Wednesday, July 23, 2014

प्ल्यंचेट आणि मी


अकरावीत होतो. पाबळला भाड्याच्या खोलीत आम्ही चार मित्र रहायचो. आमचे जेवण आम्हीच आळीपाळीने करायचो. माझ्या स्वयंपाकात प्रयोगच जास्त असल्याने कधी मजा तर कधी हजा व्हायची. तेथले वाचनालय हे खरे घर. वाचायला मनसोक्त मिळायचे. एकदा प्ल्यंचेटवरील एक पुस्तक वाचनात आले. मग सोडतो काय? मीही प्ल्यंचेट करायचे ठरवले. मित्रांना पटवायला लागलो. प्ल्यंचेटचे वाचलेले रसभरीत तर काही भयंकर किस्से सांगितले. मित्रांत एक साहेबराव म्हणून मित्र होता. आता तेवढेच नांव आठवते. त्यालाही मग मुड आला. मग बाकीचेही सारे पटले.

अमावस्येच्या रात्री प्ल्यंचेट यशस्वी होते असे लेखकाने आवर्जून सांगितले असल्याने तिची वाट आतुरतेने पाहू लागलो. आली. त्या दिवशी प्ल्यंचेटला लागणा्रे सामानही तयार केले होते. सामान म्हणजे काय...तर एक पाट (जो आमच्याकडे नव्हता...शेजा-याकडून आणला), ए टू झेड स्वतंत्रपणे लिहिलेला एक मोठा कागद आणि एक नाणे. लयच उत्सूक होतो आम्ही. बाकीच्यांत थोडे भयही होते. मी काय, अमावस्येच्या मध्यरात्री मानवी कवटी हातात घेऊन ओढ्याच्या डोहात कमरीवढ्या पाण्यात तंत्रसाधना करण्याचे दिव्य पराक्रम पुर्वी केलेच असल्याने निर्धास्त होतो. त्या दिवशी स्वयंपाकाची पाळी माझी होती. मला सहज जमणारी आणि भरपूर प्रयोग करायची संधी देणारी खिचडी त्यादिवशी कसलेही प्रयोग न करता भराभर त्या दिवशी बनवली. (म्हणून बहुदा चांगली झाली असावी...कारण त्या रात्री तरी कोणीच बोंब मारली नाही.)

रातचे बारा वाजेपर्यंत प्ल्यंचेट कसे करायचे याची आम्ही उजळनी करत बसलो. एकदाचे बारा वाजले. आम्ही पाटाभोवती न जमणारे गंभीर चेहरे करून बसलो. पाट, त्यावरील कागद आणि नाणे आधीच ठेवलेले होते. नाण्यावर चौघांनी बोट ठेवले.

आता मृतात्म्यांना आवाहन करायचे होते. ज्याचे बोट थरथरू लागेल त्याच्यात प्ल्यंचेट आले हे समजून इतरांनी प्रश्न विचारायचे होते. प्रश्न आधीच ठरलेले होते. (पोरी-बाळींशिवाय काय प्रश्न असणार आमचे?) उत्तरांची कमालीची उत्सूकता होती. आज ती मिळनारच याची खात्री होती.

आधी मनोमन आवाहने केली.

काहीच झाले नाही.

मग ओरडून आवाहने केली.

आमच्या ओरडण्याने आम्हीच हललो तेवढेच...मृतात्मा काही केल्या आमच्या हातात किंवा आमच्यात शिरायला तयार होईना.

शेवटी मस्तानीच्या रूहलाही आवाहन करून झाले.

करता करता वाजले दोन. पण कसचे काय?

मग यच्चयावत विश्वातल्या मृतात्म्यांना आणि ज्या कोणी नालायकाने प्ल्यंचेट हा चाळा शोधला त्याला घाल घाल शिव्या घातल्या. त्या शिव्यांचा जोर ओसरला...

तसे सारे माझ्यावर त्याच शिव्या मोठ्या प्रेमाने (?) बरसू लागले...

आता डा. दाभोळकरांचा खुनी शोधायला ज्या कोणी महामुर्खाला प्ल्यंचेटची कल्पना सुचली त्याला त्या शिव्या परत करतोय!

