुन्निसा आपल्या बागी पुत्र अकबराच्या बंडात सामील आहे हे कळताच त्याने तिला निर्दयपणे कैदेत टाकून दिले.  झेबुन्निसाही उत्कृष्ठ कवी होती.

हरममधील कर्मचारी वर्गाला त्यांची कर्तव्ये आधीच निश्चित करून दिली जात असत. या कर्मचा-यांना त्यांच्या हुद्द्यानुसार मासिक दोन रुपये ते एक हजार रुपये एवढे वेतन दिले जाई. अर्थात त्यांच्यावर कडक बंधने असत. त्यांच्यात हेरही असून ते ती माहिती बादशहापर्यंत पोचवायचे काम करत असत. जनानखाने हे कटकारस्थानांचे अनेकदा केंद्र असल्याने ही व्यवस्था करणे बादशहाला अत्यावश्यक वाटणे स्वाभाविक आहे.

मोगल राजवटीच्या प्रभावामुळे हिंदू संस्थानिक व सरदारही आपल्या अंत:पुराची व्यवस्था मोगल शैलीत करू लागले. किंबहुना जनानखाना केवढा यावरून प्रतिष्ठा ठरत असल्याने राजकीय हितसंबंधाच्या नावाखाली अनेक विवाह करणे व जनानखान्यात रखेल्यांची संख्या वाढवत नेणे अनेक राजांना अभिमानास्पद वाटू लागले होते. मोगल बादशहाप्रमाणे ते युद्धावरही जातांना आपला जनानखाना किंवा राणीवसा सोबत घेऊन जाणे ही जशी प्रतिष्ठेची बाब बनली. प्रिय राण्यांना मोगल बादशहा किंवा सरदारांप्रमाणे जहागिरी देणे, उत्पन्नासाठी गावे नेमून देणे हे प्रकार तर सर्रास होते. अनेक राण्यांनी/बेगमांनी आपली संपत्ती या मार्गाने वाढवलेली आहे. उदाहणार्थ सुरत या सर्वात श्रीमंत बंदराचे उत्पन्न बादशहा शहाजहानने आपली कन्या जहांआराला पानसुपारीच्या खर्चासाठी नेमून दिलेले होते असे मनुची सांगतो. तो पुढे म्हणतो कि बेगमांना रोखीच्या स्वरूपातही बक्षिसी मिळे. लुटीतील बहुमुल्य दागगदागिनेही भेटीत दिले जात असत. गुलबदन बेगम सांगते कि बाबराने जेव्हा इब्राहीम लोदीचा पराभव करून आपाप लुट मिळवली तेव्हा त्याने ख्वाजा किलन बेगमार्फत आपल्या हरममधल्या प्रत्येक महिलेला बहुमुल्य वस्तू पाठवल्या होत्या. विशेष समारोहात बेगामांवर भेटवस्तूंची वर्षा करण्यात अकबरही मागे नव्हता. शहाजहानने मुमताज महलला एका प्रसंगी दोन लाख अशरफी आणि सहा लाख रुपये भेटीत दिल्याचीही नोंद आहे. जहांगीरने जनानखान्यातील स्त्रीयांना त्यांच्या दर्जानुसार त्यांचे वेतन तर वाढवले होतेच पण सर्वात जास्त जहागी-या नूरजहान बेगमला दिल्या होत्या. आपल्या नाझीरामार्फत या बेगमा जहागीरीची व्यवस्था बघत असत. वारसा हक्काच्या लढाईत आपल्याला मदत केली म्हणून औरंगजेबाणे आपली बहिण रोषनआरा बेगमला पाच लाख रूपये भेट दिले होते. थोडक्यात बेगमा आणि आवडत्या दासींवर पैसे उधळले जात ते त्यांना खुश ठेवण्यासाठी. याशिवाय विदेशी व्यापारी आणि स्थानिक व परसत्तांचे वकीलही बेगमासाठीही भेटवस्तू देत असत. बादशहाच्या सर्वात जवळची जी बेगम असे ती अर्थात सर्वात धनाढ्य असे.

त्यामुळे काही शाही स्त्रियांनी अनेक मकबरे, बागा, सराया, आणि महालांची उभारणी केली तसेच दान-धर्मावरही खर्च केले.  त्यांचा व्यक्तिगतही नोकरवर्ग असे. त्या हाजच्या यात्राही करत असत. जनानखान्यातील रजपूत स्त्रियाही त्यांचा हिंदू धर्म पाळत असत. सन साजरे करत असत. त्यात सर्व स्त्रिया सहभागी होत असत. गुलबदन बेगम ही बैरामखानाचे विधवा आणि अकबराची बेगम सलीमा सुलतानासोबत हाजला गेली होती असे तिने लिहून ठेवलेले आहे. जवळपास सर्वच मोगल स्त्रियांनी हाजच्या यात्रा केलेल्या आहेत. शिवाय अजमेरसारख्या स्थानिक धार्मिक स्थलांनाही भेट देण्यास त्या जात असत. जनानखाण्यातील या गर्भश्रीमंत महिला व्यापारातही भाग घेत असत. मरियम उल जमानी (उर्फ जोधाबाई किंवा हरखाबाई) , नूरजहान, जहांआरा बेगम या त्यात मोठा आयात-निर्यात व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.  त्या शाली, किमती वस्त्रे, गालिचे, अलंकार इत्यादीचा व्यापार करत असत. अर्थात त्यातूनही त्यांना मोठा फायदा होत असे. ही प्रथा जवळपास सर्वच राजघराण्यांनी पाळलेली दिसते. उदा. विजापूरची बडी बेगमही राजापुरच्या बंदरातून अरब देशांशी व्यापार करीत असे. अकबराची बेगम मरियम इल जमानीच्या मालकीचेच “राहीमी” या नावाचे जहाजही होते!

विवाह अथवा निकाह केल्यावर पत्नीबरोबर सेविकाही दासी म्हणून दिल्या जात. या दासी एक प्रकारे भोगदासीच असत. त्यांना पत्नीचा दर्जा मिळत नसला तरी पत्नीखालोखाल त्यांचे स्थान असे. जनानखान्यातील दासीला ‘कनीज’ असे संबोधत. त्यांच्या संततीला वैध अपत्यासारखीच वागणूक मिळत असली तरी पैतृक अधिकार मात्र मिळत नसत. हिंदू सरदार व राजांचे अनेक दासीपुत्र महाराष्ट्राच्या इतिहासातही अवतरले आहेत. फर्जंद नामांत असलेले अनेक दासीपुत्र इतिहासात प्रसिद्धही आहेत. अकबराचे मुराद आणि द्नियाल हे कनीजपुत्रही इतिहासात प्रसिद्ध आहेत. असे असले तरी या दासी अथवा कनीज वा बंदी आपल्या धन्याशी एकनिष्ठ असतच असे नाही. उदा उदेपुरी महल ही दारा शुकोहची दासी असली तरी ती नंतर औरंगजेबाकडे राजीखुशीने गेली. पण दुसरी दासी मात्र दाराची हत्या होऊनही आणि दबाव येउनही औरंगजेबाकडे गेली नाही.

