Friday, December 27, 2013

हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय?

मित्रहो,

संस्कृतीचा आदिम वारसा मिरवणा-या गोमंतभूमीत भरणारे हे शेकोटी साहित्य संमेलन आधुनिक काळातील साहित्य-संस्कृतीच्या प्रकाशाचा, उर्जेचा आणि चेतनेचा उत्सव आहे. शेकोटी या शब्दातच मानवाच्या पुरातन गाथेचा समग्र इतिहास सामावला आहे. अग्नीचा शोध माणसाला लागला ही आदिमानवाच्या जीवनात क्रांती घडवणारी घटना होती. मानवी टोळ्यांनी अग्नी सतत प्रज्वलीत रहावा यातून पहिली शेकोटी पेटवली त्याला आता कदाचित लाखावर वर्ष झाली असतील. मानवी टोळ्यांनी स्थलांतर जरी केले तरी एखादे तरी जळते लाकूड दुस-या स्थानी नेले जायचे. तेथे पुन्हा शेकोटी पेटायची. या शेकोटीचा भवताली बसून टोळीमानव आपल्या आदिम भाषेत गूज करायचा. शेकोटीभोवतीच पुरातन काव्ये स्फुरली. भाषेचा विकास शेकोटीभोवतीच होत गेला. शेकोटीनेच अनेक धर्मांना जन्म घातला. वैदिक धर्मियांचे यज्ञ हे शेकोटीचेच उत्क्रांत रुप. अग्नीत हविद्रव्ये देत ते त्यांच्या अमूर्त देवतांना आवाहने करायचे. पारशी धर्मही पुर्णतया अग्नीभोवतीच फिरणारा. मुर्तीपूजक (पेगन) शैव, ग्रीक, इजिप्शियन धर्मांत मंदिरांत होम पेटायचे. अग्नी सर्वात पवित्र मानला गेला कारण त्याने नुसतीच माणसाची सोय केली नाही तर त्याच्या सांस्कृतीक जीवनात क्रांती घडवून आणली. 

गोमंतभुमीत मानवाच्या संस्कृतीचे किमान चाळीस हजार वर्षांपुर्वीचे पुरावे आहेत. ते पुरावे म्हणजे कुशावती नदीच्या काठी पुरामानवाने खडकांत कोरलेली चित्रे. ही चित्रे जशी त्याच्या कौशल्याची साक्ष आहेत तशीच त्याच्या गूढ धर्मकल्पना आणि जीवनसौंदर्याच्या जाणीवेचे प्रगल्भ दर्शन घडवनारी आहेत. त्यात आदिमातेचे जसे चित्रण आहे तसेच नाचणारी युवती व पशु-पक्षांचेही चित्रण आहे. हे चित्रण करणारा मानव, आपला पुर्वज कोणत्या भाषेत बोलत होता हे आपल्याला माहित नाही...त्या भाषेत त्याने कोणती कवने रचली हे आपल्याला माहित नाही...पण त्या गीत-संगीत तालावर ते नाचत होते...आणि ते नृत्य शिकार करुन आलेल्याला थकव्याला मिटवण्यासाठी, जीवन सौंदर्य खुलवण्यासाठी शेकोटीभोवतीच नाचत होते हे आपण निश्चयाने म्हणु शकतो. आज आपण येथे जी शेकोटी पेटवली आहे आणि त्याभोवती हा साहित्य-संस्कृतीचा जागर सुरू झाला आहे तो मला थेट त्या काळात नेतोय.

संस्कृतीचा प्रवाह अव्याहतपणे जीवंत ठेवण्यासाठीचा हा साहित्य संमेलनाचा उपक्रम मला अभिनंदनीय, अनुकरणीय वाटतो तो त्यासाठीच!

वर्तमानात येतांना मात्र आपल्याला अधिक गंभीर व्हायला लागते. आपण सारे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी आहात. किंबहुना आपण आहात म्हणून साहित्य संस्कृती जीवंत आहे. पण जीवंत असने म्हणजे नेमके काय? आपण कसे जीवंत आहोत? रसरशितपणे जीवंत आहोत कि गलितगात्र जीवंत आहोत? आपली साहित्य संस्कृती कोणत्या प्रकारे जीवंत आहे याचे नीट अवगाहन केल्याखेरीज आपल्याला योग्य निदान करता येणार नाही. आपण त्यावर जर गंभीरपणे चर्चा केली नाही तर साहित्य संस्कृतीचे भवितव्यही आपल्याना नीट ठरवता येणार नाही. या शेकोटीच्या साक्षीने आपण त्यावर चर्चा करुयात.