14 comments:

  1. आम्ही भावंड, त्यांचे मित्र, त्यांची भावंडं असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, खूप सहली काढल्या. कधी कधी कोणाच्यातरी डोक्यात यायचं चला प्लान्चेट करूया! मग सगळेजण रात्री एखाद्याच्या घरी जमायचो. मोठ्ठा चित्र काढायचा कागद घेऊन त्यावर ए ते झेड अक्षरं, बाजूला शून्य ते नऊ आकडे लिहायचे, बरोबर मधोमध "बाहेरच्या" पाहुण्यांसाठी आणि आजू बाजूला "हो"-"नाही" चे गोल काढायचे. उदबत्ती आणि काचेचा ग्लास हे सामान. भूताच्या गोष्टी ऐकून ऐकून पक्कं माहित झालेलं की देवगण वाल्यांना भूत काही करत नाही. त्यामुळे प्लान्चेट सफल संपूर्ण करण्यासाठी तीन देवगणवाले, त्यातला एक मी. प्लान्चेट सुरु करताना काचेच्या ग्लासमध्ये उदबत्तीचा धूर भरायचा, तो ग्लास कागदावर मधे उपडा टाकून तीन सारथ्यांनी उजव्या हाताची दोन बोटं ग्लासवर अलगद ठेवायची. मग त्यातल्या एकाने अतिशय नम्रपणे ह्या "बाहेरच्याला" आवाहन करायचे की तुम्ही या आणि आमच्या काही प्रश्नांची ( खूपच गहन...)उत्तर द्या, आणि तुम्ही आलात हे कळण्यासाठी "हो" वर जा. मंडळी... ग्लास अलगद फिरत "हो" वर जायचा! एकदा का हा परलोकवासी "हो" वर गेला की झाली त्याची परवड सुरु. मग मुख्य सारथी सगळ्यांतर्फे प्रश्न विचारायचा. प्रश्न काय माहित आहे? अमुक अमुक मोठेपणी कोण होणार? कुठला अभियन्ता होणार? नोकरी करणार की धंदा? कुठल्या गावाला?आमच्या मोठ्या बहिणी, मैत्रिणींची लग्न ठरवली प्लान्चेटने. आम्ही विचारायचो, त्यांच्या भावी नवऱ्याचे नाव काय? स्पेलिंग करून दाखवा, कुठल्या गावाचा असेल? काय शिकलेला असेल? वगैरे वगैरे. आम्ही ग्लासमध्ये कोणा कोणाला बोलाविले माहित आहे? ताजे ताजे गेलेले आत्मे लवकर यायचे, त्यामुळे राजीव गांधी, किशोर कुमार, संजीवकुमार,इंदिरा गांधी, संजय गांधी असे, पंडित नेहरू, गांधीजी हे यायचे पण जरा वेळ लावायचे. असं करून ह्यातली भीती पार निघून गेली होती, प्रश्न तरी किती आणि काय विचारणार मग आम्ही ह्या बाहेरच्यांची फिरकी घ्यायचो, त्यांची लफडी, अंडी पिल्ली बाहेर काढायचो, आमच्यातले काही जण गंभीर... बाकी नुसते हसून लोट पोट. असं करता करता ग्लास पडायचा मग सगळे गंभीर ("बाहेरचा" सुटला तर?) कित्येक जणांना बोलावलं पण कोणाच्या नातेवाईकांना मात्र नाही, आले आणि गेलेचं नाही तर काय घ्या?

    असंच एका रात्रि, प्लान्चेटसाठी गिऱ्हाईक शोधता शोधतामित्र म्हणाला, "अरे आमचा खडूस, म्हातारा मालक हल्लीच गेलाय", सगळे खूष ! ताजा, ताजा.......झालं त्यांना बोलावलं, ते लगेचच आले, ते पेशाने वकील होते, भाडेकरूंना खूप त्रास द्यायचे आणि आत्ता आमच्या ग्लासमध्ये. मग हवे नको ते विचारून त्यांची उलट तपासणी घेतली. बराच वेळ असं ग्लासमध्ये कोंडून फिर फिर फिरवलं, नंतर ग्लास चा वेग खूप वाढला आणि झाली की हो गडबड ....ग्लास थांबायलाच तयार नाही. मग मात्र आमची सगळ्यांची पाचावर धारण बसली.वकील साहेब खूपच भडकले होते आणि आम्ही सगळे चिडीचूप्प, हसणं एकदम बंद. सारथ्यांनी खूप विनवण्या केल्या, आम्ही चुकलो, माफ करा वगैरे वगैरे. थोड्यावेळाने स्वारी शांत झाली आणि सांगितल्या प्रमाणे "गेलो" हे कळण्यासाठी मधल्या गोलावर थांबली. ह्या प्रसंगानंतर आम्ही परत प्लान्चेट केलं नाही. प्लांन्चेट म्हणजे प्लान ऑफ चीटिंग.