युद्धात जिंकलेल्या शत्रूच्या बायका रखेल्या वा दासी म्हणूनच ठेवल्या जात नसत. काही वेळा त्यांच्याशी विवाहही केले गेल्याची उदाहरणे आहेत. एखाद्या अंतर्गत शत्रूला मारले तारे त्याच्या एखाद्या बायकोशी विवाह केला जात असे.  उदाहणार्थ बैरामखान हा सम्राट हुमायूनचा मित्र आणि अकबराचा वजीर होता. आपल्याविरुद्ध कट केला आहे या संशयाने अकबराने त्याची हज यात्रेच्या वाटेवर असताना हत्या घडवून आणली आणि नंतर त्याची बायको सलीमा सुलतान बेगमशी निकाह केला.

राजकीय सौदेबाजीतून होत असलेले निकाहही खूप असत. अकबराने अजमेरच्या राजा भारमलची मुलगी जोधाबाई हिच्याशी निकाह करून तिला मरियम-उझ-झमानी असे नाव दिले. त्याने बिकानेर, जैसलमेर आणि मारवारच्या राजघराण्यातील मुलींशीही निकाह केला होता. जहांगीरही हिंदू मुलींशी विवाह करण्यात मागे नव्हता. त्याने अंबरच्या राजाची मुलगी मनबाई, व अन्य चार राजपूत राजांच्या कन्यांशी विवाह केले. जवळपास सर्वच मोगल सम्राटांनी ही परंपरा जपली.

याव्यतिरिक्त जनानखान्यातील दासींशीही राजपुत्र ते सम्राटांची प्रेमप्रकरणेही होत असत. औरंगजेबाला जेव्हा दक्षिणेचा सुभेदार बनवण्यात आले तेव्हा त्याच्या मावशीच्या घरची हिराबाई उर्फ जैनाबादी ही दासी त्याला दिसली. ती सुंदर तर होतीच पण नृत्य-गायनात कुशल होती. औरंगजेब तिच्या प्रेमात पडला. तो प्रेमात चूर असल्याने त्याचे कर्तव्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहने शहाजहानकडे तक्रार केली. दौलताबाद येथे हिराबाईचा नंतर खून करण्यात आला. या खुनामागे कोण असणार यचा अंदाज येऊ शकतो. औरंगजेब हिराबाईच्या वियोगाने एवढा सैरभैर झाला कि त्याच्या वर्तनातच फरक पडला, तो अबोल आणि सर्वच गोष्टीबाबत उदासीन झाला. आणि असा तर्क करण्यास वाव आहे कि औरंगजेब तिला कधीच विसरला नाही पण तिच्या मृत्यूमुळे तो सनकी बनला असे अनेक इतिहासकार मानतात. दार शुकोहच्या हत्येमागे औरंगजेबाच्या मनात त्याच्याबद्दलचा हाही तिरस्कार असू शकेल.

जनानखान्यात असलेल्या राजस्त्रिया व दासीव्यतिरिक्त महत्वाच घटक म्हणजे नृत्यांगना, गायिका, रक्षिका, आणि सेविका म्हणजे गुलाम स्त्रिया. गुलाम स्त्रीया सोडल्या तर अन्य स्त्रियांची मात्र जनानखान्यात प्रतिष्ठा असे. रक्षक वर्गातील स्त्रिया आणि खोजे हे तर सर्वात महत्वाचे घटक. जनानखान्यातील स्त्रीयांना गुपचूप पुरुष पुरवण्यापासून अंतर्गत कटकारस्थानात त्यांचा सहभाग असल्याने अगदी राण्याही त्यांना वचकून असत.  असे असले तरी अनेक सेविकांनी राजस्त्रियांची (बेगमांची) जीवावर उदार होऊन मनोभावे सेवा केल्याचे गुलबदन बेगमने नोंदवून ठेवले आहे. 

 जनानखान्याची व्यवस्था बादशहा, राजे अथवा सरदार-अमीरांनी कितीही काटेकोर ठेवली असली आणि त्याच्या उदात्त कहाण्याही असल्या तरी या व्यवस्थेला काळी बाजू फार मोठी आहे. जनानखाने सत्तेचे मुख्य केंद्र नसले तरी सत्तेच्या उलथा-पालथीमागे रानीवसे (अंत:पूर) ते जनानखान्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्याचे ऐतिहासिक विश्लेषण माहितीच्या अभावामुळे अद्याप फारसे झाले नसले तरी हा एक इतिहास घडवणारा महत्वाचा घटक होता यात शंका नाही. कारण जनानखाना ही एक संस्था होती. अंत:पूर किंवा राणीवसे ही भारतीय संस्था होती. दोन्ही व्यवस्था तशा अत्यंत वेगळ्या समाजव्यवस्थेतून निर्माण झालेल्या असल्या तरी तिचे भले-बुरे परिणाम राज्यव्यवस्थेवर आणि म्हणूनच समाजव्यवस्थेवर होणे अपरिहार्य होते. आपल्या राण्यांना आणि राजघराण्यातील स्त्रीसदस्यांना एका संरक्षित जागेत ठेवणे यामागे त्यांच्या रक्षणाचा जसा हेतू होता तसाच त्यांनी “परपुरुषांच्या नादी लागू नये” म्हणूनही बंदिस्त जागेत ठेवण्याचा होता. त्यांना आरामदायक जीवन उपलब्ध करून देणे ही राजा, सरदार ते बादशहाची गरज होती अन्यथा वेगळ्याच कटकटी सुरु झाल्या असत्या. पण विश्वातली कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्था मानवांनी बनवली असली तरी ती मानवाकडूनच चालवली जाते. मानवी भाव-भावना, मानवी प्रवृत्ती याचा आणि व्यवस्थेचा संघर्ष उडणे त्यामुळे स्वाभाविक बनून जाते. इतिहास कधी मूक आक्रोश टिपत नाही. तो नैसर्गिक भावनांचा उद्रेक टिपत नाही. तो फक्त घटना लिहितो तोही अत्यंत रुक्ष पद्धतीने.

