Sunday, December 14, 2014

भगवद्गीता....राष्ट्रीय ग्रंथ?

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अजतागायत जो काही प्रवास दिसत आहे तो विकासाकडे नसून धर्मांधतेकडे जाणारा आहे असे कोणीही तटस्थ निरिक्षक म्हणेल. भाजप हा पक्ष रा. स्व. संघाचे अपत्य असल्याने त्याची वैदिकवादी विचारसरणी पुढे रेटणार हे अभिप्रेत होतेच पण फक्त तोच एकमेव अजेंडा रेटला जाईल हे मात्र अभिप्रेत नव्हते. कोंग्रेसचे आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण व सामाजिक/शैक्षणिक धोरण यात अधिक वास्तविकता, सर्वोपयोगी एकसुत्रीपणा आणतील व विकासाच्या दिशा बदलत उद्योग ते रोजगाराच्या व्यापक संध्या उपलब्ध करण्यासाठी नवीन धोरणांची अपेक्षा होती. शिक्षण क्षेत्रालाही मेकालेच्या रोजगारप्रणित गारुडातून बाहेर पाडत विद्यार्यांचे कल लक्षात घेत त्यात त्यांना "तज्ञ" बनवणारे नवीन धोरण आणतील अशीही अपेक्षा होती. भारत-पाक सीमेवर कोंग्रेसच्या राजवटीत जेवढ्या घुसखोरीच्या, भारतीय सैनिकांच्या मृत्युच्या घटना घडत होत्या त्यात कमी होणे सोडा या "छप्पन इंची" छातीच्या प्रधानसेवकाच्या काळात वाढच झालेली दिसते.

याचा अर्थ असा घ्यायचा कि खरे तर या सरकारकडे राबवण्यासाठी मुळात धोरणच नाही? प्रत्यक्षातील वास्तव तर तेच दिसते आहे. जेही काही धोरण आहे ते मात्र सुरुवातीपासून चर्चेचे, समाजाच्या टीकेचे कारण बनलेले आहे. सुरुवात केली ती स्मृती इराणी यांनी. शपथविधी होऊन काही दिवस उलटतात न उलटतात तोवर त्यांनी अभ्यासक्रमात वैदिक विज्ञान-गणित वगैरे सामील करणार असे घोषित करुन धुरळा उडवून दिला व या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत हे एका परीने घोषित केले. बात्राप्रणित शिक्षणप्रणाली गुजराथमद्ध्ये राबवली गेलीच असल्याने आता ती भारतभर राबवली जाणार अशी रास्त शंका नागरिकांना येणे स्वाभाविक होते. तुर्तास जरी हे धोरण गासडीत बांधून ठेवले असले तरी ते पुढे खरेच राबवले जाणार नाही असेही नाही. नंतर अलीकडेच इराणीबाईंनी अभ्यासक्रमात जर्मनीऐवजी संस्कृतचे पिल्लू सोडले. खरे तर ही ऐच्छिक भाषा आहेच. परंतू संस्कृत या मृत भाषेची सक्ती करणे म्हणजे मुलांचा वेळ वाया घालवणे. बरे ही भाषा वैदिकांची असा काहीतरी गैरसमज (जसे भारतीय संस्कृतीबाबत संघाचे आहेत) यांचा आहे त्यामुळे एवढे कवतूक. प्रत्यक्षात ही भाषा सनपुर्व ३०० ते सन १५० या कळात क्रमश: कशी उत्तर ते महाराष्ट्रापर्यंतच्या दक्षीण भागात कशी उत्क्रांत झाली याचे अतोनात पुरावे उपलब्ध आहेत. या भाषेची निर्मिती बौद्ध ते अनेक अवैदिक समाज व सत्तांनी केली. याचा फक्त वैदिकांशी काही संबंध नाही. परंतू सांस्कृतिक अपहरणे करत वैदिक महत्ता गाजवण्यासाठी संस्कृतचा हत्याराप्रमाणे गेल्या सहस्त्रकात वापर केल्का गेला हेही वास्तव आहे आणि तोच कित्ता आता गिरवण्याची त्यांना हौस आली आहे एवढाच मतितार्थ त्यातून निघतो. अर्थात संस्कृतच्या सक्तीलाही विरोध झाला....स्मृती इराणी यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. त्यात "रामजादे-हरामजादे" हे "हे राम" म्हणायला लावील असे प्रकरण घडले. ते वादळ अजून शमत नाहीय.

हे प्रकरण ताजेच असतांना आता सुषमा स्वराज वैदिक सांस्कृतिक झेंडा घेऊन पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी दिल्ली येथील भगवद्गीतेच्या ५१५१ व्या वर्धापनदिनी लाल किल्ल्यासमोर झालेल्या कार्यक्रमात गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची पंतप्रधानांकडे मागणी केली. आपण या कार्यक्रमात मंत्री म्हणुन सामील झालो नाहीत अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या कार्यक्रमात त्या असेही म्हणाल्या कि, "बराक ओबामांना मोदींनी गीतेची प्रत भेट दिल्याने अनौपचारिक रित्या गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा दिलेलाच आहे." या त्यांच्या असांस्कृतिक मागणीमुळे अजून नवे वादळ उठणे स्वाभाविक होते. तसे ते उठलेही आहे.

खरे तर मोदींच्या सध्या रिकामटेकड्या असलेल्या मंत्र्यांनी संघाची बौद्धिके देणा-या पुस्तकांपार जात अन्य संशोधनेही वाचायचे कष्ट घेतले पाहिजेत. तसेही सर्व खात्यांचे खरे मंत्री मोदीच असल्याने त्यांना वेळच वेळ आहे. तो जरा सत्कारणी तरी लावला पाहिजे व भारतीय केंद्रीय मंत्रीमंडळ हे अर्धवट ज्ञानी नसून सखोल अभ्यासकही आहेत हे सिद्ध होईल. असो. आपण हा गीताप्रकार नीट समजावून घेवूयात.

भगवद्गीता काय आहे?

भगवद्गीता ही साक्षात श्रीकृष्णाने महाभारताच्या समरप्रसंगी हतोत्साहित झालेल्या अर्जुनाला युद्धोन्मूख करण्यासाठी सांगितली यावर सर्वच हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्यक्षात महाभारताचे अभ्यासक यावर काडीइतकाही विश्वास ठेवत नाहीत. महाभारताच्या भीष्मपर्वात गीता येते. मुळात १८ अध्यायांची गीता रणभुमीवर कृष्णाला सांगायचा अवधी मिळाला हेच गृहितक, महाकाव्यात शोभत असले तरी, वास्तवात ते शक्य नाही. मुळात आज उपलब्ध असलेले महाभारत व्यासांचे नाही. व्यासांचे मुळ वीरकाव्य हे "जय" नांवाचे होते व ते ८८०० श्लोकांचे होते. पुढे "जय"चे भारत व पुढे अजून भर पडत महाभारत झाले ते सौति व जनमेजयामुळे. ही रचना शेकडो वर्ष चालु असली तरी त्याला अंतिम रुप गुप्तकाळात इसवी सनाच्या चवथ्या शतकात मिळाले असे विद्वानांचे मत आहे. गीता मुळात व्यासांची कि सौतीची याबाबतही विद्वानांत मतभेद आहेत.