मराठी साहित्याला पुरातन इतिहास आहे. हालाची गाथा सप्तशती आज उपलब्ध असलेला सर्वात जुना पण कालजेयी पुरावा आहे. गाथा सप्तशतीत इसवी सनाच्या पहिल्या शतकातील मानवी जीवनाचे जे मनमोकळे आणि मनोरम चित्रण झाले आहे तसे दुर्दैवाने नंतरच्या साहित्यातून गायब झालेले दिसते. गाथा सप्तशतीत आठव्या शतकापर्यंत भर पडत राहिली हे येथे लक्षात घेतले पाहिजे. गाथा सप्तशतीतील एक गाथा येथे सांगण्याचा मोह आवरत नाही कारण आपले संचित काय आहे हे समजायला त्यामुळे उपयोग होईल.

"तुह मुहसारिच्छं ण लहै त्ति संपुण्णमंण्डलो विहिणा
आणामां व्व घडइउं वि खण्डिज्जइ मिअंको..."

अर्थ असा आहे...पौर्णिमेचा पुर्ण चंद्रही तुझ्या रुपाशी स्पर्धा करु शकत नाही म्हणून चिडलेला विधाता नवीन चंद्र घडवावा यासाठी या चंद्राचे कलाकलांनी तुकडे करतो आहे.

गाथा सप्तशतीतील सर्वच गाथा नितांत रमणीय आहेत. आपल्या भाषेचे प्राचीन रुप त्यातून दिसते. ही माहाराष्ट्री प्राकृत चक्रधरांच्या...नंतर ज्ञानदेवांचा मराठीत कशी बदलत गेली यावरून मराठीचा प्रवाहीपणा दिसतो आणि बदलत्या काळाबरोबर बदलणारी भाषा कशी चिरकाळ टिकते हेही यातून स्पष्ट होते. मध्ययुगातील भाषा ते आजची भाषाही परिवर्तन स्वीकारत आली आहे. या भाषेने जसे इतर हजारो शब्द उधार घेतले तसेच हजारो शब्द इतर भाषांना दिलेही. आपली माय मराठी प्रगल्भ झाली ती यामुळेच.

पण भाषा वैभवशाली असली तरी आम्ही आधुनिक काळात तिच्यावर साज चढवण्यात कितपत यशस्वी ठरत आहोत हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मुद्दा आहे. मराठी साहित्यावर परपूष्ट असल्याचा आरोप वारंवार होत असतो. म्हणजे मूळ म्हणता येतील अशा कृती मराठीत अत्यल्प आहेत. र. वा. दिघेंसारखे, उद्धव शेळकेंसारखे काही ओरिजिनल साहित्यिक आपल्याकडे दुर्लक्षीत राहिले तर जे उचलेगिरी करत लिहित राहिले ते मात्र "सारस्वत" म्हणून मिरवत राहिले असे आपल्याला दिसते. आपले साहित्य आपल्या मातीचे हवे, आपल्या शैलीचे हवे, आपल्या आशा-आकांक्षा-जीवनस्वप्ने-जीवनशोध त्यातून प्रखरपणे आणि प्रगल्भपणे व्यक्त करणारे हवे ही अपेक्षा साहित्याकडून असायला हरकत नाही. पण गत शतकाने अपवाद वगळता आपली निराशाच केली आहे हे जर तटस्थपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल. 

साहित्य हे मानवी संस्कृतीचा उद्गार असते. समाजाच्या रचनेचा, एकुणातील व्यक्तिगत तसेच समष्टीच्या अंतर्गत कलह-विजय-अपुर्णता-पुर्णत्वाची ओढ इत्यादिंचा एकुणातील जो सारगर्भ याला साहित्यातून जीवंत केले जात असते. त्यासाठी साहित्यिकाला...कवीला प्रत्यक्ष जीवनाशी भिडावे लागते. अनुभवसंपृक्त व्हावे लागते. वैश्विक दृष्टीकोनातून समग्र जीवनाकडे पहावे लागते. मग एका सामान्य शेतक-याची साधी गोष्टही वैश्विक बनू शकते. उध्वस्त वृक्षावरील एखादी दहा ओळींची कविताही महाकाव्याचा अनुभव देवू शकते. मी येथे पाश्चात्य लेखक-कवींची उदाहरणे देत नाही. काही प्रयोजनही नाही. कारण आपल्याला आपल्या स्वप्रतिभेने अजून खूप मजल मारायची आहे. त्यांचे जीवन बेगळे, संस्कृती वेगळी, सामाजिक संदर्भ वेगळे आणि त्यांना उपलब्ध असलेले अवकाशही वेगळे. आपला प्रश्न हा आहे कि आम्ही आमचे अवकाश शोधण्यात कमी तर पडत नाही ना? 