एक तर राजा वा सम्राटाच्या पत्नी आणि दासीची संख्याच मोठी असल्याने नवरा किंवा शौहर प्रत्येकीच्या वाट्याला येणार तरी किती? नैसर्गिक कामभावनांचे दमन होणार तरी कसे? अनेक स्त्रिया हिजड्यांकरवी अनैसर्गिक पद्धतीने वासनापूर्ती करण्याचा प्रयत्न करत. जनानखान्यात काकडी, गाजर किंवा तत्सम फळभाज्या नेता येण्यावर बंदी होती तीही त्यामुळेच. स्त्रीयांना कामोत्तेजक पदार्थ पुरवण्यावरही सर्रास बंदी होती. अनेक बंधने असली तरी त्या बाहेरून पुरुष आत आणता यावा यासाठी त्या अनेक युक्त्या शोधून काढत. हिजडे त्यासाठी दाम मोजून एजंट म्हणून वापरले जात. काही स्त्रिया समलिंगी संबंधातून कामभावनांचे दमन करून घेत. मनुची सांगतो कि शाहजहानच्या मुली जहांआरा आणि रोषणआरा या एकमेकांच्या प्रेमात होत्या. प्रेमाची नैसर्गिक उर्मीही त्यांना गुप्त प्रेमी शोधायला भाग पाडी. जहांआराने एका तरुणाशी सुत जुळवून त्याला जनानखान्यात गुप्तपणे आणायची व्यवस्था केलेली होती. बर्नियार सांगतो कि अशा त्यांच्या मिलनवेळेस बादशाहा जहांगीर अचानक तेथे आला. तो तरुण लपायला जागा मिळेना म्हणून न्हाणीघरासाठी पाणी गरम करायला वापरल्या जाणा-या त्यावेळेस थंड असलेल्या भट्टीत लपला. शाहजहानने आपल्या मुलीशी काहीच घडले नसल्यासारखे दाखवत गप्पा मारल्या आणि जातांना तिला स्नान करण्याची सुचना देऊन तेथील एका हिजड्याला भट्टी पेटवण्यास सांगितले. जहांआरा बिचारी काय बोलणार? हिजड्याने भट्टीत लाकडे सरकावत ती पेटवून दिली. जहांगीर त्या तरुणाचा कोळसा होईपर्यंत तेथेच थांबला. मनुची आणि बर्नियर, दोघेही सांगतात कि जहांआराची बहीण रोशनआरानेही दोन तरुणांशी अशाच प्रकारे सुत जुळवले होते. औरंगजेबाच्या लक्षात हे प्रकरण आले. त्याने त्या तरुणांना काहीच केले नाही पण देखरेखीसाठी ठेवलेल्या रक्षक हिजड्यांना मात्र देहदंड दिला. मोगल जनानखान्याच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि मनुष्यस्वभाव पाहता स्त्रियांनी जे काही वासनापूर्तीसाठी केले ते दोषार्ह आहे असे म्हणता येत नाही.

मोगल स्त्रिया बाहेर पडत त्या अंबारीतून किंवा पालखीतून. जातांना त्या पर्द्यात असल्या तरी त्यांचे नजर एखाद्या देखण्या तरुणांवर जाई. वासना दाबून असल्याने अश दर्शनाने त्या उचंबळून येत. त्या तरुणाचा पत्ता शोधून त्याची भेट घालण्यात दासी अथवा हिजडे मोलाची मदत करीत. हिंदू अंत:पुरातही असेच घडत असे याच्या असंख्य कथा प्राकृत व संस्कृत साहित्यात आलेल्या आहेत. हिजड्यांची जनानखान्यातील हुकुमत वाढे ती त्यांना माहित असलेल्या गुपितांमुळेही.

बर्नियर या वैद्यकशास्त्र जानना-या फ्रेंच प्रवाशाला एकदा एका शाही स्त्रीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिल्ली येथील शाही जनानखान्यात जावे लागले होते. त्याला आत नेले गेले ते तोंडावर काश्मिरी शाल बांधून. आता काहीही दिसेनासे झालेल्या बर्नियरला एका तृतीयपंथीयाने हात धरून आत नेले.  त्यामुळे त्याला अपार उत्सुकता असूनसुद्धा जानानखान्याच्या अंतरभागाचे निरीक्षण करता आले नाही. पण तो म्हणतो की जनानखाण्यातील स्त्रीयांना असंख्य बंधनात राहावे लागे. पडद्याआडून त्यांना तपासायला त्या आजारी महिलेला स्पर्श जरी केला तरी त्या शहारून उठत. मनुची म्हणतो कि सर्व स्त्रियांनी चारित्र्यसंपन्न असलेच पाहिजे असा कटाक्ष होता पण त्या तशाच चारित्र्यसंपन्न प्रत्यक्षात कशा राहणार?  किंबहुना जनानखान्याची रचनाही त्याच प्रकारे केली गेलेली होती. एडवर्ड टेरी नावाचा अभ्यासक म्हणतो कि अगदी जवळच्या पुरुष नातेवाइकांसोबतही स्त्रिया अन्य कोणाची उपस्थिती असल्याखेरीज बोलू शकत नसत. कोणी स्त्री व्यभिचार करते आहे हे लक्षात आले तर तिला देहांत प्रायश्चित दिले जात असे. अनेक शाहजाद्यांनी आपल्या बहीनीन्नाही यामुळे ठार मारलेले आहे.

याचा अर्थ प्रेमप्रकरणे होतच नसत असे नाही. औरंगजेबाचे हिराबाईसोबत झालेले प्रकरन आपण पाहिलेच आहे. बाबराचे मासुमा सुलतानासोबतचा निकाह प्रेमातूनच झाला होता. हुमायुनचा हमीदाबानू बेगमशी झालेला निकाहही प्रेमातूनच झाला होता. हमीदाबानूला प्राप्त करण्यासाठी त्याने एखाद्या नवथर प्रेमिकाप्रमाणे अनेक उपद्व्याप केले. हमीदा बानू त्याच्याशी विवाह करण्यास उत्सुक नव्हती कारण तिच्या मते तो एवढ्या उच्च पदावर होता कि तिची आणि त्याची बरोबरी होऊच शकत नव्हती. पुढे जनानखान्यातील अन्य स्त्रियांनी तिची समजूत काढल्यावर तिने हुमायूनशी निकाह केला.

जहांगीरचे नूरजहानवरील प्रेम प्रसिद्धच आहे. पण तो मेहरुन्निसा नामक सुंदरीच्या प्रेमातही बुडाला होता. अकबराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिचे लग्न घियासुद्दिन बेग या पर्शियन तरुणाशी लावून तिला आपल्या जननखाण्यातून दूर केले. शाहजादा जहांगीर यामुळे एवढा अस्वस्थ झाला कि स्वत: सम्राट बनल्यावर त्याने मेहरुंनिसाला परत प्राप्त करण्यासाठी तिच्या नव-याची हत्या करण्याची योजना बनवली होती. तिच्या नव-याच्या मृत्युनंतर ती परत आग्रा येथे आली असता त्याने तिची सर्व व्यवस्था जातीने पाहिली. नंतर जहांगीरने १६११मध्ये तिच्याशी रीतसर निकाहही केला. जहांगीरचे अनारकली या नर्तकीशी झालेले प्रेमप्रकरण तर एक आख्याईका बनुन बसलेले आहे.

