Monday, April 18, 2011

निर्जलीकरन: यंत्रसामग्री आणि बाजारपेठ


निर्जलीकरण प्रक्रिया मी आधीच्या लेखात थोडक्यात विषद केलेली आहेच. थोड्याशा चाचण्या घेवून प्रत्येक भाजीसाठी ती निर्धारीत करता येते. येथे मी यंत्रसामग्रीबद्दल माहिती देत आहे. हे लघुत्तम प्रकल्पासाठी आहे जे शेतक-यांना सहज वापरता येणे शक्य आहे. यात थोडेफार बदल प्रत्यक्ष स्थितीप्रमाणे व गरजांप्रमाणे करता येतील.
१. कटर्स/स्लायसर्स: हे काम मानवी श्रमाने करणे छोट्या क्षमतेच्या प्लांटसाठी सोयीस्कर आहे. कटर्स/स्लायसर्स हे प्रत्येक भाजीचा वकूब बघुन किती जाडी-लांबी ठेवायची याचा पुर्वनिर्नय घेवून ते करता येते. यासाठी अल्युमिनियमचे आछादन असलेले टेबल्स असावेत. भाजी स्वछ्छ धुतल्यानंतर प्रथम मुळे, अवांछित गवतादी भाग बाजुला करावेत. नंतर त्यांचे सुयोग्य, एकच परिमाण राहील या पद्धतीने कटिंग करावे. बटाटे, टोम्यटोदि फळ भाज्यांचे स्लायसिंग करावे. समजा १ टन प्रतिदिन क्षमतेचा प्लांट असेल तर ताशी १०० किलो माल प्रक्रियेसाठी तयार ठेवावा लागतो.
२. ब्लांचींग साठी batchनुसार सरासरी १५ ते २५ किलो माल २-५ मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात ठेवावा लागतो म्हणजे उत्पादित मालाचा दर्जा उंचावतो. त्यासाठी कोणत्याही धातुची, एवढा माल सामावु शकेल भांडी लागतील...लग्नात भोजन बनवायला लागतात तशी.
३. जाळीदार गाळण्या: माल थोडा वेळ उकडला कि तो स्टीलच्या चाळण्यात घ्यावा आणि पुर्ण पाणी निथळु द्यावे. या पाण्याचा पुनर्वापर करता येतो. करावा. काही वेळ त्याला नैसर्गिक तापमानातच सुकु द्यावे. जर हवेत पावसाळी आद्रता असेल वा उन्हाचा अभाव असेल तर मात्र सुकवण्यात अर्थ राहणार नाही...मालाला सरळ सुकवण्याच्या प्रक्रियेत न्यावे.
४. ड्रायर: दोन प्रकारचे ड्रायर मी सुचवतो. दोन्ही टनेल ड्रायरच आहेत पण रचना वेगळी आहे.
अ. कन्वेयर बेल्ट ड्रायर: यात ड्रायरमद्धे एक फिरता बेल्ट असतो जो जाळीदार स्टेनलेस स्टीलचा असतो. हा बेल्ट ड्रायरच्या बोडीच्या मधोमध रोलर्सवरुन फिरवला जातो. हा वेग अत्यंत कमी असल्याने हे काम मानवी श्रमानेही करता येते वा टायमिंग स्पीड कंट्रोलर मार्फत नियंत्रीत ठेवता येतो. मालात पाण्याचे प्रमाण जेवढे अधिक तेवढाच याचा वेगही कमी असतो. या बेल्टवर सरासरी २ ते २.५ इंच उंच एवढाच थर समप्रमाणात विखरावा लागतो. बेल्ट जसजसा पुढे सरकेल त्या प्रमानात माल सतत विखरवत रहावा. ५ ते १० तासांत सायकल पुर्ण होते...म्हणजे सुकलेला माल दुस-या बाजुने बाहेर येवु लागतो. त्याची टेस्ट (म्हणजे त्यातील उर्वरीत जलांश, रंग आणि राखेचे प्रमाण) घेवून जर जलांश अधिक झाला असेल तर नंतर असा माल ड्रायरमधुन जास्त वेगाने पास करावा म्हनजे अधिकचा जलांश निघुन जाईल.
ब. ट्रे टनेल ड्रायर: यात ड्रायर तसाच असतो पण त्याची उंची अधिक असते. यात ट्रे वर ट्रे ठेवता येतील अशा ट्रोली लागतात. माल वर सांगीतल्याप्रमाणेच सम प्रमानात पसरवायचा असतो. वेगातही बदल नसतो पण हे काम मानवी श्रमानेच पण अत्यंत दक्षतेने करावे लागते.