आम्ही आमची संस्कृती नीट शोधण्यात, समजण्यात, सामाजिक अनुबंध जाणन्यात कमी तर पडत नाही ना?

आपण मोठे साहित्यिक असलो तरी हा प्रश्न विचारला पाहिजे, सातत्याने, व प्रश्नांची उत्तरेही शोधली पाहिजेत...सातत्याने, कारण आज आपल्या जगाला कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. हा वेग भोवळ आणनारा आहे. त्यामुळे साहित्यिकांसमोरील आव्हानेही तेवढीच वाढली आहेत.

गत शतकातील आढावा घेतला तर हजारोंनी लेखक-कवी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. पण ज्ञानेश्वरांची-नामदेवांची ते तुकोबांची उंची ओलांडुन जाईल...पुढेही टिकेल, कालातीत होईल अशी एकही साहित्यकृती मराठीत निर्माण झालेली आपल्याला दिसून येणार नाही. ज्ञानेश्वर-नामदेव-तुकोबा टिकले ते केवळ त्यांच्या आध्यात्मिक लेखनामुळे असे म्हणता येणार नाही कारण आध्यात्मिक लेखकांची तर फार मोठी मांदियाळी होऊन गेली आहे. जीवनाचे दर्शन हा त्यांच्या लेखनाचा मुलगाभा होता. आमचे साहित्यिक तेथेच कमी पडले हे वास्तव स्वीकारायला हवे. 

मी पारितोषिकांवरून साहित्याची उंची मोजत नाही. मी एखाद्या लेखकाच्या कृतीची समिक्षा किती झाली यावरुनही त्याची उंची मोजत नाही. मी एखादे पुस्तक किती खपले यावरुनही त्या पुस्तकाचा दर्जा ठरवत नाही. साहित्याची उंची आणि खोली मोजायचे एकच साधन असते म्हणजे त्यातील जीवनदर्शन किती प्रत्ययकारी आहे यावरून! तसे असले तर आज वाचक दहा आहेत कि दहा लाख...ते भविष्यात कोट्यावधी होतातच याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. अन्यथा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे साहित्यिकाच्या हातात असतेच. Old Man and the Sea ही अवघ्या शंभरेक पानांची कादंबरी...तिलास नोबेल मिळाले... पण ती हेमिंग्वेने ३२ वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली होती हे आम्ही विसरतो. 

साहित्यनिष्ठा हा साहित्यिकाचा प्राण असतो. पण मी आजकालच नव्हे तर प्रकाशक झाल्यापासून बघतो...१९९२ सालापासून कि लेखकाला प्रसिद्ध होण्याची अकारण घाई झालेली असते. संपादकीय संस्कार, पुनर्लेखन हे प्रकार अपवाद वगळता लेखकांना आवडत नाहीत. काही लेखक तर मी असे पाहिलेत कि पुस्तक प्रकाशित होण्याआधीच पुरस्कारांची फिल्डिंग लावून आलेले होते. एका नव-लेखकाच्या शोधलेखनात खरेच दम होता...पण अप्रोच बदलला तर ते लेखन एक माइलस्टोन ठरु शकले असते. पण त्यांना आहे तसेच प्रकाशित करायचे होते. कोणी प्रकाशक भेटला नाही तर ते स्वत: खर्च करून प्रकाशित केले. मला आता त्या लेखकाचेही नांव आठवत नाही...आठवतो फक्त विषय. 

म्हणजे आपणच विस्मृतीत जाण्यासाठीच लेखन करतो काय? केवळ पुस्तक यावे व एखादा पुरस्कार मिळावा हीच आपल्या लेखनाची प्रेरणा आहे काय? मला वाटते आपण हा प्रश्न मनोमन विचारायला हवा. आपापली कृती अधिकाधिक निर्दोष आणि अधिक सखोल जीवनदर्शन घडवणारी होईल याबाबत सजग रहायला हवे. असे म्हणतात लेखनाची एखादी कल्पना स्फुरते तोच प्रतिभेचा क्षण असतो...पुढची कारागिरी असते. पण कारागिरीलाही वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी कल्पना स्फुरण्याचा जो प्रतिभाशाली क्षण होता तेवढीच प्रतिभा पुन्हा पुन्हा पणाला लावावी लागते. 

ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा नेहमी म्हणतात कि मराठीत नोबेल पारितोषिक मिळण्याच्या योग्यतेची कविता-कथा-कादंबरी यायला हवी. त्यांचे बरोबर आहे. नोबेल मिळणे हे काही साहित्यकृती श्रेष्ठ असण्याचे लक्षण नाही. गांधीजींना नोबेल मिळाले नाही पण त्यांच्या शिष्याला मिळाले. गांधीजींची योग्यता कधीच कमी झाली नाही. नोबेल समितीला त्याबद्दल खेद व्यक्त करावा लागला. असाच खेद प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण होईल अशा कृती निर्माण करायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

असो. आपण आज ज्या जगात जगत आहोत ते कसे आहे? 

आज जागतिकीकरणामुळे जीवनाचे संदर्भ झपाट्याने बदलत चालले आहेत. मानवी नातेसंबंधांची मोडतोड होत त्यांची नव्याने फेरबांधणी होत आहे. त्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवरही होत आहे. किंबहुना एवढ्या वेगाने सांस्कृतिक-सामाजिक अभिसरण होऊ शकते याची कोणी कल्पनाही केली नव्हती. जागतीकीकरण गोयंकरांना तसे नवे नाही. पुरातन कालापासून विविध संस्कृत्यांचे मानवी समूह येथे आले आहेत. सर्वात आधी तीन-चार हजार वर्षांपुर्वी आले ते सुमेरियन. नंतर जसे हबशी आले तसे शिद्दीही. काही टिकले तर काही पुन्हा स्थलांतरीत झाले. पुढचा इतिहास आपल्याला माहितच आहे. किंबहुना गोवा...ही कोकणची अवघी किनारपट्टी जागतीक संस्कृत्यांसाठी एक पुल बनला. पण आताचे जागतिकीकरण वेगळे आहे. ते चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असू शकतो. मतमतांतरे असायलाच हवीत. पण हे जे संक्रमण होते आहे त्याचे जीवंत चित्रण करणे हे आपणासमोरचे मोठे आव्हान आहे.  

दुसरे महत्वाचे असे की मराठी साहित्यात एक नवाच चातुर्वर्ण्य निर्माण झालेला आहे. म्हणजे शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, ओबीसी साहित्य, प्रादेशिक कादंब-या इत्यादी. समिक्षक अशा कोणत्या ना कोणत्या क्यटेगरीत साहित्य ढकलत त्याचे त्या क्यटेगरीप्रमाने समिक्षण करत असल्याने, व त्यालाही पाश्चात्य साहित्यिक मापदंड लावत असल्याने एक विचित्र स्थिती झालेली आहे. ही स्थिती साहित्यिकांसाठीही विघातक आहे. प्रदेशाचे, जातीयतेचे परिमाण लावून त्या साहित्याकडे पाहिले तर साहित्याचा जो मुलगर्भ हेतू...वैश्विकता कसा साध्य होईल? महात्मा फुले सामाजिक संदर्भात म्हनाले होते...एकमय समाज निर्माण झाल्याखेरीज नेशन...म्हणजे राष्ट्र निर्माण होत नसते. यालाच पुढे नेवून म्हणता येईल कि साहित्यातील सर्व प्रवाहांना एकमयतेच्या दृष्टीने जर आपण पाहू शकलो नाही तर ते मराठी साहित्याला विघातक ठरेल...नव्हे ठरतेच आहे. र. वा. दिघेंच्या कादंब-यांना ग्रामीण कादंबरी किंवा प्रादेशिक कादंबरीचे लेबल चिकटवल्यामुळे पानकळासारख्या अभिजात साहित्यकृतीचे नुकसान झाले आहे हे आपण विसरता कामा नये. 

साहित्यकृती एकतर उत्कृष्ठ असते किंवा चांगली किंवा वाईट...साहित्य हे साहित्यच असते याचे भान समिक्षकांनी ठेवले पाहिजे.

आपल्या साहित्य व्यवहाराच्या अन्य अंगांकडे जरा दृष्टी टाकुयात. आज आपला साहित्य संस्कृतीचा व्यवहार अत्यंत विखंडित झाला आहे असे आपल्या लक्षात येईल. तसा तो सुरुवातीपासुनच आहे. विदर्भातला लेखक पश्चिम महाराष्ट्राला माहित होता होता त्याचे उमेदीचे वय निघून जाते. परराज्यांतील लेखकांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. प्रकाशक मिळणे, त्याची व्यापक समिक्षा होणे हे प्रकार कमीच आहेत. सर्वदूर मराठी भाषकांपर्यंत एखाद्या लेखकाला पोहोचता येईल असे दुर्दैवाने एकही माध्यम नाही. साहित्य विषयाला वाहिलेल्या पुरवण्या आटत चालल्या आहेत. एक-दोन पाने देणारी वृत्तपत्रे आता जाहिरातीच जास्त आणि चतकोर मजकूर अशा अवस्थेला आली आहेत. मग साहित्य प्रचार-प्रसार कसा होणार? नवीन लेखकांना व्यासपीठ कसे मिळणार?