जनानखान्यात बादशहा आणि शाहजाद्यांना असलेल्या प्रवेशामुळे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने एकमेकांना पाहिले तरी जाई, पण बाहेरच्या पुरुषाला असे दर्शन दुर्लभ असे, निकाह तर फार दूरची बाब झाली. तरीही अशी मूक प्रेमप्रकरणेही असंख्य झाली असतील. अंत:पूर काय कि जनानखाने काय, तेथे राहणा-या स्त्रियांच्या मूक आक्रोशाच्या साक्षी म्हणजे तेथील निर्जीव भिंती. इतिहासही या आक्रोशाबाबत मुकच राहिलेला आहे.  हिंदू अंत:पुरे वा राणीवसेही अशीच वेदनांची गाथा सांगत असतील. त्यांचे जीवन वरकरणी विलासी वाटले तरी मुख्य बेगमा अथवा पट्टराण्या सोडून खरे सुख क्वचितच कोणाला मिळाले असेल. आणि असे असले तरी नूरजहानसारखा राजकीय प्रभावही काही स्त्रियांनी निर्माण केला आणि इतिहासावर छाप सोडली हेही एक ऐतिहासिक सत्य आहे. बादशाही किंवा राजेशाही संपली तसे जनानखान्याचे अस्तित्व धूसर होत जात अदृश्य झाले. एका काळ्या जगावर पडदा पडला. असे असले तरी जगात अजून अनेक धनाढ्य व्यक्ती आपले जनानखाने बाळगून आहेत हेही एक कटू असले तरी वास्तव आहे.


-संजय सोनवणी

 (Published in Media Watch Diwali issue 2024)

Friday, January 17, 2025

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

 

वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक निकष अधिक व्यापक आणि गुंतागुंतीचे आहेत. आहेत. त्याची सोडवणूक करण्याचे मार्गही वेगळे आहेत. जाती, धर्म, प्रांता-प्रांतातील विकासाचे असमान वितरण, मुलभूत सुविधांचा अभाव, आरोग्य सेवांचे अपुरे जाळे, वाहतूक व्यवस्थेतील सर्वकष दोष, पाण्याचे होणारे असंतुलित वितरण, मुलभूत अधिकारांचे जतन न होणे, लैंगिक व जातीय अत्याचार असे असंख्य पैलू वंचिततेच्या परिप्रेक्षात असतात आणि त्यावरही आजतागायत आपण प्रभावी तोडगा काढण्यात अपयशी ठरलेलो आहोत. पण किमान आर्थिक वंचितता एवढा जरी आधार घेतला तरी ती दूर करण्यासाठी आपल्याकडे तोडके आणि जुजबी उपाय केले जातात हेही वास्तव आहे. या वंचित घटकांना आपले मतदार बनवण्यासाठी लेक लाडकी किंवा लाडकी बहीण, कर्जमाफी, वीजबिलमाफी स्वस्त किंवा मोफत राशनसारख्या योजना कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सरकार किंवा निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष घोषित करतात व त्याआधारावर आपली राजकीय पोळी भाजून घेतांना आपण नित्यश: पाहत असतो. यातून वंचितांचे हित होईल असा दावा त्या त्या पक्षांचे प्रवक्ते अथवा स्वयंघोषित अर्थतज्ञ करत असले तरी त्यामध्ये फारसे तथ्य नसते. यातून फुकटेपणाची भावना वाढीस लागून त्याचा आत्मसन्मान कमी होत अंत:ता कार्यक्षमतेवर परिणाम होईल असे इशारेही काही अर्थतद्न्य देत असतात. आपणच करदाते आहोत या मस्तीत वावरणा-या पांढरपेशा वर्गाचा तळफळाट होत असला तरी त्यांचेही दृष्टीकोन मुळात च दुषित असल्याने वंचिततेच्या मुख्य प्रश्नावर गंभीर चर्चा करून शाश्वत तोडगा काढण्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे वंचितता दूर होईल हा एक भाबडा आशावाद तेवढा निर्माण होतो आणि राजकीय साठमारीत सरकारने नेमके काय करायला हवे आणि काय केले जाते यावर व्यापक चर्चा घडून येत नाही.

व्यापक आणि सहज रोजगार संधींचा अभाव हे प्रमुख कारण आर्थिक वंचिततेसाठी दिले जाते. रोजगार इच्छुक व्यक्तीला त्याच्या त्याच्या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात आहेत अशी अपेक्षा करता येते. पण प्रत्यक्षात आपण पाहिले तर आज उच्च शिक्षितांमध्येही जीवनावश्यक कौशल्यांचा अभाव असल्याचे दिसते. आपली नोकरप्रधान शिक्षण पद्धती शिक्षित तर निर्माण करते पण सुशिक्षित नाही. आणि त्यांनाही पुरेशा नोक-या उपलब्ध नसल्याने त्यांच्यातही बेरोजगारीचा विस्फोट झाला आहे, म्हणजेच आर्थिक वंचितांची संख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी आजकाल प्रत्येक समाज आरक्षणाच्या रांगेत उभा राहू लागला आहे. आमागास वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी १०% स्वतंत्र आरक्षण देण्यात आले असले तरी ते समग्र वंचितता दूर करण्यासाठी कुचकामी आहे हे उघड आहे. पांढरपेशा नोकऱ्याचे अनावर आकर्षण अन्य क्षेत्रात संधी असल्या तरी त्या आपल्या सामाजिक विचाराच्या अभावात शोधल्या जात नाहीत हेही एक कारण आहे.

मागे भाजप सरकारने जनधन योजनेचा गाजावाजा केला होता. कोट्यावधी बँक अकौंट काढले गेले. पण बँकेत अकाउंट उघडले म्हणजे बँकेत आपोआप पैसे येत नाहीत किंवा कर्जेही मंजूर होत नाहीत. कारण पैसे जमा व्हायचे असतील तर ते कमवावे लागतात. पैसे कमवायचे तर आहे त्या किंवा संभाव्य व्यवसायासाठी किमान भांडवल हवे. व्यवसाय नसेल तर किमान नोकरी हवी. भांडवलच नाही म्हणून पैसे कमावता येत नाही आणि कर्ज हवे तर त्यासाठी जी पत लागते ती आधीच्या कंगालपणामुळे नसतेच. त्यामुळे तोही मार्ग खुंटलेला असतो. थोडक्यात वंचित एका अर्थ-चक्रव्युहात सापडलेला असतो आणि शेवटी त्याचा अभिमन्यू होणार हे जवळपास निश्चित असते. त्यामुळे याही योजनेचा जो बट्ट्याबोळ व्हायचा तो झालाच.

भारतात वंचितपणा हा बव्हंशी जातीसंस्थाधारित आहे. अनेक जातींचे पारंपरिक व्यवसाय नव्या तंत्रज्ञानाच्या जगात नामशेष झालेत. असे अनेक पारंपरिकच व्यवसाय आहेत जे आज नवीन तंत्रज्ञान वापरत अवाढव्य जोमात आहेत, पण कुशल भांडवलदारांनी जातीविचार न करता नुसता त्यात प्रवेश केला नाही तर ते त्यात भांडवली व तंत्रज्ञान बळावर वर्चस्व गाजवत आहेत. कातडी कमावने, चप्पल-बुटांचे उत्पादन-विपणन ते गृहोपयोगी लोखंडी वस्तूंचे उत्पादन ते आधुनिक साधने बनवणे यात अग्रेसर आहेत. ही औद्योगिक क्रांती होण्यापुर्वी याच व्यवसायांत पारंपारिक पद्धतीने उत्पादन करणारे लोक होतेच. लोकांच्या गरजा ते आपल्या कौशल्याच्या जोरावर भागवत होतेच. पण औद्योगिक क्रांतीने त्यांना सामावून घेतले नाही. त्यामुळे त्यांचे पारंपारिक व्यवसाय जवळपास हातातुन गेले. व्यवसाय गेले हे समजा एक वेळ ठीक. पण पारंपारिक व्यवसायामुळे चिकटलेली जात मात्र गेली नाही. जातीचा अभिशाप सुटला नाही. ना नव्या संध्या ना पारंपारिक क्षेत्रात राहण्याचा उत्साह हा अजून एक तिढा निर्माण झाला.