हे दोन्ही पद्धतीचे टनेल ड्रायर बनवणे सोपे आहे. त्यासाठी फार उच्च दर्जाची तांत्रीक क्षमता लागत नाही. महत्वाचे म्हणजे जी उष्ण हवा आत सोडली जाते तीचे आवर्तन आणि वितरण समप्रमानात झाले पाहिजे. अन्यथा त्याचा अंतिम उत्पादनावर विपरीत परिणाम होवु शकतो. या ड्रायर्स मद्धे २-४ इन्स्पेक्शन विंडो (काचेच्या) ठेवलेल्या असतात. रंगावरुन मालाची प्रत तपासता येते. तसेच कोन्वेयर बेल्ट ड्रायरमद्धे ठरावीक अंतरावर माल उलत-सुलट करता येईल या पद्धतीने प्रयुक्ती योजलेली असते म्हनजे सर्व माल उचीत उष्णता मिळवुन समप्रमानात निर्जलीक्रुत होवु शकेल.
५. होट एयर ब्लोवर: प्रत्येक पदार्थासाठी आवश्यक उष्णता वेगळी असते. हा ब्लोअर शक्यतो एलेक्ट्रिकल असावा म्हनजे वांछीत तापमान कंट्रोलर्स मार्फत साधता येते. यासाठी फारशी वीज लागत नाही कारण आवश्यक तापमान हे अधिकाधिक १५० डिग्री लागते. पण ब्लोअरची क्षमता ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने फ़ोर्सड ड्राफ़्ट निर्मान करत एकंदरीत वोल्युम हा टनेलच्या आकारानुसार ठरवावा लागतो. या ब्लोअर मधुन बाहेर येणारी उष्ण हवा चार वेगवेगळ्या पाईप्स मधुन टनेलची सुरुवात (वरुन एक व खालुन एक आणि ३५% अंतर ओलांडले जाते तेथेही खालुन आणि वरुन अशा पद्धतील नि:श्वास द्यावे लागतात. ही रचना प्रत्यक्ष लोकेशन आणि ड्रायरचे आकारमान यावरुन ठरवावे लागते.
बाहेर येणारी गरम हवा ही पुर्ण स्यचुरेट होते कारण भाज्यांतील जलांश काढुन घेतल्याने ती हवा वाफेने परिपृक्त झालेली असते. तिचा पुनर्वापर करु नये. या हवेस बाहेर पडण्यासाठी दोन निश्वास देता येतात.
६. बाहेर येणारा माल दोन पद्धतीने तपासावा:
अ. रंग समान आहे हे पहावे, अत्यंत वाळलेला वा ओला राहीलेला निरुपयोगी असा माल हाताने बाजुला काढावा.
ब. इलेक्ट्रोनिक उपकरणाने सरासरी जलांश पहावा.
उपयुक्त मालात आद्रतेचे/जलांशाचे प्रमाण कोणत्याही स्थितीत जर ९५% पेक्षा कमी असेल तर प्रक्रिया वेगात/तापमानात आवश्यक बदल करावा.
७. प्याकिंग: येथे माल कोणत्या ग्राहकासाठी बनवत आहोत याचा विचार करुनच प्याकिंग करायला हवे.
अ. जर होटेल्स, मसाला उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग हे ग्राहक असतील तर २ ते ५ किलो क्षमतेच्या प्लास्टिक पिशव्यांत प्याकिंग करुन ते सील करावे.
ब. जर हा माल सरळ ग्राहकांसाठी असेल (अंतिम उपभोक्ता) मॉल्स मधुन विकायचा असेल तर अत्यंत आकर्षक अशा पोचेस मधुन ते प्याक करावे. अर्थात त्यासाठी प्याकिंगची अत्यंत काळजी घ्यावी लागेल.
माल जोवर नैसर्गिक तापमानाला आलेला नाही तोवर कधीही प्याकिंग करु नये. तोवर अर्थात माल पुन्हा हवेतील आद्रताही शोषणार नाही यासाठी तो कार्टन्स मद्धे साठवावा....आणि बाष्प-शोषक द्रव्यांचे प्यकेट्स पसरवुन ठेवा.
बाजारपेठ:
निर्जलीक्रुत मालाची बाजारपेठ अवाढव्य आहे. ती जागतीक आहे. घरोघर आहे. सैन्यदलांसाठी आहे तशीच पार ट्रेकिनंगला जाणा-यांसाठी आहे. पण या दिशेने विशेष प्रयत्न झालेलेच नसल्याने आपल्याला कळत नाही एवढेच.
पण त्याआधी आपण निर्जलीक्रुत मालाची वैशिष्ट्ये समजावुन घ्या.
१. निर्जलीक्रुत माल हा साध्या पाण्यात ५-१० मिनिटे ठेवताच ते पाणी शोषुन पुन्हा ताज्या मालासारखे बनतो.
२, मुळ चवीत किंचीत फरक असला तरी भाज्या बनवल्या तर त्या जास्त चविष्ट होतात.
३. ड्राय टोम्यटो, बटाटे, फुलकोबी इ. पदार्थ स्न्याक्स्प्रमाणे सरळ वापरता येतात.
४. कोथींबीर तर सरळ जशी एरवी ताजी कोथींबीर वापरतो त्याप्रमाणे वापरता येते...वाया जाण्याचे प्रमाण शुन्य. एरवी आपण ताजी आनली तरी ३० ते ५०% (अगदी फ़्रीझ मद्धे ठेवुनही) वाया जातेच.
५. सुप्स ते बिर्याण्या-पुलावात सरळ वापरता येतात.
६. सकसता वाढली असल्याने प्रोटीन्सचा लाभ मिळतो...फ्याट्स मात्र निघुन गेलेले असतात...
७. अनेक पदार्थ जे १२ महिने उपलब्ध नसतात ते उपलब्ध होतात. उदा. कै-या...फळे... इ.इ.इ. अनेक प्रकारच्या पालेभाज्या वा फळभाज्या ज्या फक्त सीझनल असतात.
८. हे पदार्थ किमान २ वर्ष टिकत असल्याने बाजारपेठेतील बदलत्या भावांचा फरक पडत नाही.
९. ताज्या भाज्यांपेक्षा वजनाने कमी...निवडणे...कापत बसणे ही कटकट नाही त्यामुळे आजच्या गतीमान युगात झटपट स्वयंपाकासाठी अत्यंत उपयुक्त.
१०. हवे तेंव्हा हवा तो पदार्थ उपलब्ध...सीझनची वाट पाहण्याची गरजच नाही.
अर्थव्यवस्थेचा-नागरिकांचा आणि उत्पादकांचा फायदा:
१. कोन्ताही शेतमाल वाया जाणार नसल्याने जवळपास प्रतिवर्षी ७० ते ८० हजार कोटींची राष्ट्रीय बचत.
२. शेतक-यांना बाजारभाव नाही म्हणुन काहीही फेकायची नसलेली गरज. यातुन शेतक-यांची होणारी आर्थिक भरभराट.
३. गावोगाव वा पंचक्रोशीत किमान एकेक उद्योग निघाल्यास किमान १० ते १०० जणांना मिळणारा रोजगार. शहराकडे पळण्याची गरज नाही. शहरांवरचा बोजा कमी.
४. एकुणातील शेती अर्थव्यवस्था ख-या मालकांच्या हातात जाईल कारण दल्ल्यांचा सहभाग अत्यल्प.
५. उपभोक्त्यांना समाधान कारण कमी श्रमात अन्न बनवणे सोपे आणि सुघड.
६. होटेल्स फार मोठे ग्राहक कारण त्यांचा कामगारांवरचा खर्च वाचतो आणि व्यक्तिगत ग्राहकाचा वेळ वाचतो.
७. राष्ट्रात अन्न-दुर्भीक्ष निर्मान होवु शकणार नाही.
८. सैन्याला/ट्रेकर्सना अत्यंत कमी वजन वहावे लागेल...थैल्याच्या थैल्या भरुन खाद्य बरोबर ठेवायची गरज नाही.
९. उत्पादकास नेहमीच उत्पादन खर्चाच्या वर किमान २५% आर्थिक फायदा.
१०. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो...तो वाचेल...म्हनजेच पुन्हा अर्थिक भरभराटच!
मी येथे मोठ्या प्रकल्प-उभारणीची गोष्ट करत नाहीहे. तो करुही नका कारण मोठ्या प्रकल्पाच्या अडचणी मोठ्याच असतात...विशेशता: अन्न प्रक्रिया उद्योगात. कारण तेवड्या मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळवणे सोपे नसते. शेतकरीही सहकार्य करतील याची खात्री नसते. स्थानिक पातळीवर जे करता येईल तेच कायम टीकणार आहे. एका अर्थाने ग्राम-विकास हा अशाच लघु-औद्योगीकरणाने होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या...आज big is beautiful
हा काळ आला आहे...पण small is beautiful हे आपल्याला कधीच कळाले नाही. कारण त्यामागे आपली भारतीय मानसिकता आहे.
-संजय सोनवणी

1 comment:

  1. sirji,mi shetakaryanparant pohachavato apale vichar

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...