Monday, July 4, 2022

रामाने सीतेबाबत काय म्हटले?

काही वर्षांपूर्वी दै. पुण्यनगरीत माझा रामायण आधीचे कि महाभारत हा लेख प्रसिद्ध झाला होता.  त्यातील राम सीतेची सुटका केल्यावर तिला उद्देशून जे बोलतो त्यावर अनेक पुरातन-रामवादी वाचक खवळलेले होते.  "तुम्ही राम-सीतेचा अपमान केला" असे म्हणत होते. त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करुन खुद्द वाल्मिकी रामायणात काय म्हटले आहे ते मी फेसबुकवर लिहिले होते ते असे-

(वाल्मिकी रामायण, युद्धकांड. सर्ग ११८)

१) रक्षता तु मया वृतमपवादं च सर्वश...प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यन्गं च परिरक्षता: (श्लोक १६)

(पण रावणाला मारुन मी माझ्या चरित्राचे रक्षण केले असून माझ्या प्रख्यात वंशाला लागलेला कलंक धुवून काढला आहे.)

२) प्राप्तचारित्रसंदेहा मम प्रतिमुखे स्थिता.....दीपो नेत्रातुरन्येव प्रतिकूलासि मे दृढम (श्लोक १७)

(मला तुझ्या चारित्र्यावर संशय उत्पन्न झाला असून मला तू माझ्या समोर उभी आहेस हेही सहन होत नाही.)

३) तद्गच्छ ह्यभ्यनुज्ञाता यथेष्टं जनकात्मजे....एता दश दिशो भद्रे कार्यमस्ति न मे त्वया (श्लोक १८)

(आता तुला निघून जायला दाही दिशा मोकळ्या आहेत. तुला जेथे जायचे असेल तेथे जायला तू मुक्त आहेस.)

४) क: पुमान्हि कुले जात: स्त्रियं परगृहेषिताम....तेजस्वी पुनरादद्यात्सुहृल्लेख्येन चेतसा (श्लोक १९)

(परगृही राहिलेल्या स्त्रीला आपली समजून कोण उच्चकुलीन अंगीकारणार?)

५) रावणांकपरिभ्रष्टां दृष्टां दुष्टेने चक्षुषा...कथं त्वां पुनराद्यां कुलं व्यपदिशन्महत (श्लोक २०)

(रावणाच्या मांडीवर बसलेली, त्याच्या दुष्ट हेतुने पाहिली गेलेली जी तु, तिला मी एवढ्या मोठ्या कुळात जन्मलेला का ग्रहण करु?)

६) तदर्थ निर्जिता मे त्वं यश: प्रत्याह्रतं मया....नास्ति मे त्वत्यभिष्वंगो यथेष्टं गम्यतामित: (श्लोक २१)

(ज्या किर्तीसाठी मी तुझा उद्धार केला ती मला मिळाली. आता मला तुझी गरज नाही. आता तू हवे तिथे जाऊ शकतेस.)

७) इति प्रव्याहृतं भद्रे मयीतत्कृत्वुद्धिना...लक्ष्मणे भरते वा त्वं वुद्धिं यथासुखम...

सुग्रीवे वानरेन्द्रे वा राक्षसेंद्रे विभिषणे...निवेशय मन: सीते यथा वा सुखमात्मन: (श्लोक २२-२३)

( हे भद्रे, मी निश्चयाने सांगतो को लक्ष्मण, भरत, सुग्रीव अथवा विभीषण यापैकी जोही तुला सुख देईल असे तुला वाटते त्याबरोबर खुशाल तू राहु शकतेस.)

८) न हि त्वां रावणो दृष्ट्वा दिव्य रुपां मनोरमाम...मर्षयेत चिरें सीते स्वगृहे परिवर्तिनिम (श्लोक २४)

( सीते, तुझे दीव्य नि मनोहर रुप पाहुन रावणाने त्याला जे वाटले ते तुझ्याशी केले असेल कारण त्याच्या घरी तू खूप दिवस राहिलीस.)

हे वरील वाल्मिकी रामायणातील श्लोक. याआधीही आणि नंतर राम जे वागला ते इश्वरी अवताराला साजेशे नव्हे तर एका सामान्य संशयग्रस्त मनुष्याप्रमाणे पण आत्मप्रौढीसाठी रावणाशी लढून बायकोला वा-यावर सोडू पाहण-या क्षुद्र माणसाप्रमाणे.

आज मला जेही फोन आले ते सामान्यातिसामान्य आहेत. त्यांना वाल्मिकीने जे म्हटलेय तेही मान्य नाही. बाळबोध आणि मुर्ख श्रद्धेने भारतियांच्या विवेकबुद्धीचा घात केला होता आणि आजही करत आहे. राम सामान्य कि असामान्य हे वाल्मिकींनीच वरील श्लोकांतुन सांगितले आहे.

मी माझे मत देण्याची आवश्यक्यताही नाही एवढे हे सुस्पष्ट आहे.

काहीही असो...आज पर्जन्य एकीकडॆ बरसला...रामभक्तांच्या शिव्यांचा मारा दुसरीकडे!

राम पराक्रमी असेल, पण होता एक सामान्य मानव आणि त्याच्यात माणसासारखे असतील ते गुणदोष होते हे मान्य करायला कोणती हरकत?

मुर्खोंके देश में और क्या हो सकता है?

 

1 comment:

  1. जबरदस्त वास्तव समोर ठेवलेत सर... रामाच्या आदर्शाचे खोटे ढोल बडवणाऱ्यांना संस्कृत वाचता येत नाही. अर्थ त्याहून कळणार नाही. म्हणून या मुर्खांना सनातनी कट्टरपंथी लोक हवे तसे वापरून घेतात. तुम्हाला फोन करून वाईटसाईट बोलणारे धमक्या देणारे हेच ते मूर्ख आहेत ज्यांना हिंदू धर्म कधी कळलाच नाही. एकदम चिरफाड करणारी एक घाव आणि सरळ सरळ दोन तुकडे करणारी छान मांडणी सर . वाल्मिकी रामायणात जे संस्कृत मध्ये दिलेले आहे त्याचा आजच्या मराठीत सरळ अनुवाद करून हे जळजळीत वास्तव लोकांसमोर मांडणे सोपे काम नव्हे. हा सूर्य हा जयद्रथ हा तुमचा खाक्या स्वभाव म्हणूनच मला आवडतो. जय सीता मैय्या कि जिने हा अन्याय सहन केला. Really Great

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...