सुतार, लोहार, चांभार, वैदू, वडार ईईई आहे म्हणून सामाजिक अवहेलनेचे शिकार होत गेलेले हे घटक. ज्यांनी कधी कसलीही निर्मिती केली नाही त्यांनी याच सर्व व्यवसायांत नोकऱ्या किंवा मालक्या गाजवत निर्माण केलेले तथाकथित बौद्धिक किंवा भांडवली वर्चस्व. सामाजिक अवहेलनेमुळे जगात सर्वच करत असलेल्या, आता प्रतिष्ठित बनलेल्या व्यवसायांत पूर्वी जे परम्पातेने होते त्यांच्याकडे जातीमुळे घृणेने पहायला लागलेली सवय हा अजून एक तिढा. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही अशी ही गत. मी धनगर समाजाने सहकार क्षेत्रात पदार्पण करत पशुपालन उद्योगातही अग्रणी व्हावे असे म्हटले तर "आम्हाला पारंपारिक उद्योगांत जखडायचे नाही." असे काही तरुण बांधव म्हणाले. जखडू नये हे मान्य. पण म्हणून पारंपारिक व्यवसाय त्याज्ज्य कसा ठरतो? आधुनिकीकरण करता येईल कि नाही? जगात लाखो लोक, जे परंपरेने या व्यवसायांशी संबंधित नाहीत ते हा उद्योग करत नाहीत काय? ते करतात उपजिविका आणि व्यवसायावर नजर ठेऊन. पण दुर्दैव हे कि आम्ही केला तर त्याचा संबंध जातीशीच जोडला जातो, अवहेलनाच वाट्याला येते नि म्हणून तरुण स्वत:च्याच पारंपारिक व कौशल्य असलेल्या व्यवसायात अत्याधुनिक पद्धत आणू पहात नाहीत. जातीचीच लाज वाटावी अशीही स्थिती आहे. उलट त्यातून बाहेर पडण्यासाठी झटतात. अवहेलनेपासुन वाचायची ही धडपड कोणत्यातरी नोकरीत जाऊन धडकण्यापर्यंत होते. पण असे किती तरुण आपल्या चक्रव्युहातुन बाहेर पडू शकतात? मुळात जात म्हणजे व्यवसाय आणि एके काळी याच व्यावसायिक जातींनी देशाची समग्र अर्थव्यवस्था खांद्यांवर पेलली हे वास्तव जातीउत्पत्तीच्या भलत्याच व्युत्पत्त्या देणा-या विद्वानांमुळे समूळ नाकारले गेलेले आहे. जगातील कोणताही व्यवसाय वाईट नसतो आणि हवा तो व्यवसाय निवडायचे आपल्याला स्वातंत्र्य आहे याचे भान ठेवले जात नाही. यांना व्यवसायही हवेत पण तेही असे कि जेथे तथाकथित प्रतिष्ठा असली तरी आधीच जीवघेणी स्पर्धा आहे.

बरे, समजा कोणाला आधुनिकीकरण करत आपलाच कोणताही परंपरागत अथवा नव्याने निर्माण झालेल्या व्यवसायक्षेत्रात पडायचे असले तरी आपली अर्थव्यवस्था आणी समाजव्यवस्था त्याला सकारात्मक आहे काय? पारंपारिक व्यावसायिक ज्ञानाला आम्ही आधुनिक तंत्रज्ञानात सामावुन घेतले काय?

नाही.

बँकात याच वंचितांकडून छोट्या-मोठ्या बचतींचे अवाढव्य भांडवल उभारत त्यातुन कर्जे (त्यातीलही नंतर १०% तरी बुडित) देतात. सामान्य माणूस बचत करतो तर भांडवलदार म्हणवणारे कर्जे घेतात. हा एक विपर्यास आहेच. आमचे एक माजी मुख्यमंत्री म्हणाले होते, "स्वत:च्या भांडवलाने कधीच व्यवसाय करु नका. कर्ज घ्या." ही भांडवली मानसिकता आहे. कारण व्यवसाय डुबला तर दुसरे डुबतील, असा व्यावहारिक दृष्टीकोन आहे. समजा यातही वावगे नाही. पण कर्ज कोणाला द्यायचे हे बॅंकांना ठरवता येत नाही ही खरी समस्या आहे. "पत" हा शब्द अत्यंत भोंगळ आहे. पत ठरवायचे निकश केवळ आणि केवळ आर्थिक आहेत, कागदोपत्री आहेत आणि त्यात प्रामाणिकपणाचे कसलेही पतांकन नाही. सामाजिक प्रतिष्ठा, तथाकथित शिक्षण आणि हितसंबंध हेच पतीचे निकश. अशा अवस्थेत भांडवल पुरवणारे भांडवलापासून वंचित राहतात आणि यांच्याच भांडवलातुन चतूर लोक भांडवलदार बनतात.

हाही एक तिढा आहे.

पण वंचिताला भांडवलाचेही संरक्षण द्यावे असा विचार आमच्या अर्थव्यवस्थेला सुचत नाही. आरक्षणाचे संरक्षण आज कुचकामी झाले आहे. त्याचा उपयोग त्या-त्या जाती-जमातींतील मुठभर नव-भांडवलदारांनाच झाला आहे. आपल्याच जाती-जमातीतील अन्यांना फायदा होण्यासाठी किमान दोन पिढ्यांनंतर तरी आपण ते वापरु नये ही सामाजिक जाणीव त्यांच्या ठायी नाही. समांतर आरक्षण आणि आरक्षणातील एकाही सवलतीचा (वय, फ़ी वगैरे) फायदा घेतला तर तुम्हाला आहे त्याच प्रवर्गात रहावे लागेल असे बजावत ओपन जागांवरील न्याय्य हक्क झुगारत नवे "ओपन आरक्षण" निर्माण केले गेले आहे. हेही वंचितांचे समग्र अर्थकारण बिघडवण्याचे कारस्थान आहे. आता आरक्षणात वर्गवारी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अधिकार दिले तर लगेचच वंचितांतील बलिष्ठ जाती त्याला विरोध करायला सरसावून पुढे आल्या आहेत. सामाजिक न्यायाची जाणीव वंचित घटकातही किती आहे याचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होतो.