महाराष्ट्रातील साहित्य संस्थाही कृपण बनलेल्या आहेत. परराज्यांतील लेखकांना, समिक्षकांना, विचारवंतांना आपण निमंत्रीत करायला हवे, त्यांची ओळख साहित्य रसिकांना व्हायला हवी यासाठी काही उपक्रम नाहीत. उलट परराज्यातील संस्था मात्र महाराष्ट्रातील लेखक-कवींना आवर्जून बोलवत असतात. त्यांचे मन लावून ऐकत असतात...सन्मान देत असतात. पण आपलेही काही उत्तरदायित्व आहे याचे भान महाराष्ट्रातील संस्थांनी ठेवलेले नाही याबाबत खंत व्यक्त केलीच पाहिजे. 

साहित्य संस्कृतीचे विकसन व्हायला, लेखक-कवींना मोकळे व्ह्यायला, अभिव्यक्त व्हायला साहित्य संमेलनांची, साहित्यिक कार्यक्रमांची, व्याख्यानांची आवश्यकता असते. गोवा हे त्या दृष्टीने श्रीमंत राज्य आहे असे म्हनावे लागेल. मराठी भाषेला अधिष्ठान देण्यात गोव्याने नेहमीच हातभार लावला आहे. किंबहुना गोव्याची संस्कृती घडवण्यात मराठीने मोठा हातभार लावला आहे. बा. भ. बोरकरांसारखे महान कवी याच भुमीने दिले आहेत. असे असतांनाही गोवा शासन मराठीला मात्र प्रशासकीय भाषेचा दर्जा देत नाही ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर हे घटनाविरोधी आहे. घटनेचे कलम ३०, ३४५, ३४७ आणि ३५० (अ व ब) नुसार एखाद्या राज्यातील किंवा त्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात राहणा-या एखाद्या अल्पभाषक गटाने जरी मागणी केली तरी त्यांच्या भाषेला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला पाहिजे. खरे तर घटनेत "राजभाषा" हा शब्दच नाही...आहे तो प्रशासकीय भाषा आणि एखाद्या राज्यात अशा अनेक प्रशासकीय भाषा असू शकतात. हे असे असूनहे मराठी भाषेला गोवा शासन प्रशासकीय भाषेचा दर्जा इतकी वर्ष मागणी करुनही देत नसेल तर ही बाब घटनेच्या विरोधात जाते. सर्वांनी घटनेचा सन्मान ठेवायला हवा. गोवा शासनही ठेवेल अशी मला आशा आहे.  

आजवर दिग्गजांनी भुषवलेल्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यंदा आपण माझी निवड केली याबाबत मी संयोजकांचा आणि आपणा सर्वांचा कृतज्ञ आहे. ही शेकोटी अशाच धगधगत राहो...आपल्या चिरंतन प्रकाशाने साहित्य संस्कृती तेजालत राहो...सर्वांसाठी एक दीपस्तंभ बनो आणि आपल्या सर्वांचे...मग साहित्यिक असोत कि साहित्य रसिक...जीवन समृद्ध करो ही शुभकामना. 

धन्यवाद.

5 comments:

  1. आई एक नाव असतं

    घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

    सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
    आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

    जत्रा पांगते पालं उठतात
    पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

    आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
    जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

    आई असतो एक धागा
    वातीला उजेड दावणारी समईतली जागा
    http://www.m4marathi.com
    घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
    विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

    पिकं येतात जातात
    माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान
    दिसत नसलं डोळ्यांना तरी
    खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

    याहून का निराळी असते आई?
    ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

    आई खरंच काय असते?
    लेकराची माय असते
    वासराची गाय असते
    दुधाची साय असते
    लंगड्याचा पाय असते
    धरणीची ठाय असते
    poem on aai in marathi
    आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!

    - कविवर्य श्री. फ. मु. शिंदे.happy new year

    ReplyDelete
  2. ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?
    कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
    क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
    गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
    माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
    मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
    भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
    प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
    कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
    पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे
    खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
    पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला

    मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
    पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !
    - कवी कुसुमाग्रज

    ReplyDelete
  3. सर आपला पराभव सर्व काही नकळत बोलुन जातोय

    ReplyDelete
    Replies
    1. खरेच असे वाटले तुम्हाला? तो तर मला मी उभा राहिलो तेंव्हाच माहित होता!

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...