    ReplyDelete
  2. हो प्लांचेट केलंय मी स्वतः, सांगते ती मजा.

    बर्‍याच वर्षांपूर्वी शाळेत असताना, एकदा कुणाला तरी करताना पाहिलं होतं, कृती समजुन घ्यायला आणि नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामे, मावस भावंडं एकत्र जमायचो, तेव्हा गच्चीत केले. पहिल्यांदा जेव्हा बघ्याची आणि विद्यार्थ्याची भूमिका बजावली होती, तेव्हा ते तितकेसे यशस्वी झाले नव्हते आणि त्यामुळे हे सगळं बकवास असतं असंच वाटत होतं.

    दुसर्‍यांदा मात्र इतर भावंडं, आजुबाजुची मित्र-मंडळी आग्रह करु लागली, दुपारच्या वेळी, गच्चीत, कृती मलाच नीट माहित होती, म्हणून केले धाडस, मात्र ती वाटी इतकी जबरदस्त वेगाने फिरू लागली पाटावर कि आमाची भंबेरी उडाली हाताची बोटे स्थिर ठेवताना. बॉलिवूडमधील दिवंगत नट-नट्यांना बोलवले होते आणि प्रश्नांची उत्तरेही बर्‍यापैकी योग्य वाटत होती, कैच्याकै वाटत नव्हती. सगळे खूप एंजॉय करत होतो. पण जसजसा दिवस मावळू लागला, सर्वच अस्वस्थ होवू लागले व तो प्रकार थांबवला.

    एका मामे भावाला (वय वर्षे १०) खूप भिती वाटली हे बघताना व भितीने ताप भरला आम्ही बाकी सारे १३-१४ वर्षांचे होतो व काही त्रास जाणवला नाही नंतर मात्र काहितरी चुकीचे केल्याची रुखरुख लागून राहिली का कोण जाणे आणि हे असले काही त्यानंतर कधीच परत करायचे नाही हे ठरवून टाकले.

    हे सारं का व कसं घडतं, नाही माहित, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी वाटी अक्षरांवरुन फिरताना पाहिलीय आणि आपण जावू शकता हे शेवटी सांगताच ती वाटी हलायची थांबून मुळ स्थानी परत येतानाही पाहिलंय.

    कृती मी मुद्दाम सांगत नाही इथे कारण कुणीही तिचे अनुकरण करावे असे मलाच आता वाटत नाही.
    इथे अनेकांना माहितही असेल बहुदा.

    एक अविस्मरणीय अनुभव होत प्लांचेटचा !!

    ReplyDelete
  3. आमचेही असेच झाले होते.
    मी ३-४ वेळा केलंय प्लांचेट.
    माझ्या ताईच्या लग्नानंतर ती दिवाळसणाला आली होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा केलं.
    भावजींनी शिकवलं.
    कृती फारच सोपी होती त्यामुळे अजिबात विश्वास बसत नव्हता.
    पण जेव्हा ती वाटी फिरायला लागली तेव्हा अक्षरशः हात घाईला आले.