खरे तर आरक्षणाने सर्वच वंचितांना फायदा होईल अशी स्थिती नव्हती. आणि जे मागे राहिलेत त्यांना पायावर उभे राहता येईल यासाठी व्यवसायांसाठी आर्थिक भांडवलही नाही. सामाजिक अवहेलनेमुळे परंपरागत व्यवसाय आधुनिक पद्धतीने पुढे रेटण्याची मानसिक हिम्मतही नाही.

भटक्या-विमुक्तांसाठीचे वसंतराव नाईक महामंडळ असो कि धनगरांसाठी बनवलेले शेळी-मेंढी महामंडळ असो. पहिल्याला जो निधी मिळतो त्यातून लाभार्थी शोधावे लागतील आणि दुस-याला जो निधी मिळतो त्यात फारतर ५-५० शेळ्या पाळता येतील. ही महामंडळे काय धोरणात्मक आणी समाजाच्या आर्थिक उत्थानाचे काम करतात हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येते व ते म्हणजे राजकीय सोयींसाठी या महामंडळांवर झालेल्या नियुक्त्या. बाकी शून्य.

मग आपले वंचितांचे अर्थशास्त्र तरी नेमके अस्तित्वात आहे काय? कि वंचित हा केवळ राजकीय घोषणाबाज्यांचा शतकानुशतके परवलीचा शब्द राहणार आहे? ना आमची सामाजिक मानसिकता बदलायला तयार आहे ना राष्ट्रीय अर्थकारणाची मानसिकता. बँक अकाउंट काढून किंवा मोफत देण्याच्या योजनांमुळे वंचिततेचा प्रश्न मिटु शकत नाही हे उघड आहे. किंबहुना वंचित मानसिकतेत त्यामुळे जास्तच भर पडून वंचितांचा देश ही प्रतिमा ठळक होण्यापलीकडे त्यात्यून काहीएक साध्य होणार नाही. प्रश्न आहे तो त्यांना ब्यंकेत जमा करण्यासाठी पुरेसे उत्पन्न कसे मिळेल आणि त्यासाठीचे शिक्षण व आर्थिक आवश्यक भांडवल कसे मिळेल हा.

भांडवलदारी जागतिक मानसिकतेचा पाया असेल तर छोट्या-मोठ्या प्रमाणात सारेच भांडवलदार बनवावे लागतील. त्यासाठी आवश्यक भांडवलही व्यवस्थेलाच पुरवावे लागेल. "वंचितांचे अर्थशास्त्र" आपल्याला नव्याने बनवावे लागेल. येथे पाश्चात्य मोडॆल्स चालणार नाहीत. कारण त्यांची समाजव्यवस्था आणी आपली समाजव्यवस्था यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. पण आपल्या विद्वानांची त्यासाठी बौद्धिक आणी आत्मीय झेप घ्यायची तयारी आहे काय?

अर्थप्रेरणा आणि त्या प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्यासाठी कोणते अर्थ व राजकीय तत्वज्ञान देश अंगिकारतो यावर त्या त्या देशाची संस्कृती ठरेल हे नक्कीच आहे. आणि सर्व देशांच्या संस्कृतींचा एकुणातील ताळेबंद म्हणजे आपल्या जगाची संस्कृती. कोठे प्रगती आहे पण स्वातंत्र्य नाही ते प्रगतीही नाही आणि स्वातंत्र्यही नाही अशा विरोधाभासी स्थितीत अनेक राष्ट्रे आज अडकलेली आहेत. नीट अर्थतत्वज्ञान नसल्यामुळेच मागे व्हेनेझुएला-ग्रीससारखे देश कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली कसा चिरडला गेला होता आणि नागरी जीवन अस्ताव्यस्त होत गुन्हेगारीचा कसा विस्फोट झाला होता हे आपण पाहिले. यातून आपण काही धडा शिकायला हवा. काही दशकांपुर्वीच समाजवादी बंधनांत अडकलेल्या भारतावर एवढी आर्थिक अवनती कोसळली होती की चंद्रशेखर सरकारवर सोने गहाण ठेवायची वेळ आली होती हे आजच्या स्थितीत कोणाला खरे वाटणार नाही. नरसिंहराव सरकारने समाजवादाला काही प्रमाणात मुरड घालत जागतिकीकरणाचे पर्व आणल्याने भारतात मोठी अर्थक्रांती झाली आणि त्यामुळे समाजक्रांतीही घडली हे वास्तव आहे. अर्थात नरसिंहरावांचे जागतिकीकरण केवळ उद्योग-धंद्यांपुरते मर्यादित राहिले, त्यांनी शेतीक्षेत्राला मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून वगळले यामुळे इंडिया विरुद्ध भारतयातील दरी संपायच्या ऐवजी रुंदावत गेली व ती काही प्रमाणात द्वेषपुर्णही झाली. अर्थात विकासाच्या वेगालाही मर्यादा बसली. एक पाय खुला आणि दुसरा पाय पोतड्यात घालून रेस जिंकता येणार नाही हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. भविष्यात राजकीय पक्ष आपापल्या अर्थविचारधारेत कालसुसंगत व न्याय्य बदल करतील आणि ही दरी बुजवत ख-या अर्थाने एकोप्याची संस्कृती निर्माण करतील एवढी आशा मात्र आपण नक्कीच करू शकतो. बंधनांची समाजवादी अर्थव्यवस्था आकर्षक वाटली तरी ती शोषित-वंचितांसह व्यापक हित करू शकत नाही हे आपण अनुभवले आहे. आजच्या शोषित-वंचितांना अधिक पंगू न बनवता मुळात त्यांनाच समर्थ करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. जागतिक अर्थव्यवस्थांनाही ते लागू आहे. त्यात गेल्या दहा वर्षात संपत्तीक वाटपातील विषमता कळसाला पोहोचलेली आहे. आज देशातील दहा टक्के लोकांकडे ८०% संपत्तेचे केंद्रीकरण झालेले असूर उरलेली संपत्ती ९०% त वाटलेली आहे. यामागे केंद्रीभूत मक्तेदारीला प्रोत्साहन मिळत असल्याने आणि काही उद्योगांवर सरकार फारच मेहरबान होत असल्याने असे विषम चित्र निर्माण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था श्रीमंत होते आहे असे चित्र दिसत असले तरी किती लोक श्रीमंत होत आहेत आणि बाकीचे दिवसेंदिवस गरीबच होत चालले आहेत याचा आलेख चिंता करण्याएवढा विषम झाला आहे.

थोडक्यात आर्थिक वंचितांची संख्या झपाट्याने वाढत असून ती एकूणच अर्थव्यवस्थेचा घास घेईल अशी चिन्हे आहेत.