हे असे असले तरी गीतेत एकाच वेळीस इतके तत्वज्ञान प्रवाह आले आहेत कि गीतेला नेमके काय सांगायचे आहे याबाबतही घोळ आहे. एकाच वेळीस युद्धभुमीवर अर्जुनाला युद्धायमान करण्यासाठी इतकी सारी तत्वज्ञाने कृष्ण सांगत बसेल हेही संभवनीय नाही. त्यामुळे युद्धभुमीवर सांगितली गेलेली गीता प्रत्यक्षात एखाददुसराच अध्याय असू शकेल असेही विद्वानांचे मत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा शेवट हा ज्या समाप्तीने केला आहे तो पाहता व तसा महाभारतात अन्य कोणत्याही अध्यायात  दिसत नसल्याने त्याची रचनाच एक स्वतंत्र पुस्तक म्हणून झालेली दिसते.

खरे तर गीता हा तत्कालीन उपलब्ध तत्वज्ञानांचा कुशलतेने केला गेलेला संग्रह आहे व त्याचे महत्व वाढवण्यासाठी महाभारतातील युद्धप्रसंगाचा अत्यंत चपखलपणे वापर केला गेलेला आहे. तसा गीता हा ग्रंथ कृष्णाच्या नांवावर असला तरी ते वास्तव नाही. असू शकत नाही. सध्याचे महाभारत हे इ.स. च्या चवथ्या शतकात सिद्ध झाले. मुळ व्यासप्रणित "जय" मद्धे नेमके काय होते हे कळयला आता तरी मार्ग नाही. मुळात ते फक्त ८८०० श्लोकांचे होते. पुढे त्यात भर पडत गेली व जवळपास लाख श्लोकांचे महाभारत बनले. गीता ही कधीतरी दतिस-या-चवथ्या शतकाच्या आसपास कोणी अनाम तत्वद्न्याने महाभारतात घुसवली असे स्पष्ट दिसते.

भगवद्गीतेवर आजवर अनेक टीका (भाष्ये) झालेली आहेत. उपलब्ध असणारे जुने भाष्य हे आदी शंकराचार्यांचे असून त्यांनी गीता ही अद्वैतवादी व निवृत्तीपर असल्याचे प्रतिपादन केलेय तर मध्वाचार्यांनी त्यात विशिष्टाद्वैतवादाचा शोध लावला आहे. ज्ञानेश्वरांना त्यात संन्यास/ज्ञानयोग दिसतो तर टिळकांना गीतारहस्यात गीता ही कर्मयोगपर असल्याचे वाटते. म. गांधींनीही गीतेवर भाष्य लिहिले असून तीत त्यांना "अनासक्तियोग" दिसतो. याचा अर्थ असा कि आजवर प्रत्येक भाष्यकाराने गीतेतून आपल्याला हवा तसा अर्थ काढला आहे आणि ते केवळ सहजशक्य अशासाठी आहे कि त्यात सर्वच प्रकारांच्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. अनेक तत्वज्ञाने स्वाभाविकपणेच परस्परविरुद्ध आहेत. उदा संन्यासयोग आणि कर्मयोग परस्परांशी मेळ कसा घालतील? थोडक्यात गीता हा तत्वज्ञानांचा संग्रह आहे आणि त्या दृष्टीने त्याचे तत्वज्ञानांचा इतिहास पाहण्यासाठी मोल आहेच!

गीता ५१५१ जुनी?

संस्कृतीवादी नेहमीच आपले प्रिय ग्रंथ किती पुरातन आहेत हे सांगण्यात धन्यता मानतात. महाभारताचा काळ कथित नक्षत्रस्थितीवरून इसपू ३१३९ एवढा काढला जातो. त्यात काही अर्थ नाही हे सर्व विद्वानांना मान्य आहे. मुळात ऋग्वेदच इसपू १५०० वर्षाच्या मागे जात नाही. एडविन ब्रायंट म्हणतात जर उत्खननांत उपलब्ध जालेले पुरावे आणि महाभारतातील पुरामद्ध्ये हस्तिनापूर वाहून गेले ही कथा विचारात घेतली तर महाभारत इसपू चारशेच्या पलीकडे घडलेले असू शकत नाही. अंधभाविकांसाठी गीता पृथ्वीची निर्मिती झाली त्याही पुर्वीची वाटू शकते. परंतू मंत्र्यांनाही जर तसे वाटत असेल तर मात्र आपल्या देशाचा एकुणातील बुद्ध्यांक ढासळत तर नाहीहेना याची चिंता वाटली पाहिजे.

दुसरे म्हणजे स्वराज म्यडम धडधडीत खोटे बोलतात हेही या निमित्ताने सिद्ध झाले. मोदींनी ओबामांना गीतेची प्रत भेट दिली असे त्या सांगतात. मोदीच अनेक खोटे दडपून बोलत असतांना त्यांचे मंत्रीमंडळ तरी मागे का राहील? खरे असे आहे कि गीता नव्हे तर महात्मा गांधींनी गीतेवर जे भाष्य लिहिले ते मोदींनी ओबामांना भेट दिले. त्यामागील सांकेतिक अर्थ वेगळा होता. स्वराज म्यडमचेच खरे मानायचे तर मग मोदींनी गांधींच्या अनासक्तियोगाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून अनौपचारिक रित्या घोषित केले असा मग अर्थ निघेल. अर्थात तसेही वास्तव नाही. गीता हा धर्मग्रंथ नसून तत्वज्ञानांचा संग्रह अहे असे सुयोग्य निरिक्षणही उच्च न्यायालयाने २०१२ साली नोंदवले होते हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे.

राष्ट्रीय ग्रंथ?


गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे ही मागणी स्वराज यांनी केली हे अधिक गंभीर आहे. पहिली बाब म्हणजे कोणताही धर्मग्रंथ भारतात राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करता येत नाही कारण भारताने धर्मनिरपेक्षतेची चौकट स्विकारली आहे. गीता जरी तत्वज्ञानांचा संग्रह असला तरी त्यालाही राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करता येत नाही कारण गीता हा परस्परविरोधी तत्वज्ञानांनी भरलेला ग्रंथ आहे. त्यतील अर्जुनाला "युद्धायमान" करणारा कृष्ण संघाच्या एकुण विचारसरणीला प्रेय वाटत असला तरी मुळात तत्वज्ञान हे सापेक्ष आणि नेहमीच द्वंद्वात्मक असल्याने त्यात कोणातही एकमत होऊ शकत नाही.