    नंतर मी नोकरीनिमित्त चेन्नईला गेलो तेव्हा तिथल्या मराठी चमूमधल्या काही मैत्रिणींना खूप उत्सुकता होती.
    म्हणून एकदा रात्री आमच्या घरी केलं होतं.
    आम्ही सावरकर, शिवाजी महाराज, पु.ल. ह्यांना बोलावलं होतं.
    सावरकरांचा आत्मा लवकर जाईच ना आणि नंतर नंतर (खूपच प्रश्न विचारून झाल्यानंतर) उत्तरे असंबद्ध येत होती.
    आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर खरे ठरले नाही.
    आत्ता आम्ही त्याच्याकडे केवळ गंमत म्हणून पाहतो खरे, पण वाटी जोरजोरात फिरायला लागली तेव्हा दोन क्षण जाम टरकलो होतो सगळेच. त्यात ते (सावरकर) जा म्हणता जाईनात.
    "आमचे प्रश्न विचारून झालेत. तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्ही जाणार असाल तर 'येस' कडे चला. "
    असं म्हणून पाहिलं पण वाटी हलेच ना.
    तुम्ही जाणार नाही आहात का? असं विचारल्यावर 'येस' कडे वाटी.... आणि आमची वाट फिदीफिदी
    थोड्या वेळाने पुन्हा जाणार का म्हणून विचारलं तर वाटी 'नो' कडे.
    मग आम्ही वाटी सरळ केली. ज्यांनी पहिल्यांदाच केलं होतं त्यांना जाम टेन्शन.
    पण त्यामुळे वेगळं/ वाईट काहीच झालं नाही.
    मग ती वाटी फिरण्याची कारणे वगैरे ऊहापोह सुरू.
    ग्रूपमधल्या एकाने जरी त्यावर अविश्वास दाखवत भाग घेतला असेल तर वाटी फिरत नाही असा मात्र अनुभव आहे.
    गूगलबाबाकडे याची शास्त्रशुद्ध उत्तरे आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा स्मित

    ReplyDelete
  4. आपण सुंदर उदाहरण दिले आहे
    विनोदाचा भाग सोडला तर ,हा प्रकार लहान मुलांचे विश्वात अलगद येतो आणि बरेच दिवस रेंगाळत असतो !आणि शिशुमन व्यापलेले अनेक नाजूक अनामिक गुंते सोडवताना त्याचे मन एकतर्फी यात गुंतत जात असते प्रत्येकाकडे असे खजिने असतील , पण आपण याला मोकळी वात करून दिली आहे बरेच जण आनंदाने आपले मन मोकळे करतील असे वाटते ,जितके वय जास्त तितके अनुभव विश्व अजून गमतीदार असणार !
    मिताली

    ReplyDelete
  5. आप्पा - अरे संजय , मस्तच !१९८० ची गम्मत असेल ना ही ?
    बाप्पा - आम्ही पण असेच झपाटलो होतो ,ते वयच तसे असते !
    आप्पा - पानशेत चा पूर आणि चीन युद्ध नुकतेच होऊन गेले होते , नेहरूही नुकतेच गेले होते
    बाप्पा - नेहरू प्लान्चेटवर लगेच येतात अशी अफवा होती -
    आप्पा - आम्हीपण तू म्हणतो तसेच सर्व केले ,आणि काय सांगू महाराजा ! एबीसीडी असे लिहिलेल्या कागदावर आमचे पालथे टाकलेले भांडे सरकले , घाम आला , प्रश्न काय , तर आपली भूमी आपल्याला परत मिळेल का ?- आणि भांडे सरकू लागले - येस - असे पटापटा सरकले
    बाप्पा - आम्ही सुखावलो - आमची बालबुद्धी सुखावली - आम्हाला सर्व समरगीते पाठ होती , आम्ही जवानांना आमचे स्वेटर आणि पांघरुणे दिली होती , आस एकच होती - आमची भूमी आम्हास परत हवी ! का तर आमचे पीटीचे सर तसे म्हणायचे !
    आप्पा - येस उत्तर आल्यावर आम्ही एकमुखाने ओरडलो - भारत माता की जय ! !
    बाप्पा - इतक्यात दारावर टकटक झाले , भीतीने आमची गाळण उडाली ,
    आप्पा - प्लांचेट चा हात काढता येईना आणि दारावर जोरजोरात टकटक होत होते - नेहरुंना तसाच नमस्कार करून आम्ही उभे राहिलो ,दार उघडले
    बाप्पा - समोर खुद्द आई ! काय रे कसला ओरडा चाललाय - गधड्यानो , इकडे पाकिस्तान युद्ध पेटलय , आत्ता कुठे रेशनवर रॉकेल आणि साखर मिळत्ये असं समजलंय - जा एकेकाने पिशवी आणि रेशन कार्ड घेऊन - आणि ही थेर बंद करा - त्या नेहरूला म्हणावं - जिवंतपणे काही केलं नाहीस आणि आता भांड्यावर बसून आम्हाला काय अक्कल शिकवतो आहेस - जा पळा !-
    नाहीतर ढुंगणावर एकेक शिपटी मारीन !
    आप्पा -अजूनही तो भूभाग चीन कडेच आहे आणि आम्ही दर १५ ऑगस्ट ला " भारत माता की जय " म्हणत असतो !

    ReplyDelete
  6. amhi pan college astana planchet kele hote, 97 sali, ratri ek mitrala khurchivar basavle aani saglyani ek ek bot lavale khurchila ani khurchi 1 foot var uchalali geli hoti.

    ReplyDelete
  7. sonavani saheb, planchet he satvik ani dharmik vivharachya mansache hote, tumchya sarkhya nastik lokanche kadhich yashasvi hot nahi.

    ReplyDelete
  8. युधिष्ठीर - बर झाल ,संजय ने प्लांचेट चा विषय काढला
    दुर्योधन - हो ना रे दादा ! हे बघ तुझं नि माझं काही वैर नाही -
    युधिष्ठीर - ते खर आहे रे , आपण पण प्लांचेट करायचोच की , आपला कृष्ण किती हातोहात फ़सवायचा ?आणि तुझी आई पण किती रागवायची - काहीतरी कराल आणि कुणीतरी मानगुटीवर बसेल आणि जाता जाणार नाही -
    दुर्योधन - आणि आपला विदुर काका किती सांगत बसायचा - जुन्या जुन्या गोष्टी , मला तर काहीच लक्षात राहायचं नाही !एकदा आठवतंय , आपण प्लांचेट केले आणि तो कोण बरे आला होता - शंतनू - बापरे - किती बोलत बसला होता !इतकी जुनी भाषा - संजय तर फार घाबरला होता - सोन्याचे भांडे घेतले की आत्मा लगेच येतो म्हणून आपण पुजेतले देव्हाऱ्यात असते ते देवाचे भांडे घेतले आणि तो आत्मा निघाला आजारी !सारखा खोकत आणि शिंकत होता !
    युधिष्ठीर - मागच्या वर्षी आपण चुकून व्यास गुरुजीना बोलावले होते , ते एकदम खेकसले - "मी तुमच्या बापाच्या बापाचा बाप आहे -" मला तर काहीच कळाल नाही - आपले भीष्म आजोबा म्हणाले - नंतर सांगेन !, पण व्यास किती जोरात ओरडले ना - मी अमर आहे आणि मला कसले प्लांचेट वर बोलावताय ?आणि गुप्त झाले !
    दुर्योधन - खर सांगू - आपल घराण काही फार निर्मळ दिसत नाहीये - फार घोळ वाटतात -
    दुर्योधन - फार गेमाड पूर्वज होते आपले - आत्ता कृष्ण जसा आहे ना तसेच !
    १६ सहस्त्र बायका - काही खर नाही !
    युधिष्ठीर - आणि आमच तरी काय - आणि तुझ तरी काय - सगळाच आनंद आहे - त्यामुळे आपण प्रश्न तरी काय विचारणार ?
    दुर्योधन - अरे १०० भाऊ , नावच लक्षात रहात नाहीत -!
    युधिष्ठीर - आणि आमचे खरे भाऊ किती ते पण कळत नाही - कर्ण म्हणे आमचा भाऊ !

    आणि आता संजयने नवीनच फ्याड काढलय - म्हणे महाभारत हे रामायणाच्या आधी घडल आहे -
    या संजयचे सर्वच विचित्र - आपला संजय बरा - तो कसा लाइव्ह लढाईचे वर्णन करायचा - पण हा संजय सोनावणी फारच गडबड करतो - बरेच वेळा वाटते की पटकन जाउन कोणाच्या तरी प्लांचेट वर त्याला ओरडून सांगावे - की रामाच्या नंतरच कृष्ण झाला आहे रे बाबा , असे इतिहासाचे काळाचे काटे भराभर हवे तसे आगेमागे फिरवू नको - त्रास होतो आम्हाला !

    ReplyDelete
  9. प्लँचेट, दाभोलकर आणि सावरकर

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट केल्याच्या बातमीने सध्या महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली आहे. प्लँचेट हे पोलिसांसाठी काही नवे नाही. दहशतवादविरोधी पथकांनी अनेकवेळा प्लँचेट करून आरोपींचा अदमास घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्लँचेट खरे की खोटे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला म्हणून प्लँचेट थांबतील या भ्रमात कोणी राहू नये.

    प्लँचेटसाठी भारतभर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्म्याला बोलावण्यास प्राधान्य दिले जाते. सावकर यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे तो लवकर येतो, तसेच प्रश्नांची उत्तरेही तो अचूक देतो, असे प्लँचेट करणारे लोक मानतात. खरेखोटे प्लँचेट करणारे आणि सावरकरच जाणोत. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी करण्यात आलेल्या प्लँचेटमधून पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. डॉ. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी सावरकरांच्या आत्म्याला बोलावले असते, तर कदाचित खुनी सापडलेही असते, असेही तमाम प्लँचेटकर मानत आहेत.

    ReplyDelete
  10. अरे रे ,
    सावरकर अतृप्त आत्मा होते हा दिव्य शोध चमत्कारिकच आहे
    सावरकर प्रायोपवेषण करून त्यांनी देहत्याग केला असा इतिहास आहे . त्यांचे जीवन तृप्त होते
    प्लांचेट हा प्रकार हाताळणे हासुद्धा अत्यंत अशिक्षित प्रकार आहे
    एक लक्षात ठेवले पाहिजे
    भूत आले की आत्मा आला म्हणजे मोक्ष आला - पुनर्जन्म आला -स्वर्ग नरक आले - पाप पुण्य आले
    आपण आत्म परीक्षण कधी करणार ?
    असे असणेच शक्य नाही असे आपली बुद्धी का सांगत नाही ? हा आपला वैचारिक पराभव आहे -
    जगात स्वर्गही नाही आणि नरकही नाही -आत्मा नाही आणि मोक्षही नाही !
    आपल्या उत्क्रांतीतून आपण इतके तरी शिकायला हरकत नसावी एकदा एक मिथक मानले की सर्व आलेच मागून मागून -पाप आले की तोडगे आले , उपाय आले -आणि मग तुमचे संकट दूर करणारे धार्मिक एजंट आले !हे दुष्टचक्र आहे , आपला देश आधी वैचारिक पराभवाने पराभूत होतो आणि मग प्रत्यक्ष पराभूत होतो !हा इतिहास आहे !
    मुसलमान आले त्यांनी हजारो जप जाप्य करणाऱ्या ब्राह्मणाना कापून काढले - कोणताही देव धाऊन आला नाही - कलीचा फेरा आणि पारतंत्र्य - हे पराभूत मनोवृत्तीचे द्योतक आहे
    १००० वर्षे त्यांनी आपल्यावर राज्य केले -कोणताही देव आला नाही मदतीला -
    एक महात्मा आला त्याला सुद्धा या ब्राह्मणांनी मारला !
    इंग्रजांनी खूप आटापिटा केला , नवीन शिक्षण दिले , समाज सुधार केले ,
    पण आपण परत परत मागेमागेच जात आहोत
    सुजीत पेंढारकर

    ReplyDelete
  11. अपावी मं चा पुळका येउन ज्यांनी ्यांचा ब्लोग वाचायचे सुचवले आहे त्यांच्या साठी मुद्दाम निवेदन करतो ते असे की त्यांच्या विचारला आव्हान करणारे लेखन जर त्यांच्या ब्लोगवर आपण केले तर अपावीमं कधीही ते प्रसारित करून त्याची दाखल घेत नाहीत आजच्या लोकशाहीच्या काळात खरेतर त्यांनी प्रत्येक मताचा आदर करून त्याचे खंडन मंडण केले पाहिजे
    आचार्य अत्रे पुल किंवा इतिहासाचार्य राजवाडे अशा ब्राह्मणांच निन्दानालस्ती करून त्यांना बदनाम करण्याचा गावढळ उद्योग हा मंच करत असतो
    संजय सोनवणी यांनी मात्र सर्वांच्या मताचा उत्तम आदर आज पर्यंत तरी केला आहे -त्यामुळे ते या मन्चा पेक्षा शतपटीने श्रेष्ठ ठरतात
    दुसरी बाब अशी आहे - शिवाजी रामदास असा एक गुरु शिष्याचा प्रकार जनतेला सांगायचा प्रकार मागच्या पिढीत झाला त्यातील सत्य हा संशोधनाचा विषय आहे -
    पण त्याला प्रत्युत्तर म्हणून तुकाराम शिवाजी असे गुरु शिष्याचे नाते जनतेवर लादण्याचा जोरदार प्रयत्न सध्या चालू आहे -
    शिवाजीचे दैवत काय ते सर्वजण जाणतातच ! शिवाजीची वृत्ती टाळ कुटणाऱ्या देवाचे गोडवे गाणारी नव्हती हे अगदी सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे

    स्वराज्य उभारणीला या संतानी कणभरही हातभार लावलेला दिसत नाही तसेच म्लेञ्च्छ राज्याच्या पारीपत्याविषयी या संतांनी एक चकार शब्दही कधी अभंग ओवी यामधून रचलेला दिसत नाही
    याला सर्व जातीचे संत अगदी ज्ञानेश्वरा पासून एकनाथ नामदेव चोखोबा तुकाराम यांच्या पर्यंत कोणीही अपवाद नाही हे सत्य नाकारता येत नाही विठोबा हा वीररस पुजानारा देव मुळातच नाही आणि शिवाजी हा शिवभक्त असे म्हटले जाते त्यामुळे तो अशा वैष्णव पंथाला किती प्रोत्साहन देत असेल हे पण अभ्यासले पाहिजे आज ब्रिगेडी लोक त्यांना हवे तसे इतिहास वाकवू बघत आहेत हा दुधखुळा प्रकार काही इतिहास म्हणून खपणारा नाही त्यामुळे त्यांच्या अकलेची लक्तरे मात्र वेशीवर टांगली जात आहेत !
    मुळात हि संघटना दाखल घेतली जात नाही म्हणून हिंसक विचारांची आणि ब्राह्मण द्वेष्टि म्हणूनच लोकाना माहित आहे त्यामुळे एक हिणकस पोरकट टोळके इतकीच त्याची किंमत ठरते

    त्या मानाने संजय सोनावणी यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे !
    कारण ते कधीही कुठेही चर्चेची सभ्यता न सोडता खंडन मांडण या तत्त्वावरच प्रत्युत्तर देतात - हे अत्यंत सुसंस्कृत पणाचे आणि प्रगल्भतेचे लक्षण आहे - एखादी संघटना इतिहासात कशामुळे प्रसिद्ध राहते याला पण महत्व आहेच ना शेवटी ?संजय यांचे कार्य फारच विधायक म्हणून धरले जाइल आणि आपवी मंच हा अत्यंत दळभद्री टोळके म्हणून हिणवला जाईल आणि आज तेच खरे ठरवत आहात आपण !
    आपण सांगितले आहे की अनेक ब्राह्मण हे मुसलमान आमदानीत मुसलमान सत्तेकडून शिवाजी विरुद्ध काम करत होते - मग शहाजी राजे तरी काय दिवे लावत होते ? आणि राज्याभिषेक होई पर्यंत शिवाजीतारी मोघलांचा सरदाराच होता असे इतिहास सांगतो - शिवाजीने हा गनिमी कावा केला असे आपले म्हणणे असते - आणि सावरकरांनी जर माफीपत्र सादर केले असेल इंग्रजांकडे तर ती संपूर्ण शरणागती असे आपण उर बडवून जगाला सांगत असता - असा आपला दुतोंडी कारभार आहे - हे सर्वाना कळून चुकले आहे
    शिवाजीने तरी आपली सत्ता स्थिर करताना सर्व जैतॆच्या लोकांचा उत्तम वापर करून घेतला - प्रत्येक जातीची वैशिठ्ये अभ्यासून माणसांची निवड केली आणि ते ते काम त्यांच्या कडून करवून घेतले - हाच शिवाजीचा मोठ्ठे पणा ठरतो - आपल्या सारखे सारखे ब्राह्मणांच्या नावे बोंब मारत बसणारा तो नव्हता - त्याच्यापुढे अथांग काल होता आणि त्याचे नेतृत्व हे शतकातून एकदाच होणारे असे होते - तो जर युरोपात जन्माला आला असता तर त्याने जग जिंकून दाखवले असते आणि एक उत्तम प्रशासक म्हणून त्याने नाव कमावले असते - त्या संदर्भात आपण केवळ गाडीच्या नालीबरोबर धावणारे कुत्रे ठरता ! अशी हि अनिता पाटील यांची कथा आहे
    संभाजी निंबाळकर

    ReplyDelete
    Replies
    1. संभाजी निंबाळकर साहेब,
      तुमची कमाल आहे. काहीही लिहिता. मी सन्माननीय सोनवणी सरांच्या ब्लॉगप्रमाणेच अपाविमंचा नियमित वाचक आहे. मला या ब्लॉगवर ब्राह्मण जातीच्या विरोधात एकही पोस्ट आजपर्यंत दिसून आली नाही. पु. ल. देशपांडे, अत्रे वगैरे साहित्यिकांच्या विरोधात लेख आहेत. पण, हे लोक ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांना अपाविमंने विरोध केल्याचे या लेखात कोठेही म्हटलेले दिसून आले नाही. त्यांच्या लेखनाची समीक्षा त्यात आहे. हे लोक ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांची समीक्षा करूच नका, असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय? हा तर निव्वळ जातीयवाद आहे.

      राहता राहिला संजय सोनवणी आणि अपाविमंच्या तुलनेचा, तर स्वत: संजय सोनवणी यांनी अपाविमंच्या संस्थापिका अनिता पाटील ताई यांना आशीर्वाद दिला आहे. हा आशीर्वादपर लेख अपाविमंवर जसा उपलब्ध आहे, तसाच तो सोनवणी साहेबांच्या ब्लॉगवरही आहे. या लेखाची लिन्क येथे देत आहे. कृपया उघडून वाचा.

      http://anita-patil.blogspot.in/2012/04/blog-post_3070.html

      श्रीकांत कुलकर्णी, खर्डा, जि. जालना.

      Delete
  12. बापरे ,
    अहो कुलकर्णी ,
    अपावी मं ची भाषा बघा - हे काय परीक्षण असते असे ?लो टिळक यांच्या बद्दल बघा लेख -
    समाजात यांना काही पत तरी आहे का , वैचारिक विश्वात यांच्या मताची दखल्सुद्धा कोणी घेत नाही , विषय शिवाजी तुकाराम हा आहे
    कुलकर्णी साहेब , आमच्या मते टाळ कुट्या तुकारामांना शिवाजीचे गुरु मानाने हा शिवाजी आणि तुकोबा दोघांचाही अपमान आहे दोघांच्याही वाटा , तत्वज्ञाने आणि उद्दिष्टे भिन्न होती
    तुकोबाने मुसलमान अमदनॆचा कुठेही निषेधही केला नाही
    बोला आता !जालन्याचे श्रीकांतराव !

    ReplyDelete
  13. मी संजयची आणि रायगडची कुत्र्याची समाधी बाबत त्याची अस्वस्थता अनुभवली आहे आणि फार जवळून पाहिली आहे
    संजय आणि हरी नरके आणि ब्राह्मण यावर आपली मल्लीनाथी वाचली आहे ते ब्राह्मण अनुनय करतात असे आपले म्हणणे असते
    शहाजी महाराज हेपण मुस्लिम चाकरीत होते त्याचे काय , आपण तर ब्राह्मण हे मुसलमानांच्या चाकरीत होते असे म्हणता - शिवाजीपण राज्याभिषेक होई पर्यंत मुघलांचा मनसबदार होता - आणि नंतरही तो तसाच त्यांना नजराणे पाठवत होता
    आपण ज्याला इतिहास संशोधन म्हणता त्याला आम्ही ब्राह्मण द्वेषाची कावीळ असे म्हणतो !
    किसनराव धनगर

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...