दारिद्र्याचा इतिहास फार प्राचीन आहे. दुष्काळ-परचक्रे, मागणीत झालेले बदल, कालबाह्य ठरलेले व्यवसाय ते औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत सर्व समाजघटकांना सामाविष्ट न करता आल्याने दारिद्र्य एका घटकाकडून दुस-या घटकांकडे स्थलांतरित झाल्याचाही इतिहास आहे. सामाजिक संरचनेवर व मानसिकतेवर दारिद्र्याचा प्रभाव अनेक प्रकारे पडत जातो व पराभूतपणाची भावना वाढीला लागून सामाजिक विषमतेचा कळस गाठला जातो.

भारतातील दारिद्र्याचा इतिहास

इसपू ३१०० ते इसपू १८०० या काळात पर्जन्यमान चांगले असल्याने सिंधू व गंगा नदी ते दक्षिणेतील नद्यांच्या खो-यात शेती व त्यानुषंगाने आवश्यक वस्तूंच्या निर्मितीचे व्यवसाय भरभराटीला आलेले होते. दारिद्र्याचे प्रमाणही कमी होते. पण इसपूच्या अठराव्या शतकापासून पर्जन्यमान घटल्याने नागरी सिंधू संस्कृती कंगाल झाली आणि ग्रामीण भागात आश्रयाला गेली. रोजगाराचे जुनी साधने नष्ट झाली आणि नवी शोधावी लागली. इसपू १२०० पर्यंतचा काळ अर्थव्यवस्थेची पुनर्रचना होण्यातच गेला. त्यानंतर स्थैर्य येते असे वाटते न वाटते तोवर इसपूच्या सहाव्या शतकात आणि नंतर इसपूच्या चवथ्या शतकात अकेमेनीद आणि ग्रीक आक्रमणे झाली. त्यानंतर भारताचे राजकीय मानचित्र जसे बदलले तसेच आर्थिकही. पश्चिमोत्तर भारत कंगाल तर अन्य प्रांत बऱ्या ते समृद्ध स्थितीत गेले. त्यानंतरही अवर्षने येतच राहिली पण ती सार्वत्रिक नव्हती. व्यापारी व उत्पादक श्रेण्यांनी भारताला पुन्हा वैभव मिळवून दिले. व्यवसायांची निर्मिती आणि व्यवसायबदल ही सामान्य स्थिती होती. कठोर जातीसंस्थेचे स्वरूप दहाव्या शतकापर्यंत त्यामुळेच अत्यंत सैल होते.

पण अकराव्या शतकापासून एकुणातील अर्थव्यवस्था संकटात सापडु लागलेली दिसते. सन १०३३, १०४३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...ते पुरते ठप्प झाले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते. थोडक्यात द्वितीय महायुद्धानंतर जशी एक महामंदी आली होती त्यापेक्षाही भिषण अशी महामंदी भारतात या दुष्काळांनी आणली.

 

दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता. समग्र अर्थव्यवस्था भुइसपाट करणा-या या दुष्काळाने निर्माणकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल!

 

भारतातील सांस्कृतिक उलथापालथीला हे काही शतके चाललेले दुष्काळाचे सत्र आहे. याचा समाज-मानसशास्त्रावर झाल्या असलेल्या परिणामांची चिकित्सा व्हायला हवी.  या घटनांमुळे सामाजिक व आर्थिक घुसळण होते आणि आणि खालचे स्तर ही वर येऊ शकतात तर धनिकांवर विपन्नावस्था कोसळू शकते ही इतिहासावरून आपल्या लक्षात येते. अकराव्या शतकानंतर केंद्रीभूत व्यवसाय गावपातळीवर विकेंद्रित झाले. बलुतेदारी (रयत) पद्धतीचा उगम त्यातून झाला आणि व्यवसाय बंदिस्त करून स्पर्धा नको ही भावना निर्माण केली. जातीव्यवस्था त्यातून बंदिस्त तर झालीच नवे शोध लागणेही बंद झाले. याच काळात वाढलेली मुस्लीम आक्रमणे व सत्ता यामुळे अर्थव्यवस्थेत कररचनेतही मोठी विषमता निर्माण झाली. यापासून वाचण्यासाठी मोठ्या संख्येने धर्मांतरेही घडली.

 

ब्रिटीश काळात औद्योगीकरनामुळे देशी उत्पादक क्रमश; देशोधडीला लागले. शेतीलाही अवकळा आली. दुष्काळांचे सत्रही थांबायला तयार नव्हते. थोडक्यात कोलमडलेल्या देशी अर्थव्यवस्थेला पूर्ण नष्ट करण्यात ब्रिटीशांना यश आले. भारतीय लोक अकराव्या शतकापासूनच इहवादाकडून दैववादाकडे वळाल्याने एकुणातील मानसिकताच दैवतशरण बनत गेली आणि आजही त्यात फारसा बदल झालेला आहे असे नाही. वंचिततेचे परिमाण बदलत एवढे व्यामिश्र झाले कि त्यावर एकमात्र असा उपाय शोधता येणे अशक्य होऊन जावे. तरीही आपल्याला सध्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यावर कोणते उपाय तातडीने केले पाहिजेत यावर विचार करणे आवश्यक आहे.

 

आर्थिक वंचिततेचे परिणाम:

१.      कुपोषण. स्त्रिया-मुलांचे अधिक कुपोषण.

२.      आरोग्याच्या समस्या

३.      शिक्षणाचा अभाव अथवा अनियमितता

४.      बेरोजगारी अथवा रोजगारासाठी निरंतर भ्रमंती

५.      मुलभूत जीवनावश्यक सुविधांचा अभाव

६.      मानसिक आरोग्यावर परिणाम. परिणामी गुन्हेगारी, आत्महत्या, बलात्कार, जातीद्वेष यात वाढ.

७.      सरासरी आयुर्मानात घट

८.      वरिष्ठ आर्थिक समुहांकडून होणारे आर्थिक, मानसिक ते लैंगिक शोषण

९.      भटक्या वेश्यावृत्तीस उत्तेजन

१०.  जातीसंस्थेला घट्ट चिकटून बसण्याची प्रवृत्ती

११.  सामाजिक सौहार्दाला धोका. धार्मिक अंधश्रद्धांचा उद्रेक.

कारणे

१.      अवाढव्य लोकसंख्या

२.      संपत्तीच्या वितरणातील असमानता.

३.      सरकारी धोरणे. प्रशासनातील त्रुटी.

४.      महागत चाललेले शिक्षण

५.      दर्जेदार कौशल्य शिक्षणाचा अभाव.

६.      सरकारी नोक-यांचे अनिवार आकर्षण

७.      पुरेशा संधींचा व क्रयशक्तीचा अभाव.

८.      उद्योग-व्यवसायांतील संधीचा अभाव

९.      उद्योगधंदे व नागरीकरणातील विकेंद्रीकरणाचा अभाव

१०.  व्यावसायिक कौशल्यांचा व तशा कौशल्यशिक्षणाचा अभाव

११.  साधनसामग्रीचा चुकीचा विनियोग अथवा अपव्यय. उदा. कच्ची खनिजे प्रक्रिया न करता निर्यात करण्याचे वाढलेले अवास्तव प्रमाण. सरासरी ३०% शेतमाल साठवणूक सुविधांच्या व प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे वाया जाणे.