गीतेवर आजवर शेकडोंनी भाष्ये लिहिली गेली आहेत. सांप्रदायिक मंडळी त्यात आघाडीवर राहिली आहेत. गीतेची परसंगी मोडतोड ते करतात. अलीकडचेच उदाहरण म्हणजे रशियात गीतेवर बंदी आल्याची बातमी इकडॆ फार गाजवली गेली होती. प्रत्यक्षात गीतेवर नव्हे तर गीतेच्या इस्कोनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या भाष्यावर ती बंदी होती कारण त्यांनी हिंसेला प्रोत्साहन दिले होते. हे सत्य मी उजेडात आणल्यानंतर इस्कोनी भडकले होते हेही वास्तव आहे. थोडक्यात गीतेचा हवा तसा सोयिस्कर उपयोग सर्वच पंथांनी केला आहे असे दिसून येईल.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे यच्चयावत जगात कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही धर्मग्रंथ अथवा तत्वज्ञानग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देलेली नाही. इस्लामी राष्ट्रांत शरियाचे कायदे लागू असले तरी त्यांनीही कुराणला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित केलेले नाही. भारतात गीता शैव-शाक्तांना तसेच अनेक नास्तिक पंथांना जुन्या काळापासूनच मान्य नाही कारण गीतेत असलेले वैदिक समर्थन.

कोणाला कोणता ग्रंथ धर्मग्रंथ म्हणून आवडावा याचे स्वातंत्र्य घटनेने नागरिकांना दिलेले आहेच. त्यातील तत्वज्ञानाचा रुचेल तसे अर्थ काढत प्रचार-प्रसार करायलाही कोणी अडवलेले नाही. भारतात असंख्य तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्यात सांख्य-चार्वाकादि नास्तिक तत्वज्ञाने आहेत तशीच नाथ, शैव/शाक्त, बौद्ध, जैनादि स्वतंत्र धर्मप्रेरणांनी निर्माण झालेली वैदिकविरोधी स्वतंत्र तत्वज्ञानेही आहेत. कोणते तत्वज्ञान आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणून वापरावे/अभ्यासावे याचे मन:पुत स्वातंत्र्य आपले संविधान देते.

अशा परिस्थितीत वैदिकवादाने झपाटलेल्या मंडळीने आमचे (ते त्यांचे नसले तरी...उदा सांख्य तत्वज्ञान अवैदिकांचे आहे) तत्वज्ञान वा आमचा धर्मग्रंथ हाच राष्ट्रीय ग्रंथ व्हावा अशी मागणी, तेही स्वत: मंत्र्यांनी करावे हे अजब आहे...निषेधार्ह आहे.

मोदी सरकार कोठे चालले आहे याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. जनतेचे प्रश्न, त्यांच्या आशा/आकांक्षा व जीवनस्वप्ने वास्तवात येण्यासाठी धोरणे न ठरवता, अंमलबजावणी न करता फुटकळ विषयांना चर्चेत आणत लोकांचा वेळ वाया घालवणे त्यांना शोभत नाही. चर्चाच घडवून आणायच्या तर विकासावर. धर्मावर नव्हेत याचे भान अजुनही मोदी सरकारला येत नसेल तर त्यांनी जनतेचा घोर विश्वासघात केला आहे असेच म्हणावे लागेल!

20 comments:

  1. In one of your last articles on Sanskrit (where you said you will answer few questions raised in one comment, however, you never answered them) you said that Panini formalized Sanskrit grammar in 250 AD. However, most of the people believed (at least many scholars i have read) that Panini lived in the era of 400 BC, or may be before that. What is the truth?

    ReplyDelete
  2. अमित सर ,
    एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते , आपण ती समजून घ्याल अशी आशा आहे
    आपण संजय सोनावणी यांच्याकडे कोणतीही अपेक्षा का ठेवता ? कारण धादांत टिंग्या लावण्यात ते माहीर आहेत , त्यांना अनेक जणांनी बौद्धिक कचाट्यात पकडण्यासाठी अतिशय संवेदनशील प्रश्न विचारले आहेत , पण ते अतिशय जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष्य करतात
    आणि दुसरी गोष्ट ,
    त्यांच्या ब्लोगवरचे लिखाण हे काही संशोधन म्हणून विचारात घेतले जात नाही -
    गावगप्पा असेच त्याचे रूप असते ,त्यामुळे त्यांना विनोदी लिखाण करणारे आणि आत्म मग्न असलेले म्हणून धरले जाते - त्यांची पुस्तके तर अत्यंत दयनीय प्रकारची असतात
    वैदिक म्हणून कुठूनतरी ओढूनताणून बडबड करत बसणे हा त्यांचा उद्योग !
    असो !
    मोघल अमदानी इंग्रज अंमल अशा अतिशय कट्टर राजवटी इथे होऊन गेल्या त्यात अनंत अत्याचार ,मानसिक शोषण झाले , पण यांचे सर्व लक्ष वैदिकांवरच !वैदक हे हिंदू नाहीत असे यांनी ठरवून टाकले आहे तर मग परत परत संजय कशाला त्यांच्यात तोंड खुपसतात ?
    त्यांचा शैव सिद्धांत तर विनोदीच आहे - यांचे जर बौद्धिक तेज प्रखर असते तर यांचा उदोउदो झाला असता - पण हे अडगळीतले अध्यक्ष असा यांचा नावलौकिक आहे - "जेथे कमी तेथे आम्ही"हि म्हण सार्थ करत ते आपला महिमा वाढवत असतात
    वैदिक , आर्य आणि वैष्णव यांचे बौद्धिक कोलांट उड्या मारणारे प्रात्यक्षिक तर खास हसवणारे असते आणि आजपर्यंत आपण जसा आग्रह धरता तसाच मीही आग्रह धरला आहे - त्याचे काहीही उत्तर नाही - हि त्यांची खासियत आहे
    i am not reportable to you असा काहीतरी उलटा प्रकार ते मानतात म्हणून आपल्या प्रश्नांची बांधिलकी ते उडवून लावत असावेत असे हल्ली वाटू लागले आहे
    त्यांची ठराविक चौकडी आहे त्यांना ते आपल्यावर सोडतात आणि प्रतिकाराचा केविलवाणा आणि हिंस्र प्रयत्न करतात असा अनुभव घेतलेले असंख्य आहेत
    मामला बौद्धिक चर्चेचा असताना अशी पापे करताना त्यांना लाज शरम वाटत नाही हे त्यांच्या संस्कारातून आलेले असेल - दुसरे काय असू शकते ?
    तात्पर्य , आपण त्यांच्या कडून तीक्ष्ण बौद्धिक चर्चेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे - पालथ्या घड्यावर पाणी !
    संजय साहेब , काय म्हणताय ? यावर - मूग गिळून गप्प ना ?
    निदान रामायण हे महाभारता नंतर घडले हि विनोदी कथा एकदा परत सांगा की - काय ?

    ReplyDelete
  3. माझ्या अनुभवाप्रमाणे काही ठराविक लोक अत्यंत वैयक्तिक टीका करत असतात त्यामुळे अतिशय त्रास होतो
    नराधम वगैरे शब्द वाचताना विषण्ण वाटते
    खरेतर हा ब्लोग वैचारिक चर्चेसाठी आहे त्यात विकास किंवा लिहा वाचा असे टोपण नावाने लिहिणारे आपल्यालाच वेड्यात काढतात - याला काय म्हणावे ?
    भगवत गीतेबद्दल आज पर्यंत हजारो लोकांनी लिहिले आहे पं नेहरूंनी सुद्धा त्याचे गोडवे गायले आहेत
    मुळात पं नेहरू , आणि त्यांचे घराणे यांचा ओढा इंग्रज संस्कृतीकडे जास्त - पुस्तकी पोशाखी भारतीयता जपण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही -
    राजकीय नेतृत्वाला प्रेझेंटेबल करण्याचे म गांधींचे तंत्र त्या घराण्याने आत्मसात केले आणि ते हिरो बनले त्यांच्या पावलावर पाउल ठेवत इंदिरा गांधी आल्या - राजीव आला -मोदिनी यात शिखर गाठले आहे !
    संजय उवाच -
    भगवत गीता हे कधीही तपासून पाहिले तर संजय सोनावणी म्हणतात तसे एका विचारांचे समर्थन करणारे दिसत नाही - अनेकांनी त्यावरून अनेक अर्थ काढले आहेत हे विधान अगदी सत्य आहे
    असे होणे स्वाभाविक आहे पण वैदिक आहे म्हणून टाकाऊ हेपण योग्य नाही !
    समजा काल्पनिक पाने असे समजा - संजयला कुणी असे म्हटले की तुम्हाला जिवंत सोडतो पण गीता वैदिक आहे असे म्हणणे बंद करा तर संजय काय करेल -
    तो काही शैविक हुतात्मा बनणार नाही -
    इतका तो वैचारिक बांधिलकी असलेला प्रगल्भ अभ्यासक नाही !
    भरल्या पोटी शाब्दिक चाळे करणारा तो एक पडीक लुडबुड्या आहे
    वेळ आणि परिस्थिती पाहून तो ब्राह्मण पुराणिक आणि वैदिक वर्गावर हल्ले करत असतो
    खरेतर त्याने चौकाचौकातून जाहीर वैदिक वग्मयच्या होळ्या केल्या पाहिजेत -
    पण ह्यांचे शेपूट घालून पळ काढणे सर्वाना माहित आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. Mohini, are you stupid? Mind your language first and then teach philosophy to others.

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Except "Indian Constitution" no any religious book accepted as a National Book"

    ReplyDelete
  7. संजय सरांनी त्यांच्या हूब वर जे भगवान श्रीकृष्णावर लिहिले आहे त्यातील भावना आणि
    भगवत गीता राष्ट्रीय ग्रंथ यातील मते एकमेकाशी काहीही तारतम्य दाखवत नाहीत
    असे प्रकार त्यांच्या बाबतीत अनेक वेळा दिसून येतात - असे का होते ?श्रीकृष्ण एक का तीन असा प्रश्न त्यांनी विचारला आहे तसेच नाहीतर विचारावे लागेल -
    संजय सोनावणी एक का तीन ?

    ReplyDelete
  8. लिहा वाचा काकांची प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले
    समजा एकच फोटो समान आला तर काय करणार ?
    आपला लेख आपणास वाकून नमस्कार करण्याच्या योग्यतेचा आहे हे नक्की
    आपण जरी आमचा अवमान केला तरी आम्ही आपणास साष्टाग नमस्कारच करणार इतकी आपली योग्यता आहेच !
    आपण जे गीतेबद्दल लिहिले आहे ते दररोज वाचावे इतके सूक्ष्म आणि स्पष्ट आहे अगदी सोपे करून आपण एक थोर सामाजिक कार्यच केले आहे
    आजच्या आमच्या पिढीला असे सहज सोपे सांगणारे कुणी भेटत नाही - सरर्व जीवनाचेच कप्पे झाल्यामुळे अवघड होते आहे करमणूक अध्यात्म अभ्यास अर्थार्जन नातीगोती कर्तव्ये सामाजिक देणे आणि अशासारखी अनेक बंधने - त्यामुळे खरे चिंतन आणि आत्मसंवाद फार म्हणजे फारच कमी होत चालला आहे - त्यात आपण अत्यंत दुर्मिळ आणि जिव्हाळ्याच्या विषयाला उत्तम मांडणीने जिवंत केले आहे
    आपल्याला आपले प्रतिक्रियात्मक निरुपण वाचून भेटावेसे वाटते पण आपण जी ही टोचणी लावून आम्हास बहिष्कृत केले त्यामुळे एक सदासर्वदा वाहात राहणारी वेदना आपण जागवली आहे !
    कुणा दुसऱ्याला आपण अशा वेदना देऊ नका हीच आपल्या पायाशी मागणी आहे

    ReplyDelete
  9. एखाद्याने एखादा विचार या तथाकथित उच्चवर्णीय लोकांना पोषक असा मांडला तर ते त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतात, अभिनन्दनाचा वर्षावच करतात. त्यांना आनंदाच्या उखळ्याच फुटतात? मात्र त्यांच्या विरोधात एखाद्याने लिहिले की यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि उगीचच डोक्यात राख कालवून घेतात. अगदी वेडेपिसे होतात! हे लक्षण ठीक नाही! मग काय वेगवेगळ्या नावाने लिहून स्वतः चेच खोटे समाधान केले जाते! हे मानसिक रोगाचे लक्षण नाही तर काय आहे?

    ReplyDelete
  10. अरे विकास ,
    ते काहीही असो - ते लिहितात त्यात वाईट काय आहे ?

    इतका रिकामटेकडा असशील असे वाटले नव्हते
    लिहा वाचा पण तसलाच आहे

    लिहा त्याचे नाव आणि वाचा त्याच्या पिताश्रींचे नाव आणि विकास त्याच्या आजोबांचे नाव असावे - हो ना ?

    ReplyDelete
  11. pruthviraj vijayraj
    samir ghatge
    suvarna shakuntala
    AMRUTA VISHVARUP
    pratibha pratima
    aappa bappa
    Dattatreya Agashe
    mohini parkar
    pratibha pratima pratima

    या विविध नावांनी लिहिणारी व्यक्ती कोठेही पूर्ण विरामाचा (.) कधीच वापर करीत नाही, या मागचे सहस्य काय? ते रहस्य समजू शकेल काय? पूर्ण विरामाचे बटन तुटले आहे काय? (- -) चा वापर मुबलक प्रमाणात होतोय, नाही काय?

    ReplyDelete
  12. भगवद्गीता नव्हे, भारतीय राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ - कुंभारे

    केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभर पडत असून माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी स्वराज यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून 'भारतीय राज्यघटना' हाच राष्ट्रीय ग्रंथ असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला.
    भगवदगीतेसह, धम्मपद, कुराण, बायबल, गुरुग्रंथसाहेब हे सर्व धर्मग्रंथ पवित्र असून ते सर्व भारतीयांना आदरणीय आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार भगव्दगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देत असेल तर अन्य धर्मियांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारत हा अनेक धर्म, पंथ, संप्रदाय मिळून बनलेला देश आहे. विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्टय़ व परंपरा राहिलेली आहे. भारतीय राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ आहे व त्यामुळे भारताची लोकशाही वर्षांनुवर्षे अखंडित राहील, असे मत कुंभारे यांनी व्यक्त केले.

    ReplyDelete
  13. गीतेस राष्ट्रग्रंथ म्हणणे संकुचितपणा ठरेल

    भगवद्गीतेतील विचार कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाहीत. त्यात संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्त्वज्ञान आहे. राष्ट्रग्रंथाचा दर्जा देऊन त्याला संकुचित करू नये, असे परखड मत संत साहित्याचे अभ्यासक व घुमान येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले.
    ज्ञानसाधना महाविद्यालयातील जनकवी पी. सावळाराम नगरीत भरविण्यात आलेल्या अभाविपच्या १३ व्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. १३ व्या शतकापासून १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत संत साहित्य हा एकच प्रवाह मराठीत प्रचलीत होता. संतांच्या रचनांमध्ये मराठी भाषेचे सौदर्य दडलेले आहे. मराठी शब्दसंपत्तींचा तो अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळे 'संत साहित्य' असा वेगळा प्रकार मानून मुख्य साहित्य परंपरेपासून त्यास बाजूला सारणे योग्य नाही. अशा प्रकारची विभागणी करणे साहित्याचा संकोच ठरेल. खरेतर ज्ञानेश्वरी हा निवृत्तीनंतर वाचायचा ग्रंथ नाही. मात्र ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी लिहिलेला हा ग्रंथ बहुतेकजण ६१ व्या वर्षांपर्यंत वाचायला घेत नाही, हे दुर्दैवी आहे, असेही मोरे म्हणाले. कार्यक्रमानंतर बोलताना नेमाडेंनी साहित्य संमेलनाविषयी केलेल्या वक्तव्यावर थेट भाष्य करणे त्यांनी टाळले.

    ReplyDelete
  14. खरी चूक देवाचीच!

    रवींद्र देसाई

    सात महिन्यांपूर्वी देशात सत्तांतर झाले. या काळात कट्टरतावादी नेते वा संस्थांनी संस्कृत भाषा, राममंदिर, गीतेसारखा ग्रंथ तसेच घरवापसी यांसारखे मुद्दे पुढे आणले. यामुळे आपला वेगळाच अजेंडा ते राबवू पाहात असल्याचे सर्वसामान्यांना वाटू लागले आहे. अशा वादविषयांची वेगळ्या अंगाने चिकित्सा करणारे टिपण..
    रागावू नका मंडळी, कोणाच्याच भावना दुखवायची माझी इच्छा नाही; पण शांतपणे विचार करून पाहिलात, तर तुम्हीसुद्धा 'चूक देवाचीच आहे' हे लगेच कबूल कराल. देवाचा अवमान करण्याचा तर माझा काडीमात्र हेतू नाही. त्याच्याशी पंगा घेऊन, मेल्यानंतर मला नरकात जाऊन पडायचे आहे थोडेच?
    देव सर्वशक्तिमान आहे. साऱ्या विश्वाचा व्यवहार केवळ त्याच्या इच्छेनुरूप चालतो. आपण कोणाच्या पोटी, केव्हा आणि कुठे जन्म घ्यायचा, जन्मभर काय भोग वा हालअपेष्टा भोगायच्या, केव्हा मरायचे हे सारे देवच ठरवतो. जिवंतपणी आपल्या हातून कोणती कृत्ये व्हावीत, इतकेच काय, पण आपल्या मनात कोणते विचार यावेत, हेही सारे केवळ देवच ठरवतो.
    टाचणीच्या टोकावर ज्यांचा मेंदू ठेवला तरीदेखील त्या टोकावर मूळ जागेइतकीच जागा शिल्लक राहील, अशा किडय़ा-मुंगीसारख्या क्षुद्र (क्षुद्र केवळ आपल्या लेखी हं, परमेश्वराच्या लेखी नव्हे! कारण तीही त्याचीच निर्मिती आहे ना?) जीवांनासुद्धा आहार, निद्रा, भय, मथुन या गोष्टी परमेश्वराने त्यांच्या जीन्समध्ये आणि डीएनएमध्ये लिखित स्वरूपात दिल्या आहेत. आपण ती लिपी अजून तरी वाचू शकत नाही, ही बाब वेगळी! श्वसन, पचन, उत्सर्जन, जनन संस्थेसारख्या अत्यंत जटिल यंत्रणा - इतक्या जटिल की, आजपर्यंत मानवाला त्यांच्यासंबंधीचे झालेले ज्ञान हे समुद्रतटावरील वाळूच्या एका कणाइतके क्षुद्र आणि अल्प आहे - त्या क्षुद्रादिक्षुद्र प्राणिमात्रांनासुद्धा त्याने बहाल केल्या आहेत. प्रत्येक प्राणिमात्राला पंचज्ञानेंद्रिये दिली आहेत; विचारशक्ती (आपल्या लेखी थोडी कमी-जास्त) दिली आहे, वंशसातत्याची ओढ दिली आहे. खरोखरच हे सारे केवळ थक्क करणारे आहे.
    मग अन्य कोणालाही अशक्यप्राय असलेले हे इतके सारे निर्माण करणाऱ्या परमेश्वराने आणखी केवळ एकाच तर्कशुद्ध गोष्टीची निर्मिती केली असती, तर काय बिघडले असते? निदान त्याने तसे केल्याचे मला तरी (त्याच्याच इच्छेने?) जाणवत नाही म्हणूनच मी (की माझ्या मुखातून तोच!) असे म्हणतो आहे की, 'खरी चूक परमेश्वराचीच आहे'.

    ReplyDelete
  15. मंडळी, सारे काही निर्माण करण्याचे सामथ्र्य असलेल्या परमेश्वराने समजा, 'देव म्हणजे कोण', 'धर्म म्हणजे काय', 'धर्माचरण म्हणजे काय', 'माझा अधिकृत प्रतिनिधी कोण', 'अधिकृत धर्मग्रंथ कोणता' याची कोणालाही कळेल अशी अत्यंत सुस्पष्ट (आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकुलती एक!) व्याख्या प्रत्येक मानवाच्या जीन्समध्येच लिहून ठेवली असती, तर बिचाऱ्या परमेश्वराच्या पदरचे असे काय चार चव्वल जादा खर्च झाले असते? किंवा नुसताच ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट करण्याऐवजी त्याने 'आकाशवाणी' करून (आकाशवाणीवरून 'मन की बात' करून नव्हे!) स्वत:च्या धीरगंभीर आवाजात हे सारे अजून जरी स्पष्ट केले की, 'बाबांनो, भांडू नका, या साऱ्या जगाची निर्मिती मीच केली आहे. प्रभू रामचंद्र हा माझाच अवतार होता. आज जी अयोध्येत वादग्रस्त इमारत आहे, तेच प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थळ आहे (किंवा 'नाही'सुद्धा!)'; 'गीता हा केवळ राष्ट्रीयच नव्हे तर वैश्विक पूज्य ग्रंथ मानावा' अथवा 'पैगंबर हेच शेवटचे प्रेषित आहेत' किंवा 'येशू हा माझा अत्यंत लाडका पुत्र मी केवळ तुमच्यावरील प्रीतीपोटी पृथ्वीवर पाठवलेला आहे' किंवा यापेक्षाही धमाल म्हणजे त्याने आपल्या इलेक्शन कमिशनकडून ती सुप्रसिद्ध नॉन-वॉशेबल इंक घेऊन, प्रत्येकाच्या कपाळी 'हा युगानुयुगांचा िहदू', 'हा जन्मोजन्मीचा मुसलमान', 'हा पिढय़ान्पिढय़ांचा ख्रिश्चन' वगरे वगरे 'परमनंट' शिक्के अजून जरी मारले, तर कित्येक प्रश्न झटक्यात मिटतील.
    पण नाही. परमेश्वर असे स्वत: काहीही करत नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी दुसरेच कोणी तरी अशा अनधिकृत घोषणा करतात वा शिक्के मारतात आणि मग ती घोषणा स्वीकारण्याचा, नाकारण्याचा वा भलतेसलते शिक्के पुसण्याचा इतरांना उगीचच अधिकार प्राप्त होतो. मग त्यातून खूनखराबा होतो. 'यदा यदाही धर्मस्य.. संभवामी युगेयुगे' असे खुद्द कृष्णाने (पण मानवी रूपात!) म्हटले म्हणून तर त्या काळातसुद्धा दुर्योधनाने ते मानले नाही. जो आधीपासूनच विनातक्रार आपल्याला देव मानतो त्या अर्जुनाला हे 'विश्वरूप दर्शन' घडवण्यापेक्षा, 'विश्वरूप दर्शन' दुर्योधनाला घडवणे अधिक उचित व उपयुक्त नसते का ठरले?
    खरे तर भाडय़ाचे ट्रक वा बिदागी न पाठवतासुद्धा, अनायासे किमान १८ औक्षणींचा मॉब कुरुक्षेत्रावर जमला असताना, मानवरूपी कृष्णाच्या तोंडून 'संभवामी युगे युगे' असा अर्जुनाला दिलासा देण्याऐवजी, भले अदृश्य रूपात जरी परमेश्वराने, 'मुकाटय़ाने कृष्ण काय सांगतो ते ऐका, नाही तर माझ्याशी गाठ आहे,' अशी आकाशवाणीवरून तंबी दिली असती, तर कौरवांची युद्ध करायची काय बिशाद झाली असती; पण नाही. परमेश्वर तेव्हा मूग गिळून गप्प बसला आणि आता त्याऐवजी गीतेतला एकही श्लोक माहीत नसलेल्यांना कंठ फुटला आहे. परमेश्वरा, अशी करतात का रे कधी 'स्वराजनिर्मिती'?
    किंवा याचा दुसऱ्या पद्धतीनेही अन्वयार्थ लावता येईल. एक तर देवाला यातले तेव्हाही काहीच अपेक्षित नव्हते किंवा अजूनही नाही. खुद्द परमेश्वराचे या तथाकथित धर्माशी, धर्ममरतडांशी, मुल्ला-मौलवींशी, पोप-पाद्रय़ांशी, गीता-कुराण-बायबलशी तेव्हाही काहीच देणेघेणे नव्हते अथवा अजूनही नाही. हे सारे धर्माच्या नावावर दुकाने चालवणाऱ्यांचे तेव्हाचे उद्योग होते आणि अजूनही तेच चालू आहे किंवा देवाकडून खरोखरच गफलत झाली आहे!
    देवांच्या मदतीस चला तर..
    तेव्हा आता बापडय़ा देवाची चूक ती सुधारायची पाळी आपल्यावर आली आहे. 'देव म्हणजे कोण', 'धर्म म्हणजे काय', 'धर्माचरण म्हणजे काय', 'धर्माचा अधिकृत प्रतिनिधी कोण', 'अधिकृत धर्मग्रंथ कोणता', या साऱ्याचा निर्णय आपणच करू या. आपण खुद्द परमेश्वराचेच अंश आहोत ना? मग आपल्याला परमेश्वराशी संवाद साधायला बाहेरचे दलाल मुळात हवेतच कशाला?
    तहानलेल्याला पाणी पाजणे म्हणजे धर्म. दुसऱ्याच्या डोळ्यांतील पाणी पुसणे म्हणजे धर्म. या दोन्ही गोष्टी करणे म्हणजे धर्माचरण! छळाने, बळाने, कपटाने दुसऱ्याची वस्तू छिनून घेणे म्हणजे अधर्म! दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी येईल असे वागणे म्हणजे अधर्म! अशा गोष्टी करणे म्हणजे अधर्माचरण! धर्म आणि अधर्म समजून घेणे इतके सोपे असताना आपल्याला हवेत कशाला अरबी, फारसी, इंग्लिश अथवा संस्कृतमधले ते दुसऱ्याकडून समजून घ्यायला लागतात असे क्लिष्ट ग्रंथ?
    आपल्या मनाचा आवाज ऐकू या.
    तीच खरी देवाची साद असेल.
    (जाताजाता : आणि हो, धर्मभ्रष्टांना शिक्षा करायची 'फुकट फौजदारी' स्वत:च्या शिरावर घेऊ नका. त्यांना शासन करण्यासाठी खुद्द परमेश्वर स्वत: समर्थ असेलच, नाही का? तुम्ही ते काम स्वत:च्या हाती घेणे म्हणजे बिचाऱ्या परमेश्वराला नालायक ठरवून, आपण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे दाखवून देण्याजोगेच नाही का?)

    ReplyDelete
  16. गीतेचा स्वराजाध्याय.........

    या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा करता येईल, असाच त्यांचा प्रयत्न आहे. संस्कृत, गीता, रामजादे विरुद्ध हरामजादे.. ही सर्व उपकथानके पुढे केली जात आहेत ती मूळ कथा सुरूच होऊ शकलेली नाही म्हणून.
    केंद्रीय जलसंपत्तीमंत्री साध्वी उमा भारती, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह वा अलीकडे गाजलेल्या नव्या साध्वी आणि अन्नप्रक्रिया खात्याच्या राज्यमंत्री निरंजन ज्योती वगरेंच्या तुलनेत सुषमा स्वराज या संयत आणि विचारी असाव्यात असे समजले जात होते. भगवद्गीता या ग्रंथास राष्ट्रीय ग्रंथ म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी करून श्रीमती स्वराज यांनी तो धुळीस तर मिळवलाच. पण आपण अन्य कोणत्याही बेजबाबदार साध्वी वा साधूंपेक्षा तसूभरही कमी नाही हेही त्यांनी दाखवून दिले. काही वर्षांपूर्वी त्यांनी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर आपण केशवपन करू असे जाहीर करून आपण किती कर्कश होऊ शकतो हे सिद्ध केले होते. वास्तविक त्यानंतर स्वराज यांना गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती. परंतु तरीही त्यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चच्रेत होते. नरेंद्र मोदी यांनी त्यांची साग्रसंगीत पंचाईत केल्यामुळे ते मागे पडले. त्यामुळे त्यांना केवळ परराष्ट्र व्यवहार खात्यावरच समाधान मानावे लागले. पण ते खातेही दाखवण्यापुरतेच. कारण त्या खात्याचा खरा कारभार पंतप्रधान मोदी यांच्याच हाती असून आंतरराष्ट्रीय विषयांवर श्रीमती स्वराज यांना ते फार विचारतात असेही नाही. तेव्हा प्रसिद्धी आणि महत्त्व मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनही असेल त्यांनी एकदम टोकाची भूमिकाच मांडली असून गीता या धर्मग्रंथाचे स्थान हे राज्यघटनेपेक्षाही वरचे असल्याचे सूचित केले आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून जो बाष्कळपणा सुरू झाला आहे, त्यात स्वराजबाईंचे ताजे विधान शोभून दिसते. त्यांनी हे विधान केल्याकेल्या भाजप नेत्यांत त्याचे समर्थन करण्यासाठी चांगलीच अहमहमिका सुरू झालेली दिसते. हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे स्वराजबाईंच्या पुढे एक पाऊल गेले आणि अन्य देशीय राज्यघटनांच्या तुलनेत गीता ग्रंथात किती शाश्वत मूल्ये सांगितली आहेत आणि आपण गीतेलाच राज्यघटनेपेक्षाही अधिक महत्त्व कसे द्यायला हवे हे ते सांगत बसले. त्यांच्या हरयाणा राज्याने गीता जयंती साजरी करण्यासाठी दुप्पट निधीचे नियोजन केल्याचीही घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनीही गीता जयंतीसाठी असेच काही करावे असा त्यांचा आग्रह आहे. हे सर्व गीतारहस्य विशद करायची संधी या सर्वाना मिळाली ती नवी दिल्लीत ग्लोबल इनस्पिरेशन अ‍ॅण्ड एन्लाइटन्मेंट ऑर्गनायझेशन ऑफ गीता, ऊर्फ जियोगीता, या संघप्रणीत संघटनेमार्फत आयोजित गीतेच्या ५१५१ व्या वर्धापन दिन सोहळ्यात. स्वराजबाईंच्या या विधानाने अनेकांना अपेक्षेप्रमाणे लगेचच चेव चढला. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांनी लगेच गीता हा राष्ट्रग्रंथ म्हणून जाहीर केला जावा, अशी मागणी केली. जे झाले ते अगदीच हास्यास्पद म्हणावयास हवे.

    ReplyDelete
  17. याचे कारण समस्त हिंदूंसाठीदेखील भगवद्गीता पूज्य आहे, असे नाही. वास्तवात हिंदू असो वा अन्य कोणी. बुद्धीच्या आधारे जगताना कोणीही एकच एक ग्रंथ प्रमाण वा अंतिम मानण्याची गरज नाही. कोणतेही एक पुस्तक परिपूर्ण वा सर्व प्रश्नांना उत्तरे देणारे असू शकत नाही. त्यात धर्मग्रंथ तर नाहीच नाही. मग तो गीता असो वा अन्य कोणता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे देशातील सुखवस्तू हिंदूंना जेवढे गीतेचे आकर्षण होते वा आहे, तेवढे आíथकदृष्टय़ा निम्नस्तरावर असणाऱ्यांना नाही, हे ध्यानात घ्यावयास हवे. डॉ. आंबेडकर यांच्यातील सामाजिक तत्त्वचिंतकाने गीतेसंदर्भात विस्तृत विवेचन केले आहे. त्यांच्या मते गीतेचे महत्त्व वाढावयास सुरुवात झाली ब्रिटिशांच्या काळात. ख्रिस्ती, मुसलमान आदींप्रमाणे िहदूंसाठीही एखादा धर्मग्रंथ असावयास हवा असा विचार त्यांनी केला असावा, या डॉ. बाबासाहेबांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते बुद्धपूर्व आर्य संस्कृतीत कोणतीही नीतिनियमांची चौकट नव्हती. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर येथे मोठी आधी सामाजिक आणि नंतर राजकीय क्रांती झाली. या काळात ब्राह्मणांच्या हितसंबंधांना बाधा आली. परंतु मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर ब्राह्मणांनी पुन्हा उचल खाल्ली आणि ब्राह्मणांच्या या प्रतिक्रांतीचे समर्थन करण्यासाठी गीतेचा घाट घालण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे डॉ. दयानंद कोसंबी यांनीदेखील गीतेची उत्तम चिकित्सा केली आहे. या गीतेमुळे नक्की कोणास कोणती प्रेरणा मिळाली याचा सविस्तर ऊहापोह डॉ. कोसंबी यांनी केलेला आहे. ते दाखवून देतात की ज्या ग्रंथापासून आधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि पुढे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढय़ाची प्रेरणा घेतली त्याच गीता ग्रंथावरून अरिवदबाबूंना स्वातंत्र्यलढा सोडून आत्मचिंतनात मग्न होण्याची प्रेरणा मिळाली. शैव आणि वैष्णव, योगमार्गी, ज्ञानमार्गी आणि भक्तीमार्गी, सुधारणावादी आणि सनातनी अशा सर्वानाच अधूनमधून गीतेपासून प्रेरणा मिळत असते, असे डॉ. कोसंबी लिहितात. 'प्रत्येक जण आपल्याला सोयीस्कर असा या ग्रंथाचा अर्थ लावतो. जो ग्रंथ इतक्या परस्परविरोधी मनोवृत्तीच्या सर्वानाच सोयीस्कर अर्थ लावू देतो वा त्यांना लावता येतो तो ग्रंथ कमालीचा संदिग्ध असला पाहिजे, ही गोष्ट उघड आहे,' असे डॉ. कोसंबी यांचे ठाम प्रतिपादन होते. परंतु तरीही त्यांचा मोठेपणा हा की ज्या अर्थी हा ग्रंथ इतक्या परस्परविरोधी विचारधारेच्या लोकांना जवळचा वाटतो, त्या अर्थी त्याची काही तरी उपयुक्तता असली पाहिजे, असेही ते मान्य करतात.

    परंतु या अशा उपयुक्ततेस धर्माच्या बंधनात अडकवून तिची उदात्तता वाढवण्याचा सामुदायिक उद्योग आपल्याकडे सतत सुरू असतो. गाय या जनावरास अन्य प्राण्यांसारखाच एक असे न मानता तीस गोमातेच्या कोंदणात बसवण्यासारखेच हे. या अशा भाकड, निरुपयोगी म्हणून मालकांनी टाकलेल्या गोमाता आपल्याकडे रस्त्यारस्त्यांवर केविलवाण्या नजरेने उकिरडे शोधत असतात. खऱ्या उकिरडय़ांप्रमाणे वैचारिक उकिरडेदेखील आपल्याकडे देशभर पसरले असून त्यात अनेक जण सुखेनव रवंथ करीत असतात. अलीकडची वक्तव्ये याचेच निदर्शक. हा नवा गीताध्याय यातील सर्वात ताजा. तो रचणाऱ्या या सुषमा स्वराजबाईंना गीता इतकी प्रिय वा अनुकरणीय वाटत असेल तर त्यांनी स्वत:पासून तिचे आचरण करावयास सुरुवात करावी. सुख दु:खे समे कृत्वा यावर विश्वास ठेवून मोदी पंतप्रधान झाले काय किंवा स्वत:ला ते पद मिळाले काय वा न मिळाले काय, स्वराजबाईंनी आपले देशसेवेचे कार्य कोणताही जळफळाट न करता चालूच ठेवावयास हवे होते. सर्वाचा आत्मा एकच असतो. तेव्हा सोनिया गांधी यांना देशाचे नेतृत्व करावयाची संधी मिळाल्यास ती आपल्यालाच मिळाल्याचा आनंद या गीतेमुळे यापुढे आपल्याला होईल असे स्वराजबाईंनी जाहीर करावे.
    यापैकी अर्थातच काहीही होणार नाही. याचे कारण या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा करता येईल, असाच त्यांचा प्रयत्न आहे. संस्कृत शिकण्याचा मुद्दा चच्रेत आणणे असो वा रामजादे आणि हरामजादे ही विभागणी असो. हे सर्व मुद्दे उपस्थित केले जात आहेत कारण अन्य महत्त्वाच्या आघाडय़ांवर काहीही भरीव करून दाखवण्यात मोदी सरकारला अद्याप यश आलेले नाही. ही सर्व उपकथानके पुढे केली जात आहेत ती मूळ कथा सुरूच होऊ शकलेली नाही म्हणून. आता त्यात या नव्या गीताध्यायाची भर.
    अभ्यास न करता केवळ श्रद्धा आणि विश्वास यांवरच विसंबून राहायचे, तरीही अर्जुनाला कार्यप्रवण करणारा संदेश गीतेने दिला होता एवढे मान्य करावे लागेल. कार्यप्रवणतेचा तो धडा तर सरकारही शिकलेले दिसत नाही. अशा वेळी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी गीतेत स्वराजाध्यायाची भर घालू नये, हे बरे.

    ReplyDelete
  18. परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यानी भगवदगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. सुषमा स्वराज या एक जबाबदार नेत्या आणि केंद्रीय मंत्री असतानाही भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता तत्वालाच त्यानी आव्हान दिले आहे.

    स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये धर्माचे स्थान काय असावे, स्वतंत्र भारताचा कोणता धर्म असावा यावर बरीच चर्चा झाली. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकत्र राहत आहेत. भिन्नधर्मीयांची ही वैविध्यपूर्ण संस्क्रुती
    जपण्याबरोबरच धर्माधिष्ठित व्यवस्था भारताच्या प्रगतीत अडथळेच आणू शकते हे घटनाकाराना माहीत होते. त्यामूळेच स्वतंत्र भारताचा कोणताही एक अधिक्रुत धर्म असणार नाही अशी भूमिका घेतली गेली.

    राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील पहिलीच ओळ अशी आहे : 'आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा......'. मूळ घटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. तो 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केला. याचा अर्थ असा कि भारतीय राज्यसंस्थेचा कोणताही धर्म नसेल. धर्म ही बाब वैयक्तिक जीवनापुरती मर्यादित असेल. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कोणत्याही धर्माचा प्रचार, प्रसार आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य असेल. धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली जाणार नाही. प्रा. के. टी. शहा यानी ही दुरुस्ती सुचवली आणि ती मंजूर झाली.
    परंतु घटनेने मात्र सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्ष तत्व स्वीकारले होते. तश्या तरतूदीही घटनेत नमूद आहेत. घटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश आहे. यानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार कोणत्याही धर्माचा पुरस्कार करु शकते. व्यक्तीवर एखाद्या धर्माची, धार्मिक विचारप्रणालीची सक्ती करता येणार नाही अशी हमी घटनेनेच दिली असताना घटनेचीच शपथ घेवून राज्यकारभार करणार्या सुषमा स्वराज याना घटनेच्या मूलभुत तत्वांचाच विसर पडला कि काय ?

    घटनेतील धर्मनिरपेक्षता हे तत्व घटनेच्या मौलिक संरचनेचा भाग असून घटनादुरुस्ती करुनही हा भाग बदलता येणार नाही अशा प्रकारचे निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. केशवानंद भारती वि. केरळ राज्य (1973), एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (1994) अशा खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या मौलिक संरचनेची व्याख्या करताना 'धर्मनिरपेक्षता' हे तत्व मौलिक असल्याचा उल्लेख केला आहे.

    भारतीय संविधान या देशातील सर्वोच्च दस्तऐवज आहे. कोणत्याही धर्माचा ग्रंथ घटनेशी बरोबरी करु शकत नाही. स्वराज किंवा भाजपच्या इतर नेत्याना घटनेबद्दल किती प्रेम आहे ते जगजाहीर आहे. त्याना असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग त्यानी जरुर घ्यावा. मात्र कोणत्याही एका धर्माला झुकते माप देवून घटनेच्या मूलभुत तत्वानाच हरताळ फासू नये.

    ReplyDelete
  19. तुम्ही भगवद्गीता वाचली नसणार..ज्ञानेश्वरी वाचली नसणार, गीतारहस्य वाचले नसणार....! आणि स्वतःला सर्वज्ञ समजून गीतेवर टीका करत सुटलात...अर्थात हे काही वेगळं नाही...हिंदू,वैदिक, असा फरक करून असंही लोकांत कलह निर्माण करायला तुम्हाला आवडतंच...!

    ReplyDelete

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...