१२.  शिक्षणाचे चुकीचे उद्देश व सर्वांच्याच शिक्षणातील सरसकटीकरण. शिक्षणाच्या गरजांचे निरीक्षण करून ते आता गरजाधरीत बनवण्याची आवश्यकता.

१३.  एकुणातील समाजाची ढासळलेली वैचारिकता. श्रमाला प्रतिष्ठा नसणे.

१४.  नैतिक शिक्षणाचा अभाव. त्यामुळे सामाजिक समस्यांचा उद्रेक.

१५.  नव्या संधी शोधण्यात किंवा निर्माण करण्यात आलेले अपयश.

यात आपण आपापल्या मगदुरानुसार अजूनही कारणे आपल्या विचारानुसार जोडू शकता.

उपाय

१.      शिक्षण-आरोग्यसेवाची व्याप्ती वाढवत नेत त्या मात्र सर्वांना मोफत असायला हव्यात.

२.      श्रमप्रतिष्ठा वाढेल यासाठी सामाजिक विचारांत बदल घडेल असे प्रयत्न करावेत.

३.      शेतमालाच्या आयात-निर्यातीवर मनमानी सरकारी बंधने नकोत. शेतमालावरील आयात-निर्यात दर एकदाच अंतिम ठरवावेत व किमान वर्षभर तरी त्यात कसलाही बदल नको.

४.      शेतमालाचे भाव वाढत असले किंवा घसरू लागले तर त्यात होणारा सरकारचा हस्तक्षेप थांबवला जावा. बाजारभाव मागणी-पुरवठ्याच्या नियमानेच ठरवले जावेत.

५.      शेतमाल प्रक्रिया उद्योगांची वाढ करण्यात यावी. अधिकाधिक शेतमालावर व फळांवर प्रक्रिया करण्यात येईल असे धोरण असावे. त्यासाठी लघुत्तम व लघु उद्योगांना विशेष प्रोत्साहन द्यावे. सुलभ कर्ज मिळेल अशीही व्यवस्था करावी. जीवनावश्यक वस्तू कायद्याचा अंत करण्याची आवश्यकता.

६.      शेतकरी अथवा गाव-कंपन्यांना प्रोत्साहन देत शेतक-यांनीच आधुनिक व्यवस्थापन व उत्पादनपद्धती राबवण्यासाठी शेतीचे कॉर्पोरेट स्वरूप आणून शेतमालाची बाजार नियंत्रित करावी अशा दीर्घकालीन धोरणाची अंमलबजावणी सुरु करावी.

७.      पारंपारिक व्यवसायांचे लघुत्तम पातळीवर आधुनिकीकारण करणे.

८.      बाजारपेठांची पुनर्रचना करून लघुत्तम आणि लघु उद्योगांतील उत्पादनांसाठी देशांतर्गत आणि बाह्य बाजारपेठा विकसित करणे.

९.      वाहतूक, साठवणूक व शीतगृह सुविधांत वाढ व्हावी.

१०.  पशुपालन व मत्स्योद्योगातील पारंपारिक घटकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यात सामील करून घेणे.

११.  शासकीय-बिगरशासकीय नोकरदार वर्गाचे पेन्शन सरसकट बंद करावे व त्यांच्या अधिकाधिक पगारावरही मर्यादा आणावी अथवा कार्यक्षमतेनुसार वेतन दिले जावे.

१२.  महागाई दरानुसार किमान वेतन निश्चित करून त्याचे कायदे संघटीत व असंघटीत क्षेत्रात सारखेच लाऊन ते कायदे कडक करणे. शेतमजुरापासून सर्वच क्षेत्रात या कायद्यातील किमान वेतन समानतेची अपेक्षा.

१३.  लघुत्तम व लघु उद्योगव्यवसायासाठी व्यापक उत्तेजन देणे. त्यांना भांडवल आणि व्यावसायिक प्रशिक्षण पुरवणे,

१४.  शिक्षणपद्धतीत गरजाधारीत बदल करणे.

१५.  मक्तेदारीयुक्त भांडवलशाहीला आळा घालणे ज्यामुळे कमी व्यक्तींकडे अधिक संपत्ती गोळा व्हायचे प्रमाण कमी होईल.

१६.  पाण्याचे सध्याचे विषम वितरण बदलने.

१७.  पाण्याचे अधिक शोषण करणा-या पिकांवर (उदा. उस) क्षेत्रमर्यादा घालणे.

१८.  मोफत योजना सरसकट बंद करणे. निवडणुकीत अशा योजना घोषित करणा-या राजकीय पक्षांवर तातडीने बंदी घालणे.

१९.  राजकीय उमेदवारांच्या गतवर्षीच्या एकूण उत्पन्नापेक्षा दुस-या वर्षी अचानक अनैसर्गिकरित्या उत्पन्न वाढले असल्याचे निदर्शनास येताच त्यावर अतिरिक्त कर लादण्यात यावा व त्या उत्पन्नाचा सोर्सही शोधण्यात यावा.

२०.  शाश्वत अर्थव्यवस्थेचा अंगीकार.

 

थोडक्यात वंचित समूहांची संख्या अधिक असणे हे मुळात कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विनाशाचे कारण ठरते. त्यात वेळीच हस्तक्षेप न केल्यास सामाजिक असंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो हे आपण अगदी शेजारच्या बांगला देशात उसळलेल्या उद्रेकावरून पाहिलेले आहे. समाजवाद वा साम्यवाद जेवढा वाईट आहे तेवढाच अतिरेकी मक्तेदारीयुक्त भांडवलदारीही वाईट आहे. त्याज्ज्य आहे. संपत्तीचे वरून खाली झिरपन्याचा सिद्धांत कालबाह्य झाला असून संपत्तीचे खालून वर असे उलटे झिरपणे सुरु व्हायला हवे. म्हणजे पाया भक्कम बनेल व अर्थव्यवस्थेची इमारत भक्कम होत जाईल. थोडक्यात समाजातील सर्व घटक संपत्तीनिर्मितीच्या कार्यक्रमात सहभागी केली जायला हवी. असे झाले नाही तर कितीही फुकट्या योजना आणल्या तरी वंचितता तीळमात्रही कमी होणार नाही. फुकातेपानाचा सोस असाच वाढत जाईल यात शंका बाळगायचे काही कारण नाही. आणि फुकट्यांचा देश कधीही महासत्ता होऊ शकत नाही. वंचितता दूर करण्याचे सामर्थ्य वंचितांतच आहे पण ते ओळखून त्यांना समर्थ बनवण्यासाठी सरकारने खर्च करावा. त्यास हरकत नाही. वंचितांचे सक्षमीकरण हाच आपला मूलमंत्र असला पाहिजे. देशाचा शाश्वत विकास त्यातच सामाविष्ट आहे हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल व व्यापक जनमत तयार करावे लागेल.

 

-संजय सोनवणी

(साहित्य चपराकच्या २०२५ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख)

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

     चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए....